गुरुवार, १७ मार्च, २०२२

उधळण रंगांची...

या वर्षीच्या होळीच्या सुमारास 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे, समाजमाध्यमांमध्ये अनेक रंगांची उधळण चालू आहे. 

१९८० च्या दशकात काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास असलेल्या हिंदूंच्या अमानुष नरसंहाराचे विदारक चित्रण 'काश्मीर फाईल्स' सिनेमामध्ये केले आहे. दाखवलेल्या सगळ्या घटना सत्य आहेत. पण त्या एकाच कुटुंबातील व्यक्तींवर आणि एका ठराविक काळात घडल्या आहेत असे नाही. पूर्ण सिनेमा व त्यातील प्रसंग 'रक्तरंजित' आहेत. त्या घटनांचा आणि त्या दृश्यांच्या लाल रंगाने आपल्या मनांत काळे ढग निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. 

आपण हा सिनेमा बघायचा नाही, असा निश्चय काहीं लोकांनी केलेला आहे. काहींनी त्यापुढे जाऊन, तो इतरांनीही सिनेमागृहात जाऊन पाहू नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण अनेक जण स्वतः सिनेमा बघत तर आहेतच पण इतरांनाही सिनेमा पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. सिनेमा पाहून आलेल्या लोकांच्या मनांमध्ये मात्र, जातीधर्मातील तेढीच्या अनेक छटा दिसत आहेत.

कश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून काश्मीरी हिंदूंचा छळ, त्यांचे धर्मांतर आणि स्त्रियांची अब्रू लुटणे हा प्रकार चालत होता. पण या कारवायांना १९८० च्या दशकात ऊत आला. त्या काळात अल्पसंख्याक, निःशस्त्र काश्मिरी हिंदूंना कमलीची दहशत बसवून  त्यांचे हत्याकांड केले गेले. हे सत्य या सिनेमात दाखवले गेले आहे. 

पण, "असा काही नरसंहार घडला हेच मुळी खोटे आहे", असे सांगणारे काहीजण आहेत. अशा लोकांमध्ये मुख्यत्वे, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा धारण करणाऱ्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा आहे. देशाचे तुकडे करण्याची घोषणाबाजी करणाऱ्या 'आझादी गँग'चा मुखवटा या सिनेमाने फाडून काढला आहे. त्यामुळे, मुखवट्यामागचे त्यांचे  रंग उडालेले चेहरे समोर आलेले आहेत. इतर सगळ्या धर्मांतील लोकांच्या छळाचे भांडवल करून गळे काढणाऱ्या या 'धर्मनिरपेक्ष' लोकांना, हिंदूंचा झालेला छळ अमान्य करणे सोयीचे वाटते आहे. 

बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांचे शोषण किंवा हत्या होणे हे निंदनीयच आहे. अर्थात, काश्मीरमध्ये अल्पसंख्याक पंडितांवर झालेले अत्याचार निंदनीय असलेच पाहिजेत. पण एकंदरीत काश्मीरबाबतच्या तोकड्या ज्ञानामुळे, एक मोठाच गैरसमज भारतीय समाजात पसरलेला आहे. 

काश्मिरी पंडित म्हणजे केवळ ब्राह्मणसमुदाय आहे असे अनेकजण समजतात. प्रत्यक्षात, काश्मिरी हिंदूंमध्ये अधिकांश लोक जरी ब्राह्मण असले तरी, 'कारकून', 'वाणी' अशा इतर जातींचे लोकही आहेत. त्यांच्यावरही अत्याचार झालेच आहेत आणि त्यांनाही जिवाच्या भीतीने काश्मीर सोडून पळावेच लागले आहे. प्रत्यक्षात, 'पंडित' हा शब्द काश्मीरमध्ये 'हिंदू' या शब्दाचा समानार्थी शब्दच म्हणावा लागेल. दहशतवादामुळे हिंदूंना जसे काश्मीर खोरे सोडावे लागले तसेच अनेक शीख कुटुंबियांनाही सोडावे लागले हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे.   

