बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

८. रामेश्वराचा रसास्वाद आणि शंखनाद !

रामेश्वरच्या सहलीबद्दल एक सविस्तर लेखमाला लिहून झाली असली तरीही अगदी छोट्या-छोट्या काही गोष्टी आणि प्रसंगांबद्दल लिहायचे राहूनच गेले होते. त्याची रुखरुख मनाला लागून असल्यामुळे ते लिहूनच काढावे असे मी ठरवले. 

सहलीला जायच्या आधी, एखादे यूट्यूब चॅनेल बघून किंवा विशिष्ट लेख वाचून, मी हे बघून ठेवलेले असते की, आपण जातोय त्या-त्या शहरात, 'कुठली ठिकाणे पाहायची?  तसेच तिथे काय विशेष खाद्यपदार्थ मिळतात?' आणि त्यापैकी आपण काय, कुठे आणि कधी खायचे हेही शक्यतो मी आधीच ठरवून ठेवलेले असते. मदुराई आणि रामेश्वरला जाण्यापूर्वी मात्र या गोष्टींचा मी विचारच केला नव्हता. गेल्या पाच वर्षांमध्ये, माझी आई वारंवार आजारी पडत असल्याने आणि तिच्या मृत्यूनंतर कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे, मी कुठल्याही सहलीला जाऊ शकले नव्हते. त्यामुळे रामेश्वरला निघताना, आपण कुठेतरी बाहेर प्रवासाला निघतो आहोत, या गोष्टीचे समाधान इतके होते की कोणत्याही नियोजनाचा विचारच माझ्या मनात आला नव्हता. 

मदुराई-रामेश्वरला मिळणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांबाबत मी आधी माहिती गोळा केलेली नसली तरी, तिथे गेल्यावर वेगळ्या दिसणाऱ्या खाद्यपदार्थांवर माझे चटकन लक्ष जात होतेच. तिथल्या टपऱ्यावर टांगलेली, लाल रंगाच्या सालीची केळी मी खाऊन बघितली. तिथल्या शहाळ्याच्या गाड्यांवर, आपल्याकडे मिळतात तशी हिरव्या रंगाची शहाळी होती. त्याचबरोबर, हळदीच्या रंगाची, पिवळीधमक्क शहाळीही होती. त्या पिवळ्या शहाळ्यांचे पाणी हिरव्या शहाळ्यांच्या पाण्यापेक्षा फार काही वेगळे नव्हते. एका शहाळ्याच्या गाडीच्या शेजारी, एक मनुष्य एक "एलनीर सरबत" तयार करून विकत होता. भिजवलेले तुळशीचे बी, नन्नारी सिरप, शहाळ्याच्या कोवळ्या मलईचे तुकडे आणि बदाम पिसिन (बदामाच्या झाडाचा डिंक), हे सगळे नारळाच्या पाण्यामध्ये घालून तो ते पेय बनवत होता. शिरीषच्या आग्रहाखातर मी ते पेय पिऊन बघितले, पण मला विशेष आवडले नाही. मदुराईचा फेमस "जिल जिल जिगरथंडा" (स्थानिक उच्चार "जिगरदंडा"), जिव्हेला आणि जीवाला शांती देऊन गेला. 'थेनाई कुरुथु' नावाच्या, नारळाच्या झाडाच्या आतल्या कोवळ्या बुंध्याच्या चकत्या मी खाऊन बघितल्या. त्या वेगळ्याच चवीच्या चकत्या मात्र मला फार आवडल्या. मदुराईच्या रस्त्यांवरच्या हातगाड्यांवर नारळाचे कोवळे खोड घेऊन उभे असलेले विक्रेते ठिकठिकाणी दिसतात. कोकणपट्टीत किंवा गोव्यामध्ये, इतकी नारळाची झाडे असूनही, तिथे या चकत्या का मिळत नाहीत? याचे मला नवल वाटले. 

आम्ही १७ ऑक्टोबरला दुपारी रामेश्वर दर्शनासाठी गेलो असता, आमच्या पर्सेस, चपला आणि मोबाईल, आम्हाला देवळाबाहेरच्या दुकानातच ठेवावे लागले होते. त्यामुळे, १८ ऑक्टोबरच्या पहाटे, मी आणि माझी वहिनी प्राची, 'स्फटिक लिंग' दर्शनासाठी रामेश्वराच्या देवळाकडे निघालो तेंव्हा आम्ही आमच्या पर्सेस घेतल्याच नव्हत्या. टॅक्सीचालकाने आम्हाला देवळाच्या पश्चिमद्वाराजवळ सोडले. चपला टॅक्सीत ठेवून, आम्ही दोघी देवळाच्या पूर्वद्वारापर्यंत अनवाणी चालत गेलो. दोघीत मिळून एक मोबाईल मात्र आम्ही बरोबर ठेवला होता. देवळात जाण्यापूर्वी मोबाईल दुकानातील लॉकरमध्ये ठेवायचा आणि दर्शन करून बाहेर पडल्यावर, मोबाईलवरून टॅक्सीचालकाला फोन करून बोलावून घ्यायचे, असे आम्ही ठरवले होते. दर्शनासाठी प्रत्येकी दोनशे रुपयांचे तिकीट काढायचे होते. त्यासाठीचे चारशे रुपये आणि वर काही लागलेच तर थोडेसे पैसे असावेत, अशा विचाराने आम्ही आमच्याजवळ शंभर रुपयांच्या एकूण फक्त पाचच नोटा ठेवल्या होत्या.  

पूर्वद्वाराजवळ पोहोचताच, एका दुकानाच्या लॉकरमध्ये फोन ठेवायला मी गेले. दुकानदाराने फोन ठेवण्यासाठी १० रुपये मागितले. माझ्याकडे किंवा त्याच्याकडेही शंभराचे सुटे नव्हते. आत्ता फोन आणि १०० रुपये ठेऊन जा आणि परत जाताना फोन आणि ९० रुपये घेऊन जा, असा आग्रह त्या दुकानदाराने धरला. "अहो, तुमच्याकडे माझा फोन आहेच. मी दर्शन घेऊन आल्यावर तुम्हाला दहा रुपये देते आणि माझा फोन घेऊन जाते", असे माझे म्हणणे होते. पण तो दुकानदार काही केल्या ऐकेना. बरं, तो मोबाईल आणि शंभर रुपये ठेऊन घेतल्याची पावतीही द्यायला तयार नव्हता. आजूबाजूची सगळी दुकाने बंद होती. आता काय करावे? हा माझ्यापुढे प्रश्न होता. तेव्हड्यात आणखी एक दुकानदार त्याचे दुकान उघडत असल्याचे मला दिसले. मी त्यांना फोन ठेऊन घेण्याची विनंती केली. त्याने कुठलेही आढेवेढे न घेता माझा फोन ठेऊन घेतला. त्याच्याकडच्या पावती पुस्तकात कार्बन पेपर ठेऊन, माझा फोन नंबर आणि नाव लिहून घेऊन, रीतसर पावती दिली. "दर्शन झाल्यावर दहा रुपये देऊन फोन घेऊन जा" असे त्याने मला सांगितले. 

'स्फटिक लिंग' दर्शन झाल्यावर मी फोन घ्यायला गेले. आता आमच्याकडे १०० रुपयाची एकच नोट राहिली होती. पुन्हा सुट्या पैशाचा प्रश्न होताच. दुकानदाराकडेही सुटे ९० रुपये नव्हते. मी त्याला सुचवले, "तुम्ही आत्ता हे १०० रुपये ठेऊन घ्या, संध्याकाळी अभिषेकाच्या निमित्ताने मी देवळात येणारच आहे, त्यावेळेस मला ९० रुपये परत करा" मात्र त्याने १०० रुपयाची नोट ठेऊन घेण्यास नकार दिला, आणि माझा फोनही मला परत दिला. "संध्याकाळी याल तेव्हा माझे दहा रुपये देऊन जा" इतकेच तो म्हणाला आणि आपल्या कामाला लागला. 

संध्याकाळी अभिषेक करण्यासाठी आम्ही दोघी पुन्हा देवळात गेलो. आमची टॅक्सी पश्चिमद्वारापाशी असली तरी, अभिषेक झाल्यावर पूर्वद्वारातून बाहेर पडून त्या दुकानदाराचे दहा रुपये आम्ही चुकते केले. न राहवून मी त्या दुकानदाराला प्रश्न केला, "मी तुमचे पैसे बुडवेन, ही भीती तुम्हाला वाटली नाही का?  तुमचे पैसे बुडू नयेत म्हणून तुम्ही मला दुकानातील इतर काही वस्तू घेण्याचा आग्रह कसा काय केला नाहीत?" 

त्या दुकानदाराने दिलेले उत्तर अतिशय मार्मिक होते. "तुम्ही माझे पैसे दिले नसते तरीही, तुमचा मोबाईल ठेऊन घेऊन, देवदर्शन करण्यासाठी मी तुम्हाला मदत केल्याचे पुण्य मला मिळणारच होते ना? मोबाईल ठेऊन घेण्या बद्दलचे दहा रुपये मिळावेत, यासाठी तुम्हाला माझ्या दुकानातली एखादी वस्तू घ्यायला लावणे अयोग्य झाले असते. मी तसे केले असते तर मला पाप लागले असते ना?" त्या दुकानदाराच्या प्रगल्भ विचारसरणीचे मला प्रचंड कौतुक वाटले. देवाच्या व्दारापाशी दुकानदारी करत असलेल्या त्या दोन दुकानदारांच्या विचारसरणीतील विरोधभासही मला प्रकर्षाने जाणवला. 

मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिराच्या बाहेर, एका फिरत्या विक्रेत्याने शिरीषचा पिच्छा पुरवला होता. तो माणूस मीनाक्षीअम्मनच्या चित्रांची पदके असलेल्या सोनेरी चेन्स विकत होता. शिरीषने त्याच्याकडून बऱ्याच चेन्स विकत घेतलेल्या पाहून मला आश्चर्य वाटले. इतक्या दूर यात्रेला आलोच आहे तर नातेवाईक, मित्रमंडळी, नोकरचाकरांसाठी छोटेसे काहीतरी घेऊन जावे, अशा विचाराने त्या चेन्स घेतल्याचे त्याने मला सांगितले. मला त्याची कल्पना आवडली. त्यामुळे, संध्याकाळी नायकर पॅलेसमध्ये जाताना मीही एक चेन विकत घेतली. माझ्या दिवंगत आईच्या घरी काम करणाऱ्या, एका देवभक्त मोलकरणीला ती द्यावी असे माझ्या मनात होते. 

रामेश्वरच्या सहलीनंतर दिवाळीसाठी सोलापूरला गेल्यावर, मीनाक्षीअम्मनच्या चित्राचे पदक असलेली चेन आणि मदुराई-रामेश्वरहून आणलेला प्रसाद मी त्या मोलकरणीला दिला. ती खूपच भारावून गेली. आम्ही रामेश्वराचे दर्शन घेऊन आलेलो असल्याने ती आम्हा तिघांच्याही पाय पडली. रामेश्वराची सहल तर आनंदमय झालीच होती. पण त्या दर्शनाचा आनंद अप्रत्यक्षपणे का होईना आपण त्या भाविक मोलकरणीला देऊ शकलो, याचेच समाधान मला अधिक महत्वाचे वाटले. 

शिरीष आणि गिरीशने रामेश्वर आणि धनुष्यकोडी येथे मोठमोठाले शंख विकत घेतले. पण, दुकानदाराने खणखणीत आवाजात वाजवून दाखवलेले शंख, आपण शंखनाद करायला गेलो की तसे वाजत नाहीत असे लक्षात आले. रामेश्वरहून आल्यावर, श्रीमद्भग्वदगीता, रामरक्षा आणि इतर श्लोकांचे स्मरण आणि पठण मी सुरु केले आहे असे मागच्या लेखात मी लिहिलेच होते. गीतेच्या पहिल्या अध्यायात, कुरुक्षेत्रावर वेगवेगळ्या लढवय्यांनी आपापल्या, विशिष्ट नावांच्या शंखांचा नाद करून युद्ध कसे घोषित केले, याचे वर्णन आहे. ते ऐकल्यावर मात्र मला मी आणि आनंदने शंख विकत घेतले नाहीत याचे वाईट वाटते आहे. आम्हा दोघांपैकी कोणालाही दुसऱ्या व्यक्तीशी भांडण्याची उर्मी आलीच, तर अघोषित युद्ध करण्यापेक्षा, आपापल्या शंखाचा नाद करून, ते घोषित करायला कदाचित जास्त मजा आली असती, असे आता वाटते. 

म्हणून म्हणते, तुमच्यापैकी कोणी रामेश्वरला गेलातच तर शंख आणायला विसरू नका बरं का !



बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

७. रामरक्षां पठेत्प्राज्ञ: ...

१८ ऑक्टोबरला पहाटे मी व माझी वहिनी प्राची स्फटिकदर्शनाची अनुभूती घेऊन सकाळी साडेसात वाजेपर्यंत हॉटेलवर परतलो. त्याआधी, संध्याकाळचा अभिषेक करण्यासाठी गुरुजींशी पक्के बोलणे केले होते. नाश्ता झाल्यावर आम्ही सगळेजण इतर ठिकाणे बघायला बाहेर पडलो. सर्वप्रथम, दिवंगत राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलाम यांचे स्मारक बघायला गेलो. रामेश्वरजवळ  पीकारंबू  येथे डॉक्टर कलामांना दफन केले आहे. त्याच ठिकाणी उभारलेल्या या संग्रहालयाचे उदघाट्न, डॉ. कलामांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशी, म्हणजे २७ जुलै २०१७ ला,  पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झाले. या संग्रहालयात प्रवेश विनामूल्य असला तरी, तिथे जतन करून ठेवलेला ठेवा मात्र अमूल्य आहे. प्रवेशद्वारावरच "मिसाईल मॅन" ची ओळख सांगणारी, 'अग्नी' क्षेपणास्त्राची प्रतिकृती आहे. डॉ. कलामांच्या काही वैयक्तिक वापरातल्या वस्तू, व अनेक छायाचित्रे आणि पेंटिंग्ज या संग्रहालयात आहेत. डॉ. कलाम वीणा वादनात निपुण होते. त्यामुळे, ते वीणा वादन करीतअसतानाचा त्यांचा एक सुंदर पुतळा आहे. तसेच डॉ.  कलमाची काही भाषणे आपल्याला वाचायला मिळतात.
 
संग्रहालय बघून झाल्यावर सगळ्यांनी  रस्त्यावरच्या शहाळ्याच्या गाडीवर नारळपाण्याचा आस्वाद घेतला.  त्यानंतर  आम्ही कोदंडरामस्वामी मंदिर बघायला निघालो. धनुषकोडीच्या रस्त्यावर, रामेश्वरपासून सुमारे १० किलोमीटरवर, डाव्या बाजूला एका बेटाकडे जाणारा रस्ता आहे. एका बाजूने बंगाल महासागर आणि दुसऱ्या बाजूने मन्नारची खाडी यांनी वेढलेल्या या बेटावर, हे पुरातन मंदिर आहे. यामध्ये कोदंडधारी (धनुर्धारी) राम, आणि  लक्ष्मण, सीता, हनुमान व बिभीषण यांच्या, काळ्या दगडातील रेखीव मूर्ती आहेत. रावणाचा वध केल्यानंतर, याच जागी प्रभू रामचंद्रांनी  बिभीषणाला पट्टाभिषेक किंवा राज्याभिषेक केला अशी पौराणिक कथा, या मंदिराबाबत सांगितली जाते.
 

१९६४ सालच्या भीषण चक्री वादळांत संपूर्ण धनुष्यकोडी गाव उध्वस्त झाले होते. मात्र त्या तडाख्यात हे मंदिर अभंग राहिले, हे विशेष आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूने नितळ समुद्र होता. भन्नाट वारे वाहत होते पण उन्हाचाही तडाखाही जाणवत होता. आम्हाला धनुषकोडी येथील रामसेतू पॉईंटला पोहोचण्याची ओढ लागलेली असल्याने आम्ही तिथून निघालो. 


धनुषकोडीकडे जाणारा सरळसोट रस्ता आणि दोन्ही बाजूला दिसणारा निळाशार अथांग समुद्र, त्यावरचे अफाट वारे, समुद्रकिनाऱ्यावरील पांढरीशुभ्र वाळू आणि वर दिसणारे निरभ्र आकाश, हे सगळे आपल्याला कमालीचा आनंद देऊन जाते. त्या रस्त्यावर आपण जसजसे पुढे-पुढे जात राहतो, तशी वस्ती विरळ होत जाते. वाटेत, १९६४ सालच्या वादळांत संपूर्णतः उध्वस्त झालेल्या धनुष्यकोडी गावाचे अनेक भग्नावशेष बघायला मिळतात. त्या घटनेनंतर तेथे पुन्हा कधीही वस्ती न झाल्याने आज ते "घोस्ट टाऊन" म्हणूनच ओळखले जाते. १९६४ पूर्वी  धनुष्यकोडीपर्यंत रेल्वे येत असे. धनुषकोडीचे जुने, पडके रेल्वे स्टेशन आणि एका चर्चच्या पडक्या भिंतीही दिसतात. 

रस्त्याच्या शेवटी, म्हणजेच भारतभूच्या टोकावर असलेल्या, रामसेतू पॉईंटचे दृश्य फारच रोमांचकारी होते. या  ठिकाणापासून, समुद्रमार्गे श्रीलंका केवळ १८ ते २० किलोमीटर दूर आहे. रामसेतू पॉईंटवर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून आम्ही बरेच फोटो आणि व्हिडीओ काढले. उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा फेस मनसोक्त अंगावर घेतला. आसपास, डोक्याला टॉवेल गुंडाळलेल्या अनेक तामिळी बायका, भर उन्हात उभे राहून अननस, काकडी आणि कैऱ्यांचे काप विकत होत्या. आम्ही अननसाचे आणि कैऱ्यांचे भरपूर काप खाल्ले. तिथलय फिरत्या विक्रेत्या बायकांकडून शिरीषने, इलिना,अन्य आणि नूर या नातींसाठी मोत्याच्या माळा विकत घेतल्या. धनुषकोडीहून दुपारी चार वाजायच्या आत परतावे लागते, हे माहित असल्याने आम्ही रामेश्वरकडे परतीचा प्रवास सुरु केला. 

धनुषकोडीच्या वाटेवर, चंद्रमौळी टपऱ्यांमध्ये 'परमेश्वराच्या प्रथमावतारा' चे सेवन केल्याशिवाय परत येऊ नका, असा प्रेमळ सल्ला काही हितचिंतकांनी आम्हाला दिला होता. अशाच एका अगदी छोट्या टपरीत आम्ही थांबलो. पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो. मोक्षप्राप्तीचे सुख काय असू शकेल याचा अंदाज आम्हाला त्या मत्स्यभोजनानंतर आला. मुख्य म्हणजे, ते सुख मिळवायला अत्यंत अत्यल्प खर्च आला. सर्वसाधारणपणे, आपल्याकडच्या चांगल्या हॉटेल्समध्ये असे रुचकर जेवण जेवायला एका माणसाला जितका खर्च येईल, तेवढ्याच पैशात आम्हा आठ जणांचे जेवण झालेले बघून माझा भाचा देवाशिष कमालीचा अचंबित झाला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला पोहोचलो. त्या रात्री लवकर झोपणे आम्हाला आवश्यक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत, सामान बांधून, नाश्ता करून, रामेश्वरहून मदुराईचा विमानतळ गाठायचा होता आणि मुंबईची फ्लाईट पकडायची होती.  

१९ तारखेला, आम्ही सकाळी सगळे काही वेळेत आवरले. वाटेत चहापाण्यासाठी थांबूनही फ्लाईटच्या वेळेच्या बरेच आधी आम्ही मदुराईमध्ये पोहोचलो. विमानतळावर जायला थोडा वेळ शिलकी असल्यामुळे, पुन्हा एके ठिकाणी थांबून मनसोक्त नारळपाणी प्यायलो. विमानतळावर पोहोचताच, मणी आणि सत्या या आमच्या टॅक्सीचालकांना निरोप दिला. सर्व काही सुरळीत पार पडले असे वाटत असतानाच, एक विघ्न उभे राहते की काय अशी परिस्थिती अचानकच उद्भवली. आमच्याकडे दादांच्या आधार आणि पॅन कार्डाची झेरॉक्स होती, पण त्यापैकी कुठल्याही कार्डाची मूळप्रत नव्हती. सुरक्षा अधिकारी त्या कागदपत्रांची मूळ प्रत दाखवल्याशिवाय विमानतळात आम्हाला प्रवेश नाकारू लागले. थोडा खोळंबा झाला, पण शेवटी, आनंद एक निवृत्त सेनाधिकारी असल्याचे जाणून, त्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर आम्हाला विमानतळात प्रवेश दिला. 

"कोणाकोणाची किती ज्योतिर्लिंगे बघून झाली आहेत?" या विषयावर, परतीच्या प्रवासात आमची चर्चा सुरु झाली. बारा ज्योतिर्लिंगे नेमकी कुठे-कुठे आहेत? हे कोणालाच नीटसे आठवेना. खरंतर माझ्या मुलांना, त्यांच्या लहानपणी  मी जे श्लोक शिकवले होते, त्यात ज्योतिर्लिंग स्तोत्रही होतेच. पण आज मात्र मला ते बिनचूक आठवेना. शेवटी पुन्हा गूगलचाच आधार घ्यावा लागला. 

पूर्वी तोंडपाठ असलेले हे स्तोत्र, मी असे कसे विसरले? ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. निदान लहानपणी आपण केलेल्या पाठांतराचे तरी विस्मरण होऊ नये असे मला वाटू लागले. त्यामुळे हल्ली रोज पहाटे, बागकाम करता-करता, रामरक्षा, गीतेचा पहिला आणि पंधरावा अध्याय, मारुतीस्तोत्र आणि पूर्वी पाठ असलेले इतर काही श्लोक, 'यूट्यूब' वर लावून ऐकायचा आणि ऐकता-ऐकता म्हणायचा नेम मी सुरु केला आहे. त्याच बरोबर, मला पूर्वी पाठ नसलेली, अथर्वशीर्ष आणि विष्णुसहस्त्रनाम, ही स्तोत्रेही हळूहळू तोंडपाठ करण्याचा मानस आहे. 

एकंदरीत पाहता, अतिशय आनंददायी अशा यात्रेनंतर, रामेश्वराने मला भक्तिमार्गावर वाटचाल सुरु करायला लावले आहे, हे या सहलीचे फलित म्हणावे लागेल! 
                                                                                                                                          
                                                                                                                                            (क्रमशः)

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

६. रामेश्वराला त्रिवार वंदन!

१७ ऑक्टोबरला रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो. रात्रीचे आठ वाजून गेले होते. हॉटेलबाहेर पडून इतरत्र कुठे जेवायला जायचा उत्साह आम्हाला कोणालाच नव्हता. त्यामुळे सगळेजण दैविक हॉटेलच्या तळमजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथला शाकाहारी बुफे जेवलो. दुसऱ्या दिवशी किती वाजता निघायचे आणि काय-काय बघायचे याची योजना जेवता-जेवताच पक्की केली. 

आम्ही रामेश्वरदर्शनाबाबत चर्चा करीत असतानाच माझी वहिनी, प्राची म्हणाली, की तिला 'स्फटिकदर्शन' करण्याची इच्छा आहे. त्याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. मग प्राचीनेच सांगितले की सकाळी पाच वाजता रामेश्वराचे देऊळ भक्तांसाठी उघडल्यावर प्रथम पल्लियारे दीप पूजा होते. ठीक पाच वाजून दहा मिनिटांनी रामेश्वराच्या पिंडीखाली किंवा मागे ठेवलेले स्फटिक लिंग भक्तांच्या दर्शनासाठी बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. ते दर्शन घेणे फार भाग्याचे असते असे तिचे म्हणणे होते. 

कुतूहलापोटी मी इंटरनेटवर स्फटिकदर्शनाची माहिती वाचली. त्या दर्शनासाठी पहाटे चारच्या आत स्नान करून भक्तगण रांग लावून उभे असतात असेही मी वाचले. इतक्या पहाटे उठून प्राचीबरोबर जायला इतर कोणाचीच तयारी नव्हती. कुठल्याही भाग्योदयाच्या आशेने नव्हे, पण एक अनुभव म्हणून मी प्राचीबरोबर जाण्यासाठी आनंदाने तयार झाले. मी तिच्यासोबत जाणार आहे या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद गिरीशला झाला! पहाटे साडेतीनला उठून, अंघोळ करून जायचे आम्ही ठरवले व लगेच आपापल्या खोलीत झोपायला गेलो. 

माझा डोळा लागत असतानाच, अचानक माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याचे वडील बरेच आजारी आहेत व त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या वतीने मी, माझ्या डोळ्यादेखत रामेश्वराला अभिषेक करवून घ्यावा, अशी कळकळीची विनंती त्याने मला केली. मी हे काम निश्चित करेन अशी ग्वाही त्याला दिली. 

शिरीषकडे रामेश्वरच्या एका गुरुजींचा दूरध्वनी क्रमांक होता. रात्रीच मी त्यांच्याशी बोलले.  स्फटिकदर्शनासाठी मी दुसऱ्या दिवशी देवळात येणार आहे, त्यावेळीच अभिषेक करावा अशी विनंती मी गुरुजींना केली. अभिषेकासाठी काय-काय लागेल, किती खर्च येईल याबाबत गुरुजींकडून सर्व माहिती घेतली. आमचे स्फटिकदर्शन' झाल्यावर, रामेश्वर मंदिराच्याच आवारातील काशीविश्वनाथाच्या देवळाजवळ ते आम्हाला येऊन भेटतील आणि अभिषेकाबाबत चर्चा करतील, असे गुरुजींनी सांगितले. 

ठरल्याप्रमाणे आम्ही दोघी पहाटे उठून, अंघोळ करून, रामेश्वर मंदिराच्या पूर्व द्वारावर पहाटे सव्वाचारला पोहोचलो. तिथे आमच्याही आधी अनेक भाविक येऊन रांगेत उभे होते. पाच वाजायच्या काही मिनिटे आधीच आम्हाला आत सोडण्यात आले. अगदी जवळून दर्शन घेता यावे यासाठी आम्ही प्रत्येकी २०० रुपयाचे तिकीट घेऊन आत गेलो. पल्लियारे दीप पूजा आम्हाला बघायला मिळाली. त्यानंतर, पुजाऱ्यांनी स्फटिक लिंग बाहेर काढले. साधारण फूटभर लांबीचे ते स्फटिक लिंग,समयांच्या मंद प्रकाशामध्ये अतिशय सुंदर दिसत होते. शिवनामाच्या घोषात त्या लिंगाला मनोभावे नमस्कार करणाऱ्या भाविकांच्या डोळ्यातील भाव मी निरखत होते. तिथल्या वातावरणाचा, त्या पूजेचा, आणि स्फटिक लिंग दर्शनाचा तो सोहळा मला एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. दर्शन झाल्यावर आम्हाला 'थिरुवनंथाल दीप आराधना'ही बघायला मिळाली. त्यानंतर गुरुजींची वाट बघत आम्ही विश्वनाथाच्या देवळापाशी थांबलो. 

गुरुजी आल्यावर आमच्या डोळ्यादेखत अभिषेक करून हॉटेलवर परतायचे असे आम्ही ठरवले होते. जवळजवळ सात वाजत आले तरीही गुरुजी आलेच नाहीत. मंदिरात आमच्याजवळ फोन नसल्यामुळे गुरुजींशी संपर्क साधणेही शक्य नव्हते. पण त्या पवित्र मंदिरात, पहाटेच्या मंगलवेळी बसून राहायला आम्हाला दोघीनाही खूप प्रसन्न वाटत होते. शेवटी गुरुजी आले. आज प्रदोष असल्याने, अभिषेक संध्याकाळी सहा वाजतानंतरच करायचा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार, संध्याकाळी ठीक सहा वाजता विश्वनाथाच्या  देवळाजवळ येऊन भेटायला त्यांनी आम्हाला सांगितले. तो दिवसभर आम्ही धनुष्यकोडी व इतरत्र हिंडणार होतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी देवळांत येण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा राहील की नाही याबाबत मी साशंक होते. पण एकीकडे, "तुझ्या डोळ्यादेखत अभिषेक करून घे" ही माझ्या मित्राने बोलून दाखवलेली इच्छा आणि "संध्याकाळी सहा वाजतानंतरच अभिषेक करायचा", हा गुरुजींचा आदेश, या दोन गोष्टींच्या कचाट्यात मी सापडले होते. त्यामुळे, संध्याकाळी पुन्हा रामेश्वराच्या देवळांत जाण्याचे नक्की ठरवले. 

दिवसभर धनुष्यकोडी व इतर ठिकाणे पाहून आम्ही हॉटेलवर पाच वाजेपर्यंत परतलो. त्यानंतर अंघोळ करून, अगदी उत्साहाने आम्ही दोघीही अभिषेक करण्यासाठी रामेश्वराच्या देवळात पोहोचलो. सायंकाळची रामेश्वराची 'सयरात्वा' पूजा आम्हाला बघायला मिळाली. त्या पाठोपाठ, माझ्या मित्राच्या इच्छेनुसार, रामेश्वराला गंगाजल, दूध आणि बिल्वपत्र यांचा अभिषेक व साग्रसंगीत पूजा गुरुजींनी केली. त्यानंतर आम्हाला सोबत घेऊन गुरुजींनी सर्व मंदिर परिसर आम्हाला पुन्हा दाखवला. इतरही देवदेवतांची आराधना आणि पूजा आम्ही केली. मंदिराच्या 'Infinite Corridor' मध्ये, गुरुजींनी त्यांच्याच फोनवर आमचा फोटो काढून दिला. हे सगळे करून रात्री आठनंतर आम्ही हॉटेलच्या रूमवर परतलो.  

 

'प्रदोष' म्हणजे काय? हा प्रश्न माझ्या डोक्याच्या मागे कुठेतरी होता. रूमवर आल्यावर सहज म्हणून गूगलवर माहिती वाचली. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. सूर्योदय होण्याच्या ४५ मिनिटांपूर्वी ते सूर्यास्तानंतर ४५ मिनिटांच्या काळाला 'प्रदोष काळ' असे म्हणतात. शिवपूजेच्या दृष्टीने प्रदोषकालाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. सूर्यास्तानंतर रात्रीचा प्रारंभ होण्याच्या काळांत प्रदोषाची पूजा केली जाते. ज्या वारी  प्रदोष  असतो, त्या दिवशीच्या व्रताचे महत्त्व वेगवेगळे असते, असेही कळले. सोमवारी आलेल्या प्रदोषाला 'सोमप्रदोष' म्हणतात आणि त्यादिवशी पूजा केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. 

माझ्या मित्राला मी हे सगळे सांगितले. त्याला फार समाधान वाटले. विशेष म्हणजे स्फटिकलिंग दर्शनाच्या  प्राचीच्या  इच्छेमुळे आणि, मी माझ्या डोळ्यादेखत अभिषेक करून घ्यावा, या माझ्या मित्राच्या आग्रहापोटी, मी १८ ऑक्टोबरला, सोमवारी दोन वेळा रामेश्वराच्या दर्शनासाठी गेले. अशा रीतीने मला आदल्या दिवशी एकदा आणि दुसऱ्या दिवशी दोन वेळा रामेश्वराचे दर्शन घडले आणि रामेश्वराला त्रिवार वंदन करण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीला, रामेश्वराने संपूर्ण प्रदोषकाळ त्याच्या देवळात व्यतीत करायला लावला हे विशेष!

१८ ऑक्टोबरच्या दिवसभर आम्ही काय-काय मजा केली, ते मी पुढील लेखात लिहीन. 

                                                                                                                                  (क्रमशः)

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

५. रामेश्वर दर्शन

१७ ऑक्टोबरला, आमच्या सहलीदरम्यान, प्रत्यक्षात रामेश्वरला पोहोचण्याच्या आधी, दुपारी साधारण साडेबारा-एकच्या सुमारास आम्ही टॅक्सीने पुलापाशी पोहोचलो होतो. तेथे बराच वेळ थांबून तिथले वारे अंगावर घेतल्यावर आणि तिथले विहंगम दृश्य डोळे भरून पाहिल्यावरही, आमचा कोणाचाच पाय तिथून निघत नव्हता. पण आम्ही त्याच संध्याकाळी रामेश्वर दर्शन करायचे, असे  मनाशी योजले होते. त्यामुळे शेवटी आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. रामेश्वरच्या 'दैविक हॉटेल' मध्ये आमचे बुकिंग गिरीशने आधीच करून ठेवले होते. आम्ही दोन वाजेपर्यंत हॉटेलवर पोहोचलो. आधी हॉटेलच्या खोलीवर सामान टाकले आणि पाठोपाठ खाली उतरून रेस्टॉरंट मध्ये  दुपारचे जेवण उरकले. त्यानंतर सगळेजण रामेश्वर दर्शनासाठी निघालो. रामेश्वर देवळाला चारही दिशांना चार उत्तुंग प्रवेशद्वारे किंवा गोपुरे  आहेत. मुख्य देवळाचा गाभारा पूर्वाभिमुख आहे. आम्ही गेलो तेव्हा फक्त पूर्व आणि पश्चिम दिशांच्या द्वारांमधून प्रवेश करता येत होता. नेहमी तसेच असते की नाही, हे मात्र मला माहिती नाही. आम्ही पश्चिम दरवाज्याने प्रवेश केला. त्याआधी आमचे फोन व चप्पल बाहेरच्या एका दुकानात ठेऊन दिले. देवळात मोबाईल अथवा कॅमेरा नेण्यास वा फोटो काढण्यास मनाई आहे. 


रामेश्वरचे देऊळ फारच सुंदर आहे. आम्ही दर्शनाला गेलो त्या दिवशी रविवार होता. अनेक महिन्यानंतर  प्रथमच रामेश्वरचे देऊळ, रविवारच्या दिवशी दर्शनासाठी उघडलेले होते. त्यामुळे देवळात भाविकांची फारशी गर्दी नव्हती. आत गेल्यावर दादांसाठी व्हीलचेअरही  मिळाली. त्यामुळे त्यांना दर्शन करणे सुकर झाले. रामेश्वरचे संपूर्ण देऊळ दगडी आहे. या देवळाची भव्यता बघून खरोखरीच अचंबित व्हायला होते. या छोट्याशा बेटावरच्या समुद्रतटावर असे विशाल, प्रमाणबद्ध आणि अद्वितीय मंदिर बांधण्याची संकल्पना करणे आणि ती प्रत्यक्षांत उतरवणे, ही गोष्टच मला आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद वाटली. आपल्या देशाच्या एका कोपऱ्याच्या जवळ वसलेल्या या बेटावर, दळणवळणाच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध असल्यामुळे आज आपल्याला तिथपर्यंत सहजी पोहोचता येते. पण शेकडो वर्षांपूर्वी या सर्व सोयी नसताना,  हे देऊळ कसे बांधले असेल? हा आपल्याला प्रश्न पडतो. देवळातील दगडी खांब व मूर्ती ज्या प्रकारच्या पाषाणातून कोरलेल्या आहेत, त्या प्रकारचे पाषाण तिथल्या पंचक्रोशीत कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे ते पाषाण कुठूनतरी दूरवरून जहाजांवर लादून. समुद्रावाटे, आणलेले असावेत असा कयास आहे. शेकडो वर्षांपूर्वी इतके मोठे दगड कसे वाहून आणले असतील? त्यावर इतके कलात्मक कोरीव काम कसे केले असेल? हे सगळे आपल्या आकलनाच्या पलीकडचे आहे. १९८१ साली मी केदारनाथचे देऊळ पहिले होते तेव्हाही अभिमानाने ऊर असाच भरून आला होता. 

रामेश्वराच्या देवळाचे बरेचसे पुजारी हे महाराष्ट्रातले ब्राम्हण आहेत. देवळात शिरायच्या आधीपासूनच काही पुजारी, अभिषेक करायचा आहे का? इतक्या-इतक्या रुपयांमध्ये अभिषेक होईल, इतके पैसे भरा लवकर आणि जवळून दर्शन होईल, असे सांगत आपल्या मागे लागतात. ते पुजारीच गाईड म्हणूनही तुमच्याबरोबर येतात. असेच एक पुजारी आमच्याबरोबर येऊन आम्हाला देवळाची माहिती,  देवळाशी निगडित सर्व पौराणिक कथा आणि इतिहासही सांगत होते. मीनाक्षीअम्मन देवळाप्रमाणेच रामेश्वराच्या देवळाच्या आवारात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पण मीनाक्षी देवळाच्या मानाने रामेश्वरचे देऊळ खूप योजनाबद्धपणे बांधलेले वाटते. कदाचित यावनी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी या मंदिराची रचना एखाद्या चक्रव्यूहासारखी केलेली असावी, असे वाटते. मुख्य मंदिराच्या बाहेर एक भलामोठा नंदी आहे. मंदिरात एकूण तीन शिवलिंगे आहेत. सीतेने वाळूपासून तयार केलेले लिंग म्हणजेच 'रामनाथ स्वामी लिंग', हनुमानाने कैलास पर्वतावरून उचलून आणलेले 'काशीविश्वनाथ' किंवा 'हनुमदीश्वर' लिंग आणि हनुमानाने स्वतःसाठी शिवाकडून मागून घेतलेले, 'आत्मलिंगेश्वर लिंग' अशी ती तीन लिंगे आहेत.  शेजारी विशालाक्षी देवीचे, पर्वतवर्धिनी देवीचे अशी दोन मंदिरे आहेत.  शेषशायी विष्णूची अतिशय सुंदर मूर्ती असलेले मंदिर आहे. हनुमानाची एक भव्य स्वयंभू मूर्ती 'अंजनेय' मंदिरात आहे. सोन्याने मढवलेला एक गरुड ध्वज आहे. संथान गणेश, सायनाग्रह, सेतू-माधव अशा सर्व देवी देवतांचे दर्शन घेत आम्ही तो विस्तृत मंदिर परिसर हिंडत होतो. त्या दिवशी फारशी गर्दी नसल्यामुळे आम्हाला अगदी शांतपणे दर्शन घेता आले.  

रामेश्वर मंदिर परिसरांत एकूण ५३ तीर्थे आहेत. त्यातली २२ तीर्थे मंदिराच्या आतल्या बाजूस आहेत तर उरलेली बाहेर आहेत. त्या तीर्थाच्या पवित्र पाण्यात अंघोळ करून रामेश्वराचे दर्शन करणे हा 'पापक्षालनाचा' आणि मोक्षप्राप्तीचा खात्रीशीर मार्ग समजला जातो. आम्ही गेलो होतो तेव्हा, कोव्हीड निर्बंधामुळे ही कुंडे आणि त्यामधले  स्नान, बंद केलेले होते. ते जरी चालू असते तरीही आमच्या पैकी कोणी स्नान केले असते की नाही, या बाबत मी जरा साशंकच आहे.  मंदिराची प्रवेशद्वारे अतिशय भव्य आहेत. त्यामुळे तिथे अंबारीसहित हत्ती सहजी प्रवेश करू शकतो. आम्ही गेलो होतो तेव्हाही तिथे एक हत्ती होताच. माहुताला पाच-पन्नास रुपये दिले की तो हत्ती आपल्याला सोंड वर करून आशीर्वादही देतो. प्राचीला हत्ती खूप आवडत असल्याने तिने तो आशीर्वाद घेतला आणि हत्तीच्या सोंडेला हात लावून मनोभावे वंदन केले. 

रामेश्वराच्या देवळातले मंडप, सुंदर कोरीव काम केलेले एकसंध अजस्त्र दगडी खांब, त्यामुळे तयार झालेले लांब-लांब प्राकार (Infinite corridor ),  हे सर्व बघून  डोळे दिपून जातात, आपला ऊर अभिमानाने ऊर भरून येतो, आणि निसर्गसान्निध्यात असलेली ही भव्य वास्तू आपल्याला भारावून टाकते. आम्ही दोन-तीन तास मंदिरातील देव-देवतांचे दर्शन करत, सुरस पौराणिक व ऐतिहासिक कथा ऐकत आणि मंदिरातील कोरीव न्याहाळत व वाखाणत हिंडत होतो. तोपर्यंत संध्याकाळ झाल्यामुळे देऊळ बंद व्हायची वेळ झाली होती. दादांना रामेश्वराचे दर्शन करवणे, हा आमच्या सहलीचा मुख्य हेतू, आता साध्य झाला होता. पण का कुणास ठाऊक माझे मन भरले नव्हते. बराच वेळ देवळात काढल्यानंतरही, परत आपण या देवळात यावे, अशी तीव्र इच्छा तिथून बाहेर पडताना मला झाली. आम्ही रामेश्वरमध्ये, पुढचा एकच दिवस राहणार होतो. त्या दिवशी दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम मेमोरियल, व बिभीषण मंदिर पाहून धनुष्यकोडीला जाणे, असा पूर्ण दिवसभराचा बेत आधीच ठरलेला होता. त्यामुळे पुन्हा रामेश्वरदर्शनाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य होती.  

पण रामेश्वराच्या मनात काहीतरी वेगळीच योजना असावी. अनपेक्षिपणे रामेश्वराला त्रिवार वंदन करण्याची संधी मला मिळाली. त्याबाबत मात्र आता मी पुढील लेखात सांगेन.        

                                                                                                                               (क्रमशः)

४. पंबन ब्रिज

१७ ऑक्टोबरला सकाळी आम्ही मदुराईचे रिसॉर्ट सोडले आणि मणी व सत्याच्या टॅक्सीमधून रामेश्वरचा रस्ता पकडला. मदुराईचे रिसॉर्ट सोडताना एकीकडे मन अगदी जड झाले होते तर दुसरीकडे रामेश्वरला जाण्याची ओढही लागली होती. मदुराई ते रामेश्वर हा रस्ता अगदी चांगला असल्याने हे अंतर सहजी तीन तासात पार करता येते. पण आम्ही वाटेत एके ठिकाणी थांबून चहा-पाणी केले. त्यामध्ये थोडा वेळ गेला. तिथेच त्या चहाच्या टपरीवरच्या एका काचेच्या बरणीतला एक पदार्थ मला खुणावू लागला. गुलबट रंगाचा, एखाद्या छोट्या पणतीच्या  आकाराचा हा काय पदार्थ असावा, याचे मला कुतूहल वाटले. ते जाणून घेण्यासाठी, ड्रायव्हर सत्याला बोलावले. त्याने, 'कोकोनट अँड जॅगरी, लोकल स्वीट, व्हेरी गुड, व्हेरी टेस्टी" असे वर्णन केल्यावर, आधी त्यातल्या एक-दोन पणत्या किंवा वड्या विकत घेऊन, त्याचे तुकडे करून आम्ही सगळ्यांनी चव बघितली. ती वडी चवीला आपल्या खोबऱ्याच्या वडीसारखीच लागत होती. पण त्यात साखरेऐवजी गूळ असल्याने, छान खमंग लागत होती. आम्हाला सगळ्यांनाच ती आवडल्यामुळे आम्ही एक डझनभर वड्या  विकत घेतल्या आणि पुन्हा रामेश्वरच्या वाटेवर निघालो.

रामेश्वर हा भारताचा भाग असला तरी ते एक बेट आहे. मंडपम या गावापासून पंबन या गावाला जोडणाऱ्या पुलावरून गेल्यावर, तिथून पुढे आपल्याला रामेश्वरला जात येते. तिथे रेल्वेसाठी एक आणि वाहनासाठी एक असे  एकूण दोन पूल आहेत. रामेश्वरला पोहोचायच्या आधी, 'अन्नाई इंदिरा गांधी' पुलावर बराच वेळ थांबलो. आमच्या आधी आलेल्या अनेक प्रवासी गाड्या आणि बसेस तिथे थांबलेल्या होत्या. त्या वाहनांमधील प्रवासी पुलावर उतरून तिथल्या वातावरणाचा आनंद लुटत होते. "इधर थोडी देर रुकना, व्हेरी गुड सीन, व्हेरी फास्ट विंड" असे म्हणत आमच्या ड्रायव्हर्सनी आमच्या टॅक्सीज रस्त्याच्या कडेला थांबवल्या आणि आम्हाला खाली उतरायला सांगितले. पुलावर थांबल्यावर दिसणारे दृष्य आणि तिथल्या जादुई वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे अवघड आहे,  पण मी प्रयत्न करते. ते भन्नाट वातावरण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवे.  

आम्ही पुलावरच्या रस्त्यावर उतरलो. तिथे उभे राहून दोन्ही बाजूला दिसणाऱ्या समुद्राचे दर्शन घेता येते. पुलाच्या दोन बाजूला दोन वेगवेगळे समुद्र आहेत. त्या  दोन्ही समुद्राच्या पाण्याचे रंग, त्याची गती वेगळी आहे. मंडपम कडून रामेश्वरकडे जाताना डाव्या बाजूला बंगालचा उपसागर आहे, तर आपल्या उजव्या बाजूला हिंद महासागर दिसतो. दोन्ही बाजूच्या समुद्राचे पाणी छान निळे आणि नितळ आहे. पण त्या दोन्ही सागरांच्या निळाईमध्येही जाणवण्यासारखा फरक आहे. तसेच दोन्ही बाजूच्या पाण्यामध्ये निळ्या रंगाच्या अनेकविध छटा दिसतात. डाव्या बाजूचे, म्हणजे बंगालच्या उपसागरातले पाणी शांत वाटले. तर आमच्या उजव्या बाजूचे, म्हणजे हिंद महासागरातील पाणी चांगले उसळताना दिसत होते. अन्नाई इंदिरा गांधी रोड ब्रिजच्या, डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहिले असता, दोन्हीकडच्या वाऱ्याच्या वेगातही कमालीचा फरक जाणवला. बंगालच्या उपसागरावरचे वारे जोराचे आहे पण त्याच्या तुलनेत हिंद महासागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग तुफान वाटला. इतका की, हे वारे आपल्याला हवेत उडवून लावेल की काय असे आम्हाला वाटले. सोबतच, या पुलावरून मोठमोठाली वाहने वेगात जात असताना पूल जरा हलल्यासारखा वाटतो आणि जीवाचा अगदी थरकाप उडतो. 

आम्ही दादांनाही या पुलावर उतरवले. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक वाहने उभी होती. काही वाहने अचानक सुरु होत होती. तसेच अनेक वाहने, दोन्ही बाजूने सुसाट जात-येत होती. त्यामुळेच रस्ता पार करून दादांना पुलाच्या डाव्या बाजूला, म्हणजे हिंद महासागराच्या बाजूला नेऊ नये असे मला वाटत होते. पण आनंदने दादांचा हात काळजीपूर्वक पकडून, त्यांनाही तिकडच्या तुफानी वाऱ्याची अनुभूती देऊन आणले. दादाही त्या सर्व वातावरणात अगदी उल्हसित झाले होते. आम्हा इतर सर्वांच्या अंगात तरअक्षरशः वारे भरल्यासारखेच झाले होते. तिथे अनेक फिरते विक्रेते, परातीत ठेवलेले अननसाचे आणि कलिंगडाचे पातळ काप विकत होते. आधी नको-नको म्हणत सगळ्यांनी तिखट-मीठ लावलेले ते काप, पुन्हा-पुन्हा  विकत घेऊन खाल्ले. 

रस्त्याच्या डाव्या बाजूला, खाली समुद्रात, एक लांबलचक रेल्वेचा पूल, म्हणजेच पंबन रेल्वे ब्रिज दिसतो. भारतात समुद्रावरील हा एकमेव असा पूल आहे की जो जहाजे आडवी जाऊ देण्यासाठी खुला होऊ शकतो. या पुलावरून रेल्वे जात असताना बघण्यासाठी अनेक प्रवासी तिथे तास-दोन तास प्रतीक्षा करत थांबून राहतात म्हणे. आमच्याकडे तितका वेळ नव्हता. तसेच तो पूल जहाजासाठी उघडताना बघणे ही एक पर्वणीच असते, असे म्हणतात. अगदी पूर्वी, म्हणजे शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी पंबनचा रेल्वेचा पूल बांधला होता. १९६४ साली आलेल्या अघोरी वादळाच्या तडाख्यात त्या पुलाचा काही भाग समुद्रात कोसळला होता. त्या जुन्या पुलाचे  पाण्यात पडलेले  अवशेष, आजही आपल्याला दिसतात. त्या काळरात्री, पंबन पुलावरून जात असलेल्या रेल्वे गाडीतल्या सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती, हे आठवले आणि निसर्गाच्या ताकदीपुढे मानव किती क्षुद्र ठरतो याची मला जाणीव झाली. तसेच हा पूल, आपल्याला जीवनाकडून मृत्यूकडे नेणारा पूल आहे, हे त्यावेळी त्या प्रवाशाना  कळले असेल का? हा विचार माझ्या मनाला चाटून गेला आणि मनात अगदी चर्रर्र झाले. 

जीवन आणि मृत्यू याना जोडणारा पूल अदृश्यच असतो,  हे किती चांगले आहे नाही का ? 


                                                                                                                                            (क्रमशः)

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

३. मीनाक्षीअम्मन

आम्ही १५ ऑक्टोबरला दुपारी मदुराईला पोहोचलो. दादांना दगदग होणार नाही अशा बेताने, मदुराई आणि रामेश्वरची सहल अगदी आरामात करायची असेच आम्ही ठरवले होते. त्यामुळे पोहोचलो त्या दिवशी कुठेही बाहेर न पडता "ताज गेट वे" या रिसॉर्टमध्येच आम्ही आराम केला. मदुराई एयरपोर्टवरून रिसॉर्टकडे जाताना, मणी नावाच्या एका टॅक्सीचालकाशी शिरीषने संधान बांधून ठेवले होते. त्याच्या टॅक्सीतून त्याने आम्हाला १६ तारखेला मदुराई दर्शन करवावे, आणि १७-१८ ऑक्टोबरला रामेश्वर दर्शन करवून, १९ ऑक्टोबरला मदुराई एयरपोर्टवर सोडावे अशी बोली शिरीषने मणीसोबत ठरवली. त्यानुसार, मणीची स्वतःची झेस्ट गाडी आणि त्याच्याच ओळखीतल्या, सत्त्या नावाच्या ड्रायव्हरची इनोव्हा गाडी, अशा दोन गाड्या १६ तारखेला सकाळी ९ वाजता, आमच्या दिमतीला हजर झाल्या. मीनाक्षी मंदिर दुपारी बारा वाजता बंद करतात असे कळल्यामुळे आम्ही सगळे तयार होऊन, सकाळी  १० वाजेपर्यंत मंदिराकडे जायला निघालो. 


मीनाक्षी मंदिर अतिशय भव्य-दिव्य आहे. मंदिराच्या चारही दिशेला असलेल्या द्वारांची उत्तुंग गोपुरे दूरवरूनच दिसू लागतात. मंदिरापासून साधारण ५०० मीटर अलीकडे गाड्यांमधून उतरून, मंदिरापर्यंत चालत जावे लागते. दर्शनासाठी तिकीट काढावे लागते. बाहेर चपला-बूट ठेवण्याची व्यवस्था आहे. मंदिरात मोबाईल अथवा कॅमेरा न्यायला बंदी आहे. मंदिरात जाताना स्त्रियांनी साडी अथवा सलवार-कमीज-दुपट्टा असा वेष घालावा आणि पुरुषांनी पँट/ धोतर/ लुंगी नेसलेली असावी, असा नियम आहे. आमचे दादा नेमके बर्म्युडा  घालून आलेले होते. रिसॉर्टमधून निघण्याच्या गडबडीत ते आमच्या कोणाच्याच लक्षात आलेले नव्हते. मग दादांसाठी वेल्क्रो-वाली लुंगी विकत घेऊन, बर्म्युडा पँटच्यावरच त्यांच्या कमरेला ती गुंडाळली. गंमत म्हणजे, देवळात अनेक मद्रासी 'लुंगे-सुंगे', आपली लुंगी अर्धी दुमडून, कमरेला खोचून हिंडत होते.आणि त्याबाबत मात्र कोणीही आक्षेप घेत नव्हते. 

मीनाक्षी मंदिराच्या आवारात अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. तिथे व्हीलचेअर मिळाल्यामुळे दादांना दर्शन घेणे जरा सुखकर झाले. मंदिराची आणि देवदेवतांची माहिती कळावी म्हणून, आम्ही एक गाईड केला होता. तो त्याच्या तमिळ-हिंदीमधून आम्हाला, तिथल्या मूर्तींबाबत वेगवेगळ्या दन्तकथा सांगत होता. मीनाक्षीच्या रूपातील पार्वती आणि सुंदरेश्वराच्या रूपातील शंकर यांचा लग्नसोहळा सर्व देवी-देवतांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगितले जाते. एकावेळी हजारो लोकांना सहजी सामावून घेईल इतके हे मंदिर भव्य आहे.  मंदिरात गर्दी होती आणि खूप उकडत होते. मीनाक्षी मंदिर आणि तिथल्या प्रत्येक खांबावरील कोरीव कामाचे निरीक्षण करायला आणि प्रत्येक मूर्तीचे महत्व समजावून घ्यायला कमीतकमी एक पूर्ण दिवस हवा. त्यामानाने आम्ही ते मंदिर अगदीच भराभरा पहिले. मीनाक्षी अम्मनच्या मूर्तीचेही अगदी ओझरतेच दर्शन झाले. मंदिराच्या परिसरांत एक हजार खांब असलेले एक भव्य दालन किंवा मंडप आहे. त्या प्रत्येक खांबावर उत्तम कोरीव काम केलेले आहे. त्या दालनांत सध्या एक संग्रहालय केलेले आहे. या दालनाला काही काळापूर्वी आग लागून बरेच नुकसान झाले आहे. तिथेच एका कोपऱ्यात, 'म्युझिकल पिलर्स' आहेत. त्या खांबांवर आघात केला असता, मधुर सूर वाजतात असे आम्हाला समजले. पण तो भाग बंद केलेला असल्याने आम्हाला तिथपर्यंत पोहोचता आले नाही. 

मीनाक्षी मंदिराचा फेरफटका आणि दर्शन झाल्यावर बऱ्यापैकी दमणूक जाणवत होती. त्यामुळे रिसॉर्टमधल्या वातानुकूलित खोलीत जाऊन एक झोप काढावी असा माझा विचार होता. पण गिरीशला अचानक हुक्की आली की, आपल्या गृहलक्ष्मीला, म्हणजे प्राचीला, साडीखरेदीसाठी नेऊन खूष करावे. दादांना दुपारी विश्रांती घेणे आवश्यक असल्याने ते रिसॉर्टवर परतणार होते. दादांच्याच गाडीत शिताफीने घुसून, आनंद, शिरीष व देवाशिष हे तिघेही रिसॉर्टवर विश्रांती घेण्यासाठी सटकले. मला मात्र त्या साडी-खरेदी दौऱ्यावर अगदी नाईलाजानेच, पण जावे लागले. गिरीश-प्राची, ज्योत्स्ना आणि मी पुढील तीन तास तंगडतोड करून शेवटी प्राचीसाठी दोन रेशमी साड्यांची खरेदी केली. तोपर्यंत पाच वाजून गेले होते. संध्याकाळी साडेसहाला नायकर महालातील 'लाईट आणि साउंड शो'  पाहण्याचे आमचे आधीच ठरले होते. उरलेल्या थोडक्या वेळात आम्हाला रिसॉर्टवर जाऊन, वेळेत परत येणे शक्य नव्हते. त्यामुळे नायकर महालाजवळच थोडा वेळ काढायचे आम्ही ठरवले. जवळच्या एका हॉटेलमध्ये उत्तम कॉफी प्यायलो आणि एका हलवायाच्या दुकानातून, दोन-तीन प्रकारची मिठाई, काजूची भजी व इतर काही नमकीन घेऊन आम्ही नायकर महालात पोहोचलो. रिसॉर्टवर गेलेले लोक मस्त झोप काढून, ताजेतवाने होऊन नायकर महालापाशी पोहोचलेले होते. नायकर महाल भव्य आहे, पण तिथला 'लाईट आणि साउंड शो' अगदीच सुमार आहे. मला तर बराच काळ डुलकी लागली होती! 

सकाळी भरपेट नाश्ता झालेला असल्याने आम्ही दुपारी जेवण केलेले नव्हते. दिवसभर नारळाचे पाणी, चहा कॉफी आणि मदुराई-फेम 'जिगरठंडा' नावाचे पेय पीत हिंडत होतो. संध्याकाळी 'लाईट आणि साउंड शो' बघत असताना काजूची भजी आणि केळ्याचे वेफर्स खाल्ल्यामुळे तोंड चांगलेच खवळलेले होते. रात्रीपर्यंत कमालीची भूक लागली होती. त्यामुळे, आम्ही मदुराईचे सुप्रसिद्ध, 'सबरीस' रेस्टोरंट गाठले. तिथले दोसे, इडली, आप्पम असे अनेक गरमागरम व चवदार पदार्थ खाऊन आमचे पोट अगदी तुडुंब भरले. तरीदेखील, संध्याकाळी विकत घेतलेल्या मिठाईचाही आस्वाद आम्ही घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रामेश्वरला जायचे असल्याने लवकर झोपणे आवश्यक होते. तरीही झोपायच्या आधी थोडावेळ पत्ते खेळण्याचा मोह आम्हाला टाळता आला नाही. 

माझ्या आईचे माहेरचे नाव मीनाक्षी होते. मदुराई-रामेश्वरची सहल ठरवली तेव्हापासूनच आणि संपूर्ण सहलीच्या काळात, माझ्या दिवंगत 'मीनाक्षीअम्मन'ची आठवण मला सातत्याने अस्वस्थ करत राहिली होती.   

                                                                                                                                                      (क्रमशः )

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

२."वाह ताज! वन्स मोर..!"

आमच्या मदुराई-रामेश्वर सहलीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे १६ ऑक्टोबरला, मला रोजच्या सवयीप्रमाणे पहाटे लवकर जाग आली. पहाटेचा चहा घेतल्यानंतर, आम्ही राहत असलेल्या ताज ग्रुपच्या "द गेटवे हॉटेल" या रिसॉर्टचा निसर्गरम्य परिसर पायी हिंडून बघण्याचा मोह मला आवरेना. आनंद अजून साखरझोपेत होता. त्यामुळे त्याला न जागे करता, मी एकटीच पायात बूट चढवून खोलीच्या बाहेर पडले. पसुमलाईच्या टेकाडावर, या रिसॉर्टचा त्रेसष्ठ एकर विस्तीर्ण परिसर आहे. 'जे बी कोट्स' या ब्रिटिश  कंपनीची भारतातील शाखा  'मदुरा कोट्स' या सूत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासाठी, १८९० साली बांधलेल्या, या भल्यामोठ्या बंगल्याचे रूपांतर, आता लक्झरी रिसॉर्टमध्ये केलेले आहे. स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश अधिकाऱ्याचे वास्तव्य असलेला मूळ बंगला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या काळातल्या धनाढ्य ब्रिटिश लोकांनी भारतामध्ये राहून काय ऐश करून घेतली असेल याची कल्पना अशा वास्तू बघितल्यावर येते. "सूत कारखानदारांच्या त्या बंगल्याचे आणि सभोवतालच्या परिसराचे वैभव बघूनच, 'सुतावरून स्वर्ग गाठणे' ही  म्हण पडली असेल की काय?" असा एक गंमतशीर विचार माझ्या मनात तरळून गेला!

जुन्या वास्तूत, रिसॉर्टच्या चार-सहा  खोल्या आहेत. नव्याने बांधलेल्या पंच्चावन्न-साठ खोल्या, रेस्तराँ व इतर काही इमारती आसपासच्या पाच एकरांवर पसरलेल्या आहेत. आम्ही राहत असलेली खोली जुन्या वास्तूतच होती. त्यामुळे ती खूपच मोठी होती. नजरेने अंदाज घेतला असता, आमची खोली सहजी सहाशे ते सातशे चौरस फुटाची असावी असे दिसत होते. नवीन इमारतीतील इतर खोल्याही  चांगल्या प्रशस्त होत्या. प्रत्येक खोलीच्या आकारमानाला शोभेसे जुने सुंदर फर्निचर, दोन भलेमोठे क्वीन-साईझ पलंग, आणि अटॅचड वेस्टर्न टॉयलेट आणि बाथरूम होते. नवीन खोल्याही जुन्या धाटणीच्या वाटाव्या अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत. त्यामुळे एकूण सर्व रिसॉर्टला एक 'मॅजेस्टिक लुक' आलेला आहे. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, जिम, बॅडमिंटन व टेनिस कोर्ट अशा सुविधा आहेत, पण कोव्हिड निर्बंधांमुळे स्विमिंग पूल आणि जिम बंद होते. रिसॉर्टचे रेस्टॉरंट उत्तम होते. सर्व चांगल्या हॉटेल्समध्ये असतात तसे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ इथे होते. शिवाय, ताज हॉटेल्सच्या पाहुणचारात नेहमीच जाणवणारा 'Tajness', इथल्या कर्मचाऱ्यांची कर्तव्यदक्षता आणि अदबशीर वागण्यामध्ये जाणवत होताच.

हे रिसॉर्ट एका टेकाडावर असल्यामुळे, इथले सगळे रस्ते वळणा-वळणाचे आणि चढ-उताराचे आहेत. त्यामुळे माथेरान किंवा महाबळेश्वरची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. इथे दीड-दोनशे वर्षे जुनी, मोठमोठाली वडा-पिंपळाची झाडे आहेत. कित्येक भल्यामोठ्या वडाच्या पारंब्या लांबवर जमिनीत रुतून, त्यापासून नवनवीन वट-वृक्ष उगवलेले आहेत.  संपूर्ण टेकडी हिरव्यागार झाडांनी भरलेली आहे. हे हरित-धन जतन कारण्याचे श्रेय अर्थातच ताज ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या निगराणीला आहे. या परिसरात अनेक मोर व इतरही अनेक पक्षी आहेत. मोरांच्या केकावलींमुळे आणि इतर पक्षांच्या मधुर किलबिलाटाने वातावरण संगीतमय झालेले होते. या परिसरात एकूण पन्नास-साठ मोर आहेत. ते सर्व मोर अगदी माणसाळलेले आहेत. काही ठराविक ठिकाणी तिथले मोर मोठ्या डौलात आपल्या हातातून दाणे टिपायला येतात. 

गिरीश-प्राची काही वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांना घेऊन याच रिसॉर्टमध्ये राहून गेलेले होते. त्या वेळी आलेल्या सुखद अनुभवांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी यावेळीही पुन्हा इथेच राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे आम्हालाही हे स्वर्ग-सुख उपभोगता आले. दादांचे, म्हणजे आमच्या वडिलांचे वय लक्षांत घेऊन, गिरीशने दादांसाठी रेस्टोरंटच्या जास्तीतजास्त जवळची खोली मिळवली होती. रिसॉर्टमध्ये वयस्कर लोकांसाठी व्हीलचेयरचीही सोय होती. विशेष म्हणजे, रिसॉर्टच्या मध्यवर्ती भागांत सगळीकडे व्हील चेअर घेऊन जाता येईल असे रॅम्प्स केलेले होते. त्यामुळे दादांना जरा दमणूक जाणवली की आम्ही त्यांना व्हील चेयरवर बसवून नेत होतो. 

आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही रिसॉर्टमध्ये इकडे-तिकडे हिंडत असताना  हॉटेलचा एक कर्मचारी रिसॉर्टबाबतची सर्व माहिती देण्यासाठी आमच्या बरोबर आलेला होता. दुसरा एक कर्मचारी दादांना  व्हील चेअर वरून आमच्यासोबत हिंडवत होता. त्यामुळे दादांनाही रिसॉर्टची आरामदायी सफर मिळाली. मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या खोल्याकडे बोट दाखवत त्या कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले"या खोल्यांमध्ये पंतप्रधान मोदीजी दोन वेळा राहून गेलेले आहेत"त्यामुळे साहजिकचती खोली आपण बघून यावे असे मला वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे बाहेर पडल्यावर, मी जरा दबकतच त्या खोलीसमोरील व्हरांड्यात उभी राहून इकडे-तिकडे बघत होते. तेवढ्यात, रूम सर्व्हिससाठी आलेल्या कर्मचाऱ्याने अत्यंत अदबीने मला सांगितले कीसध्या त्या खोलीत आमच्यासारखेच कोणी गेस्ट राहत आहेत. त्यामुळे ती खोली आतून बघण्याची संधी हुकली. पण वरच्या मजल्यावर हिंडून, तिथल्या जुन्या सुंदर फर्निचरचे फोटो माझ्या मोबाईलमध्ये, आणि आणि उंचावरून दिसणारा मदुराई शहराचा नजारा माझ्या मनात मी साठवून ठेवला. 


पक्ष्यांचा किलबिलाट वगळता सर्वत्र असलेल्या पहाटेच्या शांततेत तासभर फेरफटका मारून झाल्यावर, आमच्यापैकी इतर कोणी जागे झाले आहे का, ते पाहण्यासाठी मी आमच्या खोल्यांजवळ गेले. आनंदही फिरायला बाहेर पडला होता. ज्योत्स्ना आसपास हिंडून पक्षीनिरीक्षण करत होती. त्यानंतर हळू-हळू आम्ही सगळेच नाश्त्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जमा झालो. गप्पा-गोष्टी करत भरपेट नाश्ता केला, आणि तयार व्हायला आपापल्या खोल्यांकडे वळलो. आज  मीनाक्षी मंदिर व मदुराई दर्शनासाठी आम्ही  जाणार होतो. 

तयार होऊन मी खोलीबाहेर पडले आणि नेमका त्याच वेळी मला असिलताचा, म्हणजे आमच्या ऑस्ट्रेलियास्थित मुलीचा फोन आला. आमच्या रिसॉर्टचे भरभरून वर्णन करून मी तिला सांगितले. माझ्या लहानग्या नातीला, नूरला, इकडे-तिकडे नाचणारे मोर व्हिडिओकॉलवर दाखवले. शिरीषने तर मोरांच्या मागे-मागे जाऊन, अगदी दूरवर हिंडून, नूरला मोर आणि लांडोरीही दाखवल्या. मग ज्योत्स्नानेही इलिना आणि अनया, या तिच्या सिंगापूरस्थित नातींना व्हिडीओकॉलवर मोर दाखवून खूष केले. नूरने यापूर्वी कधीच मोर बघितलेला नव्हता किंवा त्यांची केकावलीही ऐकलेली नव्हती. मोर बघून ती भलतीच आनंदित झाली. आमच्या नातींच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आम्ही ठरवूनच टाकले की, नातवंडांना घेऊन या रिसॉर्टमध्ये परत यायचे आणि त्यांना मोर दाखवायचे. हा विचार पक्का होताच, मी मनातल्या मनातच पुटपुटले, "वाह ताज! वन्स मोर..!"


(क्रमशः)

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

१. सीमोल्लंघन !

माझे वडील, सोलापूरचे श्री. श्रीकृष्ण गोडबोले वकील, यांना नुकतीच ८८ वर्षे पूर्ण झाली. ते खूप हौशी असल्याने, दरवर्षी कोर्टाच्या प्रत्येक मोठ्या सुट्टीमध्ये लांबलांबच्या सहली आखत असत. जवळजवळ ५७ वर्षांपूर्वी, १९६४ सालच्या नाताळच्या सुट्टीत, सोलापुरातील काही वकिलांबरोबर त्यांनी दक्षिण भारताची सहल काढली होती. त्या सहलीदरम्यान, तामिळनाडूमधील शेणकोटा नावाच्या स्थानकावर त्यांची बोगी, शेणकोटा-रामेश्वर पॅसेंजर गाडीला जोडण्यात येणार होती. परंतु ऐनवेळी तेथील स्टेशन मास्तरांनी त्यांची बोगी गाडीला न जोडता, त्याऐवजी, काही गुजराथी व्यापाऱ्यांची बोगी त्या गाडीला जोडून टाकली. व्यापाऱ्यांकडून थोडी 'वरकमाई' करून घेऊन त्याने तसे केले असावे, अशी माझ्या वडिलांची व त्यांच्या मित्रमंडळींची जवळजवळ खात्रीच झाली होती. सात्विक संतापापोटी सर्व वकिलांनी त्या स्टेशन मास्तरला घेरले आणि त्याच्यावर भरपूर तोंडसुख घेतले. पण तोपर्यंत रामेश्वरची गाडी निघून गेल्याने त्यांचा नाईलाज झाला. 

