काल रात्री खूप थंडी पडली होती. किमान तापमान उणे ३ होते. रात्रभर वॉर्मर चालू ठेवून झोपल्यामुळे खोली चांगली उबदार राहिली होती. मला सात तास छान झोप लागली. आनंदला मात्र रात्रभर सलग झोप नव्हती, असे त्याने सकाळी मला जाग आल्यानंतर सांगितले. त्याला आज ताप नव्हता, पण घसा दुखणे आणि सर्दी खोकला अजून होताच. माझाही घसा दुखत होता, आणि सारखा खोकलाही येत होता. पण रात्री सलग व शांत झोप झाल्यामुळे माझ्या अंगात काम करायचा उत्साह होता. आनंदला गरम पाण्यामधे मीठ घालून गुळण्या करायला सांगून मी वर चहा आणायला गेले.
आज नाष्ट्याला काय करणार आहे हे आचाऱ्याला विचारले. आजही सूजीका हलवा, म्हणजे शिरा असणार होता. फ्लास्कमध्ये चहा घेऊन मी खाली आले. आज कपडे बरेच साठलेले होते म्हणून वॉशिंग मशीन लावले. पेशंटशी संपर्क आल्यामुळे रोज बाहेरचे कपडे खराब होतातच. त्यामुळे एक दिवसाआड कपडे धुवावेच लागतात. बाहेर वापरण्याचे दोन स्वेटर्सही काल हाताने धुवून वाळत टाकले होते. आता केदारनाथहून आम्हाला दोन-तीन दिवसातच निघायचे आहे या कल्पनेने एकीकडे खूप वाईट वाटत होते. पण दुसरीकडे जराशी घरची ओढही लागलेली होती. इथे आल्यापासून मी कामात असल्याने आणि आनंद बरेच दिवस आजारीच असल्याने केदारनाथाच्या देवळात जाऊन दर्शन घ्यायला जमलेच नव्हते. माझ्या बरोबरचे तिन्ही डॉक्टर्स दोन-दोन वेळा देवळामध्ये जाऊन दर्शन घेऊन आले होते. त्यांच्याकडून तिथे असलेल्या तुफान गर्दीचे आणि धक्काबुक्कीचे वर्णन ऐकायला मिळाले होते.
सकाळी नेहमीप्रमाणे मी ८.४० पर्यंत ड्यूटीवर गेले. गेल्यागेल्या समोरच, पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला एक मृतदेह दिसला. आज पहाटे एका पेशंटला मृतावस्थेतच हॉस्पिटलमधे आणले गेले होते, असे मला समजले. बऱ्याच लोकांसाठी केदारनाथचा ट्रेक अवघडच आहे. अनेकांना घोड्यावरून किंवा डोलीतून येताना कमालीचा त्रास होतो. कित्येकजणांची तब्येत आधीपासूनच खराब असते. इथे यात्रेकरूंची तुफान गर्दी असते. अनेकांना ती दगदग सोसवत नाही. साठी-पासष्टी उलटून गेलेले एक नवरा-बायको काल रात्री केदारनाथला पोहोचले होते. त्यांनी रात्री इथेच कुठेतरी तंबूमधे मुक्काम केला असावा. पहाटे, त्या बाईंनी आपल्या नवऱ्याला हाका मारल्या पण तो जागा झाला नाही. म्हणून मग तिने त्याला हॉस्पिटलमध्ये आणले होते. आता मात्र त्याच्या मृतदेहाबरोबर तिला परत जायचे होते. माझ्या समोरच NDRF च्या चार जवानांनी त्या माणसाचा मृतदेह उचलून नेला. त्या बाईंचा चेहरा बघून मला कसेसेच झाले. अशा तीर्थस्थानी मृत्यू आल्यास मृतात्म्याला सद्गती लाभते असा समज हिंदुधर्मात आहे. पण अशा कठीण प्रसंगी, आपल्यासोबत पतीचा मृतदेह घेऊन गावी परतणे त्या बाईसाठी किती क्लेशदायक झाले असेल याची नुसती कल्पना करूनही माझ्या अंगावर काटा आला!
आज डॉ. अजय आणि नर्स कृष्णा कुठेतरी गायब होते. डॉ. सुभाषिनी तर किचनमधे आचाऱ्याला इडली-दोशाचे पीठ भिजवायला शिकवत होती! त्यामुळे, तिला यायला उशीर होणार होता, हे तिने मला आधीच सांगितले होते. इथल्या स्वयंपाकघरात रेडीमेड रवा इडलीची आणि MTR सांबार मसाल्याची अनेक पाकिटे आधीपासून पडलेली होती. त्या रेडीमेड पिठाच्या इडल्या करण्याची कृती पाकिटावर लिहिलेली होती. पण, त्या सर्व सूचना वाचून इथल्या स्वयंपाक्याला कोणीतरी समजावून देणे आवश्यक होते. ते कष्ट आत्तापर्यंत कोणीच घेतले नव्हते. पूर्वी एकदा इथल्या आचाऱ्याने त्या पाकिटातील इडली रवा भिजवून इडल्या केल्या होत्या असे ऐकले. पण त्या दगडासारख्या कडक झाल्या होत्या म्हणे! त्यानंतर त्या रवा इडलीच्या पाकिटाला कोणीच हात लावला नव्हता. त्यामुळे अनेक पाकिटे तशीच पडून होती. डॉ. सुभाषिनीला फुलके आणि भाजी खाऊन कंटाळा आलेला होता. त्यामुळे तिनेच पुढाकार घेऊन, पाकिटावरच्या सूचना वाचून व समजून घेतल्या. त्या सूचनांप्रमाणे, इडलीचे पीठ नेमके कसे भिजवायचे, त्यात किती दही घालायचे, हे सगळे तिनेच आचाऱ्याला समजावून दिले. तिलाच इडली, डोसे आणि मेदुवडा खायची अतीव इच्छा झाल्यामुळे तिने साहजिकच पुढाकार घेतला होता. रेडिमेड इडली पीठ तर ती भिजवून आलीच, पण त्या बरोबरच मेदुवड्यासाठी उडदाची डाळ आणि दोशांसाठी डाळ आणि तांदूळही तिने भिजत घातले होते.
सकाळी १०.४५-११ वाजेपर्यंत मी व नोंदणी करणारी नर्स रिया, अशा दोघीचजणी काम करत होतो. स्वयंपाकघरातले काम संपवून डॉ. सुभाषिनी ओपीडीत आल्यावर मला थोडीतरी उसंत मिळाली. डॉ. अजय, डॉ. हर्ष आणि नर्स कृष्णा हे दिवसभर गायबच होते. शेवटी संध्याकाळी पाच वाजता ते आले. कदाचित ते कुणालाच न सांगता हिंडायला गेले होते. त्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्यावर चिडलेलो होतो. आज मला कामातून अजिबात उसंत मिळाली नव्हती. ११.३०-११-४५ च्या सुमारास मात्र, मी न मागताच, मस्त 'अद्रकवाली चाय' प्यायला मिळाली होती. चहाबरोबर टोस्टही आले होते. ते टोस्ट काही मी खाल्ले नाहीत. थोड्या वेळाने स्वयंपाकघरातून MTR ची रेडीमेड रवा इडली आली. त्या इडलीची चव बघण्यासाठी सुभाषिनीने फारच आग्रह केला. इडली बरी झाली होती, पण सोबत चटणी नसल्याने कोरडी-कोरडी लागत होती.
आज जवळपास साडेचारशे-पाचशे पेशंट्सना मी तपासले होते. बराच काळ मी एकटीच डॉक्टर काम करत असल्याने मी पार दमून गेले होते. संध्याकाळपर्यंत पेशंट्सशी बोलून आणि "गर्दी करू नका, बाहेर थांबा" असे पेशंट्सच्या नातेवाईकांना सांगून-सांगून माझा घसा ठणकायला लागला होता. इथे आलेल्या मोजक्या पेशंट्सनाच जरा सविस्तर उपचारांची आवश्यकता असते. बाकी सर्वांना जुजबी उपचार करून लवकरात लवकर बाहेर पाठवणे आणि पुढचे पेशंट तपासायला घेणे आवश्यक असते. तसे केल्याशिवाय एवढ्या जास्त पेशंट्सना सेवा देणे शक्य नसते.
इथे केदारनाथला अनेक भगवे वस्त्रधारी साधू येत असतात. कित्येकजण इथे सहा महिने मुक्कामच करतात. अनेक जटाधारी तृतीयपंथी लोकदेखील भगवी वस्त्रे परिधान करून, आपले चेहरे रंगवून, हातात त्रिशूल घेऊन इथे येतात. आज हॉस्पिटलमधे दाखवायला आलेल्या एका साधूबाबाने, पातळ भगव्या कफनीशिवाय अंगात इतर काहीही घातलेले नव्हते. पायामधे चपला, बूट किंवा कोणतेच पादत्राणही घातलेले नव्हते. त्याचे दोन्ही तळपाय सोलवटलेले होते. तळपायांवर काही ठिकाणी फोडही आलेले होते. मला वाटले की, तळपायाला फोड आल्यामुळे हा मनुष्य अनवाणी आला असेल. पण त्याच्याकडून वेगळीच माहिती मिळाली. त्याने पादत्राणांचा आणि भगव्या कफनीव्यतिरिक्त इतर सर्व वस्त्रांचा त्याग केलेला होता. गरम कपड्याविना, आणि अनवाणी पायानेच तो केदारनाथ देवळाच्या मागच्या बाजूला आणि आसपासच्या बर्फाच्छादित डोंगरांमधे फिरून आलेला होता. तिथे काढलेले व्हिडिओदेखील त्याने मला दाखवले. काही साधू तर फक्त गोणपाटाचे कापड अंगावर गुंडाळून आलेले होते.
अनेक सामान्य लोकही केदारनाथपर्यंत अनवाणी चालत येतात. त्यातले बरेचजण काही ना काही नवस बोललेले लोक असतात. पण या यात्रेकरूंपैकी बऱ्याचश्या लोकांच्या पायाला खूप फोड आलेले होते आणि त्यांचे पाय सोलवटलेले होते. अशा लोकांना आम्ही जरी बूट-चपला घालायला सांगितले तरी ते ऐकत नव्हते. कित्येक नवविवाहित जोडपी जोडीनेच दर्शनाला येतात. त्यांच्या घराण्याची तशीच पद्धत असते. त्यांच्याबरोबर सासरचे लोकही आलेले असतात. या जोडप्यामधली नववधू भरपूर नटलेली, अंगावर दागदागिने घातलेली आणि हातभर लाल चुडा भरून आलेली असते. आज दोन सख्खे भाऊ आपापल्या सुंदर नववधूंना घेऊन आले होते. त्या दोघीनींही चेहऱ्याला छान मेकअप केलेला होता आणि भरजरी साड्या नेसलेल्या होत्या. त्या दोघींनाही फारसे काहीच झाले नव्हते. पण नवीन लग्न झालेले असल्याने काळजीपोटी त्यांचे नवरे त्यांना दाखवायला घेऊन आले होते. आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अनेक स्त्रिया आम्हाला सॅनिटरी पॅड्स मागत होत्या. केदारनाथपर्यंत पोचण्याच्या दगदगीने त्यांना अचानकच आणि वेळेपूर्वीच मासिक पाळी आलेली असे. केदारनाथच्या वाटेवर अशा प्रकारच्या वस्तू सहजी कुठेच विकत मिळत नाहीत. त्यामुळे मग बायकांची पंचाईत होते. आमच्या नर्सेसनी अशा बायकांसाठी, कापूस आणि बँडेजचे कापड वापरून पॅड्स बनवून ठेवलेली होती. किमान इमर्जंसीपुरते तरी एक-दोन पॅड्स त्या बायकांना मिळत होती. इथे काम करता-करता, अशा नानाविध अनुभवांची शिदोरी मी जमा करत चालले होते.
आज दुपारी आनंदला खूप बरे वाटत नव्हते असे त्याने मला फोनवर कळवले. मी वर जाऊन ताप मोजला, तर त्याला १०१ ताप आलेला होता. छाती भरल्याची किंवा इतर काहीच लक्षणे त्याला दिसत नव्हती. ऑक्सिजन सॅच्युरेशनसुद्धा नॊर्मल होते. पण आज त्याच्या तापाचा चौथा दिवस होता. त्याचे रक्त आमच्या इथल्या लॅबमध्ये तपासायला दिले. त्या रिपोर्टनुसार त्याचा WBC काउन्ट वाढलेला दिसला. अखेर त्यामुळे मी त्याला Augmentin 625 या गोळ्या चालू केल्या. त्याला तोंडावाटे गोळ्या देण्यापेक्षा, शिरेवाटे अँटिबायोटिक द्यावे असे एकदा मला वाटले होते. पण उगीचच अंगात सुया कशाला टोचायच्या, असेही वाटले. संध्याकाळी चार वाजता त्याने अँटिबायोटिक गोळ्यांचा पहिला डोस घेतला. त्याबरोबर लागेल तसे क्रोसीनही घेत राहायला सांगून मी परत कामावर आले. आज आनंदला इतका जास्त ताप चढलेला पाहून मी काळजीतच पडले होते. आता इथे आम्ही अजून दोनच दिवस राहणार होतो. पण अशा परिस्थितीत केदारनाथाचे दर्शन कधी घडणार, हा विचारही डोक्यात सारखा येत होता. इथपर्यंत येऊन दर्शनाशिवायच परत जावे लागणार की काय, असेही अनेकदा वाटून गेले.
आज नेहमीप्रमाणे साडेसातपर्यंत अविरत काम केले. जेवणाच्या वेळेपूर्वी, डोसे आणि वडे कसे करायचे, हे इथल्या स्वयंपाक्याला शिकवण्यासाठी डॉ. सुभाषिनी खूप आधीच ओपीडीतून वर निघून गेली होती. आनंदला घेऊन जेवायला लवकरच वर या, असे तिने मला सांगितले होते. ती दोसे, वडे आणि इडली तयार ठेवणार होती. त्यामुळे मी आणि आनंद नेहमीपेक्षा जरा लवकरच भोजनालयामधे गेलो. तिथे बटाटा भाजी, गरम फुलके, घट्ट दाल असे जेवण लागलेले दिसले. सुभाषिनी स्वयंपाकघरात काहीतरी खुडबूड करत होती. दोसे, वडे, सांबार यांचा अजून पत्ताच नव्हता. तिला ते सगळे करणे जमत नाहीये असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी चटकन माझे जेवण उरकले आणि तिच्या मदतीला गेले. तिला स्वतःला दोसे घालताच येत नव्हते. तिथल्या स्वयंपाक्यालाही ते जमत नव्हते. सुभाषिनीने घातलेले अगदी छोटे-छोटे आणि वेड्यावाकड्या आकाराचे दोसे तिला त्या तव्यावरून काढताही येत नव्हते. ती हैद्राबादची असली तरीही तिला, मधे भोक असलेले मेदूवडेही घालता येत नव्हते हे तिने स्वतःच मला सांगितले. त्यामुळे वडेदेखील तळून झालेले नव्हते. डॉ. सुभाषिनी एका बड्या घरातली सून आहे. तिचे सासू-सासरे स्वतः आमदार आहेत व नवरा मोठा कारखानदार आहे. त्यामुळे तिला कामाची सवय आणि उरक नाही असे तिने मला सांगून टाकले. तिच्या घरी स्वयंपाकी असल्याने, हे सगळे पदार्थ कसे करतात हे तिला फक्त बघून माहिती होते, पण करायचे कसे याचा अनुभव मात्र अजिबात नव्हता.
सगळी पीठे तर भिजवून ठेवलेली होती आणि "आज मी दोसे आणि वडे करणार आहे" असे तिने सगळ्यांना सांगूनही ठेवलेले होते. MTR चा सांबार मसाला वापरून सांबार तेवढे तिने तयार करून घेतलेले होते. हे सगळे बघून मात्र मग मी सर्व सूत्रे माझ्या हातात घेतली. एकीकडे भराभर दोसे घालायला मी सुरुवात केली. दुसरीकडे तळणी ठेऊन त्यात वडे तळायला घेतले. पण झाले असे, की भराभरा तळून तयार होत असलेले सगळे वडे पहिल्या अर्ध्या तासातच फस्त झाले. मग पुढचे जवळपास दोन तास, मी सगळ्यांना दोसे करून घालत होते. इथे आम्ही सहा डॉक्टर्स, तरुण नर्सिंग स्टाफ, नर्सिंग स्टुडंट्स, फार्मसिस्ट, व्यवस्थापक, वॉचमन आणि सफाई कामगार असे सगळे मिळून ३५-४० जण होतो. सुभाषिनीने भिजवलेले दोशाचे पीठ मुळात कमीच होते. खाणारी तोंडे ३५-४० असल्याने ते डोसेही सगळे संपले.
सगळ्यांना डोसे तर खूप आवडले होते आणि अजूनही मिळाल्यास हवे होते. मग मी जरा डोकं लढवलं. इथे रवा इडलीची अनेक पाकिटे पडलेली होती. त्यातलेच एक पाकीट फोडून, त्यात थोडे दही व पाणी घालून तो रवा भिजवला. ते मिश्रण मिक्सरमधून काढून बारीक केले आणि त्या मिश्रणाचे छान, पातळ, कुरकुरीत रवा दोसे घातले. त्यानंतर स्वयंपाकघरात सगळ्यांनी अक्षरशः रांग लावून ते गरमागरम दोसे पोटभर खाल्ले. डोसाच्या गाडीवर असतो तशा प्रकारच्या मोठ्या चौकोनी तव्यावर एका वेळेस चार-चार मोठेमोठे डोसे घालून ते सर्वाना खायला घालण्यात मलाही खूप मजा वाटली. दोसे आणि वडे खाऊन ती सगळी तरुण मुले-मुली खूप खूष झाली होती. दोन दिवसांनी मी जाणार आहे हे माहिती असल्याने त्या सगळ्यांना खूपच वाईट वाटत होते. "मॅडम, तुम्ही अजून चार-आठ दिवस राहा आणि आम्हाला तुम्ही रोज नवीन काहीतरी खायला घाला." असे ती मुले म्हणू लागली. त्या दिवशी मी आणि आनंद वगळता इतर कोणीच पोळी-भाजी, डाळ-भात खाल्ले नसल्याने, त्या दिवशीचा सगळा स्वयंपाक उरला. मग खाली वेटिंग रूममध्ये थांबलेल्या गरीब पेशंट्सच्या नातेवाईकांना आम्ही ते अन्न वाटून टाकले.
हे सगळे उरकून खोलीत येईपर्यंत रात्रीचे दहा-सव्वादहा झाले होते. आम्हाला हेलिकॉप्टरने खाली जायला अजून दोन दिवस असले तरी, आमचे सामान खेचरावर वाहून नेले जाणार होते.आम्ही खाली गेल्यावर ते वेळेत आम्हाला मिळावे यासाठी आमचे सामान उद्याच रवाना करायचे आहे हे कळल्यामुळे, मी रात्रीच कपडे धुवून घेतले आणि बारा वाजता पलंगावर पाठ टेकवली.
दमल्यामुळे लगेच अगदी गाढ झोप लागली, हे सांगायलाच नको.
[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.









