मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-३

१५ नोव्हेंबरच्या सकाळी आम्ही सगळेच आरामात उठलो. सामान आवरून, दोन टॅक्सी घेऊन आम्ही सोमनाथकडे निघालो. आमच्या चालकाने सुचवलेल्या, हायवे वरच्या एका हॉटेलमधे थांबून नाष्टा घेतला. सोमनाथ देवस्थान प्रभास पाटण या गावामधे आहे. दीव ते प्रभास पाटण हे अंतर ९५ किलोमीटर आहे. रस्ता चांगला असल्याने आम्ही एक वाजायच्या आतच प्रभास पाटण येथील हॉटेलमधे पोहोचलो. त्या दिवशी दुपारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणारा विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना, कुठल्याही परिस्थितीत शिरीषला चुकवायचा नव्हता. म्हणूनच सोमनाथला दुपारी एक वाजायच्या आत पोहोचण्याबाबत तो आग्रही होता. आपापल्या खोल्यांचा ताबा घेऊन स्थिरस्थावर होईपर्यंत भारत-न्यूझीलंड सामना सुरू झाला होता.

सकाळी उशीरा आणि भरभक्कम नाष्टा केलेला असल्याने कोणालाही जेवायची इच्छा नव्हती. तसे अडीअडचणीला उपयोगी पडावा म्हणून मी आणि प्राचीने, एका पिशवीमध्ये दिवाळीचा फराळ भरून आणला होता. खाद्यपदार्थाच्या गच्च भरलेल्या त्या पिशवीचे नामकरण शिरीषने 'गाझा पिशवी' असे केले होते! त्याच्या म्हणण्याप्रमाणे, हेलिकॉप्टरने ती पिशवी गाझा पट्टीमध्ये टाकली तर युद्धविराम होईपर्यंत तमाम गाझावासियांना पुरून उरतील इतके खाद्यपदार्थ त्या पिशवीत होते! त्याउप्पर, शिरीषच्या मित्राने आणि शिरीषच्या सासूबाईंनी बांधून दिलेला फराळ त्याने सोबत आणलेला होता, तो वेगळाच! त्यामुळे एखादे-एखादे जेवण चुकले आणि अगदीच भूक लागली तर चिवडा, लाडू, शंकरपाळे, चिरोटे आणि चकल्यांवर भागवायचे, असा अलिखित नियम आम्ही केला होता. 

त्याच संध्याकाळी सोमनाथ देऊळ बघण्याची माझी व प्राचीची इच्छा होती. पण आम्ही काही बोलायच्या आतच, सामना संपेपर्यंत कुठेही बाहेर न पडण्याचा निर्णय चौघाही पुरुषांनी जाहीर करून टाकला. त्यामुळे आम्ही दोघीच, दुपारच्या चहानंतर रिक्षा पकडून देवदर्शनाला निघालो. आम्हा सहा जणांपैकी श्रद्धाळू म्हणावे अशी फक्त प्राचीच होती. आधीच्या बेतानुसार गिरीश आणि प्राची असे दोघेच सोमनाथ-द्वारका करणार होते. नंतर मीही सोबत येतेय हे समजल्यावर, प्राचीबरोबर देवळामधे जाण्याचे काम गिरीशने अगदी तत्परतेने मला आऊटसोर्स करून टाकले होते! मला देवळे बघायला आवडत असल्याने मीही ते आनंदाने स्वीकारले होते.  

मंदिर परिसरात अतोनात गर्दी असल्याने, देवळापासून चार-पाचशे मीटरच्या अंतरावर पोलिसांनी वाहनप्रतिबंधक अडथळे लावून ठेवले होते. रिक्षावाल्याने ज्या ठिकाणी आम्हाला सोडले, तिथे समोरच लक्ष्मीनारायण मंदिर दिसत होते. त्या देवळात दर्शन घेऊन, उजवीकडे वळून आम्ही समुद्राच्या दिशेने, म्हणजे सोमनाथ मंदिराकडे पायी चालत निघालो. अनेक शतके भग्नावस्थेत आणि दुर्लक्षित असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे कार्य श्री. वल्लभ भाई पटेलांच्या पुढाकारामुळे १९५१ साली पूर्ण झाले. अतिशय भव्य आणि देखणे असे हे मंदिर आहे. 
मुख्य सोमनाथ मंदिरात मोबाईल, बॅग्स, पर्सेस, डिजिटल घड्याळे आणि अर्थातच चपला न्यायला मनाई आहे. या वस्तू लॉकरमध्ये ठेवण्याची मोफत व्यवस्था आहे. आपण आपली वस्तू ठेवली की आपल्याला एक टोकन मिळते. ते टोकन परत केले की आपली वस्तू आपल्याला परत मिळते. मात्र, मोबाईल्स एका ठिकाणी, पर्स दुसऱ्याच ठिकाणी आणि चप्पल्स तिसऱ्याच  ठेवायची असल्याने बराच वेळ वाया जातो. देवळात फार गर्दी असेल तर लॉकरमध्ये जागा नसते आणि बराच वेळ तिष्ठत उभे राहावे लागते. त्या दालनामध्ये सर्वत्र CCTV कॅमेरे बसवले असल्यामुळे वस्तू चोरीला जाण्याची भीती जरा कमी असते. आमचे मोबाईल्स, पर्सेस आणि चप्पल्स ठेऊन, टोकन घेऊन आम्ही महिलांच्या बारीमध्ये उभे राहिलो. 

रांगेमध्ये जवळपास तास-दीडतास उभे राहिल्यानंतर आम्ही देवळामध्ये पोहोचलो. गर्दी असल्याने, लांबूनच जेमतेम काही सेकंद दर्शन मिळाले. संध्याकाळच्या आरतीच्या दोन मिनिटे आधीच आम्ही गाभाऱ्यात पोहोचल्यामुळे, ती आरती बघायला मिळाली नाही. बाहेर पडून, परत रांगेत घुसून आरती बघण्याचा प्रयत्न केला पण आम्ही  गाभाऱ्यापर्यंत पोहोचेस्तोवर आरती संपून गेली होती. 

देवळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार ठेवलेला आहे. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रतट आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेला सुप्रसिद्ध, दिशादर्शक बाणस्तंभ आम्ही बघितला. मुख्य मंदिराजवळच एक जुने शिवमंदिरदेखील आहे.  १७७३ साली पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी ते बांधून घेतले होते. त्या मंदिरातही जाऊन आम्ही दर्शन घेतले. अशा रीतीने सर्व परिसराची पाहणी (Recce) करून आम्ही हॉटेलवर परतलो. सोमनाथ मंदिराची महती, आणि त्याचा इतिहास यावर पुढील भागांमध्ये लिहीन.   




 

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-२

१४ नोव्हेंबरला दुपारचे ऊन ओसरल्यावर आम्ही INS Khukri स्मारक बघायला बाहेर पडलो. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामधे, भारतीय नौदलाचे हे लढाऊ जहाज पाकिस्तानी पाणबुडीने केलेल्या सागरी हल्ल्यामध्ये कामी आले. दिनांक ९/१२/१९७१ या दिवशी, दीवच्या किनाऱ्यापासून ४० सागरी मैल दूरवर या जहाजाला आणि त्यावरील १८ नौदल अधिकारी आणि १७६ नौसैनिकांना जलसमाधी मिळाली. खुकरी जहाजाचे अवशेष आजही दीवजवळ समुद्राच्या तळाशी पडून आहेत. 

