शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

रक्ताचे नाते!

रक्ताचे नाते!

माझी आई, कै. सौ. वसुंधरा श्रीकृष्ण गोडबोले. तिचे माहेर खानदेशातल्या चाळीसगावचे. लग्न होऊन ती सासरी, म्हणजे माझ्या माहेरच्या सोलापूरच्या वाड्यात, १९५७ साली आली. जशी आली, तशी एकत्र कुटुंबातल्या धबडग्याला जुंपली गेली. आमच्या त्या मोठ्या वाड्यात, माझ्या काकांचीही कुटुंबे धरून आम्ही दहा-बारा माणसे एकत्र राहत होतो. माझे वडील वकील होते आणि त्यांचे ऑफिस घरातच होते. त्यामुळे सतत पक्षकारांचे येणे-जाणे घरी असायचे. आमचे जवळचे-लांबचे अनेक नातेवाईक बाहेरगावाहून येऊन आमच्या घरी उतरायचे. कधी कोणी कामानिमित्तही येत असत. कधी आत्या-मावश्या सहकुटुंब सुट्टीसाठी यायच्या, तर कधी कोणी पंढरपूर, गाणगापूर तुळजापूर, अक्कलकोटला जाऊन देवदर्शन करण्यासाठी यायचे. नात्या-गोत्यातला एखादा-दुसरा विद्यार्थी सोलापुरात शिकायला आल्याने आमच्याकडे राहिलेला असायचा. एकुणात काय, घरच्या दहा-बारा माणसांव्यतिरिक्त, बाहेरची दोन-चार माणसेही आमच्या वाड्यात मुक्कामाला असायचीच. त्यावेळी, घरात तिन्ही वेळा ताजा स्वयंपाक व्हायचा. तसेच मधल्या वेळच्या खाण्यासाठी चिवडा, चकल्या, लाडू वगैरे करणं असायचंच. वडिलांच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या पक्षकारांना चहा किंवा सरबत द्यायची पद्धत होती. या सगळ्यामुळे माझी आई सतत स्वयंपाकघरात राबत असायची. 

आमची आई अतिशय मोठ्या मनाची आणि कमालीची हौशी होती. दिवसभर सगळयांचे स्वयंपाक-पाणी अगदी उत्साहाने आणि हौसेने करायचीच, पण अनेक जबाबदाऱ्या ती स्वतःहून अंगावर घ्यायची. कुणाची काही अडचण आहे असे कळले की आई पदर खोचून पुढे असायची. आजारी माणसाजवळ रुग्णालयात बसणे असो, एखाद्या बाळंतिणीला चवीचे खाणे-पिणे पोहोचवणे असो, कोणाचे डोहाळजेवण असो, कोणाचे मूल सांभाळणे असो, किंवा कोणाचे बाळंतपण असो. त्या सगळ्यांना मदत करण्यात आई पुढे असायची.  

आम्ही लहान असताना, कधी-कधी आम्हा भावंडांना आईच्या या असल्या उद्योगांचा रागच यायचा. एखाद्या वेळेस मी आईवर चिडायचे. "तो अमुक तमुक, ना आपल्या नात्याचा-ना गोत्याचा. तुला कशाला गं सगळयांना मदत करायला हवी? आणि ओढून ओढून अंगावर ही कामं का घ्यायची? तू इतकी धावून मदत करतेस, भविष्यात ही माणसं  काय तुझ्या वेळेला उभी राहणार आहेत का? त्यावर आईचं नेहमीचं उत्तर ठरलेलं असायचं ,"स्वाती, आपण नेहमी आपलं मन मोठ्ठ ठेवावं. जमेल तिथे आणि जमेल त्याला, आपल्याला जमेल ती मदत करत राहावं. त्यात "समोरच्याचे आणि आपले रक्ताचे नाते आहे की नाही?" एवढाच कोता विचार करू नये. गरजवंताला मदत करत राहावं. ते त्याची परतफेड करतील की नाही याचाही विचार आपण करू नये. निरपेक्षपणे आपण इतरांना मदत करत राहिलो तर आपल्या वेळेला कोणी ना कुणीतरी उभे राहतंच. मग भले आपले आणि त्यांचे रक्ताचे नाते असो व नसो." 

आईचे हे बोलणे त्या काळात कधीच फारसे पटले नाही. पण, कोणी मदत मागितली किंवा कोणाला आपल्या मदतीची गरज आहे असे कळले की, पुढे होऊन, शक्य असेल ती मदत करायची, ही आईची शिकवण मात्र, नकळतच माझ्या रक्तात भिनत गेली.  

तिच्या शेवटच्या दिवसात आई माझ्या घरी पुण्यात होती. तिला वेळोवेळी, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. तिचे अखेरचे आजारपण १० मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२० इतका दीर्घ काळ टिकले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून करोना महामारीला काबूत ठेवण्यासाठी, संपूर्ण देशभर कडक लॉकडाऊनची घोषणा झाली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आईची तब्येत अधिकाधिक गंभीर होऊ लागली. तिला सेप्सीस झाले असल्याने रक्तस्राव होऊ लागला. तिला वरचेवर रक्त किंवा रक्तातील काही घटक देणे आवश्यक झाले होते. आईच्या शुश्रूषेसाठी माझा मुंबईचा भाऊ-वहिनीही पुण्यातच येऊन राहिले होते. आईसाठी आम्ही घरच्या सर्वानी रक्तदान केले. पण रक्तस्त्राव होतच राहिल्याने अजूनही अनेक बाटल्या रक्ताची आवश्यकता होती. कडक लॉकडाऊन आणि संचारबंदीमधे, आईसाठी रक्तदाते कुठून मिळवायचे? या चिंतेत आम्ही होतो. पण काहीतरी प्रयत्न करणे आवश्यक होते. 

दवाखान्यातल्या आणि शहरातल्या रक्तपेढ्यांमध्ये सरसकट रक्तदान होत नसल्याने रक्त, आणि प्लाझ्मा किंवा प्लेटलेट्स अशा रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा होता. त्यामुळे ते विकत घेणेही शक्य नव्हते. आम्ही सर्वानी नुकतेच रक्तदान केल्यामुळे, इच्छा असूनही, आम्हाला पुन्हा रक्त देता येत नव्हते. शेवटी हवालदिल होऊन, आम्ही मित्र-आप्त यांच्या व्हॉटसऍप ग्रुपवर रक्तदानाचे आवाहन केले. तसेच, आमचा संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची विनंतीही त्या सर्वांना केली. पण, त्यावेळची सगळी परिस्थिती लक्षात घेता, स्वतःचा जीव धोक्यात घालून, पोलिसांकडून पास काढण्याची तसदी घेऊन, कोणी रक्तदाते पुढे येण्याबाबत आम्ही साशंकच होतो.  

पुढच्या काही दिवसात मात्र कमालच झाली. ओळखीतल्या अनेक लोकांनी पुढे येऊन माझ्या आईसाठी रक्तदान केले. आमचा मित्र, निशिकांत भोमे याचे कुटुंबीय, आणि आमचे स्नेही श्री. संजय कणेकर यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ती यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. अनेक मित्र-मैत्रिणींनी आमचे आवाहन त्यांच्या ग्रुप्सवर पुढे पाठवल्यामुळे चारही बाजूने मदतीचा ओघ सुरु झाला. श्री. संजय नायडू हे नवनाथ, सोमनाथ आणि सूर्या, या आपल्या सहकाऱ्यांसह त्वरित येऊन रक्तदान करून गेले. संजय नायडू आणि त्यांच्या या मित्ररिवाराशी माझी साधी तोंडओळखही नव्हती, हे विशेष. अशा कित्येक अनोळखी व्यक्ती येऊन रक्त देऊन गेल्या. कडक लॉकडाऊनमध्ये आणि करोनासारख्या जीवघेण्या महामारीचे सावट असतानाही, माणुसकीचा आलेला हा पूर पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. 

दहा-बारा रक्तदाते येऊन रक्तदान करून गेल्यानंतरही आईसाठी अजून रक्तदाते हवेच होते. याच सुमारास माझा मित्र श्री. नृसिंह मित्रगोत्री यांने 'रक्ताचे नाते' नावाच्या सेवाभावी संस्थेच्या श्री. रामभाऊ बांगड यांचा दूरध्वनी क्रमांक मला पाठवला. श्री. बांगड यांच्याशी मी बोलले. काही वेळातच, ते  स्वतःबरोबर एका रक्तदात्याला आईसाठी रक्तदान करायला घेऊन आले. "कितीही बाटल्या रक्त लागले तरीही मी ते पुरवीन, तुम्ही काळजी करू नका" असा दिलासा मला देऊन गेले. 'रक्ताचे नाते' या संस्थेबद्दलची माहिती त्यांच्या वेबसाईटवर वाचता येईल.  http://www.raktachenate.org/AboutUs/About-Raktache-Nate-Charitable-Trust

३० एप्रिल २०२० ला माझ्या आईने देहत्याग केला. पण जाता-जाता, 'रक्ताच्या नात्याची' अनेक माणसे ती  आमच्यासोबत जोडून गेली!

"रक्ताचे नाते असो व नसो, आपल्याला शक्य असेल त्या परीने, निरपेक्षपणे आपण इतरांना मदत करावी, आपल्या वेळेला कोणी ना कोणीतरी उभे राहतेच," हा तिचा विश्वास किती खरा होता, ते आमच्या आणि तिच्याही नकळत, ती आम्हाला दाखवून गेली. 

आईच्या आजारपणात आमच्याशी 'रक्ताचे नाते' जुळलेल्या, या अनेक अनोळखी, अनामिक रक्तदात्यांमुळे अगदी निरपेक्षपणे इतरांच्या वेळेला उभे राहण्याची प्रेरणा मला मिळाली. 



गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

गुरुवंदना!

गुरुवंदना!

डॉ. सौ. स्वाती बापट 

यावर्षी, करोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर कधीतरी, बहुतेक मे-जून महिन्यात, श्री. संजय रानडे या मला अपरिचित असलेल्या व्यक्तीने, माझ्याशी फेसबुक मेसेंजरवर संपर्क साधला. मी लिहिलेले काही ब्लॉग्ज त्यांनी वाचले होते. माझे लेखन त्यांना आवडले. फेसबुकवर माझ्याबद्दलची माहिती वाचल्यामुळे मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशाला, किंवा ह. दे. प्रशालेची विद्यार्थिनी आहे, हे त्यांना कळले. ते स्वतःदेखील ह.दे. प्रशालेचे माजी विद्यार्थी असल्याने माझ्याशी काहीही ओळख नसताना, बिनदिक्कतपणे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मलाही त्यात काही गैर वाटले नाही कारण ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, हे मोठे आपुलकीचे नाते होते. पुढे माझी आणि त्यांची फोनवर बरीच चर्चा झाली. 

आपल्या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या शतकभराच्या काळात, शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांच्या आठवणी आजी-माजी विद्यार्थ्यांकडून लिहून घ्याव्यात आणि त्याचे एक पुस्तक छापावे, ही श्री. रानडेंची कल्पना मला फारच आवडली. ह दे प्रशालेत शिकलेल्या माझ्या आप्तेष्टांना त्यांच्या शिक्षकांच्या आठवणी लिहून काढण्याची विनंती मी केली. हे पुस्तक खरोखरीच छापले जाईल की नाही याबाबत मी स्वतःच साशंक होते. पण, "हाती घ्याल ते तडीस न्या" हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य, श्री. संजय रानड्यांनी प्रत्यक्षात उतरवले. त्यासाठी त्यांनी, व्हॉट्सअपवर सर्व माजी विद्यार्थ्यांना वरचेवर निरोप पाठवले. लेख लिहू शकतील अशा प्रत्येक व्यक्तीशी ते आवर्जून बोलले व सगळ्या गोष्टींचा अगदी योग्य पद्धतीने पाठपुरावा केला हे विशेष. 

आपल्या जडणघडणीत शालेय शिक्षणाचे महत्व खूपच असते. शाळेतल्या एकूण वातावरणाचा आपल्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर, नकळत पण फार खोलवर परिणाम होत असतो. तसा सकारात्मक परिणाम माझ्यावरही झाला. पहिली ते चौथी मी सोलापुरातच नूमवि प्राथमिक शाळेत शिकले होते. शि. प्र. मंडळी, पुणे, या संस्थेच्या, नूमवि आणि ह दे प्रशाला या दोन्ही शाळा एकाच आवारात होत्या. आमच्या नूमवि शाळेतून ह दे प्रशालेची भव्य इमारत दिसायची. आमच्या एकत्र कुटूंबातील माझ्यापेक्षा मोठी सर्व भावंडे ह दे प्रशालेतच शिकत असल्याने, मी पाचवीत जाण्याच्याही आधी कधीतरी, त्यांच्याबरोबर ह दे प्रशालेत गेलेले आठवते आहे. भावंडांप्रमाणे मीदेखील ह दे प्रशालेतच जाणार हे जणू ठरलेलेच होते. त्यामुळे मोठ्या शाळेत जाण्याचे दडपण वगैरे नव्हते. 

ह दे प्रशालेत अनेक चांगले शिक्षक व सोयी-सुविधा होत्या. शाळेचे वाचनालय आणि प्रयोगशाळा या दोन गोष्टी विशेष होत्या. विविध विषयांच्या अनेक पुस्तकांनी सुसज्ज असे वाचनालय पूर्णपणे भोमे सरांच्या ताब्यात होते. वाचनालयात भोमे सरांची कडक शिस्त दिसून यायची. सगळी पुस्तके विषयवार लावून ठेवलेली असत. शाळेच्या वेळापत्रकातच वाचनाचा एक तास असायचा. त्या तासाला आमच्यापैकी कोणीतरी वाचनालयात जाऊन पुस्तकांनी भरलेली एक पेटी वर्गात आणायचा. त्यातलेच एखादे पुस्तक त्या तासात आम्ही वाचायचो. त्या पेटीत फारशी काही धड पुस्तके नसायची. तरीही आमच्या हाताला लागेल ते आम्ही आनंदाने वाचायचो. पुस्तकाची पेटी घ्यायला गेलो की,"पुस्तके नीट वापरा. फाडू नका" अशी दटावणी भोमे सर त्यांच्या करड्या आवाजात करायचे. त्यामुळे, सुरुवातीला काही काळ भोमे सरांची खूपच भीती वाटायची व त्यांचा रागही यायचा. दर शनिवारी, शाळेच्या वाचनालयातून काही पुस्तके आम्हाला घरी नेता येत असत. मी सातत्याने वाचनालयातून पुस्तके घरी नेऊन वाचत असे. मी ती पुस्तके व्यवस्थितपणे हाताळायचे आणि वाचून झाली की वेळेत परत करायचे. त्यामुळे हळू-हळू भोमे सरांची आणि माझी ओळख झाली. वाचनात रमणाऱ्या आणि पुस्तके जपून वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना भोमे सर चांगली पुस्तके आवर्जून काढून देत असत. एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट विषयाची गोडी लागल्याचे लक्षात आल्यास, त्याच्या वयानुसार योग्य अशी, त्या-त्या विषयाची पुस्तके सुचवणे, हे भोमे सरांचे वैशिष्ट्य होते. काही वर्षांपूर्वी, मी भोमे सरांच्या घरी गेले होते. त्यावेळी, आम्हा विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवल्याबाबत त्यांचे आभार मानायचे राहून गेले याची खंत वाटते. आज भोमे सर हयात नाहीत. पण मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन.  

शास्त्र आणि गणित या विषयांची गोडी मला कुमठेकर सरांमुळे लागली. हे दोन्ही विषय शिकवताना, तर्कशुद्ध विचार कसा करायचा हे कुमठेकर सर सांगत. त्यांचे बोलणे अतिशय सडेतोड होते. गणित हा त्यांचा हातखंडा विषय होता. पण त्याचबरोबर त्यांचे अवांतर वाचनदेखील दांडगे होते. त्यामुळे, एखाद्या ऑफ तासाला ते आमच्या वर्गावर आले की, इंग्रजी भाषेतल्या काही सुरस कथा, विशेषतः काल्पनिक विज्ञानकथा, आम्हाला मराठीतून ऐकवायचे. त्या ऐकल्यामुळे पुढे इंग्रजी कथा-कादंबऱ्या वाचायची गोडी लागली. Science आणि pseudoscience यामध्ये फरक कसा करावा, अंधश्रद्धांना दूर कसे ठेवावे  आणि शास्त्रशुद्ध विचार कसा करावा, ही कुमठेकर सरांची शिकवण, मला आयुष्यभर पुरलेली फार मोठी देणगी आहे. कुमठेकर सरांमुळेच गणित व शास्त्रविषयांची गोडी मला लागली आणि मी आणि पुढे शास्त्रशाखेकडे वळले.

