बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

१४. मलबारची सफर- तळी देऊळ आणि कप्पड बीच

१६ तारखेला सकाळी आमची मलबारची सफर संपणार होती. आमचे सहप्रवासी सकाळी १० वाजता हॉटेल सोडणार होते कारण त्यांना मुंबईची फ्लाईट पकडायची होती. पण त्याआधी सकाळीच तळी देऊळ बघायचे ठरले होते. शुभेन्दु, आनंद आणि दादा देऊळ बघायला आले नाहीत. बाकीचे आम्ही सर्वजण सकाळी अंघोळी करून देवदर्शनाला निघालो. देऊळ हॉटेलपासून जवळ असल्यामुळे, चालतच गेलो. या देवळामध्ये प्रवेश करण्यासाठी, तेथील नियमानुसार, पुरुषांना लुंगी नेसावी लागते. देवळाच्या बाहेर, २० रुपये देऊन भाड्याने मिळत असलेल्या लुंग्या परिधान करून, आमच्या बरोबरची पुरुषमंडळी तयार झाली आणि आम्ही सगळेजण देवळामध्ये गेलो. 

हे कोळीकोडमधील प्राचीन मंदिर आहे. स्वामी थिरुमूलपाद यांनी १४व्या शतकात हे मंदिर बांधले. तेथील झामोरिन राज्यकर्त्यांचे हे कौटुंबिक मंदिर होते. १८व्या शतकात टिपू सुलतानने कोळीकोडवर केलेल्या आक्रमणामध्ये या मंदिराचे बरेच नुकसान झाले होते. १९६४ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. गर्भगृहातील ज्योतिर्लिंगाची स्थापना परशुरामन यांनी केल्याचे मानले जाते. हे भव्य मंदिर पारंपारिक केरळी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. मंदिरात लाकडी कोरीव काम, सुंदर भित्तिचित्रे आणि कलात्मक रचना असलेले छप्पर आहे. गर्भगृहाच्या भिंती रथाच्या आकारात बांधलेल्या आहेत. गर्भगृहातील मुद्रा उमामहेश्वराची आहे. हे मंदिर जरी शिवमंदिर असले तरीही या मंदिरात, गणपती, विष्णू  श्रीकृष्ण, अय्यप्पा, नरसिंह यांच्याही मूर्ती आहेत. आम्ही गेलो तेंव्हा देवळामध्ये विशेष गर्दी नसल्यामुळे आम्हाला शांतपणे दर्शन घेता आले. 

आम्ही हॉटेलवर परत आलो तोवर दादा आणि आनंद जागे झालेले  होते. आम्ही सहप्रवाशांनी तळमजल्यावर नाश्ता घेतला.

सहप्रवाशांसोबत तळी मंदिरासमोर 

इडली-वडा, पुरी-भाजी, कॉर्नफ्लेक्स-दूध, ब्रेड-लोणी,  जॅम आणि 'Eggs to order' असे अनेक पदार्थ मांडलेले होते. पण चार दिवस आमच्यासोबत असलेले सहप्रवासी आम्हाला सोडून जाणार असल्यामुळे, आम्हाला अन्न गोड लागत नव्हते. मुंबईला परतणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर सोडायला निलेश राजाध्यक्ष आणि सुमंत पेडणेकरही गाडीमधून जाणार होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन खोलीवर परत आलो.

१६ तारखेचा संपूर्ण दिवस आमच्यासाठी मोकळाच होता. पण आदल्या रात्री उशिरा मला खोली बदलावी लागली असल्यामुळे आमची झोप पूर्ण झालेली नव्हती. म्हणून, थोडा वेळ विश्रांती झाल्यावर टॅक्सी करून कप्पड बीचवर जाऊन यावे, असे आम्ही ठरवले. ट्रेनिंगच्या काळापासून आनंदसोबत असलेले दोन आर्मी ऑफिसर सेवानिवृत्तीनंतर कोळीकोडला स्थायिक झालेले आहेत. त्यांच्याशी आनंदने आधीच संपर्क साधलेला होता. त्यापैकी एक, कर्नल रामकृष्ण आम्हाला त्या रात्री त्यांच्या घरी जेवायला येण्याचा आग्रह करत होते. परंतु, संध्याकाळी लवकर हॉटेलवर परतून झोपण्याची आमची इच्छा असल्याने, आम्ही नम्रपणे नकार दिला. 

आम्ही टॅक्सी करून कोप्पड बीचला जाणार, हे ऐकल्यावर, कर्नल रामकृष्णनी सुचवले की दुपारी चारच्या सुमारास, त्यांच्या गाडीतून ते स्वतःच आम्हाला कप्पड बीचवर घेऊन जातील. ती सूचना मात्र आम्ही लगेच उचलून धरली. त्यांच्या गाडीतूनच आम्ही कप्पड बीचला गेलो. वाटेत गप्पा मारता-मारता, कोळीकोडबद्दल आणि एकूणच केरळच्या इतिहासाबाबत बरीच माहिती त्यांनी आम्हाला सांगितली.

१४९८ साली, कप्पड येथील पुळणीवर वास्को-द-गामाने पाय ठेवताक्षणी, भारतावरच्या युरोपीय आक्रमणाच्या इतिहासाची सुरुवात झाली होती. त्या घटनेची आठवण करून देणारा एक संगमरवरी शिलालेख त्या किनारपट्टीवर असल्याचे कर्नल रामकृष्णांनी आम्हाला सांगितले. त्यांच्या लहानपणीच्या आठवणीप्रमाणे, ते स्मारक अगदी समुद्रालगत होते. परंतु, ते आम्हाला कुठेच दिसेना. चौकशी करता समजले की, किनारपट्टीचे सुशोभीकरण करताना ते समुद्रकिनाऱ्यापासून जरा दूर नेऊन उभारले होते. आम्ही ते स्मारक शोधले आणि त्यासमोर आमचा फोटोही काढून घेतला. 

वास्को द गामा स्मारकशिला 

त्यानंतर, जवळच्या कॅफेमध्ये बसून सँडविचेस आणि चहाचा आस्वाद घेत-घेत सूर्यास्त पाहण्याचा आमचा विचार होता. बसल्या-बसल्या मी विचार करू लागले, की वास्को-द-गामा भारतामध्ये आला नसता तर कदाचित सँडविच आणि चहासुध्दा भारतामध्ये आले नसते! अखेर, कप्पड बीचवरच्या रेस्टॉरंटमध्ये बसून सूर्यास्त बघणेही आमच्या नशिबात नव्हते. सूर्यास्ताच्या वेळीच नेमका पाऊस सुरु झाला.  

कप्पड बीचवरून हॉटेलवर परतण्याच्या वाटेवर, कर्नल रामकृष्ण मला मसाले खरेदी करण्यासाठी घेऊन गेले. मसाल्याबरोबर दोन-तीन किलो काजू आणि खजूराचीही खरेदी झाली. तिथे 'आजवा' जातीचे खजूर बरेच स्वस्त मिळाले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे १७ ऑगस्टला सकाळी, कर्नल रामाकृष्ण, त्यांची पत्नी प्रमिला आणि कोळीकोडमधले आनंदचे दुसरे मित्र कर्नल करुणाकरन, यांच्यासोबत आम्ही 'गुलमोहोर रेस्टॉरंट' मध्ये नाश्ता केला. त्यानंतर हॉटेलच्या खोलीवर येऊन आम्ही कोळीकोड विमानतळावर गेलो आणि परतीचे विमान पकडले. दुसऱ्या दिवसापासून पुण्यात कामे असल्याने, मुंबईला उतरल्यावर गिरीश-प्राचीच्या घरी न जाता, आम्ही विमानतळावरूनच उबर टॅक्सीने पुण्याला घरी येऊन पोहोचलो.

मलाबारच्या त्या सुखद सहलीच्या, आणि सर्व सहप्रवाशांच्या आठवणीने, त्या रात्री मला काही केल्या झोप येईना. खरेतर मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल कंपनीबरोबर सहलीला गेले होते. 'अनुभव ट्रॅव्हल्स'मुळे आमचे अनुभवविश्व छान समृद्ध झाले होते. 

'अनुभव ट्रॅव्हल्स'तर्फे आलेले श्री. निलेश राजाध्यक्ष, श्री. सुमंत पेडणेकर आणि बसचालक श्री. श्याम, यांची वागणूक अतिशय नम्र होती. आम्हा प्रवाशांना जास्तीतजास्त सेवा-सुविधा पुरविण्याबाबत ते तत्पर होते. सोनम-शुभेन्दू हे तरुण रक्ताचे दांपत्य सोबत असल्याने त्यांचा सहवास सर्वांनाच हवाहवासा होता. पेंडसे पती-पत्नी मितभाषी असले तरी, ते स्वभावाने अतिशय मृदू असल्याचे जाणवले. श्री पेंडसे यांचे गाणे आम्हाला खूप आवडले. कु. वृंदा जोशी यांनी पूर्वी भरपूर प्रवास केलेला असल्यामुळे त्यांच्याकडे माहितीचा खजिना होता. त्यांनीही खूप सुरेल आवाजात गाणी म्हटली. म्हात्रे पती-पत्नी दोघेही बोलके आणि हसतमुख होते. सहप्रवाशांबरोबर आमचा वेळ मजेत गेला आणि प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले.

सरतेशेवटी, माझा भाचा देवाशिष, ज्याच्यामुळे ही मस्त सहल घडली, त्याचे आभार मानायलाच हवेत!

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

१३. मलबारची सफर- मिश्काल मस्जिद, 'गोदाम' आणि फालुदा!

'गुलमोहोर रेस्टॉरंट'मध्ये पोटभर जेवण करून आम्ही कोळीकोडच्या कुट्टीचिरा या भागात असलेली जुनी-पुराणी  'मिश्काल मस्जिद' बघायला गेलो. मशिदीपर्यंत पोहोचेस्तोवर दुपारचे अडीच तीन वाजले होते. मिश्काल मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे.  

१४ व्या शतकात मुस्लिम व्यापारी, नाखुदा मिश्काल, याने ही मशीद बांधली होती. नाखुदा मिश्काल हा येमेनी व्यापारी अतिशय श्रीमंत होता. त्याच्याकडे जहाजांचा मोठा ताफा होता. भारत, चीन आणि पर्शिया या देशांशी त्याचा व्यापार होता. मुखत्वे लाकूड वापरून बांधली गेलेली ही मशीद पूर्वी पाचमजली होती. इसवी सन १५१० मध्ये पोर्तुगीज सेनानी अल्बुकर्क याने कोळीकोडवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्याच्या सैन्याने या मशिदीची जाळपोळ केली. त्यामुळे मशिदीच्या वरच्या काही मजल्यांचे नुकसान झाले. झामोरिन (सामुद्री) राजाच्या सैन्याने तो हल्ला परतवून लावला. पुढे १५७८ साली झामोरिन राजाने मिश्काल मशिदीची पुनर्बांधणी करून, मुस्लिमांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थपित केले. 

मिश्काल मस्जिद 

सध्या उभी असलेली मिश्काल मशीद चारमजली आहे. मशिदीची वास्तू जुनी असली तरीही सुंदर आहे. केरळमध्ये ज्या बोटावर मोजण्याइतक्या मध्ययुगीन मशिदी आहेत, त्यापैकी मिश्काल मशिदीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तसेच, ही मशीद मध्ययुगीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुनादेखील आहे. या मशिदीचे वेगळेपण असे की, इतरत्र सर्व मशिदींमध्ये दिसणारे घुमट आणि मिनार या मशिदीत अजिबात नाहीत. मशिदीच्या अंतर्भागातील कोरीव काम केलेले खांब, दरवाजे आणि कमानींवर दक्षिणेतील मंदिरांच्या स्थापत्यकलेची छाप दिसून येते. मशिदीच्या मध्यभागी असलेल्या हॉलमध्ये चारशे लोक एकावेळी नमाज पढू शकतात. 

शिहाद आम्हाला मशिदीबाबत जुजबी माहिती सांगत होता तोच तेथील नमाजाची वेळ झाली. एवीतेवी स्त्रियांना मशिदीमध्ये प्रवेश करता येणार नव्हताच, पण नमाजाच्या वेळी गैरमुस्लिम पुरुषांनाही प्रवेश वर्ज्य होता. त्यामुळे आमच्यापैकी कोणालाच मशिदीच्या आत जाता आले नाही. आम्ही सर्वानी मशीद फक्त बाहेरूनच पहिली, आणि मशिदीसमोर एक ग्रुप फोटो काढला. मी आणि आनंद मशिदीच्या बाहेर लावलेल्या फलकांवरची माहिती वाचत जरा जास्तच वेळ रेंगाळलो. बाहेर येऊन पाहिले तर, कु. वृंदा जोशी वगळता, आमच्याबरोबरचे इतर सर्वजण मशिदीशेजारच्या तलावावर गेले असल्याचे कळले. आम्ही त्यांच्यासाठी गाडीमध्ये बराच वेळ थांबलो पण त्यांचा पत्ताच नाही! 

शेवटी श्री. निलेश यांना फोन लावला. त्यांच्याकडून असे समजले की इतर सहप्रवाशाना घेऊन, हलवा गल्लीतुन पुढे 'गोदाम' नावाच्या एका जागी ते गेले होते. ती जागा शोधत आम्हीही तेथे पोहोचलो. तिथे असे कळले की, १५ ऑगस्टची सार्वजनिक सुट्टी असल्याने सुप्रसिद्ध 'हलवा गल्ली'मधली सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे आमच्या सहप्रवाशांच्या हलवाखरेदीच्या इराद्यावर पाणी पडले होते. म्हणून, तेथून जवळच गुजराती स्ट्रीटवर असलेले हे 'गोदाम' पाहण्याचा बूट अचानक निघाला असावा. आम्हीही आत गेलो, पण एक जिना चढून वर जावे लागणार असल्याने दादांना खालीच थांबवले. 

श्री. व सौ. बशीर यांच्यासोबत 'गोदाम'मध्ये 

'गोदाम' हे नावाप्रमाणे खरोखरीच पूर्वीचे धान्याचे गोदाम होते. पण ती जागा पडीक झालेली होती. श्री. बशीर नावाच्या गृहस्थांनी ते गोदाम भाड्याने घेतलेले होते. दुबईच्या पोलीस खात्यात नोकरी केलेल्या श्री. बशीर यांना पुरातन कलात्मक वस्तू जमवण्याचा छंद होता. गेल्या अनेक वर्षांमध्ये जमवलेल्या वस्तूंचे संग्रहालय त्यांनी आता त्या जागेत तयार केले आहे. तिथे अनेक सुंदर कलात्मक वस्तू होत्या. काही वस्तू, फर्निचर आणि अत्तरे वगैरे खरेदी करण्यासाठीही उपलब्ध होती. परंतु, ते सगळे संग्रहालय असंख्य वस्तूंनी भरून गेलेले होते, आणि त्या वास्तूंबद्दलची माहिती कोठेही लिहिलेली नव्हती, किंवा ती माहिती सुसूत्रपणे सांगणारेही तेथे कोणी नव्हते. त्यामुळे मला ती जागा विशेष आवडली नाही. विदेशी गोऱ्या लोकांना भारतामधली कलाकुसर दाखवून, त्यांना तेथील वस्तू अव्वाच्या सव्वा भावामध्ये विकल्या जात असाव्यात असे मला वाटले. 

गोदाम बघून झाल्यावर खरे तर, आमच्या मूळ कार्यक्रमाप्रमाणे आम्ही कोळीकोडजवळच असलेल्या कप्पड बीचवर जाणार होतो. पण त्याऐवजी आम्हाला कोळीकोड शहरातील बीचवरच्या 'कडलास' नावाच्या कॅफेमध्ये नेण्यात आले. हा कॅफे फारच छान होता आणि तिथे बसून आम्ही सूर्यास्त बघू शकणार होतो. आम्हाला वरच्या मजल्यावरची जागाही चांगली मिळाल्यामुळे समुद्रदर्शन चांगले होत होते. पण ढगाळ वातावरणामुळे आम्हाला सूर्यास्त मात्र दिसला नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने, बीचवर आणि आसपासच्या रस्त्यांवर लोकांची तुडुंब गर्दी होती. आम्ही दुपारी जेवलेले जेवण अजून खाली उतरले नव्हते. तरीही 'कडलास' कॅफेमध्ये बसून मी 'कॉफी क्रंच' प्यायले. ते पेय छानच होते, पण ते पीत असताना आणि माझ्या पोटामध्ये भूक नसतानाही, निशिताईंनी मागवलेला फालुद्याचा सुंदर पेला माझे लक्ष वेधून घेत होता!

'कडलास' कॅफेमधला फालुदा!

'कडलास' कॅफेमधून निघून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. कोळीकोडच्या मध्यवस्तीतील पालयम नावाच्या भागात, 'मेट्रो एम्पायर्स' हे हॉटेल होते. हॉटेलवर सामान टाकल्यावर म्हात्रे आणि पेंडसे पति-पत्नींबरोबर मी बाजारात फिरायला गेले. म्हात्रे आणि पेंडसे दांपत्यांनी केळ्याचे  वेफर्स आणि कोळीकोडचा सुप्रसिद्ध हलवा खरेदी केला. मला केरळी मसाले विकत घ्यायचे होते, पण मसाल्याची सगळी दुकाने बंद होती. 

दरम्यान, गिरीश-प्राची आणि जहागीरदार पतिपत्नींच्या कोळीकोडमधील हॉटेल बुकिंगचा काहीतरी घोळ झाला होता. तो घोळ निस्तरून श्री. निलेश साडेआठ वाजेपर्यंत आमच्या हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो, मात्र आम्हाला विशेष चांगले जेवण मिळाले नाही. मी जेवणारच नव्हते, त्यामुळे माझी काहीच अडचण झाली नाही. पण म्हात्रे पती-पत्नींना चतुर्थीचा उपास सोडायचा होता. त्यांना मनासारखी थाळी न मिळाल्याने त्यांचा बराच विरस झाला. 

जेवणानंतर आम्ही हॉटेलवर परत आलो. हॉटेलच्या खोल्या आरामदायी होत्या, पण आमच्या खोलीमध्ये खूपच तीव्र वासाचे रूम फ्रेशनर मारलेले होते. तीव्र वासाची ऍलर्जी असल्याने, मला खोकल्याचा असह्य त्रास होऊ लागला. हॉटेल पूर्णपणे वातानुकूलित होते आणि खोलीच्या खिडक्या उघडण्याची काही सोय नव्हती. रात्री अकराच्या पुढे आता आपल्याला दुसरे हॉटेल शोधावे लागते आहे की काय असे आम्हाला वाटायला लागले होते. पण माझ्या नशिबाने, एका खोलीची खिडकी उघडण्यात हॉटेलच्या नोकरांना यश आले. त्या खोलीमध्ये रूम फ्रेशनरही  मारलेला नसल्यामुळे मला शांत झोप लागली. 

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

१२ . मलबारची सफर-दीपांजली संग्रहालय

कोळीकोड स्टेशनवर आम्ही सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचलो. अनुभव ट्रॅव्हल्सची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी, स्टेशनबाहेर आमच्यासाठी येऊन थांबलेली होती. गाडीचा चालक श्याम सकाळी साडेसातच्या सुमारास 'सी शेल होम' वरून आमचे सामान घेऊन निघाला होता. पण तो अगदी वेळेत, आमच्या स्वागताला कोळीकोड स्टेशनवर पोहोचलेला बघून अगदी हायसे वाटले. आम्ही गाडीमध्ये बसून दीपांजली संग्रहालयाकडे निघालो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी कण्णूरहून इनोव्हाने निघून कोळीकोडच्या वाटेवर होते. पण त्यांना पोहोचायला वेळ लागणार होता. 

दीपांजली संग्रहालय हे अगदी डोळे दिपवून टाकणारे संग्रहालय आहे. एखादी व्यक्ती एका विशिष्ट ध्येयाने पेटली की काय नेत्रदीपक कामगिरी करू शकते, याचे हे संग्रहालय उत्तम उदाहरण आहे. श्री. प्रसाद यांच्या अथक प्रयत्नातून हे भारतातील एकमेवाद्वितीय दीप संग्रहालय तयार झालेलं आहे. श्री. प्रसाद यांनी अनेक वर्षे  दीपगृहामध्ये अधिकारी म्हणून काम केले. नोकरीच्या सुरुवातीपासूनच त्यांना दिवे जमवण्याचा छंद लागला. नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही, तीस वर्षांहून अधिक काळामध्ये, श्री. प्रसाद यांनी अठराव्या शतकापासून वापरात असलेले अनेक प्रकारचे दिवे जमा केले आहेत. कोळीकोडच्या पुथियांगडी या भागातील, श्री. प्रसाद यांच्या स्वतःच्या छोट्या बंगलीच्या वरच्या मजल्यावर, त्यांनी जमवलेल्या दिव्यांचे प्रदर्शन मांडलेले आहे. 

श्री. प्रसाद 

दीपांजली संग्रहालय एकावेळी पाचच जणांना बघता येते. एकेका पाच जणांच्या गटाला, श्री. प्रसाद त्यांच्याकडचे सगळे दिवे दाखवतात. दिवे दाखवण्याच्या निमित्ताने ते विविध संस्कृती, भूगोल, इतिहास, कला आणि विज्ञान या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकतात असे जाणवते. तसेच, प्रत्येक दिवा त्यांनी कुठून आणि कसा मिळवला याबाबतची अतिशय रंजक माहिती ते आपल्याला देतात. या संग्रहालयामध्ये शेकडो दिवे आहेत. देवळांमध्ये, चर्चमधे , मशिदींमध्ये किंवा ज्यू लोकांच्या सायनागॉगमध्ये वापरले गेलेले दिवे, दीपगृहांमध्ये, खाणींमध्ये, जहाजांवर, रेल्वेमध्ये आणि रेल्वेच्या सिग्नल्ससाठी वापरात आलेले दिवे, गॅसवर, अल्कोहोलवर, पेट्रोलवर, तेला-तुपावर किंवा चरबीवर चालणारे दिवे, वेगवेगळ्या धातूंपासून, काचेपासून, मातीपासून आणि दगडांपासूनही केलेले दिवे, टेबल लॅम्प्स, लटकवायचे, भिंतीवर लावायचे दिवे, दिवट्या, मशाली, चिमण्या, कंदील, आणि दिव्याची झुंबरे असे अनेको-अनेक प्रकारचे दिवे या संग्रहालयामध्ये आहेत. अनेक कलात्मक, पारंपरिक तसेच अत्यंत दुर्मिळ असे दिवे इथे आपल्याला बघायला मिळतात. 'अल्लाउद्दीनचा दिवा' सोडला तर बाकी सगळ्या प्रकारचे दिवे मला या संग्रहालयामध्ये  बघायला मिळाले!

आम्ही पाच-पाच जणांच्या तुकडीने वर जाऊन दिवे बघत होतो. बाकीचे सगळे श्री. प्रसाद यांच्या घरामध्ये खालच्या मजल्यावर बसून होतो. एकेका तुकडीला,  ते सर्व दिवे डोळे भरून बघायला अर्धा-पाऊण तास लागत होता. पहिली तुकडी वर होती तोपर्यंत गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी दीपांजली संग्रहालयात येऊन पोहोचले. पाच-पाच जणांचा एक, अशा तीन गटांमध्ये आम्ही संग्रहालय बघितले. निलेश राजाध्यक्षांनी आम्हा सर्वांसाठी, लिची आणि सफरचंदाच्या थंडगार ज्यूसचे टेट्रापॅक्स आणले आणि प्रतीक्षेचा काळ सुसह्य केला. सगळ्यांचे  प्रदर्शन बघून होईपर्यंत दुपारचे दीड वाजून गेले होते. सकाळी भरपेट नाश्ता केलेला असला तरी सगळ्यांनाच आता भूक लागायला लागली होती. दीपांजली संग्रहालय बघून झाल्यावर आमच्या दोन्ही गाड्या 'गुलमोहोर' या  शाकाहारी रेस्टॉरंटपाशी येऊन थांबल्या आणि आमचा जीव भांड्यात पडला. 

अगदी थोडाच वेळ थांबल्यानंतर आम्हाला बसायला टेबल मिळाले. रेस्टॉरंट अतिशय स्वच्छ दिसत होते. या रेस्टॉरंटमधली थाळी चांगली असते, आणि ती अगदी लोकप्रिय आहे, असे शिहादने आम्हाला सांगितल्यामुळे, थाळीच मागवायची असे आम्ही सगळ्यांनी ठरवले. इथे फक्त दोनच प्रकारच्या थाळ्या होत्या, तेही मला फार बरे वाटले. आम्ही सर्वांनी 'साऊथ इंडियन मील्स ' घेतली आणि शुभेन्दूने 'नॉर्थ इंडियन मील' घेतले. मी आणि दादा प्रत्येकी एकेक पूर्ण थाळी खाऊ शकणार नाही असे वाटल्यामुळे आम्ही दोघांमध्ये मिळून एक थाळी घेतली, ते फारच योग्य झाले. थाळीमध्ये आलेले जेवण भरपूर होते. या थाळ्याच्या किमती अगदी कमी होत्या. 'साऊथ इंडियन मील ' साधारण  १५० रुपयाला आणि 'नॉर्थ इंडियन मील' १७५ रुपये होते. 

केळीचे पान आच्छादलेली पितळेची मोठी थाळी, दोन-तीन प्रकारच्या भाज्या, रस्सम, सांबारम, दही, आणि पायसम, असे पदार्थ आठ वाट्यांमध्ये, आणि एक मोठा वाडगा भरून भात, एक तळलेला आप्पलम किंवा पप्पड्म, दोन प्रकारच्या चटण्या, बीट व गाजराचे गोडसर लोणचे, एक कोशिंबीर, तळलेली भरली मिरची आणि टॅपिओकाचे तळलेले कुरकुरीत काप, अशी ती थाळी बघून मन अगदी तृप्त झाले. थाळीमधल्या पदार्थांची रंगसंगती केळीच्या हिरव्यागार पानावर छान उठून दिसत होती. अगणित पदार्थ वाढलेली ही थाळी 'अनलिमिटेड' होती. एखादा पदार्थ आपण मागितला की तिथले वेटर्स तो पदार्थ अगदी तत्परतेने वाढत होते. सर्वसाधारणपणे आपल्याकडच्या 'थाळी भोजनालया'मध्ये वेटर्स सतत काहीनाकाही वाढण्यासाठी आपल्या आसपास घोंघावत राहतात आणि शांतपणे जेवू देत नाहीत. तशी परिस्थिती तिथे अजिबात नव्हती, हे मला फार आवडले. प्रत्येक पदार्थाची चव उत्कृष्ट होती. रेस्टॉरंटमध्ये भरपूर गर्दी होती, आणि बाहेरही लोक जेवणासाठी थांबलेले होते. तरीही, आम्ही जेवण करत असताना आम्हाला कोणीही घाई-गडबड केली नाही हेही विशेष. माझ्या व दादांच्या सामायिक थाळीमध्ये पायसमची एकच वाटी आलेली असल्यामुळे मी माझ्यासाठी आणखी एक वाटी मागून घेतली. म्हात्रे पती-पत्नीचा चतुर्थीचा उपास असल्यामुळे त्यांच्यासाठी फ्रुट डिश आणि ताक मागवले होते. 


अगदी वेगळ्या चवीचे, जास्त तेल-तिखट-मसाले न वापरलेले साधे सात्विक पण रुचकर जेवण झाल्यावर आम्ही कोळीकोडमधल्या अजून काही जागा बघायला निघालो. 


,

११. मलबारची सफर-ध्वजारोहण!

 

१५ ऑगस्टला पहाटे पाच वाजताच जाग आली. चहाचे पाणी गरम करायची किटली आणि टी बॅग वगैरे सामान आदल्या दिवशीच मागवून ठेवले होते. पहाटे डिप-डिपचा चहा करून प्यायले. माझ्या खुडबुडीमुळे आनंदला जाग आली होती, पण तो पांघरूण गुरफटून पडून राहिला होता. म्हणून मी एकटीच पुळणीवरच्या वाळूवर थोडा वेळ पळून आले. 

मी खोलीवर परतेपर्यंत आनंद आणि दादा जागे झालेले होते. त्या दोघांबरोबर पुन्हा चहा घेतला. आज आम्हाला सामान बांधून, लवकर तयार होऊन, रेल्वे स्टेशनवर जायचे होते. आमची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी सात वाजता आमचे सामान घेऊन पुढे कोळीकोडला जाऊन थांबणार होती. आम्ही साडेनऊ वाजता कण्णूर रेल्वे स्थानकावर पोहोचणारी आणि पुढे कोळीकोडला जाणारी गाडी पकडणार होतो. त्याआधी आमच्या अंघोळी, नाश्ता उरकून साडेआठ वाजता ध्वजारोहण समारंभाला हजर राहून ध्वजवंदन करायचे होते. 

आम्ही लगबगीने तयारीला लागलो. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचा एक वेगळाच आनंद आमच्या मनामध्ये होता. दादांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यामुळे दादा खूपच उत्साहात होते. त्यांची अंघोळ व नाश्ता वेळेत आवरून, त्यांना कुठलाही त्रास न होऊ देता, रेल्वे गाडीमध्ये कसे चढवावे, याचाच विचार मी आणि आनंद करीत होतो. 'सीशेल होम' मधल्या सोलर हिटरची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे, सर्वांना अंघोळीकरता गरम पाणी पुरवण्याची निराळी व्यवस्था निलेश राजाध्यक्ष यांनी बघितली. त्यामुळे आम्ही सगळेच वेळेत तयार झालो. सामान बांधून आमच्या बॅगा टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये ठेवण्यासाठी दिल्या. फक्त दादांची व्हीलचेयर आमच्याबरोबर रेल्वेने नेण्यासाठी ठेवली. 
नाश्ता करायला गेलो तर तिथे सगळे वेगवेगळे आणि छानछान पदार्थ मांडून ठेवलेले होते. ते बघून माझ्या तोंडाला पाणीच सुटले. केळीच्या पानामध्ये बांधलेले पुट्टु होते, 'एलाअडा' म्हणजेच गूळ व ओल्या नारळाचे सारण भरून केळीच्या पानामध्ये उकडून केलेल्या करंज्या होत्या, काळे चणे किंवा घुगऱ्याची मसालेदार उसळ, अर्थात 'कडलाकरी' होती, नारळाची चटणी व पांढरेशुभ्र जाळीदार आप्पम होते; त्याशिवाय, नारळाच्या दुधामध्ये शिजवलेली एक मिक्स भाजी आणि आदल्या दिवशीसारख्याच पुदिन्याची पाने पेरलेल्या कलिंगडाच्या फोडी, असा भरभक्कम नाश्त्याचा बेत होता. 

सगळे पदार्थ अगदी मस्त दिसत होते आणि त्यांचा सुवासही दरवळत होता. मग काय, आम्ही सगळेच त्या पदार्थांवर तुटून पडलो. म्हात्रे पती-पत्नींचा चतुर्थीचा उपास असल्यामुळे निलेश राजाध्यक्ष यांनी त्यांच्यासाठी खास बटाट्याचे तळलेले फिंगरचिप्स आणि आले घातलेले मसाला ताक मागवून ठेवले होते. आम्ही सर्वांनीही फिंगरचिप्सची चव बघितली. काहींनी ताकाचा आस्वादही घेतला. सगळे पदार्थ पचायला हलके व अतिशय चवदार होते. आमच्या शेजारच्या टेबलवर काही केरळी लोक बसले होते. डिशमध्ये पुट्टु कुस्करून त्यावर कडलाकरी, भाजी किंवा चटणी घालून भातासारखे कालवून ते हाताने खात होते. ते पाहून मग मीही तसेच कालवून खाल्ले. केवळ ध्वजारोहणाची वेळ होत आली होती आणि त्यानंतर आम्हाला गाडी पकडायची होती म्हणूनच आम्ही खाणे थांबवले आणि तिथून उठलो!

ध्वजारोहणाची सर्व जय्यत तयारी झालेली होती. दादांनी ध्वज फडकवला आणि कडक सलामी दिली. आम्ही सगळ्यांनी राष्ट्र्गीतचे समूहगान केले. त्यानंतर शिहादने एक छोटेसे भाषण केले. जवळजवळ सव्वासहाशे वर्षांपूर्वी वास्को द गामा या पहिल्या युरोपियन माणसाने केरळच्या सागरी किनाऱ्यावर पाय ठेवला होता. त्या घटनेमुळे आणि त्यानंतरच्या काळात ब्रिटिश आक्रमणांमुळे आपला देश पारतंत्र्यामध्ये गेला होता. दीडशे वर्षांचे पारतंत्र्य झुगारून, पंचाहत्तर वर्षांपूर्वी ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला, नेमके त्याच दिवशी, केरळ किनारपट्टीवरच आम्ही ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणे, हा मला आमच्यापुरता एक सुखद योगायोग वाटला. मोठ्या उत्साहाने आणि अतिशय अभिमानाने आम्ही सर्वांनी हातामध्ये ध्वज पकडून आमचे फोटो काढून घेतले. 

आता आमची 'सीशेल होम' सोडण्याची वेळ झाली होती. आमच्यापैकी कोणाला आणखी काही हवे आहे का, याची हरीस यांनी अगदी आस्थेने चौकशी केली. आमच्याबरोबर केळी आणि काही फळे बांधून दिली. त्यानंतर मला व आमच्यापैकी इतर काही जणांना, 'सीशेल होम' बद्दल आपापले अभिप्राय देण्याची विनंती केली. रोशनने, म्हणजे हरीस यांच्या मुलाने, आमच्या बोलण्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. आम्ही सर्वांनीच आपापल्या शब्दांमध्ये 'सीशेल होम' मधील चोख व्यवस्थेचे, उत्तम खाद्यपदार्थांचे, आणि आल्हाददायक वातावरणाचे भरभरून कौतुक केले.

आमच्या सामानासह टेम्पो ट्रॅव्हलर गाडी घेऊन, आमचा चालक शाम सकाळी साडेसातच्या सुमारासच कोळीकोडला निघून गेलेला होता.  'सीशेल होम' पासून आम्हाला कण्णूर रेल्वे स्टेशनवर नेण्यासाठी  एका वेगळ्या गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. आम्हाला निरोप द्यायला स्वतः रिसॉर्टमालक हरीस उभे होते. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना आपण म्हणतो तसे, "परत एकदा या निवांत राहायला आणि कोळीकोडला सुखरूप पोहोचलात की फोन करून कळवा" या शब्दात ते बोलले नाहीत इतकेच. पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावांमुळे ते तसेच म्हणत आहेत असे मला जाणवले. त्यामुळे हे 'होम' सोडताना माझे मन अगदी गलबलून आले होते. "आम्ही परत निश्चित येऊ" असे त्यांना सांगून मगच  मी गाडीमध्ये बसले. 

कण्णूर स्टेशनवर आम्ही अगदी वेळेत पोहोचलो. तिथे सरकता जिना असल्यामुळे, दादांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेताना आम्हाला काही त्रास झाला नाही. तसेच, व्हीलचेयर सोबत नेलेली असल्याने दादांना प्लॅटफॉर्मवर चालावेही लागले नाही. तिथे गेल्यानंतर आमची गाडी वीस मिनिटे उशिरा येणार असे कळले. त्यामुळे मी जरा कण्णूर प्लॅटफार्मवर इकडे-तिकडे हिंडून आले. व्हीलचेयरवरच्या रुग्णाला सहजी आत नेता येईल असे एक शौचालय प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला होते. पण त्याला कुलूप लावून ठेवलेले दिसले! कण्णूर स्टेशनचा प्लॅटफॉर्म मात्र अतिशय स्वच्छ होता. काही फिरते विक्रेते मेदूवडे विकत होते. दुकानांमध्ये इतर पदार्थांबरोबरच तीळगुळाचे लाडूही विकायला ठेवले होते. 

आमची गाडी कण्णूर स्टेशनवर फक्त तीन मिनिटे थांबणार होती. त्यामुळे गाडीमध्ये चढताना काही गडबड तर होणार नाही ना, अशी धाकधूक मनामध्ये होती. परंतु, निलेश राजाध्यक्ष, सुमंत पेडणेकर आणि मोहंमद शिहाद या तिघांनींही दादांना गाडीमध्ये चढायला मदत केली, आणि आम्ही सगळे अगदी सहजी गाडीमध्ये शिरुन बसू शकलो. एसी चेयरकारच्या दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये आम्हाला जागा मिळाली होती. काही प्रवाशांना विनंती करून आम्ही एकत्र जागा मिळवल्या. 

आपण सर्वांनी देशभक्तीपर गाणी गात-गात जावे असे श्री. पेंडसे यांनी सुचवले. ती कल्पना आम्हाला सगळ्यांनाच आवडली. डब्यामधले इतर प्रवासी काय म्हणतील याची तमा न बाळगता आम्ही मुक्तपणे समूहगान केले. कोळीकोड स्टेशन येईपर्यंत या जोशपूर्ण आणि संगीतमय वातावरणामध्ये आमचा वेळ कसा गेला, हे आम्हाला कळलेच नाही.

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

१०. मलबारची सफर- 'बेंगला कुटुंबीय' आणि 'मुळाप्पिलंगड बीच'

आम्ही डॉ. हर्मन गुंडर्ट यांच्या बंगल्यामधून अतिशय भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो. त्यावेळी सहा वाजून गेले होते. आता आम्ही 'मुळाप्पिलंगड बीच' वर जाणार होतो. पण आमची गाडी बीचकडे वळायच्या ऐवजी विरुद्ध दिशेच्या एका अरुंद बोळामध्ये वळून एका दुमजली घराजवळ थांबली. आमचा गाईड उर्फ 'स्टोरी टेलर' मोहंमद शिहाद गाडीतून उतरला आणि त्या घरात शिरला. त्याच्या मागे आमच्यापैकी काहीजण गेले. 'आपण आता इथे कशासाठी थांबलो आहोत? ही काही विशेष प्रेक्षणीय जागा आहे का?' असे प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाले. तिथे नेमके काय आहे, हे बघून यावे म्हणून मी पण त्या घरात गेले. तिथले सुंदर दृश्य बघून आणि शिहाद सांगत असलेली माहिती कानावर पडताच मी त्वरित बाहेर आले, आणि दादांना व आळसावलेल्या इतर सर्व सहप्रवाशांना बरोबर घेऊन परत त्या घरामध्ये गेले.   

२६५ वर्षांपूर्वी बांधलेले हे घर, श्री. इशाक बेंगला व त्यांच्या कुटुंबियांचे राहते घर होते. श्री. इशाक, हे शिहादच्या ओळखीचे असल्याने, शिहादने त्यांचे घर आम्हाला दाखवण्याची विनंती त्यांना केली होती. आमच्या सुदैवाने ती विंनती श्री. इशाक यांनी मान्य केली होती.

या दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर मोठा व्हरांडा होता. तिथे आरामखुर्च्या आणि मोठे बाकी ठवलेले होते. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर एक बैठकीची खोली होती. त्या खोलीला असलेल्या दोन मोठ्या खिडक्यांची झापडे आतल्या बाजूला उघडली की त्या झापडांचेच बाक तयार होत होते. मुख्य दरवाज्याच्या अगदी समोरच्या भिंतीमध्ये स्वयंपाकघरात जाण्यासाठी एक दार होते. त्या स्वयंपाकघरामध्ये आणि आतल्या खोल्यांमध्ये बेंगला कुटुंबातील स्त्रियांचा वावर असल्याने आम्हाला अर्थातच तिकडे जाता आले नाही. बैठकीच्या खोलीच्या उजव्या बाजूला एक नक्षीदार जिना होता. जिना चढून वर गेल्यावर उजव्या हाताला एक प्रशस्त दिवाणखाना होता. त्यातील भल्यामोठ्या खिडक्यांच्या तावदानांना रंगीबेरंगी काचा लावलेल्या होत्या.  


दिवाणखान्याच्या छताला मोठमोठाले हांडे आणि झुंबरे टांगलेली होती. तिथे अनेक मूल्यवान अशा शोभेच्या पुरातन वस्तू होत्या. एक मोठा ग्रामोफोन होता, खटका दाबल्यावर एकच सिगरेट बाहेर येईल अशी व्यवस्था असलेली सिगारेट केस होती, अनेक सुंदर दिवे आणि फुलदाण्या होत्या, एक नाजूकसा हुक्का होता, एक खूप जुना रेडिओ होता. श्री. इशाक हे पंच्याहत्तरीचे गृहस्थ, त्यांच्या तारुण्यात उत्तम क्रिकेटपटू आणि फ़ुटबॉलपटू होते. त्यांनी जिकंलेल्या काही ढाली आणि चषक तिथे मांडून ठेवलेले होते. दिवाणखान्यामध्ये एक मोठे गोलाकार टेबल आणि एक सुंदरसा झोपाळा होता. 


दिवाणखान्यातील एका कोपऱ्यामध्ये असलेले  एक कपाट उघडून, श्री. इशाक यांनी आम्हाला त्यातली एक गंमत दाखवली. त्या कपाटातच्या वरच्या फळीच्या वर, एक पिळाचा दांडा होता. तो  दांडा फिरवत राहिल्यास ती फळी खाली येत जाई. त्या फळीच्या खालच्या फळीवर, घडी केलेली एक साडी ठेवलेली होती. दांडा फिरवून वरची फळी खाली-खाली आणून त्या साडीवर दाबून ठेवण्याची ती योजना होती. कपड्यांना  इस्री करण्यासाठीही अनोखी पद्धत पूर्वी वापरात होती असे इशाकभाईंनी आम्हाला सांगितले.

दिवाणखान्यालगतच्या दोन मोठमोठया खोल्यामध्ये, मच्छरदाणी लावण्याची सोय असलेले मोठे पलंग होते. त्या दोन्ही खोल्या सध्या बेडरूम म्हणून वापरात होत्या. दिवाणखान्याच्या मागच्या बाजूच्या एका दालनामधे, एक खूप लांब टेबल आणि त्याभोवती खुर्च्या ठेवलेल्या होत्या. चाळीस ते पन्नास माणसे एकत्र जेवायला बसू शकतील असे ते लांबलचक डायनिंग टेबल होते. त्याच दालनाच्या मागच्या बाजूला एक सुंदर जिना होता. खालच्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाकघरातून, बायकांना ये-जा करण्यासाठी तो जिना होता. भारतातील अनेक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू, त्या टेबलावर, त्या कुंटुबासोबत जेवलेले आहेत, असे  श्री. इशाक यांनी आम्हाला सांगितले. बेंगला कुटुंबाच्या या ऐतिहासिक घराला भेट देऊन गेलेल्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंचे फोटो वरच्या मजल्यावरच्या एका छोट्या खोलीमध्ये लावलेले होते. इशाकभाईंनी सगळे घर आम्हाला मोठ्या उत्साहाने दाखवले एवढेच नव्हे तर, आम्हा सर्वाना शुद्ध तुपातली सोहनपापडीही खायला दिली. इशाकभाईंचा निरोप घेण्यापूर्वी आम्ही त्या घरासमोर, त्यांच्यासोबत आमचा सर्वांचा एक फोटो काढून घेतला. त्यानंतर आम्ही 'मुळाप्पिलंगड बीच' बघायला निघालो. 



'मुळाप्पिलंगड' किनारपट्टी जवळपास चार ते पाच किलोमीटर लांबीची आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे या पुळणीच्या वाळूवर गाडी किंवा स्कूटर-मोटरसायकल चालवता येते. बीचवर पर्यटकांची बरीच गर्दी होती. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने सुसाट वेगाने समुद्राला समांतर धावत होती. आम्हीही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीमधून बीचवर फिरलो. थोडा वेळ आम्ही बाहेर पायीही फिरलो, पण बारीक पाऊस पडत असल्याने आम्हाला जास्त फिरता आले नाही. आम्ही बरेच दमलेले असल्यामुळे निलेश राजाध्यक्ष यांनी एका चहाच्या टपरीवर सर्वांसाठी चहा मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण तिथले दूध संपलेले होते, आणि संध्याकाळचे सात वाजून गेले होते. म्हणून गाडीमध्ये बसून आम्ही रिसॉर्टकडे  परत निघालो. 

'सी शेल बीच होम' वर पोहोचताच आधी चहा घेतला. रात्रीचे जेवण अगदी साधे आणि सात्विक होते. मी दुपारी विशेष जेवलेले नसल्यामुळे रात्री जेवले. कोबीची भाजी, पडवळाची भाजी, फोडणीचे वरण, पोळ्या, साधा पुलाव, प्रॉन्स पुलाव आणि गुलाबजाम असा बेत होता. रिसॉर्टच्या जवळच श्री. हरीस यांचे एक शेत आहे. त्या शेतात उगवणाऱ्या ताज्या भाज्या स्वयंपाकात वापरल्या जातात, अशी माहितीही जेवताना कळली.भाज्यांची चव आपण घरी करतो त्यापेक्षाही खूप वेगळी होती. जेवण साधे असले तरीही अतिशय रुचकर असल्याने अगदी घरचे जेवण जेवल्यासारखे वाटले.  

दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता, दादांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर कण्णूर-कोळीकोड रेल्वे प्रवास करायचा आहे असे निलेश यांनी आम्हाला सांगितले. १५ तारखेलाच म्हात्रे दांपत्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो. पण १५ तारखेला चतुर्थी असल्याने, त्या दोघांचा उपास असणार होता. म्हणून १४ ऑगस्टच्या रात्रीच्या जेवणानंतरच त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय निलेश राजाध्यक्षांनी घेतला होता. त्यासाठी साधीच पण अतिशय सुंदर सजावट केली होती. एक छानसा केक मागवला होता. म्हात्रे पती-पत्नींनी केक कापला आणि आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर संगीताच्या तालावर त्या दोघांनी झोकात नृत्य केले. समुद्राच्या काठावर, लाटांच्या संगीतामध्ये,  हलक्या  वाऱ्यावर, मंद निळ्या प्रकाशात लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना खरोखरीच रोमँटिक होती!

रात्र खूप झाली होती. दुसऱ्या दिवशी लवकर उठून, नाश्ता करून, ध्वजवंदन करून आम्हा सर्वांना गाडी पकडायची होती. त्यामुळे  गप्पा मारत बसण्याचा मोह आवरून आम्ही झोपायला निघून गेलो.       

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

९. मलाबारची सफर- 'हर्मन गुंडर्ट' आणि 'गुंडर्ट बंगला'

कण्णूर दीपगृहापासून निघून आम्ही थेट थलासरीच्या 'एम आर ए रेस्टॉरंट' मध्ये साधारण अर्ध्या तासामधे पोहोचलो. रेस्टारंटमध्ये तुडुंब गर्दी होती. त्यामुळे आम्हाला जेवण्यासाठी जागा मिळेपर्यंत पुढे अजून अर्धा-पाऊण तास लागला. तोपर्यंत सर्वांनाच कडाडून भूक लागली होती. त्या कॅफेच्या बाहेर, काचेच्या आड मांडून ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ अत्यंत आकर्षक दिसत होते. तिथे बाहेरच एक माणूस 'कुनाफा' नावाचा गोड पदार्थ तयार करत होता. जेवणाला वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यामुळे प्राचीने दादांसाठी एक कुनाफा विकत घेतला. शेवटी आम्हाला बसायला जागा मिळाली. पण रेस्टारंटमध्ये तुफान गर्दी असल्यामुळे, जेवण खूप उशिरा आले. थलासरी चिकन, थलासरी बिर्याणी आणि दोन प्रकारचे पुलाव उत्तम होते. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे जेवण मिळावे यासाठी निलेश राजाध्यक्ष खूपच धडपड करत होते. परंतु, तेथील गर्दीमुळे, त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. जेवणासाठी बराच वेळ प्रतीक्षा करूनही मनासारखे खाद्यपदार्थ न मिळाल्याने काहीजण नाराज झाले. 

जेवण उरकून रेस्टॉरंटमधून निघेपर्यंत साडेचार वाजून गेले होते. जेमतेम पंधरा मिनिटांतच आम्ही 'गुंडर्ट बंगल्या'मध्ये पोहोचलो. या प्रशस्त बंगल्याचे आवारही  खूप मोठे आहे. बंगल्याच्या चारही बाजूंना मोठे व्हरांडे आहेत. हा बंगला पारंपरिक केरळी स्थापत्यशैलींमध्ये बांधलेला आहे. बंगल्यावर उतरते कौलारू छप्पर आहे. बंगल्याला मोठमोठ्या खिडक्या आहेत तर तिथले लाकडी दरवाजे चांगले रूंद व मजबूत आहेत. हा बंगला वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि बंगल्याचा परिसर शांत व निसर्गरम्य आहे.

एकोणिसाव्या शतकामध्ये, याच बंगल्यामधे सुमारे २० वर्षे राहून डॉ. हर्मन गुंडर्ट आणि त्यांच्या पत्नी ज्युली डुबोईस यांनी मल्याळम भाषासंवर्धनासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या बंगल्यामध्ये गुंडर्ट यांच्या जीवनाबाबतची आणि कार्याबद्दलची सर्व माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ती माहिती विविध भाषांमधून ऐकण्याची सोय करण्यात आलेली आहे. 


डॉ हर्मन गुंडर्ट यांचा जन्म १८१४ साली जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरामध्ये झाला. ते अतिशय प्रतिभावंत होते. १८३५ मधे टूबिगन विद्यापीठामधून त्यांनी भाषाशास्त्रामध्ये (फिलॉलॉजीमध्ये) डॉक्टरेटची पदवी संपादन केली. त्याचबरोबर त्यांनी तिथे धर्मशास्त्राचाही अभ्यास केला. या शिक्षणादरम्यान, हिब्रू, लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. १८३६ साली ते ख्रिश्चन मिशनरी म्हणून युरोपातून सागरी मार्गाने भारतात आले. बोटीवरील काही महिन्यांच्या प्रवासातच ते बंगाली, हिंदी व तेलगू भाषा शिकले आणि सहप्रवाशाना शिकवूही लागले. त्यांचे जहाज आधी कलकत्त्याला जाणार होते. पण ते तिथे न जाता मद्रासच्या किनाऱ्याला लागले. त्यामुळे काही काळ ते तामिळनाडूमधील तिरुनेलवेल्ली आणि पुढे आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे कार्यरत होते. त्याकाळात त्यांनी तामिळ आणि तेलगू भाषांवर प्रभुत्व मिळवले. युरोपमधून त्यांच्याबरोबर आलेल्या ज्युली डुबोईस या तरुणीशी, चित्तुर येथे ते विवाहबद्ध झाले. नोव्हेम्बर १८३८ मधे गुंडर्ट पती-पत्नींना मेंगलोरच्या बासेल मिशनचे काम बघण्यासाठी बोलावण्यात आले. त्या कामानिमित्त फिरताना ते केरळच्या थलासरी येथे पोहोचले आणि पुढील वीस वर्षे त्यांनी तिथेच वास्तव्य केले. 

गुंडर्ट पती-पत्नींनी थलासेरीच्या इल्लीकुन्नू भागातील या बंगल्यामध्ये राहावे, तेथेच बासेल मिशनचे स्टेशन स्थापन करावे आणि ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करावे असे ठरले होते. त्या कामाच्या निमित्ताने  डॉ. गुंडर्ट यांनी स्थानिक शिक्षकांकडून काही महिन्यातच मल्याळम भाषा शिकून घेतली. वर्षभरातच त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात पहिली मल्याळम शाळा सुरु केली. त्याच वेळी त्यांच्या पत्नीने मुलींसाठी पहिली  निवासी शिक्षणसंस्था सुरू केली. त्यानंतरच्या काही महिन्यांत, डॉ गुंडर्ट यांनी कादिरूर, थलासेरी फोर्ट, माहे आणि धर्मादम येथे मल्याळम शाळा सुरु केल्या. या सर्व शाळांना नियमित भेटी देऊन, तिथल्या कामकाजावर ते देखरेख करीत असत. 

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानिमित्त, थलासरीच्या आसपासच्या गावांना सातत्याने भेटी देत असल्यामुळे, तेथील स्थानिक लोकांमध्ये डॉ. गुंडर्ट यांची नियमित उठ-बस होती. स्थानिकांसोबतच्या संवादातून त्यांनी शक्य तितके मल्याळम शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी गोळा केल्या. त्यामुळे, मल्याळम भाषेचे पुष्कळच ज्ञान त्यांना प्राप्त झाले. स्थानिक विद्वानांसोबत चर्चा करून, त्यांनी मल्याळम भाषेतील व्याकरणाचे नियम निश्चित केले. तसेच त्या भाषेमधे  पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, आणि प्रश्नचिन्ह अशा चिन्हांचा वापर प्रचलित केला. 'मल्याळभाषा व्याकरणम' हे मल्याळम भाषेतील पहिले व्याकरणाचे पुस्तक डॉ. गुंडर्ट यांनीच संकलित करून १८५१ साली छापले. तसेच, १८७२ साली पहिला मल्याळम-इंग्रजी शब्दकोशदेखील त्यांनी तयार केला व बायबलचे मल्याळममध्ये भाषांतरही केले. 

१८५७ मध्ये, मलाबार प्रांताच्या दक्षिणेला असलेल्या कोळीकोड शहरापासून ते उत्तरेकडे कर्नाटकातील हुबळीपर्यंतच्या सर्व शाळांचे पहिले शिक्षण-निरीक्षक म्हणून डॉ. गुंडर्ट यांची नियुक्ती केली गेली. त्या पदावर असताना, शिक्षकांची नियुक्ती करण्याचे कामही ते पाहत असत. शाळा, महाविद्यालये आणि नव्याने स्थापन झालेल्या मद्रास विद्यापीठासाठी डॉ. गुंडर्ट यांनी पाठ्यपुस्तके लिहिली आणि परीक्षांकरिता प्रश्नसंचही संकलित केले. इतिहास, भूगोल आणि खगोलशास्त्र या क्षेत्रातही डॉ गुंडर्ट यांनी योगदान दिले आहे. मल्याळम भाषेमधील अनेक जुने दस्तऐवज आणि थलासरीशिवाय मलबार प्रांतामधील इतर ठिकाणच्या धर्मग्रंथांचे संकलन त्यांनी केले होते. ते सर्व संकलित साहित्य त्यांनी पुढे जर्मनीमधील टुबिंगेन विद्यापीठाला देणगीरूपाने दिले.

डॉ. गुंडर्ट यांनी छपाईसाठी, आपल्या बंगल्यामध्येच एक 'लिथो प्रेस' चालू केली. त्या छापखान्यामधून, 'राज्यसमाचारम' नावाचे पहिलेवहिले मल्याळम वर्तमानपत्र, आणि पुढे 'पश्चिमोदयम' हे दैनिकदेखील छापण्याची सुरुवात डॉ गुंडर्ट यांनीच केली. महिलांना इंगजी शिक्षण देऊन, शिवणकाम शिकवून त्यांना उपजीविकेचे साधन मिळवून देऊन, त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या बंगल्यात चालू केले गेलेले अनेक उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. डॉ. हर्मन  गुंडर्ट यांनी सुरु केलेली नेत्तूर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NTTF),  ही या बंगल्याच्या शेजारीच आहे आणि अजूनही कार्यरत आहे.

केरळची स्थानिक संस्कृती व मल्याळम भाषेचा विकास साधण्याकरिता, आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याकरणविषयक ज्ञान संकलित करण्यासाठी, डॉ. गुंडर्ट यांनी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी मल्याळम भाषेत एकूण तेरा पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी तेलगू साहित्याचे हिब्रूमध्ये भाषांतर केले आहे, असेही एका फलकावर वाचले आणि मी आश्चर्यचकितच झाले. डॉ गुंडर्ट याचे नातू, जर्मन कादंबरीकार व नोबेल पारितोषिक विजेते हर्मन हेसे यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. गुंडर्ट यांना कमीतकमी तीस भाषा अवगत होत्या. 

गुंडर्ट बंगला पाहून आणि डॉ. गुंडर्ट यांच्या कार्याबद्दल लिहिलेली विस्तृत माहिती वाचून, मी कमालीची थक्क झाले. कोण कुठला हा परकीय मनुष्य, आपल्या देशामध्ये येऊन राहतो काय, आपल्यालाही अतिशय अवघड वाटणाऱ्या दाक्षिणात्य भाषा व संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवतो काय, स्थानिक संस्कृती व भाषांच्या संवर्धनासाठी आपल्या तारुण्यातील बहुमूल्य काळ वेचतो काय, हे सर्व अचंबित करणारेच कार्य आहे. 

परंतु, डॉ. गुंडर्ट यांच्या कार्याबद्दल वाटलेल्या आदरासोबतच मला स्वतःचीच फार लाजही वाटली. मी एक डॉक्टर असल्याने, बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या केरळी नर्सेसबरोबर माझा नेहमी संबंध येतो. त्या नर्सेस आपापसात मल्याळममध्ये बोलत असतात. इतकी वर्षे ती भाषा माझ्या कानावर पडत आली आहे, पण ती मला बोलता तर येत नाहीच, पण समजतही नाही, ही वस्तुस्थिती खरोखरच लाजिरवाणी आहे. 

आपल्यापैकी कित्येकांना, एखादी दाक्षिणात्य भाषा ऐकल्यानंतर ती तेलगू आहे, तमिळ आहे की मल्याळम, हेसुद्धा सांगता येत नाही. त्या भाषा बोलणे किंवा त्या भाषांमध्ये लेखन करणे ही तर खूपच दूरची गोष्ट झाली. इतकेच नव्हे तर, मराठी भाषेशी पुष्कळसे साधर्म्य असलेल्या हिंदी, गुजराती या भाषाही आपल्याला येत नाहीत, आणि त्याची लाज वाटण्याऐवजी आपण ते 'वृथा अभिमानाने' सांगून हसण्यावारीही नेतो. 

आपण आपल्याच देशाबद्दल आणि देशवासीयांबद्दल किती अनभिज्ञ आहोत, आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपण सर्वांनीच आणखी किती प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव मला गुंडर्ट बंगल्यामधे गेल्यावर प्रकर्षाने झाली.

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

८.मलबारची सफर-'अरक्कल संग्रहालय' आणि दीपगृह

'सेंट अँजेलो फोर्ट' बघून झाल्यावर आम्ही अराक्कल संग्रहालय बघायला निघालो. वाटेत एका मशिदीची सुंदर इमारत दिसली. सर्वसाधारणपणे बघायला मिळणाऱ्या इतर मशिदींपेक्षा या इमारतीची रचना खूपच वेगळी होती. ही मशीद अरक्कल म्युझियम आणि मापिला खाडीच्या मध्ये आहे. कण्णूर शहरातील ही सर्वात जुनी मशीद अरक्कल राजाने सतराव्या शतकात बांधली, असे आम्हाला आमचा गाईड शिहाद याने सांगितले. डच स्थापत्यशैलींमध्ये बांधली गेलेली ही एकमेव मशीद आहे आणि त्यामुळेच या मशिदीची इमारत वेगळी आणि अतिशय देखणी आहे.  

सेंट अँजेलो किल्ल्यावर उन्हामध्ये फिरून आमच्या तोंडाला कोरड पडली होती. त्याबाबत आम्ही काही तक्रार करायच्या आधीच निलेश राजाध्यक्ष यांनी ते ओळखले असावे. अराक्कल संग्रहालयाजवळ आम्ही गाडीतून उतरल्यावर, संग्रहालयाच्या आत जाण्याआधी, त्यांनी आम्हा सर्वांना एक मस्त शीतपेय प्यायला दिले. शहाळ्यातील पाणी आणि 'पतली मलई' एकत्र मिक्सरमधून फिरवून, नंतर थंडगार केलेले ते मधुर पेय पिऊन आम्ही अगदी ताजेतवाने झालो. 

'अरक्कल राजवट' ही केरळमधील एकुलती एक मुस्लिम राजवट होती. कण्णूर शहर आणि लक्षद्वीपमधील दक्षिणेकडील काही बेटांवर यांचे राज्य होते. हे शाही घराणे कोलाथिरी राजवंशाचीच एक शाखा असल्याचे म्हटले जाते. या घराण्यात मातृसत्ताक पद्धत पाळली जात असल्यामुळे, राज्याचे उत्तराधिकार मामाकडून भाच्याकडे जात असत. पण कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, स्त्री अथवा पुरुष, हाच राज्याचा शासक असतो. राज्यकर्त्या राजाला 'अली राजा' आणि सत्ताधारी राणीला 'अरक्कल बीवी' अशा नावांनी संबोधले जाते. या मुस्लिम शासकांनी, अठराव्या शतकामध्ये हैदर अली या म्हैसूरच्या राजाला, केरळवर आक्रमण करण्यासाठी बोलावले होते. १६६३ साली अरक्कल राजाने डचांकडून एक वास्तू विकत घेतली. ती वास्तू, म्हणजेच 'अरक्कल राजवाडा', ज्यामध्ये सध्या हे अरक्कल संग्रहालय आहे.  

या छोट्याशा संग्रहालयाची इमारत जुनी असली तरी मजबूत आहे. संग्रहालयामध्ये अरक्कल राजघराण्यामधल्या लोकांनी वापरलेल्या वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्यात लाकडी नक्षीदार टेबल-खुर्च्या, बाक, पलंग, कपाटे, संदुका आणि मोठमोठाले आरसे आहेत. त्याचबरोबर त्या काळची शस्त्रे, दंड, वाद्ये, हांडे अशा इतरही अनेक वस्तू आहेत. जुने टेलीफोन्स, दुर्बिणी यासोबतच तिथले विशेष आकर्षण म्हणजे, कुराण शरीफची एक हस्तलिखित प्रत आणि अरक्कल राजवटीचा जुना ध्वज! शिहादने आम्हाला त्या ध्वजावरच्या सगळ्या चिन्हांबद्दल सविस्तर माहिती दिली. संग्रहालय बघून झाल्यावर आम्ही कण्णूरचे दीपगृह बघायला निघालो. 

पैयंबलम बीचजवळ असलेल्या या दीपगृहापर्यंत पोहोचेस्तोवर, दुपारचे  बारा वाजून गेले होते. दीपगृहाच्या आवारात शिरताच, डाव्या बाजूला एक छोटे संग्रहालय आहे. त्यामध्ये, सर्व दीपगृहांमध्ये पूर्वापार वापरली गेलेली वेगवेगळी उपकरणे ठेवलेली आहेत. शिहादने आम्हाला त्या उपकरणांची माहिती सांगितली. १८८५ सालापासून ते १९६२ पर्यंत लक्षद्वीप दीपस्तंभामध्ये वापरले गेलेले एक अवाढव्य ऑप्टिक (प्रकाश प्रवर्धित करणारी भिंगाची रचना) दाखवले. कधीकधी दाट धुक्यामुळे, ऑप्टिकने प्रवर्धित केलेला प्रकाशही जहाजांना दिसू शकत नाही. अशा परिस्थितीत जहाजचालकांना सतर्क करण्यासाठी पूर्वीपासून वापरण्यात आलेली एक प्रचंड  घंटा  या संग्रहालयामध्ये बघायला मिळाली. तिथल्या प्रेक्षागृहामध्ये भारत देशातील सर्व दीपगृहांबद्दलचा एक माहितीपट दाखवला जातो. संग्रहालय बघून झाल्यावर, आम्ही प्रेक्षागृहामध्ये चित्रपट बघायला जाईपर्यंत एक वाजत आला होता. तिथल्या सरकारी कर्मचाऱ्याने आम्हाला चित्रपट चालू करून दिला. पण बरोबर एक वाजायला पाच मिनिटे बाकी असताना, आपला सरकारी बाणा दाखवला. दुपारी १ ते २ जेवणाची सुट्टी असल्यामुळे त्याने आम्हाला संग्रहालयाच्या बाहेर काढले. त्यामुळे तो चित्रपट आम्हाला पूर्ण बघता आला नाही.  

सकाळी सगळ्यांनी भरपेट नाश्ता केलेला असल्यामुळे एक वाजेपर्यंत कोणालाच भूक लागली नव्हती. त्यामुळे आम्ही सर्वांनी दीपगृहाचा जिना चढून वर जाण्याचे ठरवले. फक्त दादा आणि सौ. अस्मिता म्हात्रे खालीच थांबले. लाल आणि पांढर्‍या रंगात रंगवलेले, जवळपास ७५ फूट उंच असे हे  दीपगृह, अजूनही सक्रिय आहे. वर चढून जाण्यासाठी एक चक्राकार जिना आहे. जिन्यामधे हवा येण्यासाठी बाहेरच्या भिंतीला ठराविक अंतरावर खिडक्या आहेत. जिना चढताना आम्हाला सर्वानाच धाप लागत होती. त्यामुळे त्या खिडक्यांजवळ थांबून जरा दम खात, अंगावर वारे घेत, बाहेर बघायला बरे वाटले. 

अगदी शेवटी एक निमुळती आणि खडी चढण असलेली लोखंडी शिडी चढून, दीपगृहाच्या गोलाकार सज्जामध्ये जात येत होते. त्या शिडीवरून एकावेळी फक्त एकच व्यक्ती चढू किंवा उतरू शकत होती आणि चढताना पायामधे आणि पोटामध्येही गोळे येत होते. पण इतके कष्ट करून, सज्ज्यामध्ये पोहोचताच, जे दृश्य दिसले ते मात्र वर्णनातीत होते. मॉन्सूनचे तुफान वारे वाहत होते आणि नजर पोहोचेपर्यंत फक्त समुद्रच दिसत होता. तिथे आम्ही अनेक फोटो काढले. बऱ्याच जणांनी ३६० अंशातील व्हिडिओही काढला. व्हिडियोमध्ये आपण एखाद्या ठिकाणचे दृश्य, तिथले आवाज, तिथे असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील भाव हे सगळे कैद करू शकतो. पण तरीही तेथील 'माहौल', आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये उचंबळणारे भाव मात्र कैद करता येत नाहीत!  


खरं सांगायचे तर त्या 'माहौल' मधून आमचा कोणाचाच पाय निघत नव्हता. पण त्या छोट्या सज्ज्यामध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला लागली होती. तसेच आम्हाला पुढे थलासरीपर्यंत प्रवास करून, तिथली सुप्रसिद्ध 'थलासरी बिर्याणी' चाखायची होती. त्यामुळे काहीश्या नाईलाजानेच आम्ही खाली उतरलो आणि गाडीमध्ये बसून थलासरीकडे प्रयाण केले.   

 

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

७. मलबारची सफर-'सेंट अँजेलो फोर्ट'


१४ ऑगस्टच्या पहाटे ६ वाजता मला जाग आली. पाठोपाठ आनंदही जागा झाला. बीचवर जाण्यासाठी सोनम अगदी छान तयार होऊन शुभेन्दूची वाट पाहत थांबली होती. सात वाजेपर्यंत चहा मिळू शकणार नसल्याने आम्ही पुळणीवर फेरफटका मारायला गेलो. श्री. अशोक म्हात्रे आणि सौ. अस्मिता म्हात्रे, हे पती-पत्नी आम्हा सर्वांच्या आधीच तिथे पोहोचून पुळणीवर चालत होते. त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्हीही पाय मोकळे केले. पाठोपाठ सोनम-शुभेन्दूही आले. सगळ्यांचे एक छान फोटोसेशन झाल्यावर आम्ही रिसॉर्टवर परतलो. तोपर्यंत तिथे सकाळचा चहा आलेला होता. दादांना उठवून त्यांच्याबरोबर गरमागरम चहा घेतला. 

चहा झाल्यानंतर अंघोळी आटपाव्यात म्हटले तर नळाला गरम पाणीच येईना. केरळमध्ये सर्वच हॉटेलांमध्ये, मसाल्याचा वास असलेले गरम पाणी प्यायला देतात. पण अंघोळीला मात्र गरम पाणी घेण्याची पद्धत नसावी की काय अशी शंका आम्हाला येऊ लागली. रिसॉर्टमध्ये सौर उर्जेवर पाणी गरम करण्याची सोय होती. पण त्यात कदाचित काही बिघाड असल्यामुळे गरम पाणी येईना. वातावरण ढगाळ होते आणि ऊन पडायचीही शाश्वती नव्हती. म्हणून आम्ही अंघोळीच्या आधीच नाश्ता करून घ्यायचे ठरवले.

नाश्त्यामध्ये स्थानिक पदार्थांची रेलचेल होती. जाळीदार पांढरेशुभ्र आप्पम, नारळाची चटणी, तांदुळाच्या उकडीपासून केलेले नाजूक इडिअप्पम व त्यासोबत गूळ घातलेले नारळाचे दूध, उपमा, गोडसर आप्पे म्हणजे मुट्टप्पम, व्हेज स्ट्यू असे एकेक अफलातून आणि सात्विक चवीचे पदार्थ होते. कुठल्याही पदार्थामध्ये तेल, मसाले अथवा मिरची जास्त नव्हते. कलिंगडाच्या कापलेल्या फोडींवर पुदिन्याची पाने आणि मसाला घालून ठेवलेले होते. आदल्या रात्री मी जेवलेले नसल्याने, मला भूक लागली होतीच. हे अतिशय आकर्षक पदार्थ समोर आल्यावर मी अक्षरशः पोटाला तडस लागेपर्यंत नाश्ता केला.

अंघोळीच्या गरम पाण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबावे लागले. शेवटी साडेनऊच्या सुमारास आमची गाडी 'सेंट अँजेलो फोर्ट' कडे निघाली. त्या दिवशी आमच्याबरोबर मोहम्मद शिहाद हा 'लोकल गाईड' म्हणून आलेला होता. किल्ल्यामध्ये पोहोचल्यावर त्याने आम्हाला बरीच चांगली माहिती सांगितली. काही माहिती मी गूगलवरही वाचली. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी आम्ही पोहोचायच्या आधीच किल्ल्यापाशी पोहोचले होते.    

१४९८ साली वास्को द गामा पहिल्यांदा भारतात कोळीकोड किनाऱ्यावर उतरला होता. त्याने स्थानिक कोलाथिरी राजाला वसाहतीसाठी जागा देण्याची विनंती केली. १५०५ साली राजाकडून जमीन मिळवून पोर्तुगीजांनी तिथे एक लाकडी किल्ला बांधला. १५०७ साली त्यांनी त्याच जागी एक भक्कम दगडी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळी तिथल्या झामोरिन आणि कोलाथिरी राजांनी, किल्ल्याला वेढा घालून पोर्तुगीजांकडून तो किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला. पुढे या किल्ल्यामध्येच आपल्या नौदलाचा भक्कम तळ उभारून पोर्तुगीजांनी गोवाही जिंकले.

१६६३ साली डचांनी पोर्तुगीजांकडून सेंट अँजेलो किल्ला जिंकला आणि किल्ल्याचे आधुनिकीकरण केले. अरक्कलचा राजा अली याने १७७२ साली हा किल्ला डचांकडून विकत घेतला, पण १७९० साली ब्रिटिशांनी तो त्याच्याकडून हिरावून आपल्या ताब्यात घेतला. १९४७ सालापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांचा मलबारमधील मुख्य लष्करी तळ होता. बेकलच्या किल्ल्याप्रमाणेच, हा किल्लादेखील समुद्रामध्ये घुसणाऱ्या एका उंच सुळक्यावर बांधलेला आहे. त्यामुळे, किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारे दृश्य अतिशय नयनरम्य आहे. किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली असली तरीही सगळा परिसर खूप स्वच्छ ठेवलेला आहे. बुरुजावरून मापिला खाडी दिसते. खाली एका बाजूला अगदी समुद्राच्या काठावर एक छानशी बाग, आणि चालण्यासाठी एक ट्रॅकही केलेला आहे. 

मोहम्मद शिहादसोबत आम्ही सगळा किल्ला हिंडून बघितला. किल्ला  दाखवताना, तो किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आम्हाला समजावून सांगत होता. किल्ल्यावर एक जुने दीपगृह आहे. समुद्राच्या दिशेने डागता येतील अशा अनेक तोफा किल्ल्याच्या एका बुरुजावर आहेत. गंमत म्हणजे, त्यातल्या एका तोफेमधे एक तोफगोळा अडकूनच बसलेला आहे. त्याचा मी फोटो काढला. एके ठिकाणी, एका डच अधिकाऱ्याच्या पत्नीच्या आणि त्यांच्या दोन मुलांच्या थडग्यावरच्या दगडावर, त्या काळच्या डच भाषेत, त्यांचा मृत्युलेख लिहिलेला आहे. तो दगड बघून मात्र मला जरा उदास वाटले. 

किल्ल्यामध्ये खालच्या बाजूला घोड्याच्या पागा आहेत. त्याशेजारी एक अंधारकोठडी आहे. किल्ल्याच्या आतमध्ये खूप उंच-उंच वृक्ष आहेत आणि बरीच फुलझाडेही आहेत. आम्ही भर पावसाळ्याच्या दिवसात तिथे गेल्यामुळे सगळीकडे हिरवळही होती. किल्ल्यामध्ये एके ठिकाणी एक खोल विवर होते. एखाद्या कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली असेल तर त्याचे हातपाय तोडून, त्याला त्या विवरामध्ये  ढकलून देत असत, असे शिहादने आम्हाला सांगितले. त्या काळी, पोर्तुगीजांनी या भागामधील स्थानिक लोकांवर अनन्वित अत्याचार केले. विवरामध्ये ढकलून मृत्युदंडाची शिक्षा देण्याची प्रथा ब्रिटिशांनी बंद केली असेही आम्हाला सांगितले गेले. 

किल्ल्याच्या आवारात एक 'Light and Sound show' चालू करण्याचे २०१५ साली ठरवण्यात आले होते. त्यासाठी किल्ल्यामध्ये जेंव्हा खोदकाम केले गेले, तेंव्हा जमिनीखाली गाडले गेलेले हजारो किलो वजनाचे तोफगोळे मिळाले. हजारो तोफगोळे बाहेर काढल्यावरही जमिनीखाली अजूनही बरेच तोफगोळे आहेत असे लक्षात आल्यामुळे शेवटी ते खोदकाम थांबवण्यात आले. ते सर्व तोफगोळे दोन खोल्यांमध्ये रचून ठेवले आहेत आणि खोल्यांच्या जाळीच्या दरवाज्यांना कुलूप लावलेले आहे. ती तोफगोळ्यांची रास आम्हाला शिहादने जाळीतूनच दाखवली. मी त्याचा फोटोही काढला.  

किल्ल्याच्या आवारात आम्ही एकूण तास-दीडतास होतो. त्यानंतर आम्ही अरक्कल म्युझियम आणि कण्णूरचा दीपस्तंभ बघण्यासाठी पुढे निघालो. 

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

६. मलाबारची सफर- 'सी शेल बीच होम'


नीलेश्वर बॅकवॉटर्सपासून आम्ही कण्णूरकडे साधारण चार वाजायच्या सुमारास गाडीत बसून निघालो. नकाशावर अंतर ७५ किलोमीटर दिसत होते. पण रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी झाली असल्याने, आम्हाला वाट वाकडी करून जावे लागले. दीड तासांत पोहोचू असे वाटले होते. पण वेळ लागू लागला. त्यामुळे वाटेत जरा 'पाय धुवायला' थांबलो. [हा वाक्प्रचार हल्ली फारसा वापरात नाही. 'फ्रेश होणे' या आजकाल मराठीत घुसलेल्या वाक्प्रचारामुळे असे अनेक जुने मराठी वाक्प्रचार वळचणीला जाऊन पडलेले आहेत!] तिथे आसपास कुठे चहा मिळतोय का, हे पाहायचा प्रयत्न श्री. नीलेश यांनी केला, पण चहा काही मिळाला नाही. दोन तास होत आले तरीही रिसॉर्ट न आल्याने सगळ्यांनाच जरा कंटाळल्यासारखे झाले होते. शेवटी साडेसहा वाजायच्या सुमारास 'सी शेल बीच होम' या रिसॉर्टला आम्ही पोहोंचलो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नींचे अगदी ऐनवेळी या सहलीला यायचे ठरल्यामुळे, त्या चौघांना 'सी शेल बीच होम' मध्ये जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांची सोय दुसऱ्या कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये केलेली होती. बेकलचा किल्ला बघून ते परस्पर तिकडे गेले.  

'सी शेल बीच होम' मधे आमच्या स्वागताची तयारी होती. बाहेरच एका मोठ्या टोपल्यात शहाळी घेऊन एक गडी बसलेला होता. त्याने सपासप शहाळी कापून आम्हाला सर्वांना दिली. शहाळ्याचे गोड पाणी पिऊन झाल्यावर त्याने आम्हाला आमच्या शहाळ्यांमधली 'पतली मलई' काढून दिली. शहाळ्यातले पाणी पिऊन आणि मलई खाऊन आमचा थकवा दूर पळाला. शहाळे बघितल्यावर, अनिरुद्धची, म्हणजे आमच्या मुलाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. अमेरिकेतून भारतात आल्याबरोबर आणि परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर पोहोचायच्या आधी तो आवर्जून शहाळे पितो. त्याची आठवण काढत मी दोन शहाळी प्यायले.   

'सी शेल बीच होम' हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या एका उंच कड्यावर आहे. आमच्या डोळ्यासमोर, पण जरा खालच्या पातळीवर समुद्र दिसत होता. समुद्राचा धीरगंभीर नाद इथल्या संपूर्ण वातावरणात भरून राहिलेला होताच पण एक सुखावह शांतताही जाणवत होती. रिसॉर्टचे बाह्य रूप अगदी साधे आहे. ज्या पर्यटकांना 'तथाकथित' पंचतारांकित सोयी हव्या असतात त्यांना कदाचित हे रिसॉर्ट फारसे आवडणार नाही. पण आम्हाला आवडते तशी स्वच्छ, शांत, कुठलाही भपका नसलेली ही जागा असल्याने आम्ही फारच खूष झालो. 'सी शेल बीच होम' मध्ये  राहायला आलेल्या पाहुण्यांना, 'Home away from home' असा अनुभव देण्यासाठी  रिसॉर्टचे मालक हरिस आणि त्यांचा मुलगा रोशन जातीने लक्ष घालत असतात. 

'सी शेल बीच होम' रिसॉर्टच्या आत आल्या-आल्या, अगदी समोरच एक समुद्राभिमुख झोपाळा आहे. जवळच, पन्नास-साठ माणसांना आरामात बसता येईल असे एक दालन आहे. त्यामध्ये एक छोटे स्टेजही आहे. एखादे घरगुती स्नेहसंमेलन आयोजित करण्यासाठी ही अगदी सुयोग्य जागा आहे. या बीच होम मध्ये एकूण १६ खोल्या आहेत. सर्व खोल्या वातानुकूलित आहेत. खालच्या मजल्यावरच्या खोल्यांच्या समोर व्हरांडा आहे तर वरच्या मजल्यावरच्या खोल्यांना बाल्कनी आहे. तिथे लाकडी बाक आणि मोठमोठाल्या आरामखुर्च्या ठेवलेल्या आहेत. कुठल्याही खोलीच्या बाहेर उभे राहिले की समोर अथांग समुद्र दिसतो! खालच्या मजल्यावर स्वयंपाकघर आहे. त्यासमोरच एका प्रशस्त मोकळ्या जागेमध्ये जेवणासाठी टेबल-खुर्च्या मांडलेल्या आहेत. या जागेवर छप्पर घातलेले असल्यामुळे, भर पावसामध्ये सुद्धा इथे बसता येते. या भागातून खाली समुद्राकडे जाण्यासाठी एक बांधलेला जिना आणि पायवाट आहे. पंधरा-वीस पायऱ्या आणि पायवाट उतरून गेले की आपण पुळणीवर पोहोचतो.  

आम्हाला खालच्या मजल्यावरच्या दोन खोल्या दिल्या होत्या. अंघोळ करून कपडे बदलून आम्ही मोकळ्या हवेवर बाहेर येऊन बसलो. तिथे एका कोपऱ्यामधले टेबल पकडून, तमाम समविचारी लोकांनी, निवांतपणे सुरापानाचा आस्वाद घेतला. जेवण लागेपर्यंत आम्ही सगळे, 'खारे' वारे खात, आरामात गप्पा मारत बसलो. आम्हा 'अनुभव'च्या सहप्रवाशांसाठी खास बुफे लावला होता. मलाबारी पराठेआणि साधे पराठे, पनीर मसाला, डाळ, कसलीशी भाजी, मटण स्ट्यू , तळलेले मासे, आणि फ्राईड चिकन आणि भात असा बेत होता. जेवणानंतर व्हॅनिला आईस्क्रीम होते. श्री. हरिस, प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत, स्वतः सगळ्यांना जेवण वाढत होते. त्यांना सांगून मी  दादांसाठी केळ्यांची शिकरण करून घेतली. सर्व खाद्यपदार्थांचे रूप आणि वास खूपच चांगला असल्याने, मला जेवायचा मोह होत होता, पण मी तो आवरला. दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे भूक कमीच होती आणि रात्री उशिरा बाहेरचे जेवण जेवल्यावर त्रास होईल की काय, अशी भीतीही वाटत होती. मी एक ग्लासभर गरमागरम दूध मात्र प्यायले. 

जेवण झाल्यानंतरही उशिरापर्यंत आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. नीलेश राजाध्यक्ष यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या, म्हणजे १४ ऑगस्टच्या, कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या. सात वाजता चहा मिळेल, नाश्ता आठ नंतर मिळेल, मधल्या वेळामध्ये कोणाला समुद्रावर फिरायला जायचे असेल तर जाऊन यायला हरकत नाही, असे सांगितले गेले. नाश्त्यानंतर सकाळी ९ वाजायच्या सुमारास 'फोर्ट सेंट अँजेलो' बघायला निघायचे आहे असेही सांगितले गेले. १४ ऑगस्टला आम्ही आणखी बऱ्याच छानछान जागांना भेट देणार होतो. 

सगळे झोपायला गेले तरीही मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी व्हरांडयातील आरामखुर्चीवर बसून सतत उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांकडे बघत बसले. माझ्या मनामध्येही अनेक विचार उसळत होते.  गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नींना आमच्याबरोबर या घरातला पाहुणचार घेता आला नाही याचे वाईट वाटत होते. आमच्या नातीला, म्हणजे नूरला इथे घेऊन आलो तर तिला किती आवडेल, असेही वाटले. जवळच्या सर्व आप्तांना या 'सी शेल बीच होम' मध्ये घेऊन यायचे , असा मनाशी निश्चय करून मी  खोलीमध्ये जाऊन निद्राधीन झाले.