शनिवार, १८ मार्च, २०२३

कॅच देम यंग!

आज दुपारी मी माझ्या कारमधून क्लिनिकला निघाले होते. एका सिग्नलवर थांबले असताना, अतिशय वेगाने आणि नागमोडी वळणे घेत, एक मोटारसायकल माझ्या उजव्या हाताला येऊन थांबली. मी बिचकले. माझे लक्ष  साहजिकच त्या मोटारसायकलस्वाराकडे गेले. अगदी कोवळ्या वयाचा, एक बारकुडा मुलगा ती मोटारसायकल चालवत आहे, हे बघून मला दुसरा धक्का बसला. त्याच्या मागच्या सीटवर एक चाळीशीचा मनुष्य बसला होता. दोघांच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. मला अगदी राहवले नाही. कारच्या उजव्या खिडकीची काच खाली करून, मी त्या मागे बसलेल्या माणसाला विचारले,

"हा मुलगा खूपच लहान दिसतो आहे. काय वय आहे याचे?" 

"आता चौदावे चालू आहे" त्या माणसाने उत्तर दिले.

"अहो, मग इतक्या कोवळ्या वयाच्या मुलाला मोटारसायकल चालवायला का दिलीत? अठरा वर्षांच्या खालच्या मुलांना चालवायला कायद्याने बंदी आहे. महत्त्वाचे म्हणजे हे त्याच्या जिवाच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. तो किती जोरात चालवतोय, पाहिलंत ना " मी पोटतिडिकीने बोलले. 

"अहो मॅडम, कोवळ्या वयात मुलं गाडी चालवायला शिकली की त्यांची भीड चेपते आणि पटकन शिकतात. माझाच मुलगा आहे आणि मी मागे बसलोय. मी काळजी घेतोय ना त्याची." तो माणूस हसत-हसतच म्हणाला. 

मला खरंतर खूप राग आला होता. या दोघांचा आणि त्या मोटरसायकलच्या नंबरप्लेटचा, असे दोन फोटो काढून, त्वरित ट्राफिक कंट्रोल रूमला पाठवून द्यावेत, असा विचार माझ्या मनामध्ये चमकून गेला. पण तितक्यात सिग्नल हिरवा झाल्यामुळे सगळीच वाहने पुढे निघाली. तो मोटारसायकलस्वार तर विजेच्या चपळाईने, वळवळत माझ्या नजरेआड झाला. 

मी क्लिनिकला पोहोचले. तिथे एक बंगाली सुवर्णकार आणि त्याची बायको, त्यांच्या दोन लहानग्यांना घेऊन आले होते. 

"मॅडम इनके स्कूल की छुट्टी पडी हैं ना, तो ये लोग गाँव जा रहें है। आपसे  कुछ दवा लिखवाके ले के जाऊं, ऐसे सोच  के आया था।"  मुलांच्या वडिलांनी खुलासा केला. 

मी त्या दोन्ही मुलांना तपासले, आणि सध्या कुठलीही औषधे देण्याची गरज नसल्याचे सांगितले.  

" कैसे जा रहे हैं? ट्रेनसे या फ्लाईटसे? " खरंतर, उत्तर माहिती असूनही मी विचारले.
 
" कलकत्ता तक फ्लाईट्से, और वहाँसे टैक्सी करके मिदनापूर डिस्ट्रिक्ट में हमारें गाँव चलें जायेंगे।"

गेल्या अनेक वर्षांपासून पुष्कळ बंगाली स्वर्णकारांची मुले मी तपासत आलेले आहे. हे सगळे लोक, नवरात्रामध्ये एकदा, आणि मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की एकदा, असे वर्षातून दोन वेळा, कलकत्त्यापर्यंत विमानप्रवास करून, पुढे टॅक्सीने आपापल्या खेडेगावी जातात, हे मला माहिती आहे. 

ताप, उलटी, जुलाब यावरची जुजबी औषधे कशी द्यायची, हे मी त्यांना समजावून दिले.
  
"मॅडम, इनको छोडके अभी मैं वापस आ जाऊँगा। जूनमें स्कूल खुलनेसे पहले, मैं फिर इनको लेने जाऊँगा। इधर पुणे में अपना कारोबार है ना।" स्वर्णकाराने जास्तीची माहिती पुरवली. 

मी सहजी विचारले, "आपके यहाँ कितने मजदूर काम करते है? 

"पच्चीस लडके हैं"

जेमतेम पस्तिशीच्या त्या माणसाच्या हाताखाली, इतके कामगार आहेत हे ऐकून मला कौतुक वाटले. 

"आपने ये काम कब सीखा था?'  

"मैं तेरा-चौदा सालकी उमरमें इधर आया था। पहले आठ साल तक काम सीखा। बादमें अपना मॅन्युफॅक्चरिंग युनिट शुरू किया। धीरे धीरे बढाया।"

मी आश्चर्यचकित झाले. 

"इतनी छोटी उमरमें आपके पिताजीनें आपको कैसे भेजा?"

"मॅडम, ये काम कच्ची उमरमेंही सीखना होता हैं। बडी उमरमें सीखना मुश्किल होता है। हमारे इधर के सब लडके छोटी उमर में ही सीखना चालू करते हैं। इसीलिये मेरे पिताजीनें मुझे भी भेज दिया था। मेरेको पूना आये अभी बावीस साल हो गये। इधर कारोबार बहोत अच्छा चलता हैं।" 

मी विचारात पडले. 

तेरा-चौदा वर्षांच्या आपल्या मुलाला भर ट्रॅफिकमध्ये मोटारसायकल चालवू देणारे एक वडील, आणि साधारण त्याच वयाच्या आपल्या मुलाला कामासाठी दूर पाठवणारे दुसरे वडील.
 
कायद्याच्या दृष्टिकोनामधून बघितले तर दोघेही अयोग्य कृत्यच करत होते. पण अर्थार्जनासाठी काहीतरी कसब शिकून, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला एक मुलगा आज अनेकांना रोजगार देऊ शकत होता. 
अतिशय धोकादायक पद्धतीने, सुसाट मोटारसायकल चालवायला शिकून त्या दुसऱ्या कोवळ्या मुलाचे पुढे नेमके काय विशेष भले होणार होते? कुणास ठाऊक?

गुजराती, मारवाडी, सिंधी समाजातली खूप मुले-मुली शाळा-कॉलेज शिकता-शिकता, फावल्या वेळेत वडिलांबरोबर दुकानांच्या गल्ल्यावर बसतात. असे करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांची चेष्टा करणारे लोकही मला माहित आहेत. आणि दुसरीकडे, "धंदा करणे मराठी माणसाच्या रक्तातच नाही" अशी स्वतःचीच लाजिरवाणी चेष्टा स्वतःच्याच तोंडाने करणारे महाभागदेखील मी पाहते. 
त्याउपर, "महाराष्ट्रातील सगळे व्यवसाय, नोकऱ्या, कामधंदे परप्रांतीयांनी बळकावल्यामुळे मराठी तरुणांना बेकारीची झळ सोसावी लागते", अशी ओरडही आपण ऐकतो. 
पण तसे होऊ नये म्हणून आपण मराठी माणसे काय पाऊले उचलतो? आपली पुढची पिढी आपण कशी घडवतो?  
हा विचार अधिक महत्वाचा नाही का?
  



शुक्रवार, १७ मार्च, २०२३

'नूतन' सेवा

काल संध्याकाळी मला व्हॉट्सऍपवर नूतन या माझ्या बालमैत्रिणींचा संदेश आला, "तुला कधी फोन करू गं?' 

संदेश वाचल्या-वाचल्या, तिला माझ्याशी काय बोलायचे असणार आहे, याचा मला अंदाज आला. मी लगेच तिला फोन लावला.

"अगं, ते बाळ आहे ना, त्याला गेले कितीतरी दिवस खोकला आहे. त्याची आई काही लक्षच देत नाही बघ. नुसतं बाटलीच्या दुधावर ठेवते. दहा महिन्याच्या बाळाला सगळं चारायला हवं ना? मी पंधरा दिवस सोलापूरला होते. परत आले तर आमच्या बाळाची हाडं अगदी वर आली आहेत. आता मी दिवसभर त्याला माझ्याकडेच ठेऊन खाऊ-पिऊ घालणार आहे. अजून काही टॉनिक वगैरे देऊ का सांग ना?" नूतन कळकळीने विचारत होती. 

जवळजवळ सहा महिने झाले, दर महिन्या-पंधरा दिवसाला तिच्या शेजाऱ्यांच्या एका बाळासाठी नूतन माझा असाच काही-बाही सल्ला घेत असते.

मी म्हणाले, "नूतन, असं बाळाला न बघता सांगणं अवघड आहे. पण तू त्याला भरपूर खायला घाल. त्यातून त्याला सगळं पोषण मिळेल. बाळाच्या नेहमीच्या डॉक्टरांनी त्याला काय औषधे दिली आहेत, तेही बाळाच्या आईला विचारून सांग. मग बघूया."

"खायला तर मी घालतेच आहे गं. त्याच्यासाठी छोट्या कुकरमध्ये मुगाच्या डाळीची मऊ खिचडी शिजवून, तूप  घालून त्याला चारते. वरण-चपाती, दूध-चपाती, इडली, शिरा, उपमा, सगळं चारते. बाळाचे हाल बघवत नाहीत गं. मी नसले की हे लोक चार-चार दिवस बाळाला अंघोळ पण घालत नाहीत. कितीदातरी मीच त्याला अंघोळ घालते. आपण सोलापूर सिव्हिलला असताना अगदी भिकाऱ्यांना सुद्धा खायला घालायचो, अंघोळ घालायचो. हे तर माझ्या शेजाऱ्यांचे बाळ आहे. याचं तर मी सगळं करतेच गं."

नूतनने भिकाऱ्यांची आठवण काढली आणि माझ्या मनामध्ये अगदी चर्रर्र झाले. सोलापूर हा दुष्काळी जिल्हा. चाळीस वर्षांपूर्वी तर अनेकांची फार हलाखीची परिस्थिती असायची. अत्यंत खंगलेले, भुकेकंगाल भिकारी बरेचदा आमच्या वार्डांमध्ये भरती व्हायचे. अगदी हाडापर्यंत गेलेल्या त्यांच्या जखमांमध्ये अळ्या झालेल्या असायच्या. तसले रुग्ण अनेक महिने वॉर्डमध्ये पडून असायचे. त्यांच्याजवळ गेले तरी कमालीची दुर्गंधी यायची. अशा त्या रुग्णांची सेवा-सुश्रुषा करणाऱ्या काही मोजक्याच परिचारिका आणि डॉक्टर्स असायचे. बाकीचे त्यांना हिडीस-फिडीस करायचे किंवा अगदी पळवून सुद्धा लावायचे. रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या नूतनने ते काम मनापासून केले असणार याची मला जाणीव झाली. 

नूतन सोनतळे ही माझी बालमैत्रीण. तिची आई सोलापूर महानगरपालिकेच्या लेडी डफरिन हॉस्पिटलमध्ये मेट्रन होती. आम्ही शाळेत असताना, डफरिन हॉस्पिटलच्या आवारातच असलेल्या क्वार्टर्समध्ये नूतन राहायची. तिचे घर आमच्या शाळेच्या अगदी जवळ असल्याने, लहानपणी कितीदातरी आम्ही तिच्या घरी जायचो. पुढे, नूतन आणि मी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असलो तरीही मैत्रीचा धागा पक्का राहिला. बारावीनंतर मी सोलापूरच्या वैशंपायन  वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला लागले. नूतनचे लग्न होऊन ती सौ रोहिणी पडसलगी झाली व सोलापूर सिव्हिलला ती परिचारिका म्हणून रुजू झाली. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही वर्षे आमची भेट होत राहिली. पुढे अनेक वर्षे ती तिच्या नोकरीत, मी माझ्या व्यवसायात, आणि आम्ही दोघीही आपापल्या संसारात गुंतून गेल्यामुळे भेट क्वचितच होत असे. मात्र मागील काही वर्षे, आमच्या शाळेच्या दहावीच्या बॅचचा  व्हॉट्सऍप ग्रुप झाल्यामुळे, आम्ही पुन्हा  एकमेकींच्या जवळ आलो. 

'सिस्टर इन-चार्ज ऑफ ऑपेरेशन थिएटर' या पदावरून, जवळपास दोन वर्षांपूर्वी नूतन निवृत्त झाली. पण सेवाभाव तिच्या रक्तातच आहे. त्यामुळेच, शेजाऱ्यांच्या लहान बाळाला खायला-प्यायला घालणे, न्हाऊ-माखू घालणे ही कामे ती आपणहून करते, याची मी साक्षीदार आहे. 

माझ्या बालमैत्रिणीने सेवानिवृत्तीनंतरही चालू ठेवलेल्या या सेवेचा मला खूप अभिमान वाटतो आणि तिचे कौतुक करावेसे वाटते!    






शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

उचलबांगडी!

आम्ही राहतो त्या इमारतीत, वरच्या मजल्यावर एक सत्त्याऐंशी वर्षे वयाच्या आजी राहतात. आजींची तिन्ही अपत्ये परदेशी असल्याने त्या इथे एकट्याच राहतात. त्यांच्या घरी, त्यांच्या सोबतीला राहून घरकाम करण्यासाठी, गौरी कांबळे नावाची  एक चाळीशीची बाई राहत होती. २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आजी अगदी खुटखुटीत आणि चालत्या फिरत्या होत्या. पण २१ नोव्हेंबर २०२२ ला त्यांच्या पाठीच्या मणक्यातून असह्य कळा जायला लागल्या. त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट व्हावे लागले. तिथे त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या. त्यांच्या दोन मणक्यांना फ्रॅक्चर झालेले आहे असे निदान झाले. योग्य उपचार सुरु करून त्यांना २६ नोव्हेंबरला  घरी सोडण्यात आले. 

आजी घरी आल्यानंतरही दोन आठवडे त्यांच्या मणक्यातून कळा जातच होत्या. त्यांना कुशीवर वळायलाही त्रास होत होता. पण औषधोपचारामुळे आणि विश्रांतीमुळे हळूहळू त्यांना बरे वाटायला लागले. त्या दरम्यान, स्पेनमध्ये स्थायिक असलेली  त्यांची मुलगी आपल्या आईची शुश्रूषा करायला त्यांच्याजवळ येऊन राहिली. शेजारधर्म म्हणून मी जमेल तसे, आजींची विचारपूस करायला, काही खाद्यपदार्थ-फळे द्यायला त्यांच्याकडे वरचेवर जात होते. त्यातून मी वैद्यकीय व्यावसायिक असल्याने, त्यांना लागेल ती वैद्यकीय मदतही  करत होते. 

साधारण १५ डिसेंबर २०२२ च्या सुमारास, दुखणे जरा कमी झाल्यानंतर आजींना त्यांच्या सोन्याच्या बांगडीबद्दल आठवण झाली. २१ नोव्हेंबरला त्यांना हॉस्पटलमध्ये नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स आली होती. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी आजीनी त्यांच्या हातातली सोन्याची बांगडी, पलंगाशेजारच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काढून ठेवली होती, हे आजींना पक्के आठवत होते. आजीच्या मुलीने त्या ड्रॉवरमध्ये ती बांगडी शोधली, पण तिथे ती बांगडी काही सापडली नाही.  त्यामुळे तिने घरामध्ये सगळीकडे शोधाशोध सुरु केली. आजी हॉस्पिटलमध्ये असताना, गौरी घरी येत-जात होती. त्यामुळे गौरीने ती बांगडी कुठेतरी ठेवली असण्याची अथवा स्वतःच घेतली असण्याची शक्यता दाट होती. त्यामुळे, "गौरी, तू बांगडी कुठे ठेवली आहेस का? कुठे पहिली आहेस का?" अशी विचारणा आजींच्या मुलीने गौरीकडे केली. पण गौरीने कानावर हात ठेवल्यामुळे आजींची आणि त्यांच्या मुलीची पंचाईत झाली. 

१६-१७ डिसेंबर २०२२च्या सुमारास मी आजींची विचारपूस करायला गेले असताना, आजींच्या मुलीने ती सोन्याची बांगडी हरवल्याचे मला सांगितले. आजीनी त्वरित पोलिसांची मदत घ्यावी असा मी सल्ला दिला. पण आजी आणि त्यांची मुलगी पोलिसांमध्ये तक्रार द्यायला मुळीच तयार नव्हत्या. पुढचे पाच-सात दिवस, पोलिसांमध्ये तक्रार देणे कसे आवश्यक आहे , हे मी त्या दोघीना सातत्याने सांगत होते. शेवटी २३ डिसेंबर २०२२ रोजी,  पोलीस घरी येऊन तक्रार घेणार असतील तरच आम्ही तक्रार देऊ' या बोलीवर त्या दोघी तयार झाल्या. मी त्वरित १०० क्रमांकाला फोन करून चोरीबाबत तक्रार केली आणि आजींना येऊन भेटण्याची विनंती पोलिसांना केली. पुढील दहा-पंधरा मिनिटांत दोन पोलीस मार्शल आजींच्या घरी हजर झाले. 

आजी आणि त्यांच्या मुलीला मराठी नीटसे येत नसल्याने त्यांनी मलाही त्यांच्या घरीच थांबवून घेतले होते. पोलिसांनी आजींकडून सगळी घटना नीट समजावून घेतली. तसेच गौरी कांबळेकडे बांगडीबाबत चौकशी केली. गौरीने, 'मी ती बांगडी कधीही पाहिलेली नाही' असाच पवित्रा  घेतला. खरेतर, आजींच्या हातात ती बांगडी नेहमीच असायची. तेंव्हा मला अचानक एक प्रसंग आठवला. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी मी केक केला होता. तो केक कापतानाच्या फोटोमध्ये आजींची बांगडी दिसत असणार. माझ्या फोनवरचे ते फोटो काढून मी पोलिसांना दाखवले. पोलिसांनी आजींना आणि त्यांच्या मुलीला धीर देत सांगितले की आमचे माधाळेसाहेब अतिशय चांगले अधिकारी आहेत. तुम्ही बंडगार्डन पोलीस  स्टेशनला येऊन त्यांना भेटा, ते निश्चित मदत करतील.   

आजी अंथरुणाला खिळलेल्या असल्याने, आजींच्या मुलीला घेऊन मी लगेच बंडगार्डन पोलीस स्टेशनमधल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API ) संदीप माधाळेसाहेबांची भेट घेतली.  त्यांनी पुन्हा आमच्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला, व बांगडीचा फोटो पहिला. त्यानंतर त्यांनी महिला पोलीस मार्शलना आजींच्या घरी पाठवून गौरी कांबळेला पोलीस ठाण्यामध्ये आणण्याचे आदेश दिले. गौरी पोलीस स्टेशनला आल्यावर, पोलिसांनी मला आणि आजींच्या मुलीला  बाहेरच्या बाकावर बसून राहण्याची विनंती केली. 

पुढील तास-दीड तास  महिला पोलीस  कॉन्स्टेबलच्या उपस्थितीमध्ये,  माधाळे साहेब आणि पोलीस सब इन्स्पेक्टर रवींद्र गावडेसाहेबानी गौरीची कसून चौकशी केली. बराच वेळ झाला तरी आतून काही खबर मिळत नसल्याने आजींच्या मुलीचा धीर सुटत चालला होता. शेवटी, 'गौरीने बांगडी उचलल्याची कबुली दिली आहे आणि तिचा साथीदार लोणावळ्याहून रात्री बांगडी परत आणून देईल' अशी खुशखबर घेऊन महिला पोलीस बाहेर आल्या. स्पॅनिश नागरिक असलेल्या आजींच्या मुलीला मी ही खबर सांगितली. पुणे पोलिसांची कार्यतत्परता पाहून ती  आश्यर्यचकित झाली. 

त्याच रात्री सुमारे साडेबारा वाजता पोलीस सब इन्स्पेक्टर अजय असवले साहेबांचा मला फोन आला. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये येऊन बांगडी घेऊन जायला त्यांनी सांगितले. पोलिसांनी माझ्या हातात ती बांगडी सुपूर्द केली. आणि "ती बांगडी मी आजींच्या वतीने स्वीकारलेली आहे", असे माझ्याकडून लिहून घेतले. त्यानंतर मी त्वरित आजींच्या घरी जाऊन त्यांना त्यांची बांगडी सुपूर्द केली. हे सगळे घडायच्या आधी, बांगडी उचलण्याच्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी आजींच्या घरातून गौरी कांबळेचीच उचलबांगडी केलेली होती हे सांगायला नकोच!


पोलिसांच्या कार्यतत्परतेबद्दल माझ्या मनामध्ये कधीही शंका नव्हती. पण तक्रार केल्यापासून आठ तासांच्या आत, आपली तीन तोळ्यांची  बांगडी घरपोच मिळाल्यामुळे, आजींच्या आणि त्यांच्या मुलीच्या मनामध्ये पोलिसांवर आपण 'भरोसा' ठेऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला, हे विशेष!  

मला असे प्रकर्षाने वाटते की सामान्य नागरिकांनी पोलिसांची भिती बाळगू नये, आणि पोलीस निष्क्रिय असतात असा विचारही करू नये. त्याउलट, पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेऊन, एखादा गुन्हा घडल्याचे लक्षात येताच पोलिसांची मदत घेणे हेच श्रेयस्कर ठरते.