शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

'विजय' राम

या वर्षी रामनवमीला पहाटे पाच-साडेपाचलाच उठलो. गच्चीवरील बागेला पाणी घालणे, भांडी घासणे व इतर घरकामे उरकून, अंघोळी करून तयार झालो. सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही सोलापूर जिल्ह्यातील कुंभेज गावाच्या दिशेने आमच्या गाडीने प्रवास सुरू केला. नव्वदीतले माझे वडील, दादा, हेही उत्साहाने तयार होऊन निघाले होते. मी गूगल मॅपवर कुंभेजचा रस्ता लावला. त्याप्रमाणे बरोबर साडेअकरा वाजता आम्ही कुंभेजला पोहोचलो. हायवे सोडून आतल्या रस्त्याला लागल्यावर, बराच काळ रस्ता खूपच खराब लागला. वाटेतल्या तळ्यांवर आणि भीमा नदीच्या पात्रामधे अनेक सुंदर पक्षी दिसल्यामुळे तो प्रवास सुसह्य झाला. शेवटी कुंभेज गावाची पाटी दिसल्यामुळे मला हायसे वाटले. 

मी आनंदला म्हणाले, "चला, आपण पोहोचलो आहोत. आता रामजन्माचा सोहळा पाहू, सुंठवडा खाऊ आणि सोलापूरकडे रवाना होऊ. आपण आलेले बघून सुनीता आणि विजय कुलकर्णींना फार आनंद वाटेल" 

सुनीता ही माझी बालमैत्रीण. तिचे यजमान श्री. विजय कुलकर्णी हे सोलापूर जिल्ह्यातील, कुंभेजच्या कुलकर्णी कुटुंबातले. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने विजय कुलकर्णी गावाबाहेर पडले आणि शेवटी पुण्याला स्थायिक झाले. पण त्यांच्या मनाचा ओढा सदैव आपल्या मूळ गावाकडेच होता. विजय कुलकर्णी हे अत्यंत भाविक असून  गोंदवलेकर महाराजांचे अनुयायी आहेत. पंधरा वर्षांपूर्वी, त्यांनी पुढाकार घेऊन गावातल्या प्राचीन व्यंकटेश मंदीराचा जीर्णोद्धार केला होता. आपल्या गावात आपण एक राममंदिर बांधावे हे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी मागील वर्षी, ऑगस्ट महिन्यात पूर्ण केले. त्यानंतर यंदा या देवळांत प्रथमच रामनवमी साजरी होणार होती. नेमके रामनवमीच्या दिवशीच आम्ही पुण्याहून सोलापूरला निघालो होतो. त्यामुळे, वाटेत या मंदिरात रामजन्माचा सोहळा बघावा व दर्शन घेऊन पुढे जावे अशी माझी इच्छा होती. 

आम्ही कुंभेजला पोहोचलो तरी तिथे कोणत्याही समारंभाची काहीच लगबग दिसेना. सुनीताचा फोन उचलला जात नव्हता. विजय कुलकर्णी यांचा दूरध्वनी क्रमांक आमच्याकडे नव्हताच. आता हे मंदिर कसं शोधायचं? हा प्रश्न आम्हाला पडला. तेवढ्यात एका ट्रॅक्टरवर एक मनुष्य निवांत बसलेला दिसला. 

"कुलकर्णींनी गावामधे नवीन बांधलेले राममंदिर कुठे आहे?" आम्ही विचारणा केली. 

तो मनुष्य थोडावेळ विचारमग्न झाला. शेवटी, एका बाजूला मान वळवून, तोंडातल्या तंबाखूची पिंक लांबवर टाकत उत्तरला,  "राममंदिर?  आमच्या गावात तर राममंदिर नाही. तरी पण खाली बामणाच्या आळीत विचारा." 

आम्ही बुचकळ्यात पडलो. पण तसेच पुढे निघालो. पारावर बसलेल्या एका मध्यमवयीन मनुष्याला 'बामणाची आळी' कुठे आहे, हे विचारले. त्याच्यासोबत झालेल्या संवादातून एक धक्कादायक गोष्ट पुढे आली. आम्ही ज्या कुंभेजला पोहोचलो होतो ते करमाळा तालुक्यातील कुंभेज होते. प्रत्यक्षात आम्हाला माढा तालुक्यातील कुंभेजला जायचे होते. अर्थात ही चूक सर्वस्वी माझीच होती. गूगल मॅपवर जायचे ठिकाण मी 'कुंभेज' इतकेच टाकले होते. पण माढा तालुक्यातील कुंभेज, असे शोधून टाकले नव्हते. सोलापूर जिल्ह्यात दोन कुंभेज असतील, असा विचारही माझ्या मनाला स्पर्शून गेला नव्हता. गूगलने मात्र इमानेइतबारे आम्हाला एका कुंभेजला, अगदी वेळेवर पोहोचवले होते. आनंद माझ्या बावळटपणावर चिडला, पण माझ्या इच्छेखातर त्याने गाडी माढा तालुक्यातील कुंभेजकडे वळवली. या सगळ्या प्रकारात दादांनी काही कुरकूर केली नाही, हे विशेष. 
मजल-दरमजल करत, शेवटी दीड वाजायच्या सुमारास, आम्ही विजय कुलकर्ण्यांच्या कुंभेजला पोहोचलो. कुलकर्णीं दांपत्याने अतिशय प्रेमाने आमचे स्वागत केल्यामुळे आमचा प्रवासाचा थकवा पार निघून गेला. 

आम्ही पोहोचेपर्यंत रामजन्माच्या सोहळ्याची सांगता झाली होती. बरेचसे लोक प्रसादाचे जेवण जेऊन गेले होते.  कुलकर्णी पती-पत्नींनी उत्साहाने आम्हाला देऊळ दाखवले. मुख्य गाभाऱ्यामधे, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या अतिशय सुबक, रेखीव व मोहक मूर्ती बसवल्या आहेत. उजव्या बाजूला शंकराची पिंड व नंदी आहेत. त्यापुढे गोंदवलेकर महाराजांच्या पादुका आहेत व मागील भिंतीवर महाराजांचा फोटो लावलेला आहे. देवळात, गाभाऱ्याच्या बाहेर, उजव्या बाजूला दत्ताची व डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. सर्व मूर्ती संगमरवरी असून, खास राजस्थानमधून बनवून घेतल्या आहेत. मंदिराच्या डाव्या हाताला छानशी छोटी बाग केलेली आहे. देवपूजेसाठी फुले मिळत राहावीत  म्हणून तिथे अनेक फुलझाडे लावलेली आहेत. 

देवळाच्या मागे एक छोटी खोली, स्वयंपाकघर व न्हाणीघर बांधलेले आहे. कुलकर्णीं कुटुंबीय गावात आले की तिथेच राहतात. देवळाच्या उजव्या हाताला, विजय कुलकर्णी यांच्या मोठ्या बंधूंचे घर आहे. ते पेशाने शिक्षक असून, आपली नोकरी सांभाळून शेती करतात. राममंदिराची व्यवस्था व रोजची पूजा-अर्चा तेच बघतात. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामधे राममंदिरामधे मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यावेळी कुलकर्णी दांपत्याच्या कलेक्टर पद भूषवणाऱ्या मुलाने योगेशने व त्याच्या पत्नीने, गावातल्या घरात राहून सगळ्या समारंभाला हातभार लावला होता. 

रामजन्माच्या सोहळ्यासाठी कुलकर्णींचे अनेक नातेवाईक व मित्रपरिवार जमलेला होता. जवळपासच्या गावातूनही बरेच लोक दर्शनासाठी आलेले होते. नवरात्रात रोज अखंड रामनामाचा जप, कीर्तन, अभिषेक, पूजा चालू असल्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेले होते. देवदर्शन झाल्यावर आम्ही प्रसादाचे जेवण जेवलो. त्यानंतर सुनीताने माझी खणा-नारळाने ओटी भरली, बुंदीचे लाडू व सुंठवड्याच्या पुड्या दिल्या. विजय कुलकर्णी यांनी प्रसाद म्हणून द्राक्षे व रामाच्या मूर्तीला घातलेला साखरेच्या गाठींचा हार आम्हाला दिला. त्यानंतर साधारण साडेतीनच्या सुमारास आम्ही सोलापूरला निघालो. त्या दरम्यान, वाट चुकून करमाळा तालुक्यातील कुंभेजला पोहोचलेल्या एक-दोघांचा फोन विजय कुलकर्णींना आला. त्यांचे फोनवरचे बोलणे ऐकले, आणि माझ्यासारखाच बावळटपणा करणारे इतरही कोणी आहे, म्हणून कुठेतरी बरे वाटले. 
श्री. विजय कुलकर्णी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठ वर्षांखाली, बँक ऑफ इंडियातल्या अधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली होती. त्यानंतर २०१७ साली त्यांचे लिव्हर ट्रांन्सप्लांट हे मोठे ऑपरेशन झाले. त्यांची इतरही छोटी-मोठी पाच-सहा ऑपरेशन्स झालेली आहेत. मोठे आर्थिक पाठबळ आणि तब्येतीची साथ नसतानाही अतिशय जिद्दीने व हौसेने हे मंदीर त्यांनी बांधले, हे विशेष आहे. त्यांच्या पत्नीची, आणि सर्व आप्तांचीही साथ त्यांना लाभली. रामविजयाबद्दल आपण नेहमीच अभिमान बाळगतो. पण श्री. विजय कुलकर्णी यांनी आपल्या अत्यवस्थ प्रकृतीवर विजय मिळवून, इतके सुरेख राममंदिर बांधलेले बघून आम्हाला खरोखरीच कौतुक वाटले. त्यामुळे मनोमन या राममंदिराचे नामकरण मी 'विजय' राममंदिर असे करून टाकले. 

सोलापू-पुणे प्रवासा थोडीशीच वाट वाकडी करून, तुम्हीही या 'विजय' रामाचे दर्शन निश्चित घ्या. हायवे सोडून, यावली फाट्याला आत वळले की कुंभेजला जाता येते. पण आपल्याला माढा तालुक्यातील कुंभेजला जायचे आहे, हे मात्र विसरू नका, म्हणजे झालं! 

शनिवार, १८ मार्च, २०२३

कॅच देम यंग!

आज दुपारी मी माझ्या कारमधून क्लिनिकला निघाले होते. एका सिग्नलवर थांबले असताना, अतिशय वेगाने आणि नागमोडी वळणे घेत, एक मोटारसायकल माझ्या उजव्या हाताला येऊन थांबली. मी बिचकले. माझे लक्ष  साहजिकच त्या मोटारसायकलस्वाराकडे गेले. अगदी कोवळ्या वयाचा, एक बारकुडा मुलगा ती मोटारसायकल चालवत आहे, हे बघून मला दुसरा धक्का बसला. त्याच्या मागच्या सीटवर एक चाळीशीचा मनुष्य बसला होता. दोघांच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. मला अगदी राहवले नाही. कारच्या उजव्या खिडकीची काच खाली करून, मी त्या मागे बसलेल्या माणसाला विचारले,

"हा मुलगा खूपच लहान दिसतो आहे. काय वय आहे याचे?" 

"आता चौदावे चालू आहे" त्या माणसाने उत्तर दिले.

"अहो, मग इतक्या कोवळ्या वयाच्या मुलाला मोटारसायकल चालवायला का दिलीत? अठरा वर्षांच्या खालच्या मुलांना चालवायला कायद्याने बंदी आहे. महत्त्वाचे म्हणजे हे त्याच्या जिवाच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. तो किती जोरात चालवतोय, पाहिलंत ना " मी पोटतिडिकीने बोलले. 

