शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती- ५

लोणार सरोवर बघून आम्ही संध्याकाळी MTDC रिसॉर्टवर परत आलो, आणि इथे "कोणी चांगला माहितगार गाईड आहे का?" अशी विचारणा तिथल्या कर्मचाऱ्यांकडे केली. महेश मिश्रा नावाच्या गाईडचा नंबर त्यांच्याकडून मिळाला. मी लगेच महेश मिश्रांशी संपर्क साधला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता लोणार सरोवराच्या प्रवेशद्वाराजवळ भेटायचे आम्ही ठरवले. उद्या पहाटे तो आमच्या बरोबर लोणार सरोवरापर्यंत येऊन त्या परिसरातील सर्व मंदिरांची माहिती देणार होता. 

रात्रीचे जेवण लवकर उरकून आम्ही त्वरित झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे आंघोळीच्या गरम पाण्याने दुखरे अंग शेकून घेतले आणि बरोबर सात वाजता आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो. महेश मिश्राही वेळेत तिथे आलेला होता. महेश हा जेमतेम तिशी पार केलेला, एम.कॉम. शिकलेला, मृदुभाषी तरुण आहे. त्याचे आडनाव मिश्रा असले तरी तो उत्तम मराठी बोलत होता. पहिल्या पाच-सात मिनिटांमधले त्याचे बोलणे ऐकूनच, चांगला माहितगार गाईड मिळाला असल्याची आम्हा दोघांची खात्री पटली. लोणार परिसराचे गाढे अभ्यासक, व तेथील कॉलेजचे माजी प्राचार्य कै. सुधाकर बुगदाणे सरांशी महेशचा शालेय जीवनातच संपर्क आलेला होता. त्यांच्यासोबत हा संपूर्ण परिसर महेशने हिंडून पाहिलेला होता. बुगदाणे सरांकडून महेशने मिळवलेल्या माहितीला,  MTDC आणि वनखात्याकडून त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचीही जोड मिळालेली आहे.

महेशने सांगितले की, सरोवराच्या  परिसरामधे महादेवाची एकूण बारा मंदिरे आहेत. या बारा महादेवांचे दर्शन घेतले तर भारतभर विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य मिळते असे मानतात. गोमुख तीर्थाच्या जवळच असलेले, भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळचे हटकेश्वर किंवा हटेश्वर मंदिर हे तंत्र-मंत्र करणाऱ्या हटयोगी लोकांचे आराध्यदैवत आहे. या मंदिरातली पिंड उत्तराभिमुख नसून पूर्वाभिमुख आहे. पूर्वाभिमुख पिंड हे प्रत्येक 'हटेश्वर' किंवा हटकेश्वर' महादेव मंदिराचे वैशिष्ट्य असते. तिथून जवळच नारदेश्वर मंदिर आहे. ही दोन मंदिरे पहिली आणि आम्ही पायऱ्या उतरून सरोवराच्या दिशेने जायला लागलो. हटकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने खाली असलेले पापहरेश्वर मंदिर दिसत होते. पण तिथे जाण्यासाठीचा रस्ता चांगला नसल्यामुळे आम्ही ते मंदिर दुरूनच पाहिले. पापहरेश्वर मंदिराच्या आसपास उत्खननाचे काम चालू असून तिथे भुयारी मार्ग आणि जुन्या मंदिरांचे काही अवशेष सापडलेले आहेत. काही पायऱ्या उतरून गेल्यावर डाव्या हाताला कुमारेश्वर मंदिर लागले. राष्ट्रकूट काळातले, हेमाडपंती शैलीतील या मंदिराची रचना इजिप्तच्या पिरॅमिड्स सारखी आहे. कुमारेश्वर मंदिराच्या समोरील झऱ्याला 'सीतान्हाणी' किंवा 'ललित तीर्थ' असे म्हणतात. राम-लक्ष्मण व सीता वनवासात असताना, रामाने जमिनीत बाण मारून हा झरा काढला आणि सीतेला स्नान करण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते, अशी आख्यायिका आहे. या तीर्थाच्या पाण्यामधे स्नान करू नये अशी पाटी असूनही वनखात्याचा एक कर्मचारी, तिथून नुकताच स्नान आटपून बाहेर पडताना दिसला!  

त्यानंतर आम्ही यज्ञेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलो. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रेश्वर मंदिराच्या छताला जसे  गोलाकार भोक आहे तसेच भोक या मंदिराच्या छताला आहे. हे भोक पूर्वीच्या काळात आकाशदर्शनासाठी वापरले जात असे. पण आता ते भोक बुजवलेले आहे. शुक्राचार्य ऋषी या मंदिराचा वेधशाळा म्हणून वापर करायचे. या मंदिराजवळील एका मोठ्या शिळेतून वेगवेगळे आवाज निघतात. जवळच असलेले याज्ञवल्केश्वर मंदिर मात्र पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे. शिवभक्त असलेले याज्ञवल्केश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. त्यांनी या परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करून विविध रोगांवर औषधे शोधली होती. तिथून जरासे उंच स्तरावर असलेले  रामगया मंदिर महेशने आम्हाला दाखवले. या मंदिरातील राम-लक्ष्मण व सीतेच्या प्राचीन मूर्ती निजामाच्या काळात फोडल्या गेल्या. आता इथे रामाची एक लाकडी रंगवलेली मूर्ती  बसवलेली आहे. या मंदिरामधे तिन्ही बाजूने प्रकाश येतो. गर्भगृहासमोर आपण उभे राहिलो की आपल्याला तीन सावल्या दिसतात, हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. होकायंत्राच्या सहाय्याने या मंदिराच्या दगडामधील चुंबकीय गुणधर्माचे प्रात्यक्षिक महेशने आम्हाला करून दाखवले. मंदिराजवळ रामकुंड नावाचे एक चौरसाकृती कुंड आहे. तिथून पुढे सरोवराकडे चालत जात असताना, लोणार सरोवराची आणि त्या परिसरातल्या वनस्पती व प्राणिसृष्टीबद्दलची खूप माहिती महेश आम्हाला देत होता. वाटेवर पडलेले साळींदराचे काटे आणि लालचुटुक गुंज बिया त्याने उचलून मला दिल्या, महादेवाच्या पिंडाच्या आकाराची बी असलेले लाल फूल दाखवले, अनेक झाडांची, पक्ष्यांची व प्राण्यांची माहिती दिली. तिथे वाटेतच पडलेली बिबट्याची विष्ठाही त्याने आम्हाला दाखवली. बिबट्याचा नित्य वावर त्या वाटेवर होत असल्याचे लक्षात येताच आम्ही पुन्हा एकदा मनातून जरा चरकलो! 

कमळजा मंदिराच्या वाटेवर, वाघ महादेव मंदिर, मोर मंदिर, शंकर-गणेश मंदिर अशी अर्धवट पाण्याखाली गेलेली आणि मोडकळीला आलेली काही मंदिरे आम्हाला काठावरूनच पाहता आली. कमळजा मंदिराचाही काही भाग पाण्यात गेलेला आहे. त्या मंदिरापुढे, सरोवराच्या परिघावर असलेली बगीचा मंदिर अथवा विष्णू मंदिर, देशमुख महादेव मंदिर, अंबारखाना मंदिर, चोपडा महादेव, मुंगळा महादेव, ही मंदिरे मात्र हल्ली संपूर्णपणे पाण्याखाली असल्याने आम्हाला पाहता आली नाहीत. महेशने आम्हाला सांगितले की लोणार सरोवराचे पाणी खारट असले तरी अत्याधिक आम्लारी (alkaline) असल्यामुळे या सरोवराच्या पाण्यात मासे जगू शकत नाहीत, आणि ते पाणी पिण्यासाठीही अयोग्य आहे. मात्र त्या पाण्यात वाढणारे प्रथिनयुक्त शेवाळ किंवा Blue-Green Algae खायला विविध स्थलांतरित पक्षी दरवर्षी येऊन जातात. लिटमस पेपरच्या सहाय्याने सरोवराच्या पाण्याचा pH  तपासल्यास १२ च्या आसपास येतो असे महेशने आम्हाला सांगितले. त्यानंतर एका पारदर्शक ग्लासमधे सरोवराचे पाणी त्याने घेतले व त्यामध्ये हळद घातली. हळदीमुळे त्या पाण्याचा रंग पिवळा न होता त्यातील आम्लारी गुणधर्मामुळे काही क्षणातच ते पाणी कुंकवाच्या रंगासारखे लाल झाले. मग त्याच लाल पाण्यामधे महेशने लिंबाचा रस मिसळला. लिंबूरस आम्लधर्मी असल्याने त्या पाण्याच्या अम्लारीधर्मावर मात झाली आणि त्या लाल पाण्याचा रंग बदलून पिवळा झाला. प्रयोगशाळेमधले रसायनशास्त्राचे प्रत्याक्षिकच आमच्यासमोर चालू असल्यासारखे आम्हाला वाटले. या पाण्यावर विशिष्ट प्रकारचे दगड तरंगतात हे महेशने दाखवल्यावरही आम्हाला आश्चर्य वाटले. लोणार सरोवराचा परिसर अनेक अद्भुत आणि गूढ गोष्टीनी भरलेला आहे. या खाऱ्या पाण्याच्या सरोवराशेजारी खड्डा खणल्यास तिथे मात्र गोड्या पाण्याचे झरे लागतात. सरोवराच्या अगदी शेजारी गोड्या पाण्याची एक विहीरदेखील आहे. सरोवराच्या आसपासची माती लोहकणमिश्रित आहे. तिथल्या काही दगडांमधे चुंबकीय गुणधर्म आहेत. या परिसरामध्ये अजूनही अनेक भुयारी मार्ग, मूर्ती, मंदिरे आणि इतर ऐतिहासिक अवशेष मिळण्याची शक्यता असल्याने, पुरातत्वखात्यातर्फे उत्खनन व संशोधन अजूनही चालूच आहे.  

सकाळच्या वेळी सरोवराचे सौंदर्य जास्तच खुलून दिसत होते आणि  थंड वातावरणातली भटकंतीही आल्हाददायक वाटत होती. मंदिरे बघून परतत असताना, लोकांनी वाटेतच टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या महेश गोळा करत होता. वर पोहोचल्यावर तो सगळा कचरा त्याने कचरापेटीत टाकला. आपल्या परिसराचे सौंदर्य जपण्यासाठीची त्याची धडपड पाहून आम्हाला अतिशय कौतुक वाटले. आम्ही वर येईपर्यंत साडेअकरा वाजून गेले होते. आम्हाला त्याच दिवशी मोठा पल्ला गाठून पुण्याला परतायचे होते.  त्यामुळे गोमुख धारेवरील मंदिरांची माहिती आम्ही बाहेरूनच ऐकली. या धारेच्या वरच्या बाजूला देवीच्या आणि बालविष्णू मंदिरांमधे अनेक कोरीव शिल्पे आहेत. आम्ही आमच्या खोलीवर परतलो आणि झटपट सामान आवरून  खोली सोडली. दैत्यसूदन मंदिराजवळ पुन्हा महेशला भेटायचे ठरले होते. आदल्या दिवशीही आम्ही ते सुंदर मंदिर बघून आलो होतो. पण त्या मंदिराचा इतिहास, स्थापत्यशास्त्र, पौराणिक महत्त्व आणि तिथली कलाकुसर याबाबत महेशने आम्हाला सविस्तर माहिती दिली. हे मंदिर चालुक्यराजा विजयादित्य याने लोकपालदेवी या आपल्या पत्नीच्या आग्रहास्तव बांधले होते. १८७८ साली उत्खनन करून हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मंदिरात मूळ मूर्ती मात्र सापडली नव्हती. सध्या मंदिरामध्ये असलेली विष्णूची मूर्ती नागपूरच्या राजे भोसले यांनी दिलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर अनेक सुंदर शिल्पचित्रे कोरलेली आहेत. त्यामध्ये लवणासुराचा वध आणि इतरही अनेक कथा चितारलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय रेखीव शिल्पे आहेत. त्यामधे ब्रम्हा-विष्णू-महेश, श्रीकृष्ण, महिशासुरमर्दिनी, नृसिंह अशा अनेक देवादिकांची चित्रे कोरलेली आहेत. तसेच खजुराहो येथील मंदिरांमध्ये आहेत तशीच कामक्रीडेची काही शिल्पचित्रेही आहेत. लोणार येथे प्रत्यक्षात जाऊनच अनुभवायला व मनात साठवायला हवे असे दैत्यसूदन मंदिराचे सौंदर्य आहे. 

दैत्यसूदन मंदिर बघून झाल्यावर आम्ही मोठा मारुती मंदिर बघायला गेलो. १८४१ साली कोकणातून आलेल्या कानिटकर घराण्यातील एका संतपुरूषाला ही ९ फूट ३ इंच लांब आणि चार फूट रुंद अशी हनुमानाची भव्य मूर्ती पालापाचोळ्यामधे सापडली होती. तिथे राहून ते या मूर्तीची पूजा-अर्चा करायचे. निजामाचा दिवाण, राजा चंदुमल याने १८६५ साली इथे मंदिर बांधून दिले. या मूर्तीला अनेक वर्षे शेंदूर फासला जात होता. त्यामुळे ही मूर्ती दिसायला अगदीच ओबडधोबड होती. काही वर्षांपूर्वी या मूर्तीवर साठलेला जवळपास वीस टन शेंदूर खरडून काढण्यात आला. त्यानंतरच या मूर्तीचे मूळ सुंदर रूप दिसू लागले. काळ्या दगडात कोरलेली ही मूर्ती अतिशय भव्य आणि रेखीव आहे. या मूर्तीचा दगडही चुंबकीय गुणधर्म असलेला आहे. कानिटकर कुटुंबीयांनी अलीकडेच त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हे मंदिर पाहून झाल्यावर, महेश आम्हाला लोणार सरोवराच्या 'व्ह्यू पॉंईंट'वर घेऊन गेला. तिथे उंचावर उभे राहून लोणार सरोवराचे मनोहर दृष्य आम्ही डोळ्यात आणि आमच्या फोनच्या कॅमेऱ्यामधे बंदिस्त केले आणि मोठ्या जड मनाने पुण्याकडे निघालो. 

महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी लोणार सरोवर हे एक आहे, हे मला तिथे जाईपर्यंत माहिती नव्हते, याची मला लाज वाटली. या सरोवराची निर्मिती निसर्गाच्या चमत्कारामुळे झाली आहे. सरोवर आणि भोवतालचा प्रदेश म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा आविष्कार आहे. आपल्या राजे-रजवाड्यांनी इथे सुंदर मंदिरे बांधून या जागेच्या सौंदर्यामधे भर घातलेली आहे. त्यांची कल्पकता, कलासक्तता आणि दूरदृष्टी जागोजागी दिसून येते. पण  इतक्या सुंदर स्थळाला म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. त्यामुळेही असेल कदाचित, पण इथे पर्यटन-विकास खूपच कमी झालेला वाटला. अजिंठा-वेरूळपर्यंत येणारे काही जाणकार परदेशी पर्यटक मात्र आवर्जून लोणारलाही येतात. देशातील ऐतिहासिक स्थळाबद्दल भारतीयांमधे असलेली अनास्था बघून त्यांना काय वाटत असेल याची कल्पना न केली तर बरे. विदर्भामधे भेटलेल्या अनेक स्थानिक लोकांना मी "लोणार-मेहेकर पाहिलेत का?" असा प्रश्न विचारला. अनेकांनी ते अजून बघितलेले नाही असे कळले. खरे तर, प्रत्येक शाळा-कॉलेजच्या सहली इथे नेऊन विद्यार्थ्यांना या स्थळाचे पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भूगर्भशास्त्रीय, आणि खगोलशास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, या आणि इतर अनेक शास्त्रांची प्रात्यक्षिके इथल्या रम्य वातावरणामधे दाखवल्यास  विद्यार्थ्यांमधे शास्त्र विषयाची गोडी वाढवता येईल असे मला वाटले. 

