रविवार, २ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-१

१२ फेब्रुवारी २०२५. रात्रीचे दहा वाजले होते. मी माझा फोन चाळत बसले होते आणि अचानक मला काय वाटले कुणास ठाऊक? मी माझ्या मुंबईच्या वहिनीला फोन लावला, "प्राची, मी महाकुंभमेळ्याला चालले आहे. तुला यायचंय का? "

माझे बोलणे ऐकून प्राचीला बहुतेक हर्षवायू झाला असावा. ती कमालीच्या आनंदात म्हणाली, "अहो, मी अंजलीशी आत्ताच महाकुंभला जाण्याबाबत बोलत होते. पण आम्हाला सगळ्या अडचणीच समोर दिसत होत्या. तिचा फोन ठेवला आणि तुमचा फोन आला. आता तुम्ही जायचं ठरवताय म्हणजे आमची महाकुंभयात्रा निश्चित घडणार. आपण तिघी मिळून जाऊया. तुम्ही जसे ठरवाल तशा आम्ही दोघी येऊ." प्राचीकडून अशी बिनशर्त संमती मिळताच, प्रयागराजपर्यंत कसे जायचे याचा विचार मी करू लागले. 

आनंद कॉम्प्युटरवर काहीतरी काम करत बसला होता. माझे आणि प्राचीचे बोलणे त्याच्या कानावर पडल्यामुळे आश्चर्यचकित होऊन तो  मला म्हणाला, "तू खरंच महाकुंभ मेळ्यामधे जाणार आहेस?" 

"हो. निश्चितच जाणार आहे मी. आणि तूही आलास तर मला बरे वाटेल."

"आणि गंगास्नानही करणारेस?" आनंदने विचारले.

"ते मी सांगू शकत नाही, पण मी जाणार हे निश्चित आहे. तू पण येणार का? तू येणार असशील तर चौघांनी एकत्र कसे जायचे या दृष्टीने विचार करूया." 

"तुला मी बरोबर असावे असे वाटते आहे ना? मग मी येईन. " 

आनंदचे उत्तर ऐकून मला अगदी सुखावायला झाले. 

तितक्यात माझ्या मुंबईच्या भाच्याचा फोन आला, "आत्या, तू महाकुंभमेळ्याला खरंच जाणार आहेस? का नुसतीच आईची चेष्टा करते आहेस?" 

"अरे, मी नक्की जाणार आहे. तुझी आई किती श्रद्धाळू आहे हे मला माहीत आहे. धार्मिक गोष्टींच्या बाबतीत मी तिची अशी चेष्टा कशी करेन?" 

"अगं, पण त्या स्नानामुळे पापक्षालन, मोक्षप्राप्ती, वगैरे होईल या गोष्टींवर तुझा विश्वास तरी आहे का?"

"नाही. यापैकी कशावरही माझा विश्वास नाहीये, हे तुला चांगले माहिती आहे " 

"मग तू महाकुंभामधे कशासाठी जाते आहेस?" 

"अशा गोष्टींवर विश्वास असलेल्यांनीच महाकुंभाला जावे, असे कुठे लिहिले आहे? ना आपल्या धर्मामधे तसे सांगितले आहे, ना योगीजींनी तसे काही म्हटले आहे. कोणावरही कसलीही वैचारिक सक्ती नसणे, हेच तर आपल्या धर्माचे वैशिष्ठय आहे. मला जावेसे वाटतेय,  मी जाणार आणि आमच्याबरोबर आनंदकाकाही येणार आहेत" 

"आनंदकाकांनी तुझ्याबरोबर यावे असा आग्रह नक्की तूच धरला असणार. Otherwise, he would have never come. "

"मी आग्रह धरला नाही. पण माझ्याबरोबर त्यांनी यावे, ही इच्छा मी बोलून दाखवली आणि ते लगेच तयार झाले" 

"चला. मग काय? तिकडे जाऊन तुम्ही दोघेही गंगास्नान करून पावन होणार नां?" भाच्याने आता जरा चेष्टेचाच सूर लावला. 

"तुझी आई आणि तुझी मामी गंगास्नान करतील. त्यांच्याबरोबर संगमापर्यंत मी जाईनच. त्यांचे सामान सांभाळेन. त्यांचे व्हिडीओज आणि फोटोज काढेन आणि तुम्हाला पाठवीन. आनंदकाका गंगास्नान करणार की नाहीत, याबाबत तेच सांगू शकतील. पण आम्ही तिथे जाणार हे निश्चित."  

"पण मला सांग, आनंदकाका पूर्वी तीन-साडेतीन वर्षे  प्रयागराजमधेच पोस्टिंगवर होते. त्या काळात तुम्ही कधीतरी संगमावर जाऊन गंगास्नान केले होते का?" भाच्याने आता माझी उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली. 

"त्या काळात आमच्याकडे आलेल्या अनेक पाहुण्यांना आम्ही संगमावर नेऊन आणले. पण आम्ही दोघांनी कधीच  गंगास्नान केले नाही हे खरे आहे. पण आता तुझे प्रश्न थांबव आणि फोन ठेव. आम्हाला पुढचं सगळं प्लॅनिंग करायचं आहे."  

प्रयागराजपर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय-काय आहेत, त्यापैकी कोणता मार्ग सगळ्यात श्रेयस्कर, चौघांच्या दृष्टीने सोयीच्या तारखा कोणत्या आहेत, प्रवासात काय-काय अडचणी येऊ शकतील याबाबत पुढचा अर्धा-पाऊण तास उलट-सुलट चर्चा झाली. आम्हा दोघांनाही  खरे तर स्वतःच्या गाडीने जाण्याची इच्छा होती. प्राचीचा ड्रायव्हर, आनंद आणि मी, असे तिघेजण आळीपाळीने गाडी चालवू शकलो असतो. पण त्यासाठी कमीतकमी पाच ते सहा दिवसांचा दौरा आखावा लागला असता. अंजलीच्या मुलीची परीक्षा असल्याने, पाच-सहा दिवस काढणे अंजलीला शक्य नव्हते. प्रयागराजजवळच्या हमरस्त्यांवर वरचेवर होत असलेल्या ट्रॅफिक जॅमच्या बातम्याही आम्ही ऐकून होतो. रेल्वेची तिकिटे मिळणे केवळ अशक्य होते. प्राची आणि अंजलीशी एक-दोन वेळा चर्चा झाल्यावर आम्ही विमानाने जायचे निश्चित केले. साधारण रात्री ११.३० वाजेपर्यंत आमची विमानाची तिकिटे काढून झालीसुद्धा!

माझा मुंबईचा भाऊ त्याच्या वकिली व्यवसायामधे अतिशय व्यग्र असल्यामुळे रोजच रात्री जेमतेम ११-१२ वाजेपर्यंत तो घरी येतो. भाऊ घरी परतला आणि आमची प्रयागराजची तिकिटे काढून झाली आहेत, ही सनसनाटी बातमी त्याला मिळाली. त्याला न विचारता, न कळवता, प्राचीने जाण्याचे पक्के केले आणि त्या बेतामध्ये मीही सामील आहे हे ऐकून तो अचंबित झाला असावा. त्याने मला फोन केला.

"स्वाती, प्राची सांगते आहे की महाकुंभमेळ्याला जायचे तू ठरवलेस आणि प्राचीला "येणार का?" असे  विचारलेस म्हणे! खरे आहे का हे? का ती उगीच आपलं तुझं नाव पुढे करते आहे?" 

"प्राची सांगते आहे ते अगदी खरे आहे. मलाच अचानक महाकुंभमेळ्याला जायची इच्छा झाली. पण कोणीतरी बरोबर असावे असे मला वाटले. प्राची  भाविक आहे. तिची जायची इच्छा असणार, याची मला खात्री होती. म्हणून मी तिला फोन केला." 

"प्राचीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण मुळात तुला जायची इच्छा कशी काय झाली हेच मला कळत नाहीये! आणि तुझ्या इच्छेखातर आनंदसुद्धा यायला तयार झालाय म्हणे! तुझे डोके मूळ स्वभावाच्या उलट चालायला लागले आहे, का आता साठी उलटल्यानंतर तू भक्तिमार्गावर चालायचे ठरवले आहेस?" 

माझ्या स्वभावाच्या उलट दिशेने जाण्याचा माझा निर्णय कशामुळे झाला हे गिरीशला समजावून सांगणे अवघड होते. त्यामुळे त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे मी टाळले.

महाकुंभमेळ्याला जाण्याची प्रेरणा नेमकी कशामुळे मिळाली याबद्दल अनेकजणांच्या कथा माझ्या वाचनात आल्या होत्या. मला मात्र महाकुंभमेळ्याला जाण्याची तीव्र इच्छा एका अगदी निराळ्याच कारणामुळे झाली होती. त्याबाबत मी पुढील भागामधे सांगेन...  

(क्रमशः)

१५ टिप्पण्या:

  1. ग्रेट 👍, नितिन चौधरी

    उत्तर द्याहटवा
  2. पुढच्या भागाची वाट बघतोय 👍

    उत्तर द्याहटवा
  3. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. 👌 पुढच्या भागाची प्रतीक्षा

    उत्तर द्याहटवा
  5. Wow. ताई, आता अगदी छान आणि खरी माहिती मिळणार तुझ्यामुळे

    उत्तर द्याहटवा
  6. पाहूया आता पुढे काय

    उत्तर द्याहटवा
  7. अदृष्य शक्ती ने तुम्हाला अनपेक्षित निर्णय घेण्यास प्रवृत्त केले... चलो बुलावा आया है माताने बुलाया है...

    पूढिल भाग ऐकायला उत्सुक

    उत्तर द्याहटवा
  8. दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत 👌

    उत्तर द्याहटवा
  9. स्वातीताई खूप छान. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

    उत्तर द्याहटवा