गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

१. मलाबारची सफर- मंगळुरु

मंगळुरु बद्दल मला फक्त 'मंगळुरी कौले', इतकेच काय ते ऐकून माहिती होते. पण प्रत्यक्षात मंगळुरुला जाण्याचा कधी योग येईल असे वाटले नव्हते. या वर्षी ऑगस्ट महिन्यात, जोडून सुट्ट्या येत आहेत तर आपण सगळे मिळून, दादांना घेऊन कुठेतरी प्रवासाला जाऊया, अशी टूम देवाशिषने, म्हणजे माझ्या भाच्याने काढली. मग इथे जाऊया का तिथे जाऊया? असे करता करता त्याची गाडी, 'सध्या कुठेच नको. दिवाळीच्या सुट्टीत जाऊया' इथपर्यंत येऊन थांबली. प्रवासाला जायला मी आणि आनंद तर खुश होतोच, पण दादाही उत्सुक होते. आता त्या बेतावर पाणी पडणार, या कल्पनेने दादा हिरमुसले झाले. मी आणि आनंदने जवळपासच्या अनेक रिसॉर्टस्  मधे जागा मिळते आहे का याबाबत फोनवर चौकशी केली. पण लागून सुट्ट्या आलेल्या असल्याने कुठेही जागा उपलब्ध नव्हती. 

मागे ज्योत्स्नाकडून, म्हणजे माझ्या चुलत बहिणीकडून 'अनुभव ट्रॅव्हल्सच्या'  'कोस्टल कर्नाटक' सहली बद्दल, बरेच कौतुक ऐकले होते. ते आठवल्यामुळे मी 'अनुभव  ट्रॅव्हल्सच्या' पुणे ऑफिसला फोन करून त्यांची एखादी सहल जाणार आहे का? याची चौकशी केली. नेमके आम्हाला हव्या त्या दिवसातली 'मलाबार कोस्ट' ची त्यांची सहल निघणार होती आणि त्यात पाच जागाही शिल्लक होत्या. त्या चार दिवसांच्या सहलीची कार्यक्रम पत्रिका WhatsApp वर मागवून घेतली. दादांनी मलाबार किनारपट्टी आधी बघितलेली नव्हती. त्यांना या सहलीची रूपरेषा आवडली. त्यामुळे आम्ही लगेच पैसे भरून सहलीला जायचे निश्चित करून टाकले. आमच्या व्याह्यांना आणि विहीणबाईंना, म्हणजे डॉ राजेंद्र देवपूरकर सरांना आणि सौ. संध्याताईंना आमच्याबरोबर येण्याचा आग्रह केला. पण ते येऊ शकले नाहीत.  

१२ ऑगस्टच्या सकाळपासून मंगळुरु एयरपोर्टवरून चालू होऊन, मलाबार किनारपट्टीवरून दक्षिणेला प्रयाण करत सोळा ऑगस्टला सकाळी ती सहल कोळीकोडला संपणार होती. दादांना तो प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आम्ही एक दिवस आधी, म्हणजे ११ ऑगस्टला मंगळुरुला पोहोचायचे आणि १६ ऑगस्टनंतर एक दिवस कोळीकोड येथे थांबून मगच परतायचे असे ठरवले. त्याप्रमाणे जाताना मुंबई-मंगळुरु व परतीचे कोळीकोड-मुंबई अशी विमानाची तिकीटे हातोहात काढून टाकली. 

१० ऑगस्टला दिवसभराची सगळी कामे संपवून रात्रीपर्यंत आम्ही टॅक्सी करून मुंबईला गिरीश-प्राचीकडे मुक्कामाला पोहोचलो. रात्री सगळ्यांना उकडीचे मोदक करून घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून, विमान सुटायच्या वेळेच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचलो आणि सामान चेक-इन करून निश्चिंत झालो.  शाळेत माझ्या मागे एक वर्ष असलेली 'अर्जुन पुरस्कार विजेती' वंदना शानभाग मंगळुरुला आहे असे कळले होते. तिच्याशी संपर्क साधला, पण नेमकी त्यावेळी ती चिकमगळूरला गेलेली असल्याचे कळले. 

आमच्याबरोबर गिरीश आणि प्राचीही येऊ इच्छितात असे आदल्या रात्री कळले होते. पण रात्री 'अनुभव ट्रॅव्हल्स' शी बोलणे होऊ शकले नाही. सकाळी मुंबई विमानतळावरून मी त्यांच्याशी संपर्क साधला. पण इतक्या ऐनवेळी नवीन प्रवाशांना घेणे शक्य नाही असे उत्तर मिळाले. त्यामुळे जरा वाईट वाटले. 

मुंबई-मंगळुरु विमान प्रवास अगदी अल्लद झाला. मंगळुरु विमानतळ अगदी स्वच्छ आहे. जागोजागी  कलात्मक सजावट केलेली आहे. विमानतळावरून टॅक्सी करून हॉटेलमध्ये येताना, वाटेवर फळे विकत घ्यायला एका दुकानात थांबले. पूर्वी कधीही न बघितलेले, एक लालभडक्क रंगाचे काटेरी फळ मला तिथे दिसले. जेवण करून, फलाहार केला आणि थोडी वामकुक्षी घेतली. संध्याकाळी असिलताशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्या फळाचे नाव, 'राम्बुतान' आहे असे कळले. ती फळे फारच मधुर आणि रसाळ होती. 

सकाळपासून मला जरा बरे वाटत नव्हते. दुपारी मात्र चांगलाच ताप भरला. आता हा ताप सहलभर मला 'ताप' देणार की काय, हा विचार मनाला अस्वस्थ करत होता. 

मंगळुरु विमानतळ 


लालभडक्क राम्बुतान !

१४ टिप्पण्या:

  1. नेहमीप्रमाणे सफाईदारपणे प्रवास वर्णन केले आहे पुढील भाग लवकर वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहेच

    उत्तर द्याहटवा
  2. स्वाती तुझे प्रवास वर्णन वाचून प्रत्यक्ष प्रवास केल्याचा अनुभव येतो.छानच.👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लिहिले आहेस.

    उत्तर द्याहटवा