पुण्या-मुंबईकडचे माझ्यासारखे अनेक सुशिक्षित लोक विदर्भ, मराठवाडा खानदेश या भागाबद्दल बऱ्यापैकी अनभिज्ञ असतात असे मला अनेकदा जाणवते. मागे मराठवाड्यामधील परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि आसपासची देवळे पहिली तेंव्हाही मला असेच वाटले होते. आम्हाला भेटलेल्या तेलंगणनिवासी बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यही भेट देण्यासारखे आहे. या जिल्ह्यात आम्ही ज्या भागांमधे फिरलो, तो सगळा  प्रदेश  हिरवागार दिसला. तिथले शेतकरी प्रगत असावेत आणि एकूण बऱ्यापैकी सुबत्ता असावी असे वाटले. तिथले लोक बोलायला नम्र आणि मदत करायला तत्पर दिसले. एक गोष्ट मात्र खटकली. ती म्हणजे, शेगाव कचोरी वगळता खास वैदर्भीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे एकही उपाहारगृह आम्हाला दिसले नाही. आपली भाषा, आपला इतिहास, आपली कला, आपली संस्कृती आणि आपली खाद्यसंस्कृती या सगळ्याचा पोकळ अभिमान बाळगून उपयोग नाही. या गोष्टींचे जाणीवपूर्ण जतनही केले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली. लोणार सरोवर परिसरामधे प्लास्टिकला बंदी असल्यासंबंधीचे अनेक फलक लावलेले होते. तरीही जागोजागी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या पडलेल्या बघून खूप वाईट वाटले. या परिसराचे सौंदर्य टिकावे असे वाटत असेल तर पर्यटकांचे सामान तपासून प्लॅस्टिकच्या पिशव्या व बाटल्या प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्याची सक्ती करायला हवी. 

फारसे काही पूर्वनियोजन केलेले नसतानाही आमची बुलढाणा जिल्ह्याची भ्रमंती उत्तम रीतीने पार पडली. आता पुन्हा कधीतरी मुद्दाम ठरवून किमान चार-पाच दिवसांचा दौरा काढला पाहिजे, असे वाटते. बघू या पुन्हा केंव्हा योग येतो ते! 


मार्गदर्शक श्री. महेश मिश्रा यांना संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक:- ८२०८३६१४४६ / ९५२७९७९५३८

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-४

वनखात्याच्या सुरक्षारक्षकांकडून प्रवेशिका घेऊन पुढे जाता-जाता तिथे असलेल्या एका माहिती फलकावर आमची नजर गेली. लोणार सरोवर परिसर हा जैवविविधतेने नटलेला परिसर असल्यामुळे या परिसराला २०२० साली 'रामसर  स्थळ' म्हणून मान्यता देण्यात आली आहे. इराणमधील रामसर या ठिकाणी १९७१ साली जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेतील ठरावाला 'रामसर ठराव' असे संबोधले जाते. एखादे स्थळ रामसर स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर त्या देशाला त्या स्थळाच्या संरक्षणासाठी आणि तिथली जैविविधता जपण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतात. वनखात्याने उभ्या केलेल्या फलकावर ही माहिती संक्षिप्त रूपात लिहिलेली होती. त्या परिसरामधे नीलगाय, लांडगे, अस्वले, माकडे, तरस, बिबटे इत्यादि वन्य प्राणी आणि मोर, रोहित, टिटवी, गोल्डन डक, कोकीळ, भारद्वाज  व अनेक स्थलांतरित सुंदर पक्षी आहेत असेही लिहिलेले होते. तसेच वन्य प्राण्यांना पर्यटकांनी काही खायला देऊ नये अशी सूचना लिहलेली होती. तसेच तिथे बिबट्याचा लाकडी, किंवा कदाचित रबरी पूर्णाकृती पुतळा ठेवला होता. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे हे ऐकून मनामध्ये थोडीशी धाकधूक झाल्याशिवाय राहिली नाही. 

आम्ही वनविभागाची चौकी पार करून पुढे निघालो. एकूण परिसरात पर्यटकांची फारशी वर्दळ नव्हती. थोडेसे  उतरून गेल्यावर पुढे डाव्या बाजूला 'कुमारेश्वर' मंदिर लागते. मंदिरासमोरच उजव्या बाजूला 'सीता न्हाणी' नावाचा एक छोटा झरा आहे. कुमारेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. थोडी उतरण उतरून गेल्यावर 'यज्ञेश्वर' मंदिर लागले. या देवळांची पडझड झाली असली तरी त्याचे सौंदर्य डोळ्यात भरते. तिथून डावीकडे वळणारी पायवाट सरोवराकडे जात असल्याचे तिथल्या पाटीवरून कळल्यामुळे आम्ही ती पायवाट पकडली. जरा पुढे गेल्यावर समोरून काही पर्यटक बायका येताना दिसल्या. त्या आणि त्यांचा ग्रुप सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास एका गाईडला बरोबर घेऊन लोणार सरोवर परिसर बघायला आलेले होते. आम्ही  गाईड न घेता सरोवर आणि आसपासची मंदिरे बघतो आहोत, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या गाईडने सांगितलेल्या काही अद्भुत गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. जमल्यास एखादा चांगला गाईड घेऊन उद्या परत हा परिसर बघा, असे त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितले. त्या बायकांपाठोपाठ त्यांचा गाईड आणि त्यांच्या गटातील इतर पर्यटकही परतताना दिसले. 
दोन्ही बाजूला घनदाट झाडी असलेल्या त्या निर्मनुष्य वाटेवर आता आम्ही दोघेच होतो. झाडीतून कुठूनही थोडासा आवाज आला की आम्हाला बिबट्याची चाहूल लागतेय की काय अशी भीती वाटायला लागली होती. पुढे डावीकडे 'रामगया' मंदिराकडे जाणारी एक पायवाट दिसली. आधी सरोवरापर्यंत जावे आणि परतीच्या वाटेवर रामगया मंदिर पहावे असे ठरवून आम्ही निघालो. पण थोडे पुढे गेल्यावर त्या पायवाटेवरच एक वानरांची टोळी बसलेली दिसली आणि आम्ही थबकलो. पुढे जायला आम्ही जरा बिचकत होतो, कारण त्या वानरसेनेतील एक दांडगे, काळ्या तोंडाचे वानर आमच्याकडे बघून सतत दात विचकत होते. त्यांच्या टोळीतील लहान-मोठी वानरे आमच्या अवतीभोवती झाडांवर उड्या मारत होती. त्या सर्व वानरांना जरा हटकण्याचा प्रयत्न आम्ही केला पण ती जाम बाजूला होईनात. आता ही वानरे आपल्याला काही पुढे जाऊ देणार नाहीत असे आम्हाला वाटले. तितक्यात आमच्या मागून बोलण्याचे आवाज ऐकू आले, आणि दोन तरुण आमच्याजवळ आले. वानरांच्या टोळीने आमची वाट अडवून धरलेली बघून तेही थांबले आणि आमच्यासोबत  गप्पा मारू लागले.  

मूळ हैदराबादचे ते दोन तरुण इंडियन बँकेच्या खामगाव व शेगावजवळच्या दोन ग्रामीण शाखांमधे कनिष्ठ अधिकारी  होते. सुट्टीचे निमित्त साधून ते लोणार परिसर फिरायला आले होते व संध्याकाळी परत आपल्या मुक्कामी पोहोचणार होते. आमच्यासारखेच त्यांनाही लोणार सरोवरापर्यंत जाण्याची आणि सर्वात दूरवर असलेल्या कमळजामाता मंदिराला भेट द्यायची इच्छा होती. आम्ही थांबलो होतो त्याच  ठिकाणी,  काही काळापूर्वी त्या दोघांची वाट त्याच वानरांच्या टोळीने अडवली होती. त्यामुळे तिथून उलटे फिरून ते रामगया मंदिर बघायला गेले होते. आमचा आवाज ऐकू आल्यामुळे ते दोघे पुन्हा हिंमत  करून आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते. या निर्मनुष्य जागी आपण अगदीच एकटे नाही आहोत, हे जाणवून आमच्याही जिवात जीव आला आणि चौघांनी मिळून वानरसेनेला हाकलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने काही काळानंतर वानरे पांगली आणि आमचा रस्ता मोकळा झाला. त्यानंतर ते दोन तरुण आणि आम्ही दोघे मिळूनच कमळजामाता मंदिरापर्यंत गेलो. त्या निर्मनुष्य वाटेवर त्यांना आमचा आणि आम्हाला त्यांचा मोठाच आधार वाटला. तसेच गप्पा मारत चालत असल्यामुळे आम्हाला फारसा शिणवटाही जाणवला नाही. 

दुपारचे चार वाजत आले होते. पायवाटेने चालत साधारण दोन किलोमीटर गेल्यावर अचानक आम्हाला लोणार सरोवराचे दर्शन झाले आणि आमचे डोळे दिपले. सरोवराच्या पाण्यामध्ये हिरव्या-निळ्या रंगाच्या अनेक छटा होत्या. नानाविध प्रकारचे आणि रंगाचे पक्षी तिथे दिसत होते. त्यातले कित्येक पक्षी मी आयुष्यात प्रथमच बघत होते. सरोवरापाशी पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्यामुळे त्या पक्ष्यांचा स्वैर संचार आणि मुक्तकंठाने किलबिलाट चालला होता. तिथल्या शांत, निरसर्गरम्य परिसरात ऐकू येणाऱ्या त्या मंजुळ किलबिलाटामुळे मी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. माझे मन अगदी पिसासारखे हलके झाले. त्या जागेवरून परत वर जाऊच नये आणि अनंत काळासाठी तिथेच थांबून राहावे, असे मला वाटायला लागले! 

सरोवराच्या चहू बाजूंना मंदिरे आहेत व काठाकाठाने चालत गेल्यास ती  पाहता येतात असे वर्णन कुठेतरी वाचनात आले होते. पण प्रत्यक्षात कमळजा मातेच्या मंदिरापाशी आम्ही पायवाटेच्या शेवटाला पोहोचलो असल्याचे लक्षात आले. कमळजामाता मंदिराचा काही भाग पाण्यात होता आणि मंदिराशेजारची दीपमाळही सरोवराच्या पाण्याने वेढलेलीच होती. आम्ही मंदिराच्या आत गेलो व दर्शन घेतले. तिथे पूजेसाठी असलेल्या एका माणसाने आम्हाला सांगितले की पाण्याची पातळी गेल्या काही वर्षात वाढलेली असल्याने कमळजामाता मंदिराचा काही भाग आणि पुढील इतर काही मंदिरे आता पाण्याखालीच होती. आम्ही मंदिराचे आणि मंदिरासमोर उभे राहून आमचेही फोटो काढले आणि मोठ्या जड अंतःकरणाने परतीचा प्रवास सुरु केला. 

सरोवर परिसरामधे खाली उतरायला सुरुवात केल्यानंतर कुठेही पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय दिसली नाही. आमच्याजवळ पाण्याची बाटली होती पण त्या दोन तरुणांनी पाणी आणले नव्हते. त्यांना आम्ही आमच्याकडचे पाणी प्यायला दिले. त्यामुळे तीनेक किलोमीटर वर चढून आम्ही रस्त्यावर पोचेपर्यंत आमच्याजवळचे पाणी संपून गेले होते. भर उन्हात चालून-चालून बरेच दमायलाही झाले होते. त्यामुळे वर पोहोचताच आम्ही  चौघांनी आमच्या गाडीत असलेल्या बाटल्यामधले पाणी प्यायले. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या अननस विकेत्यांना आमच्या समोरच दोन-तीन अननस सोलायला आणि फोडी करून द्यायला सांगितले. अननसाच्या फोडींवर मीठ-तिखट  घालून त्या फोडी आम्ही चौघांनी अगदी मिटक्या मारत खाल्ल्या. छान श्रमपरिहार झाल्यानंतर ते दोघे तरुण त्यांच्या मोटारसायकलवर स्वार होऊन खामगावकडे निघून गेले. आम्ही आमची गाडी दैत्यसूदन मंदिराकडे वळवली. ते सुंदर मंदिर पाहत असतानाच मी आनंदला सांगून टाकले, "आपण गाईड घेऊन उद्या पहाटे लोणार परिसर बघायला परत यायचे."
 
दुसऱ्या दिवशी लोणारहून उशिरा निघालो आणि पुण्याला घरी पोहोचायला फार रात्र होईलसे वाटलेच तर अर्ध्या वाटेवर अहिल्यानगरला मुक्काम करू, पण पहाटे उठून लोणार सरोवर पुन्हा पाहिल्याशिवाय इथून परतायचे नाही असा निर्णय मी घेऊन टाकला. तो निर्णय किती योग्य होता, हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजले.    

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-३

लोणार सरोवराबाबत गेली कित्येक वर्षे वर्तमानपत्रांमधून आलेले अनेक लेख मी वाचलेले होते. हजारो वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर भारतातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील एक आश्चर्य समजले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य असे की, उल्कापातामुळे जगभरामधे अनेक ठिकाणे विवरनिर्मिती झाली. पण फक्त याच विवराचे रूपांतर खाऱ्या पाण्याच्या सरोवरामधे झालेले आहे. "सुमारे सव्वातीनशे पायऱ्या उतरून आणि जंगलातली पायवाट चालून, आपण अगदी सरोवरापर्यंत जाऊन आलो तरीही, लोणार सरोवर परिसर बघायला अर्धा दिवस पुरतो" असे मला अनेकांनी सांगितले होते. त्या दृष्टीने आम्ही MTDC रिसॉर्टमधल्या खोलीचे एकाच रात्रीचे बुकिंग केले होते. आम्ही पोहोचलो तो शनिवार होता. लोणार ते पुणे हा प्रवास कमीतकमी ८ ते ९ तासांचा आहे असे आम्हाला गुगल मॅप्सवर दिसत होते. त्यामुळे, संध्याकाळच्या आत सरोवर बघायचे, दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दैत्यसूदन मंदिर बघून उशिरात-उशिरा सकाळी नऊ वाजेपर्यंत लोणारहून निघून, दिवसाढवळ्या पुण्याला पोहोचायचे, असे आम्ही मनाशी ठरवले होते. 

मेहेकर येथील सुंदर मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही साधारण दुपारी अडीच-तीनच्या सुमारास MTDC रिसॉर्टमध्ये पोहोचलो. या रिसॉर्टमध्ये छोट्या-छोट्या अनेक टुमदार बंगल्या आहेत. प्रत्येक बंगलीमधे एक डबलरूम, अटॅच्ड टॉयलेट आणि खोलीच्या समोर व मागच्या बाजूला व्हरांडा आहेत. या व्हरांड्यांमधे प्लॅस्टिकच्या आराम खुर्च्या ठेवलेल्या असतात. चार-चार बंगल्यांच्या मधल्या चौरस भागामधे चांगली निगराणी राखलेले हिरवेगार लॉन  आहे. आसपासच्या संपूर्ण परिसरामधे  भरपूर झाडे आहेत. शिवाय संपूर्ण रिसॉर्टच्या आवारामध्ये छान  फुलझाडे लावून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. एकूण तिथले वातावरण शांत आणि प्रसन्न आहे. व्हरांड्यामधल्या खुर्च्यांवर बसून निवांतपणे चहाचे घोट घेत त्या वातावरणाचा सुखद अनुभव घेता येतो. या रिसॉर्टचे रेस्टॉरंट वरच्या मजल्यावर आहे. त्या मजल्याची उंची मुद्दामच खूप जास्त ठेवलेली असल्यामुळे पूर्वी तिथूनच लोणार सरोवराचे दर्शन व्हायचे. पण आता रेस्टॉरंट आणि लोणार सरोवर यांच्या  दरम्यान खूप झाडी वाढल्यामुळे तिथून सरोवर दिसत नाही.  

MTDCच्या थोड्याफार गलथान कारभाराची पहिली झलक आम्हाला रिसेप्शन काउंटरवर गेल्याबरोबर मिळाली. महाराष्ट्रातल्या ज्या-ज्या पर्यटनस्थळी MTDC ची रिसॉर्ट आहेत त्या सर्व ठिकाणांची माहितीपुस्तके तिथल्या एका शेल्फमधे  ठेवलेली दिसली. मी साहजिकच लोणारचे माहितीपुस्तक शोधू लागले. तिथल्या मॅनेजरने अगदी थंडपणे, 'लोणारची माहितीपुस्तके संपली आहेत. लोणार वगळता इतर सर्व माहितीपुस्तके आहेत' असे उत्तर दिले. त्याच्या आवाजामध्ये कुठलीही दिलगिरी नव्हती हे प्रकर्षाने जाणवले. 

आमच्या बंगलीची किल्ली घेऊन आम्ही सामान खोलीत ठेवले. खोल्यांची देखभाल फारशी चांगली नाही, हे लगेच जाणवले. आजकाल कोणत्याही साध्या हॉटेलच्या खोलीमध्ये आंघोळीचा साबण, शाम्पू, टूथपेस्ट, पाणी गरम करण्याची किटली, हे सर्व ठेवलेले असते. त्या बंगलीमध्ये यापैकी एकही गोष्ट तर नव्हतीच, पण टॉवेल्स व नॅपकिन्सदेखील ठेवलेले नव्हते. चौकशी करता सांगण्यात आले की, "लॉंड्रीवाला दोन वाजता येईल, तेंव्हा टॉवेल मिळतील." खोलीमध्ये 'वायफाय' कनेक्शन होते पण इंटरनेट चालू नव्हते. त्याचे कारण ऐकून तर आम्ही धन्य झालो. "इंटरनेट कनेक्शनची फी वेळेत भरलेली नसल्याने कनेक्शन कापलेले आहे!"

दुपारी जेवणाच्या वेळेस आम्ही मेहेकरच्या बालाजी मंदिरात साबुदाणा उसळीचा प्रसाद खाल्लेला असल्यामुळे जेवायची भूक नव्हतीच. चहा घेऊन लगेच आम्ही सरोवर परिसर हिंडायला जायचे ठरवले. पण तिथल्या सहाय्यकाने दोन कप चहा आणायला अर्धा तास लावला. अल्युमिनियम फॉईलने झाकून आणलेल्या कपांमधला तो चहा आमच्या हातात येईपर्यंत थंड झालेला होता. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना द्यायची असेल तर अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे जाणवले.  

लोणार गावामधे MTDC रिसॉर्ट व्यतिरिक्त 'विक्रांत रिसॉर्ट' आणि 'कृष्णा लॉज' अशाही दोन जागा राहण्याजोग्या आहेत असे समजले. पण लोणार सरोवराच्या सर्वात जवळचे निवासस्थान MTDC रिसॉर्ट हेच आहे. कृष्णा लॉज ST स्टँडच्या समोरच आहे. तिथे कदाचित रास्त भावात राहण्याची सोय होत असावी. विक्रांत रिसॉर्टचे दर MTDC रिसॉर्टपेक्षा जास्त आहेत असेही समजले. अर्थात, ही सगळी माहिती आम्हाला स्थानिक लोकांकडून 'ऐकीव' स्वरूपात मिळालेली असल्याने आणि आम्ही कृष्णा लॉज किंवा विक्रांत रिसॉर्ट येथे प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करून घेतलेली नसल्याने खात्रीशीर म्हणता येणार नाही.   

चहा घेऊन आम्ही निघालो. लोणार सरोवराच्या बाहेर रस्त्यावरच आमची गाडी उभी केली. तिथे जेमतेम पाच-सहा गाड्याच उभ्या होत्या. बाहेर हातगाडीवर तीन-चार फळविक्रेते, प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये उघड्यावरच ठेवलेल्या अननस आणि कलिंगडाच्या कापलेल्या फोडी विकत होते. काही पर्यटक ते विकत घेऊन खातही होते. 'उघड्यावरील फळे आणि अन्न खाऊ नये' असे शाळेत कितीही शिकवले गेले तरी प्रत्यक्षात मात्र ते पाळले जाताना दिसत नाही. "असल्या पोपटपंची शिक्षणाचा तरी काय उपयोग?" असे मला वाटून गेले. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता बाळगण्याची सवय आपल्या देशातल्या सामान्यजनांना लावण्यासाठी अशा छोट्याछोट्या गोष्टींमधे प्रचंड काम करणे आवश्यक आहे. 


सरोवर परिसरात जाण्यासाठी सकाळी सातपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच प्रवेश दिला जातो. पाच वाजता प्रवेशद्वार बंद केले जाते, पण खाली सरोवरापर्यंत गेलेल्या पर्यटकांना गडबडीने वर यावे लागत नाही. खाली गेलेले सर्व पर्यटक वर आलेले आहेत याची खात्री करून मगच प्रवेशद्वाराला कुलूप लावले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटकाला आपले नाव, गावाचे नाव, फोननंबर यांची नोंद करावी लागते. त्याशिवाय आधारकार्ड किंवा एखादे फोटो-आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागते. तिथे असलेले सुरक्षारक्षक प्रत्येक पर्यटकांचे सर्व तपशील त्यांच्या वहीमध्ये लिहून घेतात. "इतकी कसून चौकशी का केली जाते?" हा माझ्या मनामधे साहजिकच आलेला प्रश्न मी तिथल्या सुरक्षारक्षकाला विचारला असता, गेल्या ऑगस्ट महिन्यामधे घडलेली एक धक्कादायक सत्यघटना त्याने सांगितली. परभणी जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीने लोणार सरोवराच्या परिसरामधे येऊन, एका साथीदाराच्या मदतीने आपल्या तरुण व अविवाहित प्रियकराचा गळा आवळून खून केला होता. मारेकऱ्यांनी त्या तरुणाचा मृतदेह तिथल्या झाडीमधे टाकून दिला होता. त्या घटनेनंतर, या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड तपासून, नाव, गाव व फोननंबर यांची नोंदणी करण्याचे आदेश पोलिसांकडून जारी झाले आहेत. ही घटना ऐकून, माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला.  

लोणार सरोवराच्या परिसरात शिरल्यानंतर काही दगडी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. रस्त्याच्या  पातळीपासून जेमतेम २५-३० मीटर्स खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आणि इतर काही देवळांचा समूह लागतो. त्याच्याच डाव्या बाजूला जरा वरच्या भागामध्ये भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ हटेश्वर मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच नारदेश्वर मंदिर आहे. तिथेच एक आयताकृती सुंदर लॉन तयार करून या भागाचे सुशोभीकरण करण्याचा थोडाफार प्रयत्न झालेला आहे. आम्ही ती मंदिरे परतीच्या वाटेवर बघायचे ठरवले आणि सरोवराच्या दिशेने पायऱ्या उतरायला लागलो. काही अंतर गेल्यावर पायऱ्या संपून पायवाट लागते. तिथेच वनखात्याचे सुरक्षारक्षक बसलेले दिसले. त्यांनी आम्हा दोघांकडून प्रत्येकी चाळीस रुपये घेऊन प्रवेशिका दिली. त्यानंतर आम्ही पुन्हा ती पायवाट धरली. लोणार सरोवराभोवती एकूण बरीच सुंदर मंदिरे आहेत. सगळी मंदिरे, त्यांचे वैशिष्ट्य आणि इतर बरेच काही मी पुढील भागांमधे सांगणार आहे. 

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-२

आम्ही सिंदखेडराजाहून दुपारी चार-साडेचारच्या सुमारास शेगावच्या दिशेने निघालो. वाटेवरच सुमारे १६-१७ किलोमीटरवर असलेल्या देऊळगावराजा गावातले बालाजीचे देऊळ आम्हाला बघायचे होते. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही अर्ध्या तासातच पोहोचलो. देवळापर्यंत जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांमधे दोन्ही बाजूला, साधारण सर्व देवस्थानांच्या ठिकाणी असतात तशी दुकाने होती. या बालाजीच्या देवळातली मूर्ती लखुजीराजांना सापडली असे म्हणतात. जगदेवराव जाधवांनी बांधलेल्या मूळ देवळाचा जीर्णोद्धार १९५२ साली  केला गेला.  जाधवांचे वंशज या देवळाचे विश्वस्त आहेत. 

या मंदिराला बालाजीचे दुकान किंवा देवघर असे म्हणले जाते. मंदिराला कळस नाहीये. या देवळातील बालाजीची मूर्ती यातुशय सुबक आणि मोहक आहे. बालाजीच्या उजव्या बाजूला श्रीदेवी आणि डाव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. बालाजीच्या मस्तकावर नागफणी आणि त्यावर पाचू बसवलेला आहे. या बालाजीला 'प्रतितिरुपती' असेही म्हणतात. तिरुपतीच्या मंदिरामधे बोललेला नवस या मंदिरामधे फेडता येतो असे मानले जाते. या देवळामध्ये देणगी देणाऱ्या भक्तांना, त्यांनी दिलेल्या देणगीच्या प्रमाणात काही टक्केवारीवर प्रसाद दिला जातो, हे या मंदिराचे वैशिष्ठ्य आहे. नवरात्रात लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा होतो. आम्ही गेलो तेव्हा मात्र तिथे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती. दर्शन घेऊन बाहेर पडलो तेंव्हा एक वयस्कर विक्रेता, खाण्याचा डिंक आणि जिरे विकायला रस्त्याकडेलाच बसलेला दिसला. त्याच्याकडचा डिंक अगदी  उत्तम प्रतीचा असल्याची तो ग्वाही देत होता आणि मी डिंक विकत घ्यावा यासाठी तो फारच गळ घालत होता. जिरे चांगल्या प्रतीचे आहे हे मला वासावरून कळत होते पण डिंकाबद्दल खात्री नव्हती. तरीही मी एक किलो डिंक आणि अर्धा किलो जिरे विकत घेतले. भाव, दर्जा यांची फारशी चिकित्सा न करता, मी इतकी लवकर खरेदी केलेली बघून आनंदला भलतेच आश्चर्य वाटले. घरी परतल्यानंतर गरम तुपामध्ये डिंक चांगला फुलल्यावर माझा चेहरा आनंदाने फुलला हे सांगायलाच नको. 

संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही चिखली-खामगावमार्गे शेगावकडे निघालो. शेगावच्या 'श्री गजानन महाराज संस्थान'तर्फे चालवण्यात येणाऱ्या 'आनंदविहार' या अतिथीगृहातच मुक्काम करावा असे माझ्या मैत्रिणीने आवर्जून सांगितले होते. संभाजीनगरहून निघण्यापूर्वीच आम्ही ऑनलाईन किंवा फोनबुकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, "शेगावपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचलात की फोन करा. खोली मिळून जाईल" असे आम्हाला फोनवर सांगण्यात आले हॊते. खामगावला पोहोचलो तेंव्हा आम्ही 'आनंदविहार'ला फोन केला. पण, "माऊली,  इथे खोलीसाठी भक्तांची मोठी रांग लागली आहे. कमीतकमी दोन तासांचे वेटींग आहे. बराच वेळ थांबूनही खोली मिळेल याची खात्री देता येत नाही. आपणही येऊन रांगेत थांबू शकता." असे उत्तर अतिशय  नम्रपणे देण्यात आले. सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता. दिवसभराच्या प्रवासामुळे आम्ही दोघेही कंटाळलेलो होतो. आनंद  दिवसभर ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याला विश्रांतीची नितांत गरज होती. त्यामुळे मी पुन्हा फोन केला. परंतु, नम्र स्वरामधे तेच उत्तर देऊन फोनवरची व्यक्ती म्हणाली, "माऊली, इथे जागा मिळेल याची खात्री देता येणार नाही. शेजारी आमचेच 'आनंद विसावा' नावाचे अतिथीगृह आहे, तिथे चौकशी करा." पण तिथेही आम्हाला विनम्र स्वरात नकारघंटाच ऐकू आली. आम्ही बरेच हिरमुसलो होतो. तरीही मोठ्या आशेने 'आनंदविहार'च्या पार्किंगमध्ये गाडी लावून बुकिंग काउंटरकडे गेलो. 

'आनंदविहार'चा परिसर अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ आणि रम्य आहे. आपल्याला खोली मिळेल की नाही अशी धाकधूक मनामध्ये बाळगून, बुकिंग काऊंटरजवळ आम्ही सुमारे दोन तास रांगेत थांबून होतो. "आत्तापर्यंत असा अनुभव कधीच आलेला नाही" असे रांगेतले अनेकजण आम्हाला सांगत होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी एकादशी होती आणि पाठोपाठ रविवार व २६ जानेवारीची सुट्टी असल्याने भक्तांची गर्दी लोटली असल्याचे आम्हाला समजले. काहीजण कंटाळून 'आनंद विसावा' मधे कोणालातरी पाठवून तिकडे खोली मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आठ वाजून गेले तरी आम्हाला खोली मिळाली नव्हती. आता थकव्यासोबतच पोटात भूकही जाणवत होती. पण आमच्यापैकी किमान एकाला रांगेत थांबणे आवश्यक होते. त्यामुळे आधी मी आणि त्यानंतर आनंदने, तिथल्या उपाहारगृहामधे जाऊन जेवण केले. अतिशय साध्या, सात्विक चवीची थाळी प्रत्येकी केवळ सत्तर रुपयाला होती. अखेर, रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला एक डबलरूम मिळाली आणि आमचा जीव भांड्यात पडला. 

'आनंदविहार' येथे राहण्यासाठी २/३/४/५/६ जणांची सोय असलेल्या वेगवेगळ्या आकारमानाच्या एकूण सहाशे खोल्या आहेत. सर्व खोल्यांमधे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे. एकंदर परिसर आणि खोल्यांमधली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. खोलीत गेल्याबरोबर अंघोळ करून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ व नाश्ता उरकल्यानंतर आम्ही श्री गजानन महाराजांचे मुखदर्शन केले. देवळातली चोख व्यवस्था, तेथील सर्व सेवेकऱ्यांची सेवा आणि लोटलेल्या भक्तांचा गजाननमहाराजांच्या प्रति असलेला भक्तिभाव मनाला खूपच भावला. दर्शन झाल्यावर, खोलीवर परतून सामानाची आवराआवर केली. 'आनंदविहार'मधले प्रसन्न, शांत आणि अतिशय सात्विक वातावरण अनुभवायला परत शेगावला यायचेच अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही खोली सोडली. शेगाव सोडताना तिथली सुप्रसिद्ध कचोरी खाण्याचा मोह टाळता आला नाही. गुगलचा सहारा घेऊन एका कुठल्यातरी शर्मांच्या दुकानातील कचोऱ्या विकत घेतल्या. काही बायका डझनावारी 'फ्रोझन' कचोऱ्या विकत घेत होत्या. मी दोन दिवसांनंतर पुण्याला पोहोचणार असल्यामुळे फ्रोझन कचोऱ्या विकत घेता आल्या नाहीत. कचोरीची चव अप्रतिम असली तरीही अशावेळी नेमके स्वतःचे गोलमटोल शरीर डोळ्यासमोर येत असल्यामुळे केवळ एका कचोरीवर समाधान मानले. 

सुमारे ११ वाजता शेगाव सोडून आम्ही साडेबारा वाजेपर्यंत मेहेकर येथील 'शारंगधर  बालाजी' मंदिरामधे पोहोचलो. या मूर्तीबाबतची सत्यकथा अतिशय रंजक आहे. १८८८ साली, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेहेकर गावाजवळच धरणाचे खोदकाम सुरु झाले होते. त्या खोदकामादरम्यान एक मोठी लाकडी पेटी सापडली. त्या पेटीमधे चंदनाच्या सालींमधे गुंडाळलेली बालाजीची अत्यंत सुबक मूर्ती होती. ही मूर्ती ब्रिटिशांनी पळवू नये म्हणून, कुठल्याच मुहूर्ताची वाट न बघता, ग्रामस्थांनी रातोरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यामुळे संतापलेल्या ब्रिटिशांनी येथील साठ गावकऱ्यांना काही महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. त्या पेटीवर असलेला ताम्रपट व मूर्तीवरील दागिने मात्र ब्रिटिशांनी हडप केले, असे सांगितले जाते. 

काळ्या गंडकी दगडामध्ये कोरलेली, ११ फुटी उंच, चार फुटी रुंद आणि दोन फुटी जाड, अशी ही मूर्ती बालाजीची जगातली सर्वांत मोठी मूर्ती आहे. मूर्तीभोवतीच्या प्रभावळीमधे दशावतार कोरलेले आहेत. चतुर्भुज  मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहे. बालाजीच्या मूर्तीबरोबर श्रीलक्ष्मी विराजमान असलेली ही एकमेव मूर्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी-विष्णूच्या एकत्रित दर्शनाचा लाभ मिळू शकतो. प्रभावळीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित चित्र आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय आणि भूदेवी आहेत. मूर्तीच्या डोक्यावर असलेल्या मुकुटामध्ये शारंग नावाचे धनुष्य धारण केलेल्या श्री विष्णूंची मूर्ती असल्यामुळे या मूर्तीला शारंगधार-बालाजी असे नाव पडले आहे. आपल्या मनामधे जो भाव असेल तोच भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसत असल्यामुळे इथे आत्मरूप दर्शनाचा लाभ मिळतो असे म्हणतात. इतकी सुंदर मूर्ती असलेल्या या देवस्थानाचा परिसर मात्र अगदीच रया गेलेला भासला. आम्ही दर्शन घेत असताना तिथल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला विचारले, "तुम्ही बाहेरगावाहून आला आहात का?" आम्ही हो म्हणताच, मोठ्या अगत्याने ते आम्हाला देवळामागे असलेल्या प्रसादालयात घेऊन गेले. बाहेरगावच्या भक्तांना आवर्जून प्रसाद देण्याची प्रथा तिथे आहे. अप्रतिम चवीची 'साबुदाणा उसळ' म्हणजेच साबुदाणा खिचडी, आणि ताक असा प्रसाद त्या सेवेकऱ्यांनी आम्हाला आग्रहाने खाऊ घातला.  

मंदिरामधून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर नृसिंह मंदिराचा फलक दिसला. संत श्री बाळाभाऊमहाराज पितळे यांच्या ज्ञानमंदिराजवळील सुमारे २०० वर्षे जुन्या वाड्यामध्ये हे मंदिर आहे. संपूर्ण जगामधे जशी १२ ज्योतिर्लिंगे  प्रसिध्ध आहेत तशी पौराणिक महत्त्व असलेल्या एकूण ११ नृसिंह मूर्ती आहेत. त्यापैकी सहावे नृसिंह मंदिर हे मेहेकर येथे आहे. ही स्वयंभू प्राचीन मूर्ती कमीतकमी १५०० वर्षे जुनी असावी. ही वाकाटक काळातील मूर्ती आहे असे काही संशोधक मानतात तर काही जणांच्या मते ही उत्तर चालुक्यकालीन असावी. एकुणात, या मूर्तीच्या कालखंडाबाबत एकमत नाही. अनेक शतके जमिनीखालील भुयारामधे ही मूर्ती बंदिस्त होती. येथील पितळे कुटुंबियांपैकी, नागपूरस्थित श्यामराज पितळे महाराजांना दृष्टांत झाल्यामुळे मेहेकर येथील माळीपेठेत असलेली ही हेमाडपंती भुयारामधली ही मूर्ती बाहेर काढली गेली. या मूर्तीची स्थापना १५८१ साली झालेली आहे. गंडकी काळ्या पाषाणामधे कोरलेली ही अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती अष्टभुज असून, तिच्या हातांमधे शंख, चक्र, पद्म आणि गदा आहेत. नृसिंहाचा चेहरा, आयाळ, व मुकुटावर आभूषणे अतिशय रेखीवपणे कोरलेली आहेत. हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये नृसिंहाची नखे रुतलेली स्पष्ट दिसून येतात. नृसिंहानी भक्त प्रल्हादाबरोबर इथेच भोजन केले आणि ते शांत झाले असा समज  आहे. त्यामुळे या देवस्थानात अन्नदानाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मंदिरामधे मुख्य मूर्तीजवळच श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील सुबक पण छोटी मूर्ती आहे. 

आम्ही काहीही ठरवले नसताना, एकादशीच्या दिवशी तीन देवस्थानाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचा योग आपसूकच आला, हे विशेष होते. अशा रितीने पुण्यसंचय करून, मेहेकरहून आम्ही लोणारच्या वाटेला लागलो. 

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-१

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला जाणे झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत काम संपणार होते. त्यानंतर तसेच पुढे लोणारला जावे असे आम्ही ठरवले. अनेक वर्षांपासून लोणार सरोवराला भेट द्यायची इच्छा माझ्या मनामधे होतीच. माझ्या तीन मैत्रिणी नुकत्याच तिथे जाऊन आल्याचे, त्यांनी ग्रूपवर पाठविलेल्या फोटोंवरून कळले होते. त्यामुळे आपणही तिथे जावे आणि आपलेही फोटो शेयर करावेत, असे वाटायला लागले. त्यापैकी एका मैत्रिणीला फोन केला असता तिने, "लोणारपर्यंत जाताच आहात, तर शेगावला पण जाऊनच या", असे आग्रहाने सांगितले. आम्ही दोघेही फारसे भाविक नसल्याने, आवर्जून शेगावला जाण्याचे कदाचित ठरवलेही नसते. पण मैत्रिणीच्या सूचनेप्रमाणे, आम्ही शेगाव आणि इतर एक-दोन ठिकाणांची भ्रमंती करायचे ठरवले. 

छत्रपती संभाजीनगरपासून जवळच, शिंगी नावाच्या छोट्या गावातील शाळेमध्ये आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथला कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास आम्ही निघालो आणि वैजापूर गावाजवळ समृद्धी महामार्गाला लागलो. या महामार्गाबद्दल फक्त वर्तमानपत्रामधून वाचले होते. पण प्रत्यक्षांत, ताशी १२० किमी वेगाने या महामार्गावर प्रवास करताना, आपण अमेरिकेतल्या Interstate highway वर प्रवास करतोय की काय असे वाटत होते. मात्र या महामार्गावर अजून बऱ्याच सोयी व्हायला हव्यात याची जाणीव मात्र प्रकर्षाने झाली. बुलढाणा एक्झिटने समृद्धी महामार्ग सोडून आम्ही डावीकडे उतरलो आणि तिथून सिंदखेडराजा या गावाकडे निघालो. राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानाला भेट देण्याचा आमचा इरादा होता.  

जिजाऊंचे वडील, सरदार लखुजीराव जाधव यांच्या, सिंदखेडराजा येथील वाड्यामधे जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. १५७६ साली बांधल्या गेलेल्या या दगडी वाड्याची खूपच पडझड झालेली असून तिथे काही डागडुजीचे काम चालू होते.  वाड्याच्या भोवतालच्या तटबंदीचा आवाका पाहता, कोणे एके काळी ही भव्य वास्तू मोठ्या दिमाखात उभी असेल याचा अंदाज येतो. वाड्यात जायला फक्त पाच रुपये तिकीट आहे. वाड्याच्या उंच दरवाज्यावर, दगडामधे कोरलेल्या चौदा नारळांचे तोरण आहे. प्रवेशद्वारात सर्वात खाली देवड्या, वर नगारखाना आणि त्यावर सज्जा  आहे. आत गेल्यावर उजव्या बाजूच्या एका खांबावर जाधवांची वंशावळ आणि डाव्याबाजूच्या खांबावर सिंदखेडराजामधील सर्व प्रेक्षणीय स्थळांची नावे लिहिलेली आहेत. म्हाळसामहाल आणि दरबारमहाल अशा दोन भागामध्ये वाडा विभागला गेला आहे. जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसा असल्यामुळे, त्यांच्या राहत्या महालाचे नाव म्हाळसामहाल असे ठेवले होते. या महालात जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी जिजाऊमातेच्या  मांडीवर बसलेल्या बालशिवाजीराजांचा पुतळा आहे. महालात असलेला एक भुयारी मार्ग आता बंद करून ठेवण्यात आला आहे. या महालाखालील तळघर धान्यकोठार म्हणून वापरत असत. म्हाळसामहालाच्या जवळच जरा मागच्या बाजूला दरबारीमहाल आहे. लखुजीराजे यांचा दरबार इथे भरायचा. समोरच्या पटांगणावर सामान्य जनतेला बसण्याची जागा असावी. वाड्याबाहेर जिजामातांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्या पुतळ्याला वंदन करून, तिथे आम्ही आमचे फोटो काढून घेतले आणि पुढे लखुजीराजे जाधवांच्या समाधीकडे निघालो. 
अहमदनगरचा (म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगरचा) सुलतान निजामशाह दौलताबादचा किल्ला जिंकण्यासाठी जवळपास एक तप प्रयत्न करीत होता पण त्याला ते जमले नव्हते. १५७२ साली लखुजीराजे जाधव यांनी निजामशहाला तो किल्ला जिंकून दिल्यामुळे निजामाने त्यांना मोठी जहागिरी दिली. पण पुढे २६ जुलै १६२९ या दिवशी, निजामशहानेच लखुजीराजे, त्यांचे दोन पुत्र अचलोजीराव व राघोजीराव आणि नातू यशवंतराव यांचा दौलताबादच्या दरबारात खून करवला. म्हाळसाबाई आणि त्यांच्या दोन्ही सुना आपापल्या नवऱ्यांच्या चितेवर सती गेल्या. या सर्वांच्या आणि जाधव कुटुंबातील इतरही स्त्री-पुरुषांच्या समाधी, लखुजीरावांचे बंधू जगदेवराव यांनी बांधून घेतल्या. हे दगडी बांधकाम चौरसाकृती आहे आणि त्यावर विटांनी बांधलेला घुमट आहे. समाधीच्या दरवाजावर कीर्तिमुखाचे शिल्प आणि दरवाजाच्या  दोन्ही बाजूला हत्तीवर आरूढ झालेल्या वाघाचे शिल्प आहे. प्रत्येक समाधीवर शंकराची पिंड आहे. समाधीस्थळावर गेल्यावर मन अगदी खिन्न होते. हे हत्याकांड ज्यावेळी झाले त्यावेळी शिवराय जिजामातेच्या पोटामध्ये होते. या हत्याकांडानंतर आपले वडील, भाऊ आणि भाचा यांच्या खुनाचा बदला घेण्याची तीव्र इच्छा कदाचित जिजाऊंच्या मनात निर्माण झाली असावी. त्यामुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याची कल्पना त्यांच्या मनात रुजली आणि ती त्यांनी आपल्या पराक्रमी सुपुत्राच्या हस्ते प्रत्यक्षात आणली.  

या समाधीच्या शेजारी सिंदखेडचे ग्रामदैवत असलेले रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर शेजारी-शेजारी असलेले दोन नंदी आपले लक्ष वेधून घेतात. महादेवासमोर दोन नंदी क्वचितच बघायला मिळतात. मंदिराच्या आवारात एक भलेमोठे मोठे दगडी  तुळशीवृंदावन आणि सहा शिवलिंगे आहेत. या परिसरामधे मंदिराचे अनेक भग्नावशेष पडून आहेत. प्रभू रामचंद्रांनी या रामेश्वर मंदिरातील पिंडीची स्थापना  केली असे मानले जाते. दर महाशिवरात्रीला इथे आठवडाभर जत्रा भरते. या मंदिराजवळच नीळकंठेश्वर मंदिर  आहे. त्या मंदिराच्याच आवारात दगडी बांधकाम असलेली, चौरस आकाराची नीळकंठेश्वर बारव आहे. या आवारात भैरव, गणेश, हनुमान आणि शनिदेवाची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या एका गर्भगृहात शंकराची पिंड आहे तर दुसऱ्या गर्भगृहामधे चतुर्भुज हरिहराची खंडित मूर्ती आहे. या मूर्तीचे उजवे अंग भगवान शंकराचे आहे तर डावे अंग भगवान विष्णूचे आहे. एकाच मंदिरामध्ये शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांची मंदिरे क्वचितच पाहायला मिळतात. आम्ही पूर्वी पाहिलेल्या, सोलापूरजवळच्या हत्तरसंग कुडल येथील मंदिराची आठवण नीळकंठेश्वर मंदिर पाहताना मला झाली. 
रामेश्वर महादेव व नीळकंठेश्वर ही दोन्हीही मंदीरे पुरातन असून यांचा जीर्णोध्दार आधी लखुजीराव जाधवांनी आणि कालांतराने अहिल्यादेवी होळकरांनी केला होता. 

आम्हाला पुढे देऊळगावराजा गावाच्या दिशेने निघायचे असल्याने आमच्या हातात वेळ कमी होता. दगडी बांधकाम असलेला चांदणी तलाव, त्यामधला चांदणी महाल, मोती तलाव आणि 'जिजाऊ सृष्टी' नावाचे एक आधुनिक स्मारक, ही सर्व ठिकाणे आम्ही बाहेरूनच पहिली आणि देऊळगावराजाकडे निघालो.