आज पहाटे ३ वाजता आम्हाला नारायणकोटीहून सोनप्रयागकडे जायचे होते. पहाटे २ वाजताच्या गजराच्या आवाजानेच जाग आली. डोळे चुरचुरत असले तरीही उठून तयार होणे आवश्यक होते. आमच्या खोलीमधे पाणी गरम करायला किटली, चहा-कॉफी, साखरेची आणि मिल्क पावडरची पाकिटे होती. पटकन चहा केला. त्यानंतर प्रातर्विधी व अंघोळ उरकून दोघेही ३ वाजायच्या आत तयार झालो. खूप जड असे ट्रेकिंग शूज घातल्यामुळे पायात जणू बेड्या किंवा साखळदंड घातल्यासारखे वाटत होते.
आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडायला नारायणकोटीच्या हॉस्पिटलचीच गाडी येणार होती. पहाटे ३ वाजायला पाच मिनिटे कमी असताना, गाडीच्या चालकाचा फोन आला. आम्ही तयारच होतो. पण डॉ. हर्ष आणि डॉ. अजय अजून तयार होत आहेत अशी माहिती त्या चालकाकडूनच समजली. त्यामुळे मग, "त्यांना घेऊनच आमच्याकडे ये", असे आम्ही चालकाला सांगितले. त्या दोघांना घेऊन गाडी सव्वातीन वाजेपर्यंत आमच्याकडे आली. पाठीवर घ्यायच्या बॅकपॅक्स आम्ही गाडीत ठेवल्या आणि स्थानापन्न झालो.
हरिद्वारच्या हॉस्पिटलमधील व्यवस्थापक, श्री. ध्वजपालजींनी आम्हाला प्रत्येकाला गळ्यात अडकवायचा बिल्ला दिला होता. "केदारनाथला जाताना तो गळ्यात अडकवून जा, तो बिल्ला दाखवलात की पोलीस तुम्हाला कुठेही अडवणार नाहीत आणि कुठल्याही रांगेत उभे राहावे लागणार नाही," असे त्यांनी सांगितले होते. तसेच "कुठल्याही परिस्थितीत बिल्ला कुठे विसरू नका, हरवू नका आणि हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे परत आलात की तो आमच्याकडे जमा करा," असेही त्यांनी बजावून सांगितले होते. गाडीत बसल्यावर गळ्यात तो बिल्ला घालण्यासाठी मी बॅकपॅकमधे शोधायला लागले. पण ऐनवेळेस तो बिल्ला काही मिळेना. खरंतर मी तो लगेच सापडावा म्हणून माझ्या बॅकपॅकमधे बाहेरच्या बाजूलाच ठेवला होता असे मला आठवत होते. आम्ही दोघांनीही आपापले बॅकपॅक्स उघडून, सगळे सामान काढून बघितले. तरीही तो बिल्ला कुठे मिळेना. मी अगदी हवालदिल झाले. पुन्हा खोलीत परत गेले आणि तिथेही शोधाशोध केली. तरी तो बिल्ला काही मिळाला नाही. मी अक्षरशः रडवेली झाले होते. तेवढ्यात हर्षचा फोन आला. त्याला गाडीतच तो बिल्ला खाली पडलेला मिळाला आहे हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला.
बिल्ला शोधाशोध प्रकरणात आमची पंधरा मिनिटे मात्र वाया गेली. शेवटी पहाटे साडेतीन वाजता आम्ही नारायणकोटीहून जेमतेम २४ किलोमीटरवर असलेल्या सोनप्रयागकडे निघालो. सोनप्रयागहून शटल गाडीत बसून गौरीकुंडपर्यंत जायचे होते व त्यानंतर पुढे प्रत्यक्ष ट्रेकिंगला सुरूवात करायची होती. आम्ही नारायणकोटीहून निघाल्यापासून वाटेत अक्षरशः पावलोपावली वाहतूक कोंडी लागत होती. कित्येक वेळा असे झाले की, एका जागी थांबलेल्या गाडीत आम्ही नुसतेच बसून ट्रॅफिक हलायची वाट पाहत असायचो. गाडी अगदी मुंगीच्या पावलाने पुढे जात होती. गाडीमध्ये आमच्या गप्पा चालूच होत्या. मी तिथेच बसून नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशनचा फॉर्म भरला. तिथे आम्ही गाडीत बसलेलो असतानाच हर्ष आणि अजय MBBSची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मेसेजेस त्यांना आले. त्यामुळे ते दोघेही खूप आनंदात होते. आम्हीही त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर थोडावेळ त्यांचे कोणकोण मित्र आणि मैत्रिणी उत्तीर्ण झाल्या आहेत, कोणकोण मागे राहिले आहेत, ही चर्चा फोनवर चालू होती. ती ऐकताना माझे मनही आमच्या कॉलेजच्या दिवसांमधे फिरून आले!
