सोमवार, १५ जून, २०२६

केदारनाथ-भाग-७

आदल्या रात्री लवकर जेवून झोपले होते. गाढ झोप लागली होती आणि पहाटे ६.३० वाजता अगदी प्रसन्न चित्ताने जाग आली. नेहमीप्रमाणे सकाळी चहा प्यायची हुक्की आली होतीच. कालच अशी महिती मिळालेली होती की, इथे सकाळी चहा मिळतो पण बरोब्बर सव्वासहाला वरच्या मजल्यावर स्वयंपाकघरात जाऊन तो आणावा लागतो. ती वेळ चुकली की मात्र मग नाष्ट्याबरोबरच चहापान करता येते. कडाक्याच्या थंडीमधे सकाळी उठल्यानंतर उबदार खोलीतून बाहेर पडून, चहा आणायला वरच्या मजल्यावर जायला अगदी नको वाटत होते.  त्यामुळे, चहाची तल्लफ मनातच दाबून टाकली. 

आमचे सगळे सामान असलेल्या स्ट्रॉली बॅग्स आम्ही १९ तारखेला संध्याकाळीच नारायणकोटीमध्ये तेथील व्यवस्थापकांच्या हवाली केल्या होत्या. पण २२ तारीख उजाडली तरी आमच्या बॅग्स अजूनही केदारनाथपर्यंत पोचलेल्या नव्हत्या. आश्चर्य म्हणजे आमच्यासोबतच वर चढून आलेल्या डॉ. हर्ष आणि डॉ. अजय यांचे सामान मात्र २२ तारखेला सकाळी त्यांना मिळाले. अगदीच जुजबी सामान जवळ असल्याने आमची बरीच गैरसोय होत होती. आनंदने काल वॉशिंग मशीनमधे आमचे कपडे धुतले असल्याने बदलायला स्वच्छ कपड्यांचा एक जोड तरी होता हे नशीब! काल एका नर्स मुलीकडून मी थोडासा साबण घेतल्यामुळे कपडे धुता आले होते. आज मात्र मी सकाळीच बाहेर पडून, हॉस्पिटलसमोरच्या दुकानातून सर्फचा एक पुडा विकत आणला. अंघोळ करून आम्ही दोघेही नाष्टा करायला गेलो. नाष्ट्याला गरम छोले-भटुरे होते. छोले अगदी छान मऊ शिजलेले आणि चवीला चटकदार होते. भटुरे आकाराने चांगलेच मोठे होते. दोन भटुरे व छोले आणि २-३ कप गरमागरम चहा असा भक्कम नाष्टा करून ८.४५ पर्यंत मी कामाला गेले.
मी ९ वाजायच्या आतच OPD मधे पोहोचल्यामुळे, रात्रपाळी केलेला स्टाफ अगदी खूष झाला. मी ताजीतवानी असल्याने लगेच कामाला लागले. तिथली रजिस्ट्रेशनची पद्धत, रूग्णांचे बेशिस्तीची वागणे आणि एकेका रूग्णाबरोबर येणाऱ्या दोन-तीन किंवा कित्येकदा जास्तच नातेवाईकांचे आत घुसणे, हे सगळे मला कालपासूनच खटकत होते. त्यामुळे मी तिथली घडी नीट बसवण्यासाठी सूत्रे हातात घेतली. रजिस्ट्रेशनची कारवाई नीट व सुरळीतपणे होईल यासाठी टेबलांची योग्य जागी हलवाहलव करून घेतली. बाहेरून आत येण्याच्या दरवाज्याजवळच आमची तपासणीची टेबल्स लावून घेतली. प्रत्येक रुग्णाने रांगेतच यायचे, नावनोंदणी केल्यानंतरच तपासणी होईल, आणि रुग्णासोबत शक्यतो एकाही नातेवाईकाने आत यायचे नाही, असे नियम मी लागू केले. त्यामुळे आपोआपच बघ्यांची संख्या घटली आणि गर्दी आणि गोंधळ जरासा कमी झाल्यामुळे सगळ्यांनाच सुसूत्रपणे काम करता येऊ लागले. इथल्या सगळ्या तपासण्या आणि उपचार मोफत आहेत हे बाहेरच्या बोर्डावरच लिहिलेले होते. त्यामुळे, एखाद्या खऱ्या रुग्णासोबत आलेले नातेवाईकदेखील फारसा काही त्रास नसताना, "माझे पण बीपी बघा, शुगर तपासा, ऑक्सिजनची लेव्हल मोजा" असा आग्रह आमच्यापाशी धरत होते. मी लागू केलेल्या नियमांमुळे, विनाकारण तपासणी करून घेऊ पाहणाऱ्या धडधाकट नातेवाईकांची संख्याही आपोआपच घटली. त्यामुळे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या नर्सेसना अगदी "हुश्श" झाले. 

सकाळी ८.४५ ते रात्री ७.३० पर्यंत मी सलग ड्यूटी केली. आज मात्र  दुपारी जेवायलाही गेले नाही. अलीकडे बरेच दिवसांपासून, पुण्यात घरी असताना, आम्ही दुपारचे जेवण करायची सवय ठेवलेली नव्हती. शिवाय, आज सकाळचे भटुरे पोटात अगदी गच्च बसलेले होते. त्यामुळे फारशी भूकही लागली नव्हती. इथे थंडी जरी असली तरी फारशी भूक लागत नाही असे माझ्या लक्षात आले. या हॉस्पिटलमध्ये सतत खूप जास्त पेशंट्स येत असल्यामुळे एकाचवेळी सगळा स्टाफ व डॉक्टर्स जेवायला जात नाहीत. अर्धा नर्सिंग स्टाफ आधी जेवून येतो आणि ते लोक परत आले की उरलेली मुले-मुली जेवायला जातात. आधी गेलेल्या मुलामुलींकडून आज दुपारी जेवणात आंबे आहेत, हे मला कळले होते. त्यामुळे, नंतर जेवायला जाणाऱ्या रिया आणि कविता या नर्सेसना मी माझ्यासाठी आणि आनंदसाठी प्रत्येकी एक-एक आंबा आणायला सांगितले. पण या मुली जेवायला जाईपर्यंत आंबे संपत आलेले असल्याने त्यांनी एकच आंबा आणला होता. मी तो रात्रीच्या जेवणात खाण्यासाठी ठेवला. 
इथे आल्यापासून अनेक चित्रविचित्र अनुभव येत राहिले होते. भारताच्या कोनाकोपऱ्यातून आणि खेडोपाड्यातून इथे भाविक येतात. अनेकजण घोड्यावरून, डोलीतून किंवा पिठ्ठूत बसून येतात. वाटेत घोड्यावरून पडून मार खाल्लेले, हाडे मोडलेले, खरचटलेले, किंवा मुका मार लागलेले असे दिवसभरात कमीतकमी १०-१२ रुग्ण येत होते. त्यापैकी अनेकजण अतिशय गरीब होते. सहसा अशा गरीब घरांमधील कित्येक वृद्ध बायका, पुरुष व लहान मुले आधीच कुपोषित व खालावलेल्या प्रकृतीचे असतात. इथली थंडी, प्रवासाचा शीण, हवेतली प्राणवायूची कमतरता, आणि एकंदर खाण्याचे हाल, यामुळे त्यांची तब्येत एकदमच कमालीची ढासळते. कित्येकांना इथपर्यंत येऊनही दर्शन न करताच परत जावे लागते. अनेकांनी चारधाम यात्रेसाठी आयुष्यभराची पुंजी खर्च केलेली असते. अशावेळी दर्शन न घेता परत जावे लागणे हे खरोखरच दुर्दैव म्हणायचे. दवाखान्यामध्ये एक दानपेटी ठेवलेली आहे. परंतु, इथले कोणीही कर्मचारी कोणालाही दान देण्याची विनंती करत नाहीत. तरीदेखील अनेक जण त्या दानपेटीमधे पैसे दान करताना दिसत होते. आणि मला जाणवलेली विशेष गोष्ट म्हणजे दान करणारे बरेचसे लोक गरीब घरामधून आलेले दिसत होते. त्या मानाने, सुखवस्तू लोक फारसे दान  करताना आढळले नाहीत. 

मला आलेला आणखी एक अनुभवही खूप बोलका होता. ज्यांना खरोखरीच खूप त्रास असतो, ते लोक फारसे कुरकूर करताना दिसले नाहीत. ते नावनोंदणी होईपर्यंत शांतपणे थांबत होते आणि आमचा सल्ला ऐकत होते. याउलट, विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत म्हणून आलेले, फारसा त्रास नसलेले सुखवस्तू लोक जास्तच कटकट करत होते. विनाकारण हॉस्पिटलमधे आलेल्या कित्येक तरुण मुलामुलींना फारसे काहीही झालेले नसतानाही, उगीचच ऑक्सिजन लावून हवा असायचा. अशा लोकांना वेळीच ओळखून, थोडे गोड बोलून त्यांची बोळवण करावी लागे. 

आपल्या देशात कोणत्याही पॅथीची, कुठलीही औषधे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही अगदी सहज मिळू शकतात हे आपण पाहतोच. अनेक पेशंट्स आपल्या मनाने वाट्टेल ती औषधे व गोळ्या खाऊन आलेले मला दिसले. तरीही त्यांना अजून मिळतील ती औषधे घेण्याची हौस होती. पंचेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही केदारनाथला आलो होतो तेंव्हा आमच्यापैकी कोणालाही किंवा आमच्या आसपास चालणाऱ्या इतर कोणा यात्रेकरूंनाही प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्रास झाल्याचे मला आठवत नव्हते. इथे मात्र बरेच पेशंट्स त्या त्रासाची तक्रार घेऊन येत होते. अनेकजण कापूर हुंगत-हुंगत आलेले होते. हातात किंवा आपल्या गळ्यामध्ये कापराच्या पुड्या बांधलेलेही महाभाग दिसले. त्यांच्या समजुतीनुसार कापूर हुंगल्याने शरीरातील प्राणवायू वाढतो! करोनाकाळामध्ये बऱ्याच प्रमाणात बोकाळलेले हे कापूराचे खूळ अजूनही लोकांच्या मनातून उतरलेले नसल्याचे पाहून आश्चर्यही वाटले आणि खेदही वाटला. अति कापूर हुंगण्यामुळे श्वासनलिकेला आतून सूज येऊ शकते आणि श्वसनाला अधिकच त्रास होऊ शकतो. या कापूर हुंगण्याच्या फॅडमुळेच तिथे येणाऱ्या अनेकांना श्वसनाचा त्रास होत होता. याबाबत लोकांचे प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतही होतो. पण हे 'कापूर-महात्म्य' लोकांच्या मनांमध्ये इतके खोलवर बिंबलेले आहे की फारसे कोणी आमच्यावर विश्वासही ठेवत नव्हते.  
 
या हॉस्पिटलात रोज दुपारी ३ वाजता, इथे सहा महिने पूर्णवेळ काम करण्यासाठी आलेल्या सर्व नर्सिंग स्टाफची एक मिटिंग घेतली जाते. इथले व्यवस्थापक श्री. रोहनजी, श्री. धनवीरजी, आणि डॉ. यादव या मीटिंगमधे उपस्थित असतात. नर्सिंग स्टाफला राहण्या-खाण्याच्या बाबतीत किंवा रोजच्या कामामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या ऐकून घेतल्या जातात व त्यावर तोडगा काढला जातो. अर्थात, आम्ही बाहेरून केवळ दहा दिवसांसाठी आलेले चार डॉक्टर्स या मिटिंग्जना जात नव्हतो. रोज दुपारी ३ ते ४ दरम्यान ही मिटिंग चालते. माझ्याबरोबर काम करणारा डॉ. अजय आज दुपारी जेवणानंतर बराच काळ कुठेतरी गायब होता. हैदराबादहून आलेल्या डॉ. सुभाषिनीची तब्येत बरी नसल्याने ती सलग दुसऱ्या दिवशीही कामाला आलेली नव्हती. दुपारी ३ ते  ४ दरम्यान, नावनोंदणी करणारी एक नर्स, एक नर्सिंग कोर्सचा विद्यार्थी आणि मी एकटीच डॉक्टर, असे तिघेच काम करत बसलो होतो. आनंदने दुपारी येऊन तास-दीड तास रजिस्टर भरण्याचे काम केले. 

पेशंट नोंदणीसाठी रोजची तीन रजिस्टर्स असतात. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नावनोंदणीचे एक रजिस्टर, दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुसरे रजिस्टर व रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंतचे तिसरे रजिस्टर. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत, साडेतीनशेच्या वर पेशंटसची नावनोंदणी झालेली होती, म्हणजेच दुपारी ३ वाजेपर्यंत किमान ३५० पेशंट्स तपासले गेले होते! इथे रोज दुपारी ४ वाजता चहा येतो. श्रमपरिहारासाठी चहासारखे दुसरे काही नाही. तो चहा मात्र मी दोन-तीन छोटे कागदी कप भरून प्यायले. भर थंडीमध्ये गरम चहा चांगला वाटतो. 

संध्याकाळी ७.३० पर्यंत ओपीडीत थांबून मी येतील ते सगळे पेशंट्स बघितले.  दिवसभर पेशंट्स तपासून, त्यांच्याशी बोलून आणि बिनकामाच्या नातेवाईकांना बाहेर हाकलून मला खूपच दमायला झाले होते. रात्रीचे जेवण साधेच होते. घट्ट दाल, गरम रोटी, आलूमटारची भाजी आणि भात असे जेवून, आणि दुपारी जपून ठेवलेला आंबा खाऊन मी खोलीवर रात्री ९ पर्यंत पोहोचले. रात्री आनंदशी गप्पा मारत आणि फोनवर काहीबाही ऐकत असतानाच केंव्हातरी झोप लागून गेली.

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट 


रविवार, १४ जून, २०२६

केदारनाथ-भाग-६

पायी चालत, दमून-भागून, आदल्या रात्री आम्ही केदारनाथला पोचलो होतो. रात्री झोपताना माझे अंग बर्फासारखे गार पडले होते. केस तर ओलेच होते. झोप लागण्यापूर्वी बराच वेळ मी रजईच्या आत कुडकुडत होते. तेंव्हा मला खरोखर असे वाटले होते की आज रात्रीतूनच माझे काही बरेवाईट होणार! दिवसभर फारसे काही खायलाही मिळालेले नसल्याने पोट रिकामेच होते. पण अतिशय दमणुकीमुळे मला झोप चांगली लागली. जवळजवळ पहाटे दोन वाजता मी झोपले असले, तरीही सवयीमुळे पहाटे ६.३० वाजता जाग आली. 

कालच्या दिवसभरात आम्ही चौघेही सुमारे साडेसोळा तास चालून केदारनाथला पोहोचलो होतो. स्मार्टवॉचवरचे रेकॉर्ड बघितले तर एकूण ३२.५३ किलोमीटर अंतर पार केलेले दिसत होते. दमणुकीमुळे काल मी अगदीच अर्धमेल्या अवस्थेत होते. बाकीचे तिघे त्या मानाने ठीक होते. मी रात्री कुठलीही pain killer गोळी न घेताच झोपले होते. तरीही सकाळी उठताना, हालचाल करताना, पाय किंवा अंग फारसे दुखत नव्हते. मुख्य म्हणजे मी जिवंत आहे, हालचाल करू शकते आहे या जाणिवेमुळेच मला समाधान वाटले! 

दात घासून सर्वप्रथम मी चहाच्या शोधात तळमजल्यावर गेले. तिथे हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये सगळेजण प्रचंड लगबगीत होते. पेशंट्सची तोबा गर्दी होती. त्या गोंधळातही एका नर्सने माझ्या हातात चहाचा कप आणून दिला. बिनदुधाचा, गोडमचूळ आणि थंड झालेला चहा मला मुळीच आवडला नाही. चहा व नाष्टा दुसऱ्या मजल्यावरच्या डायनिंग हॉलमधे सकाळी ८.३० वाजताच मिळेल ही मोलाची माहिती घेऊन मी खोलीवर परतले. आम्ही दोघेही तयार होऊन डायनिंग हॉलवर नाष्टा करायला गेलो. कुणाल व अविनाश हे दोन नर्सिंग कोर्सचे विद्यार्थी आमच्याही आधी डायनिंग हॉलमधे येऊन नाष्ट्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा झाल्या. नाष्ट्याला गरम फुलके आणि बटाट्याची भाजी होती. त्याबरोबर छान, गरम, पण भरपूर गोडमिट्ट चहा होता. जवळपास ३६ तासांनंतर गरम आणि पोटभरीचे खाणे मिळाल्यामुळे आम्ही दोघांनी अगदी भरपेट खाल्ले. तेथील शिरस्त्याप्रमाणे नाश्ता झाल्यानंतर आपापली ताटे घासून ठेवली.

केदारनाथसारख्या दुर्गम ठिकाणी गेल्या वर्षीपर्यंत फक्त एक छोटेखानी, बैठा दवाखाना होता. परंतु, आताचे हे नवीन, पक्के बांधकाम असलेले हॉस्पिटल खूपच मोठे आणि अद्ययावत आहे. या धर्मादाय हॉस्पिटलचे उद्घाटन याच वर्षी ८ मे रोजी झालेले आहे. तळमजल्यावर औषधालय किंवा फार्मसी, एक छोटी लॅब, ओपीडी, एक लहान operation theater (मायनर ओटी), एक्सरे रूम, आयसीयू, जनरल वॉर्ड, आणि वेटिंग रूम आहे. बाहेरून आल्या-आल्या समोरच फार्मसी आहे. तिथे गोळ्या-औषधांचे वितरण होते. फार्मसीच्या डावीकडच्या दारातून आत गेले की OPD, इमर्जन्सी किंवा कॅजुअल्टी,  त्याच्या बाजूला मायनर ओटी, सगळ्यात मागच्या बाजूला ICU, जनरल वॉर्ड, आणि लॅबोरेटरी अशी रचना आहे. हॉस्पिटलच्या आवारात सगळीकडे सीसी टीव्ही लावलेले आहेत. फार्मसीच्या आतमध्ये मागील बाजूस एक कॉन्फरन्स रूमही आहे. तिथेच सीसी टीव्हीचा स्क्रीन बसवलेला आहे. फार्मसीच्या पलीकडे एक भली मोठी वेटिंग रूम आहे. तिथे अनेक यात्रेकरू विसावा घेत असतात. त्यापलीकडे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. 

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सर्व वैद्यकीय स्टाफला राहण्याची व्यवस्था केलेली होती. खोल्या मोठ्या होत्या व त्यामध्ये गरज व सोयीनुसार पलंग आणि बंक बेड ठेवलेले होते. एकेका खोलीत चार ते पाच शिकाऊ पुरुष किंवा स्त्री नर्सेस, अशी राहायची व्यवस्था होती. सेवाज्येष्ठतेनुसार एका खोलीत एक किंवा फारतर दोन डॉक्टर्स राहतात. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकघर व भोजनालय आणि त्याच्या मागच्या बाजूला मोठी गच्ची होती. भोजनालयाच्या बरोबर खाली, पहिल्या मजल्यावर एक मोठे मोकळे दालन होते, जिथे सध्यातरी बांधकामाचे उर्वरित साहित्य ठेवलेले होते. आमच्या खोल्यांच्या सर्व बाजूंनी मोठा व्हरांडा होता. या व्हरांड्याला काचेची तावदाने असल्याने व्हरांड्यातून बाहेरचा यात्रेकरूंची ये-जा असलेला वाहता रस्ता दिसत होता. व्हरांड्याच्या एका कोपऱ्यातून आम्हाला केदारनाथ देवळाच्या शिखराचे दर्शन होत होते. आमच्याच हॉस्पिटलचे दोन बूथ्स केदारनाथच्या देवळाच्या अगदी जवळ आहेत, अशीही माहिती मला मिळाली. एक बूथ देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि एक देवळाच्या मागच्या दाराजवळ होता. तिथेही मोफत तपासणी आणि औषधे देण्याची सोय होती.  

मी बरोबर ८.४५ वाजता तळमजल्यावर ड्यूटीसाठी पोहचले. तिथे OPD मधे प्रचंड गडबड होती. किमान चाळीसएक रूग्णांची रांग लागलेली होती. प्रत्येक व्यक्ती आपला नंबर आधी लागावा यासाठी धडपडत होती. प्रत्येक रूग्णाबरोबर दोन-तीन नातेवाईकही आत घुसून आपापल्या रुग्णाला लवकर तपासावे यासाठी गडबड करत होते. सगळा नर्सिंग स्टाफ पेशंट्सना तपासून औषधांसाठी फार्मसीमधे पाठवत होता. एका बाजूला एका ओळीत काही रूग्णांना खुर्चीवर बसवून मास्कने ऑक्सिजन देणे सुरू होते. तिथेच एका बाजूला असलेल्या ५-६ Casualty beds वर काही अत्यवस्थ रुग्णांना ठेवलेले होते. त्यातल्या तिघांना तातडीने हेलिकॉप्टरने खाली पाठवायची गरज होती. त्यासाठी हेलिकॉप्टरचे बुकिंग करणे, त्यांच्यासोबत जाण्यासाठी State Disaster Response Force (SDRF) आणि National Disaster Response Force (NDRF) च्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेणे, हेलिपॅडपर्यंत पेशंटला घेऊन जाताना वाटेत ऑक्सिजन देत राहण्यासाठी भरलेला ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवणे, तो नेण्यासाठी पिठ्ठूवाल्याला सज्ज राहायला सांगणे अशी सर्व कामे करण्यात काही नर्सेस व हॉस्पिटलचे व्यवस्थापक, श्री. धनवीर व श्री. रोहन हे व्यग्र होते. हे सगळे होत असतानाच, पेशंटचे वैद्यकीय कागदपत्र तयार करणे, पेशंटचे आधार कार्ड, फोन नंबर घेणे, श्रीनगर (गढवाल) किंवा AIIMS ऋषिकेश यापैकी ज्या हॉस्पिटलमधे पेशंटला पाठवायचे आहे, तिथे संपर्क करून त्यांना पेशंटबाबत आगाऊ माहिती देणे, अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू होती. ती सगळी लगबग बघून मी क्षणभर  चक्रावून गेले. 

पेशंटला हेलिपॅडपर्यंत न्यायला SDRF किंवा NDRF चे चार जवान येतात. पेशंटला उचलून स्ट्रेचरवर ठेवले जाते व पेशंटच्या नातेवाईकाच्या हातात पेशंटचे कागद आणि सलाईनची बाटली/infusion pump दिला जातो. पिठठूवाल्याच्या पाठीवर oxygen सिलिंडर ठेवतात. मग एक पेशंट, एक नातेवाईक, एक पिठठूवाला आणि चार जवान अशी  सात जणांची वरात पेशंटला घेऊन हेलिपॅडकडे रवाना होते. अशावेळी पाऊस, बर्फ पडत असले तर पेशंटचे आणि नातेवाईकांचे मानसिक आणि शारीरिक हाल बघवत नाहीत. आपल्या पेशंटला हेलीकॉप्टरने खाली नेले तरी तिथल्या वैद्यकीय सेवा कशा असतील याची मनात धाकधूक, तिथे पैसे किती मोजावे लागतील याचा अंदाज नाही आणि इतकं करूनही आपलं माणूस जगेल का नाही याची शाश्वती नाही, अशा अनिश्चिततेच्या मनस्थितीत पेशंटचे नातेवाईक असतात. त्यांना धीर देऊन रवाना करण्याव्यतिरिक्त काहीच करता येत नाही. 

माझ्या ड्यूटीच्या पहिल्याच सकाळी माझ्यासमोर तीन पेशंट्सना हेलिकॉप्टरने खाली पाठवले गेले. त्यातला एकजण High Altitude Pulmonary Oedema (HAPO म्हणजे फुफ्फुसात पाणी होऊन त्यावर सूज येणे) चा पेशंट होता. त्या अत्यवस्थ रुग्णावर माझ्यासमोरच उपचार झाले होते. त्याच्या श्वसनाचा वेग, हृदयाची गती आणि बाहेरून oxygen लावून का होईना, पण रक्तातील Oxygen Saturation या सर्वांमधे प्राथमिक उपचारांनंतर लक्षणीय सुधारणा झालेली मला दिसून आली होती. त्यामुळे त्याचा जीव नक्की वाचेल अशी आशा माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. पुढील उपचारासाठी त्याला ऋषिकेश येथील AIIMS मधे हलवणार होते. अशा रूग्णाच्या नातेवाईकांना तेथून निघण्यापूर्वीच्या काळात अभिप्राय लिहिण्याची विनंती करण्यात येते. HAPO झालेल्या त्या तरूण रूग्णाच्या भावाने सद्गदित होऊन साश्रूनयनांनी माझ्यासमोरच अभिप्राय लिहिला. "माझा भाऊ बरा होईल ना?" असे रडवेल्या आवाजात त्याने मला विचारले. मी त्याला धीर देऊन पाठवून दिले. घोड्यावरून पडून हात आणि पाय फ्रॅक्चर झालेल्या एका मध्यमवयीन बाईला प्लास्टर घालून ठेवलेले होते. ती वेदनेने कळवळत होती. एक वृद्ध रूग्ण हृदयरोगग्रस्त होता. त्या दोघांनाही यथावकाश  खाली पाठवले गेले. केदारनाथच्या हॉस्पिटलमधे पोर्टेबल एक्सरेची देखील सोय आहे. दिल्ली येथील 'यथार्थ हॉस्पिटल' मधला अत्यंत उत्तम प्रकारे प्रशिक्षित झालेला स्टाफ केदारनाथच्या या हॉस्पिटलात सध्या कार्यरत आहे. सलाईन लावणे, पटापट एक्सरे काढणे, प्लॅस्टर घालणे अशी आणि इतरही अनेक कामे हे सर्व स्त्री व पुरूष नर्सेस अगदी सफाईने करतात. 

हेलिकॉप्टरने खाली पाठवून द्यायच्या पेशंटची गडबड एकदाची संपली. त्यानंतर मी तिथले मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुशील यादव यांच्यापाशी गेले. माझे नाव, मेडिकल डिग्री, मी कुठून आले आहे इत्यादि ओळख सांगितली. मी इथे काय काम करायचे आहे? किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत  कामावर यायचे आहे हे सगळे ते मला सांगतील अशी माझी अपेक्षा होती. पण तसे काहीच झाले नाही. त्यामुळे परत त्यांच्याजवळ जाऊन, "मी नेमकी काय-काय कामे करायची आहेत? किती ते किती माझी ड्युटी असेल?" असे विचारले. त्यावर त्यांनी,"मॅडम यहां कामही काम हैं. आपको जो करना है वो करिये. अगर बच्चे पेशंट्स आते हैं तो उनको आपही देखिये. माझ्यासारख्या सिनियर डॉक्टरला काम कसे सांगायचे, असे कदाचित त्यांना वाटले असेल, असे मी समजले. त्यानंतर फक्त पाच-दहा मिनिटे मी ओपीडीत काय काम चालू आहे, याचे निरीक्षण केले आणि तिथेच बसून येणारे सर्व पेशंट तपासायचे, असा निर्णय मी घेतला. 

खरंतर माझी विश्रांती पूर्ण झाली नव्हती. थोडा वेळ काम करून वर येऊन झोपावे असे ठरवून मी खाली कामाला गेले होते. पण तिथल्या कामाचे प्रचंड लोड व मेडिकल स्टाफ यामधले व्यस्त प्रमाण आणि एकंदर सर्व गडबड बघता, मी विचार बदलला. पेशंट आल्यावर त्याला कोणी बघायचे, त्याने औषधे कुठून घ्यायची, पेशंटसाठी काय-काय औषधे आणि इतर उपचार उपलब्ध आहेत, हे सगळे तिथल्या नर्सेसकडून पटकन समजून घेतले आणि मी झटून कामाला लागले. हे सगळे होईपर्यंत १० वाजले होते. हरिद्वारपासून आमच्याबरोबरच चालत वरपर्यंत आलेले हर्ष आणि अजय हे दोन नवशिके डॉक्टर्स OPD त नुकतेच पोहोचले होते. ते दोघेही डॉ. सुशील यादव यांना जाऊन भेटले. हर्षची ड्यूटी देवळाजवळच्या बूथवर आणि अजयची ड्यूटी हॉस्पिटलच्याच ओपीडीत लावली गेली. इथे कसे काम करायचे याचा अंदाज तोपर्यंत मला आलेला होता. त्यामुळे मी अजयला पटापट काम समजावून दिले आणि आम्ही दोघेही भराभर पेशंट्स बघायला लागलो. दीड वाजेपर्यंत वेळ कसा गेला ते समजलेच नाही. त्यानंतर मी जेवायला वर गेले आणि जेवण झाल्यावर लगेच परत खाली येऊन संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत काम केले. आमच्याबरोबर हैदराबादहून डॉ. सुभाषिनी नावाच्या एक सर्जन बाई असणार आहेत असे आदल्या दिवशीच मला कळलेले होते. पण डॉ. सुभाषिनी त्या दिवशी कामाला आलीच नाही.

आमचे आदल्या दिवशी वापरलेले कपडे आनंदने वॉशिंग मशीनला लावून दुपारपर्यंत धुऊन घेतले होते. जेवण झाल्यावर तो खोलीतच थांबला होता. पण मला लक्षात आले की या हॉस्पिटलात अफाट काम आहे आणि ते अतिशय शिस्तबद्धतेने, तत्परतेने, व निःस्वार्थ भावनेने, 'निःशुल्क सेवा' याच स्वरूपात केले जात आहे. या सर्व कामाची व सोयी-सुविधांची माहिती सर्व भारतीयांसमोर यायला हवी असे मला प्रकर्षाने वाटले. ती माहिती, अत्यंत प्रभावी व्हिडिओज् बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम, आनंद निश्चितच करू  शकेल, अशी माझी खात्री होती. स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचे प्रमुख, डॉ. अनुज सिंघल यांना लगेच मेसेज पाठवून मी त्यांची परवानगी घेतली. त्याशिवाय, दुसरेही एक काम आनंदला करणे सहजी शक्य होते, ते म्हणजे OPD रजिस्टर लिहिणे. ते लिहिण्यासाठी एक नर्सिंग स्टाफ उगाचच अडकून राहिला होता. आनंदने ते काम तासभर केले. काहीतरी योगदान देता आल्यामुळे त्यालाही बरे वाटले. पण त्याला खूपच दमणूक व अंगदुखी जाणवत होती.  त्यामुळे तासाभरानंतर  तो खोलीत जाऊन झोपला.

साडेसात वाजता खोलीवर येऊन मी तासभर विश्रांती घेतली आणि मग आम्ही जेवायला गेलो. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात शिरा होता. शिरा साजूक तुपात केलेला होता आणि फार गोड नव्हता. त्यामुळे खायला बरा वाटला. दोन्हीवेळच्या जेवणात शिरा, बटाट्याची भाजी, भात, गरम फुलके व घट्ट डाळ  होती. 
जेवण झाल्यावर मात्र मी रात्री ९-९.१५ च्या सुमारास गाढ झोपी गेले.

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट 

शनिवार, १३ जून, २०२६

केदारनाथ-भाग-५

आनंदची आणि माझी ताटातूट झाल्यानंतर या प्रचंड गर्दीमध्ये आपण किती एकटे आहोत याची मला जाणीव झाली. माझ्याकडे फोन नसल्याने आनंदशी संपर्क कसा साधायचा हा प्रश्नच होता. जवळ पाणी नव्हते, आणि बाटली विकत घ्यायला पैसेही नव्हते.  त्यामुळे तहानेने जीव व्याकुळ झालेला होता. तरीही त्या अवस्थेत मी चालत पुढे निघाले. हळूहळू चढत जात असताना, प्रत्येक वळणावर वाटेत थांबून, एखाद्या बाईला विनंती करून, मी तिच्या फोनवरून कधी आनंदच्या तर कधी माझ्या स्वतःच्या फोनवर फोन करून बघत होते. फोनवर रिंग जात होती पण पलीकडून फोन उचलला जात नव्हता. त्या परिस्थितीतही एक मजेशीर विचार मनात आला. 'केदारनाथच्या वाटेवर बायकोपासून कायमची सुटका', असे म्हणत आनंद खुश झाला असावा! 

अनेक वेळा फोन करून झाल्यावरही आनंदने फोन उचलला नाही. त्यामुळे आता मला थोडी काळजीच वाटायला लागली होती. असेच एका तरूण मुलीचा फोन मी वापरला आणि परत केला. त्यानंतर त्या मुलीने मला सुनावले, "आँटी, आप तो पढी-लिखी लगती हैं. ऐसी जगह भीडभाडमें आते है तो कमसेकम अपना फोन, थोडे पैसे और अपनी पानीकी बॉटल तो अपने पास रखना चाहिये ना? इतनी समझदारी तो होनी चाहिये." हे तिचे बोलणे ऐकून मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. कारण या तिन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. पण ते हिला कसे कळले? असेही वाटून गेले. कसनुसा चेहरा करून, "चुकलंच गं बाई माझं" असं म्हणत मी पुढे चालू लागले. शेवटी मी बरीच पुढे गेल्यावर आनंद कुठूनसा मला शोधत, माझ्या मागून आला आणि मी हुश्श म्हणाले. आनंदला बघून मला बरे वाटले असले तरीही मी त्याच्यावर तोंडसुख घ्यायची संधी चुकवली नाही. त्यामुळे अर्थातच तिथे आमचे दोघांचे चांगलेच वाजले, हे सांगायला नकोच!
आम्ही तसेच चालत पुढे निघालो आणि जंगलचट्टीपर्यंत पोहोचलो. अजय व हर्ष कुठेतरी गायबच होते.  त्यामुळे आम्हाला आमच्या पाण्याच्या बाटल्या अजूनही उपलब्ध नव्हत्या. तहानेने व्याकूळ झाल्यामुळे आणि आमच्या भांडणामुळे तापलेले माझे डोके थंड करण्यासाठी, जंगलचट्टीला एके ठिकाणी थांबून मी लिंबू सरबत प्यायले.  या संपूर्ण रस्त्यावर सगळ्या गोष्टी कमालीच्या महाग विकतात. नळाच्या पाण्यातले लिंबू सरबत ५० रूपयांना होते. तर तेच बिसलेरीच्या पाण्यात केले की १०० रूपयाला होते. आनंदला माझ्या ग्लासमधले  सरबत प्यायचा मी  आग्रह केला, पण तो चिडलेला असल्याने त्याने सरबत प्यायला नकार दिला. माझे सरबत पिऊन होईपर्यंत हर्ष आणि अजय मागून कुठूनतरी उगवले. त्या तरूण मुलांना आमच्याबरोबर हळूहळू चालणे म्हणजे एकप्रकारे शिक्षाच वाटत असावी. त्यामुळे ते मधे-मधे थांबत, फोटो-बिटो काढत, खात-पीत असे निवांत येत होते. आमच्या भांडणानंतर मात्र पुढे अगदी शेवटपर्यंत आनंद माझ्याबरोबर चालत राहिला. आम्ही चढत होतो, मला खूप दम लागत होता, चालताना छातीत खूप धडधडत होते. स्मार्ट वॉचमधे कधीकधी हार्ट रेट मिनिटाला १६० च्या वर जात होता. असे झाले की मी ठिकठिकाणी थांबत होते. आनंद सहजी चालत होता आणि हर्ष व अजय तर लीलया चालत होते. 

रामबाराचा पूल पार करायला दुपारचे पाच वाजून गेले होते. आता जरा उन्हाची तीव्रता कमी झाली होती. अजून बरेच अंतर चालायचे होते. भीमबलीला आम्ही सहाच्या नंतरच  पोहोचलो असू. रस्ता संपायची काहीही चिन्हे दिसत नव्हती. वाटेवरच्या अंतर दाखवणाऱ्या पाट्या अतिशय विचित्र आहेत. समजा, एके ठिकाणी 'केदारनाथ १० किलोमीटर' असे लिहिलेली पाटी असेल तर बरेच चालून गेल्यानंतर पुढची पाटी, 'केदारनाथ ११ किलोमीटर' अशी दिसायची. त्यामुळे आपल्याला अजून किती चालायचे आहे, याबाबतची अनिश्चितता खूप त्रासदायक वाटत होती. सहा वाजेपर्यंत आकाशामधे सतत हेलिकॉप्टरची ये-जा चालू होती. हेलिकॉप्टरने न येता आपण चढून जायचे कुठून ठरवले असे मला झाले होते. सहा वाजल्यानंतर हेलिकॉप्टर्सचे आवाजही बंद झाले.

सूर्य मावळल्यानंतर हळूहळू अंधार पडायला लागला. त्यानंतर मात्र माझा धीर सुटत चालला होता. मला अतोनात दमणूक जाणवत होती. आपण हॉस्पिटलमध्ये सेवा द्यायला चाललो आहोत, आणि या ट्रेकिंगच्या दमणुकीमुळे आपण काम तर करू शकणार नाहीच आणि कदाचित आपलीच सेवा तिथल्या लोकांना करत बसावी लागेल असे सतत वाटत होते. अनेकदा घोड्यावर, पिठ्ठूवर किंवा डोलीमधून जायची इच्छा होत होती. वाटेत त्यापैकी अनेक लोकांनी आम्हाला थांबवून, "घोडा लेना है क्या? उपर तक पिठठू में चलना है क्या? हम मंदिर तक छोड दें क्या?" असे विचारले की, आपण घोड्यावर बसून किंवा आरामात डोली किंवा पिठ्ठूमधे बसून जावे,  असा विचार मनांत यायचा. पण अशी चौकशी मी सुरु केली की प्रत्येक वेळेस आनंद मला धीर देत होता, "तू चालत जाण्याचा निर्धार केला आहेस ना? मग आता धीर सोडू नकोस. आपण हळूहळू चालू, पण चालतच जाऊ या" ते शब्द ऐकून मी पुन्हा धीर एकवटून चालू लागायचे. मी मनाशी ठरवत होते की सलग शंभर पावले मोजून होईपर्यंत थांबायचे नाही. पण जेमतेम  चाळीस-पन्नास पावले झाली की मला थांबावे लागायचे. 

भीमबली ते लिंचोली हा प्रवास खूपच कष्टाचा झाला. तिथले खडे रस्ते बघून अनेक ठिकाणी पोटात गोळा उठत होता. दिवसभरात कुठेही फारसे काहीही खाल्लेले नव्हते. त्यामुळे भूकही लागली होती. पण एकाही ठिकाणी खाण्यास योग्य, स्वच्छ असे अन्न दिसत नव्हते. त्यामुळे मग चहा आणि एखादे नमकीनचे पाकीट, असे खात-पीत आम्ही निघालो होतो. वाटेत पाणी आणि स्वच्छतागृहाची नीटशी सोय नाही. पाण्याची १० रूपयांची बाटली सगळीकडे सर्रास १०० रूपयांना विकत होते. तरी आम्ही ती विकत घेत होतो. कितीतरी वेळा बाटली संपली आणि जवळपास दुकानही नसले तर नाईलाजानेच का होईना,पण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नळाचे पाणीदेखील आम्ही पीत होतो. साधारण सात वाजेपर्यंत आम्ही खूप दमून गेलो. शेवटी एका पिठ्ठूवाल्याला पकडून त्याच्याजवळ आमच्या पाठीवरचे बॅकपॅक्स काढून दिले आणि ते सामान वरपर्यंत नेण्यासाठी १५०० रूपयांची बोली झाली.

पाठीवरचे सामान कमी झाले तरीही माझा चालण्याचा वेग काही वाढत नव्हता. तसेच पाय ओढत-ओढत आणि हृदयाची धडधड ऐकत मी चढत होते. आम्हाला पोहोचायला रात्रीचे १० वाजून जातील असे वाटायला लागले. त्यामुळे आम्ही त्या पिठ्ठूवाल्याला फोन करून, आमचे सामान केदारनाथच्या स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमधे ठेवायला सांगितले. हॉस्पिटलमधील श्री. धनवीर या व्यवस्थापकांना फोन करून, "पिठ्ठूवाल्याकडून सामान ठेवून घेऊन त्याला १५०० रुपये द्या, आम्ही पोचल्यावर तुमचे पैसे तुम्हाला देतो." असे सांगितले. रस्त्यावरील सर्वच हॉटेल्समधील अस्वच्छता बघून वाटेत काहीही खाण्याची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे, मी श्री. धनवीर यांना विनंती केली होती की, आम्हा चौघांसाठी रात्री पोहोचल्यानंतर काहीतरी खायला-प्यायला ठेवा. पण, "रात्री दहा वाजल्यानंतर स्वयंपाकघर बंद होते. त्यामुळे इथे काहीही खायला मिळू शकणार नाही, वाटेतच काहीतरी खाऊन या." असे उत्तर मिळाले. 

लिंचोलीच्या पुढील रस्ता तर अतिशय चढणीचा होता. दर १५-२० पावलांना दम घ्यायला थांबावे लागत होते. एकच सुख होते की रात्र झालेली असल्याने हवा थंड झालेली होती आणि आमचे नशीब चांगले असल्याने पाऊस पडत नव्हता. हवा थंड झाल्यामुळे मी आणि आनंदने आपापली गरम जॅकेट अंगावर चढवली होती. वाटेतल्या ओढ्यांमधून ठिकठिकाणी पाण्याचे बर्फ झालेले दिसत होते. काही ठिकाणी ते रस्त्यावरही वाहून आलेले होते. आता अंधारून आल्यामुळे खालून वर येणाऱ्या प्रवाशांचा ओघ जरा कमी झाला होता. त्यामुळे मागून येणारी खेचरांची आणि डोलीवाल्यांची वर्दळही जराशी कमी झाली होती. पण आता केदारनाथहून खाली उतरणाऱ्या खेचरांचा फार त्रास होत होता. अंगावर स्वारी नसलेली खेचरे उतरणीवरून मोकाट उधळत खाली येत होती. दर पावलागणिक आनंद त्या खेचरांच्या मालकांना ओरडत होता, तसेच त्याच्या हातातील काठी उगारून खेचरं आमच्यापासून दूर हाकत होता. 

चढताना अधूनमधून अनेक शॉर्टकट्स दिसत होते. काही सहप्रवासी तरुण-तरुणी ते शॉर्टकट्स  घेतही होते. आमच्याबरोबर हर्ष आणि अजय चालत होतेच. ते दोघे गेल्याच वर्षी केदारनाथला चालत येऊन गेलेले असल्याने, त्यांना बरेच शॉर्टकट्स माहिती होते. एखादा खड्या चढाचा शॉर्टकट घेतला की, कमी चढणीचा पण बऱ्याच लांब पल्ल्याचा वळणा-वळणांचा रस्ता वाचायचा. पण शॉर्टकट घेणे म्हणजे खडी चढण चढण्याचा त्रास होताच. त्यामुळे काही शॉर्टकट्स आम्ही घेत होतो आणि काही सोडत होतो. प्रत्येक उंचवट्यावर आणि वळणावर माझा धीर सुटत होता. हर्ष आणि अजय मला सतत सांगत होते, "मॅडम, आता ही चढण चढून गेलो की सगळा सपाटच रस्ता आहे", किंवा "आता आपण अगदी जवळ आलो आहोत. आता उतरणीलाच लागणार आहोत" असे सांगत-सांगत मला धीर देणे चालू होते. आनंदही तीच भाषा बोलत होता. मला धीर देण्यासाठी तिघेही संगनमताने मला फसवत आहेत असे मला जाणवत राहिले. 

चालता चालता रात्रीचे बारा वाजून गेले, तरीही केदारनाथच्या बेसकॅम्पजवळही आम्ही पोहोचलो नव्हतो. चन्द्रप्रकाशात लोकांची ये-जा चालूच होती. आता आमच्याबरोबर चढणारे आणि समोरून उतरत येणारे यात्रेकरू विरळ होत चालले होते. संध्याकाळ झाल्यानंतरच अनेकांनी अर्ध्या वाटेत खेचर, डोली अथवा पिठठू करून केदारनाथ गाठायचा निर्णय घेतला होता. काहीजण मधेच कुठेतरी तंबूमध्ये मुक्कामाला थांबले असावेत. केदारनाथाचे दर्शन घेऊन येणारे काही यात्रेकरू रात्रीच खाली उतरून परतीच्या वाटेला लागले होते. त्यांना मी मोठ्या आशेने विचारत होते, "आता अजून किती अंतर राहिले आहे हो?" कोणी सांगायचे, "आता अगदी जवळ आहे", तर कोणी म्हणत होते "अजून खूप लांब आहे". त्यामुळे सगळीच माहिती मला फसवी वाटत होती. 

शेवटी रात्री साडेबाराच्या सुमारास आम्ही 'घोडापडाव' येथे, म्हणजे जिथपर्यंत घोड्यांना किंवा खेचरांना जायची परवानगी आहे, तिथपर्यंत पोहोचलो. "आता काय, इथून हॉस्पिटल जेमतेम २०० ते ३०० मीटरवर आहे." अशी खात्रीशीर माहिती हर्ष आणि अजयने दिली. त्या दोघा तरुण मुलांना साहजिकच खूप भूक लागलेली होती. त्यामुळे, ते दोघे एका  हॉटेलमध्ये जेवायला थांबले. आम्हा दोघांना मात्र आता काही खाण्याची इच्छा उरली नव्हती. त्यामुळे मी आणि आनंद तसेच पुढे चालत निघालो. हळूहळू हॉस्पिटलची दुमजली इमारत दृष्टीपथात आली. रात्री १ च्या सुमारास आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. रात्रपाळीवरील फार्मसिस्टने आमचे स्वागत केले व आमचे बॅकपॅक्स आम्हाला दिले. तिथल्या कर्मचाऱ्याने आम्हाला  वरच्या मजल्यावरील  आमची खोली उघडून दिली. मोठी व स्वच्छ खोली, आतल्याआत अटॅच्ड बाथरूम, गरम पाण्याचा गीझर, खोली उबदार ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक वॉर्मर, छानसे पलंग आणि प्रत्येकी दोन-दोन रजया बघून आम्ही सुखावलो. खोलीमधे स्टीलचा रिकामा जग आणि एक स्टीलचा ग्लास होता. आम्हा दोघांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने पायात घालायला स्लीपर्स आणून दिल्या. एका फ्लास्कमधे गरम पाणीही आणून दिले.   

आम्ही खोलीतील वॉर्मर सुरु केला आणि अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी गीझरही चालू केला. मोठ्या उत्साहाने मी अगदी छान गरम पाण्याने डोक्यावरून अंघोळ केली. पण अंग पुसायला पंचाच नाही हे नंतर लक्षात आले. जी एक पातळसर ओढणी ओली करून डोक्यावर घेऊन दिवसभर उन्हामधे मी चालले होते, त्याच ओढणीने जेमतेम अंग आणि केस कोरडे केले. बाथरूममधून कुडकुडतच बाहेर आले आणि रजईत शिरून, कदाचित काही क्षणातच गाढ झोपी गेले. 

[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.

शुक्रवार, १२ जून, २०२६

केदारनाथ-भाग-४

आज पहाटे ३ वाजता आम्हाला नारायणकोटीहून सोनप्रयागकडे जायचे होते. पहाटे २ वाजताच्या गजराच्या आवाजानेच जाग आली. डोळे चुरचुरत असले तरीही उठून तयार होणे आवश्यक होते. आमच्या खोलीमधे पाणी गरम करायला किटली, चहा-कॉफी, साखरेची आणि मिल्क पावडरची पाकिटे होती. पटकन चहा केला. त्यानंतर प्रातर्विधी व अंघोळ उरकून दोघेही ३ वाजायच्या आत तयार झालो. खूप जड असे ट्रेकिंग शूज घातल्यामुळे पायात जणू बेड्या किंवा साखळदंड घातल्यासारखे वाटत होते. 

आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडायला नारायणकोटीच्या हॉस्पिटलचीच गाडी येणार होती.  पहाटे ३ वाजायला पाच मिनिटे कमी असताना, गाडीच्या चालकाचा फोन आला. आम्ही तयारच होतो. पण डॉ. हर्ष आणि डॉ. अजय अजून तयार होत आहेत अशी माहिती त्या चालकाकडूनच समजली. त्यामुळे मग, "त्यांना घेऊनच आमच्याकडे ये", असे आम्ही चालकाला सांगितले. त्या दोघांना घेऊन गाडी सव्वातीन वाजेपर्यंत आमच्याकडे आली. पाठीवर घ्यायच्या बॅकपॅक्स आम्ही गाडीत ठेवल्या आणि स्थानापन्न झालो. 

हरिद्वारच्या हॉस्पिटलमधील व्यवस्थापक, श्री. ध्वजपालजींनी आम्हाला प्रत्येकाला गळ्यात अडकवायचा बिल्ला दिला होता. "केदारनाथला जाताना तो गळ्यात अडकवून जा, तो बिल्ला दाखवलात की पोलीस तुम्हाला कुठेही अडवणार नाहीत आणि कुठल्याही रांगेत उभे राहावे लागणार नाही," असे त्यांनी सांगितले होते. तसेच "कुठल्याही परिस्थितीत बिल्ला कुठे विसरू नका, हरवू नका आणि हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे परत आलात की तो आमच्याकडे जमा करा," असेही त्यांनी बजावून सांगितले होते. गाडीत बसल्यावर गळ्यात तो बिल्ला घालण्यासाठी मी बॅकपॅकमधे शोधायला लागले. पण ऐनवेळेस तो बिल्ला काही मिळेना. खरंतर मी तो लगेच सापडावा म्हणून माझ्या बॅकपॅकमधे बाहेरच्या बाजूलाच ठेवला होता असे मला आठवत होते. आम्ही  दोघांनीही आपापले बॅकपॅक्स उघडून, सगळे सामान काढून बघितले. तरीही तो बिल्ला कुठे मिळेना. मी अगदी हवालदिल झाले. पुन्हा खोलीत परत गेले आणि तिथेही शोधाशोध केली. तरी तो बिल्ला काही मिळाला नाही. मी अक्षरशः रडवेली झाले होते. तेवढ्यात हर्षचा फोन आला. त्याला गाडीतच तो बिल्ला खाली पडलेला मिळाला आहे हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला.

बिल्ला शोधाशोध प्रकरणात आमची पंधरा मिनिटे मात्र वाया गेली. शेवटी पहाटे साडेतीन वाजता आम्ही नारायणकोटीहून जेमतेम २४ किलोमीटरवर असलेल्या सोनप्रयागकडे निघालो. सोनप्रयागहून शटल गाडीत बसून गौरीकुंडपर्यंत जायचे होते व त्यानंतर पुढे प्रत्यक्ष ट्रेकिंगला सुरूवात करायची होती. आम्ही नारायणकोटीहून निघाल्यापासून वाटेत अक्षरशः पावलोपावली वाहतूक कोंडी लागत होती. कित्येक वेळा असे झाले की, एका जागी थांबलेल्या गाडीत आम्ही नुसतेच बसून ट्रॅफिक हलायची वाट पाहत असायचो. गाडी अगदी मुंगीच्या पावलाने पुढे जात होती. गाडीमध्ये आमच्या गप्पा चालूच होत्या. मी तिथेच बसून नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशनचा फॉर्म भरला. तिथे आम्ही गाडीत बसलेलो असतानाच हर्ष आणि अजय MBBSची परीक्षा  उत्तीर्ण झाल्याचे मेसेजेस त्यांना आले. त्यामुळे ते दोघेही खूप आनंदात होते. आम्हीही त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर थोडावेळ त्यांचे कोणकोण मित्र आणि मैत्रिणी उत्तीर्ण झाल्या आहेत, कोणकोण मागे राहिले आहेत, ही चर्चा फोनवर चालू होती. ती ऐकताना माझे मनही आमच्या कॉलेजच्या दिवसांमधे फिरून आले!  

पुढचे सुमारे पाच तास आम्ही गाडीत बसून होतो. तेवढ्या काळात जेमतेम १२-१४ किलोमीटरचा पल्ला गाठलेला असल्याने आम्ही पार वैतागून गेलो होतो. सोनप्रयागला पोहोचायला अजून किती वेळ लागेल काहीच सांगता येत नव्हते. गूगल मॅप पुढचा सगळा रस्ता, प्रचंड वाहतूक कोंडीचा, म्हणजे लाल रंगात दाखवत होता. तसेच त्या गाडीच्या चालकाला, आम्हाला सोडल्यानंतर नारायणकोटीला परतून कुणालातरी हरिद्वारला घेऊन जायचे होते. बराच उशीर होत असल्याने तोही सतत कुरकूर करत होता. आमच्या आसपासच्या गाड्यांमधून आमच्यासारखेच अडकलेल्या अनेक लोकांनी खाली उतरून पुढे चालायला सुरुवात केल्याचे आम्हाला दिसत होते. शेवटी आम्हीसुध्दा तोच निर्णय घेतला. सीतापूरच्या अलीकडेच आम्ही गाडी सोडून दिली आणि चालायला सुरुवात केली. 

सीतापूरपासून सोनप्रयागच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. त्या दुकानांमधून गरम कपडे, शाली, रेनकोट्स, टोप्या, छत्र्या, काठ्या, बूट आणि बुटावर चढवायला रबरी आवरणे अशा अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. काहीजण रस्त्याच्या कडेला बसून या वस्तू विकतात.  अनेक फिरते विक्रेते पाणी, चहा आणि इतर वस्तू विकत असतात. या मार्गावर जसजसे आपण वर-वर चढत जातो, तसतशी प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाते. आमच्याबरोबर, संपूर्ण भारतभरातून आलेले अनेक आबालवृद्ध  चालत होते. प्रत्येकाच्या हातात आधारासाठी किमान एकेक काठी होती. काहीजण तर दोन्ही हातात काठ्या घेऊन चालले होते. आमच्यासारख्या काही शहरी  लोकांनी पायात ट्रेकिंग शूज  घातले होते. पण बरेचजण साधे बूट, चपला घालून चालले होते. काहीजण तर अनवाणी चालत होते. बरेचसे शहरी लोक आणि विशेषतः तरूण-तरूणी जणू एखाद्या पिकनिकला चाललोय अशा अविर्भावात मजा करत चालत होते. खाणे-पिणे, फोटो काढणे, व्हिडीओ शूट करणे, आणि एकमेकांची चेष्टा करण्यात ते मश्गूल होते. सोनप्रयागला पोहोचेपर्यंत रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागलेली दिसत होती. त्यातून आणि लोकांच्या घोळक्यामधून वाट काढत आम्ही सावकाश पुढे चालत होतो. 

सोनप्रयागला पोहोचल्यावर हुश्श झाले. आता पुढील पाच किलोमीटर शटल गाडीत बसून गौरीकुंडला पोहोचायचे होते. सोनप्रयाग गाव सोडल्यानंतर, पुढे एक लोखंडी पूल लागला. तो ओलांडून डावीकडे गेल्यावर तिथे गौरीकुंडला जाणाऱ्या शटलगाड्यांचा थांबा आहे असे कळले. कमालीच्या गर्दीतून वाट काढत, आम्ही त्या शटलच्या थांब्यापर्यंत पोहोचलो. पण तिथली झुंबड बघूनच आम्ही हबकलो. शेकडो लोक तिथे आमच्या आधी येऊन थांबलेले होते. एखादी गाडी वरून खाली येऊन, त्यातले लोक बाहेर पडेपर्यंत, ती गाडी वर जाणाऱ्या यात्रेकरूंनी भरली जात होती. शटल म्हणजे टेम्पो ट्रॅक्स गाड्या होत्या व प्रत्येक गाडीमधे १२-१५ माणसे, अक्षरशः कोंबून भरली जात होती. "आम्ही डॉक्टर्स आहोत, आम्हाला ड्यूटीवर पोहोचायचे आहे, आम्हाला जरा लवकर  शटलमधे बसवून द्या," असे एका पोलीसाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्याने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्या तोबा गर्दीत त्यालाही फारसे काही करता येण्यासारखे नव्हते हेही खरेच. इथे शटलसाठी थांबून राहण्यात आणि अजून वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतरदेखील चालतच पार करायचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही उलटे लोखंडी पुलाकडे मागे फिरलो. हर्ष आणि अजयने तिथे वर जाणारा एक खड्या चढणीचा शॉर्टकट आम्हाला दाखवला. ती खडी चढण बघून माझ्या पोटात गोळाच उठला होता. पण अजय म्हणाला, "मॅम, आमच्यापैकी एकजण तुमच्या पुढे आणि एकजण तुमच्या मागे राहील. आम्ही बरोबर तुम्हाला घेऊन जाऊ. या शॉर्टकटमुळे आपले जवळपास एक किलोमीटर अंतर कमी होणार आहे." शेवटी माझ्या मनांत नसतानाही मी हिम्मत करून ती चढण चढू लागले. गौरीकुंडपर्यंत जायच्या आतच, ही पहिली खडी चढण यशस्वीरित्या चढल्यामुळे माझाही आत्मविश्वास थोडासा वाढला. 

अजय आणि हर्षच्या मते आम्ही दोघांनी पाठीवर वजन न उचलता, आमचे बॅकपॅक्स त्यांच्याजवळ द्यायला हवे होते. पण आम्ही दोघांनीही तसे करायला ठाम नकार दिला. आमच्या पाठीवरचे वजन कमी व्हावे म्हणून मग त्यांनी मागच्यामागे आमच्या बॅकपॅक्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. त्या एका बाटलीचे वजन कमी झाल्यानेही मला खूप बरे वाटले. त्यानंतर त्यांनी आमच्या बॅकपॅकमधील रेनकोटही काढून, त्यांच्या बॅकपॅक्समध्ये ठेवले. ही दोन तरूण मुले आम्हा दोघांची आणि विशेषतः माझी खूप काळजी घेत होती. मला चढायला त्रास वाटला तर हात देत होती. त्यामुळे मला त्यांचा खूपच आधार वाटत होता. आम्ही या प्रवासाला निघण्याआधी चालण्याचा भरपूर सराव केलेला असला तरीही, तो सराव किती अपुरा होता हे गौरीकुंडला पोहोचेपर्यंतच माझ्या लक्षात आले. 

सोनप्रयाग ते गौरीकुंडपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड झुंबड होती. आमच्यासारखेच चालत गौरीकुंडापर्यंत जायचा निर्णय घेतलेले अनेकजण होते. पण प्रवाश्यांनी खच्चून भरलेल्या शटल गाड्याही त्याच घाटाच्या रस्त्यावरून ये-जा करीत होत्या. त्यामुळे त्यांना वाट करून देताना आमची खूपच त्रेधा उडत होती. कसेबसे आम्ही गौरीकुंडापर्यंत पोचलो. तिथून प्रत्यक्ष केदारनाथपर्यंतचा पायी रस्ता सुरु झाला. 

आम्हाला वाटले होते की त्या पायवाटेवर शटल गाड्यांचा त्रास नसल्याने आमची पुढील वाट जरा तरी सुखकर असेल. पण आमचा लवकरच भ्रमनिरास झाला. अनेक खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले अक्षरशः आमच्या भोवती घोंगावत होते. खरंतर खेचराने यात्रेकरूंना वरपर्यंत नेण्याचा सरकारी दर ठरलेला आहे. पण त्या दरापेक्षा जास्त पैशामधे गिर्‍हाईक पटवणे आणि जमल्यास दिवसभरात दोन-तीन खेपा करून जास्तीतजास्त पैसे कमावणे, हा यांचा उद्देश असतो. चारधाम यात्रेचे हे पाच-सहा महिने यांचे कमाईचे दिवस असतात. नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमधून अनेक ठिकाणांहून आपापली खेचरे घेऊन हे सर्व वयांचे खेचरवाले इथे येतात. त्याचप्रमाणे डोली आणि पिठ्ठू उचलणारे तगडे तरूणही येतात. 'पिठ्ठू' म्हणजे त्या हमालाच्या पाठीवर बांधलेली एक खुर्ची असते. या खुर्चीमधे एक व्यक्ती किंवा काही सामान बसू शकते. या पिठ्ठूमधे शक्यतो लहान मुलांना किंवा कमी वजनाच्या यात्रेकरूंना बसवून वर नेतात. त्या-त्या व्यक्तीच्या वजनाच्या प्रमाणात किती दर आकारायचा हे सरकारने ठरवून दिलेले आहे. भरभक्कम वजनाच्या स्री-पुरूषांना घोडा करायचा नसल्यास त्यांच्यासाठी 'डोली'मधून जायचा पर्यायही उपलब्ध असतो. ही 'डोली' म्हणजे प्रत्यक्षात पूर्वीच्या काळी असायची तशी 'पालखी' किंवा 'मेणा' म्हणावा असाच असला तरी, त्याला वर छत मात्र नसते. ही डोली चार तरुण उचलून नेतात. तसे पाहता, खेचर काय, पिठ्ठू काय किंवा डोली काय, यापैकी कुठलाच पर्याय निर्धोकही नाही आणि सुखाचाही नाही. कारण हे खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले लोक खूप धसमुसळेपणा करतात. अनेकदा पिठ्ठूमधून किंवा खेचरावरून यात्रेकरू पडतात आणि त्यांना जबर दुखापत होते. त्या मानाने डोलीतून जाणे जरा तरी सुरक्षित असते. खेचरवाले अतिशय वेगाने खेचरं हाकत नेतात. त्यामुळे कित्येकदा चालणाऱ्या वाटसरूंना धक्का लागून मुकामार लागणे, खोक पडणे, याबरोबरच काहीवेळा अगदी फ्रॅक्चर किंवा जीवघेण्या दुखापतीही होतात. यात्रेकरुंपैकी कोणालाच सहसा घोड्यावर बसायची सवय नसते. इथे असलेली खेचरे अगदीच मरतुकडी आणि कुपोषित असतात. त्यांच्यावर ठेवलेल्या खोगीरांना चांगले, गुबगुबीत असे कुशनही नसते. त्यामुळे ढुंगणाच्या खालच्या भागाला आणि मांड्यांच्या आतल्या बाजूला घासून-घासून अनेकांना त्रास होतो. घोड्यावर किंवा खेचरावर बसताना नेहमीच मांड घट्ट ठेवून, रिकिबीत पाय व्यवस्थित रोवून बसावे लागते. इथे मात्र अनेकांचे पाय रिकीबीतून बाहेर लटकत असतात आणि त्या बाहेर लटकणाऱ्या पायांना सहजी इजा, फ्रॅक्चर्स होतात. एकूण काय, तर खेचरे, डोली आणि पिठ्ठू हे तिन्ही पर्याय, ते वापरणाऱ्यांसाठीच नव्हे तर पायी चालेल्या इतर लोकांसाठीही त्रासदायकच असतात. 

अरुंद रस्ता, कमालीची गर्दी, खेचरे, पिठ्ठूवाले आणि डोलीवाल्यांची धक्काबुक्की, वाटेवर पडलेली खेचरांची लीद, त्या लिदीची आणि मूत्राची दुर्गंधी, या सगळ्यामुळे हा प्रवास आम्हाला अतिशय क्लेशदायक होत होता. वाटेत कुठेही स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल याची खात्री नव्हती, स्वच्छतागृहे अगदीच तुरळक आणि अत्यंत गलिच्छ होती. स्वच्छ, पोटभरीचे व खात्रीशीर ताजे खाण्याचे पदार्थ कुठेही उपलब्ध नव्हते. लहान-लहान चण्या-शेंगदाण्याची, वेफर्स-चिवड्याची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या तेवढ्या मिळत होत्या पण या सर्वच वस्तूंचे भाव 'एमआरपी' च्या किमान दुप्पट लावले जात होते! 

अशा अवस्थेत आम्ही चालत होतो. एकूण २१-२२ किलोमीटर चढणीचा रस्ता चढत जाणे म्हणजे दिव्यच होते. मी ४५ वर्षांपूर्वी केदारनाथला आले होते, तेंव्हाचा रस्ता तसा अरुंद पण केवळ चौदा किलोमीटरचाच होता. २०१३ सालच्या प्रलयामध्ये तो रस्ता जागोजागी वाहून गेलेला होता. त्यामुळे सध्या जो रस्ता आहे तो जरा रुंद असला तरीही अधिक लांबीचा आहे. आताच्या मानाने पूर्वी यात्रेकरुंची संख्याही बरीच कमी होती. तरीही त्यावेळचा रस्ता सध्याच्या रस्त्यापेक्षा बराच अरुंद असल्याने, माझ्या आठवणीप्रमाणे त्या रस्त्यावरही आजच्यासारखीच गर्दी त्यावेळी आम्हाला जाणवली होती. त्या काळी हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध नसल्यामुळे खेचरे, पिठठू आणि डोलीवाल्यांची गर्दीही आजच्यापेक्षा जास्तच जाणवत होती असे मला आठवते. पण पंचेचाळीस वर्षांनंतरही या मार्गावर अधिक चांगल्या सोयी-सुविधा, आणि स्वच्छता नसावी याचे मला फार वाईट वाटले.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी कदाचित सगळ्यात जुन्या, आणि सगळ्यात दुर्गम जागी असलेल्या या सुंदर देवस्थानाच्या रस्त्यावर चालणाऱ्या यात्रेकरूंची आजही अशी दुरवस्था असावी हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. वर पायी चढत जायचे या निर्धारानेच आम्ही या प्रवासाला आलो होतो. पण इथली गर्दी, गैरसोयी, आणि घाण बघून मात्र आम्ही ठरवले की परतताना हेलिकॉप्टरनेच खाली उतरायचे. 

आम्ही पहाटे साडेतीनला आमची नारायणकोटीची खोली सोडली होती. त्यानंतर जवळपास पाच तासांनंतर, सकाळी ८.३० वाजता आम्ही चालायला सुरूवात केली. गौरीकुंडला पोहोचेपर्यंत जवळपास ११.३० वाजले होते. आम्ही दोघेही घामेघूम झालो होतो.  गौरीकुंड म्हणजे प्रत्यक्षात एक कुंडच आहे, ज्यामध्ये लोक स्नानही करतात. पण  ते बघायला थांबण्याची इच्छा आम्हाला झाली नाही. सतत चालत राहून,  दिवसाउजेडी केदारनाथला पोहोचावे अशी आमची इच्छा होती. आम्ही चढत असताना पाऊस मात्र आला नाही हे आमचे नशीबच म्हणायचे. पण कडाक्याचे ऊन पडले असल्याने मला चालणे कष्टदायक वाटत होते. लांब बाह्यांचे, सुती, पण एकावर एक असे तीन-चार कपडे मी अंगावर घातले होते. वरून एक गरम जॅकेटही होते. भर उन्हात चालताना अतिशय उकडायला लागले. त्यामुळे मी एकेक कपडे काढून कंबरेला गुंडाळणे सुरू केले. तरीही उकडणे कमी होईना. म्हणून मग माझ्याकडे बॅकपॅकमधे असलेली, बांधणीची पातळ ओढणी ओली करून डोक्यावर घेऊन मी चालू लागले. माझ्या लक्षात आले की मला खूप तहानही लागली होती. पण पाण्याच्या बाटल्या हर्ष आणि अजयजवळ होत्या आणि ती दोघेही मुले कुठे जवळपास दिसेनात. त्यामुळे आम्ही तसेच चालत पुढे निघालो.

गौरीकुंडला पोहोचेपर्यंत कुठेही वापरण्याजोगे, सार्वजनिक स्वच्छतागृह दिसेना. त्यामुळे काय करावे असा मला प्रश्न पडला होता. शेवटी रस्त्याच्या कडेच्या एका हॉटेलमध्ये  शिरले. तिथल्या मालकीणबाईला बऱ्याच विनवण्या केल्यानंतर तिला माझी दया  आली असावी. तिने आतल्या बाजूला असलेले स्वछतागृह वापरण्याची परवानगी दिली. तिथे जायच्या आधी, कुठे पडू नये म्हणून, माझा फोन मी आनंदजवळ दिला होता. आम्ही दोघे त्या हॉटेलमधून  बाहेर पडलो. मागून डोलीवाले आरडाओरडा करत येत होते. त्यांना चुकवायला आनंद डावीकडे सरकला आणि मी रस्त्याच्या उजवीकडे राहिले. मी आनंदला 'थांब-थांब' अशा हाका मारत असताना आनंद माझ्या डोळ्यासमोर गर्दीत दिसेनासा झाला. आता माझ्याकडे फोन नाही, पैसे नाहीत, जवळ प्यायला पाणी नाही आणि अजय आणि हर्ष या दोघांचाही कुठे पत्ता नाही, अशा अवस्थेत मी एकटीच चालत पुढे निघाले. 

[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.
 

गुरुवार, ११ जून, २०२६

केदारनाथ-भाग-३

आज सकाळी सहा वाजता हरिद्वारहून नारायणकोटीला निघायचे होते. पहाटे साडेचारचा गजर व्हायच्या आधीच जाग आली. सकाळी उठल्या-उठल्या आम्हा दोघांनाही गरम चहा हवाच असतो. पहाटे चहा मिळावा यासाठी आनंदने आदल्या रात्री इथल्या नेपाळी आचाऱ्याशी संधान बांधून ठेवले होते. "सकाळी चार वाजता या, मी इथेच असतो, मला उठवा, तुम्ही म्हणाल तेंव्हा, छान ताजा आणि गरम चहा करून पाजतो", असे आश्वासन त्याने आनंदला दिलेले होते. त्यामुळे आम्हाला चहा मिळणारच या खात्रीने आम्ही एक मजला उतरून भोजनालयामधे पोहोचलो. तिथे एक मनुष्य खाली जमिनीवर गादी टाकून, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपलेला दिसला. आनंदने त्याला हाक मारून उठवले. तर तो नेपाळी आचारी नसून कोणीतरी वेगळाच माणूस निघाला. "मी चहा करणारा माणूस नाही आणि जो चहा करतो तो माणूस इथे झोपत नाही", असे अत्यंत झोपाळलेल्या आवाजात सांगून, तो मनुष्य पुन्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपून गेला. आता चहा मिळणार नाही, या कल्पनेने आम्ही दोघेही अस्वस्थ  झालो. आपणच स्वयंपाकघरात जाऊन चहा करावा आणि प्यावा, अशा विचाराने आम्ही आत शिरलो. पण तिथला सगळा पसारा आणि भली मोठी भांडी पाहून आम्ही चक्रावून गेलो. त्यामुळे आम्ही चहा न करण्याचा निर्णय घेतला. आदल्या रात्री फ्रीजमधे ठेवलेला, कापलेल्या खरबुजाचा डबा घेऊन वर आलो आणि दोघांनी मिळून ते संपवले. 

अंघोळी उरकून, प्रवासाचे कपडे घालून, सगळे सामान बांधून आम्ही तयार झालो होतो. तोच ५.३० च्या सुमारास, आमच्या खोलीच्या दारावर थाप पडली. हॉस्पिटलचा वॉचमन आम्हाला सर्वांना जागे करायला आला होता. पाठोपाठ कोणीतरी खोलीवर चहा घेऊन आले. छान गरम, पण साखरेच्या पाकासारखा गोड चहा पिऊन आम्ही खाली उतरलो. आमचे सामान हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आधीच खाली नेऊन ठेवले होते. आम्ही उतरल्यानंतर डॉ. हर्ष आणि डॉ. अजय ही मुले त्यांचे सामान आवरून खोलीबाहेर पडले. हर्ष म्हणजे एक अगदी खास नमुना आहे, हे त्याच्या काल रात्रीच्या बोलण्यातच कळले होते. आज सकाळी तो खाली यायच्या आधी बराच वेळ वरच्या मजल्यावरच थांबून स्वतःचे  फोटो काढत बसला होता. ६.१५ पर्यंत आम्हाला न्यायला टॅक्सी आली. शेवटी हर्षला खाली बोलवावे लागले. चालक आमचे सामान टॅक्सीच्या वरच्या कॅरीअरला  बांधत असतानाच आम्ही हॉस्पिटलमधे असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यासमोर आमचे फोटो काढले. 

हरिद्वार ते नारायणकोटी, हा वळणा-वळणांच्या घाटरस्त्यावरचा प्रवास, कमीतकमी ६ तासांचा आहे. सध्या चारधाम यात्रा चालू असल्याने सतत वाहतूक कोंडी असते. त्यामुळे उशिरात उशिरा सकाळी सहा-साडेसहापर्यंत हरिद्वारहून निघा, नाहीतर जेवायच्या वेळेपर्यंत तुम्ही नारायणकोटीला पोहोचणार नाही, असे ध्वजपालजींनी आम्हाला बजावून सांगितले होते. आम्हाला नारायणकोटीला घेऊन जाण्यासाठी नेमलेल्या टॅक्सीवाल्याला आणखीही एक काम दिलेले होते. आमच्या आधी केदारनाथला गेलेल्या आणि १० दिवसांची सेवा पूर्ण करून परतणाऱ्या डॉक्टर्सना घेऊन त्याच दुपारी त्याला पुन्हा हरिद्वारला परतायचे होते. त्यामुळे आम्हाला नारायणकोटीला वेळेत पोहोचणे आवश्यक होते.

हरिद्वार ते नारायणकोटीचा प्रवास तसा सुखकर झाला. चालकाव्यतिरिक्त आम्ही चार प्रवासी गाडीत होतो. एसी गाडी होती खरी, पण अनेक ठिकाणी चढाचा रस्ता असल्याने चालकाला एसी बंदच करावा लागत होता. आनंदला मानेचा त्रास असल्याने तो चालकाच्या शेजारी बसला होता. मी, अजय व हर्ष मागे बसलो होतो. 

हर्ष आणि अजय या विद्यार्थ्यांशी खूप गप्पा झाल्या. ही मुले नुकतीच फायनल एमबीबीएस ची परीक्षा देऊन आलेली होती. रिझल्ट अजून यायचा होता. परीक्षा झाल्यावर इंटर्नशिप चालू व्हायच्या आधीच्या काळात ही तरूण मुले केदारनाथधामच्या हॉस्पिटलात काम करायला चाललेली होती, हे ऐकून आम्हाला दोघांनाही त्यांचे कौतुक वाटले. हे दोघेही, एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून ते आजतागायत एकाच खोलीवर राहात आहेत. त्यामुळे त्यांचा मैत्रीचा बंध अगदी घट्ट आहे. दोघेही अगदी पहिल्या वर्षापासून रक्तदानाचे कँप्स घेणे, आणि इतरही बरेच समाजोपयोगी कार्य करत आलेली आहेत. दोघेही मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत. हर्ष कटणीचा आणि अजय सिहोरचा राहणारा आहे. दोन्ही मुले शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे पुढे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने काही व्यवसायही चालू करावा असा त्यांचा मानस आहे. हर्ष फारच ध्येयवादी व आदर्शवादी वाटला. त्याच्या कल्पना चांगल्या असल्या तरीही त्या प्रत्यक्षात उतरणे अवघड वाटत होते. त्या मानाने अजय बराच प्रॅक्टिकल वाटला. 

हर्ष आणि अजय कडून National Medicos Organization (NMO) या संस्थेबद्दल माहिती मिळाली. मेडिकलच्या विद्यार्थ्यांपासून ते वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत कोणीही व्यक्ती या संस्थेची सदस्य होऊ शकते. देशभरातल्या दुर्गम, किंवा आदिवासी-बहुल भागांमध्ये या संस्थेचे मेडिकल कँप्स चालतात, देशभरातल्या लहान-मोठ्या गावांमध्ये त्यांच्या वार्षिक मीटिंग्ज होतात असे समजले. एकूण ही सर्व माहिती मला चांगली वाटली. म्हणून मी लगेच NMO चा फॉर्म भरायचा निर्णय घेतला. पण टॅक्सी-प्रवासादरम्यानच तो फॉर्म मी भरत असल्याने अनंत अडचणी आल्या. शेवटी तो फॉर्म दुसऱ्या दिवशी केदारनाथच्या वाटेवर जाताना भरला गेला.

हरिद्वार ते नारायणकोटीच्या रस्त्यावर वाटेत शिवपुरी व ब्रम्हपुरी ही गावे लागली. इथे River rafting, bungee jumping असे साहसी खेळ चालतात. त्यामुळे तिथपर्यंत खूप ट्रॅफिक लागले. गेल्या वर्षी आम्ही या भागात फिरायला आलेलो असताना आमची रिव्हर राफ्टिंगची सफर शिवपुरीतूनच सुरु झाल्याचे आठवले. हा भाग संपल्यानंतर कुठेतरी नाष्टा करायला थांबायचे ठरले. पण रस्त्यावर फारशी चांगली उपहारगृहे दिसत नव्हती. शेवटी चालकाला सांगितले की तू तुझ्या माहितीच्या बऱ्या ठिकाणी थांब. त्याने ज्या ढाब्यावर गाडी थांबवली तिथे जाऊन आम्ही पराठे, दही, छोले आणि कसलीशी चटणी असलेल्या थाळीचा नाष्टा केला. भूक लागलेली होतीच, आणि आता उंचावर चढून आल्याने हवाही जराशी आल्हाददायक वाटू लागली होती. मी आणि आनंदने आधी एकेक पनीर पराठा खाल्ला व नंतर एक मिक्स पराठा अर्धा-अर्धा करून खाल्ला. अजयने केवळ एक मिक्स पराठा खाल्ला. हर्षला गाडी लागण्याचा त्रास असल्याने त्याने फक्त लिंबूपाणी घेतले. लिंबूपाणी विकणारा मनुष्य चाट मसाला लावलेली काकडीपण विकत होता. मी आमच्यासाठी खायला काकडीही आणली. नाष्ट्यानंतर चहा प्यायल्याशिवाय समाधान होणार नव्हते. डॉ. अजयदेखील माझ्याप्रमाणेच चांगल्या चहाचा शौकीन असल्याने आमची मैत्री जरा आणखी घट्ट झाली. 

आम्ही सकाळी ६.३० ला हरिद्वारहून निघालो होतो. वाटेत जेमतेम अर्धा पाऊण तास थांबलो होतो. दुपारचा दीड वाजत आला तरीही रस्ता संपत नव्हता. वाटेत आधी देवप्रयाग, मग श्रीनगर (गढवाल), आणि रुद्रप्रयाग ही गावे लागली होती. केदारनाथकडून वाहत येणारी मंदाकिनी आणि हिमालयातील एका हिमनगातून वाहत येणारी अलकनंदा या पवित्र नद्यांचा संगम रुद्रप्रयाग येथे होतो. तिथून पुढे वाहत जाणारी अलकनंदा देवप्रयाग येथे भागीरथी नदीला जाऊन मिळते आणि त्यानंतर ती गंगा या नावानेच पुढे वाहत जाते. या दोन्ही संगमांच्या ठिकाणी आपण काही काळ थांबावे अशी हर्षची फार इच्छा होती. परंतु, आम्ही पोहोचल्यानंतर ज्या डॉक्टरांना आमच्याच गाडीतून हरिद्वारला परतायचे होते, त्यांचा आमच्या टॅक्सीचालकाला सतत फोन येत असल्याने आम्ही वाटेत फार वेळ वाया घालवणे श्रेयस्कर नव्हते. 

नारायणकोटीला पोहोचेपर्यंत दुपारचे २.३०-३ वाजले होते. अजय आणि हर्षची राहण्याची सोय नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे केली होती. पण तिथे काही दुरुस्तीचे  काम चालू असल्याने, आम्हा दोघांना,  जवळच असलेल्या एका छोट्या रिसॉर्टमधे ठेवले होते. नारायणकोटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री. गौरव जुयाल हे आम्हाला थोड्या वेळाने येऊन भेटणार असे म्हणाले होते. आम्ही बरोबर आणलेली वैद्यकीय सामग्री, मला त्यांच्याकडे  सुपूर्द करायची होती. तसेच दुसऱ्या दिवशीचे नियोजनही करायचे होते. पण बराच वेळ झाला तरी तो मनुष्य आला नाही. शेवटी त्याला फोन करून मी सांगितले, "आम्हाला आता जेवण करून झोपायचे आहे, तुम्ही लवकर या". सर्व वैद्यकीय सामग्री त्याच्या स्वाधीन केली आणि केदारनाथच्या रस्त्यासंबंधी चर्चाही केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथच्या वाटेवर सध्या तुफान गर्दी आहे, सोनप्रयागपर्यंत सतत वाहतूक कोंडी असते, तसेच तिथून पुढे गौरीकुंडपर्यंत शटल गाडी मिळणेही खूप अवघड होते, असे कळले. त्यामुळे शक्यतो पहाटे तीन वाजता नारायणकोटी सोडणे आणि  लवकरात लवकर सोनप्रयाग गाठणे  आवश्यक आहे, हे लक्षात आले. त्याप्रमाणे अजय आणि हर्षलाही दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत तयार राहा, असा निरोप दिला. 

आम्ही राहात असलेल्या 'हिमालयन कम्फर्टस्' या रिसॉर्टमधे अनेक छोट्या-छोट्या कॉटेजेस् होत्या. आमची कॉटेज म्हणजे एक लहानशीच पण अगदी उबदार अशी खोली होती. रिसॉर्टचा स्टाफ अतिशय अदबीने वागत होता. अगदी आर्मीच्या शिस्तीत सगळे काम चालू असल्याचा भास होत होता. त्यामुळे आम्ही दोघेही सुखावलो. त्यांच्या रेस्टॉरंटमधे बसून जेवायला मजा आली. आधी गरमागरम टोमॅटो सूप आणि भाजलेले पापड आणि सॅलड आले. त्यानंतर फणसाची भाजी, बीन्स+बटाटा भाजी, मटर-पनीर, छान शिजलेला आणि लाजवाब चवीचा राजमा, भात आणि टमटमीत फुगलेल्या गरम रोट्या असे चविष्ट जेवण होते. जेवणानंतर सुकामेवा घातलेली खीर होती व शेवटी सौंफ व मुखवास दिला. एकूण सगळे नेटके वाढणे, स्वच्छता आणि वाढप्यांचे अदबशीर बोलणे बघून आर्मीच्या वातावरणाचीच आठवण होत राहिली. न राहवून आम्ही चौकशी केल्यावर समजले की या रिसॉर्टचे मालक, कर्नल प्रदीप श्रीवास्तव, हे सेवानिवृत्त आर्मी पायलट आहेत. सध्या ते दिल्लीत वास्तव्याला असून इथे एक मॅनेजर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम रिसॉर्टची सर्व व्यवस्था पाहते. आर्मीमधून सेवानिवृत्तीनंतर कर्नल श्रीवास्तव हे येथील एका खाजगी हेलिकॉप्टर कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करीत होते. या रिसॉर्टच्या जवळच फाटा आणि गुप्तकाशी अशी दोन हेलिपॅड आहेत. त्यामुळे तिथून वर हेलिकॉप्टरने केदारनाथला जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांची इथे चांगली सोय होते. या चार महिन्यांत या रिसॉर्टची बरीच कमाई होत असावी. आनंदने लगेच कर्नल प्रदीप श्रीवास्तव यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या रिसॉर्टबद्दलचा आमचा अभिप्राय कळवला. मी त्यांचा वेबसाईटवर review देखील लिहिला. 

जेवण झाल्यावर आधी सामानाची बांधाबांध केली. श्री. गौरव जुयाल यांनी आमच्या लहान-लहान स्ट्रॉलीज पाहिल्या आणि आम्हाला त्या स्ट्रॉलीज मधेच सामान भरायला सांगितले. त्यामुळे केदारनाथला न्यायचे सामान त्यात भरून आम्ही आमच्या स्ट्रॉलीज तयार ठेवल्या. त्या स्ट्रॉलीज खेचरावरून वर केदारनाथला नेल्या जाणार होत्या. आमचे सामान केदारनाथला पोहोचायला दोन दिवसदेखील लागू शकतील असे समजले होते. सहसा, एका दिवशी सकाळी दिलेले सामान, दुसऱ्या दिवशी गौरीकुंडला पोहोचते व तिथे ते खेचरावर लादून तिसऱ्या दिवशी केदारनाथच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवले जाते. आम्ही जे सामान वरपर्यंत नेणारच नव्हतो तेवढे सामान आमच्या रिकाम्या झालेल्या  मोठ्या बॅगमध्ये घालून, ती बॅग आम्ही नारायणकोटीलाच ठेवली. स्ट्रॉलीज वरपर्यंत नेता येणार नाहीत अशा कल्पनेने आम्ही मुंबईहून ज्या रिकाम्या हॅन्डबॅग्स आणल्या होत्या त्या मात्र उगीचच बरोबर वाहून आणल्या असा पश्चात्ताप आम्हाला झाला. आमच्या पाठीवरच्या बॅकपॅक्समध्ये आम्ही अगदी अत्यावश्यक सामान घेतले. त्यात पाण्याची एकेक बाटली, केदारनाथला गेल्यावर बदलण्यासाठी एकेक कपड्यांचा जोड, एक स्वेटर, कानटोपी, माझा स्टेथोस्कोप, आधार कार्ड, रेनकोट व पैसे अशा मोजक्या वस्तू सोबत ठेवल्या. माझ्याकडे एक पातळ सुती ओढणी होती. तीही बॅकपॅकमधे ठेवली. चालताना वापरण्यासाठी ट्रेकिंग स्टिकही घेतल्या. संस्थेने आम्हाला दिलेले, गळ्यात अडकवायचे आयडी कार्ड किंवा ओळखपत्रही सोबत ठेवले.

सामानाची आवराआवर करून ९ वाजता झोपी गेलो. पण झोपण्यापूर्वी पहाटे दोन वाजताचा गजर लावायला मात्र विसरलो नाही!

बुधवार, १० जून, २०२६

केदारनाथ-भाग-२

आमची मुंबई-दिल्ली फ्लाईट १८ तारखेला सकाळी १० वाजता होती. आम्ही जाताना मुद्दामच मुंबई दिल्ली असे विमानाचे तिकीट काढले होते. डेहराडून एयरपोर्ट छोटा आहे आणि हवामान खराब  असले की तिथला विमानतळ बंद केला जातो. दिल्ली-डेहराडून हे विमान काही कारणाने रद्द झाले तरी आम्ही दिल्लीहून टॅक्सी घेऊन डेहरादूनला पोहोचू शकणार होतो. आम्ही दोघेही सकाळी साडेपाचलाच उठलो. आमच्या आधीच गिरीशही  उठून बसला होता. आम्ही दोघे जात असल्याने तो जरा हळवा झाला होता. आमच्यासाठी त्याने चहा करून ठेवला होता आणि सँडविचेसही बनवून घेतली होती. रात्रीचे जेवण बरेच जड झालेले असल्याने आम्हाला  दोघांनाही सकाळी काहीही खायची भूक नव्हती. त्यामुळे ती सँडविचेस डब्यात घालून वाटेत खाण्यासाठी आम्ही आमच्याबरोबर घेतली. तसेच चार वेलची केळीही गिरीशने बरोबर दिली. प्रवासात खाणे आणि पाणी बरोबर असले पाहिजे, असा आमच्या आईचा नियम होता. तो नियम आम्हा तिघाही भावंडांच्या डोक्यात हे पक्का बसलेला आहे. त्यामुळे सॅन्डविचेसचा डबा, केळी आणि दोन पाण्याच्या बाटल्याही मी सोबत घेतल्या. त्यानंतर पटापटा अंघोळी करून व आवरून, आम्ही उबर टॅक्सीने विमानतळ गाठला. 

मुंबई ते दिल्ली व दिल्लीपासून पुढे देहरादून पर्यंतचा प्रवासही सुखाचा झाला. कोणत्याही प्रवासात इतर सहप्रवासी काही खात असतील तर आपल्यालाही काहीतरी खायची अनावर इच्छा होतेच. दिल्लीच्या प्रवासात विमानात एयरहोस्टेसने काही ठराविक प्रवाशांनाच खाणे दिले. त्यातल्या काहींनी आधीपासून खाद्यपदार्थांसाठी पैसे भरलेले होते तर काहीजण पैसे भरून खाद्यपदार्थ विकत घेत होते. त्या खाद्यपदार्थांच्या वासाने आमचीही भूक चाळवली. म्हणून आम्हीही सोबत आणलेले सँडविचेस व केळी असे खाल्ले. आम्ही देहरादूनला दुपारी ३ वाजता पोहोचणार होतो. दिल्लीला बारा वाजताच पोहोचलो होतो. थोडे खाणे झाले असले तरीही अजूनही पोटात भूक होती. दिल्ली विमानतळावर अगदी गडबडीतच वडा सांबार खाल्ले आणि कॉफी प्यायलो. त्या सुमार चवीच्या वड्यामुळे आणि कॉफीमुळे अंशी आमच्या तोंडाची चव तर खराब करून घेतलीच, पण त्या सुमार खाण्यापायी  चक्क साडेसहाशे रूपये उडाल्याचे दुःख त्याहून मोठे होते

दिल्ली देहरादून विमान आम्ही अगदी धावत-पळतच पकडले. जेमतेम पाऊण तासांतच विमान डेहरादूनला उतरले. गेल्या वर्षी डिसेंबरमधे आम्ही दिल्लीमार्गे हरिद्वार, ऋषिकेश आणि देहरादूनला येऊन गेलो होतो. पण त्यावेळी आम्ही दिल्ली-देहरादून प्रवास रेल्वेने व देहरादून-दिल्ली प्रवास टॅक्सीने केला होता. त्यामुळे, देवभूमीतील देहरादून येथील जॉली ग्रँट एयरपोर्टवर आम्ही प्रथमच पाऊल ठेवत होतो. तिथे सगळ्या पाट्या हिंदी तसेच संस्कृतमधे आहेत. वाचून छान वाटले. एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला हॉस्पिटलची गाडी आली होती. गाडी तशी खटाराच होती. एसी लावलेला होता पण गाडी फारशी थंड होत नव्हती. आमच्या आधी दोन तीन तास, हैद्राबादचे एक सायकियाट्रिस्ट डॉ. राव आलेले होते. आम्ही दुसऱ्या दिवशी केदारनाथसाठी रवाना होणार होतो तर ते बद्रीनाथला जाणार होते. त्यांना व आम्हाला मिळून एकच गाडी नेमलेली होती. त्यांचे जेवण झालेले नसल्याने, आम्ही पोहोचलो तेंव्हा ते गाडी घेवून जेवण-खाण्याच्या शोधात बाहेर पडलेले होते. पण दुर्दैवाने त्यांना जवळपास काहीच खायला मिळाले नाही. आमच्या बरोबर गाडीतून तेही हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे आले. तोपर्यंत चार वाजून गेले होते आणि ते भुकेने कासावीस झाले होते. 

हॉस्पिटलमधे पोहोचल्यानंतर तिथले मुख्य डॉक्टर संजय शाह यांच्या ऑफिसमधे बसून, त्यांच्या बरोबर बऱ्याच गप्पा झाल्या. थोड्या वेळाने चहा आला पण चहाबरोबर बिस्किटे येणार होती ती काही  आली नाहीत. डॉ रावांना हिंदी बोलण्याची जरा अडचणच असल्याने आणि कदाचित भिडस्त स्वभावामुळे, ते त्यांच्या भुकेबाबत किंवा काहीतरी खायला मिळावे याबद्दल  तोंड उघडून बोलेनात. डॉ शहा तर खूपच गप्पा मारत बसले होते. आम्हा दोघांनाही प्रवासाचा शीण जाणवत होता. शेवटी काही खायलाही येईना आणि गप्पाही संपेनात, हे बघून, आम्हीच डॉ. शाह यांना सांगितले की डॉ राव यांना भूक लागली आहे, तरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था लवकरच झाली तर बरे होईल.  

हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये एकच स्वयंपाकी आहे, पण त्याने  संध्याकाळची भाजी आमटी करून ठेवलेली आहे, अशी खबर मिळाली. आम्हा तिघांसाठी फक्त गरम फुलके करणे बाकी होते. आम्ही तिघेही पहिल्या मजल्यावर असलेल्या भोजनालयात गेलो. भोजनालयाच्या आत जाण्याआधी बाहेरच्या स्टँडवर आपापले बूट व चपला काढून जाणे अपेक्षित असते. जेवण झाल्यावर आपापले ताट, वाटी, भांडे व चमचे धुवून ठेवायचे असते. हॉस्पिटलमधे काम करणारेे सर्व कर्मचारी व डॉक्टर्स एकत्र आणि एकच प्रकारचे जेवण या भोजनालयात आनंदाने जेवतात. सकाळी प्रार्थना होते, अन्नदेवतेला हात जोडून मगच सगळेजण जेवण सुरू करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीचा आणि एकत्र काम करण्याच्या शक्तीचा अनुभव इथे आला. 

 डॉ रावांच्यामुळे संध्याकाळी  सहाच्या आत  आम्हालाही गरम जेवण मिळाले. अगदी साधे पण रुचकर जेवण होते. तिथे डॉ संजय शाह यांची पत्नी डॉ. तीस्ता शाह यांनी स्वहस्ते आम्हाला गरम फुलके आणून वाढले. अशा प्रकारे स्वागत झाल्यामुळे आम्ही मनोमन सुखावलो. पोटभर जेवण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत गेलो. हॉस्पिटलमधेच वरच्या मजल्यावर चार क्रमांकाच्या खोलीमधे आमची राहण्याची व्यवस्था होती. आतल्या आतच संडास व न्हाणीघर असलेली ती  प्रशस्त खोली होती. आमचे सामान आधीच तिथे नेऊन ठेवलेले होते. एका मठाची वास्तू या संस्थेने आपल्या हॉस्पिटलसाठी मिळवली आहे. याच वास्तूमधे 'सेवाभारती' या संघाच्या उपसंस्थेचे कार्यालयही आहे.

 त्या जुन्या मठाच्या जागेतच हे हॉस्पिटल सुरू केलेले असले तरी आमची राहण्याची व्यवस्था असलेल्या भागाचे बांधकाम कदाचित नवीन असावे. खोलीतील बाथरूममधे एक साबण, एक शांपूचे व एक तेलाचे पाकीट ठेवलेले होते. अंग पुसायचे पंचे व हात पुसायला टॉवेलही दिलेला होता. खोली साधीच पण स्वच्छ होती. बाहेर सर्व खोल्यांना सामायिक असा एक मोठा व्हरांडाहोता. आम्ही दोघांनीही अंघोळ केली. दिवसभर घातलेले कपडे धुवायला वॉशिंग मशीनचा शोध आम्ही घेऊ लागलो. आमच्या खोलीकडून जुन्या भागाला जोडणारा एक कलंडलेला आणि अरुंद व्हरांडा होता. तिथेच पुढे एका मोठ्या खोलीत चार-सहा वॉशिंग मशीन्स ठेवलेली होती. बरेच जुने सामानही तिथे पडलेले होते. बाहेर एक मोठी गच्ची होती. तिथे कपडे वाळत घालण्यासाठी तारा होत्या. काही खोल्यांच्या बाहेर, कपडे वाळत घालण्यासाठी स्डँडही ठेवलेले दिसत होते. आनंदने तिथे जाऊन आमचे दिवसभर वापरलेले कपडे, वॉशिंग मशीनमधून धुवून काढले व वाळत घातले. बाहेर गच्चीवर छान वारे सुटलेले होते. खोलीच्या बाहेर वातावरण थंड आणि प्रसन्न होते. त्यामानाने खोलीच्या आत एसी असूनदेखील विशेष थंडावा जाणवत नव्हता. 

पोटभर जेवण झालेले असले तरीही जिभेचे चोचले पुरवायला आम्ही दोघे बाहेर पडलो. डॉ. राव यांना  'हर की पौडी' घाटावरची गंगाआरती पाहायची असल्याने ते तिकडे गेले होते. आम्ही सहा महिन्यापूर्वीच ते सर्व पाहिलेले असल्याने, जरा इकडे-तिकडे फिरून कुठे हलवायाचे चांगले दुकान दिसते आहे का ते पाहायला आम्ही निघालो. जवळच मोहन पुरीवाल्याचे दुकान दिसले. तिथे आत वातानुकूलित खोलीत बसून रसमलाई, लस्सी आणि दही खाऊन जीव तृप्त झाला. परत येताना एक खरबूजही आणले.  तिथल्या स्वयंपाकघरातून सुरी घेऊन अर्धे खरबूज कापून खाल्ले आणि उरलेले अर्धे कापून डब्यात भरून स्वयंपाकघरातील फ्रीजमधे नेऊन ठेवले. पहाटे निघण्यापूर्वीच्या नाश्त्याची सोय झाली. 

भोपाळहून आलेली डॉ. हर्ष राय आणि डॉ. अजय अहिरवाल अशी दोन तरूण मुले आमच्या बरोबरच केदारनाथला जाणार आहेत, असे आम्हाला इथल्या श्री. ध्वजपाल जी नावाच्या  मॅनेजरकडून कळले होते. रात्री त्या दोघांची आणि आमची ओझरती भेट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता, आम्हाला नारायणकोटीला नेण्यासाठी गाडी येईल, असे ध्वजपालजींनी सांगितले होते. त्यामुळे रात्री लवकर झोपणे आवश्यक होते. पण विमानातून आणण्यासाठी बॅग्ज ज्या पद्धतीने भरल्या होत्या, त्या उघडून त्यातले सामान वेगळ्या पद्धतीने भरणे आता आवश्यक होते. एका मोठ्या बॅगेमधे केदारनाथच्या हॅस्पिटलमधे देण्याचे सामान वेगळे केले. केदारनाथला जायच्या वाटेवर नारायणकोटी येथे आमच्या व्यक्तिगत सामानापैकी कुठले सामान काढून ठेवायचे आणि कोणते सामान पुढे वरपर्यंत न्यायचे याचे मनोमन नियोजन केले. रात्री १० वाजेपर्यंत झोपलो, पण त्याआधी सकाळी ४.३० चा गजर लावायला आम्ही विसरलो नाही. 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट  

सोमवार, ८ जून, २०२६

केदारनाथ - भाग १

केदारनाथला जाण्याचे ठरल्याने आणि तिकिटेही झालेली असल्याने आम्ही दोघेही चांगलेच उत्साहात होतो. ट्रेकिंग करणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणीना विचारून CTR चे waterproof, ankle-high, trekking shoes विकत घेतलेले होते. ते घालून एकदा सिंहगड, दोन तीन वेळा तळजाई आणि पर्वती चढून झाले होते. म्हणजेच ट्रेकर्सच्या भाषेत ज्याला 'breaking the shoes' म्हणतात किंवा ज्याला आपण नवीन जोड्यांची सवय करणे म्हणतो, तेही झाले होते. दुर्गेश बुगडे या ट्रेकर मित्राने त्याच्याकडच्या, धातूच्या दोन चांगल्यापैकी trekking sticks ही आम्हाला वापरण्यासाठी दिल्या होत्या. माझ्या भाचीचे काही पातळ पण अतिशय उबदार स्वेटर्स माझ्याकडे होते. आनंदला एक ट्रेकिंग पॅन्ट हवी होती, तीही विकत आणलेली होती. त्यामुळे सगळी जय्यत तयारी झालेली होती. आम्ही विमानाचे तिकीट काढायच्या सुमारासच नेमके इराण-अमेरिका युद्ध जोरदार सुरु झाले होते. "भारतातील चार विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी बंद  ठेवणार" अशी बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. त्यामधे पुण्याचाही विमानतळ होता. म्हणून मग आम्ही आमचे तिकीट मुंबईहून काढले होते. 

आमची फ्लाईट १८ तारखेला सकाळी १० वाजताची होती. त्यामुळे गिरीश-प्राचीकडे १७ तारखेला दुपारपर्यंत पोहोचण्याचे ठरवले होते. १६च्या रात्री उशिरापर्यंत सामानाची बांधाबांध सुरू होती. नवीनच ओळख झालेल्या साहिल या मुलाला फोन करून सकाळची टॅक्सी सांगितली होती. खरंतर साहिलला बजावून सांगितले होते की ड्रायव्हरला सकाळी ७.३० ला  आम्हाला फोन करू दे. त्यावेळी आम्ही त्याला वेळ सांगू, मगच त्याला येऊ दे. पण तो निरोप त्या ड्रायव्हरला पोहोचलाच नव्हता. त्यामुळे बरोबर ७.३० वाजता स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन तो हजरच झाला. सगळी आवरासावर करून निघताना कमालीची गडबड झाली. कसेबसे सामान एकत्र करून, शेवटचे अगदी जपून ठेवलेले दोन आंबे खाऊन आम्ही सामान घेऊन खाली उतरलो. आम्हाला घ्यायला आलेली गाडी मोठी असली, तरीही मागे डिकीमधे सिएनजी सिलेंडर असल्याने डिकीमधे सगळे सामान बसले नाही. शेवटी ड्रायव्हरशेजारी पुढच्या सीटवर काही सामान कोंबून ९ वाजता घर सोडलं. 

वाटेत आम्ही माझ्या मामेनणंदेकडे, मंजूकडे पनवेलला जाणार होतो. तिच्याकडे सकाळी ११ च्या सुमारास पोहोचलो. तिथे दोन तास गप्पा आणि खाणं-पिणं झालं. मंजूने मस्त इडली-सांबार आणि हुग्गी केलेली होती. आम्ही गेल्यापासून ते आम्ही निघेपर्यंत मंजुची नात, आभा, गाढ झोपेत असल्याने तिला जागे असताना बघताच आले नाही. शांतपणे झोपलेले ते गोड बाळ बघून मात्र मन प्रसन्न झाले. आमची निघायची वेळ होऊन गेलेली असल्याने, शेवटी तिच्यासाठी नेलेले पांघरूण आणि छोटीशी भेट प्रियांकाच्या हातात देऊन आम्ही माहीमला निघालो. गिरीश-प्राचीच्या घरी आम्ही पार्किंग मधे पोहोचायला आणि प्राचीची गाडी तिथे पोहोचायला एकच गाठ पडली. प्राची, तिची मैत्रीण मृणाल आणि मैत्रिणीची डॉक्टर बहीण स्वाती असे डहाणूजवळील आगवन येथे एका मेडिकल कँपसाठी गेले होते. त्यांच्याबरोबर थोड्याफार गप्पा झाल्या. 

आता आम्हाला आमचे सामान आवरणे अत्यावश्यक होते. माझ्याबरोबर मी बरेच वैद्यकीय सामान केदारनाथच्या हॉस्पिटलमधे देण्यासाठी सोबत आणले होते. त्या सगळ्या सामानाचे फोटो काढून मी त्या संस्थेचे मुख्य व्यवस्थापक, संदीपजींकडे आदल्या रात्रीच पाठवले होते. या सामानात बरेच स्प्लिंट्स्, दोन ग्लुकोमीटर, बीपी मोजण्याचे मशीन वगैरे होते. 'ते सगळे सामान केदारनाथच्या हॉस्पिटलमध्ये वापरले जाईल, तुम्ही ते बरोबर घेऊन या", असे संदीपजींनी मला फोनवर सांगितले. विमानाने नेण्याच्या दृष्टीने ते सामान नेमक्या कुठल्या दोन बॅग्जमधे भरायचे आणि पुढे केदारनाथला कसे न्यायचे, याचे नियोजन करण्यातच बराचसा वेळ गेला. 

वैद्यकीय सामान खूप जड होते. त्याशिवाय, वजनाने हलके पण आकाराने मोठे असे बरेच स्वेटर्स आणि इतर गरम कपडे होते. विमानामधे प्रत्येकी १५ किलोची एकच बॅग चेक-इन करता येणार होती. हल्ली आपल्याला स्वतःचे सामान वाहून किंवा उचलून न्यायची सवयच राहिलेली नाही. विमानप्रवासात आणि इतरत्र सहजी वाहून नेण्यासाठी खाली चाके असलेल्या स्ट्रॉलीज सोयीच्या पडतात. पण "वर केदारनाथला जाताना स्ट्रॉली बॅग्स आणू नका, त्या खेचरांवर लादणे अवघड पडते" असेही आम्हाला सांगितले गेले होते. अगदी अत्यावश्यक असे कमीतकमी सामान आणा अशी सूचनाही मिळालेली होती. त्यामुळे सामान हरिद्वारपर्यंत न्यायला स्ट्रॉलीज बऱ्या आणि पुढे खेचरांवरून केदारनाथपर्यंत सामान वाहून नेण्याच्या दृष्टीने छोट्याछोट्या, चाकं नसलेल्या चार जाडसर हॅण्डबॅग्ज न्याव्यात असे ठरले. वैद्यकीय सामान व इतरही बऱ्याच जड वस्तू घालून एक बॅग आधी बाजूला केली. त्याचे वजन साधारण १५ किलोपर्यंत भरतेय याची खात्री करून घेतली. त्यानंतर आनंदची बॅग आकाराने जरा मोठी असल्याने त्यातही जमेल ते जड सामान घातले. त्या बॅगचे वजनही १०-१२ किलो भरले. उरलेले सामान विमानात घेऊन जाण्याच्या दृष्टीने हॅन्डबॅगमध्ये भरले. कमीतकमी सामान घेऊन प्रवास करणे खरोखरच किती अवघड असते, हे लक्षांत आले. सगळ्या बॅगा  योग्य प्रकारे पॅक करून भरायला आम्हाला दोन-तीन तास लागले. 


सगळे सामान आवरून झाल्यावर आम्ही जरा गप्पा मारायला मोकळे झालो. रविवारची रात्र असल्याने, त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे  गिरीश-प्राची आम्हाला घेऊन बाहेर जेवायला हॉटेलमध्ये निघाले. 'हयात' या पंचतारांकित हॉटेलच्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये गेलो. जेवण चांगले होतेच पण पंचतारांकित हॉटेलमधल्या झुळझुळीत वातावरणात ते विशेष चांगले वाटले. घरी आल्यावरही रात्री उशीरापर्यंत गप्पा झाल्या. गिरीशला आनंदबरोबर इराण-अमेरिका युद्धाबद्दल आणि पुढील संभाव्य धोके आणि शक्यतांबद्दल गहन चर्च करायची खूप सुरसुरी होती. नुकत्याच पार पडलेल्या तीन-चार राज्यातील निवडणूका, ममतादीदींची हार असे इतरही अनेक विषय चघळायला होतेच. हा गप्पांचा तास बराच लांबला आणि झोपायला पहाटेचा १ वाजला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताची फ्लाईट असल्याने, तयार होऊन,नाश्ता करून ७-७.३० पर्यंत घर सोडणे आवश्यक होते. त्यामुळे जेमतेम चार-साडेचार तास झोप मिळणार होती... 


क्रमशः 

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

दीपशिखा

१९९५ साली, अलाहाबाद कॅंटोन्मेंटमधील टेनिस कोर्टवर एक सुंदर, सुदृढ मुलगी तडफदारपणे टेनिस खेळताना मी बघितली. तिचा खेळ झाल्यावर मी तिला तिचे नाव विचारले. ती म्हणाली, "दीपशिखा". ती मुलगी आणि ते नाव माझ्या मनात घर करून बसले. त्यानंतर साधारण दीड-पावणेदोन वर्षांनंतर माझ्या धाकट्या वहिनीला एक गोड  मुलगी झाली. मी तिची आत्या असल्याने तिचे नामकरण करण्याचा मान माझाच होता. मी त्या मुलीचे नाव 'दीपशिखा' ठेवले. 

आम्हा तीन भावंडांच्या मुलांपैकी दीपशिखा सगळ्यात लहान असल्याने ती आम्हा सर्वांचीच लाडकी होती. घरात इतर सगळेजण तिला  दिलू म्हणत. पण माझ्यासाठी ती नेहमीच दीपशिखा होती. लहानपणी जरा घुमी वाटणारी दीपशिखा वयात आल्यावर एखाद्या सुंदर, टवटवीत फुलासारखी खुलली. अतिशय हुशार,  प्रेमळ, अधिकारवाणीने बोलणारी, माणसांमध्ये रमणारी दीपशिखा कलासक्त होती. प्रवासाची, चवीचे खाण्याची,  नटण्याची आवड असलेली आणि सदैव उल्हसित असलेली ती तरुणी तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे प्रत्येकावर छाप पाडत असे. 

आम्हा दोघींचे रूप, बोलण्याची ढब, आणि एकंदर व्यक्तिमत्त्व यांमधे खूप साम्य आहे असे इतरांना वाटायचे. आम्हा दोघींचे एकमेकींवर अतोनात प्रेम असले तरीही छोट्या-मोठ्या कारणांवरून आमचे बरेच वाद व्हायचे. त्यामुळे, तुम्हा दोघींची Love-Hate relationship आहे, असे माझा भाऊ गिरीश नेहमी म्हणायचा. आम्ही एकमेकींची मनसोक्त चेष्टामास्करी करायचो, अगदी समवयस्क मैत्रिणी असल्यासारख्या आम्ही रात्ररात्र गप्पा मारत बसायचो, एकमेकींवर बौद्धिक कुरघोड्या करायचो. खूप मजा करायचो.  

दीपशिखा दहावीमध्ये शिकत असताना काही कारणाने आम्ही मुंबईला गेलो होतो. शाळेतून आल्या-आल्या  ती मला म्हणाली, "आज माझ्या शाळेतल्या संस्कृतच्या बाईंनी मला विचारले माझे नाव कोणी ठेवले. मी अर्थातच तू ठेवल्याचे त्यांना सांगितले. आमच्या बाई म्हणाल्या, तुझ्या आत्याला जाऊन सांग की तिने तुझे अगदी खास नाव ठेवले आहे. बाईंनी मला माझ्या नावाचा अर्थही समजावून सांगितलाय. त्यामुळे I am feeling really special. Thank you very much!" अलाहाबादला भेटलेल्या मुलीमुळे प्रभावित होऊन, मी तिचे नाव दीपशिखा ठेवले होते, असे मी तिला सांगितले. त्यावेळी  तिने मला, "दीपशिखा कालिदास" असे काहीसे सांगितलेले मला आठवते. त्यानंतरही अनेकदा याच कारणासाठी ती माझे वरचेवर आभार मानत आली. पण तो संदर्भ  मी पार विसरून गेले होते. 

एका आठवड्यापूर्वी आम्ही तिच्या लग्नासाठी नाशिकला निघालो होतो. त्यावेळीदेखील, मी तिचे नाव दीपशिखा ठेवल्याबद्दल तिने माझे आभार मानले आणि मला म्हणाली," आत्या, माझ्या नावाचा काहीतरी खास अर्थ आहे. तू जरा बघून सांग ना." पण लग्नाच्या धामधुमीत मी ते विसरूनच गेले. 

२८ डिसेंबरला सकाळी दीपशिखाच्या हळदीचा कार्यक्रम होता आणि गोरज मुहूर्तावर तिचा विवाह होणार होता. पण नियतीला ते मंजूर नसावे. त्याच दिवशी सकाळी झालेला दीपशिखाचा आकस्मित मृत्यू आम्हा आप्तस्वकीयांनाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला चुटपुट लावून गेला. त्यानंतर गेले आठवडाभर मी माझ्या भावाच्या घरीच आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या सांत्वनासाठी शब्द नसले तरीही लोक येऊन भेटत आहेत. 

आज मी "दीपशिखा" या नावाचा अर्थ शोधला आणि मला "दीपशिखा कालिदास" याचा संदर्भदेखील सापडला. "दीपशिखा" ही कालिदासाच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट उपमा मानली जाते. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या ज्या श्लोकामधे ती उपमा मिळते तो श्लोक खालीलप्रमाणे आहे:-

संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।

या श्लोकामध्ये कवी कालिदासांनी राजकुमारी इंदुमतीस  दीपशिखेची (मशालीची) उपमा दिली आहे. राजकुमारी इंदुमतीच्या स्वयंवराच्या प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या विवाहोत्सुक राजांचे चेहेरे पाहत  इंदुमती पुढे-पुढे चालत जात असते. त्या प्रसंगाच्या वर्णनासाठीच कालिदासाने ही उपमा योजलेली आहे. तो म्हणतो, "जसे कुणी हातात दीपशिखा अथवा मशाल घेऊन रात्रीच्या काळोखात पुढे जात असताना राजमार्गावरील पुढील घरांचे सज्जे प्रकाशित होतात व मागील घरे अंधारात बुडून जातात; त्याचप्रमाणे, इंदुमती आपल्याला वरमाला घालेल असे वाटून तिच्या मार्गात पुढे असलेल्या राजांचे चेहरे मोठ्या आशेने उजळून जात व मागील राजांचे चेहरे निराशेने काळे पडत". असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. उपमा या अलंकाराचा असा सौन्दर्याविष्कार निव्वळ अद्वितीयच आहे! उपमेतील या सौंदर्यामुळे कालिदासांना पुढे “दीपशिखा कालिदास” असे संबोधन मिळाले. 

आमची दीपशिखा जिथे असेल तिथे मशालीसारखी तळपत राहील याची मला खात्री आहे. तिला उद्देशून अनेक प्रश्न आज विचारावेसे वाटतात, "दीपशिखा, तुझ्या स्वयंवरातील राजकुमार तर तू आधीच ठरवलेला होतास. मग त्याला वरमाला न घालताच तू पुढे का निघून गेलीस? आम्हा सर्वाना इहलोकीच्या दुःखमय अंधारात ढकलून तू परलोक उजळून काढायला गेली आहेस का? का तू स्वतःच परलोकीची एक शापित अप्सरा होतीस?"

हे सगळे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार... 

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

नांदा सौख्यभरे!

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. व्हॉटस्अप-फेसबुक-फोन या सर्व माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. छान वाटलं.
हल्ली लोक कुठे-कुठे जाऊन त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात, एकमेकांना महागड्या आणि 'सरप्राईझ गिफ्ट्स' वगैरे देतात. आम्ही मात्र आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायची पद्धत कधीच ठेवलेली नाही. आज आम्हाला नेमके पुण्याजवळच्या रिसॉर्टमधे एका लग्नासाठी जायचे होते. त्यामुळे सकाळपासून तयार होऊन वेळेवर लग्नस्थळी पोहोचण्याची गडबड होती. तिथेच गोडाचे जेवण करून आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमधे एका मैत्रिणीने, "नांदा सौख्यभरे" अशा शुभेच्छा पाठवल्या आणि मला हसू आले. आमच्या लग्नाला आज ३९ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही सौख्यभरे नांदतो आहोत, हे तर निश्चितच आहे. 

मागच्या महिन्यात, आनंदचे काही सेवानिवृत्त आर्मी अधिकारी मित्र आणि त्यांच्या पत्नी असे एकत्र जेवायला गेलो होतो.  गप्पांच्या ओघात 'नवरा-बायकोची भांडणे' हा विषय सुरू झाला. मग काय विचारता? सगळ्यांनाच कंठ फुटला. "नांदा सौख्यभरे" अशा शुभेच्छा आज मला माझ्या ज्या मैत्रिणीने पाठवल्या तिनेच, तिची आणि तिच्या नवऱ्याची कशाकशावरून भांडणे होतात, याचे रसभरीत वर्णन त्या दिवशी केले होते. थोड्याफार फरकाने इतरही सगळ्याचे असेच अनुभवकथन झाले. अत्यंत क्षुल्लक किंवा अगदी हास्यास्पद वाटणाऱ्या कारणांवरून, आमच्यासारखेच इतरही सगळे नवराबायको अगदी कडाकडा भांडतात, हे ऐकून मला हायसे वाटले. लग्नाला पन्नास वर्षे झालेल्या नवरे-बायकांचेही  अनुभव असेच होते. त्यातली एक तर म्हणाली, "आम्हा दोघांनाही एकमेकांशी भांडल्याशिवाय चैनच पडत नाही. एखाद्या दिवशी कुठल्याही कारणावरून भांडण झालेच नाही तर अगदी चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. या वयात नवरा-बायकोंना भांडण्यासाठी हक्काचा पार्टनर म्हणून एकमेकांची जास्त गरज असते!" 

माझ्या मैत्रिणीने, "नांदा सौख्यभरे" असा शुभसंदेश पाठवल्यावर मी तिला प्रश्न विचारला , "अगं भांडा सौख्यभरे, असं  तुला म्हणायचेय का? " तिचे हसून उत्तर आले, "ते तुमचे  रोजचे चालूच असणार आहे. म्हणून आज 'नांदा सौख्यभरे', अशा शुभेच्छा दिल्या आहेत." 

आजचा दिवस संपत आला. आश्चर्य म्हणजे आज कुठल्याही विषयावरून आमचे भांडण झाले नाही. मैत्रिणीच्या शुभेच्छा आजचा एक दिवस तरी पुरल्या आहेत, हेही नसे थोडके! 


मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

त्या कुणी ना पाहिले ...

मागील काही महिने माझ्या व्यायामामधे अनियमितपणा आला होता. तसे होण्यासाठी काही कारणही घडले होते. जुलै महिन्यात माझ्या डाव्या पायाच्या करंगळीजवळच्या बोटाला, घरच्या घरीच दुखापत झाली आणि बारीकसे फ्रॅक्चर झाले. फ्रॅक्चर लहानसे असले तरी बोट बरेच दुखत होते. पण Orthopedic Surgeon ने सांगितले की, "प्लॅस्टर वगैरे घालण्याची गरज नाही, तीन-चार आठवडे 'Buddy Strapping' करून ठेवा. डाव्या पायावर आणि विशेषतः त्या बोटावर वजन घेऊ नका". त्याप्रमाणे ती शेजार-शेजारची दोन बोटे एकमेकांना बांधून ठेवली. त्यानंतर एखादा आठवडा घरी लोळून काढला. पण मग मात्र नेहमीच्या कामाला सुरुवात केली.

फ्रॅक्चर झाल्यावर मला सगळ्यात मोठी काळजी ही होती की, "आता माझ्या रोजच्या व्यायामाचे काय होणार?" डॉक्टरांनाही मी त्याबाबत विचारले. त्यांचे म्हणणे पडले की, चालणे, पळणे यासारखे पायावर जोर पडणारे व्यायाम  वगळता इतर व्यायाम मी करावा. पण पहिले दोन-अडीच महिने मी चालण्याचा तर नाहीच, पण इतर कोणताच व्यायाम केला नाही. व्यायाम नसला की एकप्रकारे negative cycle सुरू होते असं मला वाटतं. एकीकडे शरीराला व्यायाम नाही, आणि दुसरीकडे खाणंही कमी केलेलं नाही, अशा परिस्थितीत वजनवाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे जास्तच guilty feeling येते. त्यामुळे मनाला जास्तच मरगळ येते. आता गेले काही आठवडे मी  पुन्हा हळूहळू चालण्याचा व्यायाम सुरू केला आहे.

रोज काही किलोमीटरचा फेरफटका मारायचा, आणि मग किती पावले झाली, किती वेग होता, त्या काळात हृदयाच्या ठोक्यांचा वेग किती होता, हे सगळे घरी आल्यावर हातातल्या स्मार्ट वॉचवर बघायचे; असे सध्या चालू आहे. आपले आपणच मनोमन कौतुक करायचे आणि सुखावून जायचे हे ओघाने आलेच. नुसते तेवढेच नव्हे तर, आपण केलेल्या व्यायामाच्या आलेखाचा स्क्रीनशॉट घेऊन वेगवेगळ्या फिटनेस ग्रूपवर आणि मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपवर पाठवायचे, हा एक त्यापुढचा चाळा!

हल्ली हळूहळू चालणे वाढवत नेतेय. पूर्वी १२-१३ किलोमीटरचा फेरा सहजी व्हायचा. आता मात्र पहिले काही दिवस ५ किलोमीटर पासून चालू करून आता ८-९ किलोमीटर पर्यंत चालतेय. आज सकाळी मी जरा जास्तच चालले. कदाचित १० किलोमीटर चालले असावे. पण नेमकी किती पावले झाली? किती कॅलरीज बर्न झाल्या? हार्ट रेट किती होता हे सगळे बघायला घरी आल्यावर बसले, तर काय? मनगटावर स्मार्ट वॉचच नाही. मग लक्षात आलं की पहाटे उठल्यावर माझ्या स्मार्टवॉचचा चार्ज कमी आहे हे मी पाहिले होते. त्यामुळे ते स्मार्टवॉच मी चार्जिंगला लावले होते. चहा पिऊन, तयार होईपर्यंत कदाचित चार्जिंग पूर्ण झालेही असेल. पण निघण्याच्या गडबडीत ते स्मार्टवॉच चार्जरमधून काढून हातावर बांधायला मी विसरून गेले होते. 

खरंतर ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. पण माझं मन फार खट्टू झालं. आज नेहमीपेक्षा मी जरा जास्त व्यायाम केला होता. पण नेमका किती याचं मोजमापन झालं नाही, म्हणून मला वाईट वाटले. तसेच, माझ्या आजच्या व्यायामाचा स्क्रीनशॉट इतरांना पाठवून त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याची संधी हुकली म्हणूनही मी हळहळले. या दोन्हीपैकी कुठल्या गोष्टीचा मला जास्त त्रास झाला, हे सांगणे अवघड आहे. पण कदाचित दोन्हीचा सारखाच त्रास झाला असावा.

स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि अशी अनेक स्मार्ट उपकरणे आपल्या हातात आल्यापासून आपण सतत आपले कोडकौतुक स्वतःच करण्यासाठी आणि इतरांकडूनही ऐकण्यासाठी उत्सुक असतो. छोटेसे यशदेखील आपण समाजमाध्यमावर पोस्ट करतो. त्यावर कोणी कौतुकाचे चार शब्द लिहिले की मनोमन सुखावतो. व्हॉटस्अप, इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी माध्यमातून आपण सतत व्यक्त होत असतो. आपण पाठवलेल्या विनोदी पोस्टवर कोणीतरी निदान एखादा 'स्माइली' तरी पाठवावा, असे आपल्याला वाटत असते. आपल्या कुठल्याही पोस्टची बराच वेळ कोणी दखलच घेतली नाही, तर आपण अस्वस्थ होतो. आपण विचारलेल्या शंकेचे कोणी समाधानकारक उत्तर दिले नाही तरी आपण चडफडतो.

कौतुकासाठी आणि इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी मनुष्य किती हपापलेला असतो, याची जाणीव माझ्यासोबत घडलेल्या आजच्या या छोट्याशा घटनेमुळे मला प्रकर्षाने झाली. 

तुमचंही होतं का असं  ? 

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

आणि आज माझं अपहरण झालं!

आज मला जरा उशीराच जाग आली. नेहमी पहाटे चार-साडेचारला जाग येते, पण आज साडे सहा वाजता डोळे उघडले. रोजच्याप्रमाणे फिरायला जावे, का आज उशीर झालाय तर न जावे, अशा द्विधा मनस्थितीत मी होते. पण फिरणे चुकवायला नको, या विचाराने शेवटी तयार होऊन मी बाहेर पडले. रोजच्या सवयीच्या मार्गावर चालत चालत आर्मीच्या सबएरिया ग्राऊंडपाशी पोहोचले. तिथून तसेच पुढे जाऊन मी रेसकोर्सवर रोज पायी एक-दोन चकरा मारत असते.

इतक्यात माझ्या मागून एक चारचाकी गाडी सतत जोरजोरात हॉर्न वाजवत यायला लागली. सकाळच्या शांत वातावरणात तो कर्कश्श आवाज ऐकून मी वैतागले. मागे वळून बघितले, तर ती गाडी सर्रकन येऊन अगदी माझ्या अंगाजवळच थांबली. गाडीच्या आतून एक करडा आवाज आला, "मुकाट्याने गाडीत बस" आवाज स्त्रीचा होता आणि खूप ओळखीचा वाटत होता. त्यामुळे मला जास्तच आश्चर्य वाटले. ती गाडी माझी मैत्रिण स्मिता शिरवळकर चालवत होती. तिनेच, स्मितहास्य करत पण मोठ्या अधिकारवाणीने मला गाडीत बसायला सांगितले होते.

"अगं, माझा व्यायाम अजून व्हायचाय. आत्ता कुठे जायचंय? आत्ता नको गं. मग माझं चालणं राहून जाईल..."
"मी तुझं काही ऐकणार नाही. मुकाट्याने गाडीत बस आणि माझ्याबरोबर घरी चल. आज आपण एकत्र चहा-कॉफी पिऊ या, पूर्वीसारख्या मनसोक्त गप्पा मारूया, मग मी तुला परत घरी सोडते"

माझ्या मैत्रिणीची ती लाडिक आज्ञा मानून मी गाडीत तिच्याशेजारी जाऊन बसले. स्मिताची आणि माझी अनेक वर्षांपासून जवळची मैत्री आहे. तिचा नवरा आणि माझा नवरा यांची पण आधीपासूनची ओळख होतीच. आर्मीच्या सेपरेटेड क्वार्टर्समधे काही वर्षे आम्ही एकाच कॉलनीत जवळ-जवळच राहात होतो. तिचा मुलगा अभिमन्यू आणि माझी मुलगी असिलता एकाच वयाचे आणि एकाच वर्गात शिकणारे. त्यामुळे आम्हा दोघींमधला मैत्रीचा धागा अजूनच पक्का होत गेला. त्यावेळी आम्ही दोघीही आपापल्या व्यवसायात व्यग्र असायचो. पण रविवारी सकाळी एकमेकींकडे जाऊन चहा पिता-पिता गप्पा मारणे हा आमचा आवडता छंद होता. 

आज सकाळी-सकाळी तिच्या घरी मी अचानकच पोचल्याने तिच्या नवऱ्याला सुखद धक्का बसला. मग त्या दोघांनी फर्मान काढले, "आत्ताच्या आत्ता आनंदला बोलवून घे". थंडीच्या दिवसात आनंद  पांघरूणात गुरफटून साखरझोपेत असणार याचा मला अंदाज होता. म्हणून आनंदला फोन न करता  मेसेज पाठवून, "माझे अपहरण झाले आहे" असे कळवले. त्याचे उलटे उत्तर आले, "तुझी सुटका करण्यासाठी खंडणी काय द्यायचीय, ते सांग". आनंदचे ते उत्तर ऐकून मी मनोमन भलतीच सुखावले. लग्नाला चाळीस वर्षे होत आलेली असताना, चक्क खंडणी द्यायची तयारी दाखवून, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बायकोला सोडवून आणायला आपला नवरा तयार असावा, हे कोणाही बायकोला सुखावह असणारच ना? 

आनंद नुकताच जागा होऊन, मी आधीच करून ठेवलेल्या चहाचा आस्वाद घेत बसला होता. त्यामुळे, तो मला घ्यायला येऊ शकला नाही. पण स्मिता आणि कर्नल शिरवळकर यांच्याबरोबर कपभर चहा पिऊन आणि पोटभर गप्पा मारून मला मात्र खूप हलके वाटले. 

अगदी आश्चर्यकारकरीत्या, माझ्या रविवारची अशी आनंदी सुरूवात करून दिल्याबद्दल माझ्या अपहरणकर्तीचे शतशः आभार !