आम्ही सिंदखेडराजाहून दुपारी चार-साडेचारच्या सुमारास शेगावच्या दिशेने निघालो. वाटेवरच सुमारे १६-१७ किलोमीटरवर असलेल्या देऊळगावराजा गावातले बालाजीचे देऊळ आम्हाला बघायचे होते. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही अर्ध्या तासातच पोहोचलो. देवळापर्यंत जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांमधे दोन्ही बाजूला, साधारण सर्व देवस्थानांच्या ठिकाणी असतात तशी दुकाने होती. या बालाजीच्या देवळातली मूर्ती लखुजीराजांना सापडली असे म्हणतात. जगदेवराव जाधवांनी बांधलेल्या मूळ देवळाचा जीर्णोद्धार १९५२ साली केला गेला. जाधवांचे वंशज या देवळाचे विश्वस्त आहेत.
या मंदिराला बालाजीचे दुकान किंवा देवघर असे म्हणले जाते. मंदिराला कळस नाहीये. या देवळातील बालाजीची मूर्ती यातुशय सुबक आणि मोहक आहे. बालाजीच्या उजव्या बाजूला श्रीदेवी आणि डाव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. बालाजीच्या मस्तकावर नागफणी आणि त्यावर पाचू बसवलेला आहे. या बालाजीला 'प्रतितिरुपती' असेही म्हणतात. तिरुपतीच्या मंदिरामधे बोललेला नवस या मंदिरामधे फेडता येतो असे मानले जाते. या देवळामध्ये देणगी देणाऱ्या भक्तांना, त्यांनी दिलेल्या देणगीच्या प्रमाणात काही टक्केवारीवर प्रसाद दिला जातो, हे या मंदिराचे वैशिष्ठ्य आहे. नवरात्रात लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा होतो. आम्ही गेलो तेव्हा मात्र तिथे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती. दर्शन घेऊन बाहेर पडलो तेंव्हा एक वयस्कर विक्रेता, खाण्याचा डिंक आणि जिरे विकायला रस्त्याकडेलाच बसलेला दिसला. त्याच्याकडचा डिंक अगदी उत्तम प्रतीचा असल्याची तो ग्वाही देत होता आणि मी डिंक विकत घ्यावा यासाठी तो फारच गळ घालत होता. जिरे चांगल्या प्रतीचे आहे हे मला वासावरून कळत होते पण डिंकाबद्दल खात्री नव्हती. तरीही मी एक किलो डिंक आणि अर्धा किलो जिरे विकत घेतले. भाव, दर्जा यांची फारशी चिकित्सा न करता, मी इतकी लवकर खरेदी केलेली बघून आनंदला भलतेच आश्चर्य वाटले. घरी परतल्यानंतर गरम तुपामध्ये डिंक चांगला फुलल्यावर माझा चेहरा आनंदाने फुलला हे सांगायलाच नको.
संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही चिखली-खामगावमार्गे शेगावकडे निघालो. शेगावच्या 'श्री गजानन महाराज संस्थान'तर्फे चालवण्यात येणाऱ्या 'आनंदविहार' या अतिथीगृहातच मुक्काम करावा असे माझ्या मैत्रिणीने आवर्जून सांगितले होते. संभाजीनगरहून निघण्यापूर्वीच आम्ही ऑनलाईन किंवा फोनबुकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, "शेगावपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचलात की फोन करा. खोली मिळून जाईल" असे आम्हाला फोनवर सांगण्यात आले हॊते. खामगावला पोहोचलो तेंव्हा आम्ही 'आनंदविहार'ला फोन केला. पण, "माऊली, इथे खोलीसाठी भक्तांची मोठी रांग लागली आहे. कमीतकमी दोन तासांचे वेटींग आहे. बराच वेळ थांबूनही खोली मिळेल याची खात्री देता येत नाही. आपणही येऊन रांगेत थांबू शकता." असे उत्तर अतिशय नम्रपणे देण्यात आले. सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता. दिवसभराच्या प्रवासामुळे आम्ही दोघेही कंटाळलेलो होतो. आनंद दिवसभर ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याला विश्रांतीची नितांत गरज होती. त्यामुळे मी पुन्हा फोन केला. परंतु, नम्र स्वरामधे तेच उत्तर देऊन फोनवरची व्यक्ती म्हणाली, "माऊली, इथे जागा मिळेल याची खात्री देता येणार नाही. शेजारी आमचेच 'आनंद विसावा' नावाचे अतिथीगृह आहे, तिथे चौकशी करा." पण तिथेही आम्हाला विनम्र स्वरात नकारघंटाच ऐकू आली. आम्ही बरेच हिरमुसलो होतो. तरीही मोठ्या आशेने 'आनंदविहार'च्या पार्किंगमध्ये गाडी लावून बुकिंग काउंटरकडे गेलो.
'आनंदविहार'चा परिसर अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ आणि रम्य आहे. आपल्याला खोली मिळेल की नाही अशी धाकधूक मनामध्ये बाळगून, बुकिंग काऊंटरजवळ आम्ही सुमारे दोन तास रांगेत थांबून होतो. "आत्तापर्यंत असा अनुभव कधीच आलेला नाही" असे रांगेतले अनेकजण आम्हाला सांगत होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी एकादशी होती आणि पाठोपाठ रविवार व २६ जानेवारीची सुट्टी असल्याने भक्तांची गर्दी लोटली असल्याचे आम्हाला समजले. काहीजण कंटाळून 'आनंद विसावा' मधे कोणालातरी पाठवून तिकडे खोली मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आठ वाजून गेले तरी आम्हाला खोली मिळाली नव्हती. आता थकव्यासोबतच पोटात भूकही जाणवत होती. पण आमच्यापैकी किमान एकाला रांगेत थांबणे आवश्यक होते. त्यामुळे आधी मी आणि त्यानंतर आनंदने, तिथल्या उपाहारगृहामधे जाऊन जेवण केले. अतिशय साध्या, सात्विक चवीची थाळी प्रत्येकी केवळ सत्तर रुपयाला होती. अखेर, रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला एक डबलरूम मिळाली आणि आमचा जीव भांड्यात पडला.
'आनंदविहार' येथे राहण्यासाठी २/३/४/५/६ जणांची सोय असलेल्या वेगवेगळ्या आकारमानाच्या एकूण सहाशे खोल्या आहेत. सर्व खोल्यांमधे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे. एकंदर परिसर आणि खोल्यांमधली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. खोलीत गेल्याबरोबर अंघोळ करून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ व नाश्ता उरकल्यानंतर आम्ही श्री गजानन महाराजांचे मुखदर्शन केले. देवळातली चोख व्यवस्था, तेथील सर्व सेवेकऱ्यांची सेवा आणि लोटलेल्या भक्तांचा गजाननमहाराजांच्या प्रति असलेला भक्तिभाव मनाला खूपच भावला. दर्शन झाल्यावर, खोलीवर परतून सामानाची आवराआवर केली. 'आनंदविहार'मधले प्रसन्न, शांत आणि अतिशय सात्विक वातावरण अनुभवायला परत शेगावला यायचेच अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही खोली सोडली. शेगाव सोडताना तिथली सुप्रसिद्ध कचोरी खाण्याचा मोह टाळता आला नाही. गुगलचा सहारा घेऊन एका कुठल्यातरी शर्मांच्या दुकानातील कचोऱ्या विकत घेतल्या. काही बायका डझनावारी 'फ्रोझन' कचोऱ्या विकत घेत होत्या. मी दोन दिवसांनंतर पुण्याला पोहोचणार असल्यामुळे फ्रोझन कचोऱ्या विकत घेता आल्या नाहीत. कचोरीची चव अप्रतिम असली तरीही अशावेळी नेमके स्वतःचे गोलमटोल शरीर डोळ्यासमोर येत असल्यामुळे केवळ एका कचोरीवर समाधान मानले.
सुमारे ११ वाजता शेगाव सोडून आम्ही साडेबारा वाजेपर्यंत मेहेकर येथील 'शारंगधर बालाजी' मंदिरामधे पोहोचलो. या मूर्तीबाबतची सत्यकथा अतिशय रंजक आहे. १८८८ साली, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेहेकर गावाजवळच धरणाचे खोदकाम सुरु झाले होते. त्या खोदकामादरम्यान एक मोठी लाकडी पेटी सापडली. त्या पेटीमधे चंदनाच्या सालींमधे गुंडाळलेली बालाजीची अत्यंत सुबक मूर्ती होती. ही मूर्ती ब्रिटिशांनी पळवू नये म्हणून, कुठल्याच मुहूर्ताची वाट न बघता, ग्रामस्थांनी रातोरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यामुळे संतापलेल्या ब्रिटिशांनी येथील साठ गावकऱ्यांना काही महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. त्या पेटीवर असलेला ताम्रपट व मूर्तीवरील दागिने मात्र ब्रिटिशांनी हडप केले, असे सांगितले जाते.
काळ्या गंडकी दगडामध्ये कोरलेली, ११ फुटी उंच, चार फुटी रुंद आणि दोन फुटी जाड, अशी ही मूर्ती बालाजीची जगातली सर्वांत मोठी मूर्ती आहे. मूर्तीभोवतीच्या प्रभावळीमधे दशावतार कोरलेले आहेत. चतुर्भुज मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहे. बालाजीच्या मूर्तीबरोबर श्रीलक्ष्मी विराजमान असलेली ही एकमेव मूर्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी-विष्णूच्या एकत्रित दर्शनाचा लाभ मिळू शकतो. प्रभावळीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित चित्र आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय आणि भूदेवी आहेत. मूर्तीच्या डोक्यावर असलेल्या मुकुटामध्ये शारंग नावाचे धनुष्य धारण केलेल्या श्री विष्णूंची मूर्ती असल्यामुळे या मूर्तीला शारंगधार-बालाजी असे नाव पडले आहे. आपल्या मनामधे जो भाव असेल तोच भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसत असल्यामुळे इथे आत्मरूप दर्शनाचा लाभ मिळतो असे म्हणतात. इतकी सुंदर मूर्ती असलेल्या या देवस्थानाचा परिसर मात्र अगदीच रया गेलेला भासला. आम्ही दर्शन घेत असताना तिथल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला विचारले, "तुम्ही बाहेरगावाहून आला आहात का?" आम्ही हो म्हणताच, मोठ्या अगत्याने ते आम्हाला देवळामागे असलेल्या प्रसादालयात घेऊन गेले. बाहेरगावच्या भक्तांना आवर्जून प्रसाद देण्याची प्रथा तिथे आहे. अप्रतिम चवीची 'साबुदाणा उसळ' म्हणजेच साबुदाणा खिचडी, आणि ताक असा प्रसाद त्या सेवेकऱ्यांनी आम्हाला आग्रहाने खाऊ घातला.
मंदिरामधून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर नृसिंह मंदिराचा फलक दिसला. संत श्री बाळाभाऊमहाराज पितळे यांच्या ज्ञानमंदिराजवळील सुमारे २०० वर्षे जुन्या वाड्यामध्ये हे मंदिर आहे. संपूर्ण जगामधे जशी १२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्ध आहेत तशी पौराणिक महत्त्व असलेल्या एकूण ११ नृसिंह मूर्ती आहेत. त्यापैकी सहावे नृसिंह मंदिर हे मेहेकर येथे आहे. ही स्वयंभू प्राचीन मूर्ती कमीतकमी १५०० वर्षे जुनी असावी. ही वाकाटक काळातील मूर्ती आहे असे काही संशोधक मानतात तर काही जणांच्या मते ही उत्तर चालुक्यकालीन असावी. एकुणात, या मूर्तीच्या कालखंडाबाबत एकमत नाही. अनेक शतके जमिनीखालील भुयारामधे ही मूर्ती बंदिस्त होती. येथील पितळे कुटुंबियांपैकी, नागपूरस्थित श्यामराज पितळे महाराजांना दृष्टांत झाल्यामुळे मेहेकर येथील माळीपेठेत असलेली ही हेमाडपंती भुयारामधली ही मूर्ती बाहेर काढली गेली. या मूर्तीची स्थापना १५८१ साली झालेली आहे. गंडकी काळ्या पाषाणामधे कोरलेली ही अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती अष्टभुज असून, तिच्या हातांमधे शंख, चक्र, पद्म आणि गदा आहेत. नृसिंहाचा चेहरा, आयाळ, व मुकुटावर आभूषणे अतिशय रेखीवपणे कोरलेली आहेत. हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये नृसिंहाची नखे रुतलेली स्पष्ट दिसून येतात. नृसिंहानी भक्त प्रल्हादाबरोबर इथेच भोजन केले आणि ते शांत झाले असा समज आहे. त्यामुळे या देवस्थानात अन्नदानाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मंदिरामधे मुख्य मूर्तीजवळच श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील सुबक पण छोटी मूर्ती आहे.
आम्ही काहीही ठरवले नसताना, एकादशीच्या दिवशी तीन देवस्थानाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचा योग आपसूकच आला, हे विशेष होते. अशा रितीने पुण्यसंचय करून, मेहेकरहून आम्ही लोणारच्या वाटेला लागलो.
सुरेख. ह्या सर्व ठिकाणी मी अनेकदा गेलो आहे, पुनर्प्रत्याची अनुभूती आली. नितिन चौधरी
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख वर्णन
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाअप्रतिम वर्णन, 🙏ताई
उत्तर द्याहटवाआभारी आहे!
हटवाअतिशय बारकाईने परंतु सहजपणे सर्व डिटेल्स लिहिले आहेत. छान वाटले वाचायला. शेगाव मध्ये काम करणारी मंडळी ही सेवेकरी ऐवजी सेवाधारी असावीत त्यामुळे मनापासून काम करतात.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाखूपच छान प्रवास वर्णन
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाखूपच छान माहीती वाचायला मिळाली. लिहिलेस पण छान.
उत्तर द्याहटवाआभारी आहे!
हटवावा! मेहकर येथील बालाजी मूर्तीची माहिती प्रथमच समजली. धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा- विठ्ठल कुलकर्णी
धन्यवाद विठ्ठल!
हटवानर्मविनोदी ,सहज, सुंदर, अतिशय प्रवाही आणि महत्वाचे म्हणजे माहितीपूर्ण लेखन. तुझ्याबरोबरच प्रवास केला, असं वाटलं. 🙏👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवानेहमी प्रमाणेच सहज सुंदर व माहिती पूर्ण वर्णन..
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाखूप छान वर्णन, तिथे जाण्याचा योग लवकर येऊ दे. तुमचा अनुभव सोबत असेलच. 🙏
उत्तर द्याहटवा