आज मे महिना संपला. मे महिन्याच्या आपल्या सगळ्यांच्या काही विशेष आठवणी असतात. मे महिना आला की मला सगळ्यात आधी आठवण येते ती बाबांची, म्हणजे माझ्या सासऱ्यांची. परिवारातील सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस बाबा आवर्जून लक्षात ठेवायचे. त्या-त्या तारखेला त्या व्यक्तींना फोन करून ते हमखास शुभेच्छा द्यायचेच. मे महिन्यात त्यांच्या सहा नातवंडांपैकी तीन नातवंडांचे वाढदिवस असल्यामुळे, मेच्या सुरुवातीपासूनच, अमुक तारखेला याचा वाढदिवस, तमुक तारखेला हिचा वाढदिवस, या तारखेला अमक्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्या तारखेला तमक्याची मुंज झाली होती, असे तपशील ते वरचेवर घोकत राहायचे. नातवंडांसाठी, स्वहस्ते एक छानसे ग्रीटिंग करायचे. त्या ग्रीटिंगच्या वरच्या कोपऱ्यात त्यांचे एक 'ट्रेडमार्क' फूल काढलेले असायचे. माझ्या मुलाचा, अनिरुद्धचा वाढदिवस मे महिन्यातला. तो भारताबाहेर शिकायला गेल्यानंतर दर वर्षी, जवळजवळ १ मेच्या सुमारासच बाबा त्याचा पत्ता आमच्याकडून कन्फर्म करून घ्यायचे आणि त्याला ग्रीटिंग करून पाठवायचे. दरवर्षी, बाबांनी घोकलेल्या तारखा आणि वाढदिवसाचे तपशील ऐकून घरातल्या सगळ्यांना मे मधले वाढदिवस लक्षात राहिले आहेत. मे महिन्यात बाबांचा एक वाढदिवस असायचा. प्रत्यक्षात त्यांचा जन्म जुलै महिन्यातला. पण त्यांना शाळेत घालताना कुणीतरी अंदाजे ३० मे अशी तारीख लावून टाकली होती. त्यांचे हे दोनही वाढदिवस साजरे केलेले त्यांना आवडायचे.
मे महिन्यातल्या लहानपणीच्या तर अनंत आठवणी आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आते-मामे-चुलत-मावस भावंडांसोबत घातलेला धिंगाणा आठवला की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. एकत्र जमलेल्या सगळ्या बाळगोपाळांना खेळण्यासाठी भरपूर जागा आणि वाट्टेल ते करायची मुभा माझ्या माहेरच्या मोठ्या वाड्यात होती. घरात एका खोलीत, रायवळ आंब्याची आढी लावलेली असायची. आम्ही मनसोक्त आंबे चोखायचो. दुपारच्या जेवणात रोज आमरस असायचाच. काका किंवा वडील, मंडईतून आमरसासाठी वेगळे आंबे आणायचे. आणलेले आंबे बादलीत बुडवून ठेवायचे. आंबे पिळणे, मोठ्ठे पातेले भरून रस काढणे, आंब्यांच्या कोयी चोखणे हे कार्यक्रम झाले की दुपारची जेवणे व्हायची. डायटींग, कॅलरीज, कोलेस्टेरॉल वगैरे शब्द त्यावेळी आमच्या किंवा घरातल्या कोणा मोठ्यांच्याही शब्दकोशात नव्हते. त्यामुळे आम्ही अगदी पोट फुटेस्तोवर जेवायचो. घरातल्या मुलांच्या पांढऱ्या छाटणींवर आणि मुलींच्या पांढऱ्या पेटीकोटवर आंब्यांमुळे केशरी नक्षी उमटायची. दुपारभर सगळे मिळून, पत्त्यांचे डाव, व्यापार किंवा कॅरम खेळायचो. संध्याकाळी अंगणात आणि गच्चीवर पाणी मारायचो. रात्री सगळी भावंडे गच्चीत झोपायचो. एकमेकांना भुताटकीच्या गोष्टी सांगायचो. एखाद्या संध्याकाळी, घरच्याघरी पॉटमध्ये आईस्क्रीम करायचा बेत असायचा. त्या 'फॅमिली आईस्क्रीम पार्टी'ची सर आजच्या कुठल्याही 'फॅमिली पॅक'ला येत नाही. पुढच्या पिढीतल्या मुलांना इतकी भावंडे नसतील, आणि असलेली भावंडे सर्रास एकत्र येण्याची शक्यताही कमीच असणार आहे. त्या बिचाऱ्यांना आम्ही चाखली ती मजा कुठून मिळणार?
माझी मुले शाळेत जायला लागल्यावर, मे महिन्यात त्या दोघांच्या इंग्रजी शाळेत, दोन वेगवेगळ्या तारखांना सगळी वह्यापुस्तके मिळायची. ती आणायला शाळेत मला जावे लागायचे. ती ढीगभर वह्यापुस्तके आणणे, त्यांना कव्हर्स घालणे, त्यावर नावे लिहिणे हा कार्यक्रम चालायचा. माझ्या मुलांच्या सुदैवाने, त्यांच्या लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत त्यांच्यासोबत खेळायला त्यांची दोन मामे भावंडे तरी होती. त्या चौघांना वॉटर पार्कला नेणे, समर कॅम्पला पाठवणे, त्यांच्यासाठी नवनवीन पदार्थ करणे किंवा त्यांची भांडणे सोडवणे, असे उद्योग मला असायचे. पण माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळे, रविवार सोडला तर इतर कुठल्याही दिवशी मला सुट्टी नसायची. त्यामुळे त्यांच्यासोबत मजा करायला मला निवांत वेळ कधीच मिळाला नाही, याचे वाईट वाटतेच. पुढे मुले मोठी झाली. ऑलिम्पियाड सारख्या मानाच्या परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवून देशपातळीवर होणाऱ्या शिबिरांमध्ये त्यांची निवड होत राहिली. त्यामुळे मे महिन्यांत, त्या शिबिरांसाठी त्यांना मुंबईला सोडणे-आणणे हे एक सुखद व्यवधान असायचे. मे महिना संपताना या शिबिरांचा शेवट यायचा. भारताच्या संघात आपल्या मुलांची निवड होते की नाही, याची हुरहूर लागलेली असायची. शिबिरांच्या सांगतासमारंभांना हजर राहून मुलांना घरी परत आणायला मी जायचे. एखाद्यावर्षी, भारतीय संघात मुलांची निवड झाली नाही तरीही त्यांना हिरमुसले होऊ न देणे हे मोठे नाजूक काम असायचे. शिबिरासाठी भारताच्या वेगवेगळ्या शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी गप्पा मारण्यात, माहितीची देवाण-घेवाण करण्यात, मे महिना कधी संपून जायचा ते कळायचेच नाही. पुढे मुले परदेशी गेल्यावर जून-जुलै मध्ये सुट्टीवर येऊ घातलेल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसण्यात मे महिना निघून जायचा. यंदाचा मे महिना मात्र अगदीच विचित्र अवस्थेत 'लॉकडाऊन' मध्ये गेला. माझ्या आईच्या मृत्यूच्या दुःखाचे आणि करोनाच्या भीतीचे सावट तर होतेच.
आज पहाटे फिरायला गेले तेव्हाही तेच विचार माझ्या मनाला अस्वस्थ करत होते. पण अचानकच, रोजच्या पाहण्यातल्या एका बंगल्याच्या आवारात, एक 'मे-फ्लॉवर' फुललेले दिसले. कालपर्यंत ते दिसले नव्हते. अनेक छोट्या-छोट्या नाजूक फुलांनी बनलेले, ते लालचुटुक गोलाकार फूल बघून माझे मन प्रसन्न झाले. गेल्या अनेक वर्षांच्या मे महिन्याच्या आठवणी मनातल्या मनात फुलून आल्या आणि माझ्या मनाचाही 'अनलॉक-१.०' चालू झाल्याचे मला जाणवले.