मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

पारंपरिक?

टीव्हीवरच्या सगळ्या कार्यक्रमांपैकी खाद्य पदार्थांबद्दलचे सर्व प्रकारचे कार्यक्रम बघायला मला मनापासून आवडते. Food Factory असो किंवा Master Chef हा कार्यक्रम असो. वेगवेगळ्या खाद्य संस्कृती बघण्याचा मला छंद आहे. Fox Life , TLC , Food-Food वगैरे वाहिन्यांवरचे कार्यक्रम बघून मला नेहमी असे वाटते की आपणही अशा वाहिन्यांसाठी काम करावे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये फक्त खादाडी करत आणि पदार्थांवर भाष्य करत हिंडावे. ते शक्य होईल न होईल. परंतु, निदान पुण्यातल्या पुण्यात तरी असा कार्यक्रम करत हिंडावे असे अनेकदा मनांत येते. रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचे आणि पारंपरिक पदार्थांबद्दलचे कार्यक्रम मला विशेष आवडतात. एखाद्या कार्यक्रमात खास पारंपरिक पदार्थाची पाककृती दाखवत असतात तेव्हां तर मी अगदी टीव्हीला डोळे आणि कान लावून बसते. कोळाचे पोहे, वरणफळे, धपाटे, उकडीचे मोदक, पाकातले चिरोटे असे खास पारंपरिक पदार्थ आपल्या घरांमधून हल्ली फारसे  केले जात नाहीत. असे पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी,एखादी वाहिनीच आपण चालू करावी असेही मला वाटते.
परवा एकदा Fox Life किंवा तत्सम  वाहिनीवर एक कार्यक्रम बघत होते. त्या कार्यक्रमाच्या 'गोऱ्या' निवेदकाने एका भारतीय सुंदरीला एक पारंपरिक भारतीय मिठाई दाखवायला सांगितली. त्या सुंदरीने भारतीय खाद्यसंस्कृतीमधील 'लाडू' या पदार्थाचे महत्व सांगितले आणि एका प्रकारच्या लाडवाची पाककृती दाखवते अशी प्रस्तावना केली.  आता ही कुठले लाडू दाखवतेय ते बघावे, म्हणून मी सरसावून बसले. 'पारंपारिक लाडू' या नावाखाली तिने चक्क Milkmaid आणि सुक्या खोबऱ्याचे लाडू तयार केले. मी डोक्याला हातच लावून घेतला.  माझी आई, आजी, काकू, मावशी आणि आत्या यांच्या हातच्या  अनेक प्रकारच्या साजूक लाडूंच्या आठवणीने, मन भरून आले. Milkmaid चे लाडू 'पारंपरिक' आहेत, हे त्या सुंदरीने सांगितल्याने आपल्या गृहिणींचा तसा समज होऊ नये यासाठी अळवाच्या आणि साबुदाण्याच्या लाडवापासून ते खास मोतीचूर, डिंक किंवा चुरम्याच्या लाडवापर्यंत सर्व पाककृती दाखवण्याचा मी आता निश्चयच केलाय.
पण, त्या माझ्या आवडत्या कार्यक्रमांमधून दाखवले जाणारे इतर देशांतले 'पारंपरिक पदार्थ' खरोखरीच पारंपरिक असतात की नाही, हा माझ्यापुढे मोठा प्रश्नच आहे.

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

पेशावरची फुले

पेशावरची फुले 

पेशावरच्या मृतांची अजून,नेमकी संख्याही नव्हती कळली
  आरोपप्रत्यारोपांसाठी, दोन्हीकडे अनेकांची जीभ वळवळली

कोणीतरी तिकडे बोलले, यामागे आहे इकडच्यांचाच हात
भावनांचा भडका उसळला मग, दोन्ही बाजूंच्या डोक्यांत
  
आमची संस्कृती, त्यांची संस्कृती, झाला उहापोह मग सुरु
 आपली संस्कृती एकच आहे, इतिहास देईल कसे विसरू ?

  कळ लावून, रेषा आखून, सोडून गेले ते आपसांत भांडायला
    नुकसान दोघांचेही  होतय, हे नको का आम्हाला कळायला? 

हजारो वर्षांची सभ्यता आपली, सिंधू नदीच्या कुशीतली
कुणी रेषा ओढल्याने, अचानक होईल अशीकशी वेगळी?

    प्रतिशोधाची ठिणगी टाकणारे, अनेक आहेत रेषेच्या आरपार
     ती रेषा मिटवून टाकूया का आपण, विचार करून सारासार?   


डॉ. स्वाती बापट 
swateebapat@gmail.com 
९४२२०३५८७५