पुढचे सुमारे पाच तास आम्ही गाडीत बसून होतो. तेवढ्या काळात जेमतेम १२-१४ किलोमीटरचा पल्ला गाठलेला असल्याने आम्ही पार वैतागून गेलो होतो. सोनप्रयागला पोहोचायला अजून किती वेळ लागेल काहीच सांगता येत नव्हते. गूगल मॅप पुढचा सगळा रस्ता, प्रचंड वाहतूक कोंडीचा, म्हणजे लाल रंगात दाखवत होता. तसेच त्या गाडीच्या चालकाला, आम्हाला सोडल्यानंतर नारायणकोटीला परतून कुणालातरी हरिद्वारला घेऊन जायचे होते. बराच उशीर होत असल्याने तोही सतत कुरकूर करत होता. आमच्या आसपासच्या गाड्यांमधून आमच्यासारखेच अडकलेल्या अनेक लोकांनी खाली उतरून पुढे चालायला सुरुवात केल्याचे आम्हाला दिसत होते. शेवटी आम्हीसुध्दा तोच निर्णय घेतला. सीतापूरच्या अलीकडेच आम्ही गाडी सोडून दिली आणि चालायला सुरुवात केली.
सीतापूरपासून सोनप्रयागच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. त्या दुकानांमधून गरम कपडे, शाली, रेनकोट्स, टोप्या, छत्र्या, काठ्या, बूट आणि बुटावर चढवायला रबरी आवरणे अशा अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. काहीजण रस्त्याच्या कडेला बसून या वस्तू विकतात. अनेक फिरते विक्रेते पाणी, चहा आणि इतर वस्तू विकत असतात. या मार्गावर जसजसे आपण वर-वर चढत जातो, तसतशी प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाते. आमच्याबरोबर, संपूर्ण भारतभरातून आलेले अनेक आबालवृद्ध चालत होते. प्रत्येकाच्या हातात आधारासाठी किमान एकेक काठी होती. काहीजण तर दोन्ही हातात काठ्या घेऊन चालले होते. आमच्यासारख्या काही शहरी लोकांनी पायात ट्रेकिंग शूज घातले होते. पण बरेचजण साधे बूट, चपला घालून चालले होते. काहीजण तर अनवाणी चालत होते. बरेचसे शहरी लोक आणि विशेषतः तरूण-तरूणी जणू एखाद्या पिकनिकला चाललोय अशा अविर्भावात मजा करत चालत होते. खाणे-पिणे, फोटो काढणे, व्हिडीओ शूट करणे, आणि एकमेकांची चेष्टा करण्यात ते मश्गूल होते. सोनप्रयागला पोहोचेपर्यंत रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागलेली दिसत होती. त्यातून आणि लोकांच्या घोळक्यामधून वाट काढत आम्ही सावकाश पुढे चालत होतो.
सोनप्रयागला पोहोचल्यावर हुश्श झाले. आता पुढील पाच किलोमीटर शटल गाडीत बसून गौरीकुंडला पोहोचायचे होते. सोनप्रयाग गाव सोडल्यानंतर, पुढे एक लोखंडी पूल लागला. तो ओलांडून डावीकडे गेल्यावर तिथे गौरीकुंडला जाणाऱ्या शटलगाड्यांचा थांबा आहे असे कळले. कमालीच्या गर्दीतून वाट काढत, आम्ही त्या शटलच्या थांब्यापर्यंत पोहोचलो. पण तिथली झुंबड बघूनच आम्ही हबकलो. शेकडो लोक तिथे आमच्या आधी येऊन थांबलेले होते. एखादी गाडी वरून खाली येऊन, त्यातले लोक बाहेर पडेपर्यंत, ती गाडी वर जाणाऱ्या यात्रेकरूंनी भरली जात होती. शटल म्हणजे टेम्पो ट्रॅक्स गाड्या होत्या व प्रत्येक गाडीमधे १२-१५ माणसे, अक्षरशः कोंबून भरली जात होती. "आम्ही डॉक्टर्स आहोत, आम्हाला ड्यूटीवर पोहोचायचे आहे, आम्हाला जरा लवकर शटलमधे बसवून द्या," असे एका पोलीसाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्याने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्या तोबा गर्दीत त्यालाही फारसे काही करता येण्यासारखे नव्हते हेही खरेच. इथे शटलसाठी थांबून राहण्यात आणि अजून वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतरदेखील चालतच पार करायचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही उलटे लोखंडी पुलाकडे मागे फिरलो. हर्ष आणि अजयने तिथे वर जाणारा एक खड्या चढणीचा शॉर्टकट आम्हाला दाखवला. ती खडी चढण बघून माझ्या पोटात गोळाच उठला होता. पण अजय म्हणाला, "मॅम, आमच्यापैकी एकजण तुमच्या पुढे आणि एकजण तुमच्या मागे राहील. आम्ही बरोबर तुम्हाला घेऊन जाऊ. या शॉर्टकटमुळे आपले जवळपास एक किलोमीटर अंतर कमी होणार आहे." शेवटी माझ्या मनांत नसतानाही मी हिम्मत करून ती चढण चढू लागले. गौरीकुंडपर्यंत जायच्या आतच, ही पहिली खडी चढण यशस्वीरित्या चढल्यामुळे माझाही आत्मविश्वास थोडासा वाढला.
अजय आणि हर्षच्या मते आम्ही दोघांनी पाठीवर वजन न उचलता, आमचे बॅकपॅक्स त्यांच्याजवळ द्यायला हवे होते. पण आम्ही दोघांनीही तसे करायला ठाम नकार दिला. आमच्या पाठीवरचे वजन कमी व्हावे म्हणून मग त्यांनी मागच्यामागे आमच्या बॅकपॅक्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. त्या एका बाटलीचे वजन कमी झाल्यानेही मला खूप बरे वाटले. त्यानंतर त्यांनी आमच्या बॅकपॅकमधील रेनकोटही काढून, त्यांच्या बॅकपॅक्समध्ये ठेवले. ही दोन तरूण मुले आम्हा दोघांची आणि विशेषतः माझी खूप काळजी घेत होती. मला चढायला त्रास वाटला तर हात देत होती. त्यामुळे मला त्यांचा खूपच आधार वाटत होता. आम्ही या प्रवासाला निघण्याआधी चालण्याचा भरपूर सराव केलेला असला तरीही, तो सराव किती अपुरा होता हे गौरीकुंडला पोहोचेपर्यंतच माझ्या लक्षात आले.
सोनप्रयाग ते गौरीकुंडपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड झुंबड होती. आमच्यासारखेच चालत गौरीकुंडापर्यंत जायचा निर्णय घेतलेले अनेकजण होते. पण प्रवाश्यांनी खच्चून भरलेल्या शटल गाड्याही त्याच घाटाच्या रस्त्यावरून ये-जा करीत होत्या. त्यामुळे त्यांना वाट करून देताना आमची खूपच त्रेधा उडत होती. कसेबसे आम्ही गौरीकुंडापर्यंत पोचलो. तिथून प्रत्यक्ष केदारनाथपर्यंतचा पायी रस्ता सुरु झाला.