पण हे सत्य समजून न घेता, सिनेमात दाखवलेल्या सत्य घटनांना काही लोक जातीय रंग देत आहेत. "या चित्रपटात ब्राह्मणांवरील अत्याचारांचे विनाकारण उदात्तीकरण केले आहे", अशी मुक्ताफळे उधळणारेही काही आहेत. त्याही पुढे जाऊन, "ब्राह्मणांची जातच भेकड. आम्ही असतो तर शर्थीने लढलो असतो आणि शेजारचा देशही काबीज केला असता" अशा फुशारक्या मारणारेही अनेक आहेत. हे दोन्ही प्रकारचे लोक, त्यांच्या मनातल्या काळ्या रंगाच्या छटांचे दर्शन घडवत आहेत. 

काश्मिर खोऱ्यामध्ये काही शतकांपूर्वी, दहशतीच्या जोरावर मुस्लिमांनी हिंदूंचे धर्मांतर केले. धर्मांतर न करणाऱ्या हिंदूच्या हत्या केल्या. अशा प्रकारे हिंदूंना जीवाची भीती घालून भगव्या रंगाचे उच्चाटण करण्यात आले. तसाच प्रकार १९८८ सालापासून पुढे घडू लागला. त्या काळातले सत्य 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा आपल्यापुढे अत्यंत प्रभावीपणे मांडतो. त्यामुळे न्याय्यनिष्ठ आणि संवेदनशील वृत्तीच्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वाईट वाटते. 

परंतु, ते सत्य पाहिल्यावर भडकून जाऊन, "संपूर्ण देशातून हिरव्या रंगाचे पूर्णपणे उच्चाटण केले पाहिजे", अशी दुसऱ्या टोकाची भूमिका घेणारे महाभागदेखील आहेत. ही भूमिका देशहिताच्या दृष्टीने वाईट आहेच पण ती तर्कसंगतही नाही. कारण, आपल्या धर्मनिरपेक्ष देशात रक्तपाताचा लाल रंग वगळता, इतर कुठल्याही एका रंगाचे उच्चाटण करणे, हे आपले ध्येय असूच शकत नाही.

आपल्या राष्ट्रध्वजातील सर्व रंगांना एकत्र ठेवणे, आणि आपल्या देशाच्या खऱ्या शत्रूंना ओळखून त्यांना नेस्तनाबूत करणे, हेच ध्येय आपण सर्वांनी मनात ठेवले पाहिजे. 

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!








सोमवार, ७ मार्च, २०२२

मी तर घरीच असते!

अलीकडेच कुठल्याशा समारंभात एका मध्यमवयीन बाईंशी माझी कोणीतरी ओळख करून दिली. त्यांचा नवरा उच्च्पदस्थ अधिकारी होता. बोलताना सहजच  मी त्या बाईंना विचारले,
"तुम्ही काय करता?"
अगदी कसनुसं हसून त्या म्हणाल्या,
"तशी मी डबल ग्रॅज्युएट झालेली आहे. पण मी घरीच असते."

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि बोलण्याचा सूर, त्यांच्यातला न्यूनगंड दर्शवत होते. त्या बाईंशी बोलत असतानाच मला सौ. सिन्हा आठवल्या. 

पंधरा-सोळा वर्षांपूर्वी आनंदचे पोस्टिंग दिल्लीला होते. मुलांना घेऊन मी पुण्यातच राहत होते. असिलताने, आमच्या मुलीने, नुकतेच भारताच्या ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड संघात स्थान मिळवून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गणित ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय शिबिरातही तिची निवड झालेली होती. ही सर्व माहिती आनंदबरोबर काम करणाऱ्या एका बिहारी सेनाधिकाऱ्याला समजली. त्याच्या ओळखीतल्या, श्री. सिन्हा या सनदी अधिकाऱ्याचा मुलगादेखील त्याच स्पर्धांसाठी तयारी करत होता. असिलताची यशोगाथा त्या सेनाधिकाऱ्याने सिन्हा कुटुंबियांना सांगितली असणार.

थोड्याच दिवसात मला सौ. सिन्हा यांचा दिल्लीहून फोन आला. "तुमच्या मुलीने या परीक्षांची तयारी कशी केली? कोणकोणती पुस्तके वापरली?" त्या फोनवर मला प्रश्न विचारू लागल्या. माझी उत्तरे त्या लिहून घेत होत्या. 