"अहो मॅडम, कोवळ्या वयात मुलं गाडी चालवायला शिकली की त्यांची भीड चेपते आणि पटकन शिकतात. माझाच मुलगा आहे आणि मी मागे बसलोय. मी काळजी घेतोय ना त्याची." तो माणूस हसत-हसतच म्हणाला. 

मला खरंतर खूप राग आला होता. या दोघांचा आणि त्या मोटरसायकलच्या नंबरप्लेटचा, असे दोन फोटो काढून, त्वरित ट्राफिक कंट्रोल रूमला पाठवून द्यावेत, असा विचार माझ्या मनामध्ये चमकून गेला. पण तितक्यात सिग्नल हिरवा झाल्यामुळे सगळीच वाहने पुढे निघाली. तो मोटारसायकलस्वार तर विजेच्या चपळाईने, वळवळत माझ्या नजरेआड झाला. 

मी क्लिनिकला पोहोचले. तिथे एक बंगाली सुवर्णकार आणि त्याची बायको, त्यांच्या दोन लहानग्यांना घेऊन आले होते. 

"मॅडम इनके स्कूल की छुट्टी पडी हैं ना, तो ये लोग गाँव जा रहें है। आपसे  कुछ दवा लिखवाके ले के जाऊं, ऐसे सोच  के आया था।"  मुलांच्या वडिलांनी खुलासा केला. 

मी त्या दोन्ही मुलांना तपासले, आणि सध्या कुठलीही औषधे देण्याची गरज नसल्याचे सांगितले.  

" कैसे जा रहे हैं? ट्रेनसे या फ्लाईटसे? " खरंतर, उत्तर माहिती असूनही मी विचारले.
 
" कलकत्ता तक फ्लाईट्से, और वहाँसे टैक्सी करके मिदनापूर डिस्ट्रिक्ट में हमारें गाँव चलें जायेंगे।"

गेल्या अनेक वर्षांपासून पुष्कळ बंगाली स्वर्णकारांची मुले मी तपासत आलेले आहे. हे सगळे लोक, नवरात्रामध्ये एकदा, आणि मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की एकदा, असे वर्षातून दोन वेळा, कलकत्त्यापर्यंत विमानप्रवास करून, पुढे टॅक्सीने आपापल्या खेडेगावी जातात, हे मला माहिती आहे. 

ताप, उलटी, जुलाब यावरची जुजबी औषधे कशी द्यायची, हे मी त्यांना समजावून दिले.
  
"मॅडम, इनको छोडके अभी मैं वापस आ जाऊँगा। जूनमें स्कूल खुलनेसे पहले, मैं फिर इनको लेने जाऊँगा। इधर पुणे में अपना कारोबार है ना।" स्वर्णकाराने जास्तीची माहिती पुरवली. 

मी सहजी विचारले, "आपके यहाँ कितने मजदूर काम करते है? 

"पच्चीस लडके हैं"

जेमतेम पस्तिशीच्या त्या माणसाच्या हाताखाली, इतके कामगार आहेत हे ऐकून मला कौतुक वाटले. 

"आपने ये काम कब सीखा था?'  

"मैं तेरा-चौदा सालकी उमरमें इधर आया था। पहले आठ साल तक काम सीखा। बादमें अपना मॅन्युफॅक्चरिंग युनिट शुरू किया। धीरे धीरे बढाया।"

मी आश्चर्यचकित झाले. 

"इतनी छोटी उमरमें आपके पिताजीनें आपको कैसे भेजा?"

"मॅडम, ये काम कच्ची उमरमेंही सीखना होता हैं। बडी उमरमें सीखना मुश्किल होता है। हमारे इधर के सब लडके छोटी उमर में ही सीखना चालू करते हैं। इसीलिये मेरे पिताजीनें मुझे भी भेज दिया था। मेरेको पूना आये अभी बावीस साल हो गये। इधर कारोबार बहोत अच्छा चलता हैं।" 

मी विचारात पडले. 

