शुक्रवार, १२ जून, २०२६

केदारनाथ-भाग-४

आज पहाटे ३ वाजता आम्हाला नारायणकोटीहून सोनप्रयागकडे जायचे होते. पहाटे २ वाजताच्या गजराच्या आवाजानेच जाग आली. डोळे चुरचुरत असले तरीही उठून तयार होणे आवश्यक होते. आमच्या खोलीमधे पाणी गरम करायला किटली, चहा-कॉफी, साखरेची आणि मिल्क पावडरची पाकिटे होती. पटकन चहा केला. त्यानंतर प्रातर्विधी व अंघोळ उरकून दोघेही ३ वाजायच्या आत तयार झालो. खूप जड असे ट्रेकिंग शूज घातल्यामुळे पायात जणू बेड्या किंवा साखळदंड घातल्यासारखे वाटत होते. 

आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडायला नारायणकोटीच्या हॉस्पिटलचीच गाडी येणार होती.  पहाटे ३ वाजायला पाच मिनिटे कमी असताना, गाडीच्या चालकाचा फोन आला. आम्ही तयारच होतो. पण डॉ. हर्ष आणि डॉ. अजय अजून तयार होत आहेत अशी माहिती त्या चालकाकडूनच समजली. त्यामुळे मग, "त्यांना घेऊनच आमच्याकडे ये", असे आम्ही चालकाला सांगितले. त्या दोघांना घेऊन गाडी सव्वातीन वाजेपर्यंत आमच्याकडे आली. पाठीवर घ्यायच्या बॅकपॅक्स आम्ही गाडीत ठेवल्या आणि स्थानापन्न झालो. 

हरिद्वारच्या हॉस्पिटलमधील व्यवस्थापक, श्री. ध्वजपालजींनी आम्हाला प्रत्येकाला गळ्यात अडकवायचा बिल्ला दिला होता. "केदारनाथला जाताना तो गळ्यात अडकवून जा, तो बिल्ला दाखवलात की पोलीस तुम्हाला कुठेही अडवणार नाहीत आणि कुठल्याही रांगेत उभे राहावे लागणार नाही," असे त्यांनी सांगितले होते. तसेच "कुठल्याही परिस्थितीत बिल्ला कुठे विसरू नका, हरवू नका आणि हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे परत आलात की तो आमच्याकडे जमा करा," असेही त्यांनी बजावून सांगितले होते. गाडीत बसल्यावर गळ्यात तो बिल्ला घालण्यासाठी मी बॅकपॅकमधे शोधायला लागले. पण ऐनवेळेस तो बिल्ला काही मिळेना. खरंतर मी तो लगेच सापडावा म्हणून माझ्या बॅकपॅकमधे बाहेरच्या बाजूलाच ठेवला होता असे मला आठवत होते. आम्ही  दोघांनीही आपापले बॅकपॅक्स उघडून, सगळे सामान काढून बघितले. तरीही तो बिल्ला कुठे मिळेना. मी अगदी हवालदिल झाले. पुन्हा खोलीत परत गेले आणि तिथेही शोधाशोध केली. तरी तो बिल्ला काही मिळाला नाही. मी अक्षरशः रडवेली झाले होते. तेवढ्यात हर्षचा फोन आला. त्याला गाडीतच तो बिल्ला खाली पडलेला मिळाला आहे हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला.

बिल्ला शोधाशोध प्रकरणात आमची पंधरा मिनिटे मात्र वाया गेली. शेवटी पहाटे साडेतीन वाजता आम्ही नारायणकोटीहून जेमतेम २४ किलोमीटरवर असलेल्या सोनप्रयागकडे निघालो. सोनप्रयागहून शटल गाडीत बसून गौरीकुंडपर्यंत जायचे होते व त्यानंतर पुढे प्रत्यक्ष ट्रेकिंगला सुरूवात करायची होती. आम्ही नारायणकोटीहून निघाल्यापासून वाटेत अक्षरशः पावलोपावली वाहतूक कोंडी लागत होती. कित्येक वेळा असे झाले की, एका जागी थांबलेल्या गाडीत आम्ही नुसतेच बसून ट्रॅफिक हलायची वाट पाहत असायचो. गाडी अगदी मुंगीच्या पावलाने पुढे जात होती. गाडीमध्ये आमच्या गप्पा चालूच होत्या. मी तिथेच बसून नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशनचा फॉर्म भरला. तिथे आम्ही गाडीत बसलेलो असतानाच हर्ष आणि अजय MBBSची परीक्षा  उत्तीर्ण झाल्याचे मेसेजेस त्यांना आले. त्यामुळे ते दोघेही खूप आनंदात होते. आम्हीही त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर थोडावेळ त्यांचे कोणकोण मित्र आणि मैत्रिणी उत्तीर्ण झाल्या आहेत, कोणकोण मागे राहिले आहेत, ही चर्चा फोनवर चालू होती. ती ऐकताना माझे मनही आमच्या कॉलेजच्या दिवसांमधे फिरून आले!  

पुढचे सुमारे पाच तास आम्ही गाडीत बसून होतो. तेवढ्या काळात जेमतेम १२-१४ किलोमीटरचा पल्ला गाठलेला असल्याने आम्ही पार वैतागून गेलो होतो. सोनप्रयागला पोहोचायला अजून किती वेळ लागेल काहीच सांगता येत नव्हते. गूगल मॅप पुढचा सगळा रस्ता, प्रचंड वाहतूक कोंडीचा, म्हणजे लाल रंगात दाखवत होता. तसेच त्या गाडीच्या चालकाला, आम्हाला सोडल्यानंतर नारायणकोटीला परतून कुणालातरी हरिद्वारला घेऊन जायचे होते. बराच उशीर होत असल्याने तोही सतत कुरकूर करत होता. आमच्या आसपासच्या गाड्यांमधून आमच्यासारखेच अडकलेल्या अनेक लोकांनी खाली उतरून पुढे चालायला सुरुवात केल्याचे आम्हाला दिसत होते. शेवटी आम्हीसुध्दा तोच निर्णय घेतला. सीतापूरच्या अलीकडेच आम्ही गाडी सोडून दिली आणि चालायला सुरुवात केली. 

सीतापूरपासून सोनप्रयागच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. त्या दुकानांमधून गरम कपडे, शाली, रेनकोट्स, टोप्या, छत्र्या, काठ्या, बूट आणि बुटावर चढवायला रबरी आवरणे अशा अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. काहीजण रस्त्याच्या कडेला बसून या वस्तू विकतात.  अनेक फिरते विक्रेते पाणी, चहा आणि इतर वस्तू विकत असतात. या मार्गावर जसजसे आपण वर-वर चढत जातो, तसतशी प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाते. आमच्याबरोबर, संपूर्ण भारतभरातून आलेले अनेक आबालवृद्ध  चालत होते. प्रत्येकाच्या हातात आधारासाठी किमान एकेक काठी होती. काहीजण तर दोन्ही हातात काठ्या घेऊन चालले होते. आमच्यासारख्या काही शहरी  लोकांनी पायात ट्रेकिंग शूज  घातले होते. पण बरेचजण साधे बूट, चपला घालून चालले होते. काहीजण तर अनवाणी चालत होते. बरेचसे शहरी लोक आणि विशेषतः तरूण-तरूणी जणू एखाद्या पिकनिकला चाललोय अशा अविर्भावात मजा करत चालत होते. खाणे-पिणे, फोटो काढणे, व्हिडीओ शूट करणे, आणि एकमेकांची चेष्टा करण्यात ते मश्गूल होते. सोनप्रयागला पोहोचेपर्यंत रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागलेली दिसत होती. त्यातून आणि लोकांच्या घोळक्यामधून वाट काढत आम्ही सावकाश पुढे चालत होतो. 

सोनप्रयागला पोहोचल्यावर हुश्श झाले. आता पुढील पाच किलोमीटर शटल गाडीत बसून गौरीकुंडला पोहोचायचे होते. सोनप्रयाग गाव सोडल्यानंतर, पुढे एक लोखंडी पूल लागला. तो ओलांडून डावीकडे गेल्यावर तिथे गौरीकुंडला जाणाऱ्या शटलगाड्यांचा थांबा आहे असे कळले. कमालीच्या गर्दीतून वाट काढत, आम्ही त्या शटलच्या थांब्यापर्यंत पोहोचलो. पण तिथली झुंबड बघूनच आम्ही हबकलो. शेकडो लोक तिथे आमच्या आधी येऊन थांबलेले होते. एखादी गाडी वरून खाली येऊन, त्यातले लोक बाहेर पडेपर्यंत, ती गाडी वर जाणाऱ्या यात्रेकरूंनी भरली जात होती. शटल म्हणजे टेम्पो ट्रॅक्स गाड्या होत्या व प्रत्येक गाडीमधे १२-१५ माणसे, अक्षरशः कोंबून भरली जात होती. "आम्ही डॉक्टर्स आहोत, आम्हाला ड्यूटीवर पोहोचायचे आहे, आम्हाला जरा लवकर  शटलमधे बसवून द्या," असे एका पोलीसाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्याने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्या तोबा गर्दीत त्यालाही फारसे काही करता येण्यासारखे नव्हते हेही खरेच. इथे शटलसाठी थांबून राहण्यात आणि अजून वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतरदेखील चालतच पार करायचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही उलटे लोखंडी पुलाकडे मागे फिरलो. हर्ष आणि अजयने तिथे वर जाणारा एक खड्या चढणीचा शॉर्टकट आम्हाला दाखवला. ती खडी चढण बघून माझ्या पोटात गोळाच उठला होता. पण अजय म्हणाला, "मॅम, आमच्यापैकी एकजण तुमच्या पुढे आणि एकजण तुमच्या मागे राहील. आम्ही बरोबर तुम्हाला घेऊन जाऊ. या शॉर्टकटमुळे आपले जवळपास एक किलोमीटर अंतर कमी होणार आहे." शेवटी माझ्या मनांत नसतानाही मी हिम्मत करून ती चढण चढू लागले. गौरीकुंडपर्यंत जायच्या आतच, ही पहिली खडी चढण यशस्वीरित्या चढल्यामुळे माझाही आत्मविश्वास थोडासा वाढला. 

अजय आणि हर्षच्या मते आम्ही दोघांनी पाठीवर वजन न उचलता, आमचे बॅकपॅक्स त्यांच्याजवळ द्यायला हवे होते. पण आम्ही दोघांनीही तसे करायला ठाम नकार दिला. आमच्या पाठीवरचे वजन कमी व्हावे म्हणून मग त्यांनी मागच्यामागे आमच्या बॅकपॅक्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. त्या एका बाटलीचे वजन कमी झाल्यानेही मला खूप बरे वाटले. त्यानंतर त्यांनी आमच्या बॅकपॅकमधील रेनकोटही काढून, त्यांच्या बॅकपॅक्समध्ये ठेवले. ही दोन तरूण मुले आम्हा दोघांची आणि विशेषतः माझी खूप काळजी घेत होती. मला चढायला त्रास वाटला तर हात देत होती. त्यामुळे मला त्यांचा खूपच आधार वाटत होता. आम्ही या प्रवासाला निघण्याआधी चालण्याचा भरपूर सराव केलेला असला तरीही, तो सराव किती अपुरा होता हे गौरीकुंडला पोहोचेपर्यंतच माझ्या लक्षात आले. 

सोनप्रयाग ते गौरीकुंडपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड झुंबड होती. आमच्यासारखेच चालत गौरीकुंडापर्यंत जायचा निर्णय घेतलेले अनेकजण होते. पण प्रवाश्यांनी खच्चून भरलेल्या शटल गाड्याही त्याच घाटाच्या रस्त्यावरून ये-जा करीत होत्या. त्यामुळे त्यांना वाट करून देताना आमची खूपच त्रेधा उडत होती. कसेबसे आम्ही गौरीकुंडापर्यंत पोचलो. तिथून प्रत्यक्ष केदारनाथपर्यंतचा पायी रस्ता सुरु झाला. 

आम्हाला वाटले होते की त्या पायवाटेवर शटल गाड्यांचा त्रास नसल्याने आमची पुढील वाट जरा तरी सुखकर असेल. पण आमचा लवकरच भ्रमनिरास झाला. अनेक खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले अक्षरशः आमच्या भोवती घोंगावत होते. खरंतर खेचराने यात्रेकरूंना वरपर्यंत नेण्याचा सरकारी दर ठरलेला आहे. पण त्या दरापेक्षा जास्त पैशामधे गिर्‍हाईक पटवणे आणि जमल्यास दिवसभरात दोन-तीन खेपा करून जास्तीतजास्त पैसे कमावणे, हा यांचा उद्देश असतो. चारधाम यात्रेचे हे पाच-सहा महिने यांचे कमाईचे दिवस असतात. नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमधून अनेक ठिकाणांहून आपापली खेचरे घेऊन हे सर्व वयांचे खेचरवाले इथे येतात. त्याचप्रमाणे डोली आणि पिठ्ठू उचलणारे तगडे तरूणही येतात. 'पिठ्ठू' म्हणजे त्या हमालाच्या पाठीवर बांधलेली एक खुर्ची असते. या खुर्चीमधे एक व्यक्ती किंवा काही सामान बसू शकते. या पिठ्ठूमधे शक्यतो लहान मुलांना किंवा कमी वजनाच्या यात्रेकरूंना बसवून वर नेतात. त्या-त्या व्यक्तीच्या वजनाच्या प्रमाणात किती दर आकारायचा हे सरकारने ठरवून दिलेले आहे. भरभक्कम वजनाच्या स्री-पुरूषांना घोडा करायचा नसल्यास त्यांच्यासाठी 'डोली'मधून जायचा पर्यायही उपलब्ध असतो. ही 'डोली' म्हणजे प्रत्यक्षात पूर्वीच्या काळी असायची तशी 'पालखी' किंवा 'मेणा' म्हणावा असाच असला तरी, त्याला वर छत मात्र नसते. ही डोली चार तरुण उचलून नेतात. तसे पाहता, खेचर काय, पिठ्ठू काय किंवा डोली काय, यापैकी कुठलाच पर्याय निर्धोकही नाही आणि सुखाचाही नाही. कारण हे खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले लोक खूप धसमुसळेपणा करतात. अनेकदा पिठ्ठूमधून किंवा खेचरावरून यात्रेकरू पडतात आणि त्यांना जबर दुखापत होते. त्या मानाने डोलीतून जाणे जरा तरी सुरक्षित असते. खेचरवाले अतिशय वेगाने खेचरं हाकत नेतात. त्यामुळे कित्येकदा चालणाऱ्या वाटसरूंना धक्का लागून मुकामार लागणे, खोक पडणे, याबरोबरच काहीवेळा अगदी फ्रॅक्चर किंवा जीवघेण्या दुखापतीही होतात. यात्रेकरुंपैकी कोणालाच सहसा घोड्यावर बसायची सवय नसते. इथे असलेली खेचरे अगदीच मरतुकडी आणि कुपोषित असतात. त्यांच्यावर ठेवलेल्या खोगीरांना चांगले, गुबगुबीत असे कुशनही नसते. त्यामुळे ढुंगणाच्या खालच्या भागाला आणि मांड्यांच्या आतल्या बाजूला घासून-घासून अनेकांना त्रास होतो. घोड्यावर किंवा खेचरावर बसताना नेहमीच मांड घट्ट ठेवून, रिकिबीत पाय व्यवस्थित रोवून बसावे लागते. इथे मात्र अनेकांचे पाय रिकीबीतून बाहेर लटकत असतात आणि त्या बाहेर लटकणाऱ्या पायांना सहजी इजा, फ्रॅक्चर्स होतात. एकूण काय, तर खेचरे, डोली आणि पिठ्ठू हे तिन्ही पर्याय, ते वापरणाऱ्यांसाठीच नव्हे तर पायी चालेल्या इतर लोकांसाठीही त्रासदायकच असतात. 