चार दिवसांनी परत सौ. सिन्हांचा मला फोन आला. त्या स्पर्धापरीक्षांची काही पुस्तके दिल्लीमध्ये उपलब्ध नसल्याने, ती पुण्यात विकत घेऊन, मी  त्यांना पार्सल करावीत अशी विनंती त्यांनी मला केली.  

मुलांना सुट्टी लागत असल्याने दोनच दिवसांनी, मी आणि मुले दिल्लीला जाणार होतो. त्यामुळे, पुस्तके सोबतच घेऊन येईन असे मी त्यांना सांगितले.
 
दिल्लीला पोहोचल्यानंतर मी सौ. सिन्हांना फोन केला. 
 
"स्वातीजी, क्या आप किताबें भिजवा सकती हैं? या फिर आप स्वयं लेकर हमारे घर आईए ना। उसी बहाने मिलना भी हो जाएगा। असलमें, मेरे घरमें कई बच्चे पढ रहें हैं, नहीं तो मैं स्वयं किताबे लेने आ जाती।" 
बाईंनी अत्यंत मृदू स्वरात मला सांगितले. 

"ही 'कई' बच्चेकंपनी कुठून आली?" हा प्रश्न मला पडला पण सौ. सिन्हांच्या मुलाचे मित्र त्याच्याबरोबर अभ्यास करत असतील असा विचार मी केला. ठरलेल्या वेळी मी त्यांच्या घरी गेले. दिल्लीतल्या रामकृष्णपुरम या भागात, सरकारी अधिकाऱ्यांच्या वसाहतीत त्यांचा खूप मोठ्ठा चार बेडरूमचा फ्लॅट होता. प्रशस्त दिवाणखान्याची अगदी साधी सजावट होती. चारही बेडरूम्सची दारे बंद होती. 

सिन्हा बाईंनी हसतमुखाने  माझे स्वागत केले. चहापानाबरोबर आमच्या गप्पा सुरु झाल्या. बोलण्या-बोलण्यात त्यांनी मला  सांगितले,
"मैं घरमेंही रहती हूँ। सब बच्चोंकी पढाई, खाना-पीना, किताबें, नोट्स सब मुझे देखना पड़ता है। कुछ बच्चों को मैं गणित सिखाती भी हूँ।"

उत्सुकतेपोटी, शेवटी मी त्यांना त्यांच्या "बच्चेकंपनीबद्दल" विचारलेच. 

"हमारा इकलौता बेटा है, जो हमारी बेडरूम में पढ रहा है। बाकी तीनों बेडरूम में दूसरे बच्चे पढ रहें हैं।"

सौ. सिन्हांनी मला पुढे सांगितले की, एका बेडरूममध्ये यूपीएस्सीची तयारी करणारे तीन तरुण, दुसऱ्या बेडरूममध्ये मेडिकलची तयारी करणारी दोन मुले, तर तिसऱ्या बेडरूममध्ये आय.आय.एम. च्या प्रवेशपरीक्षेची तयारी करणारी काही मुले होती.

"हा प्रकार तरी काय असेल?"  मी बुचकळ्यात पडले होते. 

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून सिन्हा बाईंनीच खुलासा केला. 

श्री. सिन्हा बिहारमधील अगदी गरीब कुटुंबात जन्मलेले, पण जात्याच हुशार होते. नोकरी करत-करत ते पदवीधर झाले आणि नंतर दिल्लीला आले. दहा-बारा बिहारी मुलांबरोबर ते एका खोलीत राहिले. अर्धवेळ नोकरी करून, स्वहस्ते जेवण शिजवून खात, कष्टाने अभ्यास करून श्री. सिन्हा पहिल्याच प्रयत्नात  यूपीएससी परीक्षा अव्वल दर्जाने उत्तीर्ण झाले आणि सनदी अधिकारी म्हणून दिल्लीतच रुजू झाले. 

सिन्हा पती-पत्नींनी लग्नानंतर, त्यांच्या नात्या-गोत्यातल्या, ओळखीपाळखीच्या अनेक हुशार मुलांना दिल्लीत आपल्या सरकारी निवासात ठेऊन घेतले. त्यांच्या घरीच राहून, अभ्यास करून अनेक मुले सनदी अधिकारी झाली, कित्येक मुले आयआयटी, आयआयएम मध्ये दाखल झाली.  

सिन्हा साहेब बढती मिळवत, उच्च पदांवर चढत गेले तरी सिन्हा पती-पत्नींनी त्यांचा शिरस्ता तसाच चालू ठेवला. पुढे-पुढे तर बिहारच्या खेड्यातील, अनेक अनोळखी होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना हुडकून आणून त्यांनी आपल्या घरी ठेऊन शिकवले. 

मी अवाक झाले. आणि मग मला जाणवले, सिन्हा बाईंच्या, "मैं घरमेंही रहती हूँ।" या वाक्यामध्ये कमीपणाचा कुठेही लवलेश नव्हता, उलट खूप अभिमान होता. 

"मी घरीच असते" असे सांगताना स्त्रियांच्या बोलण्यातला कमीपणाचा भाव मला नेहमीच खटकतो. आपल्या आधीच्या पिढ्यांमधल्या बहुतांश बायका घरीच असायच्या.   

माझी आई सतत स्वयंपाकघरात आणि आल्या-गेल्यांचे आगत-स्वागत करण्यात व्यग्र असायची. माझ्या सासूबाई शिवणकाम, विणकाम, वाचन याबरोबरच घरात मुलांची शिकवणीही घ्यायच्या. माझी मोठी काकू तिच्या मोलकरणीच्या मुलांना इंग्रजी बोलायला शिकवायची. तसेच, माझ्या आत्या, मावशा आणि इतरही कितीतरी बायका घरीच असायच्या. सुस्थितीत असलेल्या या सगळ्या बायका, मुलांचे संगोपन, स्वयंपाक, घरची टापटीप अशा कितीतरी गोष्टी करायच्या. अनेक बायका, गृहउद्योग करून आपापल्या संसाराला हातभार लावताना आपण  बघतोच. 



"मी तर घरीच असते!" हे कमीपणाने सांगणाऱ्या स्त्रियांना मला नेहमीच सिन्हा बाईंचे उदाहरण सांगावेसे वाटते. तसेच हेच वाक्य, मोठ्या अभिमानाने उच्चारता येईल, असे काहीतरी  करा असे त्यांना सुचवावेसे वाटते.

वर्षातला एखादाच दिवस 'महिला दिन' म्हणून साजरा करण्याऐवजी, एकही महिला कधीही 'दीन' कशी होणार नाही, याचा विचार करणे मला अधिक महत्वाचे वाटते.    
 
 


गुरुवार, ३ मार्च, २०२२

रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!

या लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला जरा आश्चर्यच वाटले असेल. गावाकडच्या मराठी भाषेमध्ये 'रताळ्या' हा एक तुच्छतादर्शक शब्द आहे. साधारणपणे एखाद्या रेम्याडोक्याच्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो. खेडयापाडयात, एखाद्या पुरुषाने तरुणींची छेडछाड केली तर, चिडून जाऊन, त्या पुरुषाला कधीकधी 'का रे, ए रताळ्या, तुला काही आई बहिणी नाहीत का?' असे मुली दटावतात. 

त्याचप्रमाणे, एखाद्याला कचऱ्यात काढणे, म्हणजे कस्पटासमान समजणे, या वाक्प्रचाराचा अर्थही अपमानास्पद असाच आहे.  

व्हॅट्सऍप आणि फेसबुकवर बागकामविषयक चर्चा व मार्गदर्शन करणाऱ्या काही ग्रुप्सची मी सदस्य आहे. "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" हा फेसबुक ग्रुप मला आवडतो. या ग्रुपवरील सदस्यांच्या पोस्ट आणि त्यावर चाललेली चर्चा वाचून, मला बागकामाविषयी खूप चांगली माहिती मिळते.  

माझ्या गच्चीवरच्या बागेत, थर्माकोलच्या एका डब्यात लावलेली रताळी शिवरात्रीच्या निमित्ताने मी काढली. त्या रताळ्यांचे वजन सुमारे दीड किलो भरले. वजनकाट्यावर ठेवलेल्या त्या रताळ्यांचा फोटो मी काढला, आणि "आज एका थर्माकोलच्या डब्यातली रताळी काढली! मातीविरहित बागेतून आलेले पीक!" अशा शीर्षकाखाली तो फोटो,  "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" या ग्रुपमध्ये टाकला. त्यावर अनेकजणांनी कौतुक केले व  मातीशिवाय रताळी कशी उगवली? असा प्रश्न मला विचारला. उत्तरादाखल मी खुलासा केला होता.   

 


लोकांनी फेकून दिलेल्या थर्माकोलच्या, पत्र्याच्या, व प्लॅस्टिकच्या डब्यांमधे रोपे लावून, आमच्या इमारतीवरच्या गच्चीमध्ये मी माझी बाग उभी केली आहे. तिथेच, प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या कचराकुंड्या आणि थर्माकोलच्या डब्यांमध्ये मी कंपोस्ट तयार करते. त्या डब्यांमधे आणि कचराकुंड्यांमध्ये मी गांडुळे सोडलेली आहेत. त्यामुळे गांडूळखत व कंपोस्ट एकत्रच तयार होत असते. ते चाळल्यावर खाली जी खतमिश्रित माती मिळते त्यातच मी भाजी-पाला लावते. चाळणीत उरलेला चाळ एका मोठ्या थर्माकोलच्या डब्यात मी साठवते. 

साधारण दीड वर्षांपूर्वी, माझ्या आतोबांनी, त्यांच्या बागेतल्या रताळ्याच्या वेलाचा एक लांबलचक तुकडा मला दिला. ते रोप लावण्यासाठी एकही रिकामा डबा त्यावेळी माझ्याकडे नसल्यामुळे, वेलाचा तो तुकडा मी पाण्यात घालून ठेवला होता. काही दिवसातच त्याला पुष्कळशी मुळे फुटली. अखेर, त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे कापले आणि खताचा चाळ साठवलेल्या डब्यात खुपसून ठेवले. 

गंमत म्हणजे, ती रोपे तिथे रुजली. त्यानंतरही मी त्या डब्यात चाळ व पाणी घालतच राहिले. मागच्या वर्षी दोनवेळा रताळ्याचा वेल उपसून, त्याखाली लागलेली रताळी मी काढली होती. पण, गेल्या सात-आठ महिन्यांत मात्र मी रताळी काढली नव्हती. 

यावेळी आलेली ती सणसणीत रताळी बघून मला आनंद झालाच, पण  इतरांनीही कौतुक केल्यामुळे तो द्विगुणित झाला. रताळ्याचा वेल लावलेल्या डब्यात चाळ, म्हणजेच झाड-पाल्याचे मोठे-मोठे तुकडे, असल्यामुळे त्या डब्यात हवा खेळती राहिली होती . तसेच, गांडुळांच्या अविरत कार्यामुळे तेथे गांडूळखतही तयार होत राहिले होते. त्यामुळेच त्या रोपाला भरपूर पोषण मिळून जोरदार पीक आले असावे, असा निष्कर्ष  मी काढला .  

आतोबांकडून आणलेल्या त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे, शिरीष गोडबोले या माझ्या सोलापूरस्थित भावालाही दिले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी, शिरीषने त्याच्याकडे उगवलेल्या रताळ्यांचा एक फोटो मला पाठवला. रताळ्यांचे आकारमान लक्षात यावे म्हणून त्याने त्या रताळ्यांच्या शेजारी एक बॉलपेन ठेवले होते. "डाव्या बाजूचे कचऱ्यातले, आणि उजव्या बाजूचे मातीतले" अशी तुलनात्मक टिप्पणी फोटोखाली त्याने लिहिली होती. कचऱ्यात उगवलेले ते धष्टपुष्ट रताळे बघून मी पटकन म्हणून गेले, "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!"

एखादे पीक काढणे म्हणजेच एखादे पीक घेणे, असा एक अर्थ अभिप्रेत असतो. पण, "रताळ्या", आणि "कचऱ्यात काढणे" यांचा बोली भाषेतला अर्थ, आणि "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!" या वाक्यामधे मला प्रत्यक्षात अभिप्रेत असलेला अर्थ, यांच्यामधला विरोधाभास लक्षात आल्याने मला खूपच मजा वाटली.

अचानकच झालेल्या या शाब्दिक कोटीमुळे, मायमराठीबद्दल अभिमानही माझ्या मनात दाटून आला. 

मराठी भाषेचे गुणगान 'मराठी राजभाषा दिनी'च झाले पाहिजे, असे काही नाही! हो ना ?