मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

तूच माझी व्हॅलेंटाईन!

             
                           अवचित आज सकाळी नवऱ्याने जेंव्हा ताजा लाल गुलाब माझ्या हाती दिला
                           व्हॅलेंटाईन डे! किती छान वाटलं मला, लाजत-लाजत  मीही तो स्वीकारला

                           मी नाही रे आणला गुलाब तुझ्यासाठी, कसनुसं हसून मी त्याला बोलले
                          "राहू दे गं राणी, तू असताना गुलाब कशाला?" त्याच्या बोलांनी जरा सुखावले

                          माझी व्हॅलेन्टाईन मात्र यायची होती अजून, तिचीच तर प्रतीक्षा होती मला
                          ठरवत होते मनातल्या मनात, आज एक छानसं फूल द्यायलाच हवं तिला

                          त्याने दिलेले फूल, परत त्यालाच मी द्यावे, या अपेक्षेने नवरा होता बघत
                          फूल हातात  घट्ट धरून, मी मात्र  बसले होते माझी घालमेल लपवत

                          इतक्यात ती लांबूनच येताना दिसली, आणि माझ्याकडे बघून छानसं हसली
                          तिला पाहता किती बरं वाटलं म्हणून सांगू? निदान आजची तरी चिंता मिटली

                          नवऱ्याला सोडून मी गेले धावत, अन गुलाबाच्या फुलाने केले तिचे स्वागत
                          म्हणाले "बरं झालं आलीस बाई," ("लाग आता कामाला") हे मात्र होतं स्वगत

                         लाल गुलाबाने ती अगदी हरखून गेली, वेणीमध्ये फूल खोवून कामालाही लागली
                         नजरेनेच मी त्याला म्हणाले "तूच माझा प्राणसखा," पण व्हॅलेंटाईन मात्र कामवाली! 









   

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

इस्टमनकलर

काल माझ्या ध्यानीमनी काही नसताना अचानकच आनंद म्हणाला,
"आज 'ध्यानीमनी'  बघायला जायचे का? व्हिक्टरीला सव्वाआठचा शो आहे "
वॅलेंटाईन डे जवळ आल्याचे सोशल मीडियातून नवऱ्याला कळल्यामुळे त्याने हे विचारले असावे असा गोड समज करून घेऊन मी चटकन हो म्हणून टाकलं. "तिकिटे मिळणार का? किती रुपयाचे तिकीटआहे?" असले व्यवहारी प्रश्न न विचारता मी लगेच तयार झाल्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटलं असावं!

गडबडीने जेवण उरकून, आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आम्ही तिकिटाच्या खिडकीवर पोहोचलोसुद्धा. बाल्कनीची तिकिटे मिळणार नाहीत हे कळल्यामुळे खालची दोन तिकिटे काढली. मनातल्या मनातच, "दोन तिकिटाचे मिळून चाळीस रुपये वाचणार आहेत" या 'मध्यमवर्गीय' विचाराचे मलम त्या दुःखावर लावून मी पिक्चर बघायला सज्ज झाले. थिएटरवर सगळाच शुकशुकाट होता. पिक्चर सुरु झाला की काय या कल्पनेमुळे मी धास्तावले आणि गडबडीने थिएटरच्या दरवाज्यापाशी गेले. बराच वेळ झाला तरी कोणी आत सोडायचे नांवच घेईना. विचारणा केल्यावर कळलं की बाल्कनीची दुरुस्ती चालू असल्यामुळे तिथली तिकिटे विकलेलीच नाहीत. आणि आमची दोन तिकिटे धरून एकूण तीनच तिकिटांची विक्री झाली आहे!
पंधरा-वीस मिनिटे वाट बघितली. पण कोणीही प्रेक्षक न  फिरकल्यामुळे तो शो रद्दच झाला. आम्ही तिकिटाचे पैसे घेऊन घरी परत असताना माझ्या ध्यानीमनी नसताना मन हलकेच भूतकाळात, म्हणजे माझ्या लग्नाआधीच्या काळातल्या सोलापूरात  गेले.

मला सिनेमाचे वेड आहे, किंवा व्यसनच म्हणा ना! आणि या व्यसनाचे मूळ लहानपणी आमच्या घरी असलेल्या शिस्तीत आहे. आमचं एकत्र कुटुंब आमच्या आजीच्या अधिपत्याखाली चालायचे. ज्या काळांत आमच्या बरोबरच्या काही मुलामुलींनी राजेशखन्ना, अमिताभच्या पिक्चरची , 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची नशा अनुभवलेली होती, त्या काळांत आम्हा सहा-सात भावंडांना मात्र कधीतरी वर्ष-सहा महिन्यातून  'रामजोशी' किंवा 'आम्ही जातो आमुच्या गांवा' असले सोवळे सिनेमे दाखवले जायचे. एखादा सिनेमा 'गेवा कलर' आहे, 'फुजिकलर' आहे, 'टेक्निकलर' आहे का 'इस्टमनकलर' आहे, असल्या तांत्रिक बाबी, किंवा कुणा हिरो-हिरोईनला सायनिंग अमाऊंट किती मिळाली, असल्या आर्थिक बाबींची माहिती आमच्या बरोबरच्या दर्दी मुलामुलींना असायची. 'बिनाका गीतमाला' मध्ये त्या-त्या आठवड्याला कोणते गाणे नंबर एकवर येऊन 'सरताज गीत' होणार, यांवर त्यांच्या पैजा लागायच्या. त्या काळात सिनेमा बघणं, त्यातली गाणी ऐकणं आणि म्हणणं, अगदी गुणगुणणं सुद्धा, आमच्या घरातल्या शिस्तीत बसत नसल्यामुळे, आम्ही मात्र अगदीच अज्ञानी होतो. पण घरातल्या त्या विरोधामुळेच सिनेमा माझ्या मनाला जास्तच खुणावत राहिला.  दहावीत असताना, आमच्या वर्गातल्या दीपाली आणि इतर दोघी-तिघी मुलींनी सिनेमांची गाणी लिहिण्यासाठी केलेली दोनशे पानी वही बघून, मीही चोरून तशीच एक वही केली होती. माझ्या 'चुगलीतत्पर' भावंडांपैकी कोणीतरी त्याबद्दल आईला खबर पोहोचवली. मला बरीच बोलणी खावी लागली आणि अर्थातच ती वहीदेखील जप्त करण्यात आली. पण या सगळ्यामुळे सिनेमाबद्दलचे माझे आकर्षण वाढतच गेले.

कॉलेजमध्ये गेल्यावर, विशेषतः मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर, घरच्या शिस्तीची पकड जरा सैल झाली. कधी चोरून तर कधी उघडपणे मी माझं व्यसन पूर्ण करू लागले. त्या काळातल्या अगदी साध्या, एसी नसलेल्या थिएटरमध्ये  सिनेमा बघायला जी मजा यायची, ती आजच्या झुळझुळीत मल्टिप्लेक्समध्येही  येत नाही. तसे पाहता 'मल्टिप्लेक्स'ची सुरुवात, सोलापूरसारख्या गावंढ्या शहरांत, ऐंशी वर्षांपूर्वी भागवत थिएटर्सने केली. एकाच आवारात असलेली भागवतांनी बांधलेली चित्रा, कला, छाया, उमा आणि गांधीं कुटुंबियांच्या मालकीची मीना आणि आशा ही थिएटर्स सिनेमाशौकिनांची नशा गेली कित्येक वर्षे पूर्ण करत आहेत. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजच्या दिवसांत, रांगा लावून किंवा प्रसंगी ब्लॅकने सिनेमाची तिकिटे विकत घ्यावी लागायची, हे आज खरे वाटणार नाही. कॉलेजमध्ये अचानकच प्रॅक्टिकल रद्द झाल्यावर किंवा एखाद्या वेळेस  प्रॅक्टिकल्स बुडवून मॅटिनी शो 'टाकण्याची' मजा अवर्णनीय होती. आधी पैशांची जुळवाजुळव करणे, "कॉलेज बुडवून सिनेमा बघण्यात तू काही मोठ्ठं पाप करत नाही आहेस" हे एखाद्या 'पापभीरू' मैत्रिणीला पटवून देणे, ट्रिपल सीट बसून पोलिसांना चुकवत चुकवत कसबसं थिएटरपाशी वेळेत पोहोचणे आणि शेवटी आपल्याला हवा तो सिनेमा निर्विघ्नपणे बघायला मिळणे यांत खूप मोठ्ठ थ्रिल होतं. अशावेळी भलीमोठी रांग पाहिली की पोटात गोळा यायचा. रांगेत कोणी ओळखीचे भेटले तर ठीक, अगदी नाहीच तर रांगेत पुढे असलेल्या एखाद्या तरुणाला अगदी गोड आवाजात आमच्यापैकी कोणीतरी तिकिटे काढण्याची विनंती करायचे आणि काम होऊन जायचं! कधी-कधी मात्र आम्ही पोहोचेपर्यंत "हाऊसफुल्ल" चा बोर्ड झळकलेला असायचा. अशा वेळी पोलिसांची नजर चुकवत दबक्या आवाजात तिकिटे विकणाऱ्या ब्लॅकवाल्याशी भरपूर हुज्जत घालून तिकीट मिळवावे लागायचे. अगदी तेही नाही मिळाले, तर डोअरकीपरला थोडे पैसे देऊ केले की तो पत्र्याच्या खुर्च्या टाकून आम्हाला बसवायचा!

त्या काळी सोलापुरातल्या थिएटरमध्ये सिनेमा बघण्याची मजा सांगावी तितकी थोडी आहे. एक तर सिनेमा हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. मोठीमोठी थिएटर्स प्रेक्षकांनी गच्च भरलेली असायची. बाल्कनीतला प्रेक्षक आणि खाली बसलेलं पब्लिक यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये मोठा फरक असायचा. खाली बसलेलं पब्लिक दिलखुलासपणे दाद देणारं होतं. गाणी चालू झाली की लोक समोर येऊन नाचायचे, रुमाल-टोप्या-फेटे हवेत उडवायचे, आणि फारच चांगले नाच-गाणे चालू असेल तर पडद्यावरच्या हिरो-हिरोईनवर चक्क पैसे फेकायचे! 'लव्ह सीन्स' चालू असताना, आपण स्वतःच हिरो आहोत असे स्वप्नरंजन काहीजण करत असावेत,पण काही जण मात्र जळकटपणे हिरोला ओरडून सांगायचे, "ए सोड... सोड बे तिला"! व्हिलनवर तर सगळे, सुप्तपणे, भलताच खार खाऊन असायचे!!  

पब्लिकच्या गप्पांमधून सिनेमाचा बॉक्स-ऑफिस वरचा परफॉर्मन्स समजत असे. "त्यात लै एक्सपोज हाय बे! किसींग आन बेडसीन बी हाय बे" असं काहीसं एखाद्या सिनेमाचं वर्णन असलं की तो सिनेमा महिनोंमहिने हाऊसफुल्ल जायचा. अशा सिनेमातील 'तसला' शॉट चालू असला की पब्लिकमध्ये मोठा गोंधळ तरी माजायचा किंवा अगदी पिनड्रॉप सायलेन्स तरी असायचा. त्या काळात तसली कामं फक्त साईड हिरोइन्सकडे किंवा सिनेमातील कॅब्रे डान्सर कडे असायची. आजकालच्या हिरोइन्सनीच 'ती जबाबदारी' उचलून कॅब्रे डान्सर्सची सुट्टी करून टाकली आहे! शिवाय 'एक्स्पोज' आणि 'किसिंग' मध्ये काहीच नावीन्य न राहिल्याने सिनेमामध्ये "लै एक्सपोज आन किसिंग हाय बे !" अशी 'वर्ड ऑफ माऊथ' पब्लिसिटी पण  गायब झालीय!

त्यावेळी फक्त बाल्कनीतील सीट्सना नंबर असायचे. त्या खालचं तिकीट असलं की डोअरकीपरने आत सोडताक्षणी धक्का-बुक्की करत, पळत पळत जाऊन जागा पकडावी लागायची. त्यामुळे बाल्कनीत बसलेल्या लोकांना सिनेमा सुरु व्हायच्या आधीच ड्रेस सर्कलमध्ये चाललेल्या तुफान हाणामारीचा ट्रेलर बघायला मिळायचा. सोलापूरच्या रांगड्या पब्लिकच्या तोंडातून मराठी भाषेतील उच्चतम शिव्यांचे शब्दभांडार त्यावेळी ओतले जायचे. एकदा का सिनेमा सुरु झाला की हळूहळू समेट होऊन हा सगळं गोंधळ संपायचा आणि सिनेमाच्या जादुई दुनियेत पब्लिक रंगून जायचं. सिनेमाच्या थिएटरमध्ये जागा पकडण्याची एक गंमतशीर आठवण आहे. एकदा आम्हाला, 'संत तुकाराम' हा सिनेमा शाळेमार्फत दाखवला गेला होता. दोन-दोनच्या जोडीने उभे करून आम्हाला अगदी शिस्तीत रांगेने आत सोडले होते. 'हुशार' विद्यार्थी असल्यामुळे आत शिरताक्षणी पळत-पळत पुढच्या रांगेतल्या खुर्च्या आम्ही पकडल्या. अजूनही मला पडद्यावर अगदी जवळ दिसलेलं ते मोठ्ठंच्या-मोठ्ठं 'पुष्पक' विमान आठवतंय! अर्थातच, घरी आल्यावर डोकं खूप दुखलं आणि, 'सिनेमा नेहमी मागच्या रांगांमधे बसून बघावा आणि नाटक नेहमी पुढच्या रांगांमध्ये बसून बघावं' हे मौलिक ज्ञान त्यावेळी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींकडूनच मिळाले!
सिनेमा चालू असताना मधेच कधीतरी आवाज गायब व्हायचा. मग, 'ए तुझ्या XXX... आव्वाज.... XXX' अशा आरोळ्यांनी आणि शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमून जायचे. सिनेमाच्या मध्येच रीळ तुटणे, एखादे रीळ उलटे किंवा पुढेमागे  लागणे, वीज जाणे, असले व्यत्ययही कधी-कधी यायचे. पण एकंदरीत त्या काळातलं पब्लिक सहनशील आणि समंजस होतं. असला दीर्घ काळाचा व्यत्यय आल्यावर थोडा आरडाओरडा करून मग पब्लिक शांत बसायचं. थिएटरमध्ये जास्त वेळ गेला म्हणून कोणाच्या आयुष्यात फारसा फरक पडत नसे. सगळं आयुष्यच निवांत होतं.  पुरुषवर्ग  बाहेर चक्कर मारून विडी-सिगरेट फुंकून किंवा 'मावा' खाऊन यायचा. तर स्त्रीवर्ग नाकाला पदर लावून पोराबाळांना काखोटीला मारून स्वछतागृह गाठायचा. अशा वेळी खारे दाणे, वेफर्स, पिवळ्या रंगाच्या नळ्या म्हणजेच 'बॉबी', सोडावॉटरआणि चहाची भरपूर विक्री व्हायची. अगदीच पब्लिकच्या सहनशक्तीचा अंत बघितला गेला तर मात्र  प्रोजेक्टर चालवणाऱ्या 'बाळ्या' किंवा 'उस्मान्या' च्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जायची. अशा व्यत्ययानंतर सिनेमा चालू झाला की त्याच  'बाळ्या' किंवा 'उस्मान्या'ला टाळ्यांनी आणि शिट्ट्यांनी उत्स्फूर्त दाद द्यायला लोक हात आखडत नसत !

सोलापुरातील स्त्री प्रेक्षकवर्गाची कथा काही औरच होती. "जय संतोषी माँ", किंवा "माहेरची साडी", "बाळा गाऊ कशी अंगाई" सारखे अलका कुबल, आशा काळे वगैरे रडक्या नट्यांचे सिनेमे "स्त्रियांच्या तुफान गर्दीत सतरावा आठवडा..." अशा वर्णनात चालायचे. तसल्या सिनेमाला कधी चुकून गेलेच तर खास बायकी गोधळ दिसायचा. पोरांची किरकिर, आयांनी त्यांच्या पाठीत घातलेले धपाटे आणि 'टवळे, सटवे..' वगैरे बायकी शिव्यांसहित एकमेकींच्या झिंज्या उपटत केलेली भांडणे, या सर्व आवाजांनी थिएटर कलकलून जायचं. असल्या सिनेमात हिरोईनचा सासरी होणारा छळ पाहून बायका मुसमुसून रडायच्या. सिनेमा संपेस्तोवर समस्त महिलावर्गाचे डोळे सुजून लालेलाल आणि पदर ओले झालेले असायचे. 

मागच्या महिन्यात सोलापूरच्या भागवत थिएटरमध्ये एक सिनेमा पाहिला. त्यातल्या एका थिएटरचे नाव आता, 'बिग सिनेमा भागवत' असं झालंय. मोबाईलवरून दीडशे रुपयांच्या तिकिटाचे बुकिंग केले. झुळझुळीत एसी थिएटरमधल्या गुबगुबीत गालिच्यासारख्या पायघड्यांवरून आमच्या तिकिटाच्या नंबरच्या सीटवर अलगद आसनस्थ झालो. कुठलीही रांग नाही, धक्काबुक्की नाही, आरडाओरडा नाही, तिकीट आणि जागा मिळणार की नाही याबद्दलची धास्ती नाही! थिएटरमध्ये बाल्कनी आणि ड्रेससर्कल अशी विभागणीही नव्हती. सगळे प्रेक्षक कमालीच्या शांतपणे सिनेमाचा आस्वाद घेत होते. शिट्ट्या, शिव्या आणि टाळ्या नसल्यामुळे सोलापूरच्या त्या थिएटर मध्ये 'पब्लिक' नव्हतंच असं वाटलं. सिनेमाच्या मध्यांतरात 'ट्रिंग-ट्रिंग' असा सोडा वॉटर बाटल्यांचा ओळखीचा आवाज आला नाही, आणि कुणी पोऱ्या चहा किंवा खाऱ्या दाण्याच्या कागदी पुड्या विकायलाही आला नाही. नाईलाजाने बाहेर जाऊन कॅरॅमल पॉपकॉर्नचा पुडा विकत घेतला. पण त्या महागड्या कॅरॅमल पॉपकॉर्नला जुन्या काळातल्या एक-दोन रुपयाच्या खाऱ्या दाण्यांच्या पुडीची सर अजिबातच नव्हती.

आजही मला थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघायला आवडते. पण खरे सांगायचे झाले तर, सोलापुरातल्या थिएटरमध्ये, सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमे पाहायला जशी मजा यायची तशी आजकाल येतच नाही! 

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

'निदानतज्ज्ञ'



माझे काका, डॉक्टर राम गोडबोले, १९६२ ते २००६ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. त्या काळी बरेचसे डॉक्टर M.B.B.S. अथवा L.C.P.S. होऊन जनरल प्रॅक्टिस करायचे. आजच्यासारखा स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटीचा तो जमाना नव्हता. लंडनहून M.R.C.P. आणि ग्लासगो विद्यापीठातून D.T.M.&H. या पदविकेचे सुवर्णपदक मिळवून भारतात परतल्यानंतर थेट आपल्या जन्मगावी म्हणजेच सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात, जनरल फिजिशियन म्हणून त्यांनी स्वतःच्या कारकीर्दीस सुरुवात केली. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन स्पेशालिस्ट प्रॅक्टिस करणारे माझ्या काकांसारखे एक-दोनच डॉक्टर त्या काळी सोलापूरच्या पंचक्रोशीत होते. त्यामुळे साहजिकच  सुरुवातीपासून डॉक्टर राम गोडबोले हे एक वलयांकित व्यक्तिमत्व होते. तसेच त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यातदेखील प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हणून ते नावाजले गेले.

