सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

देवा, असेच छत्र असू द्या !

मागचे दोन आठवडे , माझ्या बालरुग्णांना रात्री अपरात्री उदभवणाऱ्या दुखण्यांमुळे,  मला दुखणे आल्यासारखे झाले  होते. रोजचे जागरण होत होते, सकाळी लवकर जाग येत नव्हती आणि उठल्यावरही अंग आळसावलेले राहत होते.  आज मात्र पहाटे पहाटे छान जाग आली. त्यामुळे बरेच दिवसांनी, सकाळी फिरायला बाहेर पडले. बाहेर उघडीप होती म्हणून छत्री घ्यावी का न घ्यावी, अशा व्दिधा मनस्थितीत असताना शेवटी,  छत्री घेऊनच बाहेर पडले. मागच्या वर्षी, आमची अर्धांगवायू झालेली छत्री बाद करून, चांगली महागातली एक  नवीन छत्री  विकत घेतली होती. पण मागच्या पावसाळ्यात काही तिची घडी  मोडता आली नव्हती. त्यामुळे ती तशी अजूनही नवीनच असल्यासारखी आहे.

पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर पडले आणि पाऊस आलाच नाही की माझा जरासा हिरमोडच होतो.  अशा वेळी, "कशासाठी उगीच छत्री घेऊन बाहेर पडतात, कुणास ठाऊक " असा भाव काही लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसतो आणि वाईट वाटते. आज मी बाहेर पडून थोडा वेळ झाला आणि पावसाच्या सरी सुरु  झाल्या. मी मोठ्या दिमाखाने माझी छत्री उघडली. अशावेळी मात्र, छत्री नसलेल्यांकडे बघून मात्र मला जास्तच वाईट वाटते. आषाढ आणि श्रावणांत, रस्त्यावर छत्री उघडझाप करण्याचा खेळ करण्यातही एक मजा असते . पाऊस थांबला म्हणून छत्री बंद करावी तर, आपण  छत्री उघडेस्तोवर आपल्याला भिजवून टाकणारी एखादी जोरदार सर येऊन जाते. आपण छत्री उघडून चालत राहावे, तर मधेच पाऊस बंद होतो. पाऊस थांबलाय, हे लक्षांत न आल्यामुळे छत्री उघडी ठेऊन चालत राहिलं तर, "बाई आता पाऊस थांबलाय, बंद करा ती छत्री" असा भाव समोरच्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. 

या पावसाळ्यांत नवीन छत्री वापरून , पावसावर  आणि छत्रीवर चार ओळी  लिहण्याचा योग आलाय, हे ही नसे  नसे थोडके. वरुणराजा, तुझे छत्र असेच आमच्यावर राहू दे रे बाबा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा