बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

'नवगरीबांचे' 'नोट'कारण!

पुणे महानगर पालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमध्ये माझ्या बालरूग्णांच्या पालकांना, "पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे तुम्हाला कितपत त्रास होतोय?" असा प्रश्न विचारला असता जवळपास प्रत्येकाने, "मॅडम आमच्या कडे नेहमी फक्त दहा, पन्नास आणि कधीतरी शंभराच्या नोटा असतात. पाचशे किंवा हजारचीनोट आम्हाला कधी वापरायला मिळतच नाही तर आम्हाला काय फरक पडणार आहे?", असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आणि खऱ्याखुऱ्या गोरगरिबांच्या जीवनावर नोटा बंदीच्या निर्णयामुळे काहीही विपरीत परिणाम झालेला नाही, याची खात्री पटली. त्या लोकांनी प्रधानमंत्री मोदींच्या निर्णयाचे स्वागतच केले.सोनावणे रुग्णालयात पेपर काढायला दहा रुपये पडतात. एखाद्या बालकाचे रक्त तपासणी करावी लागणार असेल तर अजून दहा रुपये भरावे लागतात. बरेचदा ते जास्तीचे दहा रुपयेही या गरीब लोकांकडे नसतात. त्यामुळे, "नोटा बंदमुळे गरिबांचे हाल होताहेत",  हा विरोधी पक्षांचा कांगावा हास्यास्पद आहे. इतर अनेक कारणांनी गरिबांचे हाल होताहेत,  ते यांना कधी जाणवले आहेत का? आज या राजकीय पुढाऱ्यांवर, मोदींच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे अचानक गरीबी ओढवली आहे आणि या नवगरीबांचे हाल होत आहेत, ही गोष्ट मला मान्य आहे आणि त्यांच्या बद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे.