बुधवार, २४ जून, २०२६

केदारनाथ- भाग- १६

काल रात्री मी उशिरा झोपले होते आणि झोपेतसुद्धा जरा अस्वस्थच होते. पहाटे चार वाजताचा गजर लावलेला होता. गजर वाजायच्या आधीच पाचएक मिनिटे सुभाषिनी आमच्या खोलीच्या दारावर टकटक करून आम्हाला जागे करून गेली. आम्ही उठून तयारीला लागलो. सुभाषिनीने दिलेली मिल्क पावडर गरम पाण्यामधे घालून, मी दूध तयार केले आणि आम्ही दोघांनीही प्यायले. आम्ही तयार व्हायच्या आधीच सुभाषिनी तयार झाली होती. ती खाली उतरून एखादा पिठठूवाला ठरवून ठेवणार होती. आम्हा तिघांचे सामान हेलिपॅडपर्यंत वाहून नेण्यासाठी पिठठूवाल्याची गरज लागणार होती. आनंदला मी आधी खाली हॉस्पिटलमधे जाऊन त्याच्या इंजेक्शनचा डोस घ्यायला सांगितले. त्यानंतर त्याच्या हाताच्या शिरेमधली intracath सुईदेखील काढून घेणे आवश्यक होते. 



काल मला  संस्थेमार्फत दिले गेलेले स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू आमच्या बॅकपॅक्समध्ये बसवणे, हे कामही बाकी होतेच. ते करून आनंदच्या पाठोपाठ मीही दोघांचे बॅकपॅक्स घेऊन खाली उतरले. तोपर्यंत सुभाषिनीने एका पिठठूवाल्याशी बोलणे करून ठेवले होते. सुभाषिनीचा बॅकपॅक भलामोठा होता. त्या मानाने, आम्हा दोघांचे बॅकपॅक्स छोटे होते. ते तिन्ही पॅक्स सुभाषिनीने ठरवलेल्या त्या पिठठूवाल्याच्या पिठठूमध्ये आम्ही ठेवले आणि निघायला तयार झालो. सुभाषिनी आधीच पायी चालत पुढे गेली होती.   

आमच्या सुदैवाने पहाटे पाऊस किंवा बर्फ पडत नव्हते. तसा माझ्याकडे नर्स कृष्णाचा रेनकोट अजूनही होता. मी तो रेनकोट माझ्याकडेच ठेवून घ्यावा, म्हणजे पहाटे पाऊस असेल तर उपयोगी पडेल, असे त्याने मला आवर्जून सांगितले होते. इतक्या थोड्या दिवसांचा सहवास असूनही सहकाऱ्यांकडून इतके प्रेम आम्हाला मिळत होते, हे बघून आम्हा दोघांनाही खूप बरे वाटत होते. पण पाऊस किंवा बर्फ पडत नसल्याचे पाहून मी नर्स कृष्णाचा रेनकोट रात्रपाळीच्या परवेझ नर्सकडे दिला आणि तो आठवणीने कृष्णाला द्यायला सांगितले. आमच्या खोलीची किल्ली मी फार्मसिस्टकडे सुपूर्द केली. भल्या पहाटे आम्हाला इलेक्ट्रिकची गाडी मिळणे शक्य नसल्याने, मी आणि आनंद हेलिपॅडकडे चालत जायला निघालो.  आम्हाला निरोप द्यायला हॉस्पिटलमधील रात्रपाळीचा सगळा स्टाफ बाहेर व्हरांड्यात आला होता. मोठ्या जड मनाने आणि साश्रुनयनांनी आम्ही सर्वांचा निरोप घेतला.  

आमचे सामान वाहून नेणाऱ्या पिठठूवाल्याच्या बरोबरच आम्ही चालावे आणि त्याला नजरेच्या टप्प्यातून दूर होऊ देऊ नये, असा मोलाचा सल्ला मला हॉस्पिटलमधील नर्सेसनी दिलेला होता. पिठठूवाला जरा वयस्कर असल्याने तो हळूहळूच चालत होता. तरीही त्याच्याबरोबर चालणे मला जरा अवघड जात होते. आनंद तर माझ्यापेक्षाही हळू चालत होता. त्यामुळे त्याला मागे सोडून पुढे जायलाही नको वाटत होते. पण आनंदने मला सांगितले, "तू त्याच्याबरोबर पुढे हो, मी हळूहळू मागून येतो आणि हेलिपॅडपर्यंत पोहोचतो". 

मी आणि पिठठूवाला हेलिपॅडपर्यंत पोहोचलो तर तिथे सुभाषिनी अतिशय हवालदिल अवस्थेत उभी होती. हेलिपॅडवर चार वेगवेळ्या तंबूंमधे चार हेलिकॉप्टर कंपन्यांची तात्पुरती ऑफिसेस होती. आम्ही ज्या 'एरो एव्हिएशन' कंपनीच्या हेलिकॉप्टरने जाणार होतो, त्या कंपनीच्या माणसाने सुभाषिनीला निक्षून सांगितले होते, "आज आम्ही फक्त काल जाऊ न शकलेल्या यात्रेकरूंना नेणार आहोत. त्यामुळे आज तुम्हाला जाता येणारच नाही". 

सहा वाजेपर्यंत आनंदही हेलिपॅडपर्यंत पोहोचला. हेलिपॅडसमोर एका शेडखाली काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. कालपासून आपापल्या हेलिकॉप्टरच्या फेरीची वाट बघत असलेल्या अनेक यात्रेकरुंची गर्दी तिथे उसळलेली होती. आनंदला मी सगळी परिस्थिती थोडक्यात सांगितली. कशीबशी एक खुर्ची पकडून त्याला आधी तिथे बसवले आणि आमचे सगळे सामान त्याच्याजवळ ठेवले. मी आणि सुभाषिनी आमच्या हेलिकॉप्टर कंपनीच्या त्या तंबूवजा "ऑफिस" मधे ठिय्याच देऊन  बसलो. 

ऑफिसमधला तो मनुष्य दर १५-२० मिनिटांनी हेलिपॅडवर जाऊन प्रवाश्यांना "चेक-इन" करून येत होता. त्याच्याकडे असलेल्या एका वहीमधे लिहिलेल्या नावांपैकी पुढची चार-सहा नावे तो पुकारत होता आणि त्या लोकांना हेलिपॅडकडे पाठवत होता. प्रत्येकवेळी तो आला की आम्ही त्याला आमच्या तिकिटाबद्दल विचारत होतो. त्यावर तो अतिशय तुच्छतेने आम्हाला उडवून लावत होता, "माताजी आप यहाँ आजके दिन रुकनेका  इंतजाम करो. आज तो आप पक्का नहीं जा सकते."

सकाळचे साडेआठ वाजेपर्यंत आमच्या जाण्याबाबत काहीही होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. संदीपजी, धनवीरजी आणि रोहनजी यांना फोन आणि मेसेजेस करून-करून सुभाषिनी थकली होती. पण त्यांच्यापैकी कोणीच उत्तरे देत नव्हते. शेवटी पावणेनऊ वाजायच्या सुमारास संदीपजींनी सुभाषिनीच्या फोनवर मेसेज पाठवला की, कोणी कुलदीप नामक मनुष्य येईल आणि आम्हाला जाण्यासाठी मदत करेल. आमच्या हेलिकॉप्टर कंपनीच्या माणसाला आम्ही विचारले, "भैय्या, कुलदीप कौन है? वो कहां मिलेंगे?" त्यावर त्याने "मैं किसी कुलदीप को जानता नही हूं. आप कृपा करके यहांसे जाईये और मुझे तंग मत करिये." असे निर्वाणीच्या सुरात सांगितले. 

नऊ वाजत आले तरी त्या कोणा कुलदीपचा पत्ताच नव्हता. हळूहळू तिथले हवामानही बदलायला लागले होते. गार वारे सुटले होते आणि थोड्याच वेळात पाऊस सुरु होईल असे वाटायला लागले होते. आनंदला खूप थंडी वाजत होती. जवळ कुठेही चहापाण्याची सोय नव्हती. स्वच्छतागृह कुठेतरी खूप लांब आणि कमालीचे अस्वच्छ होते. आमच्या जाण्याबाबत तर काहीच खबर मिळत नव्हती. अशा अवस्थेत आम्ही हताश होऊन बसून होतो. 

नऊ वाजता काय जादू घडली कळले नाही. अचानक ऑफिसमधील त्या माणसाने येऊन आम्हा तिघांना सांगितले, "हेलिपॅडवर असलेल्या त्या लोखंडी बाकड्यावर जाऊन बसा." आम्ही जवळजवळ धावतच पुढे जाऊन बसलो. एका माणसाने येऊन आमचे प्रत्येकाचे वजन विचारले. ऐंशी किलो वजनापर्यंत एक ठराविक तिकीट, आणि पुढील जास्तीच्या वजनासाठी अधिक दर आकारला जातो, असे सुभाषिनीने आम्हाला सांगितले होते. त्या माणसाने आमच्याकडून तिकिटाचे आणि सामानाचे मिळून १३३२०/- रुपये घेतले पण आमच्या हातात तिकीट वगैरे काहीच दिले नाही. हे पैसे त्याने कुठल्या हिशोबाने घेतले? आम्हाला तिकीट कधी आणि कोण देणार? अशी काही चौकशी किंवा विचार न करता त्याच्याकडे आम्ही तातडीने पैसे देऊन टाकले. 

आमच्यासमोर असलेल्या मोठ्या डांबरी मैदानामधे, एकूण चार हेलिपॅडस होती. दर पाच-सात मिनिटाला तिथे एकेका कंपनीचे एकेक हेलिकॉप्टर येऊन उतरत होते. आलेल्या प्रवाशांना उतरवले आणि जाणाऱ्या प्रवाशांना बसवले की ते लगेच पुन्हा उड्डाण करत होते. हेलिकॉप्टर उतरताना आणि परत हवेमध्ये झेप घेताना, हेलिकॉप्टरच्या गरागरा फिरणाऱ्या पंख्यामुळे गार वाऱ्याचा प्रचंड झोत आमच्या अंगावर येत होता. त्यामुळे आनंदला कमालीची हुडहुडी भरत होती. शेवटी मी माझ्याकडे असलेली ओढणी आनंदच्या नाका-तोंडाला घट्ट बांधली, सुभाषिनीने तिचे गरम हातमोजे स्वतःच्या हातातून काढून आनंदला हातावर चढवायला लावले. तेव्हा कुठे त्याला जरा बरे वाटले. 

आम्ही तिघे आणि अजून तीन प्रवासी असे सहाजण एका हेलिकॉप्टरने जाणार होतो. हेलिकॉप्टर कंपनीच्या माणसाने आम्हाला, हेलिकॉप्टरमध्ये कोणी कुठे बसायचे, आत शिरताना कसे जायचे व उतरल्यानंतर कसे बाहेर पडायचे याबाबतच्या सूचना दिल्या. आता आम्ही अगदी जीव मुठीत धरून, आम्हाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कधी येते, याची आतुरतेने वाट बघत बसलो होतो. शेवटी, सुमारे अर्ध्या तासानंतर आम्हाला सांगण्यात आले, "आता जे हेलिकॉप्टर उतरेल त्या हेलिकॉप्टरमधून तुम्हाला जायचे आहे." 

हेलिकॉप्टर उतरल्या-उतरल्या आम्ही त्याच्या दिशेने अक्षरशः धावत सुटलो. आमचे सामान हेलिकॉप्टर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या  हेलिकॉप्टरमधे ठेवले. आम्ही आत बसल्यानंतर काही क्षणातच आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझा आणि आनंदचा हा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास होता. पण तो प्रवास आणि त्या सुंदर प्रदेशाचे उंचीवरून दिसत असलेले विहंगम दृश्य यापैकी कशाचाही आनंद लुटण्याची आमची मनःस्थिती नव्हती. अखेर आपण घरच्या वाटेला लागलो, अशा विचारामुळे काहीसे बरे वाटत होते इतकेच. 

हरिद्वारपर्यंत पोहोचेस्तोवर आम्हाला अजून अनेक अडचणींचा सामना करायचा होता, पण त्यावेळी आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती. 

त्याबाबत पुढच्या आणि या लेखमालेच्या शेवटच्या भागामध्ये लिहीन. 

[क्रमशः]

डॉ. स्वाती बापट.

मंगळवार, २३ जून, २०२६

केदारनाथ - भाग १५

आम्ही केदारनाथाचे दर्शन घेऊन परत येईपर्यंत आनंदच्या दुपारच्या इंजेक्शनच्या डोसची वेळ झाली होती. रवि नर्सने आनंदला तिथेच वॉर्डमधल्या एका पलंगावर झोपायला सांगितले आणि त्याला शिरेवाटे इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. आनंदचे बूट आणि मोजे पावडसात भिजून ओले झालेले होते. त्यामुळे त्याला थंडी वाजत होती. त्याचे बूट-मोजे मी वर नेऊन ठेवले आणि त्याच्यासाठी आमच्या खोलीतून स्लिपर्स घेऊन आले. त्याचे इंजेक्शन घेऊन झाल्यावर तो खोलीत झोपायला गेला. मी मात्र ओपीडीतच थांबून काम करत बसले. कारण नेहमीप्रमाणे तिथे पेशंट्सची भलीमोठी रांग लागलेलीच होती. 


ह्या सगळ्या गडबडीत, माझ्या हातातली walking stick अचानक मिळेनाशी झाली. मी ती स्टिक हॉस्पिटलपर्यंत आणली होती. त्यानंतर मी ती ओपीडीतच माझ्या खुर्चीजवळ ठेवली होती, हे मला खात्रीशीर आठवत होते. दुर्गेश बुगडे या माझ्या एका ट्रेकर मित्राने आम्हा दोघांना त्याच्याकडच्या walking sticks वापरायला दिल्या होत्या. दुसऱ्याची वस्तू वापरण्यासाठी आणल्यामुळे मी ती जरा जास्तच जपून वापरत होते. पण आता ती हरवल्यामुळे, दुसऱ्याची वस्तू मला सांभाळता आली नाही, अशी अपराधीपणाची भावना माझ्या मनात आली. मग मी श्री. रोहनजींना CCTV फूटेज बघण्याची विनंती केली. त्यातही कुठे ती सहजी दिसेना. त्यामुळे मी अगदी बेचैन झाले. नंतर कुणाच्यातरी असे लक्षात आले की ती स्टिक कुणी यात्रेकरू तिथेच विसरून गेला असेल असे समजून, आमच्याच एका सफाई कामगाराने ती स्टिक बाहेर व्हरांड्यात नेऊन ठेवली होती. पण ती स्टिक मिळाल्याने माझा जीव भांड्यात पडला. 

दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास खूप जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली. केदारनाथला आल्यापासून थोडेसे बर्फ भुरभुरलेले मी पाहिले होते. पण आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मोठी बर्फवृष्टी मी पाहत होते. थोड्याच वेळात जवळपासचे सगळे डोंगर बर्फाच्छादित झाले. पण त्यामुळे अगदी कडाक्याची थंडीही पडली. भिजून कुडकुडत येणाऱ्या अनेक पेशंट्सची नुसती गर्दी उसळली. अनेक म्हातारे-कोतारे, लहान मुले आणि इतर भिजलेले पेशंट्स थंडीने गारठून, कुडकुडत आमच्यासमोर उभे होते. सर्वप्रथम त्यांना आम्ही आमच्याजवळचा वॉर्मर बाहेर काढून दिला. अनेकजण त्या वॉर्मरभोवती शेक घेत बसले. त्या सर्वांची नावनोंदणी करून, सर्वांवर आवश्यक ते उपचारही आम्ही केले. आत आलेले सगळे पेशन्ट्स तपासून झाल्यानंतर मी बाहेर गेले आणि बर्फ पडत असतानाचा एक छोटासा व्हिडिओ काढला. बर्फ पडतानाचे ते दृश्य, मला तेंव्हा कितीही मनोहर भासत असले तरी, सकाळी आम्ही देवदर्शनाला गेलो असताना बर्फ पडले असते तर आमची काय दुर्दशा झाली असती, या कल्पनेने माझ्या अंगावर काटा आला. 

दुपारी मी जेवायला वर गेलेच नव्हते. आनंदही खोलीत झोपूनच होता. चारच्या सुमारास चहा आणि टोस्ट आले. गरम चहा पिऊन माझ्या शरीरात जराशी धुगधुगी आली. साडेचारच्या सुमारास आनंदचा फोन आला. त्याच्या अंगात हुडहुडी भरून त्याला पुन्हा ताप भरतोय असे तो म्हणाला. मी वर जाऊन त्याला तपासले. थर्मामिटरवर १०२ ताप दिसत होता, पण ऑक्सिजन saturation उत्तम होते. मी त्याला क्रोसीनची गोळी दिली, ORSप्यायला दिले आणि पुन्हा खाली ओपीडीमधे येऊन कामाला बसले. बाहेर जोरदार पाऊस पडत असल्याने पुष्कळसे यात्रेकरू कदाचित आडोशाला कुठेकुठे थांबले असावेत. कारण, पेशंट्स आत येण्याचा ओघ आता बराच  कमी झालेला होता. त्यामुळे बराच वेळ तिथे बसून श्री. रोहनजींशी गप्पा झाल्या. त्या गप्पातूनच असे ठरले की, आम्हाला इथे काम करत असताना आलेल्या अनुभावाबद्दल आम्ही अभिप्राय द्यावा. माझा आणि डॉ. सुभाषिनीचा प्रत्येकी एकेक असे दोन व्हिडीओ रेकॉर्ड करावेत. आम्ही दोघीही आनंदाने तयार झालो.   

डॉ. सुभाषिनी म्हणाली आपण व्हिडिओसाठी जरा तयार होऊन येऊ या. मलाही ती कल्पना आवडली. आम्ही दोघी वर आपापल्या खोलीमध्ये येऊन, चेहरा धुवून, केस सारखे करून आणि कपडे बदलून तयार झालो. मी तयार होऊन सुभाषिनीच्या खोलीवर गेले. माझ्या कपाळावर टिकली नसल्याचे बघून सुभाषिनीने मला तिच्याकडची एक मोठी टिकली लावायला दिली. त्या टिकलीच्या खाली तिने कुंकवाने चंद्रकोरही काढली. नटून-थटून आम्ही दोघी व्हिडिओसाठी खाली आलो. श्री. धनवीरजींनी मोहित नेगी या तरूणाला बोलावले. त्याने माझा आणि सुभाषिनीचा एकेक व्हिडिओ शूट केला. त्यानंतर, 'स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन सोसायटी' या संस्थेच्या वतीने, तेथील निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. यादव यांच्या हस्ते माझा आणि सुभाषिनीचा सत्कार करण्यात आला. आम्हाला संस्थेतर्फे एक प्रशस्तिपत्र, एक स्मृतीचिन्ह आणि काहीतरी भेटवस्तूही दिली गेली. 

हे सर्व होईपर्यंत आठ वाजून गेले होते. मी दुपारी जेवलेले नसल्याने मला भूक लागली होती. आनंद जेवायला वर येत नाही म्हणाला. त्यामुळे मी व सुभाषिनी वर भोजनालयामधे येऊन जेवलो. डाळ-कोबीभात, बटाट्याची भाजी, सकाळचा शिरा आणि गरम फुलके असा बेत होता. माझे जेवण झाल्यावर आनंदसाठी डिस्पोझेबल प्लेटमधे जेवण घेऊन मी खाली गेले. त्याला त्रास होतच होता व दमणूकही जाणवत होती. तो बळेबळेच थोडे जेवला. डॉ. सुभाषिनी स्वयंपाकघरातच थांबून आमच्यासाठी छान कडक चहा बनवणार होती. त्यामुळे मी आनंदला जेवण देऊन परत वर गेले आणि चहाचे कप घेऊन खाली आले. सुभाषिनीही तिचा चहाचा कप घेऊन आमच्या खोलीतच आली. तिच्याबरोबर बऱ्याच गप्पा झाल्या. रात्री दहा वाजता रवि नर्सने येऊन आनंदला antibioticचा रात्रीचा डोस दिला. 

अजूनही आमचे दुसऱ्या दिवशीच्या हेलिकॉप्टर फेरीचे तिकीट आमच्या हाती आलेले नव्हते. संस्थेच्या धर्मावाला येथील हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक, श्री. संदीपजींनी आम्हाला इतकेच सांगितले होते की, "उद्या सकाळच्या हेलिकॉप्टर फेरीत तुमच्या जाण्याची व्यवस्था झाली आहे."  पण नेमकी वेळ, कुठल्या कंपनीचे विमान, याबाबत त्यांनी काहीच कल्पना दिलेली नव्हती. डॉ. सुभाषिनीनें हेलिपॅडवरचा सावळा गोंधळ आधीच बघितलेला असल्यामुळे ती जरा जास्तच चिंतेत होती. आज पाऊस आणि बर्फवृष्टी झालेली असल्याने, आज संध्याकाळच्या हेलिकॉप्टर्सच्या अनेक फेऱ्या रद्द झालेल्या असणार, असा आमचा अंदाज होता. त्यामुळे उद्या हेलिकॉप्टर सेवा सुरु झाल्यानंतर, आज अडकून पडलेल्या यात्रेकरूंची खाली उतरण्यासाठी गडबड असणार होती. शिवाय, उद्या सकाळी अकरा वाजल्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस व बर्फवृष्टी होईल असा अंदाज असल्याने, हवामान खात्यातर्फे 'रेड अलर्ट' जारी करण्यात आलेला होता. या सगळ्या गोष्टींचा अंदाज सुभाषिनीला असल्यामुळे तिचे म्हणणे होते की, आम्ही हॉस्पिटलमधून पहाटे पाच वाजताच निघावे, आणि सकाळी सहाच्या आत हेलिपॅडवर पोहोचावे. त्या दृष्टीने आमचे सामान तयार करून ठेवायला तिने आम्हाला सांगितले.

रात्रीपर्यंत आनंदला ताप होताच. त्यामुळे त्याला हेलिपॅडपर्यंत कसे न्यायचे हाही एक प्रश्न मला भेडसावत होता. आमच्या हॉस्पिटलपासून हेलिपॅडपर्यंत जाण्याच्या रस्त्यावर पहिले शंभर मीटर खडी चढण होती. ती चढण चढायला आनंदला त्रास होणार होता. पण आनंद पिठठूवर बसायला तयार होणार नाही याचीही मला खात्री होती. सकाळी निघण्यापूर्वी आनंदचा सकाळचा antibiotic चा डोसही घ्यायचा होता. त्यातही काही वेळ जाणार होताच. हे सगळे वेळेत कसे जमणार, आम्हाला उद्या हेलिकॉप्टर मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न मनात होते. तरीही, सकाळी किती वाजता निघायचे, सामान हेलिकॉप्टरपर्यंत कसे न्यायचे, याचे जुजबी प्लॅनिंग आम्ही तिघांनी बसून केले. रात्री झोपण्यापूर्वी आनंदला दूध प्यायला मिळावे म्हणून सुभाषिनीने खोलीत जाऊन अमूल मिल्क पावडर आणून दिली. रात्री झोपायच्या आधी मी आनंदला  गरम दूध तयार करून प्यायला दिले.  

रात्री उशिरापर्यंत आमचे हेलिकॉप्टर बुकिंग झाल्याचा काहीही निरोप आलेला नव्हता. हरिद्वारहून आमचे परतीच्या विमानाचे  तिकीट एक जूनचे होते. वेळप्रसंगी उद्या, म्हणजे ३० मे ऐवजी आम्हाला ३१ मे रोजी हेलिकॉप्टर फेरी मिळाली तरी चालणार होते. पण डॉ. सुभाषिनीला मात्र ३० तारखेपर्यंत हरिद्वारला पोहोचणे आवश्यक होते. कारण, तेथून तिची हैदराबादची परतीची फ्लाईट ३१ तारखेची होती. त्यामुळे ती भलतीच काळजीत पडली होती. रात्री बराच काळ ती संस्थेचे मुख्य व्यवस्थापक, श्री. संदीपजी यांच्याशी संपर्क ठेवून होती. शेवटी रात्री बऱ्याच उशिरा संदीपजींनी तिला एका व्यक्तीचा नंबर पाठवला. केदारनाथहून आमच्या परतीच्या हेलिकॉप्टर फेरीची व्यवस्था प्रत्यक्षात ज्यांनी करवली होती त्यांचा तो नंबर होता. तिने रात्री अकरा वाजता तो नंबर मलाही पाठवून दिला. उद्या आमचे कसे होणार या काळजीमुळे मला मात्र झोप लागत नव्हती. 

केदारनाथला आल्यापासून, आणि येण्यापूर्वीही अनेकांच्या तोंडी काही ठराविक वाक्ये मी ऐकत आलेले होते. "बाबा स्वयं बुलाते हैं| बाबा की मर्जीसेही सबकुछ होता है| अगर बाबाकी इच्छा होगी तो वे आपको दर्शनके लिये बुलाएंगे| अगर उन की इच्छा न हो तो, कोई यहां उपर पहुंचने के बाद भी उनके दर्शन नहीं कर सकता|" 
ही वाक्ये बोलणाऱ्यांची केदारनाथावरची अपार श्रद्धा मला समजत होती. पण काही अंशी, त्या वाक्यांमधली सत्यतादेखील मी अनुभवली होती. इथपर्यंत येऊनही केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही लोकांना दर्शनाविनाच परत जावे लागले होते. एक डॉक्टर या नात्याने मीच तसा सल्ला अनेकांना दिलाही होता. 

बाबांच्या इच्छेमुळे आमचे दर्शन तर झालेलेच होते. आता त्यांची इच्छा असेल तर आम्ही उद्या सुखरूप खालीही उतरू, असा विचार मनात करत असतानाच रात्री उशिरा केंव्हातरी मला झोप लागून गेली.   

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट.

सोमवार, २२ जून, २०२६

केदारनाथ-भाग १४

आज सकाळी मला साधारण चारच्या सुमाराला जाग आली. आनंद जागाच दिसला. त्याला बिचाऱ्याला रात्रभर झोप आली नव्हती. सतत खोकल्याची उबळ येत होती. झोप न झाल्यामुळे आणि अंगात गेले पाच-सहा दिवस सतत ताप असल्याने तो खूपच वैतागलेला होता. आज एकच गोष्ट चांगली होती, ती म्हणजे त्याला सकाळी ताप नव्हता. काल दिवसा आणि रात्री त्याला झोपही नव्हती. कधी नव्हे ते कालच्या दिवसभरात त्याने अंघोळही केलेली नव्हती कारण तेवढे कष्टही त्याला नको वाटत होते. त्यामुळे आधी त्याने आणि त्याच्यापाठोपाठ मी अशी दोघांनीही पाच वाजायच्या आत  अंघोळ उरकली. 

आम्हाला उद्या सकाळी इथून हेलिकॉप्टरने निघायचे असल्याने आमचे बरेचसे सामान आम्ही कालच खाली पाठवून दिलेले होते. त्यामुळे आज सकाळी लाँड्री करणे आवश्यक होते. आमच्या अंघोळी झाल्यानंतर पाठोपाठ मी वॉशिंग मशीन लावून टाकले. आम्ही ज्या दिवशी आलो होतो, त्याच दिवशी आम्हाला श्री. धनवीरजींनी सांगून ठेवले होते की तुमच्या सोयीने कुठल्याही दिवशी पहाटे पाच वाजता तुम्ही दर्शनाला जा. त्याला कारणही तसेच होते. पहाटे पाच वाजता आमच्या हॉस्पिटलमधे काम करणाऱ्या कोणालाही गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यासाठी विशेष सोय केलेली होती. इतक्या दिवसांत आज प्रथमच आम्ही दोघेही, पाच वाजायच्या आधी अंघोळी करून तयार झालेले होतो. पण आनंदच्या सध्याच्या परिस्थितीत, इतक्या पहाटे आणि कडाक्याच्या थंडीत, दीड किलोमीटर दूर असलेल्या देवळापर्यंत चालत जाऊन दर्शन करण्याचा विचारही आम्ही करू शकत नव्हतो.  

सहा वाजता चहा आणण्यासाठी फ्लास्क घेऊन वर स्वयंपाकघरात गेले. तिथून गरम  चहा आणि दोन प्रकारच्या बिस्किटांचे पुडे घेऊन आले. आनंदला दिवसातून तीन वेळा antibioticचे इंजेक्शन द्यायचे होते. इतक्या पहाटे, रात्रपाळी करून दमलेल्या नर्सेसपैकी कोणालातरी इंजेक्शन द्यायला वर बोलवून घ्यावे असे आम्हाला वाटले नाही. त्यामुळे चहा पिऊन झाल्यावर आम्ही दोघेही खाली वॉर्डमधे गेलो. तिथे नर्सेसनी आनंदला Antibiotics चा डोस दिला व पाठोपाठ त्याच्या छातीचा एक्सरेही काढला. इथे पोर्टेबल एक्सरेची आणि डिजिटल फिल्मची सोय आहे. त्यामुळे लगेच मला तो एक्सरे बघायलाही मिळाला. त्यामधे न्यूमोनिया किंवा इतरही काही दोष न दिसल्यामुळे मला हायसे वाटले. 

जेंव्हा आनंदला शिरेवाटे antibiotic देणे चालू होते आणि अजून त्याचा एक्सरेही व्हायचा होता तोपर्यंत मी थोडा वेळ ओपीडीतले पेशंट्स तपासले. बरीच आजारी असलेली एक-दोन लहान मुले ओपीडीत आली होती. त्यांना तपासून मी औषधोपचार केले. इतक्या सकाळी मी तिथे थांबून काम करतेय हे बघून, आधीच रात्रपाळीचा डॉ. शोभित आश्चर्यचकित झाला होता. त्यातून लहान मुलांना तपासून मी औषधे दिल्यामुळे त्याला खूपच बरे वाटले असावे. कारण, लहान मुलांना औषधे द्यायला बालरोगतज्ज्ञ सोडून इतर डॉक्टर्स जरासे घाबरतात. आम्ही दोघेही पहाटे OPD मधेच असल्यामुळे, डॉ. हर्ष आणि डॉ. अजय गौरीकुंडला पायी निघण्याआधी त्यांची व आमची भेट होऊ शकली. 

आनंदचे इंजेक्शन आणि एक्सरे  झाल्यावर त्याने तिथे आलेल्या NDRF आणि SDRF च्या जवानांशी जरा गप्पा मारल्या. त्यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर आम्ही दोघे खोलीत आलो आणि नेहमीपेक्षा जरा लवकरच  नाश्ता खाण्यासाठी वर भोजनालयात गेलो. पण तिथे अजून झाडलोट चालू होती. म्हणून मी खाली जाऊन वॉशिंग मशीनची स्पिन सायकल संपवून कपडे वाळत घालून आले. तोपर्यंत आनंद वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमधे उभा राहून बाहेरचे फोटो काढत होता. आज नाश्त्याला गरमागरम आलूपराठे व दही होते. मोठमोठाले दणकट आणि चवदार पराठे खायला आम्हा दोघांनाही बरे वाटले. आम्ही नाश्ता करत असताना आमच्याबरोबर नरेंद्र नावाचा नर्सही नाश्ता करायला आला. आमच्या त्याच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. राजस्थानमधील अल्वर गावच्या शेतकरी कुटुंबातील हा मुलगा अतिशय गुणी नर्स आहे. कार्डियाक नर्सिंगमधे तो निपुण आहे. या नर्सेसना इथे कमीतकमी दोन महिने काम करायचे असते. त्यांना बारा तासांची शिफ्ट असते. कुठल्याही शिफ्टमध्ये काम भरपूरच असते. घरापासून दूर, इतक्या थंड वातावरणात, १२-१२ तास अविरत काम करणे, तसे खूपच जिकिरीचे आहे. या मुला-मुलींना, इथे ड्यूटी केल्याबद्दल, नेहमीच्या पगारापेक्षा, जास्तीचे असे केवळ १५०००/- रुपये दरमहा मिळतात. त्या मुला-मुलींचा कामाचा उरक आणि कामाबद्दलची आत्मीयता वाखाणण्याजोगी होती.  

नाष्ट्यानंतर मी खाली ८.३० पर्यंत कामाला आले. आज नेमके पावसाळी हवामान होते. आमचे अजून केदारनाथाचे दर्शन राहिलेच होते. डॉ. सुभाषिनीने सकाळीच मला फोन करून सांगितले होते की तिला आज ओपीडीत यायला उशीर होणार आहे. फोनवरून तिने आनंदच्या तब्येतीची चौकशी केली. आनंदला आज ताप नाहीये हे कळल्यामुळे तिने सुचवले की आम्ही दोघांनी आज सकाळीच दर्शन करायला जावे. ती ओपीडीत आली की लगेच मी आनंदला घेऊन दर्शनासाठी निघून जावे, असे तिने निक्षून सांगितले. १० च्या सुमारास डॉ. सुभाषिनी ओपीडीत आली. ती आल्यावर मात्र तिने मला ओपीडीमधून बाहेर काढले आणि दोघेजण त्वरित दर्शन करून या, असे सांगितले. मी पटापट वर येऊन आनंदला सांगितले की, "आपण आत्ता  दर्शनाला जायचे आहे, तू  जरा लवकर तयार हो."

इथल्या स्थानिक पोलिसांकरवी चालवली जाणारी एक इलेक्ट्रिक कार पेशंट्सना हॉस्पिटलपासून हेलिपॅडपर्यंत नेण्यासाठी वापरली जाते. मी खोलीत येण्याआधी श्री. धनवीरजींना विनंती केली होती की आनंदसाठी इलेक्ट्रिक गाडी मागवून घ्या. त्या गाडीसाठी त्यांनी फोनही करून ठेवला होता. आज एक पेशंटही हेलिपॅडपर्यंत जाणारच होता. त्यामुळे त्याच गाडीत आमचीही सोय होऊ शकणार होती. त्या कारमधून निदान काही अंतर तरी आम्हाला जाता येणार होते. देवळाचे गर्भगृह दुपारी १२ वाजता बंद होते, असेही आम्हाला रोहनजींनी सांगितले होते. त्यामुळे, काहीही करून आम्हाला १२ वाजायच्या आत 'स्पर्शदर्शना'साठी देवळामध्ये पोहोचणे आवश्यक होते.  

आनंदला तयार व्हायला सांगून मी खाली उतरले. त्याला बिचाऱ्याला उठवतही नव्हते. पण त्यालाही केदारनाथाचे देऊळ बघायचेच होते. त्यामुळे तो कसाबसा दोन स्वेटर्स अंगावर चढवून तयार झाला. आमचे सामान आम्ही खाली नारायणकोटीला पाठवून दिलेले असल्याने, आमचे रेनकोट्स आता आमच्याकडे नव्हते. डॉ. सुभाषिनीने आणि कृष्णा नर्सने, तत्परतेने आपापल्या खोलीमधे जाऊन त्यांचे रेनकोट आणून आम्हा दोघांना दिले. आनंदने खाली येताना बरोबर फ्लास्कमधे गरम पाणी भरून आणले होते. आम्हा दोघांच्या walking sticks पण आणल्या होत्या. मात्र तो पैसे बरोबर आणायचे विसरला होता. तसेच त्याच्या डोक्यावर कानटोपीही नव्हती. त्याची कानटोपी नेमकी धुवायला गेलेली होती. मग मी पुन्हा वर जाऊन पैसे घेऊन आले. OPD मधे कोणा एका पेशंटची बरेच दिवसापूर्वी विसरलेली एक लोकरी कानटोपी मिळाल्यामुळे ती आनंदला घालायला दिली. हे सगळे होईपर्यंत सव्वा अकरा वाजून गेले. आम्ही इथे आल्यापासून नऊ दिवसांनी आज प्रथमच हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. इलेक्ट्रिक कारने आम्हाला मंदिराच्या अलीकडे सुमारे ५०० मीटरवर असलेल्या हेलिपॅडपर्यंत सोडले. त्यानंतर पुढे आमचे आम्हाला चालतच जायचे होते.

दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांची लांबचलांब रांग मंदिरापासून हेलीपॅडपर्यंत आलेली दिसत होती. बारीकसा पाऊसही सुरु झाला होता. सगळीकडे चिखल, पाण्याची डबकी आणि निसरडे झालेले होते. आमच्या हॉस्पिटलचाच एक बूथ देवळाच्या मागील दरवाज्यापाशी लावलेला होता. त्या बूथवर काम करणाऱ्या, कुणाल नावाच्या एका नर्सिंग स्टुडंटने आम्हाला त्या बूथवर यायला सांगितले होते. एक मोठा पूल येईपर्यंत देवळात जाणाऱ्यांची आणि देवळातून बाहेर पडणाऱ्यांची वाट एकच होती. त्यामुळे त्या पुलावर कमालीची चेंगराचेंगरी होती. त्यातून कशीबशी वाट काढत, आम्ही हळूहळू पुढे गेलो. पुलावरून बाहेर पडल्यावर मात्र मंदिराकडे जाण्याचा व परतीचा मार्ग वेगवेगळा होता. तिथून उजव्या हाताला असलेल्या पायऱ्या चढून, एका मोठ्या आकाराचे ॐ अक्षर असलेल्या चिन्हापर्यंत येऊन, पुढे मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या आमच्या हॉस्पिटलच्या बूथपर्यंत आम्ही पोहोचलो. 

बूथवर गेल्यावर आमचा बॅकपॅक मी उतरवून ठेवला. कुणालबरोबर काम करणारा, राम नावाचा दुसरा एक नर्सिंग स्टुडंट आम्हाला त्याच्यासोबत घेऊन निघाला. त्याच्यामागून तिथल्या तुफान गर्दीतून वाट काढत आम्ही पुढे निघालो. कुणालजवळ बसलेल्या एका पोलिसाने माहिती पुरवली, "आता तुम्हाला उशीर झाला आहे, गर्भगृह बरोबर बारा वाजता बंद होईल आणि पुढचे दोन तास बंद राहील. तोपर्यंत तुम्हाला काही दर्शन मिळणार नाही". हे ऐकून माझा खूप विरस झाला. बारा वाजायला काही मिनिटेच बाकी होती. देवळामधून बाहेर पडणाऱ्या त्या गर्दीच्या लोंढ्यातून वाट काढणे आम्हाला काही केल्या जमेना. तिथे बरीच चेंगराचेंगरी होत होती आणि गर्दी हटवण्यासाठी पोलीस लाठ्या मारत होते. स्वतःपेक्षाही मला आनंदची काळजी वाटत होती. त्याच्या हाताच्या शिरेमधे Intracathची सुई लावलेली होती. तिथे त्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होईल की काय, ही भिती मला भेडसावत होती. शेवटी कशीबशी गर्दीतून वाट काढत आम्ही मागच्या दारामधून, अगदी बारा वाजायला दोन मिनिटे कमी असताना गर्भगृहात प्रवेश मिळवू शकलो. 

आम्ही आत गेल्यागेल्या देवळाच्या गर्भगृहाकडे जाण्याचे दार बंद झाले. त्यामुळे बाहेरून नवीन कोणीही भाविक आत येऊ शकत नव्हते. पण आधीच आत आलेल्या लोकांची गर्दी आमच्यापुढे होतीच. प्रथम नंदीचे दर्शन घेऊन गर्भगृहात पोहोचलो आणि पिंडरुपी शिळेचे स्पर्शदर्शन घेतले. माझ्या एका मित्राने त्याच्या दिवंगत वडिलांसाठी काही प्रार्थना करायला सांगितली होती. मनोमन ती प्रार्थनाही मी केली. जवळजवळ सर्वच देवस्थानांमध्ये असते तशी कमालीची गर्दी, "विविध प्रकारच्या पूजा करून घ्या" असे म्हणत तिथल्या पुजाऱ्यांचे मागे-मागे लागणे, एकंदर अस्वच्छता आणि ढकलाढकली पाहून मनात चीड आली. आमच्या पुढे असलेल्यांपैकी बरेचसे लोक 'व्हीआयपी दर्शन'वाले होते. अशा धनिक यजमानांची किती आणि कशी लुबाडणूक करता येईल, याची तिथल्या पुजाऱ्यांमधे जणू चढाओढ चालू होती. 

गर्भगृहात गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की आम्ही आणलेले पैसे आमच्या बॅकपॅकमध्येच राहिले होते. त्यावेळी मला 'स्वामी विवेकानंद हॉस्पिटल'चे ब्रीदवाक्य आठवले, "नरसेवा, नारायणसेवा". त्यामुळे मी माझ्या मनाचे समाधान करून घेतले की हॉस्पिटलमधे मी जी नरसेवा केली होती, तीच ईशसेवा मानून केदारनाथ मला आशिर्वाद नक्की देतील! गर्भगृहामध्ये जमिनीवर अनेक नाणी खाली पडलेली दिसली. मी ती खाली पडलेली सगळी नाणी उचलली आणि पिंडीसमोरच्या दानपेटीत टाकली. ते बघून तिथल्या एका पुजाऱ्याने माझ्याकडे पैशासाठी हात पसरले. मी मानेनेच नाही असे म्हटल्यावर त्याने चक्क माझ्या पाठीत धपाटा घातला! मला कमालीचा राग आला. पुढे असेच एका-दोघांनी मला हाताने ढकलल्यावर मी त्यांच्यावर चक्क माझ्या हातातली काठी उगारली. केदारनाथाच्या पवित्र गर्भगृहात आलेले हे कडवट अनुभव खूपच क्लेशदायक होते. 

देवळाच्या मागच्या बाजूला काही पायऱ्या चढून गेल्यावर आम्हाला 'भीमशिळा' दिसली. २०१३ साली मंदाकिनी नदीच्या रौद्र रूपाने झालेल्या प्रलयकाळात ही भीमकाय शिळा प्रवाहाबरोबर वाहत येऊन, बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूस येऊन थांबली होती. त्या शिळेने पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळेच मंदिराचे काहीही नुकसान झालेले नव्हते. प्रत्यक्ष भीमानेच शिळेचे रूप घेऊन केदारनाथाच्या गाभाऱ्याचे रक्षण केले असल्याची भावना श्रद्धाळूंच्या मनात रूढ आहे. भीमशिळेजवळ आम्ही फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर देवळाचा परिसर थोडा हिंडून बघितला व देवळाच्या बाहेरही काही फोटो काढले. त्यानंतर मेडिकल बूथवर येऊन आमची बॅकपॅक कुणाल नर्सकडून घेतली आणि त्याचे आभार मानून परतीच्या वाटेला लागलो.

या सगळ्या काळात जवळजवळ सतत बारीक पाऊस पडत राहिला होता. पण आमच्याकडे दोन रेनकोट्स असल्याने आम्ही भिजलो नाही. "केदारनाथ येथील हॉस्पिटलमधली माझी सेवा पूर्ण करून मगच मी शेवटच्या दिवशी स्पर्शदर्शनाला जाईन." असे इथे येताना मी ठरवूनच आले होते. ती गोष्ट जरी माझ्या मनाप्रमाणे झालेली असली, तरीही आनंदच्या तब्येतीची मला फार काळजी वाटत होती. देवळाच्या आसपासच्या डोंगरांवर यात्रेकरू गेलेले आम्हाला दिसत होते. पण आता आम्हाला मात्र इतरत्र कुठेही जायची इच्छा उरली नव्हती आणि अंगात त्राणही नव्हते. परतीच्या वाटेवर चालताना आनंदला खूप दमायला होत होते. त्याचे पाय दुखत होते आणि त्याला तहानही लागत होती. त्यामुळे त्याला वरचेवर विश्रांतीसाठी थांबावे लागत होते. भाविकांच्या तुडुंब गर्दीतून वाट काढत आणि आमच्या आसपास घोंगावणाऱ्या पिठ्ठूवाले आणि घोडेवाल्यांना बाजूला सारत, आम्ही कसेबसे हॉस्पिटलमधे येऊन पोहोचलो. आनंदने केदारनाथाचे देऊळ पाहावे अशी माझी तीव्र इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण त्याची अशी फरफट झालेली पाहूनही मला फार वाईट वाटले. आम्ही साडेअकराच्या  सुमारास हॉस्पिटलमधून बाहेर पडलो होतो आणि दीड वाजेपर्यंत परत आलो होतो. 

अनंत अडचणींवर मात करून अखेर गर्भगृहापर्यंत वेळेत पोहोचणे आणि स्पर्शदर्शन करणे आमच्या नशिबी लिहिलेले होते तर!

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट. 
 

रविवार, २१ जून, २०२६

केदारनाथ-भाग १३

काल रात्री झोपायला खूप उशीर झाला होता. पण मला खूप गाढ आणि शांत झोप लागली होती. पहाटे ४.३० च्या सुमारास जाग आली त्यावेळी, आनंद जागाच आहे असे मला दिसले. त्याला रात्रभर झोपच लागली नाही असे तो म्हणाला. त्याच्या अंगात अजूनही ताप होता आणि त्याला अशक्तपणामुळे पलंगावरून उठवतही नव्हते. आता मात्र मला त्याची खूपच काळजी वाटायला लागली. पडल्या-पडल्या आम्ही दोघांनी थोडावेळ गप्पा मारल्या आणि परत झोपलो. सकाळी ७.४५ ला मला एकदम खडबडून जाग आली. आज आम्हा दोघाच्या बॅग्स भरून नारायणकोटीला पाठवायच्या होत्या. दोघांच्याही बॅग्स भरण्याचे काम आता मला एकटीलाच करायचे होते. 

त्याआधी आनंदला काहीतरी खायला-प्यायला द्यावे म्हणून मी वर स्वयंपाकघरात गेले. वर नाश्ता तयार होता आणि आज नाश्त्याला ब्रेड पकोडे केलेले होते. ते खायची मला इच्छा नव्हती. आनंदलाही ते फारसे आवडत नाहीत. त्यामुळे तोही नको म्हणणार हे माहिती असूनही मी त्याला फोन करून, "तुझ्यासाठी  ब्रेड पकोडे आणू का?" असे विचारले. माझ्या अंदाजाप्रमाणे तो नाहीच म्हणाला. नाश्त्याबरोबर चहाही तयार होताच. मग, आमच्या फ्लास्कमधे मी चहा भरून आणला. तिथल्या स्वयंपाक्याला सांगून तिथूनच ग्लूकोज बिस्कीटचे दोन पुडे आणि टोस्टचा एक पुडा आणला. मी दोन कप चहा प्यायले आणि टोस्ट खाल्ले. आनंदनेही चहा, टोस्ट आणि ग्लूकोज बिस्किटे खाल्ली. 

"दोघांच्याही बॅग्ज नारायणकोटीला पाठवण्यासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत तयार ठेवा", असे हॉस्पिटलचे व्यवस्थापक, श्री. धनवीरजी यांनी मला सांगितले होते. चहा प्यायल्यानंतर मी बाहेर जाऊन, दोरीवरचे आमचे वाळलेले कपडे काढून आणले. कपड्यांच्या घड्या करून, दोघांच्या बॅग्ज भरून तयार केल्या. डॉ. सुभाषिनी केदारनाथला येताना हेलिकॉप्टरने आली होती. हेलिकॉप्टरमधे जड सामान आणू देत नाहीत, आणि आणलेच तर त्यासाठी बरेच जास्तीचे पैसे भरावे लागतात, ही माहिती तिच्याकडूनच मला कळली होती. त्यामुळे आम्हा दोघांचेही जड ट्रेकिंग शूज आणि इतर बरेचसे जड सामान बॅग्जमधे घालून, दोन्ही बॅग्ज मी बंद केल्या. दोन्ही स्ट्रॉलीज भरून झाल्यावर, मी स्वतःच त्या ओढून-उचलून खाली नेऊन ठेवल्या. 

सामान खाली नेण्यासाठी इथल्या सफाई कामगारांपकी कोणालातरी मी बोलवू शकले असते. पण त्यांना सतत हॉस्पिटल झाडून-पुसून काढण्याचे काम करावे लागते याची मला कल्पना होती. आमच्या खोल्या-बाथरूम्स, भोजनालय, स्वयंपाकघर या सर्व ठिकाणी सतत झाडणे-पुसणे चालू असायचे. तळमजल्यावरची ओपीडीची मोठी खोली दिवसातून कमीतकमी चार-सहा वेळा स्वच्छ केली जाई. म्हणूनच, सफाई कामगारांपैकी कोणाला आमचे सामान उचलायला बोलवावे असे मला वाटले नाही. नारायणकोटीहून आमचे सामान वर आले तेंव्हा आमच्या स्ट्रॉलीज बाहेरून जरा खराबच होऊन आल्या होत्या. त्यामुळे, त्या जाड प्लॅस्टिक बॅग्जमधे किंवा पोत्यांमधे घालून मगच खेचरांवरून खाली पाठवण्याचा सल्ला डॉ. सुभाषिनीने आम्हाला दिला होता. त्यानुसार आम्हा दोघांच्या स्ट्रॉलीज् मी काळ्या जाड गार्बेज बॅग्जमधे बंद केल्या. त्यानंतर त्या  खेचरावरून  खाली वाहून नेणाऱ्या नेहमीच्या लोकांकडे सुपूर्द  केल्या. 

हे सगळे काम संपवून, माझ्या रोजच्या कामाला ओपीडीत जाईपर्यंत सकाळचे ९.३० वाजले होते. आनंदला अजूनही बराच ताप आणि खूप अशक्तपणा होता. ते एक कारण होतेच, पण उशीरा काम सुरू केल्यामुळेही आज कामात माझे नीट लक्ष लागत नव्हते. सकाळी नाश्ताही केलेला नव्हता. बाहेर सतत पाऊस, आणि मधूनमधून बर्फही पडत होतेच. थंडगार, बोचऱ्या वाऱ्यामुळे अंगात शिरशिरी भरत होती. त्यामुळे, ११.३० च्या सुमारास मी चहा मागवून घेतला. चहाबरोबर सुभाषिनीने बिस्किटेही दिली. ती खाण्याची इच्छा मला नव्हती, पण गरम चहामुळे जरा बरे वाटले. 

पाऊस आणि बर्फामुळे भिजलेले, ताप आणि हुडहुडी भरलेले, अशा अनेक पेशंट्सची इथे रीघ लागली होती. भिजलेली आणि कुडकुडणारी लहान मुले बघून त्यांची तर खूपच काळजी वाटत होती. वरकरणी तगडे दिसणारे डोलीवाले, पिठठूवाले आणि खेचरे हाकणारे तरुणही, वरचेवर आमच्याकडे तापाने फणफणलेल्या अवस्थेत येत. त्याना मात्र गोळ्या नको असायच्या. ताप लगेच उतरावा आणि पुन्हा आपल्या पोटापाण्याच्या कामाला लागता यावे, यासाठी त्यांना इंजेक्शनच हवे असे. रोजची कमाई सोडायची इच्छा नसल्याने, इंजेक्शन घेऊन ते तसेच कामाला जात. यातल्या अनेक तरुणांची मूळची तब्येतही फारशी चांगली नव्हती. त्यांच्याकडे पुरेसे गरम कपडे किंवा पावसापासून बचावासाठी रेनकोट्स नसत. अशा दयनीय अवस्थेत, केवळ रोजची कमाई बुडू नये म्हणून ते तसेच कसेबसे काम करत असावेत. एखादा यात्रेकरू खेचरावरून पडणे किंवा चालणाऱ्या प्रवाशांना खेचरांमुळे इजा होणे यासारखे प्रकारही अशा आजारी डोलीवाले, पिठठूवाले, आणि खेचरवाल्यांकडूनच अधिक होत असावेत. या लोकांचे आयुष्य अतिशय खडतर असते. डोलीतून प्रवाशांची ने-आण करताना, आपल्या डोलीला त्यांनी पोर्टेबल म्युझिक प्लेअर लटकवलेले असतात. त्यावर मोठ्या आवाजात, आपापल्या भाषेतली गाणी लावून, त्या गाण्याच्या तालावर मन रमवत, ते पाय उचलत असतात. पण अपुरे अन्न, वस्त्र, निवारा आणि अपार कष्ट यामुळे या लोकांची तब्येत सारखी बिघडते असे माझ्या लक्षात आले. पाऊस सुरु झाला की यांची गर्दी होत असे. 

दुपारी एकच्या सुमारास मी फोनवर आनंदच्या तब्येतीची चौकशी केली. त्याच्या अंगी हुडहुडी भरून ताप चढतो आहे असे त्याने मला सांगितले. त्यामुळे, मी लगेच वर जाऊन त्याचे टेंपरेचर आणि ऑक्सिजन लेव्हल तपासले. त्याला पुन्हा १०१ च्या वर ताप चढलेला होता. पण छाती भरल्याची लक्षणे मात्र नव्हती. तसेच त्याच्या रक्तातली ऑक्सिजन लेव्हलही उत्तमच होती. आनंदला कालपासून Augmentin च्या तीन गोळ्या गेलेल्या होत्या, तरीही त्याचा ताप वाढतच चालला होता. इतक्या उंचीवरच्या आणि अतिशय थंड हवेच्या ठिकाणी, तोंडावाटे दिलेली औषधे रक्तामधे नीट शोषली जात नाहीत. म्हणून मग तेच antibiotic, म्हणजे Augmentin, गोळीच्या स्वरूपात देण्याऐवजी शिरेवाटे देण्याचा निर्णय मी घेतला. पुन्हा खाली येऊन, डॉ. सुभाषिनी आणि डॉ. अजय या दोघाना, आनंदची परिस्थिती सांगितली आणि मी त्याला शिरेवाटे antibiotic सुरु करते आहे, हेही सांगितले. हे ऐकून त्या दोघांनीही फर्मान काढले की मी वर खोलीत जाऊन आनंदजवळ थांबायचे आणि दुपारी अजिबात कामाला यायचे नाही. त्यानुसार मी निश्चिन्तपणे वर निघून आले. आज प्रथमच मी पूर्णवेळ काम करणार नव्हते. आमची राहण्याची व्यवस्था हॉस्पिटलच्याच वरच्या मजल्यावर असल्याने इंजेक्शन, औषधे, सलाईन लावण्याची सगळी सोय इथल्याइथेच होणार होती. आनंदला कोणती इंजेक्शन्स किती डोसमधे द्यायची आहेत, हे रवि नावाच्या नर्सला सांगून मी वर खोलीत आले.   

रवि दुपारी दीडच्या सुमारास आमच्या खोलीत आला आणि आनंदला आधी शिरेवाटे पॅरॅसिटॅमॉलचे इंजेक्शन आणि त्यापाठोपाठ Augmentin दिले. आज सकाळी मी नाश्ता केलेला नसल्यामुळे मला भूक लागली होती. आनंदची इंजेक्शन्स देऊन झाल्यानंतर मी भोजनालयामध्ये जाऊन डाळ-भात जेवले. दुपारच्या जेवणात इथे रोज घट्ट डाळ आणि भात असतो. फुलके क्वचितच असतात. आनंदनेही सकाळी नाश्ता केलेला नव्हता. "तुझ्यासाठी डाळ-भात आणू का? किंवा इतर काही खाणार का?" असे फोनवर विचारून घेतले. डॉ. सुभाषिनीने 'रेडी-टू-ईट' अशी बरीच वेगवेगळी पाकिटे सोबत आणलेली होती. त्यातले एखादे पाकीट आनंदसाठी बनवून घे आणि त्याला खायला दे, असा आग्रह ती मला सतत करत होती. पण आनंद म्हणाला, "गरम डाळ-भातच आण, इतर काही नको". इथे उत्तम दर्जाचा, बासमती तांदूळ वापरला जातो. इथला आचारी उत्तर हिंदुस्तानी पद्धतीची घट्ट डाळही खूप चवदार बनवतो. मी आनंदसाठी एका छोट्या कागदी कपामधे डाळ-भात घेतला, त्यावर साजूक तूप घातले आणि त्याला आणून दिले. त्याने तो डाळ-भात चवीने खाल्ला. तो खाऊन झाल्यावरही त्याला अजून भूक जाणवत होती. म्हणून मग पुन्हा जाऊन अजून एक कपभर डाळ-भात आणि त्यावर तूप घालून घेऊन आले. तोही त्याने खाल्ला. त्याच्या पोटात अन्न गेल्यामुळे मला बरे वाटले.  मी सकाळी आणलेला चहाही फ्लास्कमधे अजून उरलेला होताच. मी वर जाऊन उरलेला चहा पुन्हा गरम करून आणला. तो चहा पुन्हा उकळल्यामुळे जरासा कडवट झाला असला तरीही त्या थंडीमधे गरम चहा पिऊन बरेच वाटले. 

आनंदच्या शरीरामध्ये शिरेवाटे Paracetamol चा डोस गेल्यामुळे त्याचा ताप जरासा उतरला होता. पण इतक्या दिवसांच्या शारीरिक दगगगीमुळे आणि मानसिक ताणामुळे मला मात्र आज खूप दमणूक जाणवत होती. दुपारी मी कामाला जाणार नव्हतेच. त्यामुळे दुपारी मीही पलंगावर आडवी झाले. आम्हा दोघांनाही थोडा वेळ चांगली झोप लागली. संध्याकाळी ६ च्या सुमारास मला जाग आली. थोडी विश्रांती झाल्यामुळे  जरा बरे वाटत होते. पण आनंदला मात्र पुन्हा साडेसात-आठच्या सुमारास हुडहुडी भरून ताप भरला. दुपारी त्याला एकदा पॅरासिटॅमॉलचे इंजेक्शन दिलेले होते. आता परत पॅरासिटॅमॉल इंजेक्शन द्यायला नको असे मला वाटले. त्यामुळे त्याला पॅरॅसिटॅमॉलची गोळी घ्यायला लावली. रात्री आनंद वर जेवायला आलाच नाही. मी एकटीच जाऊन जेवून आले. जेवणामधे आज फुलके, फणसाची भाजी, तळलेले पापड, शेवयाची खीर आणि सकाळचीच डाळ आणि भात असे होते. फणसाची भाजी खूपच चवदार होती. आनंदसाठी थोडे जेवण आणि ग्लासभर खीर घेऊन आले. त्याने ते चवीने खाल्ले. दहा वाजता, रवि नर्स पुन्हा खोलीत येऊन आनंदला antibiotic चा डोस देऊन गेला. मी, आनंद आणि डॉ. सुभाषिनी दोन दिवसांनी इथून हेलिकॉप्टरने खाली उतरणार होतो. पण डॉ. अजय आणि डॉ. हर्ष उद्याच पहाटे निघणार होते, कारण ते पायी चालत खाली उतरून नारायणकोटीला जाणार होते. त्यामुळे रात्री डॉ. हर्ष, डॉ. अजय आणि नर्सिंग स्टुडन्ट कृष्णा आमच्या खोलीवर आनंदला भेटायला म्हणून आले. इंजेक्शन घातलेली सलाईनची बाटली संपेस्तोवर या मुलांनी आळीपाळीने ती हातात उंच धरून ठेवली होती. त्यांची आत्मीयता बघून आणि त्यांच्याशी गप्पा मारून आनंदला खूप बरे वाटले.  

आनंदला बिछान्यातून उठून खाली जाण्याचीही ताकद नव्हती. त्यामुळे त्याच्या छातीचा एक्सरे मी अजून करून घेतलेला नव्हता. "आता उद्यापर्यंत त्याला नक्की बरे वाटेल"  असेच मी रोज मनाशी म्हणत होते. इथे जास्त आजारी पडलेल्या सगळ्या रुग्णांना आम्ही डॉक्टर्स सल्ला देत होतो, "लवकरात लवकर इथून निघून जा आणि खाली उतरा. या उंच प्रदेशातून खाली उतरून गेलात की तुम्हाला जरा बरे वाटेल". 'आनंदला घेऊन आपणही आता केदारनाथहून खाली उतरावे,' असे अनेक वेळा माझ्या मनामध्ये येत होते. पण आता माझ्या ड्यूटीचा एकच दिवस राहिलेला असल्याने, मी माझी ड्यूटी पूर्ण करावी, थोडक्यासाठी इथून निघून खाली जाऊ नये, असे आनंदचे मत होते. 

केदारनाथला आम्ही मोठ्या उत्साहाने आलो होतो, इथे येण्याआधी आम्ही दोघांनी खूप मनसुबे केलेले होते. रोज दिवसभर १०-१२ तासाची ड्युटी केल्यानंतर संध्याकाळी किंवा ड्यूटीवर जाण्याआधी पहाटे उठून, केदारनाथच्या देवळाच्या आसपासचा प्रदेश फिरून बघून यावा, असे आम्ही दोघांनीही ठरवले होते. रोज संध्याकाळी सात वाजता देवळाजवळ आरती असते, ती बघायला जावे, अशीही आमची इच्छा होती. पण आनंदच्या आजारपणामुळे ते शक्यच झाले नव्हते आणि आम्ही दोघेही खूप त्रासलो होतो. आनंदला लवकरच बरे वाटेल अशी आशा आम्ही दोघांनीही गेल्या दोन-तीन दिवसात एकमेकांजवळ बोलून दाखवली होती. पण जरा बरे वाटले असे म्हणेस्तोवर त्याला परत ताप चढत होता. 

केदारनाथचे देऊळ मी स्वतः आधी पाहिलेले होते. ते सुंदर देवस्थान आनंदनेही पाहावे अशी माझी मनापासूनची इच्छा होती. पण त्याची अधिकच खराब झालेली तब्येत आणि अशक्तपणा बघून केदारनाथाचे  दर्शन होण्याची शक्यता माझ्या मनातून मावळत चालली होती... 

[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट 

शनिवार, २० जून, २०२६

केदारनाथ - भाग १२

काल रात्री खूप थंडी होती इथे उणे ३ तापमान होते. रात्रभर हीटर चालू ठेवून झोपलो. त्यामुळे खोली चांगली उबदार राहिली होती. मला सलग सात तास झोप लागली. आनंदला मात्र सलग झोप लागली नाही, असे सकाळी मला जग आल्यानंतर त्याने सांगितले.  त्याला आज ताप नव्हता पण घसा दुखणे आणि सर्दी खोकला अजून आहे. माझाही घसा दुखतोच आहे, खोकलाही येतोय, पण काम करण्यासाठी उत्साह आहे. आनंदला गरम पाण्यामधे मीठ घालून गुळण्या करायला सांगून मी वर चहा आणायला गेले. आज नाष्ट्याला काय करणार आहे?  हे आचाऱ्याला विचारले. होते. आज पण सूजीका हलवा, म्हणजे शिरा असणार होता.  चहा घेऊन मी खाली आले. आज कपडे बरेच साठलेले दिसले. म्हणून मग लाँड्री लावली. बाहेरचे कपडे पेशंटशी संपर्क आल्यामुळे खराब होतात तर आतले कपडे घामामुळे खराब होतात. त्यामुळे एक दिवसाआड कपडे धुवावे लागतात. काल बाहेर वापरण्याचे दोन स्वेटर्सही हाताने धुवून वाळत टाकले. आता इथे दोन-तीनच दिवस राहिले या कल्पनेने एकीकडे खूप वाईट वाटते आहे तर दुसरीकडे कुठेतरी घरची ओढही लागली आहे. अजूनही इथल्या कामामुळे  देवळात जाऊन दर्शन घ्यायला वेळच झालेला नाही. माझ्या बरोबरचे तिन्ही डॉक्टर्स दोन वेळा देवळामध्ये जाऊन आले. त्यांच्याकडून तिथे असलेल्या तुफान गर्दीचे आणि धक्काबुक्कीचे वर्णन ऐकायला मिळाले. 

आज सकाळी नेहमीप्रमाणे मी ८.४० पर्यंत ड्यूटीवर गेले. गेल्यागेल्याच, समोरच  पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेला मृतदेह  दिसला.  आज पहाटे  एक पेशंटला मृतावस्थेत आणलेले होते, असे कळले . एकूणच केदारनाथचा ट्रेक अवघड आहे. अनेकजणांना घोड्यावरून किंवा डोलीतून  येताना कमालीचा त्रास होतो. त्यातून अनेकांची तब्येत आधीच खराब असते. इथे कमालीची गर्दी आहे. त्यामुळे अनेकांना ही दगदग सोसवत नाही. साठी उलटून गेलेले एक नवरा-बायको दोघेच काल रात्री केदारनाथला पोहोचले होते. पहाटे त्या बाईंनी नवऱ्याला  हाक मारल्या पण तो जागा झाला नाही. म्हणून तिने त्याला हॉस्पिटलमध्ये आणले होते. आता त्याचा मृतदेहाबरोबर तिला परत जायचे होते. माझ्या समोरच NDRF च्या चार जवानांनी त्या माणसाचा मृतदेह उचलून नेला, त्या बाईंचा चेहरा बघून मला कसेसेच झाले. अशा तीर्थस्थानाच्या जागी मृत्यू आल्यास हिंदुधर्मात मृतात्म्याला सद्गती लाभते असा समाज आहे . पण अशावेळी तो मृतदेह घेऊन आपल्प्या गावी घेऊन जाणे हे नकातेवाइकांच्या दृष्टीने किती दुःखदायक असेल याची कल्पना न केलेलीच बरी. 

आज जवळपास १०.४५-११ वाजेपर्यंत मी आणि नोंदणी करणारी रिया, दोघीच काम करत होतो. डॉ अजय आणि नर्स कृष्णा गायब होते. डॉ सुभाषिनी वर किचनमधे आचाऱ्याला इडली दोशाचे पीठ भिजवायला शिकवणार  होती. त्यामुळे तिला यायला उशीर होणार होता, हे  तिने मला आधीच सांगितले होते.  रेडिमेड रवा इडलीची आणि MTR च्या सांबार मसाल्याची अनेक पाकिटे इथे पडलेली आहेत. ती इडली करण्याची कृती,  पाकिटावरच्या सूचना वाचून कोणीतरी आचार्याला समजावून देणे आवश्यक होते. पण ते कष्ट आत्तापर्यंत कोणीच घेतले नव्हते. पूर्वी एकदा आचाऱ्याने त्या पाकिटातील इडली रवा भिजवून इडल्या केल्या होत्या म्हणे. पण त्या दगडासारख्या कडक झाल्या होत्या. त्यानंतर त्या रवाइडलीच्या पाकिटात कोणीच हात लावला नव्हता व अनेक पाकिटे पडून होती. डॉक्टर  सुभाषिनीला फुलके आणि भाजी  खाऊन कंटाळा आलेला होता. त्यामुळे तिने पुढाकार घेऊन, पाकिटावरच्या सूचना वाचून घेतल्या. त्या सूचनांप्रमाणे, आचाऱ्याला इडलीचे पीठ नेमके कसे भिजवायचे, त्यात किती दही घालायचे, हे सगळे  शिकवले . तिला स्वतःला इडली, डोसे  आणि मेदुवडा खायची अतीव इच्छा झालेली होती. त्यामुळे ती रेडिमेड इडली पीठ तर भिजवून आलीच होती. पण त्या बरोबरच मेदुवड्यासाठी उडदाची डाळ आणि दोशांसाठी डाळ आणि तांदूळही  भिजवून आली होती. डॉक्टर सुभाषिनी आल्यावर मला थोडीतरी उसंत मिळाली. डॉ अजय, डॉ हर्ष आणि नर्स कृष्णा हे शेवटी संध्याकाळी पाच वाजता आले. ते कदाचित कुणालाच न सांगता गायब झाले होते, असे कळले . त्यामुळे सगळेजण त्यांच्यावर चिडले होतो. आज ११.३०-११-४५ च्या सुमारास, मी  न मागताच आले घातलेला  चहा आला होता . चहाबरोबर टोस्टही आले होते. ते टोस्ट मात्र मी  खाल्ले नाहीत. थोड्यावेळाने MTR ची रवा इडली आली. त्या इडलीचे चव बघण्यासाठी सुभाषिनीने फारच आग्रह केला. ती इडली बारी झाली होती. पण इडलीबरोबर चटणी नसल्याने कोरडी-कोरडी लागत होती. 

आज जवळपास चारशे-पाचशे  पेशंट्सना तपासले असेन. आजही बराचकाळ  मी एकटीच डॉक्टर काम करत असल्याने मी पार दमून गेले होते.  संध्याकाळ पर्यंत, पेशंटसशी बोलून आणि त्यानच्या नातेवाईकांना "बाहेर थांबा" हे सांगून घसा ठणकायला लागला होता. . काही ठराविक पेशंट्सना योग्य ट्रीटमेन्टची आवश्यकता असते. बाकी सर्वांना लवकरात लवकर जुजबी उपचार करून बाहेर काढणे व पुढचे पेशंट तपासणे आवश्यक असते.अशा गर्दीतही काही चत्रविचीत्र अनुभव येतात. इथे केदारनाथला भगवे वस्त्रधारी अनेक साधू येत असतात. कित्येकजण इथे सहा महिने मुक्कामाच करतात. अनेक तृतीयपंथी लोक देखील भगवी वस्त्रेपरिधान करून, आपले चेहरे रंगवून हातात त्रिशूल घेऊन इथे येतात. आज  हॉस्पिटलमढे दाखवायला आलेल्या एका साधूने, एका पातळ  भगव्या कफ़नीशिवाय काहीही घातलेले नव्हते. त्या साधूबाबाने पायामधे चपला, बूट असे  कोणतेच पादत्राणही घातलेले नव्हते. त्याचे दोन्ही तळपाय सोलवटलेले होते. तळपायांवर काही ठिकाणी फोडही आलेले होते. मला वाटले तळपायाला फोड आल्यामुळे हा मनुष्य अनवाणी आला असेल. पण त्याच्या कडून वेगळीच माहिती मिळाली. त्याने पादत्राणांचा आणि भगवी कफनी सोडली तर इतर सर्व वस्त्रांचा त्याग केलेला होता. अनवाणी पायाने तो केदारनाथ देवळाच्या मागच्या बाजूला आणि आसपासच्या बर्फाच्छदित डोंगरांमधे फिरून आलेला होता. त्याने मला तिथे काढलेले व्हिडिओदेखील दाखवले. असे अनेक चत्रविचीत्र अनुभ इथे येतात. काही साधू फक्त गोणपाटाचे कापड गुंडाळून आलेले होते. 

इथे केदारनाथपर्यंत अनेक लोक अनवाणी चालत येतात. काहीजण काही कारणाने नवस बोललेले असतात. पण या लोकांच्या पायाला खूप फोड येणे, पाय सोलवटणे असे होते. अशा ललोकना बूट-चपला घाला असे सांगितले तरीही ते ऐकत नाहीत. कित्येक नवविवाहित जोडपी इथे जोडीने दर्शनाला येतात. त्यांच्या घराण्याची तशी पद्धत असते. त्यांच्याबरोबर सासरचे लोकही आलेले असतात. या जोडप्यामधली नववधू भरपूर नटलेली, अंगावर दागदागिने घातलेली आणि हातभार लाल चुडा भरून आलेली  असते. आज दोन सख्खे भाऊ त्यांच्या दोघाच्या सुंदर नववधूंना घेऊन आले होते. त्या दोघीनींही चेहऱ्याला छान  मेकअप केलेला होता आणि भरजरी साड्या नेसलेल्या होत्या. त्या दोघीनाही फारसे काहीही झाले नव्हते. पण नवीन लग्न झालेले असल्याने काळजीपोटी त्यांचे नवरे त्याना दाखवायला घेऊन आले होते. इथे अनुभवांची शिदोरीच आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये अनेक स्त्रिया आम्हाला सॅनिटरी पॅड्स मागत येतात. केदारनाथला आल्यावर दगदगीने त्यांना अचानकच वेळेच्या आधी पाली आलेली असते. केदारनाथमध्ये अशा अनेक वस्तू सहजी मिळत नाहीत. त्यामुळे मग बायकांची पंचाईत होते. अशा बायकांसाठी आमच्या नर्सेस कापूस आणि gause पासून पॅड्स बनवून ठेवत असत आणि इमर्जंसीपुरते एक-दोन पॅड्स देत असत.  

आज दुपारी आनंदला खूप बरे वाटत नव्हते असे त्याने मला फोनवर कळवले. मी वर जाऊन ताप मोजला, तर त्याला  १०१ ताप होता. त्याला छाती भरल्याची किंवा इतर काहीच लक्षणे नव्हती. पण आज आता तापाचा चौथा दिवस होता. त्याचे रक्त आमच्या लॅबमध्ये तपासायला दिले. त्यात त्याचा WBC काउन्ट वाढलेला दिसला . त्यामुळे मग त्याला Augmentin 625 गोळ्या चालू केल्या. एकदा IV द्यावे असे वाटत होते. पण उगीचच कशाला द्या ? असेही वाटले. चार वाजता पहिला डोस घेतला आहे. रात्री दहा वाजता दुसरा डोस घेईल. त्याबरोबर लागेल तसे क्रोसीनही घ्यायला मी त्याला सांगितले आहे. आता इथे आम्ही अजून दोनच दिवस आहोत.पण आम्हला हॉस्पिटलच्या बाहेरही पडता आलेले नाही. आनंदला तापामुळे आणि मला सततच्या कामामुळे बाहेर पडत आलेले नाही. केदारनाथच्या  दर्शन कधी होणार हे माहिती नाही. आज आनंदाला इतका जास्त टॅप चढलेला पाहून मी काळजीतच पडले. इथपर्यंत येऊन दर्शनाशिवाय परत जावे लागणार कि काय असे वाटून गेले. 

आज नेहमीप्रमाणे साडेसातपर्यंत अविरत काम केले. सुभाषिनी डोसे  आणि वडे कसे करायचे, हे स्वयंपाक्याला शिकवण्यासाठी म्हणून  लवकरच निघून गेली होती. तिने मला, आनंदलाघेऊन वर जेवायला लवकरच घेऊन यायला सांगितले होते. ती दोसे, वडे आणि इडली तयार ठेवणारा होती असे तिने सांगितले होते. त्यामुळे मी आनंदला घेऊन लवकर वर गेले. तिथे नेहमीप्रमाणे बटाटा भाजी, गरम फुलके, घट्ट दाल असे जेवण होते. सुभाषिनी स्वयंपाकघरात काहीतरी खुडबूड करत होती. दोसे, वडे सांबर याचा अजून पत्ता नव्हता.  मी चटकन जेवण उरकून तिच्या मदतीला गेले. तिला स्वतःला दोषे घालता येत नव्हते. तिचे दोसे त्या तव्यावरून जाम निघत नव्हते, उडीदवडे तळून झाले नव्हते. ती हैद्राबादची असली तरीही तिला मध्ये भोक असलेले  मेदूवडे घालता येत नाहीत, असे तिने सांगितले. ती बरीच बड्या घरातली होती. तिचे सासू-सासरे खासदार आहेत व नारा मोठा कारखानदार आहे. त्यामुळे तिला कामाची सवय आणि उरक नाही असे तिने मला सांगून टाकले. तिच्या घरी स्वयंपाकी  .मग मी एकीकडे भराभर दोसे घातले तर दुसरीकडे वडे तळायला घेतले.  त्यामुळे पुढील दोन तास मी सगळ्यांना वडे तळून व दोसे करून घातले. तिने भिजवलेले दोशाचे पीठ केंव्हाच संपले. मग मी माझं डोकं लढवलं. इथे रवा इडलीची अनेक पाकिटे पडलेली आहेत. त्यातले एक पाकीट फोडून, त्यात थोडे दही व पाणी घालून भिजवले. ते मिश्रण मिक्सरमधून काढून बारीक केले. व त्याचे पातळ, कुरकुरीत रवा दोसे केले. तरूण नर्सेस, ब्रदर्स, फार्मसिस्ट, सफाईकामगारप, इथले डॉ यादव आणि व्यवस्थापक धनवीर व रोहनजी, अशा सर्वांनी दोसे खाल्ले. दोन दिवसांनी मी जाणार आहे हे कळल्यावर ती सगळी मुले हळहळली. तुम्ही रोज नवीन काहीतरी बनवा, असे म्हणू लागली.
मी सव्वादहावाजता खोलीवर आले.आमचे सामान उद्याच पलत पाठवायचे आहे, हे कळल्यामुळे, त्यानंतर लाँड्री करून मग रात्री बारा वाजता पलंगावर पाठ टेकवली. 

शुक्रवार, १९ जून, २०२६

केदारनाथ-भाग ११

काल रात्री मला खूप थंडी वाजत होती. मी अगदी पायमोजे-हातमोजे घालून, दोन रजया घेऊन झोपले होते. माझे अंगही खूप दुखत होते आणि पाय वळत होते. आनंदचे इन्फेक्शन मलाही लागले असावे, असे मला वाटले. शेवटी दुखणे मला अगदीच सहन होईना. त्यामुळे रात्री उशिरा केंव्हातरी उठून मी एक पॅरॅसिटॅमॉलची गोळी घेऊन झोपले. सकाळी उठले तेंव्हा जरा बरे वाटत होते. पहाटे पाच वाजता आनंदच्या हाक मारण्याने मला जाग आली. तो कण्हत होता. त्याचे संपूर्ण अंग आणि घसा खूप दुखत होते. 

मी आनंदला तपासले. त्याला आजही ताप आहे, हे मला जाणवले. मी त्याचा घसा, छाती, नाडी पुन्हापुन्हा तपासत होते. त्या सगळ्या तपासणीनंतर, त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आहे, असे मला वाटत नव्हते. व्हायरल ताप असण्याचीच शक्यता अधिक होती. त्यामुळे Antibiotics घेणे आवश्यक नव्हते. तरीही, आता राहिलेले शेवटचे तीन-चार दिवस कसेबसे पार पडावेत असेही एकीकडे वाटत होते. इतक्या लांब आपण आलो आहोत, आता अजून किती काळ आनंदचा ताप हटायची वाट पाहणार? त्यापेक्षा एखादे अँटिबायोटिक सुरु करू या, असा विचार मी केला. खरंतर अँटिबायोटिक चालू करण्याचा निर्णय माझा मलाच पटत नव्हता. पण आता नाईलाज आहे अशा विचाराने मी बाहेरचे कपडे घालून, तयार होऊन, खालच्या मजल्यावरच्या फार्मसीमधून औषध आणायला बाहेर पडले. 

जिना उतरून खाली गेले, तर जिन्यातून ओपीडीत जाणारा दरवाजाच बंद होता. तो दरवाजा रात्री बंद ठेवतात, आणि सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वयंपाकघरामधून चहा खाली आणण्याच्या वेळीच तो दरवाजा उघडतात, हे मला नंतर आठवले. मागे एकदा, रात्री तो दरवाजा उघडा राहिला होता. त्यावेळी त्या दरवाज्यामधून वरच्या मजल्यावर येऊन अनेक यात्रेकरू झोपले होते. त्यामुळे आजकाल ही खबरदारी घेतली जाते, हे मी ऐकून होते. दरवाजा बंद असल्यामुळे मी फार्मसीमध्ये जाऊ शकले नाही आणि मला Antibiotic आणता आले नाही. त्यामुळे मी वर आले. खोलीत येऊन मी रात्रपाळीच्या डॉ. शोभितला दरवाजा उघडण्याबाबत WhatsApp वर मेसेज पाठवला. सव्वासहाला त्याचे उत्तर आले. पण तोपर्यंत आनंद उठून दात घासून, तोंड धुवून आला होता. आनंद मला म्हणाला, "तुला जर हे viral इन्फेक्शन वाटते आहे, तर तू तुझ्याच मनाविरुद्ध जाऊन Antibiotic का सुरु करते आहेस? तुझ्या डायग्नोसिसवर माझा पूर्ण विश्वास आहे. धीर सोडू नकोस. मला बरे वाटेल." त्यामुळे मग मी Antibiotics न देण्याचा निर्णय घेतला. मग त्याने सकाळी फक्त क्रोसिनची एक गोळी घेतली. 

तो निर्णय झाल्यामुळे, मी वरच्या मजल्यावरच्या स्वयंपाकघरात आमच्याकडचा फ्लास्क घेऊन गेले. मी वर जात असतानाच स्वयंपाकघरात काम करणारा मनुष्य एका स्टीलच्या जगमधे चहा घेऊन खाली चाललेला दिसला. "मॅडम, तुम्ही वर स्वयंपाकघरात जा, तिथे तुम्हला हवा तसा, ताजा, गरम चहा करून देतील." असे त्याने मला सांगितले आणि मला हुरूप आला. वर जाऊन बिनसाखरेचा, ताजा चहा करून घेतला आणि तो फ्लास्कमधे भरून आणला. इथे चहासाठी, पाणी पिण्यासाठी, कागदी ग्लास आहेत. ते पिचके असल्यामुळे त्यातून कुठलेच पेय प्यायला नको वाटते. त्यामुळे मी दोघांसाठी नेहमी चार ग्लास घेऊन येते. दोन ग्लास एकात-एक घालून, त्या पिचक्या कपांना जरा तरी बळकटी येते. माझ्याकडे पुण्याला एक collapsible स्टीलचा ग्लास आहे. तो आणायला हवा होता, असे मला रोज वाटे. 

मी चहा आणायला गेले होते, तेव्हा स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी चालू होती. मी मेनूची चौकशी केली तर, "आज कोबी घालून पोहे करणार आहे," असे तिथल्या स्वयंपाक्याने सांगितले. ते ऐकून मला कसेसेच झाले. मस्त, चमचमीत फोडणी दिलेले, सालासकट भाजून लाल शेंगदाणे घातलेले, फोडणीमध्ये भरपूर हिरव्या मिरच्या आणि कढीलिंब घातल्यामुळे स्वादिष्ट झालेले, शिवाय वर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि पांढरेशुभ्र ओले खोबरे पेरलेले, असे आपल्याकडचे पिवळेधमक कांदापोहे आठवले, आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले. कोबी घातलेल्या पोह्यांची कल्पना मला अजिबात पसंत पडली नव्हती आणि ते पोहे खायला मी मुळीच उत्सुक नव्हते. पण सकाळी नाश्ता करणे आवश्यकच होते. त्यामुळे नाश्त्याला जाण्याआधी आमच्याकडे असलेला थोडा सुकामेवा खाल्ला. रोजच्याप्रमाणे, तुळशीचे बी गरम पाण्यात घालून ते पाणीही प्यायलो. 

आम्ही दोघेही नेहमीच्या वेळेला, म्हणजे आठ-सव्वाआठच्या सुमारास नाश्ता करायला गेलो. तिथे कोबी, गाजर आणि भाजलेले शेंगदाणे घालून केलेले पोहे होते. पोह्यांचे रूप काही विशेष चांगले दिसत नव्हते. इथल्या जेवणा-खाण्यामधे कांदा-लसूण कधीच नसते. पोह्यांमधे हिरवी मिरची, कढीलिंब, कोथींबीर किंवा खोबरे यापैकीही काहीच नव्हते. नर्स मुले-मुली पोह्यांवर टोमॅटो सॉस घेऊन खात होते. कोबी घातलेले पोहे वाईटच लागणार असे मला आधी वाटले होते. पण त्या मानाने ते चवीला बरे होते. आमचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर, मी किंवा आनंद आवर्जून तिथल्या स्वयंपाक्याचे आभार मानायचो. काही पदार्थ तो उत्तमच करायचा. आजचा आमचा नाश्ता झाल्यानंतर, "तुझ्यामुळे मला पोहे करण्याची नवीन पद्धत कळली. या वेगळ्या पध्द्तीने केलेले पोहेदेखील चांगले लागले." असे तिथल्या स्वयंपाक्याला मी सांगितले. त्यावर त्याने मला अगदी आत्मविश्वासाने आणि ठासून सांगितले की, "पोहा तो हमेशा  ऐसेही बनता है. और कौनसा तरीका है? वैसे इसमें तो शिमला मिरचीभी डलती हैं. लेकिन आज वो सप्लायमें आयी नही थी. अगर शिमला मिरची होती, तो पोहा और इससेभी टेस्टी बनता." मला त्याच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली. आपल्याकडे आपण करतो ते अनेक प्रकारचे चवदार पोहे आठवून मी मनोमन हसले आणि खाली कामाला निघून गेले.

खाली गेले तेंव्हा असे कळले की, काल अगदी अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या, आणि Paroxysmal Supraventricular Tachycardia (PSVT) असे निदान झालेल्या त्या मराठी आज्जीबाईला पहाटे-पहाटे डिस्चार्ज मिळालेला आहे. त्या बाईला तिचा नवरा गौरीकुंडच्या दिशेने घेऊन गेला असेही समजले. जाताना रात्रपाळीच्या नर्सेसजवळ, तो माझ्यासाठी निरोप ठेऊन गेला होता. माझे तोंडभरून आभार मानून गेला होता. ती बाई बरी होऊन गेली, हे ऐकून मला खूपच आनंद झाला. या हॉस्पिटलमधे रात्री रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्यासाठी अंथरूण व पांघरूण दिले जाते. रात्री गरमागरम डाळतांदुळाची खिचडी आणि सकाळी गरम चहाही देतात. तसेच, या संस्थेकडे येत असलेल्या देणग्यांमधून, गरीब, गरजू यात्रेकरूंना गरम मोजे, लोकरी टोप्या आणि उबदार ब्लँकेट्सही दान केली जातात. ही सगळी माहिती मी त्या बाईच्या नवऱ्याला पुरवली होती. रात्री ड्यूटी संपवून वर जाण्याआधी त्याला ब्लॅंकेट व झोपायला गादी मिळेल याची व्यवस्था मी केलेली होती. 

काल डायबेटिक कोमामधे गेलेला मनुष्यही जिवंत आणि सुखरूप आहे हे बघून माझ्याच जिवात जीव आला. त्याने मात्र, काल रात्री शुद्धीवर आल्यापासून तिथे नुसता सावळा गोंधळ घालून ठेवला होता. तो प्रत्यक्षात टूर ऑपरेटरच होता आणि त्याने सोबत आणलेले प्रवासी त्याला शोधत-शोधत हॉस्पिटलमधे पोहोचलेले होते. त्याला खाली नेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या बुकिंगची विनंती हॉस्पिटलकडून पाठवण्यात आली होती. त्याच्या सुदैवाने, हेलिकॉप्टरच्या एका फेरीमधे त्याच्यासाठी बुकिंगही झालेले होते. पण तो मनुष्य भलताच विचित्र निघाला. "इथल्या डॉक्टर्सनी मला मारायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माझी माफी मागितली तरच मी खाली जाईन." असा हट्ट त्याने धरला. तो काही केल्या, कोणाचेच ऐकायला तयार होईना. तो सगळ्यांवर ओरडत होता. "मी स्वतःच्या पायांनी चालत खाली उतरू शकतो. तरीही मला उगीचच हेलिकॉप्टरच्या खर्चात तुम्ही सगळे टाकत आहात." असाही आरोप तो करत होता. "मी कुठल्याही परिस्थितीत हेलिकॉप्टरचा खर्च करणार नाही, हा खर्च हॉस्पिटलनेच केला पाहिजे." असा आग्रहदेखील तो धरून बसला. 

आता काय करायचे, असा आमच्यापुढे प्रश्नच पडला. शेवटी, "ठीक आहे. पण मग तू हेलिकॉप्टरने खाली जायला तयार नाहीस असे आम्हाला केसपेपरवर लिहून दे." अशी विनंती डॉ. यादव यांनी त्याला केली. त्याने ते लिहिण्यासाठी केसपेपर मागून घेतला. "या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स आणि नर्सेसनी मिळून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मला काहीही झालेले नसताना, कालपासून विनाकारणच मला इथे ICU मध्ये डांबून ठेवलेले आहे. मला उगीचच सलाईन लावले आहे, इंजेक्शने टोचत बसले आहेत. त्यामुळे माझ्या बिघडलेल्या तब्येतीसाठी हे हॉस्पिटलच जबाबदार आहे. म्हणूनच, माझा आणि माझ्याबरोबर हेलिकॉप्टरमधून सोबत येणाऱ्या व्यक्तीच्या तिकिटाचा खर्च हॉस्पिटलनेच केला पाहिजे." असे त्याने त्या केसपेपरवर लिहिले. ते वाचून आम्ही सगळ्यांनी कपाळाला हात लावून घेतला. 

त्या माणसाला आम्ही खूप समजावून सांगितले, की तुला हेलिकॉप्टरने खाली उतरणे आवश्यक आहे. पण तो काही केल्या ऐकेना. शेवटी त्याच्याकडून त्याच्या आई-वडिलांचा फोननंबर मी घेतला. त्याच्या आईवडिलांशी मी स्वतः बोलले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर त्याच्या आईवडीलांनीही त्याला समजावायचा प्रयत्न केला. तरीही तो ऐकेना. अखेर, मी त्याच्यासमोर अक्षरशः हात जोडून त्याला विनंती केली की, "शहाणा असशील तर हेलिकॉप्टरने लवकरात लवकर खाली जा आणि स्वतःचा जीव वाचव." त्यानंतर तो मला म्हणायला लागला, "डॉक्टर, तुम्ही स्वतः जाऊन काल रात्रीचे CCTV रेकॉर्डिंग बघून या. म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. या लोकांनी मला मारायचा प्रयत्न केला आहे. मी मुंबईला मंत्रालयामधे फोन लावला आहे. तिथून केंद्र सरकारला फोन जाणार आहे. मग या लोकांना दिल्लीहून होम मिनिस्ट्रीकडून तंबी मिळेल. मग हे माझे पाय धरतील. त्यानंतरच मी इथून निघेन." 

हे सगळे बोलणे ऐकल्यावर मात्र माझ्या लक्षांत आले की हा खरोखरच एक माथेफिरू मनुष्य आहे. मी थोडावेळ ICU च्या बाहेर गेले. परत येऊन त्याला मी सांगितले, "हे बघा, मी CCTV रेकॉर्डिंग बघितले. तुम्हाला कोणीही काहीही केलेले नाही. तुम्ही आता निष्कारण वेळ वाया घालवू नका. आत्ता बऱ्या बोलाने खाली गेलात तर स्वतःचा जीव वाचवू शकाल. तुमची पोटनि, चार वर्षांचा मुलगा, वयस्कर आईवडील हे सगळे तुमच्यतावर अवलंबून आहेत. मुंबईला गेल्यावर मग, या हॉस्पिटलावर जी कायदेशीर कारवाई तुम्हाला करायची, ती करू शकाल." तेंव्हा कुठे तो तयार झाला. शेवटी NDRF च्या टीमने येऊन त्याची अक्षरशः उचलबांगडी केली, त्याला हेलिकॉप्टरमध्ये बसवून दिले आणि आम्ही सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

तो मनुष्य गेला असेल-नसेल, तेवढ्यात, काल आपल्या वयस्कर आईला घेऊन आलेला, मुंबईचाच दुसरा एक मराठी मनुष्य मोठमोठ्याने आरडा-ओरड करत, त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसला. त्याच्या आईला कमालीचा दम लागलेला होता. तिला मी ऑक्सिजन देण्यासाठी खुर्चीवर बसवले. काल याच माणसाला मी नीट समजावून सांगितलेले होते, "तुझ्या आईची तब्येत चांगली नाहीये. तू आईला घेऊन लगेच खाली गौरीकुंडला जा. तिला दर्शनासाठी नेण्याचा हट्ट धरू नकोस. तिथे देवळाजवळ खूप गर्दी आहे असे मी ऐकून आहे. तुझ्या आईला ती सगळी दगदग सहन होणार नाही." पण त्याने माझा सल्ला मानला नव्हता. त्याने आणि इतर सर्व सहा कुटुंबियांनी रात्री केदारनाथलाच मुक्काम केला होता. सकाळी आईला घेऊन दर्शनाला जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याआधीच सकाळी त्याची आई अत्यवस्थ झालेली होती. आता आईला हेलिकॉप्टरने खाली नेण्यासाठी हेलिकॉप्टर मिळावे यासाठी त्याची धडपड चालू झाली होती. हेलिपॅडवर जाऊन हेलिकॉप्टर कंपन्यांच्या ऑफिसमध्येही तो जाऊन आला होता. पण त्याने मेडिकल सर्टिफिकेट आणले तरच त्याच्या आईला खाली नेण्यासाठी प्राधान्यक्रम मिळेल, असे त्याला सांगितले गेले होते. आता त्याला आमच्याकडून तसे मेडिकल सर्टिफिकेट हवे होते. 

गुप्तकाशी, फाटा आणि सेरसी अशा तीन ठिकाणांहून, चार हेलिकॉप्टर कंपन्या सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सतत यात्रेकरूंची केदारनाथपर्यंत ने-आण करत असतात. दर १० ते १५ मिनिटाला एकेक हेलिकॉप्टर निघत असते. पण एकेका फेरीमधे चार ते सहा लोकांनाच जाता येते. अनेकजणांनी खूप आधीपासूनच बुकिंग केलेले असते. त्यामुळे ऐनवेळी कितीही पैसे देऊ केले तरीही कोणालाच हेलिकॉप्टरचे बुकिंग मिळत नाही. विशेष करून मे-जूनमध्ये अशी अचानक बुकिंग मिळण्याची शक्यता जवळ-जवळ शून्य असते. त्यातून, यंदाच्या मे महिन्यामध्ये, सुट्टी आणि अधिकमास असे एकत्र आल्याने, यात्रेकरूंची तुफान गर्दी झालेली होती. काही ठराविक आजाराने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना, मेडिकल कोट्यामधून ऐनवेळी हेलिकॉप्टरमधे जागा दिली जाते. या बाईंना, त्या आजारांपैकी, म्हणजे हृदयरोग, स्ट्रोक, HAPO, मेंदूत रक्तस्त्राव, किंवा कोमा, यापैकी काहीच झालेले नव्हते. त्यामुळे त्यांना तसे प्रमाणपत्र देणे हॉस्पिटललादेखील शक्य नव्हते. त्यामुळेच त्याला ऐनवेळी हेलिकॉप्टर मिळून आईला हेलिकॉप्टरने खाली नेणे शक्य होणार नव्हते. "तुझ्या आईसाठी तसे सर्टिफिकेट देणे आम्हाला शक्य नाही." असे मी त्याला सांगितले. त्यानंतर त्याने मला आणि तिथल्या इतर सर्व डॉक्टर्सना अक्षरश शिव्यांची लाखोली वाहिली. एकाच दिवसात दोन मराठी रुग्णांमुळे मला अक्षरशः लाजेने मान खाली घालण्याची वेळ आली हे दुर्दैवच म्हणायचे! आमच्या व्यवसायात शिव्या-ओव्या दोन्हीही 'इदं न मम' या भावनेनेच स्वीकारायच्या असतात हे बाळकडू मिळालेले असल्याने मी तसेच केले. 

नेहमीप्रमाणे सकाळी ८.४५ पासून संध्याकाळी ७.३० पर्यंत मी इमानेइतबारे ड्यूटी बजावली. आजदेखील नेहमीप्रमाणेच मी ४०० च्या वर पेशंट्स तपासले होते. मधे दोनवेळा जेमतेम चहा प्यायला ब्रेक घेतला असेल. पेशंट्स पाहण्याचा त्रास काहीच वाटत नव्हता. पण पेशंटबरोबर आलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबायला सांगणे, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पुरवणे, हेच मोठे जिकिरीचे काम होते. बोलून-बोलून माझा दुखरा घसा आता खूपच दुखायला लागला होता. शेवटी-शेवटी तर मी अगदी कंटाळून, दमून आणि हतबल होऊन लोकांच्या गर्दीकडे, बेशिस्तीकडे बघत होते. 

कोणालाही रांगेत उभे राहायचे नव्हते, 'हॉस्पिटलच्या आत रुग्णाच्या नातेवाईकांना प्रवेश निषिद्ध' अशी पाटी बाहेर लावलेली असली तरीही तो नियम कुणीच पाळत नव्हते, ओपीडीत येऊन, फोनवर मोठमोठ्याने गप्पा मारत बसू नये इतका पाचपोचदेखील कुणाला आहे असे दिसत नव्हते. हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ रुग्ण असतात, आणि त्यांच्यामुळे लहान मुलांना जंतुसंसर्ग होऊ शकतो. लहान मुलांना गरज नसताना हॉस्पिटलमध्ये आणू नका, हे सांगितले तरी कुणी दखल घेत नव्हते. असे अनेक चित्रविचित्र आणि डोक्यात तिडीक जायला भाग पडणारे अनुभवही मला रोज येत होते. 

हे हॉस्पिटल विनामूल्य सेवा देते, म्हणजे प्रत्येकाच्या हक्क्काचेच हॉस्पिटल असल्याच्या कल्पनेने, कित्येक लोक नावनोंदणी न करता किंवा आम्हाला कोणालाही न दाखवता आपले आपणच जाऊन ऑक्सिजन घ्यायच्या खुर्चीवर बसत होते. आधी नावनोंदणी करा, हे त्यांना सांगितले की त्यांना राग येई. अनेक सुशिक्षित आणि आर्थिक सुस्थितीतले लोक आपल्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर-नामक, एक नऊ-दहा इंच लांबीचे डबडे घेऊन हिंडत होते. त्या डबड्यातला ऑक्सिजन जेमतेम पाच मिनिटात संपत असेल. आपल्या समाजातले अज्ञान मात्र संपत नाही हेच खरे, असे मला वाटायला लागले होते. त्यामुळे भारतीय माणूस कधी सुधारणार? अशीच भावना माझ्या मनात वरचेवर येई.

संध्याकाळपर्यंत मी हतबल होऊन आणि दमून बसलेली असताना एक सुस्थितीतला दिसणारा मनुष्य आत आला. मला म्हणाला "इथे आमची राहायची सोय कराल का? मी तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो." ते बोलणे ऐकून तर मी अवाकच झाले. बाहेर हॉस्पिटलची पाटी वाचून आलेला हा सुशिक्षित मनुष्य मला हे काय विचारतो आहे, ते मला कळेचना. मला अगदी त्याला सांगावेसे वाटले होते, "बाबा रे, तू अ‍ॅडमिट हो. मी तुला इथे रात्रभर ठेवून घेते."  अर्थात प्रत्यक्षात मी त्याला, "हे हॉस्पिटल आहे. हॉटेल किंवा धर्मशाळा नाही. इथे तुमची राहण्याची सोय करता येणार नाही." असे अत्यंत शांत स्वरात सांगितले.  

ओपीडीतून वर खोलीत येईपर्यंत जवळपास ७.४० झाले होते. आनंदने संध्याकाळीही क्रोसिनची गोळी घेतली होती असे तो म्हणाला. आम्ही दोघे बरोबर आठ वाजता जाऊन जेवून आलो. बटाट्याची भाजी, दह्यातील बटाट्याचे रायते, राजमा, भात व पोळ्या असा बेत होता. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा मला झाली. पण जेवणामध्ये आज काही गोड पदार्थ ठेवलेला नव्हता. त्यामुळे अर्थातच ती इच्छा मारावी लागली. रात्रीपर्यंत मनाने आणि शरीराने खूपच दमायला झाले होते. त्यामुळे  खोलीत आल्याआल्या आम्ही झोपून गेलो. 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट.

गुरुवार, १८ जून, २०२६

केदारनाथ - भाग १०

काल रात्रीपासूनच माझा घसा जरा धरला होता. बारीकसा खोकला, अंगदुखी, असे चालू झाले होते. रात्री मी १० वाजेपर्यंत झोपले होते. पण पहाटे २-२.१५ वाजता नाक चोंदल्यामुळे जाग आली. घसा दुखत होताच. मग उठून भरपूर गरम पाणी प्यायले. नाक साफ केले. तरीही लगेच झोप येईना. पुढे ३.३० ते ७ अशी साडेतीन तास झोप लागली. गेली काही वर्षे हातात स्मार्टवॉच घालत असल्याने, आपण नेमके किती वेळ झोपलो, हे निश्चितपणे सांगता येते. पण काल रात्री अगदी झोपतानाच ते स्मार्टवॉच मी चार्जिंगला लावलेले होते. त्यामुळे एकूण किती झोप झाली हे मात्र कळले नाही. सकाळी उठल्यावर अंग दुखत असले तरी अंघोळ केल्यावर जरा बरे वाटले. परत भरपूर गरम पाणी पिऊन दुखऱ्या घशालाही जरा शेक दिला.

आज आनंदला जरा बरे वाटत होते. त्यामुळे तो पण नाश्त्याला वर भोजनालयामध्ये आला. नाष्ट्याला  बटाट्याची गरगटा भाजी आणि गरम फुलके होते. मस्तपैकी आमचूर घालून केलेली आणि बटाटे भपूर घोटून केलेली ती भाजी होती. त्याआधी सकाळी, आम्ही आमच्यासोबत आणलेला थोडा सुकामेवा, म्हणजे बदाम, काजू आणि पिस्ते असे खाल्ले होते. थंडीमधे बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही चिया सीड्स, तुळशीचे बी अशा गोष्टीही सोबत आणल्या होत्या. तुळशीचे बी गरम पाण्यात घालून, ते पाणी पिऊन, बद्धकोष्ठ होऊ नये याचीही व्यवस्था आम्ही केली होती. 

नाष्ट्यानंतर मी खाली कामाला निघून गेले आणि आनंद खोलीत परत गेला. आज सकाळी त्याला बरे वाटत असल्यामुळे मला जरा हायसे वाटले होते. आनंदने आमच्या खोलीच्या मागे दिसणाऱ्या बर्फाच्छादित शिखरांचा आणि तिथे दिसणाऱ्या विविधरंगी  तंबूंचा फोटो आमच्या काही फॅमिली ग्रूप्सवर पाठवलेला दिसला. त्यामुळे तो आता बरा आहे याची मला खात्री झाली आणि मी निश्चिंत झाले.

मी बरोबर सकाळी ८.४५ वाजता कामाला लागले. रात्री कामावर असलेल्या नर्सिंग स्टाफपैकी काजल, परवेझ आणि अजून एक मुलगा, अशा तिघांनाही रोज मला कामावर आलेले बघितले की आनंद होतो असे मला जाणवत होते. कारण, रात्रभरात ते तिघे मिळून जवळपास १५०-२०० पेशंट्स तपासत. मी आले की त्यांना अगदी 'हुश्श' होत असावे. आज मी काम सुरू केल्यानंतर तासाभराने डॉ. अजय आला. त्यानंतर हलत-डुलत डॉ. सुभाषिनी आली. ती ओपीडीत आली तरी ती कधीच एका जागी बसून काम करण्याच्या मूडमधे नसते. सतत इकडे जा, तिकडे जा, एखाद्यासोबत गप्पा मार, असे करत असते. डॉ. अजयबरोबर कृष्णा नावाचा एक नर्सिंगचा विद्यार्थी काम करतो. तो बिहारी मुलगा अगदी गुणी आणि कामसू आहे. नॉयडाच्या 'यथार्थ हॉस्पिटल' मधून आलेली, नवीन, अक्षय, रवि, रिया, नरेंद्र, ही मुले अतिशय तरबेज आहेत आणि त्यातला प्रत्येकजण कामाला वाघ आहे. पण रियाला नर्सिंग कामाऐवजी बराच काळ केवळ पेशंट रजिस्टर भरत बसावे लागल्यामुळे तिची खूप चडफड होत असे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेसाठी एक स्वतंत्र रजिस्टर असते. त्या रजिस्टरमधे पेशंट्सचे नाव, लिंग, वय, पत्ता, फोन नंबर, व्यवसायाचे स्वरूप, वैद्यकीय निदान आणि उपचार असे बरेच रकाने भरत बसावे लागते. 

इथे येणारे काही रुग्ण घोड्यावर बसल्यामुळे मांड्यांना खरचटून किंवा घोड्यावरून पडून इजा झालेले असतात. पण, अलंकारिक भाषेत बोलायचे तर, बरेचसे पेशंट्स 'घोड्यावर बसून आल्यासारखे' वाटत. कारण, त्यांना इतकी घाई असे की काही विचारू नका. रांगेत त्यांच्याआधी कितीही वयस्क लोक, किंवा कितीही जास्त आजारी रुग्ण नोंदणीसाठी थांबलेले असले तरीही त्यांना सगळ्यांच्या पुढे यायचे असे. "आम्हाला जायचंय, आमच्याबरोबरचे लोक पुढे निघून गेलेत, आम्हीच मागे अडकलोत, आमचा घोडेवाला किंवा डोलीवाला थांबला आहे," असली कारणं सांगून हे लोक आपापलं घोडं पुढे दामटायला बघत. अशा लोकांची मला फार चीड येई. विशेषतः दिल्ली आणि हरयाणाकडचे लोक महाआगाऊ असतात असा अनुभव मला आला. मग मी ठरवूनच अशा लोकांना मुळीच पुढे येऊ देत नव्हते. त्यातले काहीजण, आपण अगदी अत्यवस्थ आहोत असे नाटक करत पुढे घुसायचा प्रयत्न करायचे. "मला ऑक्सिजन लावाच, श्वास घ्यायला फार त्रास होतोय" असे सांगून घुसायचे. पण मग एकदा का तोंडाला ऑक्सिजनचा मास्क लागला, की लगेच फोन कानाला लावून मोठमोठ्यांदा फोनवर बडबड सुरु करायचे. अशा वेळेस मात्र माझं डोकं खरोखरच आउट होऊन, मी त्यांना फोन बंद करायला लावत असे. 

आज अगदी अर्धमेल्या अशा अवस्थेतल्या एका दहा-बारा वर्षांच्या मुलाला आणले होते. त्याचे आई-वडील आपल्या मुलाची अवस्था बघून, घाबरून, मोठमोठ्याने रडत-ओरडत होते. सोबत त्यांचा पिठ्ठूवालाही होता. त्या मुलाला बेडवर झोपवून आम्ही ऑक्सिजन सुरु केला. पेशंटला व्यवस्थित ऊब मिळावी यासाठी असलेला, ट्यूबने गरम हवा पांघरुणाच्या आत सोडणारा वॉर्मर आम्ही त्या मुलाच्या पांघरुणात लावला. आम्ही त्याला सेटल करण्याच्या प्रयत्नात होतो. मी त्या मुलाला तपासत होते. तेवढ्यात मागून धाडकन कोणीतरी पडल्यासारखा आवाज आला. मी वळून बघितले तर त्या मुलाचे वडील घाबरल्यामुळे चक्कर येऊन, जमिनीवर कोसळले होते. मुलाची आई ते सर्व पाहून भीतीने जोरजोरात किंचाळू लागली होती आणि आपले डोके बडवून घेत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमच्यापैकी निम्मी टीम त्या माणसाकडे धावली. त्याला उचलून दुसऱ्या बेडवर ठेवण्यात आले. आपले वडील जमिनीवर कोसळल्याचा आवाज, आणि आईचे रडणे ऐकून, तो जवळपास बेशुद्धावस्थेत असलेला मुलगा ताडकन उठला  आणि, "पापा, पापा, आपको क्या हो गया? मैं ठीक हूं." असे म्हणत, रडू-ओरडू लागला. आपला मुलगा शुद्धीवर येऊन बोलतोय, ओरडतोय हे बघून त्याचा बापही एकदम उठून बसला. अशा रीतीने, आम्ही फारसे काहीही न करताच, तो मुलगा आणि त्याचे वडीलही ठणठणीत बरे झाले! 
अर्थातच, पुढे फारसे काहीच उपचार न करता, त्या कुटुंबाला आम्ही धीर दिला आणि पाठवून दिले.

आणखी एक अशीच गंमत आम्हाला पाहायला मिळाली. बेशुद्धावस्थेतल्या एका दहा-बारा वर्षाच्या मुलाला आणले गेले होते. पिठठूमधे बसून वर येत असताना तो मुलगा ग्लानीमध्ये गेला होता आणि काही केल्या डोळे उघडत नव्हता. त्याचा पिठठूवाला, आई-वडील आणि इतर नातेवाईक सगळेच घाबरेघुबरे झालेले होते. आम्ही त्याला emergency bed वर घेतले, ऑक्सिजन मास्क लावून ऑक्सिजन सुरु केला, जाड ब्लॅंकेट घालून,  ब्लॅकेटच्या आतमधे वॉर्मरच्या पाईपने गरम हवा सोडायला सुरुवात केली. मी त्या मुलाला तपासून त्याचे हृदय आणि श्वासाची गती ठीक आहे ना ते  तपासले. त्याला हाक मारून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पापण्या वर करून त्याच्या डोळ्याची बुबुळे तपासली. पण इतके करूनसुद्धा त्या मुलाने डोळे हलवले नाहीत, हालचाल केली नाही, की कसलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी नर्सेसना तातडीने ऑर्डर दिली की त्या मुलाच्या हाताच्या शिरेतून रक्त काढा, ते रक्त लगेच तपासून घ्या आणि मुलाला सलाईन लावा. 'सलाईन' हा शब्द त्या मुलाच्या कानावर पडताच, तो मुलगा एकदम ताडकन पलंगावरून उठून बसला आणि "नहीं, नहीं, सलाईन नहीं, सलाईन नहीं..." असे किंचाळू लागला. त्यामुळे, साहजिकच पुढे फारसे काहीही न करता आम्ही त्या मुलाला आणि त्याच्यासोबत आलेल्या फौजेला तिथून रवाना केले!  इथल्या संपूर्ण ड्यूटीच्या काळात मला असे अनेक मजेशीर अनुभव येत राहिले.

काहीवेळा, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यातल्या खेड्यापाड्यातून आलेल्या बायकांना त्यांच्या नवऱ्याचे नाव विचारले की त्यातल्या काही बायका तोंडावर पदर ठेवून लाजत कसेबसे नाव उच्चारत. पण काही जणी मात्र नाव सांगायला अजिबात तयार होत नसत. मग मोठ्या खुबीने त्यांच्याकडून ते नाव काढून घ्यावे लागे. याउलट, महाराष्ट्रातल्या खेडेगावाकडच्या एका बाईला नावनोंदणी करणाऱ्या नर्सने तिच्या नवऱ्याचे नाव विचारले. तर ती म्हणाली, "माझा नवरा कधीच मेला." ती मराठीभाषिक असल्याने आणि तिला हिंदी नीटसे येत नसल्याने मी तिच्याकडून मराठीत माहिती घ्यायला सुरुवात केली. तिला म्हणाले "तुझा नवरा हयात नसला तरीही त्याचं नाव सांग, आम्हाला नोंद करावी लागते." त्यावर ही बाई मला म्हणते, "माझ्या मेलेल्या नवऱ्याचं नाव तुम्हाला काय करायचंय?" मी डोक्याला हात लावून घेतला. शेवटी कसेबसे तिला पटवून दिले की आमच्या रेकॉर्डसाठी आम्हाला ते नाव लिहावेच लागते. मग तिने आमच्यावर मोठे उपकार केल्याच्या थाटात, तिच्या दिवंगत नवऱ्याचे नाव सांगितले आणि आमची सुटका केली!

एक सुशिक्षित, मध्यमवयीन नवरा-बायको आले होते. त्या बाईंना एरवी डायबेटिसच्या गोळ्या चालू होत्या. पण त्यांनी आपल्या डायबेटिसच्या गोळ्या सोबत आणल्याच नव्हत्या. त्या बाईंना कुठल्या गोळ्या चालू आहेत, हेदेखील त्यांना किंवा त्यांच्या नवऱ्याला माहिती नव्हते. त्या बाईंची शुगर तपासणी करायला ग्लुकोमीटर लावला तर, त्यावर रेकॉर्डही होऊ शकणार नाही इतकी जास्त शुगर आली. परत दोन वेळा तपासणी करून बघितली तरी पुन्हा तीच परिस्थिती होती. मी त्या बाईंना इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला नर्सला सांगितले. पण, "काहीही झाले तरी मी इन्सुलिन इंजेक्शन घेणार नाही म्हणजे नाही." असे म्हणून ती बाई अडूनच बसली. आत्ता इन्सुलिन इंजेक्शन आम्ही दिले नाही तर ती बाई डायबेटिक कोमामधे जाऊ शकते, तिच्या जीवाला धोका आहे, हे सगळे मी त्या नवराबायकोंना समजावून सांगितले. बऱ्याच मुश्किलीने ती बाई इन्सुलीन घ्यायला तयार झाली. कसेबसे करून तिची शुगर आम्ही २७५-३०० च्या रेंजमधे आणली आणि तिला पाठवून दिले. रोजच्या डायबिटीस व रक्तदाबाच्या गोळ्या विसरून आलेले कमीतकमी १०-१२ पेशंट्स तरी दिवसभरात भेटायचे. स्वतःच्या गोळ्यांचे नाव माहीत नाही, गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन सोबत नाही, मोबाईलमध्ये गोळ्यांचा फोटो नाही, असे बरेच पेशंट्स इथे पाहिले. "नेहमीची औषधे व गोळ्या गौरीकुंडला ठेवलेल्या सामानामधेच विसरलो." असे खुशाल सांगणारे हे पेशंट्स आपला मोबाईल गौरीकुंडला सामानात विसरलेले मात्र मी एकदाही ऐकले नाही! 

ती डायबेटिसवाली बाई गेली असेल-नसेल तेवढ्यात अक्षय नावाचा एक नर्स मुलगा मला बोलवायला आला, "मॅडम, महाराष्ट्रातला एक पेशंट सिरीयस झाला आहे. येऊन बघता का?" त्या पेशंटला पाहिल्या-पाहिल्या मी विचारले, "हा डायबेटिक आहे का?" हो असे उत्तर मिळताच मी म्हणाले, "अरे, हा तर डायबेटिक कीटोऍसिडोसिसचा पेशंट आहे. हा कधीही कोमात जाऊ शकतो." मी पटापटा सलाईन, अँटिबायोटिक्स, इतर तपासण्या, अशा सर्व ऑर्डर्स दिल्या. त्या माणसाला चक्कर येऊ लागल्याने आणि डोळ्यांना काहीच दिसेनासे झाल्याने तो हॉस्पिटलमधे आला होता. तो रोज सकाळी इन्सुलिन घेत असे, पण आज त्याने ते घेतले नव्हते. हॉस्पिटलमध्ये आल्या-आल्या त्याला कोणीतरी नर्स मुलगा इन्सुलिन द्यायला गेला होता. पण त्याने ते इंजेक्शन त्या नर्सकडून घ्यायला नकार दिला. रोजच्याप्रमाणे माझे मीच लावून घेतो असे त्याने सांगितले. पण त्याने स्वतःदेखील ते इंजेक्शन घेतले नाही आणि तसाच पडून राहिला. तो अर्धवट ग्लानीत गेल्याचे लक्षात आल्यानंतर मला बोलावले गेले होते. मी त्या माणसाला तपासले तेंव्हा तो जेमतेम उत्तरे देऊ शकत होता. त्याचे वय ४१ वर्षे आहे, तो मुंबईचा आहे व तो एकटाच आला आहे, असे त्याने मला सांगितले. प्रत्यक्षात मात्र, "तो इथे एक टूर गाईड म्हणून आला आहे व त्याने सोबत आणलेले प्रवासी त्याला शोधत आहेत" असे मला नर्सेसनी सांगितले. साडेसात-पावणेआठला ओपीडीतून वर येईपर्यंत मी चारवेळा तरी त्याला तपासून आले होते. मला त्या पेशंटच्या जीवाची काळजीच वाटत होती. रात्रभर त्याला हॉस्पिटलातच ठेवणार होते. 

सकाळी, जवळजवळ अर्धमेल्या अवस्थेतली एक मराठी म्हातारी तिथे आली होती. तिचा नवराही सोबत होता. लातूर, उस्मानाबाद या भागातून आलेल्या त्या अत्यंत गरीब घरच्या बाईला, धड उभेसुद्धा राहवत नव्हते. मी तिला ऑक्सिजन दिल्यावर ती जरा ताजीतवानी झाली. ते नवरा-बायको कुठल्यातरी यात्रा कंपनीबरोबर आलेले होते. त्यामुळे, मी नको म्हणत असतानाही ती बाई हट्टाने दर्शनासाठी जातेच असे म्हणाली. पण थोड्याच वेळात तिला घेऊन तिचा नवरा परत आला. तिला आम्ही अ‍ॅडमिट करून घेतले. तिला Paroxysmal Supra-ventricular Tachycardia (हृदयाची गती अचानक व प्रमाणाबाहेर वाढणे) हा आजार निघाला. तिचा नवरा तिला हॉस्पिटलमधेच ठेवून एकटाच दर्शन करून आला. चार वाजता चहा आल्यावर मी त्या माणसाला कपभर चहा नेऊन दिला. त्यामुळे तो अक्षरशः भारावून गेला. माझ्याजवळ येऊन हात जोडून त्याने माझे आभार मानले. त्या बाईंना रात्रभर 'आयसीयू' मधेच ठेवले गेले. 

मुंबईहून एक मराठी कुटुंब आले होते. त्या कुटंबातील आजींच्या आग्रहाखातर सहाजणांचे ते कुटुंब केदारनाथ दर्शनाला आले होते. त्या आजी वयस्कर होत्याच आणि त्यांच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळीही खूप खाली गेलेली होती. बराच वेळ ऑक्सिजन लावला तरी काही केल्या रक्तातली पातळी उंचावत नव्हती. त्या बाईंचा छातीचा एक्सरे, ईसीजी नॉर्मल होता. शेवटी मी त्या बाईंना सलाईन व इतर उपचार दिले. त्यानंतर त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी जरा नॉर्मल झाली. मी त्या बाईंच्या मुलाला सल्ला दिला की, त्या बाईंना घेऊन लगेच खाली गौरीकुंडला जा. पण त्या लोकांची मनाची तयारी दिसली नाही. "आईच्या इच्छेखातर तर आम्ही तिला घेऊन इथे आलो आहोत. आता तिला केदारनाथच्या दर्शनाशिवाय कसे परत न्यायचे?" असे त्यांचे म्हणणे होते. पण त्या बाईंची तब्येत नाजूक आहे, त्यांना दर्शन करायला नेऊ नका असे मी निक्षून सांगितले. थोड्या वेळाने ते लोक त्या आजींना घेऊन तिथून निघून गेले.

भारताच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या, विविधभाषिक, नानाविध प्रकृतीच्या, आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकांशी बोलणे आणि त्यांच्यावर उपचार करणे, म्हणजे अनुभवांचा अक्षय खजिनाच आहे असे मला न वाटले तरच नवल!

आज दिवसभर माझे डोके खूप दुखत होते. त्यामुळे आज मी सकाळी ११-११.३० च्या सुमारास चहा मागवून घेतला होता. स्वयंपाकघरामधून किटलीभरून चहा आणि टोस्ट आले होते. मी टोस्ट खाल्ले नाहीत, पण दोन-तीन छोटे कागदी कप भरून चहा मात्र प्यायले. चहाने चांगलीच तरतरी आली आणि तसेच मी दिवसभर काम केले. संध्याकाळी डॉ. सुभाषिनीने सर्वांसाठी पाच-पाच रूपयांची नमकीनची पॅकेट्स मागवून घेतली. त्यातले थोडे शेंगदाणे व फरसाण खाऊन जरा तोंडाला चव आली. मी दुपारी जेवत नसल्याने संध्याकाळपर्यंत भूक लागलेली होती. 

संध्याकाळी ७.३५ ला वर आले तर आनंद परत पांघरूण घेऊन कळवळत पडलेला दिसला. मी खाली जाऊन थर्मामिटर आणि pulse oxymeter घेऊन आले. ऑक्सिजन सॅच्युरेशन ठीक होते पण पुन्हा ९९ इतका सौम्य ताप मात्र आलेला होता. मग मी पुन्हा खाली जाऊन, जरा जास्तीच्या पॅरॅसिटॅमॉल गोळ्याही घेऊन आले. 

रात्री सव्वाआठ पर्यंत आम्ही जेवायला गेलो. अरहर दाल, कोबी पुलाव, सोयाचे मुटके घातलेली मिक्स भाजी, दही-बुंदी, आणि गरम फुलके, असे जेवण आम्ही संपवत आणले होते, तेवढ्यात आचाऱ्याने गरम शिरा आणून ठेवला. मग तो शिराही थोडाथोडा खाल्ला. आनंदला रात्री पॅरॅसिटॅमॉलची गोळीही दिली. 

उद्याचा दिवस काय-काय नवीन अनुभव देणार असा विचार करता-करता केंव्हातरी झोप लागून गेली... 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट  

बुधवार, १७ जून, २०२६

केदारनाथ:-भाग-९

काल रात्री झोपायला जरा उशीरच झाला होता. तरी सवयीने सकाळी ५.३० ला जाग आलीच. आनंद आजही जरा कळवळतच उठला होता. त्याच्या अंगात तापही होता. तो व्यवस्थित मोजून पाहायला हवा, म्हणून तो मला म्हणाला, "खाली ओपीडीत जाऊन थर्मामिटर घेऊन ये." मी जाऊन थर्मामिटर व Pulse Oxymeter सुद्धा घेऊन आले. आनंदला १०० ताप होता. पण सुदैवाने त्याचे ऑक्सिजन saturation नॉर्मल होते. "चहा प्यावासा वाटतोय का?" असे मी त्याला विचारले आणि तो 'हो' म्हणाल्यामुळे लगेच वरच्या मजल्यावर जाऊन किचनमधे डोकावले. आचाऱ्याला विनंती करून बिनसाखरेचा चहा करून घेतला. पण तो चहा खोलीत न्यायला त्यांच्याकडे फ्लास्कच नव्हता. म्हणून परत खाली खोलीत येऊन आमचा फ्लास्क घेऊन वर गेले आणि चहा आणला. दोघांनी गरम चहा प्यायला. इथे 'अमूल' ची दूधपावडर येते. त्यात आधीच भरपूर साखर असते. इथले आचारी त्यातही वरून साखर घालतात. त्यामुळे एरवी इथला अति गोड, पाकासारखा चहा प्यायला मला आवडत नाही. मळमळायला होतं. आजचा कमी गोड चहा पिऊन मात्र बरे वाटले. 
हे सगळे होईपर्यंत ६.४५ वाजले होते. बाहेर कडक ऊन पडलेले होते व हिमशिखरे चमकत होती. मला अचानक आठवण झाली की कपडे धुवायला हवेत. आधीच्या दोन वेळा आनंदनेच इथले वॉशिंग मशीन वापरलेले होते. म्हणून त्याच्याकडूनच मी ते कसे चालवायचे ते विचारून घेतले व मशीन लावले. मशीनची soak cycle झाली, वॉश सायकलही झाली आणि स्पिन सायकलसाठी शेजारच्या ड्रममधे कपडे टाकणार, तेवढ्यात नाईट ड्यूटीवर असलेल्या डॉ. शोभितचा फोन आला, "ओपीडीमधे दीड वर्षाचे मूल आले आहे, खूप रडतंय, खाली येऊन प्लीज त्याला बघा", अशी त्याने विनंती केली. म्हणून मग मी स्पिन सायकल लावून खाली पेशंट बघायला गेले. 

ओपीडीमधे एक बाळ जोरजोरात केकाटत होते. मी त्याला व्यवस्थित तपासले. पण त्याला फारसे काही झाले नव्हते. त्याला काहीतरी साधेच औषध देऊन मी under observation ठेवले. थोडावेळ तिथेच थांबून ते मूल शांत झाल्यावरच मी खोलीवर परतले. आमच्या सर्व खोल्यांच्या मागच्या बाजूला एकच कॉमन व्हरांडा-कम-बाल्कनी आहे. त्यामुळे खोलीच्या मागच्या दरवाज्याने वॉशिंग मशिन ठेवलेल्या जागेपर्यंत जाता येते. मी गेले तोपर्यंत स्पिन सायकल संपलेली होती. मागच्या बाल्कनीमधेच तारा बांधून कपडे वाळत घालायची सोय केलेली आहे. अनेकांचे कपडे तिथे लटकत असतात. त्यातच जागा शोधून आपले कपडे वाळत घालायचे असतात. कपडे वाळत घालून मी खोलीवर येईपर्यंत ७.३० वाजले होते. आनंद खूपच दमलेला दिसत होता. तापामुळे रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे तो नाष्टा करायलाही येत नाही म्हणाला. मग मीच पटापटा अंघोळ उरकून, कपडे बदलून नाष्टा करायला गेले. 

आज नाश्त्याला काळे चणे आणि शेवयाची खीर होती. इथे एका नोटीसबोर्डावर आठवडाभराचा मेनू लावलेला असतो. रोजच्या तिन्ही जेवणांमधे नेमके काय-काय असणार ते कळावे अशी सोय आहे. पण मजा म्हणजे, छापील मेनू वेगळाच असतो आणि प्रत्यक्ष जेवणातले पदार्थ वेगळेच असतात.गौरीकुंडहून वर केदारनाथपर्यंत येणारी भाजी-फळे आणि स्वयंपाकघरातल्या आचाऱ्यांची मर्जी, यावरच त्या-त्या दिवशी काय बनवले जाईल हे ठरते. अर्थातच मेनू नावापुरताच लावलेला होता हे मला समजले. माझा नाश्ता चालू असतानाच मी आनंदला फोन करून आजचा मेनू सांगितला आणि विचारले, "तुला काही खायला आणू का?" तो "खीर चालेल" म्हणाल्यामुळे ग्लासमधे खीर घालून नेली. त्याने ती खीर खाल्ली. त्यामुळे मलाच जरा बरे वाटले. पुण्याहून सोबत नेलेले तुळशीचे बी मी सकाळीच भिजवून ठेवले होते. मी ते खाल्लेच होते पण आनंदलाही खिरीत घालून ते खायला लावले.

नेहमीप्रमाणे मी ८.४५ ला कामाला आले. रात्रपाळीचा नर्सिंग स्टाफ पेंगाळलेल्या अवस्थेत होता. कालच्या रात्रभरात खूप जास्त आणि त्यातही बरेच अत्यवस्थ असलेले रुग्ण आले होते. त्यामुळे ती सगळी नर्स मुले-मुली दमलेली होती. शिवाय, OPD मधेही रोजच्याप्रमाणेच पेशंट्सची गर्दी उसळलेली होती. रात्रीच्या चहाचे कप, स्टीलचा जग, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे अर्धवट खाल्लेले पुडे, असा सगळा पसारा माझ्या पुढ्यातल्या टेबलवर होता. मी ते टेबल स्वच्छ करून घेतले आणि लगेच झटून कामाला लागले. 

इथे काही ठराविक स्थानिक पेशंट पुन्हा-पुन्हा येत असतात. त्यामधे इथले हॉटेलवाले, खेचरवाले, हमाल, बांधकामावरचे मजूर, स्थानिक पोलीस आणि देवळातले पुजारी असे लोक असतात. चारधाम यात्रेचे महिने सोडून इतरवेळी, इथे अगदी मोजकेच लोक राहत असल्याने हे सगळे लोक एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांना सांभाळून असतात. त्यामुळे, इथल्या स्थानिक लोकांना आमच्या हॉस्पिटलमधे जराशी 'व्हीआयपी ट्रीटमेंट' असते. यातल्या अनेकांची आणि माझीही आता ओळख झाली होती. इथे येणाऱ्या यात्रेकरुंपैकी बरेच लोक मराठीभाषिक असतात. त्यांना मराठीत बोलणारी डॉक्टर मॅडम बघून साहजिकच खूप दिलासा वाटतो. 

आज डॉ. अजयच्या ऐवजी डॉ. हर्ष ओपीडी ड्यूटीवर आला होता. त्याच्या जागी, मंदिराजवळच्या बूथवर अजय गेला होता. हर्ष अतिशय आस्थेने पेशंट्स बघतो पण तो जरा गप्पिष्ट आहे. जेंव्हा OPD मध्ये पेशंट्सची झुंबड उडालेली असते त्यावेळी प्रत्येक पेशंटसोबत गप्पा मारत बसायची त्याची सवय खूपच नडते. म्हणून अधूनमधून मी त्याला कानपिचक्या देऊन लगबगीने काम करायला लावत होते.   

आज डॉ. सुभाषिनी, म्हणजे आमच्यासोबत हैदराबादहून आलेली सर्जन बाई, छान  तयार होऊन, एक लांब स्वेटर घालून सकाळी दहानंतर तिच्या खोलीमधून खाली आली. बराच वेळ ओपीडीत न येता आतल्या बाजूच्या टेबलापाशी बसून होती. ती पेशाने सर्जन व कॉलेजातली प्राध्यापिका असल्याने, तिला OPDमध्ये सर्दी-खोकल्याचे पेशंट्स बघत बसायला नको वाटत असावे. काहीतरी operative काम मिळाले तर बरे असे तिला वाटत असावे. काही वेळ माझ्याशी गप्पा मारून ती खोलीवर निघूनच गेली. त्यानंतर पुन्हा थोडया वेळाने आली तेंव्हा तिने वेगळ्याच रंगाचा स्वेटर आणि टोपी घातलेली होती. वर एक छानसे जॅकेटही घातले होते. कामाच्या वेळेत चाललेली तिची फॅशनपरेड पाहून मला नवलच वाटले. ती जून महिन्यात कैलास मानसरोवर यात्रा करणार असल्याने त्या यात्रेसाठी तिने अनेक नवीन स्वेटर्स, टोप्या आणि जॅकेट्स विकत घेतलेले होते. त्यापैकीच एकेक कपडा घालून इथल्या थंडीपासून कसा बचाव होतोय, ते तिला बघायचे असावे. तिला नुसते बसून गप्पा मारायला खूप आवडते असे माझ्या लक्षात आले. माझे काम करता-करताच तिच्या गप्पा ऐकताना माझी चांगलीच करमणूक होत होती. 

मी रोज माझे काम मन लावून करत असल्यामुळे मला इथे आल्यापासून खूप समाधान मिळत होते. इथल्या सर्व स्टाफपैकी मीच वयाने सगळ्यात मोठी असूनही मी इतके जास्त काम करते हे बघून इथल्या सगळ्या नर्सिंग स्टाफला माझे फार कौतुक वाटत होते. इथले निवासी डॉक्टर, डॉ. यादव हेदेखील मी आल्यापासून रोज मला विचारत होते, "मॅडम, आपकी तबियत कैसी है? आप ठीक तो हो ना? खांसी-बुखार तो नही है ना?" मला आधी त्यांच्या अशा रोजच्या चौकशीचे जरा आश्चर्यच वाटले होते. पण मग इथल्या नर्सिंग स्टाफकडून समजले की इथे आमच्यासारखे दहा-दहा दिवसांसाठी आलेले कोणीही डॉक्टर्स पूर्ण दिवस काम करूच शकत नाहीत. ते आजारी तरी पडतात किंवा काम न झेपल्याने लवकर खाली हरिद्वारला निघूनच जातात. हे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की इथल्या लोकांना माझे एवढे कौतुक का वाटत होते!

दुपारी खोलीवर येऊन आनंदला बघून गेले. तो झोपलेलाच होता. त्याला जेवणाबाबत विचारले. तो "काहीतरी खाईन" असे अनिच्छेनेच म्हणाला. माझ्याबरोबरचे दोन डॉक्टर्स आधीच वर जेवायला गेलेले होते. म्हणून मग डॉ. हर्षला फोन करून दुपारच्या जेवणाचा मेनू विचारला. सकाळचीच उरलेली खीर पुन्हा जेवणात ठेवलेली आहे, असे त्याने सांगितले. मग डायनिंग हॉलमधे जाऊन मी आनंदला खीर आणून दिली. वाळलेले कपडे खोलीत आणून ठेवले व परत खाली कामाला गेले. आजही मी रोजच्याप्रमाणे ७.३० वाजेपर्यंत काम केले. आज मलाही जरा अंगात कणकण आणि घशात खवखव जाणवत होती. कदाचित उद्या मलाही ताप येईल असे वाटले. पण लगेच, 'तसे न झाल्यास बरे', हा विचारही मनात आला. रात्री आनंदही जेवायला वर आला. कढी-पकोडे, दुधी भोपळ्याची भाजी, भात आणि सकाळचीच खीर असा बेत होता. आज कढी-भातासोबत तळलेले पापडही होते. त्यामुळे जेवायला मजा आली. मी दुपारी जेवले नसले तरी आज चहासोबत थोडे स्नॅक्स खाल्लेले होते. रोज दुपारी ५ च्या सुमारास हॉस्पिटलतर्फे,  म्युसली आणि चॉकोज् असे एक मिश्रण येते. त्याशिवाय आज डॉ. सुभाषिनीने प्रत्येकाला चहासोबत एकेक नमकीनचे पाकीट दिले होते. मी ते स्नॅक्सचे पाकीट घेतले नव्हते. पण रिया नावाच्या नर्सने आग्रह करून मला तिच्या स्नॅक्सच्या पाकिटातले दोन घास खायला लावले होते. 

आज संध्याकाळपासून थोडे बरे वाटते आहे असे आनंद म्हणाला. त्याच्या अंगात तापही नव्हता. पण माझे डोके मात्र जड होऊन, अंगही दुखून आले होते. पहिल्यापासूनच मी मनाशी निर्धार केला होता की काहीही झाले तरी शेवटच्या दिवसापर्यंत मी माझ्या कामात खंड पडू देणार नाही. त्यामुळे मला आजारी पडून चालणार नव्हते. म्हणून आज लवकरच झोपायचा विचार केला आणि तो अमलातही आणला...

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट