शुक्रवार, १९ जून, २०२६

केदारनाथ-भाग ११

काल रात्री मला खूप थंडी वाजत होती. मी अगदी पायमोजे-हातमोजे घालून, दोन रजया घेऊन झोपले होते. माझे अंगही खूप दुखत होते आणि पाय वळत होते. आनंदचे इन्फेक्शन मलाही लागले असावे, असे मला वाटले. शेवटी दुखणे मला अगदीच सहन होईना. त्यामुळे रात्री उशिरा केंव्हातरी उठून मी एक पॅरॅसिटॅमॉलची गोळी घेऊन झोपले. सकाळी उठले तेंव्हा जरा बरे वाटत होते. पहाटे पाच वाजता आनंदच्या हाक मारण्याने मला जाग आली. तो कण्हत होता. त्याचे संपूर्ण अंग आणि घसा खूप दुखत होते. 

मी आनंदला तपासले. त्याला आजही ताप आहे, हे मला जाणवले. मी त्याचा घसा, छाती, नाडी पुन्हापुन्हा तपासत होते. त्या सगळ्या तपासणीनंतर, त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आहे, असे मला वाटत नव्हते. व्हायरल ताप असण्याचीच शक्यता अधिक होती. त्यामुळे Antibiotics घेणे आवश्यक नव्हते. तरीही, आता राहिलेले शेवटचे तीन-चार दिवस कसेबसे पार पडावेत असेही एकीकडे वाटत होते. इतक्या लांब आपण आलो आहोत, आता अजून किती काळ आनंदचा ताप हटायची वाट पाहणार? त्यापेक्षा एखादे अँटिबायोटिक सुरु करू या, असा विचार मी केला. खरंतर अँटिबायोटिक चालू करण्याचा निर्णय माझा मलाच पटत नव्हता. पण आता नाईलाज आहे अशा विचाराने मी बाहेरचे कपडे घालून, तयार होऊन, खालच्या मजल्यावरच्या फार्मसीमधून औषध आणायला बाहेर पडले. 

जिना उतरून खाली गेले, तर जिन्यातून ओपीडीत जाणारा दरवाजाच बंद होता. तो दरवाजा रात्री बंद ठेवतात, आणि सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वयंपाकघरामधून चहा खाली आणण्याच्या वेळीच तो दरवाजा उघडतात, हे मला नंतर आठवले. मागे एकदा, रात्री तो दरवाजा उघडा राहिला होता. त्यावेळी त्या दरवाज्यामधून वरच्या मजल्यावर येऊन अनेक यात्रेकरू झोपले होते. त्यामुळे आजकाल ही खबरदारी घेतली जाते, हे मी ऐकून होते. दरवाजा बंद असल्यामुळे मी फार्मसीमध्ये जाऊ शकले नाही आणि मला Antibiotic आणता आले नाही. त्यामुळे मी वर आले. खोलीत येऊन मी रात्रपाळीच्या डॉ. शोभितला दरवाजा उघडण्याबाबत WhatsApp वर मेसेज पाठवला. सव्वासहाला त्याचे उत्तर आले. पण तोपर्यंत आनंद उठून दात घासून, तोंड धुवून आला होता. आनंद मला म्हणाला, "तुला जर हे viral इन्फेक्शन वाटते आहे, तर तू तुझ्याच मनाविरुद्ध जाऊन Antibiotic का सुरु करते आहेस? तुझ्या डायग्नोसिसवर माझा पूर्ण विश्वास आहे. धीर सोडू नकोस. मला बरे वाटेल." त्यामुळे मग मी Antibiotics न देण्याचा निर्णय घेतला. मग त्याने सकाळी फक्त क्रोसिनची एक गोळी घेतली. 

तो निर्णय झाल्यामुळे, मी वरच्या मजल्यावरच्या स्वयंपाकघरात आमच्याकडचा फ्लास्क घेऊन गेले. मी वर जात असतानाच स्वयंपाकघरात काम करणारा मनुष्य एका स्टीलच्या जगमधे चहा घेऊन खाली चाललेला दिसला. "मॅडम, तुम्ही वर स्वयंपाकघरात जा, तिथे तुम्हला हवा तसा, ताजा, गरम चहा करून देतील." असे त्याने मला सांगितले आणि मला हुरूप आला. वर जाऊन बिनसाखरेचा, ताजा चहा करून घेतला आणि तो फ्लास्कमधे भरून आणला. इथे चहासाठी, पाणी पिण्यासाठी, कागदी ग्लास आहेत. ते पिचके असल्यामुळे त्यातून कुठलेच पेय प्यायला नको वाटते. त्यामुळे मी दोघांसाठी नेहमी चार ग्लास घेऊन येते. दोन ग्लास एकात-एक घालून, त्या पिचक्या कपांना जरा तरी बळकटी येते. माझ्याकडे पुण्याला एक collapsible स्टीलचा ग्लास आहे. तो आणायला हवा होता, असे मला रोज वाटे. 

मी चहा आणायला गेले होते, तेव्हा स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी चालू होती. मी मेनूची चौकशी केली तर, "आज कोबी घालून पोहे करणार आहे," असे तिथल्या स्वयंपाक्याने सांगितले. ते ऐकून मला कसेसेच झाले. मस्त, चमचमीत फोडणी दिलेले, सालासकट भाजून लाल शेंगदाणे घातलेले, फोडणीमध्ये भरपूर हिरव्या मिरच्या आणि कढीलिंब घातल्यामुळे स्वादिष्ट झालेले, शिवाय वर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि पांढरेशुभ्र ओले खोबरे पेरलेले, असे आपल्याकडचे पिवळेधमक कांदापोहे आठवले, आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले. कोबी घातलेल्या पोह्यांची कल्पना मला अजिबात पसंत पडली नव्हती आणि ते पोहे खायला मी मुळीच उत्सुक नव्हते. पण सकाळी नाश्ता करणे आवश्यकच होते. त्यामुळे नाश्त्याला जाण्याआधी आमच्याकडे असलेला थोडा सुकामेवा खाल्ला. रोजच्याप्रमाणे, तुळशीचे बी गरम पाण्यात घालून ते पाणीही प्यायलो. 

आम्ही दोघेही नेहमीच्या वेळेला, म्हणजे आठ-सव्वाआठच्या सुमारास नाश्ता करायला गेलो. तिथे कोबी, गाजर आणि भाजलेले शेंगदाणे घालून केलेले पोहे होते. पोह्यांचे रूप काही विशेष चांगले दिसत नव्हते. इथल्या जेवणा-खाण्यामधे कांदा-लसूण कधीच नसते. पोह्यांमधे हिरवी मिरची, कढीलिंब, कोथींबीर किंवा खोबरे यापैकीही काहीच नव्हते. नर्स मुले-मुली पोह्यांवर टोमॅटो सॉस घेऊन खात होते. कोबी घातलेले पोहे वाईटच लागणार असे मला आधी वाटले होते. पण त्या मानाने ते चवीला बरे होते. आमचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर, मी किंवा आनंद आवर्जून तिथल्या स्वयंपाक्याचे आभार मानायचो. काही पदार्थ तो उत्तमच करायचा. आजचा आमचा नाश्ता झाल्यानंतर, "तुझ्यामुळे मला पोहे करण्याची नवीन पद्धत कळली. या वेगळ्या पध्द्तीने केलेले पोहेदेखील चांगले लागले." असे तिथल्या स्वयंपाक्याला मी सांगितले. त्यावर त्याने मला अगदी आत्मविश्वासाने आणि ठासून सांगितले की, "पोहा तो हमेशा  ऐसेही बनता है. और कौनसा तरीका है? वैसे इसमें तो शिमला मिरचीभी डलती हैं. लेकिन आज वो सप्लायमें आयी नही थी. अगर शिमला मिरची होती, तो पोहा और इससेभी टेस्टी बनता." मला त्याच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली. आपल्याकडे आपण करतो ते अनेक प्रकारचे चवदार पोहे आठवून मी मनोमन हसले आणि खाली कामाला निघून गेले.

खाली गेले तेंव्हा असे कळले की, काल अगदी अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या, आणि Paroxysmal Supraventricular Tachycardia (PSVT) असे निदान झालेल्या त्या मराठी आज्जीबाईला पहाटे-पहाटे डिस्चार्ज मिळालेला आहे. त्या बाईला तिचा नवरा गौरीकुंडच्या दिशेने घेऊन गेला असेही समजले. जाताना रात्रपाळीच्या नर्सेसजवळ, तो माझ्यासाठी निरोप ठेऊन गेला होता. माझे तोंडभरून आभार मानून गेला होता. ती बाई बरी होऊन गेली, हे ऐकून मला खूपच आनंद झाला. या हॉस्पिटलमधे रात्री रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्यासाठी अंथरूण व पांघरूण दिले जाते. रात्री गरमागरम डाळतांदुळाची खिचडी आणि सकाळी गरम चहाही देतात. तसेच, या संस्थेकडे येत असलेल्या देणग्यांमधून, गरीब, गरजू यात्रेकरूंना गरम मोजे, लोकरी टोप्या आणि उबदार ब्लँकेट्सही दान केली जातात. ही सगळी माहिती मी त्या बाईच्या नवऱ्याला पुरवली होती. रात्री ड्यूटी संपवून वर जाण्याआधी त्याला ब्लॅंकेट व झोपायला गादी मिळेल याची व्यवस्था मी केलेली होती. 

काल डायबेटिक कोमामधे गेलेला मनुष्यही जिवंत आणि सुखरूप आहे हे बघून माझ्याच जिवात जीव आला. त्याने मात्र, काल रात्री शुद्धीवर आल्यापासून तिथे नुसता सावळा गोंधळ घालून ठेवला होता. तो प्रत्यक्षात टूर ऑपरेटरच होता आणि त्याने सोबत आणलेले प्रवासी त्याला शोधत-शोधत हॉस्पिटलमधे पोहोचलेले होते. त्याला खाली नेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या बुकिंगची विनंती हॉस्पिटलकडून पाठवण्यात आली होती. त्याच्या सुदैवाने, हेलिकॉप्टरच्या एका फेरीमधे त्याच्यासाठी बुकिंगही झालेले होते. पण तो मनुष्य भलताच विचित्र निघाला. "इथल्या डॉक्टर्सनी मला मारायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माझी माफी मागितली तरच मी खाली जाईन." असा हट्ट त्याने धरला. तो काही केल्या, कोणाचेच ऐकायला तयार होईना. तो सगळ्यांवर ओरडत होता. "मी स्वतःच्या पायांनी चालत खाली उतरू शकतो. तरीही मला उगीचच हेलिकॉप्टरच्या खर्चात तुम्ही सगळे टाकत आहात." असाही आरोप तो करत होता. "मी कुठल्याही परिस्थितीत हेलिकॉप्टरचा खर्च करणार नाही, हा खर्च हॉस्पिटलनेच केला पाहिजे." असा आग्रहदेखील तो धरून बसला. 

आता काय करायचे, असा आमच्यापुढे प्रश्नच पडला. शेवटी, "ठीक आहे. पण मग तू हेलिकॉप्टरने खाली जायला तयार नाहीस असे आम्हाला केसपेपरवर लिहून दे." अशी विनंती डॉ. यादव यांनी त्याला केली. त्याने ते लिहिण्यासाठी केसपेपर मागून घेतला. "या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स आणि नर्सेसनी मिळून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मला काहीही झालेले नसताना, कालपासून विनाकारणच मला इथे ICU मध्ये डांबून ठेवलेले आहे. मला उगीचच सलाईन लावले आहे, इंजेक्शने टोचत बसले आहेत. त्यामुळे माझ्या बिघडलेल्या तब्येतीसाठी हे हॉस्पिटलच जबाबदार आहे. म्हणूनच, माझा आणि माझ्याबरोबर हेलिकॉप्टरमधून सोबत येणाऱ्या व्यक्तीच्या तिकिटाचा खर्च हॉस्पिटलनेच केला पाहिजे." असे त्याने त्या केसपेपरवर लिहिले. ते वाचून आम्ही सगळ्यांनी कपाळाला हात लावून घेतला. 

त्या माणसाला आम्ही खूप समजावून सांगितले, की तुला हेलिकॉप्टरने खाली उतरणे आवश्यक आहे. पण तो काही केल्या ऐकेना. शेवटी त्याच्याकडून त्याच्या आई-वडिलांचा फोननंबर मी घेतला. त्याच्या आईवडिलांशी मी स्वतः बोलले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर त्याच्या आईवडीलांनीही त्याला समजावायचा प्रयत्न केला. तरीही तो ऐकेना. अखेर, मी त्याच्यासमोर अक्षरशः हात जोडून त्याला विनंती केली की, "शहाणा असशील तर हेलिकॉप्टरने लवकरात लवकर खाली जा आणि स्वतःचा जीव वाचव." त्यानंतर तो मला म्हणायला लागला, "डॉक्टर, तुम्ही स्वतः जाऊन काल रात्रीचे CCTV रेकॉर्डिंग बघून या. म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. या लोकांनी मला मारायचा प्रयत्न केला आहे. मी मुंबईला मंत्रालयामधे फोन लावला आहे. तिथून केंद्र सरकारला फोन जाणार आहे. मग या लोकांना दिल्लीहून होम मिनिस्ट्रीकडून तंबी मिळेल. मग हे माझे पाय धरतील. त्यानंतरच मी इथून निघेन." 

हे सगळे बोलणे ऐकल्यावर मात्र माझ्या लक्षांत आले की हा खरोखरच एक माथेफिरू मनुष्य आहे. मी थोडावेळ ICU च्या बाहेर गेले. परत येऊन त्याला मी सांगितले, "हे बघा, मी CCTV रेकॉर्डिंग बघितले. तुम्हाला कोणीही काहीही केलेले नाही. तुम्ही आता निष्कारण वेळ वाया घालवू नका. आत्ता बऱ्या बोलाने खाली गेलात तर स्वतःचा जीव वाचवू शकाल. तुमची पोटनि, चार वर्षांचा मुलगा, वयस्कर आईवडील हे सगळे तुमच्यतावर अवलंबून आहेत. मुंबईला गेल्यावर मग, या हॉस्पिटलावर जी कायदेशीर कारवाई तुम्हाला करायची, ती करू शकाल." तेंव्हा कुठे तो तयार झाला. शेवटी NDRF च्या टीमने येऊन त्याची अक्षरशः उचलबांगडी केली, त्याला हेलिकॉप्टरमध्ये बसवून दिले आणि आम्ही सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

तो मनुष्य गेला असेल-नसेल, तेवढ्यात, काल आपल्या वयस्कर आईला घेऊन आलेला, मुंबईचाच दुसरा एक मराठी मनुष्य मोठमोठ्याने आरडा-ओरड करत, त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसला. त्याच्या आईला कमालीचा दम लागलेला होता. तिला मी ऑक्सिजन देण्यासाठी खुर्चीवर बसवले. काल याच माणसाला मी नीट समजावून सांगितलेले होते, "तुझ्या आईची तब्येत चांगली नाहीये. तू आईला घेऊन लगेच खाली गौरीकुंडला जा. तिला दर्शनासाठी नेण्याचा हट्ट धरू नकोस. तिथे देवळाजवळ खूप गर्दी आहे असे मी ऐकून आहे. तुझ्या आईला ती सगळी दगदग सहन होणार नाही." पण त्याने माझा सल्ला मानला नव्हता. त्याने आणि इतर सर्व सहा कुटुंबियांनी रात्री केदारनाथलाच मुक्काम केला होता. सकाळी आईला घेऊन दर्शनाला जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याआधीच सकाळी त्याची आई अत्यवस्थ झालेली होती. आता आईला हेलिकॉप्टरने खाली नेण्यासाठी हेलिकॉप्टर मिळावे यासाठी त्याची धडपड चालू झाली होती. हेलिपॅडवर जाऊन हेलिकॉप्टर कंपन्यांच्या ऑफिसमध्येही तो जाऊन आला होता. पण त्याने मेडिकल सर्टिफिकेट आणले तरच त्याच्या आईला खाली नेण्यासाठी प्राधान्यक्रम मिळेल, असे त्याला सांगितले गेले होते. आता त्याला आमच्याकडून तसे मेडिकल सर्टिफिकेट हवे होते. 

गुप्तकाशी, फाटा आणि सेरसी अशा तीन ठिकाणांहून, चार हेलिकॉप्टर कंपन्या सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सतत यात्रेकरूंची केदारनाथपर्यंत ने-आण करत असतात. दर १० ते १५ मिनिटाला एकेक हेलिकॉप्टर निघत असते. पण एकेका फेरीमधे चार ते सहा लोकांनाच जाता येते. अनेकजणांनी खूप आधीपासूनच बुकिंग केलेले असते. त्यामुळे ऐनवेळी कितीही पैसे देऊ केले तरीही कोणालाच हेलिकॉप्टरचे बुकिंग मिळत नाही. विशेष करून मे-जूनमध्ये अशी अचानक बुकिंग मिळण्याची शक्यता जवळ-जवळ शून्य असते. त्यातून, यंदाच्या मे महिन्यामध्ये, सुट्टी आणि अधिकमास असे एकत्र आल्याने, यात्रेकरूंची तुफान गर्दी झालेली होती. काही ठराविक आजाराने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना, मेडिकल कोट्यामधून ऐनवेळी हेलिकॉप्टरमधे जागा दिली जाते. या बाईंना, त्या आजारांपैकी, म्हणजे हृदयरोग, स्ट्रोक, HAPO, मेंदूत रक्तस्त्राव, किंवा कोमा, यापैकी काहीच झालेले नव्हते. त्यामुळे त्यांना तसे प्रमाणपत्र देणे हॉस्पिटललादेखील शक्य नव्हते. त्यामुळेच त्याला ऐनवेळी हेलिकॉप्टर मिळून आईला हेलिकॉप्टरने खाली नेणे शक्य होणार नव्हते. "तुझ्या आईसाठी तसे सर्टिफिकेट देणे आम्हाला शक्य नाही." असे मी त्याला सांगितले. त्यानंतर त्याने मला आणि तिथल्या इतर सर्व डॉक्टर्सना अक्षरश शिव्यांची लाखोली वाहिली. एकाच दिवसात दोन मराठी रुग्णांमुळे मला अक्षरशः लाजेने मान खाली घालण्याची वेळ आली हे दुर्दैवच म्हणायचे! आमच्या व्यवसायात शिव्या-ओव्या दोन्हीही 'इदं न मम' या भावनेनेच स्वीकारायच्या असतात हे बाळकडू मिळालेले असल्याने मी तसेच केले. 

नेहमीप्रमाणे सकाळी ८.४५ पासून संध्याकाळी ७.३० पर्यंत मी इमानेइतबारे ड्यूटी बजावली. आजदेखील नेहमीप्रमाणेच मी ४०० च्या वर पेशंट्स तपासले होते. मधे दोनवेळा जेमतेम चहा प्यायला ब्रेक घेतला असेल. पेशंट्स पाहण्याचा त्रास काहीच वाटत नव्हता. पण पेशंटबरोबर आलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबायला सांगणे, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पुरवणे, हेच मोठे जिकिरीचे काम होते. बोलून-बोलून माझा दुखरा घसा आता खूपच दुखायला लागला होता. शेवटी-शेवटी तर मी अगदी कंटाळून, दमून आणि हतबल होऊन लोकांच्या गर्दीकडे, बेशिस्तीकडे बघत होते. 

कोणालाही रांगेत उभे राहायचे नव्हते, 'हॉस्पिटलच्या आत रुग्णाच्या नातेवाईकांना प्रवेश निषिद्ध' अशी पाटी बाहेर लावलेली असली तरीही तो नियम कुणीच पाळत नव्हते, ओपीडीत येऊन, फोनवर मोठमोठ्याने गप्पा मारत बसू नये इतका पाचपोचदेखील कुणाला आहे असे दिसत नव्हते. हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ रुग्ण असतात, आणि त्यांच्यामुळे लहान मुलांना जंतुसंसर्ग होऊ शकतो. लहान मुलांना गरज नसताना हॉस्पिटलमध्ये आणू नका, हे सांगितले तरी कुणी दखल घेत नव्हते. असे अनेक चित्रविचित्र आणि डोक्यात तिडीक जायला भाग पडणारे अनुभवही मला रोज येत होते. 

हे हॉस्पिटल विनामूल्य सेवा देते, म्हणजे प्रत्येकाच्या हक्क्काचेच हॉस्पिटल असल्याच्या कल्पनेने, कित्येक लोक नावनोंदणी न करता किंवा आम्हाला कोणालाही न दाखवता आपले आपणच जाऊन ऑक्सिजन घ्यायच्या खुर्चीवर बसत होते. आधी नावनोंदणी करा, हे त्यांना सांगितले की त्यांना राग येई. अनेक सुशिक्षित आणि आर्थिक सुस्थितीतले लोक आपल्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर-नामक, एक नऊ-दहा इंच लांबीचे डबडे घेऊन हिंडत होते. त्या डबड्यातला ऑक्सिजन जेमतेम पाच मिनिटात संपत असेल. आपल्या समाजातले अज्ञान मात्र संपत नाही हेच खरे, असे मला वाटायला लागले होते. त्यामुळे भारतीय माणूस कधी सुधारणार? अशीच भावना माझ्या मनात वरचेवर येई.

संध्याकाळपर्यंत मी हतबल होऊन आणि दमून बसलेली असताना एक सुस्थितीतला दिसणारा मनुष्य आत आला. मला म्हणाला "इथे आमची राहायची सोय कराल का? मी तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो." ते बोलणे ऐकून तर मी अवाकच झाले. बाहेर हॉस्पिटलची पाटी वाचून आलेला हा सुशिक्षित मनुष्य मला हे काय विचारतो आहे, ते मला कळेचना. मला अगदी त्याला सांगावेसे वाटले होते, "बाबा रे, तू अ‍ॅडमिट हो. मी तुला इथे रात्रभर ठेवून घेते."  अर्थात प्रत्यक्षात मी त्याला, "हे हॉस्पिटल आहे. हॉटेल किंवा धर्मशाळा नाही. इथे तुमची राहण्याची सोय करता येणार नाही." असे अत्यंत शांत स्वरात सांगितले.  

ओपीडीतून वर खोलीत येईपर्यंत जवळपास ७.४० झाले होते. आनंदने संध्याकाळीही क्रोसिनची गोळी घेतली होती असे तो म्हणाला. आम्ही दोघे बरोबर आठ वाजता जाऊन जेवून आलो. बटाट्याची भाजी, दह्यातील बटाट्याचे रायते, राजमा, भात व पोळ्या असा बेत होता. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा मला झाली. पण जेवणामध्ये आज काही गोड पदार्थ ठेवलेला नव्हता. त्यामुळे अर्थातच ती इच्छा मारावी लागली. रात्रीपर्यंत मनाने आणि शरीराने खूपच दमायला झाले होते. त्यामुळे  खोलीत आल्याआल्या आम्ही झोपून गेलो. 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट.

गुरुवार, १८ जून, २०२६

केदारनाथ - भाग १०

काल रात्रीपासूनच माझा घसा जरा धरला होता. बारीकसा खोकला, अंगदुखी, असे चालू झाले होते. रात्री मी १० वाजेपर्यंत झोपले होते. पण पहाटे २-२.१५ वाजता नाक चोंदल्यामुळे जाग आली. घसा दुखत होताच. मग उठून भरपूर गरम पाणी प्यायले. नाक साफ केले. तरीही लगेच झोप येईना. पुढे ३.३० ते ७ अशी साडेतीन तास झोप लागली. गेली काही वर्षे हातात स्मार्टवॉच घालत असल्याने, आपण नेमके किती वेळ झोपलो, हे निश्चितपणे सांगता येते. पण काल रात्री अगदी झोपतानाच ते स्मार्टवॉच मी चार्जिंगला लावलेले होते. त्यामुळे एकूण किती झोप झाली हे मात्र कळले नाही. सकाळी उठल्यावर अंग दुखत असले तरी अंघोळ केल्यावर जरा बरे वाटले. परत भरपूर गरम पाणी पिऊन दुखऱ्या घशालाही जरा शेक दिला.

आज आनंदला जरा बरे वाटत होते. त्यामुळे तो पण नाश्त्याला वर भोजनालयामध्ये आला. नाष्ट्याला  बटाट्याची गरगटा भाजी आणि गरम फुलके होते. मस्तपैकी आमचूर घालून केलेली आणि बटाटे भपूर घोटून केलेली ती भाजी होती. त्याआधी सकाळी, आम्ही आमच्यासोबत आणलेला थोडा सुकामेवा, म्हणजे बदाम, काजू आणि पिस्ते असे खाल्ले होते. थंडीमधे बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही चिया सीड्स, तुळशीचे बी अशा गोष्टीही सोबत आणल्या होत्या. तुळशीचे बी गरम पाण्यात घालून, ते पाणी पिऊन, बद्धकोष्ठ होऊ नये याचीही व्यवस्था आम्ही केली होती. 

नाष्ट्यानंतर मी खाली कामाला निघून गेले आणि आनंद खोलीत परत गेला. आज सकाळी त्याला बरे वाटत असल्यामुळे मला जरा हायसे वाटले होते. आनंदने आमच्या खोलीच्या मागे दिसणाऱ्या बर्फाच्छादित शिखरांचा आणि तिथे दिसणाऱ्या विविधरंगी  तंबूंचा फोटो आमच्या काही फॅमिली ग्रूप्सवर पाठवलेला दिसला. त्यामुळे तो आता बरा आहे याची मला खात्री झाली आणि मी निश्चिंत झाले.

मी बरोबर सकाळी ८.४५ वाजता कामाला लागले. रात्री कामावर असलेल्या नर्सिंग स्टाफपैकी काजल, परवेझ आणि अजून एक मुलगा, अशा तिघांनाही रोज मला कामावर आलेले बघितले की आनंद होतो असे मला जाणवत होते. कारण, रात्रभरात ते तिघे मिळून जवळपास १५०-२०० पेशंट्स तपासत. मी आले की त्यांना अगदी 'हुश्श' होत असावे. आज मी काम सुरू केल्यानंतर तासाभराने डॉ. अजय आला. त्यानंतर हलत-डुलत डॉ. सुभाषिनी आली. ती ओपीडीत आली तरी ती कधीच एका जागी बसून काम करण्याच्या मूडमधे नसते. सतत इकडे जा, तिकडे जा, एखाद्यासोबत गप्पा मार, असे करत असते. डॉ. अजयबरोबर कृष्णा नावाचा एक नर्सिंगचा विद्यार्थी काम करतो. तो बिहारी मुलगा अगदी गुणी आणि कामसू आहे. नॉयडाच्या 'यथार्थ हॉस्पिटल' मधून आलेली, नवीन, अक्षय, रवि, रिया, नरेंद्र, ही मुले अतिशय तरबेज आहेत आणि त्यातला प्रत्येकजण कामाला वाघ आहे. पण रियाला नर्सिंग कामाऐवजी बराच काळ केवळ पेशंट रजिस्टर भरत बसावे लागल्यामुळे तिची खूप चडफड होत असे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेसाठी एक स्वतंत्र रजिस्टर असते. त्या रजिस्टरमधे पेशंट्सचे नाव, लिंग, वय, पत्ता, फोन नंबर, व्यवसायाचे स्वरूप, वैद्यकीय निदान आणि उपचार असे बरेच रकाने भरत बसावे लागते. 

इथे येणारे काही रुग्ण घोड्यावर बसल्यामुळे मांड्यांना खरचटून किंवा घोड्यावरून पडून इजा झालेले असतात. पण, अलंकारिक भाषेत बोलायचे तर, बरेचसे पेशंट्स 'घोड्यावर बसून आल्यासारखे' वाटत. कारण, त्यांना इतकी घाई असे की काही विचारू नका. रांगेत त्यांच्याआधी कितीही वयस्क लोक, किंवा कितीही जास्त आजारी रुग्ण नोंदणीसाठी थांबलेले असले तरीही त्यांना सगळ्यांच्या पुढे यायचे असे. "आम्हाला जायचंय, आमच्याबरोबरचे लोक पुढे निघून गेलेत, आम्हीच मागे अडकलोत, आमचा घोडेवाला किंवा डोलीवाला थांबला आहे," असली कारणं सांगून हे लोक आपापलं घोडं पुढे दामटायला बघत. अशा लोकांची मला फार चीड येई. विशेषतः दिल्ली आणि हरयाणाकडचे लोक महाआगाऊ असतात असा अनुभव मला आला. मग मी ठरवूनच अशा लोकांना मुळीच पुढे येऊ देत नव्हते. त्यातले काहीजण, आपण अगदी अत्यवस्थ आहोत असे नाटक करत पुढे घुसायचा प्रयत्न करायचे. "मला ऑक्सिजन लावाच, श्वास घ्यायला फार त्रास होतोय" असे सांगून घुसायचे. पण मग एकदा का तोंडाला ऑक्सिजनचा मास्क लागला, की लगेच फोन कानाला लावून मोठमोठ्यांदा फोनवर बडबड सुरु करायचे. अशा वेळेस मात्र माझं डोकं खरोखरच आउट होऊन, मी त्यांना फोन बंद करायला लावत असे. 

आज अगदी अर्धमेल्या अशा अवस्थेतल्या एका दहा-बारा वर्षांच्या मुलाला आणले होते. त्याचे आई-वडील आपल्या मुलाची अवस्था बघून, घाबरून, मोठमोठ्याने रडत-ओरडत होते. सोबत त्यांचा पिठ्ठूवालाही होता. त्या मुलाला बेडवर झोपवून आम्ही ऑक्सिजन सुरु केला. पेशंटला व्यवस्थित ऊब मिळावी यासाठी असलेला, ट्यूबने गरम हवा पांघरुणाच्या आत सोडणारा वॉर्मर आम्ही त्या मुलाच्या पांघरुणात लावला. आम्ही त्याला सेटल करण्याच्या प्रयत्नात होतो. मी त्या मुलाला तपासत होते. तेवढ्यात मागून धाडकन कोणीतरी पडल्यासारखा आवाज आला. मी वळून बघितले तर त्या मुलाचे वडील घाबरल्यामुळे चक्कर येऊन, जमिनीवर कोसळले होते. मुलाची आई ते सर्व पाहून भीतीने जोरजोरात किंचाळू लागली होती आणि आपले डोके बडवून घेत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमच्यापैकी निम्मी टीम त्या माणसाकडे धावली. त्याला उचलून दुसऱ्या बेडवर ठेवण्यात आले. आपले वडील जमिनीवर कोसळल्याचा आवाज, आणि आईचे रडणे ऐकून, तो जवळपास बेशुद्धावस्थेत असलेला मुलगा ताडकन उठला  आणि, "पापा, पापा, आपको क्या हो गया? मैं ठीक हूं." असे म्हणत, रडू-ओरडू लागला. आपला मुलगा शुद्धीवर येऊन बोलतोय, ओरडतोय हे बघून त्याचा बापही एकदम उठून बसला. अशा रीतीने, आम्ही फारसे काहीही न करताच, तो मुलगा आणि त्याचे वडीलही ठणठणीत बरे झाले! 
अर्थातच, पुढे फारसे काहीच उपचार न करता, त्या कुटुंबाला आम्ही धीर दिला आणि पाठवून दिले.

आणखी एक अशीच गंमत आम्हाला पाहायला मिळाली. बेशुद्धावस्थेतल्या एका दहा-बारा वर्षाच्या मुलाला आणले गेले होते. पिठठूमधे बसून वर येत असताना तो मुलगा ग्लानीमध्ये गेला होता आणि काही केल्या डोळे उघडत नव्हता. त्याचा पिठठूवाला, आई-वडील आणि इतर नातेवाईक सगळेच घाबरेघुबरे झालेले होते. आम्ही त्याला emergency bed वर घेतले, ऑक्सिजन मास्क लावून ऑक्सिजन सुरु केला, जाड ब्लॅंकेट घालून,  ब्लॅकेटच्या आतमधे वॉर्मरच्या पाईपने गरम हवा सोडायला सुरुवात केली. मी त्या मुलाला तपासून त्याचे हृदय आणि श्वासाची गती ठीक आहे ना ते  तपासले. त्याला हाक मारून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पापण्या वर करून त्याच्या डोळ्याची बुबुळे तपासली. पण इतके करूनसुद्धा त्या मुलाने डोळे हलवले नाहीत, हालचाल केली नाही, की कसलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी नर्सेसना तातडीने ऑर्डर दिली की त्या मुलाच्या हाताच्या शिरेतून रक्त काढा, ते रक्त लगेच तपासून घ्या आणि मुलाला सलाईन लावा. 'सलाईन' हा शब्द त्या मुलाच्या कानावर पडताच, तो मुलगा एकदम ताडकन पलंगावरून उठून बसला आणि "नहीं, नहीं, सलाईन नहीं, सलाईन नहीं..." असे किंचाळू लागला. त्यामुळे, साहजिकच पुढे फारसे काहीही न करता आम्ही त्या मुलाला आणि त्याच्यासोबत आलेल्या फौजेला तिथून रवाना केले!  इथल्या संपूर्ण ड्यूटीच्या काळात मला असे अनेक मजेशीर अनुभव येत राहिले.

काहीवेळा, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यातल्या खेड्यापाड्यातून आलेल्या बायकांना त्यांच्या नवऱ्याचे नाव विचारले की त्यातल्या काही बायका तोंडावर पदर ठेवून लाजत कसेबसे नाव उच्चारत. पण काही जणी मात्र नाव सांगायला अजिबात तयार होत नसत. मग मोठ्या खुबीने त्यांच्याकडून ते नाव काढून घ्यावे लागे. याउलट, महाराष्ट्रातल्या खेडेगावाकडच्या एका बाईला नावनोंदणी करणाऱ्या नर्सने तिच्या नवऱ्याचे नाव विचारले. तर ती म्हणाली, "माझा नवरा कधीच मेला." ती मराठीभाषिक असल्याने आणि तिला हिंदी नीटसे येत नसल्याने मी तिच्याकडून मराठीत माहिती घ्यायला सुरुवात केली. तिला म्हणाले "तुझा नवरा हयात नसला तरीही त्याचं नाव सांग, आम्हाला नोंद करावी लागते." त्यावर ही बाई मला म्हणते, "माझ्या मेलेल्या नवऱ्याचं नाव तुम्हाला काय करायचंय?" मी डोक्याला हात लावून घेतला. शेवटी कसेबसे तिला पटवून दिले की आमच्या रेकॉर्डसाठी आम्हाला ते नाव लिहावेच लागते. मग तिने आमच्यावर मोठे उपकार केल्याच्या थाटात, तिच्या दिवंगत नवऱ्याचे नाव सांगितले आणि आमची सुटका केली!

एक सुशिक्षित, मध्यमवयीन नवरा-बायको आले होते. त्या बाईंना एरवी डायबेटिसच्या गोळ्या चालू होत्या. पण त्यांनी आपल्या डायबेटिसच्या गोळ्या सोबत आणल्याच नव्हत्या. त्या बाईंना कुठल्या गोळ्या चालू आहेत, हेदेखील त्यांना किंवा त्यांच्या नवऱ्याला माहिती नव्हते. त्या बाईंची शुगर तपासणी करायला ग्लुकोमीटर लावला तर, त्यावर रेकॉर्डही होऊ शकणार नाही इतकी जास्त शुगर आली. परत दोन वेळा तपासणी करून बघितली तरी पुन्हा तीच परिस्थिती होती. मी त्या बाईंना इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला नर्सला सांगितले. पण, "काहीही झाले तरी मी इन्सुलिन इंजेक्शन घेणार नाही म्हणजे नाही." असे म्हणून ती बाई अडूनच बसली. आत्ता इन्सुलिन इंजेक्शन आम्ही दिले नाही तर ती बाई डायबेटिक कोमामधे जाऊ शकते, तिच्या जीवाला धोका आहे, हे सगळे मी त्या नवराबायकोंना समजावून सांगितले. बऱ्याच मुश्किलीने ती बाई इन्सुलीन घ्यायला तयार झाली. कसेबसे करून तिची शुगर आम्ही २७५-३०० च्या रेंजमधे आणली आणि तिला पाठवून दिले. रोजच्या डायबिटीस व रक्तदाबाच्या गोळ्या विसरून आलेले कमीतकमी १०-१२ पेशंट्स तरी दिवसभरात भेटायचे. स्वतःच्या गोळ्यांचे नाव माहीत नाही, गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन सोबत नाही, मोबाईलमध्ये गोळ्यांचा फोटो नाही, असे बरेच पेशंट्स इथे पाहिले. "नेहमीची औषधे व गोळ्या गौरीकुंडला ठेवलेल्या सामानामधेच विसरलो." असे खुशाल सांगणारे हे पेशंट्स आपला मोबाईल गौरीकुंडला सामानात विसरलेले मात्र मी एकदाही ऐकले नाही! 

ती डायबेटिसवाली बाई गेली असेल-नसेल तेवढ्यात अक्षय नावाचा एक नर्स मुलगा मला बोलवायला आला, "मॅडम, महाराष्ट्रातला एक पेशंट सिरीयस झाला आहे. येऊन बघता का?" त्या पेशंटला पाहिल्या-पाहिल्या मी विचारले, "हा डायबेटिक आहे का?" हो असे उत्तर मिळताच मी म्हणाले, "अरे, हा तर डायबेटिक कीटोऍसिडोसिसचा पेशंट आहे. हा कधीही कोमात जाऊ शकतो." मी पटापटा सलाईन, अँटिबायोटिक्स, इतर तपासण्या, अशा सर्व ऑर्डर्स दिल्या. त्या माणसाला चक्कर येऊ लागल्याने आणि डोळ्यांना काहीच दिसेनासे झाल्याने तो हॉस्पिटलमधे आला होता. तो रोज सकाळी इन्सुलिन घेत असे, पण आज त्याने ते घेतले नव्हते. हॉस्पिटलमध्ये आल्या-आल्या त्याला कोणीतरी नर्स मुलगा इन्सुलिन द्यायला गेला होता. पण त्याने ते इंजेक्शन त्या नर्सकडून घ्यायला नकार दिला. रोजच्याप्रमाणे माझे मीच लावून घेतो असे त्याने सांगितले. पण त्याने स्वतःदेखील ते इंजेक्शन घेतले नाही आणि तसाच पडून राहिला. तो अर्धवट ग्लानीत गेल्याचे लक्षात आल्यानंतर मला बोलावले गेले होते. मी त्या माणसाला तपासले तेंव्हा तो जेमतेम उत्तरे देऊ शकत होता. त्याचे वय ४१ वर्षे आहे, तो मुंबईचा आहे व तो एकटाच आला आहे, असे त्याने मला सांगितले. प्रत्यक्षात मात्र, "तो इथे एक टूर गाईड म्हणून आला आहे व त्याने सोबत आणलेले प्रवासी त्याला शोधत आहेत" असे मला नर्सेसनी सांगितले. साडेसात-पावणेआठला ओपीडीतून वर येईपर्यंत मी चारवेळा तरी त्याला तपासून आले होते. मला त्या पेशंटच्या जीवाची काळजीच वाटत होती. रात्रभर त्याला हॉस्पिटलातच ठेवणार होते. 

सकाळी, जवळजवळ अर्धमेल्या अवस्थेतली एक मराठी म्हातारी तिथे आली होती. तिचा नवराही सोबत होता. लातूर, उस्मानाबाद या भागातून आलेल्या त्या अत्यंत गरीब घरच्या बाईला, धड उभेसुद्धा राहवत नव्हते. मी तिला ऑक्सिजन दिल्यावर ती जरा ताजीतवानी झाली. ते नवरा-बायको कुठल्यातरी यात्रा कंपनीबरोबर आलेले होते. त्यामुळे, मी नको म्हणत असतानाही ती बाई हट्टाने दर्शनासाठी जातेच असे म्हणाली. पण थोड्याच वेळात तिला घेऊन तिचा नवरा परत आला. तिला आम्ही अ‍ॅडमिट करून घेतले. तिला Paroxysmal Supra-ventricular Tachycardia (हृदयाची गती अचानक व प्रमाणाबाहेर वाढणे) हा आजार निघाला. तिचा नवरा तिला हॉस्पिटलमधेच ठेवून एकटाच दर्शन करून आला. चार वाजता चहा आल्यावर मी त्या माणसाला कपभर चहा नेऊन दिला. त्यामुळे तो अक्षरशः भारावून गेला. माझ्याजवळ येऊन हात जोडून त्याने माझे आभार मानले. त्या बाईंना रात्रभर 'आयसीयू' मधेच ठेवले गेले. 

मुंबईहून एक मराठी कुटुंब आले होते. त्या कुटंबातील आजींच्या आग्रहाखातर सहाजणांचे ते कुटुंब केदारनाथ दर्शनाला आले होते. त्या आजी वयस्कर होत्याच आणि त्यांच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळीही खूप खाली गेलेली होती. बराच वेळ ऑक्सिजन लावला तरी काही केल्या रक्तातली पातळी उंचावत नव्हती. त्या बाईंचा छातीचा एक्सरे, ईसीजी नॉर्मल होता. शेवटी मी त्या बाईंना सलाईन व इतर उपचार दिले. त्यानंतर त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी जरा नॉर्मल झाली. मी त्या बाईंच्या मुलाला सल्ला दिला की, त्या बाईंना घेऊन लगेच खाली गौरीकुंडला जा. पण त्या लोकांची मनाची तयारी दिसली नाही. "आईच्या इच्छेखातर तर आम्ही तिला घेऊन इथे आलो आहोत. आता तिला केदारनाथच्या दर्शनाशिवाय कसे परत न्यायचे?" असे त्यांचे म्हणणे होते. पण त्या बाईंची तब्येत नाजूक आहे, त्यांना दर्शन करायला नेऊ नका असे मी निक्षून सांगितले. थोड्या वेळाने ते लोक त्या आजींना घेऊन तिथून निघून गेले.

भारताच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या, विविधभाषिक, नानाविध प्रकृतीच्या, आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकांशी बोलणे आणि त्यांच्यावर उपचार करणे, म्हणजे अनुभवांचा अक्षय खजिनाच आहे असे मला न वाटले तरच नवल!

आज दिवसभर माझे डोके खूप दुखत होते. त्यामुळे आज मी सकाळी ११-११.३० च्या सुमारास चहा मागवून घेतला होता. स्वयंपाकघरामधून किटलीभरून चहा आणि टोस्ट आले होते. मी टोस्ट खाल्ले नाहीत, पण दोन-तीन छोटे कागदी कप भरून चहा मात्र प्यायले. चहाने चांगलीच तरतरी आली आणि तसेच मी दिवसभर काम केले. संध्याकाळी डॉ. सुभाषिनीने सर्वांसाठी पाच-पाच रूपयांची नमकीनची पॅकेट्स मागवून घेतली. त्यातले थोडे शेंगदाणे व फरसाण खाऊन जरा तोंडाला चव आली. मी दुपारी जेवत नसल्याने संध्याकाळपर्यंत भूक लागलेली होती. 

संध्याकाळी ७.३५ ला वर आले तर आनंद परत पांघरूण घेऊन कळवळत पडलेला दिसला. मी खाली जाऊन थर्मामिटर आणि pulse oxymeter घेऊन आले. ऑक्सिजन सॅच्युरेशन ठीक होते पण पुन्हा ९९ इतका सौम्य ताप मात्र आलेला होता. मग मी पुन्हा खाली जाऊन, जरा जास्तीच्या पॅरॅसिटॅमॉल गोळ्याही घेऊन आले. 

रात्री सव्वाआठ पर्यंत आम्ही जेवायला गेलो. अरहर दाल, कोबी पुलाव, सोयाचे मुटके घातलेली मिक्स भाजी, दही-बुंदी, आणि गरम फुलके, असे जेवण आम्ही संपवत आणले होते, तेवढ्यात आचाऱ्याने गरम शिरा आणून ठेवला. मग तो शिराही थोडाथोडा खाल्ला. आनंदला रात्री पॅरॅसिटॅमॉलची गोळीही दिली. 

उद्याचा दिवस काय-काय नवीन अनुभव देणार असा विचार करता-करता केंव्हातरी झोप लागून गेली... 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट  

बुधवार, १७ जून, २०२६

केदारनाथ:-भाग-९

काल रात्री झोपायला जरा उशीरच झाला होता. तरी सवयीने सकाळी ५.३० ला जाग आलीच. आनंद आजही जरा कळवळतच उठला होता. त्याच्या अंगात तापही होता. तो व्यवस्थित मोजून पाहायला हवा, म्हणून तो मला म्हणाला, "खाली ओपीडीत जाऊन थर्मामिटर घेऊन ये." मी जाऊन थर्मामिटर व Pulse Oxymeter सुद्धा घेऊन आले. आनंदला १०० ताप होता. पण सुदैवाने त्याचे ऑक्सिजन saturation नॉर्मल होते. "चहा प्यावासा वाटतोय का?" असे मी त्याला विचारले आणि तो 'हो' म्हणाल्यामुळे लगेच वरच्या मजल्यावर जाऊन किचनमधे डोकावले. आचाऱ्याला विनंती करून बिनसाखरेचा चहा करून घेतला. पण तो चहा खोलीत न्यायला त्यांच्याकडे फ्लास्कच नव्हता. म्हणून परत खाली खोलीत येऊन आमचा फ्लास्क घेऊन वर गेले आणि चहा आणला. दोघांनी गरम चहा प्यायला. इथे 'अमूल' ची दूधपावडर येते. त्यात आधीच भरपूर साखर असते. इथले आचारी त्यातही वरून साखर घालतात. त्यामुळे एरवी इथला अति गोड, पाकासारखा चहा प्यायला मला आवडत नाही. मळमळायला होतं. आजचा कमी गोड चहा पिऊन मात्र बरे वाटले. 
हे सगळे होईपर्यंत ६.४५ वाजले होते. बाहेर कडक ऊन पडलेले होते व हिमशिखरे चमकत होती. मला अचानक आठवण झाली की कपडे धुवायला हवेत. आधीच्या दोन वेळा आनंदनेच इथले वॉशिंग मशीन वापरलेले होते. म्हणून त्याच्याकडूनच मी ते कसे चालवायचे ते विचारून घेतले व मशीन लावले. मशीनची soak cycle झाली, वॉश सायकलही झाली आणि स्पिन सायकलसाठी शेजारच्या ड्रममधे कपडे टाकणार, तेवढ्यात नाईट ड्यूटीवर असलेल्या डॉ. शोभितचा फोन आला, "ओपीडीमधे दीड वर्षाचे मूल आले आहे, खूप रडतंय, खाली येऊन प्लीज त्याला बघा", अशी त्याने विनंती केली. म्हणून मग मी स्पिन सायकल लावून खाली पेशंट बघायला गेले. 

ओपीडीमधे एक बाळ जोरजोरात केकाटत होते. मी त्याला व्यवस्थित तपासले. पण त्याला फारसे काही झाले नव्हते. त्याला काहीतरी साधेच औषध देऊन मी under observation ठेवले. थोडावेळ तिथेच थांबून ते मूल शांत झाल्यावरच मी खोलीवर परतले. आमच्या सर्व खोल्यांच्या मागच्या बाजूला एकच कॉमन व्हरांडा-कम-बाल्कनी आहे. त्यामुळे खोलीच्या मागच्या दरवाज्याने वॉशिंग मशिन ठेवलेल्या जागेपर्यंत जाता येते. मी गेले तोपर्यंत स्पिन सायकल संपलेली होती. मागच्या बाल्कनीमधेच तारा बांधून कपडे वाळत घालायची सोय केलेली आहे. अनेकांचे कपडे तिथे लटकत असतात. त्यातच जागा शोधून आपले कपडे वाळत घालायचे असतात. कपडे वाळत घालून मी खोलीवर येईपर्यंत ७.३० वाजले होते. आनंद खूपच दमलेला दिसत होता. तापामुळे रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे तो नाष्टा करायलाही येत नाही म्हणाला. मग मीच पटापटा अंघोळ उरकून, कपडे बदलून नाष्टा करायला गेले. 

आज नाश्त्याला काळे चणे आणि शेवयाची खीर होती. इथे एका नोटीसबोर्डावर आठवडाभराचा मेनू लावलेला असतो. रोजच्या तिन्ही जेवणांमधे नेमके काय-काय असणार ते कळावे अशी सोय आहे. पण मजा म्हणजे, छापील मेनू वेगळाच असतो आणि प्रत्यक्ष जेवणातले पदार्थ वेगळेच असतात.गौरीकुंडहून वर केदारनाथपर्यंत येणारी भाजी-फळे आणि स्वयंपाकघरातल्या आचाऱ्यांची मर्जी, यावरच त्या-त्या दिवशी काय बनवले जाईल हे ठरते. अर्थातच मेनू नावापुरताच लावलेला होता हे मला समजले. माझा नाश्ता चालू असतानाच मी आनंदला फोन करून आजचा मेनू सांगितला आणि विचारले, "तुला काही खायला आणू का?" तो "खीर चालेल" म्हणाल्यामुळे ग्लासमधे खीर घालून नेली. त्याने ती खीर खाल्ली. त्यामुळे मलाच जरा बरे वाटले. पुण्याहून सोबत नेलेले तुळशीचे बी मी सकाळीच भिजवून ठेवले होते. मी ते खाल्लेच होते पण आनंदलाही खिरीत घालून ते खायला लावले.

नेहमीप्रमाणे मी ८.४५ ला कामाला आले. रात्रपाळीचा नर्सिंग स्टाफ पेंगाळलेल्या अवस्थेत होता. कालच्या रात्रभरात खूप जास्त आणि त्यातही बरेच अत्यवस्थ असलेले रुग्ण आले होते. त्यामुळे ती सगळी नर्स मुले-मुली दमलेली होती. शिवाय, OPD मधेही रोजच्याप्रमाणेच पेशंट्सची गर्दी उसळलेली होती. रात्रीच्या चहाचे कप, स्टीलचा जग, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे अर्धवट खाल्लेले पुडे, असा सगळा पसारा माझ्या पुढ्यातल्या टेबलवर होता. मी ते टेबल स्वच्छ करून घेतले आणि लगेच झटून कामाला लागले. 

इथे काही ठराविक स्थानिक पेशंट पुन्हा-पुन्हा येत असतात. त्यामधे इथले हॉटेलवाले, खेचरवाले, हमाल, बांधकामावरचे मजूर, स्थानिक पोलीस आणि देवळातले पुजारी असे लोक असतात. चारधाम यात्रेचे महिने सोडून इतरवेळी, इथे अगदी मोजकेच लोक राहत असल्याने हे सगळे लोक एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांना सांभाळून असतात. त्यामुळे, इथल्या स्थानिक लोकांना आमच्या हॉस्पिटलमधे जराशी 'व्हीआयपी ट्रीटमेंट' असते. यातल्या अनेकांची आणि माझीही आता ओळख झाली होती. इथे येणाऱ्या यात्रेकरुंपैकी बरेच लोक मराठीभाषिक असतात. त्यांना मराठीत बोलणारी डॉक्टर मॅडम बघून साहजिकच खूप दिलासा वाटतो. 

आज डॉ. अजयच्या ऐवजी डॉ. हर्ष ओपीडी ड्यूटीवर आला होता. त्याच्या जागी, मंदिराजवळच्या बूथवर अजय गेला होता. हर्ष अतिशय आस्थेने पेशंट्स बघतो पण तो जरा गप्पिष्ट आहे. जेंव्हा OPD मध्ये पेशंट्सची झुंबड उडालेली असते त्यावेळी प्रत्येक पेशंटसोबत गप्पा मारत बसायची त्याची सवय खूपच नडते. म्हणून अधूनमधून मी त्याला कानपिचक्या देऊन लगबगीने काम करायला लावत होते.   

आज डॉ. सुभाषिनी, म्हणजे आमच्यासोबत हैदराबादहून आलेली सर्जन बाई, छान  तयार होऊन, एक लांब स्वेटर घालून सकाळी दहानंतर तिच्या खोलीमधून खाली आली. बराच वेळ ओपीडीत न येता आतल्या बाजूच्या टेबलापाशी बसून होती. ती पेशाने सर्जन व कॉलेजातली प्राध्यापिका असल्याने, तिला OPDमध्ये सर्दी-खोकल्याचे पेशंट्स बघत बसायला नको वाटत असावे. काहीतरी operative काम मिळाले तर बरे असे तिला वाटत असावे. काही वेळ माझ्याशी गप्पा मारून ती खोलीवर निघूनच गेली. त्यानंतर पुन्हा थोडया वेळाने आली तेंव्हा तिने वेगळ्याच रंगाचा स्वेटर आणि टोपी घातलेली होती. वर एक छानसे जॅकेटही घातले होते. कामाच्या वेळेत चाललेली तिची फॅशनपरेड पाहून मला नवलच वाटले. ती जून महिन्यात कैलास मानसरोवर यात्रा करणार असल्याने त्या यात्रेसाठी तिने अनेक नवीन स्वेटर्स, टोप्या आणि जॅकेट्स विकत घेतलेले होते. त्यापैकीच एकेक कपडा घालून इथल्या थंडीपासून कसा बचाव होतोय, ते तिला बघायचे असावे. तिला नुसते बसून गप्पा मारायला खूप आवडते असे माझ्या लक्षात आले. माझे काम करता-करताच तिच्या गप्पा ऐकताना माझी चांगलीच करमणूक होत होती. 

मी रोज माझे काम मन लावून करत असल्यामुळे मला इथे आल्यापासून खूप समाधान मिळत होते. इथल्या सर्व स्टाफपैकी मीच वयाने सगळ्यात मोठी असूनही मी इतके जास्त काम करते हे बघून इथल्या सगळ्या नर्सिंग स्टाफला माझे फार कौतुक वाटत होते. इथले निवासी डॉक्टर, डॉ. यादव हेदेखील मी आल्यापासून रोज मला विचारत होते, "मॅडम, आपकी तबियत कैसी है? आप ठीक तो हो ना? खांसी-बुखार तो नही है ना?" मला आधी त्यांच्या अशा रोजच्या चौकशीचे जरा आश्चर्यच वाटले होते. पण मग इथल्या नर्सिंग स्टाफकडून समजले की इथे आमच्यासारखे दहा-दहा दिवसांसाठी आलेले कोणीही डॉक्टर्स पूर्ण दिवस काम करूच शकत नाहीत. ते आजारी तरी पडतात किंवा काम न झेपल्याने लवकर खाली हरिद्वारला निघूनच जातात. हे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की इथल्या लोकांना माझे एवढे कौतुक का वाटत होते!

दुपारी खोलीवर येऊन आनंदला बघून गेले. तो झोपलेलाच होता. त्याला जेवणाबाबत विचारले. तो "काहीतरी खाईन" असे अनिच्छेनेच म्हणाला. माझ्याबरोबरचे दोन डॉक्टर्स आधीच वर जेवायला गेलेले होते. म्हणून मग डॉ. हर्षला फोन करून दुपारच्या जेवणाचा मेनू विचारला. सकाळचीच उरलेली खीर पुन्हा जेवणात ठेवलेली आहे, असे त्याने सांगितले. मग डायनिंग हॉलमधे जाऊन मी आनंदला खीर आणून दिली. वाळलेले कपडे खोलीत आणून ठेवले व परत खाली कामाला गेले. आजही मी रोजच्याप्रमाणे ७.३० वाजेपर्यंत काम केले. आज मलाही जरा अंगात कणकण आणि घशात खवखव जाणवत होती. कदाचित उद्या मलाही ताप येईल असे वाटले. पण लगेच, 'तसे न झाल्यास बरे', हा विचारही मनात आला. रात्री आनंदही जेवायला वर आला. कढी-पकोडे, दुधी भोपळ्याची भाजी, भात आणि सकाळचीच खीर असा बेत होता. आज कढी-भातासोबत तळलेले पापडही होते. त्यामुळे जेवायला मजा आली. मी दुपारी जेवले नसले तरी आज चहासोबत थोडे स्नॅक्स खाल्लेले होते. रोज दुपारी ५ च्या सुमारास हॉस्पिटलतर्फे,  म्युसली आणि चॉकोज् असे एक मिश्रण येते. त्याशिवाय आज डॉ. सुभाषिनीने प्रत्येकाला चहासोबत एकेक नमकीनचे पाकीट दिले होते. मी ते स्नॅक्सचे पाकीट घेतले नव्हते. पण रिया नावाच्या नर्सने आग्रह करून मला तिच्या स्नॅक्सच्या पाकिटातले दोन घास खायला लावले होते. 

आज संध्याकाळपासून थोडे बरे वाटते आहे असे आनंद म्हणाला. त्याच्या अंगात तापही नव्हता. पण माझे डोके मात्र जड होऊन, अंगही दुखून आले होते. पहिल्यापासूनच मी मनाशी निर्धार केला होता की काहीही झाले तरी शेवटच्या दिवसापर्यंत मी माझ्या कामात खंड पडू देणार नाही. त्यामुळे मला आजारी पडून चालणार नव्हते. म्हणून आज लवकरच झोपायचा विचार केला आणि तो अमलातही आणला...

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट 

मंगळवार, १६ जून, २०२६

केदारनाथ-भाग-८

काल रात्री छान झोप लागली. पहाटे साडेपाचला जाग आली. पण तसेच लोळत पडावेसे वाटले. NEET परीक्षेच्या घोटाळ्याबाबतचे व्हिडिओ ऐकत पडले होते. एकंदर  शिक्षणाचा बाजार पाहून मनातल्या मनात चडफडत होते. "मोटेगावकर आणि पेपर फोडणाऱ्या टोळीने २२ लाख मुलांचे नुकसान केले", असे सतत बोलले जात होते. पण माझ्या मते, या पेपरफुटीमुळे फक्त ते पेपर विकत घेणाऱ्या धनदांडग्यांच्या मुलांचे नुकसान झाले आहे. भविष्याचा विचार करता, इतर विद्यार्थ्यांचे भलेच झाले आहे असे मला वाटले.
माझ्या पाठोपाठ आनंद उठला. तो जरा कळवळतच उठला होता. "मला दम लागल्यासारखे वाटते आहे, रात्रभर झोप नाही" असं तो म्हणाल्याने मी घाबरले. लगेच त्याला खाली ओपीडीत घेऊन गेले व त्याचे ऑक्सिजन saturation तपासले. ते नॉर्मल होते. त्याचे टेंपरेचर बघितले, तेही नॉर्मल होते. "उगाच घाबरू नकोस. तुला काहीही झालेले नाही" असे मी आनंदला सांगून त्याला खोलीत पाठवले. ओपीडीमध्ये खूप पेशंट्स थांबलेले होते आणि रात्रीचा स्टाफही खूपच थकलेला दिसला. म्हणून मग मी तिथेच थांबून साधारण तासभर पेशंट्स तपासले. 

रात्रपाळीच्या डॉ. शोभित सिंग यांच्याशी अधेमधे गप्पा झाल्या. डॉ. शोभित याने MD (PSM) केलेले आहे. त्यानंतर सध्या तो DM (High Altitude medicine) हा कोर्स AIIMS ऋषिकेश इथे करत आहे. तो MD (PSM) करत असताना, पेशंट्स तपासणे, वॉर्डमधे काम करणे ही कामे त्याला करून माहितीच नव्हते. त्यामुळे क्लिनिकल कामात तो जरा चाचपडतोय असे मला जाणवले. त्याने मला विचारले, "मॅडम, तुम्हाला intubation करता येते का? मला शिकवाल का?" मी म्हणाले, "मला करता येते आणि मी तुला शिकवूही शकेन. मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांमध्ये intubation केलेले नाही. पण वेळ पडली तर मी ते निश्चित करू शकते याची मला खात्री आहे."  तसे इथे नॉयडा येथील 'यथार्थ हॉस्पिटल' चा, कामात अतिशय तत्पर आणि तरबेज असलेला, नर्सिंग स्टाफ असल्याने, आम्हा सगळ्यांचेच काम सुकर झाले होते.

मी साधारण साडेसात वाजल्यानंतर लगेच ओपीडीतून वर जायला निघाले. तेवढ्यात मला दिसले की बाहेर आमचे सामान खेचरावरून वाहून पोचलेले होते. कालच मी सामान वाहून आणणाऱ्या खेचरवाल्यांना विनंती केलेली होती की, "उद्या कुठल्याही परिस्थितीत आम्हा दोघाचे सामान आणाच." ठराविक दोन खेचरवाले रोज हॉस्पिटलच्या सामानाची वर-खाली ने-आण करतात. रोज रिकामे झालेले Oxygen सिलिंडर खाली न्यायचे असतात. खालून औषधे, फळे-भाज्या आणि भरलेले सिलिंडर वर आणायचे असतात. रोज रात्री चालत ते वर येतात आणि दिवसा खाली उतरतात. मी नाश्त्याला गेले तेंव्हा, ते सामान वाहून नेणारे खेचरवालेही एका टेबलावर नाश्ता करत बसलेले मला दिसले. पुढेही ते अनेकवेळा नाश्त्याला दिसायचे. 

आज आमचे सामान आलेले पाहून मला आनंद झाला. मी चटकन आमच्या दोन्ही बॅग्ज उचलून वर आणल्या. आंघोळीनंतर अंग पुसायला पंचा, बदलायला चांगले कपडे, केस धुवायला शांपू, अंगाला लावायला मॉयश्चरायझर मिळाल्यामुळे अगदी चैन झाली. नाष्ट्याला वांग्याचे भरीत आणि गरम फुलके होते. भरीत छान चमचमीत होते. भूकही लागली होतीच. त्यामुळे दोन फुलके आणि भरीत चापले. आजचा चहाही चांगला कडक होता. पण नेहमीपेक्षाही खूप जास्त गोड होता. भर थंडीत गरमागरम चहा प्यायला चांगले वाटत होते. 

आज सतत वीज जात-येत होती. आमच्या टेबलजवळ एक इलेक्ट्रिक वॉर्मर ठेवलेला होता. आम्हाला बसायला दिलेल्या खुर्चीवर इलेक्ट्रिक पॅड्स लावलेली होती. विजेवर चालणारी ती पॅड्स, पाठीला आणि ढुंगणाला छान शेक देण्याकरता ठेवलेली होती. एरवी मी गेल्यागेल्या ती पॅड्स बंद करून ठेवायचे किंवा काढूनच ठेवायचे. आज मात्र बाहेर बर्फ पडायला सुरुवात झाली होती. गारवा चांगलाच जाणवत होता. अंग भिजून, थंडीने कुडकुडत, थरथरत असे अनेक म्हातारे-कोतारे येऊ लागले. त्यांच्याजवळ वॉर्मर लावून त्यांना बसवणे, कपडे बदलायला लावणे, प्रसंगी सलाईन देणे, अशी कामे चालू झाली होती. 

अत्यंत कुपोषित, गरीब आणि खेड्यापाड्यातून आलेल्या त्या भाविकांची हिंमत वाखाणण्याजोगी असते. भिजून थंडीने कुडकुडणारे ते पेशन्टस बघून मी माझ्या खुर्चीजवळचा वॉर्मर बाहेर काढून ठेवला व त्या म्हाताऱ्या माणसांना त्याचा जरा शेक घ्यायला सांगितले. केवळ माणुसकीला धरून जे मला करावेसे वाटले तेवढेच काम मी केले होते. पण त्या रुग्णांना मात्र त्यामुळे खूप दिलासा मिळाला. एक-दोघे तर चक्क माझ्या पायाच पडायला लागले. आजच्या दिवसभरात आठ ते दहा बालरूग्णही मी बघितले. त्यातली काही मुले तशी सुखवस्तू घरातली असली तरी कुपोषितच दिसत होती. त्यांना ताप, चक्कर येणे, अशी लक्षणे होती. इतक्या थंडीत आणि मरणप्राय गर्दीत लहान मुलांचे आणि म्हाताऱ्यांचे खूप हाल होतात. कित्येकजण तंबूमध्ये किंवा पिठठूमध्ये बसलेल्या अवस्थेतच बेशुद्धावस्थेत गेलेले आढळतात. मग त्यांना गडबडीने हॉस्पिटलमध्ये आणले जाते. त्यांना वॉर्मर लावणे, oxygen देणे, सलाईन व इंजेक्शन देणे असे उपचार करावे लागतात. दिवसातून असे ३-४ पेशंटस तरी येतच होते. 

डायबेटीस आणि ब्लडप्रेशरचे रुग्णही बरेच होते. त्यातले बरेच लोक आपापली नेहमीची औषधेच बरोबर घेऊन आलेले नव्हते. कुठली औषधे चालू आहेत तेही त्यांना नीटसे सांगता येत नव्हते. अनेक मधुमेहींनी आपल्या मनानेच गोळ्या बंद केलेल्या आहेत असे दिसले. त्यातल्या तीन बायकांची शुगर तर ६०० च्या आसपास निघाली. मग त्यांना इन्सुलिन चे इंजेक्शन देऊन त्यांची शुगर कमी करावी लागली. काहीजण म्हणाले की ते मधुमेहासाठी 'इंग्लिश औषधे' म्हणजे Allopathy ची औषधे खात नाहीत आणि खाणार नाहीत. अनेक पेशंट्स काय वाट्टेल ती औषधे, अगदी Antibiotics सुद्धा आपापल्या मनानेच घेत असतात हे कळून आले. माझ्या असेही लक्षात आले की अनेक उच्चशिक्षित लोकदेखील स्वतःला वाटेल तेंव्हा, आणि वाटेल ती डायबेटीस व हायपरटेंशनची औषधे अगदी बिनदिक्कत घेत असतात. डॉक्टर म्हणून आपण औषधे लिहून देताना किती खोलात जाऊन विचार करतो आणि पेशंट्स मात्र आपापल्या मनाने काय-काय महाभयंकर प्रकार करू शकतात, याची प्रचिती मला आली. 

आज एका वयस्कर माणसाला देवळाजवळ उभे असताना दम लागू लागला होता. इथल्या सरकारी हॉस्पिटलच्या कॅम्पमध्ये त्याला सांगितले गेले होते की, "आता तुम्ही दर्शन न घेताच परत जा". इथपर्यंत २२ किलोमीटर चालत चढून आल्यानंतर दर्शन न घेताच परत जाण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. मध्यप्रदेशातील एका खेड्यातून आलेल्या त्या सडपातळ पण कणखर अशा सत्तरीच्या म्हाताऱ्याला मी तपासले. त्याचे बीपी, ऑक्सिजन saturation उत्तम आहे, हे सांगून धीर दिला आणि "जरा हिंमत करा, घट्ट राहा आणि केदारनाथाचे दर्शन घ्या" असे त्याला सांगितले. तो माणूस एकटाच आलेला होता व त्याने इतर सर्व म्हणजे ११ ज्योतिर्लिंगांचे दर्शन केलेले होते. मोठ्या आशेने तो बाराव्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला आला होता. दर्शन घेता येणार नाही, या कल्पनेने तो अगदी रडवेला झाला होता. मी त्याला दर्शन घेण्याची परवानगी दिल्याने त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मला काही कळायच्या आतच त्याने माझे पाय धरले आणि म्हणाला, "डॉक्टर, तुमच्यामुळे मला आज देवाचे दर्शन होणार आहे!" मी लाजून चटकन पाय मागे घेतले. संध्याकाळी दर्शन घेऊन परत जाताना तो आवर्जून थांबून माझे आभार मानून गेला. 

असेच एक सात-आठ जणांचे कुटुंब आले होते. त्यातला ऐंशी वर्षांच्या जवळपास आलेला एक वृद्ध गौरीकुंडापासून २२ कि.मी. चालत वर आला होता. पण केदारनाथला पोहोचल्यावर त्याला दम लागू लागला होता. आम्ही त्याला oxygen दिला. त्याची oxygen level सुधारल्यावर त्या वृद्धाचा मुलगा त्याला घेऊन दर्शनासाठी गेला. पण थोड्याच वेळात त्या वृध्दाला परत धाप लागली. म्हणून त्याचा मुलगा त्याला हॉस्पिटलमध्ये परत घेऊन आला. त्या माणसाला पुन्हा oxygen द्यावा लागला. "मॅडम, मेरे पिताजीको मै आपके पास छोडके जाऊं क्या? हम दर्शन करके जल्दही वापस आते है". त्यांची अगतिकता बघून मला नाही म्हणवेना. त्या माणसाचे वय आणि वैद्यकीय परिस्थिती बघून त्यांना एकट्यालाच वेटिंग रूममध्ये ठेऊन जा, असेही सांगायला जीभ रेटेना. बराच वेळ मी त्या आजोबांना आमच्याजवळ बसवून ठेवले. थोड्या वेळाने एक बेड रिकामा झाला. त्यावर त्या आजोबाना पडून राहायला सांगितले.  चार-पाच  तासांनी त्यांचा मुलगा दर्शन घेऊन परत आला. त्यानेही येऊन आमचे आभार मानले. 

आज डॉ. सुभाषिनी सकाळी कामाला आली होती. पण डॉ. अजय आणि डॉ. हर्षला घेऊन ती देवळामध्ये दर्शन करायला निघून गेली. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांचा पत्ता नव्हता. त्यामुळे आजही बराच काळ मी एकटीच डॉक्टर कामावर होते. आज नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता काम संपवून वर आले. आनंदला जरा ताप आलेला वाटत होता. म्हणून परत खाली जाऊन थर्मामिटर आणला. ताप नव्हता, तरी फार्मसीमधून क्रोसिनच्या गोळ्या घेऊन आले. आठ वाजता आम्ही दोघेही जेवायला गेलो. बटाटा व भोपळी मिरची आणि सोयाचे मुटके घातलेली भाजी, भात, दाल, आणि गरम फुलके, असे छान जेवण होते. रोज दुपारी जेवत नसल्याने, रात्रीपर्यंत चांगली भूक लागलेली असते. त्यामुळे रात्रीचे जेवण तसेही रुचकर लागते. इथे आलेली अनेक नर्स मुले घरून लोणी किंवा तूप घेऊन आलेली होती. रोजच ती मुले फुलक्यांना लोणी किंवा तूप चोपडून खातात. आम्हालाही लोणी-तूप घ्यायचा आग्रह करतात. पण वजनकाट्याची आठवण आम्हाला वरचेवर येत असल्याने आम्ही ते कधीच घेतले नाही. जेवण झाल्यावर आपापले ताट घासून ठेवायचे, असा इथे नियम आहे. ही मुले मात्र एकाच ताटात दोघे किंवा तिघे जेवतात व आळीपाळीने ते ताट धुतात! थंडीत ओले थोडे काम वाचवायचा त्यांचा हेतू असावा. अगदी वेगळ्याच वातावरणात आणि वेगवेगळे अनुभव घेत इथे काम करायला मला खूपच मजा येऊ लागली होती.

आज आनंद मात्र खूपच दमलेला दिसत होता. त्याने दिवसभर विश्रांती घेतली होती. पण आता त्याचे अंगही गरम लागत होते. म्हणून मी पुन्हा खाली जाऊन थर्मामिटर आणि pulse oxymeter आणला. त्याचे टेंपरेचर ९९ च्या आसपासच होते पण मुख्य म्हणजे त्याचे ऑक्सिजन saturation उत्तम होते. त्याचा घसाही मी तपासला. किंचितसा लाल होता. बाकी सर्व नॉर्मल होते. पण एकूण त्याची प्रकृती जरा नरम झाल्याचे कळत होते. म्हणून रात्री त्याला क्रोसिनची गोळी दिली. सगळे होईपर्यंत झोपायला १० वाजून गेले होते.

[क्रमशः]

©डॉ.  स्वाती बापट.

सोमवार, १५ जून, २०२६

केदारनाथ-भाग-७

आदल्या रात्री लवकर जेवून झोपले होते. गाढ झोप लागली होती आणि पहाटे ६.३० वाजता अगदी प्रसन्न चित्ताने जाग आली. नेहमीप्रमाणे सकाळी चहा प्यायची हुक्की आली होतीच. कालच अशी महिती मिळालेली होती की, इथे सकाळी चहा मिळतो पण बरोब्बर सव्वासहाला वरच्या मजल्यावर स्वयंपाकघरात जाऊन तो आणावा लागतो. ती वेळ चुकली की मात्र मग नाष्ट्याबरोबरच चहापान करता येते. कडाक्याच्या थंडीमधे सकाळी उठल्यानंतर उबदार खोलीतून बाहेर पडून, चहा आणायला वरच्या मजल्यावर जायला अगदी नको वाटत होते.  त्यामुळे, चहाची तल्लफ मनातच दाबून टाकली. 

आमचे सगळे सामान असलेल्या स्ट्रॉली बॅग्स आम्ही १९ तारखेला संध्याकाळीच नारायणकोटीमध्ये तेथील व्यवस्थापकांच्या हवाली केल्या होत्या. पण २२ तारीख उजाडली तरी आमच्या बॅग्स अजूनही केदारनाथपर्यंत पोचलेल्या नव्हत्या. आश्चर्य म्हणजे आमच्यासोबतच वर चढून आलेल्या डॉ. हर्ष आणि डॉ. अजय यांचे सामान मात्र २२ तारखेला सकाळी त्यांना मिळाले. अगदीच जुजबी सामान जवळ असल्याने आमची बरीच गैरसोय होत होती. आनंदने काल वॉशिंग मशीनमधे आमचे कपडे धुतले असल्याने बदलायला स्वच्छ कपड्यांचा एक जोड तरी होता हे नशीब! काल एका नर्स मुलीकडून मी थोडासा साबण घेतल्यामुळे कपडे धुता आले होते. आज मात्र मी सकाळीच बाहेर पडून, हॉस्पिटलसमोरच्या दुकानातून सर्फचा एक पुडा विकत आणला. अंघोळ करून आम्ही दोघेही नाष्टा करायला गेलो. नाष्ट्याला गरम छोले-भटुरे होते. छोले अगदी छान मऊ शिजलेले आणि चवीला चटकदार होते. भटुरे आकाराने चांगलेच मोठे होते. दोन भटुरे व छोले आणि २-३ कप गरमागरम चहा असा भक्कम नाष्टा करून ८.४५ पर्यंत मी कामाला गेले.
मी ९ वाजायच्या आतच OPD मधे पोहोचल्यामुळे, रात्रपाळी केलेला स्टाफ अगदी खूष झाला. मी ताजीतवानी असल्याने लगेच कामाला लागले. तिथली रजिस्ट्रेशनची पद्धत, रूग्णांचे बेशिस्तीची वागणे आणि एकेका रूग्णाबरोबर येणाऱ्या दोन-तीन किंवा कित्येकदा जास्तच नातेवाईकांचे आत घुसणे, हे सगळे मला कालपासूनच खटकत होते. त्यामुळे मी तिथली घडी नीट बसवण्यासाठी सूत्रे हातात घेतली. रजिस्ट्रेशनची कारवाई नीट व सुरळीतपणे होईल यासाठी टेबलांची योग्य जागी हलवाहलव करून घेतली. बाहेरून आत येण्याच्या दरवाज्याजवळच आमची तपासणीची टेबल्स लावून घेतली. प्रत्येक रुग्णाने रांगेतच यायचे, नावनोंदणी केल्यानंतरच तपासणी होईल, आणि रुग्णासोबत शक्यतो एकाही नातेवाईकाने आत यायचे नाही, असे नियम मी लागू केले. त्यामुळे आपोआपच बघ्यांची संख्या घटली आणि गर्दी आणि गोंधळ जरासा कमी झाल्यामुळे सगळ्यांनाच सुसूत्रपणे काम करता येऊ लागले. इथल्या सगळ्या तपासण्या आणि उपचार मोफत आहेत हे बाहेरच्या बोर्डावरच लिहिलेले होते. त्यामुळे, एखाद्या खऱ्या रुग्णासोबत आलेले नातेवाईकदेखील फारसा काही त्रास नसताना, "माझे पण बीपी बघा, शुगर तपासा, ऑक्सिजनची लेव्हल मोजा" असा आग्रह आमच्यापाशी धरत होते. मी लागू केलेल्या नियमांमुळे, विनाकारण तपासणी करून घेऊ पाहणाऱ्या धडधाकट नातेवाईकांची संख्याही आपोआपच घटली. त्यामुळे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या नर्सेसना अगदी "हुश्श" झाले. 

सकाळी ८.४५ ते रात्री ७.३० पर्यंत मी सलग ड्यूटी केली. आज मात्र  दुपारी जेवायलाही गेले नाही. अलीकडे बरेच दिवसांपासून, पुण्यात घरी असताना, आम्ही दुपारचे जेवण करायची सवय ठेवलेली नव्हती. शिवाय, आज सकाळचे भटुरे पोटात अगदी गच्च बसलेले होते. त्यामुळे फारशी भूकही लागली नव्हती. इथे थंडी जरी असली तरी फारशी भूक लागत नाही असे माझ्या लक्षात आले. या हॉस्पिटलमध्ये सतत खूप जास्त पेशंट्स येत असल्यामुळे एकाचवेळी सगळा स्टाफ व डॉक्टर्स जेवायला जात नाहीत. अर्धा नर्सिंग स्टाफ आधी जेवून येतो आणि ते लोक परत आले की उरलेली मुले-मुली जेवायला जातात. आधी गेलेल्या मुलामुलींकडून आज दुपारी जेवणात आंबे आहेत, हे मला कळले होते. त्यामुळे, नंतर जेवायला जाणाऱ्या रिया आणि कविता या नर्सेसना मी माझ्यासाठी आणि आनंदसाठी प्रत्येकी एक-एक आंबा आणायला सांगितले. पण या मुली जेवायला जाईपर्यंत आंबे संपत आलेले असल्याने त्यांनी एकच आंबा आणला होता. मी तो रात्रीच्या जेवणात खाण्यासाठी ठेवला. 
इथे आल्यापासून अनेक चित्रविचित्र अनुभव येत राहिले होते. भारताच्या कोनाकोपऱ्यातून आणि खेडोपाड्यातून इथे भाविक येतात. अनेकजण घोड्यावरून, डोलीतून किंवा पिठ्ठूत बसून येतात. वाटेत घोड्यावरून पडून मार खाल्लेले, हाडे मोडलेले, खरचटलेले, किंवा मुका मार लागलेले असे दिवसभरात कमीतकमी १०-१२ रुग्ण येत होते. त्यापैकी अनेकजण अतिशय गरीब होते. सहसा अशा गरीब घरांमधील कित्येक वृद्ध बायका, पुरुष व लहान मुले आधीच कुपोषित व खालावलेल्या प्रकृतीचे असतात. इथली थंडी, प्रवासाचा शीण, हवेतली प्राणवायूची कमतरता, आणि एकंदर खाण्याचे हाल, यामुळे त्यांची तब्येत एकदमच कमालीची ढासळते. कित्येकांना इथपर्यंत येऊनही दर्शन न करताच परत जावे लागते. अनेकांनी चारधाम यात्रेसाठी आयुष्यभराची पुंजी खर्च केलेली असते. अशावेळी दर्शन न घेता परत जावे लागणे हे खरोखरच दुर्दैव म्हणायचे. दवाखान्यामध्ये एक दानपेटी ठेवलेली आहे. परंतु, इथले कोणीही कर्मचारी कोणालाही दान देण्याची विनंती करत नाहीत. तरीदेखील अनेक जण त्या दानपेटीमधे पैसे दान करताना दिसत होते. आणि मला जाणवलेली विशेष गोष्ट म्हणजे दान करणारे बरेचसे लोक गरीब घरामधून आलेले दिसत होते. त्या मानाने, सुखवस्तू लोक फारसे दान  करताना आढळले नाहीत. 

मला आलेला आणखी एक अनुभवही खूप बोलका होता. ज्यांना खरोखरीच खूप त्रास असतो, ते लोक फारसे कुरकूर करताना दिसले नाहीत. ते नावनोंदणी होईपर्यंत शांतपणे थांबत होते आणि आमचा सल्ला ऐकत होते. याउलट, विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत म्हणून आलेले, फारसा त्रास नसलेले सुखवस्तू लोक जास्तच कटकट करत होते. विनाकारण हॉस्पिटलमधे आलेल्या कित्येक तरुण मुलामुलींना फारसे काहीही झालेले नसतानाही, उगीचच ऑक्सिजन लावून हवा असायचा. अशा लोकांना वेळीच ओळखून, थोडे गोड बोलून त्यांची बोळवण करावी लागे. 

आपल्या देशात कोणत्याही पॅथीची, कुठलीही औषधे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही अगदी सहज मिळू शकतात हे आपण पाहतोच. अनेक पेशंट्स आपल्या मनाने वाट्टेल ती औषधे व गोळ्या खाऊन आलेले मला दिसले. तरीही त्यांना अजून मिळतील ती औषधे घेण्याची हौस होती. पंचेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही केदारनाथला आलो होतो तेंव्हा आमच्यापैकी कोणालाही किंवा आमच्या आसपास चालणाऱ्या इतर कोणा यात्रेकरूंनाही प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्रास झाल्याचे मला आठवत नव्हते. इथे मात्र बरेच पेशंट्स त्या त्रासाची तक्रार घेऊन येत होते. अनेकजण कापूर हुंगत-हुंगत आलेले होते. हातात किंवा आपल्या गळ्यामध्ये कापराच्या पुड्या बांधलेलेही महाभाग दिसले. त्यांच्या समजुतीनुसार कापूर हुंगल्याने शरीरातील प्राणवायू वाढतो! करोनाकाळामध्ये बऱ्याच प्रमाणात बोकाळलेले हे कापूराचे खूळ अजूनही लोकांच्या मनातून उतरलेले नसल्याचे पाहून आश्चर्यही वाटले आणि खेदही वाटला. अति कापूर हुंगण्यामुळे श्वासनलिकेला आतून सूज येऊ शकते आणि श्वसनाला अधिकच त्रास होऊ शकतो. या कापूर हुंगण्याच्या फॅडमुळेच तिथे येणाऱ्या अनेकांना श्वसनाचा त्रास होत होता. याबाबत लोकांचे प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतही होतो. पण हे 'कापूर-महात्म्य' लोकांच्या मनांमध्ये इतके खोलवर बिंबलेले आहे की फारसे कोणी आमच्यावर विश्वासही ठेवत नव्हते.  
 
या हॉस्पिटलात रोज दुपारी ३ वाजता, इथे सहा महिने पूर्णवेळ काम करण्यासाठी आलेल्या सर्व नर्सिंग स्टाफची एक मिटिंग घेतली जाते. इथले व्यवस्थापक श्री. रोहनजी, श्री. धनवीरजी, आणि डॉ. यादव या मीटिंगमधे उपस्थित असतात. नर्सिंग स्टाफला राहण्या-खाण्याच्या बाबतीत किंवा रोजच्या कामामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या ऐकून घेतल्या जातात व त्यावर तोडगा काढला जातो. अर्थात, आम्ही बाहेरून केवळ दहा दिवसांसाठी आलेले चार डॉक्टर्स या मिटिंग्जना जात नव्हतो. रोज दुपारी ३ ते ४ दरम्यान ही मिटिंग चालते. माझ्याबरोबर काम करणारा डॉ. अजय आज दुपारी जेवणानंतर बराच काळ कुठेतरी गायब होता. हैदराबादहून आलेल्या डॉ. सुभाषिनीची तब्येत बरी नसल्याने ती सलग दुसऱ्या दिवशीही कामाला आलेली नव्हती. दुपारी ३ ते  ४ दरम्यान, नावनोंदणी करणारी एक नर्स, एक नर्सिंग कोर्सचा विद्यार्थी आणि मी एकटीच डॉक्टर, असे तिघेच काम करत बसलो होतो. आनंदने दुपारी येऊन तास-दीड तास रजिस्टर भरण्याचे काम केले. 

पेशंट नोंदणीसाठी रोजची तीन रजिस्टर्स असतात. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नावनोंदणीचे एक रजिस्टर, दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुसरे रजिस्टर व रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंतचे तिसरे रजिस्टर. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत, साडेतीनशेच्या वर पेशंटसची नावनोंदणी झालेली होती, म्हणजेच दुपारी ३ वाजेपर्यंत किमान ३५० पेशंट्स तपासले गेले होते! इथे रोज दुपारी ४ वाजता चहा येतो. श्रमपरिहारासाठी चहासारखे दुसरे काही नाही. तो चहा मात्र मी दोन-तीन छोटे कागदी कप भरून प्यायले. भर थंडीमध्ये गरम चहा चांगला वाटतो. 

संध्याकाळी ७.३० पर्यंत ओपीडीत थांबून मी येतील ते सगळे पेशंट्स बघितले.  दिवसभर पेशंट्स तपासून, त्यांच्याशी बोलून आणि बिनकामाच्या नातेवाईकांना बाहेर हाकलून मला खूपच दमायला झाले होते. रात्रीचे जेवण साधेच होते. घट्ट दाल, गरम रोटी, आलूमटारची भाजी आणि भात असे जेवून, आणि दुपारी जपून ठेवलेला आंबा खाऊन मी खोलीवर रात्री ९ पर्यंत पोहोचले. रात्री आनंदशी गप्पा मारत आणि फोनवर काहीबाही ऐकत असतानाच केंव्हातरी झोप लागून गेली.

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट 


रविवार, १४ जून, २०२६

केदारनाथ-भाग-६

पायी चालत, दमून-भागून, आदल्या रात्री आम्ही केदारनाथला पोचलो होतो. रात्री झोपताना माझे अंग बर्फासारखे गार पडले होते. केस तर ओलेच होते. झोप लागण्यापूर्वी बराच वेळ मी रजईच्या आत कुडकुडत होते. तेंव्हा मला खरोखर असे वाटले होते की आज रात्रीतूनच माझे काही बरेवाईट होणार! दिवसभर फारसे काही खायलाही मिळालेले नसल्याने पोट रिकामेच होते. पण अतिशय दमणुकीमुळे मला झोप चांगली लागली. जवळजवळ पहाटे दोन वाजता मी झोपले असले, तरीही सवयीमुळे पहाटे ६.३० वाजता जाग आली. 

कालच्या दिवसभरात आम्ही चौघेही सुमारे साडेसोळा तास चालून केदारनाथला पोहोचलो होतो. स्मार्टवॉचवरचे रेकॉर्ड बघितले तर एकूण ३२.५३ किलोमीटर अंतर पार केलेले दिसत होते. दमणुकीमुळे काल मी अगदीच अर्धमेल्या अवस्थेत होते. बाकीचे तिघे त्या मानाने ठीक होते. मी रात्री कुठलीही pain killer गोळी न घेताच झोपले होते. तरीही सकाळी उठताना, हालचाल करताना, पाय किंवा अंग फारसे दुखत नव्हते. मुख्य म्हणजे मी जिवंत आहे, हालचाल करू शकते आहे या जाणिवेमुळेच मला समाधान वाटले! 

दात घासून सर्वप्रथम मी चहाच्या शोधात तळमजल्यावर गेले. तिथे हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये सगळेजण प्रचंड लगबगीत होते. पेशंट्सची तोबा गर्दी होती. त्या गोंधळातही एका नर्सने माझ्या हातात चहाचा कप आणून दिला. बिनदुधाचा, गोडमचूळ आणि थंड झालेला चहा मला मुळीच आवडला नाही. चहा व नाष्टा दुसऱ्या मजल्यावरच्या डायनिंग हॉलमधे सकाळी ८.३० वाजताच मिळेल ही मोलाची माहिती घेऊन मी खोलीवर परतले. आम्ही दोघेही तयार होऊन डायनिंग हॉलवर नाष्टा करायला गेलो. कुणाल व अविनाश हे दोन नर्सिंग कोर्सचे विद्यार्थी आमच्याही आधी डायनिंग हॉलमधे येऊन नाष्ट्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा झाल्या. नाष्ट्याला गरम फुलके आणि बटाट्याची भाजी होती. त्याबरोबर छान, गरम, पण भरपूर गोडमिट्ट चहा होता. जवळपास ३६ तासांनंतर गरम आणि पोटभरीचे खाणे मिळाल्यामुळे आम्ही दोघांनी अगदी भरपेट खाल्ले. तेथील शिरस्त्याप्रमाणे नाश्ता झाल्यानंतर आपापली ताटे घासून ठेवली.

केदारनाथसारख्या दुर्गम ठिकाणी गेल्या वर्षीपर्यंत फक्त एक छोटेखानी, बैठा दवाखाना होता. परंतु, आताचे हे नवीन, पक्के बांधकाम असलेले हॉस्पिटल खूपच मोठे आणि अद्ययावत आहे. या धर्मादाय हॉस्पिटलचे उद्घाटन याच वर्षी ८ मे रोजी झालेले आहे. तळमजल्यावर औषधालय किंवा फार्मसी, एक छोटी लॅब, ओपीडी, एक लहान operation theater (मायनर ओटी), एक्सरे रूम, आयसीयू, जनरल वॉर्ड, आणि वेटिंग रूम आहे. बाहेरून आल्या-आल्या समोरच फार्मसी आहे. तिथे गोळ्या-औषधांचे वितरण होते. फार्मसीच्या डावीकडच्या दारातून आत गेले की OPD, इमर्जन्सी किंवा कॅजुअल्टी,  त्याच्या बाजूला मायनर ओटी, सगळ्यात मागच्या बाजूला ICU, जनरल वॉर्ड, आणि लॅबोरेटरी अशी रचना आहे. हॉस्पिटलच्या आवारात सगळीकडे सीसी टीव्ही लावलेले आहेत. फार्मसीच्या आतमध्ये मागील बाजूस एक कॉन्फरन्स रूमही आहे. तिथेच सीसी टीव्हीचा स्क्रीन बसवलेला आहे. फार्मसीच्या पलीकडे एक भली मोठी वेटिंग रूम आहे. तिथे अनेक यात्रेकरू विसावा घेत असतात. त्यापलीकडे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. 

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सर्व वैद्यकीय स्टाफला राहण्याची व्यवस्था केलेली होती. खोल्या मोठ्या होत्या व त्यामध्ये गरज व सोयीनुसार पलंग आणि बंक बेड ठेवलेले होते. एकेका खोलीत चार ते पाच शिकाऊ पुरुष किंवा स्त्री नर्सेस, अशी राहायची व्यवस्था होती. सेवाज्येष्ठतेनुसार एका खोलीत एक किंवा फारतर दोन डॉक्टर्स राहतात. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकघर व भोजनालय आणि त्याच्या मागच्या बाजूला मोठी गच्ची होती. भोजनालयाच्या बरोबर खाली, पहिल्या मजल्यावर एक मोठे मोकळे दालन होते, जिथे सध्यातरी बांधकामाचे उर्वरित साहित्य ठेवलेले होते. आमच्या खोल्यांच्या सर्व बाजूंनी मोठा व्हरांडा होता. या व्हरांड्याला काचेची तावदाने असल्याने व्हरांड्यातून बाहेरचा यात्रेकरूंची ये-जा असलेला वाहता रस्ता दिसत होता. व्हरांड्याच्या एका कोपऱ्यातून आम्हाला केदारनाथ देवळाच्या शिखराचे दर्शन होत होते. आमच्याच हॉस्पिटलचे दोन बूथ्स केदारनाथच्या देवळाच्या अगदी जवळ आहेत, अशीही माहिती मला मिळाली. एक बूथ देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि एक देवळाच्या मागच्या दाराजवळ होता. तिथेही मोफत तपासणी आणि औषधे देण्याची सोय होती.  

मी बरोबर ८.४५ वाजता तळमजल्यावर ड्यूटीसाठी पोहचले. तिथे OPD मधे प्रचंड गडबड होती. किमान चाळीसएक रूग्णांची रांग लागलेली होती. प्रत्येक व्यक्ती आपला नंबर आधी लागावा यासाठी धडपडत होती. प्रत्येक रूग्णाबरोबर दोन-तीन नातेवाईकही आत घुसून आपापल्या रुग्णाला लवकर तपासावे यासाठी गडबड करत होते. सगळा नर्सिंग स्टाफ पेशंट्सना तपासून औषधांसाठी फार्मसीमधे पाठवत होता. एका बाजूला एका ओळीत काही रूग्णांना खुर्चीवर बसवून मास्कने ऑक्सिजन देणे सुरू होते. तिथेच एका बाजूला असलेल्या ५-६ Casualty beds वर काही अत्यवस्थ रुग्णांना ठेवलेले होते. त्यातल्या तिघांना तातडीने हेलिकॉप्टरने खाली पाठवायची गरज होती. त्यासाठी हेलिकॉप्टरचे बुकिंग करणे, त्यांच्यासोबत जाण्यासाठी State Disaster Response Force (SDRF) आणि National Disaster Response Force (NDRF) च्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेणे, हेलिपॅडपर्यंत पेशंटला घेऊन जाताना वाटेत ऑक्सिजन देत राहण्यासाठी भरलेला ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवणे, तो नेण्यासाठी पिठ्ठूवाल्याला सज्ज राहायला सांगणे अशी सर्व कामे करण्यात काही नर्सेस व हॉस्पिटलचे व्यवस्थापक, श्री. धनवीर व श्री. रोहन हे व्यग्र होते. हे सगळे होत असतानाच, पेशंटचे वैद्यकीय कागदपत्र तयार करणे, पेशंटचे आधार कार्ड, फोन नंबर घेणे, श्रीनगर (गढवाल) किंवा AIIMS ऋषिकेश यापैकी ज्या हॉस्पिटलमधे पेशंटला पाठवायचे आहे, तिथे संपर्क करून त्यांना पेशंटबाबत आगाऊ माहिती देणे, अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू होती. ती सगळी लगबग बघून मी क्षणभर  चक्रावून गेले. 

पेशंटला हेलिपॅडपर्यंत न्यायला SDRF किंवा NDRF चे चार जवान येतात. पेशंटला उचलून स्ट्रेचरवर ठेवले जाते व पेशंटच्या नातेवाईकाच्या हातात पेशंटचे कागद आणि सलाईनची बाटली/infusion pump दिला जातो. पिठठूवाल्याच्या पाठीवर oxygen सिलिंडर ठेवतात. मग एक पेशंट, एक नातेवाईक, एक पिठठूवाला आणि चार जवान अशी  सात जणांची वरात पेशंटला घेऊन हेलिपॅडकडे रवाना होते. अशावेळी पाऊस, बर्फ पडत असले तर पेशंटचे आणि नातेवाईकांचे मानसिक आणि शारीरिक हाल बघवत नाहीत. आपल्या पेशंटला हेलीकॉप्टरने खाली नेले तरी तिथल्या वैद्यकीय सेवा कशा असतील याची मनात धाकधूक, तिथे पैसे किती मोजावे लागतील याचा अंदाज नाही आणि इतकं करूनही आपलं माणूस जगेल का नाही याची शाश्वती नाही, अशा अनिश्चिततेच्या मनस्थितीत पेशंटचे नातेवाईक असतात. त्यांना धीर देऊन रवाना करण्याव्यतिरिक्त काहीच करता येत नाही. 

माझ्या ड्यूटीच्या पहिल्याच सकाळी माझ्यासमोर तीन पेशंट्सना हेलिकॉप्टरने खाली पाठवले गेले. त्यातला एकजण High Altitude Pulmonary Oedema (HAPO म्हणजे फुफ्फुसात पाणी होऊन त्यावर सूज येणे) चा पेशंट होता. त्या अत्यवस्थ रुग्णावर माझ्यासमोरच उपचार झाले होते. त्याच्या श्वसनाचा वेग, हृदयाची गती आणि बाहेरून oxygen लावून का होईना, पण रक्तातील Oxygen Saturation या सर्वांमधे प्राथमिक उपचारांनंतर लक्षणीय सुधारणा झालेली मला दिसून आली होती. त्यामुळे त्याचा जीव नक्की वाचेल अशी आशा माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. पुढील उपचारासाठी त्याला ऋषिकेश येथील AIIMS मधे हलवणार होते. अशा रूग्णाच्या नातेवाईकांना तेथून निघण्यापूर्वीच्या काळात अभिप्राय लिहिण्याची विनंती करण्यात येते. HAPO झालेल्या त्या तरूण रूग्णाच्या भावाने सद्गदित होऊन साश्रूनयनांनी माझ्यासमोरच अभिप्राय लिहिला. "माझा भाऊ बरा होईल ना?" असे रडवेल्या आवाजात त्याने मला विचारले. मी त्याला धीर देऊन पाठवून दिले. घोड्यावरून पडून हात आणि पाय फ्रॅक्चर झालेल्या एका मध्यमवयीन बाईला प्लास्टर घालून ठेवलेले होते. ती वेदनेने कळवळत होती. एक वृद्ध रूग्ण हृदयरोगग्रस्त होता. त्या दोघांनाही यथावकाश  खाली पाठवले गेले. केदारनाथच्या हॉस्पिटलमधे पोर्टेबल एक्सरेची देखील सोय आहे. दिल्ली येथील 'यथार्थ हॉस्पिटल' मधला अत्यंत उत्तम प्रकारे प्रशिक्षित झालेला स्टाफ केदारनाथच्या या हॉस्पिटलात सध्या कार्यरत आहे. सलाईन लावणे, पटापट एक्सरे काढणे, प्लॅस्टर घालणे अशी आणि इतरही अनेक कामे हे सर्व स्त्री व पुरूष नर्सेस अगदी सफाईने करतात. 

हेलिकॉप्टरने खाली पाठवून द्यायच्या पेशंटची गडबड एकदाची संपली. त्यानंतर मी तिथले मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुशील यादव यांच्यापाशी गेले. माझे नाव, मेडिकल डिग्री, मी कुठून आले आहे इत्यादि ओळख सांगितली. मी इथे काय काम करायचे आहे? किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत  कामावर यायचे आहे हे सगळे ते मला सांगतील अशी माझी अपेक्षा होती. पण तसे काहीच झाले नाही. त्यामुळे परत त्यांच्याजवळ जाऊन, "मी नेमकी काय-काय कामे करायची आहेत? किती ते किती माझी ड्युटी असेल?" असे विचारले. त्यावर त्यांनी,"मॅडम यहां कामही काम हैं. आपको जो करना है वो करिये. अगर बच्चे पेशंट्स आते हैं तो उनको आपही देखिये. माझ्यासारख्या सिनियर डॉक्टरला काम कसे सांगायचे, असे कदाचित त्यांना वाटले असेल, असे मी समजले. त्यानंतर फक्त पाच-दहा मिनिटे मी ओपीडीत काय काम चालू आहे, याचे निरीक्षण केले आणि तिथेच बसून येणारे सर्व पेशंट तपासायचे, असा निर्णय मी घेतला. 

खरंतर माझी विश्रांती पूर्ण झाली नव्हती. थोडा वेळ काम करून वर येऊन झोपावे असे ठरवून मी खाली कामाला गेले होते. पण तिथल्या कामाचे प्रचंड लोड व मेडिकल स्टाफ यामधले व्यस्त प्रमाण आणि एकंदर सर्व गडबड बघता, मी विचार बदलला. पेशंट आल्यावर त्याला कोणी बघायचे, त्याने औषधे कुठून घ्यायची, पेशंटसाठी काय-काय औषधे आणि इतर उपचार उपलब्ध आहेत, हे सगळे तिथल्या नर्सेसकडून पटकन समजून घेतले आणि मी झटून कामाला लागले. हे सगळे होईपर्यंत १० वाजले होते. हरिद्वारपासून आमच्याबरोबरच चालत वरपर्यंत आलेले हर्ष आणि अजय हे दोन नवशिके डॉक्टर्स OPD त नुकतेच पोहोचले होते. ते दोघेही डॉ. सुशील यादव यांना जाऊन भेटले. हर्षची ड्यूटी देवळाजवळच्या बूथवर आणि अजयची ड्यूटी हॉस्पिटलच्याच ओपीडीत लावली गेली. इथे कसे काम करायचे याचा अंदाज तोपर्यंत मला आलेला होता. त्यामुळे मी अजयला पटापट काम समजावून दिले आणि आम्ही दोघेही भराभर पेशंट्स बघायला लागलो. दीड वाजेपर्यंत वेळ कसा गेला ते समजलेच नाही. त्यानंतर मी जेवायला वर गेले आणि जेवण झाल्यावर लगेच परत खाली येऊन संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत काम केले. आमच्याबरोबर हैदराबादहून डॉ. सुभाषिनी नावाच्या एक सर्जन बाई असणार आहेत असे आदल्या दिवशीच मला कळलेले होते. पण डॉ. सुभाषिनी त्या दिवशी कामाला आलीच नाही.

आमचे आदल्या दिवशी वापरलेले कपडे आनंदने वॉशिंग मशीनला लावून दुपारपर्यंत धुऊन घेतले होते. जेवण झाल्यावर तो खोलीतच थांबला होता. पण मला लक्षात आले की या हॉस्पिटलात अफाट काम आहे आणि ते अतिशय शिस्तबद्धतेने, तत्परतेने, व निःस्वार्थ भावनेने, 'निःशुल्क सेवा' याच स्वरूपात केले जात आहे. या सर्व कामाची व सोयी-सुविधांची माहिती सर्व भारतीयांसमोर यायला हवी असे मला प्रकर्षाने वाटले. ती माहिती, अत्यंत प्रभावी व्हिडिओज् बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम, आनंद निश्चितच करू  शकेल, अशी माझी खात्री होती. स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचे प्रमुख, डॉ. अनुज सिंघल यांना लगेच मेसेज पाठवून मी त्यांची परवानगी घेतली. त्याशिवाय, दुसरेही एक काम आनंदला करणे सहजी शक्य होते, ते म्हणजे OPD रजिस्टर लिहिणे. ते लिहिण्यासाठी एक नर्सिंग स्टाफ उगाचच अडकून राहिला होता. आनंदने ते काम तासभर केले. काहीतरी योगदान देता आल्यामुळे त्यालाही बरे वाटले. पण त्याला खूपच दमणूक व अंगदुखी जाणवत होती.  त्यामुळे तासाभरानंतर  तो खोलीत जाऊन झोपला.

साडेसात वाजता खोलीवर येऊन मी तासभर विश्रांती घेतली आणि मग आम्ही जेवायला गेलो. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात शिरा होता. शिरा साजूक तुपात केलेला होता आणि फार गोड नव्हता. त्यामुळे खायला बरा वाटला. दोन्हीवेळच्या जेवणात शिरा, बटाट्याची भाजी, भात, गरम फुलके व घट्ट डाळ  होती. 
जेवण झाल्यावर मात्र मी रात्री ९-९.१५ च्या सुमारास गाढ झोपी गेले.

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट 

शनिवार, १३ जून, २०२६

केदारनाथ-भाग-५

आनंदची आणि माझी ताटातूट झाल्यानंतर या प्रचंड गर्दीमध्ये आपण किती एकटे आहोत याची मला जाणीव झाली. माझ्याकडे फोन नसल्याने आनंदशी संपर्क कसा साधायचा हा प्रश्नच होता. जवळ पाणी नव्हते, आणि बाटली विकत घ्यायला पैसेही नव्हते.  त्यामुळे तहानेने जीव व्याकुळ झालेला होता. तरीही त्या अवस्थेत मी चालत पुढे निघाले. हळूहळू चढत जात असताना, प्रत्येक वळणावर वाटेत थांबून, एखाद्या बाईला विनंती करून, मी तिच्या फोनवरून कधी आनंदच्या तर कधी माझ्या स्वतःच्या फोनवर फोन करून बघत होते. फोनवर रिंग जात होती पण पलीकडून फोन उचलला जात नव्हता. त्या परिस्थितीतही एक मजेशीर विचार मनात आला. 'केदारनाथच्या वाटेवर बायकोपासून कायमची सुटका', असे म्हणत आनंद खुश झाला असावा! 

