बुधवार, ११ मार्च, २०२०

विटाळशीची खोली!

माझ्या माहेरचे घर म्हणजे शंभरी गाठायला आलेला भला मोठा वाडा आहे. सोलापुरात मध्यवर्ती भागातल्या नवीपेठेच्या मुख्य रस्त्याच्या आतल्या एका बोळात वाड्याचा पुढचा दरवाजा उघडतो. तर वाड्याचा मागचा दरवाजा भागवत टॉकीजकडून शिंदे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बोळात उघडतो. वाड्याच्या मागच्या बाजूला साधारण बारा-पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंत आहे. त्या जाडजूड भिंतीतच वाड्याचे मागचे दार आहे. त्या दारातून येऊन प्रशस्त अंगण  पार करून आपण आलो की वाड्यातल्या राहत्या खोल्या आहेत. वाड्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या एका खिडकीतून नवीपेठेतल्या मुख्य रस्त्यावरची, आणि मागच्या दारात उभे राहिले की मागच्या रस्त्यावरची रहदारी दिसते. तरीही त्या रस्त्यांवरच्या गजबटाचा त्रास, वाड्यात जाणवत नाही. तसेच वाड्यात आत काय चालले आहे, हे  बाहेरून  कोणालाही समजत नाही.

माझ्या पणजोबांनी १९२५ साली हा वाडा, चुना-मातीने बांधून घेतला होता. त्यानंतर १९७४-७५ साली, पूर्वीचे बांधकाम जुने झाले असल्याने माझ्या वडिलांनी वाड्याच्या मधला बराचसा भाग पाडून तिथे सिमेंट-काँक्रीटचे पक्के बांधकाम करून घेतले. वाड्याच्या दर्शनी भागात, माझ्या पणजोबांच्या काळापासून वापरात असलेली, एक मोठे आणि एक लहान, अशी दोन ऑफिसेस आणि त्यावरची माडी आहे. पणजोबांनी १९२५ साली बांधलेल्या वाड्याचा हा भाग, वाड्याचे नूतनीकरण करताना, न पाडता तसाच ठेवला आहे. वाड्याच्या मागच्या अंगणात उघडणाऱ्या तीन खोल्या आणि त्यावरची माडी, हा भाग माझ्या पणजोबांनी १९२८ साली बांधून घेतला होता. तो जुना भागदेखील आज तसाच आहे. त्या तीन खोल्यांमधली एका कडेची अंधारी खोली, ही 'बाळंतिणीची खोली' आहे. त्या खोलीबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन. पण सांगायचं मुद्दा असा की सध्या अस्तित्वात असलेला वाडा म्हणजे, बाहेरून जुना आणि आत मात्र जुन्या आणि नव्या बांधकामाचा सुंदर मिलाफ असलेला, असा आहे.

वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीलगतच्या एका कोपऱ्यात पूर्वी एक 'विटाळशीची खोली' होती. त्या  खोलीत आतल्या बाजूला एक मोरी होती आणि खोलीत जायला मागच्या अंगणात उघडणारा दरवाजा होता. तीन बाजूंनी उंच भिंती असलेली ती अरुंद, लांबुळकी खोली, लहानपणी मला एखाद्या खोल गुहेसारखी वाटायची. ती खोली म्हणजे आम्हा भावंडांसाठी मोठाच कुतुहलाचा आणि रागाचाही विषय होता. अधून-मधून आई-काकू किंवा पाहुण्या आलेल्या कोणी आत्या-माम्यांना सुध्दा, तीन-चार दिवस शिक्षा मिळाल्यासारखे तिथे का बसावे लागते? याबाबत एकीकडे कमालीचे कुतूहल होते, तर दुसरीकडे, त्या चार दिवसांत आईजवळ जाता येत नाही, याबद्दलचा राग असायचा. आमचं सगळं घर आजीच्या धाकात असायचे. विटाळशीच्या खोलीतल्या बाईजवळ कोणीही जायचे नाही, हा आजीने घालून दिलेला अलिखित नियम होता. तिथे फक्त बायकांना आणि कधीकधीच का बसावे लागते? इतरवेळी कोणालाच त्या खोलीत का जाता येत नाही? असे अनेक प्रश्न मनांत असायचे. पण त्याबाबत कोणालाही काही विचारायची सोय नव्हती. आईला विचारले, तर "तू लहान आहेस, तुला नाही कळायचे, कावळा शिवला की तिकडे बसावे लागते किंवा अगोचरपणा करू नकोस, आजीने सांगितलेले ऐकायचे, उगीच भलते प्रश्न विचारायचे नाहीत," असली उडवाउडवीची उत्तरे मिळायची. आमच्यापैकी कुणीही,  विटाळशीच्या खोलीबद्दलचे प्रश्न फारच लावून धरले, तर पाठीत एक चांगला सणसणीत रट्टा मिळायचा, पण समाधानकारक उत्तर कधीच मिळायचे नाही. जुन्या वाड्याचे नूतनीकरण  करताना, म्हणजे साधारण १९७५-७६ साली ती खोली पाडल्यामुळे वाड्यातून कायमची गायब झाली.

आई किंवा काकू त्या खोलीत गेल्या की आजी त्यांना धान्य निवडणे, भुईमूगाच्या शेंगा फोडणे, किंवा भाजी निवडणे अशी ठराविक कामे द्यायची. तिथे बसलेल्या बाईला जेवणाचे ताट वाढून दिले जायचे. तिच्यासाठी वेगळे तांब्या-भांडे ठेवलेले असायचे. त्या बाईला तिथे आतच असलेल्या मोरीमध्ये अंघोळ करावी लागे, स्वतःचे कपडेही तेथेच धुवावे लागत आणि तिथेच झोपायला लागायचे. इतर वेळी आई स्वयंपाकघरांत सतत कामं करत उभी असायची. त्यामुळे  आमच्याशी गप्पा-गोष्टी करायला, तिला कधी वेळच नसायचा. त्या चार दिवसांत, आई त्या विटाळशीच्या खोलीत निवांत बसलेली बघून तिच्याजवळ जावे, तिच्याशी गप्पा माराव्यात, असे वाटायचे.  तिला बिचारीला आजीने शिक्षा केली आहे किंवा तिच्यावर अन्याय होतो आहे, असे वाटून कधीकधी तिची कीव यायची. कोणीही लहान मूल चुकून जरी त्या  विटाळशीच्या खोलीतल्या बाईकडे गेले, किंवा तिला शिवले, तर त्या भावंडाला आजी लांबूनच पाणी टाकून अंघोळ करायला लावून मगच घरात घ्यायची. चौथ्या दिवशी, आजी मोलकारीणीला सांगून विटाळशीच्या अंगावर, लांबूनच पाणी टाकायची, विटाळशीला डोक्यावरून अंघोळ करायला लावयाची. अशारितीने तिचे शुद्धीकारण झाले, की तिला घरात प्रवेश मिळायचा. आई घरात आली की मला अगदी हुश्श व्हायचे.

जसजशी मी मोठी व्हायला लागले तसतसे हळूहळू आपोआपच त्या खोलीबाबतचे गूढ उलगडायला लागले. आमच्या गल्लीत राहणाऱ्या काही मुली वयात आल्यामुळे, त्यांना मखरात बसवून ठेऊन, मोठे समारंभ व्हायला लागले. काही मैत्रिणी महिन्यातले तीन-चार दिवस अकारणच शाळा बुडवू लागल्या. आई-आत्या-काकू-मावशी-मोठ्या बहिणी किंवा शाळेतल्या काही मैत्रिणींकडून, दबक्या आवाजात मासिक पाळी बाबत थोडीफार माहिती मिळत गेली. आता आपल्यालाही कधीतरी त्या विटाळशीच्या खोलीत बसायला लागणार, या भीतीने मला ग्रासले. त्यामुळे प्रत्यक्षांत मासिक पाळी सुरु व्हायच्या आधीच, माझ्या मनाने बंड पुकारले. काय वाट्टेल ते होवो आपण त्या खोलीत बसायचे नाही, हे मी मनातल्या मनांत पक्के ठरवून टाकले. आणि मला पहिल्यांदाच पाळी येण्याचा, तो दिवस प्रत्यक्षांत उजाडला. आईला माझा निश्चय सांगितला. आईला माझी भूमिकापटत असली तरीही, माझ्या बंडखोरीला ती पाठींबा देऊ शकणार नाही , हे तिने मला स्पष्ट केले. मग मात्र त्या दिवशी, प्रथमच आजीच्या डोळ्याला डोळे भिडवून , मी काहीही झाले तरी  त्या खोलीत बसणार नाही हे निक्षून सांगून टाकले. आजी चिडली असावी , तीन-चार दिवस  बोलली नाही.  पण मग शेवटी, स्वयंपाकघरात आणि देवघरात यायचे नाही या अटींवर, माझा निर्णय तिने नाईलाजाने आणि नाराजीने स्वीकारला.

तुम्हाला असे वाटेल, मी आज हे इतके उघडपणे आणि सविस्तरपणे  लिहण्याचे कारणच  काय?

गेले चार-पाच दिवस माझे डोळे आलेले आहेत. नुकत्याच जीवघेण्या आजारातून बाहेर पडलेली, दोन्ही किडनीज निकामी झाल्यामुळे दर दोन-तीन दिवसाआड डायलिसिस लागणारी माझी वयोवृद्ध आई, सध्या आमच्याबरोबर राहते आहे . माझ्या संसर्गामुळे तिचे डोळे आले तर बिचारीचे अजूनच हाल होतील, या विचारानेच मीच  स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतले आहे. इथे बसून, व्हाटसऍपवर चॅटिंग करता करता किंवा टीव्ही बघता बघता, भाजी निवडणे, लसूण सोलाणे, कपड्यांच्या घड्या घालणे, अशी काही फुटकळ घरकामे  मी सध्या करते आहे. मला इथे आयते ताटं वाढून आणून दिले जाते आहे. या सर्व गोष्टींमुळे मला माझ्या माहेरच्या वाड्यातल्या त्या विटाळशीच्या खोलीची, आई-काकूंच्या त्या दिवसांची आणि मी पुकारलेल्या त्या बंडाची तीव्रतेने आठवण झाली. गम्मत म्हणजे,  योगायोगाने नेमके कालच माझ्या एका मैत्रिणीने, एका तात्विक मुद्द्यावर माझे मत विचारण्यासाठी व्हॅट्सऍपवर एक चॅट पाठवले.

" माझ्या ओळखीतल्या एका मुलीचे लग्न जवळजवळ ठरत आले आहे. स्थळ उत्तम आहे. दोन्ही बाजूने पसंती आहे. पण सासरचे म्हणताहेत की लग्नानंतर मुलीच्या मासिक पाळीच्या काळांत ते तिला स्वयंपाकघरात येऊ देणार नाहीत  आणि  दवपूजाही करू देणार नाहीत. थोड्यावेळासाठी तू असे समज की, तुझ्या मुलीच्या बाबतीत मुला कडच्यांनी अशी अट घातली असती आणि पुढे जायचे की नाही, या बाबतीतला निर्णय सर्वस्वी तुझ्या हातात असता, तर तू काय केले असतेस?"

मी निश्चितच स्पष्टपणे नकार कळवून टाकला असता, असे माझे मत मी मैत्रणीला मी क्षणार्धांत कळवून टाकले. अर्थात लग्नाच्या मुलीला या अटी मान्य आहेत की नाहीत या गोष्टीला मी जास्त महत्व दिले असते, हेही मी तिला लिहले.त्याउपर, आपल्या दोघींच्याही मुलींची लग्नें झालेली असताना ही चर्चा उगीचच  कशासाठी करत बसायची? असे विचारून, तिला चार स्मायली पाठवून, तो विषय तिथेच संपवला. पण प्रत्यक्षांत, इतक्या वर्षांनंतरही विटाळशीच्या खोलीची खोली, अजूनही तशीच आहे , या जाणिवेने माझे मन मात्र  खिन्न झाले.
   