प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हटलं की, दिमाखदार एसी गाडीतून हिंडणारे, ब्रँडेड कपडे वापरणारे, भरपूर बँक बॅलन्स, फार्महाऊस किंवा शेती असलेले, वरचेवर परदेशवाऱ्या करणारे, देशी-विदेशी कॉन्फरन्समध्ये भाषणं देणारे, अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉक्टर, असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते, नाही का? आश्चर्य म्हणजे माझ्या काकांकडे यातले काहीच नव्हते. पण 'प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर' च्या माझ्या व्याख्येत बसणारे सर्व काही त्यांच्याकडे होते. ते एक उत्तम  'निदानतज्ज्ञ' आणि कुशल शिक्षक होते. त्यांचा अनुभव दांडगा होता. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील सोलापूरलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. सोलापूरच्या 'डॉ. वैशंपायन  मेमोरियल मेडिकल कॉलेजचे' ते मानद प्राध्यापक असल्याने त्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते 'मेडिसिन' या विषयाची लेक्चर्स द्यायचे. वाडिया हॉस्पिटलमध्ये आमची क्लिनिकल टर्म लागली की तिथल्या अवघड, आव्हानात्मक केसेस त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यावर होणारी चर्चा व त्यायोगे केलेले वाचन यातूनही आम्हाला खूप शिकायला मिळायचे.  

काका-पुतणी या रक्ताच्या नात्यापेक्षा गुरु-शिष्या हे आमचे नाते अधिक घट्ट होते. त्यांच्या हाताखाली दोन-तीन वर्षे काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्या वैद्यकीय करियरमधील सगळ्यांत भाग्याची गोष्ट आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि वाजवी खर्चात केलेल्या वैद्यकीय निदानाचे महत्त्व, या 'निदानतज्ज्ञ' गुरूने माझ्या मनावर ठासून बिंबवले. रुग्णाच्या सर्व तक्रारी शांतपणे ऐकून, व्यवस्थित वेळ देऊन रुग्ण तपासणे, त्या तपासणीतून सापडलेली लक्षणे, आणि आपले वैद्यकीय ज्ञान व अनुभव यांची सांगड घालून एक-दोन तात्पुरत्या निदानांपर्यंत (presumptive diagnosis) येणे, 'योग्य निदान' (correct and  final diagnosis) करण्यासाठी काही अत्यावश्यक चाचण्या लिहून देणे आणि त्या चाचण्यांचे अहवाल मिळेस्तोवर तात्पुरती औषधयोजना करणे, अशी त्यांची सविस्तर 'निदानप्रक्रिया' होती.  डॉक्टरने रुग्णाकडून खुबीने काढून घेतलेले त्याच्या तक्रारींचे नेमके वर्णन (History) आणि  रुग्णाची केलेली सखोल तपासणी (Medical examination),  यातच निदानप्रक्रियेतील नव्वद टक्के काम पूर्ण होत असते, असे ते नेहमी सांगायचे. त्यामुळे त्यांच्या निदानप्रक्रियेत सर्वात जास्त खर्च काय होत असेल तर तो त्यांचा वेळ आणि शास्त्रशुद्ध विचार. महागड्या वैद्यकीय चाचण्या आणि औषधे हा खर्च जवळजवळ नसायचाच. एखाद्या आव्हानात्मक केसमध्ये सहजासहजी 'योग्य निदान' होऊ शकत नसे. अशावेळी रुग्णाला पुढच्या काही तपासण्या ते लिहून देत. पण त्याचबरोबर,  स्वतः अगदी  शिकाऊ डॉक्टर असल्यासारखे वैद्यकीय पुस्तके व संदर्भग्रंथ काढून परत-परत वाचत. त्या काळात होणारी त्यांची प्रचंड तगमग योग्य निदान झाल्यावरच शांत होत असे. मग मात्र, एखादे जटिल रहस्य उलगडल्यावर शेरलॉक होम्सच्या चेहऱ्यावर जो काही भाव येत असेल, तशा छटा मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. गोडबोले सरांच्या हाताखाली शिकलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने हे अनुभवलेले आहे आणि त्यातूनच आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा पाया भक्कम झाला आहे.  

त्या काळी, योग्य निदान करणे (Reaching  correct  and final diagnosis), हा वैद्यकीय शिक्षणातला अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य असा भाग होता. गोडबोले सरांसारखे अनेक उत्तम शिक्षक व 'निदानतज्ज्ञ' आमच्या पिढीला लाभले. योग्य निदान करण्याची ही कला गुरु-शिष्य परंपरेतून पुढे जात होती आणि अनेक 'निदानतज्ज्ञ' घडत होते. परंतु, त्याच काळातले आमच्याबरोबर किंवा थोडे पुढे-मागे शिकलेले बरेचसे व्यावसायिक, आज ज्या प्रकारे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत ते बघितले की माझ्या अंगावर काटा येतो. आपल्या  शिक्षणाचा उपयोग करून योग्य निदान व उपचार करणे हे आपले कर्तव्य आहे, या शिकवणीचा माझ्या पिढीतल्याही कित्येक अलोपॅथी व्यावसायिकांना पूर्ण विसर पडलेला असावा, असे मला जाणवते. किंवा कदाचित त्या गोष्टींना त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वच राहिलेले नाही. आपल्याकडे आलेल्या रुग्णावर स्वतःचा वेळ व बुद्धी खर्च न करता भरपूर चाचण्या व अनेक महागड्या औषधांवर रुग्णांना  पैसे खर्च करायला लावण्याची जणू अहमहमिका लागली आहे असे वाटते. अलोपॅथीव्यतिरिक्त इतर पॅथीच्याही अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी 'वैदिकोपचार', 'निसर्गोपचार', 'चिलेशन थेरपी', 'अरोमा थेरपी' अशा वेगवेगळ्या गोंडस नावांखाली जे काही घृणास्पद उद्योग चालवलेले आहेत, त्याबद्दल तर न बोललेलेच बरे. अशा व्यावसायिकांच्या कचाट्यात सापडलेल्या रुग्णाच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तरच तो वाचतो. मात्र तसे नसेल तर आपला जीव आणि पैसे दोन्हीही गमावून बसतो. गंमत म्हणजे यांपैकीच अनेक व्यावसायिक हे लौकिकार्थाने 'वलयांकित, प्रतिथयश आणि नामवंत' झालेले आहेत. समाजातील सगळेच वैद्यकीय व्यावसायिक असे आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु, सचोटीने आणि केवळ 'रुग्णहित' डोळ्यापुढे ठेऊन व्यवसाय करणारे तज्ज्ञ आज 'अल्पसंख्याक' होत चाललेले आहेत, हे मात्र खरे. 
  
आजच्या वैद्यकीय शिक्षणाची पद्धत आणि घसरत चाललेला दर्जा बघितला की मी विद्ध होते. बारावीनंतर लगेच MD/MS होता येत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव विद्यार्थी साडेचार वर्षे कशीबशी काढतात आणि  एम.बी.बी.एस. कोर्स 'उरकून घेतात'. या काळात लेक्चर्स ऐकणे, आव्हानात्मक केसेस अभ्यासणे व त्यावर चर्चा करणे, असल्या 'फालतू' गोष्टींवर वेळ न घालवता MD/MS प्रवेश परीक्षेच्या क्लासेसचे मार्ग विद्यार्थी धुंडाळत असतात. त्यानंतरच्या  सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा अधिकच अवघड असतात. आणि त्यांच्या तयारीसाठी वेगळे 'सुपर' क्लास असतातच. अशा या 'क्लासिकल' शिक्षणामध्ये ज्ञान मिळो ना मिळो, चांगली  'रँक' मिळणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. त्यामुळेच रुग्णाच्या आजाराचे 'योग्य निदान' होणे यासारख्या 'क्षुल्लक' गोष्टीला महत्त्वच राहिलेले नाही! 

आजचे हे विदारक चित्र पाहता, भविष्यकाळात गोडबोले सरांसारख्या डॉक्टर्सची दुर्मिळ प्रजाति नामशेष होईल की काय, अशी भीती मला भेडसावते. म्हणूनच,  'निदानतज्ञ' अशा एका सुपरस्पेशालिटी कोर्सचा समावेश वैद्यकीय शिक्षणप्रणालीत व्हायला हवा असे मला वाटते. तसे शक्य होईल अथवा न होईल. निदानपक्षी, मागच्या पिढीतल्या उत्तम गुरूंच्या तालमीत तयार झालेल्या 'निदानतज्ज्ञ' डॉक्टरांना हाताशी घेऊन, मीच 'निदानकला' या विषयाचा एखादा क्लास सुरु का करू नये? कशी वाटतेय कल्पना?