सोमवार, २९ मे, २०२३

शिमला-कसौली भाग- ११:- खाद्यभ्रमंती !

आर्मी हेरिटेज म्यूझियम पाहून आम्ही जेमतेम ११ वाजेपर्यंत आमच्या खोलीवर परतलो. सामान बाहेर काढून ठेवले. शिमल्याहून कसौलीला निघण्यापूर्वी आम्हाला 'हिमाचली रसोई' मध्ये स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता.  जिथे खास हिमाचली खाद्यपदार्थ मिळतात अशा या रेस्टॉरंटबद्दल मला यूट्यूब व्हिडीओवरून कळले होते. शिमल्यामध्ये आल्यापासून सतत लागलेल्या पावसामुळे या रेस्टॉरंटमधे जाता आलेले नव्हते. ५ मे ला आम्ही शिमल्यातला मुक्काम अर्ध्या दिवसाने वाढवला होताच. म्हणून दुपारचे जेवण आम्ही 'हिमाचल रसोई' मधे घ्यायचे ठरवले.
  
एपिक चॅनेलवरच्या 'राजा रसोई और अन्य कहानियाँ' आणि 'लॉस्ट रेसिपिज' या कार्यक्रमांमधून हिमाचली खाद्यसंस्कृतीची माहिती मी ऐकली होती. एलिझियम हेरिटेज रिसॉर्टमधे एकदा बुफे ब्रेकफास्ट मधे 'बब्रू' नावाचा तळलेला पदार्थ होता. पण कोणा लाडावलेल्या बबडूसाठी तो केला असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. 'सिद्दू' नावाचा, एक वाफवलेला पदार्थ असतो, हे माहिती असल्यामुळे तो खायची इच्छा होती. 'हिमाचली  रसोईला' फोन करून त्यांच्या वेळा विचारून मी आधीच सिद्दूची ऑर्डर देऊन ठेवली होती. बरोबर साडेबारा वाजता आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये हजर झालो. 

'हिमाचली रसोई', हे छोटेसे रेस्टॉरंट शिमल्याच्या लक्कड बाजारमध्ये आहे. तळमजल्यावर, जेमतेम १०-१२ जण बसू शकतील अशी लाकडी टेबल आणि बाकडी आहेत. एक खडी शिडी चढून पोटमाळ्यावर गेल्यावर आठ-दहा माणसांना खाली बसून जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. वर चढून जाण्याचे अजिबात त्राण पायात नसल्यामुळे आम्ही तळमजल्यावरच बसलो. मोजकेच पण एखाद्या विशिष्ट खाद्यसंस्कृतीचे स्वादिष्ट पदार्थ  मिळणारी रेस्टॉरंट्स आम्हाला आवडतात. 'पंजाबी, मुगलाई, चायनीज, साऊथ इंडियन आणि इटालियन' अशी सरमिसळ पाटी लावलेल्या रेस्टॉरंटमधे आम्हाला जावेसे वाटत नाही. पाश्चिमात्य देशात काही अगदी छोट्या रेस्टॉरंट्सच्या बाहेर एखाद्या पाटीवर त्या-त्या दिवशीचा मेनू, किंमतीसह लावलेला असतो. ते आम्हाला फारच आवडले. 'आपण इथे जावे की नाही?' हे बाहेरच्या पाटीवरची डावी-उजवी बाजू बघून ठरवता येते! 'हिमाचल रसोई' मध्ये मोजकेच पण पारंपरिक हिमाचली पदार्थ मिळत असल्यामुळे ते आम्हाला प्रथमदर्शनीच आवडले. 

त्या दिवशीच्या मेन्यूमध्ये 'मंडियाली धाम' होते. 'धाम' म्हणजे हिमाचलमधील सणासुदीच्या जेवणाचे ताट. आणि हिमाचलमधील मंडी शहराजवळच्या भागातले पदार्थ या थाळीत समाविष्ट असल्याने या जेवणाचे नाव 'मंडियाली धाम' असे होते. आम्ही एक मर्यादित थाळी आणि एक गोडाचे व एक तिखटाचे सिद्दू मागवले. हे जेवण स्वादिष्ट तर होतेच, पण आले-लसूण--कांदा विरहित असल्याने ते अतिशय सात्विकही होते. थाळीतल्या पाच वाट्यांमध्ये, कढी, राजमा, दुधी भोपळ्याची भाजी, पाकातला  दुधीहलवा आणि एक चिंच-गूळ घातलेली आंबट-गोड भाजी, अशी तोंडीलावणी भातासोबत वाढली होती. चायनीज बाऊ या पदार्थाच्या जवळ जाणारा, वाफवलेल, सिद्दू हा पदार्थ, आम्हाला फारच आवडला. गरमागरम सिद्दू फोडून, त्यावर साजूक तूप घालून खायला मजा आली. गोडाच्या सिद्दूमध्ये खसखस, सुका मेवा आणि गुळाचे सारण होते, तर तिखटाच्या सिद्दूमधे खसखस, कोथींबीर आणि गरम मसाले घातलेले सारण होते. जेवण झाल्यावर, माल रोडवरून आम्ही लिफ्टच्या साहाय्याने कार्ट रोडला उतरलो. तोपर्यंत आमचा टॅक्सीचालक कुलदीप, आमचे सामान मेसमधून घेऊन तिथे पोचला. त्यानंतर आम्ही कुफ्री-चैल मार्गे कसौलीचा प्रवास सुरु केला. 

 
कसौलीपर्यंतचा रस्ता रतिशय रम्य होता. थंडीच्या मोसमात बर्फाच्छदित शिखरांसाठी आणि बर्फातल्या खेळांसाठी  कुफ्री प्रसिद्ध आहे. आम्हाला तिथे थांबायला वेळ नव्हता. आमचे जेवण तर झालेले होते, पण तीन वाजून गेले तरी कुलदीप त्याच्या जेवणासाठी कुठेही थांबायला तयार नव्हता. जनेड घाटातल्या 'सोनी दा ढाबा' मधेच मी जेवणार, असे त्याने सांगितले. शेवटी तो ढाबा आल्यावर आम्हाला  हायसे वाटले. कुलदीपच्या सांगण्याप्रमाणे, हा ढाबा उत्तम स्थानिक जेवणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. कुलदीप जेवायला गेला तरी आम्ही टॅक्सीमधेच बसून लांबूनच त्या ढाब्याकडे पाहत होतो. एक गोरी-गोबरी पण मिचमिच्या डोळ्यांची बाई, सतत रोट्या लाटत आणि चुलीवर भाजत बसलेली होती. तुपाची धार सोडलेल्या गरमागरम रोट्या, आणि तोंडीलावणी वाढायची लगबग चालू होती. ढाब्याच्या एका गाळ्यामध्ये ड्रायव्हर्स आणि कामकरी लोकांची आसनव्यवस्था होती. तर शेजारच्या गाळ्यामध्ये टूरिस्ट लोकांसाठी जेवण्याची व्यवस्था होती. इथले सगळे जेवण आणि विशेषतः 'हिमाचली मीठी रोटी' अतिशय प्रसिद्ध आहे, असे कुलदीपणे आम्हाला सांगितले. आम्हाला भूक नसल्यामुळे आम्ही मात्र तिथे काहीच खाल्ले नाही. 


 
मस्त गप्पा मारत, आणि आम्हाला सगळी माहिती सांगत कुलदीप सफाईने गाडी चालवत होता. आम्हाला चैल पॅलेस पाहायला जायची इच्छा नव्हती. पण चैल येथील सुप्रसिद्ध 'राष्ट्रीय मिलिटरी स्कूल'पर्यंत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला. तसेच, कुलदीपच्या सांगण्यावरून 'काली टिब्बा' या प्राचीन मंदिराला भेट दिली. उंच डोंगरावर बांधलेले हे मंदिर सुंदर असून इथले वातावरण अतिशय प्रसन्न आहे. पण इथल्या तुफान वाऱ्यामुळे आम्ही अगदी कुडकुडून गेलो. हे सगळे होईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजत आले होते. आम्हाला गरमागरम चहा हवा होता. पण, 'मैं आपको एक जगह बढिया चाय पिलाऊंगा' असे म्हणत कुलदीप इथे-तिथे कुठेही थांबायला तयारच नव्हता. शेवटी कंडाघाट येथील एक छोट्या टपरीपाशी तो थांबला. अगदी हसतमुख अशा माय-लेकींच्या जोडीने चालवलेल्या त्या टपरीवर अप्रतिम चवीचा, आले घातलेला अगदी गरम चहा मिळाला. एक कप चहा  पिऊन झाल्यावर आम्हाला आजून एकेक कप चहा प्यायची आणि त्याबरोबर मठरी  खायची इच्छा अनावर झाली.  

चहा घेऊन आम्ही सोलन मार्गे कसौलीकडे निघालो. त्या दिवशीची आमची भ्रमंती खरेतर खाद्यभ्रमंतीच होती. वाटेत कुलदीपशी गप्पा चालू होत्याच. गप्पांच्या ओघामध्ये व्यसनाधीनता हा विषय सुरु झाला. त्यानंतर मात्र कुलदीपने सांगितलेली माहिती ऐकून आम्ही सुन्न झालो. पंजाबमधल्या तरुण पिढीसारखीच, हिमाचलमधील तरुण पिढीदेखील व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे आहे हे ऐकून आम्हाला धक्का बसला. 

साधारण रात्री नऊच्या सुमारास आम्ही कसौलीच्या आर्मी हॉलिडे होम मध्ये पोहोचलो. रात्रीचे जेवण खोलीवरच आले. जेवण झाल्यावर निद्रधीन झालो. 

रविवार, २८ मे, २०२३

शिमला-कसौली भाग- १०

शिमल्याला येण्याआधी मी इंटरनेटवरून इथल्या पर्यटनस्थळांबद्दल बरीच माहिती वाचली होती. तसेच यूट्यूबवर चार-पाच ट्रॅव्हलॉगही बघितले होते. पण ऍन्नाडेलच्या आर्मी हेरिटेज म्युझिअम संबंधी फारसे वाचायला अथवा ऐकायला मिळाले नव्हते. शिमल्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पर्यटकांना या म्युझियमबाबत विशेष माहिती नसते. आर्मी हेरिटेज म्युझियमच्या आवारामध्ये आम्ही दहा वाजायच्या आधीच जाऊन पोहोचलो. २००६ साली सुरु केलेले हे छोटेसे पण अतिशय नीटनेटके म्युझियम, दोन-तीन टुमदार बैठ्या बंगल्यामध्पस रलेले आहे. हे म्युझियम बघण्यासाठी प्रवेशमूल्य नाही. पण फक्त भारतीय नागरिकांनाच इथे प्रवेश दिला जातो. सोमवार सोडून आठवड्यातील इतर सर्व दिवशी हे म्युझियम, सकाळी १० ते २ व ३ ते ५ या वेळात खुले असते. या म्युझियमच्या बाहेर व आतही फोटो काढण्याची मुभा आहे.

म्युझियमच्या आवारामध्ये, मूळ हिमाचल प्रदेशनिवासी शूर सैनिकांचे अर्धपुतळे बसवण्यात आलेले आहेत. हे सर्व वीर भारतमातेच्या रक्षणार्थ लढताना धारातीर्थी पडलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्या-त्या सैनिकाचे अथवा अधिकाऱ्याचे नाव व त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. आम्ही ती सगळी माहिती वाचली. अशा ठिकाणी गेले की मनामध्ये खूपच कालवाकालव होते आणि डोळे पाण्याने भरून येतात. 

दहा वाजता हे संग्रहालय उघडणार होते. आम्ही दहाच्या आधी पोहोचलो होतो. आत साफसफाई चालू होती. पण तिथल्या जवानाला आनंदने, आपण निवृत्त सेनाधिकारी असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला परतण्याची गडबड असल्यामुळे आम्हाला अगदी थोड्या वेळात, ते संग्रहालय आणि परिसर दाखवायची विनंती केली. त्या जवानाने आम्हाला आधी संग्रहालयाच्या बाजूला असलेल्या ग्रीन-हाऊसमधे  नेले. तिथे अतिशय सुरेख अशी निवडुंगांची बाग (कॅक्टस गार्डन) केलेली आहे. या बागेमध्ये अनेक प्रकारचे कॅक्टस आणि फुलझाडे आहेत. या बागेला गेली अनेक वर्षे स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळत असल्याचे त्याने मोठ्या अभिमानाने सांगितले. बाग बघून झाल्यावर आम्ही खालच्या बाजूला असलेल्या एका पॅव्हेलियनमध्ये गेलो. तिथे अनेक रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमानांच्या छोट्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. या आवारातून डाव्या हाताला ऍन्नाडेल गोल्फकोर्सचे पुन्हा एकदा सुखद दर्शन झाले. तिथे आमचे फोटो काढून होईपर्यंत संग्रहालय उघडलेले होते. त्यामुळे आम्हाला आत प्रवेश मिळाला. 

अगदी महाभारतातल्या अर्जुनापासून सध्याच्या भारतीय सैनिकांच्या कथा संग्रहालयामध्ये दाखवलेल्या आहेत. या संग्रहालयात भारतीय लष्कराबाबत उत्तम माहिती संकलित केलेली आहे. भारतीय सैन्यातील वेगवेगळ्या रेजिमेंटचे पोशाख व झेंडे, सियाचेन ग्लेशियरवर सैनिक वापरतात ते गणवेश, तसेच वायुसैनिकांचे आणि नौसैनिकांचे गणवेश आपल्याला बघायला मिळतात. काही हुतात्म्यांचे गणवेश आणि त्यांची पदकेही इथे संग्रहित केलेली आहेत. तसेच युद्धामध्ये, पूर्वीपासून वापरली जाणारी अनेकविध  शस्त्रास्त्रे, युद्धसाधने, व वाद्येही इथे ठेवण्यात आलेली आहेत.


एका दालनामध्ये लावलेल्या काही फोटोंनी आणि कागदपत्रांनी आमचे लक्ष वेधून घेतले. डेहरादूनची जॉईंट सर्विसेस विंग (JSW) ही संस्था म्हणजेच १९४९-५५ या काळातले, आत्ताच्या NDA खडकवासलाचे जुने रूप होते. JSW देहरादूनच्या पहिल्या बॅचचे कॅडेट म्हणून तिथे प्रशिक्षण घेत असतानाचा, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा 'ब्लू पॅट्रोल' गणवेशातला अतिशय उमदा फोटो इथे लावलेला आहे. १८५७च्या स्वात्रंत्र्यसंग्रामानंतर मंगल पांडे यांचे कोर्ट मार्शल केले गेले होते. त्या कोर्ट मार्शलचे फर्मान एका शोकेसमध्ये लावलेले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला सपशेल पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करतानाचा, पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांचा फोटो तिथे बघायला मिळतो. पाकिस्तानच्या पराभवाची निशाणी म्हणून इथे पाकिस्तानच्या एका रेजिमेंटच्या झेंडाही उलटा लटकावून ठेवला आहे. तसेच पाकिस्तानी हद्दीतून आणलेली एक पोस्टाची पेटीसुद्धा इथे टांगलेली आहे. १९७१ साली आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमाची शौर्यगाथा शिमल्यामधल्या या संग्रहालयात पाहताना ऊर अभिमानाने भरून येत होता. पण, याच शिमल्यातली एक कटू आठवणही मनात येत होती. इंदिरा गांधीजींनी, याच शहरात 'शिमला करारावर' स्वाक्षरी केली होती. बदल्यात काहीही न मिळवता, पाकिस्तानच्या युद्धकैद्यांना सोडून दिले होते आणि सैन्याने जिंकलेला प्रदेशही परत केला होता. त्या घोडचुकीची आठवण होऊन खंत वाटली.

यानंतर आम्ही म्यूझियमच्या 'शौर्य हॉल'मध्ये गेलो. तिथे मोठमोठया फलकांवर भारतीय सैनिकांनी लढलेल्या महत्वाच्या लढायांची माहिती थोडक्यात लिहिलेली आहे. तिथेच एक चौकोनी आकाराची टेबलांची मांडणी केलेली दिसली. त्यावर एका बाजूला China आणि दुसऱ्या बाजूला India असे लिहिलेले होते. भारत-चीन सीमेवर, चुशूल, लिपुलेख, नथू-ला, आणि बुम-ला या चार ठिकाणी वेळोवेळी होणाऱ्या वाटाघाटींकरता वापरल्या जाणाऱ्या टेबलची ती प्रतिकृती होती.

साडेअकराच्या आत परतून मेसमधली खोली रिकामी करायची असल्यामुळे आम्हाला इथे वेळ जरा कमीच पडला. त्यामुळे त्या थोडक्या वेळात शक्य तेवढी माहिती जमा करून घेण्याच्या उद्देशाने, आनंदने काही व्हिडिओ घेता-घेता त्याचे धावते वर्णनही करून ठेवले. त्यानंतर मात्र आम्ही बसमध्ये बसून आमच्या खोलीवर परतलो.

(क्रमशः)

गुरुवार, २५ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-९

शिमल्यात आम्ही राहात असलेल्या आर्मी ट्रेनिंग कमांड (आरट्रॅक) ऑफिसर्स मेसमधली खोली आम्हाला ४ मेला सकाळी १० वाजेपर्यंतच सोडावी लागणार होती. पण त्या दिवशी सकाळी आम्हाला ऍन्नाडेललाही जाऊन यायचे होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही आमचे सामान आवरून ठेवले. आमच्यानंतर त्या खोलीचे आरक्षण ज्यांच्या नावे  होते, त्यांच्याशी बोलून, ते लोक किती वाजेपर्यंत पोहोचणार आहेत याचा अंदाज घेतला. ते जरा उशिरा म्हणजे ११.३० वाजेपर्यंत येणार असल्याचे कळले. ऍन्नाडेलचे 'आर्मी हेरिटेज म्युझिअम' दहा वाजता उघडणार होते. ऍन्नाडेलचे गोल्फ कोर्स बघून, दहाच्या आतच म्युझियममध्ये जावे असे आम्ही ठरवले. म्युझिअम बघून ११.च्या आत परतायला हवे होते. हे सगळे वेळेत करण्याच्या हिशोबाने सकाळी आठ वाजताच आम्ही चालत बाहेर पडलो. शिमल्यातल्या आमच्या सख्या, म्हणजे आमच्या छत्र्या आमच्या हातात होत्याच! 

पर्यटनासाठी बाहेर पडल्यानंतर, भोज्ज्याला शिवल्यासारखे, भराभर पर्यटनस्थळे बघत हिंडायला आम्हाला मुळीच आवडत नाही. त्यामुळेच आम्ही शक्यतो ट्रॅव्हल कंपनीतर्फे पर्यटन करत नाही. ट्रॅव्हल कंपनीचा ७-८-९, म्हणजे ७ वाजता उठणे, आठ वाजता नाश्ता आणि ९ वाजता बाहेर पडणे, हा फॉर्म्युला आम्हाला फारसा त्रासदायक वाटत नाही. परंतु, आपल्याला आवडलेल्या पर्यटनस्थळी, हवा तेवढा वेळ घालवण्याची मजा, ट्रॅव्हल कंपनीतर्फे गेल्यावर उपभोगता येत नाही, असे आम्हाला वाटते. बहुतेक सर्व ट्रॅव्हल कंपन्या आठवड्याभरात शिमला-कुलू-मनाली अशी टूर आखतात. त्यामुळेच, आम्ही शिमला-कुलू-मनाली ट्रिप करणार आहोत, असा समज अनेक मित्र-मैत्रिणींचा आणि नातेवाईकांचा झाला होता. पण शिमला-कुलू-मनाली आठवड्याभरात करणे म्हणजे ती-ती ठिकाणे केवळ 'उरकणे' झाले असते आणि आमची खूप धावपळ झाली असती.  

आरट्रॅक मेसच्या बाहेर पडून, शिमला विधानसभा चौकातून खाली, पूर्ण उताराच्या रस्त्याने चालत आम्ही ऍन्नाडेल गोल्फ कोर्सकडे निघालो. गूगल मॅपनुसार आम्ही अर्ध्या तासात पोहोचायला हवे होते. पण गेल्या तीन-चार दिवसात चढ-उताराचे रस्ते चालून आम्हा दोघांचेही गुढगे बोलायला लागले होते. त्यामुळे आम्ही हळूहळू चालत, थांबत, थांबत चाळीस मिनिटामध्ये ऍन्नाडेल गोल्फ कोर्सच्या जवळ पोहोचलो. गोल्फकोर्स आणि आर्मी हेरिटेज म्यूझियम एकाच आवारात आहे. गोल्फकोर्सच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे म्युझिअमचे गेट आहे.  हा सर्व परिसर आरट्रॅकच्या ताब्यात असून त्याची देखरेखही आर्मीतर्फेच केली जाते. सेनाधिकारी आणि काही निवडक सरकारी अधिकाऱ्यांनाच या गोल्फकोर्सवर खेळायची परवानगी आहे. 