तेरा-चौदा वर्षांच्या आपल्या मुलाला भर ट्रॅफिकमध्ये मोटारसायकल चालवू देणारे एक वडील, आणि साधारण त्याच वयाच्या आपल्या मुलाला कामासाठी दूर पाठवणारे दुसरे वडील.
 
कायद्याच्या दृष्टिकोनामधून बघितले तर दोघेही अयोग्य कृत्यच करत होते. पण अर्थार्जनासाठी काहीतरी कसब शिकून, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला एक मुलगा आज अनेकांना रोजगार देऊ शकत होता. 
अतिशय धोकादायक पद्धतीने, सुसाट मोटारसायकल चालवायला शिकून त्या दुसऱ्या कोवळ्या मुलाचे पुढे नेमके काय विशेष भले होणार होते? कुणास ठाऊक?

गुजराती, मारवाडी, सिंधी समाजातली खूप मुले-मुली शाळा-कॉलेज शिकता-शिकता, फावल्या वेळेत वडिलांबरोबर दुकानांच्या गल्ल्यावर बसतात. असे करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांची चेष्टा करणारे लोकही मला माहित आहेत. आणि दुसरीकडे, "धंदा करणे मराठी माणसाच्या रक्तातच नाही" अशी स्वतःचीच लाजिरवाणी चेष्टा स्वतःच्याच तोंडाने करणारे महाभागदेखील मी पाहते. 
त्याउपर, "महाराष्ट्रातील सगळे व्यवसाय, नोकऱ्या, कामधंदे परप्रांतीयांनी बळकावल्यामुळे मराठी तरुणांना बेकारीची झळ सोसावी लागते", अशी ओरडही आपण ऐकतो. 
पण तसे होऊ नये म्हणून आपण मराठी माणसे काय पाऊले उचलतो? आपली पुढची पिढी आपण कशी घडवतो?  
हा विचार अधिक महत्वाचा नाही का?
  



शुक्रवार, १७ मार्च, २०२३

'नूतन' सेवा

काल संध्याकाळी मला व्हॉट्सऍपवर नूतन या माझ्या बालमैत्रिणींचा संदेश आला, "तुला कधी फोन करू गं?' 

संदेश वाचल्या-वाचल्या, तिला माझ्याशी काय बोलायचे असणार आहे, याचा मला अंदाज आला. मी लगेच तिला फोन लावला.

"अगं, ते बाळ आहे ना, त्याला गेले कितीतरी दिवस खोकला आहे. त्याची आई काही लक्षच देत नाही बघ. नुसतं बाटलीच्या दुधावर ठेवते. दहा महिन्याच्या बाळाला सगळं चारायला हवं ना? मी पंधरा दिवस सोलापूरला होते. परत आले तर आमच्या बाळाची हाडं अगदी वर आली आहेत. आता मी दिवसभर त्याला माझ्याकडेच ठेऊन खाऊ-पिऊ घालणार आहे. अजून काही टॉनिक वगैरे देऊ का सांग ना?" नूतन कळकळीने विचारत होती. 

जवळजवळ सहा महिने झाले, दर महिन्या-पंधरा दिवसाला तिच्या शेजाऱ्यांच्या एका बाळासाठी नूतन माझा असाच काही-बाही सल्ला घेत असते.

मी म्हणाले, "नूतन, असं बाळाला न बघता सांगणं अवघड आहे. पण तू त्याला भरपूर खायला घाल. त्यातून त्याला सगळं पोषण मिळेल. बाळाच्या नेहमीच्या डॉक्टरांनी त्याला काय औषधे दिली आहेत, तेही बाळाच्या आईला विचारून सांग. मग बघूया."

