शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

निसटलेले क्षण

माझ्या सासूबाई २०१५ च्या डिसेंबरात वारल्या. त्यानंतर माझे सासरे त्यांच्या वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत आणि  त्यांच्या मृत्यूपर्यंत माझ्या नणंदेच्या घरीच वास्तव्यास होते. माझ्या नणंदेला २०१६ च्या नोव्हेंबरात एका लग्नानिमित्त दोन दिवसांसाठी बाहेरगावी जायचे होते. त्यावेळी माझे मामेसासूसासरे पुण्यात येऊन माझ्या सासऱ्यांच्या सोबतीला माझ्या नणंदेच्या घरी राहिले होते. माझ्या मामेसासूसासऱ्यांचे वयही त्यावेळी ऐंशीच्या पुढेच होते. त्या तिघांनीही आमच्या घरी राहावे असे आम्ही उभयतांनी माझ्या सासऱ्यांना सुचवले होते. "एक-दोन दिवसांसाठी जा-ये नको, आम्ही तिघेही येथेच राहू" असे माझे सासरे म्हणाले. म्हणून मग त्यातल्या एका दिवशी नणंदेच्या घरीच जाऊन, स्वयंपाक करून मी त्या तिघांना जेवायला वाढले. दुसऱ्या दिवशी मी कामात व्यस्त असल्याने त्या तिघांना संध्याकाळी आमच्या घरी जेवायला घेऊन आले. 

त्या रात्री, मी माझ्या सासऱ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक केले होते. मी त्यांना आग्रहाने गरम-गरम जेवण वाढले. त्यांनीही मोदक खाऊन, तृप्त होऊन माझे कौतुक केले. जेवण होता-होता रात्रीचे दहा वाजत आले होते. आम्ही सगळेजण मजेत गप्पा मारत बसलो होतो. नणंदेची फ्लाईट अकरा-साडेअकरा पर्यंत पुण्यात पोहोचणार होती. तोपर्यंत त्या तिघांनीही आमच्याच घरी थांबावे, असा आग्रह आम्ही दोघे करीत होतो. पण माझे सासरे दमले होते. घरी जाऊन झोपतो म्हणाले. ते अगदी दारात असताना मी त्यांना म्हणाले, "बाबा, जरा आत येता का? आपण आपला सगळ्यांचा एक फोटो काढू या ना'. पण ते म्हणाले, "आता नको. मी जातो आणि झोपतो". मग मीही आग्रह धरला नाही. त्या दिवशीची त्यांची आणि आमची ती भेट शेवटचीच ठरली. दहा-बारा दिवसांनी, २९ नोव्हेंबर २०१६ रोजी माझ्या सासऱ्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्यासोबत फोटो काढण्याची शेवटची संधी हातातून निसटून गेली ती गेलीच. 

आज या गोष्टीची प्रकर्षाने आठवण होण्यासाठी कारणही तसेच घडले. साधारण महिन्याभरापूर्वी माझी आई अत्यवस्थ होती आणि आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिला भेटायला आयसीयूमध्ये कोणीही येऊ नये, असेच डॉक्टरांनी सांगितले होते. हॉस्पिटलमध्ये जाऊन आईला बघण्याचा दुराग्रह न धरता, माझ्या वहिनीचे वडील ऍडव्होकेट आबा गांगल व वहिनीच्या काकू डॉ. सुधा गांगल, माझ्या वडिलाना भेटायला आवर्जून आमच्या घरी आले होते. कॅन्सरवरील संशोधनासाठी जगभरात नावाजल्या गेलेल्या, आणि टाटा कॅन्सर संशोधन केंद्राच्या माजी संचालक, विदुषी डॉ.सुधा गांगल, प्रथमच आमच्या घरी आल्या होत्या. त्यामुळे मी भारावून गेले होते. त्यांच्यासोबत आपण आपला एखादा फोटो काढावा असे एकदा माझ्या मनांत आलेही. पण त्याप्रसंगी तो विचार बोलणे कदाचित योग्य दिसणार नाही असे वाटून मी काही बोलले नाही.  

दुर्दैवाने, पुढच्या दोन दिवसातच डॉ. सुधा गांगल यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले आणि त्यांना दुर्धर कॅन्सरने ग्रासले आहे, असे निदान झाले. त्या आजारातून सुधाकाकू बाहेर पडूच शकल्या नाहीत व आज पहाटे त्या पंचत्वात विलीन झाल्या. मनोमन त्यांना श्रद्धांजली वाहताना एकच चुटपुट मनांत घर करून आहे. त्यांच्यासोबत फोटो काढून घेणे आता कधीच शक्य होणार नाही.

थोडक्यात काय? जीवन क्षणभंगुर आहे. प्रत्येक क्षणी, मनांत जे येते ते बोलावे, करून मोकळे व्हावे.  निसटून गेलेले असे हे अनेक क्षण मनाला टोचणी देत राहतात.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

'मला जगायचंय'

साडेचार महिन्यांच्या प्रदीर्घ आजारपणाने कृश झालेली माझी वयोवृद्ध आई, गेले अनेक दिवस आयसीयूत आहे. आठ-नऊ दिवस व्हेंटिलेटरवर व डायलिसिसवर राहून, तीन दिवसांपूर्वी त्या दिव्यातून ती सुखरूप बाहेर पडली. कालपासून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ती द्यायला लागली आहे.

काल मी सहज तिला विचारले, "काय आई, बरी आहेस ना? काय करावंसं वाटतं आहे? कुठे जावसं वाटतंय? "

तिने माझ्या पहिल्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मान हलवून दिले. मला बरे वाटले.

मी दुसरा व तिसरा प्रश्न परत विचारला. त्यावर ती म्हणाली, "मला जगायचंय. मला सोलापूरला जायचंय"

तिच्या उत्तराने मी अवाक् झाले.

यावर्षी जुलैच्या २२ तारखेला, मुलीच्या बाळंतपणाच्या निमित्ताने, मी पाच आठवड्यांसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. पण पाठोपाठच माझी आई सोलापूरला आजारी पडली. तिने खाणे-पिणे सोडले. शेवटी, ती जवळ-जवळ ग्लानीत जायला लागल्याने, सहा ऑगस्टला सोलापुरातच तिला आयसीयूत अ‍ॅडमिट करावे लागले. 

बरेच दिवस तिच्या आजाराचे काहीही निदान होत नसल्याने आणि तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने, तिच्यावर उपचार करणाऱ्या सोलापूरच्या डॉक्टरांनी हात टेकलेलेच होते. त्यातही कहर असा झाला की तिला नळीवाटे पातळ अन्न देताना, ते अन्न दोन-तीनदा तिच्या फुफुसांत गेले. त्यामुळे तिला Aspiration Pneumonia झाला. तिला दम लागू लागला. तिचे वय आणि एकूणच तिची अवस्था बघून, शेवटी तिथल्या डॉक्टरांनी सांगितले, "आता इथे आम्हाला याउपर कुठलेही वैद्यकीय उपचार करणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. तुम्ही सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. तिला आता घरी घेऊन जा किंवा पुण्या-मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवा"

मला हे समजताच, माझ्या भारतात परतण्याच्या नियोजित तारखेपेक्षा आठवडाभर आधीच निघून मी तडक सोलापूरला पोहोचले. आईला अँब्युलन्समध्ये घालून पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये आणले. तिच्यावर पूर्वी एकदा ज्यांनी उपचार केले होते त्या डॉक्टर वाडियांनी यावेळीही योग्य उपचार करून तिला वाचवले.

त्यानंतर जरी तिला घरी आणले तरी अशक्तपणामुळे तिला नीट खाता-पीता येत नव्हते. त्यामुळे अजूनच अशक्तपणा वाढून तिची प्रतिकारशक्ति संपून गेली व तिला वरचेवर जंतूसंसर्ग होत राहिला. तीन आठवड्यांपूर्वी तिला परत रूबी हॉल क्लिनिकमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले. हॉस्पिटलच्या खोलीमध्ये असताना काही दिवसांपूर्वी, नळीवाटे पातळ अन्नपदार्थ देताना पुन्हा तिच्या फुफुसांमध्ये अन्न जाऊन तिला अत्यंत गंभीर स्वरूपाचा Aspiration Pneumonia झाला. त्यामुळे तिला पुन्हा आयसीयूत हलवावे लागले. श्वसनाला त्रास होत असल्याने आठ-नऊ दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्याकाळात ती बेशुद्धावस्थेतच होती. तिच्या किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्याने तिचे तीन वेळा हिमोडायलिसीस करावे लागले. निष्णात डॉक्टर असलेल्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच आयसीयूत आईवर वैद्यकीय उपचार करीत आहेत. त्यामुळेच उपचारांमध्ये काही हयगय होणार नाही, याबाबत आता मी निर्धास्त आहे. 

आठ-दहा दिवसांपूर्वी जेंव्हा आई अत्यवस्थ होती, तेंव्हा कुठलेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या जवळपासच्या सर्व व्यक्तींनाही तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे "आता कधी?" अशा अर्थाचे प्रश्नचिन्हच फक्त  त्या सर्वांच्या चेहऱ्यावर होते. आई बरी व्हावी म्हणून माझ्या डॉक्टर मैत्रिणी व मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतो. रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्व प्रयत्न करीत राहायचे, अशी शिकवण आमच्या अंगात भिनलेली असली तरीही, आई या दिव्यातून बाहेर पडेल की नाही याबाबत आम्ही सर्व डॉक्टर्स त्यावेळी जरा साशंकच होतो. 

कमालीचा अशक्तपणा, बेशुद्धावस्था, व्हेंटिलेटर, डायलिसीस, सेप्सीस या सगळ्यातून आई कशी काय बाहेर पडली हा आम्हा सर्व डॉक्टर्सच्या दृष्टीनेही एक आश्चर्याचा विषय आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आई शुद्धीवर आली. त्यानंतर डॉक्टर वाडियांनी विचारलेल्या प्रश्नांची आईने सुसंगत उत्तरे दिली. ते ऐकून डॉक्टर वाडिया आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "चमत्कार घडतात."

"मला जगायचं आहे" हे आईचे वाक्य ऐकले आणि हा चमत्कार कसा घडला असावा याचा मला उलगडा झाला.

आई अजूनही आयसीयूतच आहे आणि ती पूर्ण बरी झाली आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती आजही नाही. पण तिची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सोलापूरला तिच्या स्वतःच्या घरी जाण्याची उत्कट इच्छा आणि जिद्दच तिला जगवते आहे असे मला वाटते. तिची ही इच्छाशक्ती आणि जिद्द बघून, तिला जगविण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आम्हालाही बळ येते आहे!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

दुर्गा अष्टमीचे कुमारिकाप्रबोधन

आमच्या इमारतीत आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो. आज दुपारी, एक मजला उतरून खाली गेले तोवर जिना अगदी स्वच्छ होता. पण पहिल्या मजल्यावरून इमारतीतून बाहेर पडेपर्यंत जिन्यावर व इतरत्र सगळीकडे खाद्य पदार्थांची वेष्टने आणि थोडी बिस्किटे, वेफर्स पडलेले दिसले. खाद्यपदार्थांची अशी नासाडी झालेली पाहून मला वाईट वाटले. जिना उतरून खाली आले आणि हे असे का झाले आहे,  याचा उलगडा मला झाला.

करपार्कच्या जवळच एक रिक्षा उभी होती. साधारण सहा ते दहा वयोगटातील आठ-नऊ  मुली, कलकल करत रिक्षात बसलेल्या होत्या. त्या मुली कुठल्याश्या झोपडपट्टीतून आल्या असाव्यात असे वाटत होते. त्यांच्याबरोबर, त्यांना घेऊन आलेली, मोलकरीण वाटावी अशी एक बाई होती. ती बाई आणि त्या रिक्षाचा चालक रिक्षाजवळच उभे राहून गप्पा छाटत होते. त्या सर्व मुलींच्या कपाळावर कुंकवाचे मोठ्ठे टिळे लावलेले होते. अनेक भाविक स्त्रिया दुर्गाष्टमीला कुमारिकापूजन करतात. आमच्या इमारतीमध्येच कोणाकडे तरी कुमारिकापूजनासाठी, या मुली आलेल्या असणार, हे माझ्या लक्षात आले. रिक्षाशेजारी उभ्या असलेल्या त्या बाईला विचारून मी त्याबाबत खात्रीही करून घेतली.

त्या मुली रिक्षात बसून दंगा घालत होत्या. भसाभसा हातातली पाकिटे फोडत होत्या. एखादे बिस्किट खाऊन बघत होत्या. चव आवडली नाही की उरलेली बिस्किटे, बाहेर फेकून देत होत्या. रिक्षात बसलेल्या कुणा इतर मुलीचा धक्का लागून एखादीच्या हातातले पाकीटही रस्त्यावर सांडत होते. मी रिक्षा जवळ गेले. त्या बाईंना सांगून त्या मुलींना रस्त्यावर आणि जिन्यावर पडलेले खाद्यपदार्थ उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकायला लावले.

"अन्नाची अशी नासाडी करू नका. तुम्हाला खायचे आहे  तेव्हडे आत्ता खा. बाकीचे घरी न्या आणि नंतर खा . तुम्हाला खायचे नसेल तर ते इतर कोणाला तरी द्या. ते अन्न आहे, कोणाच्या तरी पोटात जाऊ द्या, पण  फेकू नका. रिकामी पाकिटे इकडे-तिकडे टाकून, सगळीकडे घाण करू नका." हेही त्या मुलींना मी अत्यंत पोटतिडिकीने सांगितले.

कुमारिका हे देवीचे रूप समजले जाते. अष्टमीला कुमारिकापूजन केल्याने मोठे पुण्य मिळते, असा समज आहे.
पण अन्न वाया घालवल्याने मोठे पाप लागते, असेही मानले जाते. यजमानीणबाईंना आज कुमारिकापूजनाचे पुण्य लाभले असेलही. तसेच, त्या कुमारिकांचे थोडे प्रबोधन केल्याचे पुण्यकर्म माझ्याही हातून घडले, हेही नसे थोडके.
नाही का ?

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

तुझे रूप चित्ती राहो

                
काही वर्षांपूर्वीच्या आषाढी एकादशीची गोष्ट. त्यावेळी माझ्याकडे, अक्कूताई नावाची म्हातारी विधवा बाई,  घरकामासाठी यायची. ती आणि तिची अपंग मोठी बहीण, दोघीच झोपडपट्टीतल्या खोपटात राहायच्या. गावाकडून आणून तिच्या मुलाने त्या दोघींना इथे सोडले होते. कधीतरी वर्ष सहा महिन्याने तो यायचा आणि थोडं धान्य आणि पैसे देऊन निघून जायचा. 

अक्कूताई त्यांच्या घरापासून अर्धातास चालत सकाळी सातपर्यंत माझ्याकडे यायच्या, नऊ-साडेनऊपर्यंत माझ्या घरचं काम संपवून पुढच्या कामांना जायच्या.

आमच्या पहाटेच्या चहाबरोबर आम्ही अक्कूताईंसाठीपण चहा करून ठेवायचो. त्या आल्यावर त्यांना भरपूर साखर घालून तो चहा गरम करून द्यायचो. नऊ- साडेनऊला आमच्या नाष्ट्याच्या वेळेला, आमच्या बरोबर त्यांनाही नाष्टा द्यायचो. अक्कूताईंची खूप गरीबी होती. कधी रात्रीचं उरलेलं अन्न दिलं, तरीही त्या आनंदाने घेऊन जायच्या. 

दरवर्षी आमचा आषाढीचा उपास, सकाळी केलेल्या साबुदाणा खिचडी पुरताच मर्यादित असतो. तसाच त्या दिवशीही होता.
नाष्ट्याला केलेल्या गरम खिचडीची बशी मी अक्कूताईंना दिली आणि सहजी विचारले,

"काय अक्कूताई आज आषाढीचा उपास धरलाय ना?"

"नाय वो ताई"

"मग देवदर्शनाला जाणार ना?"

"नाय वो नाय" अक्कूताईचा चेहरा कसनुसा झाला होता.

"का? देवळात नाही जाणार?" 

"वस्तीतली पोरं नाय जाऊ देत" अक्कूताई वरमून बोलल्या. 

"पोरं का जाऊ देत नाहीत? " मला आश्चर्य वाटलं.

"वस्तीतली पोरं म्हनत्यात, आता आमचा धर्म येगळा, देव येगळा आन् आमचा सनबी येगळा हाय. आता फक्त जयंतीच आमचा सन. आता इट्टल, गणपती, शंकर, अंबाबाई .. हे आमचे देव न्हाईत. आता आमच्या लोकांनी देवळात जायाचं न्हाई आसं आमाला सांगत्यात."

अक्कूताईंची जात, धर्म मी आधी कधीच विचारले नव्हते. पण अक्कूताईंच्या त्या उत्तरामुळे मला सगळा प्रकार लक्षात आला. 

"पण लहानपणापासून तुम्ही देवळात जात असाल ना? उपास करत असाल ना?"

"देवळात जायाचो, उपास पन  करायचो. पन आताची पोरं जायचं नाही म्हनत्यात. त्यांच्या तोंडाला कोन लागनार."

"देवदर्शन नाही, तर मग कसं हो? तुम्हाला वाईट वाटत नाही का?"

"वाईट वाटतं. पन ताई, इट्टल फकस्त देवळातच भेटतो असं कुटं हाय का? त्यो तर मानसाच्या मनातबी असतो ना? देवळात गेलं न्हाई तरी माऊलीला माझा नमस्कार पावतोच न्हवं का?"
अक्कूताई कपाळा जवळ हात जोडत, नमस्कार करत, म्हणाल्या.

"पण अक्कूताई, तुम्ही उपास केलाय का जेवताय, हे बघायला तुमच्या घरांत कोणी येणार आहे का? विठ्ठलावर तुमची भक्ती आहे, तर उपास धरायचा होतात. म्हणजे देवाला तुमचा नमस्कार पोहोचला असता ना."

"उपासाचं काय घेऊन बसलात ताई? आमी करून खानारी मानसं. कामं नाय मिळाली, जिवाला आलं, कामाचा खाडा झाला, की आमाला तसाच उपास घडतुया की. आन् आता तुमी रोज आमच्या पोटाला देता. तुमच्या रुपाने रोज इट्टल मला भेटतोच न्हवं का?"

अक्कूताईंनी परत कपाळावर हात जोडून मला नमस्कार केला.

अक्कूताईंच्या रुपात मलाही  विठ्ठल भेटल्याचा भास झाला आणि नकळत माझे हात जोडले गेले.


रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

इलू, इलू,इलू,इलू, !

इलू -इलू , इलू -इलू !

खडगपूर आय आय टी ची मुख्य इमारत 
या दिवाळीत अगदी अचानकच  खडगपूर आय आय टी मधे जाण्याचा आणि दिवाळीचे तीन-चार दिवस तिथल्या गेस्टहाऊसमध्ये राहण्याचा योग आला. सध्या तेथे माझा भाचा जयदीप इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. दिवाळीमध्ये जयदीपला फक्त  लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सुट्टी असल्यामुळे, त्याला इतक्या लांबून घरी येणे शक्य होणार नव्हते. जयदीपला भेटायला माझा भाऊ शिरीष हा खडगपूरला जाणार होता. मग मी आणि आनंदनेही त्याच्याबरोबर जायचे ठरवले.

"दिवाळीच्या तुमच्या सुट्टीच्या दिवशी आपण काय करू या? तुझ्या आवडीचं काहीतरी करू या ना?" आम्ही जयदीपला विचारले.

"दिवसा काय करायचे ते आपण ठरवू. पण संध्याकाळी मात्र तुम्ही आर पी हॉलवर, म्हणजे आमच्या हॉस्टेलवर  'इलू' बघायला या" जयदीप मोठ्ठ्या  उत्साहाने म्हणाला.

"इलू? ते काय असतं?"

"ते काय असतं ते मी आत्ता नाही सांगणार. ते तुम्ही बघायलाच हवे. नुसतं सांगून तुम्हाला कळणारच नाही"  आमच्या प्रश्नाला बगल देत जयदीप उत्तरला.

खडगपूर आयआयटीमध्ये अनेक हॉल्स अथवा हॉस्टेलस आहेत. बरेचसे हॉल्स मुलांचे आहेत आणि काही हॉल्सवर फक्त मुलीच राहतात. त्या प्रत्येक हॉलवर 'इलू' साजरे होणार होते. तसेच कुठल्या हॉलवर किती वाजता ते साजरे होणार आहे, याचे वेळापत्रकही दिले गेले होते.

 AGV चे निरीक्षण करताना शिरीष  
लक्ष्मीपूजनाच्या, म्हणजे खडगपूर आय आय टीच्या  सुट्टीच्या दिवशी,  आम्ही आय आय टी चा  विस्तृत कॅम्पस जयदीपबरोबर पायी हिंडून पहिला. जयदीपने  आम्हाला सगळी डिपार्टमेंटस दाखवली. जयदीप Automated guided vehicle (AGV) वर काम करतो. त्याने त्यांची ती 'मनुष्य विरहित' चालणारी गाडी आम्हाला दाखवली आणि त्यांच्या त्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती दिली. ब्रिटिशांनी वसवलेल्या 'हिजली डिटेन्शन कॅम्प'च्या आवारात खडगपूर आयआयटी  आज उभी आहे. त्या कॅम्पच्या मुख्यालयाची दिमाखदार इमारत बघितली. स्वातंत्र्य संग्रामात तिथे बळी पडलेल्या  स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही आदरांजली वाहिली. दिवसभर पायी भटकून आम्ही खूप दमलो होतो. चालून चालून झालेली आमची दमणूक बघून जयदीपने असे सुचवले की आम्ही राधाकृष्णन हॉल आणि त्याला लागूनच असलेला जयदीपचा राजेंद्रप्रसाद हॉल या दोनच हॉलचे 'इलू' बघावे. ती सूचना आमच्याही पथ्यावरच पडली. 'इलू' बघायला आम्हाला राधाकृष्णन हॉलवर (आर के) हॉलवर आठ वाजता आणि जयदीप राहात असलेल्या राजेंद्रप्रसाद (आर पी) हॉलवर आठ वाजून वीस मिनिटांनी पोहोचायचे होते.

दिवसभराची रपेट करून आम्ही चार-साडेचारला गेस्टहाऊस मध्ये येऊन झोपलो ते सहा सव्वासहाला उठलो.  चहा प्यायला शिरीषला आणि जयदीपला आमच्या खोलीमध्ये बोलावण्यासाठी त्यांच्या खोलीवर फोन केला तर तिकडून काही उत्तरच आले नाही. परत थोड्यावेळाने फोन केला, त्यांच्या खोलीच्या दाराची घंटी वाजवली तरीही काहीच उत्तर आले नाही, हे बघून मी आणि आनंद चांगलेच चक्रावलो होतो. इतक्यात शिरीष मोठ्या विजयी मुद्रेने जयदीपला घेऊन बाहेरून आला. 'इलू'च्या वेळी घालायला आपल्याकडे चांगला कुडता नाही हे अचानकच जयदीपच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याला घेऊन कुडता खरेदीच्या मोहिमेवर शिरीष बाहेर पडला होता. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कॅम्पसमधली आणि बाहेरचीही बरीचशी दुकाने बंदच होती. गावातल्या सगळ्या गल्लीबोळातून 'सायकलरिक्षाने फिरून झाल्यावर, आता काही कुठेही कुडता मिळणार नाही अशा निष्कर्षाला आल्यावर, अचानक एका छोट्याशा दुकानात त्यांना जयदीपच्या मनासारखा कुडता मिळून गेला होता. त्यामुळे जयदीप आणि शिरीष दोघेही अतिशय आनंदले होते.

मी आणि जयदीप 'इलू' बघायला तयार 
नवा कुडता घालून जयदीप त्याच्या हॉलवर सायकलवरून पसार झाला. आम्हीही तयार होतोच. जयदीपच्या पाठोपाठच आम्ही चालत-चालत आर के हॉल कडे निघालो. बाहेर पडलो तर आमच्या डोळ्यावर आमचा विश्वासच बसेना. आधीचे दोन दिवस, अगदी साधेच  टीशर्ट आणि जीन्स घातलेली, आणि सायकल मारत भराभर इकडून तिकडे जाणारी  आय आय टी मधली अभ्यासू मुले-मुली आम्ही बघत होतो. पण त्या दिवशी संध्याकाळी ती सगळी मुले-मुली चक्क नटलेली होती. मुलांचे रंगीबेरंगी कुडते काय आणि मुलींचे भरजरी कपडे, साड्या, नट्टापट्टा आणि दागदागिने काय, सगळे वातावरण अगदी फुलून गेले होते. मुलामुलींच्या आणि आमच्या सारख्या इतर पालकांच्या घोळक्याबरोबर आम्ही आर के हॉलपर्यंत आठच्या आधीच पोहोचलो. पण आम्ही पोहोचायच्या आधीच तिथे प्रचंड गर्दी झालेली होती. हॉलसमोरच्या पटांगणात उभ्या केलेल्या बांबूच्या २०-२२ फुटी भव्य चटयांवर, पणत्यांच्या साहाय्याने पौराणिक देखावे सादर केले होते. त्याचसोबत रांगोळ्यांनी रंगवलेली पौराणिक चित्रे आणि त्यावर सोडलेला अल्ट्रा-व्हायोलेट झोत असे 'हाय-टेक' देखावेही होते. सर्व हॉल्सची पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची मुले महिनाभर खपून हे देखावे तयार करतात. प्रत्येक हॉल वेगवेगळ्या आशयांचे देखावे सादर करतो आणि नामांकित परीक्षकांच्या मते ज्या हॉलचे देखावे सर्वोत्कृष्ट ठरतात, त्या हॉलला बक्षीस मिळते. एखादा हॉल यावर्षी नेमका कुठला देखावा सादर करणार आहे, हे फक्त त्या-त्या हॉलच्या मुलांनाच माहिती असते. हे जे टॉप सिक्रेट ठेवलेले असते ते त्या स्पर्धेच्या वेळीच बाहेर पडते. विजेवर चालणारे सगळे दिवे बंद करून फक्त हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्या जातात आणि अचानक अंधारात आपल्यासमोर हे सुंदर देखावे तयार होतात. या नेत्रदीपक इल्युमिनेशन स्पर्धेचे संक्षिप्त रूप म्हणजेच 'इलू' हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळले!
जयदीपच्या आर पी हॉलचे या वर्षीचे 'इलू '
आर के हॉल चे देखावे पाहिल्यानंतर आम्ही जयदीपच्या आर पी हॉलवर गेलो. पणत्या पेटवणे चालू असताना 'आता काय-काय दिसणार?' अशी कमालीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सगळ्या पणत्या पेटल्या आणि तिथलेही सुरेख देखावे आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले. पाच चटयांवर, केवळ पणत्यांच्या साहाय्याने जणू संपूर्ण महाभारत रेखाटले होते. द्रौपदी-वस्त्रहरण, द्रोणाचार्य आणि एकलव्य, भीष्म-परशुराम युद्ध, कर्णाच्या रथाचे चिखलात रुतलेले चाक, बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्माचार्य, असे देखावे अगदी हुबेहूब होते. हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्यामुळे अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीचे आकाश उजळून निघाले होते. उभ्या चटयांवरच्या त्या देखाव्यांचे प्रतिबिंब जमिनीवरच्या कृत्रिम तळ्यातील पाण्यामध्ये पडल्यामुळे ते दृश्य फारच सुरेख दिसत होते. पणत्यांच्या प्रकाशामुळे प्रचंड जनसमुदायाच्या डोळ्यांच्या पणत्याही लखलखत होत्या. हवेत तरंगणारे अनेक रंगीत आकाशकंदील एकापाठोपाठ आकाशात सोडलेले होते. शोभेच्या दारूकामाने आसमंत उजळून निघाला होता. आरपी हॉलची मुले घोषणा देत होती. इतर मुले-मुली त्यांना प्रोत्साहन देत होती. भरपूर फोटो काढले जात होते. फ्लॅश उडत होते. तरुणाईच्या जल्लोषामुळे आणि त्यांच्यातल्या ऊर्जेमुळे वातावरण भारल्यासारखे झाले होते. गेले दोन दिवस पाहिलेल्या त्या 'अभ्यासू' मुला-मुलींचे हे वेगळेच रूप, त्यांचे टीम स्पिरिट, त्यांच्यामधले ते चैतन्य, त्यांच्यातल्या कलागुणांची, कल्पकतेची आणि हरहुन्नरीपणाची एक वेगळीच झलक आम्हाला पाहायला मिळाली. जयदीपच्या आर पी हॉलला, या वर्षीच्या  'इलू' चे पहिले बक्षिस मिळाल्याचे जयदीपने आम्हाला मोठ्ठ्या अभिमानाने सांगितले आणि आम्हाला खूप कौतुक वाटले.
आर पी हॉलच्या 'इलू' समोर  जयदीप 

बऱ्याच वर्षांनंतर खडगपूर आय आय टीमधील दिवाळीच्या निमित्ताने 'इलू' हा शब्द मी ऐकला. पूर्वी एका हिंदी गाण्यात हा शब्द मी ऐकला होता.
"इलू, इलू, इलू, इलू,S S,  इलू का मतलब आय लव्ह यू " असं ते गाणं होतं.

खडगपूर आय आय टी मधलं ऊर्जस्वल वातावरण, शिक्षणाचा दर्जा, तिथे घडत असलेली, अनेक कलागुणसंपन्न अशी भावी पिढी, आणि 'इलू' हे सगळं बघून मी भलतीच भारावून गेले आहे. तुम्हाला हसायला येईल, आणि कदाचित तुम्ही माझी चेष्टाही कराल. पण खरंच सांगते, या ट्रिपहून आल्यापासून मी खडगपूर आय आय टी ला उद्देशून "इलू, इलू, इलू, इलू,S S, इलू का मतलब आय लव्ह यू " हे गाणं गुणगुणते आहे,  पण फक्त माझ्या  मनांतल्या मनांतच बरं का!





बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

वेष्टनांचा विळखा!

पुणे महानगरपालिकेच्या, चंदूमामा सोनावणे रुग्णालयात, साधारण पाच ते दहा वर्षे वयाच्या  बालरुग्णांची तपासणी करीत असताना त्यांच्या पालकांबरोबर, म्हणजे बहुतेक वेळा मुलांच्या आयांबरोबर घडणारा एक ठराविक संवाद असतो.

नकाबाच्या आडून बोलणारी आई, "मॅडम, आप इसको बोलिये ना, की अगर ये रोज LAYS और कुरकुरे खायेंगा, तो आप इसको सुई लगा देंगे"

मग मी विचारते, "क्यूँ , ये रोज ऐसी चीजे खाता है क्या ?"

तिचे उत्तर, "हां, ऐसेहीच करता है. सुनताच नहीं है. इसको कितनाभी समझाओ, लेकिन घरका बना हुवा खाना नहीं खाता. रोज LAYS और कुरकुरे खायेंगा. मानताच नही."

माझा प्रश्न, "इसको रोज LAYS और कुरकुरे, फुकटमें कौन देता है? या फिर आपकी खुदकी दुकान है क्या ?"

कसनुसं हसून तिचं उत्तर, "दुकान कहाँसे होंगी? और इसको फुकटमें कौन देगा? जिद करके, रोज पैसे लेता हैं"

माझा प्रश्न, "लेकिन इसको पैसे कौन देता है?"

तिचे उत्तर, "किसीसेभी लेता है. ज्यादातर इसके अब्बू, दादा, नहीं तो चाचा दे देतें हैं"

माझे उत्तर, "तो फिर ऐसा करो, कल इसके अब्बू, दादा और चाचा, इन तीनोको मेरे पास इधर ले के आ जाओ. मैं तीनोको सुई लगा देती हूं. बच्चेको सुई लगाने से उसकी ये आदत कैसे छूटेगी?"

मग ती बाई निरुत्तर होऊन निघून जाते.

"शक्यतो कुठल्याही पाकिटातलं काहीही खाऊ नका, मुलांच्या हातात पैसे  देऊ नका, घरी बनवलेले ताजे आणि सकस अन्न कुटुंबातील सर्वजण खात जा" हे जवळजवळ प्रत्येक रुग्णाच्या पालकांना मी सांगत असते.

एके दिवशी सोनावणे रुग्णालयातील काम संपल्यावर, मी अगदी रमत-गमत पायीच घरी निघाले होते. माझ्या समोर काही अंतरावर साधारण नववी-दहावीत असावी अशी एक शाळकरी मुलगी, भराभरा चालत असलेली दिसली. तिच्या पाठीवर एक मोठ्ठे आणि अवजड दप्तर होते. केसाच्या दोन घट्ट वेण्या, रंगीत रिबीनीने वर बांधून, रिबिनीची मोट्ठी फुले केलेली होती. मुलगी शाळेच्या गणवेशात होती. तो गणवेश पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा होता. त्यामुळेच, ती मुलगी मध्यमवर्गीय घरातली असावी असा अंदाज मी मनाशी बांधला. चालता-चालता मधेच, त्या मुलीने, एक पाकीट उघडून काहीतरी तोंडात टाकले आणि त्या पाकीटाचे वेष्टन रस्त्यावर फेकून दिले.  शाळेत शिकणाऱ्या, चांगल्या घरच्या मुलीने ते वेष्टन असे रस्त्यावर फेकावे, याचा मला जरा जास्तच राग आला. तिला रागवावे आणि तिने रस्त्यावर टाकलेले ते वेष्टन तिलाच उचलायला लावून, कचराकुंडीत टाकायला लावावे, या उद्देशाने, मी भराभर पुढे चालत निघाले. पण ते वेष्टन कशाचे आहे हे पाहण्यासाठी प्रत्यक्षांत मीच ते उचलले आणि अचंबितच झाले.
ते वेष्टन होते गुटख्याच्या पाकिटाचे!
मला काय करावे ते सुचेना आणि मी जागच्याजागीच खिळून उभी राहिले. भानावर आले तोवर ती शाळकरी मुलगी माझ्या नजरेआड झालेली होती.

आपल्या भावी पिढ्या वेगवेगळ्या वेष्टनांच्या विळख्यांत अडकून गर्तेत जाणार अशी भीती मला राहून-राहून वाटत असते. निदान आपले स्वतःचे किंवा आपल्या घरातले एखादे मूल या विळख्यात अडकणार नाही, याची दक्षता आपणच घ्यायला नको का?



बुधवार, १६ मे, २०१८

आपली वास्तू खरोखर शांत आहे का?

काल सकाळचं काम संपवून घरी आल्यावर, आमरस-पोळीचे जेवण जेवून मी ताणून  दिली. तास-दीड तासाने जाग आल्यावर सवयीने व्हॉट्सऍप उघडले. दि. १६/०५/१८, म्हणजे आजच एका 'हेल्थ कॅम्पला' मी रुजू व्हायचे आहे अशी ऑर्डर नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या कार्यालयातून कोणीतरी व्हॉट्सऍपवर मला पाठवलली दिसली. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांसाठी हा मोफत हेल्थ कॅम्प, क्रेडाई आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे, असे मला त्या ऑर्डरवरून कळले. अचानक आलेल्या या ऑर्डरमुळे खरंतर माझी खूप चिडचीड झाली. माझ्या क्लिनिकच्या आजच्या अपॉईंटमेंट्स रद्द कराव्या लागणार, घरची कामे सकाळी लवकर उरकून, मरणाच्या ट्रॅफिकमध्ये घरापासून दहा किलोमीटर दूर असलेली कॅम्पची साईट शोधत जावे  लागणार, हे सर्व मला अगदी नको वाटत होते. त्यातून १६ मे हा आमच्या मुलाचा वाढदिवस. मुलगा जरी दूर अमेरिकेत असला तरी त्याचा वाढदिवस 'राझी' सिनेमा बघून साजरा करावा असे मनात योजले होते. ऑर्डर रद्द करून  घ्यावी असा मनात विचार आला पण कार्यालयीन वेळ संपून गेलेली असल्यामुळे ते केवळ अशक्य होते.

मनातल्या मनात चडफडतच कॅम्पच्या ठिकाणी पोहोचले. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांच्या वसाहतीत पत्रे ठोकून उभ्या केलेल्या एका खोलीत कॅम्प आयोजित केला होता. बाहेर वीस-पंचवीस लहान मुले तपासणी सुरु होण्याची वाट बघत बसली होती. कामगारांच्या बायका आणि काही कामगारही मोठ्या आशेने थांबून होते. 'मान्यवर' न आल्याने, कार्यक्रम तासभर उशिरा चालू झाला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन, भाषणबाजी आणि खानपान यामध्ये पुढचा पाऊण तास गेला. त्या सोहळ्यादरम्यान अनेक फोटो काढून झाले आणि लगेच तमाम मान्यवर गायब झाले. हे सर्व होऊन गेल्यावर आमचं काम चालू झाले.  त्या वेळपर्यंत भर उन्हात पत्र्याच्या शेड मध्ये बसून, ढिसाळपणे चाललेला कार्यक्रम आणि दिखाऊपणा बघून माझे डोके चांगलेच तापले होते. असले कार्यक्रम मुख्यतः फोटोपुरतेच घडवून आणले जात असल्याने, त्यात नियोजनाचा अभाव आहे, हे माझ्या लक्षात आले आणि वैद्यकीय तपासणीची सगळी सूत्रे मी हातात घेतली. दोन कर्मचाऱ्यांना केसपेपर्स बनवायला बसवले, महानगरपालिकेच्या दवाखान्यातून रुग्णांना मोफत वाटण्यासाठी कोणती आणि किती औषधे आणलेली आहेत याचा आढावा घेतला आणि कामाला सुरुवात केली.

कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेली ही कामगारांची कुटुंबे होती. मी फक्त बालरुग्णांना तपासणार होते. सगळी मुले थोड्याफार प्रमाणात कुपोषित होती. त्या वसाहतीतील बऱ्याच मुलांना नुकताच गोवर येऊन गेलेला होता. त्यामुळे त्यांची भूक कमी झालेली होती आणि ती  खूप चिडचिडी झालेली होती. अनेक मुलांच्या अंगात रक्त कमी आहे, हे मला कळत होते. काहींना खरूज झालेली होती तर काहींची पोटात जंत झाल्याची  तक्रार होती. कित्येक मुलांचे लसीकरण पूर्ण झालेले नव्हते. आई-वडील कामावर गेल्यामुळे, सात आणि आठ वर्षांची मुले पालकांशिवायच तपासणी करून घ्यायला आलेली होती. दहा-बारा वर्षांच्या मुली कडेवर लहान भावंडांना घेऊन आल्या होत्या. मी पेशन्ट्स तपासत होते पण त्यांना द्यायला, योग्य आणि पुरेशी औषधेही आमच्याकडे नव्हती. गोवर आलेल्या मुलांना द्यायला साधे 'अ' जीवनसत्वाचे औषधही नव्हते. मुलांना रक्तवाढीसाठी पातळ औषध द्यावे, तर तेही नव्हते. काही अत्यावश्यक औषधे मी विकत आणायला लावली आणि मोठ्या जिव्हाळ्याने सर्व मुले तपासली. एका वेगळ्याच उपक्रमात सहभागी होऊन  मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचे समाधान मिळाले, पण मनात मात्र विचारांचे काहूर उसळले.  

कार्यक्रम सुरु होण्याआधी कुतूहलापोटी मी काही लोकांशी बोलले होते. त्यांच्या झोपड्याकडेही माझे लक्ष  गेलेले होते. तात्पुरते पत्रे ठोकून तयार केलेल्या काड्यापेटीसारख्या झोपड्या. त्यात खेळती हवा नाही, ड्रेनेजची नीटशी सोय नाही. सगळीकडे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची तरी काय सोय होती देव जाणे. अशा परिस्थितीतच ही कुटुंबे राहत होती आणि तिथेच त्यांची मुले खेळत होती. सर्व सुखसोयींनी युक्त अशा मोठ्या मोठ्या इमारती बांधायच्या आणि इमारत पूर्ण झाल्यावर पुन्हा पुढच्या साईटवर जायचे. दर दीड दोन वर्षांनी जुने घर मोडायचे, जुनी जागा सोडायची आणि नवीन जागी पुन्हा घर उभे करायचे. या जागी किती दिवस राहायचे आहे ?नवीन जागा कुठे असेल? कशी असेल? किती दिवसांनंतर जायचे आहे ? शेजारीपाजारी कोण असेल? मालक कोण असतील? काम मिळेल का? किती दिवसांसाठी मिळेल ? किती पगार मिळेल ? मुलांसाठी शाळा असेल का? सगळी प्रश्नचिन्हेच. क्रेडाईच्या सदस्यांनी या कामगारांना मूलभूत सुविधा पुरविल्याच पाहिजेत अशी कायदेशीर सक्ती का नाही? आणि तशी तरतूद कायद्यात असल्यास त्याची कठोर अंमलबजावणी करता येणार नाही का? चकचकीत घरामध्ये राहताना, त्यासाठी राबलेल्या या कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टांबद्दल आपल्याला सुतराम कल्पनाही नसते, याची जाणीव मनाला त्रास देऊन गेली. या कॅम्पला मला यायला लागू नये, हा कातडीबचाऊ विचार मी केला होता, याचीही मला लाज वाटली.

मागच्याच महिन्यात माझ्या भावाने घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांती पूजा झाली. मी मुळीच भाविक नाही, पण पूजा करताना गुरुजी मंत्रोच्चार करून त्यांचा अर्थही समजावून सांगत होते, ते कानावर पडले होते. वास्तू उभी राहताना ज्यांना ज्यांना म्हणून त्रास झाला असू शकेल त्या सगळ्यांचा उल्लेख करून ती पूजा केली गेली. नवग्रहांचीही शांत केली. आज, या कामगाराच्या वसाहतीत प्रथमच गेल्यावर मला वाटले की,नवीन वास्तूत प्रवेश करताना, वास्तूसाठी राबलेल्या कामगारांचा एखादा प्रश्न जर एकेक फ्लॅटधारकाने सोडवला तर ती एक आगळी वेगळी वास्तुशांत होईल. 

गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

टिकली तर टिकली


काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी वॉर्डमध्ये शिरले आणि फर्नांडिस सिस्टर म्हणाल्या," मॅडम आज कपाळावर टिकली का नाही लावलीत?"

मी गोंधळले.  "मी टिकली लावली होती , कुठेतरी पडली असणार" असे पुटपुटत चटकन माझा हात कपाळाकडे गेला. अर्थातच तिथे टिकली नव्हती. त्यामुळे टिकली शोधण्यासाठी मी गडबडीने माझी पर्स धुंडाळू लागले. पर्समध्ये टिकलीचे पाकीट नेहमी असते. पण नेमके त्या दिवशी ते सापडेना, तशी मी थोडीशी ओशाळले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव फर्नाडिस सिस्टरांनी वाचले असावेत.
"मॅडम थांबा. कदम सिस्टर कडे नेहमी टिकल्यांचे पाकीट असते. मी आणते" असं  म्हणत काही क्षणांतच फर्नांडिस सिस्टरांनी टिकली आणून माझ्या कपाळावर लावली आणि आम्हा दोघींचाही जीव जणू भांड्यात  पडला.


टिकलीचे आणि माझे नाते फार वर्षांचे आहे. माझ्या लहानपणी आई बरेचदा मेण लावून त्यावर पिंजर लावायची. कधीतरी पुढे ती गंधाच्या उभ्या बाटलीतून गंध लावायला लागली आणि नंतर लालभडक मोट्ठी टिकली. अगदी लहानपणी मी पण गंधच लावत होते. पण माझ्या कपाळावर ते उतायला लागल्यामुळे नंतर मी टिकली वापरायला लागले. पण क्वचित कधी गंध फिस्कटले गेले  किंवा टिकली पडली तर आज्जी ओरडायची. सधवा बायकांनी आणि कुमारिकांनी भुंड्या कपाळाने हिंडायचे नाही, असं म्हणायची. कदाचित त्या शिकवणीमुळे असेल किंवा टिकली लावणे सवयीचे झाल्यामुळे असेल, टिकली माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भागच होऊन गेली.

लग्नानंतर उत्तरभारतात राहण्याचा योग्य आल्यामुळे त्यावेळी नाविन्यपूर्ण वाटणाऱ्या, वेगवेगळया आकाराच्या  आणि कपड्यांना मॅचिंग रंगाच्या टिकल्या वापरायला लागले. पुढे पाश्चात्य वेशभूषा करायाला लागले तरीही माझी टिकली कपाळावर टिकलीच. जीन्स आणि टॉप घालून कपाळावर टिकली लावून आले की माझी मुलं, भाचरंडं चेष्टा करतात. कधी ती टिकली काढ म्हणतात. त्यांच्या आग्रहाला  बळी पडून मी कधीतरी ती काढतेही. पण कपाळावर टिकली असली की मला जरा बरं वाटतं, हे ही तितकंच खरंय.

गेल्या सात आठ वर्षांमध्ये चार-पाच वेळा परदेशात जाण्याचा योग आला. तिथे गेले तरी माझी टिकली कपाळावर असायचीच. अमेरिकेत एका फेलोशिप प्रोग्रॅमला गेले होते त्यावेळी त्या प्रोग्रॅमला आलेल्या अमेरिकन बायकांना माझ्या टिकलीबद्दल कोण कुतूहल होतं. एक दोघींनी तर मला त्यांच्यासमोर टिकली लावायला लावली. त्यांनाही कपाळाला टिकली लाऊन बघायची होती की काय, कुणास ठाऊक. चार वर्षांपूर्वी उझबेकिस्तानला गेलो होतो तेंव्हा तिथल्या काही उझबेक स्त्रियांनी, त्यांच्या अगम्य भाषेत," तुम्ही टिकली का लावता? ती कशी लावायची? सगळ्या भारतीय बायका टिकली लावतात का?  भारतातल्या मुसलमान बायका पण टिकली लावतात का? टिकली लावणे म्हणजे भारतीय संस्कृती का? असे अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. काही बायकानीं तर माझ्या कडून आणि माझ्या वहिनींकडून मोठया कौतुकाने टिकल्या मागून घेतल्या होत्या.

आमच्या लहानपणी काही सोप्पे ठोकताळे होते. सर्वच हिंदू मुली गंध किंवा टिकली लावायच्या. टिकली किंवा गंध नसलेली मुलगी ही इतर धर्माचीच असायची. आजकाल मात्र तसं काही राहिलेलं नाही. हल्ली हिंदू मुलींनाही टिकली शिवायच बघायची आपल्या डोळ्यांना सवय होऊन गेलीय. माझी मुलगी, भाच्या, पुतण्या कपाळाला टिकली लावतातच असे नाही. मी शिकवते त्या महाविद्यालयांमध्ये जवळ जवळ सगळ्या मुली टिकली न लावताच येतात. मागच्या महिन्यात एक दिवस कॉलेजमध्ये गेले आणि बघते तर काय, सगळ्या मुली अगदी नटलेल्या दिसल्या . जवळजवळ सगळयांच्या कपाळावर टिकल्या, चंद्रकोरी,  हातात बांगड्या, गळयात सोन्या-मोत्याचे हार , साड्या अथवा घागरा-चोळी नेसलेल्या, काही विचारू नका. मी अगदी चकित झाले. शिकवायला सुरुवात करायच्या आधी," आज काही विशेष आहे का?" असे विचारले, तर त्यांचा ' कल्चरल डे' आहे असे कळले. आता आपली संस्कृती सुद्धा फक्त ‘असे 'कल्चरल डे' किंवा 'संस्कृती दिन’ साजरा करण्यापुरती उरली आहे की काय? असाही एक प्रश्न माझ्या मनांत येऊन गेला.

पण काहीही म्हणा, या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने कितीतरी मुलींच्या कपाळावर टिकली बघितली आणि छान वाटले. आपली संस्कृती टिकेल ना टिकेल देव जाणे, पण निदान या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने चार मुलींच्या कपाळावर टिकली टिकली तरी मिळवली, असे म्हणायची वेळ आली आहे, नाही का?

शुक्रवार, २६ मे, २०१७

आरक्षणाचे रक्षण!


"बाई माझ्या नातीचा फार्म भरून देणार का?"

परवा सकाळी आल्याआल्या मोलकरणीने प्रश्न केला.
"भरून देते. पण कसला फॉर्म आहे गं?"
"नात दहावीला बसलीय.आता आनलाईन का काय ते कालेज भरायचंय. पन जातीचा दाखला नाई. त्यो मिळवायला फार्म भरायचाय."
"आता तुझी नात शिकलीय ना ? मग तिने का नाही भरला फॉर्म ?"
"आता काय सांगू बाई? तिनंच भरला होता. ती गेली पन होती त्या हापिसात. पन त्यो मानूस म्हनला त्यो दाखला इथे नाय, नगरला मिळंल. म्या म्हनलं नातींनं फार्म चुकीचा भरला आसल म्हनून तुमाला सांगायला आले. आमाला तर त्यातलं कायबी कळत नाय. माज्या पोरीचा नवरा मेलाय. आमच्या घरात कोन बी शिकलेलं नाय. पर माजी नातं लै हुशार हाय, चांगली शिकली तर बरं हुईल. मॅडम द्या ना फार्म भरून "
"पण दाखला नगरला का मिळणार ? ती तर इथे शिकते ना ? "
"माज्या मुलीला नगरला दिली होती. तिचा  नवरा मेल्यावर मी तिला इकडे आनली. त्या हापिसातला मानुस म्हनला आता दाखला नगरलाच मिळनार"

माझ्या "डॉक्टरी सुवाच्य" अक्षरांत मी  फॉर्म भरण्यापेक्षा आनंदने भरलेला बरा म्हणून त्याला फॉर्म भरायला सांगितले. त्या फॉर्मबरोबर त्या मुलीची, तिच्या वडिलांची आणि आजोबांची अशी अनेक कागदपत्रे पण जोडायची होती. आनंदने तो फॉर्म भरला आणि मोलकरणीच्या मुलीला आणि नातीला बोलावून घेऊन त्यांची सर्व कागदपत्रे तपासून घेतली. फॉर्म कुठे जमा करायचा, काही अडचण आली तर काय करायचे त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून नगरच्या कार्यालयात जायला सांगितले. काल मोलकरणीची मुलगी आणि नात नगरला जाऊन तिथल्या कार्यालयात तो फॉर्म  जमा करून आल्यासुद्धा.
आता नातीला जातीचा दाखला मिळणार या कल्पनेने आज सकाळी मोलकरीण भलतीच खुशीत होती. "बाई सायबांनी आमाला सगळं नीट सांगितलं म्हणून काम झालं. नाहीतर काही खरं नव्हतं. सायबांचं लैच उपकार हायत"
"अगं उपकार कसले मानतेस. तुझी नात हुशार आहे. चांगली शिकली तर आम्हाला दोघांनाही आनंदच होईल. पण मला एक सांग, या मुलीच्या आईचा, वडिलांचा, आज्ज्याचा, पणज्याचा, कोणाचाच जातीचा दाखला कसा नाही? जातीच्या दाखल्याशिवाय त्यांना आरक्षणाचे फायदे  कसे मिळाले ?"

"त्यानला काय आन आमाला तरी कुटं काय आरक्षनाचे फायदे मिळाले? मी पयल्यापासून कामाला जायचे. आमची वस्ती लै वाईट. माजी पोरगी सातवीत होती तवाच मोठी झाली म्हनून तिचं लगीन लावून दिलं. तिचा नवरा, त्याचा बाप, आज्जा कोनबी शिकलेलं नाय. मग ते आरक्षनाचा फायदा कसा आन कुटं घेणार? माजी पोरं, माजा नवरा, माजा सासरा, त्याचा बाप, कोनबी शिकलेलं नाई. आमच्या जातीतले जे शिकले, त्यांना आरक्षनामुळं सरकारी नोकऱ्या मिळाल्या, डॉक्टर, इंजनेरबी हुता आलं. त्यांच्याकड आज गाड्या हायत, फ्लॅट हायत, मोप पैसा हाय. आता त्यांची पोरं मोठ्या शाळा-कालेजात जात्यात. पुन्हा आरक्षनाचा फायदाबी त्ये घेनारच. आमी अडानी हुतो आन आमची पोरंबी तशीच राह्यली. आमाला कुटल आरक्षन आन कसलं काय? म्हनून तर म्हन्ते बाई, तुमचे आन सायबांचे लै उपकार आहेत. तुमच्यामुळं माजी नात कालेज शिकल आन कायतरी नोकरीबी मिळवल."

तिच्या बोलण्याने मी विचारात पडले. सहज बोलता-बोलता, एक विदारक सत्य आणि गंभीर सामाजिक प्रश्न ती माझ्यासमोर मांडून गेली होती. दलितांसाठी आरक्षणाचा हक्क कायद्याने दिलेला आहे आणि ते योग्यच आहे. परंतु, गेली सत्तर वर्षे आरक्षणाचा फायदा न मिळालेल्या, त्यांच्यामधीलच खऱ्या-खुऱ्या उपेक्षितांच्या उन्नतीचं काय? आधीची पिढी शिकली नाही म्हणून पुढची पिढी सुशिक्षित नाही, जवळ पैसे नाहीत, आणि झोपडपट्टीतल्या कष्टाच्या जीवनातून सुटकाही नाही.

आरक्षणाच्या समर्थनात आणि विरोधातही आज नुसताच आरडा-ओरडा ऐकू येतो. पण, प्रत्यक्ष तळागाळात असलेले हे लोक कधी वर येणार? त्यांच्या हक्काचं रक्षण व्हायला नको कां ?

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

तूच माझी व्हॅलेंटाईन!

             
                           अवचित आज सकाळी नवऱ्याने जेंव्हा ताजा लाल गुलाब माझ्या हाती दिला
                           व्हॅलेंटाईन डे! किती छान वाटलं मला, लाजत-लाजत  मीही तो स्वीकारला

                           मी नाही रे आणला गुलाब तुझ्यासाठी, कसनुसं हसून मी त्याला बोलले
                          "राहू दे गं राणी, तू असताना गुलाब कशाला?" त्याच्या बोलांनी जरा सुखावले

                          माझी व्हॅलेन्टाईन मात्र यायची होती अजून, तिचीच तर प्रतीक्षा होती मला
                          ठरवत होते मनातल्या मनात, आज एक छानसं फूल द्यायलाच हवं तिला

                          त्याने दिलेले फूल, परत त्यालाच मी द्यावे, या अपेक्षेने नवरा होता बघत
                          फूल हातात  घट्ट धरून, मी मात्र  बसले होते माझी घालमेल लपवत

                          इतक्यात ती लांबूनच येताना दिसली, आणि माझ्याकडे बघून छानसं हसली
                          तिला पाहता किती बरं वाटलं म्हणून सांगू? निदान आजची तरी चिंता मिटली

                          नवऱ्याला सोडून मी गेले धावत, अन गुलाबाच्या फुलाने केले तिचे स्वागत
                          म्हणाले "बरं झालं आलीस बाई," ("लाग आता कामाला") हे मात्र होतं स्वगत

                         लाल गुलाबाने ती अगदी हरखून गेली, वेणीमध्ये फूल खोवून कामालाही लागली
                         नजरेनेच मी त्याला म्हणाले "तूच माझा प्राणसखा," पण व्हॅलेंटाईन मात्र कामवाली! 









   

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

इस्टमनकलर

काल माझ्या ध्यानीमनी काही नसताना अचानकच आनंद म्हणाला,
"आज 'ध्यानीमनी'  बघायला जायचे का? व्हिक्टरीला सव्वाआठचा शो आहे "
वॅलेंटाईन डे जवळ आल्याचे सोशल मीडियातून नवऱ्याला कळल्यामुळे त्याने हे विचारले असावे असा गोड समज करून घेऊन मी चटकन हो म्हणून टाकलं. "तिकिटे मिळणार का? किती रुपयाचे तिकीटआहे?" असले व्यवहारी प्रश्न न विचारता मी लगेच तयार झाल्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटलं असावं!

गडबडीने जेवण उरकून, आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आम्ही तिकिटाच्या खिडकीवर पोहोचलोसुद्धा. बाल्कनीची तिकिटे मिळणार नाहीत हे कळल्यामुळे खालची दोन तिकिटे काढली. मनातल्या मनातच, "दोन तिकिटाचे मिळून चाळीस रुपये वाचणार आहेत" या 'मध्यमवर्गीय' विचाराचे मलम त्या दुःखावर लावून मी पिक्चर बघायला सज्ज झाले. थिएटरवर सगळाच शुकशुकाट होता. पिक्चर सुरु झाला की काय या कल्पनेमुळे मी धास्तावले आणि गडबडीने थिएटरच्या दरवाज्यापाशी गेले. बराच वेळ झाला तरी कोणी आत सोडायचे नांवच घेईना. विचारणा केल्यावर कळलं की बाल्कनीची दुरुस्ती चालू असल्यामुळे तिथली तिकिटे विकलेलीच नाहीत. आणि आमची दोन तिकिटे धरून एकूण तीनच तिकिटांची विक्री झाली आहे!
पंधरा-वीस मिनिटे वाट बघितली. पण कोणीही प्रेक्षक न  फिरकल्यामुळे तो शो रद्दच झाला. आम्ही तिकिटाचे पैसे घेऊन घरी परत असताना माझ्या ध्यानीमनी नसताना मन हलकेच भूतकाळात, म्हणजे माझ्या लग्नाआधीच्या काळातल्या सोलापूरात  गेले.

मला सिनेमाचे वेड आहे, किंवा व्यसनच म्हणा ना! आणि या व्यसनाचे मूळ लहानपणी आमच्या घरी असलेल्या शिस्तीत आहे. आमचं एकत्र कुटुंब आमच्या आजीच्या अधिपत्याखाली चालायचे. ज्या काळांत आमच्या बरोबरच्या काही मुलामुलींनी राजेशखन्ना, अमिताभच्या पिक्चरची , 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची नशा अनुभवलेली होती, त्या काळांत आम्हा सहा-सात भावंडांना मात्र कधीतरी वर्ष-सहा महिन्यातून  'रामजोशी' किंवा 'आम्ही जातो आमुच्या गांवा' असले सोवळे सिनेमे दाखवले जायचे. एखादा सिनेमा 'गेवा कलर' आहे, 'फुजिकलर' आहे, 'टेक्निकलर' आहे का 'इस्टमनकलर' आहे, असल्या तांत्रिक बाबी, किंवा कुणा हिरो-हिरोईनला सायनिंग अमाऊंट किती मिळाली, असल्या आर्थिक बाबींची माहिती आमच्या बरोबरच्या दर्दी मुलामुलींना असायची. 'बिनाका गीतमाला' मध्ये त्या-त्या आठवड्याला कोणते गाणे नंबर एकवर येऊन 'सरताज गीत' होणार, यांवर त्यांच्या पैजा लागायच्या. त्या काळात सिनेमा बघणं, त्यातली गाणी ऐकणं आणि म्हणणं, अगदी गुणगुणणं सुद्धा, आमच्या घरातल्या शिस्तीत बसत नसल्यामुळे, आम्ही मात्र अगदीच अज्ञानी होतो. पण घरातल्या त्या विरोधामुळेच सिनेमा माझ्या मनाला जास्तच खुणावत राहिला.  दहावीत असताना, आमच्या वर्गातल्या दीपाली आणि इतर दोघी-तिघी मुलींनी सिनेमांची गाणी लिहिण्यासाठी केलेली दोनशे पानी वही बघून, मीही चोरून तशीच एक वही केली होती. माझ्या 'चुगलीतत्पर' भावंडांपैकी कोणीतरी त्याबद्दल आईला खबर पोहोचवली. मला बरीच बोलणी खावी लागली आणि अर्थातच ती वहीदेखील जप्त करण्यात आली. पण या सगळ्यामुळे सिनेमाबद्दलचे माझे आकर्षण वाढतच गेले.

कॉलेजमध्ये गेल्यावर, विशेषतः मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर, घरच्या शिस्तीची पकड जरा सैल झाली. कधी चोरून तर कधी उघडपणे मी माझं व्यसन पूर्ण करू लागले. त्या काळातल्या अगदी साध्या, एसी नसलेल्या थिएटरमध्ये  सिनेमा बघायला जी मजा यायची, ती आजच्या झुळझुळीत मल्टिप्लेक्समध्येही  येत नाही. तसे पाहता 'मल्टिप्लेक्स'ची सुरुवात, सोलापूरसारख्या गावंढ्या शहरांत, ऐंशी वर्षांपूर्वी भागवत थिएटर्सने केली. एकाच आवारात असलेली भागवतांनी बांधलेली चित्रा, कला, छाया, उमा आणि गांधीं कुटुंबियांच्या मालकीची मीना आणि आशा ही थिएटर्स सिनेमाशौकिनांची नशा गेली कित्येक वर्षे पूर्ण करत आहेत. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजच्या दिवसांत, रांगा लावून किंवा प्रसंगी ब्लॅकने सिनेमाची तिकिटे विकत घ्यावी लागायची, हे आज खरे वाटणार नाही. कॉलेजमध्ये अचानकच प्रॅक्टिकल रद्द झाल्यावर किंवा एखाद्या वेळेस  प्रॅक्टिकल्स बुडवून मॅटिनी शो 'टाकण्याची' मजा अवर्णनीय होती. आधी पैशांची जुळवाजुळव करणे, "कॉलेज बुडवून सिनेमा बघण्यात तू काही मोठ्ठं पाप करत नाही आहेस" हे एखाद्या 'पापभीरू' मैत्रिणीला पटवून देणे, ट्रिपल सीट बसून पोलिसांना चुकवत चुकवत कसबसं थिएटरपाशी वेळेत पोहोचणे आणि शेवटी आपल्याला हवा तो सिनेमा निर्विघ्नपणे बघायला मिळणे यांत खूप मोठ्ठ थ्रिल होतं. अशावेळी भलीमोठी रांग पाहिली की पोटात गोळा यायचा. रांगेत कोणी ओळखीचे भेटले तर ठीक, अगदी नाहीच तर रांगेत पुढे असलेल्या एखाद्या तरुणाला अगदी गोड आवाजात आमच्यापैकी कोणीतरी तिकिटे काढण्याची विनंती करायचे आणि काम होऊन जायचं! कधी-कधी मात्र आम्ही पोहोचेपर्यंत "हाऊसफुल्ल" चा बोर्ड झळकलेला असायचा. अशा वेळी पोलिसांची नजर चुकवत दबक्या आवाजात तिकिटे विकणाऱ्या ब्लॅकवाल्याशी भरपूर हुज्जत घालून तिकीट मिळवावे लागायचे. अगदी तेही नाही मिळाले, तर डोअरकीपरला थोडे पैसे देऊ केले की तो पत्र्याच्या खुर्च्या टाकून आम्हाला बसवायचा!

त्या काळी सोलापुरातल्या थिएटरमध्ये सिनेमा बघण्याची मजा सांगावी तितकी थोडी आहे. एक तर सिनेमा हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. मोठीमोठी थिएटर्स प्रेक्षकांनी गच्च भरलेली असायची. बाल्कनीतला प्रेक्षक आणि खाली बसलेलं पब्लिक यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये मोठा फरक असायचा. खाली बसलेलं पब्लिक दिलखुलासपणे दाद देणारं होतं. गाणी चालू झाली की लोक समोर येऊन नाचायचे, रुमाल-टोप्या-फेटे हवेत उडवायचे, आणि फारच चांगले नाच-गाणे चालू असेल तर पडद्यावरच्या हिरो-हिरोईनवर चक्क पैसे फेकायचे! 'लव्ह सीन्स' चालू असताना, आपण स्वतःच हिरो आहोत असे स्वप्नरंजन काहीजण करत असावेत,पण काही जण मात्र जळकटपणे हिरोला ओरडून सांगायचे, "ए सोड... सोड बे तिला"! व्हिलनवर तर सगळे, सुप्तपणे, भलताच खार खाऊन असायचे!!  

पब्लिकच्या गप्पांमधून सिनेमाचा बॉक्स-ऑफिस वरचा परफॉर्मन्स समजत असे. "त्यात लै एक्सपोज हाय बे! किसींग आन बेडसीन बी हाय बे" असं काहीसं एखाद्या सिनेमाचं वर्णन असलं की तो सिनेमा महिनोंमहिने हाऊसफुल्ल जायचा. अशा सिनेमातील 'तसला' शॉट चालू असला की पब्लिकमध्ये मोठा गोंधळ तरी माजायचा किंवा अगदी पिनड्रॉप सायलेन्स तरी असायचा. त्या काळात तसली कामं फक्त साईड हिरोइन्सकडे किंवा सिनेमातील कॅब्रे डान्सर कडे असायची. आजकालच्या हिरोइन्सनीच 'ती जबाबदारी' उचलून कॅब्रे डान्सर्सची सुट्टी करून टाकली आहे! शिवाय 'एक्स्पोज' आणि 'किसिंग' मध्ये काहीच नावीन्य न राहिल्याने सिनेमामध्ये "लै एक्सपोज आन किसिंग हाय बे !" अशी 'वर्ड ऑफ माऊथ' पब्लिसिटी पण  गायब झालीय!

त्यावेळी फक्त बाल्कनीतील सीट्सना नंबर असायचे. त्या खालचं तिकीट असलं की डोअरकीपरने आत सोडताक्षणी धक्का-बुक्की करत, पळत पळत जाऊन जागा पकडावी लागायची. त्यामुळे बाल्कनीत बसलेल्या लोकांना सिनेमा सुरु व्हायच्या आधीच ड्रेस सर्कलमध्ये चाललेल्या तुफान हाणामारीचा ट्रेलर बघायला मिळायचा. सोलापूरच्या रांगड्या पब्लिकच्या तोंडातून मराठी भाषेतील उच्चतम शिव्यांचे शब्दभांडार त्यावेळी ओतले जायचे. एकदा का सिनेमा सुरु झाला की हळूहळू समेट होऊन हा सगळं गोंधळ संपायचा आणि सिनेमाच्या जादुई दुनियेत पब्लिक रंगून जायचं. सिनेमाच्या थिएटरमध्ये जागा पकडण्याची एक गंमतशीर आठवण आहे. एकदा आम्हाला, 'संत तुकाराम' हा सिनेमा शाळेमार्फत दाखवला गेला होता. दोन-दोनच्या जोडीने उभे करून आम्हाला अगदी शिस्तीत रांगेने आत सोडले होते. 'हुशार' विद्यार्थी असल्यामुळे आत शिरताक्षणी पळत-पळत पुढच्या रांगेतल्या खुर्च्या आम्ही पकडल्या. अजूनही मला पडद्यावर अगदी जवळ दिसलेलं ते मोठ्ठंच्या-मोठ्ठं 'पुष्पक' विमान आठवतंय! अर्थातच, घरी आल्यावर डोकं खूप दुखलं आणि, 'सिनेमा नेहमी मागच्या रांगांमधे बसून बघावा आणि नाटक नेहमी पुढच्या रांगांमध्ये बसून बघावं' हे मौलिक ज्ञान त्यावेळी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींकडूनच मिळाले!
सिनेमा चालू असताना मधेच कधीतरी आवाज गायब व्हायचा. मग, 'ए तुझ्या XXX... आव्वाज.... XXX' अशा आरोळ्यांनी आणि शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमून जायचे. सिनेमाच्या मध्येच रीळ तुटणे, एखादे रीळ उलटे किंवा पुढेमागे  लागणे, वीज जाणे, असले व्यत्ययही कधी-कधी यायचे. पण एकंदरीत त्या काळातलं पब्लिक सहनशील आणि समंजस होतं. असला दीर्घ काळाचा व्यत्यय आल्यावर थोडा आरडाओरडा करून मग पब्लिक शांत बसायचं. थिएटरमध्ये जास्त वेळ गेला म्हणून कोणाच्या आयुष्यात फारसा फरक पडत नसे. सगळं आयुष्यच निवांत होतं.  पुरुषवर्ग  बाहेर चक्कर मारून विडी-सिगरेट फुंकून किंवा 'मावा' खाऊन यायचा. तर स्त्रीवर्ग नाकाला पदर लावून पोराबाळांना काखोटीला मारून स्वछतागृह गाठायचा. अशा वेळी खारे दाणे, वेफर्स, पिवळ्या रंगाच्या नळ्या म्हणजेच 'बॉबी', सोडावॉटरआणि चहाची भरपूर विक्री व्हायची. अगदीच पब्लिकच्या सहनशक्तीचा अंत बघितला गेला तर मात्र  प्रोजेक्टर चालवणाऱ्या 'बाळ्या' किंवा 'उस्मान्या' च्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जायची. अशा व्यत्ययानंतर सिनेमा चालू झाला की त्याच  'बाळ्या' किंवा 'उस्मान्या'ला टाळ्यांनी आणि शिट्ट्यांनी उत्स्फूर्त दाद द्यायला लोक हात आखडत नसत !

सोलापुरातील स्त्री प्रेक्षकवर्गाची कथा काही औरच होती. "जय संतोषी माँ", किंवा "माहेरची साडी", "बाळा गाऊ कशी अंगाई" सारखे अलका कुबल, आशा काळे वगैरे रडक्या नट्यांचे सिनेमे "स्त्रियांच्या तुफान गर्दीत सतरावा आठवडा..." अशा वर्णनात चालायचे. तसल्या सिनेमाला कधी चुकून गेलेच तर खास बायकी गोधळ दिसायचा. पोरांची किरकिर, आयांनी त्यांच्या पाठीत घातलेले धपाटे आणि 'टवळे, सटवे..' वगैरे बायकी शिव्यांसहित एकमेकींच्या झिंज्या उपटत केलेली भांडणे, या सर्व आवाजांनी थिएटर कलकलून जायचं. असल्या सिनेमात हिरोईनचा सासरी होणारा छळ पाहून बायका मुसमुसून रडायच्या. सिनेमा संपेस्तोवर समस्त महिलावर्गाचे डोळे सुजून लालेलाल आणि पदर ओले झालेले असायचे. 

मागच्या महिन्यात सोलापूरच्या भागवत थिएटरमध्ये एक सिनेमा पाहिला. त्यातल्या एका थिएटरचे नाव आता, 'बिग सिनेमा भागवत' असं झालंय. मोबाईलवरून दीडशे रुपयांच्या तिकिटाचे बुकिंग केले. झुळझुळीत एसी थिएटरमधल्या गुबगुबीत गालिच्यासारख्या पायघड्यांवरून आमच्या तिकिटाच्या नंबरच्या सीटवर अलगद आसनस्थ झालो. कुठलीही रांग नाही, धक्काबुक्की नाही, आरडाओरडा नाही, तिकीट आणि जागा मिळणार की नाही याबद्दलची धास्ती नाही! थिएटरमध्ये बाल्कनी आणि ड्रेससर्कल अशी विभागणीही नव्हती. सगळे प्रेक्षक कमालीच्या शांतपणे सिनेमाचा आस्वाद घेत होते. शिट्ट्या, शिव्या आणि टाळ्या नसल्यामुळे सोलापूरच्या त्या थिएटर मध्ये 'पब्लिक' नव्हतंच असं वाटलं. सिनेमाच्या मध्यांतरात 'ट्रिंग-ट्रिंग' असा सोडा वॉटर बाटल्यांचा ओळखीचा आवाज आला नाही, आणि कुणी पोऱ्या चहा किंवा खाऱ्या दाण्याच्या कागदी पुड्या विकायलाही आला नाही. नाईलाजाने बाहेर जाऊन कॅरॅमल पॉपकॉर्नचा पुडा विकत घेतला. पण त्या महागड्या कॅरॅमल पॉपकॉर्नला जुन्या काळातल्या एक-दोन रुपयाच्या खाऱ्या दाण्यांच्या पुडीची सर अजिबातच नव्हती.

आजही मला थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघायला आवडते. पण खरे सांगायचे झाले तर, सोलापुरातल्या थिएटरमध्ये, सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमे पाहायला जशी मजा यायची तशी आजकाल येतच नाही! 

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

'निदानतज्ज्ञ'



माझे काका, डॉक्टर राम गोडबोले, १९६२ ते २००६ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. त्या काळी बरेचसे डॉक्टर M.B.B.S. अथवा L.C.P.S. होऊन जनरल प्रॅक्टिस करायचे. आजच्यासारखा स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटीचा तो जमाना नव्हता. लंडनहून M.R.C.P. आणि ग्लासगो विद्यापीठातून D.T.M.&H. या पदविकेचे सुवर्णपदक मिळवून भारतात परतल्यानंतर थेट आपल्या जन्मगावी म्हणजेच सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात, जनरल फिजिशियन म्हणून त्यांनी स्वतःच्या कारकीर्दीस सुरुवात केली. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन स्पेशालिस्ट प्रॅक्टिस करणारे माझ्या काकांसारखे एक-दोनच डॉक्टर त्या काळी सोलापूरच्या पंचक्रोशीत होते. त्यामुळे साहजिकच  सुरुवातीपासून डॉक्टर राम गोडबोले हे एक वलयांकित व्यक्तिमत्व होते. तसेच त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यातदेखील प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हणून ते नावाजले गेले.

प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हटलं की, दिमाखदार एसी गाडीतून हिंडणारे, ब्रँडेड कपडे वापरणारे, भरपूर बँक बॅलन्स, फार्महाऊस किंवा शेती असलेले, वरचेवर परदेशवाऱ्या करणारे, देशी-विदेशी कॉन्फरन्समध्ये भाषणं देणारे, अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉक्टर, असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते, नाही का? आश्चर्य म्हणजे माझ्या काकांकडे यातले काहीच नव्हते. पण 'प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर' च्या माझ्या व्याख्येत बसणारे सर्व काही त्यांच्याकडे होते. ते एक उत्तम  'निदानतज्ज्ञ' आणि कुशल शिक्षक होते. त्यांचा अनुभव दांडगा होता. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील सोलापूरलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. सोलापूरच्या 'डॉ. वैशंपायन  मेमोरियल मेडिकल कॉलेजचे' ते मानद प्राध्यापक असल्याने त्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते 'मेडिसिन' या विषयाची लेक्चर्स द्यायचे. वाडिया हॉस्पिटलमध्ये आमची क्लिनिकल टर्म लागली की तिथल्या अवघड, आव्हानात्मक केसेस त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यावर होणारी चर्चा व त्यायोगे केलेले वाचन यातूनही आम्हाला खूप शिकायला मिळायचे.  

काका-पुतणी या रक्ताच्या नात्यापेक्षा गुरु-शिष्या हे आमचे नाते अधिक घट्ट होते. त्यांच्या हाताखाली दोन-तीन वर्षे काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्या वैद्यकीय करियरमधील सगळ्यांत भाग्याची गोष्ट आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि वाजवी खर्चात केलेल्या वैद्यकीय निदानाचे महत्त्व, या 'निदानतज्ज्ञ' गुरूने माझ्या मनावर ठासून बिंबवले. रुग्णाच्या सर्व तक्रारी शांतपणे ऐकून, व्यवस्थित वेळ देऊन रुग्ण तपासणे, त्या तपासणीतून सापडलेली लक्षणे, आणि आपले वैद्यकीय ज्ञान व अनुभव यांची सांगड घालून एक-दोन तात्पुरत्या निदानांपर्यंत (presumptive diagnosis) येणे, 'योग्य निदान' (correct and  final diagnosis) करण्यासाठी काही अत्यावश्यक चाचण्या लिहून देणे आणि त्या चाचण्यांचे अहवाल मिळेस्तोवर तात्पुरती औषधयोजना करणे, अशी त्यांची सविस्तर 'निदानप्रक्रिया' होती.  डॉक्टरने रुग्णाकडून खुबीने काढून घेतलेले त्याच्या तक्रारींचे नेमके वर्णन (History) आणि  रुग्णाची केलेली सखोल तपासणी (Medical examination),  यातच निदानप्रक्रियेतील नव्वद टक्के काम पूर्ण होत असते, असे ते नेहमी सांगायचे. त्यामुळे त्यांच्या निदानप्रक्रियेत सर्वात जास्त खर्च काय होत असेल तर तो त्यांचा वेळ आणि शास्त्रशुद्ध विचार. महागड्या वैद्यकीय चाचण्या आणि औषधे हा खर्च जवळजवळ नसायचाच. एखाद्या आव्हानात्मक केसमध्ये सहजासहजी 'योग्य निदान' होऊ शकत नसे. अशावेळी रुग्णाला पुढच्या काही तपासण्या ते लिहून देत. पण त्याचबरोबर,  स्वतः अगदी  शिकाऊ डॉक्टर असल्यासारखे वैद्यकीय पुस्तके व संदर्भग्रंथ काढून परत-परत वाचत. त्या काळात होणारी त्यांची प्रचंड तगमग योग्य निदान झाल्यावरच शांत होत असे. मग मात्र, एखादे जटिल रहस्य उलगडल्यावर शेरलॉक होम्सच्या चेहऱ्यावर जो काही भाव येत असेल, तशा छटा मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. गोडबोले सरांच्या हाताखाली शिकलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने हे अनुभवलेले आहे आणि त्यातूनच आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा पाया भक्कम झाला आहे.  

त्या काळी, योग्य निदान करणे (Reaching  correct  and final diagnosis), हा वैद्यकीय शिक्षणातला अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य असा भाग होता. गोडबोले सरांसारखे अनेक उत्तम शिक्षक व 'निदानतज्ज्ञ' आमच्या पिढीला लाभले. योग्य निदान करण्याची ही कला गुरु-शिष्य परंपरेतून पुढे जात होती आणि अनेक 'निदानतज्ज्ञ' घडत होते. परंतु, त्याच काळातले आमच्याबरोबर किंवा थोडे पुढे-मागे शिकलेले बरेचसे व्यावसायिक, आज ज्या प्रकारे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत ते बघितले की माझ्या अंगावर काटा येतो. आपल्या  शिक्षणाचा उपयोग करून योग्य निदान व उपचार करणे हे आपले कर्तव्य आहे, या शिकवणीचा माझ्या पिढीतल्याही कित्येक अलोपॅथी व्यावसायिकांना पूर्ण विसर पडलेला असावा, असे मला जाणवते. किंवा कदाचित त्या गोष्टींना त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वच राहिलेले नाही. आपल्याकडे आलेल्या रुग्णावर स्वतःचा वेळ व बुद्धी खर्च न करता भरपूर चाचण्या व अनेक महागड्या औषधांवर रुग्णांना  पैसे खर्च करायला लावण्याची जणू अहमहमिका लागली आहे असे वाटते. अलोपॅथीव्यतिरिक्त इतर पॅथीच्याही अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी 'वैदिकोपचार', 'निसर्गोपचार', 'चिलेशन थेरपी', 'अरोमा थेरपी' अशा वेगवेगळ्या गोंडस नावांखाली जे काही घृणास्पद उद्योग चालवलेले आहेत, त्याबद्दल तर न बोललेलेच बरे. अशा व्यावसायिकांच्या कचाट्यात सापडलेल्या रुग्णाच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तरच तो वाचतो. मात्र तसे नसेल तर आपला जीव आणि पैसे दोन्हीही गमावून बसतो. गंमत म्हणजे यांपैकीच अनेक व्यावसायिक हे लौकिकार्थाने 'वलयांकित, प्रतिथयश आणि नामवंत' झालेले आहेत. समाजातील सगळेच वैद्यकीय व्यावसायिक असे आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु, सचोटीने आणि केवळ 'रुग्णहित' डोळ्यापुढे ठेऊन व्यवसाय करणारे तज्ज्ञ आज 'अल्पसंख्याक' होत चाललेले आहेत, हे मात्र खरे. 
  
आजच्या वैद्यकीय शिक्षणाची पद्धत आणि घसरत चाललेला दर्जा बघितला की मी विद्ध होते. बारावीनंतर लगेच MD/MS होता येत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव विद्यार्थी साडेचार वर्षे कशीबशी काढतात आणि  एम.बी.बी.एस. कोर्स 'उरकून घेतात'. या काळात लेक्चर्स ऐकणे, आव्हानात्मक केसेस अभ्यासणे व त्यावर चर्चा करणे, असल्या 'फालतू' गोष्टींवर वेळ न घालवता MD/MS प्रवेश परीक्षेच्या क्लासेसचे मार्ग विद्यार्थी धुंडाळत असतात. त्यानंतरच्या  सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा अधिकच अवघड असतात. आणि त्यांच्या तयारीसाठी वेगळे 'सुपर' क्लास असतातच. अशा या 'क्लासिकल' शिक्षणामध्ये ज्ञान मिळो ना मिळो, चांगली  'रँक' मिळणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. त्यामुळेच रुग्णाच्या आजाराचे 'योग्य निदान' होणे यासारख्या 'क्षुल्लक' गोष्टीला महत्त्वच राहिलेले नाही! 

आजचे हे विदारक चित्र पाहता, भविष्यकाळात गोडबोले सरांसारख्या डॉक्टर्सची दुर्मिळ प्रजाति नामशेष होईल की काय, अशी भीती मला भेडसावते. म्हणूनच,  'निदानतज्ञ' अशा एका सुपरस्पेशालिटी कोर्सचा समावेश वैद्यकीय शिक्षणप्रणालीत व्हायला हवा असे मला वाटते. तसे शक्य होईल अथवा न होईल. निदानपक्षी, मागच्या पिढीतल्या उत्तम गुरूंच्या तालमीत तयार झालेल्या 'निदानतज्ज्ञ' डॉक्टरांना हाताशी घेऊन, मीच 'निदानकला' या विषयाचा एखादा क्लास सुरु का करू नये? कशी वाटतेय कल्पना? 

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

'नवगरीबांचे' 'नोट'कारण!

पुणे महानगर पालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमध्ये माझ्या बालरूग्णांच्या पालकांना, "पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे तुम्हाला कितपत त्रास होतोय?" असा प्रश्न विचारला असता जवळपास प्रत्येकाने, "मॅडम आमच्या कडे नेहमी फक्त दहा, पन्नास आणि कधीतरी शंभराच्या नोटा असतात. पाचशे किंवा हजारचीनोट आम्हाला कधी वापरायला मिळतच नाही तर आम्हाला काय फरक पडणार आहे?", असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आणि खऱ्याखुऱ्या गोरगरिबांच्या जीवनावर नोटा बंदीच्या निर्णयामुळे काहीही विपरीत परिणाम झालेला नाही, याची खात्री पटली. त्या लोकांनी प्रधानमंत्री मोदींच्या निर्णयाचे स्वागतच केले.सोनावणे रुग्णालयात पेपर काढायला दहा रुपये पडतात. एखाद्या बालकाचे रक्त तपासणी करावी लागणार असेल तर अजून दहा रुपये भरावे लागतात. बरेचदा ते जास्तीचे दहा रुपयेही या गरीब लोकांकडे नसतात. त्यामुळे, "नोटा बंदमुळे गरिबांचे हाल होताहेत",  हा विरोधी पक्षांचा कांगावा हास्यास्पद आहे. इतर अनेक कारणांनी गरिबांचे हाल होताहेत,  ते यांना कधी जाणवले आहेत का? आज या राजकीय पुढाऱ्यांवर, मोदींच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे अचानक गरीबी ओढवली आहे आणि या नवगरीबांचे हाल होत आहेत, ही गोष्ट मला मान्य आहे आणि त्यांच्या बद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. 

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

प्रतिसाद

'झीरो एफ आय आर' या माझ्या लेखावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
"जपून राहा बाई, काळजी घे, इतक्या पहाटे फिरायला जाऊ नकोस, महिलांनी अशा आक्षेपार्ह वर्तनाकडे दुर्लक्ष करणेच जास्त शहाणपणाचे असते" अशा सावध प्रतिक्रिया काहीं स्त्रियांनी दिल्या. कित्येक स्त्रियांनी त्यांच्यावर ओढवलेले असेच प्रसंग मला सांगितले व मी 'एफ आय आर' दाखल करण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल माझे खूप कौतुक केले.
"अशा गैरप्रकाराला हाताळता येणे प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला जमेलच असे नाही" अशी प्रतिक्रिया देऊन, पुरुषही अशा गैरवर्तनाचे बळी ठरू शकतात, याकडे काहींनी माझे लक्ष वेधले.
सर्वानाच विचार करायला प्रवृत्त करणारा असाही एक प्रश्न मांडला गेला की "मांडलेला विषय आणि त्यामागचा विचार समजून घ्यायची कुवत, बलात्कारांनंतर पीडितेच्या आणि गुन्हेगारांच्या जातीची चर्चा करणाऱ्या आपल्या समाजामध्ये आहे तरी का?"

पोलिसांविषयी मी जे लिहिलं, त्याबाबत मात्र सर्वांकडून आपल्या पोलीस खात्याला नांवे ठेवण्यात आली. पोलीसखात्यात काम करणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या काही व्यक्तींनी माझा लेख वाचला आणि त्यांना थोडेसे वाईट वाटले. त्यातल्या एक-दोघांनी मला असेही सुचवले की " 'झीरो एफ.आय.आर.' म्हणजे काय? बाललैंगिक शोषण आणि इतर सर्वच लैंगिक गुन्हयाविरुद्ध कायद्यात काय तरतुदी आहेत? स्त्रिया स्वसंरक्षणासाठी काय करू शकतात? सरकारने त्यासाठी काय काय पावले उचलली आहेत? पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय-काय करीत आहेत ?" याबद्दलही सविस्तर माहिती लिहून मी  समाजस्वास्थ्याला आणि स्त्रियांच्या सबलीकरणाला हातभार लावावा. म्हणूनच हा लेख.

"झीरो एफ.आय.आर." ही पोस्ट वाचून कित्येकजणींनी त्यांना त्यांच्या लहानपणी आलेले असेच काही वाईट अनुभव मला सांगितले. बाललैंगिक शोषण हा एक गंभीर गुन्हा आहे. जवळजवळ पन्नास टक्के मुला-मुलींना कुठल्या ना कुठल्या प्रकारात मोडणाऱ्या लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते, असे आकडेवारीने सिद्ध झालेले आहे. कित्येक  लहान मुलांना आपल्याबरोबर काही गैरकृत्य केले जातेय, याची जाणही नसते. अशा प्रकारच्या जवळजवळ नव्वद टक्के घटनांमध्ये मुलां-मुलींचे शोषण, नातेवाईकांकडून अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होत असते. दुर्दैवाने, कित्येक शोषणकर्तेही स्वतः कायद्याने अज्ञान, म्हणजेच अठरा वर्षाच्या खालील वयोगटातील असतात.  सुदैवाने, The Protection of Children from Sexual Offences Act, 2012, (POCSO) हा कायदा आज अस्तित्वात आलेला आहे. या कायद्याचे ज्ञान जास्तीतजास्त पालकांना असायला हवे.
आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लैंगिक शोषण होणार नाही ही  काळजी घेणे तर आवश्यकच आहे, पण त्याबरोबरच आपला पाल्य कोणाचेही शोषण करणार नाही अथवा लैंगिक गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाही यासाठी पालकांनी सतर्क राहून आपापल्या पाल्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. 

मुलांना सक्षम बनवून सुरक्षित ठेवण्यासाठी,  पालकांच्या आणि शालेय  शिक्षकांच्या कार्यशाळा 
मी स्वतः घेत असते. तसेच, चार-पाच वर्षांपासून ते मोठ्या वयाच्या मुलांसाठी मी शाळांमध्ये जाऊन  प्रबोधनसत्रे घेत असते. कुठले वर्तन अयोग्य आहे, त्यांच्याबरोबर असे अयोग्य वर्तन  होऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायची, कुणाबरोबर  असे काही घडत असेल  तर काय करायचे, नेमकी कशी व कोणाची मदत घ्यायची,अशा अनेक बाबींवर मी गप्पांच्या माध्यमातून मुलांचे प्रबोधन करते. चाईल्डलाईन या संस्थेने बनवलेली 'कोमल' ही फिल्म दाखवून मुलांना बोलते करते. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्डच्या 'POCSO E-Box' आणि चाईल्ड लाईनच्या Helpline बद्दल माहिती देते. लैंगिकता, योग्य-अयोग्य लैंगिकवर्तन, निकोप प्रेमसंबंध, सायबर सिक्युरिटी अशा विषयांवर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रबोधन मी करत असते. सर्व शाळांमधून व महाविद्यालयांमधून  असे प्रबोधन सातत्याने होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शिक्षणांमध्ये केवळ शारीरिक बदलाबद्द्दल न बोलता विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या भावनिक समस्या सोडवायला शिकवले पाहिजे. 

'झीरो एफ.आय.आर.' या पोस्टवर अशीही एक प्रतिक्रिया आली की, 'सर्व समाजात विकृती असतात, सर्वाना कधी ना कधी तरी अशा प्रसंगातून जावे लागते. आपल्याला जर काही शारीरिक इजा होत नसेल तर स्त्रियांनी डोके शांत ठेऊन अशा वागण्याकडे दुर्लक्ष करावे, हे बरे'. ही प्रतिक्रिया मात्र मला तितकीशी रुचली नाही. खरे बोलायचे तर, वर्षानुवर्षे स्त्रिया व लहान मुली घराबाहेर किंवा घरातदेखील येणाऱ्या अशा अनुभवांकडे दुर्लक्षच करत आलेल्या आहेत. कामाच्या ठिकाणी कित्येक महिलांना, बरोबरच्या पुरुषांच्या शोधक नजरा टाळत, अश्लील शेरेबाजी, शिट्ट्या, द्व्यर्थी चावट गाण्यांच्या ओळी ऐकत, किंवा सूचक हावभाव नजरेआड करतच काम करावे लागते. असे वागणे हा पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशा समजुतीने पुरुष सर्रास वागतात. "डोके शांत ठेऊन अशा वागण्याकडे दुर्लक्ष करावे",  हा 'सबुरीचा सल्ला' मात्र स्त्रियांना दिला जातो हे योग्य नव्हे. स्त्रियांपुढे प्रश्न असाही येतो की अशा प्रकारात मोडणारे वर्तन सिद्ध कसे करायचे? असल्या 'क्षुल्लक' गोष्टीसाठी थेट पोलिसांकडे जाणे म्हणजे अजूनच अवघड. शिवाय, अशा गैरप्रकाराला आपल्याला  सामोरे जावे लागते आहे, याची घरी आई-वडील, भाऊ आणि नवरा यापैकी  कोणालाही काही सांगण्याची चोरी असते. नोकरी करणे तर आवश्यकच आहे. मग करायचे काय? तर कामाच्या ठिकाणी असले आक्षेपार्ह वर्तन निमूटपणे सहन करायचे, अशीच स्त्रियांची  मनोधारणा झालेली आहे. 

सतत होणाऱ्या या कुचंबणेतून सुटका व्हावी याकरिता राजस्थानात भंवरीदेवीच्या बलात्कारानंतर सुरु झालेला लढा, दिल्लीतील निर्भयाच्या बलिदानाने अजूनच तीव्र झाला. 'Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013' हा एक अत्यंत महत्वाचा, दिवाणी कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामधील तरतुदींची स्त्रियांना आणि पुरुषांनाही व्यवस्थित माहिती असायला हवी. आक्षेपार्ह वागण्याकडे दुर्लक्ष न करता पीडित स्त्रियांनी तक्रार नोंदवावी, हेच योग्य. अशा कायदेशीर तरतुदींबद्दलही मी प्रबोधनसत्रे घेत असंते. तसेच, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तक्रारनिवारण समितीवरही माझी नेमणूक झालेली आहे. आज जरी या कायद्याने केवळ स्त्रियांनाच संरक्षण मिळाले असले तरी हा कायदा gender-neutral करून पुरुषांनाही त्यायोगे संरक्षण मिळावे, असे माझे मत आहे. त्याचबरोबर, महिलांनी या कायद्याचा दुरुपयोग करू नये असेही मला वाटते.

भारतात लैंगिक गुन्ह्यांसाठी अनेक फौजदारी कायदे ब्रिटिशांनी १८७२ सालापासून लागू केले आणि भारतीय दंड विधानातील  ५०९ , ३५४, ३७५, ३७६ ही कलमे अस्तित्वात आली. त्यामध्ये वेळोवेळी काही सुधारणाही होत गेल्या. बऱ्याच कायद्यांमध्ये स्त्रियांना विशेष संरक्षण दिलेले आहे. पत्नीला किंवा सुनेला गैरवागणूक देणे, हुंडा किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा  लावणे हा गुन्हा आहे ही जाणीव समाजात  रुजायला लागली असली तरीही, आज भारतात कौटुंबिक अत्याचारांचे व हुंडाबळीचे  प्रमाण बरेच आहे. अशा प्रकारच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी मुलींना आणि स्त्रियांना सक्षम बनवणे आवश्यक आहे. असा गैरप्रकार घडत असल्यास योग्य त्या कायद्याची मदत घेऊन स्वतःचे संरक्षण कसे करावे, याची माहिती स्त्रियांना असणे आवश्यक आहे.
 
"First Information Report (एफ.आय.आर.)" म्हणजेच, गुन्ह्याच्या तक्रारीची पोलीसांकडे सर्वप्रथम होणारी नोंद.  गुन्हा घडल्याची तारीख, वेळ, ठिकाण असे गुन्हयाबद्दलचे सर्व तपशील पोलीस विचारून घेतात आणि एफ.आय.आर.मध्ये नमूद करतात. प्रत्येक एफ.आय.आर.ला त्या पोलीस स्टेशनचा एक क्रमांक दिला जातो. पूर्वापार अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्या पोलीस स्टेशनमध्येच गुन्ह्याची नोंदणी होणे अपेक्षित होते. मात्र, दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर गठित केल्या गेलेल्या 'न्यायमूर्ती वर्मा आयोगाच्या' सूचनांनुसार २०१३ साली कायद्यात बदल केला गेला. बदललेल्या तरतुदीनुसार, एखाद्या दखलपात्र गुन्हयाची नोंद पीडित व्यक्तीला आपल्या सोयीच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला करता येते. यालाच "झीरो एफ.आय.आर."
असे म्हणतात, कारण
 गुन्हा नोंदविणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये अशा एफ.आय.आर.ला "००" असा क्रमांक देऊन ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, तेथे ती पाठवली जाते. दखलपात्र गुन्ह्याची नोंद लवकरात लवकर होऊन तपास जलदगत्या चालू व्हावा यासाठी ही तरतूद केलेली आहे. तेंव्हा, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्याच पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची नोंदणी करणे आता बंधनकारक नाही, हे जर सर्व नागरिकांना समजले तरच ते या हक्काचा वापर करू शकतील. 

पोलीस खाते काहीच कामाचे नाही असे म्हणून आपणच पोलीस खात्याला नेहमीच नावे ठेवत असतो. महाराष्ट्र पोलिसांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी 'प्रतिसाद' नावाचे एक मोबाईल ऍप तयार केलेले आहे. अपघात, अतिरेकी हल्ला, चोरी किंवा 'महिलांच्या सुरक्षेला धोका', अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा घडल्यास आपण त्या ऍपचे बटन दाबून त्वरित पोलिसांची मदत मिळवू शकतो. या ऍपचा वापर करून लोक आज पोलिसांची मदत घेत आहेत  व पोलीस खातेही मदत करते आहे. तसेच १०० नंबर फिरवूनही आपण आपली तक्रर नोंदवू शकतो. १०० नंबर फिरवल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांची मदत मिळू शकते असा माझा आत्त्तापर्यँतचा अनुभव आहे. आपल्या देशांत कायदा व सुव्यवस्था हवी असेल तर पोलिसांबरोबरच नागरिकांचीही काही सामाजिक बांधिलकी आहे याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे हे नक्कीच .