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत शिमला आणि आसपासच्या इलाख्यात गुरख्यांचे राज्य होते. १८१५-१६ साली गुरखा आणि ब्रिटीशांदरम्यान युद्ध झाले. गुरख्यांनी कडवी लढत दिली, पण शेवटी त्यांचा पराभव करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. त्यानंतर ब्रिटिशांनी या परिसरात आपला जम बसवला. १८३० च्या सुमारास, ऍन्नाडेल मधली ही सुंदर जागा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस पडली. सुरुवातीला या जागेचा वापर पोलो, क्रिकेट आणि फुटबॉलचे मैदान म्हणून आणि सहलीची जागा म्हणून केला जायचा. तेंव्हा स्थानिक लोक या जागेला 'कंपनीका बाग' असे म्हणत. साधारण १८४० च्या सुमारास इथे रेसकोर्स सुरु करण्यात आले. १८५८ नंतर हे मैदान ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आले. १८६४ साली, अधिकृतपणे शिमल्याला ब्रिटिशांच्या  उन्हाळी राजधानीचा दर्जा देण्यात आला. ऍन्नाडेल मैदानावर गोल्फकोर्स कधी तयार केले गेले, या बाबत नेमकी माहिती कुठे दिसली नाही. पण ते १८६४ नंतरच्या काही वर्षांतच तयार केले गेले असावे. १८८४-८५ साली गोल्फ कोर्सचे पॅव्हेलियन उभारण्यात आले. याच ऍन्नाडेल मैदानावर १८८८ साली, सर मॉर्टिमर ड्युरांड यांच्या नावे फुटबॉलची सुप्रसिद्ध 'ड्युरांड ट्रॉफी' स्पर्धा सुरु झाली, जी भारतात आजही खेळली जाते. 

गोल्फ क्लबची पूर्णपणे लाकडी इमारत अतिशय सुंदर आहे. क्लबच्या समोर एका बाजूला, चोचीत गोल्फचा चेंडू पकडलेल्या कावळ्याचा पुतळा आहे. त्या पुतळ्याखाली एक मजेशीर कविता लिहिलेली आहे. ती कविता अशी कल्पना करून रचलेली आहे की जणू तो कावळा तिथे आलेल्या गॉल्फर्सशी बोलतो आहे. क्लबच्या समोर दुसऱ्या बाजूला, भल्या मोठ्या आकाराच्या गोल्फ चेंडूचेही शिल्प आहे. 

गोल्फकोर्सच्या मधोमध एक हेलिपॅड आहे. शिमल्यामधे येणाऱ्या सर्व व्हीआयपी लोकांची हेलिकॉप्टर्स इथेच उतरत असल्यामुळे, या जागेला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. या जागेचे, ऍन्नाडेल किंवा  ऍन्नानडेल असे नाव का पडले? या बद्दलही एक रंजक कथा आहे. 'डेल' या शब्दाचा अर्थ दरी असा आहे. ऍन्नाडेल नावाची अजून एक दरी शिमल्याच्या पश्चिमेला आधीपासूनच होती. पण अगदी सुरुवातीच्या काळात इथे आलेला, कॅप्टन चार्ल्स प्रॅट केनेडी नावाचा एक ब्रिटिश अधिकारी, कुणा एका ऍना नावाच्या तरुणीच्या प्रेमात होता. सर्वप्रथम तो जेव्हा या जागी आला, तेंव्हा इथले नेत्रसुखद दृश्य बघून तो ऍनाच्या आठवणीने व्याकुळ झाला. त्यामुळे त्याने या जागेचे नाव  ऍन्नाडेल असे ठेवले, असे सांगितले जाते.   

सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात गोल्फकोर्सच्या भोवती असलेल्या पायवाटेवर मी एक चक्कर मारून आले. तरी म्युझिअम उघडायला अजून थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही गोल्फक्लबच्या आत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गरम-गरम चहा घेतला. तिथे बसून निवांतपणे चहा घेत असताना माझ्या मनामध्ये अनेक विचार येत होते. ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले. आपल्या देशाला लुबाडून ब्रिटिश सैन्य इथे अगदी ऐश-आरामात राहिले, या गोष्टीची मला मनोमन चीड आहे. पण ब्रिटिशांमुळे आपल्या देशात अनेक सोयी-सुविधा, व आधुनिकीकरण त्या काळी झाले हेदेखील खरेच.  

मनामधे आलेले हे सगळे विचार बाजूला सारून, आम्ही साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास म्युझिअमच्या प्रवेशद्वारात पोहोचलो...  

(क्रमश:)

 


  

सोमवार, २२ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-८

३ मे हा शिमल्यातला आमचा शेवटचा दिवस होता. अजून, 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्सड् स्टडी' बघायचे राहिले होते. सकाळपासून आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत खोलीमध्येच थांबलो होतो. खोलीच्या खिडकीपाशी बसून, बाहेर झाडांवर आलेल्या वानर टोळीतील पिल्लांचे चाललेले खोडकर चाळे बघण्यात वेळ जरा बरा गेला. दुपारी दोननंतर पाऊस थांबल्यावर आम्ही छत्र्या घेऊनच, 'ऑब्झर्वेटरी हिल' वर उभ्या असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज' च्या आकर्षक इमारतीकडे चालत निघालो. 

शिमल्यातल्या 'ऑब्झर्वेटरी हिल' ला एक विशेष महत्व आहे. ती टेकडी भारताची जलविभाजक (Watershed ) किंवा पाणलोट टेकडी आहे. या टेकडीच्या पूर्व बाजूच्या उतारावरून पडणारे पाणी ज्या नद्यांमध्ये वाहत जाते, त्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. पश्चिमेच्या उतारावरून पडणारे पाणी वेगवेगळ्या नद्यांमधून वाहत अरबी समुद्रात जाऊन मिसळते. 

याच 'ऑब्झर्वेटरी हिल'वर ब्रिटिशांनी, १८८४ ते १८८८ या काळात एक भव्य  'व्हाईसरीगल लॉज' बांधले.  तत्कालीन  व्हाइसरॉय, लॉर्ड डफरीन यांचे उन्हाळी निवासस्थान म्हणून ही इमारत बांधली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्व व्हाइसरॉयांचे शिमल्यातले निवासस्थान हेच होते.  स्वातंत्र्योत्तर काळात ते भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत  उन्हाळी निवास झाले. पण राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार, १९६५ साली ती वास्तू, 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज' या संस्थेला दिली गेली. त्यानंतर राष्ट्रपतींचे अधिकृत निवास मशोब्रा येथे नेण्यात आले. 'ऍडव्हान्स स्टडीज'ची ही वास्तू आतून बघायला, माणशी  १०० रुपये इतके जुजबी तिकीट आहे. साधारण अर्ध्या तासात आपल्याला आत हिंडवून, तिथली माहिती सांगतात.

या इमारतीच्या बाहेर अतिशय सुंदर बाग आहे. मागच्या बाजूला टेनिस कोर्ट्स आहेत. मुख्य  इमारत आतून-बाहेरून नितांतसुंदर आहे. बाहेरून भक्कम दगडी बांधकाम असल्याने ती एखाद्या राजवाड्यासारखी दिसते. आतल्या बाजूला उत्तम  लाकूडकाम केलेले आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात १९४५ साली, महत्वाची शिमला कॉन्फरन्स याच वास्तूमध्ये झाली होती. भारतीयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेतील, 'वेव्हेल प्लॅन' हा अत्यंत महत्वाचा टप्पा, याच ठिकाणी संमत केला गेला. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, अशा दिग्गजांचे पाय या वास्तूला लागलेले आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारे अनेक फोटो आत लावलेले आहेत. पण त्या बाबतची माहिती वाचायला वेळ कमी पडल्यामुळे खूपच चुटपुट लागून राहिली. या वास्तूच्या बाहेरून फोटो काढता येतात, पण आत फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे वास्तूच्या आतल्या भागातले सौंदर्य डोळ्यातच साठवत आम्ही बाहेर पडलो. खोलीवर परत येईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजत आले होते.   

संध्याकाळी, आम्हाला जनरल बालींनी जेवायला बोलावले होते. त्यामुळे आम्ही खोलीवर परतून, तयार होऊन त्वरित  बाहेर पडलो. जाताना आर्मी ट्रेनिंग कमांडच्या मुख्यालयासमोर फोटो काढले. शिमल्यातल्या लोकप्रिय मॉल रोडवर आम्ही अजून तसे मनसोक्त हिंडलो नव्हतो. मला शिमल्यातले 'लोअर बाजार' आणि 'लक्कड बाजार' हिंडायचीही इच्छा होती. सुदैवाने त्या संध्याकाळी पाऊस थांबला होता आणि इतक्या दिवसात प्रथमच छानसे ऊन पडले होते. पुढचा तास-दीड तास शिमल्यातले सगळे बाजार पायाखालून घातले. खरेदी अशी काहीच करायची नव्हती. पण लोअर बाजारात एके ठिकाणी एक भाजीवाला आंबेहळद विकायला बसला होता. माझ्या बागेत लावायला म्हणून त्याच्याकडून मी थोडे कंद विकत घेतले. 

संध्याकाळच्या उन्हामध्ये Ridge वर हिंडायला खूप मजा आली. तिथे सर्वच पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले होते. घोड्यावर बसून रपेट करणे, पारंपरिक हिमाचली वस्त्रे आणि आभूषणे घालून फोटो काढून घेणे, एकमेकांसाठी फोटो काढणे, फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेणे, साबणाचे फुगे सोडणे, खाणे-पिणे अशा एक ना अनेक गोष्टी तिथे चालू होत्या. गंमत म्हणजे दोन-चार दिवसांच्या संततधारेमुळे दूरवरची काही शिखरे बर्फाच्छादित झालेली दिसत होती. थोड्याच वेळात, जनरल बाली आणि त्यांची बायको अप्राजिता, Ridge वर चालत येताना दिसले. जनरल बालींनी Ridge वरून दूरवर दिसणाऱ्या सगळ्या इमारतींबद्दल आणि पर्वतराजींबद्दल आम्हाला माहिती दिली. त्यांनी हेही सांगितले की, इतक्या वर्षांमध्ये त्यांनी प्रथमच मे महिन्यात झालेली बर्फवृष्टी पाहिली होती. साठच्या दशकामध्ये जनरल बाली आणि सौ. अप्राजिता यांचे शालेय शिक्षण शिमल्यामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्याकडे जुन्या शिमल्याच्या आठवणींचा खजिना होता. त्याकाळी सूट-बुटात वावरणारे शिमलावासीय, देवानंदबरोबर झालेली भेट, आणि शिमल्यामध्ये अनेक सिनेमांचे चित्रीकरण होत असताना त्यांनी बघितलेले प्रसिद्ध सिने-सितारे आणि तारका, यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

त्यानंतर जनरल बाली आम्हाला Ridge वरच असलेल्या एका पुतळ्यापाशी घेऊन गेले. दिवंगत लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा तो पुतळा होता. १९६१ ते १९६३ या काळामधे, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग हे आर्मीच्या पश्चिम कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' होते. १९९३ सालापर्यंत पश्चिम कमांडचे मुख्यालय शिमल्यातच होते. त्या काळात, जम्मूच्या पूंछ  भागाची हेलिकॉप्टर मधून हवाई पाहणी करण्यासाठी गेलेले असताना, या अतिशय कर्तबगार अधिकाऱ्याचे, हेलिकॉप्टर कोसळून अपघाती निधन झाले. जनरल बालींच्याच पुढाकारामुळे हिमाचल प्रदेश सरकारने Ridge वर, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा पुतळा उभा केला. पुतळ्याभोवती लेफ्टनंट जनरल दौलत सिंग, यांच्या स्मरणार्थ एक उद्यानही तयार केले गेले.  

साडेसातच्या सुमारास जनरल बाली आम्हाला शिमल्याच्या Amateur Dramatics Club या सुप्रसिद्ध, ब्रिटिश कालीन,  आणि  अगदी उच्चभ्रू  लोकांसाठी असलेल्या क्लबमध्ये जेवायला घेऊन गेले. तिथे आत जाताना,  तिथला सुटा-बुटाचा ड्रेस कोड पाळावा लागतो. हा क्लब आतून खूपच सुंदर आहे. तिथे अनेक सिनेमांचे शूटिंग झाले आहे. या क्लबच्या डायनिंग हॉलमध्ये जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. त्यामुळे आपण Ridgeच्या खालच्या पातळीवर बसून जेवण करतो. क्लबमध्ये निवांतपणे जेवण आणि गप्पा झाल्या. तिथले फिश फिंगर्स, हरा-भरा कबाब, पेने पास्ता, बेक्ड व्हेजिटेबल्स, रोस्टेड चिकन, कटलेट्स आणि लेमन सूफले हे सर्वं खाद्यपदार्थही उत्तम होते. 

आम्ही आल्यापासून चार दिवस पाऊस पडत असल्याने, शिमल्यातील  Annadale चे आर्मी म्युझिअमही बघायचे राहिले होते. ते बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका असे जनरल बालींनी आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही शिमल्यातला आमचा मुक्काम अर्ध्या दिवसाने वाढवायचे ठरवले.

(क्रमशः)

शनिवार, २० मे, २०२३

शिमला-कसौली भाग-७

२ मेच्या सकाळी उशीरानेच जाग आली. आदल्या दिवशीच्या पायपिटीमुळे पाय आणि दिवसभर डोक्यावर छत्री घेऊन हिंडल्यामुळे, माझे हातही दुखत होते. बाहेर संततधार चालू होती. त्यामुळे आजचा दिवस टॅक्सी करून हिंडावे, असे आम्ही ठरवले. त्या दिवशी शिमल्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान असल्यामुळे इन्स्टिटयूट  ऑफ ऍडव्हान्स स्टडीज बंद आहे, असे समजले. मग शिमल्याच्या बाहेर फिरून यावे, अशा विचाराने  एक-दोन टॅक्सी वाल्यांशी संपर्क साधला. परंतु, पाऊस आणि धुक्यामधे बाहेर पडायला कोणी तयार होईना. शेवटी एक टॅक्सीवाला तयार झाला. त्यामुळे आम्ही  शिमल्याच्या आसपासचा, नालदेहरा-मशोब्रा हा भाग बघायला बाहेर पडलो.  

बाहेर प्रचंड धुके असतानाही आमचा टॅक्सीवाला अतिशय सफाईने टॅक्सी चालवत होता. राष्ट्रपतींचे उन्हाळ्यातले अधिकृत निवासस्थान मशोब्रा येथे आहे. उन्हाळ्यामध्ये सुमारे दोन आठवडे राष्ट्रपतींचा आणि त्यांच्या चाळीस कर्मचाऱ्यांचा मुक्काम इथेच असतो. राष्ट्रपती तिथे राहत नसतील त्या काळात ते निवासस्थान पर्यटकांसाठी यावर्षीपासूनच  खुले करण्यात आले आहे. टॅक्सीतून जातानाच आनंदने  फोनवरून ऑनलाईन पैसे (प्रत्येकी रु. ५०/-) भरून तिथले  तिकीट काढले. राष्ट्र्पती निवासाच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी टॅक्सी सोडून द्यावी लागते. बाहेर सुरक्षा तपासणी झाल्यानंतर प्रत्यक्ष राष्ट्रपती निवासापर्यंत, बरेच अंतर चालत जावे लागते. तो रस्ता अगदी निर्मनुष्य असल्यामुळे आपण बरोबर जातोय की नाही? अशी शंका मनात सतत येत होती. बरेच चालल्यानंतर, शेवटी राष्ट्रपती निवासाची पाटी असलेले मुख्य प्रवेशदार दिसले. तिथे पुन्हा सुरक्षा तपासणी, तिकीट तपासणी झाली. आमच्या आधी आणि नंतर आलेले असे १५-२० पर्यटक जमल्यानंतर आमच्या गटाला आत सोडण्यात आले.

राष्ट्रपती निवासाची सर्व माहिती सांगण्यासाठी आमच्याबरोबर एक अधिकृत गाईड दिला होता. ही वास्तू १७३ वर्षे जुनी असून आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आहे. कोटी संस्थानाच्या राजाच्या मालकीची असलेली ही वास्तू, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात होती. खूप पूर्वी  एकमजली असलेली ही लाकडी दिमाखदार इमारत पुढे दुमजली करण्यात आली. मार्च महिन्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिथल्या ट्यूलिप गार्डनचे उदघाटन  झाले होते. आम्हालाही  बागेमध्ये काही ट्यूलिप्स बघायला मिळाले. इमारतीतील काही खोल्या पर्यटकांना दाखवत असले तरी आतले फोटो काढण्यास मनाई आहे. आतल्या दालनांची सविस्तर माहिती गाईड आम्हाला सांगत होता. आत लावलेले अनेक फोटो बघायला आणि त्याबाबतची  माहिती वाचायला खूप मजा आली. तिथल्या डायनिंग रूमच्या भिंतीवरच्या एका मोठ्या फ्रेममधल्या 'चंबा रुमालाने' माझे लक्ष वेधून घेतले. हिमाचलच्या अतिशय दुर्मिळ आणि प्राचीन कलेचा तो सुंदर नमुना मी प्रथमच बघितला. राष्ट्रपती निवासाच्या आवारामध्ये थोडेफार फिरून, फोटो काढून आम्ही पुढे निघालो. राष्ट्रपती निवासापर्यंत पोहोचायला इलेक्ट्रिक गाड्यांची सोय केली जावी असे मात्र प्रकर्षाने वाटले. तसेच आवारातली रेस्टॉरंट आणि स्वच्छतागृहे याची सोयही विशेष चांगली नव्हती. 
 
त्यानंतर आमच्या टॅक्सीचालकाने, तेथून जवळच असलेल्या, 'भीमाकाली' मंदिरापाशी आम्हाला नेले. भर पावसामध्ये, निसरड्या पायऱ्या चढून आम्ही मंदिर बघितले. तिथून निघून आम्ही नालदेहराचे गोल्फ कोर्स बघायला जाणार होतो. वाटेवर हिमाचलची 'फ्रूट रिसर्च इन्स्टिटयूट' बघायला आम्ही थांबलो. तिथले तिकीट काढून आत गेलो. हिमाचलमध्ये सफरचंदाची लागवड कधी आणि कशी सुरु झाली, सफरचंदाच्या वेगवेगळ्या जाती, त्यावर पडणाऱ्या किडींचे निर्मूलन याबाबतची रंजक माहिती फलकांवर लिहिलेली होती. पण तिथे माहिती सांगायला कोणीही नव्हते. एकूणच सरकारी अनास्था जाणवली. हे सगळे होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. त्यामुळे वाटेत एके ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो. पोटात जेवण गेल्यावर जरा जास्तच थंडी वाजायला लागली. त्यामुळे जेवणानंतर गरमागरम 'अद्रकवाली चाय' पिऊन पुढे निघालो. 

नालदेहरा येथील गोल्फकोर्स भारतातले कदाचित सर्वात जुने, सर्वात अवघड पण अतिशय नयनरम्य गोल्फकोर्स आहे. सर्वबाजूनी उंच-उंच वृक्षांनी वेढलेल्या या भागामध्ये, गोल्फ कोर्स तयार करता यावे  इतकी विस्तीर्ण मोकळी जागा कशी मिळाली, याबाबतही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. दोन देवतांमधील तुंबळ युद्धामध्ये मधल्या जागेतील सगळे वृक्ष जळून आणि दगड वितळून गेल्यामुळे हे शक्य झाले असे समजले जाते. ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनने जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी इथे गोल्फकोर्स तयार करवले. या जागेच्या प्रेमात पडलेल्या लॉर्ड कर्झन याने आपल्या तिसऱ्या  मुलीचे नाव Alexzandra Naldehra असे ठेवले होते. गोल्फ कोर्स जवळ पोहोचेपर्यंत, काही  पायऱ्या आणि चढी वाट चढून झालेली आमची दमणूक, हिरवेगार गोल्फ कोर्स समोर येताच, कुठल्याकुठे पळून गेली. गोल्फ-कोर्सच्या अवती-भवती घोड्यावर बसूनही फेरफटका मारता येतो. तिथे अनेक हौशी पर्यटक भर पावसामध्ये घोडेस्वारीचा आनंद घेत होते. गोल्फकोर्सच्या आत, बऱ्याच अंतरावर एक नागदेवतेचे देऊळ आहे असे समजले. परंतु, पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्याने आणि वाटा निसरड्या झालेल्या असल्यामुळे आम्ही देवळापर्यंत गेलो नाही. गोल्फक्लबमध्ये एक छान रेस्टॉरंट आहे. तिथे बसले की आपल्याला सगळे गोल्फ कोर्स दिसू शकते. आमचे  जेवण व चहा नुकतेच झालेले असल्यामुळे आम्ही तिथे काही खाल्ले-प्यायले नाही. गोल्फ कोर्सच्या जवळच राहण्यासाठी टुमदार बंगल्या आहेत. त्याचे आरक्षण हिमाचल टूरिझमद्वारे करता येते. 

