सोमवार, ६ मे, २०२४

कर्णफुलांच्या गोष्टी!

त्या दिवशी जोरजोरात सायकल चालवत, मी कशीबशी कॉलेजमधे वेळेत पोहोचले होते. पहिला तास सुरू व्हायला जेमतेम एक-दोन मिनिटे बाकी होती. आम्ही मैत्रिणी वर्गात शिरून बाकांवर बसत असतानाच माझी एक मैत्रीण माझ्याकडे बघून हासत-हासत उद्गारली,
"स्वाती, काय गं हे? एकाच कानात रिंग घातली आहेस. दुसऱ्या कानातली रिंग घालायला विसरलीस की काय?"
मी चपापून दोन्ही कानांना हात लावला, तर काय? खरोखर फक्त एकाच कानात रिंग होती. तितक्यातच आमचे प्राध्यापक वर्गात शिरले आणि त्यांनी  तास चालू केला. 

माझी छाती धडधडायला लागली. सकाळी घरातून निघताना, दोन्ही कानामधे सोन्याच्या रिंग्ज घातल्याचे मला निश्चित आठवत होते. पण मग एक रिंग गेली तरी कुठे? सरांच्या शिकवण्याकडे माझे लक्षच लागेना. आता घरी गेल्यावर कुणाकुणाची, किती आणि काय-काय बोलणी खावी लागतील, या विचाराने मी भलतीच अस्वस्थ झाले. ती  रिंग वाटेत कुठे पडली असेल का? पडली असली तर कुठे? माझ्या मनांमध्ये सगळ्या उलट-सुलट विचारांनी जणू रिंगणच धरले. 
सरांचा तास संपेपर्यंत मी कशीबशी कळ काढली. सर बाहेर पडल्याबरोबर, मीही तडक वर्गाच्या बाहेर पडून  सायकल  मारत घराच्या दिशेने निघाले. पण घरापर्यंत न जाता, काहीतरी विचाराने वाटेतच एके ठिकाणी मी थांबले. तिथेच खाली बसून, वेड्यासारखी तिथल्या धुळीमध्ये हात फिरवत मी शोधू लागले. आणि आश्चर्य म्हणजे त्या धुळीत माझी सोन्याची रिंग चकाकताना मला दिसली! माझा जीव भांडयात पडला. मी ती रिंग उचलून कानात घातली  आणि पुन्हा सायकल पळवत  कॉलेजात येऊन पोहोचले!

त्याचे असे झाले होते की, मी घरातून बाहेर पडताना माझा 'एप्रन' बॅगमध्ये ठेवला होता. सायकलवर कॉलेजला निघणार तेवढ्यात लक्षात आले की सायकलमध्ये हवा अगदीच कमी आहे. म्हणून मग सायकल हातात धरून चालत जवळच्या सायकलवाल्याकडे गेले. सायकलमध्ये हवा भरायला थांबलोच आहोत तर, नंतरचा वेळ वाचावा म्हणून, बॅगमधला एप्रन बाहेर काढून मी गडबडीत अंगावर चढवला. हे सगळे मला आठवत होते.  कदाचित एप्रन घालताना ती रिंग माझ्या कानातून निसटून खाली पडली असेल ही एक शक्यता होती. म्हणून मी तिथे शोधू लागले आणि खरोखरच तसे झाले असल्याने ती रिंग मला मिळाली.
 

तुम्ही म्हणाल, आज इतक्या वर्षानंतर ही गोष्ट सांगण्याचे काय कारण? ते कारणदेखील कर्णफुले हरवण्याच्या अलीकडच्या काही घटनांबाबतीतले आहे.  परंतु, ते माझ्या कर्णफुलांचे नाही आणि ती कर्णफुलेही एका वेगळ्याच प्रकारची आहेत! 

नव्वदी पार केलेल्या माझ्या वडिलांनी, आमच्या आग्रहाखातर, चार-पाच वर्षांपूर्वी, त्यांच्या दोन्ही कानांसाठी मशिन्स  (hearing aid) विकत घेतली. अतिशय चांगल्या प्रतीची व नवीन तंत्रज्ञान वापरून बनवलेली ती यंत्रे बऱ्यापैकी महाग होती. एकेका कानाचे मशीन जवळपास लाख-लाख रुपयाचे होते. त्यांच्या या कानाच्या मशीन्सबद्दल, आम्ही गमतीनेच, "दादा, ही तुमची कर्णफुले आहेत", असे म्हणतो. आणि ही मौल्यवान कर्णफुले  माझ्या वडिलांकडून अनेक वेळा आणि वेगवेगळ्या प्रकारे गहाळ होत राहतात. 
चाळीस वर्षांपूर्वी माझ्या कानातली रिंग गायब झाली होती, तेंव्हा मी वडीलधाऱ्यांच्या भीतीने कावरी-बावरी झाले होते. गंमत म्हणजे आज वडिलांची कर्णफुले गहाळ झाली की, माझ्या धाकाने ते कावरेबावरे होतात!

वडिलांची दोन्ही मशिन्स एकाचवेळी दिसेनाशी झाली की आम्हाला जवळजवळ खात्रीच असते की त्यांनी ती नेहमीच्या जागी न ठेवता दुसरीकडे कुठेतरी ठेवली असणार. थोडी शोधाशोध केली की ती सापडतात. पण एकच मशीन गायब झाले तर मात्र फारच मोठे शोधकार्य हाती घ्यावे लागते. 
कुठल्यातरी शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात, कधी बाथरूममध्ये, कधी खुर्ची किंवा सोफ्याच्या सीटखाली, तर कधी चष्म्याच्या केसमध्ये, अशा वेगवेगळ्या आणि अकल्पनीय जागी आम्हाला ते कर्णफूल सापडते. 

एकदा असेच, त्यांचे एकाच मशीन दिसेनासे झाले. आम्ही सगळे घर उलथे -पालथे केले. त्यांची खोली दोन-दोनदा झाडून काढली. अगदी कपाटे आणि टेबलाखालूनही झाडू फिरवला. पण मशीन काही सापडले नाही. त्या दिवशी वडिलांनी त्यांचे कपाट आवरले होते. त्या आवरा-आवरीनंतर बराच सुका कचरा फेकून दिल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. काहीच मिनिटांपूर्वी आमच्या इमारतीत कचरा गोळा करायला येणाऱ्या बाईला, आमच्या घरातला सगळा सुका कचरा आम्ही दिला होता. मशीन कचऱ्यात गेले असेल तर तिला शोधायला सांगावे म्हणून गडबडीने तिला फोन केला. तर ती म्हणाली, "अवो, आत्ताच तर सगळा कचरा महानगरपालिकेच्या गाडीवाल्याला दिला की!"
 
मग काय? आम्ही महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीचा माग काढत-काढत गेलो. बरेच लांब गेल्यावर एका सोसायटीच्या बाहेर ती गाडी दिसली. त्या गाडीवरचा असंख्य पोत्यामधून, आमच्या इमारतीतील पोते आम्ही अंदाजाने शोधून काढले. ते पोते उलटे करून बघितले. पण त्या पोत्यामध्ये ते मशीन काही सापडले नाही. 

हताश होऊन आणि काहीसे वैतागून आम्ही घरी परत आलो. मशीन शोधण्याच्या नादात, घरात बराच पसाराही आम्ही करून ठेवला होता. तो आवरण्याचे  काम होतेच. माझे वडील तोंड पाडून, एका कोपऱ्यात बसून होते. आपल्यामुळे आपल्या मुलीला आणि जावयाला त्रास सहन करावा लागतोय, अशी कमालीची अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. आम्ही दोघांनी त्यांना धीर दिला. आजच नवीन मशीन घेऊन टाकूया असे सांगितले आणि घरातला पसारा आवरायला लागलो. आवरून झाल्यावर जरा नीट स्वच्छता करावी या हेतूने वडलांच्या खोलीतले टेबल पुढे ओढून त्यामागून व त्याखालूनही पुन्हा झाडून घेतले. टेबल भिंतीकडे सरकवत असतांना, टेबलाच्या मागच्या पट्टीला ते मशीन अडकून, लटकलेल्या अवस्थेत दिसले! 

आम्हाला सर्वांनाच काय आनंद झालाय म्हणून सांगू!

त्याच कर्णफुलाची काल संध्याकाळी घडलेली गोष्ट. 
वडिलांच्या एका कानातले मशीन जरा विचित्रपणे बाहेर आल्याचे मला जाणवले. पाहते तर काय, कानाच्या मागे बसणार मशीनचा मुख्य भाग व्यवस्थित होता, पण कानाच्या आत जाणारा छोटा रिसीव्हर मात्र गायब झालेला दिसत होता. पुन्हा घर झाडणे, गाद्या उलट्या-पालट्या करणे, चादरी झटकणे, ठिकठिकाणी शोधाशोध करणे हे सगळे सोपस्कार झाले. पण तो तुकडा काही मिळेना. सहज माझ्या डोक्यात काहीतरी आले. मोबाईलच्या टॉर्चने, वडिलांच्या कानाच्या आत प्रकाशझोत टाकला, तर काय? तो तुकडा तुटून, त्यांच्या कर्णनलिकेच्या (Auditory  Canal) बराच आत रुतून बसलेला दिसला! मग सर्जिकल चिमट्याच्या साहाय्याने, आम्ही तो मोठ्या खुबीने बाहेर काढला.

 
कर्णफुले हरवण्याच्या आणि गवसण्याच्या या काही गमतीदार गोष्टी षट्कर्णी व्हाव्यात यासाठीच हा लेख!

१८ टिप्पण्या:

  1. किती साधी गोष्ट पण किती गमतीदार करून लिहिलीत.खूप छान

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान लिहिलाय लेख...

    उत्तर द्याहटवा
  3. खूप मस्त विनोदी शैलीत लिहिलंय ...छानच ...

    उत्तर द्याहटवा
  4. नेहमी प्रमाणे सहज व सुन्दर

    उत्तर द्याहटवा
  5. वृद्ध वडिलांच्या भावनांना प्राधान्य देणे ही गोष्ट महत्त्वाची...त्यांच्यावर न ओरडता सहकार्य केल्याने जगण्याची नवीन उर्मी भेटते आणि एकलकोंडेपणा जाणवत नाही.. एकमेकांना थोडा फार त्रास झाला तरी माणसे जपणे महत्त्वाचे.. मुलं लहान असतात तेव्हा आई वडील क्षणभर जरी नजरे आड झाले तरी त्यांना चालत नाही पण एकदा आपल्या पायावर उभी राहून आयुष्यात स्थिर स्थावर झाली की आई वडिलांच्या भेटी पण घ्यायला वेळ राहत नाही.. त्यांचे प्राधान्य क्रम बदलतात.. प्रत्येक वेळी व्यवहार पाहिला जातो.. करियर जॉब हेच प्रथम स्थानी येतात. जेव्हा आई वडील आयुष्यातून आणि जगातून निघून जातात तेव्हा पोकळी जाणवते पण वेळ गेलेली असते. तात्पर्य, वडीलधाऱ्या माणसांची जिवंतपणी सेवा महत्त्वाची. नंतर दिमाखात दिवस श्राद्ध कर्मे करणे हा केवळ दिखावाच असतो.
    खुप सुंदर लेख..












    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान 👌👌👌👌, दादा खूप भाग्यवान आहेत 👍👍

    उत्तर द्याहटवा