शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

शंकासूर

रोज सकाळी माझ्या फेरफटक्याच्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी मला शंकासुरांची झुडुपे दिसतात. लाल व पिवळ्या रंगाच्या या फुलांना काही विशेष गंध नसतो. या फुलांचे नाव 'शंकासुर' असे का पडले असावे?  असा मात्र नेहमी मला प्रश्न पडतो .


'शंकासुर' या नावामुळे मला आमच्या अनिरुद्धचे बालपण आठवते. त्याला बोलायला येऊ लागल्यापासूनच अनेक प्रश्न आणि  शंका विचारून, तो आम्हाला इतका भंडावून सोडायचा की एखादा 'शंकासुरच' आपल्या मागे लागला आहे असे वाटायचे. त्याच्या अनेक चित्र-विचित्र प्रश्नांना उत्तरे देणे, हे आम्हा दोघांना अवघड जायचे. तरीही मोठ्या संयमाने आम्ही समर्पक उत्तरे देत रहायचो. पुढे, तो जरा मोठा झाल्यावर त्याला आम्ही वाचनाची गोडी लावली. त्यामुळे त्याच्या बऱ्याचशा शंकाचे समाधान पुस्तकांमधून आणि इंटरनेटवरून होऊ लागले. आज तो शास्त्र शाखेचा एक अभ्यासू विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या शास्त्र शाखांमधील संशोधनात तो रमलेला आहे आणि हातून काही मूलभूत संशोधन घडावे अशा प्रयत्नात आहे .

माझ्या दवाखान्यात, साधारण दोन तीन वर्ष वयाचे छोटे 'शंकासुर' रोज येत असतात. हे 'शंकासुर' सुद्धा त्यांच्या आई-वडिलांना सतत अनेक प्रश्न  विचारून पिडत असतात. काही आई-वडील त्यांच्या 'शंकासुरा'ला योग्य पद्धतीने शांत करताना मी पाहते. काही पालक मात्र त्यांच्या शंकाकडे लक्ष देण्याची तसदीही घेत नाहीत. तर काहीजण ऐकतात, पण समाधानकारक  उत्तरेच देत नाहीत. हे बघितले की मात्र मला फार वाईट वाटते. या शंकासुरी वृत्तीमुळेच उद्याचा शास्त्रज्ञ घडणार आहे. न्यूटन नामक शंकासुराला, 'झाडावरचं सफरचंद खाली का पडलं?' हा प्रश्न पडलाच नसता, तर शास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली मानवाची प्रगती कदाचित झालीही नसती. 'तुमच्या या शंकासुराला शांत करा ' हा माझा सल्ला ऐकायला  अशा पालकांना वेळही नसतो आणि ऐकण्याची इच्छाही नसते .

पालकत्व जर असेच चालू राहिले तर भावी  शात्रज्ञांची संख्या घटणार की काय? ही शंका मात्र माझ्या मनांत आल्यावाचून रहात नाही!

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

उजळणी "संस्कृतीची"!


आज आषाढी अमावास्या. हा दिवस 'दिवली अमावास्या', 'दिवळी आवस', 'दिव्याची आवस' 'दर्श अमावास्या' किंवा 'गटारी अमावास्या' अशा अनेक नावांनी ओळखला जातॊ. सकाळपासून सोशल मीडियावर दीपोत्सवाची महती आणि माहिती सांगणाऱ्या अनेक पोस्ट्स फिरताहेत, तितक्याच गटारीवर घसरलेल्याही पोस्ट्स आहेत. आज सकाळी-सकाळी 'मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?' अशी एक पोस्ट वाचली. त्या पोस्टचा आशय काहीसा असा होता की या मंगल दिवसाला, "गटारी" म्हणून इतकी कुप्रसिद्धी मिळत आहे, की ज्याची अवघ्या मराठी माणसांना लाज वाटावी, आणि हे योग्य नव्हे. दिव्याची अमावास्या साजरी करण्यामागची शास्त्रीय कारणे देऊन, खरंतर आपण पारंपरिक पद्धतीने आजचा आनंदमय दिवस साजरा करून आपली संस्कृती जपूया, असे छान विचार त्या  पोस्टमध्ये होते. परंतु, ते सगळं वाचून  मी मात्र विचारात पडले की 'आपली संस्कृती' म्हणजे नेमके काय? आणि आपली म्हणजे कोणाची? 

परंपरा जपणाऱ्या, एकत्र कुटुंबात जन्मल्यामुळे, लहानपणी घरात सगळे सण यथासांग साजरे होताना मला पाहायला मिळाले. दिव्याच्या अमावास्येच्या दिवशी मोलकरणी घरातले सगळे पितळी दिवे चिंच लावून घासून ठेवायच्या. आई-काकू गव्हाच्या जाडसर पिठांत तेल आणि गूळ घालून त्याचे दिवे करायच्या. पातेल्यावर चाळणी ठेऊन, त्यावर ते दिवे ठेऊन छान  वाफवायच्या. नंतर ते काढून, त्या दिव्यांमध्ये वातींची जोडी व तूप घालून ते प्रज्ज्वलित करून देवाला नैवेद्य दाखवायच्या. तसंच, त्या दिव्यांनी आम्हा बालगोपालांचे औक्षण झाल्यावरच मग आम्हाला दिवे खायला मिळायचे. घरातल्या मोलकरणीबरोबर तिची एखाद-दोन लहान मुले आलेली असली तर आई-काकू त्यांना पण ओवाळायच्या आणि दिवे खायला द्यायच्या.

दिवे करणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी फारच आनंददायक असायच्या. गुळाने चिकट झालेल्या कणकेत हात घोळवत दिवे करायला मजा यायची. पण आम्ही मुले जरूरीपेक्षा जरा जास्तच कलाकुसर करुन वेगवेगळ्या आकाराचे दिवे करायला लागलो, की मग आई आम्हाला स्वयंपाकघरातून हुसकून लावायची. जेवताना आपण स्वतः केलेला दिवा मिळावा यासाठी धडपड असायची आणि तो विशेष गोड लागायचा हे वेगळं सांगायलाच नकोच  कणकेच्या दिव्यामध्ये, कणीदार साजूक तूप भरून खाण्याची लज्जत काही औरच असायची.

दिव्याच्या अमावास्येची दुसरी आठवण म्हणजे, केवळ त्या दिवशीच वाचली जाणारी, विशिष्ट कहाणी आणि सुरु होणारी जिवतीची पूजा. संपूर्ण श्रावण महिना देवघरात वास्तव्यास असलेला तो जिवतीचा फोटो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. जिवती नेहमीच दागिन्याने मढलेली, मोठ्ठ कुंकू लावलेली, गोल गरगरीत चेहऱ्याची आणि सुदृढ बांध्याची असायची. तिच्या पदराखाली एक आणि अंगा-खांद्यावर कमीतकमी चार-पाच मुले असायची. त्या काळात, "दो या तीन बस" "छोटा परिवार सुखी परिवार", "एक के बाद अभी नही और दो के बाद कभी नहीं", असली नारेबाजी एकीकडे वाचनात यायची आणि ठिकठिकाणी लाल त्रिकोण दिसायचा; तर दुसरीकडे हा फोटो! आमच्या कळत्या वयांत हा विरोधाभास  त्रासदायक वाटल्यामुळे, आम्ही आईला विचारायचो, "एकापाठोपाठची इतकी लहान मुले असलेल्या या जिवतीची पूजा का करायची? त्यावर, "मी सांगते म्हणून करायची", किंवा "आपल्या घरात पूर्वीपासून करतात म्हणून करायची" अशी न पटणारी उत्तरे मिळत असत. क्वचित एखादी चापटही खावी लागायची.   

अशा वातावरणामध्ये वाढत असताना, या अमावास्येला गटारी अमावास्या म्हणतात याचा मला गंधही नव्हता. मात्र, आमच्या घराच्या मागे एक देशी दारूचा गुत्ता होता. संध्याकाळी आजीच्या देखरेखीखाली पाढे आणि परवचा म्हणायची आमची वेळ, आणि घरामागील गुत्त्यावर दर्दी लोकांची वर्दळ वाढायची वेळ, साधारण एकच असायची. त्या गुत्त्यावर येणारी माणसे बघण्यामध्ये आणि ती काय बोलतात हे ऐकण्यामध्ये आम्हा भावंडांना कमालीचा रस असायचा. गुत्त्यावर चाललेली भांडणे, आरडाओरडा, खूप प्यायल्यानंतरच्या गळाभेटी आणि एकूण सर्वच तमाशा, घरातल्या मोठयांची नजर चुकवून, गच्चीवर लपून बघताना खूपच मजा यायची. तिथल्या वाचस्पतींमुळे आमचे (अप)शब्दभांडारही खूप समृद्ध झाले! या गुत्त्यावर गोंधळ घालणाऱ्या महाभागांमध्ये आमच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींचे नवरेही असायचे. रोज संध्याकाळी सुरु झालेला हा गदारोळ मध्यरात्रीनंतर कधीतरी संपत असावा. गटारी अमावास्येला तिथे काही खास वेगळा सोहळा होत होता की नव्हता, हे मी नाही सांगू शकणार!

मी आज मात्र विचारात पडते. आमच्या घरी साजरा होणारा तो दिवस, आमच्या मोलकरणींकडे तसाच साजरा होत असेल का? दिव्याची अमावास्या म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर आपल्या संस्कृतीची जी दृष्ये येतात, तशीच दृष्ये आज त्यांच्या मुलांच्या डोळ्यांसमोर येत असतील? का नेहमीपेक्षा जास्त पिऊन गटारात पडलेला बापच त्यांच्या डोळ्यांसमोर येत असेल आणि तोच त्यांच्या संस्कृतीचा भाग असेल? शेतकरी कामकरी कुटुंबातील इतर काहींच्या डोळ्यांसमोर, फक्त त्याच दिवशी जास्त दारू पिणारे त्यांच्या घरातले पुरुष असतील का? आपण जेंव्हा "आपली संस्कृती" असे म्हणतो तेंव्हा त्यात जसा दिव्याच्या आवसेचा दीपोत्सव आहे तसंच "गटारी"चं  पिणंही आहेच. तोही आपल्या समाजातल्या काही घटकांच्या संस्कृतीचा भाग होता आणि राहणार आहे. पण तशी "गटारी" साजरी करणारे लोक, बहुदा व्रतस्थपणे श्रावणही  पाळत असतील. आजच्या समाजात, कुठल्याही वारांचा, सणांचा किंवा चातुर्मासाचा धरबंध न ठेवणाऱ्या लोकांनी "गटारी"च्या प्रथेला ग्लोरिफाय करणं जसं योग्य नाही तसंच आपली "संस्कृती-संस्कृती" असा टाहो फोडत ती प्रथा नाकारणंही अयोग्य होईल. आपल्या  मुलांपुढे आपण कुठली संस्कृती ठेवतोय, हे जास्त महत्वाचे आहे. ती मोठी झाल्यावर, या दिवसाच्या त्यांच्या आठवणी काय असतील? सोशल मीडियावर "दिव्याच्या अमावास्येच्या" आणि "गटारीच्या" नवनवीन पोस्ट वाचण्यात आणि पुढे पाठवण्यात मग्न झालेले आई-वडीलच त्यांना आठवतील, कदाचित!  

दिव्याच्या अवसेला, दिवेलागणीच्या वेळी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडून बसलेल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला मिळाल्यामुळे मला छान वाटतंय, हे मात्र खरं! 
   

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

देवा, असेच छत्र असू द्या !

मागचे दोन आठवडे , माझ्या बालरुग्णांना रात्री अपरात्री उदभवणाऱ्या दुखण्यांमुळे,  मला दुखणे आल्यासारखे झाले  होते. रोजचे जागरण होत होते, सकाळी लवकर जाग येत नव्हती आणि उठल्यावरही अंग आळसावलेले राहत होते.  आज मात्र पहाटे पहाटे छान जाग आली. त्यामुळे बरेच दिवसांनी, सकाळी फिरायला बाहेर पडले. बाहेर उघडीप होती म्हणून छत्री घ्यावी का न घ्यावी, अशा व्दिधा मनस्थितीत असताना शेवटी,  छत्री घेऊनच बाहेर पडले. मागच्या वर्षी, आमची अर्धांगवायू झालेली छत्री बाद करून, चांगली महागातली एक  नवीन छत्री  विकत घेतली होती. पण मागच्या पावसाळ्यात काही तिची घडी  मोडता आली नव्हती. त्यामुळे ती तशी अजूनही नवीनच असल्यासारखी आहे.

पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर पडले आणि पाऊस आलाच नाही की माझा जरासा हिरमोडच होतो.  अशा वेळी, "कशासाठी उगीच छत्री घेऊन बाहेर पडतात, कुणास ठाऊक " असा भाव काही लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसतो आणि वाईट वाटते. आज मी बाहेर पडून थोडा वेळ झाला आणि पावसाच्या सरी सुरु  झाल्या. मी मोठ्या दिमाखाने माझी छत्री उघडली. अशावेळी मात्र, छत्री नसलेल्यांकडे बघून मात्र मला जास्तच वाईट वाटते. आषाढ आणि श्रावणांत, रस्त्यावर छत्री उघडझाप करण्याचा खेळ करण्यातही एक मजा असते . पाऊस थांबला म्हणून छत्री बंद करावी तर, आपण  छत्री उघडेस्तोवर आपल्याला भिजवून टाकणारी एखादी जोरदार सर येऊन जाते. आपण छत्री उघडून चालत राहावे, तर मधेच पाऊस बंद होतो. पाऊस थांबलाय, हे लक्षांत न आल्यामुळे छत्री उघडी ठेऊन चालत राहिलं तर, "बाई आता पाऊस थांबलाय, बंद करा ती छत्री" असा भाव समोरच्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. 

या पावसाळ्यांत नवीन छत्री वापरून , पावसावर  आणि छत्रीवर चार ओळी  लिहण्याचा योग आलाय, हे ही नसे  नसे थोडके. वरुणराजा, तुझे छत्र असेच आमच्यावर राहू दे रे बाबा !

रविवार, २४ जुलै, २०१६

मोडणं सोपं असतं...

वर्षभरापूर्वी, म्हणजे २३ जुलै २०१५ रोजी, माझ्या ८६ वर्षांच्या सासूबाई बागेत फिरायला गेलेल्या असताना पडल्या आणि डोक्याला छोटी खोक पडली. मेंदू भोवती थोडा रक्तस्त्रावही झाला. मार अगदीच थोडा लागलेला असला तरीही त्या मनाने खचल्या आणि पुढे २० डिसेम्बर २०१५ ला त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. हा अपघात व्हायच्या दिवसापर्यंत माझ्या सासूबाई आणि माझे ९१ वर्षांचे सासरे असे दोघेच सारसबागेजवळच्या त्यांच्या सदनिकेत राहत होते. त्या वास्तूत जरी ते ३८ वर्षे राहत असले तरी त्यांचा ६७ वर्षे संसार झाला होता. 

सासूबाईंचा अपघात झालेल्या दिवसापासून, माझे सासरे माझ्या नणंदेकडे राहात असल्यामुळे त्यांची सदनिका आजपर्यंत बंदच होती. आज मात्र माझ्या सासऱ्यांनी, आम्हा सर्वांना, त्यांची दोन्ही मुले, दोन्ही सुना आणि त्यांच्या मुलीला, एकत्रित स्वतःच्या वास्तूत बोलावून घेतले. त्यांची सदनिका भाड्याने देऊन टाकावी असा विचार आता  पक्का केल्याचे सासऱ्यांनी आम्हाला सांगितले. तिन्ही अपत्यांनी त्यांच्या घरातले जे सामान ज्याला वापरासाठी हवे आहे ते एकमताने वाटून घेऊन घर रिकामे करावे असेही सुचवले. 

त्यांच्या इच्छेला मान देऊन माझा नवरा आनंद, माझे दीर,आम्ही दोघी सुना, आणि आमची नणंद अशा पाच जणांनी मिळून, भांडी-कुंडी, लाकडी सामान, पुस्तके, अशा वस्तू सामंजस्याने वाटून घेतल्या. काही वस्तू आजच्या फेरीतच उचलून आपापल्या घरी नेल्या. काही पुढच्या एक-दोन फेऱ्यांमध्ये नेऊ आणि ते घर रिकामे करू. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरात तसे फार सामान नव्हतेच. आम्ही बरेचसे सामान वाटून घेतले असले तरी काही सामान कोणीच घेऊ इच्छित नव्हते. ते कोणा गरजू व्यक्तींना द्यावे किंवा मोडीत टाकावे असे ठरले.    

सामान घेताना माझ्या मनाची नकळतच घालमेल चालू झाली. पण मन घट्ट करून काही सामान घेतले. या गोष्टी सासूबाईंची आठवण म्हणून आपल्या घरी वापरात राहतील, याचे समाधान होतेच. आणलेले सामान साफ करण्यात आणि लावण्यात उरलेला दिवस गेला. पण कुठेतरी, मनाच्या कोपऱ्यातला एक विचार, सतत मनाला टोचतो आहे. माझ्या सासू-सासऱ्यांनी साठाहून अधिक वर्षांमध्ये जोडलेला त्यांचा संसार मोडायला साठ मिनिटेही लागली नाहीत. 

आज मला प्रकर्षानं जाणवलं, की  घर मोडणं सोपं आहे पण घर जोडणं फार अवघड आहे. आज आपण एक घर मोडलं, हा विचार त्रासदायक होतोय. पण आता मनाच्या प्रवाहाला मोडता घालून हा क्लेशदायक विचार मला मोडीत टाकलाच पाहिजे!   

शनिवार, २ जुलै, २०१६

भाऊसाहेब नव्हे, भाऊच!

भाऊ गेल्याची बातमी फोनवरून समजली तेव्हा मी आणि आनंद हडपसरला एक कार्यशाळा घेत होतो. त्यामुळे तातडीने निघणे अशक्य होते. तरीही शक्य तेवढ्या लवकर कार्यक्रम उरकून आम्ही सुसाट वेगाने गाडी पळवत, शैलेश सोसायटीतील त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. पण तोपर्यंत भाऊंना तिथून वैकुंठाकडे नेलेले होते. मग तसेच उलटपावली वैकुंठ स्मशानभूमी गाठली. पण भाऊंच्या पार्थिवाचे दर्शन होऊ शकले नाही.

भाऊ म्हणजे, गजानन परशुराम सहस्र्बुद्धे, हे माझ्या माहेरच्या घरातले ज्येष्ठ जावई. आमच्या सर्वात मोठ्या आत्याचे, शान्ताआत्याचे यजमान. जुन्या काळात जावयांना साहेब, राव वगैरे उपाधी लावून संबोधण्याची पद्धत होती. म्हणून त्यांना सर्वजण भाऊसाहेब म्हणत. पण आम्ही मुले त्यांना भाऊच म्हणायचो. आमच्या सोलापूरच्या वाड्यात आमची आजी राहत असल्यामुळे भाऊ आणि शांताआत्याचे वरचेवर येणे व राहणे व्हायचे. दरवर्षी आम्हीसुद्धा पुण्याला त्यांच्या शिंदेआळीतल्या घरी जायचो. भाऊ आणि शांताआत्याबरोबर आम्ही बरेचदा सहलीलाही जायचो. त्यामुळे लहानपणी भाऊंचा सहवास लाभला. भाऊंच्या अनेक आठवणी मनात आहेत. स्वच्छ गोरा रंग, प्रसन्न हसरा चेहरा, घारे डोळे, सडपातळ देहयष्टी, बेताची उंची आणि हळू आवाजातले बोलणे असे भाऊंच्या बाह्यरूपाचे वर्णन करता येईल. पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू वर्णन करायला मात्र मला शब्द कमी पडतील.

भाऊ आणि शांताआत्याचे लग्न ज्या काळांत झाले त्या काळातील रूढीप्रमाणे, पत्रिकेतील गुण जुळल्यामुळेच त्यांचे लग्न झाले असणार. पण शान्ताआत्या आणि भाऊ या दोघांच्या प्रकृती मात्र अगदी भिन्न होत्या. तरीही त्या दोघांना त्यांच्या संसारात perfect communication, mutual respect आणि giving space to  each other हे अगदी छान जमले होते. त्यांचा संसार अतिशय सुखा-समाधानाचा होता. शिंदेआळीतल्या त्यांच्या छोट्याशा भाडोत्री घरात, दोन्हीकडच्या अनेक नातेवाईकांचा पाहुणचार अत्यंत प्रेमाने व्हायचा. शांताआत्याचा भक्तिमार्ग भाऊंना कधी भावला असेल असे वाटत नाही. पण शांताआत्याचा शब्द भाऊंनी कधी पडू दिला नाही. तिच्या पूजाअर्चेसाठी, ती सांगेल ती कामे भाऊ तिच्याप्रति असलेल्या भक्तिभावाने करीत असावेत.

नात्याने ज्येष्ठ व माझ्यापेक्षा वयाने पन्नास वर्षे मोठे असले तरी मला किंवा आम्हा कोणाही भावंडाना भाऊंची भीती कधीच वाटली नाही. ते  स्वभावाने शांत होते व लहान मुलांना ते खूप प्रेमाने वागवायचे. ते अतिशय हौशी होते आणि आमचे खूप लाड करायचे.  भाऊंच्या दृष्टीने 'मुले सांभाळणे' हे 'काम' नसून तो त्यांच्या  आनंदाचा भाग होता. लहान मुले त्यांच्याकडे बराच वेळ रमायची. अगदी रडकी, हट्टी मुलेसुद्धा त्यांच्याकडे गेली की शांत व्हायची. लहान मुलांना कडेवर घेऊन ते फेऱ्या मारायचे व अनेकदा झोपवावयाचेही. कदाचित त्यांच्या हाताचा प्रेमळ स्पर्श अगदी लहानग्या मुलालासुद्धा जाणवत असावा. त्याकाळांतल्या पुरुषवर्गात भाऊंचा हा गुण विशेष उठून दिसायचा.    

भाऊ तसे खूप बोलके नव्हते. पण ते स्वतः आणि माझे  वडील, म्हणजे दादा, हे दोघेही वकील असल्यामुळे त्यांच्या गप्पा विशेष रंगायच्या. भाऊ कमालीचे हजरजबाबी व विनोदी होते. अगदी हळू आवाजात ते एक-दोन शब्दच बोलून जायचे आणि उपस्थितांमध्ये खसखस पिकायची. काही विनोदी बोलत असतांना, भाऊंच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हालत नसे अथवा कोणतेही हातवारे वा अंगविक्षेप ते करत नसत. मी लहान असताना बरेचदा मला त्यांचे बोलणे कळत नसे. पण मोठी माणसे भाऊंच्या बोलण्याला हसून दाद देत असल्यामुळे ते काहीतरी विनोदी बोलत असावेत असा अंदाज येऊन मला मजा वाटे. पुढे त्या बोलण्यातला नर्मविनोद कळायला लागल्यावर मात्र त्यांची समयसूचकता आणि विनोदबुद्धी मला अधिकाधिक भावायला लागली.

भाऊ एक निष्णात वकील होते. कायद्यातल्या खाचाखोचा त्यांना नेमक्या माहिती असायच्या. कधी-कधी आमचे दादाही एखाद्या केसमध्ये भाऊंचा सल्ला घ्यायचे. भाऊंची समरणशक्ती अफाट होती. एखाद्या पक्षकाराची केस त्यांनी ऐकली व समजावून घेतली की ती त्यांच्या डोक्यात पक्की बसायची. त्यामुळे कित्येकदा त्या केसचे कागदपत्र समोर नसतानाही भाऊ उत्तमप्रकारे ती केस चालवू शकायचे. अर्थात भाऊंची ही महती मी दादांकडून फक्त ऐकलेली आहे. पुण्यात कोर्टाच्या आवारात भाऊंचे एक ऑफिस होते. शिंदेआळीतल्या त्यांच्या घरांत पक्षकार क्वचितच यायचे. कोणी आले तरी पाच दहा मिनिटांत त्यांचे काम उरकून भाऊ त्यांची बोळवण करीत असत. त्यामुळे भाऊ कोर्टातून घरी आले, काळा कोट काढला की कुटुंबियांना त्यांचा सहवास लाभायचा. याउलट, सोलापूरला आमच्या दादांचे ऑफिस घरातच असल्यामुळे ते घरी आले तरीही सतत पक्षकारांबरोबर कामात असायचे. म्हणूनच भाऊंच्या कामाच्या पद्धतीचे  मला खूप अप्रूप वाटायचे .   

भाऊ सगळ्या कुटुंबाचा आधारवड होते. कुणालाही कसल्याही प्रकारची मदत करायला ते तत्पर असायचे. मदत करताना त्या व्यक्तीला उपकाराच्या ओझ्याखाली त्यांनी कधीही दबू दिले नाही, हे विशेष. भाऊ कमालीचे शांत आणि विचारी होते. कोणत्याही गहन कौटुंबिक समस्येमधून ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास कुटुंबातील सर्वांना वाटायचा हे विशेष. आम्ही बद्रीनाथ व केदारनाथच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा भाऊंच्या स्थितप्रज्ञ वृत्तीची एक झलक मला अनुभवता आली. एका वळणावर आमची बस रस्ता सोडून दरीच्या कडेला गेली आणि एक चाक दरीच्या वर अधांतरी अशा अवस्थेत थांबली. सर्व प्रवाश्यांचा आरडाओरडा व रडारड सुरू झाली. भाऊंनी काहीही न बोलता बसमधील शेवटचा प्रवासी सुखरूप बाहेर पडेस्तोवर अव्याहत मदतकार्य सुरू ठेवले. जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर आम्हा इतर प्रवाशांमध्ये, सगळे कसे घडले, काय होऊ शकले असते आणि आता पुढील प्रवासाचे काय होणार, अशी चर्चा चालू होती. भाऊ मात्र दरीच्या कडेला उभे राहून शांतपणे दातांना मशेरी लावत होते!

भाऊ गेले तेंव्हा पुण्यात असून आणि प्रयत्न करूनही त्यांच्या पार्थिवापर्यंत पोहोचू शकलो नाही याची खंत सदैव जाणवेल. पण भाऊंच्या व्यक्तिमत्वाच्या उत्तुंगतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करणे तर माझ्या हातात आहेच! 

सोमवार, २७ जून, २०१६

प्रसिद्धी एजंसी

वर्षभराखाली आमच्या पारपत्रांची मुदत संपली. नूतनीकरणासाठी काय काय करावे लागेल याची इंटरनेटवरून माहिती वाचली, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि नियोजित वेळेवर कार्यालयाच्या बाहेर हजेरी लावली. रांगेमध्ये उभ्या असलेल्या बहुतांश लोकांनी एजंटमार्फत पासपोर्टसाठी अपॉईंट्मेंट घेतली होती. एजंटमार्फत का? असा प्रश्न विचारल्यावर एकापेक्षा एक अशी मजेशीर उत्तरे मिळाली. एकजण म्हणाले, "आपण पासपोर्ट कशासाठी काढतो? परदेशात जाण्यासाठी. तिकिट आणि इतर प्रवासखर्च मिळून आपण माणशी लाख-दीडलाख खर्च करणारच. मग एखाद्या एजंटला हजार बाराशे द्यावे लागले तर काय फरक पडतो ?" अजून कोणीतरी म्हणाले," आपल्या देशात कितीही सगळं कॉम्प्युटराईझ झालं तरीही, एजंट असल्याशिवाय कामं चटचट होतच नाहीत. एजंट लोकांच्या वरपर्यंत ओळखी असतात. काम अडकून पडण्यापेक्षा एजंटला पैसे दिलेले परवडतात" एका उच्चशिक्षिताने तर सरळ सांगितले " कितीही झालं तरी आपल्याकडून फॉर्म भरताना चुका होतातच. एजंटच ते रोजचंच काम असल्यामुळे त्यांच्याकडून चुका होत नाहीत आणि आपली नंतरची कटकट वाचते" अजून कोणीतरी म्हणालं," आमचे नेहमीचे एक एजंट आहेत. ड्रायविंग लायसेन्स काढण्यापासून ते व्हिसा मिळवून देण्यापर्यंत आमची सगळी कामं तेच करतात. अपॉइंटमेंट घेण्याचं काम आपलं आपल्याला  करता येतं, हेच मला माहिती नव्हतं". एकेकाची उत्तरे ऐकून आम्ही अवाक झालो. आमची अपॉइंटमेंट सुरळीत पार पडली आणि आठ दिवसांत नवीन पारपत्रे घरी आली.

काही दिवसापूर्वी घरी काम करणारी मोलकरीण महिना भरायच्या आधीच म्हणाली," मॅडम, मला दोन हजार ऍडव्हान्स द्या ना. दोन-तीन महिन्यात फेडते"
मी विचारले "का गं ? आता ऍडव्हान्स कशासाठी? मुलांच्या फिया दप्तरं सगळं तर झालंय ना नुकतंच. "
"बाई माजा नवरा ट्याम्पो चालवतो. दोन दिवसांत त्याचं डायविंग लायसन संपणार हाय. एजंटला पैसे देऊन करून घ्यायचाय उद्या."
" आधी नाही का जागं व्हायचं जरा?"
" आमाला आदी कळलंच नाय ना. लायसन संपणार हाय हे पन एजंटनं सांगितलं म्हनून कळलं. आता त्येच काढून देनार हाय एक दिवसांत लायसन "
" लायसन्स करायला इतके पैसे कुठे  लागतात? फारतर चारपाचशे रुपयांत काम होतं. एजंटच्या डोक्यावर तुमचे कष्टाचे पैसे असे कशाला घालवता?" मी कळकळीने म्हणाले.
"बाई आमाला तुमच्या सारखं लिवता वाचता येत असतं तर आमी कशाला गेलो असतो एजंटकडे ? आमच्या गल्लीतलाच एजंट हाय. बाहेरच्यांकडून तो तीन हजार घेतो. आमी गल्लीतच राहतो म्हणून दोनच हजारांत करतो. बाई द्या नं पैसे. लायसन येळेत नाय आला तर नवऱ्याला  घरीच बसावं लागेल"
मी काहीही ना बोलता पैसे काढून दिले.

आपल्या देशातले "एजंटराज"संपवायचे असेल तर "एजंटराज"ची प्रसिद्धी करणाऱ्या सुशिक्षित चालत्या बोलत्या एजन्सी आधी बंद पाडल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं ?


शनिवार, २१ मे, २०१६

गानकोकिळ

वसंत ऋतुची बहार खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर, पूर्ण ऋतूभर रोज, निसर्गाचे बारीक निरीक्षण करायला पाहिजे. सुकलेल्या झाडांना फुटलेली हिरवी-पोपटी रेशमी पालवी, हळूहळू बहरत जाणारी वेगवेगळी फुलझाडे, त्यांचे रंग आणि गंध सगळं अगदी संथपणे उपभोगावे. रोज पहाटे फिरायला जायची मला आवड आहेच. वसंत ऋतूत मला आपसूकच लवकर जाग येते. पहाटे चहा घेऊन झाला की मी निसर्गाचा वसंतोत्सव अनुभवायला बाहेर पडते. फुलांच्या रंगांच्या आणि सुवासाच्या उधळणीला वेगवेगळ्या पक्षांच्या शीळांची सांगीतिक साथ ऐकत फिरायला मस्त वाटतं. हे उष्णतेचे दिवस सुसह्य करायला कैरीचे आंबे, आईस्क्रीम्स, पन्हे, आणि इतर अनेक शीतपेये असतातच. पण रोज पहाटेचा गारवा अंगावर घेत, वसंतोत्सवाची मजा लुटत रंग आणि गंधांच्या धुंदीत दिवसाची सुरुवात झाली, की दिवसभराची उष्णता सहन करून, पुढच्या दिवशीच्या पहाटेचा उत्सव अनुभवण्याच्या ओढीने मी निद्राधीन होते.

वसंतागमनाची चाहूल, कोकिळ पक्षाच्या 'कुहू कुहू' आवाजामुळे लागते आणि संपूर्ण वसंत ऋतूत हे कोकिळगान सतत चालूच असते. बरेचदा एका कोकीळाने गायला सुरुवात केली की त्याला साथ द्यायला अजून एक दोन कोकिळ येतातच. कधीकधी दोन कोकिळांची जुगलबंदी चालू झाली की, हे कोकिळ आपापली लय वाढवून वरच्या पट्टीत, कमालीच्या जोरात, 'कुहू कुहू' गायला लागतात. काहीवेळ ही जुगलबंदी चालते आणि कसं कुणास ठाऊक, पण अचानकच त्यांचे ते  'कुहू कुहू' बंद पडते. मला अगदी  लहानपणापासूनच कोकिळांचा हा खेळ ऐकायला आवडते. माझ्या लहानपणी, आमच्या एकत्र कुटुंबाच्या घरात एकावेळी आम्ही सहा-सात भावंडे होतो. उन्हाळ्याची सुट्टी लागली की त्यात अजून आते-मामे भावंडांची भर पडायची. एखादा कोकिळ गायला लागला की आम्ही सगळी भावंडे मुक्तपणे 'कुहू कुहू' ओरडायला लागायचो. मग तो कोकीळ  चिडायचा आणि  जिवाच्या आकांताने ओरडायला लागायचा. आम्हाला मात्र 'कुहू कुहू' ओरडून अगदी मोकळे वाटायचे आणि खूप मजा यायची. आमहा मुलांचे असे आवाज लागलेले ऐकले की कोणीतरी मोठे माणूस आम्हाला दटावून, आमचे ओरडणे बंद करायला लावून, आमच्या आनंदावर विरजण घालायचे.

काल पहाटे माझे फिरणे संपायच्या वेळी माझ्या एका बालवर्गमित्राने रोजच्या त्याच्या रिवाजाप्रमाणे WhatsApp वर मला 'सुप्रभात' चा संदेश पाठवला. घरी पोहोचल्याबरोबर मी तो संदेश वाचला. "कोकिळ स्वत:ची भाषा बोलतो म्हणून तो मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची  भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून रहतो. स्वत:ची भाषा, स्वत:चे विचार आणि स्वत:वर विश्वास ठेवा. सुप्रभात!" मी तो संदेश वाचायला आणि एका कोकिळाचे गान चालू व्हायला गाठ पडली. मला एकदम लहानपणीसारखेच 'कुहू-कुहू' असा आवाज काढून कोकिळाला चिथवण्याची  सणक आली. आमच्या बेडरुममध्ये आनंद साखरझोपेत पहुडला होता, म्हणून मी दुसऱ्या बेडरुममध्ये गेले आणि अगदी मुक्तकंठाने  'कुहू कुहू' ओरडायला सुरुवात केली. ते ऐकल्यावर अर्थातच तो कोकिळ आपली लय वाढवत चेवाने ओरडायला लागला. मग मी त्याच्याहून वरच्या पट्टीत आवाज चढवून ओरडायला लागले. मला अगदी मुक्त वाटत होतं पण इतक्यात आनंदचे बोलणे कानावर पडले, "अगं अशी ओरडायला काय लहान आहेस का तू? आसपासचे लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर." मग मात्र मला माझा मुक्त छंद आवरता घेणे भाग पडले.

काही क्षण का होईना पण मनाने लहान होत, बालपणीची वेगळी मजा अनुभवायला मिळाली, हेही नसे थोडके! 

गुरुवार, १९ मे, २०१६

रंगबिरंगी

होळीच्या आसपास आणि पुढे महिना-दोन महिने  पहाटे फिरायला जाताना, निसर्गातल्या अनेकविध रंगांच्या फुलांची उधळण मला भुलवून टाकते. मला या नैसर्गिक रंगांच्या होळीपुढे, रंगपंचमी किंवा होळीचे रंग नेहमीच फिके वाटतात. त्यातल्या त्यात अनेक रंगी बोगन वेलीच्या फुलांचे रंग मला फार आवडतात. होळी आणि रंगपंचमीला, अनेक रंगांनी रंगलेल्या लोकांच्यामध्ये, पांढरे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती विशेष उठून दिसते. जणू तशीच, गुलबाक्षी, जांभळ्या, गुलाबी, अबोली, केशरी, पिवळ्या व लाल बोगनवेलीमध्ये, पांढरी बोगनवेल सुद्धा उठून दिसते आणि माझे लक्ष वेधून घेते.

या पांढऱ्या बोगनवेलीची एक मजा म्हणजे बरेचदा, तिच्या पांढऱ्या फुलांमध्ये कुठूनतरी हळूच गुलाबी रंग शिरलेला असतो. इतका हलका, इतका तरल गुलाबी रंग असतो की काही विचारू नका. त्या पांढऱ्या-गुलाबी फुलांच्या रंगाच्या छटा बघून मी थक्क होते. पांढऱ्या रंगाने रंगकाम चालू असताना, मधेच विधात्याचा कुंचला चुकून गुलाबी रंगात बुडाला असावा आणि त्यामुळेच या पांढऱ्या आणि गुलाबी रंगातील अनेक छटा निर्माण झाल्या असाव्यात असे वाटते. हा कुंचला, कधीकधी एकाच फुलामध्ये आणि कधी आसपासच्या अनेक पांढऱ्या फुलांमध्ये, गुलाबी रंगाच्या अनेक छटा भरतो .कधी या फुलांमधल्या गुलाबी छटेकडे पहिले की, एखाद्या गोऱ्यापान बाळाचे, थंडीमुळे  झालेले गुलाबी गाल  आठवतात. त्या आठवणीबरोबर नकळतच,  त्या गालांचा मुलायम स्पर्श, बाळाचे खळखळणारे हसू, निरागस निष्पाप भाव, गालावरची तीट आणि तेल-वेखंडाचा मिश्र वास, डोळ्यावरची अलगद झोप,सगळं जाणवायला लागतं. असं एखादं गोंडस बाळ डोळ्यासमोर आलं, की पुन्हा मातृत्वाची आस लागल्याशिवाय राहात नाही.


कधी कधी मात्र ही फुले, एका क्षणात मला लहानपणीच्या विश्वात नेतात. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी आजच्यासारखे घराघरांत मिक्सर किंवा फ्रीज नव्हते. आज बाहेर ठीक ठिकाणी सहजी मिळतात तसे,  आईस्क्रीम किंवा मिल्क शेक्सही त्यावेळी मिळायचे नाहीत. त्यामुळे आईस्क्रीम आणि मिल्क शेक्सचे आम्हाला अगदी अप्रूप असायचे. आमच्या घरी मिक्सर नसला तरी फ्रीज होता. उन्हाळ्याच्या दिवसांत दुधात रंग आणि इसेन्स घालून ते फ्रीजमध्ये गार करून, दूध कोल्ड्रिंक बनवून प्यायला खूप मजा यायची. घरच्या घरी पॉट आईस्क्रीम बनवून, सगळ्यांनी मिळून ते  खाणे म्हणजे तर एक पर्वणीच होती म्हणा ना. दूध कोल्ड्रिंकच्या किंवा आईस्क्रीमच्या दुधामध्ये, आई-आजी अगदी हळूच गुलाबी रंगाचा एखादा थेंब टाकायच्या. मग दुधाच्या पांढऱ्या रंगात, गुलाबी तरंग उठायचे. ते दूध चमच्याने हलवले की, पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या अनेक छटा निर्माण व्हायच्या. त्या दोन रंगांचे ते मीलन बघताना मी अगदी गुंग होऊन जायचे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच फुलणारी आणि मधूनच गुलाबी झालेली ही पंढरी बोगनवेल पाहताना, चक्क  मला लहानपणीच्या दूध कोल्ड्रिंकचा किंवाआईस्क्रीमचा गारवा आणि गोडवासुध्दा अनुभवायला मिळतो!



रविवार, २६ जुलै, २०१५

देवाचिया दारी!

काही दिवसांपूर्वी माझ्या वयस्कर आईला आळंदीला दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. वयोमानाप्रमाणे तिला चालताना थोडे कष्ट होत असल्याने गाडीने देवळाच्या शक्य तितके जवळ उतरून आम्ही चालत आत गेलो  साधारण साडेबाराच्या सुमारास देवळांत पोहोचलो असू. त्यावेळी विशेष गर्दी नव्हती पण नैवेद्याची वेळ असल्यामुळे, दर्शन एक वाजेपर्यंत बंद होते. मी चौकशी केली तेंव्हा कळले की, देवळाच्या मागच्या बाजूच्या दारावरच्या सुरक्षारक्षकांना विनंती केल्यास, वृद्ध किंवा अपंग भाविकांना लगेच आत सोडतात. मी आईला घेऊन देवळाच्या मागच्या बाजूला गेले व मुक्ताईच्या देवळाजवळ एका खुर्चीवर तिला बसवले. बरोबर एक वाजता तिथल्या सुरक्षारक्षकाने आम्हाला दोघींनाच आत पाठवले. आईचे दर्शन घेऊन होईपर्यंत, पुजाऱ्यांनी बारी थांबवलेली होती. त्यामुळे दर्शन उत्तमरीत्या पार पडले.

आम्ही बाहेर पडल्याबरोबर, आमच्या मागोमाग भाविकांची झुंड पुढील दाराने आत आली. त्यामध्ये आईपेक्षाही वयस्कर, वाकलेले, म्हातारे-कोतारे, अपंग- अधू असे कितीतरी भाविक बघून मला वाईट वाटले. कित्येकजण एक-एकटेच, काठी टेकत, कसेबसे तिथपर्यंत चालत आलेले होते. काहीजण परगावाहूनही आलेले असावेत. बरेचसे अशिक्षितही असावेत. मला वाटले, या सर्वच वयस्कर आणि अधू व्यक्तींना सुलभपणे देवदर्शन घेता यावे, यासाठी इथे कुठल्याही सोयी का नाहीत? 'मागच्या बाजूने गेल्यास विनासायास, रांगेत उभे न राहता दर्शन घेता येईल' ही माहिती, मी विचारली म्हणून मला कळली. इतर सर्व वृद्ध व्यक्तींना रांगेत तिष्ठत राहून दर्शन का घ्यावे लागले ? देवाच्या दारीचा हा कुठला न्याय ?

'देवळात सामान घेऊन जाता येणार नाही' असे सूचना फलक कोठेही लावलेले नव्हते परंतु, देवळाबाहेरचे काही दुकानदार, भाविकांना तसे सांगून, त्यांचे सामान स्वतःच्या दुकानांत ठेवायला भाग पाडत होते. काही भाविक आपले सामान दुकानदारांजवळ ठेवतही होते. देवस्थानात सामान न्यायला मनाई नसतांना, भाविकांनी त्यांच्या पिशव्या अथवा इतर सामान देवळाबाहेरील या दुकानदारांकडे ठेवून त्यासाठी पैसे का भरायचे? देवस्थानातर्फे चपला व सामान ठेवण्याची योग्य व्यवस्था का केलेली नसावी ?

देवळाच्या आवारांत सुरक्षेसाठी कॅमेरे बसवलेले आहेत तसेच 'आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर आहे' असे ठिकठिकाणी लावलेल्या पाट्यांवर लिहलेले होते. 'देवळाच्या आवारात पादत्राणे नेण्यास मनाई आहे', तसेच 'देवळाच्या आवारात मोबाईल नेण्यास मनाई आहे', अशा सूचनाही सर्वत्र लिहिलेल्या होत्या. सर्वजण पादत्राणे बाहेर काढून ठेवत होते. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांसकट कित्येकजण, मोबाईल  देवळाच्या आवारात घेऊन जाऊन मोठमोठ्या आवाजांत मोबाईलवर निवांतपणे बोलत होते. कित्येक भाविक आणि काही सुरक्षा कर्मचारीदेखील पान-तंबाखू खाऊन देवळाच्या आवारातच पिचकाऱ्या टाकून घाण करत होते. देवळाचा परिसर पान तंबाखूच्या पिंका, बिडी-काडी व इतर कचरा या सर्व गोष्टींनी प्रदूषित आणि अपवित्र होत होता.

देवळाच्या आवारांत सगळीकडे अस्वच्छता होती. फुलांचे हार आणि कोमेजलेली फुले इकडे-तिकडे पडलेली होती. ठिकठिकाणी पाणी सांडून घसरडे झालेले होते. आत जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या भाविकांकरिता  वेगवेगळे मार्ग असावेत म्हणून लावलेल्या धातूच्या दांड्या, जमिनीतून अर्धवट निखळून हलत होत्या. गर्दीच्यावेळी, भाविकांच्या लोंढ्याच्या रेट्याने, हा दांड्याचा अडसर तुटून, ऐन दरवाज्यातच अपघात होण्याची शक्यता होती. आवारात बारीसाठी बांबू लावून केलेली व्यवस्था अपुरी, तकलादू आणि अतिशय धोकादायक असल्याचे जाणवले. देवळांत किमान स्वच्छता आणि कोणी पडणार नाही किंवा चेंगरा-चेंगरी होणार नाही इतपत सुरक्षा असायला नको का? देवळाची आणि देवाची सुरक्षा जशी महत्त्वाची तशी भक्तांची सुरक्षाही महत्त्वाची नाही का?

आळंदी देवस्थानातील अस्वच्छता, ध्वनिप्रदूषण, देवस्थानाची आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा अभाव आणि भाविकांकडून पैसे उकळण्याचा किळसवाणा प्रकार ही सर्व दृश्ये माझ्या नजरेला खटकली. फक्त 'आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे' अशा पाट्या सगळीकडे लावून  भागणार आहे का? आळंदीला जाऊन  मला असे म्हणावेसे वाटले " देवा, कृपा करा, हे प्रकार उघड करणारे कुठलेतरी सीसी टीव्ही कॅमेरे तुम्हीच बसवा आणि हे प्रकार थांबवा"!

मंगळवार, १४ जुलै, २०१५

अखेर मी स्मार्ट झाले!

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी 'अजूनही स्मार्टफोन शिवाय ही कशी जगतेय?' हा प्रश्न माझ्या मित्रमंडळींना सतावत होता. पण, मी स्वतःला स्मार्ट समजत असल्यामुळे, स्मार्टफोन न वापरण्याचा माझा 'पण' मी बरेच दिवस टिकवला. परंतु, माझ्या पेशंटसचे आईवडील वरचेवर मला विचारायला लागले,  "बाळाचे रिपोर्ट, X-ray, बाळाला आलेल्या पुरळाचे फोटो, किंवा 'बाळ कसंसंच करतंय' त्याचा व्हिडीओ WhatsApp वर पाठवू का?".  तेंव्हा मात्र माझ्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे  माझी पंचाईत होऊ लागली होती .  


अनेक मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि  माझ्या लहानग्या पेशंटसच्या आईवडिलांना, "तुम्ही स्मार्ट फोन का वापरत नाही?" या प्रश्नाचे उत्तर देऊन-देऊन शेवटी मी कंटाळले. सुरुवातीला "माझ्याकडे  स्मार्टफोन नाही आणि मला तो वापरताही येत नाही" असं सोपं उत्तर मी देत असे. पण लोकांच्या टोमणेबाजीमुळे ती सोयही राहिली नव्हती. आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मॉडर्न मॉमने एकदा मला ऐटीत ऐकवले होते, "डॉक, मी की नाही, माझ्या बेबीला सांभाळणाऱ्या मेडला एक स्मार्टफोन घेऊन दिलाय. त्यामुळे मी सतत तिच्याशी WhatsApp वर कॉन्टक्टमधे असते. डॉक, ती डंब मेडसुद्धा स्मार्टफोन वापरते तर तुम्ही नक्की वापरू शकाल!"

असे अनेक अपमानास्पद अनुभव झेलून आणि लोकांच्या असंख्य प्रश्नांना कंटाळून मला जरा 'शहाणपण' आले आणि शेवटी एकदाचा मी स्मार्टफोन घ्यायचा निर्णय घेतलाच. लोकाग्रहास्तव फोन घेतेय, त्यामुळे उगीच जास्त खर्च नको, पाच हजाराच्या आतलाच फोन घ्यावा असं मी मनाशी ठरवलं.  हा माझा विचार, मोबाईलच्या दुनियेतील तरबेज भाचरंडांना आणि काही जवळच्या मित्र मंडळींना ऐकवला. तर काय, "पाच हजाराच्या आत कुठे काय बरा फोन येणार आहे का? तसला  स्मार्ट फोन घेणं आणि न घेणं सारखंच आहे"  असं बोलून  त्या सर्वांनी  माझ्या 'बावळटपणावर' शिक्कामोर्तब केलं.

कुणी म्हणालं " कॉलेजला जाणारी लोअर इकोनॉमिक क्लासमधली मुलंसुद्धा हल्ली सात आठ हजाराचे फोन वापरतात. आणि पाच हजारांत अगदीच कमी चॉइस मिळेल, कमीतकमी दहा हजारांचं  बजेट तर हवेच."

मग मी नाईलाजाने माझे बजेट वाढवून दहा हजारापर्यंत नेले.

"फक्त दहा हजाराच्या मोबाईलनं काही खास इम्प्रेशन पडणार नाही. त्यासाठी निदान वीस हजारचा स्मार्टफोन तरी घेचही काही हितचिंतकांची सूचना मात्र मी पूर्णपणे कानाआड केली.

माझ्या वाढीव बजेटमध्ये बसेलसा चांगला स्मार्टफोन शोधू लागल्यावर मात्र मी चांगलीच चक्रावले. दुकानांत त्या रेंजमधली दहा कंपन्यांची शंभर मॉडेल्स होती. त्यातून 'अँड्रॉईड' का 'विंडोझ?', 'जेली बीन' का 'आईस्क्रीम सँडविच', 'सिंगल सिम' का 'ड्युअल सिम', 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'? असले अनेक अगम्य प्रश्न विचारून आणि अनंत पर्याय  देऊन, दुकानदारांनी मला पूर्ण गोंधळात टाकलं. उच्चशिक्षित असूनही यातलं आपल्याला काहीच कळत नाही, हे मला उमगलं. आपल्या  या अज्ञानाचा फारसा गवगवा होऊ नये याची दक्षता घेत आणि  विनासायास  'ready answers' मिळवीत म्हणून मी माझ्या भाचीला फोन लावला.

माझ्या शंकांचे निरसन न करता, "ते सगळं तुझ्या युजवर डिपेंड आहे आणि ते तुलाच ठरवावं लागेल" असे स्मार्ट उत्तर अगदी  तत्परतेने तिने देऊन टाकले! त्यातून वर, "आत्या, अगं मोबाईल घ्यायला दुकानांत कशाला गेलीस? फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वर मॉडेल्सची रेटिंग्स आणि कॉनफ़िगरेशन्स बघायची, काहीऑफर्स मिळत असतील तर घ्यायच्या आणि ऑनलाईन मागवून टाकायचा." असा फुकट सल्ला देऊन मला वेड्यात काढलं ते वेगळंच!

आता मात्र स्वाभिमान जागृत झाल्यामुळे मी पेटून उठले. भाचीने सुचवलेला हा साधा-सोप्पा मार्ग पडताळून बघायचाच असं मी ठरवलं. मग काय विचारता! ऑपरेटिंग सिस्टम्स,प्रोसेसर्स,मॉडेल्स आणि त्यांची रेटिंग्स असे माझे नवीन ऑनलाईन शिक्षण चालू झाले. शेवटी माझ्या वापरासाठी योग्य आणि अगदी 'value for money' अशा मॉडेलचा शोध मला लागला. पण तो इतका दहा हजाराचा फोन ऑनलाईन मागवण्यापूर्वी एकदा आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघावा, हाताळावा, या विचाराने  एक दोन दुकानांत / virtual stores मध्ये  गेलेच .


मी ठरवलेल्या मॉडेलची किंमत प्रत्येक दुकानात, ऑनलाईन मार्केटपेक्षा जवळ-जवळ एक हजार रुपयांनी जास्त होती. साहजिकच 'हे असं कसं?' हा प्रश्न मनांत आलाच. उत्सुकतेपोटी, "हेच मॉडेल ऑनलाईन स्वस्त कसं हो?" हे विचारण्याचा बावळटपणा केलाच. उत्तरादाखल, "भारतात ऑनलाईन मालाचा काय भरवसा? बघा बुवा, इथे असलं करणं काही शहाणपणाचं नाही. कदाचित फसाल बरं का!" असं एक पिल्लू दुकानदाराने सोडून दिलं! 

आता मात्र माझी पंचाईत झाली. फोन दुकानातून घ्यावा का ऑनलाईन घ्यावा, अशी  व्दिधा मनस्थिती असली तरी, ऑनलाईन स्वस्त मिळत असल्यामुळे मन तिकडेच ओढ घेत होते. "फोन ऑनलाईन मागवल्यावर हे असलं काही होणार नाही ना?" असं विचारायला पुन्हा भाचीला गाठले. तर तिने, "मी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मागवते. पण कधीही फसलेले नाही. तू मागवून बघ काय होतय ते!" असे सावध उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतली आणि माझी धाकधूक मात्र अजूनच वाढवली.

योगायोगाने, 'अमेझॉन इंडिया' मध्येच वरच्या हुद्द्यावर काम करणारा माझा एक भाचा त्याच रात्री जेवायला येणार होता. जेवणं झाल्यावर मी, "काही फसवणूक तर होणार नाही ना? दुकानापेक्षा ऑनलाईन स्वस्त कसं? फोन खराब निघाला तर पैसे परत करतात का?" वगैरे माझ्या सगळ्या शंका-कुशंका भाच्याला  धडाधड विचारून टाकल्या.
"मावशी, तसं काहीही होणार नाही, तू निर्धास्त रहा." त्याने अत्यंत हसतमुखपणे मला दिलासा दिला. परंतु, मनातल्या मनात, "आमची अमेझॉन काय अशी चलती-फिरती कंपनी आहे काय? इतकी शिकली आहेस पण काय उपयोग? इतकं कसं कळत नाही? असले प्रश्न पडतातच कसे?" असा, माझी कीव करणारा, विचार त्या हास्यामागे  दडलेला होता की काय, असेही क्षणभर मला वाटून गेले .
इतकी हमी मिळाली तरी ऑनलाईन मागवलेला फोन हातात येईपर्यंत माझ्या अगदी जीवात जीव नव्हता. पैसे तर आधीच कापले गेलेले असल्यामुळे कुठे माशी शिंकायला नको अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. जेमतेम दोन दिवसांत फोन घरपोच येऊन पोहोचलासुद्धा! सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला.

या सगळ्या प्रवासांत स्मार्टफोनबद्दलचे माझे ज्ञान मात्र भलतेच वाढले. त्यामुळेच आताशा कुणी ओळखीचं भेटलं की त्यांना "तुमच्या स्मार्टफोनचा प्रोसेसर कुठला? स्क्रीन ४.७ इंच का ५.५ इंच?" असले प्रश्न मी हटकून विचारते. मधे एका स्मार्ट मुलाला त्याच्या फोनचा प्रोसेसर कुठला आहे असे विचारल्यावर त्याने "सिंगल सिम" असे सांगितले. मी जेंव्हा हसून म्हटलं, "अरे, 'क्वाड कोअर' का 'ड्युअल कोअर'?", तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळलेला भाव, माझ्या वाढलेल्या 'भावाची' साक्ष पटवून गेला.
माझ्या एका मैत्रिणीने  कौतुकाने मला सांगितले, "मला जेली आवडत नाही ना, म्हणून यांनी त्यांचा 'आईस्क्रीम सँडविच' वाला स्मार्टफोन मला दिला आणि स्वतःसाठी 'जेली बीन' वाला घेतला!" मला मात्र तिच्या अज्ञानावर आणि भाबडेपणावर हसावे का रडावे ते कळेना!
एका प्रथितयश डॉक्टर मित्राने मला सुनावले, "अगं, फोनचा price tag महत्वाचा असतो, प्रोसेसर नाही काही!
या सगळ्यावर कळस म्हणजे ड्युअल सिम handset मध्ये एकाच वेळी दोन सिम कार्ड घालता येतात याचा माझ्या ओळखीतल्या एका सुशिक्षित बाईंना पत्ताच नव्हता!

बऱ्याच लोकांना स्मार्ट दिसण्यासाठी स्मार्टफोनची गरज असते, असं आता माझं मत झालंय. स्मार्टफोन वापरणाऱ्या बराचशा लोकांना, फोन करणे व घेणे, गेम्स खेळणे, सेल्फी काढणे आणि Whatsapp वर चकाट्या पिटणे याव्यतिरिक्त तो अजून कशाकशासाठी वापरता येतो याचा गंधच नसतो. आता हे कळल्यामुळे माझा स्मार्टनेस मात्र कमालीचा वाढलाय हे जाणवते !

बुधवार, ८ जुलै, २०१५

माझा फेसबुकमधला 'जॉब'!

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अनिरुद्धला अमेरिकेतील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे कळल्यावर मी  रडायलाच लागले.
"आईआता सगळं मनासारखं झालंयअसिलताप्रमाणे मलाही चांगले कॉलेज मिळायला हवे, ही तुझी इच्छाही  पूर्ण झालीय. मग आता का रडतेयस? "
आनंदनेमाझ्या नवऱ्याने अनिरुद्धला समजावले. "अरे, आनंदाश्रू आहेत ते. रडू दे मनसोक्त. हलकं वाटेल जरा तिला." 

खरेदीअमेरिकेचा व्हिसासामानाची बांधाबांध या गडबडीत पुढचे काही दिवस कसे गेले ते कळलेच नाही. अनिरुद्धचे जाणे दोन दिवसावर आले. पण माझे मन काही थाऱ्यावर नव्हतेच. वरचेवर डोळे पाण्याने भरून येत होते. एकदा अनिरुद्धच्या लक्षात ते आलेच.
"आई आता काय झालंय रडायला ?"
"काही नाही रे. डोळ्यात काहीतरी गेलं आणि पाणी आलंय" मी गडबडीने सारवासारव केली.
"आईहे काय चाललय काय तुझंआजकाल तू एकतर गप्प गप्प तरी असतेस किंवा सतत डोळ्यात पाणी आणत असतेस."
यावर मी काहीच उत्तर न दिल्यामुळे तो जास्तच वैतागून म्हणाला, "आईचं मन तुला कधीच कळायचं  नाही, कारण  तू कधीच आई होणार नाहीस' ' हा तुझा नेहमीचा डायलॉग नको ऐकवूस"
माझ्या डोळ्यात जास्तीच पाणी जमायला लागलेले पाहूनअनिरुद्ध कावरा बावरा होऊन म्हणाला,
"तू अशी रडत राहिलीस तर जाताना मला किती त्रास होईलयाचा तरी विचार कर."
"तू दूर चालला आहेस याचा त्रास होतोय रे फार"  मी हुंदका देत म्हणाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आनंदने वर्तमानपत्रातून डोके वर काढले.
"अगंत्याला बाहेर पाठवण्यासाठीतुझीच तर किती धडपड होती. चांगल्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपवर तो चाललाययाचा आनंद त्याच्या विरहाच्या त्रासापेक्षा नक्कीच  जास्त आहे नाअसा  रडवेल्या चेहऱ्याने  निरोप  दिलास तर त्याला बरं वाटेल कासांग बरं?
"आनंद तर आहेच रेपण आता मी अगदीच जॉबलेस होणार याचंही कुठेतरी वाईट वाटतंय"
"धिस इज नॉट फेयर हंआई! 'तुझी बारावी होईस्तोवर माझी काही सुटका नाही'; 'एकदा का तू कॉलेजला गेलास, की मी माझ्या मनासारखं आयुष्य जगणार'असली तुझी वाक्ये सतत चार वर्षे ऐकून कान  किटले होते माझे. वर आता ही रडारड!"
अनिरुद्धच्या आवाजाला आता भलतीच धार आली होती. पण माझा रडवेला चेहरा बघूनसमजूत काढत तो  म्हणाला,
"अगं जॉबलेस व्हायला तू रिकामी कुठे असतेससकाळी फिरायला जातेसस्वैंपाक करतेस आणि दिवसभर तुझी प्रॅक्टीस असतेच की. वाचनसंगीतनाटक, सिनेमा या सगळया गोष्टींची तुला आवड आहे. कसा वेळ जाईल ते तुला कळणारही नाही."
"ते खरं आहेपण आत्तापर्यंत मी काहीही करत असले तरी मनांत सतत तुम्हा मुलांचाच विचार असायचा. तुमचं सगळं करणं आणि तुमच्या अभ्यासावर लक्ष ठेवणंहाच जणू माझा 'फुलटाईम जॉब' होता. त्यामुळे, ना  कधी मी मेडिकल कॉन्फरन्सेसना गेलेना इतर बायकांसारखी भिशी आणि लेडीज  क्लबमध्ये रमले. आता नव्यानं यातलं काही सुरु करावंस नाही वाटत. एकदम पोकळी निर्माण झाली आहे रे" मी हुंदका आवरत म्हणाले.
"होपण माझ्यावर लक्ष ठेवण्याच्या जॉब मधून तुला मी मोकळं करतोय याचं मला किती समाधान वाटतंय, ते तू समजूच शकणार नाहीस." अनिरुद्ध हसत-हसत म्हणाला. बाप-लेकांची नेत्रपल्लवी झाली आणि आनंदनेही गालांतल्या गालांत हसून घेतले.

माझं 'अभ्यासावर लक्ष ठेवणंहा मुलांचा आणि आनंदचा खास चेष्टेचा विषय होता. घारीने पिल्लावर नजर ठेवावी तशी मी अनिरुद्धवर पाळत ठेवून असायचे. तो कधी उठतोयकधी झोपतोयकोणत्या मित्र-मैत्रिणीशी किती वेळ आणि काय बोलतोयइंटरनेटवर किंवा इतरत्र टाईमपास करतोय काया सगळ्यावर माझे अगदी बारीक लक्ष असायचे. माझ्याकडून कधी अतिरेक झालाकी तो चिडायचाआमची वादावादी सुरु व्हायची आणि अशा युद्धप्रसंगांतआमच्यात तह घडवून आणण्याची जबाबदारी आनंद अगदी खुबीने पार पाडायचा.
"जोक्स अपार्ट. पण आईमी तुला एक चांगली आयडिया देतो. बघ पटतेय का! तू सकाळी फिरायला जातेस  आणि तिथे दिसणाऱ्या माणसांशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी आम्हाला त्यांच्याबद्दल काही-बाही सांगत असतेस. आता असं करत्या सगळ्यांशी प्रत्यक्षात ओळख करून घेहळूहळू गप्पा मारायला लाग. नवनवीन मित्र-मैत्रिणीचे ग्रुप्स मिळतीला बघ."
ही आयडिया मी फारशी उचलून न धरल्याने तो इतर उपाय सुचवू लागला.
"नाहीतर तुझ्या जुन्या मैत्रिणींशी पुन्हा फोनवर गप्पा सुरु कर किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तुझ्या आवडत्या सास-बहू सिरियल्स पाहणं पुन्हा सुरु कर"
माझ्या या दोन्ही आवडी - व्यसनच म्हणा ना - घरातल्यांचा खास चेष्टेचा विषय होता. गेली काही वर्षे त्या व्यसनांवर मी नियंत्रण ठेवलेले होते. मुलांच्या दहावी-बारावीच्या वर्षांत तर ही 'व्यसने' पूर्ण बंदच होती.
माझ्या 'व्यसनांचेसंभाव्य धोके लक्षांत येताच आनंद एकदम सावध झाला आणि अनिरुद्धला डोळ्याने दटावतपण अगदी प्रेमळ आवाजांत म्हणाला,
"मी काय म्हणतो स्वातीतू पूर्वीसारखे दोनवेळा फिरायला जालोकांशी गप्पा मारायला सुरु करम्हणजे दोन्ही वेळचे मिळून अनेक  ग्रुप्स होतील तुझे!"
"आनंदतुझं तिरकस बोलणं मला समजतंय बरं का मला. मैत्रिणींशी फोनवर बोलण्यावरून कमी टोमणे ऐकवलेयत का आजपर्यंतआणि अनिरुद्धतुझे हे  'सीरियल किलर' बाबा मला एकतरी सीरियल निवांतपणे बघू देतील का? "
माझ्या आवाजातला फणकारा जाणवल्यामुळे आनंदने गडबडीने परत वर्तमानपत्रांत डोके खुपसले.
"फिरायला जाताना दिसणाऱ्या लोकांशी माझी  जेमतेम तोंडओळख आहे. फारशी ओळख नसतानाअसं जाऊन कसं बोलायचंमला नाही रे जमणार ते!"
"हो काआमच्या अभ्यासाबद्दल चौकशा करायला जाऊन बोलायचीस की बिनदिक्कतपणे अगदी अनोळखी लोकांशीही. तेंव्हा कसं जमायचं तुलाकाही वेळा तर अक्षरश: लाज आणायचीस आम्हाला." अनिरुद्धने आता  मला शब्दांत पकडले.
"अरेत्यावेळी तसं करणं आवश्यकच होतं. तुम्हां मुलांचा अभ्यास हा एक कॉमन दुवा असायचा आमच्यांत.  जाऊ देमाझ्या जॉबलेस होण्याच्या प्रॉब्लेमला काही उपाय नाही. पण तू नको काळजी करूस माझी. " मी सुस्कारा सोडत म्हणाले. 
तरीही अनिरुद्ध बेचैन होता. थोडावेळ विचार करून जरा  भीत-भीतच म्हणाला,
"आईतू मला रागावणार नाहीसअसं आधी प्रॉमिस देमग मी एक भन्नाट आयडिया  देतो "
शाळेत डबा हरवला, शिक्षा झाली किंवा परीक्षेत काहीतरी घोळ झालाकी मला ते  सांगायच्या आधी ही असली प्रॉमिसेस मागूनअभयदान घेण्याची अनिरुद्धची नेहमीची युक्ती होती.
मी चटकन प्रॉमिस देऊन टाकले. 
"हे बघफेसबुक बद्दलची तुझी जहाल आणि अगदी जुनाट मते जगजाहीर आहेत. पण आज तू माझं ऐकच. तुझ्या 'जॉबलेसहोण्यावरचा उत्तम उपाय म्हणजे तुझे फेसबुक अकाऊन्ट उघडणे!"
आत्तापर्यंत अनिरुद्धच्या फेसबुक अकाऊन्टवरून आम्हा दोघांची झालेली तोंडातोंडी लक्षांत घेता त्याला अभयदान घेणे आवश्यकच होते!

पुढचा काही काळ मला फेसबुकची महती ऐकवून, माझ्या जोरदार विरोधाला न जुमानता, शेवटी त्याने माझे फेसबुक अकाऊन्ट उघडून दिले. तसेच अकौंटवर जाणेफ्रेंड रिक्वेस्ट पाठवणेचॅटींग  करणेफोटो अपलोड करणे वगैरे गोष्टी माझ्या अज्ञानावर न चिडता, अतिशय संयमाने शिकवल्या आणि त्यांचा सरावही करून घेतला. मुलगा दूर जायच्या वेळी त्याचे मन दुखावायला नको म्हणून मी ते सर्व शिकून घेतले खरेपण 'वेळ वाया घालवण्याचे एक निरुपयोगी साधनहे फेसबुक बद्दलचे माझे मत तो बदलू शकला नाही!

अमेरिकेला पोहोचल्यानंतर अनिरुद्धचा ना काही फोन, ना ईमेल, ना आमच्या ईमेलला उत्तर. आनंद स्थितप्रज्ञ असल्यामुळे, शांत होता. मी मात्र काळजीने कासावीस झाले. अनिरुद्धशी कसा संपर्क साधावा या विचारांत असतानाच माझ्या भाच्याचा फोन आला,
" मावशी, अनिरुद्धची अगदी ऐष आहे , मस्त रूम मिळालीय आणि कॅम्पस तर कसला पॉश आहे!"
"अरे तुला कसं कळलं? फोन आला होता का तुला ?"
"फोन कशाला पाहिजे? त्याच्या FB च्या पोस्ट्स बघ ना. अरे हो. पण तू कशी बघणार ? तू तर FB ची कट्टर विरोधक नां!" भाचा खोचकपणे म्हणाला.
"मी बघते ना लगेच माझ्या FB अकाऊन्टवर" आता माझ्या भाच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी होती. मी गडबडीने फोन ठेवून कॉम्प्यूटरकडे गेले, महत्प्रयासाने फेसबुक अकौंटमध्ये लॉग-इन केले. अनिरुद्धचे नवीन फोटो पाहून भराभर लाइक्स टाकले. तो सुखरूप पोहोचलाय आणि मजेत आहे हे पाहिल्यावर मला अगदी हुश्श झाले. पण त्याने खुशाली न कळवल्यामुळे उफाळून आलेला राग त्याला एक खरमरीत मेसेज पाठवल्यावरच जरा शांत झाला. क्षणार्धात अनिरुद्धचे उत्तर आले. काय तर म्हणे, मला फेसबुक वापरायला भाग पाडण्यासाठीच त्याने मुद्दाम फोन किंवा ईमेलवर खुशाली कळवली नव्हती ! मनोमन  चिडले, चडफडले तरी मी काहीही करू शकत नव्हते. त्याची खुशाली कळण्यासाठी, वरचेवर फेसबुकवर जाण्याशिवाय त्याने आता मला पर्यायच ठेवलेला नव्हता!

हळू-हळू मी फेसबुक वापरू लागले. जुन्या मित्र-मैत्रिणींना, ओळखीतल्या आणि नात्यातल्या लहान-मोठ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, आलेल्या रिक्वेस्ट मान्य करणे सुरु झाले. बघता-बघता माझा मित्रपरिवार पाचशेच्या वर गेला. त्यांच्या आयुष्यातल्या बित्तंबातम्या मला आता फेसबुकवरूनच कळायला लागल्या. सुरुवातीला इतरांचे फोटो बघणे, कॉमेंट्स वाचणे, अशा बघ्याच्या भूमिकेत मी होते. पण बघता बघता स्वत:च्या पोस्ट आणि कॉमेंट्स टाकणे सुरु झाले. त्यामुळेच मग वारंवार अकाऊन्ट उघडून आपल्याला किती लाइक्स किंवा कॉमेंट्स येताहेत, हे बघण्याचा चाळाच लागला. नवीनच लागलेल्या चॅटींगच्या व्यसनामुळे, पंधरा-सोळा वर्षे एकत्र शिकूनही एका शब्दाचीही देवाण-घेवाण न झालेल्या, वर्गमित्रांशीसुद्धा माझ्या  चक्क दिलखुलास गप्पा सुरु झाल्या.

फेसबुकमुळे काही व्यक्ती मला अगदी नव्याने उमगल्या. वरकरणी रुक्ष वाटणारे, कलासक्त किंवा कविमनाचे  निघाले. तर  काही पोक्त व्यक्तींच्या थिल्लर पोस्टसमुळे त्या व्यक्ती माझ्या मनातून कायमच्या उतरल्या. काही कोवळ्या वयाच्या मुला-मुलींचे प्रगल्भ विचार वाचून मी अगदी भारावून गेले. त्यामुळे हल्लीची मुले फेसबुकवर फक्त टाइमपास करत असतात हे माझे मत हळू-हळू बदलायला लागले. "फेसबुक हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. त्याला नावे न ठेवता पालकांनीच आपापल्या मुलांना ते योग्य प्रकारे वापरायला शिकवावे " हे अनिरुद्धचे मत आता मला पटायला लागले. अनिरुद्ध पहिल्यांदाच सुट्टीवर आल्या-आल्या, "फेसबुकच्या प्रेमात पडून मी ते चक्क एन्जॉय करतेय" अशी प्रांजळ कबुलीही त्याला देऊन टाकली.

तो सुट्टीवर असतानाच, एका लग्नाला जाऊन आम्ही घरी आल्या-आल्या त्याने माझ्यावर तोफ डागली,
"आई काय चालवलं आहेस तू हे ? आज तुझ्यामुळे मला सगळ्या भावंडांची बोलणी खावी लागली."
"काय बोलतोयस? मी काय केलंय ?" मी आश्चर्यमिश्रित रागाने म्हणाले.
"शिल्पामावशीला सांगून जयेशचे FB अकाऊन्ट बंद करवलेस ना तू?"
"हे बघ, मी काही अकाऊन्ट बंद  करायला लावलेले नाही, "जयेश बरेचदा फेसबुकवर दिसतो", एवढंच  फक्त  मी शिल्पाला सांगितलं. तिला माहीतच नव्हतं त्याच्या अकाऊन्टबद्दल. आता तिनं जयेशला ते  बंद करायला लावलं, तर त्यात माझा काय दोष ? "
"पण तुला शिल्पामावशीला सांगायची गरजच काय होती ?"
"अरे, जेमतेम दहा वर्षांच्या जयेशला काय करायचंय आत्तापासून फेसबुक? बरं शिल्पा आणि शिवेन दोघं दिवसभर घराबाहेर. जयेश कॉम्प्यूटरवर अभ्यास करतोय का फेसबुकवर टाईमपास करतोय  हे तिच्या सासूबाईना कसं कळणार? मी शिल्पाला सांगितलं, त्यांत माझं काहीही चुकलेलं नाही."
"पण आई थोडावेळ एफबी चा ब्रेक घेतल्यामुळे अभ्यास चांगला होतो, हे तू कधी का नाही लक्षांत घेत?"
"हे बघ, ते मला सांगूच नकोस. मला कधीच पटणार नाही. आम्ही काय अभ्यास केला नाही का कधी?  ब्रेकसाठी  इतर बरंच काही करता येतं." मी त्याला निरुत्तर करून पुढे म्हणाले,
"बघ, चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये जयेश आला की नाही राज्यांत पाचवा?"
"तू असं बोलतेयस की जणू फेसबुक बंद झाल्यामुळेच तो राज्यांत पाचवा आलाय" अनिरुद्ध उसळून म्हणाला.
"मी डायरेक्टली तसं काही म्हणाले आहे का? पण इनडायरेक्टली ते एक कारण आहेच "

थोडा वेळ शांततेत गेला असेल नसेल, पुन्हा अनिरुद्ध उसळून म्हणाला,"बरं दीपक तर चांगला वीस वर्षांचा आहे, पहिला येतोय कॉलेजमध्ये. मग त्याची चहाडी करायला कुणी सांगितलं होतं तुला?"
"कुणी सांगायला कशाला पाहिजे? त्याच्या पोस्ट बघितल्या होत्यास का तू? काही योग्य-अयोग्यचा विचार नको का आपल्या मुलांना? दीपकचे काही चुकतंय असं वाटलं, तर मी सांगायचं नाही का मामाला? "
"माझं चुकलं तर बोल ना मला. पण दुसऱ्यांच्या मुलांना का उगीच त्रास देतेस ?"
"हे बघ. माझ्या चुलतभाच्याला मुलाला, दुसऱ्याचा मुलगा समजायला, मी काही अमेरिकेत नाही राहात. आणि अमेरिकेतसुद्धा जवळचे लोक असं करतात. पाहिलंय ना मी त्यांच्या  सीरियल्समध्ये."
आता मात्र अनिरुद्धला गप्प बसणे भागच होते.
पुढचे चार दिवस गोडी-गुलाबीत गेले. अनिरुद्धचं मित्र-मैत्रिणींबरोबर सिनेमाला आणि जेवायला बाहेर जाणं चालू होतं. एक दिवस तो तणतणच घरी आला.
"आई तुझ्या वागण्याने तू मित्र-मैत्रिणींशीही माझे संबंध बिघडवून टाकणार आहेस"
"आता काय झालं बाबा?" मी शांतपणे विचारलं .
"शर्मिलाने तुझं नाव घेतलं नाही इतकंच. पण म्हणाली की एफबी वर तुझी फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्वीकारली आणि  दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने तिचे फोटो डिलीट करायला लावले"
"बरं झालं बाई. कसेतरीच फोटो होते ते. शर्मिला आणि तिला चिकटलेली चार-पाच मुलं. शाळेच्या सेंड-ऑफला हे असले फोटो काढून घ्यायचे? आणि वर ते फेसबुकवर प्रदर्शनाला ठेवायचे? तिच्या आईला नसेल चाललं ते!"
"तिने काय करावं हा तिचा प्रश्न आहे ना. तिच्या आईला फोटोबद्दल सांगण्याचा उद्योग तुझाच असणार"
"माझ्यासारख्याच इतर कुणा हितचिंतकाने सांगितलं नसेल कशावरून? जे झालंय ते शर्मिलाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्यच झालंय. पुढे जेंव्हा ती आई होईल आणि तिची मुलगी जेंव्हा वयांत येईल तेंव्हा कळेल तिला. " माझ्या कृत्याची कबुली न देण्याची सावधगिरी बाळगत, मी ठासून म्हणाले.
"आई, तू काय करशील आणि कुठलं बोलणं  कुठे नेशील याचा नेम नाही. यू  आर अन इम्पॉसिबल लेडी!" अनिरुद्धच्या या वाक्यावर, आनंदचा चेहरा इतका फुलला होता की कुठल्याही क्षणी तो टाळ्या वाजवेल, असे मला वाटले !

अनिरुद्ध अमेरिकेला परत जाण्याआधी त्याला भेटायला लोकांची ये-जा चालू होती. माझी एक मैत्रीण तिच्या नववीतल्या मुलाला घेऊन, बारावीपर्यंतच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, कुठली पुस्तके वापरावीत असा महत्वाचा सल्ला विचारायला आली होती. बोलता बोलता आमचा विषय फेसबुककडे वळला.
"तो फेसबुकवर नसेल तर उत्तमच. पण असेल तर जास्त वेळ घालवणार नाही यावर लक्ष ठेव. पुढची चार वर्षे फार महत्त्वाची आहेत."
हे बोलून मी चहा करायला उठले. स्वयंपाकघरात जाता-जाता सहज मुलांच्या खोलीत डोकावले तर अनिरुद्धचे बोलणे कानावर पडले,
"पुढची चार वर्षे फार महत्त्वाची आहेत. मावशी सतत आठवण करून देईलच तुला. नियमित अभ्यास कर. पण त्याच बरोबर कॉम्प्यूटर गेम्स, ग्राउंडवरचे खेळ, फेसबुक, हे सर्व थोडं थोडं करत जा. नाहीतर पकशील लेका."
"आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट आधीच सांगून ठेवतो. माझी आई आजच तुला एफबी वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल, ती इग्नोअर कर आणि शहाणा असशील तर तुझ्या आईला एफबी वापरायला मुळीच शिकवू नकोस!"
अर्थातच चहा झाल्याबरोबर मी मैत्रिणीला फेसबुक अकाऊन्ट उघडून देऊन वापरायला शिकवले!

अनिरुद्ध अमेरिकेला गेल्यापासून फेसबुकमधल्या माहिती आणि मनोरंजनाच्या दुनियेमध्ये माझा फावला वेळ उत्तम जात होताच. पण हल्ली माझ्या ओळखीतल्या तमाम बायकांना मी फेसबुक अकाऊन्ट उघडून देते आणि "फेसबुकसकट सगळीकडेच आपापल्या मुलांना योग्य मार्गावर ठेवा" असा सल्लाही देते. अर्थात, मी स्वतःदेखील त्यांच्यावर लक्ष ठेवून असते हे सांगायला नकोच!

फेसबुकमधल्या या 'जॉब' मुळे मला आता अजिबात 'जॉबलेस' वाटत नाही!







  

रविवार, ५ जुलै, २०१५

छत्री उलटली!

पुण्याच्या पावसाळयात, मला कधीतरीच छत्री वापरण्याचा योग येतो . माझ्याकडे आधीची एक छत्री होती . ती जरा स्वस्तातली असल्यामुळे, तकलादू होती. त्यात जरा वारं भरलं, की ती उलटायची आणि मग भिजायला व्हायचं. उलटून-उलटून ती छत्री निकामी होऊन गेली. मागच्या महिन्यांत इथे सतत आठवडाभर फारच पाऊस होता. एक दोनवेळा पावसांत बाहेर जायला लागले आणि तेंव्हा छत्रीशिवाय माझी चांगलीच पंचाईत झाली . त्यामुळे मग मी नवीन छत्री घ्यायचे ठरवले.  आता तरी अशी उलटणारी ही छत्री नको, म्हणून  चांगली महागातली आणि मजबूत छत्री घेतली. पण मजा बघा , नवीन छत्री घेतल्यापासून पुण्यातला पाऊस गायब. त्यामुळे नवीन छत्री वापरायचा योगच नाही आलेला अजून!

तात्पर्य काय? छत्री कुठलीही आणि कितीही महागातली घ्या, अशी ना तशी, ती उलटणारच!

सोमवार, २९ जून, २०१५

शब्दबोध

आमची आजी अगदी नेमस्त होती. रोज पहाटे-पहाटे  उठायची. अंघोळ वगैरे आटपून, एखादा तासभर एका ठराविक क्रमाने काही स्तोत्रे आणि श्लोक म्हणत देवपूजा करायची. आम्ही भावंडे साखरझोपेत असताना, तिचे ते हलक्या आवाजातले पण एका ठराविक चालीतले ते म्हणणे आमच्या कानावर पडत असायचे. त्यातल्या काही ओळी आजही माझ्या डोक्यात मधून मधून घोळत असतात.

कधी कधी तर स्वप्नांत मला असाही भास होतो की आपण सोलापूरच्या माहेरच्या घरातच आहोत आणि आजी आसपास काही स्तोस्त्र अथवा काही श्लोक म्हणते आहे आणि मधूनच आम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी हलक्याशा, प्रेमळ आवाजात हाक मारतेय! तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल, कदाचित विश्वासही  बसणार नाही, पण माझ्या या स्वप्नाला एक लय असते. तसेच, उदबत्तीच्या सुवासाचा, कापूर जाळल्याचा, देवपूजेसाठीच्या फुलांचा, सहाणेवर उगाऴलेल्या चंदनाचा, बंबाच्या धुराचा आणि अर्थातच वाफाळलेल्या चहाचा, असा काहिसा संमिश्र वास असतो!

वर्तमानपत्रात आलेली एक बातमी काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात  आली. फेसबुकचा CEO मार्क झुकरबर्ग याच्या 'बीस्ट' नावाच्या कुत्र्याचे' फेसबुकवर लाखो चाहते आहेत आणि त्याच्या फेसबुक पेजला असंख्य हिट्स मिळतात म्हणे. हे वाचताच मला प्रकर्षाने आठवण झाली ती , लहानपणी सकाळी-सकाळी आजीच्या आवाजात ऐकलेल्या काही ओळींची…
"समर्थाचिया घरचे श्वान।
त्यास सर्वही देती मान ।।
ऐसा तुझा म्हणवितो दीन।
हा अपराध कवणाचा?"

आजीच्या पाठांतरामुळे आणि ते सकाळी म्हणण्याच्या तिच्या परिपाठामुळे, रामदास स्वामींचे शब्दसामर्थ्य माझ्या कानावर अलगदपणे पडत गेले आणि मनात साठत गेले, हे माझे भाग्यच म्हणायचे. आजमितीलाही कित्येक व्यक्तींना दासबोधातील या ओळींमधला मथितार्थ लागू पडतो. मग मार्क झुकरबर्गच्या श्वानाला न पडेल तरच नवल!

सूज्ञांस अधिक सांगणे नलगे!! 

सोमवार, १६ मार्च, २०१५

शब्दसंपदा

काही दिवसापूर्वी टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या 'पारंपारिक' खाद्यपदार्थांबद्दल मनात आलेले विचार मी लिहिले होते. त्यावर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया कळवल्या. आपल्या खाद्यसंस्कृतीची पारंपारिकता आपण जपली पाहिजे असा सूर त्यात होताच. पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या खाद्यसंस्कृतीवर चाललेल्या आक्रमणाचा निषेध काहींनी केला होता.
कुणाकुणाच्या हातचे साजूक लाडू आठवून मन भरून आले असेही मी लिहिले होते. परंतु, हे लिहिताना कुणा एखादीच्याच हातचे लाडू विशेष चांगले होतात असे मला म्हणायचे नव्हते. पण नात्यातल्या काही बायका आणि मैत्रिणींचा उल्लेख राहून गेला. त्यांच्या हातच्या साजूक लाडवांना मी न जागल्यामुळे त्यांच्याकडून थोड्याशा तुटक प्रतिक्रियाही आल्या! मला लाडू पाठवण्याची, त्यांनी आजवर जपलेली परंपरा बंद होऊ नये या भीतीपोटी मी त्वरित त्यांची माफी मागून टाकली.

माझी तरुण मैत्रीण संपदा हिने, मी लिहिलेले मनोगत आवडल्याचे आवर्जून कळवले. तसेच, "तो शब्द 'पारंपारिक' असा आहे का 'पारंपरिक' आहे याची खातरजमा करून घ्यावी", अशी एक नम्र सूचनाही केली. तो शब्द वापरण्याच्या 'पारंपारिक' मानसिकतेतून माझे मन काही केल्या बाहेर पडत नव्हते. त्यामुळे  मी तिच्या प्रतिक्रियेवर लगेच आणि फार खोलात जाऊन विचार केला नाही. तरीही, "आपले काही चुकले तर नाही ना?" ही  बोच मनांत कुठेतरी होतीच.
मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेल्या माझ्या नणंदेला, अरुणाताईंना हळूच मी या शब्दाबद्दलची शंका विचारून घेतली. त्या म्हणाल्या, "हा शब्द 'पारंपारिक' असा नसून 'पारंपरिक' असा आहे."

'पारंपरिक' खाद्यसंस्कृती जपताना 'पारंपरिक' भाषा संस्कृतीदेखील जतन करून आपली शब्दसंपदा वाढवण्याची परंपरा चालू ठेवली पाहिजे हे खरे !    

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

पारंपरिक?

टीव्हीवरच्या सगळ्या कार्यक्रमांपैकी खाद्य पदार्थांबद्दलचे सर्व प्रकारचे कार्यक्रम बघायला मला मनापासून आवडते. Food Factory असो किंवा Master Chef हा कार्यक्रम असो. वेगवेगळ्या खाद्य संस्कृती बघण्याचा मला छंद आहे. Fox Life , TLC , Food-Food वगैरे वाहिन्यांवरचे कार्यक्रम बघून मला नेहमी असे वाटते की आपणही अशा वाहिन्यांसाठी काम करावे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये फक्त खादाडी करत आणि पदार्थांवर भाष्य करत हिंडावे. ते शक्य होईल न होईल. परंतु, निदान पुण्यातल्या पुण्यात तरी असा कार्यक्रम करत हिंडावे असे अनेकदा मनांत येते. रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचे आणि पारंपरिक पदार्थांबद्दलचे कार्यक्रम मला विशेष आवडतात. एखाद्या कार्यक्रमात खास पारंपरिक पदार्थाची पाककृती दाखवत असतात तेव्हां तर मी अगदी टीव्हीला डोळे आणि कान लावून बसते. कोळाचे पोहे, वरणफळे, धपाटे, उकडीचे मोदक, पाकातले चिरोटे असे खास पारंपरिक पदार्थ आपल्या घरांमधून हल्ली फारसे  केले जात नाहीत. असे पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी,एखादी वाहिनीच आपण चालू करावी असेही मला वाटते.
परवा एकदा Fox Life किंवा तत्सम  वाहिनीवर एक कार्यक्रम बघत होते. त्या कार्यक्रमाच्या 'गोऱ्या' निवेदकाने एका भारतीय सुंदरीला एक पारंपरिक भारतीय मिठाई दाखवायला सांगितली. त्या सुंदरीने भारतीय खाद्यसंस्कृतीमधील 'लाडू' या पदार्थाचे महत्व सांगितले आणि एका प्रकारच्या लाडवाची पाककृती दाखवते अशी प्रस्तावना केली.  आता ही कुठले लाडू दाखवतेय ते बघावे, म्हणून मी सरसावून बसले. 'पारंपारिक लाडू' या नावाखाली तिने चक्क Milkmaid आणि सुक्या खोबऱ्याचे लाडू तयार केले. मी डोक्याला हातच लावून घेतला.  माझी आई, आजी, काकू, मावशी आणि आत्या यांच्या हातच्या  अनेक प्रकारच्या साजूक लाडूंच्या आठवणीने, मन भरून आले. Milkmaid चे लाडू 'पारंपरिक' आहेत, हे त्या सुंदरीने सांगितल्याने आपल्या गृहिणींचा तसा समज होऊ नये यासाठी अळवाच्या आणि साबुदाण्याच्या लाडवापासून ते खास मोतीचूर, डिंक किंवा चुरम्याच्या लाडवापर्यंत सर्व पाककृती दाखवण्याचा मी आता निश्चयच केलाय.
पण, त्या माझ्या आवडत्या कार्यक्रमांमधून दाखवले जाणारे इतर देशांतले 'पारंपरिक पदार्थ' खरोखरीच पारंपरिक असतात की नाही, हा माझ्यापुढे मोठा प्रश्नच आहे.

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

पेशावरची फुले

पेशावरची फुले 

पेशावरच्या मृतांची अजून,नेमकी संख्याही नव्हती कळली
  आरोपप्रत्यारोपांसाठी, दोन्हीकडे अनेकांची जीभ वळवळली

कोणीतरी तिकडे बोलले, यामागे आहे इकडच्यांचाच हात
भावनांचा भडका उसळला मग, दोन्ही बाजूंच्या डोक्यांत
  
आमची संस्कृती, त्यांची संस्कृती, झाला उहापोह मग सुरु
 आपली संस्कृती एकच आहे, इतिहास देईल कसे विसरू ?

  कळ लावून, रेषा आखून, सोडून गेले ते आपसांत भांडायला
    नुकसान दोघांचेही  होतय, हे नको का आम्हाला कळायला? 

हजारो वर्षांची सभ्यता आपली, सिंधू नदीच्या कुशीतली
कुणी रेषा ओढल्याने, अचानक होईल अशीकशी वेगळी?

    प्रतिशोधाची ठिणगी टाकणारे, अनेक आहेत रेषेच्या आरपार
     ती रेषा मिटवून टाकूया का आपण, विचार करून सारासार?   


डॉ. स्वाती बापट 
swateebapat@gmail.com 
९४२२०३५८७५















सोमवार, ५ जानेवारी, २०१५

प्राजक्त

आज सकाळी WhatsApp वर प्राजक्ताच्या फुलांचे एक सुंदर चित्र मैत्रिणीने पाठवल्यामुळे मन प्रसन्न झाले आणि माझ्या मनांत अगदी नाजूक अशा काही आठवणी उचंबळून आल्या. लहानपणी आमच्या वाड्याच्या परसदारात प्राजक्ताचे झाड होते. देवाच्या पूजेसाठी परडीमध्ये फुले गोळा करून आणायला आमची आजी आम्हा मुलांना सांगायची. त्या वेळीही देवपूजेवर माझा खास विश्वास होता असे नाही, पण प्राजक्ताची फुले गोळा करायला मात्र  आवडायचे. केशरामध्ये थोडेसे दूध घालून कालवल्यानंतर येतो तशा केशरी रंगाचा दांडा आणि केशर घातलेल्या दुधासारख्या किंचितशा पिवळट पांढऱ्या नाजूक पाकळ्या. ते दोन्ही रंग आजही माझ्या मनांत फक्त पवित्र, शुद्ध भाव निर्माण करतात. आमच्या प्राजक्ताच्या झाडाखाली सदैव फुलांचा सडा पडलेला असायचा. एकावेळी आम्ही पाच-सहा भावंडे फुले गोळा करत असलो, तरीही सगळी फुले आम्ही उचलू शकायचो नाही. फुले गोळा करत असताना, काही फुले झाडावरून हलक्या हलक्या गिरक्या घेत माझ्या अंगावर  पडायची आणि त्यांचा तो नाजूक स्पर्श मला रोमांचित करायचा! एकूणच त्या फुलांचा रंग, मंद सुगंध आणि मऊ मुलायम स्पर्श मला फार आवडतो.

अलीकडेच, माझ्या रोजच्या जाण्या-येण्याच्या दोन रस्त्यांवर, अवचितपणे मला प्राजक्ताची झाडे दिसली. रोज सकाळच्या फिरायला जायच्या रस्त्यावर कौन्सिल हॉल पोलिस चौकी आहे. त्या चौकीच्या कोपऱ्यावर, एक दिवस अचानक पुन्हा तोच नाजूक स्पर्श मला जाणवला. वर बघितले तर प्राजक्ताचे झाड आणि खाली फुलांचा सडा. मला ते इतके अनपेक्षित होते की काही विचारू नका. तशीच दुसरी एक जागा म्हणजे माझ्या क्लिनिकच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरची. उंच्यापुऱ्या आणि रांगड्या सरदारजींची वस्ती असलेल्या सायकल सोसायटीच्या गेटजवळून चालत असताना अचानकपणे प्राजक्ताच्या फुलांचा मंद सुगंध आला. मी वर बघितले तर तिथेही चक्क प्राजक्ताचे झाड!

नाजूक प्राजक्ताचे झाड, आणि तेही पोलिस चौकी आणि सरदारजींच्या वस्तीच्या कोपऱ्यावर? या विरोधाभासामुळे विचित्र वाटणारी ही गोष्ट जरा बारकाईने विचार केल्यावर मला वेगळीच वाटायला लागली. वरून कठोर वाटणाऱ्या पोलिसांच्या आणि रांगड्या सरदारजींच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी प्राजक्ताची फुले फुलत असतीलच की!