काल रात्री झोपायला खूप उशीर झाला होता. पण मला खूप गाढ आणि शांत झोप लागली होती. पहाटे ४.३० च्या सुमारास जाग आली त्यावेळी, आनंद जागाच आहे असे मला दिसले. त्याला रात्रभर झोपच लागली नाही असे तो म्हणाला. त्याच्या अंगात अजूनही ताप होता आणि त्याला अशक्तपणामुळे पलंगावरून उठवतही नव्हते. आता मात्र मला त्याची खूपच काळजी वाटायला लागली. पडल्या-पडल्या आम्ही दोघांनी थोडावेळ गप्पा मारल्या आणि परत झोपलो. सकाळी ७.४५ ला मला एकदम खडबडून जाग आली. आज आम्हा दोघाच्या बॅग्स भरून नारायणकोटीला पाठवायच्या होत्या. दोघांच्याही बॅग्स भरण्याचे काम आता मला एकटीलाच करायचे होते.
त्याआधी आनंदला काहीतरी खायला-प्यायला द्यावे म्हणून मी वर स्वयंपाकघरात गेले. वर नाश्ता तयार होता आणि आज नाश्त्याला ब्रेड पकोडे केलेले होते. ते खायची मला इच्छा नव्हती. आनंदलाही ते फारसे आवडत नाहीत. त्यामुळे तोही नको म्हणणार हे माहिती असूनही मी त्याला फोन करून, "तुझ्यासाठी ब्रेड पकोडे आणू का?" असे विचारले. माझ्या अंदाजाप्रमाणे तो नाहीच म्हणाला. नाश्त्याबरोबर चहाही तयार होताच. मग, आमच्या फ्लास्कमधे मी चहा भरून आणला. तिथल्या स्वयंपाक्याला सांगून तिथूनच ग्लूकोज बिस्कीटचे दोन पुडे आणि टोस्टचा एक पुडा आणला. मी दोन कप चहा प्यायले आणि टोस्ट खाल्ले. आनंदनेही चहा, टोस्ट आणि ग्लूकोज बिस्किटे खाल्ली.
"दोघांच्याही बॅग्ज नारायणकोटीला पाठवण्यासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत तयार ठेवा", असे हॉस्पिटलचे व्यवस्थापक, श्री. धनवीरजी यांनी मला सांगितले होते. चहा प्यायल्यानंतर मी बाहेर जाऊन, दोरीवरचे आमचे वाळलेले कपडे काढून आणले. कपड्यांच्या घड्या करून, दोघांच्या बॅग्ज भरून तयार केल्या. डॉ. सुभाषिनी केदारनाथला येताना हेलिकॉप्टरने आली होती. हेलिकॉप्टरमधे जड सामान आणू देत नाहीत, आणि आणलेच तर त्यासाठी बरेच जास्तीचे पैसे भरावे लागतात, ही माहिती तिच्याकडूनच मला कळली होती. त्यामुळे आम्हा दोघांचेही जड ट्रेकिंग शूज आणि इतर बरेचसे जड सामान बॅग्जमधे घालून, दोन्ही बॅग्ज मी बंद केल्या. दोन्ही स्ट्रॉलीज भरून झाल्यावर, मी स्वतःच त्या ओढून-उचलून खाली नेऊन ठेवल्या. सामान खाली नेण्यासाठी इथल्या सफाई कामगारांपकी कोणालातरी मी बोलवू शकले असते. पण त्यांना सतत हॉस्पिटल झाडून-पुसून काढण्याचे काम करावे लागते याची मला कल्पना होती. आमच्या खोल्या-बाथरूम्स, भोजनालय, स्वयंपाकघर या सर्व ठिकाणी सतत झाडणे-पुसणे चालू असायचे. तळमजल्यावरची ओपीडीची मोठी खोली दिवसातून कमीतकमी चार-सहा वेळा स्वच्छ केली जाई. म्हणूनच, सफाई कामगारांपैकी कोणाला आमचे सामान उचलायला बोलवावे असे मला वाटले नाही. नारायणकोटीहून आमचे सामान वर आले तेंव्हा आमच्या स्ट्रॉलीज बाहेरून जरा खराबच होऊन आल्या होत्या. त्यामुळे, त्या जाड प्लॅस्टिक बॅग्जमधे किंवा पोत्यांमधे घालून मगच खेचरांवरून खाली पाठवण्याचा सल्ला डॉ. सुभाषिनीने आम्हाला दिला होता. त्यानुसार आम्हा दोघांच्या स्ट्रॉलीज् मी काळ्या जाड गार्बेज बॅग्जमधे बंद केल्या. त्यानंतर त्या खेचरावरून खाली वाहून नेणाऱ्या नेहमीच्या लोकांकडे सुपूर्द केल्या.
हे सगळे काम संपवून, माझ्या रोजच्या कामाला ओपीडीत जाईपर्यंत सकाळचे ९.३० वाजले होते. आनंदला अजूनही बराच ताप आणि खूप अशक्तपणा होता. ते एक कारण होतेच, पण उशीरा काम सुरू केल्यामुळेही आज कामात माझे नीट लक्ष लागत नव्हते. सकाळी नाश्ताही केलेला नव्हता. बाहेर सतत पाऊस, आणि मधूनमधून बर्फही पडत होतेच. थंडगार, बोचऱ्या वाऱ्यामुळे अंगात शिरशिरी भरत होती. त्यामुळे, ११.३० च्या सुमारास मी चहा मागवून घेतला. चहाबरोबर सुभाषिनीने बिस्किटेही दिली. ती खाण्याची इच्छा मला नव्हती, पण गरम चहामुळे जरा बरे वाटले.
पाऊस आणि बर्फामुळे भिजलेले, ताप आणि हुडहुडी भरलेले, अशा अनेक पेशंट्सची इथे रीघ लागली होती. भिजलेली आणि कुडकुडणारी लहान मुले बघून त्यांची तर खूपच काळजी वाटत होती. वरकरणी तगडे दिसणारे डोलीवाले, पिठठूवाले आणि खेचरे हाकणारे तरुणही, वरचेवर आमच्याकडे तापाने फणफणलेल्या अवस्थेत येत. त्याना मात्र गोळ्या नको असायच्या. ताप लगेच उतरावा आणि पुन्हा आपल्या पोटापाण्याच्या कामाला लागता यावे, यासाठी त्यांना इंजेक्शनच हवे असे. रोजची कमाई सोडायची इच्छा नसल्याने, इंजेक्शन घेऊन ते तसेच कामाला जात. यातल्या अनेक तरुणांची मूळची तब्येतही फारशी चांगली नव्हती. त्यांच्याकडे पुरेसे गरम कपडे किंवा पावसापासून बचावासाठी रेनकोट्स नसत. अशा दयनीय अवस्थेत, केवळ रोजची कमाई बुडू नये म्हणून ते तसेच कसेबसे काम करत असावेत. एखादा यात्रेकरू खेचरावरून पडणे किंवा चालणाऱ्या प्रवाशांना खेचरांमुळे इजा होणे यासारखे प्रकारही अशा आजारी डोलीवाले, पिठठूवाले, आणि खेचरवाल्यांकडूनच अधिक होत असावेत. या लोकांचे आयुष्य अतिशय खडतर असते. डोलीतून प्रवाशांची ने-आण करताना, आपल्या डोलीला त्यांनी पोर्टेबल म्युझिक प्लेअर लटकवलेले असतात. त्यावर मोठ्या आवाजात, आपापल्या भाषेतली गाणी लावून, त्या गाण्याच्या तालावर मन रमवत, ते पाय उचलत असतात. पण अपुरे अन्न, वस्त्र, निवारा आणि अपार कष्ट यामुळे या लोकांची तब्येत सारखी बिघडते असे माझ्या लक्षात आले. पाऊस सुरु झाला की यांची गर्दी होत असे.
दुपारी एकच्या सुमारास मी फोनवर आनंदच्या तब्येतीची चौकशी केली. त्याच्या अंगी हुडहुडी भरून ताप चढतो आहे असे त्याने मला सांगितले. त्यामुळे, मी लगेच वर जाऊन त्याचे टेंपरेचर आणि ऑक्सिजन लेव्हल तपासले. त्याला पुन्हा १०१ च्या वर ताप चढलेला होता. पण छाती भरल्याची लक्षणे मात्र नव्हती. तसेच त्याच्या रक्तातली ऑक्सिजन लेव्हलही उत्तमच होती. आनंदला कालपासून Augmentin च्या तीन गोळ्या गेलेल्या होत्या, तरीही त्याचा ताप वाढतच चालला होता. इतक्या उंचीवरच्या आणि अतिशय थंड हवेच्या ठिकाणी, तोंडावाटे दिलेली औषधे रक्तामधे नीट शोषली जात नाहीत. म्हणून मग तेच antibiotic, म्हणजे Augmentin, गोळीच्या स्वरूपात देण्याऐवजी शिरेवाटे देण्याचा निर्णय मी घेतला. पुन्हा खाली येऊन, डॉ. सुभाषिनी आणि डॉ. अजय या दोघाना, आनंदची परिस्थिती सांगितली आणि मी त्याला शिरेवाटे antibiotic सुरु करते आहे, हेही सांगितले. हे ऐकून त्या दोघांनीही फर्मान काढले की मी वर खोलीत जाऊन आनंदजवळ थांबायचे आणि दुपारी अजिबात कामाला यायचे नाही. त्यानुसार मी निश्चिन्तपणे वर निघून आले. आज प्रथमच मी पूर्णवेळ काम करणार नव्हते. आमची राहण्याची व्यवस्था हॉस्पिटलच्याच वरच्या मजल्यावर असल्याने इंजेक्शन, औषधे, सलाईन लावण्याची सगळी सोय इथल्याइथेच होणार होती. आनंदला कोणती इंजेक्शन्स किती डोसमधे द्यायची आहेत, हे रवि नावाच्या नर्सला सांगून मी वर खोलीत आले.
रवि दुपारी दीडच्या सुमारास आमच्या खोलीत आला आणि आनंदला आधी शिरेवाटे पॅरॅसिटॅमॉलचे इंजेक्शन आणि त्यापाठोपाठ Augmentin दिले. आज सकाळी मी नाश्ता केलेला नसल्यामुळे मला भूक लागली होती. आनंदची इंजेक्शन्स देऊन झाल्यानंतर मी भोजनालयामध्ये जाऊन डाळ-भात जेवले. दुपारच्या जेवणात इथे रोज घट्ट डाळ आणि भात असतो. फुलके क्वचितच असतात. आनंदनेही सकाळी नाश्ता केलेला नव्हता. "तुझ्यासाठी डाळ-भात आणू का? किंवा इतर काही खाणार का?" असे फोनवर विचारून घेतले. डॉ. सुभाषिनीने 'रेडी-टू-ईट' अशी बरीच वेगवेगळी पाकिटे सोबत आणलेली होती. त्यातले एखादे पाकीट आनंदसाठी बनवून घे आणि त्याला खायला दे, असा आग्रह ती मला सतत करत होती. पण आनंद म्हणाला, "गरम डाळ-भातच आण, इतर काही नको". इथे उत्तम दर्जाचा, बासमती तांदूळ वापरला जातो. इथला आचारी उत्तर हिंदुस्तानी पद्धतीची घट्ट डाळही खूप चवदार बनवतो. मी आनंदसाठी एका छोट्या कागदी कपामधे डाळ-भात घेतला, त्यावर साजूक तूप घातले आणि त्याला आणून दिले. त्याने तो डाळ-भात चवीने खाल्ला. तो खाऊन झाल्यावरही त्याला अजून भूक जाणवत होती. म्हणून मग पुन्हा जाऊन अजून एक कपभर डाळ-भात आणि त्यावर तूप घालून घेऊन आले. तोही त्याने खाल्ला. त्याच्या पोटात अन्न गेल्यामुळे मला बरे वाटले. मी सकाळी आणलेला चहाही फ्लास्कमधे अजून उरलेला होताच. मी वर जाऊन उरलेला चहा पुन्हा गरम करून आणला. तो चहा पुन्हा उकळल्यामुळे जरासा कडवट झाला असला तरीही त्या थंडीमधे गरम चहा पिऊन बरेच वाटले.
आनंदच्या शरीरामध्ये शिरेवाटे Paracetamol चा डोस गेल्यामुळे त्याचा ताप जरासा उतरला होता. पण इतक्या दिवसांच्या शारीरिक दगगगीमुळे आणि मानसिक ताणामुळे मला मात्र आज खूप दमणूक जाणवत होती. दुपारी मी कामाला जाणार नव्हतेच. त्यामुळे दुपारी मीही पलंगावर आडवी झाले. आम्हा दोघांनाही थोडा वेळ चांगली झोप लागली. संध्याकाळी ६ च्या सुमारास मला जाग आली. थोडी विश्रांती झाल्यामुळे जरा बरे वाटत होते. पण आनंदला मात्र पुन्हा साडेसात-आठच्या सुमारास हुडहुडी भरून ताप भरला होता. दुपारी त्याला एकदा पॅरासिटॅमॉलचे इंजेक्शन दिलेले होते. आता परत पॅरासिटॅमॉल इंजेक्शन द्यायला नको असे मला वाटले. त्यामुळे त्याला पॅरॅसिटॅमॉलची गोळी घ्यायला लावली. रात्री आनंद वर जेवायला आलाच नाही. मी एकटीच जाऊन जेवून आले. जेवणामधे आज फुलके, फणसाची भाजी, तळलेले पापड, शेवयाची खीर आणि सकाळचीच डाळ आणि भात असे होते. फणसाची भाजी खूपच चवदार होती. आनंदसाठी थोडे जेवण आणि ग्लासभर खीर घेऊन आले. त्याने ते चवीने खाल्ले. दहा वाजता, रवि नर्स पुन्हा खोलीत येऊन आनंदला antibiotic चा डोस देऊन गेला. मी, आनंद आणि डॉ. सुभाषिनी दोन दिवसांनी इथून हेलिकॉप्टरने खाली उतरणार होतो. पण डॉ. अजय आणि डॉ. हर्ष उद्याच पहाटे निघणार होते, कारण ते पायी चालत खाली उतरून नारायणकोटीला जाणार होते. त्यामुळे रात्री डॉ. हर्ष, डॉ. अजय आणि नर्सिंग स्टुडन्ट कृष्णा आमच्या खोलीवर आनंदला भेटायला म्हणून आले. इंजेक्शन घातलेली सलाईनची बाटली संपेस्तोवर या मुलांनी आळीपाळीने ती हातात उंच धरून ठेवली होती. त्यांची आत्मीयता बघून आणि त्यांच्याशी गप्पा मारून आनंदला खूप बरे वाटले.
आनंदला बिछान्यातून उठून खाली जाण्याचीही ताकद नव्हती. त्यामुळे त्याच्या छातीचा एक्सरे मी अजून करून घेतलेला नव्हता. "आता उद्यापर्यंत त्याला नक्की बरे वाटेल" असेच मी रोज मनाशी म्हणत होते. इथे जास्त आजारी पडलेल्या सगळ्या रुग्णांना आम्ही डॉक्टर्स सल्ला देत होतो, "लवकरात लवकर इथून निघून जा आणि खाली उतरा. या उंच प्रदेशातून खाली उतरून गेलात की तुम्हाला जरा बरे वाटेल". 'आनंदला घेऊन आपणही आता केदारनाथहून खाली उतरावे,' असे अनेक वेळा माझ्या मनामध्ये येत होते. पण आता माझ्या ड्यूटीचा एकच दिवस राहिलेला असल्याने, मी माझी ड्यूटी पूर्ण करावी, थोडक्यासाठी इथून निघून खाली जाऊ नये, असे आनंदचे मत होते. केदारनाथला आम्ही मोठ्या उत्साहाने आलो होतो, इथे येण्याआधी आम्ही दोघांनी खूप मनसुबे केलेले होते. रोज दिवसभर १०-१२ तासाची ड्युटी केल्यानंतर संध्याकाळी किंवा ड्यूटीवर जाण्याआधी पहाटे उठून, केदारनाथच्या देवळाच्या आसपासचा प्रदेश फिरून बघून यावा, असे आम्ही दोघांनीही ठरवले होते. रोज संध्याकाळी सात वाजता देवळाजवळ आरती असते, ती बघायला जावे, अशीही आमची इच्छा होती. पण आनंदच्या आजारपणामुळे ते शक्यच झाले नव्हते आणि आम्ही दोघेही खूप त्रासलो होतो. आनंदला लवकरच बरे वाटेल अशी आशा आम्ही दोघांनीही गेल्या दोन-तीन दिवसात एकमेकांजवळ बोलून दाखवली होती. पण जरा बरे वाटले असे म्हणेस्तोवर त्याला परत ताप चढत होता. केदारनाथचे देऊळ मी स्वतः आधी पाहिलेले होते. ते सुंदर देवस्थान आनंदनेही पाहावे अशी माझी मनापासूनची इच्छा होती. पण त्याची अधिकच खराब झालेली तब्येत आणि अशक्तपणा बघून केदारनाथाचे दर्शन होण्याची शक्यता माझ्या मनातून मावळत चालली होती...
[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट








