बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

शिक्षण पालकांचे

शिक्षण पद्धतीत लवकरात लवकर आमूलाग्र बदल व्हायला हवाच आहे. आपल्या देशची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची बौद्धिक पातळी लक्षात घेता, आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडायला किती वर्षे जातीला कुणास ठाऊक.पण तो पर्यंत काय? 

शिक्षण पध्दती किंवा शाळा कशीही 
 असली तरी, पालकांनी आपापल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावावी लागते. मुलांना हळू हळू करत प्रत्येक विषयातील पाठ्यक्रमाबाहेरचे व जरा कठीण असे थोडेसे काहीतरी शिकायला लावणे हे कुठल्याही सजग पालकाला शक्य आहे . पण बरेचसे पालक ते करत नाहीत व फक्त आपल्या शिक्षण पद्धतीला नावे ठेवत बसतात. अतिशय सोप्या अन बुद्धीला चालना न देणाऱ्या अशा सध्याच्या शालेय अभ्यासाचे स्वरूप लक्षात न घेता, आपल्या मुलांना अभ्यासाचा फार ताण आहे, अशा समजुतीत बरेसचे पालक असतात . दुर्दैवाने या समजूतीबरोबरच मार्क्स=हुषारी असे समीकरण कित्येक पालकांच्या मनात तयार झालेले असते . त्यामुळे मग मुलांच्या शिक्षणाचे outsourcing तत्परतेने 'tution classes' कडे केले जाते. या सगळ्यामुळे , ज्ञान मिळवणे व ते योग्य पद्धतीने वापरणे हा शिक्षणाचा मूळ हेतूच आजचे पालक विसरून चालले आहेत. 

आजकाल बहुतेक मुले संगणक आणि मोबाईल, गेम्स खेळणे, apps वापरणे या कामांसाठीच सफाईने हाताळतातत. आपले मूल कशासाठी संगणक व मोबाईल याचा वापर करते आहे याची पालकांना कल्पनाच नसते . त्यामुळे या उत्तम साधनांचा अत्यंत निरुपयोगी कामांसाठी वापर होत आहे हे लक्षात न घेता, आपापल्या मुलांच्या स्मार्टनेसचे अवाजावी कौतुक पालक करत रहातात. ख़रेतर संगणक आणि इंटरनेटमुळे आजच्या मुलांसमोर ज्ञानाचे मुक्त भांडार खुले आहे. पण पालकांनी ते कसे वापरायचे हे शिकावे लागते व मुलांनाही ते शिकवावे लागते.


पालकांनी शिक्षणाशी संबंधित या सर्व बाबींचा विचार डोळसपणे केला पाहिजे.

 

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

लढवय्ये पुणेकर

शिवकालापासून आजपर्यंत लढवय्या पुणेकरांच्या युद्धनीतीमध्ये जरासाच फरक पडला आहे. तेंव्हा जिवावर उदार होऊन इंच इंच लढवत किल्ले जिंकले जायचे. आताचे पुणेकर ट्राफिक मध्ये एक एक  इंच लढवत जिवावर उदार झालेले दिसतात! गनिमी कावा मात्र पुणेकर आजही तेव्हढाच वापरतात!

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

जय महाराष्ट्र?

मागच्या आठवड्यात आम्ही आमच्या गाडीने पुणे ते कोल्हापूर, सांगली आणि परत असा प्रवास केला . संध्याकाळ झाली होती आणि  रस्त्यावरच्या पाट्या नीट  दिसत नव्हत्या.  कुठल्यातरी आडगावाच्या नाक्यावर उभ्या असलेल्या काही तरुणांना रस्ता विचारावा म्हणून थांबलो.
"पलूस फाटा किती लांब आहे?"
"पलूस यहां कहां? आप आगे आ गये.  पलूस तो पाक पिछे रह गया" एका तरुणाने तत्परतेने उत्तर दिले.
"मी मराठीत विचारलं आणि तुम्ही सुद्धा मराठी बोलणारे दिसता आहात. मग माझ्या प्रश्नाला हिंदीत का उत्तर देता आहात?"
ओशाळवाणं हसून तो तरुण म्हणाला, "कुटं बिगडलंय हिंदीत बोललुय तर?"
मी स्पष्ट केलं, "मी स्वतः जर प्रश्न राष्ट्रभाषेमध्ये विचारला असता तर तुमचं उत्तर योग्यच होतं. पण महाराष्ट्रात मराठी भाषेत विचारलेल्या प्रश्नाला एका मराठी भाषिक माणसाकडून मला उत्तर मराठीत अपेक्षित होतं" 
पुन्हा कसनुसं हसून तो म्हणाला, "मला वाटलं तुम्ही मुंबईहून आलाय. म्हणून मी हिंदीतून उत्तर दिलं."
मला त्याच्या उत्तराची फारच गंमत वाटली.  मी त्याला विचारलं,
"मुंबई महाराष्ट्रातच आहे, का महाराष्ट्राच्या बाहेर?"
माझ्या प्रश्नाला तो काय उत्तर देतो आहे, हे ऐकायला आम्ही तिथे थांबलोच नाही. जाता जाता नाक्यावर एका राजकीय पक्षाच्या भव्य फ्लेक्स वर लिहिलेले दिसले "जय महाराष्ट्र".
दुर्दैवानं आज "जय महाराष्ट्र" ही फक्त एक राजकीय घोषणा होऊन राहिली आहे. मनात आलं, आता कुठल्या तरी राजकीय पक्षाने असा फतवा काढावा की,"प्रत्येक मराठी भाषिक माणसाने निदान मराठीत विचारलेल्या प्रश्नाला तरी मायबोली मराठीत उत्तर दिलं पाहिजे'. कदाचित त्यानंतर आपण सगळेच अभिमानानं म्हणू शकू  "जय हिंद, जय महाराष्ट्र"!

व्हिजन २०-२०


संध्याकाळी घरी येत होते, तर वाटेत एक दोन मंडळांचे गणपती दिसले. गणपतीपुढे लाऊड स्पीकर वर हिंदी सिनेमातली 'बलम पिचकारी' किंवा तत्सम गाणी लागलेली होती. बऱ्याचशा शाळकरी मुला-मुलींचे तसेच तरूण-तरुणींचे पाय त्या गाण्यांवर थिरकत होते.

हल्ली जवळ जवळ बारा महिने कुठल्या ना कुठल्या सणाच्या निमित्ताने असं गाणं, बजावणं आणि पाय थिरकवणं चालू असतंच. तसेच वर्षभर, शहरातल्या तरूण मुला-मुलींचे हातही मला दिवसरात्र भरभर चालताना दिसतात, पण ते मुख्यत: हातातल्या मोबाईलवर!

हेच हातपाय जर, रोज थोड्या वेळासाठी का होईना, विधायक कामांसाठी चालायला लागले, तर लवकरच आपला  देश प्रगतीपथावर लागेल. नाहीतर आपण निवांतपणे २०-२०च्या matches बघत, 'vision २०२० 'ची वाट इसवी सन ४०४० पर्यंत बघत बसू!


शनिवार, १३ जुलै, २०१३

'मेंटल ब्लॉक'

हल्ली मला मनापासून सारखं काहीतरी लिहावसं वाटतंय आणि मी रोज चक्क लिहितेय.

झालं असं की, मला आधीच हात दुखण्याचा त्रास होत होता. तरी तसेच कॉम्प्युटर वरचा मराठी font वापरून, लिखाण चालू ठेवलं होतं. पण typing च्या त्रासातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून बघितला, मित्र-मैत्रिणींशी बोलले. मी सगळं हातानीच लिहून काढावं, कुणाकडून तरी लिहून घ्यावं, किंवा सरळ मराठी टायपिस्ट कडून type करून घ्यावं, असे आणि इतर बरेच उपाय  समोर आले. स्वतः डॉक्टर असल्यामुळे शंका अशीही आली की माझं हस्ताक्षर इतरांना तर सोडाच, पण माझं मला तरी परत वाचता येईल का? आणि लिहिताना  हात दुखणार होते ते वेगळंच. बरं, माझ्या मनात जसे जसे विचार येत जातील तसे ते लगेच type  करणारा टायपिस्ट कुठून आणायचा? मराठीसाठी speech to text असं काही software मिळतंय का, हे शोधलं पण तसं काही  मिळालं नाही. मग हळू-हळू type करत,सात आठ लेख लिहून काढले.

माझ्या दुखण्यावर मात करून, कसं जिद्दीने मी लिहितेय हे मी मोठ्या अभिमानानं  अमेरिकेत शिकणाऱ्या आमच्या मुलांना सांगितलं. लगेच त्या दोघांनीही, "एक ब्लॉग लिहायला सुरु कर" असं सुचवलं. पण मला तर ब्लॉग कसा उघडायचा ते माहिती नव्हतं. मग तो उघडणार कोण ? बरं, तो उघडला तर वापरायचा कसा हे कोणाकडून शिकणार? मग सोयीस्करपणे मनाशी म्हटलं, मला कुठलं काय ब्लॉगिंग जमणार? खरंतर,  blogging, netbanking या असल्या गोष्टींबद्दल केवळ अज्ञानामुळे बसलेली, एक सुप्त अढी माझ्या मनांत होतीच! मी मग मुलांना सांगून टाकलं, "तुम्ही  पुण्याला आलात की मला शिकवा." खरंतर हे सांगण्यात शिकण्याच्या उर्मीपेक्षा, ब्लॉग  प्रकरण पुढे ढकलण्याची माझी इच्छाच जास्त प्रबळ होती. मग, माझं लिखाण आधीच्याच पद्धतीनं हळू हळू चालू राहिलं. 

आमच्या मुलीचा मित्र, रघू महाजन गेल्या शनिवारी सहा जुलैला पुण्यात आमच्या घरीच उतरला  होता. तो स्वत:च्या तीन-चार ब्लॉग्सवर नेहमी काही न काही लिहीत असतो, या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटत आलंय. पण त्याच्यासारख्या हुषार मुलाला काय सगळंच शक्य आहे, असंही वाटायचं. आमच्या दोन दिवसांच्या सहवासात, पुण्या मुंबईतील हॉटेलमधल्या चांगल्या-चुंगल्या खाण्याबद्दलचं माझं ज्ञान ऐकून, मी ह्या विषयावर एक ब्लॉग लिहावा, असं रघूनं सुचवलं. त्याची ती सूचना ऎकूनही मी न ऎकल्यासारखी केली. रविवारी, सात जुलैला रघूबरोबर मुक्त संवादाचा एक कार्यक्रम आम्ही स्वानंद फाउंडेशनतर्फे, गरवारे कॉलेजच्या ए.व्ही. हॉलमध्ये ठेवला होता. हॉल उघडण्याची वाट बघत, आम्ही उभे होतो. तेवढ्यात रघूनं  हॉलच्या भिंतीकडे कुठेतरी बोट दाखवून प्रश्न केला, "पुराचं पाणी तिथपर्यंत आलं होतं का?" मी त्या दिशेनं बघितलं. भिंतीवर एके ठिकाणी मला flood level अशी लाल रेघ दिसली. मी दुजोरा दिला. "किती साली आला होता पूर?" त्याचा पुढचा प्रश्न आला. मग मात्र, "माझ्या जन्माच्या आधी एक दोन वर्षे" असं vague उत्तर देऊन मी त्याच्या पुढच्या प्रश्नांपासून सुटका करून घेतली. खरंतर, इतके वेळा इथे येऊनही, flood level ची ही  लाल रेघ,  मला आधी कधीच दिसली नाही आणि पानशेत धरण नेमकं कधी फुटलं हेही मला माहीत नसावं या दोन्ही गोष्टींची मला कमालीची लाज वाटली होती. पण तीही तेवढ्यापुरतीच! वेळ तर मारून नेली होती, त्यामुळे मग तो विषय डोक्यातून निघून गेला. 

बारा जुलै २०१३. सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्र चाळताना लक्षात आलं  की पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला आज बावन्न वर्षे झाली. सगळ्या वर्तमानपत्रांमधून त्यावेळचा घटनाक्रम, बातम्या, थरारक अनुभव, छायाचित्रं, असं सर्व छापून आलेलं होतं. गेली कित्येक वर्षे, म्हणजे निदान चाळीस तरी, या दिवशी छापून येणाऱ्या अशाच प्रकारच्या बातम्या मी वाचत राहिले असेन. अगदी लहानपणापासून या घटनेबद्दल घरातल्या मोठ्या माणसांकडून, बरेच वेळा बरंच काही ऐकलेलं होतं. पण पुण्याच्या इतिहासातील इतक्या महत्त्वाच्या घटनेबद्दल माझ्या लक्षात फारसं काहीच राहिलेलं नव्हतं, हे  रघूशी बोलताना हे प्रकर्षानं जाणवलं होतं. त्यामुळे मग आज मात्र सगळ्या बातम्या अगदी मन लावून वाचल्या. जास्त पाणी साठल्यामुळे आधीच कच्चे असलेले बांध फुटून 'पानशेत झालं'. पण धरण फुटण्यापूर्वी सैन्याच्या जवानांनी, धरणाला पडलेल्या फटी ब्लॉक करण्यासाठी वाळूच्या bags रचून, धरणफुटी काही काळ तरी लांबवली होती, तसेच खडकवासला धरणाची काही दारे वेळीच उघडून पुणेकरांना पुरापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता म्हणे. हे वाचून भारतीय सैन्याबद्दल नेहमीप्रमाणेच पुन्हा अभिमान वाटला. 
  
परवा मुलाचा मित्र सुजीत घोलप, आमच्या घरी रहायला आला होता. सहज म्हणून त्याला माझे लेख वाचून दाखवले. "काकू, छान लिहिता आहात अगदी. तुमचा ब्लॉग आहे का? ब्लॉगवर टाका ना. आणि ब्लॉग नसेल तर आजच उघडा आणि त्यावर लिहीत जा." असं म्हणाला. त्याच्यापुढे माझं अज्ञान उघडे पडू नये असं एकीकडे वाटत असलं तरी, सरळ मी सांगितलंच, "मला ब्लॉग उघडता आणि वापरता येत नाही." लगेच सुजीतने, मला माझा ब्लॉग उघडून दिला आणि त्यावर लिहायला शिकवले. ब्लॉगवर लिहितेय तर जाणवतंय की  ब्लॉगवर लिहिणं नुसतं type करण्यापेक्षा बरच सोप्पं आहे. जाम मस्त वाटतंय आता. मग जेंव्हा माझ्या मुलांनी सांगितलं तेंव्हा मी का बरं तयार नव्हते? एकमेव कारण म्हणजे माझा 'मेंटल ब्लॉक'! तो 'ब्लॉक' निघाला आणि हा 'ब्लॉग' उघडला, तेंव्हाच मला मजा यायला लागली. 

'मेंटल ब्लॉक' वरून, सहज मनांत विचार यायला लागले.  आपापल्या मनातले अज्ञानाचे 'ब्लॉक्स' लवकरात लवकर हटवून टाकण्यातच शहाणपणा असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगांत हे किती सुकर होऊन गेलंय ते. पण मनामध्ये, न्यूनगंडाचे, नैराश्याचे, नकारात्मक विचारांचे, तर कधी गैरसमजुतीचे 'ब्लॉक' देखील असतातच  की. मनाचे काही दरवाजे बंद ठेवण्यानं खूप काही साधतं हे खरं आहे. पण, बांध फुटू नये यासाठी, वेळच्यावेळी आपल्या मनाची काही दारं उघडून तिथले 'ब्लॉक' काढावेच लागतात. केंव्हा कुठले दरवाजे उघडायचे आणि कुठले बंदच ठेवायचे, हे ज्याचं त्यानं समजून घेतलेलं बरं. नाही का? प्रत्येक वेळी कोण आणि कसं समजावून सांगणार?

गुरुवार, ११ जुलै, २०१३

महिती अधिकार कायद्याचा वापर

आज पहिल्यांदा महिती अधिकार कायद्याचा वापर केला . खूप बरं वाटलं. आता बघुयात काय होते आहे ते. 

ब्लॉगिंगची सुरवात .

आज सुजीतने मला ब्लॉग वापरायला शिकवला.