शुक्रवार, ७ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-४

माझ्या गंगास्नानानंतर, "अखेर गंगेत घोडी न्हाली" अशी कॅप्शन लिहून आनंदने चतुराई केली होती असे मला वाटले. घोडा या शब्दाचे अनेकवचन म्हणूनही 'घोडी' हा शब्द वापरात आहे. त्यामुळे, आनंदने घोडी हे संबोधन माझ्यासाठी वापरले होते, का आम्हा दोघांनाही मिळून 'घोडी' असा बहुवचनी शब्द वापरला होता ते त्याने गुलदस्त्यातच ठेवले. 

गंगास्नान घडेपर्यंत सहन कराव्या लागलेल्या अनेकांच्या अनेकविध व्यथांच्या कथा आम्हाला पूर्वीच कळलेल्या होत्या. त्याच्या तुलनेत, आमचे गंगास्नान म्हणजे अक्षरशः 'VIP स्नान' झाले, हेच आमच्या कुंभयात्रेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल! अर्धा-पाऊण तास पाण्यात डुंबून झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर परतलो. मी गंगास्नान करण्याच्या विचाराने गेलेले नसल्यामुळे, बदलण्यासाठीचे कपडे मी सोबत नेले नव्हते. त्यामुळे किनाऱ्यावर उन्हात बसून कपडे वाळवण्याशिवाय पर्यायच नव्हता. अंजली आणि प्राचीने बदलण्याचे कपडे आणले असले तरी संगमावरच्या त्या भारलेल्या वातावरणापासून पासून त्यांनाही दूर जावेसे वाटत नव्हते. आम्हाला संगमावर सोडून गेलेला आमचा नावाडीही परत आलेला नसल्यामुळे आम्हाला आपोआपच किनाऱ्यावर तासभर थांबायला मिळाले. तो तासभर एका अर्थाने अनुभवांची  गंगाजळीच म्हणावी असा होता.


अनेक प्रांतांतल्या, विविध भाषा बोलणाऱ्या, भिन्न वेषभूषांच्या, वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि अठरापगड जातींच्या लोकांचा तिथे एक सुंदर संगमच झालेला होता. काही नवराबायको जोडीने सूर्याला अर्घ्य देत होते. एकेकटेच आलेले कित्येक जणही अर्घ्यदान करत होते. काही कुटुंबातले मोठ्या गटाने आलेले लोक आपसात ठरवून एकाच वेळेला गंगेत डुबकी मारत होते. एकेका डुबकीच्या वेळी आपल्या पितरांसाठी मोक्षप्राप्ती, किंवा हयात असलेल्या आई-वडील, मुले व इतर आप्तस्वकीयांसाठी गंगेचा आशीर्वाद मागत होते. काहीजण प्रत्येक डुबकीबरोबर कलश, फुले, दूध, विड्याची पाने व सुपारी, नारळ, वस्त्र, दिवे, चांदीची नाणी अशा वस्तू गंगेला अर्पण करताना दिसत होते. काहीजण डुबकी मारताना ठराविक श्लोक किंवा स्तोत्रे म्हणत होते.      

पूजेचे साहित्य, कलश, नारळ, विड्याची पाने, सुपारी व दूध या साहित्याचे अनेक विक्रेते सरस्वती घाटाजवळच्या किनाऱ्यावर आम्ही पाहिले होतेच. तसेच संगमाजवळच्या किनाऱ्यावरही काही विक्रेते हिंडत होते. अर्थात, हे सगळेजण अव्वाच्या-सव्वा भावाने ते साहित्य विकत होते, हे सांगायलाच नको. काहीजण आपापले पूजेचे सर्व साहित्य घरूनच घेऊन आलेले होते. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारे गंगापूजन करत होते. त्या सर्वच पद्धती मला नवीन असल्यामुळे मी त्या लक्षपूर्वक पाहत होते. बरेचजण गंगेला तांब्याचा कलश अर्पण करत होते. कलशाच्या आत हळकुंड, साळीच्या लाह्या अथवा गहू, आणि एखादे नाणे टाकून, कलशावर श्रीफळ ठेवून व त्यावर वस्त्र गुंडाळून, तो कलश गंगेच्या प्रवाहामधे सोडण्याची प्रथा आहे. काहीजणांकडे गंगेला साडी दान करण्याची पद्धत आहे. गंगेच्या पात्रामधे उभे राहून, हळद-कुंकू लावून, साडीची घडी पूर्ण उघडून व साडीची चारही टोके हातात धरून गंगेच्या पात्रामधे हलकेच ती साडी सोडतात. गंगेच्या पात्रावर हेलकावे खात जात असलेल्या अनेक रंगाच्या साड्या संपूर्ण वातावरणामध्ये वेगळाच रंग भरत होत्या. 

काही कुटुंबीय नवीन कोरे कपडे परिधान करून गंगास्नान करायला आले होते. गंगास्नान झाल्यानंतर त्यांनी आपले ते नवेकोरे, ओलेते कपडे गंगाकिनारी सोडून दिले व सोबत आणलेली निराळीच नवीन वस्त्रे परिधान केली. गंगास्नानाच्या निमित्ताने गरिबांना वस्त्रदान करण्याच्या अशा पद्धती रूढ असाव्यात असे मला वाटले. एका बाईने तर मला सांगितले की तिने घरून येतानाच ब्लाउज-पीस जोडलेली नवीन साडी, फॉल-पिको करून आणली होती. ज्या कुणा गरीब स्त्रीला ती साडी मिळेल तिला ती साडी अगदी मॅचिंग ब्लाऊजसह लगेच वापरता यायला मिळावी अशी सुंदर भावना त्यामागे होती. काही स्त्रियांनी गंगेच्या काठावरच्या वाळूमधे पूजा मांडली होती. त्यांनी ओल्या वाळूच्या पिंडी तयार केल्या होत्या. त्या पिंडींना हळदकुंकू व फुले वाहून त्यावर दुधाचा अभिषेक त्या करत होत्या. अशी पूजा करताना त्या आपापल्या भाषेमधे स्तोत्रे, काही श्लोक किंवा गाणी म्हणत होत्या. प्रज्वलित केलेला दिवा  गंगेला अर्पण करून या पूजेची सांगता करत होत्या. काहींनी आपल्या घरची देवाची मूर्ती बरोबर आणली होती. त्या मूर्तीला गंगास्नान घालून, गंगाकिनारी तिचे पूजन ते करत होते. एकूण सगळे वातावरण भक्तिमय झालेले होते. 

संगमाकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ आता वाढतच चालला होता. गंगेचे आणि यमुनेचे पात्र असंख्य बोटींनी भरून गेले होते. दोन्हीं नद्यांची पात्रे स्वच्छ करण्यासाठी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्वयंचलित बोटी हिंडत होत्या. अरेल घाटापासून काही अंतरावर असलेल्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरमधून पॅराग्लायडर आणि हॉट एयर बलूनद्वारे पर्यटकांना सैर करता येत होती. तिथून निघालेल्या पॅराग्लायडरमधून काहीजण गंगेच्या पात्रावरून आकाशात भ्रमंती करताना आम्हाला दिसले. संगमावर आलेल्या अनेकांनी गंगेचे पाणी भरून नेण्यासाठी बाटल्या किंवा कॅन्स सोबत आणलेले होते. अशा प्रकारचे कॅन व बाटल्या विकण्याचा व्यवसायही किनाऱ्यावर जोरात सुरु असल्याचे आम्ही आधीच पाहिले होते. माझ्याकडे विमानात मिळालेली २०० मिलिलिटरची एक छोटी बाटली होती. मी त्यातले पाणी पिऊन संपवून टाकले आणि त्यातच गंगेचे पाणी, माझ्या भाविक सिंधी शेजाऱ्यांना देण्यासाठी भरून घेतले. सोबत आणलेल्या पिशव्यांमध्ये अनेकजण गंगेकाठची वाळू भरून नेत होते. त्यातल्या एकीला, "वाळू का नेत आहेस?" असे मी कुतूहलापोटी विचारले. गंगेकाठची वाळू आणि गंगेचे पाणी आपापल्या घरी नेऊन देवघरामधे ठेवायची पद्धत आहे असे तिच्याकडून कळले. मग प्राचीने आणि अंजलीनेही, प्लॅस्टिकच्या एका छोट्या पिशवीमधे संगमातली वाळू भरून घेतली. 

११ वाजत आले होते आणि आता सूर्य वर चढायला लागला होता. आम्ही आमच्या नावाड्याची वाट बघत होतो. इतक्यात एका बाईने माझ्या खांद्याला हात लावून माझे लक्ष वेधून घेतले. ती बहुतेक ओडिया भाषेमधे मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. ती काय म्हणत होती ते मला काही केल्या समजेना. त्यानंतर तिने मला तीच गोष्ट खुणेने सांगितली आणि मला कळली. स्नान करून आल्यानंतर तिच्या भांगामधे तिला सिंदूर भरून हवा होता. मी तो भरून दिला. तिच्याजवळ आरसा नसल्याने, माझ्या फोनचा कॅमेरा सेल्फी मोडमधे करून, सिंदूर भरलेले तिचे रूप तिला मी दाखवले. ती कमालीची खूष होत माझ्याकडे पाहून हसली आणि पुन्हा ओडिया भाषेत काहीतरी म्हणाली. मला काहीही बोध झाला नसला तरी मीही उत्तरादाखल हसले. गंगातीरावर आलेल्या सर्व भाविकांना, त्यांचे प्रांत, भाषा, जात-पात या सर्वांपलीकडे जाऊन, एकत्र जोडणारी आपली भारतीय संस्कृतीच आहे याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. त्याबरोबर हेही जाणवले की, विविधतेचे भांडार असलेल्या भारतामध्ये आपणा सर्वांना एकत्र जोडू शकणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. तरीही, आपण आसपासच्या लोकांमधले वेगळेपण शोधत, एकमेकांमध्ये भिंती का उभ्या करू पाहतो? 

आमचा नावाडी संगमावर परत येताच आम्ही सगळेजण नावेत बसून किनाऱ्याकडे निघालो. गंगास्नान झाल्यानंतर लगेच एखाद्या देवळामधे जाऊन देवदर्शन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे किनाऱ्यावर उतरताच आम्हाला किल्ल्यामधल्या पाताळपुरी देवस्थानाच्या आणि अक्षयवटाच्या दर्शनाला जायचे होते....  

                                                                                                                                                      (क्रमशः)  

बुधवार, ५ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-३

आम्ही २४ फेब्रुवारीला पहाटे प्रयागराजला  पोहोचून २६ तारखेला रात्री मुंबईला परतणार होतो. आम्ही निघायच्या एक-दोन दिवस आधी बऱ्याच घडामोडी झाल्या. 

आनंदचा जवळचा मित्र, भारतीय नौदलातील सेवानिवृत्त कमांडर लोकेश नुकताच प्रयागराजहून परतला होता. आमच्या सुनेचे आई-वडील, नेहा आणि धनंजय, हेही जाऊन आले होते. प्रयागराजमधल्या गर्दीची आणि तेथे येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणीची व्यवस्थित कल्पना आम्हाला त्या सर्वांकडून मिळाली होती. प्राचीच्या भावाच्या ओळखीने, संगमाजवळच एका फ्लॅटमधे दोन दिवसांची निवासव्यवस्था झाल्याचेही आम्हाला समजले होते. विमानतळावर आम्हाला घ्यायला येणाऱ्या टॅक्सीचालकाचा फोननंबरही आमच्या हातात आला होता. दरम्यान, आनंदच्या दुसऱ्या एका मित्राने, म्हणजे लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस याने बऱ्याच प्रयत्नांती,  नवीन कॅंटोन्मेंटमधे २५ फेब्रुवारीच्या रात्रीचे दोन खोल्यांचे  बुकिंगही आम्हाला मिळवून दिलेले होते. 

प्रयागराजला जाऊन आलेल्या प्रत्येकाने आम्हाला बजावून सांगितले होते की सर्वप्रथम संगमावर जाऊन स्नान  करून या आणि मगच इतरत्र कुठे जायचे तिथे जा. कारण, २६ फेब्रुवारीला महाशिवरात्र व शेवटचे अमृतस्नान असल्याने, संगमावर फार गर्दी होईल असा अंदाज होता. त्यामुळे शक्यतो २५ तारखेलाच आम्ही संगमापासून लांब असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटमध्ये येऊन राहावे, म्हणजे संगम परिसरातील गर्दी व ट्राफिक जॅममध्ये अडकायचा प्रसंग येणार नाही, असेही सगळ्यांनी सुचवले होते. 

पहाटे चार वाजताच्या मुंबई-प्रयागराज फ्लाईटसाठी, घरून अंघोळी करून, रात्री २ वाजता आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचलो. विमान पूर्ण भरलेले होते. विमानातले जवळपास सर्वच प्रवासी महाकुंभयात्रेला निघाले  होते, असे दिसले. बऱ्याच जणांनी अगदी ऐनवेळी तिकिटे काढलेली होती. काही जण त्याच दिवशी शेवटच्या विमानाने मुंबईला परतणार होते. तर काहीजण प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी करून परतणार होते. विमान प्रवाशांमधे आबालवृद्ध होते. कित्येकजण सहकुटुंब-सहपरिवार आलेले होते. अनेकांनी भगवी वस्त्रे परिधान केलेली होती. विमान आकाशात झेपावण्याच्या आधी, 'हरहर महादेव-हरहर गंगे' अशी घोषणा झाली. विमानात आम्हाला दिलेल्या जेवणांत सगळे उपासाचे पदार्थ होते. या सर्वच गोष्टींमुळे वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झाले होते. 

पहाटे सहा वाजता प्रयागराजला पोहोचताच आम्ही टॅक्सीने तडक सरस्वतीघाटाकडे निघालो. विमानतळाबाहेरच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खांब उभारलेले होते आणि त्या खांबांवर कुंभ ठेवलेले होते. खांबांवर व कुंभांवर विद्द्युत दिव्यांनी रोषणाई केलेली होती. ठिकठिकाणी कुंभमेळ्याबाबत माहितीचे फलक लावलेले  होते. हमरस्ता सोडून आम्ही गावात शिरलो. वाटेत लागलेल्या एका वस्तीकडे बोट दाखवत आमचा चालक उद्गारला, "ये चकिया और करेली इलाका है. कुख्यात गुंडा और दबंग राजकीय नेता अतीक अहमद का इलाका! वोही अतीक अहमद जिसकी कुछ महिने पहले हत्त्या हो गयी." 

त्या चालकाचे शब्द ऐकताच, माझे मन ३० वर्षे मागे गेले. त्या काळी प्रयागराजमधे, म्हणजेच त्यावेळच्या अलाहाबादमधे पुष्कळ प्रमाणात गुंडाराज होते. त्यावेळी अतीक अहमद हा एक युवा नेता होता आणि जिकडे तिकडे त्याचे नाव ऐकू येत होते. कित्येक सायकल रिक्षांच्या मागे त्याचा फोटो आणि "अतीक अहमद (चकिया)" असे लिहिलेले पाहिल्याचे मला ठळकपणे आठवले. पण त्याकाळीही त्याचा जबरदस्त दरारा असल्याचे आम्ही ऐकून होतो. "योगीजींने सब गुंडा लोगोंको काबू में रखा है. उत्तर प्रदेश अब बहुत बदल गया है." आमच्या चालकाचे ते शब्द ऐकून मला खूप बरे वाटले.

जसजसे आम्ही घाटाजवळ पोहोचू लागलो तसतशी गर्दी वाढू लागली. आमच्या चालकाने गल्ल्या-बोळातून मार्ग काढत आम्हाला गंगेच्या तीरावरच्या सरस्वती घाटाच्या दिशेने नेले. पण तिकडे जाण्याचा रस्ता पोलिसांनी बंद केलेला होता. आनंदने त्याचे सैनिकी ओळखपत्र दाखवल्यामुळे आम्हाला पुढे घाटापर्यंत जाता आले. घाटाजवळच असलेल्या किल्ल्याच्या आत आर्मीचा Ordnance Depot आहे. आर्मीच्याच ताब्यात असलेल्या किल्ल्यामध्ये आम्हाला सहजी आतपर्यंत जाता आल्याने, आम्ही आमची टॅक्सी किल्ल्याच्या आतच ठेवली. तिथेच आर्मीचा एक रजिस्ट्रेशन काउंटर होता. किल्ल्यामध्ये हिंडण्यासाठीच्या परवानगीचे पासेस आनंदने तिथून घेतले. त्यानंतर आम्ही जेमतेम तीनशे मीटर दूर असलेल्या सरस्वती घाटाकडे चालत गेलो. 

सरस्वती घाटावरून संगमापर्यंत जाण्यासाठी आर्मीनेच काही खाजगी बोटींची व्यवस्था केलेली होती. तिथे एक भली मोठी रांग लागलेली होती. पण सगळे भक्तगण अगदी शांतपणे रांगेमधे उभे होते. थोड्याच वेळात आम्ही बोटीमधे चढलो, सर्वांनी लाईफजॅकेट घातली आणि आमची बोट संगमाकडे निघाली. नदीकाठावरचे वातावरण  खूपच प्रसन्न होते. नदीचे संपूर्ण पात्र वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या नावांनी भरून गेले होते. आमची बोट संगमाकडे जात असताना, समोरच्या तीरावरच्या अरेल घाटावर लोटलेला अफाट जनसागर आम्हाला दिसत होता. अनेक भाविक त्या घाटावर गंगास्नानाचा आनंद घेताना दिसत होते. थोड्याच वेळात, आम्हाला संगमाचे अद्भुत दृश्य दिसू लागले. एकमेकांना भेटणारे ते दोन प्रवाह - एकीकडून संथपणे वाहत येणारी काळसर यमुना, आणि तिला आपल्यात सामावून घेण्यासाठी आसुसलेली, खळाळत येणारी, भुरकट रंगाची गंगा!



संगमाच्या जवळ आम्हाला सोडून आमचा नावाडी इतर प्रवाशांना आणायला निघून गेला. संगमाजवळच्या काठावर कपडे बदलण्यासाठी चांगले आडोसे आर्मीतर्फे तयार करून ठेवलेले होते. प्राची व अंजली गंगास्नान करण्यासाठी सज्ज होत्याच. स्नानानंतर बदलण्यासाठी त्यांनी कपडे सोबत आणलेले होते. पण आश्चर्य म्हणजे, आनंददेखील  चक्क गंगास्नान करायला अंगावरचे कपडे काढून, swimming trunk घालून तयार झाला!

गंगेच्या खळाळत वाहत्या पात्रात ते तिघेही पुढे-पुढे जायला लागले. आम्हा तिघींच्या पर्सेस आणि चौघांचेही फोन सांभाळत मीही त्यांच्या मागे-मागे जाऊ लागले. गंगेच्या पाण्याला भलताच जोर असल्याने पायाखालची वाळू सरकत होती. संगमापर्यंत पोहोचेस्तोवर आम्हाला सकाळचे नऊ वाजले होते, सूर्य वर आलेला असला तरी पाणी चांगले थंडगार होते. अंजली व प्राचीने बरेच खोल पाण्यात शिरून  डुबक्या मारल्या. आनंदही मस्तपैकी गंगास्नान  करत होता. मी मात्र फक्त त्या तिघांचे  फोटो आणि व्हिडीओ काढत होते. प्राची आणि अंजली सचैल स्नान करून बाहेर आल्या. "स्वातीताई, निदान फोटो काढून घेण्यासाठी तरी गंगेच्या पात्रामधे जरा आतपर्यंत जा" असा आग्रह प्राचीने धरला. त्यामुळे शेवटी मी आनंदचा हात धरून गंगेच्या पात्रामधे आतपर्यंत गेले. गंगेचे स्वच्छ, वाहते पाणी आणि आजूबाजूचे प्रसन्न वातावरण बघून मलाही उर्मी आली आणि मी चांगल्या दोन-तीन डुबक्या मारल्या. मी गंगेमध्ये डुबक्या मारत असतानाचा व्हिडीओ प्राचीने काढला होता. आम्ही पाण्यातून बाहेर आल्याआल्या, "अखेर गंगेत घोडी न्हाली" अशी कॅप्शन लिहून आनंदने तातडीने  तो व्हिडीओ, माझ्या नकळत, आमच्या मुलांना पाठवून दिला! 

गंगाकिनारी अनेक सुंदर गोष्टी बघायला मिळाल्या. पण त्याबाबत आता पुढील लेखामध्ये लिहीन. 

                                                                                                                                                       (क्रमशः)      

सोमवार, ३ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-२

मला ओळखणाऱ्या लोकांना, मी महाकुंभमेळ्याला जाणार आहे हे ऐकून वाटलेले आश्चर्य स्वाभाविकच होते. माझ्या मूळ स्वभावाशी मेळ न खाणारा हा निर्णय कोणत्या कारणामुळे झाला असेल याची उत्सुकताही अनेकांनी बोलून दाखवली. 

१४४ वर्षांतून एकदा येणाऱ्या प्रयागराजमधील महाकुंभाबाबत जोरदार चर्चा बरेच दिवसांपासून चालू झाली असली तरी त्याकडे मी कधी फारसे लक्ष दिले नव्हते. महाकुंभाची तयारी योगी सरकार कशी करत आहे याबाबतच्या बातम्याही मी वाचत नव्हते. "ज्या सोहळ्यामध्ये मी सामील होण्याची सुतराम शक्यता नाही त्याबाबतची चर्चा मी कशासाठी ऐकायची?" असा माझा निर्विकार दृष्टिकोन होता. १४४ वर्षांतून एकदाच येणारा हा योग आपल्या हयातीत येत आहे हे आपले भाग्य आहे, आणि पुढच्यावेळी आपण या जगात नसू, म्हणून आपण जायला हवे, असे मला अजिबात वाटले नव्हते. महाकुंभामधे अनेक सेलेब्रेटी धेंडांनी हजेरी लावल्याबद्दलही मला कौतुक नव्हते. नागा साधूंना भेटायची इच्छाही मला नव्हती  ओळखीतले, नात्यागोत्यातले अनेकजण महाकुंभासाठी जाणार होते. त्यांच्याकडे, किंवा आधीच तिथे जाऊन आलेल्या मंडळींकडे मी तिथल्या व्यवस्थेबाबत साधी चौकशीही केली नव्हती. कित्येकांच्या संगमस्नानाच्या कथा, फोटो, व्हिडीओ पोस्ट झाले. पण मी त्यापैकी कशाकडेच फारसे लक्ष दिले नव्हते. थोडक्यात काय तर, यापैकी कशामुळेही मला प्रेरित व्हायला झाले नव्हते. 'आपल्याला ज्या गावाला जायचेच नाहीये त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा?' अशीच माझी मनोधारणा होती, म्हणा ना. 

महाकुंभ सुरु झाल्यापासूनच, माझ्या काही व्हॉट्सअप ग्रुप्समधले एकदोन महाभाग सातत्याने त्याबद्दल नकारात्मक पोस्ट टाकत होते. काही चांगले घडत असेल तर त्याविरुद्ध नकारात्मक लिहून आनंद मानणाऱ्या काही नतद्रष्ट लोकांच्या त्या पोस्ट्सकडे मी सहसा काणाडोळा करत असते. पण माझ्या मनाला त्या कुठेतरी खुपत होत्या. 'डाव्या' किंवा समाजवादी विचारसरणीच्या तथाकथित 'धर्मनिरपेक्ष' लोकांच्या जिभा, केवळ  हिंदूंधर्मीयांच्या सणां-उत्सवांच्या विरोधात  वळवळत असतात हे मी पाहिले आहे. सनातनी लोक मूलतः सहिष्णू असल्याने, ते अशा विघ्नसंतोषी लोकांना फारसा विरोध करत नाहीत, आणि त्यामुळेच असल्या लोकांचे फावते. 

पहिले दोन आठवडे महाकुंभमेळ्यामधील उत्तम व्यवस्थापनामुळे मोदी-योगीजींची वाहवा जशीजशी व्हायला लागली, तसतशी या गँगच्या लेखणीला जास्त-जास्तच धार यायला लागली. गंगास्नान व त्यायोगे होणारे पापक्षालन अशा काही धार्मिक आस्थांविषयी कुचेष्टा सुरु झाली. तरीही बराच काळ मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करत राहिले. मात्र, २९ जानेवारीला, मौनी अमावस्येच्या रात्री काही भाविकांच्या मृत्यूची अतिशय क्लेशदायक बातमी आली आणि या नकारात्मक लोकांच्या हातात जणू कोलीतच आले. "महाकुंभमेळ्यात इतकी अव्यवस्था आहे  की चेंगराचेंगरी तर होणारच. अस्वच्छतेचा बजबजाट आहे, रोगराई पसरणार नाही तर काय?" असे 'ज्ञान'  त्यांच्या लिखाणातून पाझरायला लागले.  

त्यापाठोपाठच, म्हणजे ३१ जानेवारीलामाझी एक शालेय वर्गमैत्रिण, सुलेखा कानेगावकर, संगमस्नान केल्यानंतर  फेसबुकलाइव्हवर आली. तिच्या व्हिडिओला अंगठा दाखवून मी तिचे कौतुक तर केलेच. पण ती प्रयागराजमध्ये आहे हे कळताच, 'मौनी आमावस्येला ती कुठे होती? तिला काही त्रास तर झाला नाही ना?' असे प्रश्न माझ्या मनामधे आले. त्यामुळे तिच्या काळजीपोटी मी तिला फोन केला. पुढची १५-२० मिनिटे ती महाकुंभमेळ्यातील सोयी-सुविधांबद्दल भरभरून बोलत राहिली. तेथील सुव्यवस्थेचे तिने केलेले वर्णन ऐकून मी खूपच भारावून गेले. तसेच काहीसे वर्णन माझ्या परिचयातील डॉ. माधवी दातार यांच्या लिखाणातूनही मला नंतर समजले.  

मौनी अमावस्येला घडलेल्या दुर्घटनेनंतर कुंभमेळ्याकडे जाणाऱ्यांचा ओघ बराचसा आटेल अशी काही लोकांची अटकळ होती. पण तसे न होता, प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्या दुर्घटनेमुळे योगी-मोदीजींची नाचक्की होईल असेही काही लोकांना वाटले होते. परंतु, तसेही झाले नाही. त्यामुळे त्या विघ्नसंतोषी आणि मोदी-योगीविरोधी आघाडीचा जळफळाट वाढत गेला. त्यांच्याकडून नकारात्मक पोस्ट्सचा आणखी भडीमार सुरु झाला. आमच्या डॉक्टर्सच्या व्हाट्सअप ग्रुपवरील काही डॉक्टरांनी तर ताळतंत्र सोडून व्यक्त व्हायला सुरुवात केली. एखाद्या दुर्घटनेमधे निरपराध व्यक्तींचे मृत्यू झाल्यास, मग ते मृत्यू भले आपल्या शत्रूराष्ट्रवासीयांचे का असेनात,  कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला दुःखच व्हायला हवे. परंतु, या दुर्घटनेचेही भांडवल करून, आणि क्षुद्र राजकीय वैरभावनेने  टवाळी आणि टिप्पण्या करणाऱ्या या टोळक्याचा मला मनस्वी राग आला. त्यानंतर मात्र मी सातत्याने  कुंभमेळ्यातल्या व्यवस्थेबाबत माहिती घेऊ लागले. माझ्या मैत्रिणीने आणि इतर परिचितांनी सांगितलेल्या सकारात्मक गोष्टी लिहून, सर्व नकारात्मक पोस्ट्सना विरोध दर्शवू लागले. १२ फेब्रुवारीच्या रात्री अशाच काही चीड आणणाऱ्या पोस्ट्स माझ्या वाचनात आल्या. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला की इतरांच्या माहितीवर विसंबून न राहता  आपणच कुंभमेळ्यात  जावे. स्वतः तिथल्या लोकांशी बोलावे, तिथली व्यवस्था कशी आहे ते स्वतःच्या डोळ्याने पाहावे, आणि मगच या नतद्रष्ट टोळक्याला विरोध करावा. ही तीव्र  इच्छा मला झाली आणि काही तासांच्या आत आम्ही आमची तिकिटे काढलीदेखील! ज्या नकारात्मक लोकांच्या कुचाळक्यांमुळे मला हा अमृतानुभव मिळाला त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन.  

प्रयागराजला जायची आणि यायची विमानाची तिकिटे काढून झाली. आर्मीने खास कुंभमेळ्यासाठी  सुरु केलेल्या armaan या वेबसाईटवर नोंदणी करून आम्ही संगमापर्यंत जाण्यासाठीचा 'आर्मी व्हिजिटर' पास काढला. आर्मीतर्फे बोटीची सोय होईल असेही आनंदने केलेल्या चौकशीतून समजले. संगमाजवळील किल्ला आर्मीच्याच ताब्यात आहे. जुने कॅंटोन्मेंट संगमाजवळ आहे आणि नवीन कॅंटोन्मेंट तेथून ८-९ किलोमीटर दूर आहे. आर्मीतर्फे अगदी स्वच्छ व सोयीस्कर निवासव्यवस्था माफक दरामध्ये आम्हाला मिळू शकली असती. जुन्या कॅंटोन्मेंटमधे, म्हणजे संगमाच्या अगदी जवळ राहता आले तर आम्हाला हवे होते, कारण तेथे राहून संगमापर्यंय जाणे सुकर झाले असते. पण प्रचंड गर्दीमुळे बुकिंग मिळत नव्हते. दूरवरच्या नवीन कॅंटोन्मेंटमधे अगदी डॉर्मेटरी मिळाली तरीही चालेल असा विचार आम्ही केला. परंतु, सातत्याने प्रयत्न करूनही २० तारखेपर्यंत काहीच हाती लागले नाही. 

तेवढ्यात असे समजले की, प्राचीच्या भावाच्या एका पक्षकाराचे वडील प्रयागराजमधील एका मठाचे महंत आहेत. त्यांच्याकडून एखाद्या तंबूची किंवा तत्सम काहीतरी व्यवस्था होण्याची आशा निर्माण झाली. प्रवासाला निघण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत आमच्या हातात पक्के असे काहीच नव्हते. शेवटी आपापले अंथरूण-पांघरूण किंवा sleeping bags घेऊन जायचीही मनाची तयारी आम्ही केली. पण आमच्या नशिबात काहीतरी वेगळेच होते, त्याबाबत पुढील भागात लिहीन.  

(क्रमशः) 

रविवार, २ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-१

१२ फेब्रुवारी २०२५. रात्रीचे दहा वाजले होते. मी माझा फोन चाळत बसले होते आणि अचानक मला काय वाटले कुणास ठाऊक? मी माझ्या मुंबईच्या वहिनीला फोन लावला, "प्राची, मी महाकुंभमेळ्याला चालले आहे. तुला यायचंय का? "

माझे बोलणे ऐकून प्राचीला बहुतेक हर्षवायू झाला असावा. ती कमालीच्या आनंदात म्हणाली, "अहो, मी अंजलीशी आत्ताच महाकुंभला जाण्याबाबत बोलत होते. पण आम्हाला सगळ्या अडचणीच समोर दिसत होत्या. तिचा फोन ठेवला आणि तुमचा फोन आला. आता तुम्ही जायचं ठरवताय म्हणजे आमची महाकुंभयात्रा निश्चित घडणार. आपण तिघी मिळून जाऊया. तुम्ही जसे ठरवाल तशा आम्ही दोघी येऊ." प्राचीकडून अशी बिनशर्त संमती मिळताच, प्रयागराजपर्यंत कसे जायचे याचा विचार मी करू लागले. 

आनंद कॉम्प्युटरवर काहीतरी काम करत बसला होता. माझे आणि प्राचीचे बोलणे त्याच्या कानावर पडल्यामुळे आश्चर्यचकित होऊन तो  मला म्हणाला, "तू खरंच महाकुंभ मेळ्यामधे जाणार आहेस?" 

"हो. निश्चितच जाणार आहे मी. आणि तूही आलास तर मला बरे वाटेल."

"आणि गंगास्नानही करणारेस?" आनंदने विचारले.

"ते मी सांगू शकत नाही, पण मी जाणार हे निश्चित आहे. तू पण येणार का? तू येणार असशील तर चौघांनी एकत्र कसे जायचे या दृष्टीने विचार करूया." 

"तुला मी बरोबर असावे असे वाटते आहे ना? मग मी येईन. " 

आनंदचे उत्तर ऐकून मला अगदी सुखावायला झाले. 

तितक्यात माझ्या मुंबईच्या भाच्याचा फोन आला, "आत्या, तू महाकुंभमेळ्याला खरंच जाणार आहेस? का नुसतीच आईची चेष्टा करते आहेस?" 

"अरे, मी नक्की जाणार आहे. तुझी आई किती श्रद्धाळू आहे हे मला माहीत आहे. धार्मिक गोष्टींच्या बाबतीत मी तिची अशी चेष्टा कशी करेन?" 

"अगं, पण त्या स्नानामुळे पापक्षालन, मोक्षप्राप्ती, वगैरे होईल या गोष्टींवर तुझा विश्वास तरी आहे का?"

"नाही. यापैकी कशावरही माझा विश्वास नाहीये, हे तुला चांगले माहिती आहे " 

"मग तू महाकुंभामधे कशासाठी जाते आहेस?" 

"अशा गोष्टींवर विश्वास असलेल्यांनीच महाकुंभाला जावे, असे कुठे लिहिले आहे? ना आपल्या धर्मामधे तसे सांगितले आहे, ना योगीजींनी तसे काही म्हटले आहे. कोणावरही कसलीही वैचारिक सक्ती नसणे, हेच तर आपल्या धर्माचे वैशिष्ठय आहे. मला जावेसे वाटतेय,  मी जाणार आणि आमच्याबरोबर आनंदकाकाही येणार आहेत" 

"आनंदकाकांनी तुझ्याबरोबर यावे असा आग्रह नक्की तूच धरला असणार. Otherwise, he would have never come. "

"मी आग्रह धरला नाही. पण माझ्याबरोबर त्यांनी यावे, ही इच्छा मी बोलून दाखवली आणि ते लगेच तयार झाले" 

"चला. मग काय? तिकडे जाऊन तुम्ही दोघेही गंगास्नान करून पावन होणार नां?" भाच्याने आता जरा चेष्टेचाच सूर लावला. 

"तुझी आई आणि तुझी मामी गंगास्नान करतील. त्यांच्याबरोबर संगमापर्यंत मी जाईनच. त्यांचे सामान सांभाळेन. त्यांचे व्हिडीओज आणि फोटोज काढेन आणि तुम्हाला पाठवीन. आनंदकाका गंगास्नान करणार की नाहीत, याबाबत तेच सांगू शकतील. पण आम्ही तिथे जाणार हे निश्चित."  

"पण मला सांग, आनंदकाका पूर्वी तीन-साडेतीन वर्षे  प्रयागराजमधेच पोस्टिंगवर होते. त्या काळात तुम्ही कधीतरी संगमावर जाऊन गंगास्नान केले होते का?" भाच्याने आता माझी उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली. 

"त्या काळात आमच्याकडे आलेल्या अनेक पाहुण्यांना आम्ही संगमावर नेऊन आणले. पण आम्ही दोघांनी कधीच  गंगास्नान केले नाही हे खरे आहे. पण आता तुझे प्रश्न थांबव आणि फोन ठेव. आम्हाला पुढचं सगळं प्लॅनिंग करायचं आहे."  

प्रयागराजपर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय-काय आहेत, त्यापैकी कोणता मार्ग सगळ्यात श्रेयस्कर, चौघांच्या दृष्टीने सोयीच्या तारखा कोणत्या आहेत, प्रवासात काय-काय अडचणी येऊ शकतील याबाबत पुढचा अर्धा-पाऊण तास उलट-सुलट चर्चा झाली. आम्हा दोघांनाही  खरे तर स्वतःच्या गाडीने जाण्याची इच्छा होती. प्राचीचा ड्रायव्हर, आनंद आणि मी, असे तिघेजण आळीपाळीने गाडी चालवू शकलो असतो. पण त्यासाठी कमीतकमी पाच ते सहा दिवसांचा दौरा आखावा लागला असता. अंजलीच्या मुलीची परीक्षा असल्याने, पाच-सहा दिवस काढणे अंजलीला शक्य नव्हते. प्रयागराजजवळच्या हमरस्त्यांवर वरचेवर होत असलेल्या ट्रॅफिक जॅमच्या बातम्याही आम्ही ऐकून होतो. रेल्वेची तिकिटे मिळणे केवळ अशक्य होते. प्राची आणि अंजलीशी एक-दोन वेळा चर्चा झाल्यावर आम्ही विमानाने जायचे निश्चित केले. साधारण रात्री ११.३० वाजेपर्यंत आमची विमानाची तिकिटे काढून झालीसुद्धा!

माझा मुंबईचा भाऊ त्याच्या वकिली व्यवसायामधे अतिशय व्यग्र असल्यामुळे रोजच रात्री जेमतेम ११-१२ वाजेपर्यंत तो घरी येतो. भाऊ घरी परतला आणि आमची प्रयागराजची तिकिटे काढून झाली आहेत, ही सनसनाटी बातमी त्याला मिळाली. त्याला न विचारता, न कळवता, प्राचीने जाण्याचे पक्के केले आणि त्या बेतामध्ये मीही सामील आहे हे ऐकून तो अचंबित झाला असावा. त्याने मला फोन केला.

"स्वाती, प्राची सांगते आहे की महाकुंभमेळ्याला जायचे तू ठरवलेस आणि प्राचीला "येणार का?" असे  विचारलेस म्हणे! खरे आहे का हे? का ती उगीच आपलं तुझं नाव पुढे करते आहे?" 

"प्राची सांगते आहे ते अगदी खरे आहे. मलाच अचानक महाकुंभमेळ्याला जायची इच्छा झाली. पण कोणीतरी बरोबर असावे असे मला वाटले. प्राची  भाविक आहे. तिची जायची इच्छा असणार, याची मला खात्री होती. म्हणून मी तिला फोन केला." 

"प्राचीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण मुळात तुला जायची इच्छा कशी काय झाली हेच मला कळत नाहीये! आणि तुझ्या इच्छेखातर आनंदसुद्धा यायला तयार झालाय म्हणे! तुझे डोके मूळ स्वभावाच्या उलट चालायला लागले आहे, का आता साठी उलटल्यानंतर तू भक्तिमार्गावर चालायचे ठरवले आहेस?" 

माझ्या स्वभावाच्या उलट दिशेने जाण्याचा माझा निर्णय कशामुळे झाला हे गिरीशला समजावून सांगणे अवघड होते. त्यामुळे त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे मी टाळले.

महाकुंभमेळ्याला जाण्याची प्रेरणा नेमकी कशामुळे मिळाली याबद्दल अनेकजणांच्या कथा माझ्या वाचनात आल्या होत्या. मला मात्र महाकुंभमेळ्याला जाण्याची तीव्र इच्छा एका अगदी निराळ्याच कारणामुळे झाली होती. त्याबाबत मी पुढील भागामधे सांगेन...  

(क्रमशः)