अरुंद रस्ता, कमालीची गर्दी, खेचरे, पिठ्ठूवाले आणि डोलीवाल्यांची धक्काबुक्की, वाटेवर पडलेली खेचरांची लीद, त्या लिदीची आणि मूत्राची दुर्गंधी, या सगळ्यामुळे हा प्रवास आम्हाला अतिशय क्लेशदायक होत होता. वाटेत कुठेही स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल याची खात्री नव्हती, स्वच्छतागृहे अगदीच तुरळक आणि अत्यंत गलिच्छ होती. स्वच्छ, पोटभरीचे व खात्रीशीर ताजे खाण्याचे पदार्थ कुठेही उपलब्ध नव्हते. लहान-लहान चण्या-शेंगदाण्याची, वेफर्स-चिवड्याची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या तेवढ्या मिळत होत्या पण या सर्वच वस्तूंचे भाव 'एमआरपी' च्या किमान दुप्पट लावले जात होते! 

अशा अवस्थेत आम्ही चालत होतो. एकूण २१-२२ किलोमीटर चढणीचा रस्ता चढत जाणे म्हणजे दिव्यच होते. मी ४५ वर्षांपूर्वी केदारनाथला आले होते, तेंव्हाचा रस्ता तसा अरुंद पण केवळ चौदा किलोमीटरचाच होता. २०१३ सालच्या प्रलयामध्ये तो रस्ता जागोजागी वाहून गेलेला होता. त्यामुळे सध्या जो रस्ता आहे तो जरा रुंद असला तरीही अधिक लांबीचा आहे. आताच्या मानाने पूर्वी यात्रेकरुंची संख्याही बरीच कमी होती. तरीही त्यावेळचा रस्ता सध्याच्या रस्त्यापेक्षा बराच अरुंद असल्याने, माझ्या आठवणीप्रमाणे त्या रस्त्यावरही आजच्यासारखीच गर्दी त्यावेळी आम्हाला जाणवली होती. त्या काळी हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध नसल्यामुळे खेचरे, पिठठू आणि डोलीवाल्यांची गर्दीही आजच्यापेक्षा जास्तच जाणवत होती असे मला आठवते. पण पंचेचाळीस वर्षांनंतरही या मार्गावर अधिक चांगल्या सोयी-सुविधा, आणि स्वच्छता नसावी याचे मला फार वाईट वाटले.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी कदाचित सगळ्यात जुन्या, आणि सगळ्यात दुर्गम जागी असलेल्या या सुंदर देवस्थानाच्या रस्त्यावर चालणाऱ्या यात्रेकरूंची आजही अशी दुरवस्था असावी हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. वर पायी चढत जायचे या निर्धारानेच आम्ही या प्रवासाला आलो होतो. पण इथली गर्दी, गैरसोयी, आणि घाण बघून मात्र आम्ही ठरवले की परतताना हेलिकॉप्टरनेच खाली उतरायचे. 

आम्ही पहाटे साडेतीनला आमची नारायणकोटीची खोली सोडली होती. त्यानंतर जवळपास पाच तासांनंतर, सकाळी ८.३० वाजता आम्ही चालायला सुरूवात केली. गौरीकुंडला पोहोचेपर्यंत जवळपास ११.३० वाजले होते. आम्ही दोघेही घामेघूम झालो होतो.  गौरीकुंड म्हणजे प्रत्यक्षात एक कुंडच आहे, ज्यामध्ये लोक स्नानही करतात. पण  ते बघायला थांबण्याची इच्छा आम्हाला झाली नाही. सतत चालत राहून,  दिवसाउजेडी केदारनाथला पोहोचावे अशी आमची इच्छा होती. आम्ही चढत असताना पाऊस मात्र आला नाही हे आमचे नशीबच म्हणायचे. पण कडाक्याचे ऊन पडले असल्याने मला चालणे कष्टदायक वाटत होते. लांब बाह्यांचे, सुती, पण एकावर एक असे तीन-चार कपडे मी अंगावर घातले होते. वरून एक गरम जॅकेटही होते. भर उन्हात चालताना अतिशय उकडायला लागले. त्यामुळे मी एकेक कपडे काढून कंबरेला गुंडाळणे सुरू केले. तरीही उकडणे कमी होईना. म्हणून मग माझ्याकडे बॅकपॅकमधे असलेली, बांधणीची पातळ ओढणी ओली करून डोक्यावर घेऊन मी चालू लागले. माझ्या लक्षात आले की मला खूप तहानही लागली होती. पण पाण्याच्या बाटल्या हर्ष आणि अजयजवळ होत्या आणि ती दोघेही मुले कुठे जवळपास दिसेनात. त्यामुळे आम्ही तसेच चालत पुढे निघालो.

गौरीकुंडला पोहोचेपर्यंत कुठेही वापरण्याजोगे, सार्वजनिक स्वच्छतागृह दिसेना. त्यामुळे काय करावे असा मला प्रश्न पडला होता. शेवटी रस्त्याच्या कडेच्या एका हॉटेलमध्ये  शिरले. तिथल्या मालकीणबाईला बऱ्याच विनवण्या केल्यानंतर तिला माझी दया  आली असावी. तिने आतल्या बाजूला असलेले स्वछतागृह वापरण्याची परवानगी दिली. तिथे जायच्या आधी, कुठे पडू नये म्हणून, माझा फोन मी आनंदजवळ दिला होता. आम्ही दोघे त्या हॉटेलमधून  बाहेर पडलो. मागून डोलीवाले आरडाओरडा करत येत होते. त्यांना चुकवायला आनंद डावीकडे सरकला आणि मी रस्त्याच्या उजवीकडे राहिले. मी आनंदला 'थांब-थांब' अशा हाका मारत असताना आनंद माझ्या डोळ्यासमोर गर्दीत दिसेनासा झाला. आता माझ्याकडे फोन नाही, पैसे नाहीत, जवळ प्यायला पाणी नाही आणि अजय आणि हर्ष या दोघांचाही कुठे पत्ता नाही, अशा अवस्थेत मी एकटीच चालत पुढे निघाले. 

[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.
 

गुरुवार, ११ जून, २०२६

केदारनाथ-भाग-३

आज सकाळी सहा वाजता हरिद्वारहून नारायणकोटीला निघायचे होते. पहाटे साडेचारचा गजर व्हायच्या आधीच जाग आली. सकाळी उठल्या-उठल्या आम्हा दोघांनाही गरम चहा हवाच असतो. पहाटे चहा मिळावा यासाठी आनंदने आदल्या रात्री इथल्या नेपाळी आचाऱ्याशी संधान बांधून ठेवले होते. "सकाळी चार वाजता या, मी इथेच असतो, मला उठवा, तुम्ही म्हणाल तेंव्हा, छान ताजा आणि गरम चहा करून पाजतो", असे आश्वासन त्याने आनंदला दिलेले होते. त्यामुळे आम्हाला चहा मिळणारच या खात्रीने आम्ही एक मजला उतरून भोजनालयामधे पोहोचलो. तिथे एक मनुष्य खाली जमिनीवर गादी टाकून, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपलेला दिसला. आनंदने त्याला हाक मारून उठवले. तर तो नेपाळी आचारी नसून कोणीतरी वेगळाच माणूस निघाला. "मी चहा करणारा माणूस नाही आणि जो चहा करतो तो माणूस इथे झोपत नाही", असे अत्यंत झोपाळलेल्या आवाजात सांगून, तो मनुष्य पुन्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपून गेला. आता चहा मिळणार नाही, या कल्पनेने आम्ही दोघेही अस्वस्थ  झालो. आपणच स्वयंपाकघरात जाऊन चहा करावा आणि प्यावा, अशा विचाराने आम्ही आत शिरलो. पण तिथला सगळा पसारा आणि भली मोठी भांडी पाहून आम्ही चक्रावून गेलो. त्यामुळे आम्ही चहा न करण्याचा निर्णय घेतला. आदल्या रात्री फ्रीजमधे ठेवलेला, कापलेल्या खरबुजाचा डबा घेऊन वर आलो आणि दोघांनी मिळून ते संपवले. 

अंघोळी उरकून, प्रवासाचे कपडे घालून, सगळे सामान बांधून आम्ही तयार झालो होतो. तोच ५.३० च्या सुमारास, आमच्या खोलीच्या दारावर थाप पडली. हॉस्पिटलचा वॉचमन आम्हाला सर्वांना जागे करायला आला होता. पाठोपाठ कोणीतरी खोलीवर चहा घेऊन आले. छान गरम, पण साखरेच्या पाकासारखा गोड चहा पिऊन आम्ही खाली उतरलो. आमचे सामान हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आधीच खाली नेऊन ठेवले होते. आम्ही उतरल्यानंतर डॉ. हर्ष आणि डॉ. अजय ही मुले त्यांचे सामान आवरून खोलीबाहेर पडले. हर्ष म्हणजे एक अगदी खास नमुना आहे, हे त्याच्या काल रात्रीच्या बोलण्यातच कळले होते. आज सकाळी तो खाली यायच्या आधी बराच वेळ वरच्या मजल्यावरच थांबून स्वतःचे  फोटो काढत बसला होता. ६.१५ पर्यंत आम्हाला न्यायला टॅक्सी आली. शेवटी हर्षला खाली बोलवावे लागले. चालक आमचे सामान टॅक्सीच्या वरच्या कॅरीअरला  बांधत असतानाच आम्ही हॉस्पिटलमधे असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यासमोर आमचे फोटो काढले. 

हरिद्वार ते नारायणकोटी, हा वळणा-वळणांच्या घाटरस्त्यावरचा प्रवास, कमीतकमी ६ तासांचा आहे. सध्या चारधाम यात्रा चालू असल्याने सतत वाहतूक कोंडी असते. त्यामुळे उशिरात उशिरा सकाळी सहा-साडेसहापर्यंत हरिद्वारहून निघा, नाहीतर जेवायच्या वेळेपर्यंत तुम्ही नारायणकोटीला पोहोचणार नाही, असे ध्वजपालजींनी आम्हाला बजावून सांगितले होते. आम्हाला नारायणकोटीला घेऊन जाण्यासाठी नेमलेल्या टॅक्सीवाल्याला आणखीही एक काम दिलेले होते. आमच्या आधी केदारनाथला गेलेल्या आणि १० दिवसांची सेवा पूर्ण करून परतणाऱ्या डॉक्टर्सना घेऊन त्याच दुपारी त्याला पुन्हा हरिद्वारला परतायचे होते. त्यामुळे आम्हाला नारायणकोटीला वेळेत पोहोचणे आवश्यक होते.

हरिद्वार ते नारायणकोटीचा प्रवास तसा सुखकर झाला. चालकाव्यतिरिक्त आम्ही चार प्रवासी गाडीत होतो. एसी गाडी होती खरी, पण अनेक ठिकाणी चढाचा रस्ता असल्याने चालकाला एसी बंदच करावा लागत होता. आनंदला मानेचा त्रास असल्याने तो चालकाच्या शेजारी बसला होता. मी, अजय व हर्ष मागे बसलो होतो. 

हर्ष आणि अजय या विद्यार्थ्यांशी खूप गप्पा झाल्या. ही मुले नुकतीच फायनल एमबीबीएस ची परीक्षा देऊन आलेली होती. रिझल्ट अजून यायचा होता. परीक्षा झाल्यावर इंटर्नशिप चालू व्हायच्या आधीच्या काळात ही तरूण मुले केदारनाथधामच्या हॉस्पिटलात काम करायला चाललेली होती, हे ऐकून आम्हाला दोघांनाही त्यांचे कौतुक वाटले. हे दोघेही, एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून ते आजतागायत एकाच खोलीवर राहात आहेत. त्यामुळे त्यांचा मैत्रीचा बंध अगदी घट्ट आहे. दोघेही अगदी पहिल्या वर्षापासून रक्तदानाचे कँप्स घेणे, आणि इतरही बरेच समाजोपयोगी कार्य करत आलेली आहेत. दोघेही मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत. हर्ष कटणीचा आणि अजय सिहोरचा राहणारा आहे. दोन्ही मुले शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे पुढे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने काही व्यवसायही चालू करावा असा त्यांचा मानस आहे. हर्ष फारच ध्येयवादी व आदर्शवादी वाटला. त्याच्या कल्पना चांगल्या असल्या तरीही त्या प्रत्यक्षात उतरणे अवघड वाटत होते. त्या मानाने अजय बराच प्रॅक्टिकल वाटला. 

हर्ष आणि अजय कडून National Medicos Organization (NMO) या संस्थेबद्दल माहिती मिळाली. मेडिकलच्या विद्यार्थ्यांपासून ते वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत कोणीही व्यक्ती या संस्थेची सदस्य होऊ शकते. देशभरातल्या दुर्गम, किंवा आदिवासी-बहुल भागांमध्ये या संस्थेचे मेडिकल कँप्स चालतात, देशभरातल्या लहान-मोठ्या गावांमध्ये त्यांच्या वार्षिक मीटिंग्ज होतात असे समजले. एकूण ही सर्व माहिती मला चांगली वाटली. म्हणून मी लगेच NMO चा फॉर्म भरायचा निर्णय घेतला. पण टॅक्सी-प्रवासादरम्यानच तो फॉर्म मी भरत असल्याने अनंत अडचणी आल्या. शेवटी तो फॉर्म दुसऱ्या दिवशी केदारनाथच्या वाटेवर जाताना भरला गेला.

हरिद्वार ते नारायणकोटीच्या रस्त्यावर वाटेत शिवपुरी व ब्रम्हपुरी ही गावे लागली. इथे River rafting, bungee jumping असे साहसी खेळ चालतात. त्यामुळे तिथपर्यंत खूप ट्रॅफिक लागले. गेल्या वर्षी आम्ही या भागात फिरायला आलेलो असताना आमची रिव्हर राफ्टिंगची सफर शिवपुरीतूनच सुरु झाल्याचे आठवले. हा भाग संपल्यानंतर कुठेतरी नाष्टा करायला थांबायचे ठरले. पण रस्त्यावर फारशी चांगली उपहारगृहे दिसत नव्हती. शेवटी चालकाला सांगितले की तू तुझ्या माहितीच्या बऱ्या ठिकाणी थांब. त्याने ज्या ढाब्यावर गाडी थांबवली तिथे जाऊन आम्ही पराठे, दही, छोले आणि कसलीशी चटणी असलेल्या थाळीचा नाष्टा केला. भूक लागलेली होतीच, आणि आता उंचावर चढून आल्याने हवाही जराशी आल्हाददायक वाटू लागली होती. मी आणि आनंदने आधी एकेक पनीर पराठा खाल्ला व नंतर एक मिक्स पराठा अर्धा-अर्धा करून खाल्ला. अजयने केवळ एक मिक्स पराठा खाल्ला. हर्षला गाडी लागण्याचा त्रास असल्याने त्याने फक्त लिंबूपाणी घेतले. लिंबूपाणी विकणारा मनुष्य चाट मसाला लावलेली काकडीपण विकत होता. मी आमच्यासाठी खायला काकडीही आणली. नाष्ट्यानंतर चहा प्यायल्याशिवाय समाधान होणार नव्हते. डॉ. अजयदेखील माझ्याप्रमाणेच चांगल्या चहाचा शौकीन असल्याने आमची मैत्री जरा आणखी घट्ट झाली. 

आम्ही सकाळी ६.३० ला हरिद्वारहून निघालो होतो. वाटेत जेमतेम अर्धा पाऊण तास थांबलो होतो. दुपारचा दीड वाजत आला तरीही रस्ता संपत नव्हता. वाटेत आधी देवप्रयाग, मग श्रीनगर (गढवाल), आणि रुद्रप्रयाग ही गावे लागली होती. केदारनाथकडून वाहत येणारी मंदाकिनी आणि हिमालयातील एका हिमनगातून वाहत येणारी अलकनंदा या पवित्र नद्यांचा संगम रुद्रप्रयाग येथे होतो. तिथून पुढे वाहत जाणारी अलकनंदा देवप्रयाग येथे भागीरथी नदीला जाऊन मिळते आणि त्यानंतर ती गंगा या नावानेच पुढे वाहत जाते. या दोन्ही संगमांच्या ठिकाणी आपण काही काळ थांबावे अशी हर्षची फार इच्छा होती. परंतु, आम्ही पोहोचल्यानंतर ज्या डॉक्टरांना आमच्याच गाडीतून हरिद्वारला परतायचे होते, त्यांचा आमच्या टॅक्सीचालकाला सतत फोन येत असल्याने आम्ही वाटेत फार वेळ वाया घालवणे श्रेयस्कर नव्हते. 

नारायणकोटीला पोहोचेपर्यंत दुपारचे २.३०-३ वाजले होते. अजय आणि हर्षची राहण्याची सोय नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे केली होती. पण तिथे काही दुरुस्तीचे  काम चालू असल्याने, आम्हा दोघांना,  जवळच असलेल्या एका छोट्या रिसॉर्टमधे ठेवले होते. नारायणकोटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री. गौरव जुयाल हे आम्हाला थोड्या वेळाने येऊन भेटणार असे म्हणाले होते. आम्ही बरोबर आणलेली वैद्यकीय सामग्री, मला त्यांच्याकडे  सुपूर्द करायची होती. तसेच दुसऱ्या दिवशीचे नियोजनही करायचे होते. पण बराच वेळ झाला तरी तो मनुष्य आला नाही. शेवटी त्याला फोन करून मी सांगितले, "आम्हाला आता जेवण करून झोपायचे आहे, तुम्ही लवकर या". सर्व वैद्यकीय सामग्री त्याच्या स्वाधीन केली आणि केदारनाथच्या रस्त्यासंबंधी चर्चाही केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथच्या वाटेवर सध्या तुफान गर्दी आहे, सोनप्रयागपर्यंत सतत वाहतूक कोंडी असते, तसेच तिथून पुढे गौरीकुंडपर्यंत शटल गाडी मिळणेही खूप अवघड होते, असे कळले. त्यामुळे शक्यतो पहाटे तीन वाजता नारायणकोटी सोडणे आणि  लवकरात लवकर सोनप्रयाग गाठणे  आवश्यक आहे, हे लक्षात आले. त्याप्रमाणे अजय आणि हर्षलाही दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत तयार राहा, असा निरोप दिला. 

आम्ही राहात असलेल्या 'हिमालयन कम्फर्टस्' या रिसॉर्टमधे अनेक छोट्या-छोट्या कॉटेजेस् होत्या. आमची कॉटेज म्हणजे एक लहानशीच पण अगदी उबदार अशी खोली होती. रिसॉर्टचा स्टाफ अतिशय अदबीने वागत होता. अगदी आर्मीच्या शिस्तीत सगळे काम चालू असल्याचा भास होत होता. त्यामुळे आम्ही दोघेही सुखावलो. त्यांच्या रेस्टॉरंटमधे बसून जेवायला मजा आली. आधी गरमागरम टोमॅटो सूप आणि भाजलेले पापड आणि सॅलड आले. त्यानंतर फणसाची भाजी, बीन्स+बटाटा भाजी, मटर-पनीर, छान शिजलेला आणि लाजवाब चवीचा राजमा, भात आणि टमटमीत फुगलेल्या गरम रोट्या असे चविष्ट जेवण होते. जेवणानंतर सुकामेवा घातलेली खीर होती व शेवटी सौंफ व मुखवास दिला. एकूण सगळे नेटके वाढणे, स्वच्छता आणि वाढप्यांचे अदबशीर बोलणे बघून आर्मीच्या वातावरणाचीच आठवण होत राहिली. न राहवून आम्ही चौकशी केल्यावर समजले की या रिसॉर्टचे मालक, कर्नल प्रदीप श्रीवास्तव, हे सेवानिवृत्त आर्मी पायलट आहेत. सध्या ते दिल्लीत वास्तव्याला असून इथे एक मॅनेजर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम रिसॉर्टची सर्व व्यवस्था पाहते. आर्मीमधून सेवानिवृत्तीनंतर कर्नल श्रीवास्तव हे येथील एका खाजगी हेलिकॉप्टर कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करीत होते. या रिसॉर्टच्या जवळच फाटा आणि गुप्तकाशी अशी दोन हेलिपॅड आहेत. त्यामुळे तिथून वर हेलिकॉप्टरने केदारनाथला जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांची इथे चांगली सोय होते. या चार महिन्यांत या रिसॉर्टची बरीच कमाई होत असावी. आनंदने लगेच कर्नल प्रदीप श्रीवास्तव यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या रिसॉर्टबद्दलचा आमचा अभिप्राय कळवला. मी त्यांचा वेबसाईटवर review देखील लिहिला. 

जेवण झाल्यावर आधी सामानाची बांधाबांध केली. श्री. गौरव जुयाल यांनी आमच्या लहान-लहान स्ट्रॉलीज पाहिल्या आणि आम्हाला त्या स्ट्रॉलीज मधेच सामान भरायला सांगितले. त्यामुळे केदारनाथला न्यायचे सामान त्यात भरून आम्ही आमच्या स्ट्रॉलीज तयार ठेवल्या. त्या स्ट्रॉलीज खेचरावरून वर केदारनाथला नेल्या जाणार होत्या. आमचे सामान केदारनाथला पोहोचायला दोन दिवसदेखील लागू शकतील असे समजले होते. सहसा, एका दिवशी सकाळी दिलेले सामान, दुसऱ्या दिवशी गौरीकुंडला पोहोचते व तिथे ते खेचरावर लादून तिसऱ्या दिवशी केदारनाथच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवले जाते. आम्ही जे सामान वरपर्यंत नेणारच नव्हतो तेवढे सामान आमच्या रिकाम्या झालेल्या  मोठ्या बॅगमध्ये घालून, ती बॅग आम्ही नारायणकोटीलाच ठेवली. स्ट्रॉलीज वरपर्यंत नेता येणार नाहीत अशा कल्पनेने आम्ही मुंबईहून ज्या रिकाम्या हॅन्डबॅग्स आणल्या होत्या त्या मात्र उगीचच बरोबर वाहून आणल्या असा पश्चात्ताप आम्हाला झाला. आमच्या पाठीवरच्या बॅकपॅक्समध्ये आम्ही अगदी अत्यावश्यक सामान घेतले. त्यात पाण्याची एकेक बाटली, केदारनाथला गेल्यावर बदलण्यासाठी एकेक कपड्यांचा जोड, एक स्वेटर, कानटोपी, माझा स्टेथोस्कोप, आधार कार्ड, रेनकोट व पैसे अशा मोजक्या वस्तू सोबत ठेवल्या. माझ्याकडे एक पातळ सुती ओढणी होती. तीही बॅकपॅकमधे ठेवली. चालताना वापरण्यासाठी ट्रेकिंग स्टिकही घेतल्या. संस्थेने आम्हाला दिलेले, गळ्यात अडकवायचे आयडी कार्ड किंवा ओळखपत्रही सोबत ठेवले.

सामानाची आवराआवर करून ९ वाजता झोपी गेलो. पण झोपण्यापूर्वी पहाटे दोन वाजताचा गजर लावायला मात्र विसरलो नाही!

बुधवार, १० जून, २०२६

केदारनाथ-भाग-२

आमची मुंबई-दिल्ली फ्लाईट १८ तारखेला सकाळी १० वाजता होती. आम्ही जाताना मुद्दामच मुंबई दिल्ली असे विमानाचे तिकीट काढले होते. डेहराडून एयरपोर्ट छोटा आहे आणि हवामान खराब  असले की तिथला विमानतळ बंद केला जातो. दिल्ली-डेहराडून हे विमान काही कारणाने रद्द झाले तरी आम्ही दिल्लीहून टॅक्सी घेऊन डेहरादूनला पोहोचू शकणार होतो. आम्ही दोघेही सकाळी साडेपाचलाच उठलो. आमच्या आधीच गिरीशही  उठून बसला होता. आम्ही दोघे जात असल्याने तो जरा हळवा झाला होता. आमच्यासाठी त्याने चहा करून ठेवला होता आणि सँडविचेसही बनवून घेतली होती. रात्रीचे जेवण बरेच जड झालेले असल्याने आम्हाला  दोघांनाही सकाळी काहीही खायची भूक नव्हती. त्यामुळे ती सँडविचेस डब्यात घालून वाटेत खाण्यासाठी आम्ही आमच्याबरोबर घेतली. तसेच चार वेलची केळीही गिरीशने बरोबर दिली. प्रवासात खाणे आणि पाणी बरोबर असले पाहिजे, असा आमच्या आईचा नियम होता. तो नियम आम्हा तिघाही भावंडांच्या डोक्यात हे पक्का बसलेला आहे. त्यामुळे सॅन्डविचेसचा डबा, केळी आणि दोन पाण्याच्या बाटल्याही मी सोबत घेतल्या. त्यानंतर पटापटा अंघोळी करून व आवरून, आम्ही उबर टॅक्सीने विमानतळ गाठला. 

मुंबई ते दिल्ली व दिल्लीपासून पुढे देहरादून पर्यंतचा प्रवासही सुखाचा झाला. कोणत्याही प्रवासात इतर सहप्रवासी काही खात असतील तर आपल्यालाही काहीतरी खायची अनावर इच्छा होतेच. दिल्लीच्या प्रवासात विमानात एयरहोस्टेसने काही ठराविक प्रवाशांनाच खाणे दिले. त्यातल्या काहींनी आधीपासून खाद्यपदार्थांसाठी पैसे भरलेले होते तर काहीजण पैसे भरून खाद्यपदार्थ विकत घेत होते. त्या खाद्यपदार्थांच्या वासाने आमचीही भूक चाळवली. म्हणून आम्हीही सोबत आणलेले सँडविचेस व केळी असे खाल्ले. आम्ही देहरादूनला दुपारी ३ वाजता पोहोचणार होतो. दिल्लीला बारा वाजताच पोहोचलो होतो. थोडे खाणे झाले असले तरीही अजूनही पोटात भूक होती. दिल्ली विमानतळावर अगदी गडबडीतच वडा सांबार खाल्ले आणि कॉफी प्यायलो. त्या सुमार चवीच्या वड्यामुळे आणि कॉफीमुळे अंशी आमच्या तोंडाची चव तर खराब करून घेतलीच, पण त्या सुमार खाण्यापायी  चक्क साडेसहाशे रूपये उडाल्याचे दुःख त्याहून मोठे होते

दिल्ली देहरादून विमान आम्ही अगदी धावत-पळतच पकडले. जेमतेम पाऊण तासांतच विमान डेहरादूनला उतरले. गेल्या वर्षी डिसेंबरमधे आम्ही दिल्लीमार्गे हरिद्वार, ऋषिकेश आणि देहरादूनला येऊन गेलो होतो. पण त्यावेळी आम्ही दिल्ली-देहरादून प्रवास रेल्वेने व देहरादून-दिल्ली प्रवास टॅक्सीने केला होता. त्यामुळे, देवभूमीतील देहरादून येथील जॉली ग्रँट एयरपोर्टवर आम्ही प्रथमच पाऊल ठेवत होतो. तिथे सगळ्या पाट्या हिंदी तसेच संस्कृतमधे आहेत. वाचून छान वाटले. एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला हॉस्पिटलची गाडी आली होती. गाडी तशी खटाराच होती. एसी लावलेला होता पण गाडी फारशी थंड होत नव्हती. आमच्या आधी दोन तीन तास, हैद्राबादचे एक सायकियाट्रिस्ट डॉ. राव आलेले होते. आम्ही दुसऱ्या दिवशी केदारनाथसाठी रवाना होणार होतो तर ते बद्रीनाथला जाणार होते. त्यांना व आम्हाला मिळून एकच गाडी नेमलेली होती. त्यांचे जेवण झालेले नसल्याने, आम्ही पोहोचलो तेंव्हा ते गाडी घेवून जेवण-खाण्याच्या शोधात बाहेर पडलेले होते. पण दुर्दैवाने त्यांना जवळपास काहीच खायला मिळाले नाही. आमच्या बरोबर गाडीतून तेही हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे आले. तोपर्यंत चार वाजून गेले होते आणि ते भुकेने कासावीस झाले होते. 

हॉस्पिटलमधे पोहोचल्यानंतर तिथले मुख्य डॉक्टर संजय शाह यांच्या ऑफिसमधे बसून, त्यांच्या बरोबर बऱ्याच गप्पा झाल्या. थोड्या वेळाने चहा आला पण चहाबरोबर बिस्किटे येणार होती ती काही  आली नाहीत. डॉ रावांना हिंदी बोलण्याची जरा अडचणच असल्याने आणि कदाचित भिडस्त स्वभावामुळे, ते त्यांच्या भुकेबाबत किंवा काहीतरी खायला मिळावे याबद्दल  तोंड उघडून बोलेनात. डॉ शहा तर खूपच गप्पा मारत बसले होते. आम्हा दोघांनाही प्रवासाचा शीण जाणवत होता. शेवटी काही खायलाही येईना आणि गप्पाही संपेनात, हे बघून, आम्हीच डॉ. शाह यांना सांगितले की डॉ राव यांना भूक लागली आहे, तरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था लवकरच झाली तर बरे होईल.  

हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये एकच स्वयंपाकी आहे, पण त्याने  संध्याकाळची भाजी आमटी करून ठेवलेली आहे, अशी खबर मिळाली. आम्हा तिघांसाठी फक्त गरम फुलके करणे बाकी होते. आम्ही तिघेही पहिल्या मजल्यावर असलेल्या भोजनालयात गेलो. भोजनालयाच्या आत जाण्याआधी बाहेरच्या स्टँडवर आपापले बूट व चपला काढून जाणे अपेक्षित असते. जेवण झाल्यावर आपापले ताट, वाटी, भांडे व चमचे धुवून ठेवायचे असते. हॉस्पिटलमधे काम करणारेे सर्व कर्मचारी व डॉक्टर्स एकत्र आणि एकच प्रकारचे जेवण या भोजनालयात आनंदाने जेवतात. सकाळी प्रार्थना होते, अन्नदेवतेला हात जोडून मगच सगळेजण जेवण सुरू करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीचा आणि एकत्र काम करण्याच्या शक्तीचा अनुभव इथे आला. 

 डॉ रावांच्यामुळे संध्याकाळी  सहाच्या आत  आम्हालाही गरम जेवण मिळाले. अगदी साधे पण रुचकर जेवण होते. तिथे डॉ संजय शाह यांची पत्नी डॉ. तीस्ता शाह यांनी स्वहस्ते आम्हाला गरम फुलके आणून वाढले. अशा प्रकारे स्वागत झाल्यामुळे आम्ही मनोमन सुखावलो. पोटभर जेवण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत गेलो. हॉस्पिटलमधेच वरच्या मजल्यावर चार क्रमांकाच्या खोलीमधे आमची राहण्याची व्यवस्था होती. आतल्या आतच संडास व न्हाणीघर असलेली ती  प्रशस्त खोली होती. आमचे सामान आधीच तिथे नेऊन ठेवलेले होते. एका मठाची वास्तू या संस्थेने आपल्या हॉस्पिटलसाठी मिळवली आहे. याच वास्तूमधे 'सेवाभारती' या संघाच्या उपसंस्थेचे कार्यालयही आहे.

 त्या जुन्या मठाच्या जागेतच हे हॉस्पिटल सुरू केलेले असले तरी आमची राहण्याची व्यवस्था असलेल्या भागाचे बांधकाम कदाचित नवीन असावे. खोलीतील बाथरूममधे एक साबण, एक शांपूचे व एक तेलाचे पाकीट ठेवलेले होते. अंग पुसायचे पंचे व हात पुसायला टॉवेलही दिलेला होता. खोली साधीच पण स्वच्छ होती. बाहेर सर्व खोल्यांना सामायिक असा एक मोठा व्हरांडाहोता. आम्ही दोघांनीही अंघोळ केली. दिवसभर घातलेले कपडे धुवायला वॉशिंग मशीनचा शोध आम्ही घेऊ लागलो. आमच्या खोलीकडून जुन्या भागाला जोडणारा एक कलंडलेला आणि अरुंद व्हरांडा होता. तिथेच पुढे एका मोठ्या खोलीत चार-सहा वॉशिंग मशीन्स ठेवलेली होती. बरेच जुने सामानही तिथे पडलेले होते. बाहेर एक मोठी गच्ची होती. तिथे कपडे वाळत घालण्यासाठी तारा होत्या. काही खोल्यांच्या बाहेर, कपडे वाळत घालण्यासाठी स्डँडही ठेवलेले दिसत होते. आनंदने तिथे जाऊन आमचे दिवसभर वापरलेले कपडे, वॉशिंग मशीनमधून धुवून काढले व वाळत घातले. बाहेर गच्चीवर छान वारे सुटलेले होते. खोलीच्या बाहेर वातावरण थंड आणि प्रसन्न होते. त्यामानाने खोलीच्या आत एसी असूनदेखील विशेष थंडावा जाणवत नव्हता. 

पोटभर जेवण झालेले असले तरीही जिभेचे चोचले पुरवायला आम्ही दोघे बाहेर पडलो. डॉ. राव यांना  'हर की पौडी' घाटावरची गंगाआरती पाहायची असल्याने ते तिकडे गेले होते. आम्ही सहा महिन्यापूर्वीच ते सर्व पाहिलेले असल्याने, जरा इकडे-तिकडे फिरून कुठे हलवायाचे चांगले दुकान दिसते आहे का ते पाहायला आम्ही निघालो. जवळच मोहन पुरीवाल्याचे दुकान दिसले. तिथे आत वातानुकूलित खोलीत बसून रसमलाई, लस्सी आणि दही खाऊन जीव तृप्त झाला. परत येताना एक खरबूजही आणले.  तिथल्या स्वयंपाकघरातून सुरी घेऊन अर्धे खरबूज कापून खाल्ले आणि उरलेले अर्धे कापून डब्यात भरून स्वयंपाकघरातील फ्रीजमधे नेऊन ठेवले. पहाटे निघण्यापूर्वीच्या नाश्त्याची सोय झाली. 

भोपाळहून आलेली डॉ. हर्ष राय आणि डॉ. अजय अहिरवाल अशी दोन तरूण मुले आमच्या बरोबरच केदारनाथला जाणार आहेत, असे आम्हाला इथल्या श्री. ध्वजपाल जी नावाच्या  मॅनेजरकडून कळले होते. रात्री त्या दोघांची आणि आमची ओझरती भेट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता, आम्हाला नारायणकोटीला नेण्यासाठी गाडी येईल, असे ध्वजपालजींनी सांगितले होते. त्यामुळे रात्री लवकर झोपणे आवश्यक होते. पण विमानातून आणण्यासाठी बॅग्ज ज्या पद्धतीने भरल्या होत्या, त्या उघडून त्यातले सामान वेगळ्या पद्धतीने भरणे आता आवश्यक होते. एका मोठ्या बॅगेमधे केदारनाथच्या हॅस्पिटलमधे देण्याचे सामान वेगळे केले. केदारनाथला जायच्या वाटेवर नारायणकोटी येथे आमच्या व्यक्तिगत सामानापैकी कुठले सामान काढून ठेवायचे आणि कोणते सामान पुढे वरपर्यंत न्यायचे याचे मनोमन नियोजन केले. रात्री १० वाजेपर्यंत झोपलो, पण त्याआधी सकाळी ४.३० चा गजर लावायला आम्ही विसरलो नाही. 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट  

सोमवार, ८ जून, २०२६

केदारनाथ - भाग १

केदारनाथला जाण्याचे ठरल्याने आणि तिकिटेही झालेली असल्याने आम्ही दोघेही चांगलेच उत्साहात होतो. ट्रेकिंग करणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणीना विचारून CTR चे waterproof, ankle-high, trekking shoes विकत घेतलेले होते. ते घालून एकदा सिंहगड, दोन तीन वेळा तळजाई आणि पर्वती चढून झाले होते. म्हणजेच ट्रेकर्सच्या भाषेत ज्याला 'breaking the shoes' म्हणतात किंवा ज्याला आपण नवीन जोड्यांची सवय करणे म्हणतो, तेही झाले होते. दुर्गेश बुगडे या ट्रेकर मित्राने त्याच्याकडच्या, धातूच्या दोन चांगल्यापैकी trekking sticks ही आम्हाला वापरण्यासाठी दिल्या होत्या. माझ्या भाचीचे काही पातळ पण अतिशय उबदार स्वेटर्स माझ्याकडे होते. आनंदला एक ट्रेकिंग पॅन्ट हवी होती, तीही विकत आणलेली होती. त्यामुळे सगळी जय्यत तयारी झालेली होती. आम्ही विमानाचे तिकीट काढायच्या सुमारासच नेमके इराण-अमेरिका युद्ध जोरदार सुरु झाले होते. "भारतातील चार विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी बंद  ठेवणार" अशी बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. त्यामधे पुण्याचाही विमानतळ होता. म्हणून मग आम्ही आमचे तिकीट मुंबईहून काढले होते. 

आमची फ्लाईट १८ तारखेला सकाळी १० वाजताची होती. त्यामुळे गिरीश-प्राचीकडे १७ तारखेला दुपारपर्यंत पोहोचण्याचे ठरवले होते. १६च्या रात्री उशिरापर्यंत सामानाची बांधाबांध सुरू होती. नवीनच ओळख झालेल्या साहिल या मुलाला फोन करून सकाळची टॅक्सी सांगितली होती. खरंतर साहिलला बजावून सांगितले होते की ड्रायव्हरला सकाळी ७.३० ला  आम्हाला फोन करू दे. त्यावेळी आम्ही त्याला वेळ सांगू, मगच त्याला येऊ दे. पण तो निरोप त्या ड्रायव्हरला पोहोचलाच नव्हता. त्यामुळे बरोबर ७.३० वाजता स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन तो हजरच झाला. सगळी आवरासावर करून निघताना कमालीची गडबड झाली. कसेबसे सामान एकत्र करून, शेवटचे अगदी जपून ठेवलेले दोन आंबे खाऊन आम्ही सामान घेऊन खाली उतरलो. आम्हाला घ्यायला आलेली गाडी मोठी असली, तरीही मागे डिकीमधे सिएनजी सिलेंडर असल्याने डिकीमधे सगळे सामान बसले नाही. शेवटी ड्रायव्हरशेजारी पुढच्या सीटवर काही सामान कोंबून ९ वाजता घर सोडलं. 

वाटेत आम्ही माझ्या मामेनणंदेकडे, मंजूकडे पनवेलला जाणार होतो. तिच्याकडे सकाळी ११ च्या सुमारास पोहोचलो. तिथे दोन तास गप्पा आणि खाणं-पिणं झालं. मंजूने मस्त इडली-सांबार आणि हुग्गी केलेली होती. आम्ही गेल्यापासून ते आम्ही निघेपर्यंत मंजुची नात, आभा, गाढ झोपेत असल्याने तिला जागे असताना बघताच आले नाही. शांतपणे झोपलेले ते गोड बाळ बघून मात्र मन प्रसन्न झाले. आमची निघायची वेळ होऊन गेलेली असल्याने, शेवटी तिच्यासाठी नेलेले पांघरूण आणि छोटीशी भेट प्रियांकाच्या हातात देऊन आम्ही माहीमला निघालो. गिरीश-प्राचीच्या घरी आम्ही पार्किंग मधे पोहोचायला आणि प्राचीची गाडी तिथे पोहोचायला एकच गाठ पडली. प्राची, तिची मैत्रीण मृणाल आणि मैत्रिणीची डॉक्टर बहीण स्वाती असे डहाणूजवळील आगवन येथे एका मेडिकल कँपसाठी गेले होते. त्यांच्याबरोबर थोड्याफार गप्पा झाल्या. 

आता आम्हाला आमचे सामान आवरणे अत्यावश्यक होते. माझ्याबरोबर मी बरेच वैद्यकीय सामान केदारनाथच्या हॉस्पिटलमधे देण्यासाठी सोबत आणले होते. त्या सगळ्या सामानाचे फोटो काढून मी त्या संस्थेचे मुख्य व्यवस्थापक, संदीपजींकडे आदल्या रात्रीच पाठवले होते. या सामानात बरेच स्प्लिंट्स्, दोन ग्लुकोमीटर, बीपी मोजण्याचे मशीन वगैरे होते. 'ते सगळे सामान केदारनाथच्या हॉस्पिटलमध्ये वापरले जाईल, तुम्ही ते बरोबर घेऊन या", असे संदीपजींनी मला फोनवर सांगितले. विमानाने नेण्याच्या दृष्टीने ते सामान नेमक्या कुठल्या दोन बॅग्जमधे भरायचे आणि पुढे केदारनाथला कसे न्यायचे, याचे नियोजन करण्यातच बराचसा वेळ गेला. 

वैद्यकीय सामान खूप जड होते. त्याशिवाय, वजनाने हलके पण आकाराने मोठे असे बरेच स्वेटर्स आणि इतर गरम कपडे होते. विमानामधे प्रत्येकी १५ किलोची एकच बॅग चेक-इन करता येणार होती. हल्ली आपल्याला स्वतःचे सामान वाहून किंवा उचलून न्यायची सवयच राहिलेली नाही. विमानप्रवासात आणि इतरत्र सहजी वाहून नेण्यासाठी खाली चाके असलेल्या स्ट्रॉलीज सोयीच्या पडतात. पण "वर केदारनाथला जाताना स्ट्रॉली बॅग्स आणू नका, त्या खेचरांवर लादणे अवघड पडते" असेही आम्हाला सांगितले गेले होते. अगदी अत्यावश्यक असे कमीतकमी सामान आणा अशी सूचनाही मिळालेली होती. त्यामुळे सामान हरिद्वारपर्यंत न्यायला स्ट्रॉलीज बऱ्या आणि पुढे खेचरांवरून केदारनाथपर्यंत सामान वाहून नेण्याच्या दृष्टीने छोट्याछोट्या, चाकं नसलेल्या चार जाडसर हॅण्डबॅग्ज न्याव्यात असे ठरले. वैद्यकीय सामान व इतरही बऱ्याच जड वस्तू घालून एक बॅग आधी बाजूला केली. त्याचे वजन साधारण १५ किलोपर्यंत भरतेय याची खात्री करून घेतली. त्यानंतर आनंदची बॅग आकाराने जरा मोठी असल्याने त्यातही जमेल ते जड सामान घातले. त्या बॅगचे वजनही १०-१२ किलो भरले. उरलेले सामान विमानात घेऊन जाण्याच्या दृष्टीने हॅन्डबॅगमध्ये भरले. कमीतकमी सामान घेऊन प्रवास करणे खरोखरच किती अवघड असते, हे लक्षांत आले. सगळ्या बॅगा  योग्य प्रकारे पॅक करून भरायला आम्हाला दोन-तीन तास लागले. 


सगळे सामान आवरून झाल्यावर आम्ही जरा गप्पा मारायला मोकळे झालो. रविवारची रात्र असल्याने, त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे  गिरीश-प्राची आम्हाला घेऊन बाहेर जेवायला हॉटेलमध्ये निघाले. 'हयात' या पंचतारांकित हॉटेलच्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये गेलो. जेवण चांगले होतेच पण पंचतारांकित हॉटेलमधल्या झुळझुळीत वातावरणात ते विशेष चांगले वाटले. घरी आल्यावरही रात्री उशीरापर्यंत गप्पा झाल्या. गिरीशला आनंदबरोबर इराण-अमेरिका युद्धाबद्दल आणि पुढील संभाव्य धोके आणि शक्यतांबद्दल गहन चर्च करायची खूप सुरसुरी होती. नुकत्याच पार पडलेल्या तीन-चार राज्यातील निवडणूका, ममतादीदींची हार असे इतरही अनेक विषय चघळायला होतेच. हा गप्पांचा तास बराच लांबला आणि झोपायला पहाटेचा १ वाजला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताची फ्लाईट असल्याने, तयार होऊन,नाश्ता करून ७-७.३० पर्यंत घर सोडणे आवश्यक होते. त्यामुळे जेमतेम चार-साडेचार तास झोप मिळणार होती... 


क्रमशः 

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

दीपशिखा

१९९५ साली, अलाहाबाद कॅंटोन्मेंटमधील टेनिस कोर्टवर एक सुंदर, सुदृढ मुलगी तडफदारपणे टेनिस खेळताना मी बघितली. तिचा खेळ झाल्यावर मी तिला तिचे नाव विचारले. ती म्हणाली, "दीपशिखा". ती मुलगी आणि ते नाव माझ्या मनात घर करून बसले. त्यानंतर साधारण दीड-पावणेदोन वर्षांनंतर माझ्या धाकट्या वहिनीला एक गोड  मुलगी झाली. मी तिची आत्या असल्याने तिचे नामकरण करण्याचा मान माझाच होता. मी त्या मुलीचे नाव 'दीपशिखा' ठेवले. 

आम्हा तीन भावंडांच्या मुलांपैकी दीपशिखा सगळ्यात लहान असल्याने ती आम्हा सर्वांचीच लाडकी होती. घरात इतर सगळेजण तिला  दिलू म्हणत. पण माझ्यासाठी ती नेहमीच दीपशिखा होती. लहानपणी जरा घुमी वाटणारी दीपशिखा वयात आल्यावर एखाद्या सुंदर, टवटवीत फुलासारखी खुलली. अतिशय हुशार,  प्रेमळ, अधिकारवाणीने बोलणारी, माणसांमध्ये रमणारी दीपशिखा कलासक्त होती. प्रवासाची, चवीचे खाण्याची,  नटण्याची आवड असलेली आणि सदैव उल्हसित असलेली ती तरुणी तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे प्रत्येकावर छाप पाडत असे. 

आम्हा दोघींचे रूप, बोलण्याची ढब, आणि एकंदर व्यक्तिमत्त्व यांमधे खूप साम्य आहे असे इतरांना वाटायचे. आम्हा दोघींचे एकमेकींवर अतोनात प्रेम असले तरीही छोट्या-मोठ्या कारणांवरून आमचे बरेच वाद व्हायचे. त्यामुळे, तुम्हा दोघींची Love-Hate relationship आहे, असे माझा भाऊ गिरीश नेहमी म्हणायचा. आम्ही एकमेकींची मनसोक्त चेष्टामास्करी करायचो, अगदी समवयस्क मैत्रिणी असल्यासारख्या आम्ही रात्ररात्र गप्पा मारत बसायचो, एकमेकींवर बौद्धिक कुरघोड्या करायचो. खूप मजा करायचो.  

दीपशिखा दहावीमध्ये शिकत असताना काही कारणाने आम्ही मुंबईला गेलो होतो. शाळेतून आल्या-आल्या  ती मला म्हणाली, "आज माझ्या शाळेतल्या संस्कृतच्या बाईंनी मला विचारले माझे नाव कोणी ठेवले. मी अर्थातच तू ठेवल्याचे त्यांना सांगितले. आमच्या बाई म्हणाल्या, तुझ्या आत्याला जाऊन सांग की तिने तुझे अगदी खास नाव ठेवले आहे. बाईंनी मला माझ्या नावाचा अर्थही समजावून सांगितलाय. त्यामुळे I am feeling really special. Thank you very much!" अलाहाबादला भेटलेल्या मुलीमुळे प्रभावित होऊन, मी तिचे नाव दीपशिखा ठेवले होते, असे मी तिला सांगितले. त्यावेळी  तिने मला, "दीपशिखा कालिदास" असे काहीसे सांगितलेले मला आठवते. त्यानंतरही अनेकदा याच कारणासाठी ती माझे वरचेवर आभार मानत आली. पण तो संदर्भ  मी पार विसरून गेले होते. 

एका आठवड्यापूर्वी आम्ही तिच्या लग्नासाठी नाशिकला निघालो होतो. त्यावेळीदेखील, मी तिचे नाव दीपशिखा ठेवल्याबद्दल तिने माझे आभार मानले आणि मला म्हणाली," आत्या, माझ्या नावाचा काहीतरी खास अर्थ आहे. तू जरा बघून सांग ना." पण लग्नाच्या धामधुमीत मी ते विसरूनच गेले. 

२८ डिसेंबरला सकाळी दीपशिखाच्या हळदीचा कार्यक्रम होता आणि गोरज मुहूर्तावर तिचा विवाह होणार होता. पण नियतीला ते मंजूर नसावे. त्याच दिवशी सकाळी झालेला दीपशिखाचा आकस्मित मृत्यू आम्हा आप्तस्वकीयांनाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला चुटपुट लावून गेला. त्यानंतर गेले आठवडाभर मी माझ्या भावाच्या घरीच आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या सांत्वनासाठी शब्द नसले तरीही लोक येऊन भेटत आहेत. 

आज मी "दीपशिखा" या नावाचा अर्थ शोधला आणि मला "दीपशिखा कालिदास" याचा संदर्भदेखील सापडला. "दीपशिखा" ही कालिदासाच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट उपमा मानली जाते. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या ज्या श्लोकामधे ती उपमा मिळते तो श्लोक खालीलप्रमाणे आहे:-

संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।

या श्लोकामध्ये कवी कालिदासांनी राजकुमारी इंदुमतीस  दीपशिखेची (मशालीची) उपमा दिली आहे. राजकुमारी इंदुमतीच्या स्वयंवराच्या प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या विवाहोत्सुक राजांचे चेहेरे पाहत  इंदुमती पुढे-पुढे चालत जात असते. त्या प्रसंगाच्या वर्णनासाठीच कालिदासाने ही उपमा योजलेली आहे. तो म्हणतो, "जसे कुणी हातात दीपशिखा अथवा मशाल घेऊन रात्रीच्या काळोखात पुढे जात असताना राजमार्गावरील पुढील घरांचे सज्जे प्रकाशित होतात व मागील घरे अंधारात बुडून जातात; त्याचप्रमाणे, इंदुमती आपल्याला वरमाला घालेल असे वाटून तिच्या मार्गात पुढे असलेल्या राजांचे चेहरे मोठ्या आशेने उजळून जात व मागील राजांचे चेहरे निराशेने काळे पडत". असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. उपमा या अलंकाराचा असा सौन्दर्याविष्कार निव्वळ अद्वितीयच आहे! उपमेतील या सौंदर्यामुळे कालिदासांना पुढे “दीपशिखा कालिदास” असे संबोधन मिळाले. 

आमची दीपशिखा जिथे असेल तिथे मशालीसारखी तळपत राहील याची मला खात्री आहे. तिला उद्देशून अनेक प्रश्न आज विचारावेसे वाटतात, "दीपशिखा, तुझ्या स्वयंवरातील राजकुमार तर तू आधीच ठरवलेला होतास. मग त्याला वरमाला न घालताच तू पुढे का निघून गेलीस? आम्हा सर्वाना इहलोकीच्या दुःखमय अंधारात ढकलून तू परलोक उजळून काढायला गेली आहेस का? का तू स्वतःच परलोकीची एक शापित अप्सरा होतीस?"

हे सगळे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार... 

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

नांदा सौख्यभरे!

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. व्हॉटस्अप-फेसबुक-फोन या सर्व माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. छान वाटलं.
हल्ली लोक कुठे-कुठे जाऊन त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात, एकमेकांना महागड्या आणि 'सरप्राईझ गिफ्ट्स' वगैरे देतात. आम्ही मात्र आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायची पद्धत कधीच ठेवलेली नाही. आज आम्हाला नेमके पुण्याजवळच्या रिसॉर्टमधे एका लग्नासाठी जायचे होते. त्यामुळे सकाळपासून तयार होऊन वेळेवर लग्नस्थळी पोहोचण्याची गडबड होती. तिथेच गोडाचे जेवण करून आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमधे एका मैत्रिणीने, "नांदा सौख्यभरे" अशा शुभेच्छा पाठवल्या आणि मला हसू आले. आमच्या लग्नाला आज ३९ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही सौख्यभरे नांदतो आहोत, हे तर निश्चितच आहे. 

मागच्या महिन्यात, आनंदचे काही सेवानिवृत्त आर्मी अधिकारी मित्र आणि त्यांच्या पत्नी असे एकत्र जेवायला गेलो होतो.  गप्पांच्या ओघात 'नवरा-बायकोची भांडणे' हा विषय सुरू झाला. मग काय विचारता? सगळ्यांनाच कंठ फुटला. "नांदा सौख्यभरे" अशा शुभेच्छा आज मला माझ्या ज्या मैत्रिणीने पाठवल्या तिनेच, तिची आणि तिच्या नवऱ्याची कशाकशावरून भांडणे होतात, याचे रसभरीत वर्णन त्या दिवशी केले होते. थोड्याफार फरकाने इतरही सगळ्याचे असेच अनुभवकथन झाले. अत्यंत क्षुल्लक किंवा अगदी हास्यास्पद वाटणाऱ्या कारणांवरून, आमच्यासारखेच इतरही सगळे नवराबायको अगदी कडाकडा भांडतात, हे ऐकून मला हायसे वाटले. लग्नाला पन्नास वर्षे झालेल्या नवरे-बायकांचेही  अनुभव असेच होते. त्यातली एक तर म्हणाली, "आम्हा दोघांनाही एकमेकांशी भांडल्याशिवाय चैनच पडत नाही. एखाद्या दिवशी कुठल्याही कारणावरून भांडण झालेच नाही तर अगदी चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. या वयात नवरा-बायकोंना भांडण्यासाठी हक्काचा पार्टनर म्हणून एकमेकांची जास्त गरज असते!" 

माझ्या मैत्रिणीने, "नांदा सौख्यभरे" असा शुभसंदेश पाठवल्यावर मी तिला प्रश्न विचारला , "अगं भांडा सौख्यभरे, असं  तुला म्हणायचेय का? " तिचे हसून उत्तर आले, "ते तुमचे  रोजचे चालूच असणार आहे. म्हणून आज 'नांदा सौख्यभरे', अशा शुभेच्छा दिल्या आहेत." 

आजचा दिवस संपत आला. आश्चर्य म्हणजे आज कुठल्याही विषयावरून आमचे भांडण झाले नाही. मैत्रिणीच्या शुभेच्छा आजचा एक दिवस तरी पुरल्या आहेत, हेही नसे थोडके! 


मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

त्या कुणी ना पाहिले ...

मागील काही महिने माझ्या व्यायामामधे अनियमितपणा आला होता. तसे होण्यासाठी काही कारणही घडले होते. जुलै महिन्यात माझ्या डाव्या पायाच्या करंगळीजवळच्या बोटाला, घरच्या घरीच दुखापत झाली आणि बारीकसे फ्रॅक्चर झाले. फ्रॅक्चर लहानसे असले तरी बोट बरेच दुखत होते. पण Orthopedic Surgeon ने सांगितले की, "प्लॅस्टर वगैरे घालण्याची गरज नाही, तीन-चार आठवडे 'Buddy Strapping' करून ठेवा. डाव्या पायावर आणि विशेषतः त्या बोटावर वजन घेऊ नका". त्याप्रमाणे ती शेजार-शेजारची दोन बोटे एकमेकांना बांधून ठेवली. त्यानंतर एखादा आठवडा घरी लोळून काढला. पण मग मात्र नेहमीच्या कामाला सुरुवात केली.

फ्रॅक्चर झाल्यावर मला सगळ्यात मोठी काळजी ही होती की, "आता माझ्या रोजच्या व्यायामाचे काय होणार?" डॉक्टरांनाही मी त्याबाबत विचारले. त्यांचे म्हणणे पडले की, चालणे, पळणे यासारखे पायावर जोर पडणारे व्यायाम  वगळता इतर व्यायाम मी करावा. पण पहिले दोन-अडीच महिने मी चालण्याचा तर नाहीच, पण इतर कोणताच व्यायाम केला नाही. व्यायाम नसला की एकप्रकारे negative cycle सुरू होते असं मला वाटतं. एकीकडे शरीराला व्यायाम नाही, आणि दुसरीकडे खाणंही कमी केलेलं नाही, अशा परिस्थितीत वजनवाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे जास्तच guilty feeling येते. त्यामुळे मनाला जास्तच मरगळ येते. आता गेले काही आठवडे मी  पुन्हा हळूहळू चालण्याचा व्यायाम सुरू केला आहे.

रोज काही किलोमीटरचा फेरफटका मारायचा, आणि मग किती पावले झाली, किती वेग होता, त्या काळात हृदयाच्या ठोक्यांचा वेग किती होता, हे सगळे घरी आल्यावर हातातल्या स्मार्ट वॉचवर बघायचे; असे सध्या चालू आहे. आपले आपणच मनोमन कौतुक करायचे आणि सुखावून जायचे हे ओघाने आलेच. नुसते तेवढेच नव्हे तर, आपण केलेल्या व्यायामाच्या आलेखाचा स्क्रीनशॉट घेऊन वेगवेगळ्या फिटनेस ग्रूपवर आणि मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपवर पाठवायचे, हा एक त्यापुढचा चाळा!

हल्ली हळूहळू चालणे वाढवत नेतेय. पूर्वी १२-१३ किलोमीटरचा फेरा सहजी व्हायचा. आता मात्र पहिले काही दिवस ५ किलोमीटर पासून चालू करून आता ८-९ किलोमीटर पर्यंत चालतेय. आज सकाळी मी जरा जास्तच चालले. कदाचित १० किलोमीटर चालले असावे. पण नेमकी किती पावले झाली? किती कॅलरीज बर्न झाल्या? हार्ट रेट किती होता हे सगळे बघायला घरी आल्यावर बसले, तर काय? मनगटावर स्मार्ट वॉचच नाही. मग लक्षात आलं की पहाटे उठल्यावर माझ्या स्मार्टवॉचचा चार्ज कमी आहे हे मी पाहिले होते. त्यामुळे ते स्मार्टवॉच मी चार्जिंगला लावले होते. चहा पिऊन, तयार होईपर्यंत कदाचित चार्जिंग पूर्ण झालेही असेल. पण निघण्याच्या गडबडीत ते स्मार्टवॉच चार्जरमधून काढून हातावर बांधायला मी विसरून गेले होते. 

खरंतर ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. पण माझं मन फार खट्टू झालं. आज नेहमीपेक्षा मी जरा जास्त व्यायाम केला होता. पण नेमका किती याचं मोजमापन झालं नाही, म्हणून मला वाईट वाटले. तसेच, माझ्या आजच्या व्यायामाचा स्क्रीनशॉट इतरांना पाठवून त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याची संधी हुकली म्हणूनही मी हळहळले. या दोन्हीपैकी कुठल्या गोष्टीचा मला जास्त त्रास झाला, हे सांगणे अवघड आहे. पण कदाचित दोन्हीचा सारखाच त्रास झाला असावा.

स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि अशी अनेक स्मार्ट उपकरणे आपल्या हातात आल्यापासून आपण सतत आपले कोडकौतुक स्वतःच करण्यासाठी आणि इतरांकडूनही ऐकण्यासाठी उत्सुक असतो. छोटेसे यशदेखील आपण समाजमाध्यमावर पोस्ट करतो. त्यावर कोणी कौतुकाचे चार शब्द लिहिले की मनोमन सुखावतो. व्हॉटस्अप, इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी माध्यमातून आपण सतत व्यक्त होत असतो. आपण पाठवलेल्या विनोदी पोस्टवर कोणीतरी निदान एखादा 'स्माइली' तरी पाठवावा, असे आपल्याला वाटत असते. आपल्या कुठल्याही पोस्टची बराच वेळ कोणी दखलच घेतली नाही, तर आपण अस्वस्थ होतो. आपण विचारलेल्या शंकेचे कोणी समाधानकारक उत्तर दिले नाही तरी आपण चडफडतो.

कौतुकासाठी आणि इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी मनुष्य किती हपापलेला असतो, याची जाणीव माझ्यासोबत घडलेल्या आजच्या या छोट्याशा घटनेमुळे मला प्रकर्षाने झाली. 

तुमचंही होतं का असं  ? 

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

आणि आज माझं अपहरण झालं!

आज मला जरा उशीराच जाग आली. नेहमी पहाटे चार-साडेचारला जाग येते, पण आज साडे सहा वाजता डोळे उघडले. रोजच्याप्रमाणे फिरायला जावे, का आज उशीर झालाय तर न जावे, अशा द्विधा मनस्थितीत मी होते. पण फिरणे चुकवायला नको, या विचाराने शेवटी तयार होऊन मी बाहेर पडले. रोजच्या सवयीच्या मार्गावर चालत चालत आर्मीच्या सबएरिया ग्राऊंडपाशी पोहोचले. तिथून तसेच पुढे जाऊन मी रेसकोर्सवर रोज पायी एक-दोन चकरा मारत असते.

इतक्यात माझ्या मागून एक चारचाकी गाडी सतत जोरजोरात हॉर्न वाजवत यायला लागली. सकाळच्या शांत वातावरणात तो कर्कश्श आवाज ऐकून मी वैतागले. मागे वळून बघितले, तर ती गाडी सर्रकन येऊन अगदी माझ्या अंगाजवळच थांबली. गाडीच्या आतून एक करडा आवाज आला, "मुकाट्याने गाडीत बस" आवाज स्त्रीचा होता आणि खूप ओळखीचा वाटत होता. त्यामुळे मला जास्तच आश्चर्य वाटले. ती गाडी माझी मैत्रिण स्मिता शिरवळकर चालवत होती. तिनेच, स्मितहास्य करत पण मोठ्या अधिकारवाणीने मला गाडीत बसायला सांगितले होते.

"अगं, माझा व्यायाम अजून व्हायचाय. आत्ता कुठे जायचंय? आत्ता नको गं. मग माझं चालणं राहून जाईल..."
"मी तुझं काही ऐकणार नाही. मुकाट्याने गाडीत बस आणि माझ्याबरोबर घरी चल. आज आपण एकत्र चहा-कॉफी पिऊ या, पूर्वीसारख्या मनसोक्त गप्पा मारूया, मग मी तुला परत घरी सोडते"

माझ्या मैत्रिणीची ती लाडिक आज्ञा मानून मी गाडीत तिच्याशेजारी जाऊन बसले. स्मिताची आणि माझी अनेक वर्षांपासून जवळची मैत्री आहे. तिचा नवरा आणि माझा नवरा यांची पण आधीपासूनची ओळख होतीच. आर्मीच्या सेपरेटेड क्वार्टर्समधे काही वर्षे आम्ही एकाच कॉलनीत जवळ-जवळच राहात होतो. तिचा मुलगा अभिमन्यू आणि माझी मुलगी असिलता एकाच वयाचे आणि एकाच वर्गात शिकणारे. त्यामुळे आम्हा दोघींमधला मैत्रीचा धागा अजूनच पक्का होत गेला. त्यावेळी आम्ही दोघीही आपापल्या व्यवसायात व्यग्र असायचो. पण रविवारी सकाळी एकमेकींकडे जाऊन चहा पिता-पिता गप्पा मारणे हा आमचा आवडता छंद होता. 

आज सकाळी-सकाळी तिच्या घरी मी अचानकच पोचल्याने तिच्या नवऱ्याला सुखद धक्का बसला. मग त्या दोघांनी फर्मान काढले, "आत्ताच्या आत्ता आनंदला बोलवून घे". थंडीच्या दिवसात आनंद  पांघरूणात गुरफटून साखरझोपेत असणार याचा मला अंदाज होता. म्हणून आनंदला फोन न करता  मेसेज पाठवून, "माझे अपहरण झाले आहे" असे कळवले. त्याचे उलटे उत्तर आले, "तुझी सुटका करण्यासाठी खंडणी काय द्यायचीय, ते सांग". आनंदचे ते उत्तर ऐकून मी मनोमन भलतीच सुखावले. लग्नाला चाळीस वर्षे होत आलेली असताना, चक्क खंडणी द्यायची तयारी दाखवून, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बायकोला सोडवून आणायला आपला नवरा तयार असावा, हे कोणाही बायकोला सुखावह असणारच ना? 

आनंद नुकताच जागा होऊन, मी आधीच करून ठेवलेल्या चहाचा आस्वाद घेत बसला होता. त्यामुळे, तो मला घ्यायला येऊ शकला नाही. पण स्मिता आणि कर्नल शिरवळकर यांच्याबरोबर कपभर चहा पिऊन आणि पोटभर गप्पा मारून मला मात्र खूप हलके वाटले. 

अगदी आश्चर्यकारकरीत्या, माझ्या रविवारची अशी आनंदी सुरूवात करून दिल्याबद्दल माझ्या अपहरणकर्तीचे शतशः आभार !

शुक्रवार, २३ मे, २०२५

डॉटर इन लव्ह!

गेले काही दिवस मराठी न्यूज चॅनलवर आणि समाजमाध्यमांवर वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी मृत्यूची जोरदार चर्चा  सुरु आहे. तसेच हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने, मयुरी जगताप-हगवणे हिने सासरच्यांविरुद्ध केलेल्या आणि दाबल्या गेलेल्या पोलीस तक्रारीबाबतही बातम्या समोर आल्या आहेत. सगळे वाचून आणि ऐकून माझे मन गलबलले.  

हुंडाबंदीचा कायदा येऊन साठ वर्षे उलटून गेली. तरीही आज अनेक कुटुंबांमध्ये, या ना त्या मार्गाने, लग्नाच्या वेळीच मुलीच्या माहेरून पैसे उकळले जातात. अनेक घरांमधून, मुलाचे लग्न झाल्यावरही पुढील बरीच वर्षे, सुनेच्या माहेरून पैसे, कापड-चोपड, सोने-चांदी यावी, अशी अपेक्षा असते. आजही भारतीय घरांमधून सुनांचा छळ होतो का? असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी म्हणेन, हो निश्चित होतो. घरोघरी होणाऱ्या छळाची तीव्रता कमी जास्त असते आणि स्वरूप निरनिराळे असते इतकेच. तो छळ भावनिक, मानसिक, शारीरिक किंवा काहीवेळा लैंगिक स्वरूपाचाही असतो. पण, एकदा का लग्न होऊन तू त्या घरची झालीस की तेच तुझे घर, माहेरी येऊन सासरचे काही सांगायचे नाही आणि सासरी जाऊन माहेरचेही सांगायचे नाही असेच 'संस्कार' कित्येक मुलींवर आजही केले जातात. 'लग्न टिकवणे' अत्यावश्यक आहे आणि ती तुझी जबाबदारी आहे हे अनेक घरातल्या मुलींच्या मनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बिंबवले जाते, हे दुर्दैव आहे. वैष्णवीची केस म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. अशा अनेक मुलींचा सासरी असह्य छळ होत असतो.     

मी एक बालरोगतज्ज्ञ आहे. माझ्याकडे आपली लहानगी बाळे घेऊन तरुण आया येतात. सासरच्या  घरामधे त्यांचा बारीक-सारीक छळ होत असतो, हे मला जाणवते. काहीवेळा त्या मला तसे सांगतातही. कित्येकदा माझ्याकडे बाळाला घेऊन एखाद्या घरची सून येऊन गेली की पाठोपाठ तिच्या सासूचा मला फोन येतो. सून खरोखरीच माझ्याकडे आली का, कधी पोहोचली, माझ्या क्लिनिकमधून कधी बाहेर पडली, असले प्रश्न मला त्या विचारतात. मला अतिशय राग येतो. पण कोणाच्याही खाजगी आयुष्यामधे मी लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे खरी ती  उत्तरे देऊन मला गप्प बसावे लागते. अनेक सुशिक्षित घरातल्या सुनेला जर दुसरी मुलगीच झाली असेल तर तिच्या सासरचे लोक माझ्यासमोर त्या सुनेला टोमणे मारतात. शक्य असेल तेव्हा मी त्यांना रागावते. पण प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही. 

वैष्णवीच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर यथावकाश कायदेशीर कारवाई होईलही. पण वैष्णवीच्या सासरी तिचा छळ होतो आहे हे माहिती असूनही माहेरच्यांनी तिला पुन्हा-पुन्हा सासरी पाठवून दिले, हेही अयोग्य होते असे मला वाटते. 'शक्यतोवर आपल्या मुलीने सासरी नमते घेऊन, काहीतरी करून, जुळवून घ्यावे' अशीच अनेक माहेरच्यांनी मानसिकता दिसून येते. मुलीचा घटस्फोट झाला आणि ती माहेरी परत आली, तर समाजामध्ये मुलीची आणि पर्यायाने तिच्या माहेरच्यांचीच जास्त बदनामी होते, हेही दुर्दैवाने खरे आहे. त्या दबावाला घाबरून, 'कसेही कर आणि जुळवून घे' असेच अनेकजण आपापल्या मुलीला सांगत असावेत, असे मला वाटते. 'मुलं झाल्यावर होईल सगळं सुरळीत' अशाही विचाराने मुलीला जुळवून घ्यायला सांगितले जाते. कधी-कधी तसे होतही असेल. किंवा काही मुली धीटपणे छळाला प्रतिकार करून सासरच्यांना गप्प बसवतही असतील. पण एकीकडे नवऱ्याची आणि दुसरीकडे माहेरच्यांचीही साथ नसेल तर त्या विवाहितेचा कोंडमारा होतो, ही वस्तुस्थिती आहे.   

असे असले तरीही, समाजात हळूहळू काही चांगले बदल घडत आहेत. माझ्या अगदी जवळच्या दोन मैत्रिणींच्या मुली आपापल्या लहानग्या बाळांना घेऊन माहेरी परतल्या आहेत. सासरी परत जायचे नाही या निर्धारानेच त्या परत आल्या आहेत. या मुलींच्या आई-वडिलांनी माहेरचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे ठेवले होते, म्हणूनच हे शक्य झाले. या पालकांना समाजाची पर्वा नाही असे म्हणता येणार नाही. पण त्यांना आपल्या मुलींच्या मनःस्वास्थ्याची आणि सुखाची त्याहीपेक्षा जास्त पर्वा आहे, म्हणूनच ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. माझ्या माहितीतल्या त्या दोन्ही मुली सुसंस्कारित आहेत. सासरी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न असफल झाल्यानंतरच त्या सासर सोडून, आणि विवाहबंध तोडून स्वगृही परत आल्या आहेत. त्या मुली स्वतः कमावत्या आहेत, म्हणूनही कदाचित हे सुकर झाले असेल. पण एखाद्या न मिळवत्या मुलीवर असा प्रसंग ओढवला तरी तिलाही माहेरच्यांनी पाठिंबा द्यायला हवा. 

समाजात असे काही चांगले बदल घडत असले तरी काही वाईट बदलही घडत आहेत. सासरच्यांनी सुनेला छळण्याच्या घटना जशा आहेत तशाच सुनांनी सासरच्यांचा आणि नवऱ्याचा अतोनात छळ केल्याचा घटना आज काही कमी नाहीत. 'कौटुंबिक अत्याचार' कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या काही सुनाही आज बघायला मिळतात. अशा सुनांच्या कारवायांना घाबरून राहणारे सत्शील आणि सद्वर्तनी कुटुंबीयदेखील माझ्या बघण्यात आहेत. दुर्दैवाने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय काही पर्यायच नसतो. अशाच प्रकारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणाची बातमीही नुकतीच वाचनात आली होती. पण सुदैवाने अजून तरी अशा घटनांचे प्रमाण कमी आहे, असे मला वाटते.     

आज एका सुप्रसिद्ध डॉक्टर बाईंनी आपल्या सुनेच्या यशाचे कौतुक आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर सांगताना, सुनेचा उल्लेख 'डॉटर इन लॉ' असा न करता 'डॉटर इन लव्ह' असा केला. तसा उल्लेख त्यांनी मुद्दाम केला का त्यांच्या फोनने autocorrect केल्यामुळे तो झाला, हे मला माहिती नाही. 

पण 'डॉटर इन लॉ' पेक्षा  'डॉटर इन लव्ह' हे संबोधन मला फार आवडले. घरोघरी आईबाप आपल्या पोटच्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढेच ते आपल्या सुनेवरही करू शकले तर आपला समाज किती सुदृढ होईल ही कल्पना काही काळ तरी मला सुखावून गेली. तसे खरोखर होईल तो सुदिन! 

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

सेकंड ओपिनियन

साधारण १० वर्षांपूर्वी, एका रविवारी पहाटे माझा अमेरिकास्थित भाऊ पुण्यात पोहोचला होता. त्या दुपारी अचानक त्याचे डोके भयंकर दुखू लागल्याने त्याला मी पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्याच्या स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल असल्याचे केसपेपरवर लिहून आले. पण सोमवारी तोच स्कॅन मुख्य डॉक्टरांनी पाहिल्यानंतर मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झालेला आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सगळ्यांची एकच धावपळ सुरु झाली. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून त्यांची मते घेण्यात आली. प्रत्येक डॉक्टरने एकेक नवनवीन औषध लिहिले. सुदैवाने माझा भाऊ त्या दुखण्यातून पूर्ण बरा झाला. सहा आठवड्यानंतर पुन्हा केलेला त्याचा स्कॅन नॉर्मल आला आणि मला हायसे वाटले. पण त्याला अनेक अनावश्यक औषधे सुरु आहेत, असे एक डॉक्टर म्हणून माझे मत होते. स्कॅन नॉर्मल आल्यामुळे ती औषधे आता बंद करावीत, असे त्याच्या डॉक्टरांना मी सुचवले. पण त्यांच्यापैकी कोणीच डॉक्टर औषधे बंद करण्याचा निर्णयही घेईनात आणि ती सुरु ठेवण्यासाठी सबळ कारणही सांगेनात. माझे समाधान न झाल्याने एक सेकंड ओपिनियन घ्यावे असे मला वाटले. तशा परिस्थितीत एकच व्यक्ती योग्य व ठाम निर्णय देऊ शकेल याची मला खात्री होती. ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर सर! त्यामुळे मी भावाला घेऊन सोलापूरला गेले. शिरीषसरांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने सर्व औषधे बंद केली. त्यानंतर मी निश्चिन्त झाले आणि भावाला अमेरिकेला जाऊ दिले.


वळसंगकर कुटुंबियांचे आणि माझ्या सासर-माहेरच्या दोन्हीही कुटुंबियांचे अनेक वर्षे घनिष्ठ संबंध आहेत. शिरीषसर एक निष्णात डॉक्टर तर होतेच पण अतिशय उत्तम शिक्षकही होते. मी एमबीबीएस करत असताना शिरीषसरांनी मला मेडिसिन हा विषय शिकवला होता. त्यामुळे अर्थातच आमचे गुरु-शिष्याचे नाते होते. माझ्या काकांचे, म्हणजे सोलापूरच्या कै. डॉ. राम  गोडबोले यांचे आम्ही दोघेही शिष्य असल्याने शिरीषसर माझे गुरुबंधुही होते. खूप वर्षांपूर्वी अगदी मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्र ब्रिजही खेळलेलो आहोत. सर अतिशय सुस्वभावी, सद्गुणी, सत्शील, मृदूभाषी, बुद्धिमान, सामाजिक भान असलेले, निर्मळ, विनम्र आणि गप्पांत रमणारे जगन्मित्र होते. माझ्या नवऱ्याचे तसेच माझ्या सर्व भावांचे आणि सरांचे अनेक वर्षांपासूनचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याने काही कौटुंबिक कार्यक्रमांमधेही अधून-मधून आमची भेट व्हायची. कधीही आणि कुठेही भेट झाली की सर अगदी निखळ हासत, नर्म विनोद आणि चेष्टा करत बोलायचे. त्यांच्यासारखा मोठा माणूस आपल्याशी इतके मोकळेपणाने बोलतो, हे बघून सुखावायला व्हायचे. 

काही महिन्यांपूर्वी अगदी अचानकच त्यांचा मला फोन आला. फोनवर मला म्हणाले, "तुझा सल्ला घ्यायला फोन केला आहे." ते ऐकून  मला आश्चर्याचा धक्काच बसला. सरांसारख्या इतक्या मोठ्या आणि यशस्वी व्यक्तीला माझ्याकडून काय सल्ला हवा असेल? असा प्रश्न मला पडला. माझी दोन्ही मुले बारावीनंतर अमेरिकेतील विद्यापीठामधे शिकलेली आहेत. सरांच्या नातवाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय ते घेऊ इच्छित घेत असावेत, असे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. नातवाला अमेरिकेला पाठवायचे झाल्यास काय आणि कशी तयारी करावी, कुठल्या विद्यापीठांसाठी प्रयत्न करावेत, याबाबत त्यांना माझा सल्ला हवा होता. एमबीबीएस करण्यासाठी अमेरिकेत न पाठवता एमबीबीएसनंतरच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्यास हरकत नाही, असे माझे मत मी त्यांना सांगितले. माझा सल्ला आणि त्यामागची कारणमीमांसा ऐकताना एखाद्या अतिसामान्य व्यक्तीने जितक्या शांतपणे ऐकावे, तसेच सर ऐकत होते. आमच्या संभाषणादरम्यान त्यांच्या मोठेपणाचा  लवलेशही मला कुठे जाणवला नाही. त्यानंतर मात्र कधीच आमची भेट किंवा बोलणे होऊ शकले नाही.  

अचानक मागच्या आठवड्यात, १८ एप्रिलला सरांच्या दुर्दैवी अंताची बातमी आली. डोकं सुन्न होऊन माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणीच वाहू लागले. पहिले दोन-तीन दिवस तर मला नीटशी झोपही लागू शकली नाही. सरांची आठवण झाली की मनामधे एक प्रकारची वेदना उमटते. माणसांमधे रमणारे, सर्व नातेसंबंध जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे शिरीषसरांना जवळून ओळखत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची माझ्यासारखीच अवस्था झालेली असणार यात मला शंका नाही. गेल्या काही दिवसांत आलेल्या बातम्यांवरून असे लक्षात येते आहे की सरांनी पूर्ण विचारांती आत्महत्येचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे माझ्या मनात  राहून-राहून एकच प्रश्न येतो. इतका टोकाचा निर्णय घेण्याआधी सरांनी एखादे सेकंड ओपिनियन का घेतले नाही ? असे असेल का, की यशाच्या इतक्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला आपले मन मोकळे करायला कोणीच नसते? Is it so lonely at the top? 

जे झाले ते अतिशय वेदनादायक आहे. सरांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान तर झाले आहेच, पण संपूर्ण समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

सरांच्या आप्तस्वकीयांच्या दुःखात मीही सहभागी आहे. शिरीषसरांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

                                                                                          डॉक्टर स्वाती बापट, MBBS , MD (Pediatrics)

                                                                                          बालरोगतज्ज्ञ , पुणे 

                                                                                                               

गुरुवार, १३ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-५

संगमावर गंगास्नान करून झाल्यावर आम्ही बोटीने सरस्वतीघाटावर परतलो. घाटावर अनेक लहान मुले आणि मुली यात्रेकरूंच्या कपाळावर हळद-कुंकवाने मळवट भरायला उत्सुक होती. आम्ही चौघांनीही कपाळावर हळद आणि त्यावर कुंकवाने ओम आणि त्रिशुळाचे छाप मारून घेतले. किल्ल्याच्या आत जाऊन आम्ही आमचे कपडे आणि इतर सामान आमच्या टॅक्सीमध्ये ठेवले. घरून निघताना प्राचीने मेथीचे पराठे आणि अंजलीने डिंकाचे लाडू करून बरोबर आणले होते. दोन-दोन पराठे, एकेक लाडू खाऊन आणि गरम कॉफी पिऊन आम्ही ताजेतवाने झालो आणि किल्ल्याच्या आवारातच असलेल्या  पाताळपुरी मंदिराकडे चालत निघालो.

पाताळपुरी मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जमिनीच्या खालच्या स्तरावर जावे लागते. मंदिराच्या आत अत्यंत जुना असा अक्षयवट आहे. असे म्हणतात की, प्रभू रामचंद्र आणि माता सीतेने वनवासात जात असताना या वडाच्या सावलीत विश्रांती घेतली होती आणि या झाडाचा आशीर्वाद त्यांना लाभला होता. गंगास्नान केल्यानंतर अक्षयवटाला नमस्कार केल्यास जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी तर अक्षयवटावरून उडी मारून लोक आपले प्राण देत असत. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊन मोक्ष मिळावा अशीच त्यामागची धारणा असणार. परंतु, बादशाह अकबराने १५८३ साली हा भक्कम किल्ला अक्षयवटाभोवतालीच बांधून काढल्यामुळे 'तडक मोक्षप्राप्ती'च्या प्रथेला कदाचित आळा बसला असावा. 

आम्ही पाताळपुरी मंदिरात गेलो खरे, पण तिथे इतकी गर्दी आणि गोंगाट होता की कधी एकदा इथून बाहेर पडतो असे आम्हाला झाले. आम्ही त्वरित दर्शन घेऊन बाहेर पडलो, पण देवदर्शनानंतर मनाला शांती आणि समाधान लाभल्याचा अनुभव मात्र आला नाही. किल्ल्याच्या तटबंदीवर एक 'President's View Point' आहे. तिथून खाली पाहिले असता, संपूर्ण कुंभमेळ्याचे, गंगाकिनारी तात्पुरत्या वसवलेल्या Tent City चे आणि त्यामध्ये हिंडणाऱ्या प्रचंड जनसमुदायाचे दर्शन होत होते. तटबंदीच्या जवळच, गंगाकिनारी असलेल्या 'लेटे हनुमान' किंवा 'बडे हनुमान' मंदिराबाहेर दर्शनासाठी थांबलेल्या भक्तांची २-३ किलोमीटर लांब बारी लागलेली दिसत होती. ती बारी बघूनच आम्ही हनुमान मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला. 

आमच्या मुक्कामाची सोय प्राचीच्या भावाने एका महंतांकरवी केलेली होती. आमचे गंगास्नान व देवदर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी ते महंत स्वतः लक्ष घालत होते. आम्ही निवासस्थानी कधी पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी सकाळपासून त्या महंतांचा आम्हाला अनेकवेळा फोन येऊन गेला होता. आम्हीही आता दमलो होतो त्यामुळे आम्ही किल्ल्यातून तडक टॅक्सीने निघालो. यमुनेपारच्या नैनी या गावाला जोडणारा पूल पार करून आम्हाला  साधारण आठ किलोमीटर दूर असलेल्या त्या पत्त्यावर पोहोचायचे होते. आमची टॅक्सी प्रचंड गर्दीतून वाट काढत निघाली. आठ किलोमीटर अंतर कापायला आम्हाला जवळपास तीन तास लागले. गर्दीतून वाट काढत पायी निघालेले तळागाळातले यात्रेकरी प्रयागराजला आल्यावर प्रथमच आम्हाला जवळून पाहता आले. गंगास्नानाच्या ओढीने आलेले ते लोक आपले सामान  डोक्यावर लादून, गर्दीतून वाट काढत, अत्यंत शांतपणे चालत होते. कित्येक जण आपल्या लहान मुलांना खांद्यावर बसवून चालत होते. म्हातारे-कोतारे, अपंग, अंध असे अनेक भक्तगण गर्दीत दिसत होते. सर्वांचा उत्साह आणि आस्था वाखाणण्यासारखी होती.   

'ओमॅक्स हायटेक सिटी'  नावाच्या, नव्या कोऱ्या सदनिकांच्या संकुलामध्ये एका तीन बेडरूमच्या सुसज्ज सदनिकेपाशी आम्ही भुकेजलेल्या आणि दमलेल्या अवस्थेमधे पोहोचलो तेंव्हा दुपारचे चार वाजले होते. भगवी वस्त्रे धारण केलेले, अत्यंत मृदुभाषी, आणि प्रसन्न चेहऱ्याचे, महंत श्री. गंगाधरमहाराज आमच्या स्वागतासाठी थांबलेले होते. आम्हाला बोटीतून संगमापर्यंत नेऊन गंगास्नान करण्याची व्यवस्थाही महाराजांनी केलेली होती. पण आम्ही गंगास्नान करूनच आलो आहे हे समजल्यावर त्यांनी आम्हाला  विश्रांती घेण्यास सुचवले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, संगमापासून दूर असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटमध्ये आम्ही राहायला जाणार आहोत, हे आम्ही त्यांना सांगितले. "आपल्याला भेटायला मी पुन्हा संध्याकाळी येईन" असे सांगून ते महाराज निघून गेले. 

आम्ही स्वयंपाकघरामधे पाहतो तो काय? चहा-साखरेचे सामान, दूध, तेल, पोहे, कांदे-बटाटे, हिरव्या मिरच्या, तेल, मसाले, मिसळवण्याचा डबा, कणीक, डाळ-तांदूळ, भांडी-कुंडी असे सर्व काही तिथे होते.  मी माझा थकवा विसरले आणि लगेच स्वयंपाकघराचा ताबा घेतला. कांदा, मटार, हिरवी मिरची व टोमॅटो घालून मी केलेल्या चमचमीत पोह्यांवर ताव मारून झाल्यावर, आले घातलेला मस्त गरमागरम चहा आम्ही प्यायलो. मग चौघांनींही गरम पाण्याने अंघोळ केली आणि आमचा दिवसभराचा शिणवटा पळून गेला. प्राचीच्या अंगात थोडी कणकण असल्याने आणि  दमणुकीमुळे तिला झोप लागलेली होती. नेमके त्याच वेळी महाराज आम्हाला भेटायला आले. अंजलीला, मला आणि आनंदला शाल देऊन महाराजांनी आमचा सत्कार केला आणि महाकुंभमेळ्याचे चित्र असलेली एक सुंदर फोटोफ्रेम आम्हाला भेट दिली! 

श्री. गंगाधर महाराजांनी आमची राहण्याची उत्तम सोय तर केलेलीच होती. संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी आमच्यासाठी गरमागरम शुद्ध शाकाहारी वैष्णव भोजनाच्या थाळ्याही पाठवून दिल्या. आमच्याकडून राहण्या-खाण्याचे काहीही पैसे ते घेणार नव्हते. इतके सर्व आमच्यासाठी करून, त्याउप्पर त्यांनी आमचाच सत्कार केल्यामुळे आम्हाला अगदी लाजायला झाले. महाराजांशी बोलता-बोलता ज्या गोष्टी कळल्या, त्या ऐकून तर आम्हाला थक्कच व्हायला झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आदेशावरून 'ओमॅक्स हायटेक सिटी' संकुलामधे जवळपास २०० सदनिका राखून ठेवलेल्या होत्या. विविध मठांना प्रत्येकी १०-२० सदनिकांचा ताबा दिलेला होता. त्या-त्या मठांचे महंत आपापल्या सदनिकांमध्ये भाविकांची राहण्याची सोय व गंगास्नानाची व्यवस्था स्वतः पाहत होते. सर्व सदनिकांमधे सोफासेट, डबलबेड, गाद्या-उशा-पांघरुणे ठेवलेली होती. जुजबी स्वयंपाकासाठी शिधा, भांडी-कुंडी आणि Induction Heater यासह प्रत्येक स्वयंपाकघर सुसज्ज केले गेले होते. आम्ही कुणी VIP भक्त असल्याप्रमाणे आमची अशा ठिकाणी विनामूल्य सोय व्हावी याचेही आम्हाला फार आश्चर्य वाटले. 

रात्री जेवण झाल्यावर मी आणि अंजली पाय मोकळे करायला बाहेर पडलो. ओमॅक्स हायटेक सिटीच्या बाहेर पडताच दोन-तीन हेलिपॅड्स दिसली. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या 'खऱ्याखुऱ्या VIP' भक्तांची हेलिकॉप्टर्स तिथेच उतरतात असे नंतर समजले! पायी हिंडत आम्ही दोघीच अरेल घाटापर्यंत चालून आलो. 'महाकुंभमेळानगरी' मधली आकर्षक रोषणाई दुरूनच पाहून आमचे डोळे दिपले.   

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, चहा घेऊन आणि अंघोळी करून आम्ही कुंभमेळा क्षेत्रापासून दूर असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटकडे जाणार होतो. शरीर थकले होते, पण अंथरुणाला पाठ टेकल्यानंतरही मनामध्ये विचारचक्र सुरूच होते. महाकुंभमेळ्याबाबत आम्हाला मिळालेली माहिती, तिथे आलेले अनुभव आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये सुरु झालेल्या विचारचक्राबाबत पुढील लेखामध्ये लिहीन... 

(क्रमशः)  

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-४

माझ्या गंगास्नानानंतर, "अखेर गंगेत घोडी न्हाली" अशी कॅप्शन लिहून आनंदने चतुराई केली होती असे मला वाटले. घोडा या शब्दाचे अनेकवचन म्हणूनही 'घोडी' हा शब्द वापरात आहे. त्यामुळे, आनंदने घोडी हे संबोधन माझ्यासाठी वापरले होते, का आम्हा दोघांनाही मिळून 'घोडी' असा बहुवचनी शब्द वापरला होता ते त्याने गुलदस्त्यातच ठेवले. 

गंगास्नान घडेपर्यंत सहन कराव्या लागलेल्या अनेकांच्या अनेकविध व्यथांच्या कथा आम्हाला पूर्वीच कळलेल्या होत्या. त्याच्या तुलनेत, आमचे गंगास्नान म्हणजे अक्षरशः 'VIP स्नान' झाले, हेच आमच्या कुंभयात्रेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल! अर्धा-पाऊण तास पाण्यात डुंबून झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर परतलो. मी गंगास्नान करण्याच्या विचाराने गेलेले नसल्यामुळे, बदलण्यासाठीचे कपडे मी सोबत नेले नव्हते. त्यामुळे किनाऱ्यावर उन्हात बसून कपडे वाळवण्याशिवाय पर्यायच नव्हता. अंजली आणि प्राचीने बदलण्याचे कपडे आणले असले तरी संगमावरच्या त्या भारलेल्या वातावरणापासून पासून त्यांनाही दूर जावेसे वाटत नव्हते. आम्हाला संगमावर सोडून गेलेला आमचा नावाडीही परत आलेला नसल्यामुळे आम्हाला आपोआपच किनाऱ्यावर तासभर थांबायला मिळाले. तो तासभर एका अर्थाने अनुभवांची  गंगाजळीच म्हणावी असा होता.


अनेक प्रांतांतल्या, विविध भाषा बोलणाऱ्या, भिन्न वेषभूषांच्या, वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि अठरापगड जातींच्या लोकांचा तिथे एक सुंदर संगमच झालेला होता. काही नवराबायको जोडीने सूर्याला अर्घ्य देत होते. एकेकटेच आलेले कित्येक जणही अर्घ्यदान करत होते. काही कुटुंबातले मोठ्या गटाने आलेले लोक आपसात ठरवून एकाच वेळेला गंगेत डुबकी मारत होते. एकेका डुबकीच्या वेळी आपल्या पितरांसाठी मोक्षप्राप्ती, किंवा हयात असलेल्या आई-वडील, मुले व इतर आप्तस्वकीयांसाठी गंगेचा आशीर्वाद मागत होते. काहीजण प्रत्येक डुबकीबरोबर कलश, फुले, दूध, विड्याची पाने व सुपारी, नारळ, वस्त्र, दिवे, चांदीची नाणी अशा वस्तू गंगेला अर्पण करताना दिसत होते. काहीजण डुबकी मारताना ठराविक श्लोक किंवा स्तोत्रे म्हणत होते.      

पूजेचे साहित्य, कलश, नारळ, विड्याची पाने, सुपारी व दूध या साहित्याचे अनेक विक्रेते सरस्वती घाटाजवळच्या किनाऱ्यावर आम्ही पाहिले होतेच. तसेच संगमाजवळच्या किनाऱ्यावरही काही विक्रेते हिंडत होते. अर्थात, हे सगळेजण अव्वाच्या-सव्वा भावाने ते साहित्य विकत होते, हे सांगायलाच नको. काहीजण आपापले पूजेचे सर्व साहित्य घरूनच घेऊन आलेले होते. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारे गंगापूजन करत होते. त्या सर्वच पद्धती मला नवीन असल्यामुळे मी त्या लक्षपूर्वक पाहत होते. बरेचजण गंगेला तांब्याचा कलश अर्पण करत होते. कलशाच्या आत हळकुंड, साळीच्या लाह्या अथवा गहू, आणि एखादे नाणे टाकून, कलशावर श्रीफळ ठेवून व त्यावर वस्त्र गुंडाळून, तो कलश गंगेच्या प्रवाहामधे सोडण्याची प्रथा आहे. काहीजणांकडे गंगेला साडी दान करण्याची पद्धत आहे. गंगेच्या पात्रामधे उभे राहून, हळद-कुंकू लावून, साडीची घडी पूर्ण उघडून व साडीची चारही टोके हातात धरून गंगेच्या पात्रामधे हलकेच ती साडी सोडतात. गंगेच्या पात्रावर हेलकावे खात जात असलेल्या अनेक रंगाच्या साड्या संपूर्ण वातावरणामध्ये वेगळाच रंग भरत होत्या. 

काही कुटुंबीय नवीन कोरे कपडे परिधान करून गंगास्नान करायला आले होते. गंगास्नान झाल्यानंतर त्यांनी आपले ते नवेकोरे, ओलेते कपडे गंगाकिनारी सोडून दिले व सोबत आणलेली निराळीच नवीन वस्त्रे परिधान केली. गंगास्नानाच्या निमित्ताने गरिबांना वस्त्रदान करण्याच्या अशा पद्धती रूढ असाव्यात असे मला वाटले. एका बाईने तर मला सांगितले की तिने घरून येतानाच ब्लाउज-पीस जोडलेली नवीन साडी, फॉल-पिको करून आणली होती. ज्या कुणा गरीब स्त्रीला ती साडी मिळेल तिला ती साडी अगदी मॅचिंग ब्लाऊजसह लगेच वापरता यायला मिळावी अशी सुंदर भावना त्यामागे होती. काही स्त्रियांनी गंगेच्या काठावरच्या वाळूमधे पूजा मांडली होती. त्यांनी ओल्या वाळूच्या पिंडी तयार केल्या होत्या. त्या पिंडींना हळदकुंकू व फुले वाहून त्यावर दुधाचा अभिषेक त्या करत होत्या. अशी पूजा करताना त्या आपापल्या भाषेमधे स्तोत्रे, काही श्लोक किंवा गाणी म्हणत होत्या. प्रज्वलित केलेला दिवा  गंगेला अर्पण करून या पूजेची सांगता करत होत्या. काहींनी आपल्या घरची देवाची मूर्ती बरोबर आणली होती. त्या मूर्तीला गंगास्नान घालून, गंगाकिनारी तिचे पूजन ते करत होते. एकूण सगळे वातावरण भक्तिमय झालेले होते. 

संगमाकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ आता वाढतच चालला होता. गंगेचे आणि यमुनेचे पात्र असंख्य बोटींनी भरून गेले होते. दोन्हीं नद्यांची पात्रे स्वच्छ करण्यासाठी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्वयंचलित बोटी हिंडत होत्या. अरेल घाटापासून काही अंतरावर असलेल्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरमधून पॅराग्लायडर आणि हॉट एयर बलूनद्वारे पर्यटकांना सैर करता येत होती. तिथून निघालेल्या पॅराग्लायडरमधून काहीजण गंगेच्या पात्रावरून आकाशात भ्रमंती करताना आम्हाला दिसले. संगमावर आलेल्या अनेकांनी गंगेचे पाणी भरून नेण्यासाठी बाटल्या किंवा कॅन्स सोबत आणलेले होते. अशा प्रकारचे कॅन व बाटल्या विकण्याचा व्यवसायही किनाऱ्यावर जोरात सुरु असल्याचे आम्ही आधीच पाहिले होते. माझ्याकडे विमानात मिळालेली २०० मिलिलिटरची एक छोटी बाटली होती. मी त्यातले पाणी पिऊन संपवून टाकले आणि त्यातच गंगेचे पाणी, माझ्या भाविक सिंधी शेजाऱ्यांना देण्यासाठी भरून घेतले. सोबत आणलेल्या पिशव्यांमध्ये अनेकजण गंगेकाठची वाळू भरून नेत होते. त्यातल्या एकीला, "वाळू का नेत आहेस?" असे मी कुतूहलापोटी विचारले. गंगेकाठची वाळू आणि गंगेचे पाणी आपापल्या घरी नेऊन देवघरामधे ठेवायची पद्धत आहे असे तिच्याकडून कळले. मग प्राचीने आणि अंजलीनेही, प्लॅस्टिकच्या एका छोट्या पिशवीमधे संगमातली वाळू भरून घेतली. 

११ वाजत आले होते आणि आता सूर्य वर चढायला लागला होता. आम्ही आमच्या नावाड्याची वाट बघत होतो. इतक्यात एका बाईने माझ्या खांद्याला हात लावून माझे लक्ष वेधून घेतले. ती बहुतेक ओडिया भाषेमधे मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. ती काय म्हणत होती ते मला काही केल्या समजेना. त्यानंतर तिने मला तीच गोष्ट खुणेने सांगितली आणि मला कळली. स्नान करून आल्यानंतर तिच्या भांगामधे तिला सिंदूर भरून हवा होता. मी तो भरून दिला. तिच्याजवळ आरसा नसल्याने, माझ्या फोनचा कॅमेरा सेल्फी मोडमधे करून, सिंदूर भरलेले तिचे रूप तिला मी दाखवले. ती कमालीची खूष होत माझ्याकडे पाहून हसली आणि पुन्हा ओडिया भाषेत काहीतरी म्हणाली. मला काहीही बोध झाला नसला तरी मीही उत्तरादाखल हसले. गंगातीरावर आलेल्या सर्व भाविकांना, त्यांचे प्रांत, भाषा, जात-पात या सर्वांपलीकडे जाऊन, एकत्र जोडणारी आपली भारतीय संस्कृतीच आहे याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. त्याबरोबर हेही जाणवले की, विविधतेचे भांडार असलेल्या भारतामध्ये आपणा सर्वांना एकत्र जोडू शकणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. तरीही, आपण आसपासच्या लोकांमधले वेगळेपण शोधत, एकमेकांमध्ये भिंती का उभ्या करू पाहतो? 

आमचा नावाडी संगमावर परत येताच आम्ही सगळेजण नावेत बसून किनाऱ्याकडे निघालो. गंगास्नान झाल्यानंतर लगेच एखाद्या देवळामधे जाऊन देवदर्शन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे किनाऱ्यावर उतरताच आम्हाला किल्ल्यामधल्या पाताळपुरी देवस्थानाच्या आणि अक्षयवटाच्या दर्शनाला जायचे होते....  

                                                                                                                                                      (क्रमशः)  

बुधवार, ५ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-३

आम्ही २४ फेब्रुवारीला पहाटे प्रयागराजला  पोहोचून २६ तारखेला रात्री मुंबईला परतणार होतो. आम्ही निघायच्या एक-दोन दिवस आधी बऱ्याच घडामोडी झाल्या. 

आनंदचा जवळचा मित्र, भारतीय नौदलातील सेवानिवृत्त कमांडर लोकेश नुकताच प्रयागराजहून परतला होता. आमच्या सुनेचे आई-वडील, नेहा आणि धनंजय, हेही जाऊन आले होते. प्रयागराजमधल्या गर्दीची आणि तेथे येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणीची व्यवस्थित कल्पना आम्हाला त्या सर्वांकडून मिळाली होती. प्राचीच्या भावाच्या ओळखीने, संगमाजवळच एका फ्लॅटमधे दोन दिवसांची निवासव्यवस्था झाल्याचेही आम्हाला समजले होते. विमानतळावर आम्हाला घ्यायला येणाऱ्या टॅक्सीचालकाचा फोननंबरही आमच्या हातात आला होता. दरम्यान, आनंदच्या दुसऱ्या एका मित्राने, म्हणजे लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस याने बऱ्याच प्रयत्नांती,  नवीन कॅंटोन्मेंटमधे २५ फेब्रुवारीच्या रात्रीचे दोन खोल्यांचे  बुकिंगही आम्हाला मिळवून दिलेले होते. 

प्रयागराजला जाऊन आलेल्या प्रत्येकाने आम्हाला बजावून सांगितले होते की सर्वप्रथम संगमावर जाऊन स्नान  करून या आणि मगच इतरत्र कुठे जायचे तिथे जा. कारण, २६ फेब्रुवारीला महाशिवरात्र व शेवटचे अमृतस्नान असल्याने, संगमावर फार गर्दी होईल असा अंदाज होता. त्यामुळे शक्यतो २५ तारखेलाच आम्ही संगमापासून लांब असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटमध्ये येऊन राहावे, म्हणजे संगम परिसरातील गर्दी व ट्राफिक जॅममध्ये अडकायचा प्रसंग येणार नाही, असेही सगळ्यांनी सुचवले होते. 

पहाटे चार वाजताच्या मुंबई-प्रयागराज फ्लाईटसाठी, घरून अंघोळी करून, रात्री २ वाजता आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचलो. विमान पूर्ण भरलेले होते. विमानातले जवळपास सर्वच प्रवासी महाकुंभयात्रेला निघाले  होते, असे दिसले. बऱ्याच जणांनी अगदी ऐनवेळी तिकिटे काढलेली होती. काही जण त्याच दिवशी शेवटच्या विमानाने मुंबईला परतणार होते. तर काहीजण प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी करून परतणार होते. विमान प्रवाशांमधे आबालवृद्ध होते. कित्येकजण सहकुटुंब-सहपरिवार आलेले होते. अनेकांनी भगवी वस्त्रे परिधान केलेली होती. विमान आकाशात झेपावण्याच्या आधी, 'हरहर महादेव-हरहर गंगे' अशी घोषणा झाली. विमानात आम्हाला दिलेल्या जेवणांत सगळे उपासाचे पदार्थ होते. या सर्वच गोष्टींमुळे वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झाले होते. 

पहाटे सहा वाजता प्रयागराजला पोहोचताच आम्ही टॅक्सीने तडक सरस्वतीघाटाकडे निघालो. विमानतळाबाहेरच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खांब उभारलेले होते आणि त्या खांबांवर कुंभ ठेवलेले होते. खांबांवर व कुंभांवर विद्द्युत दिव्यांनी रोषणाई केलेली होती. ठिकठिकाणी कुंभमेळ्याबाबत माहितीचे फलक लावलेले  होते. हमरस्ता सोडून आम्ही गावात शिरलो. वाटेत लागलेल्या एका वस्तीकडे बोट दाखवत आमचा चालक उद्गारला, "ये चकिया और करेली इलाका है. कुख्यात गुंडा और दबंग राजकीय नेता अतीक अहमद का इलाका! वोही अतीक अहमद जिसकी कुछ महिने पहले हत्त्या हो गयी." 

त्या चालकाचे शब्द ऐकताच, माझे मन ३० वर्षे मागे गेले. त्या काळी प्रयागराजमधे, म्हणजेच त्यावेळच्या अलाहाबादमधे पुष्कळ प्रमाणात गुंडाराज होते. त्यावेळी अतीक अहमद हा एक युवा नेता होता आणि जिकडे तिकडे त्याचे नाव ऐकू येत होते. कित्येक सायकल रिक्षांच्या मागे त्याचा फोटो आणि "अतीक अहमद (चकिया)" असे लिहिलेले पाहिल्याचे मला ठळकपणे आठवले. पण त्याकाळीही त्याचा जबरदस्त दरारा असल्याचे आम्ही ऐकून होतो. "योगीजींने सब गुंडा लोगोंको काबू में रखा है. उत्तर प्रदेश अब बहुत बदल गया है." आमच्या चालकाचे ते शब्द ऐकून मला खूप बरे वाटले.

जसजसे आम्ही घाटाजवळ पोहोचू लागलो तसतशी गर्दी वाढू लागली. आमच्या चालकाने गल्ल्या-बोळातून मार्ग काढत आम्हाला गंगेच्या तीरावरच्या सरस्वती घाटाच्या दिशेने नेले. पण तिकडे जाण्याचा रस्ता पोलिसांनी बंद केलेला होता. आनंदने त्याचे सैनिकी ओळखपत्र दाखवल्यामुळे आम्हाला पुढे घाटापर्यंत जाता आले. घाटाजवळच असलेल्या किल्ल्याच्या आत आर्मीचा Ordnance Depot आहे. आर्मीच्याच ताब्यात असलेल्या किल्ल्यामध्ये आम्हाला सहजी आतपर्यंत जाता आल्याने, आम्ही आमची टॅक्सी किल्ल्याच्या आतच ठेवली. तिथेच आर्मीचा एक रजिस्ट्रेशन काउंटर होता. किल्ल्यामध्ये हिंडण्यासाठीच्या परवानगीचे पासेस आनंदने तिथून घेतले. त्यानंतर आम्ही जेमतेम तीनशे मीटर दूर असलेल्या सरस्वती घाटाकडे चालत गेलो. 

सरस्वती घाटावरून संगमापर्यंत जाण्यासाठी आर्मीनेच काही खाजगी बोटींची व्यवस्था केलेली होती. तिथे एक भली मोठी रांग लागलेली होती. पण सगळे भक्तगण अगदी शांतपणे रांगेमधे उभे होते. थोड्याच वेळात आम्ही बोटीमधे चढलो, सर्वांनी लाईफजॅकेट घातली आणि आमची बोट संगमाकडे निघाली. नदीकाठावरचे वातावरण  खूपच प्रसन्न होते. नदीचे संपूर्ण पात्र वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या नावांनी भरून गेले होते. आमची बोट संगमाकडे जात असताना, समोरच्या तीरावरच्या अरेल घाटावर लोटलेला अफाट जनसागर आम्हाला दिसत होता. अनेक भाविक त्या घाटावर गंगास्नानाचा आनंद घेताना दिसत होते. थोड्याच वेळात, आम्हाला संगमाचे अद्भुत दृश्य दिसू लागले. एकमेकांना भेटणारे ते दोन प्रवाह - एकीकडून संथपणे वाहत येणारी काळसर यमुना, आणि तिला आपल्यात सामावून घेण्यासाठी आसुसलेली, खळाळत येणारी, भुरकट रंगाची गंगा!



संगमाच्या जवळ आम्हाला सोडून आमचा नावाडी इतर प्रवाशांना आणायला निघून गेला. संगमाजवळच्या काठावर कपडे बदलण्यासाठी चांगले आडोसे आर्मीतर्फे तयार करून ठेवलेले होते. प्राची व अंजली गंगास्नान करण्यासाठी सज्ज होत्याच. स्नानानंतर बदलण्यासाठी त्यांनी कपडे सोबत आणलेले होते. पण आश्चर्य म्हणजे, आनंददेखील  चक्क गंगास्नान करायला अंगावरचे कपडे काढून, swimming trunk घालून तयार झाला!

गंगेच्या खळाळत वाहत्या पात्रात ते तिघेही पुढे-पुढे जायला लागले. आम्हा तिघींच्या पर्सेस आणि चौघांचेही फोन सांभाळत मीही त्यांच्या मागे-मागे जाऊ लागले. गंगेच्या पाण्याला भलताच जोर असल्याने पायाखालची वाळू सरकत होती. संगमापर्यंत पोहोचेस्तोवर आम्हाला सकाळचे नऊ वाजले होते, सूर्य वर आलेला असला तरी पाणी चांगले थंडगार होते. अंजली व प्राचीने बरेच खोल पाण्यात शिरून  डुबक्या मारल्या. आनंदही मस्तपैकी गंगास्नान  करत होता. मी मात्र फक्त त्या तिघांचे  फोटो आणि व्हिडीओ काढत होते. प्राची आणि अंजली सचैल स्नान करून बाहेर आल्या. "स्वातीताई, निदान फोटो काढून घेण्यासाठी तरी गंगेच्या पात्रामधे जरा आतपर्यंत जा" असा आग्रह प्राचीने धरला. त्यामुळे शेवटी मी आनंदचा हात धरून गंगेच्या पात्रामधे आतपर्यंत गेले. गंगेचे स्वच्छ, वाहते पाणी आणि आजूबाजूचे प्रसन्न वातावरण बघून मलाही उर्मी आली आणि मी चांगल्या दोन-तीन डुबक्या मारल्या. मी गंगेमध्ये डुबक्या मारत असतानाचा व्हिडीओ प्राचीने काढला होता. आम्ही पाण्यातून बाहेर आल्याआल्या, "अखेर गंगेत घोडी न्हाली" अशी कॅप्शन लिहून आनंदने तातडीने  तो व्हिडीओ, माझ्या नकळत, आमच्या मुलांना पाठवून दिला! 

गंगाकिनारी अनेक सुंदर गोष्टी बघायला मिळाल्या. पण त्याबाबत आता पुढील लेखामध्ये लिहीन. 

                                                                                                                                                       (क्रमशः)