गुरुवार, १८ जून, २०२६

केदारनाथ - भाग १०

काल रात्रीपासूनच माझा घसा जरा धरला होता. बारीकसा खोकला, अंगदुखी, असे चालू झाले होते. रात्री मी १० वाजेपर्यंत झोपले होते. पण पहाटे २-२.१५ वाजता नाक चोंदल्यामुळे जाग आली. घसा दुखत होताच. मग उठून भरपूर गरम पाणी प्यायले. नाक साफ केले. तरीही लगेच झोप येईना. पुढे ३.३० ते ७ अशी साडेतीन तास झोप लागली. गेली काही वर्षे हातात स्मार्टवॉच घालत असल्याने, आपण नेमके किती वेळ झोपलो, हे निश्चितपणे सांगता येते. पण काल रात्री अगदी झोपतानाच ते स्मार्टवॉच मी चार्जिंगला लावलेले होते. त्यामुळे एकूण किती झोप झाली हे मात्र कळले नाही. सकाळी उठल्यावर अंग दुखत असले तरी अंघोळ केल्यावर जरा बरे वाटले. परत भरपूर गरम पाणी पिऊन दुखऱ्या घशालाही जरा शेक दिला.

आज आनंदला जरा बरे वाटत होते. त्यामुळे तो पण नाश्त्याला वर भोजनालयामध्ये आला. नाष्ट्याला  बटाट्याची गरगटा भाजी आणि गरम फुलके होते. मस्तपैकी आमचूर घालून केलेली आणि बटाटे भपूर घोटून केलेली ती भाजी होती. त्याआधी सकाळी, आम्ही आमच्यासोबत आणलेला थोडा सुकामेवा, म्हणजे बदाम, काजू आणि पिस्ते असे खाल्ले होते. थंडीमधे बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही चिया सीड्स, तुळशीचे बी अशा गोष्टीही सोबत आणल्या होत्या. तुळशीचे बी गरम पाण्यात घालून, ते पाणी पिऊन, बद्धकोष्ठ होऊ नये याचीही व्यवस्था आम्ही केली होती. 

नाष्ट्यानंतर मी खाली कामाला निघून गेले आणि आनंद खोलीत परत गेला. आज सकाळी त्याला बरे वाटत असल्यामुळे मला जरा हायसे वाटले होते. आनंदने आमच्या खोलीच्या मागे दिसणाऱ्या बर्फाच्छादित शिखरांचा आणि तिथे दिसणाऱ्या विविधरंगी  तंबूंचा फोटो आमच्या काही फॅमिली ग्रूप्सवर पाठवलेला दिसला. त्यामुळे तो आता बरा आहे याची मला खात्री झाली आणि मी निश्चिंत झाले.

मी बरोबर सकाळी ८.४५ वाजता कामाला लागले. रात्री कामावर असलेल्या नर्सिंग स्टाफपैकी काजल, परवेझ आणि अजून एक मुलगा, अशा तिघांनाही रोज मला कामावर आलेले बघितले की आनंद होतो असे मला जाणवत होते. कारण, रात्रभरात ते तिघे मिळून जवळपास १५०-२०० पेशंट्स तपासत. मी आले की त्यांना अगदी 'हुश्श' होत असावे. आज मी काम सुरू केल्यानंतर तासाभराने डॉ. अजय आला. त्यानंतर हलत-डुलत डॉ. सुभाषिनी आली. ती ओपीडीत आली तरी ती कधीच एका जागी बसून काम करण्याच्या मूडमधे नसते. सतत इकडे जा, तिकडे जा, एखाद्यासोबत गप्पा मार, असे करत असते. डॉ. अजयबरोबर कृष्णा नावाचा एक नर्सिंगचा विद्यार्थी काम करतो. तो बिहारी मुलगा अगदी गुणी आणि कामसू आहे. नॉयडाच्या 'यथार्थ हॉस्पिटल' मधून आलेली, नवीन, अक्षय, रवि, रिया, नरेंद्र, ही मुले अतिशय तरबेज आहेत आणि त्यातला प्रत्येकजण कामाला वाघ आहे. पण रियाला नर्सिंग कामाऐवजी बराच काळ केवळ पेशंट रजिस्टर भरत बसावे लागल्यामुळे तिची खूप चडफड होत असे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेसाठी एक स्वतंत्र रजिस्टर असते. त्या रजिस्टरमधे पेशंट्सचे नाव, लिंग, वय, पत्ता, फोन नंबर, व्यवसायाचे स्वरूप, वैद्यकीय निदान आणि उपचार असे बरेच रकाने भरत बसावे लागते. 

इथे येणारे काही रुग्ण घोड्यावर बसल्यामुळे मांड्यांना खरचटून किंवा घोड्यावरून पडून इजा झालेले असतात. पण, अलंकारिक भाषेत बोलायचे तर, बरेचसे पेशंट्स 'घोड्यावर बसून आल्यासारखे' वाटत. कारण, त्यांना इतकी घाई असे की काही विचारू नका. रांगेत त्यांच्याआधी कितीही वयस्क लोक, किंवा कितीही जास्त आजारी रुग्ण नोंदणीसाठी थांबलेले असले तरीही त्यांना सगळ्यांच्या पुढे यायचे असे. "आम्हाला जायचंय, आमच्याबरोबरचे लोक पुढे निघून गेलेत, आम्हीच मागे अडकलोत, आमचा घोडेवाला किंवा डोलीवाला थांबला आहे," असली कारणं सांगून हे लोक आपापलं घोडं पुढे दामटायला बघत. अशा लोकांची मला फार चीड येई. विशेषतः दिल्ली आणि हरयाणाकडचे लोक महाआगाऊ असतात असा अनुभव मला आला. मग मी ठरवूनच अशा लोकांना मुळीच पुढे येऊ देत नव्हते. त्यातले काहीजण, आपण अगदी अत्यवस्थ आहोत असे नाटक करत पुढे घुसायचा प्रयत्न करायचे. "मला ऑक्सिजन लावाच, श्वास घ्यायला फार त्रास होतोय" असे सांगून घुसायचे. पण मग एकदा का तोंडाला ऑक्सिजनचा मास्क लागला, की लगेच फोन कानाला लावून मोठमोठ्यांदा फोनवर बडबड सुरु करायचे. अशा वेळेस मात्र माझं डोकं खरोखरच आउट होऊन, मी त्यांना फोन बंद करायला लावत असे. 

आज अगदी अर्धमेल्या अशा अवस्थेतल्या एका दहा-बारा वर्षांच्या मुलाला आणले होते. त्याचे आई-वडील आपल्या मुलाची अवस्था बघून, घाबरून, मोठमोठ्याने रडत-ओरडत होते. सोबत त्यांचा पिठ्ठूवालाही होता. त्या मुलाला बेडवर झोपवून आम्ही ऑक्सिजन सुरु केला. पेशंटला व्यवस्थित ऊब मिळावी यासाठी असलेला, ट्यूबने गरम हवा पांघरुणाच्या आत सोडणारा वॉर्मर आम्ही त्या मुलाच्या पांघरुणात लावला. आम्ही त्याला सेटल करण्याच्या प्रयत्नात होतो. मी त्या मुलाला तपासत होते. तेवढ्यात मागून धाडकन कोणीतरी पडल्यासारखा आवाज आला. मी वळून बघितले तर त्या मुलाचे वडील घाबरल्यामुळे चक्कर येऊन, जमिनीवर कोसळले होते. मुलाची आई ते सर्व पाहून भीतीने जोरजोरात किंचाळू लागली होती आणि आपले डोके बडवून घेत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमच्यापैकी निम्मी टीम त्या माणसाकडे धावली. त्याला उचलून दुसऱ्या बेडवर ठेवण्यात आले. आपले वडील जमिनीवर कोसळल्याचा आवाज, आणि आईचे रडणे ऐकून, तो जवळपास बेशुद्धावस्थेत असलेला मुलगा ताडकन उठला  आणि, "पापा, पापा, आपको क्या हो गया? मैं ठीक हूं." असे म्हणत, रडू-ओरडू लागला. आपला मुलगा शुद्धीवर येऊन बोलतोय, ओरडतोय हे बघून त्याचा बापही एकदम उठून बसला. अशा रीतीने, आम्ही फारसे काहीही न करताच, तो मुलगा आणि त्याचे वडीलही ठणठणीत बरे झाले! 
अर्थातच, पुढे फारसे काहीच उपचार न करता, त्या कुटुंबाला आम्ही धीर दिला आणि पाठवून दिले.

आणखी एक अशीच गंमत आम्हाला पाहायला मिळाली. बेशुद्धावस्थेतल्या एका दहा-बारा वर्षाच्या मुलाला आणले गेले होते. पिठठूमधे बसून वर येत असताना तो मुलगा ग्लानीमध्ये गेला होता आणि काही केल्या डोळे उघडत नव्हता. त्याचा पिठठूवाला, आई-वडील आणि इतर नातेवाईक सगळेच घाबरेघुबरे झालेले होते. आम्ही त्याला emergency bed वर घेतले, ऑक्सिजन मास्क लावून ऑक्सिजन सुरु केला, जाड ब्लॅंकेट घालून,  ब्लॅकेटच्या आतमधे वॉर्मरच्या पाईपने गरम हवा सोडायला सुरुवात केली. मी त्या मुलाला तपासून त्याचे हृदय आणि श्वासाची गती ठीक आहे ना ते  तपासले. त्याला हाक मारून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पापण्या वर करून त्याच्या डोळ्याची बुबुळे तपासली. पण इतके करूनसुद्धा त्या मुलाने डोळे हलवले नाहीत, हालचाल केली नाही, की कसलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी नर्सेसना तातडीने ऑर्डर दिली की त्या मुलाच्या हाताच्या शिरेतून रक्त काढा, ते रक्त लगेच तपासून घ्या आणि मुलाला सलाईन लावा. 'सलाईन' हा शब्द त्या मुलाच्या कानावर पडताच, तो मुलगा एकदम ताडकन पलंगावरून उठून बसला आणि "नहीं, नहीं, सलाईन नहीं, सलाईन नहीं..." असे किंचाळू लागला. त्यामुळे, साहजिकच पुढे फारसे काहीही न करता आम्ही त्या मुलाला आणि त्याच्यासोबत आलेल्या फौजेला तिथून रवाना केले!  इथल्या संपूर्ण ड्यूटीच्या काळात मला असे अनेक मजेशीर अनुभव येत राहिले.

काहीवेळा, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यातल्या खेड्यापाड्यातून आलेल्या बायकांना त्यांच्या नवऱ्याचे नाव विचारले की त्यातल्या काही बायका तोंडावर पदर ठेवून लाजत कसेबसे नाव उच्चारत. पण काही जणी मात्र नाव सांगायला अजिबात तयार होत नसत. मग मोठ्या खुबीने त्यांच्याकडून ते नाव काढून घ्यावे लागे. याउलट, महाराष्ट्रातल्या खेडेगावाकडच्या एका बाईला नावनोंदणी करणाऱ्या नर्सने तिच्या नवऱ्याचे नाव विचारले. तर ती म्हणाली, "माझा नवरा कधीच मेला." ती मराठीभाषिक असल्याने आणि तिला हिंदी नीटसे येत नसल्याने मी तिच्याकडून मराठीत माहिती घ्यायला सुरुवात केली. तिला म्हणाले "तुझा नवरा हयात नसला तरीही त्याचं नाव सांग, आम्हाला नोंद करावी लागते." त्यावर ही बाई मला म्हणते, "माझ्या मेलेल्या नवऱ्याचं नाव तुम्हाला काय करायचंय?" मी डोक्याला हात लावून घेतला. शेवटी कसेबसे तिला पटवून दिले की आमच्या रेकॉर्डसाठी आम्हाला ते नाव लिहावेच लागते. मग तिने आमच्यावर मोठे उपकार केल्याच्या थाटात, तिच्या दिवंगत नवऱ्याचे नाव सांगितले आणि आमची सुटका केली!

एक सुशिक्षित, मध्यमवयीन नवरा-बायको आले होते. त्या बाईंना एरवी डायबेटिसच्या गोळ्या चालू होत्या. पण त्यांनी आपल्या डायबेटिसच्या गोळ्या सोबत आणल्याच नव्हत्या. त्या बाईंना कुठल्या गोळ्या चालू आहेत, हेदेखील त्यांना किंवा त्यांच्या नवऱ्याला माहिती नव्हते. त्या बाईंची शुगर तपासणी करायला ग्लुकोमीटर लावला तर, त्यावर रेकॉर्डही होऊ शकणार नाही इतकी जास्त शुगर आली. परत दोन वेळा तपासणी करून बघितली तरी पुन्हा तीच परिस्थिती होती. मी त्या बाईंना इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला नर्सला सांगितले. पण, "काहीही झाले तरी मी इन्सुलिन इंजेक्शन घेणार नाही म्हणजे नाही." असे म्हणून ती बाई अडूनच बसली. आत्ता इन्सुलिन इंजेक्शन आम्ही दिले नाही तर ती बाई डायबेटिक कोमामधे जाऊ शकते, तिच्या जीवाला धोका आहे, हे सगळे मी त्या नवराबायकोंना समजावून सांगितले. बऱ्याच मुश्किलीने ती बाई इन्सुलीन घ्यायला तयार झाली. कसेबसे करून तिची शुगर आम्ही २७५-३०० च्या रेंजमधे आणली आणि तिला पाठवून दिले. रोजच्या डायबिटीस व रक्तदाबाच्या गोळ्या विसरून आलेले कमीतकमी १०-१२ पेशंट्स तरी दिवसभरात भेटायचे. स्वतःच्या गोळ्यांचे नाव माहीत नाही, गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन सोबत नाही, मोबाईलमध्ये गोळ्यांचा फोटो नाही, असे बरेच पेशंट्स इथे पाहिले. "नेहमीची औषधे व गोळ्या गौरीकुंडला ठेवलेल्या सामानामधेच विसरलो." असे खुशाल सांगणारे हे पेशंट्स आपला मोबाईल गौरीकुंडला सामानात विसरलेले मात्र मी एकदाही ऐकले नाही! 

ती डायबेटिसवाली बाई गेली असेल-नसेल तेवढ्यात अक्षय नावाचा एक नर्स मुलगा मला बोलवायला आला, "मॅडम, महाराष्ट्रातला एक पेशंट सिरीयस झाला आहे. येऊन बघता का?" त्या पेशंटला पाहिल्या-पाहिल्या मी विचारले, "हा डायबेटिक आहे का?" हो असे उत्तर मिळताच मी म्हणाले, "अरे, हा तर डायबेटिक कीटोऍसिडोसिसचा पेशंट आहे. हा कधीही कोमात जाऊ शकतो." मी पटापटा सलाईन, अँटिबायोटिक्स, इतर तपासण्या, अशा सर्व ऑर्डर्स दिल्या. त्या माणसाला चक्कर येऊ लागल्याने आणि डोळ्यांना काहीच दिसेनासे झाल्याने तो हॉस्पिटलमधे आला होता. तो रोज सकाळी इन्सुलिन घेत असे, पण आज त्याने ते घेतले नव्हते. हॉस्पिटलमध्ये आल्या-आल्या त्याला कोणीतरी नर्स मुलगा इन्सुलिन द्यायला गेला होता. पण त्याने ते इंजेक्शन त्या नर्सकडून घ्यायला नकार दिला. रोजच्याप्रमाणे माझे मीच लावून घेतो असे त्याने सांगितले. पण त्याने स्वतःदेखील ते इंजेक्शन घेतले नाही आणि तसाच पडून राहिला. तो अर्धवट ग्लानीत गेल्याचे लक्षात आल्यानंतर मला बोलावले गेले होते. मी त्या माणसाला तपासले तेंव्हा तो जेमतेम उत्तरे देऊ शकत होता. त्याचे वय ४१ वर्षे आहे, तो मुंबईचा आहे व तो एकटाच आला आहे, असे त्याने मला सांगितले. प्रत्यक्षात मात्र, "तो इथे एक टूर गाईड म्हणून आला आहे व त्याने सोबत आणलेले प्रवासी त्याला शोधत आहेत" असे मला नर्सेसनी सांगितले. साडेसात-पावणेआठला ओपीडीतून वर येईपर्यंत मी चारवेळा तरी त्याला तपासून आले होते. मला त्या पेशंटच्या जीवाची काळजीच वाटत होती. रात्रभर त्याला हॉस्पिटलातच ठेवणार होते. 

सकाळी, जवळजवळ अर्धमेल्या अवस्थेतली एक मराठी म्हातारी तिथे आली होती. तिचा नवराही सोबत होता. लातूर, उस्मानाबाद या भागातून आलेल्या त्या अत्यंत गरीब घरच्या बाईला, धड उभेसुद्धा राहवत नव्हते. मी तिला ऑक्सिजन दिल्यावर ती जरा ताजीतवानी झाली. ते नवरा-बायको कुठल्यातरी यात्रा कंपनीबरोबर आलेले होते. त्यामुळे, मी नको म्हणत असतानाही ती बाई हट्टाने दर्शनासाठी जातेच असे म्हणाली. पण थोड्याच वेळात तिला घेऊन तिचा नवरा परत आला. तिला आम्ही अ‍ॅडमिट करून घेतले. तिला Paroxysmal Supra-ventricular Tachycardia (हृदयाची गती अचानक व प्रमाणाबाहेर वाढणे) हा आजार निघाला. तिचा नवरा तिला हॉस्पिटलमधेच ठेवून एकटाच दर्शन करून आला. चार वाजता चहा आल्यावर मी त्या माणसाला कपभर चहा नेऊन दिला. त्यामुळे तो अक्षरशः भारावून गेला. माझ्याजवळ येऊन हात जोडून त्याने माझे आभार मानले. त्या बाईंना रात्रभर 'आयसीयू' मधेच ठेवले गेले. 

मुंबईहून एक मराठी कुटुंब आले होते. त्या कुटंबातील आजींच्या आग्रहाखातर सहाजणांचे ते कुटुंब केदारनाथ दर्शनाला आले होते. त्या आजी वयस्कर होत्याच आणि त्यांच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळीही खूप खाली गेलेली होती. बराच वेळ ऑक्सिजन लावला तरी काही केल्या रक्तातली पातळी उंचावत नव्हती. त्या बाईंचा छातीचा एक्सरे, ईसीजी नॉर्मल होता. शेवटी मी त्या बाईंना सलाईन व इतर उपचार दिले. त्यानंतर त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी जरा नॉर्मल झाली. मी त्या बाईंच्या मुलाला सल्ला दिला की, त्या बाईंना घेऊन लगेच खाली गौरीकुंडला जा. पण त्या लोकांची मनाची तयारी दिसली नाही. "आईच्या इच्छेखातर तर आम्ही तिला घेऊन इथे आलो आहोत. आता तिला केदारनाथच्या दर्शनाशिवाय कसे परत न्यायचे?" असे त्यांचे म्हणणे होते. पण त्या बाईंची तब्येत नाजूक आहे, त्यांना दर्शन करायला नेऊ नका असे मी निक्षून सांगितले. थोड्या वेळाने ते लोक त्या आजींना घेऊन तिथून निघून गेले.

भारताच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या, विविधभाषिक, नानाविध प्रकृतीच्या, आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकांशी बोलणे आणि त्यांच्यावर उपचार करणे, म्हणजे अनुभवांचा अक्षय खजिनाच आहे असे मला न वाटले तरच नवल!

आज दिवसभर माझे डोके खूप दुखत होते. त्यामुळे आज मी सकाळी ११-११.३० च्या सुमारास चहा मागवून घेतला होता. स्वयंपाकघरामधून किटलीभरून चहा आणि टोस्ट आले होते. मी टोस्ट खाल्ले नाहीत, पण दोन-तीन छोटे कागदी कप भरून चहा मात्र प्यायले. चहाने चांगलीच तरतरी आली आणि तसेच मी दिवसभर काम केले. संध्याकाळी डॉ. सुभाषिनीने सर्वांसाठी पाच-पाच रूपयांची नमकीनची पॅकेट्स मागवून घेतली. त्यातले थोडे शेंगदाणे व फरसाण खाऊन जरा तोंडाला चव आली. मी दुपारी जेवत नसल्याने संध्याकाळपर्यंत भूक लागलेली होती. 

संध्याकाळी ७.३५ ला वर आले तर आनंद परत पांघरूण घेऊन कळवळत पडलेला दिसला. मी खाली जाऊन थर्मामिटर आणि pulse oxymeter घेऊन आले. ऑक्सिजन सॅच्युरेशन ठीक होते पण पुन्हा ९९ इतका सौम्य ताप मात्र आलेला होता. मग मी पुन्हा खाली जाऊन, जरा जास्तीच्या पॅरॅसिटॅमॉल गोळ्याही घेऊन आले. 

रात्री सव्वाआठ पर्यंत आम्ही जेवायला गेलो. अरहर दाल, कोबी पुलाव, सोयाचे मुटके घातलेली मिक्स भाजी, दही-बुंदी, आणि गरम फुलके, असे जेवण आम्ही संपवत आणले होते, तेवढ्यात आचाऱ्याने गरम शिरा आणून ठेवला. मग तो शिराही थोडाथोडा खाल्ला. आनंदला रात्री पॅरॅसिटॅमॉलची गोळीही दिली. 

उद्याचा दिवस काय-काय नवीन अनुभव देणार असा विचार करता-करता केंव्हातरी झोप लागून गेली... 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट  

३ टिप्पण्या:

  1. काही वेळा खूपच गमतीशीर अनुभव येतात नाही? मात्र त्या त्या वेळेला प्रसंगावधान राखावं लागतं.
    - विठ्ठल

    उत्तर द्याहटवा
  2. मॅडम , माफ करा पण इतक्या उंच भागात गेल्यावर आपण acclimatisation न करता लगेचच इतके काम कसे केलेत? आपले पती लष्करात होते. त्यान देखील mountain sickness माहीत असेल. कमी वेळ असल्याने लगेचच कामात झोकुन दिलेत का?
    कर्नल साहेबांकडुव सैनीकाना कसे acclimatise करतात ते कळेल का?
    बाकी श्रद्धा असल्यावर म्हातारे लोक देखील धाडसी पणात कमी पडत नाहीत.
    वाचायला छान पण प्रत्यक्ष कठीण असेल. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा🙏

    उत्तर द्याहटवा
  3. आम्ही आधी हरिद्वारहून निघून नारायणकोटी इथे एक रात्र मुक्काम केला होता. ते साधारण ४३०० फुट उंचीवर आहे. त्यानंतर जवळपास 22 तासांमध्ये ७४०० फूट उंची चढून आलेलो होतो. त्यामुळे आपोआपच आमचे acclimatization झाले असावे. आम्हाला mountain sickness चा त्रास झाला नाही. मी तिथे काम करायलाच गेले होते आणि तिथे खूप कामही होते, त्यामुळे कामाला झोकून दिले.

    सैनिकांना वेगवेगळ्या उंचीवरच्या ठिकाणी ३ ते ७ दिवसांच्या काळामध्ये acclimatise करतात.

    उत्तर द्याहटवा