गुरुवार, २५ जून, २०२६

केदारनाथ-भाग-१७

आम्ही हेलिकॉप्टरमधे बसल्यावर आम्हाला थंडी वाजेनाशी झाली. समुद्रसपाटीपासून सुमारे ११७०० फूट उंचीवर असलेल्या केदारनाथहून काही मिनिटांतच आम्ही बरेच खाली उतरणार होतो. त्या फरकानेही आनंदला जरा बरे वाटणार, या कल्पनेने मी सुखावले होते. तरीही, मी एक डॉक्टर असल्याने, आणि त्याच्या आजाराचे नेमके निदान अजून न झाल्यामुळे मी मनातून काहीशी अस्वस्थही होते. मी त्याला रोजच तपासत होते आणि त्याला Viral infection झालेले आहे असेच मला माझ्या तपासणीमधे दिसत होते. पण सहा-सात दिवस त्याच्या तापात सतत चढउतार होत राहिल्याने, त्याला टायफॉईड, मलेरिया किंवा अजूनच वेगळे काहीतरी नसेल ना, अशी चिंता माझ्या मनाला भेडसावत होती. 

आमच्याबरोबर हेलिकॉप्टरमधे बसलेले इतर तिघेजण मराठीभाषिकच निघाले. त्यापैकी एक जोडपे आणि आम्ही तिघे, असे पाचजण मागे बसलेलो होतो. त्या दोघांची मुलगी समोर पायलटशेजारच्या सीटवर बसली होती. हेलिकॉप्टरमधे बसल्याबरोबर सुभाषिनीने तिच्या फोनवर बाहेरचे चलत-चित्र रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. आमच्या समोर बसलेल्या जोडप्याला, हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतानाचा त्यांचा फोटो आणि व्हिडीओ काढून हवा होता, असे मला वाटले. त्यामुळे मी हात पुढे करून, "मी तुमचे फोटो आणि व्हिडीओ काढते", असे सुचवले. त्यांनीही तत्परतेने त्यांचा फोन मला दिला. मी त्यांचे फोटो काढले आणि एक छोटासा व्हिडीओही काढून दिला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने, लगेच माझा फोन मागून घेतला आणि माझा व आनंदचा एक फोटो काढला.

काही मिनिटांतच आमचे हेलिकॉप्टर सेरसी येथे उतरले. आम्हाला आधी सूचना दिलेली असल्याने हेलिकॉप्टरची दारे उघडताच, आम्ही हेलिकॉप्टरच्या समोरच्या बाजूने पळत- पळत बाहेर पडलो. आमचे सामान घेऊन आम्ही हेलिपॅडवरून बाहेर रस्त्यावर चालत आलो. आम्हाला घ्यायला नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधून जी गाडी येणार होती, त्या गाडीच्या चालकाचा फोन, आम्ही केदारनाथला असतानाच आलेला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सगळ्या गाड्या सोनप्रयागलाच थांबवलेल्या असल्याने,  आम्हाला घ्यायला तो सेरसीपर्यंत येऊ शकणार नाही, असे त्याने आम्हाला सांगितलेले होते. सेरसीला उतरल्यानंतर, एखादी टॅक्सी करून आम्ही सोनप्रयागला यावे असे त्याने सुचवले होते. तिथून सहजी टॅक्सी मिळेल, असेही तो म्हणाला होता.  

आम्ही सेरसीला पोहोचलो तेंव्हा सकाळचे दहा वाजले होते. पहाटेपासून आम्ही तिघांनीही काहीच खाल्लेले नव्हते. केदारनाथहून सुखरूप खाली उतरल्यावर आमच्या मनावरचा ताणही आता बराचसा कमी झाला असल्यामुळे भुकेची जाणीव व्हायला लागली होती. आधी नाश्ता करावा आणि मग एखादी टॅक्सी पकडून सोनप्रयागला पोहोचावे, असे आम्ही ठरवले. आता आनंदही जरा बरा दिसत होता आणि त्याचा तापही उतरलेला वाटत होता. जवळच असलेल्या एका ढाब्यावर थांबून आम्ही पनीर पराठे खाल्ले आणि चहा घेतला. त्यानंतर टॅक्सीचा शोध चालू केला. सेरसी ते सोनप्रयाग हे  अंतर जेमतेम पाच-सहा किलोमीटर आहे. हेलिपॅडच्या बाहेर अनेक टॅक्सीझ् उभ्या होत्या, पण बऱ्याचश्या टॅक्सीझमधे चालकच बसलेले नव्हते. काही टॅक्सीझमधे  चालक होते, पण त्या सर्वांनीच, आम्ही कितीही पैसे द्यायची तयारी दाखवली तरीही, सोनप्रयागपर्यंत यायला साफ नकार दिला. शेवटी आता आपण थोडे चालत पुढे जाऊन बघू या, तिथे एखादी टॅक्सी मिळेल, अशा आशेने आम्ही शंभरएक मीटर चालत पुढे गेलो. पण एकही टॅक्सीवाला आम्हाला न्यायला तयार झाला नाही. शेवटी कसेबसे एका टॅक्सीवाल्याला अक्षरशः हात जोडून विनंती करून तयार केले. तो म्हणाला, "मी तुम्हाला इथून तीन किलोमीटरवर सोडेन. पुढे तुमचे तुम्ही जा." आमचा नाईलाज झाला. तीन किलोमीटर तर तीन किलोमीटर, असे म्हणून आम्ही त्याच्या टॅक्सीत बसलो. काही वेळातच, आम्हाला रस्त्यावरच एका ठिकाणी सोडून तो निघून गेला .

आता पुढचे अडीच-तीन किलोमीटर आम्हाला चालत जायचे होते. मनावरचा ताण आणि जागरण यामुळे आम्ही दमलेले होतो. आनंदला त्या सकाळी ताप नसला तरीही त्याला बराच अशक्तपणा जाणवत होता. आम्ही तिघेही पाय ओढत निघालो. तेवढ्यात आम्हाला सोनप्रयागच्या दिशेने जाणारा एक मोटारसायकलवाला दिसला. आम्ही त्याला आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडण्याची  विंनती केली. आमच्या नशिबाने त्याने ती मानली. आम्ही दोघींनी त्याच्या पाठीमागे बसून जावे, असे आनंदचे मत होते. अर्थातच त्याचे ते मत आम्ही दोघींनी पूर्णपणे खोडून काढले. बळेबळेच आम्ही आनंदला मोटारसायकलवर बसायला लावले, आणि आमच्याकडच्या तीन बॅकपॅक्सपैकी दोन मोठया बॅकपॅक्स त्याच्याकडे दिल्या. आता आम्हा दोघीत मिळून, वजनाने हलका असा एकच बॅकपॅक आम्हाला न्यायचा होता. त्यातून तो सगळा उताराचा रस्ता असल्याने आम्ही दोघी सहजी  चालत वीस-एक मिनिटातच सोनप्रयागपर्यंत पोहोचलो. आम्हाला न्यायला आलेल्या गाडीत बसून आनंद आमची वाटच पाहत होता.

सोनप्रयाग ते नारायणकोटीच्या प्रवासात पुन्हा वाहतूक कोंडी होतीच. त्यामुळे, अनेक ठिकाणी थांबत-थांबत जावे लागले. दुपारी १ च्या सुमारास आम्ही नारायणकोटीला पोहोचलो. त्यानंतर जेवायला वगैरे न थांबता आम्हाला लवकरात लवकर हरिद्वारला जाण्याची इच्छा होती. पण  नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे त्या दिवशी प्रथमच नवीन सोनोग्राफी मशीन आलेले असल्याने, तिथे त्या मशीनची पूजा झालेली होती. पूजेचा प्रसाद खाऊनच आम्ही हरिद्वारला निघावे, असा प्रेमळ आग्रह आम्हाला मोडता आला नाही. छोले, मसालापुरी, रायता, डाळ-भात आणि प्रसादाचा शिरा असे मस्त जेवण, मी आणि सुभाषिनी जेवलो. आनंदला जेवायची इच्छा नसल्याने त्याने जरा वेळ पडून आराम केला. दुपारी दीड-दोनच्या सुमारास आम्ही टॅक्सीने निघालो. आम्ही नारायणकोटीला असतानाच आनंदला पुन्हा १०१ च्या वर ताप चढायला लागला होता. त्याला अँटिबायोटिकची आणि क्रोसिनची गोळी देऊन आम्ही हरिद्वारकडे निघालो. तो संपूर्ण प्रवासभर आनंदच्या अंगात ताप होताच. त्यामुळे मी हरिद्वारच्या हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर संजय शहा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना कल्पना देऊन ठेवली. रात्री बाराच्या सुमारास आम्ही हरिद्वारच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉ. शहांनी त्यांचे एक ज्युनियर डॉक्टर, नर्स आणि लॅब असिस्टंट यांची टीम तयारच ठेवलेली होती. त्यामुळे, आम्ही पोहोचल्यावर लगेच आनंदच्या सर्व तपासण्या केल्या गेल्या. हरिद्वारला पोहोचेपर्यंत आनंदचा ताप उतरला होता. सुदैवाने त्याच्या सर्व तपासण्याही नॉर्मल आल्या. 

आम्ही ३० मे रोजी रात्री उशिरा हरिद्वारला पोहोचलो होतो. आमची फ्लाईट १ तारखेला दुपारची होती. त्यामुळे आमच्याकडे दीड दिवस होता. आम्ही दोघांनीही खोलीतच आराम केला. डॉ. संजय शहांनी रोज दोनवेळा आमच्या खोलीमधेच येऊन आनंदला तपासले आणि त्याला धीर दिला. हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे आलेल्या एक-दोन बालरुग्णांना मी तपासावे अशी विनंती डॉ. संजय शहांनी मला केली. मी एका मुलाला तपासत असताना, डॉक्टर शहांच्या सांगण्यानुसार हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याने माझा फोटो काढला. १ जूनला आम्ही विमानतळावर जायच्या आधी डॉ. संजय शहा यांनी  मला 'स्वामी विवेकानंद धर्मार्थ हॉस्पिटल'चे अहवाल भेट दिले आणि त्यांच्यासोबत आनंदचा व माझा फोटोही काढून घेतला. 



केदारनाथच्या या ट्रिपमुळे मला खूप वेगळ्या उंचीचे समाधान मिळाले. आपण किती शारीरिक आणि मानसिक ताण सहन करू शकतो, याचा मला अंदाज आला. या दहा दिवसांमधे, भारताच्या आणि नेपाळच्या कानाकोपऱ्यातील अनेक यात्रेकरूंशीं मला संवाद साधता आला. अनंत अडचणींवर मात करून, केदारनाथाच्या दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या, अगदी गोरगरीब आणि खेड्यापाड्यातल्या लोकांची श्रद्धा आणि भक्तिभाव पाहून मी नतमस्तक झाले. 'स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन'चे कार्य तर अक्षरशः भारावून टाकणारे आहे. 'नरसेवा, नारायणसेवा' या हे संस्थेचे ब्रीदवाक्य तिथले सगळे कर्मचारी प्रत्यक्षांत जगत आहेत हे मी अगदी जवळून अनुभवले. केदारनाथच्या विशाल मंदिराला भेट दिल्यावर पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या माझ्या सर्व आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. 

'स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन' रुग्णांना देत असलेली निःस्वार्थ सेवा अनुभवल्यावर आणि केदारनाथाच्या सुंदर, भव्य मंदिरातल्या शिळारुपी पिंडीचे स्पर्शदर्शन केल्यानंतर  माझ्या मनामधे एकच भावना उचंबळून आली, ती म्हणजे, 

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती."

[लेखमाला समाप्त]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा