रविवार, ९ जून, २०२४

एज इज नॉट जस्ट अ नंबर !

आज एकसष्ठी पूर्ण झाली. मध्यरात्रीपासूनच अनेक मित्र-मत्रिणी,आप्तांच्या आणि माझ्या बालरुग्णांच्या पालकांच्या शुभेच्छांचा  नुसता पाऊस पडतोय. "आतातरी जरा तुझा बालिशपणा सोडून देऊन, जरा पोक्तपणे वागत जा" असा लाडिक सल्ला माझ्या काही 'हितचिंतकांनी' दिला. तर माझा एक वर्गमित्र फोनवर शुभेच्छा देत म्हणाला, "तुला  एकसष्ट वर्षे पूर्ण झाली? खरंच वाटत नाही. तुझ्या वयाचे आकडे उलटे केले तर १६ हा अंक येतो. परवाच तू तोरण्यासारखा अवघड किल्ला सर केलास. त्यामुळे मला तर तू अजून षोडशाच वाटतेस!" त्याचे ते बोलणे ऐकून मी मनोमन अगदी सुखावले होते. माझ्या काही मोठ्या भावंडानी, 'साठ प्लस' या गटामध्ये माझे मागच्या वर्षीच सहर्ष स्वागत केले होते. आयुष्यातला साठीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडून, वर एक वर्ष उलटून गेल्यामुळे 'साठ प्लस' या गटामधले माझे स्थान पक्के झाले. माझ्या मोठ्या भावंडानी आणि आप्तस्वकीयांनी माझे हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या! पण आता यापुढे तब्येतीला जपायला  हवे असा प्रेमळ सल्ला दिला. माझ्या काही आत्या मावशा आणि काकूंनी, "अगंबाई मागच्याच वर्षी तू साठ वर्षांची झालीस नाही का? खरंच  वाटत नाही गं.  मला तर तू अजूनही अगदी फ्रॉक आणि दोन वेण्यातलीच अल्लड मुलगी आठवतेस!" 

एकूण काय? माझ्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला बोलले तसेच या वर्षीही मला शुभेच्छा देणारे सर्वजण 'वय' या संकल्पनेच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दलच बोलत होते. त्यामुळे व्यक्तीच्या वयाबद्दल किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात, याचा मला पुनःप्रत्यय आला. सर्वसाधारणपणे वय मोजताना आपण जन्मतारखेपासून किती वर्षे उलटली, इतका आणि इतकाच विचार करत असतो. पण वैद्यकीय परिभाषेमधे केवळ या वयाचा विचार न करता, वयाच्या वेगवेगळ्या पैलूंचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वयाचाही विचार केला जातो. जन्मदिवसापासून आजतागायत जो काळ उलटून गेला आहे त्याला आम्ही Chronological Age म्हणतो. ते महत्त्वाचे असतेच. पण बुद्ध्यांक काढण्यासाठी Mental Age हे खूप महत्त्वाचे ठरते. म्हणजे एखाद्या ठराविक वयाच्या मुला-मुलीच्या मेंदूची वाढ आणि प्रगल्भता, त्यांच्याच वयाच्या इतर मुला-मुलींच्या मेंदूइतकी झाली आहे की नाही, यावर त्या मुला-मुलीचे Mental Age ठरते. Mental Age हे Chronological age च्यापेक्षा बरेच कमी असेल तर त्या व्यक्तीला मतिमंद म्हटले जाते. Mental Age हे Chronological age च्या बरोबरीचे असेल तर  त्या व्यक्त्तीचा बुद्ध्यांक १०० असतो. Mental age हे Chronological Age च्या पेक्षा जास्त असणे, अर्थात तुमचा बुद्ध्यांक जास्त असणे, हे कधीही चांगले समजले जाते.  

कायद्याच्या परिभाषेमधे Legal Age ला खूपच महत्त्व असते. लग्न करणे, मतदानाचा हक्क मिळणे अशा अनेक गोष्टींसाठी Legal Age लक्षात घेतले जाते. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली नसल्यास, त्या व्यक्तीला भारतीय कायद्याच्या नजरेमध्ये 'अल्पवयीन' समजले जाते. 'अल्पवयीन' वयोगटासाठीचे कायदे, त्यांच्यातील गुन्हेगारांना मिळणाऱ्या शिक्षा वेगळ्या असतात. अशा अल्पवयीन व्यक्तींना कायद्याने काही विशेष हक्कही दिले गेलेले आहेत. हे हक्क, व हे कायदे बालकांच्या सुरक्षिततेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. काही दिवसांपूर्वी, साडेसतरा वर्षे वयाच्या एका मुलाकडून  पुण्यात घडलेल्या एका मोठ्या अपघातानंतर, Legal Age वर खूप उहापोह झाला. असाच उहापोह 'निर्भया' हत्याकांडाच्यावेळीही झाला होता. बाल न्याय अधिनियमातील तरतुदींनुसार, वय वर्षे १६ ते १८ च्या दरम्यानच्या कुणा व्यक्तीने एखादा जघन्य अपराध केल्यास, त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे तज्ज्ञांद्वारे मूल्यमापन केले जाते. सदर गुन्हा करण्याकरिता व त्याचे परिणाम जाणण्यासाठी ती व्यक्ती सक्षम असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिल्यास त्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीने 'प्रौढ' मानून खटला चालवला जाऊ शकतो व तिला कठोर शिक्षा होऊ शकते.   

एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वयाच्या मानाने,  तिच्या शारीरिक अवयवांचे वय किती आहे? म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे अवयव त्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या अवयवाच्या मानाने कितपत सक्षमपणे काम करू शकत आहेत यावरून त्या व्यक्तीचे Biological Age ठरते. आपला आहार, आपल्या आरोग्यपूर्ण सवयी, आपली जीवनशैली, आपली अनुवांशिकता अशा अनेक घटकांवर आपले Biological age अवलंबून असते. आपल्या Chronological Age च्या मानाने शरीर कमी थकलेले असेल तर आपले Biological Age कमी आहे असे म्हटले जाते, व ते कमी असणे वैद्यकीय दृष्ट्या त्या व्यक्तीच्या दीर्घायुरोग्यासाठी उत्तम असते. अशा व्यक्ती वयोवृद्ध होईपर्यंत कार्यक्षण आणि कार्यरत राहू शकतात. त्यामुळे, कोणालाही आपल्या Chronological Age च्या मानाने आपले Biological Age कमी असावे असे वाटणे सहाजिकच आहे.

जीवनातल्या वेगवेगळ्या  परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, एखादी व्यक्ती तिच्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या मानाने,  मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहे, यावर त्या व्यक्तीचे Psychological Age ठरते. वयाच्या मानाने Psychological Age जास्त असलेल्या व्यक्ती, तिच्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने नवनवीन आव्हानांना सहजी तोंड देऊ शकतात, जास्त उत्साही असतात, नवीन कौशल्ये लवकर आत्मसात करू शकतात, नवीन व्यवसाय किंवा नोकरीमध्ये लवकर आणि सहजी रुळू शकतात किंवा अगदी नवीन विषय व अभ्यासक्रम सहजी पूर्ण करू शकतात. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये एकप्रकारची लवचिकता असते. म्हणजेच, Chronological Age च्या मानाने Psychological Age जास्त असणे चांगलेच म्हणायचे!

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीकडून एखाद्या संस्कृतीतील सामाजिक नियमानुसार काही ठराविक वर्तनाची अपेक्षा असते. यामध्ये आपली कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडणे, आपले शिक्षण वेळेवर पूर्ण करणे, अशा गोष्टींचा समावेश असतो. एखादी व्यक्ती, आपल्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने स्वतःच्या सामाजिक जबाबदाऱ्या किती सहजी आणि समर्थपणे पार पडते, यावर त्या व्यक्तीचे Social Age अवलंबून असते. म्हणजेच  Chronological Age च्या मानाने Social Age जास्त असणे, कधीही चांगलेच समजले जाते. 

थोडक्यात काय? आपल्या Chronological Age च्या मानाने आपले mental age, Psychological Age आणि Social Age जास्त असणे,  परंतु Biological Age कमी असणे हे सर्वोत्तम! 

म्हणूनच मी म्हणते, "एज इज नॉट जस्ट अ नंबर!"

रविवार, २६ मे, २०२४

प्रेरणादायी तोरणा सहल!

या वर्षी एप्रिल-मे महिन्यांतल्या उकाड्यामुळे फारच हैराण व्हायला झाले होते. दोन-तीन दिवस महाबळेश्वरला जायचे पक्के केले होते. पण तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावातल्या एका रिसॉर्टबद्दल समाजमाध्यमात आलेली एक पोस्ट वाचली आणि तिकडे जावे असे अचानक मनात आले. आम्ही दोघे, माझे वडील दादा, माझा आतेभाऊ राजीव, आणि माझे सोलापूरस्थित काका, श्री. हरि गोडबोले आणि सौ. प्रियंवदाकाकू अशा सहाजणांनी जायचे ठरवले. 

आम्ही चौघे पुण्याहून आणि काका-काकू सोलापूरहून, पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचलो. त्या रिसॉर्टमधून अगदी समोरच तोरणा दुर्ग दिसत होता. वामकुक्षीनंतर चहासाठी म्हणून बागेमध्ये बसलो असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. काही क्षणांतच समोरचा तोरणा दुर्ग ढगांच्या आणि धुक्याच्या आड दिसेनासा झाला. सगळ्या परिसरातील दिवे गेलेले असल्याने, बाहेरच पण जरा आडोश्याला बसून  रिसॉर्टच्या मालकांशी मनसोक्त गप्पा झाल्या. तोरणा चढायला आणि उतरायला किती वेळ लागतो, गाडी कुठपर्यंत जाऊ शकते, ही माहिती त्यांच्याकडून समजली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गडावर जायचे, असे मी, आनंद व राजीवने फारसा विचार न करता ठरवूनच टाकले. सहलीला निघण्यापूर्वी, तोरणा गडाबाबत काहीही वाचलेले नव्हते किंवा गड चढायचा विचारही केलेला नव्हता हे विशेष.

पहाटे साडेपाच वाजता रिसॉर्टमधून आमच्या गाडीने निघून, आम्ही तिघे तोरणा गडाच्या पायथ्याशी  पोहोचलो. आम्ही बरोब्बर पावणेसहा वाजता चढायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच्या मुसळधार पावसामुळे वाटेवरची खडी चढण निसरडी झाली होती. त्यावेळी आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. आम्ही slow but steady अशा पद्धतीने, कुठेही न थांबता सतत चढत राहिलो. साधारण वर्षभरापूर्वी आनंदला हार्ट अटॅक येऊन त्याची  दोनवेळा angioplasty झालेली असल्यामुळे, माझ्या मनामध्ये जरा धाकधूक होती. पण मी ती कोणाजवळही बोलून दाखवलेली नव्हती. किल्ला चढायला लागल्यानंतर माझीच इतकी दमछाक होत होती की काही बोलायला माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, हे वेगळेच. माझ्या शरीरातला 'अतिरिक्त' भार पेलत चढणे, हे मोठे जिकिरीचे काम होते. त्या मानाने राजीव आणि आनंदला कमी कष्ट पडत होते. जरूर पडेल तेंव्हा ते दोघे मला हातही देत होते. 

अर्धी चढण चढून आम्ही आलो असू तेंव्हा आमच्या मागून काही कोवळी मुले आरडा-ओरडा करत, एकमेकांची चेष्टा करत, गाणी म्हणत, ठिकठिकाणी सेल्फ्या काढत वर येताना दिसली. ती मुले अगदी लीलया वर चढत होती. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आलेली जेमतेम सोळा-सतरा वर्षांची ही मुले, हातकणंगल्याहून आली होती. त्यांचे ते सरसर गड चढणे पाहून, त्यांच्यामध्ये मला सोळा-सतरा वर्षे वयाचे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच दिसू लागले. त्या कोवळ्या वयात, शिवरायांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले, इतर समवयस्क मुलांना प्रेरित केले, हा किल्ला जिकंण्याची मोहीम आखली आणि ती यशस्वीरीत्या पारदेखील पाडली, हे सगळेच आज आपल्यासाठी आश्चर्यकारक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच दुर्ग आहे. आम्ही दोन तासात गडावर पोहोचलो. तिथे थोडेफार फिरून, काही फोटो काढून आणि सभोवतालचे नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवून आम्ही खाली उतरायला लागलो. त्या वेळी, वीस ते तीस वयोगटातले अनेकजण गड चढताना आम्हाला दिसत होते. बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने पुण्याहून आलेली कॉलेजची मुले, बँकेतील कर्मचारी, अंत्रोळीहून आलेल्या काही मुली अशी तरुणाई भेटल्यामुळे खूप छान वाटले. पुण्यातील एका कॉलेजचा गट तर चक्क हातात शिवरायांचा जरीपटका घेऊन वर येताना दिसला. त्यांना थांबवून, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायचा मोह आवरता आला नाही. आजच्या तरुण पिढीला इतक्या वर्षानंतरही शिवरायांचा प्रताप प्रेरणादायी ठरत आहे, हे विशेष.  

वेल्हे गावाजवळच, मढे घाटातला लक्ष्मी धबधबा अतिशय प्रेक्षणीय आहे, असे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकच समजले. तो बघायला म्हणून, सकाळी साडेसातच्या सुमारास गाडीने बाहेर पडलो. अर्थात भर उन्हाळ्यात आम्हाला धबधबा बघायला मिळणार नव्हताच. वाटेवर गुंजवणी धरणाचा बंधारा आणि भट्टी वाघदरा, केळद वगैरे गावे लागली. वेल्हे गावातून सोळा किलोमीटर, वळणावळणाचा घाटरस्ता पार करून आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो. बराचसा रस्ता निर्मनुष्य होता. ज्या मोकळ्या पठारावरून खाली धबधबा दिसतो, त्या जागेजवळ आम्ही पोहोचलो. सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. अचानक काही लोकांचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पुढे जाऊन पहिले तो, पाच-सहा पुरुषमंडळींनी पठारावरच्या मोकळ्या जागेत लहान-लहान तंबू ठोकून रात्रभर मुक्काम केला होता, असे समजले. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून बरीच माहिती मिळाली. केळद गावामध्ये तंबू भाड्याने मिळतात, असेही समजले. पुण्याच्या अभिनव स्थापत्य महाविद्यालयातील प्राध्यापक, श्री. अतुल भागवत नामक अवलियाबरोबर त्यांचे एक-दोन नातेवाईक व मित्र, खास पौर्णिमेच्या रात्री मुक्कामाला तेथे आलेले होते. प्रा. भागवत यांना अवलिया म्हणण्याचे कारण असे की, दर पौर्णिमेच्या रात्री, ते इथे येऊन मुक्काम करतात, कधी नातेवाईक अथवा मित्रकंपूसोबत, तर कधी एकटेच! हे ऐकून आम्हाला अगदी अवाक व्हायला झाले. सरांकडे स्वतःचे दोन तंबूदेखील आहेत. आमच्या परतीच्या  वाटेवर, केळद गावातली देवराई बघून जायचा सल्ला भागवत सरांनीच आम्हाला दिला. 

देवराईची संकल्पना, पावित्र्य आणि त्यामागची गावकऱ्यांची भावना याबाबत आम्हाला पूर्वकल्पना असली, तरीही प्रत्यक्ष देवराईला भेट देण्याचा अनुभव खूपच सुखद होता. ही देवराई तशी छोटीशीच आहे. देवळाभोवती, वर्षानुवर्षे  गावकऱ्यांनी आपुलकीने जतन केलेली झाडे बघून भारावून जायला झाले. आम्ही वाटेवर पाहिलेल्या भट्टी वाघदरा या गावामधे, लोखंड वितळवून शस्त्रास्त्रे बनवण्याची शिवकालीन भट्टी आहे, अशी माहिती आम्हाला नंतर एका मित्राकडून कळली. पण ती माहिती कळेपर्यंत आम्ही वेल्ह्याला पोहोचलो होतो. त्यामुळे ही भट्टी बघायच्या निमित्ताने, पुन्हा या परिसराला भेट द्यायचे आम्ही मनाशी ठरवले. 

दोन दिवसांची आमची ही छोटीशीच सहल अनेक कारणांमुळे अविस्मरणीय झाली. 

काहीही न ठरवता आणि माहिती न घेता गेलेलो असूनही आम्ही तोरणा किल्ला चढलो. किल्ल्याची चढण बरीच अवघड आहे, हे आधी कळले असते तर माझ्याच मनाने कदाचित कच खाल्ली असती! कारण, मागच्या वर्षी, १२ जून २०२३ रोजी आनंदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये तयार झालेल्या गुठळीमुळे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती. (१००% ब्लॉक). त्यावेळी 'इमर्जन्सी अँजिओप्लास्टी' द्वारे ती गुठळी काढून स्टेंट बसवावा लागला होता. त्याच वेळी त्याच्या हृदयाची आणखी एक मोठी रक्तवाहिनी ७० ते ८०% बंद असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. पण तो अत्यवस्थ असल्याने, दुसरी अँजिओप्लास्टी लगेच न करता, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केली गेली. आमच्या तोरणा मोहिमेमधे आनंदच्या हृदयाच्या क्षमतेचा कस लागला, आणि मोहीम यशस्वी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला. 

अनेक तरुण-तरुणी, नुसते लोळत सुट्टी न घालवता, किल्ला चढायला आलेले बघूनही आम्हाला खूप कौतुक वाटले. किल्ल्याची अवघड चढण चढताना, "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.. .." हे शब्द मनामध्ये घोळत होते. प्रा. अतुल भागवतांच्या भटकंतीच्या कथा ऐकून मी अगदी भारावून गेले. 

एकूण काय, तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या उत्तुंग, 'प्रचंडगड', अर्थात तोरणा गडाला भेट देऊन मला नवीन ऊर्जा तर मिळालीच, पण तिथली शुद्ध हवा पिऊन, आणि पक्ष्यांचे मंजुळ गान ऐकून, प्रसन्न मनाने आम्ही पुण्याला परतलो.        

सोमवार, ६ मे, २०२४

कर्णफुलांच्या गोष्टी!

त्या दिवशी जोरजोरात सायकल चालवत, मी कशीबशी कॉलेजमधे वेळेत पोहोचले होते. पहिला तास सुरू व्हायला जेमतेम एक-दोन मिनिटे बाकी होती. आम्ही मैत्रिणी वर्गात शिरून बाकांवर बसत असतानाच माझी एक मैत्रीण माझ्याकडे बघून हासत-हासत उद्गारली,
"स्वाती, काय गं हे? एकाच कानात रिंग घातली आहेस. दुसऱ्या कानातली रिंग घालायला विसरलीस की काय?"
मी चपापून दोन्ही कानांना हात लावला, तर काय? खरोखर फक्त एकाच कानात रिंग होती. तितक्यातच आमचे प्राध्यापक वर्गात शिरले आणि त्यांनी  तास चालू केला. 

माझी छाती धडधडायला लागली. सकाळी घरातून निघताना, दोन्ही कानामधे सोन्याच्या रिंग्ज घातल्याचे मला निश्चित आठवत होते. पण मग एक रिंग गेली तरी कुठे? सरांच्या शिकवण्याकडे माझे लक्षच लागेना. आता घरी गेल्यावर कुणाकुणाची, किती आणि काय-काय बोलणी खावी लागतील, या विचाराने मी भलतीच अस्वस्थ झाले. ती  रिंग वाटेत कुठे पडली असेल का? पडली असली तर कुठे? माझ्या मनांमध्ये सगळ्या उलट-सुलट विचारांनी जणू रिंगणच धरले. 
सरांचा तास संपेपर्यंत मी कशीबशी कळ काढली. सर बाहेर पडल्याबरोबर, मीही तडक वर्गाच्या बाहेर पडून  सायकल  मारत घराच्या दिशेने निघाले. पण घरापर्यंत न जाता, काहीतरी विचाराने वाटेतच एके ठिकाणी मी थांबले. तिथेच खाली बसून, वेड्यासारखी तिथल्या धुळीमध्ये हात फिरवत मी शोधू लागले. आणि आश्चर्य म्हणजे त्या धुळीत माझी सोन्याची रिंग चकाकताना मला दिसली! माझा जीव भांडयात पडला. मी ती रिंग उचलून कानात घातली  आणि पुन्हा सायकल पळवत  कॉलेजात येऊन पोहोचले!

त्याचे असे झाले होते की, मी घरातून बाहेर पडताना माझा 'एप्रन' बॅगमध्ये ठेवला होता. सायकलवर कॉलेजला निघणार तेवढ्यात लक्षात आले की सायकलमध्ये हवा अगदीच कमी आहे. म्हणून मग सायकल हातात धरून चालत जवळच्या सायकलवाल्याकडे गेले. सायकलमध्ये हवा भरायला थांबलोच आहोत तर, नंतरचा वेळ वाचावा म्हणून, बॅगमधला एप्रन बाहेर काढून मी गडबडीत अंगावर चढवला. हे सगळे मला आठवत होते.  कदाचित एप्रन घालताना ती रिंग माझ्या कानातून निसटून खाली पडली असेल ही एक शक्यता होती. म्हणून मी तिथे शोधू लागले आणि खरोखरच तसे झाले असल्याने ती रिंग मला मिळाली.
 

तुम्ही म्हणाल, आज इतक्या वर्षानंतर ही गोष्ट सांगण्याचे काय कारण? ते कारणदेखील कर्णफुले हरवण्याच्या अलीकडच्या काही घटनांबाबतीतले आहे.  परंतु, ते माझ्या कर्णफुलांचे नाही आणि ती कर्णफुलेही एका वेगळ्याच प्रकारची आहेत! 

नव्वदी पार केलेल्या माझ्या वडिलांनी, आमच्या आग्रहाखातर, चार-पाच वर्षांपूर्वी, त्यांच्या दोन्ही कानांसाठी मशिन्स  (hearing aid) विकत घेतली. अतिशय चांगल्या प्रतीची व नवीन तंत्रज्ञान वापरून बनवलेली ती यंत्रे बऱ्यापैकी महाग होती. एकेका कानाचे मशीन जवळपास लाख-लाख रुपयाचे होते. त्यांच्या या कानाच्या मशीन्सबद्दल, आम्ही गमतीनेच, "दादा, ही तुमची कर्णफुले आहेत", असे म्हणतो. आणि ही मौल्यवान कर्णफुले  माझ्या वडिलांकडून अनेक वेळा आणि वेगवेगळ्या प्रकारे गहाळ होत राहतात. 
चाळीस वर्षांपूर्वी माझ्या कानातली रिंग गायब झाली होती, तेंव्हा मी वडीलधाऱ्यांच्या भीतीने कावरी-बावरी झाले होते. गंमत म्हणजे आज वडिलांची कर्णफुले गहाळ झाली की, माझ्या धाकाने ते कावरेबावरे होतात!

वडिलांची दोन्ही मशिन्स एकाचवेळी दिसेनाशी झाली की आम्हाला जवळजवळ खात्रीच असते की त्यांनी ती नेहमीच्या जागी न ठेवता दुसरीकडे कुठेतरी ठेवली असणार. थोडी शोधाशोध केली की ती सापडतात. पण एकच मशीन गायब झाले तर मात्र फारच मोठे शोधकार्य हाती घ्यावे लागते. 
कुठल्यातरी शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात, कधी बाथरूममध्ये, कधी खुर्ची किंवा सोफ्याच्या सीटखाली, तर कधी चष्म्याच्या केसमध्ये, अशा वेगवेगळ्या आणि अकल्पनीय जागी आम्हाला ते कर्णफूल सापडते. 

एकदा असेच, त्यांचे एकाच मशीन दिसेनासे झाले. आम्ही सगळे घर उलथे -पालथे केले. त्यांची खोली दोन-दोनदा झाडून काढली. अगदी कपाटे आणि टेबलाखालूनही झाडू फिरवला. पण मशीन काही सापडले नाही. त्या दिवशी वडिलांनी त्यांचे कपाट आवरले होते. त्या आवरा-आवरीनंतर बराच सुका कचरा फेकून दिल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. काहीच मिनिटांपूर्वी आमच्या इमारतीत कचरा गोळा करायला येणाऱ्या बाईला, आमच्या घरातला सगळा सुका कचरा आम्ही दिला होता. मशीन कचऱ्यात गेले असेल तर तिला शोधायला सांगावे म्हणून गडबडीने तिला फोन केला. तर ती म्हणाली, "अवो, आत्ताच तर सगळा कचरा महानगरपालिकेच्या गाडीवाल्याला दिला की!"
 
मग काय? आम्ही महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीचा माग काढत-काढत गेलो. बरेच लांब गेल्यावर एका सोसायटीच्या बाहेर ती गाडी दिसली. त्या गाडीवरचा असंख्य पोत्यामधून, आमच्या इमारतीतील पोते आम्ही अंदाजाने शोधून काढले. ते पोते उलटे करून बघितले. पण त्या पोत्यामध्ये ते मशीन काही सापडले नाही. 

हताश होऊन आणि काहीसे वैतागून आम्ही घरी परत आलो. मशीन शोधण्याच्या नादात, घरात बराच पसाराही आम्ही करून ठेवला होता. तो आवरण्याचे  काम होतेच. माझे वडील तोंड पाडून, एका कोपऱ्यात बसून होते. आपल्यामुळे आपल्या मुलीला आणि जावयाला त्रास सहन करावा लागतोय, अशी कमालीची अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. आम्ही दोघांनी त्यांना धीर दिला. आजच नवीन मशीन घेऊन टाकूया असे सांगितले आणि घरातला पसारा आवरायला लागलो. आवरून झाल्यावर जरा नीट स्वच्छता करावी या हेतूने वडलांच्या खोलीतले टेबल पुढे ओढून त्यामागून व त्याखालूनही पुन्हा झाडून घेतले. टेबल भिंतीकडे सरकवत असतांना, टेबलाच्या मागच्या पट्टीला ते मशीन अडकून, लटकलेल्या अवस्थेत दिसले! 

आम्हाला सर्वांनाच काय आनंद झालाय म्हणून सांगू!

त्याच कर्णफुलाची काल संध्याकाळी घडलेली गोष्ट. 
वडिलांच्या एका कानातले मशीन जरा विचित्रपणे बाहेर आल्याचे मला जाणवले. पाहते तर काय, कानाच्या मागे बसणार मशीनचा मुख्य भाग व्यवस्थित होता, पण कानाच्या आत जाणारा छोटा रिसीव्हर मात्र गायब झालेला दिसत होता. पुन्हा घर झाडणे, गाद्या उलट्या-पालट्या करणे, चादरी झटकणे, ठिकठिकाणी शोधाशोध करणे हे सगळे सोपस्कार झाले. पण तो तुकडा काही मिळेना. सहज माझ्या डोक्यात काहीतरी आले. मोबाईलच्या टॉर्चने, वडिलांच्या कानाच्या आत प्रकाशझोत टाकला, तर काय? तो तुकडा तुटून, त्यांच्या कर्णनलिकेच्या (Auditory  Canal) बराच आत रुतून बसलेला दिसला! मग सर्जिकल चिमट्याच्या साहाय्याने, आम्ही तो मोठ्या खुबीने बाहेर काढला.

 
कर्णफुले हरवण्याच्या आणि गवसण्याच्या या काही गमतीदार गोष्टी षट्कर्णी व्हाव्यात यासाठीच हा लेख!

रविवार, ५ मे, २०२४

जागतिक हास्यदिन?


आज सकाळी नेहमीप्रमाणेच फिरायला गेले होते. तिथे ठिकठिकाणी घोळक्यामधे उभे राहून काही मंडळी जोरजोरात हासताना दिसली. तशी ती मंडळी नेहमीच हासतात. पण आज जास्त जोरात हासत होती! समाजमाध्यमांतून आज 'जागतिक हास्यदिन' असल्याचे कळले आणि मला हासायलाच आले.





अमेरिकन लोकांनी mother's day आणि father's day साजरा करायला आपल्याला शिकवले. खरंतर आई-वडिलांवर प्रेम करायला, त्यांच्या ऋणांची उतराई करायला एखादा दिवस राखून ठेवण्याची कल्पना सुद्धा मला हास्यास्पद वाटते. पण डॉकटर मदन कटारिया, या एका भारतीय डॉक्टरने जगाला 'हास्यदिन' साजरा करायला शिकवले, हे वाचून कुठेतरी बरे वाटले. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी, उकाड्याने हैराण झालेलो असतानाही 'हास्यदिन' साजरा करायच्या निमित्ताने लोकं जोरजोरात हसायला लावणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे!

सध्या निवडणुकीचे वारे चालू असल्याने आपल्या सर्वांना नेतेमंडळी हासण्याची भरपूर संधी देत आहेत. समाजमाध्यमामधून नेत्यांवर किंवा राजकीय पक्षांवर होणाऱ्या टिप्पण्या, कविता, मिम्स आपल्याला सात हसवत राहत आहेत. 

पण खरं सांगा  हासायला आपल्याला काही कारण लागते का?

सकाळी बरेचदा फिरायला बाहेर पडते तिथे काही व्यक्ती वरचेवर भेटतात. अशा व्यक्ती कधीकधी माझ्याकडे बघून हासतात. कधी मी अशा व्यक्तींकडे बघून मी हासते. मी त्यांच्या हास्याचे आणि ते माझ्या हास्याचे, हासून स्वागत करतो. आमची अगदी छोटीशी 'हास्यमैत्री' होते. ती मैत्री जवळपास नि:शब्द असते. परस्परांकडे बघून हासण्यापेक्षा ती फार पुढे जाते असे नाही. पण रोज असे हासरे चेहरे मनाला आनंद देऊन जातात, हे मात्र खरे.

सिग्नल नसलेल्या रस्त्यावर, एखादा वाहनधारक आपल्या कडे बघत, सुहास्य करत आपल्याला त्याच्या किंवा तिच्याआधी जाण्याची खूण करतो. कधीकधी आपणही असे हासून  दुसऱ्याला आपल्या आधी जाण्याचा इशारा करतो. भर रहदारीच्या रस्त्यावर, आपण कातावलेले असताना हे हास्य दोन्ही पक्षांना सुखद वाटते.

व्हॉट्सअप, फेसबुक, इंन्टाग्रॅम मुळे तर क्षणाक्षणाला हास्याची कारंजी उडत असतात. त्या पोस्ट वाचून/ऐकून/बघून आपण प्रत्यक्षात हासतोच पण पोस्टकर्त्याला स्माईलींची बरसात करून 'हास्यपावती' पाठवतो.

थोडक्यात काय? दिवसभर अनेक कारणांमुळे मी हासतच असते. हास्यदिन साजरा करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक दिन हा 'हास्यदिन' समजून साजरा करत राहायला काय हरकत आहे?

 डॉक्टर स्वाती बापट, पुणे

रविवार, ७ एप्रिल, २०२४

अलगद झेलणे...

आज पहाटे आमच्या घराजवळच्या आर्मी सब एरियाच्या मैदानामध्ये फिरायला गेले होते. तिथे चालण्यासाठी एक छोटाच पण अगदी छानसा सिन्थेटिक ट्रॅक केलेला आहे. त्या मैदानाच्या आवारात खूप जुनी, मोठमोठालीं झाडे आहेत. त्या झाडांची सावली वॉकिंग ट्रॅकवर पडते. तसेच त्या झाडांवर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी किलबिल करत असतात.  वॉकिंग ट्रॅकच्या कडेकडेने रंगीबेरंगी फुलांची झुडपे लावलेली आहेत. एकूणच, या सर्व वातावरणात चालणे अतिशय आनंददायी असते.  

आज चालताना ट्रॅकच्या बाजूच्या हिरव्यागार झुडुपावर (Calyptocarpus Vialias) लक्ष गेले. वसंत ऋतूमध्ये या झुडुपावर अतिशय नाजूक अशी पिवळी धमक्क फुले येतात. गर्द हिरव्या पानांच्या मखमली पार्श्वभूमीवर ती पिवळी फुले उठून दिसतात. ते बघायला मला खूप आवडते. आज, नेहमीच्या फुलांबरोबरच, पण या झुडुपाच्या फुलांपेक्षा वेगळ्या आकाराची लहान-मोठी अनेक पिवळी फुले या झुडुपावर मला दिसली. मी जरा निरखून बघितल्यावर, ती फुले या झुडुपाची नसून, शेजारी असलेल्या पिवळ्या गुलमोहोराची (Peltophorum Petrocarpum) फुले आहेत असे लक्षात आले. त्या झाडाची फुले गळून खाली असलेल्या या हिरव्या झुडुपावर पडलेली होती. या झुडुपाने, जणू आपलीच फुले असल्यासारखी पिवळ्या गुलमोहराची ती फुले आपल्या अंगाखांद्यावर अलगद झेललेली होती. ते बघून मला, माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली.  

पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले अगदी हक्काने मामाच्या घरी जात. मामा-मामीची तीन-चार मुले आणि पाहुणे म्हणून आजोळी आलेली पाच-सहा भाचरंडे अगदी गुण्यागोविंदाने तिथे नांदत. स्वतःच्या मुलांमध्ये आणि नणंदांच्या मुलांमध्ये कुठलाही भेदभाव न करता, आमच्या माम्या सर्व मुलांना प्रेमाने खाऊ-पिऊ घालायच्या, त्यांचे रुसवे-फुगवे काढायच्या आणि त्यांचे अमाप लाड करायच्या. त्यामुळेच आमच्या पिढीतल्या सर्वच मुलांचा 'मामी' हा एक जिव्हाळ्याचा विषय असायचा. आजोळी एकत्र जमलेले ते लेंढार आनंदाने आणि अलगद 'झेलणाऱ्या' त्या माऊल्या खरोखर कौतुकाला पात्र होत्या! 

एखाद्या प्रसंगाला, किंवा व्यक्तीला 'झेलणे' या उक्तीमधे जरासा नकारात्मक भाव आहे.पण 'अलगद झेलणे' असं म्हटलं की त्या उक्तीला एक सकारात्मकता येते. आजकालची अनेक मुले लग्नच करायला नको म्हणतात. बरं, लग्न केलेच तर आम्हाला मूल नकोच आहे, एकापेक्षा जास्त तर नकोच नको, अशीच विचारसरणी हल्ली होत चालली आहे. आमच्या नंतरच्या पिढीतली कित्येक नाती आधीच हद्दपार होऊन गेली आहेत. आता तर काय? दर घरटी फक्त एकच मूल असल्याने मुलांना भावंडंच नसतात. त्यामुळे त्यापुढच्या पिढीत सख्खा मामा, मावशी, काका आत्या ही नाती नाहीत मग आते, मामे, चुलत आणि मावस भावंडे कुठून असणार? 

आजोळी जाणे, मामा-मामीच्या अंगाखांद्यावर अलगद खेळणे, मामीशी गुळपीठ असणे आणि हितगुज करणे  या सगळ्या गोष्टींना भावी पिढीला मुकावे लागणार आहे. आपला संपूर्ण समाज कुठेतरी निसर्ग-नियमाच्या विरोधात चालला आहे असं मला वाटतं. पटतंय का तुम्हाला?



        

बुधवार, २० मार्च, २०२४

चिमणी पाहावी शोधून!

आज २० मार्च, म्हणजे जागतिक चिमणी दिवस. 

वळचणीला बसलेल्या आणि सर्वत्र चिवचिवाट करत असलेल्या असंख्य चिमण्या मी लहानपणी पहिल्या होत्या. आज चिमणीचे दर्शन केवळ स्वप्नांमधेच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या दुर्लक्षित पक्ष्यासाठी पुढे कधीतरी एखादा 'जागतिक दिवस' राखून ठेवला जाईल असे लहानपणी मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.  

रोजच्याप्रमाणेच आजही सकाळपासून दिवसभर व्हाट्सऍपवर केवळ चिवचिवाटच चालू होता. त्यामध्ये 'चिमणी' या विषयावरचे बरेच लेख, कविता आणि विनोदही होते. आमच्या शाळेतल्या एका शिक्षिकेचे टोपणनाव विद्यार्थ्यांनी 'चिमणी' असे ठेवले होते. आमच्या शाळेच्या व्हाट्सऍप ग्रुपवर एका वात्रट विद्यार्थ्याने आज त्या 'चिमणाबाईंची' सुध्दा आवर्जून आठवण काढली! पण गेले काही दिवस माझ्या मनामध्ये मात्र एक वेगळीच चिमणी चिवचिवत होती. आजच्या या 'जागतिक चिमणी दिनाचे' औचित्य साधून, त्या चिमणीवर एक लेख लिहून काढायचा मोह मला आवरला नाही!

आमच्या घराचे नूतनीकरण करण्याचा धाडसी निर्णय आम्ही नुकताच अमलात आणला. धाडसी निर्णय अशासाठी असे की नूतनीकरणाच्या काळामध्ये, गेले तीन महिने आम्ही आमच्याच घरामध्ये निर्वासितांसारखे राहत होतो. एक-दोन भिंती फोडणे, बाथरूम्स नवीन करणे, खिडक्या बदलणे अशा इतर कामांबरोबर आम्ही 'मॉड्युलर किचनही' करून घेतले. त्या किचनबरोबर 'चिमणी' अत्यावश्यक आहे, हे समजल्यामुळे 'किचन चिमणी'ची शोधाशोध सुरु केली. आजच्या काळात एखादी उडती-फिरती चिमणी शोधण्यापेक्षाही 'किचन चिमणी' शोधणे जास्त अवघड आहे, असे माझ्या लक्षात आले. अनेक वेबसाईट्स, यू-ट्यूब व्हिडीओ, मैत्रिणींची मते आणि समाजमाध्यमातील अनेक ग्रुप्सवर शोधाशोध केल्यावर मी जास्तच संभ्रमात पडले. 

मिळत गेलेल्या माहितीतील एकेक तपशील हळू-हळू डोक्यामध्ये शिरायला लागला. किचन चिमणी ६० आणि ९० सेंटीमीटर, अशा दोन आकारामध्ये येते. सर्वसाधारणपणे दोन-तीन बर्नर असलेल्या शेगडीसाठी ६० सेंटीमीटर आणि ४-५ बर्नर असलेल्या शेगडीसाठी ९० सेंटिमीटर्सची शेगडी असावी. तसेच आपल्या गॅसच्या शेगडीच्या लांबी इतकी किचन चिमणी घेतलेली उत्तम. माझ्याकडची गॅस शेगडी तीन बर्नरची असली तरी त्या शेगडीची लांबी जवळपास ७५ सेंटिमीटर्स भरली. पण ७५ सेंटिमीटरमधे अगदीच कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणि त्या चिमण्यांनाही ६० सेंटिमीटर्सच्या चिमणीचीच मोटार बसवलेली असते, फक्त वरची काच ७५ सेंटिमीटर्सची असते इतकेच. ही बाबा लक्षात आल्यावर मी ६० सेंटिमीटरची चिमणी घेण्याचे ठरवले. 

फिल्टरवाली चिमणी घ्यावी का फिल्टरलेस चिमणी घ्यावी? हा प्रश्न पुढे आला. फिल्टरवाली चिमणी घेणेच योग्य आहे, असे माझ्या अभ्यासांती लक्षात आले. कार्बन फिल्टर, मेश फिल्टर आणि बॅफल फिल्टर, अशी वेगवेगळी नावे ऐकून मला, इंग्रजीमधल्या 'to get baffled' या वाक्यरचनेचा अर्थ पुरेपूर कळला!

बरीच माहिती गोळा केल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे baffle न होता म्हणजेच बावचळून न जाता Baffle filter असलेली चिमणीच घ्यायचे पक्के केले. हा Baffle filter फोडणीतले तेल चिमणीच्या मोटारपर्यंत जाऊ देत नाही, असे असले तरी दर दोन-तीन आठवड्यातून तो फिल्टर स्वच्छ करण्याचे काम गळ्यात पडते, हेही खरे. मात्र हा फिल्टर वरचेवर स्वच्छ करून चिमणी वापरली तर  स्वयंपाकघरामध्ये चिकट मेणी साठत नाही हे विशेष. 

चिमणी ductless घ्यावी का ducted ? हा प्रश्न  त्यानंतर उद्भवला. चिमणीमधून हवा बाहेर फेकणारी duct त्याच्या मॉड्युलर किचनच्या सौंदर्यामधे बाधा आणते असे अनेक गृहिणींना वाटते. त्यासाठी त्या ductless  चिमणी घेतात. अशा चिमणीमध्ये वरच्या बाजूला एक कार्बन फिल्टर बसवलेला असतो. तो फिल्टर, स्वयंपाकघरातला धूर आणि वास काही प्रमाणात शोषून घेत असला तरीही बाहेर फेकू शकत नाही. तसेच स्वयंपाक करत असताना निर्माण होणारी वाफ आणि गरम हवासुद्धा ही चिमणी बाहेर फेकू शकतनाही. म्हणून मग स्वयंपाकघरातला उकाडा आणि कोंदटपणा कमी होत नाही. Ductless चिमणीमधे बसवलेल्या कार्बन फिल्टरमध्ये काजळी साठून तो दर चार-सहा महिन्यांनी गच्च भरतो आणि नीट काम करेनासा होतो. त्यामुळे कंपनीचा माणूस बोलवून कार्बन फिल्टर बदलावा लागतो. त्यासाठी दीड-दोनहजार रुपये मोजावे लागतात ते वेगळेच. चिमणीची duct डोळ्यांना खुपली तरीही चालेल पण माझे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणारी ducted चिमणीच मी घेणार, हे मी पक्के ठरवले. चिमणीच्या खालच्या बाजूला असलेला baffle filter तेल शोषून घेतो, आणि वास, धूर व गरम हवा बाहेर फेकण्याचे काम चिमणीतून घराबाहेर जाणारी duct करते.    

बाजारामध्ये 'ऑटो-क्लीन' आणि 'नॉन ऑटो-क्लीन'  अशा दोन प्रकारच्या चिमण्या उपलब्ध आहेत. 'ऑटो-क्लीन' चिमणीमध्ये एक बटन दाबले की त्या चिमणीच्या आतल्या बाजूला चिकटलेली मेणी वितळून एका ट्रेमध्ये साठते आणि चिमणी स्वच्छ होते. ही प्रक्रिया दाखवणाराने मस्त व्हिडीओ यू-ट्यूबवर बघायला मिळतात. आपल्या शरीरावर चिकटलेली मेणी, एखादे बटन दाबून बाहेर काढता आली तर किती बरे होईल, हा विचार ते व्हिडीओ पाहताना मनामध्ये आल्याशिवाय राहिला नाही! वर्षातून एकदा तरी कंपनीचा माणूस बोलवून 'नॉन ऑटो-क्लीन' चिमणी, आतून-बाहेरून स्वच्छ करवून घ्यावीच लागते. पण 'ऑटो-क्लीन' चिमणीसुध्दा तशीच दर वर्षी स्वच्छ करवून घ्यायला लागते, हे जसे समजले तशी मी 'ऑटो-क्लीन' चिमणी मनातून बाद करून टाकली. 

किचन चिमणी हे तसे बरेच महागडे प्रकरण आहे. इंटरनेटवर बघायला मिळत असलेल्या बऱ्याचशा 'मॉड्युलर किचन'मध्ये 'स्लॅन्टेड' किंवा तिरप्या छताच्या चिमण्या दाखवलेल्या असतात. तिरप्या किंवा स्लॅन्टेड चिमण्या जागा कमी व्यापतात, हे खरे आहे. पण आपण चिमणी ज्या कामासाठी विकत घेतो, त्यासाठी त्या अगदीच कुचकामी ठरतात. केवळ  'आमच्याकडे महागडी किचन चिमणी आहे बरं का!' अशी शेखी मिरवण्यासाठी स्लॅन्टेड चिमण्या उपयोगी पडतात! एखादी वस्तू जास्त महाग असली कि ती जास्त चांगली असते, अशी अनेकांची समजूत असते. पण  कित्येकदा तसे नसतेही. 

किती suction power असलेली चिमणी विकत घ्यावी हे ठरवण्यासाठी माझ्या मेंदूची बरीच पॉवर खर्च झाली. सर्वसाधारणपणे, सध्याच्या विभक्त कुटुंबात जेमतेम तीन-चार माणसेच असतात. स्वयंपाकघरेही जेमतेम १००-१५० चौरस फुटांची असतात. अशा घरामध्ये १०००-१२०० सक्शन पॉवरची (ताशी १०००-१२०० घनमीटर) चिमणी पुरेशी होते. अशा पॉवरच्या चिमणीचा आवाजही सुसह्य असतो.  १०-१२ लोकांच्या कुटुंबात, जिथे सतत आणि भरपूर स्वयंपाक होत असतो अशा कुटुंबासाठी १४००-१५०० पॉवर असलेली चिमणी लागते! पण अशा पॉवरबाज चिमण्यांचा आवाजही जबरदस्त असतो, हे लक्षात घ्यायला हवे. "तो आवाज ऐकल्यावर गिऱ्हाईक पॉवरबाज चिमणी घ्यायला तयार होत नाहीत, म्हणून आम्ही त्या चिमण्या शोरूम्समध्ये ठेवतच नाही" असे एका डीलरने मला दबक्या आवाजात सांगितले! पूर्ण विचारांती माझ्या किचनसाठी मी ११५० पॉवरची चिमणी निवडली. 

आपल्या हाताच्या इशाऱ्यावर चालू-बंद होणाऱ्या, वेग कमी-जास्त करणाऱ्या (मोशन सेन्सर किंवा gesture control ) अशा चिमण्या बाजारामध्ये येतात. आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर सगळे घर नाचावे अशी सुप्त इच्छा स्त्रीच्या मनामध्ये असल्यामुळे, तशी 'मोशन सेन्सर' चिमणी घेण्याचा मोह न पडला तरच नवल! पण तो मोह टाळणेच उत्तम. काही काळातच ते मोशन सेन्सर पॅनल बंद पडते, किंवा त्रास द्यायला सुरुवात करते आणि अखेर बदलावे लागते. खरंतर push buttons ने चालणारी चिमणी सर्वात उत्तम. पण हल्ली बाजारामध्ये तशी चिमणी सहजी उपलब्ध नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक बटन्स असलेली चिमणी विकत घ्यावी लागली. 

अशी 'सर्वगुणसंपन्न' चिमणी एकदाची माझ्या घरात येऊन बसली आणि मला अगदी 'हुश्श' म्हणावेसे वाटले. पण नुसते हुश्श म्हणून गप्प बसेन तर मी कसली?

म्हणून, माझ्या चिमणी-शोधमोहिमेचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तर हा चिवचिवाट!

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका- ४


१९६० च्या दशकामध्ये केंव्हातरी दादांनी सोमनाथ मंदिर बघितलेले होते. शिवाय, मंदिरामध्ये असलेली  तुफान गर्दी आम्ही आदल्या दिवशी पहिली होती. त्यामुळे १६ नोव्हेंबरला, आम्ही दादांना बरोबर न घेताच दर्शनाला जायचे ठरवले. आंघोळी करून आम्ही पाचजण पहाटे साडेसहा वाजेपर्यंत दर्शनाच्या रांगेमधे लागलो. पहाटेच्या वेळीही बरीच गर्दी होती. तरी आम्हाला सकाळची आरती बघायला मिळाली. आनंद, गिरीश आणि शिरीष पुरुषांच्या रांगेत आणि मी व प्राची बायकांच्या रांगेमध्ये होतो. कोणाजवळही मोबाईल नसल्यामुळे, दर्शनानंतर बाण-स्तंभाजवळ भेटायचे असे आधीच ठरवून ठेवले होते. काही वर्षांपूर्वी मोबाईलशिवायही आपले आयुष्य सुरळीत कसे चालू होते, याचे आज आश्चर्य वाटते. 

सोमनाथ मंदिर परिसरातील बाणस्तंभ हे एक मोठे आश्चर्य मानले जाते. या प्राचीन स्तंभावर असलेल्या बाणाचे टोक दक्षिणेला असलेल्या समुद्राकडे रोखलेले आहे. "आसमुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग" असा संस्कृत भाषेतला मजकूर या बाणस्तंभावर लिहिलेला आहे. सोमनाथ मंदिराकडून सरळ रेषेमध्ये दक्षिणेकडे सागरी प्रवास सुरू केल्यास, हजारो मैल दूर असलेल्या दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा तुकडादेखील वाटेत लागणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. कित्येक शतकापूर्वी, कुठलीही साधने अथवा उपकरणे नसताना, आपल्या पूर्वजांना हे सत्य कसे समजले असावे, याचे आश्चर्य वाटते. 

पहाटेच्या प्रसन्न वेळी फिरत-फिरत आम्ही सोमनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला. त्यानंतर आपापले फोन, पर्सेस वगैरे ताब्यात घेतले आणि जवळच असलेल्या जुन्या शिवमंदिरात गेलो. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी बांधलेल्या या जुन्या मंदिरामध्ये मात्र मोबाईल व इतर सामान नेण्यावर काहीही पाबंदी नव्हती. त्यामुळे तिथे आम्हाला फोटो काढता आले. दर्शन घेऊन झाल्यावर आनंद, शिरीष आणि गिरीश हॉटेलवर परतले. प्राचीला अभिषेक करायचा असल्याने आम्ही दोघी मागे थांबलो. प्राची भक्तिभावाने अभिषेक करत होती आणि मी नुसतीच 'मम' म्हणत होते. 


मुख्य सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा-अभिषेक इत्यादि करण्याची व्यवस्था नाही. ते सर्व विधी अहल्याबाईंनी बांधलेल्या जुन्या मंदिरातच करता येतात. त्याकरता ठरवून दिलेले शुल्क अनेक ठिकाणी फलकांवर लिहिलेले आहे. आपण जमा केलेले पैसे सोमनाथ ट्रस्टला मिळतात आणि ट्रस्टमार्फत नेमलेले गुरुजी ते विधी पार पाडतात. आपल्याला कोणी ओळखीचे गुरुजी हवे असल्यास त्यांच्याकडून आपण  विधी  करून घेऊ शकतो. पूजा झाल्यावर आम्ही दोघी हॉटेलवर परतलो. सोमनाथ देवळाच्या उत्तरेला काही अंतरावर प्राचीन सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे संग्रहालय आहे पण ते आम्ही पाहिले नाही. 

दुपारची विश्रांती झाल्यावर, आनंद, मी आणि गिरीश-प्राची असे चौघे सोमनाथमधील इतर देवस्थाने बघायला बाहेर पडलो. शिरीषला बरे वाटत नसल्याने तो दादांबरोबर हॉटेलमध्येच थांबला. आम्ही लक्ष्मीनारायणाचे देऊळ, सूर्यमंदिर, त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम मंदिर, गीता मंदिर, कामनाथ महादेव मंदिर इत्यादी अनेक मंदिरे बघितली. पाच पांडव गुहा सध्या बंद ठेवलेल्या असल्यामुळे त्या बघता आल्या नाहीत. भालका तीर्थ आणि देहोत्सर्ग स्थान ही दोन ठिकाणे भाविकांनी विशेष भेट द्यावीत अशी आहेत. पिंपळाच्या झाडाखाली झोपलेल्या श्रीकृष्णाला हरीण समजून व्याधाने बाण मारला आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा देहांत झाला अशी पौराणिक कथा आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी भालका तीर्थ आहे. हिरण नदीच्या काठावर देहोत्सर्ग तीर्थ आहे. तिथे भगवान श्रीकृष्णांच्या पावलांचा ठसा आहे. या दोन्ही मंदिरातही बरीच गर्दी होती आणि स्वच्छतेचा अभावच होता. 

सोमनाथ मंदिराच्या आवारात रोज संध्याकाळी ''light and sound show" असतो. त्या कार्यक्रमाची तिकिटे गिरीशने संध्याकाळी आधीच जाऊन काढली होती. कार्यक्रम उत्तम होता, पण त्यामध्ये मुख्य भर पौराणिक कथांवर होता. सोमनाथाचे देऊळ कोणी-कोणी आणि किती वेळा लुटले, याचा तपशीलही मिळेल या अपेक्षेने मी गेलेले असल्याने माझा थोडा अपेक्षाभंग झाला. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर, अंबानी कुटुंबियांनी बांधलेले 'सागर दर्शन' नावाचे अतिथीगृह आहे. तिथे रास्त दरामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. पण त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवरून, बरेच आधी अर्ज करून आरक्षण करावे लागते. तिथले जेवणही शुद्ध-सात्विक आहे असे समजले. 

मागच्या वर्षी आम्ही इजिप्तला गेलो होतो. मूर्तिभंजक आक्रमणकर्त्यांनी तिथल्या प्राचीन मंदिरांची केलेली तोडफोड आम्ही पाहिली होती. मोठमोठ्या शिळा वापरून उभारलेली ती मंदिरे आपल्या मंदिरांपेक्षा अतिभव्य आकाराची असल्याने आक्रमणकर्त्यांना ती पूर्णपणे उध्वस्त करता आली नव्हती. मात्र त्या धर्मांध आक्रमणकर्त्यांनी  इजिप्तवासीयांचा धर्म पूर्णपणे नामशेष केला. त्यामुळे, आक्रमण होण्यापूर्वी प्राचीन इजिप्तवासीयांच्या धर्माचे नेमके स्वरूप कसे होते? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला मिळत नाही. 

तुलना करायची झाल्यास, आपली मंदिरे जरी वेळोवेळी उद्ध्वस्त झाली तरी आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन  केला गेला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सोमनाथचे मंदिरही मुसलमान आक्रमकांनी कैक वेळा लुटून जमीनदोस्त केले. परंतु, प्रत्येक वेळी, तत्कालीन राजांनी ते मंदिर पुन्हा बांधून घेतले.  १९५१ साली पुनर्निमाण झालेले सोमनाथ मंदिर, सनातन धर्माच्या शाश्वततेचे प्रतीक म्हणून आज  दिमाखात उभे आहे. याच कारणामुळे हे  देऊळ बघण्याची माझी प्रबळ इच्छा होती. पण सोमनाथ मंदिराचा इतिहास बघता, एका गोष्टीचे मात्र मला कमालीचे वाईट वाटते. एकदा हल्ला झाल्यानंतर, आपल्या पूर्वजांनी या मंदिरावर पुन्हा-पुन्हा हल्ले का होऊ दिले? 

आजच्या युगात कोणी परकीय आक्रमक येऊन आपल्या मंदिरांवर हल्ला करण्याची शक्यता कमीच आहे. पण समाजमाध्यमांतून, जाहिरातींमधून, आणि लव्ह-जिहाद, सक्तीचे धर्मांतर अशा प्रकारातून, आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवर सतत हल्ला होतो आहे. झालेला प्रत्येक हल्ला परतवण्यासाठी आपण सक्षम असायला हवे. परंतु, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, हल्ला करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, यासाठी आपण सजग राहिले पाहिजे असे मला वाटते .  

(क्रमशः)   

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-३

१५ नोव्हेंबरच्या सकाळी आम्ही सगळेच आरामात उठलो. सामान आवरून, दोन टॅक्सी घेऊन आम्ही सोमनाथकडे निघालो. आमच्या चालकाने सुचवलेल्या, हायवे वरच्या एका हॉटेलमधे थांबून नाष्टा घेतला. सोमनाथ देवस्थान प्रभास पाटण या गावामधे आहे. दीव ते प्रभास पाटण हे अंतर ९५ किलोमीटर आहे. रस्ता चांगला असल्याने आम्ही एक वाजायच्या आतच प्रभास पाटण येथील हॉटेलमधे पोहोचलो. त्या दिवशी दुपारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणारा विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना, कुठल्याही परिस्थितीत शिरीषला चुकवायचा नव्हता. म्हणूनच सोमनाथला दुपारी एक वाजायच्या आत पोहोचण्याबाबत तो आग्रही होता. आपापल्या खोल्यांचा ताबा घेऊन स्थिरस्थावर होईपर्यंत भारत-न्यूझीलंड सामना सुरू झाला होता.

सकाळी उशीरा आणि भरभक्कम नाष्टा केलेला असल्याने कोणालाही जेवायची इच्छा नव्हती. तसे अडीअडचणीला उपयोगी पडावा म्हणून मी आणि प्राचीने, एका पिशवीमध्ये दिवाळीचा फराळ भरून आणला होता. खाद्यपदार्थाच्या गच्च भरलेल्या त्या पिशवीचे नामकरण शिरीषने 'गाझा पिशवी' असे केले होते! त्याच्या म्हणण्याप्रमाणे, हेलिकॉप्टरने ती पिशवी गाझा पट्टीमध्ये टाकली तर युद्धविराम होईपर्यंत तमाम गाझावासियांना पुरून उरतील इतके खाद्यपदार्थ त्या पिशवीत होते! त्याउप्पर, शिरीषच्या मित्राने आणि शिरीषच्या सासूबाईंनी बांधून दिलेला फराळ त्याने सोबत आणलेला होता, तो वेगळाच! त्यामुळे एखादे-एखादे जेवण चुकले आणि अगदीच भूक लागली तर चिवडा, लाडू, शंकरपाळे, चिरोटे आणि चकल्यांवर भागवायचे, असा अलिखित नियम आम्ही केला होता. 

त्याच संध्याकाळी सोमनाथ देऊळ बघण्याची माझी व प्राचीची इच्छा होती. पण आम्ही काही बोलायच्या आतच, सामना संपेपर्यंत कुठेही बाहेर न पडण्याचा निर्णय चौघाही पुरुषांनी जाहीर करून टाकला. त्यामुळे आम्ही दोघीच, दुपारच्या चहानंतर रिक्षा पकडून देवदर्शनाला निघालो. आम्हा सहा जणांपैकी श्रद्धाळू म्हणावे अशी फक्त प्राचीच होती. आधीच्या बेतानुसार गिरीश आणि प्राची असे दोघेच सोमनाथ-द्वारका करणार होते. नंतर मीही सोबत येतेय हे समजल्यावर, प्राचीबरोबर देवळामधे जाण्याचे काम गिरीशने अगदी तत्परतेने मला आऊटसोर्स करून टाकले होते! मला देवळे बघायला आवडत असल्याने मीही ते आनंदाने स्वीकारले होते.  

मंदिर परिसरात अतोनात गर्दी असल्याने, देवळापासून चार-पाचशे मीटरच्या अंतरावर पोलिसांनी वाहनप्रतिबंधक अडथळे लावून ठेवले होते. रिक्षावाल्याने ज्या ठिकाणी आम्हाला सोडले, तिथे समोरच लक्ष्मीनारायण मंदिर दिसत होते. त्या देवळात दर्शन घेऊन, उजवीकडे वळून आम्ही समुद्राच्या दिशेने, म्हणजे सोमनाथ मंदिराकडे पायी चालत निघालो. अनेक शतके भग्नावस्थेत आणि दुर्लक्षित असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे कार्य श्री. वल्लभ भाई पटेलांच्या पुढाकारामुळे १९५१ साली पूर्ण झाले. अतिशय भव्य आणि देखणे असे हे मंदिर आहे. 
मुख्य सोमनाथ मंदिरात मोबाईल, बॅग्स, पर्सेस, डिजिटल घड्याळे आणि अर्थातच चपला न्यायला मनाई आहे. या वस्तू लॉकरमध्ये ठेवण्याची मोफत व्यवस्था आहे. आपण आपली वस्तू ठेवली की आपल्याला एक टोकन मिळते. ते टोकन परत केले की आपली वस्तू आपल्याला परत मिळते. मात्र, मोबाईल्स एका ठिकाणी, पर्स दुसऱ्याच ठिकाणी आणि चप्पल्स तिसऱ्याच  ठेवायची असल्याने बराच वेळ वाया जातो. देवळात फार गर्दी असेल तर लॉकरमध्ये जागा नसते आणि बराच वेळ तिष्ठत उभे राहावे लागते. त्या दालनामध्ये सर्वत्र CCTV कॅमेरे बसवले असल्यामुळे वस्तू चोरीला जाण्याची भीती जरा कमी असते. आमचे मोबाईल्स, पर्सेस आणि चप्पल्स ठेऊन, टोकन घेऊन आम्ही महिलांच्या बारीमध्ये उभे राहिलो. 

रांगेमध्ये जवळपास तास-दीडतास उभे राहिल्यानंतर आम्ही देवळामध्ये पोहोचलो. गर्दी असल्याने, लांबूनच जेमतेम काही सेकंद दर्शन मिळाले. संध्याकाळच्या आरतीच्या दोन मिनिटे आधीच आम्ही गाभाऱ्यात पोहोचल्यामुळे, ती आरती बघायला मिळाली नाही. बाहेर पडून, परत रांगेत घुसून आरती बघण्याचा प्रयत्न केला पण आम्ही  गाभाऱ्यापर्यंत पोहोचेस्तोवर आरती संपून गेली होती. 

देवळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार ठेवलेला आहे. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रतट आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेला सुप्रसिद्ध, दिशादर्शक बाणस्तंभ आम्ही बघितला. मुख्य मंदिराजवळच एक जुने शिवमंदिरदेखील आहे.  १७७३ साली पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी ते बांधून घेतले होते. त्या मंदिरातही जाऊन आम्ही दर्शन घेतले. अशा रीतीने सर्व परिसराची पाहणी (Recce) करून आम्ही हॉटेलवर परतलो. सोमनाथ मंदिराची महती, आणि त्याचा इतिहास यावर पुढील भागांमध्ये लिहीन.   




 

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-२

१४ नोव्हेंबरला दुपारचे ऊन ओसरल्यावर आम्ही INS Khukri स्मारक बघायला बाहेर पडलो. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामधे, भारतीय नौदलाचे हे लढाऊ जहाज पाकिस्तानी पाणबुडीने केलेल्या सागरी हल्ल्यामध्ये कामी आले. दिनांक ९/१२/१९७१ या दिवशी, दीवच्या किनाऱ्यापासून ४० सागरी मैल दूरवर या जहाजाला आणि त्यावरील १८ नौदल अधिकारी आणि १७६ नौसैनिकांना जलसमाधी मिळाली. खुकरी जहाजाचे अवशेष आजही दीवजवळ समुद्राच्या तळाशी पडून आहेत. 

नौदलाच्या परंपरेप्रमाणे, जहाजावरील सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडल्याशिवाय जहाजाचा कप्तान जहाज सोडत नाही. ती परंपरा सांभाळत, 'खुकरी'चे मुख्य अधिकारी, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी जहाजासोबतच जिवंत जलसमाधी घेतली. भारतीय नौदलाने, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना मरणोत्तर महावीरचक्र देऊन त्यांचा गौरव केला. INS Khukri स्मारकाचे उद्घाटन १५ डिसेंबर १९९९ साली, नौदलाच्या पश्चिम विभागाचे तत्कालीन मुख्य अधिकारी, व्हाईस ऍडमिरल माधवेंद्र सिंग यांच्या हस्ते केले गेले. हे स्मारक चोवीस तास खुले असते आणि इथे जाण्यासाठी काहीही प्रवेशशुल्क आकारले जात नाही. 

आम्ही स्मारकाजवळ पोहोचलो त्यावेळी ऊन उतरलेले असल्याने हवा आल्हाददायक होती. समुद्रकिनाऱ्याजवळच एका टेकाडावर हे स्मारक उभे केलेले आहे. हे छोटेसे टेकाड चढून जाणे सहजी शक्य आहे.  तसेच वर जाण्यासाठी, बॅटरीवर चालणाऱ्या गोल्फ कार्टची व्यवस्था अगदी माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे. दादा आमच्याबरोबर असल्याने आम्ही सर्वजण गोल्फ कार्टनेच वर गेलो. त्या टेकाडावर उभे राहून, तेथे फुलवलेल्या बागेकडे नजर टाकल्यास,  समुद्राच्या लाटांचा आभास होतो. टेकाडावरील बाग, आसपासचा परिसर आणि अगदी समुद्रालगत असलेले अँफीथिएटर, हा सर्व परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका ठेवलेला आहे. 

टेकाडावरील सर्वात उंच जागी, चहूबाजूंनी काचेच्या भिंती असलेल्या एका बंदिस्त खोलीत खुकरी जहाजाची प्रतिकृती ठेवलेली आहे. समुद्राच्या दिशेला तोंड करून ठेवलेली जहाजाची प्रतिकृती काचेतून व्यवस्थित दिसते. १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धामधल्या त्या दुर्दैवी घटनेत जलसमाधी मिळालेल्या सर्व वीर नौसैनिकांची नावे त्या काचेच्या भिंतींवर लिहिलेली आहेत. स्मारकाजवळ उभे राहून आम्ही त्या सर्व वीरांना, मनोमन श्रद्धांजली वाहिली. स्मारकाचा स्वच्छ परिसर, समुद्राच्या तटावर असलेले सुंदर, खुले अँफी थिएटर, आणि त्या तटाला धडक देणाऱ्या फेसाळत्या लाटा, हे सगळे दृश्य अतिशय मनोहर होते. पण तरीही, खुकरी दुर्घटनेच्या आठवणीमुळे, "आहे मनोहर तरी गमते उदास" अशाच काहीश्या संमिश्र भावना आमच्या मनामध्ये होत्या. 

१९७१ च्या युद्धात खुकरी जहाज बुडाल्यानंतर काही वर्षांनी, भारतीय नौदलामधील Corvette प्रकारच्या दुसऱ्या एका जहाजाला पुन्हा 'खुकरी' हेच नाव दिले गेले. हे भारतीय बनावटीचे जहाज, माझगाव डॉक येथे तयार केले गेले होते. ऑगस्ट १९८९ मध्ये नौदलाच्या सेवेत रुजू झालेले हे खुकरी जहाज डिसेंबर २०२१ मध्ये नौदलाच्या सेवेमधून निवृत्त झाले. जानेवारी २०२२ मध्ये नौदलाने ते जहाज दीव प्रशासनाकडे हस्तांतरित केले. आता ते दीवच्या समुद्रकिनाऱ्यावर नांगर टाकून उभे आहे आणि तरंगते संग्रहालय म्हणून ओळखले जाते. लढाऊ जहाजामध्ये वापरली जाणारी विविध शस्त्रे व उपकरणे आणि इतर काही वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. खुकरी स्मारक पाहून निघाल्यावर खरं तर आम्हाला हे 'खुकरी संग्रहालय' बघायला जायचे होते. पण सर्वानुमते आमचे असे ठरले की आधी संग्रहालय पाहण्याऐवजी दिवसाउजेडी नागोवा बीचवर जाऊन यावे. 

दीव गावापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आणि दीव विमानतळापासून अगदी जवळ नागोवा बीच आहे. इथे दीवमधली सर्वात आलिशान आणि महागडी हॉटेल्स आहेत. दीवमधल्या बऱ्याच  हॉटेल्सचे दर पर्यटनाचा मौसम सुरु झाला की गगनाला भिडतात. इतरवेळी ३ ते ४ हजार रुपये रोजचे भाडे अससेल्या हॉटेलच्या खोलीसाठी काही लोकांना १५ ते २०००० रुपये मोजावे लागले होते. आम्ही उतरलेल्या हॉटेलमध्येही आमची अशीच लुबाडणूक झाली होती. दीव हे गुजरातशेजारच्या केंद्रशासित प्रदेशातील शहर गुजरातच्या सीमेलगतच आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे आणि या केंद्रशासित प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे, खास मद्यपान करण्यासाठी अनेक गुजराती पर्यटक या ठिकाणी येतात, असे मी ऐकून होते. 'खास पिण्यासाठी' आलेले वाटावेत अशा पर्यटकांची गर्दी नागोवा बीचच्या आसपास दिसली. 

समुद्रकिनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यातच अनेक फिरंगी पर्यटकही होते. एकुणात हा बीच म्हणजे दीव मधील 'Happening place' आहे, हे जाणवत होते. बीचकडे जाणाऱ्या वाटांवर दुतर्फा, गिचमिडीत अनेक छोटी-छोटी दुकाने होती. कपडे, फळे, खाद्यपदार्थ, फुगे, खेळणी, शीतपेये आणि आईस्क्रीम विक्रेते मोठमोठ्याने ओरडून लोकांना आपापल्या दुकानात बोलावत होते. तसेच जवळपासच्या हॉटेल्समध्ये भरपूर रोषणाई, पाश्चात्य संगीत, अशी चहल-पहल दिसत होती. 

पुळणीवर समुद्राला समांतर फेरफटका मारण्यासाठी उंट आणि मोटारबाईक होत्या. तसेच समुद्राच्या पाण्यावर नौकाविहाराला जाण्यासाठी स्पीड बोट्स व साध्या बोटीही दिसत होत्या. दूरवर पॅरासेलिंग चाललेले दिसले. चार वर्षांपूर्वी मी दिवेआगारला प्रथम पॅरासेलिंग केले होते. त्यावेळी जीपला बांधलेल्या एकाच पॅराशूटच्या सहाय्याने मी आणि आनंद, दोघेही हवेत उंच उडालो होतो. पॅरासेलिंगची ती माझी पहिलीच वेळ असल्यामुळे, 'कधी एकदा सुखरूप खाली पोहोंचतोय' या विचाराने मी जीव मुठीत धरून बसले होते. त्यामुळे हवेत तरंगण्याचा आनंद फारसा अनुभवता आला नव्हता. आता मात्र मला आणि प्राचीलादेखील पॅरासेलिंग करायची उर्मी आली. वाऱ्यावर  हेलकावत, हवेत उंच  जाण्याचा आनंद यावेळी उपभोगायचाच अशी खूणगाठ मी मनाशी पक्की केली. पण प्रत्यक्ष वर जाताना आणि खाली येताना पोटामध्ये गोळा उठल्याशिवाय राहिला नाही. प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे, पॅराशूटच्या दोरीवर घट्ट पकडलेले हात काही सेकंदासाठी सोडून, पक्ष्याच्या पंखाप्रमाणे हवेत पसरून मी हलवले. पॅराशूटमध्ये वारं भरून आपण वर गेलो की आपले अंगही अगदी हलके भासते. अर्थात वजन घटल्याचा तो आनंद क्षणिक असतो, कारण काही मिनिटांतच आपल्याला जमिनीवर आणले जाते! 

मला वाटते प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी पॅरासेलिंगचा अनुभव घ्यायलाच हवा. 

पॅरासेलिंग करून येईपर्यंत आम्हाला उशीर झाला होता. खुकरी संग्रहालयाला भेट देणे आम्हाला शक्य झाले नाही. दीवमधल्या प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणी, उघड्या पोत्यांमध्ये ठेवलेला सुकामेवा आणि गरम मसाल्याचे  छोटे-छोटे ढीग किंवा वाटे विकणारे विक्रेते दिसले होते. अगदी उत्तम प्रकारचा सुकामेवा बाजारभावाच्या निम्म्या भावात इथे उपलब्ध होता. तो इतका स्वस्त कसा काय विकत असतील? हे कोडे मात्र सुटले नाही. कदाचित तो कर चुकवून आणलेला किंवा तस्करीचा विदेशी माल असू शकेल असे आम्हाला वाटले. नमुन्यादाखल आम्ही सुकामेवा विकत घेतला, आणि थोडा-थोडा सुकामेवा तोंडात टाकत, साडेसात-आठ वाजेपर्यंत हॉटेलमधे परतलो. जेवणानंतर पुन्हा पत्त्यांचे डाव रंगल्यामुळे झोपायला बराच उशीर झाला.     

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-१

यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, गिरीश-प्राची, म्हणजे माझे भाऊ-वहिनी, मुंबईहून सोमनाथ-द्वारका दर्शनासाठी जाणार होते. मी, आनंद, माझा चुलतभाऊ शिरीष, आणि  'दादा', म्हणजे माझे वडील, अशा चौघांनीही त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. त्यानुसार १३ नोव्हेंबर २०२३ च्या दुपारी मुंबईहून दुपारची फ्लाईट पकडून आम्ही तासाभरात दीवला पोहोचलो. आधीच्या आठवडाभराचे जागरण, पुणे-मुंबई प्रवास, दिवाळीच्या कामांची दगदग अशामुळे आम्ही सगळे दमलो होतो. जेवण झाल्यावर सगळेजण झोपून गेलो. संध्याकाळी चहा घेऊन पत्त्यांचे  डाव लावले आणि सुट्टी सुरू झाल्यासारखे वाटले.


दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ नोव्हेंबरच्या सकाळी एक खाजगी टॅक्सी करून आम्ही दीव-दर्शन करायला बाहेर पडलो. सर्वप्रथम आम्ही दीवचा किल्ला बघितला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला  अतिशय प्रेक्षणीय आहे. दीव या बेटावर पूर्वापार अनेक राज्यकर्ते राज्य करून गेले. पण १३३० साली गुजरातेतील सुलतान शाहबहादूर याने दीव जिंकून घेतले. १४९८ साली पोर्तुगीजांनी भारतभूमीवर पाय ठेवला. त्यानंतर ते भारताच्या किनारपट्टीवरील एकेका बंदरात आपले पाय रोवू लागले. अनेक वर्षे, दीव येथे किल्ला बांधण्याची परवानगी पोर्तुगीज गुजरातच्या सुलतानाकडे मागत होते. पण, मलिक अय्याझ नावाचा, सुलतानाचा एक सुभेदार पोर्तुगीजांच्या मागणीला सातत्याने विरोध करत राहिला. १५३५ साली मुघल सम्राट हुमाँयू याने गुजरातच्या सुलतानावर स्वारी केली. त्यावेळी  सुलतान शाहबहादूर याने 'नुनो दा कुन्हा' या पोर्तुगीज अधिकाऱ्याशी युती केली. मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी सुलतानाला मदत करण्याच्या बदल्यात पोर्तुगीजानी दीव किनाऱ्यावर किल्ला बांधण्याची परवानगी सुलतानाकडून मिळवली. पोर्तुगीजांनी १५३७ ते १९६१ असे जवळपास सव्वाचारशे वर्षे दीव-दमण या भागावर राज्य केले. 

दीव  बेटाच्या नैऋत्य टोकावर वसवलेला हा मजबूत किल्ला अजूनही उत्तम स्थितीत आहे.  किल्ल्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे. त्या अथांग सागराचे दर्शन आपल्याला श्वास  रोखायला लावते. बाहेरील तटबंदी समुद्रकिनाऱ्यालगतच आहे. आतल्या तटरक्षक भिंतीवर सर्वबाजूनी तोफा मांडलेल्या आहेत. दोन्ही भिंतींच्या मधल्या खंदकामध्ये पाणी आहे. मुख्य प्रवेशदारातून आत आल्यावर उजव्या बाजूला पाच मोठ्ठ्या खिडक्या असलेली भिंत दिसते. डाव्या बाजूला भर समुद्रात वसलेला, 'पाणकोट' नावाचा जलदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरुज, आतील कमानी, मजबूत तटबंदी हे पाहिल्यावर, हा किल्ला चार शतके अभेद्य का राहिला असावा हे समजून येते. किल्ल्याच्या एका टोकाला समुद्राच्या आत घुसणारी वाट, म्हणजेच बोटींना थांबण्यासाठीचा धक्का आहे. किल्ल्याच्या आत एक कैदखाना, चर्च, दारुगोळ्याचे कोठार, छोटेखानी दीपगृह अशा काही इमारती आहेत. किल्ल्याच्या आत असलेले एक तुळशी वृंदावन पाहून मला आश्चर्यच वाटले. बारकाईने पाहता, त्यावर सोमवार दि. १३/१२/१९४३ असा तपशील कोरलेला दिसला. म्हणजेच किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असतानाच्या काळातलेच ते तुळशी वृंदावन होते! परंतु, ते कोणी व का बांधले असावे हे मात्र गूढच राहिले. 


किल्ला पाहून झाल्यावर आम्हाला दीवचे सुप्रसिद्ध सेंट पॉल चर्च बघायचे होते. पण त्या चर्चचा जीर्णोद्धार होत असल्यामुळे ते बंद होते आणि आम्हाला ते बाहेरूनच बघावे लागले. चर्चेच्या शुभ्र, दिमाखदार इमारतीचे बाह्यदर्शनही खूप सुखावह होते. त्यानंतर आम्ही दीवपासून तीन किलोमीटर अंतरावरच्या  फुडम  गावाजवळ गंगेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. हे प्राचीन मंदिर पांडवांनी बांधले आहे असे मानले जाते. या ठिकाणाला मंदिर म्हणण्यापेक्षा देवस्थान म्हणणे योग्य आहे. कारण, याची रचना कोणत्याही सर्वसामान्य मंदिराप्रमाणे नाही. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका खडकाच्या पोटात नैसर्गिकरीत्या एक गुहा बनलेली आहे. या गुहेमध्ये किंवा दगडाच्या खोबणीमध्ये, पाच सुबक शिवलिंगे आहेत. हे देवस्थान अतिशय सुंदर आहे. समुद्राच्या लाटा अहोरात्र या शिवलिंगांवर अभिषेक करत असतात. समुद्राला भरती आल्यावर, समुद्रात घुसणारा खडकाचा एक सुळका वगळता बाकी संपूर्ण खडक पाण्याखाली लुप्त होतो, हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. 


सकाळपासून जवळपास तीन-चार तास कडक उन्हामध्ये बाहेर हिंडल्याने आम्हाला दमणूक जाणवायला लागली होती. त्यामुळे दुपारच्या वामकुक्षीनंतरच पुन्हा बाहेर पडायचे ठरवून आम्ही हॉटेलवर परतलो.  
 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

नियमबाह्य ?

एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत, एकदा का आम्ही हायवेला लागलो की आमचीं चारचाकी गाडी सुसाट चालवत प्रवास करत असू. "छोट्या गाडीनेदेखील कसे आम्ही तीन तासांत पुण्याहून मुंबई आणि साडेतीन तासात पुण्याहून सोलापूर गाठतो", अशी फुशारकी आम्ही मारत असू. पण एकदा असे झाले की, आमच्या गाडीने निर्धारित वेगमर्यादा ओलांडल्याचे दृश्य 'स्पीड गन'च्या कॅमेरामध्ये टिपले गेले आणि आम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागला. त्या घटनेमुळे आमच्या गाडीच्या वेगालाच नव्हे तर जाहीरपणे फुशारक्या मारण्यालाही आपोआपच चाप बसला. त्यानंतर मात्र, "आम्ही वेगमर्यादेचे उल्लंघन कधीही करत नाही", असे सांगून आम्ही मोठेपणा मिळवू लागलो. मात्र, १००० रुपयांचा भुर्दंड बसल्यानंतरच आम्ही नियम पाळायला लागलो, ही कबुली अर्थातच आम्ही कुणापुढे देत नव्हतो! 


आज सकाळी, गाडीच्या टपावरच्या कॅरियरवर सामान बांधून, आम्ही सोलापूर-पुणे प्रवासाला सुरुवात केली. एक टोल पार करून पुढे आलो तोच, रस्त्यावर उभ्या असलेल्या एका सहाय्यक फौजदाराने आम्हाला थांबवले. त्यांनी काही विचारायच्या आतच आनंदने गाडीची कागदपत्रे आणि स्वतःचा वाहनपरवाना त्यांच्या हातात दिला. "गाडीवर कॅरियर बसवून, सामान लादून नेण्याची परवानगी फक्त व्यावसायिक वाहनांना आहे, खाजगी वाहनांना नाही" असे सांगून त्या सहाय्यक फौजदार साहेबांनी आमच्या गाडीचे फोटो काढायला सुरुवात केली.  

गेली दहा वर्षे आम्ही CNG वर चालणारी 'मारुती वॅगन-आर' गाडी वापरतो. CNG चा सिलिंडर गाडीची संपूर्ण डिकी व्यापत असल्यामुळे, आम्ही सुरुवातीपासूनच गाडीवर कॅरियर बसवून घेतले होते. अनेकवेळा आम्ही कॅरियरवर सामान लादून प्रवास करीत  होतो. पण आत्तापर्यंत कधीच दंड भरावा लागलेला नव्हता. तसे करणे नियमबाह्य आहे, हेही आज प्रथमच ऐकले होते. 

"तसा काही नियम आहे का ते गूगलवर तपासून बघा" असे आनंदने मला आणि आमच्या भाचेसुनेला सांगितले. गूगलमावशीने काढून दिलेल्या एक-दोन अनधिकृत लिंक्समधून, असा काही नियम नसल्याचे आम्हाला कळले. मग आनंदने त्या सहाय्यक पोलीस फौजदाराला, "तुम्ही म्हणता तो नियम मला दाखवलात तर मी लगेच दंड भरायला तयार आहे" असे सांगितले. 

दरम्यान, कुठे काही अधिकृत  माहिती मिळते आहे का,  याचा आम्ही दोघी तपास करू लागलो.  

'नियम दाखवा आणि मगच दंड वसूल करा', असा पवित्रा आनंदने घेतल्याने त्या सहाय्यक फौजदाराने आनंदला, जवळच उभ्या असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI)कडे नेले. त्या अधिकाऱ्यानेदेखील तो नियम शोधण्यासाठी गुगलमावशीचेच पाय धरले. पाच-दहा मिनिटे खटाटोप केल्यावरही त्यांना तो नियम सापडेना. 

शेवटी त्या अधिकाऱ्याने आनंदला विचारले, "साहेब, आपण काय काम करता?" 

आनंद निवृत्त सेनाधिकारी आहे, हे समजल्यावर मात्र नरमाईचा स्वर लावत ते पोलीस उपनिरीक्षक आनंदला  म्हणाले, "अहो साहेब, हे आधीच नाही का सांगायचे? आम्ही तुमचा इतका वेळ घेतलाच नसता. जा तुम्ही" 

ते सहाय्यक फौजदारसाहेबही खजील होऊन आनंदला म्हणाले "साहेब मी पावती फाडण्याबद्दल कुठे काय म्हणालो होतो?"

दंड  भरावा लागला नाही या आनंदात आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि पुढे निघालो. 

पण, "खाजगी वाहनाच्या कॅरियरवर सामान लादून प्रवास करणे नियमबाह्य होते, की आनंद निवृत्त सेनाधिकारी आहे, हे कळल्याबरोबर त्याला तातडीने सोडून देणाऱ्या पोलिसांचे वर्तन नियमबाह्य होते?"  या विचाराने मला आता ग्रासून टाकले आहे!

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

आठवणींची पुडी!

आज सोलापुरात सकाळी सकाळी काही किराणामाल विकत घ्यायला घराबाहेर पडले. नऊ वाजत आले होते तरी एक-दोनच दुकाने उघडी दिसली. एका दुकानातून  सामान घेतले. त्या दुकानदाराने सगळे सामान वर्तमानपत्राच्या कागदाच्या वेगवेगळ्या पुड्यांमधे बांधून दिले. 
अलिकडे कित्येक वर्षांमधे मला अशा कागदाच्या पुड्या बघायची सवयच राहिलेली नाही. दुकानदाराने अगदी सफाईने भराभर पुड्या बांधल्या होत्या. घरी येईपर्यंत एकही पुडी सुटली नव्हती, हे विशेष. प्रत्येक पुडीच्या आत वर्तमानपत्राचा एक छोटा तुकडा बाहेरच्या मोठ्या तुकड्याला आधार देत होता! 

पूर्वी माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असलेली ही पुडी अचानकपणे माझ्या समोर आल्यामुळे मी भूतकाळात शिरले गेले. लहानपणी आईबरोबर  वाणीसामान आणायला मी जायचे. किराणामालाच्या दुकानात वर एक दोऱ्याने रीळ लटकवलेले असायचे. दुकानातले नोकर, सामानाच्या भराभर पुड्या बांधून द्यायचे त्यावेळी ते रीळ एका लयीत नाचत असायचे! घरी आल्यावर तो दोरा अगदी जपून सोडून आम्ही एका काडीला गुंडाळून ठेवायचो. तो दोरा पुडी बांधायला उपयोगी यायचा. "रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल" या त्रिसुत्रीचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा किंवा घोष न करता आपण त्या त्रिसुत्री आचरणात आणत होतो.  

आपल्या आयुष्यात किराणामालाच्या व्यतिरिक्त अनेक पुड्या यायच्या. अनेकांच्या घरी फुलपुडा यायचा. तो तर पानात बांधलेला असायचा. भेळेच्या गाडीवर भेळ बांधून घेतली की ती कागदाच्या पुड्यातच  मिळायची. भाजलेल्या शेंगांची निमुळती पुडी खूपच मोहक दिसायची. देवळातला अंगाऱ्याची चपटी पुडी, परीक्षेला जाताना किती आधार देऊन जायची! केळी सुद्धा वर्तमानपत्रात बांधून दिली जायची. 

पण मधल्या काळात आपल्या नकळत या सगळ्या पुड्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आणि सगळ्या पुड्या गायब झाल्या. आज ही पुडी बघितल्यानंतर अचानक त्या सगळ्या पुड्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आज आता या लेखाच्या निमित्ताने ही पुडी मी सोडून दिलीय. आता तुम्हाला कोणकोणत्या पुड्या आठवत आहेत, ते सांगा बरं! 

सोमवार, १२ जून, २०२३

शिमला-कसौली भाग- १३:-दगशाईचा तुरुंग!

६ मे चा दिवस हा आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत आम्हाला आमची खोली सोडायची होती. दुपारी आनंदचा मित्र, मेजर जनरल मनदीप कोहली याने आम्हाला कसौली क्लबमध्ये  जेवायला बोलावले होते. कसौलीच्या हॉलिडेहोमची देखरेख करणाऱ्या हवालदाराला, "आमची खोली जरा उशीरा सोडली तर चालेल का? असे आम्ही विचारले. त्याने  उशीरात उशीरा दुपारी चार वाजेपर्यंत खोली सोडता येईल असे सांगितले. जनरल कोहली आणि पम्मी कोहली यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आमचे  जेवण दोन वाजेपर्यंत संपले. त्यानंतर आम्ही कसौलीच्या, Central Reasearch Institute या सुप्रसिद्ध संस्थेला भेट दिली. तिथे वेगवेगळ्या आजारावरच्या लसी कशा तयार होतात, याची माहिती घेतली.   

आम्ही त्या रात्री बाराच्या सुमारास नेताजी एक्सप्रेसने काल्काहून दिल्लीला जाणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीहून मुंबईला विमानाने परतणार होतो. कसौली ते काल्का टॅक्सीने जेमतेम दोन तासांत पोहोचता येते. त्यानंतर  काल्का रेल्वेस्थानकावर पाच ते सहा तास वेळ कसा काढायचा? हा प्रश्न आमच्या समोर होता. पण कर्नल प्रताप जाधव (सेवानिवृत्त), या आनंदच्या  मित्राने तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला. कसौलीहून काल्काला जाण्याआधी थोडी वाट वाकडी करून दगशाई छावणीला भेट द्यायचा सल्ला त्याने आम्हाला दिला. तिथे असलेले दगशाई कारागृह आणि दगशाई संग्रहालय ही दोन्ही ठिकाणे आवर्जून बघण्यासारखी आहेत, असेही तो म्हणाला. आम्हाला वेळ काढायचा होताच. त्यामुळे आम्ही साधारण तीन-साडेतीन  वाजेपर्यंत कसौली हॉलिडे होम सोडले आणि दगशाईचा  रस्ता पकडला. भरपूर नागमोडी वळणे घेत, दोन तीन डोंगर  ओलांडून  शेवटी आम्ही दगशाई छावणीमध्ये पोहोचलो. आम्ही वाटेतूनच फोन करून पूर्वसूचना दिल्यामुळे आमच्या स्वागतासाठी तिथे आर्मीचा एक जवान दक्ष होताच. त्याने आम्हाला दगशाई छावणीची, तिथल्या  कारागृहाची आणि संग्रहालयाची सविस्तर माहिती दिली.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच गुरखा, अफगाण आणि शीख राजांच्या कडव्या प्रतिकारामुळे धास्तावलेल्या इंग्रजांना, आसपासच्या भागातल्या छोट्या राजांच्या आणि जंगली टोळ्यांच्या म्होरक्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्याची गरज भासत होती. म्हणून त्यांना या दुर्गम भागात एखादी भक्कम छावणी हवी होती. १८४७ साली, ईस्ट इंडिया कंपनीने ६०७८ फूट उंचीची एक टेकडी आणि आसपासची पाच गावे पतियाळाच्या महाराजांकडून फुकटात मिळवली. त्यापैकीच दगशाई या गावाच्या नावाचीच छावणी इंग्रजांनी या टेकडीवर वसवली. १८४९ साली इंग्रजांनी दगशाई छावणीमध्ये एक भक्कम कारागृह बांधले. इंग्रजी T अक्षराच्या आकारात बांधलेल्या या कारागृहामध्ये एकूण चौपन्न खोल्या आहेत. त्यापैकी अकरा खोल्यांमध्ये कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये व निवासस्थाने होती. उरलेल्या ४३ खोल्यांपैकी २७ साध्या कोठड्या आणि १६ एकांतवास कोठड्या होत्या. ही माहिती ऐकत आम्ही कारागृहाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचलो. 

कारागृहाच्या भक्कम लोखंडी दरवाज्याच्या वरच्या भिंतीत एक अवजड पितळी घंटा बसवलेली दिसली. त्या घंटेचे नाव, 'मृत्युघंटा' आहे असे आम्हाला आमच्या वाटाड्याने सांगितले. ब्रिटिश काळामध्ये या कारागृहातील एखाद्या कैद्याला फाशी दिल्यानंतर ती घंटा जोरजोरात वाजवली जाई. तिचा आवाज संपूर्ण पंचक्रोशीत घुमत असल्यामुळे आपोआपच आसपासच्या नागरिकांमध्ये जरब निर्माण होत असे. हे वर्णन ऐकूनच माझ्या अंगावर सर्र्कन काटा आला. 

बारा फूट लांब, आठ फूट रुंद आणि वीस फूट उंच असलेल्या प्रत्येक कोठडीला पोलादी गजांचा एक दरवाजा आणि छताजवळ एक छोटीशी खिडकी आहे. खिडकीपर्यंत चढणे तर अशक्यच आहे, आणि दरवाजा व खिडकीचे पोलादी गज इतके मजबूत आहेत की ते कापून पळून जाण्याचा विचारही कुणाच्या मनात येणार नाही. संपूर्ण कारागृहाची जमीन सागवानी लाकडाची आहे. हे कारागृह बनवतानाच, त्या लाकडांवर वाळवीप्रतिबंधक प्रक्रिया केलेली असल्यामुळे आजही ती लाकडे सुस्थितीत आहेत. त्या लाकडी जमिनीखालून, एका पाइपलाइनमधून बाहेरची स्वच्छ हवा आत आणण्याची व्यवस्था केलेली आहे. जमिनीखालच्या पोकळीमुळे कैद्यांच्या चालण्याचा हलका आवाजही बाहेरच्या सुरक्षारक्षकांना सहजी ऐकू येत असे. विचारपूर्वक केलेल्या अशा रचनेमुळे ते कारागृह अभेद्य होते. 

कारागृहाच्या एका भिंतीमध्ये, एक मनुष्य जेमतेम उभा राहू शकेल, अशा आकाराची एक खोबण होती. त्या खोबणीला, कुलूप लावून बंद करता येईल असा, जाळीचा भक्कम पोलादी दरवाजा होता. एखाद्या कैद्याला अधिक कडक शिक्षा देण्यासाठी तासंतास या खोबणीत उभे केले जात असे. या अवधीमध्ये त्या कैद्याला विश्रांती मिळणे तर दूरच, साधी हालचाल करणेही दुरापास्त असे. 

कारागृहाच्या एका बाजूला, तीन संलग्न खोल्यांची एक छळकोठडीही होती. त्या छळकोठडीत, कैद्याला दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या यातनांचे मी ऐकलेले वर्णन इथे लिहिणेदेखील मला नकोसे वाटते आहे. या छळकोठडीमधून कारागृहाच्या पिछाडीला उघडणारा एक दरवाजा होता. म्हणजे, एखादा कैदी छळादरम्यान मरण पावल्यास, त्याचे शव या दरवाज्यातून गुपचूप बाहेर नेण्याचीही व्यवस्था केलेली होती!

कारागृहातील कोठड्यांमध्ये पूर्वी वास्तव्य केलेल्या काही विशेष व्यक्तींसंबंधी माहितीही आम्हाला मिळाली. इंग्रजांच्या सेनेतील काही आयरिश सैनिकांनी आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देत बंड पुकारले होते. यापैकी काही आयरिश सैनिकांना येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी, इमोन द वेलेरा नावाच्या एका कैद्याला भेटून आयरिश स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती घेण्यासाठी, १९२० साली महात्मा गांधी दगशाई कारागृहात आले होते. गांधीजींच्याच विनंतीवरून, त्या रात्री त्यांची राहण्याची व्यवस्था तेथील एका कोठडीतच केली गेली होती. गांधीजींना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून, त्या कोठडीच्या भिंतीत एक शेगडीदेखील ऐनवेळी बांधून घेतली गेली होती, जी आजही तेथे दिसते.

पंजाब राज्याची राजधानी पूर्वी शिमला येथे होती. तेथील उच्च न्यायालयात नथुराम गोडसे यांच्यावरील गांधीवधाचा खटला १९४८-४९ दरम्यान चालला होता. गोडसेंना दिल्लीहून शिमल्याला आणले जात असताना, वाटेत एक रात्र त्यांना याच दगशाई कारागृहातील एका कोठडीमध्ये ठेवले गेले होते. विशेष म्हणजे, या कारागृहामध्ये ठेवले गेलेले ते अखेरचेच कैदी होते. 

गांधीजी आणि नथुराम गोडसे या दोघांचेही फोटो व माहिती त्या-त्या कोठडीबाहेर लावलेली आहे. या दोघांनीही, वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या कारणास्तव, एकेक रात्र याच कारागृहात काढली होती, हा एक विचित्र योगायोगच म्हणायचा!

दगशाई कारागृह आणि संग्रहालयाच्या इमारती, बरीच वर्षे मिलिटरी इंजिनियर सर्विसेसच्या सामानाचे गोडाऊन म्हणून  वापरात होते. मात्र, डॉ. आनंद सेठी यांनी २०१० साली सुरु केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या ऐतिहासिक वास्तूंना नवजीवन मिळाले आहे. डॉ. आनंद सेठी यांचे वडील, श्री. बाळकृष्ण सेठी हे १९४२-४३ दरम्यान दगशाई छावणीमध्ये Cantonment Executive Officer होते. त्यामुळे, डॉ. आनंद सेठी यांचे बालपण दगशाई छावणीतच गेले होते.  डॉ. आनंद सेठी यांनी २०१० साली, दगशाई छावणीतील तत्कालीन ब्रिगेड कमांडर यांच्याकडून कारागृहाच्या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्याची परवानगी मिळवली. पुढील वर्षभर अविरत मेहनत करून डॉ सेठींनी या वास्तू आजच्या रूपात आणल्या. त्यांच्याप्रति आभार व्यक्त केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकणार नाही. 

शिमल्याच्या आसपास पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनीच दगशाई कारागृह व संग्रहालयाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे.  

दगशाई कारागृह आणि संग्रहालय पाहून झाल्यावर आम्ही काल्का येथून  नेताजी एक्प्रेसने रात्रभराचा प्रवास करून  दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. तिथून दिल्ली विमानतळावर जाऊन मुंबईला परतलो. अशा रीतीने आमची शिमला-कसौलीची सहल आनंदात पार पडली. 

गुरुवार, ८ जून, २०२३

शिमला-कसौली भाग- १२: गिल्बर्ट ट्रेल

४ मे च्या रात्री आम्ही कसौलीच्या 'आर्मी हॉलिडे होम'मध्ये पोहोचलो होतो. ते ठिकाण अतिशय मोक्याच्या जागी, म्हणजे डोंगराच्या एका उंच सुळक्यावर आहे.त्यामुळे दोन्ही बाजूला दऱ्या दिसतात. एका बाजूला शिमल्याचे दिवे तर दुसऱ्या बाजूला चंदीगढचे दिवे दिसतात असे आम्हाला तिथल्या शिपायाने सांगितले होते. ५ मेच्या प्रसन्न सकाळी जाग आली. बाहेर पहिले तर  खरोखरच एका बाजूला दूरवर चंदीगढ दिसत होते. तर दुसऱ्या बाजूला पर्वतराजीमध्ये दडलेले शिमला दिसत होते. 

हॉलिडे होम मध्ये आम्हाला चांगली प्रशस्त आणि सुसज्ज खोली मिळाली होती. त्यामध्ये ओटा, भांडीकुंडी, मिक्सर, मायक्रोव्हेव्ह, पाण्याचा फिल्टर अशा सर्व सोयी असलेले एक छोटेसे स्वयंपाकघर होते. जेवणाचे टेबल व खुर्च्या मांडलेली डायनिंग रूम, एक प्रशस्त बेडरूम आणि एक हॉल अशी पाचशे फुटाची सदनिकाच होती ती. घरामध्ये असाव्यात अशा सर्व सोयी इथे होत्या. कपडे वाळत घालायचा स्टॅन्ड, इस्त्रीपासून ते हेयर ड्रायरपर्यंत सगळ्या वस्तू होत्या. पूर्वी या सदनिकांमध्ये गॅसची शेगडी आणि सिलिंडरही असल्याने आपापला स्वयंपाक करून खाता येत असे. पण २००१ साली कसौलीच्या आसपासच्या जंगलात भीषण आग लागून हॉलिडे होमच्या आसपासच्या काही इमारतींचे बरेच नुकसान झाले होते. त्यानंतर या इमारतीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने इथे गॅस वापरायला बंदी घालण्यात आली. आता या हॉलिडे होममध्ये, दोन स्वयंपाकी कामाला ठेवलेले आहेत. एका मध्यवर्ती ठिकाणी सर्वांचा स्वयंपाक होतो. आठवड्यातील प्रत्येक दिवशीचा ठराविक मेनू असतो. मात्र जेवण व नाश्ता हवा असल्यास आधी ऑर्डर द्यावी लागते.  

शुक्रवारी म्हणजे ५ मे च्या सकाळी नाश्ता झाल्यावर आम्ही चालतच  बाहेर पडलो.  त्या दिवशी बुद्धपौर्णिमेची सुट्टी होती. त्यामुळे ते छोटेसे गाव अगदी आळसावलेले दिसत होते. नऊ वाजून गेले तरी दुकाने अजून बंदच होती. कसौलीच्या चर्चच्या आवाराचे दारही बंदच होते. त्यामुळे नुसतेच  गावामध्ये फेरफटका मारून आलो. परतीच्या वाटेवर एका दुकानामधून केळी आणि काकड्या विकत घेतल्या. सगळे गाव निवांत असले तरीही वानरसेना मात्र कार्यरत आहे याची जाणीव झाली. आमच्या भोवती माकडे घोंगावायला लागली. अखेर, केळी आणि काकड्या मफलरमधे गुंडाळून, आनंदच्या जॅकेटच्या आत लपवून आम्ही खोलीकडे परत निघालो. परतीच्या वाटेवर सुप्रसिद्ध, 'सेंट्रल रिसर्च इन्स्टिटयूट' ची इमारत दिसली. ती इन्स्टिटयूट आतून बघायची इच्छा होती. म्हणून त्यांच्या ऑफिसला फोन लावला. पण बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने इन्स्टिटयूटही बंद असल्याचे कळले. 

'आर्मी हॉलिडे होम'च्या आवारात सुंदर बाग केलेली आहे. अनेकविध प्रकारची फुले तिथे बघायला मिळाली. इमारतीसमोरच्या दरीलगत एक प्रशस्त अंगण आहे. तिथे निवांत बसण्यासाठी, दोन झोपाळे आणि बाक ठेवलेले आहेत. झोपाळ्यावर झोका घेत, कोवळे ऊन खात, आम्ही चहा घेतला. कसौलीच्या जवळपास पाऊस झाल्यामुळे हवा थंड होती. पण सुदैवाने कसौलीमधे पाऊस पडत नव्हता. आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून सनसेट पॉईंट, लव्हर्स पॉईंट आणि सुइसाईड पॉईंट अगदीच जवळ होते. दुपारचे जेवण व वामकुक्षी झाल्यावर चालत जाऊन हे सगळे पॉंईंटस बघायचे ठरवले.

संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही चालत सनसेट पॉईंटच्या दिशेने निघालो. अपेक्षेप्रमाणे अनेक पर्यटकही त्या दिशेने चाललेले दिसले. कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणी सनराईझ पॉईंटपेक्षा सनसेट पॉइंटला अधिक गर्दी असते. सूर्यास्त व्हायला बराच अवकाश असल्यामुळे आम्ही गिल्बर्ट ट्रेलवर जायचे ठरवले. संध्याकाळच्या थंड आणि शांत वातावरणात नागमोडी पायवाटेवरून आम्ही चालत होतो. थोड्या  वेळातच आम्ही लव्हर्स पॉइंटला पोहोचलो. फूड टेकनॉलॉजीमधे PhD करत असलेल्या २-३ मुली तिथे आम्हाला भेटल्या. त्यांना गिल्बर्ट ट्रेलवर चालत पुढे जायचे होते, पण पुढील वाट निर्मनुष्य असल्याने त्या घाबरत होत्या. आम्ही दोघेही त्या पायवाटेने पुढे जाणार आहोत, हे कळल्यावर त्या आमच्या सोबतीने चालायला लागल्या. आम्ही बराच काळ वेगवेगळ्या टेकडयांना वळसे घालत चालत होतो. आजूबाजूला हिरव्या रंगाच्या अनंत छटा दिसत होत्या. सुंदर गवतफुले आणि घरट्याकडे परतणारे पक्षी दिसत होते. त्या वाटेवर चालणे इतके आनंददायी होते की आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी सनसेट पॉइंटला न परतता पायवाटेवरूनच सूर्यास्त पहिला. 

त्या रात्री कितीतरी वेळ, आमच्या सदनिकेमधून एका बाजूला दिसणारे शिमल्याचे दिवे आणि दुसऱ्या बाजूला दिसणारे चंदीगढचे दिवे आणि आकाशात दिसणारा पौर्णिमेचा चंद्र आम्ही डोळ्यात साठवत बसलो होतो. बुद्धपौर्णिमेला अनिरुद्धचा तिथीने वाढदिवस असतो. हॉलिडे होमच्या परिसराच एक छानसा व्हिडिओ काढून मुलांना पाठवला. या जागी मुलांना आणि नातवंडांना घेऊन यायचे असा मनाशी निश्चय करून आम्ही झोपी गेलो. 

(क्रमशः)

सोमवार, २९ मे, २०२३

शिमला-कसौली भाग- ११:- खाद्यभ्रमंती !

आर्मी हेरिटेज म्यूझियम पाहून आम्ही जेमतेम ११ वाजेपर्यंत आमच्या खोलीवर परतलो. सामान बाहेर काढून ठेवले. शिमल्याहून कसौलीला निघण्यापूर्वी आम्हाला 'हिमाचली रसोई' मध्ये स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता.  जिथे खास हिमाचली खाद्यपदार्थ मिळतात अशा या रेस्टॉरंटबद्दल मला यूट्यूब व्हिडीओवरून कळले होते. शिमल्यामध्ये आल्यापासून सतत लागलेल्या पावसामुळे या रेस्टॉरंटमधे जाता आलेले नव्हते. ५ मे ला आम्ही शिमल्यातला मुक्काम अर्ध्या दिवसाने वाढवला होताच. म्हणून दुपारचे जेवण आम्ही 'हिमाचल रसोई' मधे घ्यायचे ठरवले.
  
एपिक चॅनेलवरच्या 'राजा रसोई और अन्य कहानियाँ' आणि 'लॉस्ट रेसिपिज' या कार्यक्रमांमधून हिमाचली खाद्यसंस्कृतीची माहिती मी ऐकली होती. एलिझियम हेरिटेज रिसॉर्टमधे एकदा बुफे ब्रेकफास्ट मधे 'बब्रू' नावाचा तळलेला पदार्थ होता. पण कोणा लाडावलेल्या बबडूसाठी तो केला असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. 'सिद्दू' नावाचा, एक वाफवलेला पदार्थ असतो, हे माहिती असल्यामुळे तो खायची इच्छा होती. 'हिमाचली  रसोईला' फोन करून त्यांच्या वेळा विचारून मी आधीच सिद्दूची ऑर्डर देऊन ठेवली होती. बरोबर साडेबारा वाजता आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये हजर झालो. 

'हिमाचली रसोई', हे छोटेसे रेस्टॉरंट शिमल्याच्या लक्कड बाजारमध्ये आहे. तळमजल्यावर, जेमतेम १०-१२ जण बसू शकतील अशी लाकडी टेबल आणि बाकडी आहेत. एक खडी शिडी चढून पोटमाळ्यावर गेल्यावर आठ-दहा माणसांना खाली बसून जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. वर चढून जाण्याचे अजिबात त्राण पायात नसल्यामुळे आम्ही तळमजल्यावरच बसलो. मोजकेच पण एखाद्या विशिष्ट खाद्यसंस्कृतीचे स्वादिष्ट पदार्थ  मिळणारी रेस्टॉरंट्स आम्हाला आवडतात. 'पंजाबी, मुगलाई, चायनीज, साऊथ इंडियन आणि इटालियन' अशी सरमिसळ पाटी लावलेल्या रेस्टॉरंटमधे आम्हाला जावेसे वाटत नाही. पाश्चिमात्य देशात काही अगदी छोट्या रेस्टॉरंट्सच्या बाहेर एखाद्या पाटीवर त्या-त्या दिवशीचा मेनू, किंमतीसह लावलेला असतो. ते आम्हाला फारच आवडले. 'आपण इथे जावे की नाही?' हे बाहेरच्या पाटीवरची डावी-उजवी बाजू बघून ठरवता येते! 'हिमाचल रसोई' मध्ये मोजकेच पण पारंपरिक हिमाचली पदार्थ मिळत असल्यामुळे ते आम्हाला प्रथमदर्शनीच आवडले. 

त्या दिवशीच्या मेन्यूमध्ये 'मंडियाली धाम' होते. 'धाम' म्हणजे हिमाचलमधील सणासुदीच्या जेवणाचे ताट. आणि हिमाचलमधील मंडी शहराजवळच्या भागातले पदार्थ या थाळीत समाविष्ट असल्याने या जेवणाचे नाव 'मंडियाली धाम' असे होते. आम्ही एक मर्यादित थाळी आणि एक गोडाचे व एक तिखटाचे सिद्दू मागवले. हे जेवण स्वादिष्ट तर होतेच, पण आले-लसूण--कांदा विरहित असल्याने ते अतिशय सात्विकही होते. थाळीतल्या पाच वाट्यांमध्ये, कढी, राजमा, दुधी भोपळ्याची भाजी, पाकातला  दुधीहलवा आणि एक चिंच-गूळ घातलेली आंबट-गोड भाजी, अशी तोंडीलावणी भातासोबत वाढली होती. चायनीज बाऊ या पदार्थाच्या जवळ जाणारा, वाफवलेल, सिद्दू हा पदार्थ, आम्हाला फारच आवडला. गरमागरम सिद्दू फोडून, त्यावर साजूक तूप घालून खायला मजा आली. गोडाच्या सिद्दूमध्ये खसखस, सुका मेवा आणि गुळाचे सारण होते, तर तिखटाच्या सिद्दूमधे खसखस, कोथींबीर आणि गरम मसाले घातलेले सारण होते. जेवण झाल्यावर, माल रोडवरून आम्ही लिफ्टच्या साहाय्याने कार्ट रोडला उतरलो. तोपर्यंत आमचा टॅक्सीचालक कुलदीप, आमचे सामान मेसमधून घेऊन तिथे पोचला. त्यानंतर आम्ही कुफ्री-चैल मार्गे कसौलीचा प्रवास सुरु केला. 

 
कसौलीपर्यंतचा रस्ता रतिशय रम्य होता. थंडीच्या मोसमात बर्फाच्छदित शिखरांसाठी आणि बर्फातल्या खेळांसाठी  कुफ्री प्रसिद्ध आहे. आम्हाला तिथे थांबायला वेळ नव्हता. आमचे जेवण तर झालेले होते, पण तीन वाजून गेले तरी कुलदीप त्याच्या जेवणासाठी कुठेही थांबायला तयार नव्हता. जनेड घाटातल्या 'सोनी दा ढाबा' मधेच मी जेवणार, असे त्याने सांगितले. शेवटी तो ढाबा आल्यावर आम्हाला  हायसे वाटले. कुलदीपच्या सांगण्याप्रमाणे, हा ढाबा उत्तम स्थानिक जेवणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. कुलदीप जेवायला गेला तरी आम्ही टॅक्सीमधेच बसून लांबूनच त्या ढाब्याकडे पाहत होतो. एक गोरी-गोबरी पण मिचमिच्या डोळ्यांची बाई, सतत रोट्या लाटत आणि चुलीवर भाजत बसलेली होती. तुपाची धार सोडलेल्या गरमागरम रोट्या, आणि तोंडीलावणी वाढायची लगबग चालू होती. ढाब्याच्या एका गाळ्यामध्ये ड्रायव्हर्स आणि कामकरी लोकांची आसनव्यवस्था होती. तर शेजारच्या गाळ्यामध्ये टूरिस्ट लोकांसाठी जेवण्याची व्यवस्था होती. इथले सगळे जेवण आणि विशेषतः 'हिमाचली मीठी रोटी' अतिशय प्रसिद्ध आहे, असे कुलदीपणे आम्हाला सांगितले. आम्हाला भूक नसल्यामुळे आम्ही मात्र तिथे काहीच खाल्ले नाही. 


 
मस्त गप्पा मारत, आणि आम्हाला सगळी माहिती सांगत कुलदीप सफाईने गाडी चालवत होता. आम्हाला चैल पॅलेस पाहायला जायची इच्छा नव्हती. पण चैल येथील सुप्रसिद्ध 'राष्ट्रीय मिलिटरी स्कूल'पर्यंत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला. तसेच, कुलदीपच्या सांगण्यावरून 'काली टिब्बा' या प्राचीन मंदिराला भेट दिली. उंच डोंगरावर बांधलेले हे मंदिर सुंदर असून इथले वातावरण अतिशय प्रसन्न आहे. पण इथल्या तुफान वाऱ्यामुळे आम्ही अगदी कुडकुडून गेलो. हे सगळे होईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजत आले होते. आम्हाला गरमागरम चहा हवा होता. पण, 'मैं आपको एक जगह बढिया चाय पिलाऊंगा' असे म्हणत कुलदीप इथे-तिथे कुठेही थांबायला तयारच नव्हता. शेवटी कंडाघाट येथील एक छोट्या टपरीपाशी तो थांबला. अगदी हसतमुख अशा माय-लेकींच्या जोडीने चालवलेल्या त्या टपरीवर अप्रतिम चवीचा, आले घातलेला अगदी गरम चहा मिळाला. एक कप चहा  पिऊन झाल्यावर आम्हाला आजून एकेक कप चहा प्यायची आणि त्याबरोबर मठरी  खायची इच्छा अनावर झाली.  

चहा घेऊन आम्ही सोलन मार्गे कसौलीकडे निघालो. त्या दिवशीची आमची भ्रमंती खरेतर खाद्यभ्रमंतीच होती. वाटेत कुलदीपशी गप्पा चालू होत्याच. गप्पांच्या ओघामध्ये व्यसनाधीनता हा विषय सुरु झाला. त्यानंतर मात्र कुलदीपने सांगितलेली माहिती ऐकून आम्ही सुन्न झालो. पंजाबमधल्या तरुण पिढीसारखीच, हिमाचलमधील तरुण पिढीदेखील व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे आहे हे ऐकून आम्हाला धक्का बसला. 

साधारण रात्री नऊच्या सुमारास आम्ही कसौलीच्या आर्मी हॉलिडे होम मध्ये पोहोचलो. रात्रीचे जेवण खोलीवरच आले. जेवण झाल्यावर निद्रधीन झालो. 

रविवार, २८ मे, २०२३

शिमला-कसौली भाग- १०

शिमल्याला येण्याआधी मी इंटरनेटवरून इथल्या पर्यटनस्थळांबद्दल बरीच माहिती वाचली होती. तसेच यूट्यूबवर चार-पाच ट्रॅव्हलॉगही बघितले होते. पण ऍन्नाडेलच्या आर्मी हेरिटेज म्युझिअम संबंधी फारसे वाचायला अथवा ऐकायला मिळाले नव्हते. शिमल्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पर्यटकांना या म्युझियमबाबत विशेष माहिती नसते. आर्मी हेरिटेज म्युझियमच्या आवारामध्ये आम्ही दहा वाजायच्या आधीच जाऊन पोहोचलो. २००६ साली सुरु केलेले हे छोटेसे पण अतिशय नीटनेटके म्युझियम, दोन-तीन टुमदार बैठ्या बंगल्यामध्पस रलेले आहे. हे म्युझियम बघण्यासाठी प्रवेशमूल्य नाही. पण फक्त भारतीय नागरिकांनाच इथे प्रवेश दिला जातो. सोमवार सोडून आठवड्यातील इतर सर्व दिवशी हे म्युझियम, सकाळी १० ते २ व ३ ते ५ या वेळात खुले असते. या म्युझियमच्या बाहेर व आतही फोटो काढण्याची मुभा आहे.

म्युझियमच्या आवारामध्ये, मूळ हिमाचल प्रदेशनिवासी शूर सैनिकांचे अर्धपुतळे बसवण्यात आलेले आहेत. हे सर्व वीर भारतमातेच्या रक्षणार्थ लढताना धारातीर्थी पडलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्या-त्या सैनिकाचे अथवा अधिकाऱ्याचे नाव व त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. आम्ही ती सगळी माहिती वाचली. अशा ठिकाणी गेले की मनामध्ये खूपच कालवाकालव होते आणि डोळे पाण्याने भरून येतात. 

दहा वाजता हे संग्रहालय उघडणार होते. आम्ही दहाच्या आधी पोहोचलो होतो. आत साफसफाई चालू होती. पण तिथल्या जवानाला आनंदने, आपण निवृत्त सेनाधिकारी असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला परतण्याची गडबड असल्यामुळे आम्हाला अगदी थोड्या वेळात, ते संग्रहालय आणि परिसर दाखवायची विनंती केली. त्या जवानाने आम्हाला आधी संग्रहालयाच्या बाजूला असलेल्या ग्रीन-हाऊसमधे  नेले. तिथे अतिशय सुरेख अशी निवडुंगांची बाग (कॅक्टस गार्डन) केलेली आहे. या बागेमध्ये अनेक प्रकारचे कॅक्टस आणि फुलझाडे आहेत. या बागेला गेली अनेक वर्षे स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळत असल्याचे त्याने मोठ्या अभिमानाने सांगितले. बाग बघून झाल्यावर आम्ही खालच्या बाजूला असलेल्या एका पॅव्हेलियनमध्ये गेलो. तिथे अनेक रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमानांच्या छोट्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. या आवारातून डाव्या हाताला ऍन्नाडेल गोल्फकोर्सचे पुन्हा एकदा सुखद दर्शन झाले. तिथे आमचे फोटो काढून होईपर्यंत संग्रहालय उघडलेले होते. त्यामुळे आम्हाला आत प्रवेश मिळाला. 

अगदी महाभारतातल्या अर्जुनापासून सध्याच्या भारतीय सैनिकांच्या कथा संग्रहालयामध्ये दाखवलेल्या आहेत. या संग्रहालयात भारतीय लष्कराबाबत उत्तम माहिती संकलित केलेली आहे. भारतीय सैन्यातील वेगवेगळ्या रेजिमेंटचे पोशाख व झेंडे, सियाचेन ग्लेशियरवर सैनिक वापरतात ते गणवेश, तसेच वायुसैनिकांचे आणि नौसैनिकांचे गणवेश आपल्याला बघायला मिळतात. काही हुतात्म्यांचे गणवेश आणि त्यांची पदकेही इथे संग्रहित केलेली आहेत. तसेच युद्धामध्ये, पूर्वीपासून वापरली जाणारी अनेकविध  शस्त्रास्त्रे, युद्धसाधने, व वाद्येही इथे ठेवण्यात आलेली आहेत.


एका दालनामध्ये लावलेल्या काही फोटोंनी आणि कागदपत्रांनी आमचे लक्ष वेधून घेतले. डेहरादूनची जॉईंट सर्विसेस विंग (JSW) ही संस्था म्हणजेच १९४९-५५ या काळातले, आत्ताच्या NDA खडकवासलाचे जुने रूप होते. JSW देहरादूनच्या पहिल्या बॅचचे कॅडेट म्हणून तिथे प्रशिक्षण घेत असतानाचा, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा 'ब्लू पॅट्रोल' गणवेशातला अतिशय उमदा फोटो इथे लावलेला आहे. १८५७च्या स्वात्रंत्र्यसंग्रामानंतर मंगल पांडे यांचे कोर्ट मार्शल केले गेले होते. त्या कोर्ट मार्शलचे फर्मान एका शोकेसमध्ये लावलेले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला सपशेल पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करतानाचा, पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांचा फोटो तिथे बघायला मिळतो. पाकिस्तानच्या पराभवाची निशाणी म्हणून इथे पाकिस्तानच्या एका रेजिमेंटच्या झेंडाही उलटा लटकावून ठेवला आहे. तसेच पाकिस्तानी हद्दीतून आणलेली एक पोस्टाची पेटीसुद्धा इथे टांगलेली आहे. १९७१ साली आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमाची शौर्यगाथा शिमल्यामधल्या या संग्रहालयात पाहताना ऊर अभिमानाने भरून येत होता. पण, याच शिमल्यातली एक कटू आठवणही मनात येत होती. इंदिरा गांधीजींनी, याच शहरात 'शिमला करारावर' स्वाक्षरी केली होती. बदल्यात काहीही न मिळवता, पाकिस्तानच्या युद्धकैद्यांना सोडून दिले होते आणि सैन्याने जिंकलेला प्रदेशही परत केला होता. त्या घोडचुकीची आठवण होऊन खंत वाटली.

यानंतर आम्ही म्यूझियमच्या 'शौर्य हॉल'मध्ये गेलो. तिथे मोठमोठया फलकांवर भारतीय सैनिकांनी लढलेल्या महत्वाच्या लढायांची माहिती थोडक्यात लिहिलेली आहे. तिथेच एक चौकोनी आकाराची टेबलांची मांडणी केलेली दिसली. त्यावर एका बाजूला China आणि दुसऱ्या बाजूला India असे लिहिलेले होते. भारत-चीन सीमेवर, चुशूल, लिपुलेख, नथू-ला, आणि बुम-ला या चार ठिकाणी वेळोवेळी होणाऱ्या वाटाघाटींकरता वापरल्या जाणाऱ्या टेबलची ती प्रतिकृती होती.

साडेअकराच्या आत परतून मेसमधली खोली रिकामी करायची असल्यामुळे आम्हाला इथे वेळ जरा कमीच पडला. त्यामुळे त्या थोडक्या वेळात शक्य तेवढी माहिती जमा करून घेण्याच्या उद्देशाने, आनंदने काही व्हिडिओ घेता-घेता त्याचे धावते वर्णनही करून ठेवले. त्यानंतर मात्र आम्ही बसमध्ये बसून आमच्या खोलीवर परतलो.

(क्रमशः)