सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

"झीरो एफ आय आर"

'पिंक' सिनेमा प्रदर्शित झाला आणि 'झीरो एफ.आय.आर' या विषयावर बरंच काही-काही लिहून यायला लागले. त्याच सुमारास कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर मूक मोर्चे निघायला लागले. मग इतर जातीतील महिलांवरदेखील कसे लैंगिक अत्याचार नेहमीच होत आलेले आहेत याचाही उहापोह चालू झाला. पण या सर्व गदारोळात, जाती-पातीचे राजकारण न करता, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविरुद्ध प्रतिबंधनात्मक ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, हे नजरेआड होत आहे. 'झिरो एफ.आय.आर' वरून मला, मागच्या वर्षी नवरात्रात घडलेली एक  घटना आठवली.

नेहमीच्या सवयी प्रमाणे, पहाटे उठून मी सव्वापाच-साडेपाचच्या सुमारास फिरायला घराबाहेर पडले होते. भल्या पहाटेचे थंड, शांत व प्रसन्न वातावरण होते. अजून उजाडलेले नसल्याने  व रस्त्यावरचे काही दिवे बंद असल्याने, रस्त्यावर प्रकाश अगदीच कमी होता. साधू वासवानी चौकातून विधानभवनकडे उजव्या हाताच्या फुटपाथवरून चालत निघाले. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक दांडगा तरुण फुटपाथच्या लोखंडी रेलींगजवळून चालत येताना मला दिसला. लांबूनच त्याची व माझी नजरानजर झाली, आणि मला काही कळायच्या आतच त्याने घाणेरडे अंगप्रदर्शन करून, माझ्याकडे बघत काही अश्लील हावभाव सुरु केले. अचानक असे दृश्य समोर आल्याने मी स्तब्ध झाले, कमालीच्या भीतीची लहर माझ्या शरीरातून गेली आणि अक्षरशः घाम फुटला. पण दुसऱ्याच क्षणी मी भानावर आले आणि माझ्या मनांत किळस, राग, उद्वेग या भावना उफाळून आल्या. त्याच्या त्या हिडीस वर्तनाबद्दल  त्याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे अशी प्रबळ भावना मनात आली.

तो तरुण माझ्या डाव्या बाजूला जवळच उभा असला तरी मी त्याच्या कानफटात लावू शकेन इतका जवळ नव्हता. रागाने त्याच्यावर ओरडत पटकन मागे वळून फुटपाथवरून रस्त्यावर उतरून, त्याला पकडण्याच्या उद्देशाने मी जवळ-जवळ धावतच त्याच्याकडे निघाले. माझा रणचंडिकेचा अवतार बघून तो घाबरून, मला चुकवून, वासवानी चौकाकडे पळू लागला. मग मीही सगळे बळ एकवटून त्याच्या मागे शक्य तितक्या जोरात पळायला लागले. पण तो  जोरात पळत काही क्षणांतच माझ्या नजरेआड झाला. त्या दरम्यान मी माझ्या  मोबाईल फोन वरून १०० नंबरवर फोन फिरवला, पण तो लागला नाही. म्हणून मी घरी फोन करून झालेला प्रकार आनंदला कळवला आणि पोलिसांना कळवायला सांगितले. रस्त्यावरून पळता-पळता, "पकडा पकडा" असा आरडाओरडा मी करीत असल्याने, रस्त्यावरून चाललेला एक अनोळखी रिक्षावाला मदतीला धावून आला व मी त्याच्या  रिक्षात बसून त्या तरुणाचा पाठलाग सुरु केला. रिक्षावाल्याने प्रसंगावधान राखून सुसाट वेगाने रिक्षा चालवत पाठलाग केल्यामुळे, साधू वासवानी रस्त्यावरील पोलीस मुख्यालयाच्या अलिकडच्या पेट्रोल पंपासमोर त्या तरुणाला आम्ही गाठले.

तातडीने रिक्षातून उतरून त्या तरुणाला मी पकडले  व त्याला एक सणसणीत थोबाडीत मारली. तो तरुण माझ्या पायावर लोळण घेऊन, हात जोडून, "मावशी माफ करा, मला सोडा. परत असं करणार नाही " अशी गयावया करायला लागला.  तेवढ्यात पोलीस मुख्यालयाच्या गेट नंबर तीन मधून एक महिला पोलीस शिपाई बाहेर आल्या व काय घडले याची विचारपूस करू लागल्या. तसेच पाठोपाठ एक पुरुष पोलीस शिपाई मोटारसायकलवरून आला. त्या माणसाने जे घृणास्पद वर्तन  केले होते त्याबद्दल  सांगण्याचीही मला लाज वाटत होती. तरीही घडलेला प्रकार  मी त्यांना सांगितला. मग त्या शिपायाने त्या तरुणाला पकडून पोलीस मुख्यालयाच्या दारात तैनात असलेल्या शिपायांच्या हवाली केले. हे सर्व होईस्तोवर घरातून निघून आनंदही तिथे आलेला होता. त्याने पोलिस कंट्रोल रूमला माझा फोन नंबर कळवलेला असल्याने, कंट्रोल रुमकडूनही मला फोन आलेला होता. तसेच विधान भवन पोलीस चौकीचे फौजदारही एका शिपायासह दाखल झालेले होते.

"या माणसांविरुद्ध तुम्हाला गुन्हा दाखल करायचाय का?" असा प्रश्न माझ्यापुढे पोलिसांनी ठेवला. गुन्हा घडलेलाच होता आणि तो दाखल करणे आवश्यक आहे यावर मी आणि आनंदही ठाम होतो. मग पोलीस त्या तरुणाला घेऊन बंडगार्डन  स्टेशनमध्ये गेले व मलाही तिथे जावे लागले. तिथे गेल्यावरचा अनुभव वेगळाच होता. 'आता पहाटे पहाटे ही काय पीडा आणलीय या बाईने?' असा भाव तिथल्या ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आला होता. त्यांनंतरचा सगळा प्रकार अत्यंत त्रासदायक होता. "बाई, कम्प्लेंट कशाला करता? याला जरा आत घेतो, आमच्या पद्धतीने समज देऊन सरळ करतो आणि देतो सोडून" किंवा, "एफ. आय. आर. दाखल केलीत तर तुम्हालाच त्रास होईल. कोर्टात साक्ष द्यायला यावे लागेल" आणि कळस म्हणजे, "बाई त्यानं तुम्हाला हात तर नाही ना लावला? मग द्या ना सोडून. कशाला एफ. आय. आर. देण्याच्या भानगडीत पडता?" हे सगळं कमी होतं की काय म्हणून, "बाई इतक्या पहाटे-पहाटे तुम्ही कशाला घराबाहेर पडला होतात?" पोलिसांच्या असल्या भडिमाराला मला सामोरे जावे लागले. मला हे सगळे असह्य होत होते. पण आनंद मला धीर देत, माझ्या बरोबर होता म्हणून मी शांत राहू शकले.   

सर्वांत चीड आणणारे वक्तव्य विधानभवन पोलीस चौकीच्या फौजदारसाहेबांचे होते," बाई, गुन्हा जर आमच्या पोलीस चौकीजवळ घडला असे तुम्ही म्हणता, तर मग तुम्ही आमच्या पोलीस चौकीवर तक्रार द्यायला का नाही आलात? इकडं पोलीस हेडक्वार्टरपाशी यायची काय गरज होती?" गुन्हेगाराच्या मागे जाऊन त्याला पकडणे मला जास्त महत्त्वाचे वाटले, असे स्पष्टीकरण मी दिले. पण त्यांना पटत नव्हते व ते सतत माझ्यावरच अविश्वास दाखवत होते! 
"विधान भवन पोलीस चौकीचे दार सकाळी आठ वाजेपर्यँत चक्क बंद करून ठेवलेले असते, मग मी कशी तिकडे येणार होते?" असा प्रतिप्रश्न मी त्यांना करू शकले असते. 
माझे फिरणे संपवून मी परत येईपर्यंत म्हणजे सुमारे आठ वाजेपर्यंत खरोखरीच, विधान भवन पोलीस चौकीचे दार बंद असते, हे मी गेली कित्येक वर्षे बघते आहे. हे सांगून त्या पोलीस फौजदाराचे तोड बंद करावे, असे मला क्षणभर वाटलेही होते. पण त्या वेळी त्यांची उणी-दुणी काढणे योग्य होणार नाही या जाणिवेने गप्प बसले. 

इतकी बोलणी ऐकूनही मी एफ. आय. आर. दाखल करण्यावर ठाम आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर मग, "मॅडम आत्ता आमची आधीची कामे चालली आहेत. तुमचा फोन नंबर द्या. आम्ही तुम्हाला बोलावून घेतो आणि मग एफ. आय. आर. नोंदवून घेतो", असे सांगण्यात आले. 
मी आणि आनंदने आपसात चर्चा केली आणि तिथेच थांबून एफ.आय.आर नोंदवूनच बाहेर पडायचे असे ठरवले. पुढचे दोन-अडीच तास आम्ही तिथल्या बाकड्यावर बसून होतो. रात्रीची ड्यूटी संपवून जाणाऱ्या व सकाळी ड्यूटीवर येणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर, "बाई तर बऱ्या घरच्या दिसताहेत, मग काय भानगड आहे यांची? पहाटे-पहाटे पोलीस स्टेशनला काय करताहेत?" असा प्रश्नार्थक भाव होता. काहींनी, "तुमचं काय आहे? का थांबला आहात?" असे प्रश्न विचारलेही. मग पुन्हा ते सगळे सांगणे आले. त्यावर पोलिसांची अनेक बेजबाबदार विधाने ऐकणे आले. काही पोलिसांचा बोलण्याचा रोख तर मला असाही वाटला की, या बाईच्या बाबतीत असं काही घडलं आहे म्हणजे हिचंच काहीतरी चुकलेलं असणार. मला अगदी लाजिरवाणे वाटत होते. तरीही, या अडचणींना न  जुमानता, एफ.आय.आर दाखल करणे हे माझे कर्तव्य आहे या भावनेने आम्ही तिथे थांबून राहिलो. शेवटी साडेनऊ दहाच्या सुमारास एफ.आय.आर दाखल होऊन त्याची प्रत घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.

या सर्व घटनेतून मला काही गोष्टी जाणवल्या. सर्वप्रथम, अशा प्रसंगातून गेलेल्या स्त्रीला, गुन्ह्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरातील मंडळींचे, विशेषतः पति, वडील, भाऊ यांचे सक्रिय आणि भावनिक पाठबळ असणे अत्यावश्यक आहे. कित्येक स्त्रियांना अशावेळी कदाचित तेही मिळत नसावे. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा प्रकारची तक्रार नोंदवायला गेलेल्या माझ्यासारख्या सुशिक्षित, सुस्थितीतील स्त्रीला जर पोलिसांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसेल, तर एखाद्या अशिक्षित, गरीब घरातल्या स्त्रीला एफ.आय. आर. नोंदवणे किती अवघड जात असेल याचा मला अंदाज आला. तिसरी गोष्ट म्हणजे, केवळ माझ्यासमोर दुरून घडलेल्या त्या वर्तनामुळे जर मी इतकी घाबरले होते तर प्रत्यक्षात लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीची मानसिक अवस्था कशी होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. आणि त्यानंतर पोलिसांकडून धीर न मिळता उलट जर तिला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व कारणांमुळेच  कदाचित कित्येक गुन्हे घडूनही त्यांची नोंद करायला स्त्रिया कचरत असाव्यात. 'पिंक' सिनेमामुळे, एफ.आय.आर. नोंदवण्याचे महत्व आणि "झीरो एफ.आय.आर." ही संकल्पना अधोरेखित झाली. पण मला हेही लक्षात आले की अशा गुन्हयांची नोंद करूनच न घेण्याकडे पोलिसांचा कल असतो. कदाचित आपले पोलिसखाते, "झीरो एफ.आय.आर" म्हणजे, "एफ.आय.आर. च्या शून्य नोंदी करणे असा अगदी सोयीस्कर अर्थ घेत असावे!

नवरात्रात आपण स्त्रीशक्तीची पूजा करतो. मागच्या नवरात्रात मी माझ्यातली 'शक्ति' जागृत करून लैंगिक गुन्ह्याची प्रवृत्ती असलेल्या एका व्यक्तिला पकडून दिले. पोलिसांकडून केवळ 'समज देववून' त्याला सोडून देण्याऐवजी एफ.आय.आर. नोंदवण्याचा कष्टाचा पर्याय मी निवडला. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वेळीच पकडून देऊन, पुढे होणारा एखादा गंभीर गुन्हा कदाचित मी थांबवू शकेन, अशीच माझी ठाम भूमिका होती आणि आजही आहे. सर्वच वयाच्या स्त्रियांनी, लैंगिक स्वरूपाच्या छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यांबद्दलही   "Zero tolerence" ठेवला आणि न घाबरता गुन्हेगाराला प्रतिकार केला व गुन्हा नोंदवला, तर अशा अपप्रवृत्तींना आपोआप आळा बसेल. गुन्हा नोंदवण्यासाठी "झीरो एफ.आय.आर." ची संकल्पनाही स्त्रियांना नीट माहिती पाहिजेच. नवरात्रात स्त्रिया उपास, पूजा-अर्चा व नट्टापट्टा करतात, त्याला काहीच हरकत नाही. पण स्त्रीने स्वतःतल्या 'शक्ती'ची जाणीव करून घेणे' हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. स्त्रियांना समाजात सुरक्षितपणे आणि निर्भीडपणे वावरता यावे याकरिता केल्या गेलेल्या कायद्यांच्या 'ज्ञानाचे शस्त्र' स्त्रियांनी पाजळावे आणि निव्वळ अबला न राहता खऱ्या अर्थाने सबला व सक्षम व्हावे असे मला मनापासून वाटते! 




७ टिप्पण्या:

  1. It is really very ridiculous. Booking a complaint(FIR) is I think more painful than crime happened with us. This tendency will really lead to so called 'zero FIR' target. And thats why people do not go for FIR and all those very lengthy judicial activities. Our system itself is not capable to sort out such issues in correct way. And it is advantageous to such people.
    About crime : There is something more required than punishment. Why people behave in this way. All Jailers should understand the psychology behind every crime and work out for it. There should be guidance to social workers from such kind of cases so that the root cause will be found and there would not be any such crime. When ladies are not safe even at home, girls are not safe at school, then what can we expect from such type of 'Gundas' roaming on road. Training to girls and not the best but good society is our minimum requirement.

    उत्तर द्याहटवा
  2. Thanks Vandana! Along with women empowerment, to educating the boys and males so is equally important to have a healthy society.

    उत्तर द्याहटवा
  3. Great blog.. I completely empathise with it. Women need to start speaking up and standing up for their rights.

    उत्तर द्याहटवा
  4. Great blog.. I completely empathise with it. Women need to start speaking up and standing up for their rights.

    उत्तर द्याहटवा