अनेक वेळा फोन करून झाल्यावरही आनंदने फोन उचलला नाही. त्यामुळे आता मला थोडी काळजीच वाटायला लागली होती. असेच एका तरूण मुलीचा फोन मी वापरला आणि परत केला. त्यानंतर त्या मुलीने मला सुनावले, "आँटी, आप तो पढी-लिखी लगती हैं. ऐसी जगह भीडभाडमें आते है तो कमसेकम अपना फोन, थोडे पैसे और अपनी पानीकी बॉटल तो अपने पास रखना चाहिये ना? इतनी समझदारी तो होनी चाहिये." हे तिचे बोलणे ऐकून मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. कारण या तिन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. पण ते हिला कसे कळले? असेही वाटून गेले. कसनुसा चेहरा करून, "चुकलंच गं बाई माझं" असं म्हणत मी पुढे चालू लागले. शेवटी मी बरीच पुढे गेल्यावर आनंद कुठूनसा मला शोधत, माझ्या मागून आला आणि मी हुश्श म्हणाले. आनंदला बघून मला बरे वाटले असले तरीही मी त्याच्यावर तोंडसुख घ्यायची संधी चुकवली नाही. त्यामुळे अर्थातच तिथे आमचे दोघांचे चांगलेच वाजले, हे सांगायला नकोच!
आम्ही तसेच चालत पुढे निघालो आणि जंगलचट्टीपर्यंत पोहोचलो. अजय व हर्ष कुठेतरी गायबच होते.  त्यामुळे आम्हाला आमच्या पाण्याच्या बाटल्या अजूनही उपलब्ध नव्हत्या. तहानेने व्याकूळ झाल्यामुळे आणि आमच्या भांडणामुळे तापलेले माझे डोके थंड करण्यासाठी, जंगलचट्टीला एके ठिकाणी थांबून मी लिंबू सरबत प्यायले.  या संपूर्ण रस्त्यावर सगळ्या गोष्टी कमालीच्या महाग विकतात. नळाच्या पाण्यातले लिंबू सरबत ५० रूपयांना होते. तर तेच बिसलेरीच्या पाण्यात केले की १०० रूपयाला होते. आनंदला माझ्या ग्लासमधले  सरबत प्यायचा मी  आग्रह केला, पण तो चिडलेला असल्याने त्याने सरबत प्यायला नकार दिला. माझे सरबत पिऊन होईपर्यंत हर्ष आणि अजय मागून कुठूनतरी उगवले. त्या तरूण मुलांना आमच्याबरोबर हळूहळू चालणे म्हणजे एकप्रकारे शिक्षाच वाटत असावी. त्यामुळे ते मधे-मधे थांबत, फोटो-बिटो काढत, खात-पीत असे निवांत येत होते. आमच्या भांडणानंतर मात्र पुढे अगदी शेवटपर्यंत आनंद माझ्याबरोबर चालत राहिला. आम्ही चढत होतो, मला खूप दम लागत होता, चालताना छातीत खूप धडधडत होते. स्मार्ट वॉचमधे कधीकधी हार्ट रेट मिनिटाला १६० च्या वर जात होता. असे झाले की मी ठिकठिकाणी थांबत होते. आनंद सहजी चालत होता आणि हर्ष व अजय तर लीलया चालत होते. 

रामबाराचा पूल पार करायला दुपारचे पाच वाजून गेले होते. आता जरा उन्हाची तीव्रता कमी झाली होती. अजून बरेच अंतर चालायचे होते. भीमबलीला आम्ही सहाच्या नंतरच  पोहोचलो असू. रस्ता संपायची काहीही चिन्हे दिसत नव्हती. वाटेवरच्या अंतर दाखवणाऱ्या पाट्या अतिशय विचित्र आहेत. समजा, एके ठिकाणी 'केदारनाथ १० किलोमीटर' असे लिहिलेली पाटी असेल तर बरेच चालून गेल्यानंतर पुढची पाटी, 'केदारनाथ ११ किलोमीटर' अशी दिसायची. त्यामुळे आपल्याला अजून किती चालायचे आहे, याबाबतची अनिश्चितता खूप त्रासदायक वाटत होती. सहा वाजेपर्यंत आकाशामधे सतत हेलिकॉप्टरची ये-जा चालू होती. हेलिकॉप्टरने न येता आपण चढून जायचे कुठून ठरवले असे मला झाले होते. सहा वाजल्यानंतर हेलिकॉप्टर्सचे आवाजही बंद झाले.

सूर्य मावळल्यानंतर हळूहळू अंधार पडायला लागला. त्यानंतर मात्र माझा धीर सुटत चालला होता. मला अतोनात दमणूक जाणवत होती. आपण हॉस्पिटलमध्ये सेवा द्यायला चाललो आहोत, आणि या ट्रेकिंगच्या दमणुकीमुळे आपण काम तर करू शकणार नाहीच आणि कदाचित आपलीच सेवा तिथल्या लोकांना करत बसावी लागेल असे सतत वाटत होते. अनेकदा घोड्यावर, पिठ्ठूवर किंवा डोलीमधून जायची इच्छा होत होती. वाटेत त्यापैकी अनेक लोकांनी आम्हाला थांबवून, "घोडा लेना है क्या? उपर तक पिठठू में चलना है क्या? हम मंदिर तक छोड दें क्या?" असे विचारले की, आपण घोड्यावर बसून किंवा आरामात डोली किंवा पिठ्ठूमधे बसून जावे,  असा विचार मनांत यायचा. पण अशी चौकशी मी सुरु केली की प्रत्येक वेळेस आनंद मला धीर देत होता, "तू चालत जाण्याचा निर्धार केला आहेस ना? मग आता धीर सोडू नकोस. आपण हळूहळू चालू, पण चालतच जाऊ या" ते शब्द ऐकून मी पुन्हा धीर एकवटून चालू लागायचे. मी मनाशी ठरवत होते की सलग शंभर पावले मोजून होईपर्यंत थांबायचे नाही. पण जेमतेम  चाळीस-पन्नास पावले झाली की मला थांबावे लागायचे. 

भीमबली ते लिंचोली हा प्रवास खूपच कष्टाचा झाला. तिथले खडे रस्ते बघून अनेक ठिकाणी पोटात गोळा उठत होता. दिवसभरात कुठेही फारसे काहीही खाल्लेले नव्हते. त्यामुळे भूकही लागली होती. पण एकाही ठिकाणी खाण्यास योग्य, स्वच्छ असे अन्न दिसत नव्हते. त्यामुळे मग चहा आणि एखादे नमकीनचे पाकीट, असे खात-पीत आम्ही निघालो होतो. वाटेत पाणी आणि स्वच्छतागृहाची नीटशी सोय नाही. पाण्याची १० रूपयांची बाटली सगळीकडे सर्रास १०० रूपयांना विकत होते. तरी आम्ही ती विकत घेत होतो. कितीतरी वेळा बाटली संपली आणि जवळपास दुकानही नसले तर नाईलाजानेच का होईना,पण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नळाचे पाणीदेखील आम्ही पीत होतो. साधारण सात वाजेपर्यंत आम्ही खूप दमून गेलो. शेवटी एका पिठ्ठूवाल्याला पकडून त्याच्याजवळ आमच्या पाठीवरचे बॅकपॅक्स काढून दिले आणि ते सामान वरपर्यंत नेण्यासाठी १५०० रूपयांची बोली झाली.

पाठीवरचे सामान कमी झाले तरीही माझा चालण्याचा वेग काही वाढत नव्हता. तसेच पाय ओढत-ओढत आणि हृदयाची धडधड ऐकत मी चढत होते. आम्हाला पोहोचायला रात्रीचे १० वाजून जातील असे वाटायला लागले. त्यामुळे आम्ही त्या पिठ्ठूवाल्याला फोन करून, आमचे सामान केदारनाथच्या स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमधे ठेवायला सांगितले. हॉस्पिटलमधील श्री. धनवीर या व्यवस्थापकांना फोन करून, "पिठ्ठूवाल्याकडून सामान ठेवून घेऊन त्याला १५०० रुपये द्या, आम्ही पोचल्यावर तुमचे पैसे तुम्हाला देतो." असे सांगितले. रस्त्यावरील सर्वच हॉटेल्समधील अस्वच्छता बघून वाटेत काहीही खाण्याची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे, मी श्री. धनवीर यांना विनंती केली होती की, आम्हा चौघांसाठी रात्री पोहोचल्यानंतर काहीतरी खायला-प्यायला ठेवा. पण, "रात्री दहा वाजल्यानंतर स्वयंपाकघर बंद होते. त्यामुळे इथे काहीही खायला मिळू शकणार नाही, वाटेतच काहीतरी खाऊन या." असे उत्तर मिळाले. 

लिंचोलीच्या पुढील रस्ता तर अतिशय चढणीचा होता. दर १५-२० पावलांना दम घ्यायला थांबावे लागत होते. एकच सुख होते की रात्र झालेली असल्याने हवा थंड झालेली होती आणि आमचे नशीब चांगले असल्याने पाऊस पडत नव्हता. हवा थंड झाल्यामुळे मी आणि आनंदने आपापली गरम जॅकेट अंगावर चढवली होती. वाटेतल्या ओढ्यांमधून ठिकठिकाणी पाण्याचे बर्फ झालेले दिसत होते. काही ठिकाणी ते रस्त्यावरही वाहून आलेले होते. आता अंधारून आल्यामुळे खालून वर येणाऱ्या प्रवाशांचा ओघ जरा कमी झाला होता. त्यामुळे मागून येणारी खेचरांची आणि डोलीवाल्यांची वर्दळही जराशी कमी झाली होती. पण आता केदारनाथहून खाली उतरणाऱ्या खेचरांचा फार त्रास होत होता. अंगावर स्वारी नसलेली खेचरे उतरणीवरून मोकाट उधळत खाली येत होती. दर पावलागणिक आनंद त्या खेचरांच्या मालकांना ओरडत होता, तसेच त्याच्या हातातील काठी उगारून खेचरं आमच्यापासून दूर हाकत होता. 

चढताना अधूनमधून अनेक शॉर्टकट्स दिसत होते. काही सहप्रवासी तरुण-तरुणी ते शॉर्टकट्स  घेतही होते. आमच्याबरोबर हर्ष आणि अजय चालत होतेच. ते दोघे गेल्याच वर्षी केदारनाथला चालत येऊन गेलेले असल्याने, त्यांना बरेच शॉर्टकट्स माहिती होते. एखादा खड्या चढाचा शॉर्टकट घेतला की, कमी चढणीचा पण बऱ्याच लांब पल्ल्याचा वळणा-वळणांचा रस्ता वाचायचा. पण शॉर्टकट घेणे म्हणजे खडी चढण चढण्याचा त्रास होताच. त्यामुळे काही शॉर्टकट्स आम्ही घेत होतो आणि काही सोडत होतो. प्रत्येक उंचवट्यावर आणि वळणावर माझा धीर सुटत होता. हर्ष आणि अजय मला सतत सांगत होते, "मॅडम, आता ही चढण चढून गेलो की सगळा सपाटच रस्ता आहे", किंवा "आता आपण अगदी जवळ आलो आहोत. आता उतरणीलाच लागणार आहोत" असे सांगत-सांगत मला धीर देणे चालू होते. आनंदही तीच भाषा बोलत होता. मला धीर देण्यासाठी तिघेही संगनमताने मला फसवत आहेत असे मला जाणवत राहिले. 

चालता चालता रात्रीचे बारा वाजून गेले, तरीही केदारनाथच्या बेसकॅम्पजवळही आम्ही पोहोचलो नव्हतो. चन्द्रप्रकाशात लोकांची ये-जा चालूच होती. आता आमच्याबरोबर चढणारे आणि समोरून उतरत येणारे यात्रेकरू विरळ होत चालले होते. संध्याकाळ झाल्यानंतरच अनेकांनी अर्ध्या वाटेत खेचर, डोली अथवा पिठठू करून केदारनाथ गाठायचा निर्णय घेतला होता. काहीजण मधेच कुठेतरी तंबूमध्ये मुक्कामाला थांबले असावेत. केदारनाथाचे दर्शन घेऊन येणारे काही यात्रेकरू रात्रीच खाली उतरून परतीच्या वाटेला लागले होते. त्यांना मी मोठ्या आशेने विचारत होते, "आता अजून किती अंतर राहिले आहे हो?" कोणी सांगायचे, "आता अगदी जवळ आहे", तर कोणी म्हणत होते "अजून खूप लांब आहे". त्यामुळे सगळीच माहिती मला फसवी वाटत होती. 

शेवटी रात्री साडेबाराच्या सुमारास आम्ही 'घोडापडाव' येथे, म्हणजे जिथपर्यंत घोड्यांना किंवा खेचरांना जायची परवानगी आहे, तिथपर्यंत पोहोचलो. "आता काय, इथून हॉस्पिटल जेमतेम २०० ते ३०० मीटरवर आहे." अशी खात्रीशीर माहिती हर्ष आणि अजयने दिली. त्या दोघा तरुण मुलांना साहजिकच खूप भूक लागलेली होती. त्यामुळे, ते दोघे एका  हॉटेलमध्ये जेवायला थांबले. आम्हा दोघांना मात्र आता काही खाण्याची इच्छा उरली नव्हती. त्यामुळे मी आणि आनंद तसेच पुढे चालत निघालो. हळूहळू हॉस्पिटलची दुमजली इमारत दृष्टीपथात आली. रात्री १ च्या सुमारास आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. रात्रपाळीवरील फार्मसिस्टने आमचे स्वागत केले व आमचे बॅकपॅक्स आम्हाला दिले. तिथल्या कर्मचाऱ्याने आम्हाला  वरच्या मजल्यावरील  आमची खोली उघडून दिली. मोठी व स्वच्छ खोली, आतल्याआत अटॅच्ड बाथरूम, गरम पाण्याचा गीझर, खोली उबदार ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक वॉर्मर, छानसे पलंग आणि प्रत्येकी दोन-दोन रजया बघून आम्ही सुखावलो. खोलीमधे स्टीलचा रिकामा जग आणि एक स्टीलचा ग्लास होता. आम्हा दोघांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने पायात घालायला स्लीपर्स आणून दिल्या. एका फ्लास्कमधे गरम पाणीही आणून दिले.   

आम्ही खोलीतील वॉर्मर सुरु केला आणि अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी गीझरही चालू केला. मोठ्या उत्साहाने मी अगदी छान गरम पाण्याने डोक्यावरून अंघोळ केली. पण अंग पुसायला पंचाच नाही हे नंतर लक्षात आले. जी एक पातळसर ओढणी ओली करून डोक्यावर घेऊन दिवसभर उन्हामधे मी चालले होते, त्याच ओढणीने जेमतेम अंग आणि केस कोरडे केले. बाथरूममधून कुडकुडतच बाहेर आले आणि रजईत शिरून, कदाचित काही क्षणातच गाढ झोपी गेले. 

[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.

शुक्रवार, १२ जून, २०२६

केदारनाथ-भाग-४

आज पहाटे ३ वाजता आम्हाला नारायणकोटीहून सोनप्रयागकडे जायचे होते. पहाटे २ वाजताच्या गजराच्या आवाजानेच जाग आली. डोळे चुरचुरत असले तरीही उठून तयार होणे आवश्यक होते. आमच्या खोलीमधे पाणी गरम करायला किटली, चहा-कॉफी, साखरेची आणि मिल्क पावडरची पाकिटे होती. पटकन चहा केला. त्यानंतर प्रातर्विधी व अंघोळ उरकून दोघेही ३ वाजायच्या आत तयार झालो. खूप जड असे ट्रेकिंग शूज घातल्यामुळे पायात जणू बेड्या किंवा साखळदंड घातल्यासारखे वाटत होते. 

आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडायला नारायणकोटीच्या हॉस्पिटलचीच गाडी येणार होती.  पहाटे ३ वाजायला पाच मिनिटे कमी असताना, गाडीच्या चालकाचा फोन आला. आम्ही तयारच होतो. पण डॉ. हर्ष आणि डॉ. अजय अजून तयार होत आहेत अशी माहिती त्या चालकाकडूनच समजली. त्यामुळे मग, "त्यांना घेऊनच आमच्याकडे ये", असे आम्ही चालकाला सांगितले. त्या दोघांना घेऊन गाडी सव्वातीन वाजेपर्यंत आमच्याकडे आली. पाठीवर घ्यायच्या बॅकपॅक्स आम्ही गाडीत ठेवल्या आणि स्थानापन्न झालो. 

हरिद्वारच्या हॉस्पिटलमधील व्यवस्थापक, श्री. ध्वजपालजींनी आम्हाला प्रत्येकाला गळ्यात अडकवायचा बिल्ला दिला होता. "केदारनाथला जाताना तो गळ्यात अडकवून जा, तो बिल्ला दाखवलात की पोलीस तुम्हाला कुठेही अडवणार नाहीत आणि कुठल्याही रांगेत उभे राहावे लागणार नाही," असे त्यांनी सांगितले होते. तसेच "कुठल्याही परिस्थितीत बिल्ला कुठे विसरू नका, हरवू नका आणि हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे परत आलात की तो आमच्याकडे जमा करा," असेही त्यांनी बजावून सांगितले होते. गाडीत बसल्यावर गळ्यात तो बिल्ला घालण्यासाठी मी बॅकपॅकमधे शोधायला लागले. पण ऐनवेळेस तो बिल्ला काही मिळेना. खरंतर मी तो लगेच सापडावा म्हणून माझ्या बॅकपॅकमधे बाहेरच्या बाजूलाच ठेवला होता असे मला आठवत होते. आम्ही  दोघांनीही आपापले बॅकपॅक्स उघडून, सगळे सामान काढून बघितले. तरीही तो बिल्ला कुठे मिळेना. मी अगदी हवालदिल झाले. पुन्हा खोलीत परत गेले आणि तिथेही शोधाशोध केली. तरी तो बिल्ला काही मिळाला नाही. मी अक्षरशः रडवेली झाले होते. तेवढ्यात हर्षचा फोन आला. त्याला गाडीतच तो बिल्ला खाली पडलेला मिळाला आहे हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला.

बिल्ला शोधाशोध प्रकरणात आमची पंधरा मिनिटे मात्र वाया गेली. शेवटी पहाटे साडेतीन वाजता आम्ही नारायणकोटीहून जेमतेम २४ किलोमीटरवर असलेल्या सोनप्रयागकडे निघालो. सोनप्रयागहून शटल गाडीत बसून गौरीकुंडपर्यंत जायचे होते व त्यानंतर पुढे प्रत्यक्ष ट्रेकिंगला सुरूवात करायची होती. आम्ही नारायणकोटीहून निघाल्यापासून वाटेत अक्षरशः पावलोपावली वाहतूक कोंडी लागत होती. कित्येक वेळा असे झाले की, एका जागी थांबलेल्या गाडीत आम्ही नुसतेच बसून ट्रॅफिक हलायची वाट पाहत असायचो. गाडी अगदी मुंगीच्या पावलाने पुढे जात होती. गाडीमध्ये आमच्या गप्पा चालूच होत्या. मी तिथेच बसून नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशनचा फॉर्म भरला. तिथे आम्ही गाडीत बसलेलो असतानाच हर्ष आणि अजय MBBSची परीक्षा  उत्तीर्ण झाल्याचे मेसेजेस त्यांना आले. त्यामुळे ते दोघेही खूप आनंदात होते. आम्हीही त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर थोडावेळ त्यांचे कोणकोण मित्र आणि मैत्रिणी उत्तीर्ण झाल्या आहेत, कोणकोण मागे राहिले आहेत, ही चर्चा फोनवर चालू होती. ती ऐकताना माझे मनही आमच्या कॉलेजच्या दिवसांमधे फिरून आले!  

पुढचे सुमारे पाच तास आम्ही गाडीत बसून होतो. तेवढ्या काळात जेमतेम १२-१४ किलोमीटरचा पल्ला गाठलेला असल्याने आम्ही पार वैतागून गेलो होतो. सोनप्रयागला पोहोचायला अजून किती वेळ लागेल काहीच सांगता येत नव्हते. गूगल मॅप पुढचा सगळा रस्ता, प्रचंड वाहतूक कोंडीचा, म्हणजे लाल रंगात दाखवत होता. तसेच त्या गाडीच्या चालकाला, आम्हाला सोडल्यानंतर नारायणकोटीला परतून कुणालातरी हरिद्वारला घेऊन जायचे होते. बराच उशीर होत असल्याने तोही सतत कुरकूर करत होता. आमच्या आसपासच्या गाड्यांमधून आमच्यासारखेच अडकलेल्या अनेक लोकांनी खाली उतरून पुढे चालायला सुरुवात केल्याचे आम्हाला दिसत होते. शेवटी आम्हीसुध्दा तोच निर्णय घेतला. सीतापूरच्या अलीकडेच आम्ही गाडी सोडून दिली आणि चालायला सुरुवात केली. 

सीतापूरपासून सोनप्रयागच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. त्या दुकानांमधून गरम कपडे, शाली, रेनकोट्स, टोप्या, छत्र्या, काठ्या, बूट आणि बुटावर चढवायला रबरी आवरणे अशा अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. काहीजण रस्त्याच्या कडेला बसून या वस्तू विकतात.  अनेक फिरते विक्रेते पाणी, चहा आणि इतर वस्तू विकत असतात. या मार्गावर जसजसे आपण वर-वर चढत जातो, तसतशी प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाते. आमच्याबरोबर, संपूर्ण भारतभरातून आलेले अनेक आबालवृद्ध  चालत होते. प्रत्येकाच्या हातात आधारासाठी किमान एकेक काठी होती. काहीजण तर दोन्ही हातात काठ्या घेऊन चालले होते. आमच्यासारख्या काही शहरी  लोकांनी पायात ट्रेकिंग शूज  घातले होते. पण बरेचजण साधे बूट, चपला घालून चालले होते. काहीजण तर अनवाणी चालत होते. बरेचसे शहरी लोक आणि विशेषतः तरूण-तरूणी जणू एखाद्या पिकनिकला चाललोय अशा अविर्भावात मजा करत चालत होते. खाणे-पिणे, फोटो काढणे, व्हिडीओ शूट करणे, आणि एकमेकांची चेष्टा करण्यात ते मश्गूल होते. सोनप्रयागला पोहोचेपर्यंत रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागलेली दिसत होती. त्यातून आणि लोकांच्या घोळक्यामधून वाट काढत आम्ही सावकाश पुढे चालत होतो. 

सोनप्रयागला पोहोचल्यावर हुश्श झाले. आता पुढील पाच किलोमीटर शटल गाडीत बसून गौरीकुंडला पोहोचायचे होते. सोनप्रयाग गाव सोडल्यानंतर, पुढे एक लोखंडी पूल लागला. तो ओलांडून डावीकडे गेल्यावर तिथे गौरीकुंडला जाणाऱ्या शटलगाड्यांचा थांबा आहे असे कळले. कमालीच्या गर्दीतून वाट काढत, आम्ही त्या शटलच्या थांब्यापर्यंत पोहोचलो. पण तिथली झुंबड बघूनच आम्ही हबकलो. शेकडो लोक तिथे आमच्या आधी येऊन थांबलेले होते. एखादी गाडी वरून खाली येऊन, त्यातले लोक बाहेर पडेपर्यंत, ती गाडी वर जाणाऱ्या यात्रेकरूंनी भरली जात होती. शटल म्हणजे टेम्पो ट्रॅक्स गाड्या होत्या व प्रत्येक गाडीमधे १२-१५ माणसे, अक्षरशः कोंबून भरली जात होती. "आम्ही डॉक्टर्स आहोत, आम्हाला ड्यूटीवर पोहोचायचे आहे, आम्हाला जरा लवकर  शटलमधे बसवून द्या," असे एका पोलीसाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्याने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्या तोबा गर्दीत त्यालाही फारसे काही करता येण्यासारखे नव्हते हेही खरेच. इथे शटलसाठी थांबून राहण्यात आणि अजून वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतरदेखील चालतच पार करायचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही उलटे लोखंडी पुलाकडे मागे फिरलो. हर्ष आणि अजयने तिथे वर जाणारा एक खड्या चढणीचा शॉर्टकट आम्हाला दाखवला. ती खडी चढण बघून माझ्या पोटात गोळाच उठला होता. पण अजय म्हणाला, "मॅम, आमच्यापैकी एकजण तुमच्या पुढे आणि एकजण तुमच्या मागे राहील. आम्ही बरोबर तुम्हाला घेऊन जाऊ. या शॉर्टकटमुळे आपले जवळपास एक किलोमीटर अंतर कमी होणार आहे." शेवटी माझ्या मनांत नसतानाही मी हिम्मत करून ती चढण चढू लागले. गौरीकुंडपर्यंत जायच्या आतच, ही पहिली खडी चढण यशस्वीरित्या चढल्यामुळे माझाही आत्मविश्वास थोडासा वाढला. 

अजय आणि हर्षच्या मते आम्ही दोघांनी पाठीवर वजन न उचलता, आमचे बॅकपॅक्स त्यांच्याजवळ द्यायला हवे होते. पण आम्ही दोघांनीही तसे करायला ठाम नकार दिला. आमच्या पाठीवरचे वजन कमी व्हावे म्हणून मग त्यांनी मागच्यामागे आमच्या बॅकपॅक्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. त्या एका बाटलीचे वजन कमी झाल्यानेही मला खूप बरे वाटले. त्यानंतर त्यांनी आमच्या बॅकपॅकमधील रेनकोटही काढून, त्यांच्या बॅकपॅक्समध्ये ठेवले. ही दोन तरूण मुले आम्हा दोघांची आणि विशेषतः माझी खूप काळजी घेत होती. मला चढायला त्रास वाटला तर हात देत होती. त्यामुळे मला त्यांचा खूपच आधार वाटत होता. आम्ही या प्रवासाला निघण्याआधी चालण्याचा भरपूर सराव केलेला असला तरीही, तो सराव किती अपुरा होता हे गौरीकुंडला पोहोचेपर्यंतच माझ्या लक्षात आले. 

सोनप्रयाग ते गौरीकुंडपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड झुंबड होती. आमच्यासारखेच चालत गौरीकुंडापर्यंत जायचा निर्णय घेतलेले अनेकजण होते. पण प्रवाश्यांनी खच्चून भरलेल्या शटल गाड्याही त्याच घाटाच्या रस्त्यावरून ये-जा करीत होत्या. त्यामुळे त्यांना वाट करून देताना आमची खूपच त्रेधा उडत होती. कसेबसे आम्ही गौरीकुंडापर्यंत पोचलो. तिथून प्रत्यक्ष केदारनाथपर्यंतचा पायी रस्ता सुरु झाला. 

आम्हाला वाटले होते की त्या पायवाटेवर शटल गाड्यांचा त्रास नसल्याने आमची पुढील वाट जरा तरी सुखकर असेल. पण आमचा लवकरच भ्रमनिरास झाला. अनेक खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले अक्षरशः आमच्या भोवती घोंगावत होते. खरंतर खेचराने यात्रेकरूंना वरपर्यंत नेण्याचा सरकारी दर ठरलेला आहे. पण त्या दरापेक्षा जास्त पैशामधे गिर्‍हाईक पटवणे आणि जमल्यास दिवसभरात दोन-तीन खेपा करून जास्तीतजास्त पैसे कमावणे, हा यांचा उद्देश असतो. चारधाम यात्रेचे हे पाच-सहा महिने यांचे कमाईचे दिवस असतात. नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमधून अनेक ठिकाणांहून आपापली खेचरे घेऊन हे सर्व वयांचे खेचरवाले इथे येतात. त्याचप्रमाणे डोली आणि पिठ्ठू उचलणारे तगडे तरूणही येतात. 'पिठ्ठू' म्हणजे त्या हमालाच्या पाठीवर बांधलेली एक खुर्ची असते. या खुर्चीमधे एक व्यक्ती किंवा काही सामान बसू शकते. या पिठ्ठूमधे शक्यतो लहान मुलांना किंवा कमी वजनाच्या यात्रेकरूंना बसवून वर नेतात. त्या-त्या व्यक्तीच्या वजनाच्या प्रमाणात किती दर आकारायचा हे सरकारने ठरवून दिलेले आहे. भरभक्कम वजनाच्या स्री-पुरूषांना घोडा करायचा नसल्यास त्यांच्यासाठी 'डोली'मधून जायचा पर्यायही उपलब्ध असतो. ही 'डोली' म्हणजे प्रत्यक्षात पूर्वीच्या काळी असायची तशी 'पालखी' किंवा 'मेणा' म्हणावा असाच असला तरी, त्याला वर छत मात्र नसते. ही डोली चार तरुण उचलून नेतात. तसे पाहता, खेचर काय, पिठ्ठू काय किंवा डोली काय, यापैकी कुठलाच पर्याय निर्धोकही नाही आणि सुखाचाही नाही. कारण हे खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले लोक खूप धसमुसळेपणा करतात. अनेकदा पिठ्ठूमधून किंवा खेचरावरून यात्रेकरू पडतात आणि त्यांना जबर दुखापत होते. त्या मानाने डोलीतून जाणे जरा तरी सुरक्षित असते. खेचरवाले अतिशय वेगाने खेचरं हाकत नेतात. त्यामुळे कित्येकदा चालणाऱ्या वाटसरूंना धक्का लागून मुकामार लागणे, खोक पडणे, याबरोबरच काहीवेळा अगदी फ्रॅक्चर किंवा जीवघेण्या दुखापतीही होतात. यात्रेकरुंपैकी कोणालाच सहसा घोड्यावर बसायची सवय नसते. इथे असलेली खेचरे अगदीच मरतुकडी आणि कुपोषित असतात. त्यांच्यावर ठेवलेल्या खोगीरांना चांगले, गुबगुबीत असे कुशनही नसते. त्यामुळे ढुंगणाच्या खालच्या भागाला आणि मांड्यांच्या आतल्या बाजूला घासून-घासून अनेकांना त्रास होतो. घोड्यावर किंवा खेचरावर बसताना नेहमीच मांड घट्ट ठेवून, रिकिबीत पाय व्यवस्थित रोवून बसावे लागते. इथे मात्र अनेकांचे पाय रिकीबीतून बाहेर लटकत असतात आणि त्या बाहेर लटकणाऱ्या पायांना सहजी इजा, फ्रॅक्चर्स होतात. एकूण काय, तर खेचरे, डोली आणि पिठ्ठू हे तिन्ही पर्याय, ते वापरणाऱ्यांसाठीच नव्हे तर पायी चालेल्या इतर लोकांसाठीही त्रासदायकच असतात. 

अरुंद रस्ता, कमालीची गर्दी, खेचरे, पिठ्ठूवाले आणि डोलीवाल्यांची धक्काबुक्की, वाटेवर पडलेली खेचरांची लीद, त्या लिदीची आणि मूत्राची दुर्गंधी, या सगळ्यामुळे हा प्रवास आम्हाला अतिशय क्लेशदायक होत होता. वाटेत कुठेही स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल याची खात्री नव्हती, स्वच्छतागृहे अगदीच तुरळक आणि अत्यंत गलिच्छ होती. स्वच्छ, पोटभरीचे व खात्रीशीर ताजे खाण्याचे पदार्थ कुठेही उपलब्ध नव्हते. लहान-लहान चण्या-शेंगदाण्याची, वेफर्स-चिवड्याची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या तेवढ्या मिळत होत्या पण या सर्वच वस्तूंचे भाव 'एमआरपी' च्या किमान दुप्पट लावले जात होते! 

अशा अवस्थेत आम्ही चालत होतो. एकूण २१-२२ किलोमीटर चढणीचा रस्ता चढत जाणे म्हणजे दिव्यच होते. मी ४५ वर्षांपूर्वी केदारनाथला आले होते, तेंव्हाचा रस्ता तसा अरुंद पण केवळ चौदा किलोमीटरचाच होता. २०१३ सालच्या प्रलयामध्ये तो रस्ता जागोजागी वाहून गेलेला होता. त्यामुळे सध्या जो रस्ता आहे तो जरा रुंद असला तरीही अधिक लांबीचा आहे. आताच्या मानाने पूर्वी यात्रेकरुंची संख्याही बरीच कमी होती. तरीही त्यावेळचा रस्ता सध्याच्या रस्त्यापेक्षा बराच अरुंद असल्याने, माझ्या आठवणीप्रमाणे त्या रस्त्यावरही आजच्यासारखीच गर्दी त्यावेळी आम्हाला जाणवली होती. त्या काळी हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध नसल्यामुळे खेचरे, पिठठू आणि डोलीवाल्यांची गर्दीही आजच्यापेक्षा जास्तच जाणवत होती असे मला आठवते. पण पंचेचाळीस वर्षांनंतरही या मार्गावर अधिक चांगल्या सोयी-सुविधा, आणि स्वच्छता नसावी याचे मला फार वाईट वाटले.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी कदाचित सगळ्यात जुन्या, आणि सगळ्यात दुर्गम जागी असलेल्या या सुंदर देवस्थानाच्या रस्त्यावर चालणाऱ्या यात्रेकरूंची आजही अशी दुरवस्था असावी हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. वर पायी चढत जायचे या निर्धारानेच आम्ही या प्रवासाला आलो होतो. पण इथली गर्दी, गैरसोयी, आणि घाण बघून मात्र आम्ही ठरवले की परतताना हेलिकॉप्टरनेच खाली उतरायचे. 

आम्ही पहाटे साडेतीनला आमची नारायणकोटीची खोली सोडली होती. त्यानंतर जवळपास पाच तासांनंतर, सकाळी ८.३० वाजता आम्ही चालायला सुरूवात केली. गौरीकुंडला पोहोचेपर्यंत जवळपास ११.३० वाजले होते. आम्ही दोघेही घामेघूम झालो होतो.  गौरीकुंड म्हणजे प्रत्यक्षात एक कुंडच आहे, ज्यामध्ये लोक स्नानही करतात. पण  ते बघायला थांबण्याची इच्छा आम्हाला झाली नाही. सतत चालत राहून,  दिवसाउजेडी केदारनाथला पोहोचावे अशी आमची इच्छा होती. आम्ही चढत असताना पाऊस मात्र आला नाही हे आमचे नशीबच म्हणायचे. पण कडाक्याचे ऊन पडले असल्याने मला चालणे कष्टदायक वाटत होते. लांब बाह्यांचे, सुती, पण एकावर एक असे तीन-चार कपडे मी अंगावर घातले होते. वरून एक गरम जॅकेटही होते. भर उन्हात चालताना अतिशय उकडायला लागले. त्यामुळे मी एकेक कपडे काढून कंबरेला गुंडाळणे सुरू केले. तरीही उकडणे कमी होईना. म्हणून मग माझ्याकडे बॅकपॅकमधे असलेली, बांधणीची पातळ ओढणी ओली करून डोक्यावर घेऊन मी चालू लागले. माझ्या लक्षात आले की मला खूप तहानही लागली होती. पण पाण्याच्या बाटल्या हर्ष आणि अजयजवळ होत्या आणि ती दोघेही मुले कुठे जवळपास दिसेनात. त्यामुळे आम्ही तसेच चालत पुढे निघालो.

गौरीकुंडला पोहोचेपर्यंत कुठेही वापरण्याजोगे, सार्वजनिक स्वच्छतागृह दिसेना. त्यामुळे काय करावे असा मला प्रश्न पडला होता. शेवटी रस्त्याच्या कडेच्या एका हॉटेलमध्ये  शिरले. तिथल्या मालकीणबाईला बऱ्याच विनवण्या केल्यानंतर तिला माझी दया  आली असावी. तिने आतल्या बाजूला असलेले स्वछतागृह वापरण्याची परवानगी दिली. तिथे जायच्या आधी, कुठे पडू नये म्हणून, माझा फोन मी आनंदजवळ दिला होता. आम्ही दोघे त्या हॉटेलमधून  बाहेर पडलो. मागून डोलीवाले आरडाओरडा करत येत होते. त्यांना चुकवायला आनंद डावीकडे सरकला आणि मी रस्त्याच्या उजवीकडे राहिले. मी आनंदला 'थांब-थांब' अशा हाका मारत असताना आनंद माझ्या डोळ्यासमोर गर्दीत दिसेनासा झाला. आता माझ्याकडे फोन नाही, पैसे नाहीत, जवळ प्यायला पाणी नाही आणि अजय आणि हर्ष या दोघांचाही कुठे पत्ता नाही, अशा अवस्थेत मी एकटीच चालत पुढे निघाले. 

[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.