नौदलाच्या परंपरेप्रमाणे, जहाजावरील सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडल्याशिवाय जहाजाचा कप्तान जहाज सोडत नाही. ती परंपरा सांभाळत, 'खुकरी'चे मुख्य अधिकारी, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी जहाजासोबतच जिवंत जलसमाधी घेतली. भारतीय नौदलाने, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना मरणोत्तर महावीरचक्र देऊन त्यांचा गौरव केला. INS Khukri स्मारकाचे उद्घाटन १५ डिसेंबर १९९९ साली, नौदलाच्या पश्चिम विभागाचे तत्कालीन मुख्य अधिकारी, व्हाईस ऍडमिरल माधवेंद्र सिंग यांच्या हस्ते केले गेले. हे स्मारक चोवीस तास खुले असते आणि इथे जाण्यासाठी काहीही प्रवेशशुल्क आकारले जात नाही. 

आम्ही स्मारकाजवळ पोहोचलो त्यावेळी ऊन उतरलेले असल्याने हवा आल्हाददायक होती. समुद्रकिनाऱ्याजवळच एका टेकाडावर हे स्मारक उभे केलेले आहे. हे छोटेसे टेकाड चढून जाणे सहजी शक्य आहे.  तसेच वर जाण्यासाठी, बॅटरीवर चालणाऱ्या गोल्फ कार्टची व्यवस्था अगदी माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे. दादा आमच्याबरोबर असल्याने आम्ही सर्वजण गोल्फ कार्टनेच वर गेलो. त्या टेकाडावर उभे राहून, तेथे फुलवलेल्या बागेकडे नजर टाकल्यास,  समुद्राच्या लाटांचा आभास होतो. टेकाडावरील बाग, आसपासचा परिसर आणि अगदी समुद्रालगत असलेले अँफीथिएटर, हा सर्व परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका ठेवलेला आहे. 

टेकाडावरील सर्वात उंच जागी, चहूबाजूंनी काचेच्या भिंती असलेल्या एका बंदिस्त खोलीत खुकरी जहाजाची प्रतिकृती ठेवलेली आहे. समुद्राच्या दिशेला तोंड करून ठेवलेली जहाजाची प्रतिकृती काचेतून व्यवस्थित दिसते. १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धामधल्या त्या दुर्दैवी घटनेत जलसमाधी मिळालेल्या सर्व वीर नौसैनिकांची नावे त्या काचेच्या भिंतींवर लिहिलेली आहेत. स्मारकाजवळ उभे राहून आम्ही त्या सर्व वीरांना, मनोमन श्रद्धांजली वाहिली. स्मारकाचा स्वच्छ परिसर, समुद्राच्या तटावर असलेले सुंदर, खुले अँफी थिएटर, आणि त्या तटाला धडक देणाऱ्या फेसाळत्या लाटा, हे सगळे दृश्य अतिशय मनोहर होते. पण तरीही, खुकरी दुर्घटनेच्या आठवणीमुळे, "आहे मनोहर तरी गमते उदास" अशाच काहीश्या संमिश्र भावना आमच्या मनामध्ये होत्या. 

१९७१ च्या युद्धात खुकरी जहाज बुडाल्यानंतर काही वर्षांनी, भारतीय नौदलामधील Corvette प्रकारच्या दुसऱ्या एका जहाजाला पुन्हा 'खुकरी' हेच नाव दिले गेले. हे भारतीय बनावटीचे जहाज, माझगाव डॉक येथे तयार केले गेले होते. ऑगस्ट १९८९ मध्ये नौदलाच्या सेवेत रुजू झालेले हे खुकरी जहाज डिसेंबर २०२१ मध्ये नौदलाच्या सेवेमधून निवृत्त झाले. जानेवारी २०२२ मध्ये नौदलाने ते जहाज दीव प्रशासनाकडे हस्तांतरित केले. आता ते दीवच्या समुद्रकिनाऱ्यावर नांगर टाकून उभे आहे आणि तरंगते संग्रहालय म्हणून ओळखले जाते. लढाऊ जहाजामध्ये वापरली जाणारी विविध शस्त्रे व उपकरणे आणि इतर काही वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. खुकरी स्मारक पाहून निघाल्यावर खरं तर आम्हाला हे 'खुकरी संग्रहालय' बघायला जायचे होते. पण सर्वानुमते आमचे असे ठरले की आधी संग्रहालय पाहण्याऐवजी दिवसाउजेडी नागोवा बीचवर जाऊन यावे. 

दीव गावापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आणि दीव विमानतळापासून अगदी जवळ नागोवा बीच आहे. इथे दीवमधली सर्वात आलिशान आणि महागडी हॉटेल्स आहेत. दीवमधल्या बऱ्याच  हॉटेल्सचे दर पर्यटनाचा मौसम सुरु झाला की गगनाला भिडतात. इतरवेळी ३ ते ४ हजार रुपये रोजचे भाडे अससेल्या हॉटेलच्या खोलीसाठी काही लोकांना १५ ते २०००० रुपये मोजावे लागले होते. आम्ही उतरलेल्या हॉटेलमध्येही आमची अशीच लुबाडणूक झाली होती. दीव हे गुजरातशेजारच्या केंद्रशासित प्रदेशातील शहर गुजरातच्या सीमेलगतच आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे आणि या केंद्रशासित प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे, खास मद्यपान करण्यासाठी अनेक गुजराती पर्यटक या ठिकाणी येतात, असे मी ऐकून होते. 'खास पिण्यासाठी' आलेले वाटावेत अशा पर्यटकांची गर्दी नागोवा बीचच्या आसपास दिसली. 

समुद्रकिनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यातच अनेक फिरंगी पर्यटकही होते. एकुणात हा बीच म्हणजे दीव मधील 'Happening place' आहे, हे जाणवत होते. बीचकडे जाणाऱ्या वाटांवर दुतर्फा, गिचमिडीत अनेक छोटी-छोटी दुकाने होती. कपडे, फळे, खाद्यपदार्थ, फुगे, खेळणी, शीतपेये आणि आईस्क्रीम विक्रेते मोठमोठ्याने ओरडून लोकांना आपापल्या दुकानात बोलावत होते. तसेच जवळपासच्या हॉटेल्समध्ये भरपूर रोषणाई, पाश्चात्य संगीत, अशी चहल-पहल दिसत होती. 

पुळणीवर समुद्राला समांतर फेरफटका मारण्यासाठी उंट आणि मोटारबाईक होत्या. तसेच समुद्राच्या पाण्यावर नौकाविहाराला जाण्यासाठी स्पीड बोट्स व साध्या बोटीही दिसत होत्या. दूरवर पॅरासेलिंग चाललेले दिसले. चार वर्षांपूर्वी मी दिवेआगारला प्रथम पॅरासेलिंग केले होते. त्यावेळी जीपला बांधलेल्या एकाच पॅराशूटच्या सहाय्याने मी आणि आनंद, दोघेही हवेत उंच उडालो होतो. पॅरासेलिंगची ती माझी पहिलीच वेळ असल्यामुळे, 'कधी एकदा सुखरूप खाली पोहोंचतोय' या विचाराने मी जीव मुठीत धरून बसले होते. त्यामुळे हवेत तरंगण्याचा आनंद फारसा अनुभवता आला नव्हता. आता मात्र मला आणि प्राचीलादेखील पॅरासेलिंग करायची उर्मी आली. वाऱ्यावर  हेलकावत, हवेत उंच  जाण्याचा आनंद यावेळी उपभोगायचाच अशी खूणगाठ मी मनाशी पक्की केली. पण प्रत्यक्ष वर जाताना आणि खाली येताना पोटामध्ये गोळा उठल्याशिवाय राहिला नाही. प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे, पॅराशूटच्या दोरीवर घट्ट पकडलेले हात काही सेकंदासाठी सोडून, पक्ष्याच्या पंखाप्रमाणे हवेत पसरून मी हलवले. पॅराशूटमध्ये वारं भरून आपण वर गेलो की आपले अंगही अगदी हलके भासते. अर्थात वजन घटल्याचा तो आनंद क्षणिक असतो, कारण काही मिनिटांतच आपल्याला जमिनीवर आणले जाते! 