संध्याकाळ झाली आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो. दिवसभर घाटातल्या रस्त्यांवर फिरून आणि थंडगार वारे खाऊन आम्ही दमलो होतो. सहा-साडेसहा पर्यंत आम्ही खोलीवर परतलो. जेवण लवकरच उरकून घेतले. आम्ही आणखी एकच दिवस शिमल्यामध्ये राहणार होतो. उद्याच्या दिवस तरी शिमल्यामध्ये पाऊस नसावा, अशी मनोमन प्रार्थना करत निद्राधीन झालो. 
(क्रमशः)
  

शुक्रवार, १९ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-६

एलिझीयम रिसॉर्टमधून निघून शिमल्यातल्या मॉल रोडजवळच्या 'आर्मी ट्रेनिंग कमांडच्या ऑफिसर्स मेस'मध्ये येऊन  स्थिरस्थावर झालो. सकाळचे अकरा वाजत आले होते, तरी संततधारेमुळे सूर्यदर्शन झालेले नव्हते. गेले दोन दिवस, खिडकीतून पाहताना, शिमल्याचे ओले हिरवे निसर्गसौंदर्य जरी रम्य वाटले असले तरी आता शिमला-दर्शन करायचे कसे? या विवंचनेत आम्ही होतो. तेवढ्यात, आनंदच्या शिमलास्थित मित्राचा, म्हणजे मेजर जनरल प्रदीपमोहन बाली (सेवानिवृत्त) यांचा फोन आला. 

"Welcome to Shimla! शादी कैसी रही? आप लोग अपने साथ  बारिश भी लेकर आये हो। लेकिन कोई बात नहीं। आज का क्या प्लॅन बना रहे हो?"

जरा उघडीप होईपर्यंत ताणून देण्याच्या विचारात आम्ही होतो. आमचा इरादा प्रदीप बालीने ओळखला असावा. आम्ही काही बोलायच्या आताच त्याने जवळजवळ हुकूमच  सोडला,

'ऐसा करो, मेस से दो छाते ले लो और पैदल बाहर निकलो। मेसके पास 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज'  है। आज पहले वो देख लो। उसके बाद मॉल रोड पे आ जाना। ठीक छे बजे मैं आपको स्कँडल पॉईंट पे मिलता हूँ।"

पुढचे  तीन दिवस शिमल्यात पाऊस असणार, असे भाकीत गुगलने वर्तवलेले होतेच. आम्ही आळस झटकून, छत्र्या घेऊन बाहेर पडलो. भर पावसात, हातातल्या छत्र्या सांभाळत, 'ऍडव्हान्स स्टडीज' पर्यंतचे जेमतेम दोन किलोमीटर  अंतर कापायला, आम्हाला पाऊण तास लागला. पण सोमवारी शिमल्यात सगळी सरकारी स्थळे बंद असल्यामुळे, तिथे पोहोचूनही, आम्हाला गेटच्या बाहेरूनच परतावे लागले. आदल्या रात्रीच्या जागरणामुळे आम्ही दमलेले होतो. तरीही खोलीवर न जाता, तडक मॉलरोडवरच गेलो. 

'ऍडव्हान्स स्टडीज' पासून Ridge वर असलेल्या ख्राईस्ट चर्चपर्यंत आम्ही साधारण एक वाजता पोहोचलो असू. एलिझीयम रिसॉर्टमध्ये उशिरा आणि भरपेट नाश्ता झालेला असल्याने जेवायची इच्छा नव्हतीच. सहा वाजायच्या आत जाखू टेकडीवरील  हनुमान मंदिर बघून यावे, असे आम्ही ठरवले. ख्राईस्ट चर्चपासून एक टॅक्सीवाला आमच्या मागे लागला होता. "माझी टॅक्सी जवळच आहे, तुम्ही टॅक्सीने जाऊन आरामात देऊळ बघा" असा लकडा त्याने लावला होता. आमच्यासारखेच, देऊळ बघू इच्छिणारे दोन केरळी तरुण आम्हाला भेटले. आम्हा चौघांना देवळापर्यंत नेऊन परत आणण्यासाठी, चारशे रुपयांमधे एक टॅक्सी आम्ही ठरवली. पण त्या टॅक्सीपर्यंत पोहोचेस्तोवर, पंधरा-वीस मिनिटे चढाचा रस्ता कापत आम्हाला जावे लागल्यामुळे आमची चांगलीच दमछाक  झाली.  

जाखू टेकडीचा रस्ता खूप वळणावळणाचा व चढाचा आहे. केबल कारमध्ये बसूनही वर जाता येते. पण, धुक्यामुळे बाहेरचे दृश्य दिसणारच नव्हते. त्यामुळे केबल कारपेक्षा टॅक्सीचा पर्यायच योग्य ठरला. टेकडीवर पोहोचल्यावरही, पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे आम्हाला आसपासचे दृश्य काहीच दिसले नाही. टेकडीवर हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. संजीवनी मुळीच्या शोधात आलेल्या हनुमानाने या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली होती, अशी आख्यायिका आहे. या टेकडीवरच हनुमानाची १०८ फुटी भव्य मूर्ती बघायला मिळते. थंड वाऱ्यात कुडकुडत, जेमतेम दर्शन घेऊन, आणि फोटो काढून झाल्यावर, चार वाजेपर्यंत आम्ही टेकडीवरून खाली आलो. परतीच्या वाटेवर ख्राईस्ट चर्चलाही भेट दिली. चर्च आतून खूपच भव्य आणि सुंदर आहे. 

स्कँडल पॉईंटजवळच शिमल्याचे 'गेटी'  थिएटर आहे. २ मे पर्यंत रोज संध्याकाळी तिथे 'भरतनाट्यम महोत्सव' असल्याची जाहिरात आम्ही जातानाच वाचली होती. एक कपभर गरम कॉफी पिऊन आम्ही गेटी थिएटरमध्ये भरतनाट्यम बघायला गेलो. १८८७ साली बांधलेले हे थिएटर आतून फारच सुंदर आहे. रुडयार्ड किपलिंग, पृथ्वीराज कपूर, कुंदन लाल सेहगल, टॉम आल्टर, अनुपम खेर, नासिरुद्दीन शहा, अशा अनेक दिग्गजांनी आपली कला पूर्वी इथे सादर केली आहे. तिथे गेल्यावर अगदी भारावून जायला होते. त्या दिवशी मात्र तिथे अगदीच नवशिक्या भरतनाट्यम कलाकारांचा कार्यक्रम होता. 

सहा वाजायच्या सुमारास जनरल बालींना स्कँडल पॉईंटवर भेटलो. आनंद आणि प्रदीप बाली, हे नुसते NDA कोर्समेटच नव्हे, तर संपूर्ण ट्रेनिंगच्या काळात एकाच स्क्वाड्रनमधे राहिलेले असल्याने, काही काळ ते दोघेही मला विसरून आपल्याच गप्पांमध्ये गुंगून गेले. त्यानंतर जनरल बाली जवळच्याच 'अल्फा रेस्टॉरंटमधे' आम्हाला घेऊन गेले. दिवसभराच्या तंगडतोडीमुळे सहा वाजेपर्यंत चांगलीच भूक लागली होती. तिथे भला मोठा, खुसखुशीत आणि चविष्ट सामोसा खाल्ला आणि अगदी ब्रिटिश स्टाईलमध्ये, किटलीतून आणलेला 'इंग्लिश टी'  प्यायलो. बालींचे शालेय शिक्षण शिमल्यामध्ये झालेले असल्यामुळे, शिमल्याबद्दल आम्हाला काय सांगू आणि काय नको, असे त्यांना झाले होते. पण आमच्या चेहऱ्यावरची दमणूक जाणवल्यामुळेच कदाचित त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या. 

रात्री मेसमध्ये शिमल्यातले काही सेनाधिकारी भेटले. त्यांच्याशी छान मनमोकळ्या गप्पा झाल्या. तिथल्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या आग्रहाखातर मी Toddy नावाचे एक पेय प्यायले. मध, लिंबाचा रस आणि मसाले घातलेले ते गरम पेय मी पहिल्यांदाच प्यायले आणि मला ते खूप आवडले. Baked Vegetables, चीझ मॅकरोनी, कटलेट्स, डिनर रोल्स, पुडिंग अशा मस्त जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर, झोप कधी लागली, ते आम्हाला कळलेच नाही. 


  

गुरुवार, १८ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-५

रविवार दि. ३० एप्रिलच्या सकाळी हळदीचा कार्यक्रम रिसॉर्टच्या गच्चीवर झाला. उत्तर हिंदुस्थानात या कार्यक्रमाला खूप महत्त्व असते. हळदीच्या  कार्यक्रमासाठी सगळ्यांनीच पिवळ्या रंगाचे कपडे घालणे अपेक्षित असते. आम्हीही पिवळया रंगाचे कपडे घालून, रिसॉर्टच्या पाचव्या मजल्यावरच्या गच्चीवर गेलो. सर्व बाजूंनी काचेच्या भिंती आणि वर काचेचे छत असल्याने तिथे पाऊस लागत नव्हता. पण भिंतींना मोठ-मोठाल्या खिडक्या असल्याने त्यातून येणारे ओले वारे आणि पावसाचे तुषार अंग मोहरून टाकत होते. अगदी रोमँटिक वातावरणात हळदीचा आणि वधू-वरांवर फुले उधळण्याचा कार्यक्रम झाला. हळदीच्या कार्यक्रमासाठी पारूलने, म्हणजे साहिलच्या आईने, आम्हा सर्व बायकांना पिवळ्या रंगांच्या फुलांचे खोटे दागिने दिले आणि घालायला लावले.

त्यानंतर 'भात' हा कार्यक्रम झाला. आपल्याकडे नवऱ्या मुलीने बोहल्यावर चढताना नेसायची पिवळी किंवा अष्टगंधी साडी, मामाने देण्याचा प्रघात आहे. तसेच मारवाड्यांमध्येही 'ममेरा' नावाची पद्धत आहे. या ममेऱ्यासाठी वधूचा मामा, बराच मोठा खर्च करतो आणि भाचीला आणि बहिणीच्या कुटुंबातील इतर सर्वाना कपडे, दाग-दागिने देतो. उत्तर प्रदेशातल्या या 'भात' कार्यक्रमाचा खर्च मात्र नवऱ्या मुलाच्या मामाने करायचा असतो. पण नवऱ्या मुलाने तो कार्यक्रम बघायचा नसतो. शेजारच्या खोलीमध्ये एकीकडे तो कार्यक्रम चालू होता. त्यावेळी साहिल मोकळा असल्याने आमच्याशी गप्पा मारत बसला होता. मुलाकडच्या सर्व वऱ्हाडी मंडळींना साहिलच्या मामा-मामींनी आहेराची पाकिटे दिली. आम्हा दोघांना बोलावून आहेर दिला. 'एखाद्याचा मामा बनवणे' हा वाक्प्रचार या असल्या मामांशी संबंधित असलेल्या खर्चिक प्रथांमुळेच पडला असावा असा विचार माझ्या मनामध्ये येऊन, मला हसू आले.

दुपारी पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुपारचे जेवण झाल्यावर, मी तासभर फेरफटका मारून आले. संध्याकाळी 'हाय टी' होता. त्यातल्या खाद्यपदार्थाना लांबूनच 'हाय' म्हणून मी फक्त गरम चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलमध्ये सकाळी भरभक्कम नाश्ता, जेवणाच्या आधी स्नॅक्स, मग दुपारचे जेवण, त्यानंतर सॅन्डविच-भजी-केक्स व कुकीज सह 'हाय टी', पुन्हा संध्याकाळच्या जेवणाच्या आधी स्नॅक्स व  शीतपेये, आणि शेवटी रात्रीचे जेवण, अशी सगळी रेलचेल होती! सर्व खाद्यपदार्थ अतिशय रुचकर असले तरी, ते पाहूनच आमचे पोट भरत होते. काही वऱ्हाडी मंडळी मात्र सतत काही ना काही खाताना दिसत होती. शिवाय आमच्या खोलीमध्ये, 'गिफ्ट हॅम्पर', म्हणजे  अनेक खाद्यपदार्थ असलेली एक सुशोभित टोपली आलेली होतीच. तसेच अग्रवाल आणि शुक्ल कुटुंबियांकडून आलेले मिठायांचे डबेही होते.

मुलाकडचे आम्ही सर्व बाराती संध्याकाळी हॉटेलच्या बाहेर पडलो. ढोलकीच्या तालावर नाचत आमची बारात हॉटेलमध्ये शिरली. त्यावेळी वधुपक्षाने आमचे आगत-स्वागत केले. त्यानंतर 'जयमाला' म्हणजे, साहिल-अंशुला यांनी एकमेकांना हार घालण्याचा कार्यक्रम झाला. रात्रीच्या जेवणानंतर 'फेरे' म्हणजे सप्तपदी झाली. या लग्नासाठी खास अग्रवाल कुटुंबियांचे गुरुजी बरेलीहून आलेले होते. रात्री बाराच्या पुढे 'फेरे', वरपूजन आणि इतर विधी झाले. थोड्या-फार प्रमाणात सगळ्या लग्नांमध्ये आजकाल जे होते, तेच या लग्नातही झाले. प्रथम ढोलकीवाला रंगात येऊन, वेगवेगळ्या नातेवाईकांना गाण्यांद्वारे ललकारून नाचायला बोलवत होता. नाचणाऱ्या बारातीवरून ओवाळून टाकलेल्या पैशांची भरपूर कमाई त्याने केली. जयमाला झाल्यानंतर त्यानंतर फोटोग्राफरने साहिल व अंशुला यांचा ताबा घेतला. गुरुजींना संधी सरतेशेवटी मिळाल्यामुळे रात्रीच्या तीन वाजेपर्यंत त्यांची पूजा चालली. आम्ही सगळेजण पेंगुळलेल्या अवस्थेत बसलो होतो. श्री. शिशिर अग्रवालांनी अखेर गुरुजींना आवरते घेण्याची विनंती केल्यामुळे कसेबसे पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सर्व लग्नविधी पार पडले. 

दुसऱ्या दिवशी, म्हणजे १ मेच्या सकाळी ९ वाजेपर्यंत आम्हाला जाग आली. आम्ही आमचे सामान आवरून हॉटेलमधल्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलो. तिथेच सर्व अग्रवाल कुटुंबीय भेटले. नववधू अंशुला आणि साहिलही भेटले. नाश्ता करून, सर्वांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. 

आमची शिमला ट्रिप खऱ्या अर्थाने यानंतर सुरु होणार होती. 

सोमवार, १५ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-४

शिमला स्टेशनवर आम्हाला घ्यायला आलेल्या गाडीच्या डिकीमध्ये सामान ठेऊन आम्ही आत बसेपर्यंत आमच्यावर गारांचा मारा झालाच. ते बघून आनंद पुटपुटला,

"जहाँ जहाँ पाँव पडे संतन के, वहाँ वहाँ होवे बंटाधार।"  

आम्ही सिमल्याला आल्यामुळे काही विशेष घडले आहे, असे वाटून मला एकदम अभिमान वाटला. पण त्या हिंदी वाक्प्रचाराचा खरा अर्थ आनंदने सांगितल्यानंतर मात्र मी पुरती खजील झाले. "अभागी व्यक्ती जिथे जाईल तिथे आपले नशीब घेऊन जाते", असा काहीसा अर्थ त्या वाक्याचा आहे!

'वेलकम हेरिटेज एलिसियम रिसॉर्ट' या कार्यस्थळी आम्ही पोहोचलो. आमच्या स्वागताला साहिलचा धाकटा भाऊ सुशांत, लॉबीमधे उभाच होता. रिसॉर्टवाल्यांनी आमच्या गळ्यात एकेक हिमाचली स्कार्फ घालून व मधुर चवीचे पेय पाजवून आमचे स्वागत केले. साहिलप्रमाणेच सुशांतही वेळोवेळी आमच्या घरी येऊन राहिलेला आहे. त्यामुळे हॉटेलच्या खोलीची किल्ली मिळेपर्यंत त्याच्याशी प्राथमिक गप्पा झाल्या. आम्हाला रिसॉर्टवर पोहोचेपर्यंत दुपारचा दीड वाजून गेला होता.  मेंदीचा कार्यक्रम संपलेला होता. "आता आपण जेवायलाच जाऊया", असे सुशांतने सुचवले. खोलीवर जाऊन कपडे बदलून जेवायला येतो असे सांगून, आम्ही आमच्या खोलीकडे निघालो. वाटेत अचानकच, दोन्ही होतांच्या कोपरापर्यंत आणि पायांना ढोपरापर्यंत मेंदी लावलेली एक हसतमुख तरुणी आमच्या समोर आली, आणि आम्हाला बघताच म्हणाली,

"नमस्ते आँटी! आप स्वाती आँटी और आप आनंद अंकल हो ना? साहिलने आप दोनोके बारेमें  मुझे बहोत कुछ बताया है।" 

ती साहिलची वाग्दत्त वधू, अंशुला आहे हे आमच्या लक्षात आलेच. आमची आणि तिची पूर्वी कधीच भेट झालेली नसतानाही तिने आम्हाला ओळखावे याचे आम्हाला अप्रूप वाटले. 

दुपारचे जेवण झाल्यावर आनंदने ताणून दिली. मी मात्र शिमल्याची थंड हवा आणि निसर्गसौंदर्य  अनुभवायला चालत बाहेर पडले. तोपर्यंत पाऊस थांबलेला असल्यामुळे, चांगला दीड-दोन तासांचा फेरफटका मारून मी ताजीतवानी होऊन आले. सिमल्यामध्ये वळणावळणाच्या आणि चढ-उताराच्या रस्त्यांवर चालण्याचा व्यायाम खूपच सुखद वाटला. इतका सतत आणि सहजी व्यायाम होत असताना हिमाचल सरकारने जागोजागी ओपन जिम्स उभी करून उगाच वायफट खर्च केला आहे असे मला वाटले. एप्रिल महिन्याच्या अखेरीला शिमल्यामध्ये अकाली झालेल्या वृष्टीमुळे हवेमध्ये चांगलाच गारठा आलेला होता. इतकी थंडी पडेल अशी मुळीच अपेक्षा नसल्यामुळे आम्ही आमच्या सामानात काहीही गरम कपडे ठेवलेले नव्हते. चालताना मला थंडी जाणवली नाही. पण चालणे संपवून हॉटेलवर परत आल्यावर अंगामध्ये हुडहुडी भरून आली. मी परत येईपर्यंत आनंदची वामकुक्षी निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे तोही अगदी ताजातवाना झाला होता!  

'वेलकम हेरिटेज एलिसियम रिसॉर्ट' हे आरामदायी हॉटेल होते. आमची खोलीही सर्व सुखसोयींनी युक्त अशी होती. हॉटेलच्या बाहेरच्या बाजूच्या सगळ्या भिंती काचेच्या आहेत. त्यामुळे कुठेही उभे राहिले तरी बाहेर टुमदार शिमला शहर आणि आजूबाजची पर्वतराजी दिसते. अग्रवालांनी त्या रिसॉर्टमधल्या सगळ्या खोल्या वऱ्हाडी मंडळींसाठी आरक्षित केलेल्या होत्या. आमंत्रितांमध्ये वर आणि वधू पक्षांकडचे अगदी जवळचे नातेवाईक आणि वधू-वरांचे मित्रमंडळ असे मोजकेच लोक होते. शिशिर अग्रवाल हे उच्चपदस्थ इन्कमटॅक्स अधिकारी असूनही त्यांच्या आगे-मागे धावणारे कोणीही सरकारी कर्मचारी तिथे नव्हते. त्यामुळे लग्न जरी हॉटेलमध्ये असले तरीही सगळ्या वातावरणात एकप्रकारचा घरगुतीपणा होता. साहिलच्या मुंबई आय.आय.टी. मधल्या वर्गमित्रांपैकी बरीचशी मुले आमच्या मुलाला, अनिरुद्धला ओळखत असल्याने, साहिलने आमची आणि त्यांची ओळख करून दिली. मग त्यांच्याशीही आमच्या गप्पा झाल्या.  

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तयार होऊन आम्ही 'संगीत' कार्यक्रमासाठी गेलो. हॉलमधली सजावट, उत्तम होती, पण त्यात भपका नव्हता. स्वतः अंशुला आणि वऱ्हाडातील इतर कोणीही भडक मेकप केलेला नव्हता. सर्वप्रथम 'सगाई', म्हणजेच, एकमेकांना अंगठी देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेला 'संगीत' कार्यक्रम अतिशय आनंददायी होता. साहिल आणि अंशुलाच्या कुटुंबियांनी आणि काही मित्र-मंडळींनी मोजकीच नृत्ये सादर केली. आजकाल अशा सर्व कार्यक्रमांमध्ये वाजणारी कर्णकर्कश्श गाणी, आणि मद्यधुंद होऊन, डीजेच्या तालावर बेभानपणे नाचणारी तमाम वऱ्हाडी मंडळी, असले काहीही नव्हते. 

निवृत्त आर्मी अधिकारी असलेले, अंशुलाच्या एका जीवश्च-कंठश्च मैत्रिणीचे वडील लग्नाला आले होते. त्यांच्याबरोबर, 'गुड ओल्ड डेज' च्या गप्पा मारण्यात आनंद व्यग्र होता. त्या काळात, संगीताच्या तालावर नाच करण्याची माझी हौस मीही भागवून घेतली. दहा-साडेदहापर्यंत तो कार्यक्रम संपला. त्यानंतर जेवणे आटपून आम्ही आपापल्या खोल्यामध्ये झोपायला गेलो.


 (क्रमशः)

शिमला-कसौली भाग-३

२९ एप्रिलच्या पहाटे चहा घेऊन, आंघोळी करून, आम्ही टॅक्सीने कालका स्टेशनवर पोहोचलो. कालका स्टेशन अगदी टुमदार आहे. कदाचित ब्रिटिशकालीन असावे. तिथून ब्रॉडगेज मार्गाने दिल्ली, मुंबई, कलकत्त्यापर्यंत जाणाऱ्या लांब, पल्ल्याच्या अनेक गाड्या सुटतात. तसेच तिथून शिमल्यापर्यंत जाणारा मीटरगेजचा मार्गही आहे. ब्रिटिशांनी १८६४ साली भारताची उन्हाळी राजधानी म्हणून शिमला हे ठिकाण निवडले होते. त्यामुळे शिमल्यापर्यंत रेल्वे असण्याची त्यांना आवश्यकता वाटायला लागली. १८९८ ते १९०३ दरम्यान कालका-शिमला या रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ९ नोव्हेंबर १९०३ या दिवशी, या मार्गावर  प्रथम  रेल्वे धावली. या रेल्वेप्रवासाबद्दल आम्ही खूप ऐकलेले होते. त्यामुळे हा रेल्वे प्रवास आम्हाला करायचाच होता. 

प्रवासामध्ये नेहमी आपल्याजवळ खाणे आणि पाणी ठेवले पाहिजे, असे माझ्या आईचे तत्व होते. मुंबईहून निघताना प्राचीने, म्हणजे माझ्या वहिनीने बांधून दिलेल्या खाद्यपदार्थांचा फडशा आम्ही आधीच पाडला होता. त्यामुळे, आमच्याकडे पाणी होते, पण खाणे नव्हते. गाडी सुटायला बराच वेळ असल्यामुळे, मी एक मोनॅकोचा पुडा आणि शेवेचे एक छोटे पाकीट विकत घेतले. त्या गोष्टींचा वाटेत खूपच उपयोग झाला. कारण शिमल्यापर्यंत वाटेतल्या कुठल्याही स्टेशनवर काही नीटसे खाद्यपदार्थ मिळाले नाहीत. 

कालका-शिमला प्रवास प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केलाच पाहिजे. आमच्या गाडीच्या छताला काचेच्या खिडक्या असलेले, 'व्हिस्टाडोम' डबे होते. डब्यांना दोन्ही बाजूंनीही मोठमोठाल्या खिडक्या असल्यामुळे चहुबाजूचे दृश्य दिसू शकत होते. गाडी जशी घाटातून हळूहळू वर चढत निघाली, तशी हवा थंडगार व्हायला लागली आणि आजूबाजूची निसर्गशोभा बघून मन प्रसन्न व्हायला लागले. 

वाटेत अनेक बोगदे आणि पूल लागतात. समोरून येणाऱ्या गाडीला वाट देण्यासाठी ही गाडी मधे-मधे अनेकवेळा थांबते, आणि थांबल्यावर दम लागल्यासारखे उसासेसुध्दा सोडते. गाडी थांबली की सगळे प्रवासी खाली उतरतात, सेल्फ्या काढतात आणि आजूबाजूचा नजारा  डोळ्यांमधे आणि फोनमध्ये टिपून घेतात. समोरून येणाऱ्या गाडीकडून एक ठराविक रिंग, किंवा टोकन जमा केल्यावरच गाडीला पुढे जाण्याचा सिग्नल मिळतो. त्यामुळे, सर्व प्रवासी आणि इंजिन ड्रायव्हरसुद्धा निवांतपणे बाहेर उभे असतात. अगदी ब्रिटिश काळापासून चालत आलेली, आणि आता बरीचशी कालबाह्य झालेली, 'मॅन्युअल इंटरलॉकिंग सिग्नलिंग'ची ही पद्धत बघायला आता मजा वाटते.  

आमच्या डब्यामध्ये दोन व्यापारी कुटुंबे होती. दोन्ही पुरुष जेमतेम चाळीशीचे तर त्यांच्या बायका पस्तिशीच्या. लवकर लग्ने  झाल्यामुळे, दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ अपत्ये दहावी-बारावीत शिकत होती. दोघांची आपापली घरे, चारचाकी गाड्या, जमीन-जुमला, सगळे होते. मुले मोठी झालेली असल्यामुळे, त्या बायकाही सुटवंग झालेल्या होत्या. 

 चेन्नईहून आलेला मारवाडी व्यावसायिक सांगत होता, 

"आमच्या गावामधून १८व्या वर्षी मुले कामाला बाहेर पडतात. दोन वर्षे कुणाच्या तरी हाताखाली काम शिकले की आपापला व्यवसाय सुरु करतात. उच्च शिक्षण घेणे आणि कोणाच्या हाताखाली नोकरी करणे, हे आमच्या रक्तातच नाही. चेन्नईमध्ये आमच्या गावच्या लोकांचीच सुमारे हजार घरे आहेत. प्रत्येकजण हा ना तो धंदा करतो. सगळ्यांची घरे चेन्नईमध्ये आहेत, पण दरवर्षी आम्ही राजस्थानमधील आमच्या गावातल्या घरी जाऊन राहतो. चेन्नईमध्येही आम्ही आमची भाषा, पेहराव आणि संस्कृती टिकवून आहोत. " 

दिल्लीचा व्यावसायिक म्हणाला, "मला फॅक्टरी टाकून वीस वर्षे होत आली. पहिली पाच-सहा वर्षे खूप राबून मी व्यवसायात जम बसवला. आता बस्तान चांगले बसले असल्यामुळे मी  दिल्लीच्या बाहेर असलो तरीही फॅक्टरी आणि माझे उत्पन्न चालूच असते. त्यामुळे मी संपूर्ण भारतभर नुसती भटकंती करत असतो. शिमल्याला तर आम्ही दर वर्षी येतो. दहा-पंधरा दिवस  रिसॉर्टमध्ये राहतो, खातो-पितो, मस्त मजा करतो. "

आमचे बोलणे चालू असतानाच बडोगचा बोगदा ओलांडून आमची गाडी बडोग स्टेशनवर थांबली. बाहेर एक झोपाळा दिसल्यामुळे मी त्यावर पटकन जाऊन बसले. त्या थंड आणि कुंद हवेमध्ये झोका घेण्याचा आनंद काही औरच होता. 

मजल दरमजल करत आमची गाडी वर चढत होती. बाहेर ढग दाटून आले होते. त्या दोन व्यापाऱ्यांशी झालेल्या  बोलण्याशी निगडित अनेक विचार माझ्या मनांत दाटून आले. नोकरी मिळावी यासाठी, सरसकट सगळ्यांनीच विशीतली ऐन उमेदीची वर्षे कॉलेज-शिक्षणात घालवणे खरोखरीच कितपत योग्य आहे?  हा प्रश्न मला पडला. शाळा कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्तींपेक्षा व्यवहारी जगामध्ये टक्के-टोणपे खाऊन, शिकलेले हे दोन सहप्रवासी जास्त यशस्वी आहेत असे मला वाटले. 

आमची गाडी शिमल्याला तासभर उशिरा पोहोचली. आम्हाला रिसॉर्टमध्ये न्यायला श्री. शिशिर अग्रवालांनी गाडी पाठवली होती. सामान घेऊन उतरेपर्यंत पावसाला सुरुवात झाली होतीच. आम्ही गाडीपर्यंत पोहोचेस्तोवर तडातडा गारपीटच व्हायला लागली!


 

(क्रमशः;)

शनिवार, १३ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-२

मार्चच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी मला जयपूरला जायचे होते. त्यामुळे नवीन साड्या, मॅचिंग ब्लाऊज व चपला, आणि दागिने, ही सगळी तयारी झालीच होती. त्यामुळे सिमल्याच्या लग्नासाठी फारशी तयारी करावी लागणार नव्हती. जयपूरहुन परतल्यावर, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, आनंदच्या पासपोर्टच्या कामानिमित्त आम्ही सोलापूरला गेलो. परतीच्या वाटेवर दादांच्या इच्छेखातर भुलेश्वर मंदिर बघितले. पण दादांना प्रवासाची दगदग झाली असावी. ९-१० एप्रिलच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्वरित घरच्या घरीच उपचार सुरु केले. तरीही, त्यांचे वय बघता, मी जरा काळजीतच होते. पण दहा-बारा  दिवसांमध्ये दादांची तब्येत पुष्कळच सुधारली. त्यामुळे सिमल्याला जायचा बेत आम्ही रद्द केला नाही. 

२७ मेला पुण्याहून उबर टॅक्सी करून आम्ही मुंबईला, माझ्या धाकट्या भावाच्या, गिरीशच्या घरी पोहोचलो. हल्ली सरकारने ओला/उबरच्या, सर्व इंटरसिटी गाडयांना सीएनजी बसवणे अनिवार्य केलेले आहे. डिकीमध्ये सी.एन.जी. ची टाकी असल्यामुळे जास्त सामान बसत नाही. आमचे सामान खूप असल्याने, दोन टॅक्सी रद्द कराव्या लागल्या. शेवटी पुणे-मुंबई टॅक्सी सेवेमार्फत मोठी टॅक्सी मागवून, सर्व सामान व्यवस्थित बसवून, रात्री मुंबईला पोहोचलो. या सगळ्या प्रकारात चांगला दीड-दोन तासांचा खोळंबा झाला. 

२८ एप्रिलला आमची मुंबई-चंदिगढ फ्लाईट दुपारी पावणेचार वाजताची होती. त्यामुळे आदल्या रात्री गप्पा मारत  उशिरा झोपलो. अर्थातच सकाळी उठायला उशीर झाला. आम्ही निवांतपणे चहा-नाष्टा उरकला. पण साडेदहाच्या सुमारास  इंडिगोचा मेसेज आला, 'तुमची फ्लाईट रद्द झाली आहे, तुम्ही पैसे परत घेऊ शकता किंवा दुसरी फ्लाईट बुक करू शकता'. आमच्या निवांतपणाला अचानकच सुरुंग लागला. बरीच फोना-फोनी केल्यानंतर आम्हाला मुंबई-गोवा आणि गोवा चंदीगड असे बुकिंग मिळाले. मुंबई-गोवा फ्लाईट दुपारी दोन वाजता निघणार असल्यामुळे बारा बाजेपर्यंत विमानतळावर पोहोचायचे होते. आमची चांगलीच तारांबळ उडाली. पटापट सामान आवरून आम्ही मुंबई एयरपोर्ट गाठला. आधीच्या तिकिटानुसार आम्ही ज्या वेळेला चंदीगढला पोहोचलो असतो त्यापेक्षा आता तासभर उशिरा पोहोचणार होतो. पूर्वीच्या काळी जेंव्हा विमानप्रवासाचे अप्रूप होते, तेव्हा असे घडले असते, तर कदाचित दोन वेळा विमानात बसायला मिळणार याचा मला आनंदच झाला असता. पण आता मात्र विमान बदलणे, आणि गोवा विमानतळावर दोन तास थांबणे अगदी जिवावर आले होते.  

रात्री साडेआठच्या सुमारास चंडीगढ  विमानतळावर पोहोचलो.  दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताची कालका-सिमला टॉय ट्रेन आम्हाला पकडायची होती. मेजर जनरल हरविजय सिंग (सेवानिवृत्त), या आनंदच्या मित्राने, कालका रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या, टेरिटोरियल आर्मीच्या ऑफिसर्स मेसमध्ये आमच्यासाठी एक गेस्टरूम आरक्षित करून ठेवलेली होती. पण कालका कॅंटोन्मेंट अगदी छोटेखानी असल्याने, ते ठिकाण आम्हाला शोधावेच लागणार होते. कुठल्याही आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये एखादा पत्ता शोधणे हे एक मोठे दिव्य असते. त्यातून रात्रीच्या वेळी ते आणखीच अवघड होऊन बसते. हे गेट बंद, ते गेट बंद, सेन्ट्रीला आय-कार्ड दाखवा, इथे नोंद करा, तिथे नोंद करा, असे अनेक सोपस्कार असतात. ठिकठिकाणी विचारत-विचारतच आम्ही टेरिटोरियल आर्मीच्या ऑफिसर्स मेसपर्यंत पोहोचलो. 

तिथे पोहोचल्यानंतर मात्र आमची छान बडदास्त ठेवली गेली. साधीच पण अतिशय स्वच्छ, आणि सर्व सोयीयुक्त नीटनेटकी  खोली आमच्यासाठी तयार होती. आम्ही पोहोचेपर्यंत खूप उशीर होणार असल्याने 'मी फक्त गरम दूधच घेईन' असे मेसमध्ये कळवून ठेवले होते. त्यामुळे आर्मीच्या जवानाने फक्त आनंदपुरते जेवण, आणि माझ्यासाठी पेलाभर गरम दूध आणि केळी आणून दिली. फ्लॉवरची भाजी, दालफ्राय, गरम फुलके आणि भात असे साधेच जेवण होते. पण गरमा-गरम जेवणाच्या वासाने माझी भूक खवळली. त्यामुळे मीही चार घास जेवले आणि वर दूधही प्यायले. अर्थात आर्मीच्या मेसमध्ये एका माणसासाठी म्हणून जो डबा येतो त्यात सहजी दोन माणसांचे हलके जेवण होऊ शकते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी कालका स्टेशनवर जाण्यासाठी आनंदने फोनवरच टॅक्सीचे बुकिंग करून ठेवले. 'पहाटे साडेपाच वाजता आम्हाला चहा दे' असे त्या आर्मीच्या जवानाला सांगितले. 

भरपेट व गरमागरम जेवणामुळे, आणि दिवसभराच्या प्रवासाच्या दगदगीमुळे, त्या थंडगार वातानुकूलित खोलीमध्ये आम्हाला कधी झोप लागून गेली, हे कळलेच नाही. 


शिमला-कसौली भाग-१

यावर्षी फेब्रुवारीच्या १९-२० तारखेला साहिल अग्रवालचा अचानकच फोन आला. तो म्हणाला, 
"ऑंटी, मैं और अंशुला शादी कर रहे हैं और आप दोनोंको जरूर आना है"

साहिल, हा अनिरुद्धचा, म्हणजे आमच्या मुलाचा शालेय वर्गमित्र. बारावीनंतर आमचा अनिरुद्ध अमेरिकेला शिकायला गेला, आणि साहिल मुंबई आय.आय.टी.मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग करायला गेला. साहिलची बारावी होईपर्यंत त्याचे कुटुंबीय पुण्यातच होते. साहिलच्या आई-वडिलांची आणि आमची चांगली ओळख आहे. त्याचे वडील, श्री. शिशिर अग्रवाल हे इन्कमटॅक्सचे बडे अधिकारी आहेत. पुण्याहून त्यांची बदली बरेली आणि त्यानंतर हैद्राबादला झाली. 

गंमत म्हणजे अनिरुद्ध अमेरिकेला गेल्यानंतर साहिलचे आणि आमचे छान मैत्र जुळले. आम्ही मुंबईला गेलो की साहिल तिथेही आम्हाला भेटायला यायचा. तो पुण्याला आला की आमच्या बरोबर, आर्मीच्या क्लबमध्ये बसून एखादी निवांत संध्याकाळ हलक्या गप्पा, चर्चा आणि हास्य-विनोद करत घालवायचा. आय.आय.टी.तून बाहेर पडल्यानंतर साहिलने अमेरिकेला जाऊन MS केले व काही काळ तिथेच नोकरी केली. या सर्व काळातदेखील त्याचा आणि आमचा संपर्क कायम होता. सध्या साहिल आणि अंशुला हैद्राबादला नोकरी करतात. त्या दोघांच्या मैत्रीबद्दल त्याने आम्हाला पूर्वीच कल्पना दिली होती. आता ती दोघे लग्न करत आहेत हे ऐकून आम्हाला खूपच आनंद  झाला.  

साहिल-अंशुलाचे  लग्न २९-३० एप्रिलला शिमल्याला होणार होते. सध्याच्या  भाषेत सांगायचे झाले तर ते 'डेस्टिनेशन वेडिंग' होते. त्यामुळे एकूण ७०-७५ लोकांनाच आमंत्रण होते. ज्याला इंग्रजीमध्ये exotic locations म्हणतात, अशी अनेक नवनवीन ठिकाणे हुडकून, हल्ली बरेच लोक डेस्टिनेशन वेडिंग्ज साजरी करतात. काही काळानंतर, लोक  चंद्रावर जाऊन  लग्न करायला लागले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. अग्रवाल कुटुंबीय मूळचे बरेलीचे आहेत. अंशुलाचे आई-वडीलही मूळचे उत्तर प्रदेशातले, पण दिल्लीत स्थाईक आहेत. श्री. शिशिर अग्रवाल सध्या हैद्राबादला चीफ इन्कमटॅक्स कमिशनर असताना, आणि साहिल-अंशुला हे सुद्धा हैद्राबादेतच असताना, लग्न शिमल्याला का? हा माझ्या मनात उमटलेला प्रश्न मी साहिलला विचारला. 

"कुछ नहीं आँटी, हमने पहले डेट्स निश्चित की। हम दोनोंको यही डेट्स  सूट कर रही हैं। पर एप्रिलके अंतमे तो गर्मी रहेगी। इसलिये हम किसी हिलस्टेशनका सोच रहे थे। मेरी मम्मीने उनकी कॉलेजकी पढाई शिमलाके सेंट बीड्स कॉलेजसे की है। इसलिये मम्मीको शिमलासे थोडा लगाव है। हम लोगोंको शिमला में एक बहुत अच्छा रिसॉर्टभी मिला।  फिर हमने शिमलाही फायनल कर दिया।"  साहिल अगदी निर्मळपणे सांगत होता. 

खरंतर, डेस्टिनेशन वेडिंग म्हटले की माझ्या पोटात गोळाच उठतो. त्यामध्ये जर ड्रेस कोड, कलर कोड, वेगवेगळ्या थीम्स, असे सगळे असले तर बरीच जमवा-जमव करावी लागते. परंतु, साहिलने सांगितले की लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे, कुठलाही ड्रेस कोड-थीम्स वगैरे काहीच नाहीये. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. आम्हाला २९ एप्रिलला सकाळी रिसॉर्टमध्ये पोहोचायचे होते. सकाळी मेंदी, रात्री संगीत, ३० तारखेला सकाळी हळदीचा कार्यक्रम, रात्री जयमाला व फेरे, असे विविध सोहळे होणार होते. १ मे च्या सकाळी सगळ्यांनी आपापल्या घरी परतायचे होते.  

एकूण ७०-७५ लोकांमध्ये आमची वर्णी लागून आम्हाला अगदी आग्रहाचे निमंत्रण आहे, हे ऐकून आम्ही मनोमन सुखावलो होतो. लग्नाला हजर राहण्यामध्ये इतर काहीही अडचण नसल्याने आम्ही जायचे ठरवले. शिमल्याला आम्ही पूर्वी कधीच गेलेलो नव्हतो. दादा म्हणाले, "इतके दूर जाणार आहात तर तू आणि आनंद आठवडाभर राहून शिमला  आणि आसपासचा भाग हिंडूनच या. मी तोपर्यंत मुंबईत राहीन. तुम्ही निश्चिन्तपणे जाऊन या."

१ मे  ते ६ मे  या काळात शिमला व कसौली बघण्याचा बेत आम्ही निश्चित केला. लगेच, मुंबई ते चंडीगढ विमानाची, व पुढे कालका ते शिमला टॉय ट्रेनची तिकिटेही काढून टाकली.