"खायला तर मी घालतेच आहे गं. त्याच्यासाठी छोट्या कुकरमध्ये मुगाच्या डाळीची मऊ खिचडी शिजवून, तूप  घालून त्याला चारते. वरण-चपाती, दूध-चपाती, इडली, शिरा, उपमा, सगळं चारते. बाळाचे हाल बघवत नाहीत गं. मी नसले की हे लोक चार-चार दिवस बाळाला अंघोळ पण घालत नाहीत. कितीदातरी मीच त्याला अंघोळ घालते. आपण सोलापूर सिव्हिलला असताना अगदी भिकाऱ्यांना सुद्धा खायला घालायचो, अंघोळ घालायचो. हे तर माझ्या शेजाऱ्यांचे बाळ आहे. याचं तर मी सगळं करतेच गं."

नूतनने भिकाऱ्यांची आठवण काढली आणि माझ्या मनामध्ये अगदी चर्रर्र झाले. सोलापूर हा दुष्काळी जिल्हा. चाळीस वर्षांपूर्वी तर अनेकांची फार हलाखीची परिस्थिती असायची. अत्यंत खंगलेले, भुकेकंगाल भिकारी बरेचदा आमच्या वार्डांमध्ये भरती व्हायचे. अगदी हाडापर्यंत गेलेल्या त्यांच्या जखमांमध्ये अळ्या झालेल्या असायच्या. तसले रुग्ण अनेक महिने वॉर्डमध्ये पडून असायचे. त्यांच्याजवळ गेले तरी कमालीची दुर्गंधी यायची. अशा त्या रुग्णांची सेवा-सुश्रुषा करणाऱ्या काही मोजक्याच परिचारिका आणि डॉक्टर्स असायचे. बाकीचे त्यांना हिडीस-फिडीस करायचे किंवा अगदी पळवून सुद्धा लावायचे. रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या नूतनने ते काम मनापासून केले असणार याची मला जाणीव झाली. 

नूतन सोनतळे ही माझी बालमैत्रीण. तिची आई सोलापूर महानगरपालिकेच्या लेडी डफरिन हॉस्पिटलमध्ये मेट्रन होती. आम्ही शाळेत असताना, डफरिन हॉस्पिटलच्या आवारातच असलेल्या क्वार्टर्समध्ये नूतन राहायची. तिचे घर आमच्या शाळेच्या अगदी जवळ असल्याने, लहानपणी कितीदातरी आम्ही तिच्या घरी जायचो. पुढे, नूतन आणि मी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असलो तरीही मैत्रीचा धागा पक्का राहिला. बारावीनंतर मी सोलापूरच्या वैशंपायन  वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला लागले. नूतनचे लग्न होऊन ती सौ रोहिणी पडसलगी झाली व सोलापूर सिव्हिलला ती परिचारिका म्हणून रुजू झाली. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही वर्षे आमची भेट होत राहिली. पुढे अनेक वर्षे ती तिच्या नोकरीत, मी माझ्या व्यवसायात, आणि आम्ही दोघीही आपापल्या संसारात गुंतून गेल्यामुळे भेट क्वचितच होत असे. मात्र मागील काही वर्षे, आमच्या शाळेच्या दहावीच्या बॅचचा  व्हॉट्सऍप ग्रुप झाल्यामुळे, आम्ही पुन्हा  एकमेकींच्या जवळ आलो. 

'सिस्टर इन-चार्ज ऑफ ऑपेरेशन थिएटर' या पदावरून, जवळपास दोन वर्षांपूर्वी नूतन निवृत्त झाली. पण सेवाभाव तिच्या रक्तातच आहे. त्यामुळेच, शेजाऱ्यांच्या लहान बाळाला खायला-प्यायला घालणे, न्हाऊ-माखू घालणे ही कामे ती आपणहून करते, याची मी साक्षीदार आहे. 

माझ्या बालमैत्रिणीने सेवानिवृत्तीनंतरही चालू ठेवलेल्या या सेवेचा मला खूप अभिमान वाटतो आणि तिचे कौतुक करावेसे वाटते!