शनिवार, २७ जून, २०२०

अखेर मी स्मार्ट झाले!

पाच एक वर्षांपूर्वी मी सँर्टफोन वापरत नव्हते. प्रथम मी जेव्हा स्मार्टफोन विकत घेतला त्यावेळच्या अनुभवावरच हा लेख, प्रसिद्ध करायचा राहून गेला होता.


दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळपर्यंत माझया बर्याच मित्रमंडळींनी 
स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली हायती . त्यामुळे त्या मित्रमंडळींना 'अजूनही स्मार्टफोन शिवाय ही कशी काय जगतेय?' हा प्रश्न सतावत होता. पण, मी स्वतःला स्मार्ट समजत असल्यामुळे, स्मार्टफोन न वापरण्याचा माझा 'पण' मी बरेच दिवस टिकवला. परंतु, माझ्या पेशंटसचे आईवडील वरचेवर मला विचारायला लागले,  "बाळाचे रिपोर्ट, X-ray, बाळाला आलेल्या पुरळाचे फोटो, किंवा 'बाळ कसंसंच करतंय' त्याचा व्हिडीओ WhatsApp वर पाठवू का?".  तेंव्हा मात्र माझ्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे  माझी पंचाईत होऊ लागली होती .  

अशा अनेक मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि  माझ्या लहानग्या पेशंटसच्या आईवडिलांना, "तुम्ही स्मार्ट फोन का वापरत नाही?" या प्रश्नाचे उत्तर देऊन-देऊन शेवटी मी कंटाळले. सुरुवातीला "माझ्याकडे  स्मार्टफोन नाही आणि मला तो वापरताही येत नाही" असं सोपं उत्तर मी देत असे. पण लोकांच्या टोमणेबाजीमुळे ती सोयही राहिली नव्हती. आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मॉडर्न मॉमने एकदा मला ऐटीत ऐकवले होते, "डॉक, मी की नाही, माझ्या बेबीला सांभाळणाऱ्या मेडला एक स्मार्टफोन घेऊन दिलाय. त्यामुळे मी सतत तिच्याशी WhatsApp वर कॉन्टक्टमधे असते. डॉक, ती डंब मेडसुद्धा स्मार्टफोन वापरते तर तुम्ही नक्की वापरू शकाल!"

असे अनेक अपमानास्पद अनुभव झेलून आणि लोकांच्या असंख्य प्रश्नांना कंटाळून मला जरा 'शहाणपण' आले आणि शेवटी एकदाचा मी स्मार्टफोन घ्यायचा निर्णय घेतलाच. लोकाग्रहास्तव फोन घेतेय, त्यामुळे उगीच जास्त खर्च नको, पाच हजाराच्या आतलाच फोन घ्यावा असं मी मनाशी ठरवलं.  हा माझा विचार, मोबाईलच्या दुनियेतील तरबेज भाचरंडांना आणि काही जवळच्या मित्र मंडळींना ऐकवला. तर काय, "पाच हजाराच्या आत कुठे काय बरा फोन येणार आहे का? तसला  स्मार्ट फोन घेणं आणि न घेणं सारखंच आहे"  असं बोलून  त्या सर्वांनी  माझ्या 'बावळटपणावर' शिक्कामोर्तब केलं.

कुणी म्हणालं " कॉलेजला जाणारी लोअर इकोनॉमिक क्लासमधली मुलंसुद्धा हल्ली सात आठ हजाराचे फोन वापरतात. आणि पाच हजारांत अगदीच कमी चॉइस मिळेल, कमीतकमी दहा हजारांचं  बजेट तर हवेच."

मग मी नाईलाजाने माझे बजेट वाढवून दहा हजारापर्यंत नेले.

"फक्त दहा हजाराच्या मोबाईलनं काही खास इम्प्रेशन पडणार नाही. त्यासाठी निदान वीस हजारचा स्मार्टफोन तरी घेचही काही हितचिंतकांची सूचना मात्र मी पूर्णपणे कानाआड केली.

माझ्या वाढीव बजेटमध्ये बसेलसा चांगला स्मार्टफोन शोधू लागल्यावर मात्र मी चांगलीच चक्रावले. दुकानांत त्या रेंजमधली दहा कंपन्यांची शंभर मॉडेल्स होती. त्यातून 'अँड्रॉईड' का 'विंडोझ?', 'जेली बीन' का 'आईस्क्रीम सँडविच', 'सिंगल सिम' का 'ड्युअल सिम', 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'? असले अनेक अगम्य प्रश्न विचारून आणि अनंत पर्याय  देऊन, दुकानदारांनी मला पूर्ण गोंधळात टाकलं. उच्चशिक्षित असूनही यातलं आपल्याला काहीच कळत नाही, हे मला उमगलं. आपल्या  या अज्ञानाचा फारसा गवगवा होऊ नये याची दक्षता घेत आणि  विनासायास  'ready answers' मिळवीत म्हणून मी माझ्या भाचीला फोन लावला.

माझ्या शंकांचे निरसन न करता, "ते सगळं तुझ्या युजवर डिपेंड आहे आणि ते तुलाच ठरवावं लागेल" असे स्मार्ट उत्तर अगदी  तत्परतेने तिने देऊन टाकले! त्यातून वर, "आत्या, अगं मोबाईल घ्यायला दुकानांत कशाला गेलीस? फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वर मॉडेल्सची रेटिंग्स आणि कॉनफ़िगरेशन्स बघायची, काहीऑफर्स मिळत असतील तर घ्यायच्या आणि ऑनलाईन मागवून टाकायचा." असा फुकट सल्ला देऊन मला वेड्यात काढलं ते वेगळंच!

आता मात्र स्वाभिमान जागृत झाल्यामुळे मी पेटून उठले. भाचीने सुचवलेला हा साधा-सोप्पा मार्ग पडताळून बघायचाच असं मी ठरवलं. मग काय विचारता! ऑपरेटिंग सिस्टम्स,प्रोसेसर्स,मॉडेल्स आणि त्यांची रेटिंग्स असे माझे नवीन ऑनलाईन शिक्षण चालू झाले. शेवटी माझ्या वापरासाठी योग्य आणि अगदी 'value for money' अशा मॉडेलचा शोध मला लागला. पण तो इतका दहा हजाराचा फोन ऑनलाईन मागवण्यापूर्वी एकदा आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघावा, हाताळावा, या विचाराने  एक दोन दुकानांत / virtual stores मध्ये  गेलेच .

मी ठरवलेल्या मॉडेलची किंमत प्रत्येक दुकानात, ऑनलाईन मार्केटपेक्षा जवळ-जवळ एक हजार रुपयांनी जास्त होती. साहजिकच 'हे असं कसं?' हा प्रश्न मनांत आलाच. उत्सुकतेपोटी, "हेच मॉडेल ऑनलाईन स्वस्त कसं हो?" हे विचारण्याचा बावळटपणा केलाच. उत्तरादाखल, "भारतात ऑनलाईन मालाचा काय भरवसा? बघा बुवा, इथे असलं करणं काही शहाणपणाचं नाही. कदाचित फसाल बरं का!" असं एक पिल्लू दुकानदाराने सोडून दिलं! 

आता मात्र माझी पंचाईत झाली. फोन दुकानातून घ्यावा का ऑनलाईन घ्यावा, अशी  व्दिधा मनस्थिती असली तरी, ऑनलाईन स्वस्त मिळत असल्यामुळे मन तिकडेच ओढ घेत होते. "फोन ऑनलाईन मागवल्यावर हे असलं काही होणार नाही ना?" असं विचारायला पुन्हा भाचीला गाठले. तर तिने, "मी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मागवते. पण कधीही फसलेले नाही. तू मागवून बघ काय होतय ते!" असे सावध उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतली आणि माझी धाकधूक मात्र अजूनच वाढवली.

योगायोगाने, 'अमेझॉन इंडिया' मध्येच वरच्या हुद्द्यावर काम करणारा माझा एक भाचा त्याच रात्री जेवायला येणार होता. जेवणं झाल्यावर मी, "काही फसवणूक तर होणार नाही ना? दुकानापेक्षा ऑनलाईन स्वस्त कसं? फोन खराब निघाला तर पैसे परत करतात का?" वगैरे माझ्या सगळ्या शंका-कुशंका भाच्याला  धडाधड विचारून टाकल्या.
"मावशी, तसं काहीही होणार नाही, तू निर्धास्त रहा." त्याने अत्यंत हसतमुखपणे मला दिलासा दिला. परंतु, मनातल्या मनात, "आमची अमेझॉन काय अशी चलती-फिरती कंपनी आहे काय? इतकी शिकली आहेस पण काय उपयोग? इतकं कसं कळत नाही? असले प्रश्न पडतातच कसे?" असा, माझी कीव करणारा, विचार त्या हास्यामागे  दडलेला होता की काय, असेही क्षणभर मला वाटून गेले .
इतकी हमी मिळाली तरी ऑनलाईन मागवलेला फोन हातात येईपर्यंत माझ्या अगदी जीवात जीव नव्हता. पैसे तर आधीच कापले गेलेले असल्यामुळे कुठे माशी शिंकायला नको अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. जेमतेम दोन दिवसांत फोन घरपोच येऊन पोहोचलासुद्धा! सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला.

या सगळ्या प्रवासांत स्मार्टफोनबद्दलचे माझे ज्ञान मात्र भलतेच वाढले. त्यामुळेच आताशा कुणी ओळखीचं भेटलं की त्यांना "तुमच्या स्मार्टफोनचा प्रोसेसर कुठला? स्क्रीन ४.७ इंच का ५.५ इंच?" असले प्रश्न मी हटकून विचारते. मधे एका स्मार्ट मुलाला त्याच्या फोनचा प्रोसेसर कुठला आहे असे विचारल्यावर त्याने "सिंगल सिम" असे सांगितले. मी जेंव्हा हसून म्हटलं, "अरे, 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'?", तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळलेला भाव, माझ्या वाढलेल्या 'भावाची' साक्ष पटवून गेला.
माझ्या एका मैत्रिणीने  कौतुकाने मला सांगितले, "मला जेली आवडत नाही ना, म्हणून यांनी त्यांचा 'आईस्क्रीम सँडविच' वाला स्मार्टफोन मला दिला आणि स्वतःसाठी 'जेली बीन' वाला घेतला!" मला मात्र तिच्या अज्ञानावर आणि भाबडेपणावर हसावे का रडावे ते कळेना!
एका प्रथितयश डॉक्टर मित्राने मला सुनावले, "अगं, फोनचा price tag महत्वाचा असतो, प्रोसेसर नाही काही!
या सगळ्यावर कळस म्हणजे ड्युअल सिम handset मध्ये एकाच वेळी दोन सिम कार्ड घालता येतात याचा माझ्या ओळखीतल्या एका सुशिक्षित बाईंना पत्ताच नव्हता!

बऱ्याच लोकांना स्मार्ट दिसण्यासाठी स्मार्टफोनची गरज असते, असं आता माझं मत झालंय. स्मार्टफोन वापरणाऱ्या बराचशा लोकांना, फोन करणे व घेणे, गेम्स खेळणे, सेल्फी काढणे आणि Whatsapp वर चकाट्या पिटणे याव्यतिरिक्त तो अजून कशाकशासाठी वापरता येतो याचा गंधच नसतो. आता हे कळल्यामुळे माझा स्मार्टनेस मात्र कमालीचा वाढलाय हे जाणवते !

सोमवार, २२ जून, २०२०

'व्हॅन'टढॅण !

१९९२च्या डिसेंबर महिन्यामध्ये, प्रथमच आनंद, मी आणि मुले एकत्र असे अलाहाबादला रहायला लागलो. सुरुवातीला काही दिवस आम्ही आमच्या स्कूटरवर फिरायचो. पण नंतर आम्ही मोठ्या हौसेने नेव्ही ब्लू रंगाची नवीकोरी मारुती 'ऑम्नी' व्हॅन घेतली. ती व्हॅन आम्हाला फारच आवडायची. पुढे बॉनेट नसल्यामुळे, ती चालवताना सगळ्या रस्त्यावर अधिराज्य असल्यासारखे वाटायचे. आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही, पण त्यावेळी पैसे भरल्यानंतर, व्हॅन मिळेपर्यंत गिऱ्हाईकांना निदान दोन-चार महिने वाट बघावी लागायची. काही उतावळे लोक जास्तीचे पैसे (On Money) देऊन मारुती व्हॅन घ्यायचे. आम्ही ती व्हॅन आर्मीच्या कॅन्टीन मार्फत विकत घेतल्यामुळे आम्हाला ती बाजार भावापेक्षा दहा-बारा हजार रुपयांनी स्वस्तच मिळाली होती. आम्ही व्हॅन विकत घेतली आणि त्यानंतर जवळजवळ लगेच  मारुती कंपनीने व्हॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. 

आम्ही ती व्हॅन बरीच वापरली. मुले लहान असल्यामुळे उंच सीटवर बसून त्यांना बाहेर बघायला मजा वाटायची. अलाहाबादला आमच्याकडे नातेवाईकांचा सारखा राबता असायचा. अनेक वेळा सात-आठ जण दाटीवाटीने बसून, खाण्यापिण्याचे सामान बरोबर घेऊन आम्ही वाराणसी, लखनौ, फैजाबाद-अयोध्या, चित्रकूट-खजुराहो असे अनेक दौरे केले. त्याकाळी गाडीच्या मॉडेलला, किंवा गाडी किती सीटर आहे या गोष्टीला, फारसे महत्त्व नसायचे. त्यावरून तुमची 'किंमत'ही ठरवली जात नसे. मुख्य म्हणजे गाडी कितीही सीटर का असेना, कुरकुर न करता भरपूर लोक त्यात बसून आनंदात फिरायचे. हल्ली आपले सर्वांचे राहणीमान उंचावले आहे, पण कदाचित मनोवृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे, काहींना चार सीटर गाडीमध्ये पाचव्या व्यक्तीची, अगदी  एखाद्या लहान मुलाची सुद्धा अडचण वाटते. 

१९९५ सालच्या मे महिन्यापासून मुलांना घेऊन मी पुण्याला राहू लागले. आनंद एकटाच अलाहाबादेत राहणार असल्याने त्याला गाडीची गरज उरली नाही. म्हणून, ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीच्या सुट्टीत मी मुलांना घेऊन अलाहाबादला आले असताना आम्ही ती गाडी विकायचे ठरवले. दिवाळी संपल्या-संपल्या, "आर्मी ऑफिसरची एकहाती वापरलेली गाडी विकणे आहे" अशी जाहिरात अलाहाबादच्या स्थानिक वर्तमानपत्रांमधून आम्ही दिली. जाहिरात छापून आली त्याच दिवशी आमच्याकडे इच्छुक गिऱ्हाईकांची अक्षरश: रांग लागली. दिवसभर येत राहिलेल्या अनेक गिऱ्हाईकांना गाडी व गाडीची कागदपत्रे दाखवणे, किंमतीबद्दल घासाघीस करणे हे करून मी, आनंद आणि आनंदचा सहायक, तिघेही अगदी दमून गेलो. त्यातल्या बऱ्याच जणांनी, ही व्हॅन इतर कोणालाही देऊ नका, आम्हीच घेणार आहोत असे सांगितले असले तरीही पैसे कोणीही दिलेले नव्हते. अलाहाबादला बरीच फसवेगिरी आणि गुंडगिरीही असल्यामुळे, एक रकमी पूर्ण पैसे दिल्याशिवाय गाडी विकणार नाही, असे आम्ही निक्षून सांगितलेले होते. 

त्या संध्याकाळी आमच्याकडे आनंदचे दोन आर्मी ऑफिसर मित्र, त्यांच्या बायका-मुलांसह आले होते. आम्ही खात-पीत व गप्पा मारत बसलो होतो. सकाळी येऊन गेलेल्या इच्छुक लोकांपैकी एकजण पुन्हा येऊन आमच्या दारावर धडकला. आनंदने त्याच्याशी बोलणी सुरु केली. तितक्यात, सकाळी गाडी पाहून गेलेला दुसरा एकजणदेखील आला. त्या माणसाला मी दुसऱ्या एका खोलीत नेऊन बसवले आणि आनंदच्या मित्रांनी त्याच्याशी बोलणी चालू केली. आमचे आर्मी क्वार्टर, खूपच मोठे म्हणजे जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फुटाचे होते. ते दोघे खरेदीदार जरी वेगवेगळ्या खोलीत बसलेले असले तरीही, दुसरा एक ग्राहकदेखील येऊन बोलणी करीत आहे याची त्या दोघांनाही पूर्ण कल्पना होती. दोघेही थोडे पैसे घेऊन आलेले होते आणि उरलेले पैसे उद्या आणून देऊन गाडी घेऊन जाऊ असे म्हणत होते. त्या दोघांनाही ती गाडी हवी असल्यामुळे ते दोघेही किंमत वाढवत गेले. हा अगदीच नाट्यमय प्रसंग होता. एकाच वेळी दोन गिऱ्हाईक आल्यामुळे आम्हाला घासाघीस करायला भरपूर वाव होता. मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फेऱ्या मारून कोण जास्त किंमत द्यायला तयार आहे याचा अंदाज घेत होते. असे करता-करता शेवटी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत द्यायला ते दोघेही तयार झाले. हे सगळे नाट्य संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते. शेवटी, जो कोणी ठरलेली संपूर्ण रक्कम आधी आणून देईल, त्याला आम्ही गाडी देऊ असे सांगून त्या दोघांचीही आम्ही बोळवण केली. त्यानंतर आम्ही पुन्हा मित्र परिवाराबरोबर गप्पा-गोष्टी करण्यात गुंगून गेलो. 

खरी गंमत तर पुढे झाली. आमची जेवणे उरकल्यानंतर साधारण रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास, आनंदचे मित्र घरी परतायला निघाले होते. तितक्यात त्या दोन इच्छुक खरेदीदारांपैकी एकजण परत आला आणि त्याने नोटांच्या पुडक्याने भरलेली पिशवीच समोर काढून ठेवली. सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे "ठरलेली सर्व रक्कम मी आज देऊन जातो, गाडी तुम्ही मला उद्या द्या" असेही तो म्हणू लागला. त्यामुळे आम्ही अजूनच बुचकळ्यात पडलो. आमच्याच सांगण्यानुसार तो पैसे घेऊन तातडीने हजर झाला होता. आता त्याला परत तरी कसे पाठवायचे? एकीकडे हा प्रश्न आमच्यापुढे होता. तर दुसरीकडे, इतकी मोठी रक्कम आणि विकलेली गाडी दोन्हीही आमच्याकडेच ठेवून जाण्यामागे, या माणसाचा काही विपरीत हेतू तर नसेल ना? अशा शंकेने आम्हाला घेरले होते. हे चोरीचे पैसे तर नसतील ना? तसे असले तर काय होईल ? किंवा या पैशांसाठी रात्रीतून आमच्यावर कोणी हल्ला केला तर काय? अनेक शंका आमच्या मनात येऊ लागल्या. पण तो अपरिचित इसम मात्र, "तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे घ्याच, पण कुठल्याही परिस्थितीत ही गाडी मलाच विका" असे म्हणत हटूनच बसला. आम्ही मात्र चांगलेच अडचणीत पडलो. "तुम्ही उद्या सकाळी रक्कम घेऊन या, आम्ही उद्या तुम्हालाच गाडी देऊ, इतर कोणालाही विकणार नाही" असेही आम्ही त्या माणसाला सांगून पहिले. पण तो इसम काही केल्या ऐकेना. आत्ता रात्री या रक्कमेची पावती देणे आम्हाला शक्य होणार नाही, अशी लंगडी सबब पुढे केली. तरीही तो ऐकायला तयार होईना. शेवटी मी व आनंद आणि त्याच्या आर्मी ऑफिसर मित्रांनी मिळून चर्चा केली, आणि ते पैसे व गाडी दोन्ही आमच्याकडेच ठेवून घेऊन त्या माणसाशी सौदा पक्का करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या अर्ध्या तासात आनंदने आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून ती सगळी रक्कम मोजून घेतली. पैशाची कच्ची पावती घेऊन, पण  खरेदी केलेली गाडी मात्र न घेता तो माणूस रात्री दहानंतर परत गेला. त्या रात्रभर मी आणि आनंद काळजीने नीट झोपूही शकलो नाही.  

दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तो खरेदीदार एका स्टॅम्पपेपरवर खरेदीखताचा मसुदा टाईप करूनच घेऊन आला. त्यावर त्याने व आनंदने सह्या केल्या, साक्षीदार म्हणून आनंदच्या दोन्ही मित्रांनी सह्या केल्या आणि तो व्यवहार प्रत्यक्षात पूर्ण झाला. स्वतःला गाडी चालवता येत नसल्याने ती गाडी तो आदल्या रात्री घेऊन गेला नव्हता हा खुलासा त्याने तेंव्हा केला! सकाळी येताना मात्र, गाडी चालवता येत असलेल्या कोणालातरी बरोबर घेऊन तो आला होता. गाडी व कागदपत्रे त्याने ताब्यात घेतली आणि चालकाच्या शेजारी बसून, मोठ्या समाधानाने आणि विजयी मुद्रेने तो निघून गेला. दीड लाखात ऑन-रोड घेतलेली, दोन वर्षे मनसोक्त वापरून झालेली ती व्हॅन आम्ही एक लाख सदुसष्ट हजाराला विकल्यामुळे आम्हीही भलतेच खुषीत होतो. आनंदने तातडीने जाऊन ती रक्कम बँकेत भरून टाकली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.     

रविवार, ३१ मे, २०२०

अनलॉक-१.0

आज मे महिना संपला. मे महिन्याच्या आपल्या सगळ्यांच्या काही विशेष आठवणी असतात. मे महिना आला की मला सगळ्यात आधी आठवण येते ती बाबांची, म्हणजे माझ्या सासऱ्यांची. परिवारातील सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस बाबा आवर्जून लक्षात ठेवायचे. त्या-त्या तारखेला त्या व्यक्तींना फोन करून ते हमखास शुभेच्छा द्यायचेच. मे महिन्यात त्यांच्या सहा नातवंडांपैकी तीन नातवंडांचे वाढदिवस असल्यामुळे, मेच्या सुरुवातीपासूनच, अमुक तारखेला याचा वाढदिवस, तमुक तारखेला हिचा वाढदिवस, या तारखेला अमक्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्या तारखेला तमक्याची मुंज झाली होती, असे तपशील ते वरचेवर घोकत राहायचे. नातवंडांसाठी, स्वहस्ते एक छानसे ग्रीटिंग करायचे. त्या  ग्रीटिंगच्या वरच्या कोपऱ्यात त्यांचे एक 'ट्रेडमार्क' फूल काढलेले असायचे. माझ्या मुलाचा, अनिरुद्धचा वाढदिवस मे महिन्यातला. तो भारताबाहेर शिकायला गेल्यानंतर दर वर्षी, जवळजवळ १ मेच्या सुमारासच बाबा त्याचा पत्ता आमच्याकडून कन्फर्म करून घ्यायचे आणि त्याला ग्रीटिंग करून पाठवायचे. दरवर्षी, बाबांनी घोकलेल्या तारखा आणि वाढदिवसाचे तपशील ऐकून घरातल्या सगळ्यांना मे मधले वाढदिवस लक्षात राहिले आहेत. मे महिन्यात बाबांचा एक वाढदिवस असायचा. प्रत्यक्षात त्यांचा जन्म जुलै महिन्यातला. पण त्यांना शाळेत घालताना कुणीतरी अंदाजे ३० मे अशी तारीख लावून टाकली होती. त्यांचे हे दोनही वाढदिवस साजरे केलेले त्यांना आवडायचे.

मे महिन्यातल्या लहानपणीच्या तर अनंत आठवणी आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आते-मामे-चुलत-मावस भावंडांसोबत घातलेला धिंगाणा आठवला की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. एकत्र जमलेल्या सगळ्या बाळगोपाळांना खेळण्यासाठी भरपूर जागा आणि वाट्टेल ते करायची मुभा माझ्या माहेरच्या मोठ्या वाड्यात होती. घरात एका खोलीत, रायवळ आंब्याची आढी लावलेली असायची. आम्ही मनसोक्त आंबे चोखायचो. दुपारच्या जेवणात रोज आमरस असायचाच. काका किंवा वडील, मंडईतून आमरसासाठी वेगळे आंबे आणायचे. आणलेले आंबे बादलीत बुडवून ठेवायचे. आंबे पिळणे, मोठ्ठे पातेले भरून रस काढणे, आंब्यांच्या कोयी चोखणे हे कार्यक्रम झाले की दुपारची जेवणे व्हायची. डायटींग, कॅलरीज, कोलेस्टेरॉल वगैरे शब्द त्यावेळी आमच्या किंवा घरातल्या कोणा मोठ्यांच्याही शब्दकोशात नव्हते. त्यामुळे आम्ही अगदी पोट फुटेस्तोवर जेवायचो. घरातल्या मुलांच्या पांढऱ्या छाटणींवर आणि मुलींच्या पांढऱ्या पेटीकोटवर आंब्यांमुळे केशरी नक्षी उमटायची. दुपारभर सगळे मिळून, पत्त्यांचे डाव, व्यापार किंवा कॅरम खेळायचो. संध्याकाळी अंगणात आणि गच्चीवर पाणी मारायचो. रात्री सगळी भावंडे गच्चीत झोपायचो. एकमेकांना भुताटकीच्या गोष्टी सांगायचो. एखाद्या संध्याकाळी, घरच्याघरी पॉटमध्ये आईस्क्रीम करायचा बेत असायचा. त्या 'फॅमिली आईस्क्रीम पार्टी'ची सर आजच्या कुठल्याही 'फॅमिली पॅक'ला येत नाही. पुढच्या पिढीतल्या मुलांना इतकी भावंडे नसतील, आणि असलेली भावंडे सर्रास एकत्र येण्याची शक्यताही कमीच असणार आहे. त्या बिचाऱ्यांना आम्ही चाखली ती मजा कुठून मिळणार? 

माझी मुले शाळेत जायला लागल्यावर, मे महिन्यात त्या दोघांच्या इंग्रजी शाळेत, दोन वेगवेगळ्या तारखांना सगळी वह्यापुस्तके मिळायची. ती आणायला शाळेत मला जावे लागायचे. ती ढीगभर वह्यापुस्तके आणणे, त्यांना कव्हर्स घालणे, त्यावर नावे लिहिणे हा कार्यक्रम चालायचा. माझ्या मुलांच्या सुदैवाने, त्यांच्या लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत त्यांच्यासोबत खेळायला त्यांची दोन मामे  भावंडे तरी होती. त्या चौघांना वॉटर पार्कला नेणे, समर कॅम्पला पाठवणे, त्यांच्यासाठी नवनवीन पदार्थ करणे किंवा त्यांची भांडणे सोडवणे, असे उद्योग मला असायचे. पण माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळे, रविवार सोडला तर इतर कुठल्याही दिवशी मला सुट्टी नसायची. त्यामुळे त्यांच्यासोबत मजा करायला मला निवांत वेळ कधीच मिळाला नाही, याचे वाईट वाटतेच. पुढे मुले मोठी झाली. ऑलिम्पियाड सारख्या  मानाच्या परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवून देशपातळीवर होणाऱ्या शिबिरांमध्ये त्यांची निवड होत राहिली. त्यामुळे मे महिन्यांत, त्या शिबिरांसाठी त्यांना मुंबईला सोडणे-आणणे हे एक सुखद व्यवधान असायचे. मे महिना संपताना या शिबिरांचा शेवट यायचा. भारताच्या संघात आपल्या मुलांची निवड होते की नाही, याची हुरहूर लागलेली असायची. शिबिरांच्या सांगतासमारंभांना हजर राहून मुलांना घरी परत आणायला मी जायचे. एखाद्यावर्षी, भारतीय संघात मुलांची निवड झाली नाही तरीही त्यांना हिरमुसले होऊ न देणे हे मोठे नाजूक काम असायचे. शिबिरासाठी भारताच्या वेगवेगळ्या शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी गप्पा मारण्यात, माहितीची देवाण-घेवाण करण्यात, मे महिना कधी संपून जायचा ते कळायचेच नाही. पुढे मुले परदेशी गेल्यावर जून-जुलै मध्ये सुट्टीवर येऊ घातलेल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसण्यात मे महिना निघून जायचा.  यंदाचा मे महिना मात्र अगदीच विचित्र अवस्थेत 'लॉकडाऊन' मध्ये  गेला. माझ्या आईच्या मृत्यूच्या दुःखाचे आणि करोनाच्या भीतीचे सावट तर होतेच. 

आज पहाटे फिरायला गेले तेव्हाही तेच विचार माझ्या मनाला अस्वस्थ करत होते. पण अचानकच, रोजच्या पाहण्यातल्या एका बंगल्याच्या आवारात, एक 'मे-फ्लॉवर' फुललेले दिसले. कालपर्यंत ते दिसले नव्हते. अनेक छोट्या-छोट्या नाजूक फुलांनी बनलेले, ते लालचुटुक गोलाकार फूल बघून माझे मन प्रसन्न झाले. गेल्या अनेक वर्षांच्या मे महिन्याच्या आठवणी मनातल्या मनात फुलून आल्या आणि माझ्या मनाचाही 'अनलॉक-१.०' चालू झाल्याचे मला जाणवले.   




शनिवार, ३० मे, २०२०

माझा रेसकोर्सचा नाद !


लहानपणापासून मला पहाटे लवकर उठायची सवय आहे. पहाटेच्या शांत, थंड आणि शुद्ध हवेमधे गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायला मला फार आवडते. माहेरी, माझी आजी, भल्या पहाटे उठायची व दूध न घालता काळी कॉफी प्यायची. 
आज्जीच्या हातचा चहा विशेष चांगला व्हायचा. बरेचदा, मी आजीला माझ्यासाठी चहा करण्याची गळ घालायचे.  एकीकडे तिची कॉफी करत दुसरीकडे ती मला चहा करून द्यायची. मी मेडिकलचे शेवटचे एक वर्ष माझ्या मोठ्या काकांच्या, अप्पांच्या बंगल्यावर राहिले. तिथे मी आणि काका पहाटे उठून चहा प्यायचो व नंतर मी अभ्यासाला बसायचे. इंटर्नशिपपासून मात्र या सकाळच्या चहानंतर व्यायामासाठी बाहेर पडायची सवय मला लागली. भल्या पहाटे घराबाहेर पडून व्यायाम करण्यासाठी माझे शरीर आणि मन आसुसलेले असते. 

माझ्या लग्नानंतरही आजतागायत व्यायामाची सवय आहेच. आनंद आर्मीच्या नोकरीत असेपर्यंत त्याला पहाटे उठणे बंधनकारक होते. त्यामुळे आम्ही पहाटेचा चहा एकत्र घ्यायचो. त्यानंतर तो आर्मीच्या पीटी परेडला व मी माझ्या व्यायामाला, असे बाहेर पडायचो. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी मी पुण्यात राहिल्यामुळे बराच काळ आम्ही वेगवेगळे राहिलो.  १९९७ सालापासून आम्ही मुख्य पुणे कँटोन्मेंटमधे, म्हणजे सदर्न कमांड हेडक्वार्टरच्या जवळ, आर्मीच्या क्वार्टर्समध्ये राहायला आलो. आनंद त्याच्या बदलीच्या ठिकाणाहून पुण्याला येऊन-जाऊन असायचा. पुढे २००७ साली आनंदने सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आम्ही कँटोन्मेंटच्या हद्दीलगतच असलेल्या आमच्या सध्याच्या घरात राहू लागलो.  त्यामुळे आजही आम्ही पुणे कँटोन्मेंटमधे राहात असल्यासारखे वाटते. आनंदने सेवानिवृत्तीनंतर हळूहळू पहाटे उठणे बंद केले. पण मी मात्र माझ्या सवयीप्रमाणे पहाटे उठते, चहा घेते आणि मोठ्या उत्साहाने एकटीच व्यायामाला बाहेर पडते. अर्थात हे रोज जमतेच असे नाही. पण रोज जाण्याचा माझा प्रयत्न असतो. 

मला रेसचा जरी नसला तरीही पहाटे पुणे रेसकोर्सवर फिरायला जाण्याचे व्यसन १९९७-९८ सालापासून लागले. रेसकोर्सच्या मध्यावर एक वर्तुळाकार मैदान आहे. तिथे घोड्यांचे प्रशिक्षण चालते. त्या मैदानाच्या परिघाभोवती चालण्यासाठी २ किलोमीटर लांबीचा, एक साधारण लंबवर्तुळाकार वॉकिंग ट्रॅक आहे. त्या चालण्याच्या ट्रॅकच्या परिघाभोवती घोड्यांचा पळण्याचा ट्रॅक आहे. बाहेरच्या ट्रॅकवर दौडणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत, वेगात धावणाऱ्या घोडयांना बघत, रेसकोर्सवर चालण्यात किंवा पळण्यात मला कमालीची नशा वाटते. कधीकधी जवानांची एखादी तुकडी सकाळच्या पीटी परेडला तिथे येते. मग काय, घोड्यांच्या टापांच्या आवाजाबरोबरच, पळणाऱ्या सैनिकांच्या बुटांचा आवाजही येतो आणि रेसकोर्सवरचे वातावरण अजूनच नशिले होते.  आठ-नऊ वर्षांपूर्वीपर्यंत, घरातून  पहाटे ५-५.३० च्या सुमाराला निघून, रेसकोर्सपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर चालत मी सहाच्या आत रेसकोर्सवर हजर असायचे. चार-पाच फेऱ्या जॉगिंग करायचे. पण व्यायामाच्या व्यसनापेक्षा, माझे खादाडीचे व्यसन जास्त प्रबळ असल्याने, माझे वजन वाढत गेले. त्यामुळे जॉगिंगपेक्षा आता सायकलिंगवर भर आहे. पहाटे दहा बारा किलोमीटर सायकलिंग करून नंतर मग रेसकोर्सवरच्या ट्रॅकवर चालत एखादी फेरी मारते. 

रेसकोर्सवर फिरण्यामधे, मला नेमकी कशाची नशा जास्त येते हे सांगणे तसे अवघड आहे. सर्व बाजूने गोलाकार दिसणारे आकाश, आणि थंडगार वारे मनाला भुरळ घालतातच. पण अठरापगड जातींचे, धर्मांचे, लहान मुलांपासून अगदी जख्खड म्हातारे, वेगवेगळ्या वेशभूषा केलेले, विविध नोकऱ्या वा व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले स्त्री-पुरुष मला तिथे दिसतात. फिरत असताना या सर्व व्यक्तींचे बोलणे अर्धवटच माझ्या कानावर पडत असते. ते ऐकण्याचा आणि त्या व्यक्तीबद्दल मनातल्या मनात काही आडाखे बांधण्याचाही मला नाद आहे. त्यातल्या कांहींशीच माझी ओळख आणि काहींशी विशेष मैत्री झालेली आहे. पण अनेक व्यक्तींचे नाव मला किंवा माझे नाव त्यांना माहिती नाही. तरीही आमची "अबोल मैत्री" आहे. रोज ठराविक वेळी दिसणारी व्यक्ती दिसली नाही की मला अगदी चुकल्या-चुकल्यासारखे होते. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी दिसली की अगदी हायसे वाटते. जसे मला वाटते अगदी तसेच त्यांनाही वाटत असणार याची मला खात्री आहे. त्यातली एखादी व्यक्ती इतर वेळी बाहेर कुठे भेटली तर आम्ही अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे, सलगीने बोलायला लागू, असे वाटते. पण या सर्व गोष्टींपेक्षाही रेसकोर्सच्या वातावरणात ऐकू येत असलेल्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाच्या नादात, माझ्या मनाला, एखाद्या अबलख वारूसारखे उधळू द्यायला मला फार आवडते. 

सध्या लॉकडाऊनमुळे रेसकोर्स बंद आहे. मी रोज पहाटे पाच-साडेपाचला उठून एम्प्रेस गार्डनच्या मागच्या भागात, व्हिक्टोरिया रोड, नेहरू रोड , अलेक्झांडर रोड, या भागात सायकलस्वारीला जाते. अतिशय शांत, दुतर्फा झाडी असलेला, अनेकविध पक्षांच्या आवाजाने संगीतमय झालेला, वेगवेगळ्या जातींच्या आणि रंगांच्या फुलांनी सजलेला, ब्रिटिशकालीन प्रशस्त बंगले असलेला, हा अतिशय सुंदर परिसर आहे. तिथे फोर्ट कॉम्प्लेक्सच्या आसपास अनेक मोर मला रोज दिसतात. ते मोर पाहून मनी मोर नाचण्याचा, सध्या मी रोज अनुभव घेतेय. पण या सगळ्या रम्य वातावरणात, माझ्या मनाला बेलगाम उधळू देण्याची किमया करणाऱ्या रेसकोर्सची नशा मात्र नाही. त्यामुळेच कधी एकदा हा लॉकडाऊन संपतोय आणि रेसकोर्स चालू होतंय याचीच  मी आतुरतेने वाट बघतेय.

शनिवार, २३ मे, २०२०

"आईने केलेले" डिंकाचे लाडू!

माझ्या मुलीला, असिलताला दिवस गेल्याचे माझ्या आईला कळल्यावर ती खूपच आनंदली होती. पण बाळंतपणासाठी मी काहीच तयारी करत नाहीये, हे बघून ती अस्वस्थ झाली होती. जवळच्या कोणालाही दिवस गेल्याचे कळले, की तिची तयारी सुरु व्हायची. स्वेटर विणायला घेणे, रंगीत तुकडे जोडून सुंदर दुपटी शिवणे, उबदार कापड आणून त्याच्या बंड्या शिवणे, जुन्या मऊ साडया एकावर एक जोडून सुंदर गोधड्या शिवणे, अशी जय्यत तयारी ती हळूहळू करत असायची. त्यामुळे बाळ व्हायच्या आधी छानसा बाळंतविडा  तयार असायचा. बाळ जन्मले की बाळंतिणीसाठी डिंकाचे आणि अळिवाचे लाडू, खसखसीच्या वड्या, बदामाची खीर, शिरा असे अनेक पदार्थ करण्यात ती पुढे असायची. बरेच येणे-जाणे असलेल्या तिच्या मोठ्या घरातल्या कामाचा धबडगा सांभाळत, हे सगळेदेखील ती अगदी हौसेने करायची हे विशेष! 

२०१९ च्या मे  महिन्यात आई पुण्याला आलेली होती. आपण पणजी होणार याचा आनंद असला तरीही तिला स्वतःला हे काहीच करणे शक्य नव्हते. पण मी बाळंतविडा करणे अत्यावश्यक आहे, असा तिचा आग्रह होता. एकीकडे आईने हा धोशा लावला होता, तर दुसरीकडे, आईची तब्येत अगदी नाजूक असताना तिला मागे सोडून बाळंतपणासाठी, इतक्या लांब मी येऊच नये, असे असिलता म्हणत होती. पण मला जायची इच्छा होती. मधला मार्ग म्हणून, थोड्या काळासाठी का होईना, मी ऑस्ट्रेलियाला जायचे ठरवले. असिलता आणि आमचा जावई आनंद, या दोघांनी, त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी बरीच तयारी केलेली होती. तसेच, असिलताच्या सासूबाईंनी बरेच कपडे आणून दिले होते. त्यामुळे, बाळंतविडा करण्यात मी वेळ घालवू नये, असेही असिलताने मला सांगितले होते. तरी असिलताशी बोलून, तिला लागणाऱ्या काही गोष्टींचा मी अंदाज घेतला होता. त्यानुसार, जुन्या सुती साड्या आणि ओढण्या वापरून दोन-तीन दुपटी आणि गोधड्या मी शिवल्या, काही लंगोट विकत आणले. बाळंतविडा करण्यासाठी मी काहीतरी हालचाल करते आहे  हे बघून आई जरा शांत झाली. 

जून महिन्यात माझे आई-वडील पुण्याहून सोलापूरला त्यांच्या घरी परत गेले. ऑस्ट्रेलियाला जाण्याआधीचा दीड महिना सोलापूरला अनेक चकरा मारून मी आईची औषधे, मोलकरणी वगैरे व्यवस्था लावून दिली. तरीही आईच्या काळजीने माझी घालमेल होत होती. तर, बाळंतिणीसाठी मी डिंकाचे लाडू करणार नाहीये, हे समजल्यामुळे आईचा जीव कासावीस होत होता. पूर्वीपासून अनेक वर्षे, माझ्याकडेही आई वेगवेगळे लाडू करून पाठवीत असायची. पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे मी जी सदासर्वकाळ गर्भारशी असल्यासारखी दिसते, त्यासाठी आई व तिचे लाडूच जबाबदार आहेत, असे मी गमतीने नेहमी म्हणायचे. त्यामुळेच, कुठलेही लाडू आणायचे नाहीत, अशी तंबी असिलताने मला दिलेली होती. मलाही डिंकाचे लाडू करण्याची खास इच्छा नव्हती. जुलैच्या शेवटाला, जसजशी  माझी जाण्याची तारीख जवळ आली तसे आईने डिंकाच्या लाडवांसाठी लागणारे सामान आणण्यासाठी हट्टच धरला. मी बरीच टाळाटाळ केली. मला करायला येत नाहीत, इथे कशाला घाट घालायचा? मी निघण्यापूर्वी मुंबईत विकत घेईन, तिच्या सासूबाई करणार आहेत, अशी बरीच करणे सांगून बघितली. पण तिने जाम ऐकले नाही. 

"हे बघ, मीच करणार आहे. मी करत असताना तू पाहा आणि शीक. त्यानिमित्ताने शिकशील तरी." 
असे बोलून आईने मला निरुत्तर केले. पण, आईची तब्येत अगदीच तोळामासा झालेली होती. तिला लाडू करणे जमणार नाहीये हे मला दिसत होते. केवळ तिची इच्छा राखण्यासाठी, माझ्या ऑस्ट्रेलियाला जाण्याचा आधीच्या सोलापूर-फेरीत, मी डिंकाच्या लाडवांचे सामान आणून द्यायला तयार झाले. तीही उत्साहाने गाडीत बसून आमच्याबरोबर सामान आणायला निघाली. कुठल्या तरी पेठेतल्या, तिच्या जुन्या ओळखीच्या एका घाऊक व्यापाऱ्याकडे घेऊन गेली. अमुक झाडाचा डिंक, तमुक प्रकारच्या गोडंब्या असे तिच्या यादीप्रमाणे सगळे सामान घेऊन आम्ही घरी आलो. तोपर्यंत संध्याकाळचे आठ वाजले होते. त्यानंतर एकीकडे तिला जेवायला वाढून, दुसरीकडे ती सांगेल ती व तशी कामे मी करत गेले. काजू-बदामाचे काप करणे, खारकांची पूड करणे, सुके खोबरे किसून भाजून घेणे, गूळ चिरणे, डिंक तळून घेणे, वेलदोड्याची पूड करणे, ही सगळी तयारी करेस्तोवर जवळजवळ रात्रीचे अकरा वाजायला आले. पूर्वतयारी झालेली असल्याने, आता लाडू पाकात टाकणे आणि वळणे एवढेच बाकी होते. पण डिंकाच्या लाडवांसाठी पाक करणे आणि लाडू वळणे ही मोठी कौशल्याची कामे असतात हे मला माहिती होते. त्या दोनही गोष्टी निवांतपणे कराव्यात म्हणून, मी आमची जेवणेही उरकून घेतली होती. 

पाक करायच्या आधी मी आईला म्हणाले, 
"आता या सामानाच्या अंदाजाने किती गूळ घ्यायचा आणि त्याचा पाक किती-तारी आणि कसा करायचा ते सांग."

"अगं, काही नाही. पाक करणं अगदीच सोप्पं असतं. आता ते तू कर. तुला येईल. लाडू मात्र अगदी गरम असतानाच वळावे लागतात बरं का. हात चांगले भाजतात. जरा जपून वळ. आता मला झोप येतेय. मी झोपते." असे म्हणून ती शांतपणे झोपायला निघून गेली !

आईने माझी चांगलीच पंचाईत केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे सोलापूरहून निघून मला पुण्याला परतायचे होते. त्यामुळे ते लाडू वळून झाल्यावर सगळा चिकटलोळ पसारा आवरून झोपणे अनिवार्य होते. पण, "तयार केलेल्या सामग्रीच्या हिशोबाने किती गूळ घ्यायचा आणि लाडवांसाठी पाक कसा करायचा?" हे रात्री अकरा वाजता कोणाला आणि कसं विचारायचं, हा मला प्रश्नच पडला. मग काय, 'रुचिरा' पुस्तक शोधले, यू-ट्यूब बघितले, सर्व साहित्याच्या अंदाजाने गूळ घेतला, आणि देवाचे नाव घेऊन मी पाक तयार केला. सगळे साहित्य पाकात घातले आणि भराभरा लाडू वळले. चांगले पन्नास-साठ लाडू वळून झाल्यावरही अजून बरेच लाडू होणार आहेत हे माझ्या लक्षात आले. तोपर्यंत, किती लाडू होणार आहेत याबद्दल मी माझे डोके वापरलेलेच नव्हते. आईच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, खूप जास्त सामान आणलेले होते आणि भरपूर लाडू तयार होणार होते ! 

सगळी आवरासावर करून, लाडू डब्यांमध्ये भरून, कमालीची दमून मी एक-दीडला झोपले असेंन. पहाटे उठून पुण्याला जाऊन कामाला जुंपून घेणे अशक्य आहे, हे माझ्या लक्षात आल्याने मी पुण्याला परतणे पुढे ढकलले. तो दिवसभर मला चांगलीच दमणूक जाणवत होती. सदैव येणे-जाणे असलेल्या आमच्या त्या मोठ्या घरातली सगळी कामे सांभाळून, इतरांसाठी बाळंतविडे, लाडू आणि इतरही बरेच काही माझी आई कशी काय करत असेल, याचे मला कमालीचे नवल वाटले. आईने तिच्या देखरेखीखाली, माझ्या भाचरंडांसाठी व इतर नातेवाईकांसाठी वेगळे, आणि असिलतासाठी वेगळे, असे डबे मला भरायला लावले. त्याशिवाय नेहमीप्रमाणेच, घरात आल्या-गेलेल्या प्रत्येकाला तिने लाडू खायला दिले. सर्व मोलकरणींबरोबर त्यांच्या पोरा-बाळांसाठी दोन-चार लाडू मला द्यायला लावले. गंमत म्हणजे सगळ्यांना ती मोठ्या आंनदाने आणि अभिमानाने सांगत होती,

"असिलताच्या बाळंतपणासाठी स्वाती ऑस्ट्रेलियाला चालली आहे. डॉक्टर असली तरी स्वातीला काही कळत नाही आणि तिची मुलगीही तसलीच. डिंकाच्या लाडवांशिवाय कुठे काय बाळंतपण होत असते का? माझं ती ऐकतच नव्हती. पण मला करायचेच होते. म्हणून मीच लाडू केले!" 

मी ऑस्ट्रेलियाला गेल्यावर काही दिवसातच आई खूप आजारी पडली. त्यामुळे मी तिकडून जरा लवकरच परतले. "तिने केलेले" डिंकाचे लाडू तिच्या नातीने खाल्ले, हे ऐकल्यावर तिला खूप बरे वाटले. आईचे ते आजारपण जवळजवळ शेवटचे आजारपण ठरले. पण ती जायच्या आधी, तिच्या लाडक्या नातीच्या बाळंतपणासाठी डिंकाचे लाडू करण्याचे समाधान तिला मिळाले, हे एक बरे झाले!      
     

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

बाबांनो वेळ काय सांगून येत नाही!

सध्या संपूर्ण जगावर करोना महामारीचे संकट ओढवले आहे. हातावरचे पोट असलेल्या गरीब लोकांची रोजगाराच्या अभावामुळे उपासमार होत आहे. पण सुखवस्तू मध्यमवर्गावरही याचा परिणाम झाला आहे. डॉक्टर, वकील, सीए इत्यादी व्यावसायिकांचे उत्त्पन्न बंद झाले आहे. खाजगी नोकरीतील लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. अनेक मध्यमवर्गीय लोकांची चाललेली कुरकुर माझ्या कानावर पडतेय. सोशल मीडियावर आपल्या स्तिथीची रडगाणी लोक गात आहेत. पण माझ्या माहेरच्या आणि सासरच्या वडीलधाऱ्यांनी केलेल्या संस्कारांमुळे या परिस्थितीचा सामना मी मात्र अगदी लीलया करू शकते आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये मी मनोमन त्यांचे आभार मानते आहे.  

माझ्या माहेरच्या एकत्र कुटुंबात उत्तम आर्थिक परिस्थिती असली तरीही आम्हा भावंडांना घरातली छोटी-छोटी कामे करावीच लागायची. त्याकाळीही आमच्या घरात मोटरकार होती. पण ती फक्त काकांना आणि वडिलांना कामाला जाण्यासाठी वापरली जायची. आम्हा मुलांना शाळेत जाताना चालत अथवा बसनेच जावे लागायचे. फोन आणि फ्रीज  या वस्तूंना हात लावायची आम्हा लहानमुलांना मनाई होती. "शिकून मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वकमाईने या वस्तू घ्या आणि मग वापरायला लागा", असे सांगितले जायचे. शिसपेन्सिलीचा तुकडा बोटांमध्ये धरणे अशक्य होईपर्यंत नवीन शिसपेन्सिल मिळत नसे. मोठ्या भावंडांची जुनी पुस्तके, दप्तरे,गणवेश व इतर कपडे लहानभावंडे वापरायची. त्यावेळी या असल्या शिस्तीचा खूप राग यायचा. नवीन कपडे, वस्तू यांचे फार अप्रूप वाटायचे.  

घरात सुबत्ता असली तरीही अन्न किंवा कुठलीही वस्तू वाया घालवलेली चालत नसे. पानात वाढलेले संपवावेच लागे. बाहेरून खाद्यपदार्थ आणायची किंवा बाहेर जाऊन खाण्याची मुभा नव्हती. आई-काकू-आजी सतत  स्वयंपाकघरात राबत असायच्या. "कितीही शिकली तरीही बाईला चूल आणि मूल काही चुकत नाही" हे वाक्य मी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही मला ऐकावे लागायचे. कोणीही मला स्वयंपाक करायला शिकवल्याचे आठवत नाही. पण आई-आजीच्या हाताखाली रोज काम करता-करता आपसूक शिकले, हेच खरे. आई-आजीं पैकी कोणी परातीत कणिक मळली की त्या परातीला कणकेचा एक कणही राहायचा नाही. पालेभाजी निवडताना एक पानही कचऱ्यात जाऊ दिले जायचे नाही. ते बघून-बघून मलाही तशीच सवय लागली. रोज सकाळी आजी आदल्या दिवशीचे उरलेले अन्न बाहेर काढून ठेवायची. उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी तरी व्हायची किंवा गूळ-तूप घालून लाडू व्हायचा. शिळ्या भाताला चमचमीत फोडणी देऊन केलेला 'फोडणीचा भात' केंव्हाच फस्त व्हायचा. उरलेल्या भाजी-आमटीचे थालीपीठ लागायचे. एखादेवेळी फारच जास्त अन्न उरले तर ते वेळच्यावेळी मोलकरणींना घरी न्यायला दिले जायचे. 

माझे सासूसासरेही खर्चिक नव्हते. वयाच्या ऐंशी वर्षांनंतरही ते दोघेही स्वावलंबी होते. आपल्या अपत्यांकडून कसलीही आर्थिक मदत न घेता अत्यंत समाधानी आयुष्य जगत होते. आनंद आर्मी ऑफिसर असल्याने  ठराविक मासिक वेतन आमच्या घरात नियमित यायचे. आर्मीमध्ये देखील बऱ्याच ऑफिसरांचे राहणीमान खूप खर्चिक असायचे. उंची दारू, महागडे कपडे आणि दागदागिन्यावर बराच खर्च करणारे ऑफिसर आमच्या अवती-भोवती होते. पण आम्ही दोघांनी मात्र कधीही वायफळ खर्च केलेला आठवत नाही. तसेच आमची घरकामाची सवयही आम्ही कधी मोडली नाही. त्यामुळे आमच्या मुलांनाही तशाच सवयी लागल्या. मुलांच्या इंग्रजी मिडियम शाळांमध्ये गर्भश्रीमंतांची मुले असायची. त्यांची चैन बघून कधीकधी आमच्या मुलांना वैषम्य वाटायचे. पण ऐहिक सुखांच्या मागे लागण्यातला फोलपणा आम्ही दोघेही त्यांना नीट समजावून सांगायचो. त्यामुळेच आमची मुले कष्टाळू, समाधानी व आनंदी झाली आहेत. मुलांमध्ये अशी वृत्ती व स्वावलंबन बाणण्यासाठी त्यांच्यासमोर रोल मॉडेल लागते. माझ्या सासर-माहेरच्या घरातून मला ते मिळाले. त्यामुळेच आमच्या सवयी साध्या राहिल्या आणि आम्हीही मुलांना तसेच घडवू शकलो.      

लहानपणी सणावाराच्या गोष्टींमध्ये, "उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका", हे वाक्य असायचे. त्या गोष्टींमधे घडणाऱ्या चमत्कारांवर माझा कधीही विश्वास बसला नाही. पण  उतणे-मातणे अयोग्य आहे, हे मात्र मनावर बिंबले. "खाऊन माजा पण टाकून माजू नका" अशा वाक्यांमुळे आणि वडिलधाऱ्यांच्या आदर्श वागणुकीमुळे वृत्तीत कधीही माज आला नाही. मागच्या पिढीतल्या वडीलधाऱ्यांच्या इतके साधे जीवन आम्ही निश्चितच जगत नाही आहोत. परंतु, केवळ पैसे आहेत म्हणून विकत घेता येणाऱ्या सर्व सुखांच्या मागेही आम्ही लागलेलो नाही. 

आज करोनाच्या साथीमुळे घरात नोकर-चाकर नाहीत, प्रत्येक काम स्वहस्ते करावे लागते आहे. तरीही आम्हाला काहीही अडचण येत नाहीये. वाट्टेल तो बाजारभाव असेल तरीही भाजी-पाला, दूध व अन्नधान्य विकत घेणे आपल्याला शक्य आहे, याबाबत आम्ही समाधानी आहोत. त्याउलट, चालत जाऊन भाजी आणणे, घर स्वच्छ करणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी सोपी कामेही अनेक सुखवस्तू लोकांना जड जात आहेत. आपल्या नोकरमाणसांचे घर कसे चालत असेल? या काळजीपेक्षा, नोकरांशिवाय आपल्याला आलेल्या पंगुत्वाचे रडगाणे हे लोक गात आहेत. बँकेत भरपूर पैसे असूनही छानछोकीचे जीवन जगता येत नसल्याने, सुस्थितीतल्या  बऱ्याच लोकांची चडफड होत असताना मी पाहते आहे. घरकाम करून वैतागलेल्या, दारू, हॉटेलींग, शॉपिंग, पार्टीज या चैनींशिवाय तडफडणाऱ्या सुखवस्तू, सुशिक्षित मध्यमवर्गीयांची चडफड पाहून-ऐकून, मी अचंबित होतेय. अचानक आलेल्या करोनाच्या या संकटाच्या निमित्ताने का होईना, अश्या लोकांनी साध्या जीवनशैलीचे महत्व लक्षात घ्यावे असे मला वाटते. या वैतागलेल्या लोकांना मला अगदी कळकळीने सांगावेसे वाटते की, "बाबांनो, वेळ काय सांगून येत नाही"    

बुधवार, ११ मार्च, २०२०

विटाळशीची खोली!

माझ्या माहेरचे घर म्हणजे शंभरी गाठायला आलेला भला मोठा वाडा आहे. सोलापुरात मध्यवर्ती भागातल्या नवीपेठेच्या मुख्य रस्त्याच्या आतल्या एका बोळात वाड्याचा पुढचा दरवाजा उघडतो. तर वाड्याचा मागचा दरवाजा भागवत टॉकीजकडून शिंदे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बोळात उघडतो. वाड्याच्या मागच्या बाजूला साधारण बारा-पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंत आहे. त्या जाडजूड भिंतीतच वाड्याचे मागचे दार आहे. त्या दारातून येऊन प्रशस्त अंगण  पार करून आपण आलो की वाड्यातल्या राहत्या खोल्या आहेत. वाड्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या एका खिडकीतून नवीपेठेतल्या मुख्य रस्त्यावरची, आणि मागच्या दारात उभे राहिले की मागच्या रस्त्यावरची रहदारी दिसते. तरीही त्या रस्त्यांवरच्या गजबटाचा त्रास, वाड्यात जाणवत नाही. तसेच वाड्यात आत काय चालले आहे, हे  बाहेरून  कोणालाही समजत नाही.

माझ्या पणजोबांनी १९२५ साली हा वाडा, चुना-मातीने बांधून घेतला होता. त्यानंतर १९७४-७५ साली, पूर्वीचे बांधकाम जुने झाले असल्याने माझ्या वडिलांनी वाड्याच्या मधला बराचसा भाग पाडून तिथे सिमेंट-काँक्रीटचे पक्के बांधकाम करून घेतले. वाड्याच्या दर्शनी भागात, माझ्या पणजोबांच्या काळापासून वापरात असलेली, एक मोठे आणि एक लहान, अशी दोन ऑफिसेस आणि त्यावरची माडी आहे. पणजोबांनी १९२५ साली बांधलेल्या वाड्याचा हा भाग, वाड्याचे नूतनीकरण करताना, न पाडता तसाच ठेवला आहे. वाड्याच्या मागच्या अंगणात उघडणाऱ्या तीन खोल्या आणि त्यावरची माडी, हा भाग माझ्या पणजोबांनी १९२८ साली बांधून घेतला होता. तो जुना भागदेखील आज तसाच आहे. त्या तीन खोल्यांमधली एका कडेची अंधारी खोली, ही 'बाळंतिणीची खोली' आहे. त्या खोलीबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन. पण सांगायचं मुद्दा असा की सध्या अस्तित्वात असलेला वाडा म्हणजे, बाहेरून जुना आणि आत मात्र जुन्या आणि नव्या बांधकामाचा सुंदर मिलाफ असलेला, असा आहे.

वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीलगतच्या एका कोपऱ्यात पूर्वी एक 'विटाळशीची खोली' होती. त्या  खोलीत आतल्या बाजूला एक मोरी होती आणि खोलीत जायला मागच्या अंगणात उघडणारा दरवाजा होता. तीन बाजूंनी उंच भिंती असलेली ती अरुंद, लांबुळकी खोली, लहानपणी मला एखाद्या खोल गुहेसारखी वाटायची. ती खोली म्हणजे आम्हा भावंडांसाठी मोठाच कुतुहलाचा आणि रागाचाही विषय होता. अधून-मधून आई-काकू किंवा पाहुण्या आलेल्या कोणी आत्या-माम्यांना सुध्दा, तीन-चार दिवस शिक्षा मिळाल्यासारखे तिथे का बसावे लागते? याबाबत एकीकडे कमालीचे कुतूहल होते, तर दुसरीकडे, त्या चार दिवसांत आईजवळ जाता येत नाही, याबद्दलचा राग असायचा. आमचं सगळं घर आजीच्या धाकात असायचे. विटाळशीच्या खोलीतल्या बाईजवळ कोणीही जायचे नाही, हा आजीने घालून दिलेला अलिखित नियम होता. तिथे फक्त बायकांना आणि कधीकधीच का बसावे लागते? इतरवेळी कोणालाच त्या खोलीत का जाता येत नाही? असे अनेक प्रश्न मनांत असायचे. पण त्याबाबत कोणालाही काही विचारायची सोय नव्हती. आईला विचारले, तर "तू लहान आहेस, तुला नाही कळायचे, कावळा शिवला की तिकडे बसावे लागते किंवा अगोचरपणा करू नकोस, आजीने सांगितलेले ऐकायचे, उगीच भलते प्रश्न विचारायचे नाहीत," असली उडवाउडवीची उत्तरे मिळायची. आमच्यापैकी कुणीही,  विटाळशीच्या खोलीबद्दलचे प्रश्न फारच लावून धरले, तर पाठीत एक चांगला सणसणीत रट्टा मिळायचा, पण समाधानकारक उत्तर कधीच मिळायचे नाही. जुन्या वाड्याचे नूतनीकरण  करताना, म्हणजे साधारण १९७५-७६ साली ती खोली पाडल्यामुळे वाड्यातून कायमची गायब झाली.

आई किंवा काकू त्या खोलीत गेल्या की आजी त्यांना धान्य निवडणे, भुईमूगाच्या शेंगा फोडणे, किंवा भाजी निवडणे अशी ठराविक कामे द्यायची. तिथे बसलेल्या बाईला जेवणाचे ताट वाढून दिले जायचे. तिच्यासाठी वेगळे तांब्या-भांडे ठेवलेले असायचे. त्या बाईला तिथे आतच असलेल्या मोरीमध्ये अंघोळ करावी लागे, स्वतःचे कपडेही तेथेच धुवावे लागत आणि तिथेच झोपायला लागायचे. इतर वेळी आई स्वयंपाकघरांत सतत कामं करत उभी असायची. त्यामुळे  आमच्याशी गप्पा-गोष्टी करायला, तिला कधी वेळच नसायचा. त्या चार दिवसांत, आई त्या विटाळशीच्या खोलीत निवांत बसलेली बघून तिच्याजवळ जावे, तिच्याशी गप्पा माराव्यात, असे वाटायचे.  तिला बिचारीला आजीने शिक्षा केली आहे किंवा तिच्यावर अन्याय होतो आहे, असे वाटून कधीकधी तिची कीव यायची. कोणीही लहान मूल चुकून जरी त्या  विटाळशीच्या खोलीतल्या बाईकडे गेले, किंवा तिला शिवले, तर त्या भावंडाला आजी लांबूनच पाणी टाकून अंघोळ करायला लावून मगच घरात घ्यायची. चौथ्या दिवशी, आजी मोलकारीणीला सांगून विटाळशीच्या अंगावर, लांबूनच पाणी टाकायची, विटाळशीला डोक्यावरून अंघोळ करायला लावयाची. अशारितीने तिचे शुद्धीकारण झाले, की तिला घरात प्रवेश मिळायचा. आई घरात आली की मला अगदी हुश्श व्हायचे.

जसजशी मी मोठी व्हायला लागले तसतसे हळूहळू आपोआपच त्या खोलीबाबतचे गूढ उलगडायला लागले. आमच्या गल्लीत राहणाऱ्या काही मुली वयात आल्यामुळे, त्यांना मखरात बसवून ठेऊन, मोठे समारंभ व्हायला लागले. काही मैत्रिणी महिन्यातले तीन-चार दिवस अकारणच शाळा बुडवू लागल्या. आई-आत्या-काकू-मावशी-मोठ्या बहिणी किंवा शाळेतल्या काही मैत्रिणींकडून, दबक्या आवाजात मासिक पाळी बाबत थोडीफार माहिती मिळत गेली. आता आपल्यालाही कधीतरी त्या विटाळशीच्या खोलीत बसायला लागणार, या भीतीने मला ग्रासले. त्यामुळे प्रत्यक्षांत मासिक पाळी सुरु व्हायच्या आधीच, माझ्या मनाने बंड पुकारले. काय वाट्टेल ते होवो आपण त्या खोलीत बसायचे नाही, हे मी मनातल्या मनांत पक्के ठरवून टाकले. आणि मला पहिल्यांदाच पाळी येण्याचा, तो दिवस प्रत्यक्षांत उजाडला. आईला माझा निश्चय सांगितला. आईला माझी भूमिकापटत असली तरीही, माझ्या बंडखोरीला ती पाठींबा देऊ शकणार नाही , हे तिने मला स्पष्ट केले. मग मात्र त्या दिवशी, प्रथमच आजीच्या डोळ्याला डोळे भिडवून , मी काहीही झाले तरी  त्या खोलीत बसणार नाही हे निक्षून सांगून टाकले. आजी चिडली असावी , तीन-चार दिवस  बोलली नाही.  पण मग शेवटी, स्वयंपाकघरात आणि देवघरात यायचे नाही या अटींवर, माझा निर्णय तिने नाईलाजाने आणि नाराजीने स्वीकारला.

तुम्हाला असे वाटेल, मी आज हे इतके उघडपणे आणि सविस्तरपणे  लिहण्याचे कारणच  काय?

गेले चार-पाच दिवस माझे डोळे आलेले आहेत. नुकत्याच जीवघेण्या आजारातून बाहेर पडलेली, दोन्ही किडनीज निकामी झाल्यामुळे दर दोन-तीन दिवसाआड डायलिसिस लागणारी माझी वयोवृद्ध आई, सध्या आमच्याबरोबर राहते आहे . माझ्या संसर्गामुळे तिचे डोळे आले तर बिचारीचे अजूनच हाल होतील, या विचारानेच मीच  स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतले आहे. इथे बसून, व्हाटसऍपवर चॅटिंग करता करता किंवा टीव्ही बघता बघता, भाजी निवडणे, लसूण सोलाणे, कपड्यांच्या घड्या घालणे, अशी काही फुटकळ घरकामे  मी सध्या करते आहे. मला इथे आयते ताटं वाढून आणून दिले जाते आहे. या सर्व गोष्टींमुळे मला माझ्या माहेरच्या वाड्यातल्या त्या विटाळशीच्या खोलीची, आई-काकूंच्या त्या दिवसांची आणि मी पुकारलेल्या त्या बंडाची तीव्रतेने आठवण झाली. गम्मत म्हणजे,  योगायोगाने नेमके कालच माझ्या एका मैत्रिणीने, एका तात्विक मुद्द्यावर माझे मत विचारण्यासाठी व्हॅट्सऍपवर एक चॅट पाठवले.

" माझ्या ओळखीतल्या एका मुलीचे लग्न जवळजवळ ठरत आले आहे. स्थळ उत्तम आहे. दोन्ही बाजूने पसंती आहे. पण सासरचे म्हणताहेत की लग्नानंतर मुलीच्या मासिक पाळीच्या काळांत ते तिला स्वयंपाकघरात येऊ देणार नाहीत  आणि  दवपूजाही करू देणार नाहीत. थोड्यावेळासाठी तू असे समज की, तुझ्या मुलीच्या बाबतीत मुला कडच्यांनी अशी अट घातली असती आणि पुढे जायचे की नाही, या बाबतीतला निर्णय सर्वस्वी तुझ्या हातात असता, तर तू काय केले असतेस?"

मी निश्चितच स्पष्टपणे नकार कळवून टाकला असता, असे माझे मत मी मैत्रणीला मी क्षणार्धांत कळवून टाकले. अर्थात लग्नाच्या मुलीला या अटी मान्य आहेत की नाहीत या गोष्टीला मी जास्त महत्व दिले असते, हेही मी तिला लिहले.त्याउपर, आपल्या दोघींच्याही मुलींची लग्नें झालेली असताना ही चर्चा उगीचच  कशासाठी करत बसायची? असे विचारून, तिला चार स्मायली पाठवून, तो विषय तिथेच संपवला. पण प्रत्यक्षांत, इतक्या वर्षांनंतरही विटाळशीच्या खोलीची खोली, अजूनही तशीच आहे , या जाणिवेने माझे मन मात्र  खिन्न झाले.
   

रविवार, ८ मार्च, २०२०

असे मातृत्व दे गा देवा!

माझ्या माहेरी एकत्र कुटुंबात एकाच वेळी आम्ही सख्खी-चुलत मिळून कमीतकमी सात भावंडे असायचो. दिवाळीत किंवा उन्हाळयाच्या सुट्टीत आमची आते-मामे-मावस-चुलतचुलत अशी सर्व  भावंडे आली की आमचा भलामोठा वाडा गजबजून जायचा. आमच्या आयांना आमच्यासाठी किती कष्ट उपसावे लागत होते याची कल्पनाही त्यावेळी मला नव्हती. लग्न झाल्यावर वाटायचे की आपल्याला चांगली चार-पाच मुले होऊ द्यावीत. घर कसे मुलांनी भरलेले असावे. आईपण निभावताना आईला कशाकशातून जावे लागते, हे आई झाल्यावरच कळते. मला मोठी मुलगी आणि नंतर एक मुलगा झाला. पण दुसऱ्या बाळंतपणात मला बराच त्रास झाल्याने दोन अपत्यांवरच थांबावे लागले.

आई आपल्या मुलांवर प्रेम करतेच पण मुलांना शिस्त, संस्कार, बचत, वागणे-बोलणे, स्वच्छता अशा अनेक गोष्टी शिकवते. माझ्या मुलांचे संगोपन करीत असताना, ही जबाबदारी ओझे न वाटता नेहमी सुखदच वाटायची. मला आणखी दोन-तीन मुले असायला पाहिजे होती ही इच्छा सतत मनात असायचीच. मग अधून-मधून भाचरंडे, माझ्या मुलांचे मित्र-मैत्रिणी यांची आई होऊन मी माझी मातृत्वाची तहान तात्पुरती भागवायचे. मला लहान मुले खूपच आवडतात. मागे एकदा जम्मू ते पुणे या संपूर्ण प्रवासात, एका सहप्रवासी जोडप्याच्या दोन-तीन वर्षांच्या गोड मुलीला मी पूर्णवेळ स्वखुशीने सांभाळले होते. त्यावेळी मला मातृत्वाचे सुख भरपूर मिळाले. पण पुणे स्टेशन आल्यावर त्या मुलीने तिच्या आईकडे जायला नकार देऊन माझी आणि त्या जोडप्याचीही चांगलीच पंचाईत केली होती.

माझी आजी तिच्या वयाच्या ९५ व्या वर्षी वारली. आजी गेली तेव्हा माझी आई ७२ वर्षांची आणि वडील ७५ वर्षांचे होते आणि ती दोघेच तिची देखभाल करत होते. आजी जायच्या आदल्या वर्षी माझ्या भाऊ-वहिनीने माझ्या आई-वडिलांना परदेशवारीसाठी नेले. त्यावेळी माझ्या आजीला ते माझ्या घरी सोडून गेले होते. आजीला मी भरवायचे, तिची स्वच्छता, करमणूक, औषधपाणी  सगळे करायचे. त्यावेळेपर्यंत माझ्या आजीला स्मृतीभंश झाला होता. "मी तुझी कोण आहे?" असे विचारले की " तू माझी आई आहेस" असे ती पटकन म्हणायची. मी सुखावून जायचे आणि आजीला आईच्या मायेनेच बघायचे.

आज माझे सासू-सासरे दोघेही हयात नाहीत. माझ्या सासऱ्यांना त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत, मधेच केंव्हातरी आपण आजारी आहोत असे वाटू लागे. घाबरून जाऊन ते  स्वतःचा आहार कमी करीत व मला बोलावून घेत असत. त्यांना तपासून, "तुम्हाला  काहीही झाले नाही. मी नेमून दिलेला आहार  घेतलाच पाहिजे" असा दम त्यांना द्यावा लागे. मग ते  पुन्हा व्यवस्थित जेवू लागायचे. माझ्या सासऱ्यांची आई, ते अगदी लहान असतानाच वारली होती. ते मला त्यांची आईच मानायचे. माझ्या सासूबाई, शेवटचे चार महिने काहीच खात नव्हत्या. त्यातल्या काही काळ त्या माझ्याकडे होत्या. त्यांनी काहीतरी खावे म्हणून मी रोज नवनवीन पदार्थ करायचे. एकदा मी ज्वारीच्या पिठात पालक घालून गरमागरम भीमरोटी करून, ताज्या लोण्याबरोबर त्यांना भरवली. कुठलीही खळखळ न करता त्यांनी ती खाल्ली आणि म्हणाल्या, "तू माझी आई आहेस". माझे दोन्ही भाऊदेखील गंभीर आजारांना तोंड देत असताना मी त्यांची काळजी घेतली होती. त्या वेळेपर्यंत आमची आई स्वतःच ऐंशीच्या घरात असल्याने ती स्वतः त्यांची सेवा करण्यास असमर्थ होती. "तू आम्हाला आईची उणीव भासू दिली नाहीस" असे माझे दोघेही भाऊ मला म्हणत. या सर्वांच्या मातृत्वाचे सुखही मला लाभले आहे .

अर्थात मातृत्वाच्या सुखद अनुभवांबरोबर काही कटू अनुभवही पदरी आहेतच. पोटच्या मुलांनादेखील त्यांच्या कानाला गोड न लागणारा एखादा सल्ला दिला की ती रागाच्या भरात ,"तू माझी आई आहेस का कोण आहेस?" असे चटकन म्हणून जातात. पण मग काही काळाने स्वतःहून जवळ येतात. अनेक वेळा  "माझे आई" असे म्हणून माझा नवरा किंवा माझ्या मित्र-मैत्रिणी, माझा उध्दार करत असतात. त्या-त्या वेळी त्यांच्या बालिशपणाला हसून मी त्यांचे बोलणे कानाआड करते, हे सांगायला नकोच.

नुकतीच माझी आई अनेक महिने हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ होती. गेला सव्वा महिना ती घरी असली तरी तिची पुष्कळ काळजी घ्यावी लागते आहे. त्यामुळे लग्न किंवा इतर समारंभांची बोलावणी आली तरी "आईच्या तब्येतीच्या कारणास्तव आम्ही येऊ शकत नाही", असे कळवावे लागते. त्यावर 'तुम्हाला खूप ताण पडत असेल. तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या", "काही लागले तर सांगा" अशा दिलासा देणाऱ्या प्रतिक्रिया येतात. हॉस्पिटलमध्ये असताना आई बराच काळ ग्लानीतच असल्याने फारशी बोलत नसे. घरी आल्यावर हळूहळू ती सुधारते आहे व थोडी बोलायलाही लागली आहे. "मी तुझी कोण आहे?" असे विचारले की ती म्हणते," तू माझी आई आहेस". केवळ एखाद्याची जन्मदात्रीच त्याची आई होऊ शकते असे नाही. समोरच्या व्यक्तीला तुमच्या वागण्यातले वात्सल्य जाणवले की ती व्यक्ती स्वतःच तुम्हाला मातृत्व बहाल करते. आईविना वाढलेल्या कित्येक मुलांच्या वडिलांना किंवा पोटचे मूल नसलेल्या स्त्रियांनाही मातृत्वाचे हे सुख मिळतच असेल.

गेल्या महिन्यात आनंदच्या एका मित्राच्या मुलीचे लग्न दिल्लीला होते. "सासू आजारी असल्याने आम्ही  येऊ शकत नाही", असे आनंदने त्याला कळवले. त्यावर त्या समंजस मित्राचे आलेले उत्तर वाचून आमचे डोळे पाणावले,

" No problem Anand. We are really fortunate to take care of our elders . Take care of her"

अनेक आप्तेष्टांचे आणि खुद्द स्वतःच्या जन्मदात्रीचे मातृत्व निभावण्याचे भाग्य मला लाभले आहे, याची जाणीव आनंदच्या मित्राने करून दिली.

चटकन एक मागणे मनात आले,
"असे मातृत्व दे गा देवा".

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

निसटलेले क्षण

माझ्या सासूबाई २०१५ च्या डिसेंबरात वारल्या. त्यानंतर माझे सासरे त्यांच्या वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत आणि  त्यांच्या मृत्यूपर्यंत माझ्या नणंदेच्या घरीच वास्तव्यास होते. माझ्या नणंदेला २०१६ च्या नोव्हेंबरात एका लग्नानिमित्त दोन दिवसांसाठी बाहेरगावी जायचे होते. त्यावेळी माझे मामेसासूसासरे पुण्यात येऊन माझ्या सासऱ्यांच्या सोबतीला माझ्या नणंदेच्या घरी राहिले होते. माझ्या मामेसासूसासऱ्यांचे वयही त्यावेळी ऐंशीच्या पुढेच होते. त्या तिघांनीही आमच्या घरी राहावे असे आम्ही उभयतांनी माझ्या सासऱ्यांना सुचवले होते. "एक-दोन दिवसांसाठी जा-ये नको, आम्ही तिघेही येथेच राहू" असे माझे सासरे म्हणाले. म्हणून मग त्यातल्या एका दिवशी नणंदेच्या घरीच जाऊन, स्वयंपाक करून मी त्या तिघांना जेवायला वाढले. दुसऱ्या दिवशी मी कामात व्यस्त असल्याने त्या तिघांना संध्याकाळी आमच्या घरी जेवायला घेऊन आले. 

त्या रात्री, मी माझ्या सासऱ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक केले होते. मी त्यांना आग्रहाने गरम-गरम जेवण वाढले. त्यांनीही मोदक खाऊन, तृप्त होऊन माझे कौतुक केले. जेवण होता-होता रात्रीचे दहा वाजत आले होते. आम्ही सगळेजण मजेत गप्पा मारत बसलो होतो. नणंदेची फ्लाईट अकरा-साडेअकरा पर्यंत पुण्यात पोहोचणार होती. तोपर्यंत त्या तिघांनीही आमच्याच घरी थांबावे, असा आग्रह आम्ही दोघे करीत होतो. पण माझे सासरे दमले होते. घरी जाऊन झोपतो म्हणाले. ते अगदी दारात असताना मी त्यांना म्हणाले, "बाबा, जरा आत येता का? आपण आपला सगळ्यांचा एक फोटो काढू या ना'. पण ते म्हणाले, "आता नको. मी जातो आणि झोपतो". मग मीही आग्रह धरला नाही. त्या दिवशीची त्यांची आणि आमची ती भेट शेवटचीच ठरली. दहा-बारा दिवसांनी, २९ नोव्हेंबर २०१६ रोजी माझ्या सासऱ्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्यासोबत फोटो काढण्याची शेवटची संधी हातातून निसटून गेली ती गेलीच. 

आज या गोष्टीची प्रकर्षाने आठवण होण्यासाठी कारणही तसेच घडले. साधारण महिन्याभरापूर्वी माझी आई अत्यवस्थ होती आणि आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिला भेटायला आयसीयूमध्ये कोणीही येऊ नये, असेच डॉक्टरांनी सांगितले होते. हॉस्पिटलमध्ये जाऊन आईला बघण्याचा दुराग्रह न धरता, माझ्या वहिनीचे वडील ऍडव्होकेट आबा गांगल व वहिनीच्या काकू डॉ. सुधा गांगल, माझ्या वडिलाना भेटायला आवर्जून आमच्या घरी आले होते. कॅन्सरवरील संशोधनासाठी जगभरात नावाजल्या गेलेल्या, आणि टाटा कॅन्सर संशोधन केंद्राच्या माजी संचालक, विदुषी डॉ.सुधा गांगल, प्रथमच आमच्या घरी आल्या होत्या. त्यामुळे मी भारावून गेले होते. त्यांच्यासोबत आपण आपला एखादा फोटो काढावा असे एकदा माझ्या मनांत आलेही. पण त्याप्रसंगी तो विचार बोलणे कदाचित योग्य दिसणार नाही असे वाटून मी काही बोलले नाही.  

दुर्दैवाने, पुढच्या दोन दिवसातच डॉ. सुधा गांगल यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले आणि त्यांना दुर्धर कॅन्सरने ग्रासले आहे, असे निदान झाले. त्या आजारातून सुधाकाकू बाहेर पडूच शकल्या नाहीत व आज पहाटे त्या पंचत्वात विलीन झाल्या. मनोमन त्यांना श्रद्धांजली वाहताना एकच चुटपुट मनांत घर करून आहे. त्यांच्यासोबत फोटो काढून घेणे आता कधीच शक्य होणार नाही.

थोडक्यात काय? जीवन क्षणभंगुर आहे. प्रत्येक क्षणी, मनांत जे येते ते बोलावे, करून मोकळे व्हावे.  निसटून गेलेले असे हे अनेक क्षण मनाला टोचणी देत राहतात.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

'मला जगायचंय'

साडेचार महिन्यांच्या प्रदीर्घ आजारपणाने कृश झालेली माझी वयोवृद्ध आई, गेले अनेक दिवस आयसीयूत आहे. आठ-नऊ दिवस व्हेंटिलेटरवर व डायलिसिसवर राहून, तीन दिवसांपूर्वी त्या दिव्यातून ती सुखरूप बाहेर पडली. कालपासून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ती द्यायला लागली आहे.

काल मी सहज तिला विचारले, "काय आई, बरी आहेस ना? काय करावंसं वाटतं आहे? कुठे जावसं वाटतंय? "

तिने माझ्या पहिल्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मान हलवून दिले. मला बरे वाटले.

मी दुसरा व तिसरा प्रश्न परत विचारला. त्यावर ती म्हणाली, "मला जगायचंय. मला सोलापूरला जायचंय"

तिच्या उत्तराने मी अवाक् झाले.

यावर्षी जुलैच्या २२ तारखेला, मुलीच्या बाळंतपणाच्या निमित्ताने, मी पाच आठवड्यांसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. पण पाठोपाठच माझी आई सोलापूरला आजारी पडली. तिने खाणे-पिणे सोडले. शेवटी, ती जवळ-जवळ ग्लानीत जायला लागल्याने, सहा ऑगस्टला सोलापुरातच तिला आयसीयूत अ‍ॅडमिट करावे लागले. 

बरेच दिवस तिच्या आजाराचे काहीही निदान होत नसल्याने आणि तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने, तिच्यावर उपचार करणाऱ्या सोलापूरच्या डॉक्टरांनी हात टेकलेलेच होते. त्यातही कहर असा झाला की तिला नळीवाटे पातळ अन्न देताना, ते अन्न दोन-तीनदा तिच्या फुफुसांत गेले. त्यामुळे तिला Aspiration Pneumonia झाला. तिला दम लागू लागला. तिचे वय आणि एकूणच तिची अवस्था बघून, शेवटी तिथल्या डॉक्टरांनी सांगितले, "आता इथे आम्हाला याउपर कुठलेही वैद्यकीय उपचार करणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. तुम्ही सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. तिला आता घरी घेऊन जा किंवा पुण्या-मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवा"

मला हे समजताच, माझ्या भारतात परतण्याच्या नियोजित तारखेपेक्षा आठवडाभर आधीच निघून मी तडक सोलापूरला पोहोचले. आईला अँब्युलन्समध्ये घालून पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये आणले. तिच्यावर पूर्वी एकदा ज्यांनी उपचार केले होते त्या डॉक्टर वाडियांनी यावेळीही योग्य उपचार करून तिला वाचवले.

त्यानंतर जरी तिला घरी आणले तरी अशक्तपणामुळे तिला नीट खाता-पीता येत नव्हते. त्यामुळे अजूनच अशक्तपणा वाढून तिची प्रतिकारशक्ति संपून गेली व तिला वरचेवर जंतूसंसर्ग होत राहिला. तीन आठवड्यांपूर्वी तिला परत रूबी हॉल क्लिनिकमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले. हॉस्पिटलच्या खोलीमध्ये असताना काही दिवसांपूर्वी, नळीवाटे पातळ अन्नपदार्थ देताना पुन्हा तिच्या फुफुसांमध्ये अन्न जाऊन तिला अत्यंत गंभीर स्वरूपाचा Aspiration Pneumonia झाला. त्यामुळे तिला पुन्हा आयसीयूत हलवावे लागले. श्वसनाला त्रास होत असल्याने आठ-नऊ दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्याकाळात ती बेशुद्धावस्थेतच होती. तिच्या किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्याने तिचे तीन वेळा हिमोडायलिसीस करावे लागले. निष्णात डॉक्टर असलेल्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच आयसीयूत आईवर वैद्यकीय उपचार करीत आहेत. त्यामुळेच उपचारांमध्ये काही हयगय होणार नाही, याबाबत आता मी निर्धास्त आहे. 

आठ-दहा दिवसांपूर्वी जेंव्हा आई अत्यवस्थ होती, तेंव्हा कुठलेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या जवळपासच्या सर्व व्यक्तींनाही तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे "आता कधी?" अशा अर्थाचे प्रश्नचिन्हच फक्त  त्या सर्वांच्या चेहऱ्यावर होते. आई बरी व्हावी म्हणून माझ्या डॉक्टर मैत्रिणी व मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतो. रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्व प्रयत्न करीत राहायचे, अशी शिकवण आमच्या अंगात भिनलेली असली तरीही, आई या दिव्यातून बाहेर पडेल की नाही याबाबत आम्ही सर्व डॉक्टर्स त्यावेळी जरा साशंकच होतो. 

कमालीचा अशक्तपणा, बेशुद्धावस्था, व्हेंटिलेटर, डायलिसीस, सेप्सीस या सगळ्यातून आई कशी काय बाहेर पडली हा आम्हा सर्व डॉक्टर्सच्या दृष्टीनेही एक आश्चर्याचा विषय आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आई शुद्धीवर आली. त्यानंतर डॉक्टर वाडियांनी विचारलेल्या प्रश्नांची आईने सुसंगत उत्तरे दिली. ते ऐकून डॉक्टर वाडिया आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "चमत्कार घडतात."

"मला जगायचं आहे" हे आईचे वाक्य ऐकले आणि हा चमत्कार कसा घडला असावा याचा मला उलगडा झाला.

आई अजूनही आयसीयूतच आहे आणि ती पूर्ण बरी झाली आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती आजही नाही. पण तिची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सोलापूरला तिच्या स्वतःच्या घरी जाण्याची उत्कट इच्छा आणि जिद्दच तिला जगवते आहे असे मला वाटते. तिची ही इच्छाशक्ती आणि जिद्द बघून, तिला जगविण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आम्हालाही बळ येते आहे!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

दुर्गा अष्टमीचे कुमारिकाप्रबोधन

आमच्या इमारतीत आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो. आज दुपारी, एक मजला उतरून खाली गेले तोवर जिना अगदी स्वच्छ होता. पण पहिल्या मजल्यावरून इमारतीतून बाहेर पडेपर्यंत जिन्यावर व इतरत्र सगळीकडे खाद्य पदार्थांची वेष्टने आणि थोडी बिस्किटे, वेफर्स पडलेले दिसले. खाद्यपदार्थांची अशी नासाडी झालेली पाहून मला वाईट वाटले. जिना उतरून खाली आले आणि हे असे का झाले आहे,  याचा उलगडा मला झाला.

करपार्कच्या जवळच एक रिक्षा उभी होती. साधारण सहा ते दहा वयोगटातील आठ-नऊ  मुली, कलकल करत रिक्षात बसलेल्या होत्या. त्या मुली कुठल्याश्या झोपडपट्टीतून आल्या असाव्यात असे वाटत होते. त्यांच्याबरोबर, त्यांना घेऊन आलेली, मोलकरीण वाटावी अशी एक बाई होती. ती बाई आणि त्या रिक्षाचा चालक रिक्षाजवळच उभे राहून गप्पा छाटत होते. त्या सर्व मुलींच्या कपाळावर कुंकवाचे मोठ्ठे टिळे लावलेले होते. अनेक भाविक स्त्रिया दुर्गाष्टमीला कुमारिकापूजन करतात. आमच्या इमारतीमध्येच कोणाकडे तरी कुमारिकापूजनासाठी, या मुली आलेल्या असणार, हे माझ्या लक्षात आले. रिक्षाशेजारी उभ्या असलेल्या त्या बाईला विचारून मी त्याबाबत खात्रीही करून घेतली.

त्या मुली रिक्षात बसून दंगा घालत होत्या. भसाभसा हातातली पाकिटे फोडत होत्या. एखादे बिस्किट खाऊन बघत होत्या. चव आवडली नाही की उरलेली बिस्किटे, बाहेर फेकून देत होत्या. रिक्षात बसलेल्या कुणा इतर मुलीचा धक्का लागून एखादीच्या हातातले पाकीटही रस्त्यावर सांडत होते. मी रिक्षा जवळ गेले. त्या बाईंना सांगून त्या मुलींना रस्त्यावर आणि जिन्यावर पडलेले खाद्यपदार्थ उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकायला लावले.

"अन्नाची अशी नासाडी करू नका. तुम्हाला खायचे आहे  तेव्हडे आत्ता खा. बाकीचे घरी न्या आणि नंतर खा . तुम्हाला खायचे नसेल तर ते इतर कोणाला तरी द्या. ते अन्न आहे, कोणाच्या तरी पोटात जाऊ द्या, पण  फेकू नका. रिकामी पाकिटे इकडे-तिकडे टाकून, सगळीकडे घाण करू नका." हेही त्या मुलींना मी अत्यंत पोटतिडिकीने सांगितले.

कुमारिका हे देवीचे रूप समजले जाते. अष्टमीला कुमारिकापूजन केल्याने मोठे पुण्य मिळते, असा समज आहे.
पण अन्न वाया घालवल्याने मोठे पाप लागते, असेही मानले जाते. यजमानीणबाईंना आज कुमारिकापूजनाचे पुण्य लाभले असेलही. तसेच, त्या कुमारिकांचे थोडे प्रबोधन केल्याचे पुण्यकर्म माझ्याही हातून घडले, हेही नसे थोडके.
नाही का ?

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

तुझे रूप चित्ती राहो

                
काही वर्षांपूर्वीच्या आषाढी एकादशीची गोष्ट. त्यावेळी माझ्याकडे, अक्कूताई नावाची म्हातारी विधवा बाई,  घरकामासाठी यायची. ती आणि तिची अपंग मोठी बहीण, दोघीच झोपडपट्टीतल्या खोपटात राहायच्या. गावाकडून आणून तिच्या मुलाने त्या दोघींना इथे सोडले होते. कधीतरी वर्ष सहा महिन्याने तो यायचा आणि थोडं धान्य आणि पैसे देऊन निघून जायचा. 

अक्कूताई त्यांच्या घरापासून अर्धातास चालत सकाळी सातपर्यंत माझ्याकडे यायच्या, नऊ-साडेनऊपर्यंत माझ्या घरचं काम संपवून पुढच्या कामांना जायच्या.

आमच्या पहाटेच्या चहाबरोबर आम्ही अक्कूताईंसाठीपण चहा करून ठेवायचो. त्या आल्यावर त्यांना भरपूर साखर घालून तो चहा गरम करून द्यायचो. नऊ- साडेनऊला आमच्या नाष्ट्याच्या वेळेला, आमच्या बरोबर त्यांनाही नाष्टा द्यायचो. अक्कूताईंची खूप गरीबी होती. कधी रात्रीचं उरलेलं अन्न दिलं, तरीही त्या आनंदाने घेऊन जायच्या. 

दरवर्षी आमचा आषाढीचा उपास, सकाळी केलेल्या साबुदाणा खिचडी पुरताच मर्यादित असतो. तसाच त्या दिवशीही होता.
नाष्ट्याला केलेल्या गरम खिचडीची बशी मी अक्कूताईंना दिली आणि सहजी विचारले,

"काय अक्कूताई आज आषाढीचा उपास धरलाय ना?"

"नाय वो ताई"

"मग देवदर्शनाला जाणार ना?"

"नाय वो नाय" अक्कूताईचा चेहरा कसनुसा झाला होता.

"का? देवळात नाही जाणार?" 

"वस्तीतली पोरं नाय जाऊ देत" अक्कूताई वरमून बोलल्या. 

"पोरं का जाऊ देत नाहीत? " मला आश्चर्य वाटलं.

"वस्तीतली पोरं म्हनत्यात, आता आमचा धर्म येगळा, देव येगळा आन् आमचा सनबी येगळा हाय. आता फक्त जयंतीच आमचा सन. आता इट्टल, गणपती, शंकर, अंबाबाई .. हे आमचे देव न्हाईत. आता आमच्या लोकांनी देवळात जायाचं न्हाई आसं आमाला सांगत्यात."

अक्कूताईंची जात, धर्म मी आधी कधीच विचारले नव्हते. पण अक्कूताईंच्या त्या उत्तरामुळे मला सगळा प्रकार लक्षात आला. 

"पण लहानपणापासून तुम्ही देवळात जात असाल ना? उपास करत असाल ना?"

"देवळात जायाचो, उपास पन  करायचो. पन आताची पोरं जायचं नाही म्हनत्यात. त्यांच्या तोंडाला कोन लागनार."

"देवदर्शन नाही, तर मग कसं हो? तुम्हाला वाईट वाटत नाही का?"

"वाईट वाटतं. पन ताई, इट्टल फकस्त देवळातच भेटतो असं कुटं हाय का? त्यो तर मानसाच्या मनातबी असतो ना? देवळात गेलं न्हाई तरी माऊलीला माझा नमस्कार पावतोच न्हवं का?"
अक्कूताई कपाळा जवळ हात जोडत, नमस्कार करत, म्हणाल्या.

"पण अक्कूताई, तुम्ही उपास केलाय का जेवताय, हे बघायला तुमच्या घरांत कोणी येणार आहे का? विठ्ठलावर तुमची भक्ती आहे, तर उपास धरायचा होतात. म्हणजे देवाला तुमचा नमस्कार पोहोचला असता ना."

"उपासाचं काय घेऊन बसलात ताई? आमी करून खानारी मानसं. कामं नाय मिळाली, जिवाला आलं, कामाचा खाडा झाला, की आमाला तसाच उपास घडतुया की. आन् आता तुमी रोज आमच्या पोटाला देता. तुमच्या रुपाने रोज इट्टल मला भेटतोच न्हवं का?"

अक्कूताईंनी परत कपाळावर हात जोडून मला नमस्कार केला.

अक्कूताईंच्या रुपात मलाही  विठ्ठल भेटल्याचा भास झाला आणि नकळत माझे हात जोडले गेले.


रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

इलू, इलू,इलू,इलू, !

इलू -इलू , इलू -इलू !

खडगपूर आय आय टी ची मुख्य इमारत 
या दिवाळीत अगदी अचानकच  खडगपूर आय आय टी मधे जाण्याचा आणि दिवाळीचे तीन-चार दिवस तिथल्या गेस्टहाऊसमध्ये राहण्याचा योग आला. सध्या तेथे माझा भाचा जयदीप इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. दिवाळीमध्ये जयदीपला फक्त  लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सुट्टी असल्यामुळे, त्याला इतक्या लांबून घरी येणे शक्य होणार नव्हते. जयदीपला भेटायला माझा भाऊ शिरीष हा खडगपूरला जाणार होता. मग मी आणि आनंदनेही त्याच्याबरोबर जायचे ठरवले.

"दिवाळीच्या तुमच्या सुट्टीच्या दिवशी आपण काय करू या? तुझ्या आवडीचं काहीतरी करू या ना?" आम्ही जयदीपला विचारले.

"दिवसा काय करायचे ते आपण ठरवू. पण संध्याकाळी मात्र तुम्ही आर पी हॉलवर, म्हणजे आमच्या हॉस्टेलवर  'इलू' बघायला या" जयदीप मोठ्ठ्या  उत्साहाने म्हणाला.

"इलू? ते काय असतं?"

"ते काय असतं ते मी आत्ता नाही सांगणार. ते तुम्ही बघायलाच हवे. नुसतं सांगून तुम्हाला कळणारच नाही"  आमच्या प्रश्नाला बगल देत जयदीप उत्तरला.

खडगपूर आयआयटीमध्ये अनेक हॉल्स अथवा हॉस्टेलस आहेत. बरेचसे हॉल्स मुलांचे आहेत आणि काही हॉल्सवर फक्त मुलीच राहतात. त्या प्रत्येक हॉलवर 'इलू' साजरे होणार होते. तसेच कुठल्या हॉलवर किती वाजता ते साजरे होणार आहे, याचे वेळापत्रकही दिले गेले होते.

 AGV चे निरीक्षण करताना शिरीष  
लक्ष्मीपूजनाच्या, म्हणजे खडगपूर आय आय टीच्या  सुट्टीच्या दिवशी,  आम्ही आय आय टी चा  विस्तृत कॅम्पस जयदीपबरोबर पायी हिंडून पहिला. जयदीपने  आम्हाला सगळी डिपार्टमेंटस दाखवली. जयदीप Automated guided vehicle (AGV) वर काम करतो. त्याने त्यांची ती 'मनुष्य विरहित' चालणारी गाडी आम्हाला दाखवली आणि त्यांच्या त्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती दिली. ब्रिटिशांनी वसवलेल्या 'हिजली डिटेन्शन कॅम्प'च्या आवारात खडगपूर आयआयटी  आज उभी आहे. त्या कॅम्पच्या मुख्यालयाची दिमाखदार इमारत बघितली. स्वातंत्र्य संग्रामात तिथे बळी पडलेल्या  स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही आदरांजली वाहिली. दिवसभर पायी भटकून आम्ही खूप दमलो होतो. चालून चालून झालेली आमची दमणूक बघून जयदीपने असे सुचवले की आम्ही राधाकृष्णन हॉल आणि त्याला लागूनच असलेला जयदीपचा राजेंद्रप्रसाद हॉल या दोनच हॉलचे 'इलू' बघावे. ती सूचना आमच्याही पथ्यावरच पडली. 'इलू' बघायला आम्हाला राधाकृष्णन हॉलवर (आर के) हॉलवर आठ वाजता आणि जयदीप राहात असलेल्या राजेंद्रप्रसाद (आर पी) हॉलवर आठ वाजून वीस मिनिटांनी पोहोचायचे होते.

दिवसभराची रपेट करून आम्ही चार-साडेचारला गेस्टहाऊस मध्ये येऊन झोपलो ते सहा सव्वासहाला उठलो.  चहा प्यायला शिरीषला आणि जयदीपला आमच्या खोलीमध्ये बोलावण्यासाठी त्यांच्या खोलीवर फोन केला तर तिकडून काही उत्तरच आले नाही. परत थोड्यावेळाने फोन केला, त्यांच्या खोलीच्या दाराची घंटी वाजवली तरीही काहीच उत्तर आले नाही, हे बघून मी आणि आनंद चांगलेच चक्रावलो होतो. इतक्यात शिरीष मोठ्या विजयी मुद्रेने जयदीपला घेऊन बाहेरून आला. 'इलू'च्या वेळी घालायला आपल्याकडे चांगला कुडता नाही हे अचानकच जयदीपच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याला घेऊन कुडता खरेदीच्या मोहिमेवर शिरीष बाहेर पडला होता. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कॅम्पसमधली आणि बाहेरचीही बरीचशी दुकाने बंदच होती. गावातल्या सगळ्या गल्लीबोळातून 'सायकलरिक्षाने फिरून झाल्यावर, आता काही कुठेही कुडता मिळणार नाही अशा निष्कर्षाला आल्यावर, अचानक एका छोट्याशा दुकानात त्यांना जयदीपच्या मनासारखा कुडता मिळून गेला होता. त्यामुळे जयदीप आणि शिरीष दोघेही अतिशय आनंदले होते.

मी आणि जयदीप 'इलू' बघायला तयार 
नवा कुडता घालून जयदीप त्याच्या हॉलवर सायकलवरून पसार झाला. आम्हीही तयार होतोच. जयदीपच्या पाठोपाठच आम्ही चालत-चालत आर के हॉल कडे निघालो. बाहेर पडलो तर आमच्या डोळ्यावर आमचा विश्वासच बसेना. आधीचे दोन दिवस, अगदी साधेच  टीशर्ट आणि जीन्स घातलेली, आणि सायकल मारत भराभर इकडून तिकडे जाणारी  आय आय टी मधली अभ्यासू मुले-मुली आम्ही बघत होतो. पण त्या दिवशी संध्याकाळी ती सगळी मुले-मुली चक्क नटलेली होती. मुलांचे रंगीबेरंगी कुडते काय आणि मुलींचे भरजरी कपडे, साड्या, नट्टापट्टा आणि दागदागिने काय, सगळे वातावरण अगदी फुलून गेले होते. मुलामुलींच्या आणि आमच्या सारख्या इतर पालकांच्या घोळक्याबरोबर आम्ही आर के हॉलपर्यंत आठच्या आधीच पोहोचलो. पण आम्ही पोहोचायच्या आधीच तिथे प्रचंड गर्दी झालेली होती. हॉलसमोरच्या पटांगणात उभ्या केलेल्या बांबूच्या २०-२२ फुटी भव्य चटयांवर, पणत्यांच्या साहाय्याने पौराणिक देखावे सादर केले होते. त्याचसोबत रांगोळ्यांनी रंगवलेली पौराणिक चित्रे आणि त्यावर सोडलेला अल्ट्रा-व्हायोलेट झोत असे 'हाय-टेक' देखावेही होते. सर्व हॉल्सची पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची मुले महिनाभर खपून हे देखावे तयार करतात. प्रत्येक हॉल वेगवेगळ्या आशयांचे देखावे सादर करतो आणि नामांकित परीक्षकांच्या मते ज्या हॉलचे देखावे सर्वोत्कृष्ट ठरतात, त्या हॉलला बक्षीस मिळते. एखादा हॉल यावर्षी नेमका कुठला देखावा सादर करणार आहे, हे फक्त त्या-त्या हॉलच्या मुलांनाच माहिती असते. हे जे टॉप सिक्रेट ठेवलेले असते ते त्या स्पर्धेच्या वेळीच बाहेर पडते. विजेवर चालणारे सगळे दिवे बंद करून फक्त हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्या जातात आणि अचानक अंधारात आपल्यासमोर हे सुंदर देखावे तयार होतात. या नेत्रदीपक इल्युमिनेशन स्पर्धेचे संक्षिप्त रूप म्हणजेच 'इलू' हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळले!
जयदीपच्या आर पी हॉलचे या वर्षीचे 'इलू '
आर के हॉल चे देखावे पाहिल्यानंतर आम्ही जयदीपच्या आर पी हॉलवर गेलो. पणत्या पेटवणे चालू असताना 'आता काय-काय दिसणार?' अशी कमालीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सगळ्या पणत्या पेटल्या आणि तिथलेही सुरेख देखावे आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले. पाच चटयांवर, केवळ पणत्यांच्या साहाय्याने जणू संपूर्ण महाभारत रेखाटले होते. द्रौपदी-वस्त्रहरण, द्रोणाचार्य आणि एकलव्य, भीष्म-परशुराम युद्ध, कर्णाच्या रथाचे चिखलात रुतलेले चाक, बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्माचार्य, असे देखावे अगदी हुबेहूब होते. हजारो पणत्या एकाच वेळी पेटवल्यामुळे अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीचे आकाश उजळून निघाले होते. उभ्या चटयांवरच्या त्या देखाव्यांचे प्रतिबिंब जमिनीवरच्या कृत्रिम तळ्यातील पाण्यामध्ये पडल्यामुळे ते दृश्य फारच सुरेख दिसत होते. पणत्यांच्या प्रकाशामुळे प्रचंड जनसमुदायाच्या डोळ्यांच्या पणत्याही लखलखत होत्या. हवेत तरंगणारे अनेक रंगीत आकाशकंदील एकापाठोपाठ आकाशात सोडलेले होते. शोभेच्या दारूकामाने आसमंत उजळून निघाला होता. आरपी हॉलची मुले घोषणा देत होती. इतर मुले-मुली त्यांना प्रोत्साहन देत होती. भरपूर फोटो काढले जात होते. फ्लॅश उडत होते. तरुणाईच्या जल्लोषामुळे आणि त्यांच्यातल्या ऊर्जेमुळे वातावरण भारल्यासारखे झाले होते. गेले दोन दिवस पाहिलेल्या त्या 'अभ्यासू' मुला-मुलींचे हे वेगळेच रूप, त्यांचे टीम स्पिरिट, त्यांच्यामधले ते चैतन्य, त्यांच्यातल्या कलागुणांची, कल्पकतेची आणि हरहुन्नरीपणाची एक वेगळीच झलक आम्हाला पाहायला मिळाली. जयदीपच्या आर पी हॉलला, या वर्षीच्या  'इलू' चे पहिले बक्षिस मिळाल्याचे जयदीपने आम्हाला मोठ्ठ्या अभिमानाने सांगितले आणि आम्हाला खूप कौतुक वाटले.
आर पी हॉलच्या 'इलू' समोर  जयदीप 

बऱ्याच वर्षांनंतर खडगपूर आय आय टीमधील दिवाळीच्या निमित्ताने 'इलू' हा शब्द मी ऐकला. पूर्वी एका हिंदी गाण्यात हा शब्द मी ऐकला होता.
"इलू, इलू, इलू, इलू,S S,  इलू का मतलब आय लव्ह यू " असं ते गाणं होतं.

खडगपूर आय आय टी मधलं ऊर्जस्वल वातावरण, शिक्षणाचा दर्जा, तिथे घडत असलेली, अनेक कलागुणसंपन्न अशी भावी पिढी, आणि 'इलू' हे सगळं बघून मी भलतीच भारावून गेले आहे. तुम्हाला हसायला येईल, आणि कदाचित तुम्ही माझी चेष्टाही कराल. पण खरंच सांगते, या ट्रिपहून आल्यापासून मी खडगपूर आय आय टी ला उद्देशून "इलू, इलू, इलू, इलू,S S, इलू का मतलब आय लव्ह यू " हे गाणं गुणगुणते आहे,  पण फक्त माझ्या  मनांतल्या मनांतच बरं का!





बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

वेष्टनांचा विळखा!

पुणे महानगरपालिकेच्या, चंदूमामा सोनावणे रुग्णालयात, साधारण पाच ते दहा वर्षे वयाच्या  बालरुग्णांची तपासणी करीत असताना त्यांच्या पालकांबरोबर, म्हणजे बहुतेक वेळा मुलांच्या आयांबरोबर घडणारा एक ठराविक संवाद असतो.

नकाबाच्या आडून बोलणारी आई, "मॅडम, आप इसको बोलिये ना, की अगर ये रोज LAYS और कुरकुरे खायेंगा, तो आप इसको सुई लगा देंगे"

मग मी विचारते, "क्यूँ , ये रोज ऐसी चीजे खाता है क्या ?"

तिचे उत्तर, "हां, ऐसेहीच करता है. सुनताच नहीं है. इसको कितनाभी समझाओ, लेकिन घरका बना हुवा खाना नहीं खाता. रोज LAYS और कुरकुरे खायेंगा. मानताच नही."

माझा प्रश्न, "इसको रोज LAYS और कुरकुरे, फुकटमें कौन देता है? या फिर आपकी खुदकी दुकान है क्या ?"

कसनुसं हसून तिचं उत्तर, "दुकान कहाँसे होंगी? और इसको फुकटमें कौन देगा? जिद करके, रोज पैसे लेता हैं"

माझा प्रश्न, "लेकिन इसको पैसे कौन देता है?"

तिचे उत्तर, "किसीसेभी लेता है. ज्यादातर इसके अब्बू, दादा, नहीं तो चाचा दे देतें हैं"

माझे उत्तर, "तो फिर ऐसा करो, कल इसके अब्बू, दादा और चाचा, इन तीनोको मेरे पास इधर ले के आ जाओ. मैं तीनोको सुई लगा देती हूं. बच्चेको सुई लगाने से उसकी ये आदत कैसे छूटेगी?"

मग ती बाई निरुत्तर होऊन निघून जाते.

"शक्यतो कुठल्याही पाकिटातलं काहीही खाऊ नका, मुलांच्या हातात पैसे  देऊ नका, घरी बनवलेले ताजे आणि सकस अन्न कुटुंबातील सर्वजण खात जा" हे जवळजवळ प्रत्येक रुग्णाच्या पालकांना मी सांगत असते.

एके दिवशी सोनावणे रुग्णालयातील काम संपल्यावर, मी अगदी रमत-गमत पायीच घरी निघाले होते. माझ्या समोर काही अंतरावर साधारण नववी-दहावीत असावी अशी एक शाळकरी मुलगी, भराभरा चालत असलेली दिसली. तिच्या पाठीवर एक मोठ्ठे आणि अवजड दप्तर होते. केसाच्या दोन घट्ट वेण्या, रंगीत रिबीनीने वर बांधून, रिबिनीची मोट्ठी फुले केलेली होती. मुलगी शाळेच्या गणवेशात होती. तो गणवेश पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा होता. त्यामुळेच, ती मुलगी मध्यमवर्गीय घरातली असावी असा अंदाज मी मनाशी बांधला. चालता-चालता मधेच, त्या मुलीने, एक पाकीट उघडून काहीतरी तोंडात टाकले आणि त्या पाकीटाचे वेष्टन रस्त्यावर फेकून दिले.  शाळेत शिकणाऱ्या, चांगल्या घरच्या मुलीने ते वेष्टन असे रस्त्यावर फेकावे, याचा मला जरा जास्तच राग आला. तिला रागवावे आणि तिने रस्त्यावर टाकलेले ते वेष्टन तिलाच उचलायला लावून, कचराकुंडीत टाकायला लावावे, या उद्देशाने, मी भराभर पुढे चालत निघाले. पण ते वेष्टन कशाचे आहे हे पाहण्यासाठी प्रत्यक्षांत मीच ते उचलले आणि अचंबितच झाले.
ते वेष्टन होते गुटख्याच्या पाकिटाचे!
मला काय करावे ते सुचेना आणि मी जागच्याजागीच खिळून उभी राहिले. भानावर आले तोवर ती शाळकरी मुलगी माझ्या नजरेआड झालेली होती.

आपल्या भावी पिढ्या वेगवेगळ्या वेष्टनांच्या विळख्यांत अडकून गर्तेत जाणार अशी भीती मला राहून-राहून वाटत असते. निदान आपले स्वतःचे किंवा आपल्या घरातले एखादे मूल या विळख्यात अडकणार नाही, याची दक्षता आपणच घ्यायला नको का?



बुधवार, १६ मे, २०१८

आपली वास्तू खरोखर शांत आहे का?

काल सकाळचं काम संपवून घरी आल्यावर, आमरस-पोळीचे जेवण जेवून मी ताणून  दिली. तास-दीड तासाने जाग आल्यावर सवयीने व्हॉट्सऍप उघडले. दि. १६/०५/१८, म्हणजे आजच एका 'हेल्थ कॅम्पला' मी रुजू व्हायचे आहे अशी ऑर्डर नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या कार्यालयातून कोणीतरी व्हॉट्सऍपवर मला पाठवलली दिसली. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांसाठी हा मोफत हेल्थ कॅम्प, क्रेडाई आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे, असे मला त्या ऑर्डरवरून कळले. अचानक आलेल्या या ऑर्डरमुळे खरंतर माझी खूप चिडचीड झाली. माझ्या क्लिनिकच्या आजच्या अपॉईंटमेंट्स रद्द कराव्या लागणार, घरची कामे सकाळी लवकर उरकून, मरणाच्या ट्रॅफिकमध्ये घरापासून दहा किलोमीटर दूर असलेली कॅम्पची साईट शोधत जावे  लागणार, हे सर्व मला अगदी नको वाटत होते. त्यातून १६ मे हा आमच्या मुलाचा वाढदिवस. मुलगा जरी दूर अमेरिकेत असला तरी त्याचा वाढदिवस 'राझी' सिनेमा बघून साजरा करावा असे मनात योजले होते. ऑर्डर रद्द करून  घ्यावी असा मनात विचार आला पण कार्यालयीन वेळ संपून गेलेली असल्यामुळे ते केवळ अशक्य होते.

मनातल्या मनात चडफडतच कॅम्पच्या ठिकाणी पोहोचले. बांधकामावरील मजुरांच्या कुटुंबियांच्या वसाहतीत पत्रे ठोकून उभ्या केलेल्या एका खोलीत कॅम्प आयोजित केला होता. बाहेर वीस-पंचवीस लहान मुले तपासणी सुरु होण्याची वाट बघत बसली होती. कामगारांच्या बायका आणि काही कामगारही मोठ्या आशेने थांबून होते. 'मान्यवर' न आल्याने, कार्यक्रम तासभर उशिरा चालू झाला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन, भाषणबाजी आणि खानपान यामध्ये पुढचा पाऊण तास गेला. त्या सोहळ्यादरम्यान अनेक फोटो काढून झाले आणि लगेच तमाम मान्यवर गायब झाले. हे सर्व होऊन गेल्यावर आमचं काम चालू झाले.  त्या वेळपर्यंत भर उन्हात पत्र्याच्या शेड मध्ये बसून, ढिसाळपणे चाललेला कार्यक्रम आणि दिखाऊपणा बघून माझे डोके चांगलेच तापले होते. असले कार्यक्रम मुख्यतः फोटोपुरतेच घडवून आणले जात असल्याने, त्यात नियोजनाचा अभाव आहे, हे माझ्या लक्षात आले आणि वैद्यकीय तपासणीची सगळी सूत्रे मी हातात घेतली. दोन कर्मचाऱ्यांना केसपेपर्स बनवायला बसवले, महानगरपालिकेच्या दवाखान्यातून रुग्णांना मोफत वाटण्यासाठी कोणती आणि किती औषधे आणलेली आहेत याचा आढावा घेतला आणि कामाला सुरुवात केली.

कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेली ही कामगारांची कुटुंबे होती. मी फक्त बालरुग्णांना तपासणार होते. सगळी मुले थोड्याफार प्रमाणात कुपोषित होती. त्या वसाहतीतील बऱ्याच मुलांना नुकताच गोवर येऊन गेलेला होता. त्यामुळे त्यांची भूक कमी झालेली होती आणि ती  खूप चिडचिडी झालेली होती. अनेक मुलांच्या अंगात रक्त कमी आहे, हे मला कळत होते. काहींना खरूज झालेली होती तर काहींची पोटात जंत झाल्याची  तक्रार होती. कित्येक मुलांचे लसीकरण पूर्ण झालेले नव्हते. आई-वडील कामावर गेल्यामुळे, सात आणि आठ वर्षांची मुले पालकांशिवायच तपासणी करून घ्यायला आलेली होती. दहा-बारा वर्षांच्या मुली कडेवर लहान भावंडांना घेऊन आल्या होत्या. मी पेशन्ट्स तपासत होते पण त्यांना द्यायला, योग्य आणि पुरेशी औषधेही आमच्याकडे नव्हती. गोवर आलेल्या मुलांना द्यायला साधे 'अ' जीवनसत्वाचे औषधही नव्हते. मुलांना रक्तवाढीसाठी पातळ औषध द्यावे, तर तेही नव्हते. काही अत्यावश्यक औषधे मी विकत आणायला लावली आणि मोठ्या जिव्हाळ्याने सर्व मुले तपासली. एका वेगळ्याच उपक्रमात सहभागी होऊन  मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचे समाधान मिळाले, पण मनात मात्र विचारांचे काहूर उसळले.  

कार्यक्रम सुरु होण्याआधी कुतूहलापोटी मी काही लोकांशी बोलले होते. त्यांच्या झोपड्याकडेही माझे लक्ष  गेलेले होते. तात्पुरते पत्रे ठोकून तयार केलेल्या काड्यापेटीसारख्या झोपड्या. त्यात खेळती हवा नाही, ड्रेनेजची नीटशी सोय नाही. सगळीकडे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची तरी काय सोय होती देव जाणे. अशा परिस्थितीतच ही कुटुंबे राहत होती आणि तिथेच त्यांची मुले खेळत होती. सर्व सुखसोयींनी युक्त अशा मोठ्या मोठ्या इमारती बांधायच्या आणि इमारत पूर्ण झाल्यावर पुन्हा पुढच्या साईटवर जायचे. दर दीड दोन वर्षांनी जुने घर मोडायचे, जुनी जागा सोडायची आणि नवीन जागी पुन्हा घर उभे करायचे. या जागी किती दिवस राहायचे आहे ?नवीन जागा कुठे असेल? कशी असेल? किती दिवसांनंतर जायचे आहे ? शेजारीपाजारी कोण असेल? मालक कोण असतील? काम मिळेल का? किती दिवसांसाठी मिळेल ? किती पगार मिळेल ? मुलांसाठी शाळा असेल का? सगळी प्रश्नचिन्हेच. क्रेडाईच्या सदस्यांनी या कामगारांना मूलभूत सुविधा पुरविल्याच पाहिजेत अशी कायदेशीर सक्ती का नाही? आणि तशी तरतूद कायद्यात असल्यास त्याची कठोर अंमलबजावणी करता येणार नाही का? चकचकीत घरामध्ये राहताना, त्यासाठी राबलेल्या या कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टांबद्दल आपल्याला सुतराम कल्पनाही नसते, याची जाणीव मनाला त्रास देऊन गेली. या कॅम्पला मला यायला लागू नये, हा कातडीबचाऊ विचार मी केला होता, याचीही मला लाज वाटली.

मागच्याच महिन्यात माझ्या भावाने घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांती पूजा झाली. मी मुळीच भाविक नाही, पण पूजा करताना गुरुजी मंत्रोच्चार करून त्यांचा अर्थही समजावून सांगत होते, ते कानावर पडले होते. वास्तू उभी राहताना ज्यांना ज्यांना म्हणून त्रास झाला असू शकेल त्या सगळ्यांचा उल्लेख करून ती पूजा केली गेली. नवग्रहांचीही शांत केली. आज, या कामगाराच्या वसाहतीत प्रथमच गेल्यावर मला वाटले की,नवीन वास्तूत प्रवेश करताना, वास्तूसाठी राबलेल्या कामगारांचा एखादा प्रश्न जर एकेक फ्लॅटधारकाने सोडवला तर ती एक आगळी वेगळी वास्तुशांत होईल.