मनी माझ्या
मला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार!
शनिवार, १८ मार्च, २०२३
कॅच देम यंग!
शुक्रवार, १७ मार्च, २०२३
'नूतन' सेवा
काल संध्याकाळी मला व्हॉट्सऍपवर नूतन या माझ्या बालमैत्रिणींचा संदेश आला, "तुला कधी फोन करू गं?'
संदेश वाचल्या-वाचल्या, तिला माझ्याशी काय बोलायचे असणार आहे, याचा मला अंदाज आला. मी लगेच तिला फोन लावला.
"अगं, ते बाळ आहे ना, त्याला गेले कितीतरी दिवस खोकला आहे. त्याची आई काही लक्षच देत नाही बघ. नुसतं बाटलीच्या दुधावर ठेवते. दहा महिन्याच्या बाळाला सगळं चारायला हवं ना? मी पंधरा दिवस सोलापूरला होते. परत आले तर आमच्या बाळाची हाडं अगदी वर आली आहेत. आता मी दिवसभर त्याला माझ्याकडेच ठेऊन खाऊ-पिऊ घालणार आहे. अजून काही टॉनिक वगैरे देऊ का सांग ना?" नूतन कळकळीने विचारत होती.
जवळजवळ सहा महिने झाले, दर महिन्या-पंधरा दिवसाला तिच्या शेजाऱ्यांच्या एका बाळासाठी नूतन माझा असाच काही-बाही सल्ला घेत असते.
मी म्हणाले, "नूतन, असं बाळाला न बघता सांगणं अवघड आहे. पण तू त्याला भरपूर खायला घाल. त्यातून त्याला सगळं पोषण मिळेल. बाळाच्या नेहमीच्या डॉक्टरांनी त्याला काय औषधे दिली आहेत, तेही बाळाच्या आईला विचारून सांग. मग बघूया."
"खायला तर मी घालतेच आहे गं. त्याच्यासाठी छोट्या कुकरमध्ये मुगाच्या डाळीची मऊ खिचडी शिजवून, तूप घालून त्याला चारते. वरण-चपाती, दूध-चपाती, इडली, शिरा, उपमा, सगळं चारते. बाळाचे हाल बघवत नाहीत गं. मी नसले की हे लोक चार-चार दिवस बाळाला अंघोळ पण घालत नाहीत. कितीदातरी मीच त्याला अंघोळ घालते. आपण सोलापूर सिव्हिलला असताना अगदी भिकाऱ्यांना सुद्धा खायला घालायचो, अंघोळ घालायचो. हे तर माझ्या शेजाऱ्यांचे बाळ आहे. याचं तर मी सगळं करतेच गं."
नूतनने भिकाऱ्यांची आठवण काढली आणि माझ्या मनामध्ये अगदी चर्रर्र झाले. सोलापूर हा दुष्काळी जिल्हा. चाळीस वर्षांपूर्वी तर अनेकांची फार हलाखीची परिस्थिती असायची. अत्यंत खंगलेले, भुकेकंगाल भिकारी बरेचदा आमच्या वार्डांमध्ये भरती व्हायचे. अगदी हाडापर्यंत गेलेल्या त्यांच्या जखमांमध्ये अळ्या झालेल्या असायच्या. तसले रुग्ण अनेक महिने वॉर्डमध्ये पडून असायचे. त्यांच्याजवळ गेले तरी कमालीची दुर्गंधी यायची. अशा त्या रुग्णांची सेवा-सुश्रुषा करणाऱ्या काही मोजक्याच परिचारिका आणि डॉक्टर्स असायचे. बाकीचे त्यांना हिडीस-फिडीस करायचे किंवा अगदी पळवून सुद्धा लावायचे. रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या नूतनने ते काम मनापासून केले असणार याची मला जाणीव झाली.
नूतन सोनतळे ही माझी बालमैत्रीण. तिची आई सोलापूर महानगरपालिकेच्या लेडी डफरिन हॉस्पिटलमध्ये मेट्रन होती. आम्ही शाळेत असताना, डफरिन हॉस्पिटलच्या आवारातच असलेल्या क्वार्टर्समध्ये नूतन राहायची. तिचे घर आमच्या शाळेच्या अगदी जवळ असल्याने, लहानपणी कितीदातरी आम्ही तिच्या घरी जायचो. पुढे, नूतन आणि मी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असलो तरीही मैत्रीचा धागा पक्का राहिला. बारावीनंतर मी सोलापूरच्या वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला लागले. नूतनचे लग्न होऊन ती सौ रोहिणी पडसलगी झाली व सोलापूर सिव्हिलला ती परिचारिका म्हणून रुजू झाली. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही वर्षे आमची भेट होत राहिली. पुढे अनेक वर्षे ती तिच्या नोकरीत, मी माझ्या व्यवसायात, आणि आम्ही दोघीही आपापल्या संसारात गुंतून गेल्यामुळे भेट क्वचितच होत असे. मात्र मागील काही वर्षे, आमच्या शाळेच्या दहावीच्या बॅचचा व्हॉट्सऍप ग्रुप झाल्यामुळे, आम्ही पुन्हा एकमेकींच्या जवळ आलो.
'सिस्टर इन-चार्ज ऑफ ऑपेरेशन थिएटर' या पदावरून, जवळपास दोन वर्षांपूर्वी नूतन निवृत्त झाली. पण सेवाभाव तिच्या रक्तातच आहे. त्यामुळेच, शेजाऱ्यांच्या लहान बाळाला खायला-प्यायला घालणे, न्हाऊ-माखू घालणे ही कामे ती आपणहून करते, याची मी साक्षीदार आहे.
माझ्या बालमैत्रिणीने सेवानिवृत्तीनंतरही चालू ठेवलेल्या या सेवेचा मला खूप अभिमान वाटतो आणि तिचे कौतुक करावेसे वाटते!
शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३
उचलबांगडी!
आम्ही राहतो त्या इमारतीत, वरच्या मजल्यावर एक सत्त्याऐंशी वर्षे वयाच्या आजी राहतात. आजींची तिन्ही अपत्ये परदेशी असल्याने त्या इथे एकट्याच राहतात. त्यांच्या घरी, त्यांच्या सोबतीला राहून घरकाम करण्यासाठी, गौरी कांबळे नावाची एक चाळीशीची बाई राहत होती. २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आजी अगदी खुटखुटीत आणि चालत्या फिरत्या होत्या. पण २१ नोव्हेंबर २०२२ ला त्यांच्या पाठीच्या मणक्यातून असह्य कळा जायला लागल्या. त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट व्हावे लागले. तिथे त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या. त्यांच्या दोन मणक्यांना फ्रॅक्चर झालेले आहे असे निदान झाले. योग्य उपचार सुरु करून त्यांना २६ नोव्हेंबरला घरी सोडण्यात आले.
आजी घरी आल्यानंतरही दोन आठवडे त्यांच्या मणक्यातून कळा जातच होत्या. त्यांना कुशीवर वळायलाही त्रास होत होता. पण औषधोपचारामुळे आणि विश्रांतीमुळे हळूहळू त्यांना बरे वाटायला लागले. त्या दरम्यान, स्पेनमध्ये स्थायिक असलेली त्यांची मुलगी आपल्या आईची शुश्रूषा करायला त्यांच्याजवळ येऊन राहिली. शेजारधर्म म्हणून मी जमेल तसे, आजींची विचारपूस करायला, काही खाद्यपदार्थ-फळे द्यायला त्यांच्याकडे वरचेवर जात होते. त्यातून मी वैद्यकीय व्यावसायिक असल्याने, त्यांना लागेल ती वैद्यकीय मदतही करत होते.
साधारण १५ डिसेंबर २०२२ च्या सुमारास, दुखणे जरा कमी झाल्यानंतर आजींना त्यांच्या सोन्याच्या बांगडीबद्दल आठवण झाली. २१ नोव्हेंबरला त्यांना हॉस्पटलमध्ये नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स आली होती. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी आजीनी त्यांच्या हातातली सोन्याची बांगडी, पलंगाशेजारच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काढून ठेवली होती, हे आजींना पक्के आठवत होते. आजीच्या मुलीने त्या ड्रॉवरमध्ये ती बांगडी शोधली, पण तिथे ती बांगडी काही सापडली नाही. त्यामुळे तिने घरामध्ये सगळीकडे शोधाशोध सुरु केली. आजी हॉस्पिटलमध्ये असताना, गौरी घरी येत-जात होती. त्यामुळे गौरीने ती बांगडी कुठेतरी ठेवली असण्याची अथवा स्वतःच घेतली असण्याची शक्यता दाट होती. त्यामुळे, "गौरी, तू बांगडी कुठे ठेवली आहेस का? कुठे पहिली आहेस का?" अशी विचारणा आजींच्या मुलीने गौरीकडे केली. पण गौरीने कानावर हात ठेवल्यामुळे आजींची आणि त्यांच्या मुलीची पंचाईत झाली.
१६-१७ डिसेंबर २०२२च्या सुमारास मी आजींची विचारपूस करायला गेले असताना, आजींच्या मुलीने ती सोन्याची बांगडी हरवल्याचे मला सांगितले. आजीनी त्वरित पोलिसांची मदत घ्यावी असा मी सल्ला दिला. पण आजी आणि त्यांची मुलगी पोलिसांमध्ये तक्रार द्यायला मुळीच तयार नव्हत्या. पुढचे पाच-सात दिवस, पोलिसांमध्ये तक्रार देणे कसे आवश्यक आहे , हे मी त्या दोघीना सातत्याने सांगत होते. शेवटी २३ डिसेंबर २०२२ रोजी, पोलीस घरी येऊन तक्रार घेणार असतील तरच आम्ही तक्रार देऊ' या बोलीवर त्या दोघी तयार झाल्या. मी त्वरित १०० क्रमांकाला फोन करून चोरीबाबत तक्रार केली आणि आजींना येऊन भेटण्याची विनंती पोलिसांना केली. पुढील दहा-पंधरा मिनिटांत दोन पोलीस मार्शल आजींच्या घरी हजर झाले.
आजी आणि त्यांच्या मुलीला मराठी नीटसे येत नसल्याने त्यांनी मलाही त्यांच्या घरीच थांबवून घेतले होते. पोलिसांनी आजींकडून सगळी घटना नीट समजावून घेतली. तसेच गौरी कांबळेकडे बांगडीबाबत चौकशी केली. गौरीने, 'मी ती बांगडी कधीही पाहिलेली नाही' असाच पवित्रा घेतला. खरेतर, आजींच्या हातात ती बांगडी नेहमीच असायची. तेंव्हा मला अचानक एक प्रसंग आठवला. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी मी केक केला होता. तो केक कापतानाच्या फोटोमध्ये आजींची बांगडी दिसत असणार. माझ्या फोनवरचे ते फोटो काढून मी पोलिसांना दाखवले. पोलिसांनी आजींना आणि त्यांच्या मुलीला धीर देत सांगितले की आमचे माधाळेसाहेब अतिशय चांगले अधिकारी आहेत. तुम्ही बंडगार्डन पोलीस स्टेशनला येऊन त्यांना भेटा, ते निश्चित मदत करतील.
आजी अंथरुणाला खिळलेल्या असल्याने, आजींच्या मुलीला घेऊन मी लगेच बंडगार्डन पोलीस स्टेशनमधल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API ) संदीप माधाळेसाहेबांची भेट घेतली. त्यांनी पुन्हा आमच्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला, व बांगडीचा फोटो पहिला. त्यानंतर त्यांनी महिला पोलीस मार्शलना आजींच्या घरी पाठवून गौरी कांबळेला पोलीस ठाण्यामध्ये आणण्याचे आदेश दिले. गौरी पोलीस स्टेशनला आल्यावर, पोलिसांनी मला आणि आजींच्या मुलीला बाहेरच्या बाकावर बसून राहण्याची विनंती केली.
पुढील तास-दीड तास महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीमध्ये, माधाळे साहेब आणि पोलीस सब इन्स्पेक्टर रवींद्र गावडेसाहेबानी गौरीची कसून चौकशी केली. बराच वेळ झाला तरी आतून काही खबर मिळत नसल्याने आजींच्या मुलीचा धीर सुटत चालला होता. शेवटी, 'गौरीने बांगडी उचलल्याची कबुली दिली आहे आणि तिचा साथीदार लोणावळ्याहून रात्री बांगडी परत आणून देईल' अशी खुशखबर घेऊन महिला पोलीस बाहेर आल्या. स्पॅनिश नागरिक असलेल्या आजींच्या मुलीला मी ही खबर सांगितली. पुणे पोलिसांची कार्यतत्परता पाहून ती आश्यर्यचकित झाली.
त्याच रात्री सुमारे साडेबारा वाजता पोलीस सब इन्स्पेक्टर अजय असवले साहेबांचा मला फोन आला. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये येऊन बांगडी घेऊन जायला त्यांनी सांगितले. पोलिसांनी माझ्या हातात ती बांगडी सुपूर्द केली. आणि "ती बांगडी मी आजींच्या वतीने स्वीकारलेली आहे", असे माझ्याकडून लिहून घेतले. त्यानंतर मी त्वरित आजींच्या घरी जाऊन त्यांना त्यांची बांगडी सुपूर्द केली. हे सगळे घडायच्या आधी, बांगडी उचलण्याच्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी आजींच्या घरातून गौरी कांबळेचीच उचलबांगडी केलेली होती हे सांगायला नकोच!
पोलिसांच्या कार्यतत्परतेबद्दल माझ्या मनामध्ये कधीही शंका नव्हती. पण तक्रार केल्यापासून आठ तासांच्या आत, आपली तीन तोळ्यांची बांगडी घरपोच मिळाल्यामुळे, आजींच्या आणि त्यांच्या मुलीच्या मनामध्ये पोलिसांवर आपण 'भरोसा' ठेऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला, हे विशेष!
मला असे प्रकर्षाने वाटते की सामान्य नागरिकांनी पोलिसांची भिती बाळगू नये, आणि पोलीस निष्क्रिय असतात असा विचारही करू नये. त्याउलट, पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेऊन, एखादा गुन्हा घडल्याचे लक्षात येताच पोलिसांची मदत घेणे हेच श्रेयस्कर ठरते.
शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२
'बॅलन्स' सायकल!
माझ्या लहानपणी, एखाद्या कुटुंबामध्ये स्वतःच्या मालकीची सायकल असणे हे सुस्थितीचे लक्षण होते, असे जर आजच्या मुलांना सांगितले तर ते त्यांना खरे वाटणार नाही. सुदैवाने आमच्या घरी सायकल होती. आमच्या एकत्र कुटुंबात आम्ही सात भावंडे एकमेकांबरोबर वाढलो. 'गुण्यागोविंदाने' हा गोंडस शब्द वापरायचे मी मुद्दामच टाळले आहे. कारण आम्ही एकमेकांच्या भरपूर खोड्या काढत, भांडणे-मारामाऱ्या करत, एकमेकांना चिडवत, एकमेकांच्या चुगल्या करत, एकमेकांवर कुरघोड्या करत, पण तरीहि अगदी आनंदात वाढलो.
आमच्या घरच्या मुला-मुलींनी पहिल्या इयत्तेत प्रवेश करण्यापूर्वीच्या उन्हाळी सुट्टीमध्ये 'दुचाकी सायकल शिकलीच पाहिजे' असा जणू दंडकच होता. त्याकाळी रंगीत सायकली, फुलाफुलाची चित्रे असलेल्या सायकली, कमी उंचीच्या सायकली, तोल सांभाळता यावा म्हणून मागे दोन छोटी चाके असलेल्या सायकली, वगैरे अभावानेच असायच्या. तसल्या सायकली असणे हे अतिश्रीमंतीचे लक्षण होते. लेडीज सायकल्स सुद्धा फार कमीच घरांमधून असायच्या. त्यामुळे सर्वाना सरसकट सायकल चालवायला शिकण्यासाठी २४ इंची जेन्टस सायकलच असायची. आम्ही भावंडे सायकल चालवायला ज्या प्रकारे शिकलो, थोड्याफार फरकाने आमच्या पिढीतील सर्वच मुले त्याच पद्धतीने सायकल चालवायला शिकली असावीत.
शिकाऊ मुलाच्या किंवा मुलीच्या सायकलचे सीट व कॅरियर सर्व बाजूने पकडून, सायकल शिकवणे चालू होई. प्रथम डाव्या पायाने डाव्या बाजूचे पेडल अर्धवट मारत, हॉपिंग करायला शिकावे लागायचे. एकदा का हॉपिंग जमले की मग हॉपिंग करत-करत, कंबर डाव्या बाजूला झुकवून, जेन्टस सायकलच्या दांड्याखालून पाय नेऊन उजव्या पेडलवर पाय ठेवण्याच्या दिव्याला सामोरे जावे लागे. त्यानंतर कात्री म्हणजे पेडल्स अर्धवट मारत किंवा हाफ पेडल मारत सायकल चालवणे शिकवले जायचे. ते जमेस्तोवर पायाला खरचटणे, किंवा पाय चाकात, सायकलच्या चेनमध्ये, अचानक खाली आलेल्या सायकल स्टँडमध्ये अडकणे, सायकलची चेन पडणे वगैरे प्रकार होतच असत.
त्यानंतर पुढची पायरी, म्हणजे, फुल पेडलवर सायकल चालवणे शिकवले जायचे. फुल पेडल मारल्यावर पुढे जाणारी सायकल जणू विमान-भरारीचा आनंद त्या शिकाऊ मुलाला देऊन जायची. सायकल पुढे जात असताना भावंडे व इतर मित्रमंडळी सायकलला सर्व बाजूने धरून पळत, शिकाऊ मुलाला शाब्दिक आधारही देत असत. सर्व बाजूंनी आधार असल्याने, शिकाऊ मुलाला पडण्याची भीती नसायची. या शिक्षणामध्ये ब्रेक दाबणे, उजवा ब्रेक कधी दाबायचा, डावा कधी दाबायचा, दोन्ही ब्रेक एकदम कधी दाबायचे, याबाबतचे मौलिक शिक्षणही मिळायचे.
दोन्ही पेडल मारत सायकल चालवण्याचा सराव झाला की भावंडे आणि गल्लीतील इतर मित्र-मैत्रिणी हळूहळू आधार कमी करत. शिकाऊ मुलाच्या तिन्ही बाजूने पळणारी भावंडे, प्रथम फक्त सीट धरून सायकलस्वाराच्या मागून पळायला लागायची. थोड्या सरावानंतर, "मी तुला धरले आहे, तू फक्त पेडल मारत राहा" असे नुसते तोंडाने म्हणत, प्रत्यक्षात मात्र शिकाऊ मुलाला एकटेच सोडून देत असत. सायकल थांबवल्यावर, आपण कुणाच्याही आधाराशिवाय सायकल चालवू शकलो याचा साक्षात्कार त्या मुलाला व्हायचा. असे प्रशिक्षण मिळाल्यावर तयार झालेले ते मूल, मिळेल तेंव्हा आणि मिळेल ती सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद लुटायचे. आमच्या घरात वडिलांकडे आलेल्या पक्षकारांची, पत्र टाकायला घरात गेलेल्या पोस्टमनची, किंवा दूध घालायला आलेल्या गवळ्याची सायकल गुपचूप पळवून एखादी चक्कर मारलेली मला आठवते आहे.
आमची मुले पाच-सहा वर्षांची असतानाच सायकल शिकलो. पण त्यावेळेपर्यंत कमी उंचीच्या, रंगीबेरंगी सायकली आल्या होत्या. आमची मुलगी जेमतेम तीन-साडेतीन वर्षांची असताना तिच्यासाठी आम्ही एक लाल रंगाची सायकल विकत घेतली होती. पुढे धाकट्या मुलासाठीही रंगीबेरंगी सायकल आणली होती. सुरुवातीला दोन्ही बाजूला छोटी चाके असलेल्या सायकलींवर आमची मुले सायकल शिकली. ती जरा मोठी झाल्यावर, सीटवर बसूनही पाय सहजी खाली टेकतील अशा कमी उंचीच्या सायकली त्यांच्यासाठी आणल्या. पाय खाली टेकत असल्यामुळे मुले थोडीफार पडत, धडपडत सायकल शिकली. मुले अजून थोडी मोठी झाल्यावर, सायकलवरच शाळेला जायला लागली. मुलीसाठी आम्ही छानशी लेडी-बर्ड सायकल आणली होती आणि मुलासाठी गियरवाली सायकल आणली होती.
सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या आमच्या मुलीने आणि जावयाने, सुमारे नऊ-दहा महिन्यापूर्वी, नूरसाठी, म्हणजे आमच्या छोट्या नातीसाठी, एक लहान सायकल विकत घेतली. त्यावेळी नूर जेमतेम दोन-सव्वादोन वर्षांची असेल. ती सायकल चालवत असतानाचे नूरचे फोटो आणि व्हिडीओ पाहून आम्ही चकितच झालो. मुख्य म्हणजे, त्या सायकलीला पेडलच नव्हती! अशा सायकलला बॅलन्स सायकल म्हणतात असे मला त्या वेळी प्रथमच कळले. तिचे पाय सहजी टेकतील एवढ्याच उंचीची ती सायकल होती. सुरुवातीला पाय टेकवत-टेकवत सायकल पुढे नेण्याचा सराव मुलाने करायचा, आणि ते जमायला लागले व सायकलला वेग आला की जमिनीवरून दोन्ही पाय उचलून, सायकलचा तोल सांभाळत, भरारी घेत पुढे जायचे, अशी त्या सायकलची योजना होती.
बॅलन्स सायकलमुळे तोल सांभाळण्याचा सराव मुलांना होतो. ही सायकल उंचीने अगदीच कमी असते. तसेच ती चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य असते. त्यामुळे सरावादरम्यान मूल पडले तरी फारशी इजा होत नाही. पुढच्या दोन-तीन महिन्यातच दोन्ही पाय उचलून, आपल्या शरीराचा तोल सांभाळत सफाईने बॅलन्स सायकल चालवतानाचे नूरचे व्हिडीओ बघून आम्हाला खूप कौतुक वाटले. मुले जरा मोठी झाल्यावर पेडल्सवाली सायकल, तोल सांभाळत सहजी चालवू शकतात. जेमतेम साडेतीन वर्षांच्या नूरसाठी आता पेडल्सवाली नवीन सायकल आणली आहे.
![]() |
बॅलन्स सायकलचा प्रातिनिधिक फोटो |
बॅलन्स सायकलची कल्पना मला भलतीच आवडली. त्याचबरोबर, अर्धे पेडल-पूर्ण पेडल, हा आमच्या लहानपणीचा प्रवासदेखील आठवला. सायकल शिकण्याच्या त्या प्रवासातला सायकलभोवतीचा भावंडांचा किंवा मित्रमंडळींचा घोळका आठवला. हल्लीच्या मुलांना अगदी लहानपणीच स्वतःचा तोल सांभाळायची कला अवगत होतेय, हे खरे आहे. पण त्यांच्याभोवती, आमच्या लहानपणी होता तसा भावंडांचा आणि मित्रमंडळींचा घोळका मात्र नाही, याचे कुठेतरी वाईटही वाटते. सायकलचे पेडल उलटे फिरवत 'स्टाईल'मध्ये सायकल चालवण्यातही एक निराळी मजा होती, पण आज काळाचे चक्र उलटे फिरवणे आपल्या हातात थोडेच आहे?
काकवीचा चहा!
बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२
१४. मलबारची सफर- तळी देऊळ आणि कप्पड बीच
१६ तारखेला सकाळी आमची मलबारची सफर संपणार होती. आमचे सहप्रवासी सकाळी १० वाजता हॉटेल सोडणार होते कारण त्यांना मुंबईची फ्लाईट पकडायची होती. पण त्याआधी सकाळीच तळी देऊळ बघायचे ठरले होते. शुभेन्दु, आनंद आणि दादा देऊळ बघायला आले नाहीत. बाकीचे आम्ही सर्वजण सकाळी अंघोळी करून देवदर्शनाला निघालो. देऊळ हॉटेलपासून जवळ असल्यामुळे, चालतच गेलो. या देवळामध्ये प्रवेश करण्यासाठी, तेथील नियमानुसार, पुरुषांना लुंगी नेसावी लागते. देवळाच्या बाहेर, २० रुपये देऊन भाड्याने मिळत असलेल्या लुंग्या परिधान करून, आमच्या बरोबरची पुरुषमंडळी तयार झाली आणि आम्ही सगळेजण देवळामध्ये गेलो.
हे कोळीकोडमधील प्राचीन मंदिर आहे. स्वामी थिरुमूलपाद यांनी १४व्या शतकात हे मंदिर बांधले. तेथील झामोरिन राज्यकर्त्यांचे हे कौटुंबिक मंदिर होते. १८व्या शतकात टिपू सुलतानने कोळीकोडवर केलेल्या आक्रमणामध्ये या मंदिराचे बरेच नुकसान झाले होते. १९६४ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. गर्भगृहातील ज्योतिर्लिंगाची स्थापना परशुरामन यांनी केल्याचे मानले जाते. हे भव्य मंदिर पारंपारिक केरळी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. मंदिरात लाकडी कोरीव काम, सुंदर भित्तिचित्रे आणि कलात्मक रचना असलेले छप्पर आहे. गर्भगृहाच्या भिंती रथाच्या आकारात बांधलेल्या आहेत. गर्भगृहातील मुद्रा उमामहेश्वराची आहे. हे मंदिर जरी शिवमंदिर असले तरीही या मंदिरात, गणपती, विष्णू श्रीकृष्ण, अय्यप्पा, नरसिंह यांच्याही मूर्ती आहेत. आम्ही गेलो तेंव्हा देवळामध्ये विशेष गर्दी नसल्यामुळे आम्हाला शांतपणे दर्शन घेता आले.
आम्ही हॉटेलवर परत आलो तोवर दादा आणि आनंद जागे झालेले होते. आम्ही सहप्रवाशांनी तळमजल्यावर नाश्ता घेतला.
![]() |
सहप्रवाशांसोबत तळी मंदिरासमोर |
इडली-वडा, पुरी-भाजी, कॉर्नफ्लेक्स-दूध, ब्रेड-लोणी, जॅम आणि 'Eggs to order' असे अनेक पदार्थ मांडलेले होते. पण चार दिवस आमच्यासोबत असलेले सहप्रवासी आम्हाला सोडून जाणार असल्यामुळे, आम्हाला अन्न गोड लागत नव्हते. मुंबईला परतणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर सोडायला निलेश राजाध्यक्ष आणि सुमंत पेडणेकरही गाडीमधून जाणार होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन खोलीवर परत आलो.
१६ तारखेचा संपूर्ण दिवस आमच्यासाठी मोकळाच होता. पण आदल्या रात्री उशिरा मला खोली बदलावी लागली असल्यामुळे आमची झोप पूर्ण झालेली नव्हती. म्हणून, थोडा वेळ विश्रांती झाल्यावर टॅक्सी करून कप्पड बीचवर जाऊन यावे, असे आम्ही ठरवले. ट्रेनिंगच्या काळापासून आनंदसोबत असलेले दोन आर्मी ऑफिसर सेवानिवृत्तीनंतर कोळीकोडला स्थायिक झालेले आहेत. त्यांच्याशी आनंदने आधीच संपर्क साधलेला होता. त्यापैकी एक, कर्नल रामकृष्ण आम्हाला त्या रात्री त्यांच्या घरी जेवायला येण्याचा आग्रह करत होते. परंतु, संध्याकाळी लवकर हॉटेलवर परतून झोपण्याची आमची इच्छा असल्याने, आम्ही नम्रपणे नकार दिला.
आम्ही टॅक्सी करून कोप्पड बीचला जाणार, हे ऐकल्यावर, कर्नल रामकृष्णनी सुचवले की दुपारी चारच्या सुमारास, त्यांच्या गाडीतून ते स्वतःच आम्हाला कप्पड बीचवर घेऊन जातील. ती सूचना मात्र आम्ही लगेच उचलून धरली. त्यांच्या गाडीतूनच आम्ही कप्पड बीचला गेलो. वाटेत गप्पा मारता-मारता, कोळीकोडबद्दल आणि एकूणच केरळच्या इतिहासाबाबत बरीच माहिती त्यांनी आम्हाला सांगितली.
१४९८ साली, कप्पड येथील पुळणीवर वास्को-द-गामाने पाय ठेवताक्षणी, भारतावरच्या युरोपीय आक्रमणाच्या इतिहासाची सुरुवात झाली होती. त्या घटनेची आठवण करून देणारा एक संगमरवरी शिलालेख त्या किनारपट्टीवर असल्याचे कर्नल रामकृष्णांनी आम्हाला सांगितले. त्यांच्या लहानपणीच्या आठवणीप्रमाणे, ते स्मारक अगदी समुद्रालगत होते. परंतु, ते आम्हाला कुठेच दिसेना. चौकशी करता समजले की, किनारपट्टीचे सुशोभीकरण करताना ते समुद्रकिनाऱ्यापासून जरा दूर नेऊन उभारले होते. आम्ही ते स्मारक शोधले आणि त्यासमोर आमचा फोटोही काढून घेतला.
![]() |
वास्को द गामा स्मारकशिला |
त्यानंतर, जवळच्या कॅफेमध्ये बसून सँडविचेस आणि चहाचा आस्वाद घेत-घेत सूर्यास्त पाहण्याचा आमचा विचार होता. बसल्या-बसल्या मी विचार करू लागले, की वास्को-द-गामा भारतामध्ये आला नसता तर कदाचित सँडविच आणि चहासुध्दा भारतामध्ये आले नसते! अखेर, कप्पड बीचवरच्या रेस्टॉरंटमध्ये बसून सूर्यास्त बघणेही आमच्या नशिबात नव्हते. सूर्यास्ताच्या वेळीच नेमका पाऊस सुरु झाला.
कप्पड बीचवरून हॉटेलवर परतण्याच्या वाटेवर, कर्नल रामकृष्ण मला मसाले खरेदी करण्यासाठी घेऊन गेले. मसाल्याबरोबर दोन-तीन किलो काजू आणि खजूराचीही खरेदी झाली. तिथे 'आजवा' जातीचे खजूर बरेच स्वस्त मिळाले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे १७ ऑगस्टला सकाळी, कर्नल रामाकृष्ण, त्यांची पत्नी प्रमिला आणि कोळीकोडमधले आनंदचे दुसरे मित्र कर्नल करुणाकरन, यांच्यासोबत आम्ही 'गुलमोहोर रेस्टॉरंट' मध्ये नाश्ता केला. त्यानंतर हॉटेलच्या खोलीवर येऊन आम्ही कोळीकोड विमानतळावर गेलो आणि परतीचे विमान पकडले. दुसऱ्या दिवसापासून पुण्यात कामे असल्याने, मुंबईला उतरल्यावर गिरीश-प्राचीच्या घरी न जाता, आम्ही विमानतळावरूनच उबर टॅक्सीने पुण्याला घरी येऊन पोहोचलो.
मलाबारच्या त्या सुखद सहलीच्या, आणि सर्व सहप्रवाशांच्या आठवणीने, त्या रात्री मला काही केल्या झोप येईना. खरेतर मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल कंपनीबरोबर सहलीला गेले होते. 'अनुभव ट्रॅव्हल्स'मुळे आमचे अनुभवविश्व छान समृद्ध झाले होते.
'अनुभव ट्रॅव्हल्स'तर्फे आलेले श्री. निलेश राजाध्यक्ष, श्री. सुमंत पेडणेकर आणि बसचालक श्री. श्याम, यांची वागणूक अतिशय नम्र होती. आम्हा प्रवाशांना जास्तीतजास्त सेवा-सुविधा पुरविण्याबाबत ते तत्पर होते. सोनम-शुभेन्दू हे तरुण रक्ताचे दांपत्य सोबत असल्याने त्यांचा सहवास सर्वांनाच हवाहवासा होता. पेंडसे पती-पत्नी मितभाषी असले तरी, ते स्वभावाने अतिशय मृदू असल्याचे जाणवले. श्री पेंडसे यांचे गाणे आम्हाला खूप आवडले. कु. वृंदा जोशी यांनी पूर्वी भरपूर प्रवास केलेला असल्यामुळे त्यांच्याकडे माहितीचा खजिना होता. त्यांनीही खूप सुरेल आवाजात गाणी म्हटली. म्हात्रे पती-पत्नी दोघेही बोलके आणि हसतमुख होते. सहप्रवाशांबरोबर आमचा वेळ मजेत गेला आणि प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले.
सरतेशेवटी, माझा भाचा देवाशिष, ज्याच्यामुळे ही मस्त सहल घडली, त्याचे आभार मानायलाच हवेत!
