मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

५. मलाबारची सफर-नीलेश्वरची निळाई!

आनंदाश्रमपासून नीलेश्वर बॅकवॉटर्सला पोहोचायला साधारण पाऊण तास लागला. तो रस्ता खूप वळणा-वळणाचा होता. तसे केरळमधले सगळेच रस्ते नागमोडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर बंगल्या आणि नजर पोहोचेपर्यंत सगळीकडे फक्त हिरवाई! एका गावाची हद्द संपून दुसरे गाव कधी सुरु होते हे आपल्याला कळतच नाही. या सहलीला जाण्याचे अचानक ठरवल्यामुळे आपण नेमके कुठे-कुठे जाणार आणि काय बघणार, या बाबत गूगलवर मी काहीही वाचलेले नव्हते. त्यामुळे, नीलेश्वर बॅकवॉटर्स हा जास्तच तरल आणि सुखद अनुभव ठरला. 



आम्ही सगळेजण 'बेकल रिपल्स' या कंपनीच्या बोटीवर चढलो. २०-२५ जण आरामात प्रवास करू शकतील अशी मध्यम आकाराची ती बोट होती.  बोटीच्या समोरच्या भागात, म्हणजे डेकवर जाण्यासाठी, एक फूटभराची पायरी चढून वर जावे लागत होते. तिथेच कॅप्टनची खुर्ची आणि बोटीचे चक्राकार सुकाणू होते. बोटीच्या अगदी समोरच्या टोकावर तिरंगा फडकत होता. बोटीच्या पुढच्या अर्ध्या भागात प्रवाशांना बसण्याची सोय होती. त्या भागावर ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून छप्पर होते. पण त्या भागाच्या सर्व बाजू मोकळ्या असल्याने, आसपासचा परिसर बघता येत होता. बोटीच्या मधल्या भागामध्ये एक डबल बेड असलेली बेडरूम आणि अटॅच्ड टॉयलेट होते. बोटीच्या मागच्या भागात सुसज्ज स्वयंपाकघर होते. 

सुरुवातीला बोटीचे कॅप्टन आलेले नव्हते आणि बोट एका जागी बांधून ठेवलेली होती. बोटीचे सुकाणू बघून माझ्या मनातले 'मूल' जागे झाले आणि कोणाला काही कळायच्या आत मी कॅप्टनच्या खुर्चीवर जाऊन बोटीचे चक्राकार सुकाणू हातात घेतले. 'काय हा हिचा पोरकटपणा' असे आनंदच्या आणि गिरीशच्या मनामध्ये निश्चित आले असणार! बोट चालवायला मिळावी ही सुप्त इच्छा माझ्या मनामध्ये होतीच. पण ते शक्य नसल्याने, मी सुकाणू हातात धरून माझे फोटो मात्र काढून घेतले. माझ्यापाठोपाठ इतर प्रत्येकाने ते चक्र हातात घेऊन आपापले फोटो काढून घेतले. हे होईपर्यंत बोटीचे कप्तान आले आणि बोट चालू केली. त्यानंतर  दादाही  मोठ्या  उत्साहाने  बोटीच्या डेकवर चढले. कप्तानाने दादांना आपली खुर्ची दिली, त्यांच्या डोक्यावर आपली टोपी घातली. त्यानंतर आम्ही दादांचे फोटो काढले. तसेच तिरंग्याबरोबरही आम्ही आमचे  फोटो काढले.  

तेजस्विनी नदीवर संथ गतीने तरंगत बोट चालली होती. बॅकवॉटरच्या दोन्ही बाजूला नारळाच्या घनदाट बागा होत्या. बोटीचे कप्तान आम्हाला आसपासच्या भागाची माहिती सांगत होते. आमच्या डाव्या बाजूला अचमथुरुथी हे एक लहान बेट दिसत होते. नदीच्या मध्यभागी असलेल्या या अगदी छोट्या, शांत आणि नयनरम्य अशा बेटावर केवळ चारशे घरे आहेत. पुढे गेल्यावर चेरुवथुर या गावाजवळ असलेला कोट्टापुरम–अचमथुरुथी फूट-ब्रिज हा केरळ राज्यामधला, नदीवरील सर्वात लांब फूट-ब्रिज आहे, असेही त्याने आम्हाला सांगितले. हा प्रवास करत असताना सभोवताली निळ्या-हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. दुपारची वेळ असल्याने हवेमध्ये गारवा नव्हता पण उकाडाही नव्हता. 

बोटीवर आमचे स्वागत लिंबू सरबताने करण्यात आले. त्या पाठोपाठ 'स्टार्टर' म्हणून, गूळ आणि केळे घालून केलेले, गरमागरम आणि अतिशय चविष्ट असे तांदुळाचे आप्पे आले. दुपारची जेवणाची वेळ झालीच होती. पण जेवणाला अजून वेळ होता. त्यामुळे निलेश यांनी म्युझिक सिस्टमवर छानसे संगीत सुरु केले. त्यावर 'कराओके'ची पण सोय होती. आमच्याबरोबरचे श्री. प्रफुल्ल पेंडसे यांनी त्यांच्या सुमधुर आणि सुरेल आवाजात, "बार बार देखो, हजार बार देखो..." हे गाणे म्हटले.  तिथले सगळे वातावरणच असे होते की या गाण्याच्या ठेक्यावर वर आमचे पाय आपोआप थिरकू लागले. पाठोपाठ वृंदा जोशींनीही "अजीब दास्ताँ हैं ये, कहाँ शुरू कहाँ खतम..." हे गाणे फार छान म्हणले. पेंडसे आणि वृंदा जोशींनी अजूनही एकेक गाणे म्हटले. 

स्वयंपाकघरामधून येणाऱ्या खमंग वासामुळे भूक खवळली होती. थोड्याच वेळात जेवणाचा बुफे मांडला गेला. पोळी, भात, दाल फ्राय, रस्सम, सांबर, अवियळ, बीन्सची ओले खोबरे घातलेली भाजी, दह्यातली कोशिंबीर, तळलेले पापड, लोणचे असा अगदी फक्कड बेत होता. मांसाहारी लोकांसाठी करीमीन या जातीचे मासे, गरम-गरम तळून वाढले जात होते. सर्व पदार्थांची चव अगदी वेगळी आणि चटकदार होती. जेवणानंतर, वेलदोड्याची पूड घातलेली शेवयाची खीर, 'पायसम', आली. त्यामध्ये थोडा साबुदाणा आणि तुपात खमंग तळलेले काजूही घातले होते. आजूबाजूची सुखद निळाई बघत, गप्पा-गोष्टी करत अगदी निवांतपणे भरपेट जेवण झाले. त्या सगळ्या वातावरणामुळे, अनंत काळासाठी या बोटीवर राहावे, असे वाटू लागले होते. पण आम्हाला पुढील मुक्कामी, म्हणजे कण्णूरला पोहोचायचे होते. साधारण चारच्या सुमारास गरमागरम चहा पिऊन आणि त्याबरोबर आलेल्या केळ्याच्या भज्यांची चव घेऊन आम्ही कण्णूरकडे निघालो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी बेकलचा किल्ला पाहायला निघून गेले. 

केरळच्या दक्षिण भागातील अलेप्पी, कोची आणि कोल्लम भागामधील बॅकवॉटर्स आणि तिथल्या हाऊसबोटस खूप प्रसिद्ध आहेत. त्या मानाने, नीलेश्वर बॅकवॉटर्स अजून फारशा पर्यटकांना माहीत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची  विशेष गर्दी नव्हती. या अतिशय शांत, रम्य ठिकाणच्या बॅकवॉटरवरच्या नौकाविहाराचा अनुभव मला फार आवडला.   

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

४. मलाबारची सफर- 'अनंतपद्मनाभस्वामी' - 'आनंदाश्रम'

 

शनिवार दिनांक १३ ऑगस्टला सकाळी पाऊणे सात-सात वाजता रूमवर चहा आल्यामुळे जाग आली. तोपर्यंत मला बरेचसे बरे वाटायला लागले होते. बेकल किल्ल्यावरच्या सुसाट वाऱ्याबरोबर माझा ताप कुठल्याकुठे उडून गेला असावा. सकाळी नऊ वाजेपर्यंत सामानसुमान बांधून आम्हाला खोली सोडायची होती. त्या दिवशी सकाळी  नाश्ता झाल्यावर आम्हाला 'अनंतपद्मनाभस्वामी' हे विष्णूचे देऊळ बघायला जायचे होते. आमच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे या देवळात आम्ही १२ ऑगस्टला सकाळी जेवणाच्या आधी जाणार होतो. पण मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे विमान थोडे उशिरा पोचल्यामुळे १३ ऑगस्टच्या सकाळी देऊळ बघायचे ठरले होते. 

हॉटेलच्या बुफे नाश्त्यामध्ये इडली-वडा, सांबर, चटणी, पुरी-भाजी, उत्तप्पे, कॉर्नफ्लेक्स, चॉकोज, असे अनेक पदार्थ व चहा-कॉफी होती. सिटी टॉवर्स हॉटेलमधील जेवण उत्तम होते. पण त्या मानाने नाश्त्यातील पदार्थांची चव काही खास नव्हती. एकीकडे आमचा सगळ्यांचा नाश्ता होत असताना बसचालक श्यामने आमचे सामान गाडीच्या टपावर बांधून ठेवले होते. त्यामुळे नाश्ता उरकून आम्ही लगेच 'सिटी टॉवर्स' हे हॉटेल सोडले. 'अनंतपद्मनाभस्वामी' देवस्थान बघण्यासाठी गाडी परत मंगळुरूच्या दिशेने निघाली. जाताना निलेश राजाध्यक्ष यांनी आम्हाला या देवस्थानाबद्दल माहिती सांगितली. 

अनंतपूर गावामध्ये असलेले, हे केरळमधले एकमेव तळ्यातले देऊळ आहे. तिरुअनंतपूर या केरळच्या राजधानीमधले 'अनंतपद्मनाभस्वामी' देवस्थान सुप्रसिद्ध आहे. त्या 'अनंतपद्मनाभस्वामींचे' मूळ स्थान पूर्वी अनंतपूरच्या देवळात होते, अशी एक आख्यायिका आहे.  अनंतपूर देवळातील तळ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गुहेतून बाहेर निघणाऱ्या गुप्तमार्गाने, 'अनंतपद्मनाभस्वामी' आपले मूळ स्थान सोडून तिरुअनंतपूरला निघून गेले, अशीही एक आख्यायिका आहे. 

तिरुअनंतपूरचे देवस्थान अतिशय श्रीमंत देवस्थान आहे असे मी ऐकून आहे. परंतु, 'अनंतपद्मनाभस्वामींच्या' मूळ देवस्थानात मात्र श्रीमंतीचा भपका अजिबात जाणवला नाही. तेथे भाविकांची गर्दीही फार नव्हती. "पैशाकडे पैसा जातो" असे अगदी सहजी बोलले जाते. इतर भौतिक गोष्टींच्या बाबतीत हे सूत्र नक्कीच लागू पडत असेल. पण, तथाकथित 'श्रीमंत' देवस्थानांच्या बाबतीतही हेच सूत्र लागू पडते की काय, असे मला यापूर्वीही अनेकदा वाटून गेले आहे. तोच विचार पुन्हा मनात येऊन थोडे उदास वाटले. परंतु, मनःशांतीची जी 'श्रीमंती' अनंतपूरच्या या देवालयात मी अनुभवली, त्याने माझ्या मनावरचे मळभ क्षणभरातच दूर होऊन गेले. 

पंधरा-वीस पायऱ्या उतरून तळ्यापर्यंत गेल्यावर देवळात जाण्याची वाट आहे. पुरुषमंडळींना आपापल्या अंगातले सदरे काढून ठेऊन, उघड्या अंगाने दर्शन घ्यावे लागले. पुजाऱ्याने आम्हाला या देवळाबद्दल आणि विष्णूच्या मूर्तीबद्दलच्या अनेक आख्यायिका सांगितल्या. सध्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती पंचधातूंपासून बनवलेली आहे. पण मूळ मूर्ती,  'कडू-शर्करा-योगम्' अशा अनेक औषधी घटकांपासून तयार केलेली होती. इथल्या मूर्तीपासून परावर्तित होणारे किरण, पुरुषांच्या उघड्या छातीमधून आणि स्त्रियांच्या कुंकवामधून शरीरात प्रवेश करून ऊर्जा देतात, असेही आम्हाला सांगितले गेले. 

तळ्यामध्ये अनेक मासे आणि एक मगर आहे. ती मगर ठराविक वेळी देवळाजवळ येऊन प्रसाद ग्रहण करते, पण मासे खात नाही, असेही आम्हाला सांगितले गेले. त्या मगरीचे दर्शन मिळणे मोठे भाग्याचे समजले जाते. आम्ही देवळामध्ये पोहोचलो त्या वेळी मगरीच्या प्रसादग्रहणाची वेळ नव्हती. देवळाच्या उजव्या बाजूला गेल्यावर कुठेतरी मगर दिसू शकेल असे पुजाऱ्याने सांगितल्यामुळे आमच्या बरोबरचे काहीजण तिकडे गेले. पण बऱ्याच वेळानंतर, 'मगर तुम न आये ... ' असे म्हणत ते सगळे परतले.

देवदर्शन झाल्यानंतर आम्ही कन्हानगड येथील एका छोट्या टेकाडावर, वसलेल्या 'आनंदाश्रम' येथे गेलो. आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून उतरलो, आणि आश्चर्य म्हणजे, आमचे स्वागत करायला, मुंबईमधील सुप्रसिद्ध वकील व माजी न्यायाधीश, श्री. शेखर जहागीरदार, त्यांच्या पत्नी सौ. निशिगंधा जहागीरदार, माझा भाऊ गिरीश आणि वहिनी सौ. प्राची, असे चौघेजण उभे होते. त्या चौघांना बघून आनंदाश्रमात शिरायच्या आधीच आम्हाला खूप आनंद मिळाला.  

कन्हानगड येथेच जन्मलेले श्री. विठ्ठल राव यांनी १९२० मध्ये, वयाच्या छत्तिसाव्या वर्षी संन्यास घेऊन स्वामी रामदास हे नाव धारण केले. श्री. रामदास स्वामींनी १९३१ साली आनंदाश्रमची स्थापना केली. आश्रमात शिरल्यावर उजव्या हाताच्या दालनामध्ये स्वामी रामदास याचे जीवन, त्यांचे विचार आणि कार्य याबद्दल माहिती देणारे फोटो आणि लेख मांडून ठेवलेले होते. त्यांच्याबद्दलचा एक माहितीपटही आम्हाला दाखवला गेला. 'सर्व प्राणीमात्रांमध्ये देवत्व आहे असे समजून त्यांची सेवा करावी', या विचाराचा आणि 'वैश्विक प्रेम' या तत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. जीवनामध्ये आदर्श आचरण कसे असावे याबाबत स्वामींनी भाष्य केलेले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपापला व्यवसाय सचोटीने करून, जमेल तेवढी प्राणिमात्रांची सेवा केल्यास, त्याच्या हातून खरी ईशसेवा घडते अशी काहीशी स्वामीजींची शिकवण होती. 

सध्या आश्रमाचे काम पाहणारे एक वरिष्ठ स्वामीजी एका खोलीमध्ये बसलेले होते. त्यांनीही रामदास स्वामींच्या विचारधारेची महती आम्हाला समजावून सांगितली. पण नेमके त्याचवेळी मला थोडा खोकला आल्यामुळे मी खोलीच्या बाहेर आले. पाठोपाठ मला एक फोन आल्यामुळे मी पुन्हा आत जाऊ शकले नाही. त्यामुळे इतर सर्वांना क्रीम बिस्किटांचा पुडा आणि वेलची केळी असा प्रसाद मिळाला, जो मला मात्र मिळाला नाही! पण सौ. प्राचीने मला प्रसाद आणून दिला. त्या क्रीम बिस्किटांची चव विशेष चांगली होती.   

विशेष म्हणजे 'आनंदाश्रमात' सर्व जाती-धर्माच्या लोकांना विनामूल्य प्रवेश आहे. 'आमची इतरत्र कुठेही शाखा नाही' असे पुण्यामध्ये मला सुपरिचित असलेले वाक्य इथेही ऐकायला मिळाले. पण त्यामध्ये मार्दव होते. या स्थळाचे पावित्र्य, शांतता आणि भारलेले वातावरण मी इतरत्र फारसे अनुभवले नव्हते. त्यामुळे त्यांची कोठेही शाखा नसणे हे मला स्वाभाविकच वाटले. या आश्रमाला कुठल्याही प्रकारचे बाजारू स्वरूप आलेले नसल्यामुळे तेथे गेल्यावर मन खरोखरच प्रसन्न झाले. आनंदाश्रमामध्ये जरा उंचावर चढून गेल्यावर, ध्यानधारणेसाठी एक खोली आहे. माझे पाय दुखत असल्यामुळे तिथे मात्र मी गेले नाही. पण बाहेरच्या एका झाडाखालच्या कट्ट्यावर आडवे पडून मी काही मिनिटे ध्यानधारणा करू शकले! 

गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी १२ तारखेला संध्याकाळच्या विमानाने कण्णूर येथे येऊन पोहोचले होते. अनुभव ट्रॅव्हल्सनेच त्यांची सगळी व्यवस्था केली होती. एका इनोव्हा कारमधून ते कण्णूरहून उत्तरेला प्रवास करून आनंदाश्रम येथे आलेले होते. आनंदाश्रम सोडताना आम्ही दादांची रवानगी इनोव्हा मध्ये केली, आणि श्री. शेखर व सौ. निशिताई जहागीरदार आम्हा इतरांबरोबर टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आले. हसत-खेळत आम्ही नीलेश्वर बॅकवॉटरचा रस्ता पकडला.  

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

३. मलाबारची सफर- बेकलचा किल्ला


कासारगोडमधील सिटी टॉवर्स हॉटेलच्या खोल्या तशा टिचक्या होत्या पण अगदी स्वच्छ आणि नेटक्या होत्या. वामकुक्षी घेऊन ताजेतवाने झालेले सर्व प्रवासी साडेचारच्या सुमारास तळमजल्यावरच्या रेस्टोरंटमध्ये जमलो. चहा प्यायल्यानंतर  सर्वांना अजूनच तरतरी आली. त्यानंतर आम्ही सगळेजण बेकल किल्ला बघायला गाडीमधून निघालो. आमच्या हॉटेलपासून किल्ला साधारण १६-१७ किलोमीटर अंतरावर होता. सुमारे अर्धातास प्रवास केल्यानंतर आम्ही बेकल किल्ल्यापाशी पोहोचलो. 

बेकलचा किल्ला हा केरळमधील सर्वांत मोठा आणि अत्यंत महत्वाचा सागरी किल्ला आहे. फार पुरातन काळापासून मलबार किनारपट्टीमधे बेकल हे महत्त्वाचे बंदर होते. तिथे पूर्वी कोळाथरी राजवटीने बांधलेला एक साधा किल्ला होता, असे म्हटले जाते. पण आत्ताचा हा दणकट किल्ला, शिवाप्पा नायक या राजाने १६५० साली बांधला. १७६३ साली हा किल्ला मैसूरचा सुलतान हैदर अली याने जिंकला. हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान याने बेकलच्या किल्ल्यामध्ये तळ ठोकून मलबार पट्टी काबीज केली. पुढे बरीच वर्षे हा किल्ला टिपू सुलतान याची अत्यंत महत्वाची सैन्यछावणी होती. १७९९ साली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या युद्धामध्ये टिपू सुलतान मारला गेला. त्यानंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यातच राहिला. या ऐतिहासिक महत्वापेक्षाही बेकल किल्ल्याचे महत्व अलीकडच्या काळात एका वेगळ्याच कारणामुळे वाढलेले आहे. दिग्दर्शक मणिरत्नम याच्या 'बॉंबे' या सिनेमातील 'तू ही रे, तेरे बिना मैं कैसे जिऊं...' या सुमधूर गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण, या किल्ल्यामध्ये झाले आहे. बेकल किल्ल्यावरचे आमचे फोटो मित्र-मैत्रिणींना आणि मुलांना पाठवल्यावर, त्यांच्याकडून ही माहिती मला कळली.     

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराभोवती खंदक आहे, आणि बाकी तिन्ही बाजूने तो अरबी समुद्राने वेढलेला आहे. नागमोडी वळण घेत आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश करावा लागतो. चाळीस एकरवर पसरलेला हा किल्ला जवळजवळ समुद्रात घुसलेला आहे असेच वाटते. आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास किल्ल्याच्या आत पोहोचलो. ऊन उतरलेले असल्याने, तिथले वातावरण आल्हाददायक होते. आम्ही भर पावसाळ्यात तिथे गेलेलो असूनही आम्हाला पाऊस लागला नव्हता, पण मान्सूनमधले समुद्री वारे भरभिरत होते. हवेमध्ये ओलसर गारवा होता. किल्ल्याच्या आत सगळीकडे हिरवाई होती. त्यात भर म्हणून, अनेक मोर डौलदार चालीत इकडे-तिकडे फिरत होते, झाडा-झुडुपांवरून उड्या मारत होते. तिथल्या हिरवाईमुळे, केकावलीमुळे, समुद्राच्या लाटांच्या गाजेमुळे आणि तुफान वाऱ्यामुळे  वातावरणांत एकप्रकारची धुंदी आली होती. 

आमचे दादा आता नव्वदीला आलेले असले तरीही छान चालते-फिरते आहेत. पण इतर सर्वांच्या बरोबरीने खूप लांबवर चालायला त्यांना जरा त्रासाचे होते. सहलीमध्ये त्यांना सगळ्यांच्या बरोबर राहता यावे या दृष्टीने, आम्ही अशा प्रवासात त्यांच्यासाठी व्हीलचेयर बरोबर ठेवतो. बेकल किल्ल्यामध्ये आत बरेच चालायचे होते. तिथे आम्ही दादांना व्हीलचेयरवरून हिंडवले. किल्ल्यामध्ये दोन-तीन उंच टेहळणी बुरुज आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या टेहळणी बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या नाहीत तर अगदी खडी चढण आहे. दादांना व्हिलचेयरवर बसवून, त्या चढणीवरून ढकलत वर नेणे, त्यांना आणि आम्हालाही त्रासाचे झाले असते. त्यामुळे त्या बुरुजाच्या पायथ्याशी व्हीलचेयर वरून दादांना उतरवले. त्यानंतर एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा उत्साहात आणि वेगाने दादा एका दमात तो बुरुज चढून वर आले. त्यामुळे आमच्याबरोबर आलेल्या सर्वानाच आश्चर्याचा धक्काच बसला! 


त्या टेहळणी बुरुजावरून किल्ल्यातील सर्व भाग, ३६० कोनातला आसपासचा रम्य परिसर आणि बेकलची किनारपट्टी दिसत होती. सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, आणि हल्ला झालाच तर त्यापासून प्रभावीपणे किल्ल्याचा बचाव करण्यासाठी, तटबंदीबर अनेक झरोके आहेत. त्या झरोक्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना अतिशय कल्पकतेने केलेली आहे. वेगवेगळ्या आकारांचे हे झरोके तटबंदीवर वेगवेगळ्या उंचीवर, आणि वेगवेगळ्या कोनांमध्ये आहेत. किल्ल्यापासून कमी-जास्त अंतरावर असलेल्या शत्रूच्या नौकांना टिपण्यासाठी नेमक्या कोनातून तोफांचा मारा करता यावा यासाठी झरोक्यांचा वापर केला जात असे. दारुगोळा साठवण्यासाठी किल्ल्याच्या आत एक भलेमोठे कोठारही आहे. पण ते सध्या बंद आहे. किल्ल्यामध्ये असलेली दोन भुयारे  किनारपट्टीवर उघडतात. पण ते भुयारी मार्ग सध्या बंद करून ठेवलेले आहेत. किल्ल्याच्या आत एक भलीमोठी विहीर आहे. किल्ल्यामधून खाली किनारपट्टीकडे जायला एक चांगली दगडी पायवाट आहे. 

बेकल किल्ला पाहून आल्यावर आम्ही सर्व सहप्रवासी 

किल्ला बघून परतताना आम्ही बेकल बीच वर न जाता, वाटेतल्या एका छोट्या पुळणीवर थांबलो. दादाही मोठ्या उत्साहाने तिथे उतरले. संध्याकाळी हॉटेलवर परत येईपर्यंत आम्ही बरेच दमलेले होतो. आम्ही पुण्याहून निघण्यापूर्वी जयंताने, माझ्या मोठ्या भावाने, अगदी प्रेमाने  आनंदला, 'One for the road' असे म्हणत,  'Malibu Rum' ची एक छोटी बाटली दिली होती. दादांनी आणि आनंदने त्याचा आस्वाद घेतला. इतर दर्दी मंडळींनी, हॉटेलबाहेर जाऊन श्रमपरिहारासाठी पेय विकत आणले ही माहिती आम्हाला जेवताना मिळाली. गप्पा मारत निवांतपणे जेवण झाले. त्यावेळीच प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली. दुपारचे जेवण उशिरा झालेले असल्याने मी जेवले नाही. पण जेवणानंतर आलेल्या फालुद्याची चव बघितली. ती गोड चव जिभेवर आणि दिवसभरातील गोड आठवणी मनांमध्ये घोळवत मी निद्राधीन झाले.  


शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

२. मलाबारची सफर- कासारगोड

 

आम्ही मंगळुरुला ११ तारखेला दुपारी पोहोचलो होतो. 'अनुभव ट्रॅव्हल्सचे' निलेश राजाध्यक्ष आणि सुमंत पेडणेकर हे दोन प्रतिनिधीही ११ तारखेला संध्याकाळी आमच्याच हॉटेलमध्ये डेरेदाखल झाले. रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्हाला भेटून त्यांनी आमची अगदी आस्थेने विचारपूस केली. तसेच, दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे १२ ऑगस्टचा कार्यक्रम काय असणार आहे याची कल्पना आम्हाला दिली. १२ ऑगस्टला  सकाळी ११ वाजेपर्यंत सामान-सुमान बांधून आम्ही तयार राहावे, असे त्यांनी आम्हाला सांगितले. 'अनुभव ट्रॅव्हल्स'ची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मुंबईहून येणाऱ्या सहप्रवाशांना विमानतळावरून घेऊन, त्यानंतर पद्मश्री हॉटेलमधून आम्हा तिघांना घेऊन पुढे कासारगोडकडे जाईल, असेही सांगितले. 

१२ ऑगस्टला सकाळी अजूनही  माझ्या अंगात ताप होताच. तरीही, मला सकाळी  नेहमीसारखी अगदी व्यवस्थित  भूक लागली होती. मला एक महिन्यापूर्वीच दुसऱ्यांदा (त्या आधी दीड वर्षापूर्वी पहिल्यांदा) कोव्हिड होऊन गेला होता. पण त्यावेळीही कधी भूक काही कमी झाली नव्हती! कोव्हिड झाल्यावर भीती वाटण्याच्या ऐवजी आता या निमित्ताने का होईना आपले वजन थोडेफार कमी होईल की काय, असा विचार मनाला सुखावह वाटला होता. पण कसले काय, त्याही वेळी भूक लागतच होती. एकीकडे आहार तसाच राहिला पण  रोजचा व्यायाम मात्र कमी झाला. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम अंगावर दिसू लागला होता. तरीही खादाडीचे व्यसन सुटण्याची शक्यता नव्हती!

'पद्मश्री' हॉटेलच्या खालच्या मजल्यावर 'पद्मश्री रेस्टॉरंट' होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिथे नाश्ता करायला गेलो. आम्ही तिघांनी मसाला डोसा, इडली-वडा आणि मुख्य म्हणजे मंगळुरुचे सुप्रसिद्ध बन्स व त्यानंतर फिल्टर कॉफी, असा भरपेट नाश्ता केला. पण त्यातल्या कुठल्याही पदार्थाला स्पर्श करण्याच्या आधी, त्यांचे वेगवेगळ्या बाजूंनी फोटो काढले. ते फोटो मित्र-मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या व्हाट्सएप् ग्रुप्सवर पाठवले. खरंतर पदार्थाचे असे फोटो काढून ते वेगवेगळ्या ग्रुपवर पाठवण्याचा आनंद जास्त असतो, की त्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद जास्त असतो, हे ठरवणे  हल्ली अवघड होऊन गेले आहे! फोटोमधे ते पदार्थ अगदी मोहक दिसत असले तरी त्यांची चव तशी बेताचीच होती. पण हलक्या गोडसर चवीचे, भटुऱ्यासारखी आतून छानशी जाळी असलेले, 'मंगळुरु बन्स' मात्र मला आवडले. 


सकाळी अंघोळी करून, निवांतपणे नाश्ता खाऊन व सामानसुमान बांधून ११ वाजेपर्यंत आम्ही तयार होतो. पण मुंबईहून मंगळुरुला  येणारे विमान जरा उशिरा आले. त्यामुळे आमच्या सहप्रवाशांना घेऊन येणारी गाडी पद्मश्री हॉटेलला जरा उशीरानेच पोहोचली. शेवटी साधारण दुपारी १२च्या सुमारास आम्ही आमच्या सामानासह गाडीत चढलो आणि तिथून आमच्या 'Malabar Coast-a drift experience'  या सहलीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.  

आम्ही एकूण दहाजण या सहलीमध्ये सहभागी झालो होतो. सोनम-शुभेन्दू साहनी, हे तिशीतले जोडपे, श्री. प्रफुल्ल व सौ. स्नेहल पेंडसे, श्री. अशोक व सौ. अस्मिता म्हात्रे, कु. वृंदा जोशी आणि आम्ही तिघे. आधी WhatsApp ग्रूप तयार केलेला असल्याने, सहप्रवाशांची नावे माहिती होतीच. आम्ही गाडीमध्ये बसल्यावर सगळ्यांशी जुजबी तोंडओळखही झाली. टेम्पो ट्रॅव्हलर गाडी वातानुकूलित होती. बस चालक श्याम गाडी सावधानीने चालवत होता. तासभर प्रवास केल्यावर आम्ही कासारगोडच्या 'सिटी टॉवर्स' या हॉटेलमध्ये पोहोचलो. 

अनुभव ट्रॅव्हल्सच्या गाडीला कर्नाटकातून केरळमध्ये शिरण्यापूर्वी एक परवाना काढावा लागला. त्यामुळे वाटेत एके ठिकाणी थोडावेळ थांबावे लागले. त्यावेळी आता आपण कर्नाटकमधून आता केरळमधे शिरणार आहोत हे कळले. नाहीतर स्थानिक भाषेतील पाट्यांवरून आम्हाला काही बोध होणे शक्यच नव्हते. त्या पाट्यांवरच्या अक्षररूपी जिलब्यांचे वळण थोडेफार बदललेले आहे, इतकेच काय ते कळत होते. पण ते सगळे लिखाण अगम्य होते. नाही म्हणायला काही ठिकाणी इंग्रजीमधून पाट्या होत्या. त्यामुळे वाटेत लागणाऱ्या गावांची नावे वाचता येत होती. 
 
'सिटी टॉवर्स' या हॉटेलच्या तळमजल्यावरच्या रेस्टोरंटमध्ये आमच्या ग्रुपसाठी जेवणाची खास वेगळी सोय केली होती. जेवणामध्ये चमचमीत व चविष्ट शाकाहारी आणि सामिष पदार्थांची रेलचेल होती. अनुभव ट्रॅव्हल्सच्या सहलीमध्ये जेवण-खाण्याची बरीच चंगळ असते, हे ऐकून होतेच. कासारगोडपासूनच तो अनुभव सुरु झाला. श्री निलेश राजाध्यक्ष कुणाला काय हवे-नको आहे याची जातीने चौकशी करत होते. आम्हाला आग्रह करकरून जेवण वाढतही होते. दादांना चावायला सोपे पडावे म्हणून, नीलेश राजाध्यक्ष यांनी गरमागरम मलाबार पराठा मागवला. आम्ही इतरांनीही ते लुसलुशीत, लच्छेदार पराठे चवीने खाल्ले. फ्राईड चिकन, मटार-पनीर, चमचमीत चिकन रस्सा, डाळ फ्राय, मिक्स भाजी, जिरा राईस, सलाड, वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्या आणि त्यानंतर दुधी हलवा असे रुचकर जेवण झाले. तासाभराच्या विश्रांतीनंतर साडेचारच्या सुमारास चहा घेऊन बेकल किल्ला बघायला बाहेर पडायचे आहे, असे निलेश यांनी आम्हा सर्वांना सांगितले. सगळेच दमलेले असल्यामुळे, तडक आपापल्या खोलीत जाऊन सगळ्यांनी ताणून दिली. 




गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

१. मलाबारची सफर- मंगळुरु

मंगळुरु बद्दल मला फक्त 'मंगळुरी कौले', इतकेच काय ते ऐकून माहिती होते. पण प्रत्यक्षात मंगळुरुला जाण्याचा कधी योग येईल असे वाटले नव्हते. या वर्षी ऑगस्ट महिन्यात, जोडून सुट्ट्या येत आहेत तर आपण सगळे मिळून, दादांना घेऊन कुठेतरी प्रवासाला जाऊया, अशी टूम देवाशिषने, म्हणजे माझ्या भाच्याने काढली. मग इथे जाऊया का तिथे जाऊया? असे करता करता त्याची गाडी, 'सध्या कुठेच नको. दिवाळीच्या सुट्टीत जाऊया' इथपर्यंत येऊन थांबली. प्रवासाला जायला मी आणि आनंद तर खुश होतोच, पण दादाही उत्सुक होते. आता त्या बेतावर पाणी पडणार, या कल्पनेने दादा हिरमुसले झाले. मी आणि आनंदने जवळपासच्या अनेक रिसॉर्टस्  मधे जागा मिळते आहे का याबाबत फोनवर चौकशी केली. पण लागून सुट्ट्या आलेल्या असल्याने कुठेही जागा उपलब्ध नव्हती. 

मागे ज्योत्स्नाकडून, म्हणजे माझ्या चुलत बहिणीकडून 'अनुभव ट्रॅव्हल्सच्या'  'कोस्टल कर्नाटक' सहली बद्दल, बरेच कौतुक ऐकले होते. ते आठवल्यामुळे मी 'अनुभव  ट्रॅव्हल्सच्या' पुणे ऑफिसला फोन करून त्यांची एखादी सहल जाणार आहे का? याची चौकशी केली. नेमके आम्हाला हव्या त्या दिवसातली 'मलाबार कोस्ट' ची त्यांची सहल निघणार होती आणि त्यात पाच जागाही शिल्लक होत्या. त्या चार दिवसांच्या सहलीची कार्यक्रम पत्रिका WhatsApp वर मागवून घेतली. दादांनी मलाबार किनारपट्टी आधी बघितलेली नव्हती. त्यांना या सहलीची रूपरेषा आवडली. त्यामुळे आम्ही लगेच पैसे भरून सहलीला जायचे निश्चित करून टाकले. आमच्या व्याह्यांना आणि विहीणबाईंना, म्हणजे डॉ राजेंद्र देवपूरकर सरांना आणि सौ. संध्याताईंना आमच्याबरोबर येण्याचा आग्रह केला. पण ते येऊ शकले नाहीत.  

१२ ऑगस्टच्या सकाळपासून मंगळुरु एयरपोर्टवरून चालू होऊन, मलाबार किनारपट्टीवरून दक्षिणेला प्रयाण करत सोळा ऑगस्टला सकाळी ती सहल कोळीकोडला संपणार होती. दादांना तो प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आम्ही एक दिवस आधी, म्हणजे ११ ऑगस्टला मंगळुरुला पोहोचायचे आणि १६ ऑगस्टनंतर एक दिवस कोळीकोड येथे थांबून मगच परतायचे असे ठरवले. त्याप्रमाणे जाताना मुंबई-मंगळुरु व परतीचे कोळीकोड-मुंबई अशी विमानाची तिकीटे हातोहात काढून टाकली. 

१० ऑगस्टला दिवसभराची सगळी कामे संपवून रात्रीपर्यंत आम्ही टॅक्सी करून मुंबईला गिरीश-प्राचीकडे मुक्कामाला पोहोचलो. रात्री सगळ्यांना उकडीचे मोदक करून घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून, विमान सुटायच्या वेळेच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचलो आणि सामान चेक-इन करून निश्चिंत झालो.  शाळेत माझ्या मागे एक वर्ष असलेली 'अर्जुन पुरस्कार विजेती' वंदना शानभाग मंगळुरुला आहे असे कळले होते. तिच्याशी संपर्क साधला, पण नेमकी त्यावेळी ती चिकमगळूरला गेलेली असल्याचे कळले. 

आमच्याबरोबर गिरीश आणि प्राचीही येऊ इच्छितात असे आदल्या रात्री कळले होते. पण रात्री 'अनुभव ट्रॅव्हल्स' शी बोलणे होऊ शकले नाही. सकाळी मुंबई विमानतळावरून मी त्यांच्याशी संपर्क साधला. पण इतक्या ऐनवेळी नवीन प्रवाशांना घेणे शक्य नाही असे उत्तर मिळाले. त्यामुळे जरा वाईट वाटले. 

मुंबई-मंगळुरु विमान प्रवास अगदी अल्लद झाला. मंगळुरु विमानतळ अगदी स्वच्छ आहे. जागोजागी  कलात्मक सजावट केलेली आहे. विमानतळावरून टॅक्सी करून हॉटेलमध्ये येताना, वाटेवर फळे विकत घ्यायला एका दुकानात थांबले. पूर्वी कधीही न बघितलेले, एक लालभडक्क रंगाचे काटेरी फळ मला तिथे दिसले. जेवण करून, फलाहार केला आणि थोडी वामकुक्षी घेतली. संध्याकाळी असिलताशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्या फळाचे नाव, 'राम्बुतान' आहे असे कळले. ती फळे फारच मधुर आणि रसाळ होती. 

सकाळपासून मला जरा बरे वाटत नव्हते. दुपारी मात्र चांगलाच ताप भरला. आता हा ताप सहलभर मला 'ताप' देणार की काय, हा विचार मनाला अस्वस्थ करत होता. 

मंगळुरु विमानतळ 


लालभडक्क राम्बुतान !