रविवार, ८ मार्च, २०२०

असे मातृत्व दे गा देवा!

माझ्या माहेरी एकत्र कुटुंबात एकाच वेळी आम्ही सख्खी-चुलत मिळून कमीतकमी सात भावंडे असायचो. दिवाळीत किंवा उन्हाळयाच्या सुट्टीत आमची आते-मामे-मावस-चुलतचुलत अशी सर्व  भावंडे आली की आमचा भलामोठा वाडा गजबजून जायचा. आमच्या आयांना आमच्यासाठी किती कष्ट उपसावे लागत होते याची कल्पनाही त्यावेळी मला नव्हती. लग्न झाल्यावर वाटायचे की आपल्याला चांगली चार-पाच मुले होऊ द्यावीत. घर कसे मुलांनी भरलेले असावे. आईपण निभावताना आईला कशाकशातून जावे लागते, हे आई झाल्यावरच कळते. मला मोठी मुलगी आणि नंतर एक मुलगा झाला. पण दुसऱ्या बाळंतपणात मला बराच त्रास झाल्याने दोन अपत्यांवरच थांबावे लागले.

आई आपल्या मुलांवर प्रेम करतेच पण मुलांना शिस्त, संस्कार, बचत, वागणे-बोलणे, स्वच्छता अशा अनेक गोष्टी शिकवते. माझ्या मुलांचे संगोपन करीत असताना, ही जबाबदारी ओझे न वाटता नेहमी सुखदच वाटायची. मला आणखी दोन-तीन मुले असायला पाहिजे होती ही इच्छा सतत मनात असायचीच. मग अधून-मधून भाचरंडे, माझ्या मुलांचे मित्र-मैत्रिणी यांची आई होऊन मी माझी मातृत्वाची तहान तात्पुरती भागवायचे. मला लहान मुले खूपच आवडतात. मागे एकदा जम्मू ते पुणे या संपूर्ण प्रवासात, एका सहप्रवासी जोडप्याच्या दोन-तीन वर्षांच्या गोड मुलीला मी पूर्णवेळ स्वखुशीने सांभाळले होते. त्यावेळी मला मातृत्वाचे सुख भरपूर मिळाले. पण पुणे स्टेशन आल्यावर त्या मुलीने तिच्या आईकडे जायला नकार देऊन माझी आणि त्या जोडप्याचीही चांगलीच पंचाईत केली होती.

माझी आजी तिच्या वयाच्या ९५ व्या वर्षी वारली. आजी गेली तेव्हा माझी आई ७२ वर्षांची आणि वडील ७५ वर्षांचे होते आणि ती दोघेच तिची देखभाल करत होते. आजी जायच्या आदल्या वर्षी माझ्या भाऊ-वहिनीने माझ्या आई-वडिलांना परदेशवारीसाठी नेले. त्यावेळी माझ्या आजीला ते माझ्या घरी सोडून गेले होते. आजीला मी भरवायचे, तिची स्वच्छता, करमणूक, औषधपाणी  सगळे करायचे. त्यावेळेपर्यंत माझ्या आजीला स्मृतीभंश झाला होता. "मी तुझी कोण आहे?" असे विचारले की " तू माझी आई आहेस" असे ती पटकन म्हणायची. मी सुखावून जायचे आणि आजीला आईच्या मायेनेच बघायचे.

आज माझे सासू-सासरे दोघेही हयात नाहीत. माझ्या सासऱ्यांना त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत, मधेच केंव्हातरी आपण आजारी आहोत असे वाटू लागे. घाबरून जाऊन ते  स्वतःचा आहार कमी करीत व मला बोलावून घेत असत. त्यांना तपासून, "तुम्हाला  काहीही झाले नाही. मी नेमून दिलेला आहार  घेतलाच पाहिजे" असा दम त्यांना द्यावा लागे. मग ते  पुन्हा व्यवस्थित जेवू लागायचे. माझ्या सासऱ्यांची आई, ते अगदी लहान असतानाच वारली होती. ते मला त्यांची आईच मानायचे. माझ्या सासूबाई, शेवटचे चार महिने काहीच खात नव्हत्या. त्यातल्या काही काळ त्या माझ्याकडे होत्या. त्यांनी काहीतरी खावे म्हणून मी रोज नवनवीन पदार्थ करायचे. एकदा मी ज्वारीच्या पिठात पालक घालून गरमागरम भीमरोटी करून, ताज्या लोण्याबरोबर त्यांना भरवली. कुठलीही खळखळ न करता त्यांनी ती खाल्ली आणि म्हणाल्या, "तू माझी आई आहेस". माझे दोन्ही भाऊदेखील गंभीर आजारांना तोंड देत असताना मी त्यांची काळजी घेतली होती. त्या वेळेपर्यंत आमची आई स्वतःच ऐंशीच्या घरात असल्याने ती स्वतः त्यांची सेवा करण्यास असमर्थ होती. "तू आम्हाला आईची उणीव भासू दिली नाहीस" असे माझे दोघेही भाऊ मला म्हणत. या सर्वांच्या मातृत्वाचे सुखही मला लाभले आहे .

अर्थात मातृत्वाच्या सुखद अनुभवांबरोबर काही कटू अनुभवही पदरी आहेतच. पोटच्या मुलांनादेखील त्यांच्या कानाला गोड न लागणारा एखादा सल्ला दिला की ती रागाच्या भरात ,"तू माझी आई आहेस का कोण आहेस?" असे चटकन म्हणून जातात. पण मग काही काळाने स्वतःहून जवळ येतात. अनेक वेळा  "माझे आई" असे म्हणून माझा नवरा किंवा माझ्या मित्र-मैत्रिणी, माझा उध्दार करत असतात. त्या-त्या वेळी त्यांच्या बालिशपणाला हसून मी त्यांचे बोलणे कानाआड करते, हे सांगायला नकोच.

नुकतीच माझी आई अनेक महिने हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ होती. गेला सव्वा महिना ती घरी असली तरी तिची पुष्कळ काळजी घ्यावी लागते आहे. त्यामुळे लग्न किंवा इतर समारंभांची बोलावणी आली तरी "आईच्या तब्येतीच्या कारणास्तव आम्ही येऊ शकत नाही", असे कळवावे लागते. त्यावर 'तुम्हाला खूप ताण पडत असेल. तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या", "काही लागले तर सांगा" अशा दिलासा देणाऱ्या प्रतिक्रिया येतात. हॉस्पिटलमध्ये असताना आई बराच काळ ग्लानीतच असल्याने फारशी बोलत नसे. घरी आल्यावर हळूहळू ती सुधारते आहे व थोडी बोलायलाही लागली आहे. "मी तुझी कोण आहे?" असे विचारले की ती म्हणते," तू माझी आई आहेस". केवळ एखाद्याची जन्मदात्रीच त्याची आई होऊ शकते असे नाही. समोरच्या व्यक्तीला तुमच्या वागण्यातले वात्सल्य जाणवले की ती व्यक्ती स्वतःच तुम्हाला मातृत्व बहाल करते. आईविना वाढलेल्या कित्येक मुलांच्या वडिलांना किंवा पोटचे मूल नसलेल्या स्त्रियांनाही मातृत्वाचे हे सुख मिळतच असेल.

गेल्या महिन्यात आनंदच्या एका मित्राच्या मुलीचे लग्न दिल्लीला होते. "सासू आजारी असल्याने आम्ही  येऊ शकत नाही", असे आनंदने त्याला कळवले. त्यावर त्या समंजस मित्राचे आलेले उत्तर वाचून आमचे डोळे पाणावले,

" No problem Anand. We are really fortunate to take care of our elders . Take care of her"

अनेक आप्तेष्टांचे आणि खुद्द स्वतःच्या जन्मदात्रीचे मातृत्व निभावण्याचे भाग्य मला लाभले आहे, याची जाणीव आनंदच्या मित्राने करून दिली.

चटकन एक मागणे मनात आले,
"असे मातृत्व दे गा देवा".