शनिवार, १० सप्टेंबर, २०२२
१३. मलबारची सफर- मिश्काल मस्जिद, 'गोदाम' आणि फालुदा!
'गुलमोहोर रेस्टॉरंट'मध्ये पोटभर जेवण करून आम्ही कोळीकोडच्या कुट्टीचिरा या भागात असलेली जुनी-पुराणी 'मिश्काल मस्जिद' बघायला गेलो. मशिदीपर्यंत पोहोचेस्तोवर दुपारचे अडीच तीन वाजले होते. मिश्काल मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे.
१४ व्या शतकात मुस्लिम व्यापारी, नाखुदा मिश्काल, याने ही मशीद बांधली होती. नाखुदा मिश्काल हा येमेनी व्यापारी अतिशय श्रीमंत होता. त्याच्याकडे जहाजांचा मोठा ताफा होता. भारत, चीन आणि पर्शिया या देशांशी त्याचा व्यापार होता. मुखत्वे लाकूड वापरून बांधली गेलेली ही मशीद पूर्वी पाचमजली होती. इसवी सन १५१० मध्ये पोर्तुगीज सेनानी अल्बुकर्क याने कोळीकोडवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्याच्या सैन्याने या मशिदीची जाळपोळ केली. त्यामुळे मशिदीच्या वरच्या काही मजल्यांचे नुकसान झाले. झामोरिन (सामुद्री) राजाच्या सैन्याने तो हल्ला परतवून लावला. पुढे १५७८ साली झामोरिन राजाने मिश्काल मशिदीची पुनर्बांधणी करून, मुस्लिमांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थपित केले.
![]() |
मिश्काल मस्जिद |
सध्या उभी असलेली मिश्काल मशीद चारमजली आहे. मशिदीची वास्तू जुनी असली तरीही सुंदर आहे. केरळमध्ये ज्या बोटावर मोजण्याइतक्या मध्ययुगीन मशिदी आहेत, त्यापैकी मिश्काल मशिदीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तसेच, ही मशीद मध्ययुगीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुनादेखील आहे. या मशिदीचे वेगळेपण असे की, इतरत्र सर्व मशिदींमध्ये दिसणारे घुमट आणि मिनार या मशिदीत अजिबात नाहीत. मशिदीच्या अंतर्भागातील कोरीव काम केलेले खांब, दरवाजे आणि कमानींवर दक्षिणेतील मंदिरांच्या स्थापत्यकलेची छाप दिसून येते. मशिदीच्या मध्यभागी असलेल्या हॉलमध्ये चारशे लोक एकावेळी नमाज पढू शकतात.
शिहाद आम्हाला मशिदीबाबत जुजबी माहिती सांगत होता तोच तेथील नमाजाची वेळ झाली. एवीतेवी स्त्रियांना मशिदीमध्ये प्रवेश करता येणार नव्हताच, पण नमाजाच्या वेळी गैरमुस्लिम पुरुषांनाही प्रवेश वर्ज्य होता. त्यामुळे आमच्यापैकी कोणालाच मशिदीच्या आत जाता आले नाही. आम्ही सर्वानी मशीद फक्त बाहेरूनच पहिली, आणि मशिदीसमोर एक ग्रुप फोटो काढला. मी आणि आनंद मशिदीच्या बाहेर लावलेल्या फलकांवरची माहिती वाचत जरा जास्तच वेळ रेंगाळलो. बाहेर येऊन पाहिले तर, कु. वृंदा जोशी वगळता, आमच्याबरोबरचे इतर सर्वजण मशिदीशेजारच्या तलावावर गेले असल्याचे कळले. आम्ही त्यांच्यासाठी गाडीमध्ये बराच वेळ थांबलो पण त्यांचा पत्ताच नाही!
शेवटी श्री. निलेश यांना फोन लावला. त्यांच्याकडून असे समजले की इतर सहप्रवाशाना घेऊन, हलवा गल्लीतुन पुढे 'गोदाम' नावाच्या एका जागी ते गेले होते. ती जागा शोधत आम्हीही तेथे पोहोचलो. तिथे असे कळले की, १५ ऑगस्टची सार्वजनिक सुट्टी असल्याने सुप्रसिद्ध 'हलवा गल्ली'मधली सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे आमच्या सहप्रवाशांच्या हलवाखरेदीच्या इराद्यावर पाणी पडले होते. म्हणून, तेथून जवळच गुजराती स्ट्रीटवर असलेले हे 'गोदाम' पाहण्याचा बूट अचानक निघाला असावा. आम्हीही आत गेलो, पण एक जिना चढून वर जावे लागणार असल्याने दादांना खालीच थांबवले.
![]() |
श्री. व सौ. बशीर यांच्यासोबत 'गोदाम'मध्ये |
'गोदाम' हे नावाप्रमाणे खरोखरीच पूर्वीचे धान्याचे गोदाम होते. पण ती जागा पडीक झालेली होती. श्री. बशीर नावाच्या गृहस्थांनी ते गोदाम भाड्याने घेतलेले होते. दुबईच्या पोलीस खात्यात नोकरी केलेल्या श्री. बशीर यांना पुरातन कलात्मक वस्तू जमवण्याचा छंद होता. गेल्या अनेक वर्षांमध्ये जमवलेल्या वस्तूंचे संग्रहालय त्यांनी आता त्या जागेत तयार केले आहे. तिथे अनेक सुंदर कलात्मक वस्तू होत्या. काही वस्तू, फर्निचर आणि अत्तरे वगैरे खरेदी करण्यासाठीही उपलब्ध होती. परंतु, ते सगळे संग्रहालय असंख्य वस्तूंनी भरून गेलेले होते, आणि त्या वास्तूंबद्दलची माहिती कोठेही लिहिलेली नव्हती, किंवा ती माहिती सुसूत्रपणे सांगणारेही तेथे कोणी नव्हते. त्यामुळे मला ती जागा विशेष आवडली नाही. विदेशी गोऱ्या लोकांना भारतामधली कलाकुसर दाखवून, त्यांना तेथील वस्तू अव्वाच्या सव्वा भावामध्ये विकल्या जात असाव्यात असे मला वाटले.
गोदाम बघून झाल्यावर खरे तर, आमच्या मूळ कार्यक्रमाप्रमाणे आम्ही कोळीकोडजवळच असलेल्या कप्पड बीचवर जाणार होतो. पण त्याऐवजी आम्हाला कोळीकोड शहरातील बीचवरच्या 'कडलास' नावाच्या कॅफेमध्ये नेण्यात आले. हा कॅफे फारच छान होता आणि तिथे बसून आम्ही सूर्यास्त बघू शकणार होतो. आम्हाला वरच्या मजल्यावरची जागाही चांगली मिळाल्यामुळे समुद्रदर्शन चांगले होत होते. पण ढगाळ वातावरणामुळे आम्हाला सूर्यास्त मात्र दिसला नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने, बीचवर आणि आसपासच्या रस्त्यांवर लोकांची तुडुंब गर्दी होती. आम्ही दुपारी जेवलेले जेवण अजून खाली उतरले नव्हते. तरीही 'कडलास' कॅफेमध्ये बसून मी 'कॉफी क्रंच' प्यायले. ते पेय छानच होते, पण ते पीत असताना आणि माझ्या पोटामध्ये भूक नसतानाही, निशिताईंनी मागवलेला फालुद्याचा सुंदर पेला माझे लक्ष वेधून घेत होता!
![]() |
'कडलास' कॅफेमधला फालुदा! |
'कडलास' कॅफेमधून निघून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. कोळीकोडच्या मध्यवस्तीतील पालयम नावाच्या भागात, 'मेट्रो एम्पायर्स' हे हॉटेल होते. हॉटेलवर सामान टाकल्यावर म्हात्रे आणि पेंडसे पति-पत्नींबरोबर मी बाजारात फिरायला गेले. म्हात्रे आणि पेंडसे दांपत्यांनी केळ्याचे वेफर्स आणि कोळीकोडचा सुप्रसिद्ध हलवा खरेदी केला. मला केरळी मसाले विकत घ्यायचे होते, पण मसाल्याची सगळी दुकाने बंद होती.
दरम्यान, गिरीश-प्राची आणि जहागीरदार पतिपत्नींच्या कोळीकोडमधील हॉटेल बुकिंगचा काहीतरी घोळ झाला होता. तो घोळ निस्तरून श्री. निलेश साडेआठ वाजेपर्यंत आमच्या हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो, मात्र आम्हाला विशेष चांगले जेवण मिळाले नाही. मी जेवणारच नव्हते, त्यामुळे माझी काहीच अडचण झाली नाही. पण म्हात्रे पती-पत्नींना चतुर्थीचा उपास सोडायचा होता. त्यांना मनासारखी थाळी न मिळाल्याने त्यांचा बराच विरस झाला.
जेवणानंतर आम्ही हॉटेलवर परत आलो. हॉटेलच्या खोल्या आरामदायी होत्या, पण आमच्या खोलीमध्ये खूपच तीव्र वासाचे रूम फ्रेशनर मारलेले होते. तीव्र वासाची ऍलर्जी असल्याने, मला खोकल्याचा असह्य त्रास होऊ लागला. हॉटेल पूर्णपणे वातानुकूलित होते आणि खोलीच्या खिडक्या उघडण्याची काही सोय नव्हती. रात्री अकराच्या पुढे आता आपल्याला दुसरे हॉटेल शोधावे लागते आहे की काय असे आम्हाला वाटायला लागले होते. पण माझ्या नशिबाने, एका खोलीची खिडकी उघडण्यात हॉटेलच्या नोकरांना यश आले. त्या खोलीमध्ये रूम फ्रेशनरही मारलेला नसल्यामुळे मला शांत झोप लागली.
बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२
१२ . मलबारची सफर-दीपांजली संग्रहालय
कोळीकोड स्टेशनवर आम्ही सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचलो. अनुभव ट्रॅव्हल्सची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी, स्टेशनबाहेर आमच्यासाठी येऊन थांबलेली होती. गाडीचा चालक श्याम सकाळी साडेसातच्या सुमारास 'सी शेल होम' वरून आमचे सामान घेऊन निघाला होता. पण तो अगदी वेळेत, आमच्या स्वागताला कोळीकोड स्टेशनवर पोहोचलेला बघून अगदी हायसे वाटले. आम्ही गाडीमध्ये बसून दीपांजली संग्रहालयाकडे निघालो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी कण्णूरहून इनोव्हाने निघून कोळीकोडच्या वाटेवर होते. पण त्यांना पोहोचायला वेळ लागणार होता.
दीपांजली संग्रहालय हे अगदी डोळे दिपवून टाकणारे संग्रहालय आहे. एखादी व्यक्ती एका विशिष्ट ध्येयाने पेटली की काय नेत्रदीपक कामगिरी करू शकते, याचे हे संग्रहालय उत्तम उदाहरण आहे. श्री. प्रसाद यांच्या अथक प्रयत्नातून हे भारतातील एकमेवाद्वितीय दीप संग्रहालय तयार झालेलं आहे. श्री. प्रसाद यांनी अनेक वर्षे दीपगृहामध्ये अधिकारी म्हणून काम केले. नोकरीच्या सुरुवातीपासूनच त्यांना दिवे जमवण्याचा छंद लागला. नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही, तीस वर्षांहून अधिक काळामध्ये, श्री. प्रसाद यांनी अठराव्या शतकापासून वापरात असलेले अनेक प्रकारचे दिवे जमा केले आहेत. कोळीकोडच्या पुथियांगडी या भागातील, श्री. प्रसाद यांच्या स्वतःच्या छोट्या बंगलीच्या वरच्या मजल्यावर, त्यांनी जमवलेल्या दिव्यांचे प्रदर्शन मांडलेले आहे.
![]() |
श्री. प्रसाद |
आम्ही पाच-पाच जणांच्या तुकडीने वर जाऊन दिवे बघत होतो. बाकीचे सगळे श्री. प्रसाद यांच्या घरामध्ये खालच्या मजल्यावर बसून होतो. एकेका तुकडीला, ते सर्व दिवे डोळे भरून बघायला अर्धा-पाऊण तास लागत होता. पहिली तुकडी वर होती तोपर्यंत गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी दीपांजली संग्रहालयात येऊन पोहोचले. पाच-पाच जणांचा एक, अशा तीन गटांमध्ये आम्ही संग्रहालय बघितले. निलेश राजाध्यक्षांनी आम्हा सर्वांसाठी, लिची आणि सफरचंदाच्या थंडगार ज्यूसचे टेट्रापॅक्स आणले आणि प्रतीक्षेचा काळ सुसह्य केला. सगळ्यांचे प्रदर्शन बघून होईपर्यंत दुपारचे दीड वाजून गेले होते. सकाळी भरपेट नाश्ता केलेला असला तरी सगळ्यांनाच आता भूक लागायला लागली होती. दीपांजली संग्रहालय बघून झाल्यावर आमच्या दोन्ही गाड्या 'गुलमोहोर' या शाकाहारी रेस्टॉरंटपाशी येऊन थांबल्या आणि आमचा जीव भांड्यात पडला.
अगदी थोडाच वेळ थांबल्यानंतर आम्हाला बसायला टेबल मिळाले. रेस्टॉरंट अतिशय स्वच्छ दिसत होते. या रेस्टॉरंटमधली थाळी चांगली असते, आणि ती अगदी लोकप्रिय आहे, असे शिहादने आम्हाला सांगितल्यामुळे, थाळीच मागवायची असे आम्ही सगळ्यांनी ठरवले. इथे फक्त दोनच प्रकारच्या थाळ्या होत्या, तेही मला फार बरे वाटले. आम्ही सर्वांनी 'साऊथ इंडियन मील्स ' घेतली आणि शुभेन्दूने 'नॉर्थ इंडियन मील' घेतले. मी आणि दादा प्रत्येकी एकेक पूर्ण थाळी खाऊ शकणार नाही असे वाटल्यामुळे आम्ही दोघांमध्ये मिळून एक थाळी घेतली, ते फारच योग्य झाले. थाळीमध्ये आलेले जेवण भरपूर होते. या थाळ्याच्या किमती अगदी कमी होत्या. 'साऊथ इंडियन मील ' साधारण १५० रुपयाला आणि 'नॉर्थ इंडियन मील' १७५ रुपये होते.
केळीचे पान आच्छादलेली पितळेची मोठी थाळी, दोन-तीन प्रकारच्या भाज्या, रस्सम, सांबारम, दही, आणि पायसम, असे पदार्थ आठ वाट्यांमध्ये, आणि एक मोठा वाडगा भरून भात, एक तळलेला आप्पलम किंवा पप्पड्म, दोन प्रकारच्या चटण्या, बीट व गाजराचे गोडसर लोणचे, एक कोशिंबीर, तळलेली भरली मिरची आणि टॅपिओकाचे तळलेले कुरकुरीत काप, अशी ती थाळी बघून मन अगदी तृप्त झाले. थाळीमधल्या पदार्थांची रंगसंगती केळीच्या हिरव्यागार पानावर छान उठून दिसत होती. अगणित पदार्थ वाढलेली ही थाळी 'अनलिमिटेड' होती. एखादा पदार्थ आपण मागितला की तिथले वेटर्स तो पदार्थ अगदी तत्परतेने वाढत होते. सर्वसाधारणपणे आपल्याकडच्या 'थाळी भोजनालया'मध्ये वेटर्स सतत काहीनाकाही वाढण्यासाठी आपल्या आसपास घोंघावत राहतात आणि शांतपणे जेवू देत नाहीत. तशी परिस्थिती तिथे अजिबात नव्हती, हे मला फार आवडले. प्रत्येक पदार्थाची चव उत्कृष्ट होती. रेस्टॉरंटमध्ये भरपूर गर्दी होती, आणि बाहेरही लोक जेवणासाठी थांबलेले होते. तरीही, आम्ही जेवण करत असताना आम्हाला कोणीही घाई-गडबड केली नाही हेही विशेष. माझ्या व दादांच्या सामायिक थाळीमध्ये पायसमची एकच वाटी आलेली असल्यामुळे मी माझ्यासाठी आणखी एक वाटी मागून घेतली. म्हात्रे पती-पत्नीचा चतुर्थीचा उपास असल्यामुळे त्यांच्यासाठी फ्रुट डिश आणि ताक मागवले होते.
अगदी वेगळ्या चवीचे, जास्त तेल-तिखट-मसाले न वापरलेले साधे सात्विक पण रुचकर जेवण झाल्यावर आम्ही कोळीकोडमधल्या अजून काही जागा बघायला निघालो.
,
११. मलबारची सफर-ध्वजारोहण!
आम्ही लगबगीने तयारीला लागलो. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचा एक वेगळाच आनंद आमच्या मनामध्ये होता. दादांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यामुळे दादा खूपच उत्साहात होते. त्यांची अंघोळ व नाश्ता वेळेत आवरून, त्यांना कुठलाही त्रास न होऊ देता, रेल्वे गाडीमध्ये कसे चढवावे, याचाच विचार मी आणि आनंद करीत होतो. 'सीशेल होम' मधल्या सोलर हिटरची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे, सर्वांना अंघोळीकरता गरम पाणी पुरवण्याची निराळी व्यवस्था निलेश राजाध्यक्ष यांनी बघितली. त्यामुळे आम्ही सगळेच वेळेत तयार झालो. सामान बांधून आमच्या बॅगा टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये ठेवण्यासाठी दिल्या. फक्त दादांची व्हीलचेयर आमच्याबरोबर रेल्वेने नेण्यासाठी ठेवली.
मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२
१०. मलबारची सफर- 'बेंगला कुटुंबीय' आणि 'मुळाप्पिलंगड बीच'
आम्ही डॉ. हर्मन गुंडर्ट यांच्या बंगल्यामधून अतिशय भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो. त्यावेळी सहा वाजून गेले होते. आता आम्ही 'मुळाप्पिलंगड बीच' वर जाणार होतो. पण आमची गाडी बीचकडे वळायच्या ऐवजी विरुद्ध दिशेच्या एका अरुंद बोळामध्ये वळून एका दुमजली घराजवळ थांबली. आमचा गाईड उर्फ 'स्टोरी टेलर' मोहंमद शिहाद गाडीतून उतरला आणि त्या घरात शिरला. त्याच्या मागे आमच्यापैकी काहीजण गेले. 'आपण आता इथे कशासाठी थांबलो आहोत? ही काही विशेष प्रेक्षणीय जागा आहे का?' असे प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाले. तिथे नेमके काय आहे, हे बघून यावे म्हणून मी पण त्या घरात गेले. तिथले सुंदर दृश्य बघून आणि शिहाद सांगत असलेली माहिती कानावर पडताच मी त्वरित बाहेर आले, आणि दादांना व आळसावलेल्या इतर सर्व सहप्रवाशांना बरोबर घेऊन परत त्या घरामध्ये गेले.
२६५ वर्षांपूर्वी बांधलेले हे घर, श्री. इशाक बेंगला व त्यांच्या कुटुंबियांचे राहते घर होते. श्री. इशाक, हे शिहादच्या ओळखीचे असल्याने, शिहादने त्यांचे घर आम्हाला दाखवण्याची विनंती त्यांना केली होती. आमच्या सुदैवाने ती विंनती श्री. इशाक यांनी मान्य केली होती.
या दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर मोठा व्हरांडा होता. तिथे आरामखुर्च्या आणि मोठे बाकी ठवलेले होते. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर एक बैठकीची खोली होती. त्या खोलीला असलेल्या दोन मोठ्या खिडक्यांची झापडे आतल्या बाजूला उघडली की त्या झापडांचेच बाक तयार होत होते. मुख्य दरवाज्याच्या अगदी समोरच्या भिंतीमध्ये स्वयंपाकघरात जाण्यासाठी एक दार होते. त्या स्वयंपाकघरामध्ये आणि आतल्या खोल्यांमध्ये बेंगला कुटुंबातील स्त्रियांचा वावर असल्याने आम्हाला अर्थातच तिकडे जाता आले नाही. बैठकीच्या खोलीच्या उजव्या बाजूला एक नक्षीदार जिना होता. जिना चढून वर गेल्यावर उजव्या हाताला एक प्रशस्त दिवाणखाना होता. त्यातील भल्यामोठ्या खिडक्यांच्या तावदानांना रंगीबेरंगी काचा लावलेल्या होत्या.
दिवाणखान्याच्या छताला मोठमोठाले हांडे आणि झुंबरे टांगलेली होती. तिथे अनेक मूल्यवान अशा शोभेच्या पुरातन वस्तू होत्या. एक मोठा ग्रामोफोन होता, खटका दाबल्यावर एकच सिगरेट बाहेर येईल अशी व्यवस्था असलेली सिगारेट केस होती, अनेक सुंदर दिवे आणि फुलदाण्या होत्या, एक नाजूकसा हुक्का होता, एक खूप जुना रेडिओ होता. श्री. इशाक हे पंच्याहत्तरीचे गृहस्थ, त्यांच्या तारुण्यात उत्तम क्रिकेटपटू आणि फ़ुटबॉलपटू होते. त्यांनी जिकंलेल्या काही ढाली आणि चषक तिथे मांडून ठेवलेले होते. दिवाणखान्यामध्ये एक मोठे गोलाकार टेबल आणि एक सुंदरसा झोपाळा होता.
दिवाणखान्यातील एका कोपऱ्यामध्ये असलेले एक कपाट उघडून, श्री. इशाक यांनी आम्हाला त्यातली एक गंमत दाखवली. त्या कपाटातच्या वरच्या फळीच्या वर, एक पिळाचा दांडा होता. तो दांडा फिरवत राहिल्यास ती फळी खाली येत जाई. त्या फळीच्या खालच्या फळीवर, घडी केलेली एक साडी ठेवलेली होती. दांडा फिरवून वरची फळी खाली-खाली आणून त्या साडीवर दाबून ठेवण्याची ती योजना होती. कपड्यांना इस्री करण्यासाठीही अनोखी पद्धत पूर्वी वापरात होती असे इशाकभाईंनी आम्हाला सांगितले.
दिवाणखान्यालगतच्या दोन मोठमोठया खोल्यामध्ये, मच्छरदाणी लावण्याची सोय असलेले मोठे पलंग होते. त्या दोन्ही खोल्या सध्या बेडरूम म्हणून वापरात होत्या. दिवाणखान्याच्या मागच्या बाजूच्या एका दालनामधे, एक खूप लांब टेबल आणि त्याभोवती खुर्च्या ठेवलेल्या होत्या. चाळीस ते पन्नास माणसे एकत्र जेवायला बसू शकतील असे ते लांबलचक डायनिंग टेबल होते. त्याच दालनाच्या मागच्या बाजूला एक सुंदर जिना होता. खालच्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाकघरातून, बायकांना ये-जा करण्यासाठी तो जिना होता. भारतातील अनेक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू, त्या टेबलावर, त्या कुंटुबासोबत जेवलेले आहेत, असे श्री. इशाक यांनी आम्हाला सांगितले. बेंगला कुटुंबाच्या या ऐतिहासिक घराला भेट देऊन गेलेल्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंचे फोटो वरच्या मजल्यावरच्या एका छोट्या खोलीमध्ये लावलेले होते. इशाकभाईंनी सगळे घर आम्हाला मोठ्या उत्साहाने दाखवले एवढेच नव्हे तर, आम्हा सर्वाना शुद्ध तुपातली सोहनपापडीही खायला दिली. इशाकभाईंचा निरोप घेण्यापूर्वी आम्ही त्या घरासमोर, त्यांच्यासोबत आमचा सर्वांचा एक फोटो काढून घेतला. त्यानंतर आम्ही 'मुळाप्पिलंगड बीच' बघायला निघालो.
'मुळाप्पिलंगड' किनारपट्टी जवळपास चार ते पाच किलोमीटर लांबीची आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे या पुळणीच्या वाळूवर गाडी किंवा स्कूटर-मोटरसायकल चालवता येते. बीचवर पर्यटकांची बरीच गर्दी होती. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने सुसाट वेगाने समुद्राला समांतर धावत होती. आम्हीही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीमधून बीचवर फिरलो. थोडा वेळ आम्ही बाहेर पायीही फिरलो, पण बारीक पाऊस पडत असल्याने आम्हाला जास्त फिरता आले नाही. आम्ही बरेच दमलेले असल्यामुळे निलेश राजाध्यक्ष यांनी एका चहाच्या टपरीवर सर्वांसाठी चहा मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण तिथले दूध संपलेले होते, आणि संध्याकाळचे सात वाजून गेले होते. म्हणून गाडीमध्ये बसून आम्ही रिसॉर्टकडे परत निघालो.
'सी शेल बीच होम' वर पोहोचताच आधी चहा घेतला. रात्रीचे जेवण अगदी साधे आणि सात्विक होते. मी दुपारी विशेष जेवलेले नसल्यामुळे रात्री जेवले. कोबीची भाजी, पडवळाची भाजी, फोडणीचे वरण, पोळ्या, साधा पुलाव, प्रॉन्स पुलाव आणि गुलाबजाम असा बेत होता. रिसॉर्टच्या जवळच श्री. हरीस यांचे एक शेत आहे. त्या शेतात उगवणाऱ्या ताज्या भाज्या स्वयंपाकात वापरल्या जातात, अशी माहितीही जेवताना कळली.भाज्यांची चव आपण घरी करतो त्यापेक्षाही खूप वेगळी होती. जेवण साधे असले तरीही अतिशय रुचकर असल्याने अगदी घरचे जेवण जेवल्यासारखे वाटले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता, दादांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर कण्णूर-कोळीकोड रेल्वे प्रवास करायचा आहे असे निलेश यांनी आम्हाला सांगितले. १५ तारखेलाच म्हात्रे दांपत्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो. पण १५ तारखेला चतुर्थी असल्याने, त्या दोघांचा उपास असणार होता. म्हणून १४ ऑगस्टच्या रात्रीच्या जेवणानंतरच त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय निलेश राजाध्यक्षांनी घेतला होता. त्यासाठी साधीच पण अतिशय सुंदर सजावट केली होती. एक छानसा केक मागवला होता. म्हात्रे पती-पत्नींनी केक कापला आणि आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर संगीताच्या तालावर त्या दोघांनी झोकात नृत्य केले. समुद्राच्या काठावर, लाटांच्या संगीतामध्ये, हलक्या वाऱ्यावर, मंद निळ्या प्रकाशात लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना खरोखरीच रोमँटिक होती!
रात्र खूप झाली होती. दुसऱ्या दिवशी लवकर उठून, नाश्ता करून, ध्वजवंदन करून आम्हा सर्वांना गाडी पकडायची होती. त्यामुळे गप्पा मारत बसण्याचा मोह आवरून आम्ही झोपायला निघून गेलो.
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
९. मलाबारची सफर- 'हर्मन गुंडर्ट' आणि 'गुंडर्ट बंगला'
कण्णूर दीपगृहापासून निघून आम्ही थेट थलासरीच्या 'एम आर ए रेस्टॉरंट' मध्ये साधारण अर्ध्या तासामधे पोहोचलो. रेस्टारंटमध्ये तुडुंब गर्दी होती. त्यामुळे आम्हाला जेवण्यासाठी जागा मिळेपर्यंत पुढे अजून अर्धा-पाऊण तास लागला. तोपर्यंत सर्वांनाच कडाडून भूक लागली होती. त्या कॅफेच्या बाहेर, काचेच्या आड मांडून ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ अत्यंत आकर्षक दिसत होते. तिथे बाहेरच एक माणूस 'कुनाफा' नावाचा गोड पदार्थ तयार करत होता. जेवणाला वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यामुळे प्राचीने दादांसाठी एक कुनाफा विकत घेतला. शेवटी आम्हाला बसायला जागा मिळाली. पण रेस्टारंटमध्ये तुफान गर्दी असल्यामुळे, जेवण खूप उशिरा आले. थलासरी चिकन, थलासरी बिर्याणी आणि दोन प्रकारचे पुलाव उत्तम होते. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे जेवण मिळावे यासाठी निलेश राजाध्यक्ष खूपच धडपड करत होते. परंतु, तेथील गर्दीमुळे, त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. जेवणासाठी बराच वेळ प्रतीक्षा करूनही मनासारखे खाद्यपदार्थ न मिळाल्याने काहीजण नाराज झाले.
जेवण उरकून रेस्टॉरंटमधून निघेपर्यंत साडेचार वाजून गेले होते. जेमतेम पंधरा मिनिटांतच आम्ही 'गुंडर्ट बंगल्या'मध्ये पोहोचलो. या प्रशस्त बंगल्याचे आवारही खूप मोठे आहे. बंगल्याच्या चारही बाजूंना मोठे व्हरांडे आहेत. हा बंगला पारंपरिक केरळी स्थापत्यशैलींमध्ये बांधलेला आहे. बंगल्यावर उतरते कौलारू छप्पर आहे. बंगल्याला मोठमोठ्या खिडक्या आहेत तर तिथले लाकडी दरवाजे चांगले रूंद व मजबूत आहेत. हा बंगला वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि बंगल्याचा परिसर शांत व निसर्गरम्य आहे.
एकोणिसाव्या शतकामध्ये, याच बंगल्यामधे सुमारे २० वर्षे राहून डॉ. हर्मन गुंडर्ट आणि त्यांच्या पत्नी ज्युली डुबोईस यांनी मल्याळम भाषासंवर्धनासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या बंगल्यामध्ये गुंडर्ट यांच्या जीवनाबाबतची आणि कार्याबद्दलची सर्व माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ती माहिती विविध भाषांमधून ऐकण्याची सोय करण्यात आलेली आहे.
डॉ हर्मन गुंडर्ट यांचा जन्म १८१४ साली जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरामध्ये झाला. ते अतिशय प्रतिभावंत होते. १८३५ मधे टूबिगन विद्यापीठामधून त्यांनी भाषाशास्त्रामध्ये (फिलॉलॉजीमध्ये) डॉक्टरेटची पदवी संपादन केली. त्याचबरोबर त्यांनी तिथे धर्मशास्त्राचाही अभ्यास केला. या शिक्षणादरम्यान, हिब्रू, लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. १८३६ साली ते ख्रिश्चन मिशनरी म्हणून युरोपातून सागरी मार्गाने भारतात आले. बोटीवरील काही महिन्यांच्या प्रवासातच ते बंगाली, हिंदी व तेलगू भाषा शिकले आणि सहप्रवाशाना शिकवूही लागले. त्यांचे जहाज आधी कलकत्त्याला जाणार होते. पण ते तिथे न जाता मद्रासच्या किनाऱ्याला लागले. त्यामुळे काही काळ ते तामिळनाडूमधील तिरुनेलवेल्ली आणि पुढे आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे कार्यरत होते. त्याकाळात त्यांनी तामिळ आणि तेलगू भाषांवर प्रभुत्व मिळवले. युरोपमधून त्यांच्याबरोबर आलेल्या ज्युली डुबोईस या तरुणीशी, चित्तुर येथे ते विवाहबद्ध झाले. नोव्हेम्बर १८३८ मधे गुंडर्ट पती-पत्नींना मेंगलोरच्या बासेल मिशनचे काम बघण्यासाठी बोलावण्यात आले. त्या कामानिमित्त फिरताना ते केरळच्या थलासरी येथे पोहोचले आणि पुढील वीस वर्षे त्यांनी तिथेच वास्तव्य केले.
गुंडर्ट पती-पत्नींनी थलासेरीच्या इल्लीकुन्नू भागातील या बंगल्यामध्ये राहावे, तेथेच बासेल मिशनचे स्टेशन स्थापन करावे आणि ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करावे असे ठरले होते. त्या कामाच्या निमित्ताने डॉ. गुंडर्ट यांनी स्थानिक शिक्षकांकडून काही महिन्यातच मल्याळम भाषा शिकून घेतली. वर्षभरातच त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात पहिली मल्याळम शाळा सुरु केली. त्याच वेळी त्यांच्या पत्नीने मुलींसाठी पहिली निवासी शिक्षणसंस्था सुरू केली. त्यानंतरच्या काही महिन्यांत, डॉ गुंडर्ट यांनी कादिरूर, थलासेरी फोर्ट, माहे आणि धर्मादम येथे मल्याळम शाळा सुरु केल्या. या सर्व शाळांना नियमित भेटी देऊन, तिथल्या कामकाजावर ते देखरेख करीत असत.
ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानिमित्त, थलासरीच्या आसपासच्या गावांना सातत्याने भेटी देत असल्यामुळे, तेथील स्थानिक लोकांमध्ये डॉ. गुंडर्ट यांची नियमित उठ-बस होती. स्थानिकांसोबतच्या संवादातून त्यांनी शक्य तितके मल्याळम शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी गोळा केल्या. त्यामुळे, मल्याळम भाषेचे पुष्कळच ज्ञान त्यांना प्राप्त झाले. स्थानिक विद्वानांसोबत चर्चा करून, त्यांनी मल्याळम भाषेतील व्याकरणाचे नियम निश्चित केले. तसेच त्या भाषेमधे पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, आणि प्रश्नचिन्ह अशा चिन्हांचा वापर प्रचलित केला. 'मल्याळभाषा व्याकरणम' हे मल्याळम भाषेतील पहिले व्याकरणाचे पुस्तक डॉ. गुंडर्ट यांनीच संकलित करून १८५१ साली छापले. तसेच, १८७२ साली पहिला मल्याळम-इंग्रजी शब्दकोशदेखील त्यांनी तयार केला व बायबलचे मल्याळममध्ये भाषांतरही केले.
१८५७ मध्ये, मलाबार प्रांताच्या दक्षिणेला असलेल्या कोळीकोड शहरापासून ते उत्तरेकडे कर्नाटकातील हुबळीपर्यंतच्या सर्व शाळांचे पहिले शिक्षण-निरीक्षक म्हणून डॉ. गुंडर्ट यांची नियुक्ती केली गेली. त्या पदावर असताना, शिक्षकांची नियुक्ती करण्याचे कामही ते पाहत असत. शाळा, महाविद्यालये आणि नव्याने स्थापन झालेल्या मद्रास विद्यापीठासाठी डॉ. गुंडर्ट यांनी पाठ्यपुस्तके लिहिली आणि परीक्षांकरिता प्रश्नसंचही संकलित केले. इतिहास, भूगोल आणि खगोलशास्त्र या क्षेत्रातही डॉ गुंडर्ट यांनी योगदान दिले आहे. मल्याळम भाषेमधील अनेक जुने दस्तऐवज आणि थलासरीशिवाय मलबार प्रांतामधील इतर ठिकाणच्या धर्मग्रंथांचे संकलन त्यांनी केले होते. ते सर्व संकलित साहित्य त्यांनी पुढे जर्मनीमधील टुबिंगेन विद्यापीठाला देणगीरूपाने दिले.
डॉ. गुंडर्ट यांनी छपाईसाठी, आपल्या बंगल्यामध्येच एक 'लिथो प्रेस' चालू केली. त्या छापखान्यामधून, 'राज्यसमाचारम' नावाचे पहिलेवहिले मल्याळम वर्तमानपत्र, आणि पुढे 'पश्चिमोदयम' हे दैनिकदेखील छापण्याची सुरुवात डॉ गुंडर्ट यांनीच केली. महिलांना इंगजी शिक्षण देऊन, शिवणकाम शिकवून त्यांना उपजीविकेचे साधन मिळवून देऊन, त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या बंगल्यात चालू केले गेलेले अनेक उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. डॉ. हर्मन गुंडर्ट यांनी सुरु केलेली नेत्तूर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NTTF), ही या बंगल्याच्या शेजारीच आहे आणि अजूनही कार्यरत आहे.
केरळची स्थानिक संस्कृती व मल्याळम भाषेचा विकास साधण्याकरिता, आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याकरणविषयक ज्ञान संकलित करण्यासाठी, डॉ. गुंडर्ट यांनी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी मल्याळम भाषेत एकूण तेरा पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी तेलगू साहित्याचे हिब्रूमध्ये भाषांतर केले आहे, असेही एका फलकावर वाचले आणि मी आश्चर्यचकितच झाले. डॉ गुंडर्ट याचे नातू, जर्मन कादंबरीकार व नोबेल पारितोषिक विजेते हर्मन हेसे यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. गुंडर्ट यांना कमीतकमी तीस भाषा अवगत होत्या.
परंतु, डॉ. गुंडर्ट यांच्या कार्याबद्दल वाटलेल्या आदरासोबतच मला स्वतःचीच फार लाजही वाटली. मी एक डॉक्टर असल्याने, बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या केरळी नर्सेसबरोबर माझा नेहमी संबंध येतो. त्या नर्सेस आपापसात मल्याळममध्ये बोलत असतात. इतकी वर्षे ती भाषा माझ्या कानावर पडत आली आहे, पण ती मला बोलता तर येत नाहीच, पण समजतही नाही, ही वस्तुस्थिती खरोखरच लाजिरवाणी आहे.
आपल्यापैकी कित्येकांना, एखादी दाक्षिणात्य भाषा ऐकल्यानंतर ती तेलगू आहे, तमिळ आहे की मल्याळम, हेसुद्धा सांगता येत नाही. त्या भाषा बोलणे किंवा त्या भाषांमध्ये लेखन करणे ही तर खूपच दूरची गोष्ट झाली. इतकेच नव्हे तर, मराठी भाषेशी पुष्कळसे साधर्म्य असलेल्या हिंदी, गुजराती या भाषाही आपल्याला येत नाहीत, आणि त्याची लाज वाटण्याऐवजी आपण ते 'वृथा अभिमानाने' सांगून हसण्यावारीही नेतो.
आपण आपल्याच देशाबद्दल आणि देशवासीयांबद्दल किती अनभिज्ञ आहोत, आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपण सर्वांनीच आणखी किती प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव मला गुंडर्ट बंगल्यामधे गेल्यावर प्रकर्षाने झाली.
शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२
८.मलबारची सफर-'अरक्कल संग्रहालय' आणि दीपगृह
'सेंट अँजेलो फोर्ट' बघून झाल्यावर आम्ही अराक्कल संग्रहालय बघायला निघालो. वाटेत एका मशिदीची सुंदर इमारत दिसली. सर्वसाधारणपणे बघायला मिळणाऱ्या इतर मशिदींपेक्षा या इमारतीची रचना खूपच वेगळी होती. ही मशीद अरक्कल म्युझियम आणि मापिला खाडीच्या मध्ये आहे. कण्णूर शहरातील ही सर्वात जुनी मशीद अरक्कल राजाने सतराव्या शतकात बांधली, असे आम्हाला आमचा गाईड शिहाद याने सांगितले. डच स्थापत्यशैलींमध्ये बांधली गेलेली ही एकमेव मशीद आहे आणि त्यामुळेच या मशिदीची इमारत वेगळी आणि अतिशय देखणी आहे.
सेंट अँजेलो किल्ल्यावर उन्हामध्ये फिरून आमच्या तोंडाला कोरड पडली होती. त्याबाबत आम्ही काही तक्रार करायच्या आधीच निलेश राजाध्यक्ष यांनी ते ओळखले असावे. अराक्कल संग्रहालयाजवळ आम्ही गाडीतून उतरल्यावर, संग्रहालयाच्या आत जाण्याआधी, त्यांनी आम्हा सर्वांना एक मस्त शीतपेय प्यायला दिले. शहाळ्यातील पाणी आणि 'पतली मलई' एकत्र मिक्सरमधून फिरवून, नंतर थंडगार केलेले ते मधुर पेय पिऊन आम्ही अगदी ताजेतवाने झालो.
'अरक्कल राजवट' ही केरळमधील एकुलती एक मुस्लिम राजवट होती. कण्णूर शहर आणि लक्षद्वीपमधील दक्षिणेकडील काही बेटांवर यांचे राज्य होते. हे शाही घराणे कोलाथिरी राजवंशाचीच एक शाखा असल्याचे म्हटले जाते. या घराण्यात मातृसत्ताक पद्धत पाळली जात असल्यामुळे, राज्याचे उत्तराधिकार मामाकडून भाच्याकडे जात असत. पण कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, स्त्री अथवा पुरुष, हाच राज्याचा शासक असतो. राज्यकर्त्या राजाला 'अली राजा' आणि सत्ताधारी राणीला 'अरक्कल बीवी' अशा नावांनी संबोधले जाते. या मुस्लिम शासकांनी, अठराव्या शतकामध्ये हैदर अली या म्हैसूरच्या राजाला, केरळवर आक्रमण करण्यासाठी बोलावले होते. १६६३ साली अरक्कल राजाने डचांकडून एक वास्तू विकत घेतली. ती वास्तू, म्हणजेच 'अरक्कल राजवाडा', ज्यामध्ये सध्या हे अरक्कल संग्रहालय आहे.
या छोट्याशा संग्रहालयाची इमारत जुनी असली तरी मजबूत आहे. संग्रहालयामध्ये अरक्कल राजघराण्यामधल्या लोकांनी वापरलेल्या वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्यात लाकडी नक्षीदार टेबल-खुर्च्या, बाक, पलंग, कपाटे, संदुका आणि मोठमोठाले आरसे आहेत. त्याचबरोबर त्या काळची शस्त्रे, दंड, वाद्ये, हांडे अशा इतरही अनेक वस्तू आहेत. जुने टेलीफोन्स, दुर्बिणी यासोबतच तिथले विशेष आकर्षण म्हणजे, कुराण शरीफची एक हस्तलिखित प्रत आणि अरक्कल राजवटीचा जुना ध्वज! शिहादने आम्हाला त्या ध्वजावरच्या सगळ्या चिन्हांबद्दल सविस्तर माहिती दिली. संग्रहालय बघून झाल्यावर आम्ही कण्णूरचे दीपगृह बघायला निघालो.
पैयंबलम बीचजवळ असलेल्या या दीपगृहापर्यंत पोहोचेस्तोवर, दुपारचे बारा वाजून गेले होते. दीपगृहाच्या आवारात शिरताच, डाव्या बाजूला एक छोटे संग्रहालय आहे. त्यामध्ये, सर्व दीपगृहांमध्ये पूर्वापार वापरली गेलेली वेगवेगळी उपकरणे ठेवलेली आहेत. शिहादने आम्हाला त्या उपकरणांची माहिती सांगितली. १८८५ सालापासून ते १९६२ पर्यंत लक्षद्वीप दीपस्तंभामध्ये वापरले गेलेले एक अवाढव्य ऑप्टिक (प्रकाश प्रवर्धित करणारी भिंगाची रचना) दाखवले. कधीकधी दाट धुक्यामुळे, ऑप्टिकने प्रवर्धित केलेला प्रकाशही जहाजांना दिसू शकत नाही. अशा परिस्थितीत जहाजचालकांना सतर्क करण्यासाठी पूर्वीपासून वापरण्यात आलेली एक प्रचंड घंटा या संग्रहालयामध्ये बघायला मिळाली. तिथल्या प्रेक्षागृहामध्ये भारत देशातील सर्व दीपगृहांबद्दलचा एक माहितीपट दाखवला जातो. संग्रहालय बघून झाल्यावर, आम्ही प्रेक्षागृहामध्ये चित्रपट बघायला जाईपर्यंत एक वाजत आला होता. तिथल्या सरकारी कर्मचाऱ्याने आम्हाला चित्रपट चालू करून दिला. पण बरोबर एक वाजायला पाच मिनिटे बाकी असताना, आपला सरकारी बाणा दाखवला. दुपारी १ ते २ जेवणाची सुट्टी असल्यामुळे त्याने आम्हाला संग्रहालयाच्या बाहेर काढले. त्यामुळे तो चित्रपट आम्हाला पूर्ण बघता आला नाही.
सकाळी सगळ्यांनी भरपेट नाश्ता केलेला असल्यामुळे एक वाजेपर्यंत कोणालाच भूक लागली नव्हती. त्यामुळे आम्ही सर्वांनी दीपगृहाचा जिना चढून वर जाण्याचे ठरवले. फक्त दादा आणि सौ. अस्मिता म्हात्रे खालीच थांबले. लाल आणि पांढर्या रंगात रंगवलेले, जवळपास ७५ फूट उंच असे हे दीपगृह, अजूनही सक्रिय आहे. वर चढून जाण्यासाठी एक चक्राकार जिना आहे. जिन्यामधे हवा येण्यासाठी बाहेरच्या भिंतीला ठराविक अंतरावर खिडक्या आहेत. जिना चढताना आम्हाला सर्वानाच धाप लागत होती. त्यामुळे त्या खिडक्यांजवळ थांबून जरा दम खात, अंगावर वारे घेत, बाहेर बघायला बरे वाटले.
अगदी शेवटी एक निमुळती आणि खडी चढण असलेली लोखंडी शिडी चढून, दीपगृहाच्या गोलाकार सज्जामध्ये जात येत होते. त्या शिडीवरून एकावेळी फक्त एकच व्यक्ती चढू किंवा उतरू शकत होती आणि चढताना पायामधे आणि पोटामध्येही गोळे येत होते. पण इतके कष्ट करून, सज्ज्यामध्ये पोहोचताच, जे दृश्य दिसले ते मात्र वर्णनातीत होते. मॉन्सूनचे तुफान वारे वाहत होते आणि नजर पोहोचेपर्यंत फक्त समुद्रच दिसत होता. तिथे आम्ही अनेक फोटो काढले. बऱ्याच जणांनी ३६० अंशातील व्हिडिओही काढला. व्हिडियोमध्ये आपण एखाद्या ठिकाणचे दृश्य, तिथले आवाज, तिथे असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील भाव हे सगळे कैद करू शकतो. पण तरीही तेथील 'माहौल', आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये उचंबळणारे भाव मात्र कैद करता येत नाहीत!
खरं सांगायचे तर त्या 'माहौल' मधून आमचा कोणाचाच पाय निघत नव्हता. पण त्या छोट्या सज्ज्यामध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला लागली होती. तसेच आम्हाला पुढे थलासरीपर्यंत प्रवास करून, तिथली सुप्रसिद्ध 'थलासरी बिर्याणी' चाखायची होती. त्यामुळे काहीश्या नाईलाजानेच आम्ही खाली उतरलो आणि गाडीमध्ये बसून थलासरीकडे प्रयाण केले.
शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२
७. मलबारची सफर-'सेंट अँजेलो फोर्ट'
१४ ऑगस्टच्या पहाटे ६ वाजता मला जाग आली. पाठोपाठ आनंदही जागा झाला. बीचवर जाण्यासाठी सोनम अगदी छान तयार होऊन शुभेन्दूची वाट पाहत थांबली होती. सात वाजेपर्यंत चहा मिळू शकणार नसल्याने आम्ही पुळणीवर फेरफटका मारायला गेलो. श्री. अशोक म्हात्रे आणि सौ. अस्मिता म्हात्रे, हे पती-पत्नी आम्हा सर्वांच्या आधीच तिथे पोहोचून पुळणीवर चालत होते. त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्हीही पाय मोकळे केले. पाठोपाठ सोनम-शुभेन्दूही आले. सगळ्यांचे एक छान फोटोसेशन झाल्यावर आम्ही रिसॉर्टवर परतलो. तोपर्यंत तिथे सकाळचा चहा आलेला होता. दादांना उठवून त्यांच्याबरोबर गरमागरम चहा घेतला.
चहा झाल्यानंतर अंघोळी आटपाव्यात म्हटले तर नळाला गरम पाणीच येईना. केरळमध्ये सर्वच हॉटेलांमध्ये, मसाल्याचा वास असलेले गरम पाणी प्यायला देतात. पण अंघोळीला मात्र गरम पाणी घेण्याची पद्धत नसावी की काय अशी शंका आम्हाला येऊ लागली. रिसॉर्टमध्ये सौर उर्जेवर पाणी गरम करण्याची सोय होती. पण त्यात कदाचित काही बिघाड असल्यामुळे गरम पाणी येईना. वातावरण ढगाळ होते आणि ऊन पडायचीही शाश्वती नव्हती. म्हणून आम्ही अंघोळीच्या आधीच नाश्ता करून घ्यायचे ठरवले.
नाश्त्यामध्ये स्थानिक पदार्थांची रेलचेल होती. जाळीदार पांढरेशुभ्र आप्पम, नारळाची चटणी, तांदुळाच्या उकडीपासून केलेले नाजूक इडिअप्पम व त्यासोबत गूळ घातलेले नारळाचे दूध, उपमा, गोडसर आप्पे म्हणजे मुट्टप्पम, व्हेज स्ट्यू असे एकेक अफलातून आणि सात्विक चवीचे पदार्थ होते. कुठल्याही पदार्थामध्ये तेल, मसाले अथवा मिरची जास्त नव्हते. कलिंगडाच्या कापलेल्या फोडींवर पुदिन्याची पाने आणि मसाला घालून ठेवलेले होते. आदल्या रात्री मी जेवलेले नसल्याने, मला भूक लागली होतीच. हे अतिशय आकर्षक पदार्थ समोर आल्यावर मी अक्षरशः पोटाला तडस लागेपर्यंत नाश्ता केला.
अंघोळीच्या गरम पाण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबावे लागले. शेवटी साडेनऊच्या सुमारास आमची गाडी 'सेंट अँजेलो फोर्ट' कडे निघाली. त्या दिवशी आमच्याबरोबर मोहम्मद शिहाद हा 'लोकल गाईड' म्हणून आलेला होता. किल्ल्यामध्ये पोहोचल्यावर त्याने आम्हाला बरीच चांगली माहिती सांगितली. काही माहिती मी गूगलवरही वाचली. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी आम्ही पोहोचायच्या आधीच किल्ल्यापाशी पोहोचले होते.
१४९८ साली वास्को द गामा पहिल्यांदा भारतात कोळीकोड किनाऱ्यावर उतरला होता. त्याने स्थानिक कोलाथिरी राजाला वसाहतीसाठी जागा देण्याची विनंती केली. १५०५ साली राजाकडून जमीन मिळवून पोर्तुगीजांनी तिथे एक लाकडी किल्ला बांधला. १५०७ साली त्यांनी त्याच जागी एक भक्कम दगडी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळी तिथल्या झामोरिन आणि कोलाथिरी राजांनी, किल्ल्याला वेढा घालून पोर्तुगीजांकडून तो किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला. पुढे या किल्ल्यामध्येच आपल्या नौदलाचा भक्कम तळ उभारून पोर्तुगीजांनी गोवाही जिंकले.
१६६३ साली डचांनी पोर्तुगीजांकडून सेंट अँजेलो किल्ला जिंकला आणि किल्ल्याचे आधुनिकीकरण केले. अरक्कलचा राजा अली याने १७७२ साली हा किल्ला डचांकडून विकत घेतला, पण १७९० साली ब्रिटिशांनी तो त्याच्याकडून हिरावून आपल्या ताब्यात घेतला. १९४७ सालापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांचा मलबारमधील मुख्य लष्करी तळ होता. बेकलच्या किल्ल्याप्रमाणेच, हा किल्लादेखील समुद्रामध्ये घुसणाऱ्या एका उंच सुळक्यावर बांधलेला आहे. त्यामुळे, किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारे दृश्य अतिशय नयनरम्य आहे. किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली असली तरीही सगळा परिसर खूप स्वच्छ ठेवलेला आहे. बुरुजावरून मापिला खाडी दिसते. खाली एका बाजूला अगदी समुद्राच्या काठावर एक छानशी बाग, आणि चालण्यासाठी एक ट्रॅकही केलेला आहे.
मोहम्मद शिहादसोबत आम्ही सगळा किल्ला हिंडून बघितला. किल्ला दाखवताना, तो किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आम्हाला समजावून सांगत होता. किल्ल्यावर एक जुने दीपगृह आहे. समुद्राच्या दिशेने डागता येतील अशा अनेक तोफा किल्ल्याच्या एका बुरुजावर आहेत. गंमत म्हणजे, त्यातल्या एका तोफेमधे एक तोफगोळा अडकूनच बसलेला आहे. त्याचा मी फोटो काढला. एके ठिकाणी, एका डच अधिकाऱ्याच्या पत्नीच्या आणि त्यांच्या दोन मुलांच्या थडग्यावरच्या दगडावर, त्या काळच्या डच भाषेत, त्यांचा मृत्युलेख लिहिलेला आहे. तो दगड बघून मात्र मला जरा उदास वाटले.
किल्ल्यामध्ये खालच्या बाजूला घोड्याच्या पागा आहेत. त्याशेजारी एक अंधारकोठडी आहे. किल्ल्याच्या आतमध्ये खूप उंच-उंच वृक्ष आहेत आणि बरीच फुलझाडेही आहेत. आम्ही भर पावसाळ्याच्या दिवसात तिथे गेल्यामुळे सगळीकडे हिरवळही होती. किल्ल्यामध्ये एके ठिकाणी एक खोल विवर होते. एखाद्या कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली असेल तर त्याचे हातपाय तोडून, त्याला त्या विवरामध्ये ढकलून देत असत, असे शिहादने आम्हाला सांगितले. त्या काळी, पोर्तुगीजांनी या भागामधील स्थानिक लोकांवर अनन्वित अत्याचार केले. विवरामध्ये ढकलून मृत्युदंडाची शिक्षा देण्याची प्रथा ब्रिटिशांनी बंद केली असेही आम्हाला सांगितले गेले.
किल्ल्याच्या आवारात एक 'Light and Sound show' चालू करण्याचे २०१५ साली ठरवण्यात आले होते. त्यासाठी किल्ल्यामध्ये जेंव्हा खोदकाम केले गेले, तेंव्हा जमिनीखाली गाडले गेलेले हजारो किलो वजनाचे तोफगोळे मिळाले. हजारो तोफगोळे बाहेर काढल्यावरही जमिनीखाली अजूनही बरेच तोफगोळे आहेत असे लक्षात आल्यामुळे शेवटी ते खोदकाम थांबवण्यात आले. ते सर्व तोफगोळे दोन खोल्यांमध्ये रचून ठेवले आहेत आणि खोल्यांच्या जाळीच्या दरवाज्यांना कुलूप लावलेले आहे. ती तोफगोळ्यांची रास आम्हाला शिहादने जाळीतूनच दाखवली. मी त्याचा फोटोही काढला.
किल्ल्याच्या आवारात आम्ही एकूण तास-दीडतास होतो. त्यानंतर आम्ही अरक्कल म्युझियम आणि कण्णूरचा दीपस्तंभ बघण्यासाठी पुढे निघालो.