शाळा-कॉलेजातल्या मुलांच्या आत्महत्या हा आज एक मोठा सामाजिक प्रश्न होऊन बसला आहे. कदाचित आमच्या काळातही थोडाफार असेलच. त्याविषयी कुमठेकर सर एका विशिष्ट पद्धतीने आमचे प्रबोधन करायचे. ते म्हणायचे, "एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून जीव द्यावा इतका काही तुमचा जीव स्वस्त नाहीये. उगीच जीव द्यायची भाषा कोणीही करू नये." 'Failure is the key to success' अशी काही वाक्येही ते ऐकवायचे. पुढे म्हणायचे, "त्यातून कोणाला जीव द्यावासा वाटत असेल तर मला सांगा. मी तुम्हाला मदत करेन." अर्थातच हे उपरोधात्मक बोलणे होते हे आम्हाला कळायचे आणि त्यांच्या बोलण्याच्या त्या विशिष्ट शैलीची गंमतही वाटायची. परंतु, कुठलेही संकट आले तरीही निराश होणे, जीव देणे, हे किती अयोग्य आहे हे त्यांनी आम्हा सर्वांच्या बालमनावर चांगलेच बिंबवले. सरांच्या आवाजात आणि एकूणच व्यक्तिमत्वात एक गोडवा होता. त्यामुळे गणित आणि भौतिकशास्त्र असे 'कठीण' समजले जाणारे विषय शिकवत असले तरीही कुमठेकर सर आम्हा विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके होते. 

गणित आणि भौतिकशास्त्र या विषयाची गोडी मला लागली होती, पण जीवशास्र मात्र मला फारसे आवडत नसे. आम्ही नववी-दहावीच्या वर्गात आल्यावर, त्यावेळी अगदीच पोरसवदा वाटणारे श्री. भास्कर कानडे सर आम्हाला जीवशास्त्र शिकवायला आले. ते नवीनच नोकरीला लागलेले होते. आमचा वर्ग म्हणजे हुशार मुला-मुलींचा वर्ग होता. पण त्या वयात जितपत वात्रट असावे तेवढे आम्हीही होतोच. शाळेत आलेल्या नवीन शिक्षकांना 'सळो की पळो' करून सोडण्याची रणनीती जणू ठरलेलीच असायची. कानडे सरांनाही सुरुवातीला आमच्या वर्गाने खूप त्रास दिला. पण आमच्या गोंधळाकडे लक्ष न देता, ते चिकाटीने आणि अक्षरशः जीव ओतून, जीवशास्त्र शिकवत राहिले!कानडे सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे हळूहळू मला जीवशास्त्रातही गोडी निर्माण झाली. बारावीत गेल्यावर आमच्या लक्षात आले की, 'Cell' ची संकल्पना त्यांनी आम्हाला किती छान समजावून दिली होती. सेवानिवृत्तीनंतर, वयाच्या सत्तरीमध्ये, कानडे सर एल.एल.बी. झाले. वकिलीतले डावपेच शिकायला आणि कोर्ट केसेसवर चर्चा करायला ते माझ्या वडिलांकडे येऊ लागले. मी सोलापूरला माहेरी गेले की अजूनही त्यांची भेट होते. सत्तरीतले कानडे सर वकिली विषयातली मोठी-मोठी पुस्तके मन लावून वाचताना बघून, मला त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे खूप कौतुक वाटते. ते भेटले की त्यांना मी आवर्जून त्यांच्या शिकवण्याबद्दल सांगते आणि त्यांचे आभार मानते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे त्यांनाही खूप बरे वाटत असावे. 

आपल्या शाळेतल्या मराठीच्या शिक्षिका, आगरकर बाई आणि माझी चुलत आत्या, सौ. सुलभा पिशवीकर या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी होत्या. त्यामुळे आगरकर बाईंचे आमच्या घरी खूप वर्षांपासून येणे-जाणे होते. आम्ही मुले त्यांना घरी 'पुष्पाआत्या' अश्या नावानेच हाक मारायचो. पण शाळेमध्ये आम्ही त्यांच्याशी सलगी दाखवलेली त्यांना मुळीच चालत नसे. आमचा आणि त्यांचा घरोबा आहे म्हणून आम्हा भावंडाना त्यांनी कधी झुकते माप दिलेले आठवत नाही. आगरकर बाईंचे केस खूपच लांब होते. त्यावेळी आम्हा मुलींच्या दृष्टीने तो एक कौतुकाचा विषय असायचा. बाई अतिशय शिस्तप्रिय होत्या आणि एक शिक्षिका म्हणून त्यांचे आचरण अगदी 'आदर्श' म्हणावे असेच होते. 

आमच्या आधीच्या बॅचपर्यंत, इयत्ता नववी-दहावीच्या मुलींना, गणवेशाच्या स्कर्ट-ब्लाऊज ऐवजी, निळी साडी नेसावी लागे. त्याचप्रमाणे, नववी-दहावीच्या मुलांनी फुलपँट घालावी असा नियम होता. तसे पाहता, चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात, या नियमात गैर वाटण्यासारखे काहीच नव्हते. पण  मला आणि आमच्या तुकडीतील इतर मुलींना ते पसंत नव्हते. "आपण गणवेश म्हणून साडी नेसायची नाही" अश्या निर्धाराने, आम्ही काही समविचारी मुलींनी याबाबत आवाज उठवायचे ठरवले. आमच्या या मागणीला अध्यापकबाई, आगरकर बाई आणि इतरही अनेक शिक्षक-शिक्षिकांचा विरोध होणार होता याची आम्हाला कल्पना होती. 

एके दिवशी, अध्यापक बाई रजेवर असताना, मुख्याध्यापक  श्री. ग य दीक्षित सरांना आम्ही चक्क जिन्यातच घेराव घातला! आम्ही शाळेत सायकलने येत-जात असल्याने साडी नेसणे आम्हाला कसे गैरसोयीचे आहे हे सांगितले. "तुम्ही मुले-मुली आता मोठी झालेला आहेत. पूर्ण अंगभर पोशाख असणे आवश्यक आहे", असे समजावण्याचा सरांनी प्रयत्न केला. परंतु, "साडी नेसल्यावर पोटाचा आणि पाठीचा काही भाग उघडा राहतो" असा प्रतिवाद आम्ही केला. शेवटी तोडगा म्हणून, साडीऐवजी पायघोळ परकर किंवा मॅक्सी वापरण्याची परवानगी आम्ही सरांकडून मिळवलीच! अशा रीतीने, १९७८ च्या बॅचच्या आमच्या तुकडीतील सर्व मुलींनी साडीऐवजी मॅक्सीच वापरली. गंमत म्हणजे, आमच्या बॅचच्या इतर तुकड्यांमधल्या मुलींना मात्र साडीच नेसावी लागली! अध्यापकबाईंच्या गैरहजेरीत आम्ही केलेल्या या आगाऊपणामुळे त्या आम्हाला खूप रागावल्या होत्या हे आठवते. आगरकर बाईंनी तर घरी येऊन माझी चांगली खरडपट्टी केली होती. परंतु पुढे त्यांनी तो राग कधीच मनात ठेवला नाही. आजदेखील कधीही फोन केला तरी आगरकर बाई अगदी आपुलकीने बोलतात हे विशेष!

आगरकर बाई, पुजारी बाई, लता कुलकर्णी बाई आणि तपस्वी सर हे चौघेही मराठी विषय फार छान शिकवायचे. विटकरबाई आणि अयाचित सर संस्कृत उत्तम शिकवायचे. शाळेत शिकलेली संस्कृत सुभाषिते आजही मला पाठ आहेत. खरे पाहता, आमची इंग्रजी मीडियमची आणि हुशार मुला-मुलींची तुकडी होती. पण काही कारणांमुळे, आम्ही दहावीच्या वर्गात येईपर्यंत, आम्हा सर्वांचाच इंग्रजी विषय खूपच कच्चा राहिला होता. सुदैवाने, दहावीत अध्यापक बाई आम्हाला इंग्रजी शिकवायला आल्या. आमच्या इंग्रजी भाषेची दुःखद स्थिती पहिल्या एक-दोन तासातच त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आमच्या वर्गासाठी इंग्रजीचा जादा तास घेणे सुरु केले. शाळा भरण्याआधी तासभर त्या आम्हाला शिकवायच्या. साधी-सोपी इंग्रजी वाक्यरचना कशी करायची ते अध्यापक बाईंनी छान समजावून दिले. आमचे इंग्रजी व्याकरणही पक्के झाले. मुख्य म्हणजे, इंग्रजी भाषेबद्दलची भीती निघून गेली. पुढील आयुष्यात याचा खूप उपयोग झाला. तसे पाहता, संस्कृतव्यतिरिक्त इतर भाषा विषयांत मला फारसा रस नव्हता. परंतु, शाळेत माझ्या नकळत, माझ्यावर भाषेचे संस्कार झाले असावेत. त्यामुळेच आज मी चार-पाच वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने ब्लॉग लिहिते. शाळेमध्ये भाषा विषयांत फारशी गति नसलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थिनीचे लेखन आवडल्यामुळे श्री. रानड्यांनी माझ्याशी संपर्क साधला, हे विशेष. 

कमालीच्या उत्साही काळे बाई, मिश्किल स्वभावाचे रंगनाथ जोशी आणि अबोल असे कोरवलीकर हे दोघेही चित्रकलेचे सर, अतिशय सज्जन वृत्तीचे सारोळकर सर, गायनशिक्षक पंचवाडकर सर, बोलघेवड्या पाळंदेबाई, सुस्वभावी सारोळकरबाई,  कडक शिस्तीचे खांबेटे सर आणि कांबळे सर , टी डी  कुलकर्णी सर, जेऊरकर सर, मोहोळकर सर, बेणारे बाई, निफाडकर बाई, ही यादी खूप मोठी आहे. शाळेतल्या काही थोड्याच शिक्षकांच्या आठवणी मी लिहिल्या असल्या तरी, अनेक शिक्षक-शिक्षिकांना माझ्या मनात मानाचे स्थान आहे. या सर्व गुरूंमुळे आम्ही घडलो. या लेखाच्या रूपाने त्या सर्व गुरूंना मी वंदन करते.  




सोमवार, १३ जुलै, २०२०

पासष्ठावी कला

आपल्या पूर्वजांनी, चौषष्ठ कला आणि चौदा विद्यांबद्दल लिहून ठेवलेले आहे. सहज म्हणून ती यादी वाचली, तर त्यात काही कलांचा उल्लेख करायचे राहून गेले आहे असे वाटते. त्यापैकी एक कला म्हणजे घासाघीस करण्याची कला!




काही कला आपण केवळ निरीक्षणाने शिकतो. तशीच, घासाघीस करण्याची कला मला माझ्या आईचे निरीक्षण करता-करता अवगत झाली असावी. घरामध्ये कामाला नवी मोलकरीण ठेवणे असो, बाजारहाट करणे असो किंवा बोहारीणीशी सौदा करणे असो, अनेक ठिकाणी आई तिची ती कला मनसोक्तपणे वापरायची. नवीन मोलकरीण नेमताना, तिच्या  कामाचे तास, यायची वेळ, ती काय-काय कामे करणार याचे तपशील आणि तिचा पगार या सर्व मुद्द्यांवर भरपूर घासाघीस व्हायची. मोलकरीणही घासाघीस करण्यांत तरबेज असायची. शेवटी, त्या  मोलकरणीला पटवल्यानंतर आई मनोमन खूष असायची. पण सांगायची गंमत म्हणजे, त्या बाईने दोन चार महिने चांगले काम केले की तिच्या महिन्याच्या पगारापेक्षा दुप्पट पैसे आईने तिला अंगावर दिलेले असायचे. 

"आई, तिला कामावर ठेवताना तिच्याशी पगारासाठी किती वेळ घासाघीस केली होतीस. मग आता तिला अंगावर इतके पैसे का दिले आहेस ? असे मी आईला विचारायचे.

त्यावर आईचे ठरलेले उत्तर असायचे, "तिची बिचारीची फारच आबदा होतेय गं. नवरा दारुडा, काही कमवत तर नाहीच उलट हिच्याकडचे पैसेच काढून घेतो. तिची लहान-लहान मुले आहेत. त्यांना दोन वेळचे पोटाला तरी मिळायला नको का? म्हणून मी पैसे दिलेत. तिच्या पगारातून ती फेडेल हळू-हळू. "  

घासाघीस करून, चांगली मोलकरीण मिळवल्याचा आनंद आईला आधीच मिळालेला असायचा. आता, तिने दिलेल्या जास्तीच्या पैशांमुळे, त्या बाईच्या मुलांच्या पोटात अन्न जातेय, याचेही तिला अपार समाधान मिळत असायचे. मोलकरणीच्या अंगावर दिलेले पैसे तिने फेडावेत यासाठी आई तिच्यामागे कधी फारसा तगादाही लावायची नाही. 

आईबरोबर खरेदीला गेले की आई सगळ्या वस्तू छान भाव करून मगच घ्यायची. वस्तूची प्रत बघून त्यामानाने त्या-त्या वस्तूला किती किंमत द्यावी, उत्तम प्रतीची वस्तू योग्य भावात कशी विकत घ्यावी, हे मी आईकडे बघून-बघूनच शिकले. कधीकधी मात्र, आई अगदी छोट्या खरेदीतही फार वेळ घासाघीस करायची. तिच्या मनासारखा सौदा झाला नाही की ती वस्तू खरेदी करण्याचा बेतच रद्द करायची. आम्हाला हव्या असलेल्या वस्तूसाठी असे होताना दिसले की, आपल्याला ती वस्तू मिळणार नाही की काय, असे वाटून आमचा धीर सुटू लागायचा. आमच्या लहानपणी एकदा, दारावर डहाळ्याच्या पेंड्या विकायला आलेल्या बाईबरोबर, आई बराच वेळ घासाघीस करत होती. ती बाई चार आण्याला चार पेंड्या असा भाव सांगत होती तर आई चार आण्याला सहा पेंड्या दे म्हणत होती. थोड्याच वेळात, आईने त्या बाईकडून चार आण्याला पाच पेंड्या मिळवल्या असत्या. पण जास्त वेळ घासाघीस चाललेली बघून, आता आपल्याला डहाळे मिळणारच नाहीत, असे वाटल्यामुळे माझा मोठा भाऊ, जयंत जाम वैतागून त्या बाईला म्हणाला, "तुला चार आण्याला चार पेंड्या द्यायच्या असतील तर दे नाहीतर आम्ही दुसरीकडून घेऊ" 

आईने डोक्याला हात लावून घेतला. नाईलाजाने त्या बाईकडून तिने चार आण्याला चार पेंड्या विकत घेतल्या. नंतर मात्र तिने जयंतची चांगलीच कानउघडणी केली. घासाघीस करताना आपण कधीही घायकुतीला येऊ नये, आणि आपल्यापैकी कोणी एकजण घासघीस करत असेल तर दुसऱ्या कोणीही पडते घेऊ नये,  याचा धडा तिने आम्हाला दिला. 

एखाद्या दिवशी दुपारी घरी बोहारीण यायची. आईची आणि त्या बोहारणीची, घासाघीस करण्याची जणू जुगलबंदीच चालायची. ती जुगलबंदी ऐकताना आणि बघताना आम्हा मुलांचे दोन-अडीच तास आनंदात निघून जायचे. या दोन्ही कलाकारांनी आपापली कला यावेळी अगदी पणाला लावलेली असायची. अर्थात तो सामना बरोबरीतच सुटायचा. या असल्या अनेक प्रसंगांची साक्षीदार राहिल्यामुळे हळूहळू मला ही कला अवगत झाली असावी. पण माझे लग्न होईपर्यंत, ती कला वापरायची संधी मला फारशी कधी मिळाली नव्हती. 

आमच्या लग्नानंतर लगेच, आम्ही मध्यप्रदेशमध्ये महू येथे राहत होतो. कॉलेजकुमार असलेला माझा लहान भाऊ गिरीश, उन्हाळ्याच्या सुटीत, आमच्या घरी काही दिवसांसाठी राहायला आला होता. पीटी आणि गेम्स परेडमध्ये घालण्यासाठी, आनंदला नवीन पांढऱ्या पँट्सची त्यावेळी गरज होती. पॅंटपीस आणि इतरही काही खरेदी करायला आम्ही तिघेही महूपासून जवळच असलेल्या इंदौर शहरातील तुकोजी मार्केटमध्ये गेलो. तिथे भरपूर घासाघीस करावी लागते, हे माझ्या काही मैत्रिणींकडून मला आधीच कळले होते. आईकडून अवगत झालेली कला वापरण्याची संधी मला मिळणार, या विचाराने मी हुरळून गेले. सगळ्या वस्तूंचा भाव मी करेन, तुम्ही दोघांनी मधे काहीही बोलायचे नाही अशी तंबी मी, आनंदला आणि गिरीशला, घरून निघतानाच देऊन ठेवली होती. 

तुकोजी मार्केटमधल्या एका फिरत्या विक्रेत्याने, एका पॅंटपीसची किंमत ११० रुपये सांगितली. मी कापड पाहिले, त्याची रास्त किंमत काय द्यायला हवी याचा मनोमन अंदाज बांधला आणि, त्या पँटपीसचे मी फक्त पन्नास रुपये देईन असे त्याला सांगितले. मी अर्ध्याहून कमी किंमत सांगितल्यावर, मी काहीतरीच बोलले आहे असे गिरीश आणि आनंदला वाटले. त्यातून त्या माणसाने, "मेडमजी, आपको पचास रुपयेही देना है तो साहब के लिये पॅंटका कपडा क्यूँ खरीद रहीं हैं? आप पैजामा का कपडा देखिये ना। आपके बजेटमें केवल पैजामेका ही कपडा मिलेगा" असे बोलून माझी लाज काढली. ते ऐकल्यावर तर आनंदला आणि गिरीशला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्या दोघांनी, मला तिकडून जवळजवळ ओढतच पुढे नेले. मी किती मूर्खपणा केलाय, माझ्यामुळे त्यांना हे असले बोलणे ऐकावे लागले, असे बरेच काही त्यांनी मला सुनवले.  

"११० रुपयाचा पॅंटपीस फार-फार तर तो १०० रुपयात देईल. पण तू पन्नासला मागितलास. तो कसा देईल? त्याने आपली किती लाज काढली ऐकलंस ना? आता यापुढे खरेदी करताना तू बोलायचे नाहीस. आम्ही व्यवस्थित भाव ठरवू" 

पण माझ्या कलेवरचा माझा विश्वास दृढ असल्याने, मी शांतपणे त्या दोघांचे बोलणे ऐकत होते. गंमत म्हणजे, थोड्या वेळात तो विक्रेता आमच्या मागे-मागे येऊन ९० रुपये तरी द्या, ८० रुपये तरी द्या असे म्हणू लागला. आतातरी तो पॅंटपीस मी विकत घेऊन टाकावा असे आनंद आणि गिरीशचे मत होते. पण मी मात्र पन्नास रुपये देणार यावर ठाम होते. त्यामुळे, पुन्हा त्या दोघांनी  मला टोमणे मारायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, मी त्या विक्रेत्याशी बोलणे चालू ठेवले. शेवटी, त्याने तो पॅंटपीस मला ५५ रुपयाला दिला. माझ्या कलेचा विजय झाल्यामुळे मी खुश झाले होते. आनंदची आणि माझ्या हुशार भावाची चांगलीच जिरल्यामुळे त्या दोघांचीही तोंडे बंद झाली होती. त्यावेळेपासूनच, गिरीश माझा पाठचा भाऊ असूनही मला पाठिंबा न देता, माझी चेष्टा करण्यासाठी आनंदच्या पक्षात जाऊन मिळालेला आहे, असे मला वाटते .  

१९९२-९६ या काळात आम्ही अलाहाबादला होतो. एके दिवशी, आम्ही प्रथमच गंगा-यमुना आणि सरस्वतीचा संगम बघायला गेलो. संगम बघण्यासाठी, नावेत बसून नदीच्या पात्रात बरेच आत जावे लागते. अलाहाबादच्या घाटावर नावाड्यांपैकीच काही पोरे, संगम बघायला आलेल्या आमच्यासारख्या पर्यटकांना, "आता संगमावर जाणारी ही शेवटचीच नाव आहे, ती काही मिनिटातच सुटणार आहे, तीही आता जवळजवळ भरत आली आहे, तुम्हाला जागा हवी असेल तर माणशी १५० रुपये द्या आणि पटापट चला, नाहीतर इथपर्यंत येऊन संगम बघायला मिळणार नाही", असे बोलून खूपच घाई करत होते. ते फार जास्त पैसे मागत आहेत याचा अंदाज प्रत्येकालाच आलेला होता. काही पर्यटक थोडीफार घासाघीस करत, माणशी १०० रुपये देऊन नावेत बसायला तयार होत होते. त्या सर्व लोंकांपेक्षा आपल्याला कमी पैसे पडले पाहिजेत असे मनाशी ठरवून मी त्या नावाड्यांशी बराच वेळ घासाघीस केली. पण ते काही केल्या तयार होत नव्हते. आमच्यासमोर पंचवीस-एक लोक माणशी १०० रुपये देऊन नावेकडे गेलेही. आता नाव सुटेल आणि आपल्याला आज संगम बघायला मिळणार नाही, असेही आम्हाला वाटू लागले. 

मी मोठ्या संयमाने घासाघीस करत राहिले. शेवटी, मी अजिबात बधणार नाही हे लक्षात आल्यावर, ते नावाडी माणशी ५० रुपयांवर तयार झाले. घासाघीस करण्याच्या कलेतल्या माझ्या नैपुण्यामुळेच आपल्याला रास्त भाव मिळाला या आनंदात आम्ही नावेमधे जाऊन बसलो. आता काही मिनिटातच नाव संगमाकडे जायला निघणार, असा आमचा समज करून दिला गेलेला होता. पण प्रत्यक्षात, पुढचा अर्धा-पाऊण तास, ती नाव तिथून हलली नाही. नाव फक्त अर्धीच भरलेली होती. हळूहळू करत, आमच्यानंतरही अनेक पर्यटक येतच राहिले. बऱ्याच वेळानंतर नाव भरली आणि आम्ही संगम बघायला नदीच्या पात्रात निघालो. आपल्यानंतर आलेल्यांकडून नावाड्यांनी किती पैसे घेतले असावेत, हे जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा झाली. आमच्यानंतर शेवटी-शेवटी आलेल्या लोकांनी माणशी १० रुपये आणि शेवटच्या दोघा-तिघांनी तर केवळ ५ रुपये देऊ केल्याचे मला कळले. त्यामुळे, घासाघीस करण्याच्या कलेची मला अजून बरीच साधना करायला हवी, हे मला कळून चुकले. तसेच कोणत्याही कलाकाराला आपल्या कलेचा गर्व वाटू लागला तर मात्र गर्वहरण होतेच, हे मला कळले. 

मला अवगत झालेली ही कला, आजपर्यंत गेली अनेक वर्षे, ठिकठिकाणी वापरून त्यामधून मी कमालीचा आनंद मिळवलेला आहे. जिथे घासाघीस करायला मिळणारच नाही अशा ठिकाणी खरेदी करायला मला फारसे आवडत नाही. त्यामुळे, सेलमध्ये, मॉलमध्ये, 'एकच फिक्स्ड रेट' असलेल्या दुकानांमधून, खरेदी करायला मी जातच नाही. परदेशातही खरेदी करण्यात मला फारशी मजा येत नाही. नाही म्हणायला, उझबेकिस्तानमध्ये वस्तू खरेदी करताना घासाघीस करण्याचा आनंद मला मिळाला. अमेरिकेत 'क्रेग्स लिस्ट' वरून काही गोष्टी खरेदी करताना, थोडीफार 'ऑनलाईन' घासाघीस करता आली, पण त्यात फारशी मजा आली नाही.  

कुठेही घासाघीस करायची वेळ आली की आजही आनंद माझ्या कलेला, 'मोठ्या मनाने',  मुक्त वाव देतो. यात त्याचे अनेक हेतू साध्य होतात. एकतर त्याला स्वतःला कधी घासाघीस करावी लागत नाही. दुसरे म्हणजे, त्याने घासाघीस करून विकत आणलेली वस्तू, "यापेक्षा कशी स्वस्त मिळायला पाहिजे होती", किंवा "याच भावांत जास्त चांगल्या दर्जाची मिळायला हवी होती", अशी माझी बोलणी त्याला ऐकावी लागत नाहीत. घासाघीस करून मी चांगला भाव मिळवते याबाबत तो माझे नेहमीच तोंड भरून कौतुक करतो. पण, एखाद्यावेळी माझी फजिती झालीच, तर गिरीशसोबत माझी चेष्टा करायला त्याला एक चांगला विषय मिळतो आणि ती संधी ते दोघेही सोडत नाहीत !

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

माझं 'काळं' पोर!

आमच्या घरी, आनंदला आणि आमच्या मुलांना कुत्री आवडतात. पण माझं 'श्वानप्रेम'(?) मात्र सर्वज्ञात आहे. 

माझ्या माहेरच्या घरी कधी कुत्रे पाळलेले नव्हते. माझ्या मोठ्या काकांकडे, मामाकडे आणि इतर नातेवाईकांकडे कुत्री असायची, पण त्यांच्याबद्दल मला कधीच आपुलकी निर्माण होऊ शकली नाही. आनंद सैन्यदलातील अधिकारी असल्यामुळे, आमच्या लग्नानंतर बरीच वर्षे मी कॅंटोन्मेंट भागांमध्ये राहिले. तिथे तर काय, घरोघरी मोठमोठाली कुत्री पाळायची पद्धतच होती. त्या कुत्र्यांचे अतोनात कोड-कौतुक व्हायचे. थंडीच्या दिवसात त्यांच्या 'आया' त्यांच्यासाठी लोकरीचे छानछान स्वेटर्स विणायच्या, टोपडी आणि बूट घालायच्या. पण अशा सजवलेल्या कुठल्याही कुत्र्याबद्दल  माझ्या मनात कधीच प्रेम उत्पन्न होऊ शकले नाही. मला कुत्री आवडत नाहीत आणि कधीही आवडू शकणार नाहीत याची खात्री असल्याने "आपण घरी कुत्रं पाळूया" असा  आग्रह आनंदने आणि मुलांनी कधीही धरला नाही. 

आमची मुले लहान होती तेंव्हाची, म्हणजे साधारण १९९७-९८ सालची  गोष्ट आहे. रोज दुपारी करून ठेवलेल्या, पोळीच्या डब्यातल्या पोळ्या कमी होत आहेत असा शोध मला रात्रीच्या जेवणाच्या वेळी लागायचा. मग मी पोळ्या मोजून ठेवायला लागले आणि एक-दोन पोळ्या निश्चित गायब होत आहेत याची मला खात्री पटली. दुपारी घरात बाहेरून कोणीही येत नसताना हे असे कसे होते आहे, या विचाराने मी बेचैन होते. एके दिवशी मला अचानक समजले की आमच्या अनिरुद्धला एका भटक्या कुत्रीच्या पिलाचा लळा लागला होता. दुपारच्या जेवणानंतर मी वामकुक्षी घ्यायला गेले, की मला कळू न देता, अनिरुद्ध हळूच पोळ्यांच्या डब्यातील एखादी-दुसरी पोळी पळवायचा आणि गुपचूप त्या पिल्लाला खायला द्यायचा. अशा रीतीने, कुत्रे पाळण्याची त्याची हौस अनिरुद्ध बाहेरच्या-बाहेर भागवून घेत होता. मग, 'कुत्रं-प्रेमामुळे' नव्हे तर केवळ पुत्रप्रेमामुळे मी त्याच्या या 'उद्योगाकडे' डोळेझाक करू लागले. ते पिल्लू त्यानेही कधी घरात आणले नाही. थोडक्यात काय, एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होऊ शकेल, पण या जन्मांत मला कधीही कुठल्याही कुत्र्याबद्दल प्रेम वाटणार नाही याबद्दल फक्त माझीच नव्हे, तर आनंदची आणि मुलांचीही खात्री पटलेली होती. परंतु, आयुष्यात काही गोष्टी आपल्या ध्यानीमनी नसताना बदलतात, हेच खरं.

माझ्या मुंबईच्या भाऊ-वहिनीच्या, म्हणजे गिरीश-प्राचीच्या घरांत गेली अनेक वर्षे पाळीव कुत्री आहेत. माझी भाचरंडे लहान असताना त्यांनी एक भुऱ्या रंगाचे लॅब्राडोर जातीचे पिल्लू आणले होते. त्याचे 'ब्रूनो' असे नामकरणही केले होते. पण अत्यंत अल्पशा आजाराने ब्रूनोचा अचानक मृत्यू झाला. मग त्यांनी पुन्हा एक 'खानदानी' लॅब्राडोर पिल्लू आणले. त्या काळ्या कुळकुळीत रंगाच्या पिलाचे नाव 'डॅझ' ठेवले. पण त्याच सुमारास, आधीच्या पिलाच्या विरहाने दुःखी झालेल्या माझ्या भाचीने रस्त्यावरून उचलून एक गावठी कुत्रीचे पिलू घरात आणले व तिचे नाव 'रोझ' ठेवले. अशा रीतीने त्यांच्या घरी डॅझ हा 'उच्चकुलीन' कुत्रा आणि 'खानदानाचा पत्ता नसलेली' रोझ, हे दोघेही अगदी गुण्यागोविंदाने नांदू लागले. श्वानप्रेमी लोकांच्या घरात जसे कुत्र्यांचे कौतुक होते, तसेच डॅझ-रोझचे कौतुक त्यांच्या घरात होत असे. डॅझ-रोझ घरात राहायला आल्यानंतर आम्ही असंख्य वेळा त्या घरी गेलो होतो. आनंदला आणि मुलांना डॅझ-रोझचा खूपच लळा होता. त्यांच्याशी खेळणे, त्यांचे लाड करणे, कधी त्यांना फिरायला नेणे, असे करून, श्वानप्रेमाची त्यांची भूक गिरीश-प्राचीच्या घरी गेल्यावर ते भागवून घ्यायचे. पण मी मात्र त्या कौतुक सोहळ्यात कधीच सामील होऊ शकले नव्हते. डॅझ-रोझला प्राची रोज सकाळी दूध आणि अंडी द्यायची. आम्ही त्यांच्याकडे राहायला गेलेलो असलो तरी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, इतरांची साखरझोप सुरु असताना मी भल्या पहाटे उठायचे.  क्वचित, प्राचीची झोपमोड होण्यापूर्वी, डॅझ-रोझ यांना दूध आणि अंडे द्यायचे काम केवळ कर्तव्यभावनेने मी केलेही होते. पण ते देताना त्यात प्रेमाचा ओलावा अजिबात नव्हता.

पाच वर्षांपूर्वी गिरीशला, मोठा अपघात झाला व त्याच्या अनेक हाडांना क्रॅक फ्रॅक्चर्स झाली. आधी दोन आठवडे रुग्णालयात व पुढचे चार आठवडे घरी, असे सहा आठवडे तो अंथरुणाला खिळून होता. त्या काळांत प्राची त्याची शुश्रूषा करत होतीच. दीड  महिन्याच्या विश्रांतीनंतर गिरीश जवळ-जवळ बरा झाला. पण अचानकच त्याच्या पोटरीत रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या फुफुसांत गेल्यामुळे तो अत्यवस्थ झाला. त्याला अतिदक्षता विभागात हलवावे लागले. आधीच प्राचीची खूप ओढाताण होत होती. त्यातून पुन्हा गिरीश अत्यवस्थ झाल्याने ती खूपच धास्तावली. तिला मदत व्हावी, आणि गिरीशच्या वैद्यकीय उपचारांमध्ये काही हयगय होऊ नये, या उद्देशाने, सलग दोन आठवडे, मी मुंबईला त्यांच्या घरी राहिले. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी पहाटे उठून, तयार होऊन गिरीशजवळ हॉस्पिटलमध्ये जायचे, ते रात्रीच परत यायचे.
पहिल्या एक दोन दिवसातच  प्राची मला म्हणाली,
"स्वातीताई, तुम्ही रोज पहाटे लवकर उठताच, तर तुम्ही आहात तोवर, तुम्ही डॅझ-रोझला दूध-अंडे द्याल का? मलाही पहाटे-पहाटे त्यासाठी उठावे लागणार नाही"
मी म्हणाले, "काहीच हरकत नाही. तू काळजी करू नकोस. मी निश्चित ते काम करेन"

अशा रीतीने, सलग दोन आठवडे, डॅझ-रोझला सकाळी दूध आणि अंडे देण्याचे कर्तव्य मी पार पाडले. एक दोन दिवसांतच, "आता ही बाई आपल्याला रोज सकाळी खायला घालणार आहे", याची कल्पना डॅझ-रोझला आली. "कोणी का देईना, अंडी खायला मिळाल्याशी कारण!" या विचाराने, ती कल्पना डॅझने स्वीकारली असावी. पण, रोझला मात्र ते फारसे आवडले नव्हते. पहाटे उठून, मी माझा चहा करायला ठेवला की, डॅझ शेपूट हलवत माझ्या भोवती घुटमळू लागायचा. मग मी हळूहळू त्याच्याशी आणि रोझशी बोलायलाही लागले. तशा त्या काही प्रेमाच्या गप्पा नव्हत्याच. कडक आवाजात, "मी तुम्हाला स्वैयंपाकघरात दूध आणि अंडी देणार नाहीये, तुम्ही बाल्कनीत जाऊन बसा बरं, खायला-प्यायला तिथेच मिळेल, इथे नाही... " असंच काही-बाही मी एखाद्या शिस्तप्रिय आईसारखी सांगायचे. "रोज तर आम्ही स्वयंपाकघरात बसूनच खातो-पितो, आता हे काय नवेच?" असा नाराजीचा भाव रोझच्या चेहऱ्यावर असायचा. पण डॅझ मात्र एक-दोन दिवसांतच आज्ञाधारकपणे बाल्कनीत जाऊन थांबू लागला. दूध दिल्यावर पटापट ते संपवून, "आता अंडी कधी देणार?" अशा प्रश्नार्थक मुद्रेने बघत माझ्याकडे यायला निघायचा. मग मी त्याला दटावयाचे. "डॅझ, बाल्कनीतच थांब. अंडी उकडून झाली आहेत, पण अजून गरम आहेत. माझा चहा झाला की सोलून देते". मग तोही, एखाद्या गुणी बाळासारखा, खाली मान घालून बाल्कनीत जाऊन बसायचा. त्या दोन आठवड्यात मला हळूहळू डॅझचा चांगलाच लळा लागला. मी त्याच्या छोट्या-छोट्या लकबी टिपायला लागले. कुत्र्यांशी गप्पा मारता येतात, हे आनंदचे मत पूर्वी मी नेहमीच खोडून काढायचे. पण आता माझे बोलणे डॅझला समजायला लागले होते आणि डॅझची देहबोली मला कळायला लागली होती. 

गिरीशची तब्येत सुधारल्यावर मी पुण्याला परतले. पण पुढेही कधी मुंबईला गेले की डॅझ माझ्या शिस्तीप्रमाणे वागून माझे मन जिंकून घ्यायचा. मी पहाटे उठले की तो लगेच बाल्कनीत जाऊन बसायचा आणि मी दूध-अंडी खायला कधी देतेय याची वाट बघायचा. दरवाज्यावरची घंटी वाजली की रोझ जोरजोरात भुंकत पाव्हण्यांच्या स्वागताला उभी असायची. दारावर अनोळखी माणूस दिसले की जोरजोरात भुंकून त्याला घाबरवून टाकायची पण डॅझ मात्र शांत असायचा. ओळखीचं माणूस बाहेरून आलं की मात्र ही दोघेही अंगावर उड्या मारून, छातीवर पाय ठेऊन लाड करून घ्यायची. कुत्री अंगाजवळ आलेली मला अजिबात आवडत नाहीत हे डॅझला माहिती झाले होते. तो फक्त भुंकून, किंवा शेपटी हलवून माझे स्वागत करायचा. खाण्याच्या बाबतीत डॅझ माझ्यासारखाच, म्हणजे 'हाय कॅल' पदार्थांचा अतिशय शौकीन होता. त्याला, लाडू, श्रीखंड, मिठाई, आईस्क्रीम अशा चांगल्या पौष्टिक गोष्टी आवडायच्या. मग मीही जेवताना माझ्या घासातला घास काढून त्याला द्यायला लागले. त्यामुळे डॅझचे आणि माझे नाते एखाद्या आई-मुलाच्या नात्याप्रमाणे फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकून राहिले. जवळजवळ चार वर्षांपूर्वी डॅझ सारखा आजारी पडू लागला आणि शेवटी २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात गेलाच. मला त्यावेळी खूप वाईट वाटले.

डॅझ गेल्यानंतर मी हा लेख लिहिला होता. पण काही कारणाने तो पूर्ण केला गेला नाही. आज सकाळच्या माझ्या फेरफटक्यादरम्यान अगदी डॅझसारखाच दिसणारा कुत्रा मला दिसला. त्यामुळे, त्या माझ्या लाडक्या काळ्या पोराची मला खूप प्रकर्षाने आठवण झाली आणि घरी येऊन लगेच हा लेख पूर्ण केला.   

गुरुवार, २ जुलै, २०२०

पाऊले चालती ...

आज पहाटे अगदी लवकर जाग आली. चटकन तयार होऊन लांब सायकल स्वारीला जावे असा विचार केला होता. पण सायकल दुरुस्तीसाठी टाकली आहे हे लक्षात आले. म्हणून मग खूप लांब चालायला जायचे ठरवले. अचानक मला, कॅनबेरामध्ये विकत घेतलेल्या, माझ्या नव्याकोऱ्या एसिक्स बुटांची आठवण झाली. नव्याकोऱ्या नव्हे, न वापरलेल्या, असे म्हणूया. कारण ते बूट विकत घेऊन दहा महिने उलटून गेले. पण आज प्रथमच मी ते वापरले आणि चांगला दहा-बारा किलोमीटरचा फेरफटका मारून आले. मला थोडे दमायला झाले. पण  त्यामानाने, माझ्या पायांना व्यवस्थित बसणाऱ्या बुटांमुळे माझ्या पायांना खूप थकवा जाणवला नाही.  
 
मागच्या वर्षी, जुलैच्या शेवटाला मी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे, माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी गेले होते. माझी नात दोन आठवड्याची झाल्यानंतर तिला घेऊन, माझी मुलगी, जावई आणि मी असे कॅनबेरात हिंडायला बाहेर पडायला लागलो होतो. मला तिथे काही खास खरेदी करायची नव्हती. पण, निघताना माझे वापरातले बूट पुण्यातच राहिल्यामुळे मी प्राचीचे, म्हणजे माझ्या मुंबईच्या वहिनीचे, बूट घालून ऑस्ट्रेलियाला गेले होते. ते बूट माझ्या पायाला जरा घट्टच होत होते. पुण्यात राहिलेले माझे बूटही तसे जुनेच झाले होते. त्यामुळे, कॅनबेरात मी चांगले बूट खरेदी करावेत, असा 'बूट' निघाला आणि माझी मुलगी व  जावई मला तिथल्या मॉलमध्ये घेऊन गेले.

एरवी, मी आणि माझी मुलगीही, मॉलमध्ये जायला अजिबात उत्सुक नसतो. पूर्वी तिच्याकडे शिकागोला गेले असताना, केवळ अमेरिकन मॉल्समधल्या वातावरणाची झलक दाखवायला म्हणून, मुलीने मला आवर्जून तिथल्या  मॉलमध्ये नेले होते. अमेरिकेतला मॉल बघितल्यावर, भारतातल्या मॉलमधले चंगळवादी वातावरण कुठून आले आहे, ते लगेच कळते. कॅनबेरातल्या मॉलमध्ये साधारण आपल्या इथल्या मॉल सारखीच मोठी-मोठी दुकाने होती. पण अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या मॉल्समध्ये अनुभवायला मिळणारे, कान किटवणारे संगीत, धांगडधिंगा करणारे तरुण-तरुणींचे घोळके, श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन किंवा बेभानपणे खरेदी करत सुटलेल्या बायका, असे फारसे काहीच दिसले नाही. 

आम्ही एसिक्स कंपनीच्या दुकानात गेलो. तिथे नेमका सेल चालू होता. सेलवर असलेल्या बुटांकडे माझे पाय वळणार इतक्यात मुलीने आणि जावयाने नजरेनेच मला दाबले. तिकडची पद्धत जराशी वेगळी असते. दुकानात गेल्यानंतर, तुम्हाला काय हवे आहे असे कोणीतरी विचारते. मग तिथल्या विक्रेत्या पोऱ्याला आपल्याला नेमके काय हवे आहे ते आधी सांगायचे. मग तो आपल्याला त्यांच्या दुकानांत कुठे आणि काय विकत घ्यायचे याबाबत मार्गदर्शन करतो. तिथल्या विक्रेत्याने मला दोन-चार प्रश्न विचारून, बूट नेमके कुठे आणि कशासाठी वापरायचे आहेत याचा अंदाज घेतला. आपल्याकडे बूट-चपलांच्या दुकानात जसे पायाचे माप घेतात तसे माझ्या पायाचे अंदाजे माप त्याने घेतले. मग कुठल्यातरी मशीनद्वारे माझ्या दोन्ही पायांचे सर्व बाजूने (३D )नेमके माप घेतले. त्यानंतर मला, दहा-बारा पावले एका रेषेत चालत जाऊन परत यायला सांगितले. माझ्या चालण्याचे त्याच्या हातात असलेल्या टॅबवर त्याने व्हिडीओ शूटिंग केले. या सगळ्या गोष्टींचे कंप्यूटर अनॅलिसिस झाल्यावरचे सर्व निष्कर्ष, त्याने आम्हाला समजावून सांगितले. माझे एक पाऊल दुसऱ्या पावलापेक्षा थोडे मोठे असल्याने, मोठया पावलाच्या मापाचे बूटच खरेदी करावेत; मला मुख्यतः सपाट रस्त्यावरून चालण्यासाठी बूट हवे असल्याने पळणे, खडकाळ रस्तावरुन चालणे किंवा टेकडीवर चढणे, यासाठी वापरायचे बूट घेऊ नयेत; तसेच माझा चवड्यांचा भाग थोडा अधिक रुंद असल्याने, पुढे रुंद असलेले बूट विकत घ्यावेत; असा सल्ला त्याने दिला. शेवटी, बूट रचून ठेवलेल्या अनेक रांगांपैकी एका विशिष्ट रांगेकडे बोट दाखवून, या रांगेतल्या बुटांपैकी कुठलेही एक बूट तुमच्यासाठी योग्य होतील असे सांगून तो निघून गेला. 

त्याने निर्देशित केलेल्या बुटांच्या रांगेकडे आम्ही वळलो. त्या रांगेतले कुठलेच बूट सेलवर नव्हते. त्यामुळे सेलमधले, पन्नास-साठ ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंमतीचे, चांगले बूट मिळण्याची आशा मावळली. त्याने दाखवलेल्या त्या रांगेतले एक-दोन बूट घालून मी चालून बघितले. अर्थातच ते माझ्या पायांना अगदी सुखावह वाटत होते. दीड-दोनशे डॉलर्स किंमत बघून मी खरेदीतून पाय मागे घेणार, हे माझ्या मुलीच्या लक्षात आले. "अगं, हे बूट पायाला अगदी आरामदायी असतात, वर्षानुवर्षे टिकतात, एक बुटाची जोडी तू विकत घेच" असा आग्रह तिने व जावयाने धरला. मग, मला आवडलेले निळ्या रंगातले बूट मी खरेदी केले. भारतात परतल्यानंतर, माझ्या आईच्या आजारपणात मी अतिशय व्यस्त होते. गेल्या ऑगस्टमध्ये खरेदी केलेले ते बूट, मी अजून वापरलेच नव्हते. आई गेल्यानंतर माझे सायकलस्वारीचे रूटीन सुरु झाले, पण माझे जुने बूटच मी वापरत होते. आज प्रथमच, खूप लांबवर चालण्यासाठी एसिक्स कंपनीचे नवीन बूट वापरले. पहाटेच्या शांत वातावरणांत चालता-चालता माझ्या मनातल्या विचारांनाही  चालना मिळाली. 
             
कालच आषाढी एकादशी झाली. या वर्षी वारी, दिंड्या, रिंगण या सगळ्या गोष्टीना करोनामुळे बंदी होती. सहजच, माझ्या मनासमोर पंढरीच्या वारकऱ्यांचे चित्र उभे राहिले. वर्षानुवर्षे, गावोगावचे अनेक वारकरी विठूमाऊलीच्या ओढीने पंढरीला पायी चालत जातात. माझी आजीही वयाच्या पंच्च्याहत्तरीपर्यंत सोलापूरहून पंढरपूरला चालत  जायची. पण ती कधी बूट वापरायची नाही, चप्पलच घालायची. ती वारीला निघायची त्यावेळी माझे आई-वडील तिला चांगल्या चपला घेऊन द्यायचे. वारीबरोबर पाच-दहा किलोमीटर चालून, सोशल मीडियावर स्वतःचे पन्नास फोटो टाकून, आपल्या भक्तीचे प्रदर्शन मांडणारे, मॉडर्न 'वारकरी'ही मला आठवले. ते मात्र  रिबॉक, आदिदास, नायके  वगैरे कंपन्यांचे बूट घालून चालत असतील. पण सामान्य वारकऱ्यांचे काय? तुटक्या, झिजलेल्या बूट-चपला घालून हे वारकरी रोजचे वीस-वीस किलोमीटर अंतर चालतात. कित्येकांना मी अनवाणी पायानेही जाताना पाहिलेले आहे. भक्तिमार्गावर चालणाऱ्या या खऱ्याखुऱ्या वारकऱ्यांच्या पायांना, तो पंढरीनाथ शीण येऊच देत नसावा. महागडे आणि आरामदायी बूट घालून, व्यायामासाठी मी करत असलेल्या पायपिटीच्या दरम्यान मला, पांडुरंगाच्या भेटीसाठी मैलोन-मैल अनवाणी चालणाऱ्या गरीब वारकऱ्यांची आठवण झाली आणि मनोमनच त्या अनामिक वारकऱ्यांचे मी पाय धरले.       

शनिवार, २७ जून, २०२०

अखेर मी स्मार्ट झाले!

पाच एक वर्षांपूर्वी मी सँर्टफोन वापरत नव्हते. प्रथम मी जेव्हा स्मार्टफोन विकत घेतला त्यावेळच्या अनुभवावरच हा लेख, प्रसिद्ध करायचा राहून गेला होता.


दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळपर्यंत माझया बर्याच मित्रमंडळींनी 
स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली हायती . त्यामुळे त्या मित्रमंडळींना 'अजूनही स्मार्टफोन शिवाय ही कशी काय जगतेय?' हा प्रश्न सतावत होता. पण, मी स्वतःला स्मार्ट समजत असल्यामुळे, स्मार्टफोन न वापरण्याचा माझा 'पण' मी बरेच दिवस टिकवला. परंतु, माझ्या पेशंटसचे आईवडील वरचेवर मला विचारायला लागले,  "बाळाचे रिपोर्ट, X-ray, बाळाला आलेल्या पुरळाचे फोटो, किंवा 'बाळ कसंसंच करतंय' त्याचा व्हिडीओ WhatsApp वर पाठवू का?".  तेंव्हा मात्र माझ्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे  माझी पंचाईत होऊ लागली होती .  

अशा अनेक मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि  माझ्या लहानग्या पेशंटसच्या आईवडिलांना, "तुम्ही स्मार्ट फोन का वापरत नाही?" या प्रश्नाचे उत्तर देऊन-देऊन शेवटी मी कंटाळले. सुरुवातीला "माझ्याकडे  स्मार्टफोन नाही आणि मला तो वापरताही येत नाही" असं सोपं उत्तर मी देत असे. पण लोकांच्या टोमणेबाजीमुळे ती सोयही राहिली नव्हती. आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मॉडर्न मॉमने एकदा मला ऐटीत ऐकवले होते, "डॉक, मी की नाही, माझ्या बेबीला सांभाळणाऱ्या मेडला एक स्मार्टफोन घेऊन दिलाय. त्यामुळे मी सतत तिच्याशी WhatsApp वर कॉन्टक्टमधे असते. डॉक, ती डंब मेडसुद्धा स्मार्टफोन वापरते तर तुम्ही नक्की वापरू शकाल!"

असे अनेक अपमानास्पद अनुभव झेलून आणि लोकांच्या असंख्य प्रश्नांना कंटाळून मला जरा 'शहाणपण' आले आणि शेवटी एकदाचा मी स्मार्टफोन घ्यायचा निर्णय घेतलाच. लोकाग्रहास्तव फोन घेतेय, त्यामुळे उगीच जास्त खर्च नको, पाच हजाराच्या आतलाच फोन घ्यावा असं मी मनाशी ठरवलं.  हा माझा विचार, मोबाईलच्या दुनियेतील तरबेज भाचरंडांना आणि काही जवळच्या मित्र मंडळींना ऐकवला. तर काय, "पाच हजाराच्या आत कुठे काय बरा फोन येणार आहे का? तसला  स्मार्ट फोन घेणं आणि न घेणं सारखंच आहे"  असं बोलून  त्या सर्वांनी  माझ्या 'बावळटपणावर' शिक्कामोर्तब केलं.

कुणी म्हणालं " कॉलेजला जाणारी लोअर इकोनॉमिक क्लासमधली मुलंसुद्धा हल्ली सात आठ हजाराचे फोन वापरतात. आणि पाच हजारांत अगदीच कमी चॉइस मिळेल, कमीतकमी दहा हजारांचं  बजेट तर हवेच."

मग मी नाईलाजाने माझे बजेट वाढवून दहा हजारापर्यंत नेले.

"फक्त दहा हजाराच्या मोबाईलनं काही खास इम्प्रेशन पडणार नाही. त्यासाठी निदान वीस हजारचा स्मार्टफोन तरी घेचही काही हितचिंतकांची सूचना मात्र मी पूर्णपणे कानाआड केली.

माझ्या वाढीव बजेटमध्ये बसेलसा चांगला स्मार्टफोन शोधू लागल्यावर मात्र मी चांगलीच चक्रावले. दुकानांत त्या रेंजमधली दहा कंपन्यांची शंभर मॉडेल्स होती. त्यातून 'अँड्रॉईड' का 'विंडोझ?', 'जेली बीन' का 'आईस्क्रीम सँडविच', 'सिंगल सिम' का 'ड्युअल सिम', 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'? असले अनेक अगम्य प्रश्न विचारून आणि अनंत पर्याय  देऊन, दुकानदारांनी मला पूर्ण गोंधळात टाकलं. उच्चशिक्षित असूनही यातलं आपल्याला काहीच कळत नाही, हे मला उमगलं. आपल्या  या अज्ञानाचा फारसा गवगवा होऊ नये याची दक्षता घेत आणि  विनासायास  'ready answers' मिळवीत म्हणून मी माझ्या भाचीला फोन लावला.

माझ्या शंकांचे निरसन न करता, "ते सगळं तुझ्या युजवर डिपेंड आहे आणि ते तुलाच ठरवावं लागेल" असे स्मार्ट उत्तर अगदी  तत्परतेने तिने देऊन टाकले! त्यातून वर, "आत्या, अगं मोबाईल घ्यायला दुकानांत कशाला गेलीस? फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वर मॉडेल्सची रेटिंग्स आणि कॉनफ़िगरेशन्स बघायची, काहीऑफर्स मिळत असतील तर घ्यायच्या आणि ऑनलाईन मागवून टाकायचा." असा फुकट सल्ला देऊन मला वेड्यात काढलं ते वेगळंच!

आता मात्र स्वाभिमान जागृत झाल्यामुळे मी पेटून उठले. भाचीने सुचवलेला हा साधा-सोप्पा मार्ग पडताळून बघायचाच असं मी ठरवलं. मग काय विचारता! ऑपरेटिंग सिस्टम्स,प्रोसेसर्स,मॉडेल्स आणि त्यांची रेटिंग्स असे माझे नवीन ऑनलाईन शिक्षण चालू झाले. शेवटी माझ्या वापरासाठी योग्य आणि अगदी 'value for money' अशा मॉडेलचा शोध मला लागला. पण तो इतका दहा हजाराचा फोन ऑनलाईन मागवण्यापूर्वी एकदा आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघावा, हाताळावा, या विचाराने  एक दोन दुकानांत / virtual stores मध्ये  गेलेच .

मी ठरवलेल्या मॉडेलची किंमत प्रत्येक दुकानात, ऑनलाईन मार्केटपेक्षा जवळ-जवळ एक हजार रुपयांनी जास्त होती. साहजिकच 'हे असं कसं?' हा प्रश्न मनांत आलाच. उत्सुकतेपोटी, "हेच मॉडेल ऑनलाईन स्वस्त कसं हो?" हे विचारण्याचा बावळटपणा केलाच. उत्तरादाखल, "भारतात ऑनलाईन मालाचा काय भरवसा? बघा बुवा, इथे असलं करणं काही शहाणपणाचं नाही. कदाचित फसाल बरं का!" असं एक पिल्लू दुकानदाराने सोडून दिलं! 

आता मात्र माझी पंचाईत झाली. फोन दुकानातून घ्यावा का ऑनलाईन घ्यावा, अशी  व्दिधा मनस्थिती असली तरी, ऑनलाईन स्वस्त मिळत असल्यामुळे मन तिकडेच ओढ घेत होते. "फोन ऑनलाईन मागवल्यावर हे असलं काही होणार नाही ना?" असं विचारायला पुन्हा भाचीला गाठले. तर तिने, "मी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मागवते. पण कधीही फसलेले नाही. तू मागवून बघ काय होतय ते!" असे सावध उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतली आणि माझी धाकधूक मात्र अजूनच वाढवली.

योगायोगाने, 'अमेझॉन इंडिया' मध्येच वरच्या हुद्द्यावर काम करणारा माझा एक भाचा त्याच रात्री जेवायला येणार होता. जेवणं झाल्यावर मी, "काही फसवणूक तर होणार नाही ना? दुकानापेक्षा ऑनलाईन स्वस्त कसं? फोन खराब निघाला तर पैसे परत करतात का?" वगैरे माझ्या सगळ्या शंका-कुशंका भाच्याला  धडाधड विचारून टाकल्या.
"मावशी, तसं काहीही होणार नाही, तू निर्धास्त रहा." त्याने अत्यंत हसतमुखपणे मला दिलासा दिला. परंतु, मनातल्या मनात, "आमची अमेझॉन काय अशी चलती-फिरती कंपनी आहे काय? इतकी शिकली आहेस पण काय उपयोग? इतकं कसं कळत नाही? असले प्रश्न पडतातच कसे?" असा, माझी कीव करणारा, विचार त्या हास्यामागे  दडलेला होता की काय, असेही क्षणभर मला वाटून गेले .
इतकी हमी मिळाली तरी ऑनलाईन मागवलेला फोन हातात येईपर्यंत माझ्या अगदी जीवात जीव नव्हता. पैसे तर आधीच कापले गेलेले असल्यामुळे कुठे माशी शिंकायला नको अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. जेमतेम दोन दिवसांत फोन घरपोच येऊन पोहोचलासुद्धा! सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला.

या सगळ्या प्रवासांत स्मार्टफोनबद्दलचे माझे ज्ञान मात्र भलतेच वाढले. त्यामुळेच आताशा कुणी ओळखीचं भेटलं की त्यांना "तुमच्या स्मार्टफोनचा प्रोसेसर कुठला? स्क्रीन ४.७ इंच का ५.५ इंच?" असले प्रश्न मी हटकून विचारते. मधे एका स्मार्ट मुलाला त्याच्या फोनचा प्रोसेसर कुठला आहे असे विचारल्यावर त्याने "सिंगल सिम" असे सांगितले. मी जेंव्हा हसून म्हटलं, "अरे, 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'?", तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळलेला भाव, माझ्या वाढलेल्या 'भावाची' साक्ष पटवून गेला.
माझ्या एका मैत्रिणीने  कौतुकाने मला सांगितले, "मला जेली आवडत नाही ना, म्हणून यांनी त्यांचा 'आईस्क्रीम सँडविच' वाला स्मार्टफोन मला दिला आणि स्वतःसाठी 'जेली बीन' वाला घेतला!" मला मात्र तिच्या अज्ञानावर आणि भाबडेपणावर हसावे का रडावे ते कळेना!
एका प्रथितयश डॉक्टर मित्राने मला सुनावले, "अगं, फोनचा price tag महत्वाचा असतो, प्रोसेसर नाही काही!
या सगळ्यावर कळस म्हणजे ड्युअल सिम handset मध्ये एकाच वेळी दोन सिम कार्ड घालता येतात याचा माझ्या ओळखीतल्या एका सुशिक्षित बाईंना पत्ताच नव्हता!

बऱ्याच लोकांना स्मार्ट दिसण्यासाठी स्मार्टफोनची गरज असते, असं आता माझं मत झालंय. स्मार्टफोन वापरणाऱ्या बराचशा लोकांना, फोन करणे व घेणे, गेम्स खेळणे, सेल्फी काढणे आणि Whatsapp वर चकाट्या पिटणे याव्यतिरिक्त तो अजून कशाकशासाठी वापरता येतो याचा गंधच नसतो. आता हे कळल्यामुळे माझा स्मार्टनेस मात्र कमालीचा वाढलाय हे जाणवते !

सोमवार, २२ जून, २०२०

'व्हॅन'टढॅण !

१९९२च्या डिसेंबर महिन्यामध्ये, प्रथमच आनंद, मी आणि मुले एकत्र असे अलाहाबादला रहायला लागलो. सुरुवातीला काही दिवस आम्ही आमच्या स्कूटरवर फिरायचो. पण नंतर आम्ही मोठ्या हौसेने नेव्ही ब्लू रंगाची नवीकोरी मारुती 'ऑम्नी' व्हॅन घेतली. ती व्हॅन आम्हाला फारच आवडायची. पुढे बॉनेट नसल्यामुळे, ती चालवताना सगळ्या रस्त्यावर अधिराज्य असल्यासारखे वाटायचे. आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही, पण त्यावेळी पैसे भरल्यानंतर, व्हॅन मिळेपर्यंत गिऱ्हाईकांना निदान दोन-चार महिने वाट बघावी लागायची. काही उतावळे लोक जास्तीचे पैसे (On Money) देऊन मारुती व्हॅन घ्यायचे. आम्ही ती व्हॅन आर्मीच्या कॅन्टीन मार्फत विकत घेतल्यामुळे आम्हाला ती बाजार भावापेक्षा दहा-बारा हजार रुपयांनी स्वस्तच मिळाली होती. आम्ही व्हॅन विकत घेतली आणि त्यानंतर जवळजवळ लगेच  मारुती कंपनीने व्हॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. 

आम्ही ती व्हॅन बरीच वापरली. मुले लहान असल्यामुळे उंच सीटवर बसून त्यांना बाहेर बघायला मजा वाटायची. अलाहाबादला आमच्याकडे नातेवाईकांचा सारखा राबता असायचा. अनेक वेळा सात-आठ जण दाटीवाटीने बसून, खाण्यापिण्याचे सामान बरोबर घेऊन आम्ही वाराणसी, लखनौ, फैजाबाद-अयोध्या, चित्रकूट-खजुराहो असे अनेक दौरे केले. त्याकाळी गाडीच्या मॉडेलला, किंवा गाडी किती सीटर आहे या गोष्टीला, फारसे महत्त्व नसायचे. त्यावरून तुमची 'किंमत'ही ठरवली जात नसे. मुख्य म्हणजे गाडी कितीही सीटर का असेना, कुरकुर न करता भरपूर लोक त्यात बसून आनंदात फिरायचे. हल्ली आपले सर्वांचे राहणीमान उंचावले आहे, पण कदाचित मनोवृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे, काहींना चार सीटर गाडीमध्ये पाचव्या व्यक्तीची, अगदी  एखाद्या लहान मुलाची सुद्धा अडचण वाटते. 

१९९५ सालच्या मे महिन्यापासून मुलांना घेऊन मी पुण्याला राहू लागले. आनंद एकटाच अलाहाबादेत राहणार असल्याने त्याला गाडीची गरज उरली नाही. म्हणून, ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीच्या सुट्टीत मी मुलांना घेऊन अलाहाबादला आले असताना आम्ही ती गाडी विकायचे ठरवले. दिवाळी संपल्या-संपल्या, "आर्मी ऑफिसरची एकहाती वापरलेली गाडी विकणे आहे" अशी जाहिरात अलाहाबादच्या स्थानिक वर्तमानपत्रांमधून आम्ही दिली. जाहिरात छापून आली त्याच दिवशी आमच्याकडे इच्छुक गिऱ्हाईकांची अक्षरश: रांग लागली. दिवसभर येत राहिलेल्या अनेक गिऱ्हाईकांना गाडी व गाडीची कागदपत्रे दाखवणे, किंमतीबद्दल घासाघीस करणे हे करून मी, आनंद आणि आनंदचा सहायक, तिघेही अगदी दमून गेलो. त्यातल्या बऱ्याच जणांनी, ही व्हॅन इतर कोणालाही देऊ नका, आम्हीच घेणार आहोत असे सांगितले असले तरीही पैसे कोणीही दिलेले नव्हते. अलाहाबादला बरीच फसवेगिरी आणि गुंडगिरीही असल्यामुळे, एक रकमी पूर्ण पैसे दिल्याशिवाय गाडी विकणार नाही, असे आम्ही निक्षून सांगितलेले होते. 

त्या संध्याकाळी आमच्याकडे आनंदचे दोन आर्मी ऑफिसर मित्र, त्यांच्या बायका-मुलांसह आले होते. आम्ही खात-पीत व गप्पा मारत बसलो होतो. सकाळी येऊन गेलेल्या इच्छुक लोकांपैकी एकजण पुन्हा येऊन आमच्या दारावर धडकला. आनंदने त्याच्याशी बोलणी सुरु केली. तितक्यात, सकाळी गाडी पाहून गेलेला दुसरा एकजणदेखील आला. त्या माणसाला मी दुसऱ्या एका खोलीत नेऊन बसवले आणि आनंदच्या मित्रांनी त्याच्याशी बोलणी चालू केली. आमचे आर्मी क्वार्टर, खूपच मोठे म्हणजे जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फुटाचे होते. ते दोघे खरेदीदार जरी वेगवेगळ्या खोलीत बसलेले असले तरीही, दुसरा एक ग्राहकदेखील येऊन बोलणी करीत आहे याची त्या दोघांनाही पूर्ण कल्पना होती. दोघेही थोडे पैसे घेऊन आलेले होते आणि उरलेले पैसे उद्या आणून देऊन गाडी घेऊन जाऊ असे म्हणत होते. त्या दोघांनाही ती गाडी हवी असल्यामुळे ते दोघेही किंमत वाढवत गेले. हा अगदीच नाट्यमय प्रसंग होता. एकाच वेळी दोन गिऱ्हाईक आल्यामुळे आम्हाला घासाघीस करायला भरपूर वाव होता. मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फेऱ्या मारून कोण जास्त किंमत द्यायला तयार आहे याचा अंदाज घेत होते. असे करता-करता शेवटी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत द्यायला ते दोघेही तयार झाले. हे सगळे नाट्य संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते. शेवटी, जो कोणी ठरलेली संपूर्ण रक्कम आधी आणून देईल, त्याला आम्ही गाडी देऊ असे सांगून त्या दोघांचीही आम्ही बोळवण केली. त्यानंतर आम्ही पुन्हा मित्र परिवाराबरोबर गप्पा-गोष्टी करण्यात गुंगून गेलो. 

खरी गंमत तर पुढे झाली. आमची जेवणे उरकल्यानंतर साधारण रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास, आनंदचे मित्र घरी परतायला निघाले होते. तितक्यात त्या दोन इच्छुक खरेदीदारांपैकी एकजण परत आला आणि त्याने नोटांच्या पुडक्याने भरलेली पिशवीच समोर काढून ठेवली. सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे "ठरलेली सर्व रक्कम मी आज देऊन जातो, गाडी तुम्ही मला उद्या द्या" असेही तो म्हणू लागला. त्यामुळे आम्ही अजूनच बुचकळ्यात पडलो. आमच्याच सांगण्यानुसार तो पैसे घेऊन तातडीने हजर झाला होता. आता त्याला परत तरी कसे पाठवायचे? एकीकडे हा प्रश्न आमच्यापुढे होता. तर दुसरीकडे, इतकी मोठी रक्कम आणि विकलेली गाडी दोन्हीही आमच्याकडेच ठेवून जाण्यामागे, या माणसाचा काही विपरीत हेतू तर नसेल ना? अशा शंकेने आम्हाला घेरले होते. हे चोरीचे पैसे तर नसतील ना? तसे असले तर काय होईल ? किंवा या पैशांसाठी रात्रीतून आमच्यावर कोणी हल्ला केला तर काय? अनेक शंका आमच्या मनात येऊ लागल्या. पण तो अपरिचित इसम मात्र, "तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे घ्याच, पण कुठल्याही परिस्थितीत ही गाडी मलाच विका" असे म्हणत हटूनच बसला. आम्ही मात्र चांगलेच अडचणीत पडलो. "तुम्ही उद्या सकाळी रक्कम घेऊन या, आम्ही उद्या तुम्हालाच गाडी देऊ, इतर कोणालाही विकणार नाही" असेही आम्ही त्या माणसाला सांगून पहिले. पण तो इसम काही केल्या ऐकेना. आत्ता रात्री या रक्कमेची पावती देणे आम्हाला शक्य होणार नाही, अशी लंगडी सबब पुढे केली. तरीही तो ऐकायला तयार होईना. शेवटी मी व आनंद आणि त्याच्या आर्मी ऑफिसर मित्रांनी मिळून चर्चा केली, आणि ते पैसे व गाडी दोन्ही आमच्याकडेच ठेवून घेऊन त्या माणसाशी सौदा पक्का करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या अर्ध्या तासात आनंदने आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून ती सगळी रक्कम मोजून घेतली. पैशाची कच्ची पावती घेऊन, पण  खरेदी केलेली गाडी मात्र न घेता तो माणूस रात्री दहानंतर परत गेला. त्या रात्रभर मी आणि आनंद काळजीने नीट झोपूही शकलो नाही.  

दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तो खरेदीदार एका स्टॅम्पपेपरवर खरेदीखताचा मसुदा टाईप करूनच घेऊन आला. त्यावर त्याने व आनंदने सह्या केल्या, साक्षीदार म्हणून आनंदच्या दोन्ही मित्रांनी सह्या केल्या आणि तो व्यवहार प्रत्यक्षात पूर्ण झाला. स्वतःला गाडी चालवता येत नसल्याने ती गाडी तो आदल्या रात्री घेऊन गेला नव्हता हा खुलासा त्याने तेंव्हा केला! सकाळी येताना मात्र, गाडी चालवता येत असलेल्या कोणालातरी बरोबर घेऊन तो आला होता. गाडी व कागदपत्रे त्याने ताब्यात घेतली आणि चालकाच्या शेजारी बसून, मोठ्या समाधानाने आणि विजयी मुद्रेने तो निघून गेला. दीड लाखात ऑन-रोड घेतलेली, दोन वर्षे मनसोक्त वापरून झालेली ती व्हॅन आम्ही एक लाख सदुसष्ट हजाराला विकल्यामुळे आम्हीही भलतेच खुषीत होतो. आनंदने तातडीने जाऊन ती रक्कम बँकेत भरून टाकली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.     

रविवार, ३१ मे, २०२०

अनलॉक-१.0

आज मे महिना संपला. मे महिन्याच्या आपल्या सगळ्यांच्या काही विशेष आठवणी असतात. मे महिना आला की मला सगळ्यात आधी आठवण येते ती बाबांची, म्हणजे माझ्या सासऱ्यांची. परिवारातील सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस बाबा आवर्जून लक्षात ठेवायचे. त्या-त्या तारखेला त्या व्यक्तींना फोन करून ते हमखास शुभेच्छा द्यायचेच. मे महिन्यात त्यांच्या सहा नातवंडांपैकी तीन नातवंडांचे वाढदिवस असल्यामुळे, मेच्या सुरुवातीपासूनच, अमुक तारखेला याचा वाढदिवस, तमुक तारखेला हिचा वाढदिवस, या तारखेला अमक्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्या तारखेला तमक्याची मुंज झाली होती, असे तपशील ते वरचेवर घोकत राहायचे. नातवंडांसाठी, स्वहस्ते एक छानसे ग्रीटिंग करायचे. त्या  ग्रीटिंगच्या वरच्या कोपऱ्यात त्यांचे एक 'ट्रेडमार्क' फूल काढलेले असायचे. माझ्या मुलाचा, अनिरुद्धचा वाढदिवस मे महिन्यातला. तो भारताबाहेर शिकायला गेल्यानंतर दर वर्षी, जवळजवळ १ मेच्या सुमारासच बाबा त्याचा पत्ता आमच्याकडून कन्फर्म करून घ्यायचे आणि त्याला ग्रीटिंग करून पाठवायचे. दरवर्षी, बाबांनी घोकलेल्या तारखा आणि वाढदिवसाचे तपशील ऐकून घरातल्या सगळ्यांना मे मधले वाढदिवस लक्षात राहिले आहेत. मे महिन्यात बाबांचा एक वाढदिवस असायचा. प्रत्यक्षात त्यांचा जन्म जुलै महिन्यातला. पण त्यांना शाळेत घालताना कुणीतरी अंदाजे ३० मे अशी तारीख लावून टाकली होती. त्यांचे हे दोनही वाढदिवस साजरे केलेले त्यांना आवडायचे.

मे महिन्यातल्या लहानपणीच्या तर अनंत आठवणी आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आते-मामे-चुलत-मावस भावंडांसोबत घातलेला धिंगाणा आठवला की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. एकत्र जमलेल्या सगळ्या बाळगोपाळांना खेळण्यासाठी भरपूर जागा आणि वाट्टेल ते करायची मुभा माझ्या माहेरच्या मोठ्या वाड्यात होती. घरात एका खोलीत, रायवळ आंब्याची आढी लावलेली असायची. आम्ही मनसोक्त आंबे चोखायचो. दुपारच्या जेवणात रोज आमरस असायचाच. काका किंवा वडील, मंडईतून आमरसासाठी वेगळे आंबे आणायचे. आणलेले आंबे बादलीत बुडवून ठेवायचे. आंबे पिळणे, मोठ्ठे पातेले भरून रस काढणे, आंब्यांच्या कोयी चोखणे हे कार्यक्रम झाले की दुपारची जेवणे व्हायची. डायटींग, कॅलरीज, कोलेस्टेरॉल वगैरे शब्द त्यावेळी आमच्या किंवा घरातल्या कोणा मोठ्यांच्याही शब्दकोशात नव्हते. त्यामुळे आम्ही अगदी पोट फुटेस्तोवर जेवायचो. घरातल्या मुलांच्या पांढऱ्या छाटणींवर आणि मुलींच्या पांढऱ्या पेटीकोटवर आंब्यांमुळे केशरी नक्षी उमटायची. दुपारभर सगळे मिळून, पत्त्यांचे डाव, व्यापार किंवा कॅरम खेळायचो. संध्याकाळी अंगणात आणि गच्चीवर पाणी मारायचो. रात्री सगळी भावंडे गच्चीत झोपायचो. एकमेकांना भुताटकीच्या गोष्टी सांगायचो. एखाद्या संध्याकाळी, घरच्याघरी पॉटमध्ये आईस्क्रीम करायचा बेत असायचा. त्या 'फॅमिली आईस्क्रीम पार्टी'ची सर आजच्या कुठल्याही 'फॅमिली पॅक'ला येत नाही. पुढच्या पिढीतल्या मुलांना इतकी भावंडे नसतील, आणि असलेली भावंडे सर्रास एकत्र येण्याची शक्यताही कमीच असणार आहे. त्या बिचाऱ्यांना आम्ही चाखली ती मजा कुठून मिळणार? 

माझी मुले शाळेत जायला लागल्यावर, मे महिन्यात त्या दोघांच्या इंग्रजी शाळेत, दोन वेगवेगळ्या तारखांना सगळी वह्यापुस्तके मिळायची. ती आणायला शाळेत मला जावे लागायचे. ती ढीगभर वह्यापुस्तके आणणे, त्यांना कव्हर्स घालणे, त्यावर नावे लिहिणे हा कार्यक्रम चालायचा. माझ्या मुलांच्या सुदैवाने, त्यांच्या लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत त्यांच्यासोबत खेळायला त्यांची दोन मामे  भावंडे तरी होती. त्या चौघांना वॉटर पार्कला नेणे, समर कॅम्पला पाठवणे, त्यांच्यासाठी नवनवीन पदार्थ करणे किंवा त्यांची भांडणे सोडवणे, असे उद्योग मला असायचे. पण माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळे, रविवार सोडला तर इतर कुठल्याही दिवशी मला सुट्टी नसायची. त्यामुळे त्यांच्यासोबत मजा करायला मला निवांत वेळ कधीच मिळाला नाही, याचे वाईट वाटतेच. पुढे मुले मोठी झाली. ऑलिम्पियाड सारख्या  मानाच्या परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवून देशपातळीवर होणाऱ्या शिबिरांमध्ये त्यांची निवड होत राहिली. त्यामुळे मे महिन्यांत, त्या शिबिरांसाठी त्यांना मुंबईला सोडणे-आणणे हे एक सुखद व्यवधान असायचे. मे महिना संपताना या शिबिरांचा शेवट यायचा. भारताच्या संघात आपल्या मुलांची निवड होते की नाही, याची हुरहूर लागलेली असायची. शिबिरांच्या सांगतासमारंभांना हजर राहून मुलांना घरी परत आणायला मी जायचे. एखाद्यावर्षी, भारतीय संघात मुलांची निवड झाली नाही तरीही त्यांना हिरमुसले होऊ न देणे हे मोठे नाजूक काम असायचे. शिबिरासाठी भारताच्या वेगवेगळ्या शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी गप्पा मारण्यात, माहितीची देवाण-घेवाण करण्यात, मे महिना कधी संपून जायचा ते कळायचेच नाही. पुढे मुले परदेशी गेल्यावर जून-जुलै मध्ये सुट्टीवर येऊ घातलेल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसण्यात मे महिना निघून जायचा.  यंदाचा मे महिना मात्र अगदीच विचित्र अवस्थेत 'लॉकडाऊन' मध्ये  गेला. माझ्या आईच्या मृत्यूच्या दुःखाचे आणि करोनाच्या भीतीचे सावट तर होतेच. 

आज पहाटे फिरायला गेले तेव्हाही तेच विचार माझ्या मनाला अस्वस्थ करत होते. पण अचानकच, रोजच्या पाहण्यातल्या एका बंगल्याच्या आवारात, एक 'मे-फ्लॉवर' फुललेले दिसले. कालपर्यंत ते दिसले नव्हते. अनेक छोट्या-छोट्या नाजूक फुलांनी बनलेले, ते लालचुटुक गोलाकार फूल बघून माझे मन प्रसन्न झाले. गेल्या अनेक वर्षांच्या मे महिन्याच्या आठवणी मनातल्या मनात फुलून आल्या आणि माझ्या मनाचाही 'अनलॉक-१.०' चालू झाल्याचे मला जाणवले.   




शनिवार, ३० मे, २०२०

माझा रेसकोर्सचा नाद !


लहानपणापासून मला पहाटे लवकर उठायची सवय आहे. पहाटेच्या शांत, थंड आणि शुद्ध हवेमधे गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायला मला फार आवडते. माहेरी, माझी आजी, भल्या पहाटे उठायची व दूध न घालता काळी कॉफी प्यायची. 
आज्जीच्या हातचा चहा विशेष चांगला व्हायचा. बरेचदा, मी आजीला माझ्यासाठी चहा करण्याची गळ घालायचे.  एकीकडे तिची कॉफी करत दुसरीकडे ती मला चहा करून द्यायची. मी मेडिकलचे शेवटचे एक वर्ष माझ्या मोठ्या काकांच्या, अप्पांच्या बंगल्यावर राहिले. तिथे मी आणि काका पहाटे उठून चहा प्यायचो व नंतर मी अभ्यासाला बसायचे. इंटर्नशिपपासून मात्र या सकाळच्या चहानंतर व्यायामासाठी बाहेर पडायची सवय मला लागली. भल्या पहाटे घराबाहेर पडून व्यायाम करण्यासाठी माझे शरीर आणि मन आसुसलेले असते. 

माझ्या लग्नानंतरही आजतागायत व्यायामाची सवय आहेच. आनंद आर्मीच्या नोकरीत असेपर्यंत त्याला पहाटे उठणे बंधनकारक होते. त्यामुळे आम्ही पहाटेचा चहा एकत्र घ्यायचो. त्यानंतर तो आर्मीच्या पीटी परेडला व मी माझ्या व्यायामाला, असे बाहेर पडायचो. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी मी पुण्यात राहिल्यामुळे बराच काळ आम्ही वेगवेगळे राहिलो.  १९९७ सालापासून आम्ही मुख्य पुणे कँटोन्मेंटमधे, म्हणजे सदर्न कमांड हेडक्वार्टरच्या जवळ, आर्मीच्या क्वार्टर्समध्ये राहायला आलो. आनंद त्याच्या बदलीच्या ठिकाणाहून पुण्याला येऊन-जाऊन असायचा. पुढे २००७ साली आनंदने सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आम्ही कँटोन्मेंटच्या हद्दीलगतच असलेल्या आमच्या सध्याच्या घरात राहू लागलो.  त्यामुळे आजही आम्ही पुणे कँटोन्मेंटमधे राहात असल्यासारखे वाटते. आनंदने सेवानिवृत्तीनंतर हळूहळू पहाटे उठणे बंद केले. पण मी मात्र माझ्या सवयीप्रमाणे पहाटे उठते, चहा घेते आणि मोठ्या उत्साहाने एकटीच व्यायामाला बाहेर पडते. अर्थात हे रोज जमतेच असे नाही. पण रोज जाण्याचा माझा प्रयत्न असतो. 

मला रेसचा जरी नसला तरीही पहाटे पुणे रेसकोर्सवर फिरायला जाण्याचे व्यसन १९९७-९८ सालापासून लागले. रेसकोर्सच्या मध्यावर एक वर्तुळाकार मैदान आहे. तिथे घोड्यांचे प्रशिक्षण चालते. त्या मैदानाच्या परिघाभोवती चालण्यासाठी २ किलोमीटर लांबीचा, एक साधारण लंबवर्तुळाकार वॉकिंग ट्रॅक आहे. त्या चालण्याच्या ट्रॅकच्या परिघाभोवती घोड्यांचा पळण्याचा ट्रॅक आहे. बाहेरच्या ट्रॅकवर दौडणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत, वेगात धावणाऱ्या घोडयांना बघत, रेसकोर्सवर चालण्यात किंवा पळण्यात मला कमालीची नशा वाटते. कधीकधी जवानांची एखादी तुकडी सकाळच्या पीटी परेडला तिथे येते. मग काय, घोड्यांच्या टापांच्या आवाजाबरोबरच, पळणाऱ्या सैनिकांच्या बुटांचा आवाजही येतो आणि रेसकोर्सवरचे वातावरण अजूनच नशिले होते.  आठ-नऊ वर्षांपूर्वीपर्यंत, घरातून  पहाटे ५-५.३० च्या सुमाराला निघून, रेसकोर्सपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर चालत मी सहाच्या आत रेसकोर्सवर हजर असायचे. चार-पाच फेऱ्या जॉगिंग करायचे. पण व्यायामाच्या व्यसनापेक्षा, माझे खादाडीचे व्यसन जास्त प्रबळ असल्याने, माझे वजन वाढत गेले. त्यामुळे जॉगिंगपेक्षा आता सायकलिंगवर भर आहे. पहाटे दहा बारा किलोमीटर सायकलिंग करून नंतर मग रेसकोर्सवरच्या ट्रॅकवर चालत एखादी फेरी मारते. 

रेसकोर्सवर फिरण्यामधे, मला नेमकी कशाची नशा जास्त येते हे सांगणे तसे अवघड आहे. सर्व बाजूने गोलाकार दिसणारे आकाश, आणि थंडगार वारे मनाला भुरळ घालतातच. पण अठरापगड जातींचे, धर्मांचे, लहान मुलांपासून अगदी जख्खड म्हातारे, वेगवेगळ्या वेशभूषा केलेले, विविध नोकऱ्या वा व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले स्त्री-पुरुष मला तिथे दिसतात. फिरत असताना या सर्व व्यक्तींचे बोलणे अर्धवटच माझ्या कानावर पडत असते. ते ऐकण्याचा आणि त्या व्यक्तीबद्दल मनातल्या मनात काही आडाखे बांधण्याचाही मला नाद आहे. त्यातल्या कांहींशीच माझी ओळख आणि काहींशी विशेष मैत्री झालेली आहे. पण अनेक व्यक्तींचे नाव मला किंवा माझे नाव त्यांना माहिती नाही. तरीही आमची "अबोल मैत्री" आहे. रोज ठराविक वेळी दिसणारी व्यक्ती दिसली नाही की मला अगदी चुकल्या-चुकल्यासारखे होते. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी दिसली की अगदी हायसे वाटते. जसे मला वाटते अगदी तसेच त्यांनाही वाटत असणार याची मला खात्री आहे. त्यातली एखादी व्यक्ती इतर वेळी बाहेर कुठे भेटली तर आम्ही अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे, सलगीने बोलायला लागू, असे वाटते. पण या सर्व गोष्टींपेक्षाही रेसकोर्सच्या वातावरणात ऐकू येत असलेल्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाच्या नादात, माझ्या मनाला, एखाद्या अबलख वारूसारखे उधळू द्यायला मला फार आवडते. 

सध्या लॉकडाऊनमुळे रेसकोर्स बंद आहे. मी रोज पहाटे पाच-साडेपाचला उठून एम्प्रेस गार्डनच्या मागच्या भागात, व्हिक्टोरिया रोड, नेहरू रोड , अलेक्झांडर रोड, या भागात सायकलस्वारीला जाते. अतिशय शांत, दुतर्फा झाडी असलेला, अनेकविध पक्षांच्या आवाजाने संगीतमय झालेला, वेगवेगळ्या जातींच्या आणि रंगांच्या फुलांनी सजलेला, ब्रिटिशकालीन प्रशस्त बंगले असलेला, हा अतिशय सुंदर परिसर आहे. तिथे फोर्ट कॉम्प्लेक्सच्या आसपास अनेक मोर मला रोज दिसतात. ते मोर पाहून मनी मोर नाचण्याचा, सध्या मी रोज अनुभव घेतेय. पण या सगळ्या रम्य वातावरणात, माझ्या मनाला बेलगाम उधळू देण्याची किमया करणाऱ्या रेसकोर्सची नशा मात्र नाही. त्यामुळेच कधी एकदा हा लॉकडाऊन संपतोय आणि रेसकोर्स चालू होतंय याचीच  मी आतुरतेने वाट बघतेय.

शनिवार, २३ मे, २०२०

"आईने केलेले" डिंकाचे लाडू!

माझ्या मुलीला, असिलताला दिवस गेल्याचे माझ्या आईला कळल्यावर ती खूपच आनंदली होती. पण बाळंतपणासाठी मी काहीच तयारी करत नाहीये, हे बघून ती अस्वस्थ झाली होती. जवळच्या कोणालाही दिवस गेल्याचे कळले, की तिची तयारी सुरु व्हायची. स्वेटर विणायला घेणे, रंगीत तुकडे जोडून सुंदर दुपटी शिवणे, उबदार कापड आणून त्याच्या बंड्या शिवणे, जुन्या मऊ साडया एकावर एक जोडून सुंदर गोधड्या शिवणे, अशी जय्यत तयारी ती हळूहळू करत असायची. त्यामुळे बाळ व्हायच्या आधी छानसा बाळंतविडा  तयार असायचा. बाळ जन्मले की बाळंतिणीसाठी डिंकाचे आणि अळिवाचे लाडू, खसखसीच्या वड्या, बदामाची खीर, शिरा असे अनेक पदार्थ करण्यात ती पुढे असायची. बरेच येणे-जाणे असलेल्या तिच्या मोठ्या घरातल्या कामाचा धबडगा सांभाळत, हे सगळेदेखील ती अगदी हौसेने करायची हे विशेष! 

२०१९ च्या मे  महिन्यात आई पुण्याला आलेली होती. आपण पणजी होणार याचा आनंद असला तरीही तिला स्वतःला हे काहीच करणे शक्य नव्हते. पण मी बाळंतविडा करणे अत्यावश्यक आहे, असा तिचा आग्रह होता. एकीकडे आईने हा धोशा लावला होता, तर दुसरीकडे, आईची तब्येत अगदी नाजूक असताना तिला मागे सोडून बाळंतपणासाठी, इतक्या लांब मी येऊच नये, असे असिलता म्हणत होती. पण मला जायची इच्छा होती. मधला मार्ग म्हणून, थोड्या काळासाठी का होईना, मी ऑस्ट्रेलियाला जायचे ठरवले. असिलता आणि आमचा जावई आनंद, या दोघांनी, त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी बरीच तयारी केलेली होती. तसेच, असिलताच्या सासूबाईंनी बरेच कपडे आणून दिले होते. त्यामुळे, बाळंतविडा करण्यात मी वेळ घालवू नये, असेही असिलताने मला सांगितले होते. तरी असिलताशी बोलून, तिला लागणाऱ्या काही गोष्टींचा मी अंदाज घेतला होता. त्यानुसार, जुन्या सुती साड्या आणि ओढण्या वापरून दोन-तीन दुपटी आणि गोधड्या मी शिवल्या, काही लंगोट विकत आणले. बाळंतविडा करण्यासाठी मी काहीतरी हालचाल करते आहे  हे बघून आई जरा शांत झाली. 

जून महिन्यात माझे आई-वडील पुण्याहून सोलापूरला त्यांच्या घरी परत गेले. ऑस्ट्रेलियाला जाण्याआधीचा दीड महिना सोलापूरला अनेक चकरा मारून मी आईची औषधे, मोलकरणी वगैरे व्यवस्था लावून दिली. तरीही आईच्या काळजीने माझी घालमेल होत होती. तर, बाळंतिणीसाठी मी डिंकाचे लाडू करणार नाहीये, हे समजल्यामुळे आईचा जीव कासावीस होत होता. पूर्वीपासून अनेक वर्षे, माझ्याकडेही आई वेगवेगळे लाडू करून पाठवीत असायची. पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे मी जी सदासर्वकाळ गर्भारशी असल्यासारखी दिसते, त्यासाठी आई व तिचे लाडूच जबाबदार आहेत, असे मी गमतीने नेहमी म्हणायचे. त्यामुळेच, कुठलेही लाडू आणायचे नाहीत, अशी तंबी असिलताने मला दिलेली होती. मलाही डिंकाचे लाडू करण्याची खास इच्छा नव्हती. जुलैच्या शेवटाला, जसजशी  माझी जाण्याची तारीख जवळ आली तसे आईने डिंकाच्या लाडवांसाठी लागणारे सामान आणण्यासाठी हट्टच धरला. मी बरीच टाळाटाळ केली. मला करायला येत नाहीत, इथे कशाला घाट घालायचा? मी निघण्यापूर्वी मुंबईत विकत घेईन, तिच्या सासूबाई करणार आहेत, अशी बरीच करणे सांगून बघितली. पण तिने जाम ऐकले नाही. 

"हे बघ, मीच करणार आहे. मी करत असताना तू पाहा आणि शीक. त्यानिमित्ताने शिकशील तरी." 
असे बोलून आईने मला निरुत्तर केले. पण, आईची तब्येत अगदीच तोळामासा झालेली होती. तिला लाडू करणे जमणार नाहीये हे मला दिसत होते. केवळ तिची इच्छा राखण्यासाठी, माझ्या ऑस्ट्रेलियाला जाण्याचा आधीच्या सोलापूर-फेरीत, मी डिंकाच्या लाडवांचे सामान आणून द्यायला तयार झाले. तीही उत्साहाने गाडीत बसून आमच्याबरोबर सामान आणायला निघाली. कुठल्या तरी पेठेतल्या, तिच्या जुन्या ओळखीच्या एका घाऊक व्यापाऱ्याकडे घेऊन गेली. अमुक झाडाचा डिंक, तमुक प्रकारच्या गोडंब्या असे तिच्या यादीप्रमाणे सगळे सामान घेऊन आम्ही घरी आलो. तोपर्यंत संध्याकाळचे आठ वाजले होते. त्यानंतर एकीकडे तिला जेवायला वाढून, दुसरीकडे ती सांगेल ती व तशी कामे मी करत गेले. काजू-बदामाचे काप करणे, खारकांची पूड करणे, सुके खोबरे किसून भाजून घेणे, गूळ चिरणे, डिंक तळून घेणे, वेलदोड्याची पूड करणे, ही सगळी तयारी करेस्तोवर जवळजवळ रात्रीचे अकरा वाजायला आले. पूर्वतयारी झालेली असल्याने, आता लाडू पाकात टाकणे आणि वळणे एवढेच बाकी होते. पण डिंकाच्या लाडवांसाठी पाक करणे आणि लाडू वळणे ही मोठी कौशल्याची कामे असतात हे मला माहिती होते. त्या दोनही गोष्टी निवांतपणे कराव्यात म्हणून, मी आमची जेवणेही उरकून घेतली होती. 

पाक करायच्या आधी मी आईला म्हणाले, 
"आता या सामानाच्या अंदाजाने किती गूळ घ्यायचा आणि त्याचा पाक किती-तारी आणि कसा करायचा ते सांग."

"अगं, काही नाही. पाक करणं अगदीच सोप्पं असतं. आता ते तू कर. तुला येईल. लाडू मात्र अगदी गरम असतानाच वळावे लागतात बरं का. हात चांगले भाजतात. जरा जपून वळ. आता मला झोप येतेय. मी झोपते." असे म्हणून ती शांतपणे झोपायला निघून गेली !

आईने माझी चांगलीच पंचाईत केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे सोलापूरहून निघून मला पुण्याला परतायचे होते. त्यामुळे ते लाडू वळून झाल्यावर सगळा चिकटलोळ पसारा आवरून झोपणे अनिवार्य होते. पण, "तयार केलेल्या सामग्रीच्या हिशोबाने किती गूळ घ्यायचा आणि लाडवांसाठी पाक कसा करायचा?" हे रात्री अकरा वाजता कोणाला आणि कसं विचारायचं, हा मला प्रश्नच पडला. मग काय, 'रुचिरा' पुस्तक शोधले, यू-ट्यूब बघितले, सर्व साहित्याच्या अंदाजाने गूळ घेतला, आणि देवाचे नाव घेऊन मी पाक तयार केला. सगळे साहित्य पाकात घातले आणि भराभरा लाडू वळले. चांगले पन्नास-साठ लाडू वळून झाल्यावरही अजून बरेच लाडू होणार आहेत हे माझ्या लक्षात आले. तोपर्यंत, किती लाडू होणार आहेत याबद्दल मी माझे डोके वापरलेलेच नव्हते. आईच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, खूप जास्त सामान आणलेले होते आणि भरपूर लाडू तयार होणार होते ! 

सगळी आवरासावर करून, लाडू डब्यांमध्ये भरून, कमालीची दमून मी एक-दीडला झोपले असेंन. पहाटे उठून पुण्याला जाऊन कामाला जुंपून घेणे अशक्य आहे, हे माझ्या लक्षात आल्याने मी पुण्याला परतणे पुढे ढकलले. तो दिवसभर मला चांगलीच दमणूक जाणवत होती. सदैव येणे-जाणे असलेल्या आमच्या त्या मोठ्या घरातली सगळी कामे सांभाळून, इतरांसाठी बाळंतविडे, लाडू आणि इतरही बरेच काही माझी आई कशी काय करत असेल, याचे मला कमालीचे नवल वाटले. आईने तिच्या देखरेखीखाली, माझ्या भाचरंडांसाठी व इतर नातेवाईकांसाठी वेगळे, आणि असिलतासाठी वेगळे, असे डबे मला भरायला लावले. त्याशिवाय नेहमीप्रमाणेच, घरात आल्या-गेलेल्या प्रत्येकाला तिने लाडू खायला दिले. सर्व मोलकरणींबरोबर त्यांच्या पोरा-बाळांसाठी दोन-चार लाडू मला द्यायला लावले. गंमत म्हणजे सगळ्यांना ती मोठ्या आंनदाने आणि अभिमानाने सांगत होती,

"असिलताच्या बाळंतपणासाठी स्वाती ऑस्ट्रेलियाला चालली आहे. डॉक्टर असली तरी स्वातीला काही कळत नाही आणि तिची मुलगीही तसलीच. डिंकाच्या लाडवांशिवाय कुठे काय बाळंतपण होत असते का? माझं ती ऐकतच नव्हती. पण मला करायचेच होते. म्हणून मीच लाडू केले!" 

मी ऑस्ट्रेलियाला गेल्यावर काही दिवसातच आई खूप आजारी पडली. त्यामुळे मी तिकडून जरा लवकरच परतले. "तिने केलेले" डिंकाचे लाडू तिच्या नातीने खाल्ले, हे ऐकल्यावर तिला खूप बरे वाटले. आईचे ते आजारपण जवळजवळ शेवटचे आजारपण ठरले. पण ती जायच्या आधी, तिच्या लाडक्या नातीच्या बाळंतपणासाठी डिंकाचे लाडू करण्याचे समाधान तिला मिळाले, हे एक बरे झाले!      
     

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

बाबांनो वेळ काय सांगून येत नाही!

सध्या संपूर्ण जगावर करोना महामारीचे संकट ओढवले आहे. हातावरचे पोट असलेल्या गरीब लोकांची रोजगाराच्या अभावामुळे उपासमार होत आहे. पण सुखवस्तू मध्यमवर्गावरही याचा परिणाम झाला आहे. डॉक्टर, वकील, सीए इत्यादी व्यावसायिकांचे उत्त्पन्न बंद झाले आहे. खाजगी नोकरीतील लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. अनेक मध्यमवर्गीय लोकांची चाललेली कुरकुर माझ्या कानावर पडतेय. सोशल मीडियावर आपल्या स्तिथीची रडगाणी लोक गात आहेत. पण माझ्या माहेरच्या आणि सासरच्या वडीलधाऱ्यांनी केलेल्या संस्कारांमुळे या परिस्थितीचा सामना मी मात्र अगदी लीलया करू शकते आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये मी मनोमन त्यांचे आभार मानते आहे.  

माझ्या माहेरच्या एकत्र कुटुंबात उत्तम आर्थिक परिस्थिती असली तरीही आम्हा भावंडांना घरातली छोटी-छोटी कामे करावीच लागायची. त्याकाळीही आमच्या घरात मोटरकार होती. पण ती फक्त काकांना आणि वडिलांना कामाला जाण्यासाठी वापरली जायची. आम्हा मुलांना शाळेत जाताना चालत अथवा बसनेच जावे लागायचे. फोन आणि फ्रीज  या वस्तूंना हात लावायची आम्हा लहानमुलांना मनाई होती. "शिकून मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वकमाईने या वस्तू घ्या आणि मग वापरायला लागा", असे सांगितले जायचे. शिसपेन्सिलीचा तुकडा बोटांमध्ये धरणे अशक्य होईपर्यंत नवीन शिसपेन्सिल मिळत नसे. मोठ्या भावंडांची जुनी पुस्तके, दप्तरे,गणवेश व इतर कपडे लहानभावंडे वापरायची. त्यावेळी या असल्या शिस्तीचा खूप राग यायचा. नवीन कपडे, वस्तू यांचे फार अप्रूप वाटायचे.  

घरात सुबत्ता असली तरीही अन्न किंवा कुठलीही वस्तू वाया घालवलेली चालत नसे. पानात वाढलेले संपवावेच लागे. बाहेरून खाद्यपदार्थ आणायची किंवा बाहेर जाऊन खाण्याची मुभा नव्हती. आई-काकू-आजी सतत  स्वयंपाकघरात राबत असायच्या. "कितीही शिकली तरीही बाईला चूल आणि मूल काही चुकत नाही" हे वाक्य मी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही मला ऐकावे लागायचे. कोणीही मला स्वयंपाक करायला शिकवल्याचे आठवत नाही. पण आई-आजीच्या हाताखाली रोज काम करता-करता आपसूक शिकले, हेच खरे. आई-आजीं पैकी कोणी परातीत कणिक मळली की त्या परातीला कणकेचा एक कणही राहायचा नाही. पालेभाजी निवडताना एक पानही कचऱ्यात जाऊ दिले जायचे नाही. ते बघून-बघून मलाही तशीच सवय लागली. रोज सकाळी आजी आदल्या दिवशीचे उरलेले अन्न बाहेर काढून ठेवायची. उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी तरी व्हायची किंवा गूळ-तूप घालून लाडू व्हायचा. शिळ्या भाताला चमचमीत फोडणी देऊन केलेला 'फोडणीचा भात' केंव्हाच फस्त व्हायचा. उरलेल्या भाजी-आमटीचे थालीपीठ लागायचे. एखादेवेळी फारच जास्त अन्न उरले तर ते वेळच्यावेळी मोलकरणींना घरी न्यायला दिले जायचे. 

माझे सासूसासरेही खर्चिक नव्हते. वयाच्या ऐंशी वर्षांनंतरही ते दोघेही स्वावलंबी होते. आपल्या अपत्यांकडून कसलीही आर्थिक मदत न घेता अत्यंत समाधानी आयुष्य जगत होते. आनंद आर्मी ऑफिसर असल्याने  ठराविक मासिक वेतन आमच्या घरात नियमित यायचे. आर्मीमध्ये देखील बऱ्याच ऑफिसरांचे राहणीमान खूप खर्चिक असायचे. उंची दारू, महागडे कपडे आणि दागदागिन्यावर बराच खर्च करणारे ऑफिसर आमच्या अवती-भोवती होते. पण आम्ही दोघांनी मात्र कधीही वायफळ खर्च केलेला आठवत नाही. तसेच आमची घरकामाची सवयही आम्ही कधी मोडली नाही. त्यामुळे आमच्या मुलांनाही तशाच सवयी लागल्या. मुलांच्या इंग्रजी मिडियम शाळांमध्ये गर्भश्रीमंतांची मुले असायची. त्यांची चैन बघून कधीकधी आमच्या मुलांना वैषम्य वाटायचे. पण ऐहिक सुखांच्या मागे लागण्यातला फोलपणा आम्ही दोघेही त्यांना नीट समजावून सांगायचो. त्यामुळेच आमची मुले कष्टाळू, समाधानी व आनंदी झाली आहेत. मुलांमध्ये अशी वृत्ती व स्वावलंबन बाणण्यासाठी त्यांच्यासमोर रोल मॉडेल लागते. माझ्या सासर-माहेरच्या घरातून मला ते मिळाले. त्यामुळेच आमच्या सवयी साध्या राहिल्या आणि आम्हीही मुलांना तसेच घडवू शकलो.      

लहानपणी सणावाराच्या गोष्टींमध्ये, "उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका", हे वाक्य असायचे. त्या गोष्टींमधे घडणाऱ्या चमत्कारांवर माझा कधीही विश्वास बसला नाही. पण  उतणे-मातणे अयोग्य आहे, हे मात्र मनावर बिंबले. "खाऊन माजा पण टाकून माजू नका" अशा वाक्यांमुळे आणि वडिलधाऱ्यांच्या आदर्श वागणुकीमुळे वृत्तीत कधीही माज आला नाही. मागच्या पिढीतल्या वडीलधाऱ्यांच्या इतके साधे जीवन आम्ही निश्चितच जगत नाही आहोत. परंतु, केवळ पैसे आहेत म्हणून विकत घेता येणाऱ्या सर्व सुखांच्या मागेही आम्ही लागलेलो नाही. 

आज करोनाच्या साथीमुळे घरात नोकर-चाकर नाहीत, प्रत्येक काम स्वहस्ते करावे लागते आहे. तरीही आम्हाला काहीही अडचण येत नाहीये. वाट्टेल तो बाजारभाव असेल तरीही भाजी-पाला, दूध व अन्नधान्य विकत घेणे आपल्याला शक्य आहे, याबाबत आम्ही समाधानी आहोत. त्याउलट, चालत जाऊन भाजी आणणे, घर स्वच्छ करणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी सोपी कामेही अनेक सुखवस्तू लोकांना जड जात आहेत. आपल्या नोकरमाणसांचे घर कसे चालत असेल? या काळजीपेक्षा, नोकरांशिवाय आपल्याला आलेल्या पंगुत्वाचे रडगाणे हे लोक गात आहेत. बँकेत भरपूर पैसे असूनही छानछोकीचे जीवन जगता येत नसल्याने, सुस्थितीतल्या  बऱ्याच लोकांची चडफड होत असताना मी पाहते आहे. घरकाम करून वैतागलेल्या, दारू, हॉटेलींग, शॉपिंग, पार्टीज या चैनींशिवाय तडफडणाऱ्या सुखवस्तू, सुशिक्षित मध्यमवर्गीयांची चडफड पाहून-ऐकून, मी अचंबित होतेय. अचानक आलेल्या करोनाच्या या संकटाच्या निमित्ताने का होईना, अश्या लोकांनी साध्या जीवनशैलीचे महत्व लक्षात घ्यावे असे मला वाटते. या वैतागलेल्या लोकांना मला अगदी कळकळीने सांगावेसे वाटते की, "बाबांनो, वेळ काय सांगून येत नाही"    

बुधवार, ११ मार्च, २०२०

विटाळशीची खोली!

माझ्या माहेरचे घर म्हणजे शंभरी गाठायला आलेला भला मोठा वाडा आहे. सोलापुरात मध्यवर्ती भागातल्या नवीपेठेच्या मुख्य रस्त्याच्या आतल्या एका बोळात वाड्याचा पुढचा दरवाजा उघडतो. तर वाड्याचा मागचा दरवाजा भागवत टॉकीजकडून शिंदे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बोळात उघडतो. वाड्याच्या मागच्या बाजूला साधारण बारा-पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंत आहे. त्या जाडजूड भिंतीतच वाड्याचे मागचे दार आहे. त्या दारातून येऊन प्रशस्त अंगण  पार करून आपण आलो की वाड्यातल्या राहत्या खोल्या आहेत. वाड्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या एका खिडकीतून नवीपेठेतल्या मुख्य रस्त्यावरची, आणि मागच्या दारात उभे राहिले की मागच्या रस्त्यावरची रहदारी दिसते. तरीही त्या रस्त्यांवरच्या गजबटाचा त्रास, वाड्यात जाणवत नाही. तसेच वाड्यात आत काय चालले आहे, हे  बाहेरून  कोणालाही समजत नाही.

माझ्या पणजोबांनी १९२५ साली हा वाडा, चुना-मातीने बांधून घेतला होता. त्यानंतर १९७४-७५ साली, पूर्वीचे बांधकाम जुने झाले असल्याने माझ्या वडिलांनी वाड्याच्या मधला बराचसा भाग पाडून तिथे सिमेंट-काँक्रीटचे पक्के बांधकाम करून घेतले. वाड्याच्या दर्शनी भागात, माझ्या पणजोबांच्या काळापासून वापरात असलेली, एक मोठे आणि एक लहान, अशी दोन ऑफिसेस आणि त्यावरची माडी आहे. पणजोबांनी १९२५ साली बांधलेल्या वाड्याचा हा भाग, वाड्याचे नूतनीकरण करताना, न पाडता तसाच ठेवला आहे. वाड्याच्या मागच्या अंगणात उघडणाऱ्या तीन खोल्या आणि त्यावरची माडी, हा भाग माझ्या पणजोबांनी १९२८ साली बांधून घेतला होता. तो जुना भागदेखील आज तसाच आहे. त्या तीन खोल्यांमधली एका कडेची अंधारी खोली, ही 'बाळंतिणीची खोली' आहे. त्या खोलीबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन. पण सांगायचं मुद्दा असा की सध्या अस्तित्वात असलेला वाडा म्हणजे, बाहेरून जुना आणि आत मात्र जुन्या आणि नव्या बांधकामाचा सुंदर मिलाफ असलेला, असा आहे.

वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीलगतच्या एका कोपऱ्यात पूर्वी एक 'विटाळशीची खोली' होती. त्या  खोलीत आतल्या बाजूला एक मोरी होती आणि खोलीत जायला मागच्या अंगणात उघडणारा दरवाजा होता. तीन बाजूंनी उंच भिंती असलेली ती अरुंद, लांबुळकी खोली, लहानपणी मला एखाद्या खोल गुहेसारखी वाटायची. ती खोली म्हणजे आम्हा भावंडांसाठी मोठाच कुतुहलाचा आणि रागाचाही विषय होता. अधून-मधून आई-काकू किंवा पाहुण्या आलेल्या कोणी आत्या-माम्यांना सुध्दा, तीन-चार दिवस शिक्षा मिळाल्यासारखे तिथे का बसावे लागते? याबाबत एकीकडे कमालीचे कुतूहल होते, तर दुसरीकडे, त्या चार दिवसांत आईजवळ जाता येत नाही, याबद्दलचा राग असायचा. आमचं सगळं घर आजीच्या धाकात असायचे. विटाळशीच्या खोलीतल्या बाईजवळ कोणीही जायचे नाही, हा आजीने घालून दिलेला अलिखित नियम होता. तिथे फक्त बायकांना आणि कधीकधीच का बसावे लागते? इतरवेळी कोणालाच त्या खोलीत का जाता येत नाही? असे अनेक प्रश्न मनांत असायचे. पण त्याबाबत कोणालाही काही विचारायची सोय नव्हती. आईला विचारले, तर "तू लहान आहेस, तुला नाही कळायचे, कावळा शिवला की तिकडे बसावे लागते किंवा अगोचरपणा करू नकोस, आजीने सांगितलेले ऐकायचे, उगीच भलते प्रश्न विचारायचे नाहीत," असली उडवाउडवीची उत्तरे मिळायची. आमच्यापैकी कुणीही,  विटाळशीच्या खोलीबद्दलचे प्रश्न फारच लावून धरले, तर पाठीत एक चांगला सणसणीत रट्टा मिळायचा, पण समाधानकारक उत्तर कधीच मिळायचे नाही. जुन्या वाड्याचे नूतनीकरण  करताना, म्हणजे साधारण १९७५-७६ साली ती खोली पाडल्यामुळे वाड्यातून कायमची गायब झाली.

आई किंवा काकू त्या खोलीत गेल्या की आजी त्यांना धान्य निवडणे, भुईमूगाच्या शेंगा फोडणे, किंवा भाजी निवडणे अशी ठराविक कामे द्यायची. तिथे बसलेल्या बाईला जेवणाचे ताट वाढून दिले जायचे. तिच्यासाठी वेगळे तांब्या-भांडे ठेवलेले असायचे. त्या बाईला तिथे आतच असलेल्या मोरीमध्ये अंघोळ करावी लागे, स्वतःचे कपडेही तेथेच धुवावे लागत आणि तिथेच झोपायला लागायचे. इतर वेळी आई स्वयंपाकघरांत सतत कामं करत उभी असायची. त्यामुळे  आमच्याशी गप्पा-गोष्टी करायला, तिला कधी वेळच नसायचा. त्या चार दिवसांत, आई त्या विटाळशीच्या खोलीत निवांत बसलेली बघून तिच्याजवळ जावे, तिच्याशी गप्पा माराव्यात, असे वाटायचे.  तिला बिचारीला आजीने शिक्षा केली आहे किंवा तिच्यावर अन्याय होतो आहे, असे वाटून कधीकधी तिची कीव यायची. कोणीही लहान मूल चुकून जरी त्या  विटाळशीच्या खोलीतल्या बाईकडे गेले, किंवा तिला शिवले, तर त्या भावंडाला आजी लांबूनच पाणी टाकून अंघोळ करायला लावून मगच घरात घ्यायची. चौथ्या दिवशी, आजी मोलकारीणीला सांगून विटाळशीच्या अंगावर, लांबूनच पाणी टाकायची, विटाळशीला डोक्यावरून अंघोळ करायला लावयाची. अशारितीने तिचे शुद्धीकारण झाले, की तिला घरात प्रवेश मिळायचा. आई घरात आली की मला अगदी हुश्श व्हायचे.

जसजशी मी मोठी व्हायला लागले तसतसे हळूहळू आपोआपच त्या खोलीबाबतचे गूढ उलगडायला लागले. आमच्या गल्लीत राहणाऱ्या काही मुली वयात आल्यामुळे, त्यांना मखरात बसवून ठेऊन, मोठे समारंभ व्हायला लागले. काही मैत्रिणी महिन्यातले तीन-चार दिवस अकारणच शाळा बुडवू लागल्या. आई-आत्या-काकू-मावशी-मोठ्या बहिणी किंवा शाळेतल्या काही मैत्रिणींकडून, दबक्या आवाजात मासिक पाळी बाबत थोडीफार माहिती मिळत गेली. आता आपल्यालाही कधीतरी त्या विटाळशीच्या खोलीत बसायला लागणार, या भीतीने मला ग्रासले. त्यामुळे प्रत्यक्षांत मासिक पाळी सुरु व्हायच्या आधीच, माझ्या मनाने बंड पुकारले. काय वाट्टेल ते होवो आपण त्या खोलीत बसायचे नाही, हे मी मनातल्या मनांत पक्के ठरवून टाकले. आणि मला पहिल्यांदाच पाळी येण्याचा, तो दिवस प्रत्यक्षांत उजाडला. आईला माझा निश्चय सांगितला. आईला माझी भूमिकापटत असली तरीही, माझ्या बंडखोरीला ती पाठींबा देऊ शकणार नाही , हे तिने मला स्पष्ट केले. मग मात्र त्या दिवशी, प्रथमच आजीच्या डोळ्याला डोळे भिडवून , मी काहीही झाले तरी  त्या खोलीत बसणार नाही हे निक्षून सांगून टाकले. आजी चिडली असावी , तीन-चार दिवस  बोलली नाही.  पण मग शेवटी, स्वयंपाकघरात आणि देवघरात यायचे नाही या अटींवर, माझा निर्णय तिने नाईलाजाने आणि नाराजीने स्वीकारला.

तुम्हाला असे वाटेल, मी आज हे इतके उघडपणे आणि सविस्तरपणे  लिहण्याचे कारणच  काय?

गेले चार-पाच दिवस माझे डोळे आलेले आहेत. नुकत्याच जीवघेण्या आजारातून बाहेर पडलेली, दोन्ही किडनीज निकामी झाल्यामुळे दर दोन-तीन दिवसाआड डायलिसिस लागणारी माझी वयोवृद्ध आई, सध्या आमच्याबरोबर राहते आहे . माझ्या संसर्गामुळे तिचे डोळे आले तर बिचारीचे अजूनच हाल होतील, या विचारानेच मीच  स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतले आहे. इथे बसून, व्हाटसऍपवर चॅटिंग करता करता किंवा टीव्ही बघता बघता, भाजी निवडणे, लसूण सोलाणे, कपड्यांच्या घड्या घालणे, अशी काही फुटकळ घरकामे  मी सध्या करते आहे. मला इथे आयते ताटं वाढून आणून दिले जाते आहे. या सर्व गोष्टींमुळे मला माझ्या माहेरच्या वाड्यातल्या त्या विटाळशीच्या खोलीची, आई-काकूंच्या त्या दिवसांची आणि मी पुकारलेल्या त्या बंडाची तीव्रतेने आठवण झाली. गम्मत म्हणजे,  योगायोगाने नेमके कालच माझ्या एका मैत्रिणीने, एका तात्विक मुद्द्यावर माझे मत विचारण्यासाठी व्हॅट्सऍपवर एक चॅट पाठवले.

" माझ्या ओळखीतल्या एका मुलीचे लग्न जवळजवळ ठरत आले आहे. स्थळ उत्तम आहे. दोन्ही बाजूने पसंती आहे. पण सासरचे म्हणताहेत की लग्नानंतर मुलीच्या मासिक पाळीच्या काळांत ते तिला स्वयंपाकघरात येऊ देणार नाहीत  आणि  दवपूजाही करू देणार नाहीत. थोड्यावेळासाठी तू असे समज की, तुझ्या मुलीच्या बाबतीत मुला कडच्यांनी अशी अट घातली असती आणि पुढे जायचे की नाही, या बाबतीतला निर्णय सर्वस्वी तुझ्या हातात असता, तर तू काय केले असतेस?"

मी निश्चितच स्पष्टपणे नकार कळवून टाकला असता, असे माझे मत मी मैत्रणीला मी क्षणार्धांत कळवून टाकले. अर्थात लग्नाच्या मुलीला या अटी मान्य आहेत की नाहीत या गोष्टीला मी जास्त महत्व दिले असते, हेही मी तिला लिहले.त्याउपर, आपल्या दोघींच्याही मुलींची लग्नें झालेली असताना ही चर्चा उगीचच  कशासाठी करत बसायची? असे विचारून, तिला चार स्मायली पाठवून, तो विषय तिथेच संपवला. पण प्रत्यक्षांत, इतक्या वर्षांनंतरही विटाळशीच्या खोलीची खोली, अजूनही तशीच आहे , या जाणिवेने माझे मन मात्र  खिन्न झाले.