मला वाटते प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी पॅरासेलिंगचा अनुभव घ्यायलाच हवा. 

पॅरासेलिंग करून येईपर्यंत आम्हाला उशीर झाला होता. खुकरी संग्रहालयाला भेट देणे आम्हाला शक्य झाले नाही. दीवमधल्या प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणी, उघड्या पोत्यांमध्ये ठेवलेला सुकामेवा आणि गरम मसाल्याचे  छोटे-छोटे ढीग किंवा वाटे विकणारे विक्रेते दिसले होते. अगदी उत्तम प्रकारचा सुकामेवा बाजारभावाच्या निम्म्या भावात इथे उपलब्ध होता. तो इतका स्वस्त कसा काय विकत असतील? हे कोडे मात्र सुटले नाही. कदाचित तो कर चुकवून आणलेला किंवा तस्करीचा विदेशी माल असू शकेल असे आम्हाला वाटले. नमुन्यादाखल आम्ही सुकामेवा विकत घेतला, आणि थोडा-थोडा सुकामेवा तोंडात टाकत, साडेसात-आठ वाजेपर्यंत हॉटेलमधे परतलो. जेवणानंतर पुन्हा पत्त्यांचे डाव रंगल्यामुळे झोपायला बराच उशीर झाला.     

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-१

यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, गिरीश-प्राची, म्हणजे माझे भाऊ-वहिनी, मुंबईहून सोमनाथ-द्वारका दर्शनासाठी जाणार होते. मी, आनंद, माझा चुलतभाऊ शिरीष, आणि  'दादा', म्हणजे माझे वडील, अशा चौघांनीही त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. त्यानुसार १३ नोव्हेंबर २०२३ च्या दुपारी मुंबईहून दुपारची फ्लाईट पकडून आम्ही तासाभरात दीवला पोहोचलो. आधीच्या आठवडाभराचे जागरण, पुणे-मुंबई प्रवास, दिवाळीच्या कामांची दगदग अशामुळे आम्ही सगळे दमलो होतो. जेवण झाल्यावर सगळेजण झोपून गेलो. संध्याकाळी चहा घेऊन पत्त्यांचे  डाव लावले आणि सुट्टी सुरू झाल्यासारखे वाटले.


दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ नोव्हेंबरच्या सकाळी एक खाजगी टॅक्सी करून आम्ही दीव-दर्शन करायला बाहेर पडलो. सर्वप्रथम आम्ही दीवचा किल्ला बघितला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला  अतिशय प्रेक्षणीय आहे. दीव या बेटावर पूर्वापार अनेक राज्यकर्ते राज्य करून गेले. पण १३३० साली गुजरातेतील सुलतान शाहबहादूर याने दीव जिंकून घेतले. १४९८ साली पोर्तुगीजांनी भारतभूमीवर पाय ठेवला. त्यानंतर ते भारताच्या किनारपट्टीवरील एकेका बंदरात आपले पाय रोवू लागले. अनेक वर्षे, दीव येथे किल्ला बांधण्याची परवानगी पोर्तुगीज गुजरातच्या सुलतानाकडे मागत होते. पण, मलिक अय्याझ नावाचा, सुलतानाचा एक सुभेदार पोर्तुगीजांच्या मागणीला सातत्याने विरोध करत राहिला. १५३५ साली मुघल सम्राट हुमाँयू याने गुजरातच्या सुलतानावर स्वारी केली. त्यावेळी  सुलतान शाहबहादूर याने 'नुनो दा कुन्हा' या पोर्तुगीज अधिकाऱ्याशी युती केली. मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी सुलतानाला मदत करण्याच्या बदल्यात पोर्तुगीजानी दीव किनाऱ्यावर किल्ला बांधण्याची परवानगी सुलतानाकडून मिळवली. पोर्तुगीजांनी १५३७ ते १९६१ असे जवळपास सव्वाचारशे वर्षे दीव-दमण या भागावर राज्य केले. 

दीव  बेटाच्या नैऋत्य टोकावर वसवलेला हा मजबूत किल्ला अजूनही उत्तम स्थितीत आहे.  किल्ल्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे. त्या अथांग सागराचे दर्शन आपल्याला श्वास  रोखायला लावते. बाहेरील तटबंदी समुद्रकिनाऱ्यालगतच आहे. आतल्या तटरक्षक भिंतीवर सर्वबाजूनी तोफा मांडलेल्या आहेत. दोन्ही भिंतींच्या मधल्या खंदकामध्ये पाणी आहे. मुख्य प्रवेशदारातून आत आल्यावर उजव्या बाजूला पाच मोठ्ठ्या खिडक्या असलेली भिंत दिसते. डाव्या बाजूला भर समुद्रात वसलेला, 'पाणकोट' नावाचा जलदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरुज, आतील कमानी, मजबूत तटबंदी हे पाहिल्यावर, हा किल्ला चार शतके अभेद्य का राहिला असावा हे समजून येते. किल्ल्याच्या एका टोकाला समुद्राच्या आत घुसणारी वाट, म्हणजेच बोटींना थांबण्यासाठीचा धक्का आहे. किल्ल्याच्या आत एक कैदखाना, चर्च, दारुगोळ्याचे कोठार, छोटेखानी दीपगृह अशा काही इमारती आहेत. किल्ल्याच्या आत असलेले एक तुळशी वृंदावन पाहून मला आश्चर्यच वाटले. बारकाईने पाहता, त्यावर सोमवार दि. १३/१२/१९४३ असा तपशील कोरलेला दिसला. म्हणजेच किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असतानाच्या काळातलेच ते तुळशी वृंदावन होते! परंतु, ते कोणी व का बांधले असावे हे मात्र गूढच राहिले. 


किल्ला पाहून झाल्यावर आम्हाला दीवचे सुप्रसिद्ध सेंट पॉल चर्च बघायचे होते. पण त्या चर्चचा जीर्णोद्धार होत असल्यामुळे ते बंद होते आणि आम्हाला ते बाहेरूनच बघावे लागले. चर्चेच्या शुभ्र, दिमाखदार इमारतीचे बाह्यदर्शनही खूप सुखावह होते. त्यानंतर आम्ही दीवपासून तीन किलोमीटर अंतरावरच्या  फुडम  गावाजवळ गंगेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. हे प्राचीन मंदिर पांडवांनी बांधले आहे असे मानले जाते. या ठिकाणाला मंदिर म्हणण्यापेक्षा देवस्थान म्हणणे योग्य आहे. कारण, याची रचना कोणत्याही सर्वसामान्य मंदिराप्रमाणे नाही. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका खडकाच्या पोटात नैसर्गिकरीत्या एक गुहा बनलेली आहे. या गुहेमध्ये किंवा दगडाच्या खोबणीमध्ये, पाच सुबक शिवलिंगे आहेत. हे देवस्थान अतिशय सुंदर आहे. समुद्राच्या लाटा अहोरात्र या शिवलिंगांवर अभिषेक करत असतात. समुद्राला भरती आल्यावर, समुद्रात घुसणारा खडकाचा एक सुळका वगळता बाकी संपूर्ण खडक पाण्याखाली लुप्त होतो, हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. 


सकाळपासून जवळपास तीन-चार तास कडक उन्हामध्ये बाहेर हिंडल्याने आम्हाला दमणूक जाणवायला लागली होती. त्यामुळे दुपारच्या वामकुक्षीनंतरच पुन्हा बाहेर पडायचे ठरवून आम्ही हॉटेलवर परतलो.