आम्हाला वाटले होते की त्या पायवाटेवर शटल गाड्यांचा त्रास नसल्याने आमची पुढील वाट जरा तरी सुखकर असेल. पण आमचा लवकरच भ्रमनिरास झाला. अनेक खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले अक्षरशः आमच्या भोवती घोंगावत होते. खरंतर खेचराने यात्रेकरूंना वरपर्यंत नेण्याचा सरकारी दर ठरलेला आहे. पण त्या दरापेक्षा जास्त पैशामधे गिर्हाईक पटवणे आणि जमल्यास दिवसभरात दोन-तीन खेपा करून जास्तीतजास्त पैसे कमावणे, हा यांचा उद्देश असतो. चारधाम यात्रेचे हे पाच-सहा महिने यांचे कमाईचे दिवस असतात. नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमधून अनेक ठिकाणांहून आपापली खेचरे घेऊन हे सर्व वयांचे खेचरवाले इथे येतात. त्याचप्रमाणे डोली आणि पिठ्ठू उचलणारे तगडे तरूणही येतात. 'पिठ्ठू' म्हणजे त्या हमालाच्या पाठीवर बांधलेली एक खुर्ची असते. या खुर्चीमधे एक व्यक्ती किंवा काही सामान बसू शकते. या पिठ्ठूमधे शक्यतो लहान मुलांना किंवा कमी वजनाच्या यात्रेकरूंना बसवून वर नेतात. त्या-त्या व्यक्तीच्या वजनाच्या प्रमाणात किती दर आकारायचा हे सरकारने ठरवून दिलेले आहे. भरभक्कम वजनाच्या स्री-पुरूषांना घोडा करायचा नसल्यास त्यांच्यासाठी 'डोली'मधून जायचा पर्यायही उपलब्ध असतो. ही 'डोली' म्हणजे प्रत्यक्षात पूर्वीच्या काळी असायची तशी 'पालखी' किंवा 'मेणा' म्हणावा असाच असला तरी, त्याला वर छत मात्र नसते. ही डोली चार तरुण उचलून नेतात. तसे पाहता, खेचर काय, पिठ्ठू काय किंवा डोली काय, यापैकी कुठलाच पर्याय निर्धोकही नाही आणि सुखाचाही नाही. कारण हे खेचरवाले, पिठ्ठूवाले आणि डोलीवाले लोक खूप धसमुसळेपणा करतात. अनेकदा पिठ्ठूमधून किंवा खेचरावरून यात्रेकरू पडतात आणि त्यांना जबर दुखापत होते. त्या मानाने डोलीतून जाणे जरा तरी सुरक्षित असते. खेचरवाले अतिशय वेगाने खेचरं हाकत नेतात. त्यामुळे कित्येकदा चालणाऱ्या वाटसरूंना धक्का लागून मुकामार लागणे, खोक पडणे, याबरोबरच काहीवेळा अगदी फ्रॅक्चर किंवा जीवघेण्या दुखापतीही होतात. यात्रेकरुंपैकी कोणालाच सहसा घोड्यावर बसायची सवय नसते. इथे असलेली खेचरे अगदीच मरतुकडी आणि कुपोषित असतात. त्यांच्यावर ठेवलेल्या खोगीरांना चांगले, गुबगुबीत असे कुशनही नसते. त्यामुळे ढुंगणाच्या खालच्या भागाला आणि मांड्यांच्या आतल्या बाजूला घासून-घासून अनेकांना त्रास होतो. घोड्यावर किंवा खेचरावर बसताना नेहमीच मांड घट्ट ठेवून, रिकिबीत पाय व्यवस्थित रोवून बसावे लागते. इथे मात्र अनेकांचे पाय रिकीबीतून बाहेर लटकत असतात आणि त्या बाहेर लटकणाऱ्या पायांना सहजी इजा, फ्रॅक्चर्स होतात. एकूण काय, तर खेचरे, डोली आणि पिठ्ठू हे तिन्ही पर्याय, ते वापरणाऱ्यांसाठीच नव्हे तर पायी चालेल्या इतर लोकांसाठीही त्रासदायकच असतात.
अरुंद रस्ता, कमालीची गर्दी, खेचरे, पिठ्ठूवाले आणि डोलीवाल्यांची धक्काबुक्की, वाटेवर पडलेली खेचरांची लीद, त्या लिदीची आणि मूत्राची दुर्गंधी, या सगळ्यामुळे हा प्रवास आम्हाला अतिशय क्लेशदायक होत होता. वाटेत कुठेही स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल याची खात्री नव्हती, स्वच्छतागृहे अगदीच तुरळक आणि अत्यंत गलिच्छ होती. स्वच्छ, पोटभरीचे व खात्रीशीर ताजे खाण्याचे पदार्थ कुठेही उपलब्ध नव्हते. लहान-लहान चण्या-शेंगदाण्याची, वेफर्स-चिवड्याची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या तेवढ्या मिळत होत्या पण या सर्वच वस्तूंचे भाव 'एमआरपी' च्या किमान दुप्पट लावले जात होते!
अशा अवस्थेत आम्ही चालत होतो. एकूण २१-२२ किलोमीटर चढणीचा रस्ता चढत जाणे म्हणजे दिव्यच होते. मी ४५ वर्षांपूर्वी केदारनाथला आले होते, तेंव्हाचा रस्ता तसा अरुंद पण केवळ चौदा किलोमीटरचाच होता. २०१३ सालच्या प्रलयामध्ये तो रस्ता जागोजागी वाहून गेलेला होता. त्यामुळे सध्या जो रस्ता आहे तो जरा रुंद असला तरीही अधिक लांबीचा आहे. आताच्या मानाने पूर्वी यात्रेकरुंची संख्याही बरीच कमी होती. तरीही त्यावेळचा रस्ता सध्याच्या रस्त्यापेक्षा बराच अरुंद असल्याने, माझ्या आठवणीप्रमाणे त्या रस्त्यावरही आजच्यासारखीच गर्दी त्यावेळी आम्हाला जाणवली होती. त्या काळी हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध नसल्यामुळे खेचरे, पिठठू आणि डोलीवाल्यांची गर्दीही आजच्यापेक्षा जास्तच जाणवत होती असे मला आठवते. पण पंचेचाळीस वर्षांनंतरही या मार्गावर अधिक चांगल्या सोयी-सुविधा, आणि स्वच्छता नसावी याचे मला फार वाईट वाटले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी कदाचित सगळ्यात जुन्या, आणि सगळ्यात दुर्गम जागी असलेल्या या सुंदर देवस्थानाच्या रस्त्यावर चालणाऱ्या यात्रेकरूंची आजही अशी दुरवस्था असावी हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. वर पायी चढत जायचे या निर्धारानेच आम्ही या प्रवासाला आलो होतो. पण इथली गर्दी, गैरसोयी, आणि घाण बघून मात्र आम्ही ठरवले की परतताना हेलिकॉप्टरनेच खाली उतरायचे.
आम्ही पहाटे साडेतीनला आमची नारायणकोटीची खोली सोडली होती. त्यानंतर जवळपास पाच तासांनंतर, सकाळी ८.३० वाजता आम्ही चालायला सुरूवात केली. गौरीकुंडला पोहोचेपर्यंत जवळपास ११.३० वाजले होते. आम्ही दोघेही घामेघूम झालो होतो. गौरीकुंड म्हणजे प्रत्यक्षात एक कुंडच आहे, ज्यामध्ये लोक स्नानही करतात. पण ते बघायला थांबण्याची इच्छा आम्हाला झाली नाही. सतत चालत राहून, दिवसाउजेडी केदारनाथला पोहोचावे अशी आमची इच्छा होती. आम्ही चढत असताना पाऊस मात्र आला नाही हे आमचे नशीबच म्हणायचे. पण कडाक्याचे ऊन पडले असल्याने मला चालणे कष्टदायक वाटत होते. लांब बाह्यांचे, सुती, पण एकावर एक असे तीन-चार कपडे मी अंगावर घातले होते. वरून एक गरम जॅकेटही होते. भर उन्हात चालताना अतिशय उकडायला लागले. त्यामुळे मी एकेक कपडे काढून कंबरेला गुंडाळणे सुरू केले. तरीही उकडणे कमी होईना. म्हणून मग माझ्याकडे बॅकपॅकमधे असलेली, बांधणीची पातळ ओढणी ओली करून डोक्यावर घेऊन मी चालू लागले. माझ्या लक्षात आले की मला खूप तहानही लागली होती. पण पाण्याच्या बाटल्या हर्ष आणि अजयजवळ होत्या आणि ती दोघेही मुले कुठे जवळपास दिसेनात. त्यामुळे आम्ही तसेच चालत पुढे निघालो.
गौरीकुंडला पोहोचेपर्यंत कुठेही वापरण्याजोगे, सार्वजनिक स्वच्छतागृह दिसेना. त्यामुळे काय करावे असा मला प्रश्न पडला होता. शेवटी रस्त्याच्या कडेच्या एका हॉटेलमध्ये शिरले. तिथल्या मालकीणबाईला बऱ्याच विनवण्या केल्यानंतर तिला माझी दया आली असावी. तिने आतल्या बाजूला असलेले स्वछतागृह वापरण्याची परवानगी दिली. तिथे जायच्या आधी, कुठे पडू नये म्हणून, माझा फोन मी आनंदजवळ दिला होता. आम्ही दोघे त्या हॉटेलमधून बाहेर पडलो. मागून डोलीवाले आरडाओरडा करत येत होते. त्यांना चुकवायला आनंद डावीकडे सरकला आणि मी रस्त्याच्या उजवीकडे राहिले. मी आनंदला 'थांब-थांब' अशा हाका मारत असताना आनंद माझ्या डोळ्यासमोर गर्दीत दिसेनासा झाला. आता माझ्याकडे फोन नाही, पैसे नाहीत, जवळ प्यायला पाणी नाही आणि अजय आणि हर्ष या दोघांचाही कुठे पत्ता नाही, अशा अवस्थेत मी एकटीच चालत पुढे निघाले.
[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.