कालांतराने समजलेल्या बातमीमुळे मात्र सोलापूरच्या त्या सर्व वकील मंडळींना कळेना की, त्या स्टेशन मास्तराचे आभार कसे मानावे. ज्या दिवशी त्यांचा रामेश्वर प्रवास हुकला होता त्याच रात्री, एका अभूतपूर्व चक्रीवादळाने त्या सर्व परिसराला झोडपले होते. रामेश्वर बेटाला भारताच्या किनारपट्टीसोबत जोडणारा पंबन रेल्वे पूल त्या वादळाच्या तडाख्यामुळे कोसळला होता. त्याच वेळी त्या पुलावरून धावत असलेली शेणकोटा-रामेश्वर पॅसेंजर गाडीदेखील समुद्रात कोसळून त्यातील सर्व १५४ प्रवासी ठार झाले होते!

त्या स्टेशनमास्तरच्या 'कृपे'ने माझ्या वडिलांचे रामेश्वर दर्शन जरी चुकले असले, तरी त्यांचा जीव मात्र वाचला होता. १९६४ सालच्या त्या घटनेनंतर माझ्या वडिलांनी अनेक सहली आखल्या, पण रामेश्वरला जाण्याचा त्यांचा योग मात्र पुन्हा कधीच जुळून आला नव्हता. 

तीन वर्षांपूर्वी दिवाळीत, माझ्या आई-वडिलांना रामेश्वरला घेऊन जावे असे आम्ही ठरवत होतो. पण त्याच सुमारास आई आजारी पडल्यामुळे आमचे जाणे रहित झाले. त्यानंतर माझी आई वरचेवर आजारीच होती व शेवटी गेल्या वर्षी ३० एप्रिलला ती वारली. त्याच काळात सर्वत्र लॉकडाऊनही झालेला असल्याने कोणताच प्रवास करणे अशक्य होते. वडिलांची रामेश्वर दर्शनाची इच्छा आहे हे आम्हाला कळत होते. त्यामुळे, कोव्हिडचे निर्बंध जरासे शिथिल झाल्या-झाल्या आम्ही वडिलांसोबत रामेश्वर दर्शनाचा बेत आखला. माझे वडील, मी व माझा नवरा आनंद, तसेच माझा धाकटा भाऊ गिरीश, भावजय प्राची, आणि त्यांचा मुलगा देवाशिष, असे सगळे या सहलीला जाणार होतो. गिरीशने नेहमीच्या उत्साहात मुंबई मदुराई जाण्या-येण्याची विमान तिकिटे, आणि हॉटेल्सची बुकिंग तातडीने करून टाकली.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुण्याहून मुंबईला जाऊन गिरीशकडे मुक्काम करायचा, दसऱ्याच्या दिवशी, १५ ऑक्टोबरला मुंबईहून विमानाने निघून मदुराईला उतरायचे, आणि विमानतळावरूनच टॅक्सीने निघून तडक रामेश्वर गाठायचे, आणि १५ व १६ ऑक्टोबर रामेश्वर दर्शन करून मदुराईला यायचे असे ठरले. १७-१८ तारखेला मदुराईत हिंडून आणि मीनाक्षी-दर्शन करून १९ तारखेला दुपारपर्यंत मुंबईत परतायचे असा एकूण बेत होता. त्यानंतर, माझा चुलतभाऊ, म्हणजेच व्यवसायाने बिल्डर असलेला शिरीष, आणि चुलतबहीण डॉ. ज्योत्स्ना यांनाही आमच्याबरोबर यायचा आग्रह आम्ही केला. ज्योत्स्ना आनंदाने तयार झाली. शिरीष मात्र आढेवेढे घेत होता. एकदा गमतीने तो असेही म्हणाला, "रामेश्वरला जाण्याइतके काही माझे वय अजून झालेले नाही." मग मीही त्याला चेष्टेखोरपणे म्हणाले, "अरे आमची ट्रीप स्पॉन्सर करायला आम्हाला तुझ्यासारखी 'बडी मछली' पाहिजेच आहे!" बराच आग्रह केल्यानंतर शिरीष आमच्याबरोबर यायला राजी झाला. त्यानंतर त्या दोघांची विमान तिकिटे काढली व हॉटेलचे जास्तीच्या खोल्यांचे बुकिंगही करून टाकले. 

माझे वडील, मी, आनंद, ज्योत्स्ना, आणि शिरीष असे सर्वजण १४ ऑक्टोबरला संध्याकाळी पुण्याहून निघालो. शिरीषच्या मोठ्या 'पाजेरो' गाडीतून अगदी अलगद प्रवास झाला. पुणे-मुंबई 'एक्सप्रेस वे' वर नवीनच झालेल्या फूड मॉल मध्ये मस्त खादाडीही झाली. 

१४ ऑक्टोबरला सकाळीच आम्हाला समजले होते की, तामिळनाडू सरकारच्या नियमावलीनुसार, रामेश्वर मंदिर फक्त सोमवार ते गुरुवार असे चारच दिवस दर्शनासाठी खुले असणार होते. ठरलेल्या बेताप्रमाणे आम्ही १५ तारखेला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी उशिरा रामेश्वरला पोहोचणार होतो. ही नवीन माहिती कळल्यानंतर आम्ही आमचा बेत बदलला आणि १५-१६ ऑक्टोबर मदुराईतच मुक्काम करून, १७-१८ ऑक्टोबर रामेश्वर करायचे असे आम्ही ठरवले. निदान सोमवारी, म्हणजे १८ तारखेला तरी रामेश्वर दर्शन होऊ शकेल, या कल्पनेने आम्हाला जरा हायसे वाटले. 

देवशिषने तत्परतेने हॉटेलची बुकिंग्स बदलून घेतली. बदललेल्या प्लॅनप्रमाणे, १५-१६ ऑक्टोबर मदुराईमधील पर्यटन स्थळे पाहायची आणि मीनाक्षी दर्शन करायचे असे ठरले होते. पण १४ ऑक्टोबरला संध्याकाळी आम्हाला आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली. तामिळनाडूमधील सगळीच मंदिरे शुक्रवार ते रविवार बंद असणार होती. इतक्या दूरचा प्रवास करून मदुराईचे सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर पाहता येणार नाही याचे आम्हाला सर्वांनाच फार वाईट वाटले. "मीनाक्षी-दर्शन नाही तर नाही, रामेश्वर-दर्शन तर होणारच आहे. शुक्रवार-शनिवार मदुराईच्या रिसॉर्ट मध्ये पत्ते खेळू, गप्पा मारू, आणि आराम करू" अशी आम्ही आमच्या मनाची समजूत घातली. 

वृद्ध वडिलांना इतक्या दूर घेऊन जात असल्याने त्यांना काही त्रास न होता आमची सहल निर्विघ्न पार पडावी अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही सर्व माहितगारांकडून मदुराई व रामेश्वरची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या एका बालरुग्णाचे वडील, श्री श्याम, सौ. गीता नावाची माझी मैत्रीण, आणि कर्नल रामकृष्ण व कर्नल गणपती नावाच्या आनंदच्या दोन मित्रांची या बाबतीत खूपच मदत झाली. श्री. श्याम यांनी तर मदुराईच्या श्री. गणेश नावाच्या त्यांच्या एका मित्राशी माझे बोलणेच करून दिले. श्री. गणेश म्हणाले की, "सध्या राज्यातील सगळी मंदिरे शुक्रवार ते रविवार बंद असली तरी इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरचे निर्बंध कधीचेच उठवले आहेत. त्यामुळे हिंदू देवळावरचे निर्बंधही उठवण्यासाठी हिंदू भाविक तामिळनाडू सरकारवर दबाव आणत आहेत." एक-दोन दिवसातच हे निर्बंध उठवले जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. 

१५ तारखेला आम्ही विमानात बसण्यापूर्वीच श्री. गणेश यांनी आम्हाला आनंदाची बातमी दिली की, तामिळनाडू सरकारने सर्व मंदिरे दर्शनासाठी संपूर्णपणे खुली केली आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही महाराष्ट्र राज्याचे सीमोल्लंघन केले. आमच्या तिकिटावर विमानातील खाद्यपदार्थ फुकट मिळू शकणार असल्याची सुवार्ता इंडिगो च्या हवाई सुंदरीने आम्हाला दिली. घरून नाश्ता करून निघालेलो असलो तरीही विमानातील सुकामेवा, चिकन नूडल्स आणि वाफाळती कॉफी अशा सर्व गोष्टींचा आस्वाद आम्ही घेतला. अतिशय सुखद असा विमान प्रवास झाल्यावर मदुराई एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीची वाट बघत उभे असताना, तेथील हवेचा दमटपणा आणि उन्हाचा तडाखा आम्हाला अधिकच जाणवला. दोन टॅक्सी करून, एअरपोर्टपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या, ताज ग्रुपच्या "द गेटवे हॉटेल" नावाच्या रिसॉर्टमध्ये आम्ही पोहोचलो. पसुमलाई नावाच्या टेकाडावर वसलेल्या त्या रिसॉर्टमध्ये  पोहोचेपर्यंत दुपारचे दोन-सव्वा दोन वाजले होते. सर्वांनाच प्रवासाचा शीण जाणवायला लागला होता. हिरवीगार वनराई, पक्ष्यांची किलबिल, धिटाईने इतस्ततः हिंडणारे अनेक मोर, आणि तेथील प्रशस्त वातानुकूलित खोल्यातील उबदार पलंग, असे सर्व निवांत वातावरण पाहताच, उरलेला दिवस आरामात लोळून काढण्याबाबत सगळ्यांचे एकमत झाले. 


थोड्या विश्रांतीनंतर आम्ही त्या रिसॉर्टचा परिसर हिंडून बघितला. तिथल्या माणसाळलेल्या मोरांना आपल्या हाताने खाणे भरवायला फारच मजा येत होती. इकडे-तिकडे हिंडून आम्ही बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले. संध्याकाळच्या चहानंतर, एकीकडे आय. पी. एल. ची फायनल मॅच बघत, तास दोन तास रमी खेळलो. रात्रीचे जेवण झाल्यावर मात्र सगळ्यांच्याच डोळ्यावर निद्रादेवीने आपले उबदार पांघरूण घातले. 

(क्रमशः)

गुरुवार, २२ जुलै, २०२१

फॅट बट फिट!

माझ्या एका मैत्रिणीच्या बंगल्यावर आम्ही दहा-बारा शालेय मैत्रिणी जमणार होतो. संध्याकाळचे पेशंट तपासून निघेपर्यंत मला जरा उशिराच झाला होता. बाकी सगळ्याजणी माझ्या आधीच पोहोचल्या होत्या. मी गेल्या-गेल्या, माझ्याकडे बघून माझ्या मैत्रिणींना कमालीचे आश्चर्य वाटले. सगळ्यांनी मला घेरून प्रश्नांची सरबत्ती चालू केली. 

" अय्या, स्वाती कसली स्लिम झाली आहेस! काय केलंस तरी काय? आम्हाला सांग ना" 

"ए, तू दीक्षित केलेस का दिवेकर? सांग ना गं. मी गेले सहा महिने दीक्षित करतेय. पहिल्या दोन-तीन महिने जरा फरक पडला, पण आता काही केल्या काटा हालत नाहीये. अगदी फ्रस्टेट व्हायला होतंय गं" 

"तू काय बाई, डॉक्टर आहेस. तुला सगळंच माहिती असेल. वजन कमी करणं तुझ्यासाठी अगदीच सोप्पं आहे. पण कसं कमी करायचे आम्हाला सांग ना गं."  

मला अगदी कसचं-कसचं होऊन माझ्या पोटात गुदगुल्या होत होत्या. माझा चेहरा अगदी आनंदाने फुलला होता. मी उत्तर द्यायला सरसावले आणि... 

...नेमकी मला झोपेतून जाग आली! 

मनगटावरील 'स्मार्ट वॉच'मधे मी पाहिले, पहाटेचे पाच वाजले होते. ही माझी रोजची जाग येण्याचीच वेळ होती. खरंतर, पहाटेची स्वप्ने सत्यात उतरतात असे म्हणतात. गेली अनेक वर्षे, थोड्याफार फरकाने हे असेच स्वप्न, नेमके पहाटेच्याच वेळी मला पडत आहे. पण अजून एकदाही ते सत्यात उतरलेले नाही. त्यामुळे, 'पहाटेची स्वप्ने खरी ठरतात' या विधानावर माझा अजिबात विश्वास नाही!


गेली कित्येक वर्षे, स्लिम होण्यासाठी अनेक प्रयत्न करून मी अगदी थकून गेले आहे. या सर्व काळांत डाएट,  कॅलरीज, फॅट्स, ट्रान्सफॅट्स असल्या भीतीदायक शब्दजंजाळात मी अडकलेले आहे. प्रत्येक वेळी, एखादा खाद्यपदार्थ समोर आला की हे शब्द माझ्या मनात थैमान घालू लागतात. त्यामुळे घास तोंडाजवळ न्यायच्या आधीच अपराधीपणाची भावना मनाला घेरते. या क्लेशदायक काळात माझे वजन मात्र सातत्याने वाढतच आहे. आणि या दुःखावर डागण्या द्यायला," तू काय डॉक्टर आहेस बाई. तुला काय सगळंच माहिती आहे." अशा टिप्पण्या ऐकायला लागतात. 

खरंतर डॉक्टर असल्याने, वजन, आहार, व्यायाम आणि जीवनशैली याबाबत बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत. त्याशिवाय, गेली सहा वर्षे, तीन-चार फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मेडिसिन व पीडियाट्रिक्स हे विषय मी शिकवते आहे. त्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या, 'स्थूलत्व' या विषयावर लेक्चर घ्यायला मला फार आवडते. स्थूलत्व, त्याची व्याख्या, त्याची कारणे, दुष्परिणाम आणि ते कमी करण्याचे उपाय, यावर अगदी प्रत्येकवेळी सखोल अभ्यास करून मी व्याख्याने देते. पण हे सगळे ब्रह्मज्ञान प्रत्यक्षांत उतरवणे मला अशक्य होतेय. त्यामुळे, 'सगळं कळतंय पण वळत नाही' अशी परिस्थिती आहे. या कारणाने गेली कित्येक वर्षे मनावर एक प्रकारची मरगळ आल्यासारखे झाले होते. 

गेल्या ऑक्टोबरात मात्र ही मरगळ झटकायला मदत करणारा एक छोटा मित्र मला मिळाला. झालं असं, की अमेरिकेत असलेल्या आमच्या मुलाने, अनिरुद्धने, माझ्यासाठी आणि आनंदसाठी प्रत्येकी एक 'फिटबीट व्हर्सा-२' नावाचे स्मार्टवॉच  पाठवले. 'याने उगीचच १०० डॉलर्स खर्च केले' असाच विचार प्रथमदर्शनी माझ्या मनात आला होता. पण आता पोराने विकत घेतलेच आहे  तर वापरू या, अशा विचाराने मी ते वापरायला सुरुवात केली. तेव्हापासून मात्र माझे पूर्ण लक्ष 'फॅटनेस' वरून उडून 'फिटनेस' वर केंद्रित झालेय हे मात्र खरे. 

खरंतर मी अनेक वर्षे' 'फॅट' कॅटॅगरीतच आहे पण, अगदी न चुकता, रोजचा व्यायाम करत असल्याने 'फिट'देखील आहेच. पहाटे उठून आठ-दहा किलोमीटर चालायला जाणे किंवा सुमारे १५-२० किलोमीटर सायकलस्वारी करणे, हा माझा गेल्या अनेक वर्षांचा परिपाठ आहे. व्यायामाचा मला कधीही कंटाळा येत नाही. पूर्वी आमची मुले लहान असताना, माझे व्यायामाचे कपडे, बूट-मोजे आदल्या रात्रीच काढून ठेऊन मी जय्यत तयारी ठेवायचे. पहाटे चार-साडेचारलाच उठून मी पळायला जायचे. मुलाची शाळा साडेसातला भरत असल्यामुळे, साडेसहा वाजेपर्यंत व्यायाम संपवून मला घरी परतावे लागायचे. पण हे सगळे मी अगदी उत्साहाने न चुकता करायचे. पण, माझ्या पसरलेल्या देहाकडे बघून, "मी फिट आहे", हे माझे म्हणणे लोकांना पटतच नाही. 

'फिटबिट वर्सा-२' हातावर बांधल्यापासूनच तो माझा जिवलग मित्र झाला. दिवसाचे चोवीस तास हा मित्र माझ्यासोबतच असतो. त्याच्यामुळे माझ्या फिटनेसचे नेमके मोजमाप मी करू शकतेय, हे मला खूप आवडते आहे. सर्वसाधारणपणे, दिवसभरात मनुष्यप्राण्याने १०००० पाऊले चालणे आरोग्यदायी असते असे म्हटले जाते. फिटबिट माझ्या आयुष्यात आल्यापासून, जवळ-जवळ रोजच मी तेवढी पावले सहजी पूर्ण करते, हे माझ्या लक्षात आले. 

आम्ही असा वैद्यकीय सल्ला देतो की, आठवडाभरात किमान पाच दिवस, रोज ३० मिनिटे moderate intensity चा  किंवा रोज किमान १५ मिनिटे vigorous intensityचा व्यायाम करावा. म्हणजेच आठवडाभरात किमान १५० 'झोन मिनिटां'चा व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. मी करत असलेल्या व्यायामाद्वारे आठवड्यभरात माझी सरासरी २५०-३०० 'झोन मिनिटे' सहजी होत आहेत, असे माझा 'मित्र' मला सांगतो आहे. 

चार महिन्यांपूर्वी कोव्हिड न्यूमोनियामुळे मला रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. माझे स्थूलत्व, साठीच्या आसपासचे वयोमान आणि दम्याचा आजार, या तिन्ही धोकादायक गोष्टींमुळे कोव्हिड न्यूमोनियातून बाहेर पडेस्तोवर मनात थोडीफार धाकधूक होतीच. रुग्णालयातल्या नर्सबाई माझ्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी(SpO2), हृदयाच्या ठोक्यांचा वेग (Heart rate), मी विश्रांती घेत असतानाचा हृदयाच्या ठोक्यांचा वेग(Resting Heart Rate), माझ्या श्वसनाचा वेग(Respiratory rate), हे सगळे दिवसातून दोन वेळा तपासायच्या. पण माझ्या मनगटावर विराजमान असलेला माझा 'मित्र' मला ते सगळे सातत्याने सांगत होता. 

'फिटबिट' मला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देतो, आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेली चांगली माहिती देतो, मी चांगला व्यायाम केला की माझे कौतुक करतो, मी काय खावे आणि काय खाऊ नये याचा सल्ला देतो, मी स्वस्थ झोपते आहे का आणि पुरेशी विश्रांती घेते आहे की नाही? यावर बारकाईने लक्ष ठेवतो, दिवसभरात मी किती कॅलरीज खर्च केल्या आहेत ते सांगतो, मी किती वेळ आणि किती वेगात व्यायाम केला, याची नोंद करून मला दाखवतो, बराच काळ मी एकाजागी बसून राहिले की, "आता उठ आणि  जरा हालचाल कर बरं" असा इशारा मला देतो. असा हा माझा मित्र मी सर्वतोपरीने फिट राहावे म्हणून सातत्याने मदत करत असतो. 

आपल्या एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीलादेखील आपण आपल्या सगळ्या गोष्टी सांगतोच असे नाही. 'मी  दिवसभरात काय काय खाल्ले, किती वाजता आणि किती खाल्ले?' हे सगळे माझ्या या मित्राला मी रोज सांगणे अपेक्षित आहे. त्याने बरेचदा मला तसे विचारून झालेय. पण मी मात्र अजून त्याला ते सांगायला सुरुवात केलेली नाहीये!

त्याला मी रोज फक्त एकच सांगते, 

"फिटबिट्, माय डियर फ्रेंड, डोन्ट वरी. आय विल रिड्यूस माय वेट बिट बाय बिट. अनटिल देन, आय विल रिमेन फॅट बट फिट!" 

बुधवार, ९ जून, २०२१

'वाढ' दिवस !

काल मला आमच्या अमेरिकास्थित मुलाशी, अनिरुद्धसोबत बोलायची इच्छा झाली. नेमके कालच त्याला काही महत्त्वाचे काम असल्याने, त्याला बोलायला वेळ नव्हता. पण, "आज वेळ नाही. उद्या तुझा वाढदिवस आहे. उद्याच बोलेन" असे व्हॉटसप चॅटवर सांगून, आज माझा वाढदिवस असल्याची आठवण त्याने मला कालच करून दिली होती. हल्ली 'वाढ'दिवस म्हटले की त्यातला वाढ हा शब्द अगदी नकोनकोसा होतो!

जन्मदिवसालाच वाढदिवस का म्हणायचे? दर दिवसागणिक होणारी शारीरिक वाढ कोणी लक्षात घेत नाही का? का ती वर्षातून एकदाच लक्षांत आणून द्यावी या उद्देशानेच वाढदिवस हा शब्द पडला असावा? कोण जाणे. 

काल रात्री, बरोबर बारा वाजता, अमेरिकेतील माझ्यापेक्षा मोठ्या भाऊ-वहिनींचा, म्हणजे जयंत-मेधाचा फोन आला. त्यावेळी मला नुकतीच गाढ झोप लागली होती. त्यामुळे, त्यांच्याबरोबरचे बोलणे फारसे वाढले नाही. मेधा अगदी सुडौल बांध्याची आहे. ती स्वतः आता एका गोड नातीची आज्जी झालेली असली तरी ती 'संतूर मॉम' म्हणून सहज खपून जाईल अशी आहे. मागे एकदा जयंत आणि मेधा माझ्याकडे महिनाभर राहिले होते. मेधाला चांगले-चुंगले खायला घालून तिच्या वजनात वाढ करावी आणि तिला आपल्या गोटात घ्यावे, यासाठी मी बरेच प्रयत्न केले होते. पण कसले काय? ती होती तशीच राहिली आणि माझ्या वजनात मात्र चांगलीच वाढ झाली! ते आठवल्यामुळे रात्री अर्धवट झोपेत, त्यांचा फोन खाली ठेवता-ठेवता, "आजच्या वाढदिवसापासूनआपली वाढ आपण रोखायचीच" असा विचार करतच मी निद्रादेवीच्या आधीन झाले. 

तसे पाहता, वाढदिवसाला surprise gift, किंवा पार्टी देणे वगैरे फॅड आमच्या घरी कधीच नव्हते. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात, आनंदने माझ्यासाठी कधी-कधी काही भेटवस्तू आणल्या होत्या. एखादी वस्तू पाहून नाक मुरडणे, "इतकी महाग का आणलीस?" असे म्हणून त्याच्या हौसेचे मोल अगदीच फोल ठरवणे, किंवा "अनावश्यक वस्तू का आणलीस?" असले व्यावहारिक प्रश्न विचारणे, या माझ्या प्रतिक्रियांमुळे, काही वर्षांमध्येच आनंदचे माझ्याप्रति असलेले 'वाढीव' प्रेम आटलेले होते. अर्थात, अशा त्या परिस्थितीत दुसरे काय होणार होते? 

पण, आपल्या बायकोला हिऱ्याच्या टॉप्सपेक्षा गरम चहाचा कप जास्त आनंद देऊन जातो, हे माझ्या चाणाक्ष नवऱ्याच्या त्या काळातच लक्षात आले होते. त्यामुळे, आज सकाळी आनंदने छान ताजा, गरमागरम चहा करूनच मला उठवले. गरम चहाच्या कपाबरोबरच मला वाढदिवसाच्या शुभेच्छाही आनंद आणि माझ्या वडिलांनी, म्हणजे दादांनी दिल्या. 

आजपासून मी माझ्या 'वाढीला' आळा घालायचा निश्चय केला आहे, असे मी सांगणार इतक्यात आनंद म्हणाला, 'आज नाश्त्यासाठी तुला आवडणारा गरमागरम उडीदवडा आणि चटणी-सांबर मी घेऊन येणार आहे' हे ऐकताच, माझ्या निश्चयाला पहिला सुरुंग लागला. 'मुरुगन' कडून आणलेले कुरकुरीत वडे अगदी आग्रह करकरून मला आनंदने वाढले. मग अर्थातच, माझ्याही जिभेची भूक वाढत गेली. त्यानंतर मात्र, गच्चीवरील माझ्या कचरा प्रकल्पात आणि बागेत काम करून वाढीव कॅलरीजचा निचरा करायचे मी ठरवले. मी गच्चीवर काम सुरु केले आणि लगेच फोनवर फोन येणे सुरु झाले. माझा धाकटा भाऊ आणि वहिनी, म्हणजे गिरीश आणि प्राची, आणि माझा मुलगा अनिरुद्ध, यांच्याशी अगदी थोडक्यात पण प्रेमाने बोलणे झाले. 

हल्ली सोशल मीडियामुळे 'वाढदिवसाचे' स्तोम वाढत चालले आहे. शाळा-कॉलेजच्या काळातल्या जुन्या मित्रकंपूंचे आणि इतरही वेगवेगळे ग्रुप्स तयार झाल्यामुळे मित्र-मैत्रिणींच्या संख्येत आणि प्रेमात कमालीची वाढ झालेली आहे. अनेक जवळचे आणि लांबचे आप्तही जणू नव्याने जोडले गेले आहेत. या सर्वांमध्ये माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, लहानग्या पेशन्ट्सचे पालक यांच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छांचीही भर पडली आहे. 

आज सकाळचे क्लिनिक, दुपारचे जेवण आणि त्यानंतर ऑनलाईन लेक्चर्स, या गडबडीत संध्याकाळचे पाच वाजले. फोनवर शुभेच्छा देणाऱ्यांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झालेली आहे. वेळ मिळेल तसे सर्वांशी फोनवर बोलणे होत होतेच. संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच्या मेसेजेसची संख्या कमालीची वाढली. त्यांना सर्वांनाएकीकडे  उत्तरे देणे चालू होतेच. दुपारी  कुरियरने एक सुरेख केक आला. तो कोणी पाठवला असेल, हे गूढ मात्र उकलेना.
  


संध्याकाळी माझ्या प्रभा आत्याकडे जाऊन तिचे आणि माझ्या वयोवृद्ध आतोबांचे, दादासाहेबांचे  आशीर्वाद घेतले. तिथेच केक कापला आणि वाढीव कॅलरीजचा विचार न करता यथेच्छ चापला. अनेक मित्रमैत्रिणींचे आणि आप्तांचे फोन आले. तो केक माझा धाकटा भाऊ, गिरीशने पाठवल्याचा उलगडा माझ्या भाच्याच्या, म्हणजे देवाशिषच्या फोनमुळे झाला. प्रियंवदा काकू, राणी ताई, ज्योत्स्ना ताई आणि वीणामावशी यांनी शुभाशीर्वाद दिले. मिलिंद शिवशरण, या  माझ्या बालमित्राने फोनवर शुभेच्छा देऊन, मला माझी काही माहिती विचारली. त्यानंतर त्याने माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या 'हुशारी'वर एक लेख लिहून आमच्या शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर पाठवला. विठ्ठल, नृसिंह, विवेक, नंदा, तेजस्विनी, विनय,लक्ष्मी, सतीश, प्रकाश, मनीषा, नितीन, व्यंकटेश, गीता, ऍन, सीमा व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी माझ्यात असलेल्या, (आणि नसलेल्याही) 'सुप्त' गुणांची केलेली स्तुती वाचून व ऐकून माझ्या शरीरावरील मांस एक नव्हे तर दोन मुठींनी वाढले. रात्रीच्या जेवणाला आनंदने मटण बिर्याणी करून आणि आईस्क्रीम आणून माझी 'वाढ' कायम राहील याची व्यवस्था केली. 

वाढदिवसाच्या निमित्ताने, माझ्या वाढत्या वयाची आणि शरीराची आठवण मला दिवसभर होत होती. पण दुपारचा काही वेळ मात्र मी अगदीच लहान मूल होऊन गेले. त्याचे कारण, आमची छोटी नात, नूर! आमच्या ऑस्ट्रेलियास्थित मुलीचा, असिलताचा आणि जावई आनंद यांचा फोन आला. नूरशीही मनसोक्त बोलणे झाले. नूर आता व्हिडीओ कॉलवरही मला चांगली ओळखायला लागली आहे. तिच्याशी बोलताना आणि वेगवेगळ्या माकडचेष्टा करून तिची करमणूक करताना, माझ्या वाढदिवशी माझ्यात झालेल्या 'वाढी'चा मला पूर्ण विसर पडला.

हा लेख लिहून संपता-संपता, म्हणजे थोड्याच वेळात, माझा हा वाढदिवस संपेल. आजचा दिवस उगवताना केलेला, स्वतःची 'वाढ रोखण्याचा' माझा निश्चय मी आता माझ्या वाढत्या वाढदिवसावर, म्हणजेच उद्यावर ढकलला आहे! 

मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार!

        

  

रविवार, १६ मे, २०२१

X=Y

काही दिवसांपूर्वी 'वाजदा' नावाचा, एका अगदी छोट्याश्या विषयावरचा, सौदी अरेबियन सिनेमा पाहिला. 

वाजदा नावाच्या, एका नऊ-दहा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीला स्वतःची दुचाकी सायकल हवी असते. वाजदाच्या आईवडिलांचे परस्परसंबंध तणावपूर्ण झालेले असल्याने, वडिलांकडून सायकलसाठी पैसे मिळण्याची शक्यता जवळ-जवळ नसतेच. मुलीने सायकल चालवणे, या गोष्टीला तेथील समाजात मान्यता नसल्याने वाजदाच्या  आईचाही विरोधच असतो. वाजदाच्या आईला पहिल्या बाळंतपणात खूप त्रास झालेला असल्याने ती दुसरे मूल होऊ द्यायला तयार नसते. परंतु, वाजदाच्या आजीला, म्हणजे वडिलांच्या आईला, घराण्याला वारस म्हणून नातू हवा असतो. त्यामुळे, वाजदाच्या वडिलांचा दुसरा विवाह होतो. 

स्वकष्टातून सायकल विकत घेण्यासाठी वाजदा अनेक प्रकारे पैसे जमवू लागते. कुराणपठणाची स्पर्धा जिंकल्यास, मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेतून  आपण सहजी सायकल विकत घेऊ शकू , हे तिच्या लक्षात येते. त्यामुळे मोठ्या जिद्दीने आणि डोकेबाजपणे कुराणपठणाचा सराव करून वाजदा ती स्पर्धा जिंकते. बक्षिसाच्या रक्कमेतून स्वतःसाठी सायकल घेणार असल्याचे, ती स्टेजवरून मोठ्या अभिमानाने सांगते. स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य नसलेल्या त्या देशात, जिथे मुलींनी सायकल चालवण्याचा विचार करणेही जणू पाप असते, तिथे सायकल विकत घेण्याचा तिचा हा धक्कादायक निर्णय तिच्या शाळेच्या मुख्याध्यापक बाईंना अजिबात आवडत नाही. त्यामुळे तिच्या बक्षिसाची रक्कम त्या परस्परच धर्मादायी संस्थेला दान करण्याचे जाहीर करून टाकतात. इतक्या प्रयत्नानंतरही आपल्याला आता सायकल मिळणार नाही हे लक्षात आल्यावर वाजदा हिरमुसली होते. पण वाजदाची आई तिच्यासाठी सायकल खरेदी करून तिला आणि प्रेक्षकांनाही शेवटी सुखद धक्का देते.
 
हा सिनेमा मला खूप आवडला. पूर्णपणे सौदी अरेबियात चित्रित झालेला आणि एका स्त्री दिग्दर्शिकेने मोठ्या हिमतीने बनवलेला हा दर्जेदार सिनेमा आवर्जून बघावा असाच आहे. एका व्हॅनमध्ये कॅमेरा ठेवून, चोरीछुपे या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आलेले आहे, असेही वाचनात आले. एका श्रीमंत मुस्लिम राष्ट्रात स्त्रियांकडून अपेक्षित असलेली वर्तणूक, त्यांच्यावर असलेली बंधने, व त्यामुळे समाजातील त्यांचे दुय्य्म स्थान, यावर हा सिनेमा  प्रकाश टाकतो. प्रत्येक विवाहित स्त्रीने मुलगा जन्माला घालून नवऱ्याच्या कुटुंबाची वंशवेल वाढवणे हे अत्यावश्यक असते, हेही त्यातून अधोरेखित होते. आपली आई मुलगा जन्माला घालू शकत नसल्यानेच आपल्या आईवडिलांमध्ये बेबनाव आहे, याचा अंदाज वाजदाला आलेला असतो. केवळ याच कारणामुळे आपले वडील आपल्या आईला सोडून दुसरे लग्न करणार आहेत हेही तिला कळलेले असते. एकदा घरात खेळत असताना, एका फलकावर लावलेली, आपल्या कुटुंबीयांची वंशावळ  वाजदाला दिसते. त्या वंशावळी मध्ये प्रत्येक पुरुषाच्या अपत्यांपैकी फक्त मुलांचीच नावे लिहिलेली असतात. अर्थातच, वाजदाच्या वडिलांच्या नावाखाली कोणाचेच नाव लिहिलेले नसते. वाजदाला ते खटकते आणि ती तिथे आपले स्वतःचे  नाव लिहिते. सिनेमात अगदी सहज दाखवलेला हा प्रसंग माझ्या मनाला फार भिडला. विचाराने मागास असलेल्या राष्ट्रांमध्ये वंशावळी  बाबत हीच संकल्पना रूढ असणार हे जाणून, तिथल्या स्त्रियांबद्दल प्रचंड कीव माझ्या मनात दाटली. 

पण खरी गंमत तर पुढे झाली. माझ्या माहेरच्या कुटुंबीयांची वंशावळ माझ्या पाहण्यात आली. त्यामध्ये पिढ्यानपिढ्या, एकाही 'कन्ये'चे नाव मला दिसले नाही. माझ्या ध्यानात आले की, माझ्या सासरच्या वंशावळीतही माझे नाव असायचे कारण नव्हते. म्हणजे, दोन्हीकडच्या वंशावळींमध्ये कदाचित मला स्थानच नव्हते. आपला समाज पुढारलेला आहे असे आपल्याला कितीही वाटत असले तरी, आपल्याही समाजात स्त्रीला अजूनही  दुय्यम  स्थानच आहे. मुलगा म्हणजे 'वंशाचा दिवा', ही संकल्पना अजूनही आपल्या समाजात मूळ धरून आहे. 


'हम दो हमारे दो' या घोषवाक्याची जागा आता  'हम दो हमारा एक'  या नाऱ्याने घेतली आहे. पहिला मुलगा झाला तर आनंदीआनंद असतो. अशावेळी, एका अपत्यानंतर थांबण्याच्या निर्णयाचे, आप्तस्वकीयांकडून स्वागत होते. पण यदाकदाचित पहिली मुलगी झाली, तर दुसऱ्या 'चान्स'साठी दोन्हीकडचे आप्त त्या नवरा-बायकोच्या मागे लागल्याशिवाय राहत नाहीत. एकापाठोपाठ दोन मुली झाल्या तर 'बिच्चारीला दुसरी मुलगीच झाली' असे वाक्य हमखास ऐकू येतेच. किंवा 'दुसरी मुलगी झाली म्हणून काय झाले? हल्ली मुलीसुद्धा आईवडिलांना म्हातारपणी बघतातच की' असे एखादे 'उत्तेजनार्थ' वाक्य कोणीतरी बोलते. शंभर वर्षांपूर्वी आपल्या समाजात एखाद्या 'पुत्रवती' स्त्रीला जितके महत्व होते, तितकेच महत्व आज आहे असे मला म्हणायचे नाही. किंवा, प्रत्येक पुत्रहीन स्त्रीला आजही डावी वागणूकच मिळते, असेही मला वाटत नाही. पण, एकंदरीत समाजाच्या वैचारिक सुधारणेचा वेग अजूनही मंदच आहे हे खरे. कित्येक घरांमधून, तथाकथित 'वंशाचे दिवे' किती दिवटे निघतात, हे आपल्याला दिसतेच. एखाद्या दिवट्या पुत्राच्या प्रेमात अंध होऊन वाहवलेले पालकही आपण बघतो. परंतु, जर आज आपण मुलगा-मुलगी समान मानतो असे म्हटले, तर निदान वंशावळी मध्ये मुलींच्या नावाचा उल्लेख सहजच यायला हवा. नाही का?

आमच्या मुलीने, तिच्या लग्नानंतर स्वतःचे नाव आणि आडनाव बदललेले नाही. आमची मुलगी आणि जावई ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. तिथल्या पद्धतीप्रमाणे, अपत्य जन्माला येताच त्याच्या नावानिशी त्याची नोंद करावी लागते. तसेच, मुलगा जन्मणार का मुलगी, हे आधी जाणून घेण्याची आई-वडिलांची इच्छा असेल तर, ते त्यांना आधीच सांगितले जाते. त्यानुसार, आमच्या मुलीला मुलगी होणार हे आम्हाला कळलेले  होते. नवजात मुलीचे नाव आणि आडनाव काय ठेवायचे हे आमच्या मुलगी व जावयाने आधीच ठरवून ठेवले होते. आमच्या नातीचे कागदोपत्री नाव आहे 'नूर बापट'. आता जर मी जुन्या पद्धतीप्रमाणे विचार केला तर, 'बापट वंशावळीमध्ये जिथे आमच्या मुलीलाच स्थान नाही तिथे तिच्या मुलीला कसे स्थान मिळणार'? हा प्रश्न मला पडणारच. नाही का?

काल-परवा मी टीव्हीवर एक कार्यक्रम बघत होते. त्यात 'मॅटर्नल लिनिएज' आणि 'पॅटर्नल लिनिएज', यावर शास्त्रीय चर्चा सुरु होती. आई आणि वडिलांकडून त्यांच्या अपत्यांना X आणि Y ही गुणसूत्रे मिळतात. आईच्या पेशींमध्ये दोन X गुणसूत्रे असल्याने, आईच्या बीजातून अपत्याला फक्त X गुणसूत्रच मिळू शकते. मात्र, वडिलांच्या पेशींमध्ये X आणि Y ही दोन्ही गुणसूत्रे असल्याने, होणाऱ्या अपत्याला आपल्या वडिलांकडून X किंवा Y यांपैकी कोणतेही एक गुणसूत्र मिळू शकते. वडिलांकडून जर Y गुणसूत्र आले तर, आणि तरच, पुत्र जन्मतो. आणि वडिलांकडून जर अपत्याला X गुणसूत्र आले तर मुलगी जन्मते. 

चर्चेत पुढे असेही बोलले गेले की, Y हे गुणसूत्र अपत्याला वडिलांकडून, आणि वडिलांना त्यांच्या वडिलांकडून असेच पिढ्यानपिढ्या येत असल्याने, Y गुणसूत्राचा अभ्यास केल्यास 'पॅटर्नल लिनिएज'चा अभ्यास करता येतो. 'पॅटर्नल लिनिएज' ही संकल्पना 'गोत्र' या नावाने आपल्या धर्मात मानली गेलेली आहे. त्यामुळे, एखाद्या कुटुंबातील मुलगाच त्या कुटुंबाचे गोत्र पुढे चालवू शकतो असाही विचार चर्चेत मांडला गेला. इथपर्यंतची माहिती योग्य पद्धतीने सांगितली गेली. परंतु, त्यापाठोपाठ, "सगोत्र विवाह करणे अयोग्य आहे" असे अशास्त्रीय किंवा अंधश्रद्ध भाष्य केले गेले. याबाबत समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे, याची मला जाणीव झाली. नियोजित वर आणि वधू या दोघांच्याही कुटुंबांच्या वंशावळीतील वरच्या तीन पिढ्यांपैकी एकाही पूर्वजाचे दुसऱ्या कुटुंबातील पूर्वजासोबत सख्खे नाते असू नये असे आधुनिक शास्त्र सांगते. म्हणजेच, वरच्या तीन पिढ्यांमध्ये दोन्ही कुटुंबांपैकी कोणीही एकमेकांची सख्खी भावंडे नसतील तर सगोत्र विवाहामध्येदेखील धोका नसतो.

आज हे सगळे आठवण्याचे कारण असे की, स्वतःच्या वडिलांकडून आलेले Y गुणसूत्र धारण करणाऱ्या आमच्या मुलाचा, अनिरुद्धचा आज वाढदिवस आहे. आमच्या परीने आम्ही आमच्या दोन्ही अपत्यांना, म्हणजे XX गुणसूत्रधारक मुलीला आणि XY गुणसूत्रधारक मुलाला, समान वागणूक दिली. हेच जर गणिती सूत्रात मांडले तर XX=XY, म्हणजेच X=Y, असेच आम्ही मानत आलो. तरीदेखील, आमच्यावर आपसूक झालेल्या संस्कारांमुळे, कदाचित आमच्याकडून आमच्याही नकळत काही डावे-उजवे झाले असण्याची शक्यता आहे. 

जेंव्हा संपूर्ण समाज, जनुकीय संदर्भात X=Y हे मानायला लागेल, तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने प्रगत झाला असे म्हणता येईल.