बुधवार, २४ जून, २०२६

केदारनाथ- भाग- १६

काल रात्री मी उशिरा झोपले होते आणि झोपेतसुद्धा जरा अस्वस्थच होते. पहाटे चार वाजताचा गजर लावलेला होता. गजर वाजायच्या आधीच पाचएक मिनिटे सुभाषिनी आमच्या खोलीच्या दारावर टकटक करून आम्हाला जागे करून गेली. आम्ही उठून तयारीला लागलो. सुभाषिनीने दिलेली मिल्क पावडर गरम पाण्यामधे घालून, मी दूध तयार केले आणि आम्ही दोघांनीही प्यायले. आम्ही तयार व्हायच्या आधीच सुभाषिनी तयार झाली होती. ती खाली उतरून एखादा पिठठूवाला ठरवून ठेवणार होती. आम्हा तिघांचे सामान हेलिपॅडपर्यंत वाहून नेण्यासाठी पिठठूवाल्याची गरज लागणार होती. आनंदला मी आधी खाली हॉस्पिटलमधे जाऊन त्याच्या इंजेक्शनचा डोस घ्यायला सांगितले. त्यानंतर त्याच्या हाताच्या शिरेमधली intracath सुईदेखील काढून घेणे आवश्यक होते. 



काल मला  संस्थेमार्फत दिले गेलेले स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू आमच्या बॅकपॅक्समध्ये बसवणे, हे कामही बाकी होतेच. ते करून आनंदच्या पाठोपाठ मीही दोघांचे बॅकपॅक्स घेऊन खाली उतरले. तोपर्यंत सुभाषिनीने एका पिठठूवाल्याशी बोलणे करून ठेवले होते. सुभाषिनीचा बॅकपॅक भलामोठा होता. त्या मानाने, आम्हा दोघांचे बॅकपॅक्स छोटे होते. ते तिन्ही पॅक्स सुभाषिनीने ठरवलेल्या त्या पिठठूवाल्याच्या पिठठूमध्ये आम्ही ठेवले आणि निघायला तयार झालो. सुभाषिनी आधीच पायी चालत पुढे गेली होती.   

आमच्या सुदैवाने पहाटे पाऊस किंवा बर्फ पडत नव्हते. तसा माझ्याकडे नर्स कृष्णाचा रेनकोट अजूनही होता. मी तो रेनकोट माझ्याकडेच ठेवून घ्यावा, म्हणजे पहाटे पाऊस असेल तर उपयोगी पडेल, असे त्याने मला आवर्जून सांगितले होते. इतक्या थोड्या दिवसांचा सहवास असूनही सहकाऱ्यांकडून इतके प्रेम आम्हाला मिळत होते, हे बघून आम्हा दोघांनाही खूप बरे वाटत होते. पण पाऊस किंवा बर्फ पडत नसल्याचे पाहून मी नर्स कृष्णाचा रेनकोट रात्रपाळीच्या परवेझ नर्सकडे दिला आणि तो आठवणीने कृष्णाला द्यायला सांगितले. आमच्या खोलीची किल्ली मी फार्मसिस्टकडे सुपूर्द केली. भल्या पहाटे आम्हाला इलेक्ट्रिकची गाडी मिळणे शक्य नसल्याने, मी आणि आनंद हेलिपॅडकडे चालत जायला निघालो.  आम्हाला निरोप द्यायला हॉस्पिटलमधील रात्रपाळीचा सगळा स्टाफ बाहेर व्हरांड्यात आला होता. मोठ्या जड मनाने आणि साश्रुनयनांनी आम्ही सर्वांचा निरोप घेतला.  

आमचे सामान वाहून नेणाऱ्या पिठठूवाल्याच्या बरोबरच आम्ही चालावे आणि त्याला नजरेच्या टप्प्यातून दूर होऊ देऊ नये, असा मोलाचा सल्ला मला हॉस्पिटलमधील नर्सेसनी दिलेला होता. पिठठूवाला जरा वयस्कर असल्याने तो हळूहळूच चालत होता. तरीही त्याच्याबरोबर चालणे मला जरा अवघड जात होते. आनंद तर माझ्यापेक्षाही हळू चालत होता. त्यामुळे त्याला मागे सोडून पुढे जायलाही नको वाटत होते. पण आनंदने मला सांगितले, "तू त्याच्याबरोबर पुढे हो, मी हळूहळू मागून येतो आणि हेलिपॅडपर्यंत पोहोचतो". 

मी आणि पिठठूवाला हेलिपॅडपर्यंत पोहोचलो तर तिथे सुभाषिनी अतिशय हवालदिल अवस्थेत उभी होती. हेलिपॅडवर चार वेगवेळ्या तंबूंमधे चार हेलिकॉप्टर कंपन्यांची तात्पुरती ऑफिसेस होती. आम्ही ज्या 'एरो एव्हिएशन' कंपनीच्या हेलिकॉप्टरने जाणार होतो, त्या कंपनीच्या माणसाने सुभाषिनीला निक्षून सांगितले होते, "आज आम्ही फक्त काल जाऊ न शकलेल्या यात्रेकरूंना नेणार आहोत. त्यामुळे आज तुम्हाला जाता येणारच नाही". 

सहा वाजेपर्यंत आनंदही हेलिपॅडपर्यंत पोहोचला. हेलिपॅडसमोर एका शेडखाली काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. कालपासून आपापल्या हेलिकॉप्टरच्या फेरीची वाट बघत असलेल्या अनेक यात्रेकरुंची गर्दी तिथे उसळलेली होती. आनंदला मी सगळी परिस्थिती थोडक्यात सांगितली. कशीबशी एक खुर्ची पकडून त्याला आधी तिथे बसवले आणि आमचे सगळे सामान त्याच्याजवळ ठेवले. मी आणि सुभाषिनी आमच्या हेलिकॉप्टर कंपनीच्या त्या तंबूवजा "ऑफिस" मधे ठिय्याच देऊन  बसलो. 

ऑफिसमधला तो मनुष्य दर १५-२० मिनिटांनी हेलिपॅडवर जाऊन प्रवाश्यांना "चेक-इन" करून येत होता. त्याच्याकडे असलेल्या एका वहीमधे लिहिलेल्या नावांपैकी पुढची चार-सहा नावे तो पुकारत होता आणि त्या लोकांना हेलिपॅडकडे पाठवत होता. प्रत्येकवेळी तो आला की आम्ही त्याला आमच्या तिकिटाबद्दल विचारत होतो. त्यावर तो अतिशय तुच्छतेने आम्हाला उडवून लावत होता, "माताजी आप यहाँ आजके दिन रुकनेका  इंतजाम करो. आज तो आप पक्का नहीं जा सकते."

सकाळचे साडेआठ वाजेपर्यंत आमच्या जाण्याबाबत काहीही होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. संदीपजी, धनवीरजी आणि रोहनजी यांना फोन आणि मेसेजेस करून-करून सुभाषिनी थकली होती. पण त्यांच्यापैकी कोणीच उत्तरे देत नव्हते. शेवटी पावणेनऊ वाजायच्या सुमारास संदीपजींनी सुभाषिनीच्या फोनवर मेसेज पाठवला की, कोणी कुलदीप नामक मनुष्य येईल आणि आम्हाला जाण्यासाठी मदत करेल. आमच्या हेलिकॉप्टर कंपनीच्या माणसाला आम्ही विचारले, "भैय्या, कुलदीप कौन है? वो कहां मिलेंगे?" त्यावर त्याने "मैं किसी कुलदीप को जानता नही हूं. आप कृपा करके यहांसे जाईये और मुझे तंग मत करिये." असे निर्वाणीच्या सुरात सांगितले. 

नऊ वाजत आले तरी त्या कोणा कुलदीपचा पत्ताच नव्हता. हळूहळू तिथले हवामानही बदलायला लागले होते. गार वारे सुटले होते आणि थोड्याच वेळात पाऊस सुरु होईल असे वाटायला लागले होते. आनंदला खूप थंडी वाजत होती. जवळ कुठेही चहापाण्याची सोय नव्हती. स्वच्छतागृह कुठेतरी खूप लांब आणि कमालीचे अस्वच्छ होते. आमच्या जाण्याबाबत तर काहीच खबर मिळत नव्हती. अशा अवस्थेत आम्ही हताश होऊन बसून होतो. 

नऊ वाजता काय जादू घडली कळले नाही. अचानक ऑफिसमधील त्या माणसाने येऊन आम्हा तिघांना सांगितले, "हेलिपॅडवर असलेल्या त्या लोखंडी बाकड्यावर जाऊन बसा." आम्ही जवळजवळ धावतच पुढे जाऊन बसलो. एका माणसाने येऊन आमचे प्रत्येकाचे वजन विचारले. ऐंशी किलो वजनापर्यंत एक ठराविक तिकीट, आणि पुढील जास्तीच्या वजनासाठी अधिक दर आकारला जातो, असे सुभाषिनीने आम्हाला सांगितले होते. त्या माणसाने आमच्याकडून तिकिटाचे आणि सामानाचे मिळून १३३२०/- रुपये घेतले पण आमच्या हातात तिकीट वगैरे काहीच दिले नाही. हे पैसे त्याने कुठल्या हिशोबाने घेतले? आम्हाला तिकीट कधी आणि कोण देणार? अशी काही चौकशी किंवा विचार न करता त्याच्याकडे आम्ही तातडीने पैसे देऊन टाकले. 

आमच्यासमोर असलेल्या मोठ्या डांबरी मैदानामधे, एकूण चार हेलिपॅडस होती. दर पाच-सात मिनिटाला तिथे एकेका कंपनीचे एकेक हेलिकॉप्टर येऊन उतरत होते. आलेल्या प्रवाशांना उतरवले आणि जाणाऱ्या प्रवाशांना बसवले की ते लगेच पुन्हा उड्डाण करत होते. हेलिकॉप्टर उतरताना आणि परत हवेमध्ये झेप घेताना, हेलिकॉप्टरच्या गरागरा फिरणाऱ्या पंख्यामुळे गार वाऱ्याचा प्रचंड झोत आमच्या अंगावर येत होता. त्यामुळे आनंदला कमालीची हुडहुडी भरत होती. शेवटी मी माझ्याकडे असलेली ओढणी आनंदच्या नाका-तोंडाला घट्ट बांधली, सुभाषिनीने तिचे गरम हातमोजे स्वतःच्या हातातून काढून आनंदला हातावर चढवायला लावले. तेव्हा कुठे त्याला जरा बरे वाटले. 

आम्ही तिघे आणि अजून तीन प्रवासी असे सहाजण एका हेलिकॉप्टरने जाणार होतो. हेलिकॉप्टर कंपनीच्या माणसाने आम्हाला, हेलिकॉप्टरमध्ये कोणी कुठे बसायचे, आत शिरताना कसे जायचे व उतरल्यानंतर कसे बाहेर पडायचे याबाबतच्या सूचना दिल्या. आता आम्ही अगदी जीव मुठीत धरून, आम्हाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कधी येते, याची आतुरतेने वाट बघत बसलो होतो. शेवटी, सुमारे अर्ध्या तासानंतर आम्हाला सांगण्यात आले, "आता जे हेलिकॉप्टर उतरेल त्या हेलिकॉप्टरमधून तुम्हाला जायचे आहे." 

हेलिकॉप्टर उतरल्या-उतरल्या आम्ही त्याच्या दिशेने अक्षरशः धावत सुटलो. आमचे सामान हेलिकॉप्टर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या  हेलिकॉप्टरमधे ठेवले. आम्ही आत बसल्यानंतर काही क्षणातच आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझा आणि आनंदचा हा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास होता. पण तो प्रवास आणि त्या सुंदर प्रदेशाचे उंचीवरून दिसत असलेले विहंगम दृश्य यापैकी कशाचाही आनंद लुटण्याची आमची मनःस्थिती नव्हती. अखेर आपण घरच्या वाटेला लागलो, अशा विचारामुळे काहीसे बरे वाटत होते इतकेच. 

हरिद्वारपर्यंत पोहोचेस्तोवर आम्हाला अजून अनेक अडचणींचा सामना करायचा होता, पण त्यावेळी आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती. 

त्याबाबत पुढच्या आणि या लेखमालेच्या शेवटच्या भागामध्ये लिहीन. 

[क्रमशः]

डॉ. स्वाती बापट.

1 टिप्पणी:

  1. Dr.Swatee, When you write something like this , while reading one feels like you are watching a live real movie. I feel you should start writing stories for Bollywood...👏👏.....Dr.Arvind S.Ganeriwal

    उत्तर द्याहटवा