शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-४

वनखात्याच्या सुरक्षारक्षकांकडून प्रवेशिका घेऊन पुढे जाता-जाता तिथे असलेल्या एका माहिती फलकावर आमची नजर गेली. लोणार सरोवर परिसर हा जैवविविधतेने नटलेला परिसर असल्यामुळे या परिसराला २०२० साली 'रामसर  स्थळ' म्हणून मान्यता देण्यात आली आहे. इराणमधील रामसर या ठिकाणी १९७१ साली जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेतील ठरावाला 'रामसर ठराव' असे संबोधले जाते. एखादे स्थळ रामसर स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर त्या देशाला त्या स्थळाच्या संरक्षणासाठी आणि तिथली जैविविधता जपण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतात. वनखात्याने उभ्या केलेल्या फलकावर ही माहिती संक्षिप्त रूपात लिहिलेली होती. त्या परिसरामधे नीलगाय, लांडगे, अस्वले, माकडे, तरस, बिबटे इत्यादि वन्य प्राणी आणि मोर, रोहित, टिटवी, गोल्डन डक, कोकीळ, भारद्वाज  व अनेक स्थलांतरित सुंदर पक्षी आहेत असेही लिहिलेले होते. तसेच वन्य प्राण्यांना पर्यटकांनी काही खायला देऊ नये अशी सूचना लिहलेली होती. तसेच तिथे बिबट्याचा लाकडी, किंवा कदाचित रबरी पूर्णाकृती पुतळा ठेवला होता. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे हे ऐकून मनामध्ये थोडीशी धाकधूक झाल्याशिवाय राहिली नाही. 

आम्ही वनविभागाची चौकी पार करून पुढे निघालो. एकूण परिसरात पर्यटकांची फारशी वर्दळ नव्हती. थोडेसे  उतरून गेल्यावर पुढे डाव्या बाजूला 'कुमारेश्वर' मंदिर लागते. मंदिरासमोरच उजव्या बाजूला 'सीता न्हाणी' नावाचा एक छोटा झरा आहे. कुमारेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. थोडी उतरण उतरून गेल्यावर 'यज्ञेश्वर' मंदिर लागले. या देवळांची पडझड झाली असली तरी त्याचे सौंदर्य डोळ्यात भरते. तिथून डावीकडे वळणारी पायवाट सरोवराकडे जात असल्याचे तिथल्या पाटीवरून कळल्यामुळे आम्ही ती पायवाट पकडली. जरा पुढे गेल्यावर समोरून काही पर्यटक बायका येताना दिसल्या. त्या आणि त्यांचा ग्रुप सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास एका गाईडला बरोबर घेऊन लोणार सरोवर परिसर बघायला आलेले होते. आम्ही  गाईड न घेता सरोवर आणि आसपासची मंदिरे बघतो आहोत, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या गाईडने सांगितलेल्या काही अद्भुत गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. जमल्यास एखादा चांगला गाईड घेऊन उद्या परत हा परिसर बघा, असे त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितले. त्या बायकांपाठोपाठ त्यांचा गाईड आणि त्यांच्या गटातील इतर पर्यटकही परतताना दिसले. 
दोन्ही बाजूला घनदाट झाडी असलेल्या त्या निर्मनुष्य वाटेवर आता आम्ही दोघेच होतो. झाडीतून कुठूनही थोडासा आवाज आला की आम्हाला बिबट्याची चाहूल लागतेय की काय अशी भीती वाटायला लागली होती. पुढे डावीकडे 'रामगया' मंदिराकडे जाणारी एक पायवाट दिसली. आधी सरोवरापर्यंत जावे आणि परतीच्या वाटेवर रामगया मंदिर पहावे असे ठरवून आम्ही निघालो. पण थोडे पुढे गेल्यावर त्या पायवाटेवरच एक वानरांची टोळी बसलेली दिसली आणि आम्ही थबकलो. पुढे जायला आम्ही जरा बिचकत होतो, कारण त्या वानरसेनेतील एक दांडगे, काळ्या तोंडाचे वानर आमच्याकडे बघून सतत दात विचकत होते. त्यांच्या टोळीतील लहान-मोठी वानरे आमच्या अवतीभोवती झाडांवर उड्या मारत होती. त्या सर्व वानरांना जरा हटकण्याचा प्रयत्न आम्ही केला पण ती जाम बाजूला होईनात. आता ही वानरे आपल्याला काही पुढे जाऊ देणार नाहीत असे आम्हाला वाटले. तितक्यात आमच्या मागून बोलण्याचे आवाज ऐकू आले, आणि दोन तरुण आमच्याजवळ आले. वानरांच्या टोळीने आमची वाट अडवून धरलेली बघून तेही थांबले आणि आमच्यासोबत  गप्पा मारू लागले.  

मूळ हैदराबादचे ते दोन तरुण इंडियन बँकेच्या खामगाव व शेगावजवळच्या दोन ग्रामीण शाखांमधे कनिष्ठ अधिकारी  होते. सुट्टीचे निमित्त साधून ते लोणार परिसर फिरायला आले होते व संध्याकाळी परत आपल्या मुक्कामी पोहोचणार होते. आमच्यासारखेच त्यांनाही लोणार सरोवरापर्यंत जाण्याची आणि सर्वात दूरवर असलेल्या कमळजामाता मंदिराला भेट द्यायची इच्छा होती. आम्ही थांबलो होतो त्याच  ठिकाणी,  काही काळापूर्वी त्या दोघांची वाट त्याच वानरांच्या टोळीने अडवली होती. त्यामुळे तिथून उलटे फिरून ते रामगया मंदिर बघायला गेले होते. आमचा आवाज ऐकू आल्यामुळे ते दोघे पुन्हा हिंमत  करून आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते. या निर्मनुष्य जागी आपण अगदीच एकटे नाही आहोत, हे जाणवून आमच्याही जिवात जीव आला आणि चौघांनी मिळून वानरसेनेला हाकलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने काही काळानंतर वानरे पांगली आणि आमचा रस्ता मोकळा झाला. त्यानंतर ते दोन तरुण आणि आम्ही दोघे मिळूनच कमळजामाता मंदिरापर्यंत गेलो. त्या निर्मनुष्य वाटेवर त्यांना आमचा आणि आम्हाला त्यांचा मोठाच आधार वाटला. तसेच गप्पा मारत चालत असल्यामुळे आम्हाला फारसा शिणवटाही जाणवला नाही. 

दुपारचे चार वाजत आले होते. पायवाटेने चालत साधारण दोन किलोमीटर गेल्यावर अचानक आम्हाला लोणार सरोवराचे दर्शन झाले आणि आमचे डोळे दिपले. सरोवराच्या पाण्यामध्ये हिरव्या-निळ्या रंगाच्या अनेक छटा होत्या. नानाविध प्रकारचे आणि रंगाचे पक्षी तिथे दिसत होते. त्यातले कित्येक पक्षी मी आयुष्यात प्रथमच बघत होते. सरोवरापाशी पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्यामुळे त्या पक्ष्यांचा स्वैर संचार आणि मुक्तकंठाने किलबिलाट चालला होता. तिथल्या शांत, निरसर्गरम्य परिसरात ऐकू येणाऱ्या त्या मंजुळ किलबिलाटामुळे मी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. माझे मन अगदी पिसासारखे हलके झाले. त्या जागेवरून परत वर जाऊच नये आणि अनंत काळासाठी तिथेच थांबून राहावे, असे मला वाटायला लागले! 

सरोवराच्या चहू बाजूंना मंदिरे आहेत व काठाकाठाने चालत गेल्यास ती  पाहता येतात असे वर्णन कुठेतरी वाचनात आले होते. पण प्रत्यक्षात कमळजा मातेच्या मंदिरापाशी आम्ही पायवाटेच्या शेवटाला पोहोचलो असल्याचे लक्षात आले. कमळजामाता मंदिराचा काही भाग पाण्यात होता आणि मंदिराशेजारची दीपमाळही सरोवराच्या पाण्याने वेढलेलीच होती. आम्ही मंदिराच्या आत गेलो व दर्शन घेतले. तिथे पूजेसाठी असलेल्या एका माणसाने आम्हाला सांगितले की पाण्याची पातळी गेल्या काही वर्षात वाढलेली असल्याने कमळजामाता मंदिराचा काही भाग आणि पुढील इतर काही मंदिरे आता पाण्याखालीच होती. आम्ही मंदिराचे आणि मंदिरासमोर उभे राहून आमचेही फोटो काढले आणि मोठ्या जड अंतःकरणाने परतीचा प्रवास सुरु केला. 

सरोवर परिसरामधे खाली उतरायला सुरुवात केल्यानंतर कुठेही पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय दिसली नाही. आमच्याजवळ पाण्याची बाटली होती पण त्या दोन तरुणांनी पाणी आणले नव्हते. त्यांना आम्ही आमच्याकडचे पाणी प्यायला दिले. त्यामुळे तीनेक किलोमीटर वर चढून आम्ही रस्त्यावर पोचेपर्यंत आमच्याजवळचे पाणी संपून गेले होते. भर उन्हात चालून-चालून बरेच दमायलाही झाले होते. त्यामुळे वर पोहोचताच आम्ही  चौघांनी आमच्या गाडीत असलेल्या बाटल्यामधले पाणी प्यायले. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या अननस विकेत्यांना आमच्या समोरच दोन-तीन अननस सोलायला आणि फोडी करून द्यायला सांगितले. अननसाच्या फोडींवर मीठ-तिखट  घालून त्या फोडी आम्ही चौघांनी अगदी मिटक्या मारत खाल्ल्या. छान श्रमपरिहार झाल्यानंतर ते दोघे तरुण त्यांच्या मोटारसायकलवर स्वार होऊन खामगावकडे निघून गेले. आम्ही आमची गाडी दैत्यसूदन मंदिराकडे वळवली. ते सुंदर मंदिर पाहत असतानाच मी आनंदला सांगून टाकले, "आपण गाईड घेऊन उद्या पहाटे लोणार परिसर बघायला परत यायचे."
 
दुसऱ्या दिवशी लोणारहून उशिरा निघालो आणि पुण्याला घरी पोहोचायला फार रात्र होईलसे वाटलेच तर अर्ध्या वाटेवर अहिल्यानगरला मुक्काम करू, पण पहाटे उठून लोणार सरोवर पुन्हा पाहिल्याशिवाय इथून परतायचे नाही असा निर्णय मी घेऊन टाकला. तो निर्णय किती योग्य होता, हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजले.    

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-३

लोणार सरोवराबाबत गेली कित्येक वर्षे वर्तमानपत्रांमधून आलेले अनेक लेख मी वाचलेले होते. हजारो वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर भारतातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील एक आश्चर्य समजले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य असे की, उल्कापातामुळे जगभरामधे अनेक ठिकाणे विवरनिर्मिती झाली. पण फक्त याच विवराचे रूपांतर खाऱ्या पाण्याच्या सरोवरामधे झालेले आहे. "सुमारे सव्वातीनशे पायऱ्या उतरून आणि जंगलातली पायवाट चालून, आपण अगदी सरोवरापर्यंत जाऊन आलो तरीही, लोणार सरोवर परिसर बघायला अर्धा दिवस पुरतो" असे मला अनेकांनी सांगितले होते. त्या दृष्टीने आम्ही MTDC रिसॉर्टमधल्या खोलीचे एकाच रात्रीचे बुकिंग केले होते. आम्ही पोहोचलो तो शनिवार होता. लोणार ते पुणे हा प्रवास कमीतकमी ८ ते ९ तासांचा आहे असे आम्हाला गुगल मॅप्सवर दिसत होते. त्यामुळे, संध्याकाळच्या आत सरोवर बघायचे, दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दैत्यसूदन मंदिर बघून उशिरात-उशिरा सकाळी नऊ वाजेपर्यंत लोणारहून निघून, दिवसाढवळ्या पुण्याला पोहोचायचे, असे आम्ही मनाशी ठरवले होते. 

मेहेकर येथील सुंदर मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही साधारण दुपारी अडीच-तीनच्या सुमारास MTDC रिसॉर्टमध्ये पोहोचलो. या रिसॉर्टमध्ये छोट्या-छोट्या अनेक टुमदार बंगल्या आहेत. प्रत्येक बंगलीमधे एक डबलरूम, अटॅच्ड टॉयलेट आणि खोलीच्या समोर व मागच्या बाजूला व्हरांडा आहेत. या व्हरांड्यांमधे प्लॅस्टिकच्या आराम खुर्च्या ठेवलेल्या असतात. चार-चार बंगल्यांच्या मधल्या चौरस भागामधे चांगली निगराणी राखलेले हिरवेगार लॉन  आहे. आसपासच्या संपूर्ण परिसरामधे  भरपूर झाडे आहेत. शिवाय संपूर्ण रिसॉर्टच्या आवारामध्ये छान  फुलझाडे लावून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. एकूण तिथले वातावरण शांत आणि प्रसन्न आहे. व्हरांड्यामधल्या खुर्च्यांवर बसून निवांतपणे चहाचे घोट घेत त्या वातावरणाचा सुखद अनुभव घेता येतो. या रिसॉर्टचे रेस्टॉरंट वरच्या मजल्यावर आहे. त्या मजल्याची उंची मुद्दामच खूप जास्त ठेवलेली असल्यामुळे पूर्वी तिथूनच लोणार सरोवराचे दर्शन व्हायचे. पण आता रेस्टॉरंट आणि लोणार सरोवर यांच्या  दरम्यान खूप झाडी वाढल्यामुळे तिथून सरोवर दिसत नाही.  

MTDCच्या थोड्याफार गलथान कारभाराची पहिली झलक आम्हाला रिसेप्शन काउंटरवर गेल्याबरोबर मिळाली. महाराष्ट्रातल्या ज्या-ज्या पर्यटनस्थळी MTDC ची रिसॉर्ट आहेत त्या सर्व ठिकाणांची माहितीपुस्तके तिथल्या एका शेल्फमधे  ठेवलेली दिसली. मी साहजिकच लोणारचे माहितीपुस्तक शोधू लागले. तिथल्या मॅनेजरने अगदी थंडपणे, 'लोणारची माहितीपुस्तके संपली आहेत. लोणार वगळता इतर सर्व माहितीपुस्तके आहेत' असे उत्तर दिले. त्याच्या आवाजामध्ये कुठलीही दिलगिरी नव्हती हे प्रकर्षाने जाणवले. 

आमच्या बंगलीची किल्ली घेऊन आम्ही सामान खोलीत ठेवले. खोल्यांची देखभाल फारशी चांगली नाही, हे लगेच जाणवले. आजकाल कोणत्याही साध्या हॉटेलच्या खोलीमध्ये आंघोळीचा साबण, शाम्पू, टूथपेस्ट, पाणी गरम करण्याची किटली, हे सर्व ठेवलेले असते. त्या बंगलीमध्ये यापैकी एकही गोष्ट तर नव्हतीच, पण टॉवेल्स व नॅपकिन्सदेखील ठेवलेले नव्हते. चौकशी करता सांगण्यात आले की, "लॉंड्रीवाला दोन वाजता येईल, तेंव्हा टॉवेल मिळतील." खोलीमध्ये 'वायफाय' कनेक्शन होते पण इंटरनेट चालू नव्हते. त्याचे कारण ऐकून तर आम्ही धन्य झालो. "इंटरनेट कनेक्शनची फी वेळेत भरलेली नसल्याने कनेक्शन कापलेले आहे!"

दुपारी जेवणाच्या वेळेस आम्ही मेहेकरच्या बालाजी मंदिरात साबुदाणा उसळीचा प्रसाद खाल्लेला असल्यामुळे जेवायची भूक नव्हतीच. चहा घेऊन लगेच आम्ही सरोवर परिसर हिंडायला जायचे ठरवले. पण तिथल्या सहाय्यकाने दोन कप चहा आणायला अर्धा तास लावला. अल्युमिनियम फॉईलने झाकून आणलेल्या कपांमधला तो चहा आमच्या हातात येईपर्यंत थंड झालेला होता. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना द्यायची असेल तर अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे जाणवले.  

लोणार गावामधे MTDC रिसॉर्ट व्यतिरिक्त 'विक्रांत रिसॉर्ट' आणि 'कृष्णा लॉज' अशाही दोन जागा राहण्याजोग्या आहेत असे समजले. पण लोणार सरोवराच्या सर्वात जवळचे निवासस्थान MTDC रिसॉर्ट हेच आहे. कृष्णा लॉज ST स्टँडच्या समोरच आहे. तिथे कदाचित रास्त भावात राहण्याची सोय होत असावी. विक्रांत रिसॉर्टचे दर MTDC रिसॉर्टपेक्षा जास्त आहेत असेही समजले. अर्थात, ही सगळी माहिती आम्हाला स्थानिक लोकांकडून 'ऐकीव' स्वरूपात मिळालेली असल्याने आणि आम्ही कृष्णा लॉज किंवा विक्रांत रिसॉर्ट येथे प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करून घेतलेली नसल्याने खात्रीशीर म्हणता येणार नाही.   

चहा घेऊन आम्ही निघालो. लोणार सरोवराच्या बाहेर रस्त्यावरच आमची गाडी उभी केली. तिथे जेमतेम पाच-सहा गाड्याच उभ्या होत्या. बाहेर हातगाडीवर तीन-चार फळविक्रेते, प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये उघड्यावरच ठेवलेल्या अननस आणि कलिंगडाच्या कापलेल्या फोडी विकत होते. काही पर्यटक ते विकत घेऊन खातही होते. 'उघड्यावरील फळे आणि अन्न खाऊ नये' असे शाळेत कितीही शिकवले गेले तरी प्रत्यक्षात मात्र ते पाळले जाताना दिसत नाही. "असल्या पोपटपंची शिक्षणाचा तरी काय उपयोग?" असे मला वाटून गेले. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता बाळगण्याची सवय आपल्या देशातल्या सामान्यजनांना लावण्यासाठी अशा छोट्याछोट्या गोष्टींमधे प्रचंड काम करणे आवश्यक आहे. 


सरोवर परिसरात जाण्यासाठी सकाळी सातपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच प्रवेश दिला जातो. पाच वाजता प्रवेशद्वार बंद केले जाते, पण खाली सरोवरापर्यंत गेलेल्या पर्यटकांना गडबडीने वर यावे लागत नाही. खाली गेलेले सर्व पर्यटक वर आलेले आहेत याची खात्री करून मगच प्रवेशद्वाराला कुलूप लावले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटकाला आपले नाव, गावाचे नाव, फोननंबर यांची नोंद करावी लागते. त्याशिवाय आधारकार्ड किंवा एखादे फोटो-आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागते. तिथे असलेले सुरक्षारक्षक प्रत्येक पर्यटकांचे सर्व तपशील त्यांच्या वहीमध्ये लिहून घेतात. "इतकी कसून चौकशी का केली जाते?" हा माझ्या मनामधे साहजिकच आलेला प्रश्न मी तिथल्या सुरक्षारक्षकाला विचारला असता, गेल्या ऑगस्ट महिन्यामधे घडलेली एक धक्कादायक सत्यघटना त्याने सांगितली. परभणी जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीने लोणार सरोवराच्या परिसरामधे येऊन, एका साथीदाराच्या मदतीने आपल्या तरुण व अविवाहित प्रियकराचा गळा आवळून खून केला होता. मारेकऱ्यांनी त्या तरुणाचा मृतदेह तिथल्या झाडीमधे टाकून दिला होता. त्या घटनेनंतर, या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड तपासून, नाव, गाव व फोननंबर यांची नोंदणी करण्याचे आदेश पोलिसांकडून जारी झाले आहेत. ही घटना ऐकून, माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला.  

लोणार सरोवराच्या परिसरात शिरल्यानंतर काही दगडी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. रस्त्याच्या  पातळीपासून जेमतेम २५-३० मीटर्स खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आणि इतर काही देवळांचा समूह लागतो. त्याच्याच डाव्या बाजूला जरा वरच्या भागामध्ये भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ हटेश्वर मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच नारदेश्वर मंदिर आहे. तिथेच एक आयताकृती सुंदर लॉन तयार करून या भागाचे सुशोभीकरण करण्याचा थोडाफार प्रयत्न झालेला आहे. आम्ही ती मंदिरे परतीच्या वाटेवर बघायचे ठरवले आणि सरोवराच्या दिशेने पायऱ्या उतरायला लागलो. काही अंतर गेल्यावर पायऱ्या संपून पायवाट लागते. तिथेच वनखात्याचे सुरक्षारक्षक बसलेले दिसले. त्यांनी आम्हा दोघांकडून प्रत्येकी चाळीस रुपये घेऊन प्रवेशिका दिली. त्यानंतर आम्ही पुन्हा ती पायवाट धरली. लोणार सरोवराभोवती एकूण बरीच सुंदर मंदिरे आहेत. सगळी मंदिरे, त्यांचे वैशिष्ट्य आणि इतर बरेच काही मी पुढील भागांमधे सांगणार आहे. 

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-२

आम्ही सिंदखेडराजाहून दुपारी चार-साडेचारच्या सुमारास शेगावच्या दिशेने निघालो. वाटेवरच सुमारे १६-१७ किलोमीटरवर असलेल्या देऊळगावराजा गावातले बालाजीचे देऊळ आम्हाला बघायचे होते. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही अर्ध्या तासातच पोहोचलो. देवळापर्यंत जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांमधे दोन्ही बाजूला, साधारण सर्व देवस्थानांच्या ठिकाणी असतात तशी दुकाने होती. या बालाजीच्या देवळातली मूर्ती लखुजीराजांना सापडली असे म्हणतात. जगदेवराव जाधवांनी बांधलेल्या मूळ देवळाचा जीर्णोद्धार १९५२ साली  केला गेला.  जाधवांचे वंशज या देवळाचे विश्वस्त आहेत. 

या मंदिराला बालाजीचे दुकान किंवा देवघर असे म्हणले जाते. मंदिराला कळस नाहीये. या देवळातील बालाजीची मूर्ती यातुशय सुबक आणि मोहक आहे. बालाजीच्या उजव्या बाजूला श्रीदेवी आणि डाव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. बालाजीच्या मस्तकावर नागफणी आणि त्यावर पाचू बसवलेला आहे. या बालाजीला 'प्रतितिरुपती' असेही म्हणतात. तिरुपतीच्या मंदिरामधे बोललेला नवस या मंदिरामधे फेडता येतो असे मानले जाते. या देवळामध्ये देणगी देणाऱ्या भक्तांना, त्यांनी दिलेल्या देणगीच्या प्रमाणात काही टक्केवारीवर प्रसाद दिला जातो, हे या मंदिराचे वैशिष्ठ्य आहे. नवरात्रात लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा होतो. आम्ही गेलो तेव्हा मात्र तिथे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती. दर्शन घेऊन बाहेर पडलो तेंव्हा एक वयस्कर विक्रेता, खाण्याचा डिंक आणि जिरे विकायला रस्त्याकडेलाच बसलेला दिसला. त्याच्याकडचा डिंक अगदी  उत्तम प्रतीचा असल्याची तो ग्वाही देत होता आणि मी डिंक विकत घ्यावा यासाठी तो फारच गळ घालत होता. जिरे चांगल्या प्रतीचे आहे हे मला वासावरून कळत होते पण डिंकाबद्दल खात्री नव्हती. तरीही मी एक किलो डिंक आणि अर्धा किलो जिरे विकत घेतले. भाव, दर्जा यांची फारशी चिकित्सा न करता, मी इतकी लवकर खरेदी केलेली बघून आनंदला भलतेच आश्चर्य वाटले. घरी परतल्यानंतर गरम तुपामध्ये डिंक चांगला फुलल्यावर माझा चेहरा आनंदाने फुलला हे सांगायलाच नको. 

संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही चिखली-खामगावमार्गे शेगावकडे निघालो. शेगावच्या 'श्री गजानन महाराज संस्थान'तर्फे चालवण्यात येणाऱ्या 'आनंदविहार' या अतिथीगृहातच मुक्काम करावा असे माझ्या मैत्रिणीने आवर्जून सांगितले होते. संभाजीनगरहून निघण्यापूर्वीच आम्ही ऑनलाईन किंवा फोनबुकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, "शेगावपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचलात की फोन करा. खोली मिळून जाईल" असे आम्हाला फोनवर सांगण्यात आले हॊते. खामगावला पोहोचलो तेंव्हा आम्ही 'आनंदविहार'ला फोन केला. पण, "माऊली,  इथे खोलीसाठी भक्तांची मोठी रांग लागली आहे. कमीतकमी दोन तासांचे वेटींग आहे. बराच वेळ थांबूनही खोली मिळेल याची खात्री देता येत नाही. आपणही येऊन रांगेत थांबू शकता." असे उत्तर अतिशय  नम्रपणे देण्यात आले. सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता. दिवसभराच्या प्रवासामुळे आम्ही दोघेही कंटाळलेलो होतो. आनंद  दिवसभर ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याला विश्रांतीची नितांत गरज होती. त्यामुळे मी पुन्हा फोन केला. परंतु, नम्र स्वरामधे तेच उत्तर देऊन फोनवरची व्यक्ती म्हणाली, "माऊली, इथे जागा मिळेल याची खात्री देता येणार नाही. शेजारी आमचेच 'आनंद विसावा' नावाचे अतिथीगृह आहे, तिथे चौकशी करा." पण तिथेही आम्हाला विनम्र स्वरात नकारघंटाच ऐकू आली. आम्ही बरेच हिरमुसलो होतो. तरीही मोठ्या आशेने 'आनंदविहार'च्या पार्किंगमध्ये गाडी लावून बुकिंग काउंटरकडे गेलो. 

'आनंदविहार'चा परिसर अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ आणि रम्य आहे. आपल्याला खोली मिळेल की नाही अशी धाकधूक मनामध्ये बाळगून, बुकिंग काऊंटरजवळ आम्ही सुमारे दोन तास रांगेत थांबून होतो. "आत्तापर्यंत असा अनुभव कधीच आलेला नाही" असे रांगेतले अनेकजण आम्हाला सांगत होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी एकादशी होती आणि पाठोपाठ रविवार व २६ जानेवारीची सुट्टी असल्याने भक्तांची गर्दी लोटली असल्याचे आम्हाला समजले. काहीजण कंटाळून 'आनंद विसावा' मधे कोणालातरी पाठवून तिकडे खोली मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आठ वाजून गेले तरी आम्हाला खोली मिळाली नव्हती. आता थकव्यासोबतच पोटात भूकही जाणवत होती. पण आमच्यापैकी किमान एकाला रांगेत थांबणे आवश्यक होते. त्यामुळे आधी मी आणि त्यानंतर आनंदने, तिथल्या उपाहारगृहामधे जाऊन जेवण केले. अतिशय साध्या, सात्विक चवीची थाळी प्रत्येकी केवळ सत्तर रुपयाला होती. अखेर, रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला एक डबलरूम मिळाली आणि आमचा जीव भांड्यात पडला. 

'आनंदविहार' येथे राहण्यासाठी २/३/४/५/६ जणांची सोय असलेल्या वेगवेगळ्या आकारमानाच्या एकूण सहाशे खोल्या आहेत. सर्व खोल्यांमधे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे. एकंदर परिसर आणि खोल्यांमधली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. खोलीत गेल्याबरोबर अंघोळ करून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ व नाश्ता उरकल्यानंतर आम्ही श्री गजानन महाराजांचे मुखदर्शन केले. देवळातली चोख व्यवस्था, तेथील सर्व सेवेकऱ्यांची सेवा आणि लोटलेल्या भक्तांचा गजाननमहाराजांच्या प्रति असलेला भक्तिभाव मनाला खूपच भावला. दर्शन झाल्यावर, खोलीवर परतून सामानाची आवराआवर केली. 'आनंदविहार'मधले प्रसन्न, शांत आणि अतिशय सात्विक वातावरण अनुभवायला परत शेगावला यायचेच अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही खोली सोडली. शेगाव सोडताना तिथली सुप्रसिद्ध कचोरी खाण्याचा मोह टाळता आला नाही. गुगलचा सहारा घेऊन एका कुठल्यातरी शर्मांच्या दुकानातील कचोऱ्या विकत घेतल्या. काही बायका डझनावारी 'फ्रोझन' कचोऱ्या विकत घेत होत्या. मी दोन दिवसांनंतर पुण्याला पोहोचणार असल्यामुळे फ्रोझन कचोऱ्या विकत घेता आल्या नाहीत. कचोरीची चव अप्रतिम असली तरीही अशावेळी नेमके स्वतःचे गोलमटोल शरीर डोळ्यासमोर येत असल्यामुळे केवळ एका कचोरीवर समाधान मानले. 

सुमारे ११ वाजता शेगाव सोडून आम्ही साडेबारा वाजेपर्यंत मेहेकर येथील 'शारंगधर  बालाजी' मंदिरामधे पोहोचलो. या मूर्तीबाबतची सत्यकथा अतिशय रंजक आहे. १८८८ साली, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेहेकर गावाजवळच धरणाचे खोदकाम सुरु झाले होते. त्या खोदकामादरम्यान एक मोठी लाकडी पेटी सापडली. त्या पेटीमधे चंदनाच्या सालींमधे गुंडाळलेली बालाजीची अत्यंत सुबक मूर्ती होती. ही मूर्ती ब्रिटिशांनी पळवू नये म्हणून, कुठल्याच मुहूर्ताची वाट न बघता, ग्रामस्थांनी रातोरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यामुळे संतापलेल्या ब्रिटिशांनी येथील साठ गावकऱ्यांना काही महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. त्या पेटीवर असलेला ताम्रपट व मूर्तीवरील दागिने मात्र ब्रिटिशांनी हडप केले, असे सांगितले जाते. 

काळ्या गंडकी दगडामध्ये कोरलेली, ११ फुटी उंच, चार फुटी रुंद आणि दोन फुटी जाड, अशी ही मूर्ती बालाजीची जगातली सर्वांत मोठी मूर्ती आहे. मूर्तीभोवतीच्या प्रभावळीमधे दशावतार कोरलेले आहेत. चतुर्भुज  मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहे. बालाजीच्या मूर्तीबरोबर श्रीलक्ष्मी विराजमान असलेली ही एकमेव मूर्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी-विष्णूच्या एकत्रित दर्शनाचा लाभ मिळू शकतो. प्रभावळीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित चित्र आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय आणि भूदेवी आहेत. मूर्तीच्या डोक्यावर असलेल्या मुकुटामध्ये शारंग नावाचे धनुष्य धारण केलेल्या श्री विष्णूंची मूर्ती असल्यामुळे या मूर्तीला शारंगधार-बालाजी असे नाव पडले आहे. आपल्या मनामधे जो भाव असेल तोच भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसत असल्यामुळे इथे आत्मरूप दर्शनाचा लाभ मिळतो असे म्हणतात. इतकी सुंदर मूर्ती असलेल्या या देवस्थानाचा परिसर मात्र अगदीच रया गेलेला भासला. आम्ही दर्शन घेत असताना तिथल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला विचारले, "तुम्ही बाहेरगावाहून आला आहात का?" आम्ही हो म्हणताच, मोठ्या अगत्याने ते आम्हाला देवळामागे असलेल्या प्रसादालयात घेऊन गेले. बाहेरगावच्या भक्तांना आवर्जून प्रसाद देण्याची प्रथा तिथे आहे. अप्रतिम चवीची 'साबुदाणा उसळ' म्हणजेच साबुदाणा खिचडी, आणि ताक असा प्रसाद त्या सेवेकऱ्यांनी आम्हाला आग्रहाने खाऊ घातला.  

मंदिरामधून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर नृसिंह मंदिराचा फलक दिसला. संत श्री बाळाभाऊमहाराज पितळे यांच्या ज्ञानमंदिराजवळील सुमारे २०० वर्षे जुन्या वाड्यामध्ये हे मंदिर आहे. संपूर्ण जगामधे जशी १२ ज्योतिर्लिंगे  प्रसिध्ध आहेत तशी पौराणिक महत्त्व असलेल्या एकूण ११ नृसिंह मूर्ती आहेत. त्यापैकी सहावे नृसिंह मंदिर हे मेहेकर येथे आहे. ही स्वयंभू प्राचीन मूर्ती कमीतकमी १५०० वर्षे जुनी असावी. ही वाकाटक काळातील मूर्ती आहे असे काही संशोधक मानतात तर काही जणांच्या मते ही उत्तर चालुक्यकालीन असावी. एकुणात, या मूर्तीच्या कालखंडाबाबत एकमत नाही. अनेक शतके जमिनीखालील भुयारामधे ही मूर्ती बंदिस्त होती. येथील पितळे कुटुंबियांपैकी, नागपूरस्थित श्यामराज पितळे महाराजांना दृष्टांत झाल्यामुळे मेहेकर येथील माळीपेठेत असलेली ही हेमाडपंती भुयारामधली ही मूर्ती बाहेर काढली गेली. या मूर्तीची स्थापना १५८१ साली झालेली आहे. गंडकी काळ्या पाषाणामधे कोरलेली ही अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती अष्टभुज असून, तिच्या हातांमधे शंख, चक्र, पद्म आणि गदा आहेत. नृसिंहाचा चेहरा, आयाळ, व मुकुटावर आभूषणे अतिशय रेखीवपणे कोरलेली आहेत. हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये नृसिंहाची नखे रुतलेली स्पष्ट दिसून येतात. नृसिंहानी भक्त प्रल्हादाबरोबर इथेच भोजन केले आणि ते शांत झाले असा समज  आहे. त्यामुळे या देवस्थानात अन्नदानाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मंदिरामधे मुख्य मूर्तीजवळच श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील सुबक पण छोटी मूर्ती आहे. 

आम्ही काहीही ठरवले नसताना, एकादशीच्या दिवशी तीन देवस्थानाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचा योग आपसूकच आला, हे विशेष होते. अशा रितीने पुण्यसंचय करून, मेहेकरहून आम्ही लोणारच्या वाटेला लागलो. 

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-१

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला जाणे झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत काम संपणार होते. त्यानंतर तसेच पुढे लोणारला जावे असे आम्ही ठरवले. अनेक वर्षांपासून लोणार सरोवराला भेट द्यायची इच्छा माझ्या मनामधे होतीच. माझ्या तीन मैत्रिणी नुकत्याच तिथे जाऊन आल्याचे, त्यांनी ग्रूपवर पाठविलेल्या फोटोंवरून कळले होते. त्यामुळे आपणही तिथे जावे आणि आपलेही फोटो शेयर करावेत, असे वाटायला लागले. त्यापैकी एका मैत्रिणीला फोन केला असता तिने, "लोणारपर्यंत जाताच आहात, तर शेगावला पण जाऊनच या", असे आग्रहाने सांगितले. आम्ही दोघेही फारसे भाविक नसल्याने, आवर्जून शेगावला जाण्याचे कदाचित ठरवलेही नसते. पण मैत्रिणीच्या सूचनेप्रमाणे, आम्ही शेगाव आणि इतर एक-दोन ठिकाणांची भ्रमंती करायचे ठरवले. 

छत्रपती संभाजीनगरपासून जवळच, शिंगी नावाच्या छोट्या गावातील शाळेमध्ये आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथला कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास आम्ही निघालो आणि वैजापूर गावाजवळ समृद्धी महामार्गाला लागलो. या महामार्गाबद्दल फक्त वर्तमानपत्रामधून वाचले होते. पण प्रत्यक्षांत, ताशी १२० किमी वेगाने या महामार्गावर प्रवास करताना, आपण अमेरिकेतल्या Interstate highway वर प्रवास करतोय की काय असे वाटत होते. मात्र या महामार्गावर अजून बऱ्याच सोयी व्हायला हव्यात याची जाणीव मात्र प्रकर्षाने झाली. बुलढाणा एक्झिटने समृद्धी महामार्ग सोडून आम्ही डावीकडे उतरलो आणि तिथून सिंदखेडराजा या गावाकडे निघालो. राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानाला भेट देण्याचा आमचा इरादा होता.  

जिजाऊंचे वडील, सरदार लखुजीराव जाधव यांच्या, सिंदखेडराजा येथील वाड्यामधे जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. १५७६ साली बांधल्या गेलेल्या या दगडी वाड्याची खूपच पडझड झालेली असून तिथे काही डागडुजीचे काम चालू होते.  वाड्याच्या भोवतालच्या तटबंदीचा आवाका पाहता, कोणे एके काळी ही भव्य वास्तू मोठ्या दिमाखात उभी असेल याचा अंदाज येतो. वाड्यात जायला फक्त पाच रुपये तिकीट आहे. वाड्याच्या उंच दरवाज्यावर, दगडामधे कोरलेल्या चौदा नारळांचे तोरण आहे. प्रवेशद्वारात सर्वात खाली देवड्या, वर नगारखाना आणि त्यावर सज्जा  आहे. आत गेल्यावर उजव्या बाजूच्या एका खांबावर जाधवांची वंशावळ आणि डाव्याबाजूच्या खांबावर सिंदखेडराजामधील सर्व प्रेक्षणीय स्थळांची नावे लिहिलेली आहेत. म्हाळसामहाल आणि दरबारमहाल अशा दोन भागामध्ये वाडा विभागला गेला आहे. जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसा असल्यामुळे, त्यांच्या राहत्या महालाचे नाव म्हाळसामहाल असे ठेवले होते. या महालात जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी जिजाऊमातेच्या  मांडीवर बसलेल्या बालशिवाजीराजांचा पुतळा आहे. महालात असलेला एक भुयारी मार्ग आता बंद करून ठेवण्यात आला आहे. या महालाखालील तळघर धान्यकोठार म्हणून वापरत असत. म्हाळसामहालाच्या जवळच जरा मागच्या बाजूला दरबारीमहाल आहे. लखुजीराजे यांचा दरबार इथे भरायचा. समोरच्या पटांगणावर सामान्य जनतेला बसण्याची जागा असावी. वाड्याबाहेर जिजामातांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्या पुतळ्याला वंदन करून, तिथे आम्ही आमचे फोटो काढून घेतले आणि पुढे लखुजीराजे जाधवांच्या समाधीकडे निघालो. 
अहमदनगरचा (म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगरचा) सुलतान निजामशाह दौलताबादचा किल्ला जिंकण्यासाठी जवळपास एक तप प्रयत्न करीत होता पण त्याला ते जमले नव्हते. १५७२ साली लखुजीराजे जाधव यांनी निजामशहाला तो किल्ला जिंकून दिल्यामुळे निजामाने त्यांना मोठी जहागिरी दिली. पण पुढे २६ जुलै १६२९ या दिवशी, निजामशहानेच लखुजीराजे, त्यांचे दोन पुत्र अचलोजीराव व राघोजीराव आणि नातू यशवंतराव यांचा दौलताबादच्या दरबारात खून करवला. म्हाळसाबाई आणि त्यांच्या दोन्ही सुना आपापल्या नवऱ्यांच्या चितेवर सती गेल्या. या सर्वांच्या आणि जाधव कुटुंबातील इतरही स्त्री-पुरुषांच्या समाधी, लखुजीरावांचे बंधू जगदेवराव यांनी बांधून घेतल्या. हे दगडी बांधकाम चौरसाकृती आहे आणि त्यावर विटांनी बांधलेला घुमट आहे. समाधीच्या दरवाजावर कीर्तिमुखाचे शिल्प आणि दरवाजाच्या  दोन्ही बाजूला हत्तीवर आरूढ झालेल्या वाघाचे शिल्प आहे. प्रत्येक समाधीवर शंकराची पिंड आहे. समाधीस्थळावर गेल्यावर मन अगदी खिन्न होते. हे हत्याकांड ज्यावेळी झाले त्यावेळी शिवराय जिजामातेच्या पोटामध्ये होते. या हत्याकांडानंतर आपले वडील, भाऊ आणि भाचा यांच्या खुनाचा बदला घेण्याची तीव्र इच्छा कदाचित जिजाऊंच्या मनात निर्माण झाली असावी. त्यामुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याची कल्पना त्यांच्या मनात रुजली आणि ती त्यांनी आपल्या पराक्रमी सुपुत्राच्या हस्ते प्रत्यक्षात आणली.  

या समाधीच्या शेजारी सिंदखेडचे ग्रामदैवत असलेले रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर शेजारी-शेजारी असलेले दोन नंदी आपले लक्ष वेधून घेतात. महादेवासमोर दोन नंदी क्वचितच बघायला मिळतात. मंदिराच्या आवारात एक भलेमोठे मोठे दगडी  तुळशीवृंदावन आणि सहा शिवलिंगे आहेत. या परिसरामधे मंदिराचे अनेक भग्नावशेष पडून आहेत. प्रभू रामचंद्रांनी या रामेश्वर मंदिरातील पिंडीची स्थापना  केली असे मानले जाते. दर महाशिवरात्रीला इथे आठवडाभर जत्रा भरते. या मंदिराजवळच नीळकंठेश्वर मंदिर  आहे. त्या मंदिराच्याच आवारात दगडी बांधकाम असलेली, चौरस आकाराची नीळकंठेश्वर बारव आहे. या आवारात भैरव, गणेश, हनुमान आणि शनिदेवाची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या एका गर्भगृहात शंकराची पिंड आहे तर दुसऱ्या गर्भगृहामधे चतुर्भुज हरिहराची खंडित मूर्ती आहे. या मूर्तीचे उजवे अंग भगवान शंकराचे आहे तर डावे अंग भगवान विष्णूचे आहे. एकाच मंदिरामध्ये शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांची मंदिरे क्वचितच पाहायला मिळतात. आम्ही पूर्वी पाहिलेल्या, सोलापूरजवळच्या हत्तरसंग कुडल येथील मंदिराची आठवण नीळकंठेश्वर मंदिर पाहताना मला झाली. 
रामेश्वर महादेव व नीळकंठेश्वर ही दोन्हीही मंदीरे पुरातन असून यांचा जीर्णोध्दार आधी लखुजीराव जाधवांनी आणि कालांतराने अहिल्यादेवी होळकरांनी केला होता. 

आम्हाला पुढे देऊळगावराजा गावाच्या दिशेने निघायचे असल्याने आमच्या हातात वेळ कमी होता. दगडी बांधकाम असलेला चांदणी तलाव, त्यामधला चांदणी महाल, मोती तलाव आणि 'जिजाऊ सृष्टी' नावाचे एक आधुनिक स्मारक, ही सर्व ठिकाणे आम्ही बाहेरूनच पहिली आणि देऊळगावराजाकडे निघालो. 


शनिवार, ४ जानेवारी, २०२५

ना खाऊंगा ना खाने दूंगा !

ना खाऊंगा ना खाने दूंगा ! 

आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदीजींनी काही काळापूर्वी ही घोषणा केली आणि त्याचे देशभरामध्ये बरेच पडसाद उमटले. राजकारणामध्ये कोणता नेता काय घोषणाबाजी करतो आणि त्या घोषणा प्रत्यक्षात किती पाळल्या जातात, याबाबत आपण कोणीच न बोललेले बरे. पण "ना खाऊंगा ना खाने दूंगा!" ही घोषणा मात्र माझ्या मनाला भावली होती. 

माझ्या मते, वरकमाई करणे ही एक वृत्ती किंवा स्थायीभाव असतो. ज्याच्यामध्ये तो असतो, तो कुठे ना कुठेतरी उफाळून येतोच. यावरून लहानपणी ऐकलेली एक गंमतशीर गोष्ट आठवली. एका राजाच्या दरबारामध्ये एक खाबूनंदन, लाचखोर कर्मचारी होता. त्याला कुठल्याही खात्यात नेमले तरी तो वरकमाई करत असल्याच्या तक्रारी राजाकडे यायच्याच. पण त्या चतुर माणसाला कधीही रंगेहाथ पकडता आलेले नसल्याने राजाला त्याला कामावरून काढूनही टाकता येत नव्हते. शेवटी राजाने त्याला समुद्रकिनारी बसायला सांगितले आणि प्रत्येक दिवसभरामध्ये समुद्रात उठणाऱ्या लाटा मोजण्याचे काम दिले. थोड्याच दिवसांत पुन्हा या महाशयाविरुद्ध राजाकडे  तक्रारी यायला सुरुवात झाली. समुद्राच्या काठी बसून हा कुणाकडून आणि कशी लाच खात असेल? या बद्दल राजाला भलतेच कुतूहल वाटले. "राजाने मला समुद्राच्या लाटा मोजण्याचे काम दिलेले आहे. तुमच्या जहाजाच्या हालचालीमुळे, या सरकारी कामात व्यत्यय येत आहे'  अशी सबब सांगून हा महाभाग  किनाऱ्यावर आलेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाकडून पैसे खात होता! त्यामुळे पैसे खाण्याची वृत्ती असलेला मनुष्य कुठल्या तरी मार्गाने पैसे खाणार हे निश्चित.  

आनंदने, म्हणजे माझ्या नवऱ्याने, २६ वर्षे सेनाधिकारी म्हणून नोकरी केली, आणि कर्नल पदावर असताना, त्याने ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सैन्याच्या नोकरीमधे वरकमाई करण्याचे प्रसंग तसे कमीच येतात. त्यातून सैन्याच्या  शिस्तीमधे असे काही करताना पकडले गेल्यास कडक कारवाई होण्याची जबरदस्त भीती असतेच. तरीदेखील, 'लाचखोरी' हा स्थायीभाव असलेल्या, सैन्यातल्याही काही लोकांबाबत, लाच खाणे, लाच देणे किंवा इतरही गैरप्रकार क्वचितप्रसंगी कानावर येतातच. आनंदने चार वर्षे, अलाहाबाद येथील सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB), म्हणजेच सेनाधिकारी निवड समितीवर काम केले. तीन अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमधील तो एक सदस्य असे. त्याकाळी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर काही भुरट्या एजंट लोकांचा सुळसुळाट होता. सेनाधिकारी होण्यासाठी  आलेल्या उमेदवारांना अलाहाबाद स्टेशनवर उतरल्या-उतरल्या हे एजंट लोक गाठत असत. "आम्ही तुमची निवड करून देण्यासाठी मदत करू. परंतु, त्यासाठी निवड समितीतील अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागतात.  सेनाधिकारी म्हणून तुमची निवड न झाल्यास, तुमच्याकडून घेतलेली अर्धी रक्कम तुम्हाला परत मिळेल" असे आमिष दाखवून अनेक उमेदवाराकडून ते एजंट पैसे घेत असत. प्रत्यक्षात, सेनाधिकारी निवडण्याची प्रक्रिया अत्यंत निष्पक्षपणे होईल याची दक्षता घेतलेली असते. त्यासाठी निवडसमितीवरील अधिकाऱ्यांवर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बरीच बंधनेही घातलेली असत. परंतु, सेनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये सरसकट लाचखोरी चालत असल्याचा गैरसमज उमेदवारांमधे पसरवून, मधल्यामधे ते लबाड एजंटस भरपूर कमाई करत असत. कधी-कधी निवडसमितीच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्नही व्हायचा. त्या काळात आनंदलाही एक-दोन वेळा लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. लाच घेण्याच्या किंवा देण्याच्या सक्त विरोधात असल्यामुळे, आनंद त्या प्रलोभनाला कधीच बळी पडला नाही. 

वैयक्तिक पातळीवर 'ना खाऊंगा ना खाने दूंगा!' हे तत्व काटेकोरपणे पाळणे आपल्या देशामधे तसे अवघडच आहे. या घोषणेचा पहिला भाग, म्हणजे लाच न खाणे, एकवेळ शक्य आहे. कारण त्या गोष्टीवर बऱ्याच अंशी  स्वतःचे नियंत्रण असू शकते. पण काही 'मलईदार' सरकारी खात्यांमधे, लाच न खाणारा कर्मचारी इतरांना नकोसा असतो. कधी-कधी अशा कर्मचाऱ्याला वरचेवर बदली, सहकाऱ्यांकडून होणारी कुचेष्टा, वरिष्ठाकडून अपमानास्पद वागणूक, अशा अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आजही कित्येक सरकारी कामांमधे, लाच दिल्याशिवाय योग्यप्रकारे आणि वेळच्यावेळी काम होत नाही हे आपण ऐकतो. म्हणूनच, सामान्य माणूस, 'ना खाने दूंगा' हे तत्व सहजी पाळू शकत नाही. किंबहुना, सर्वसामान्य भारतीय नागरिकाला लायसेन्स काढण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, सर्व कामे, थोडीफार लाच देऊन करून घेण्यामध्ये फारसे काही गैर वाटत नाही. परंतु दुर्दैवाने,  लाच देऊनसुध्दा एखादे काम व्यवस्थित होईलच याची खात्री नसते. १५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामधे वास्तव्यास असलेल्या एका अमराठी सेनाधिकाऱ्याला येथील रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) हवे होते. अनेक वेळा विहित नमुन्याचा अर्ज आणि योग्य शुल्क भरूनही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला त्याला काही केल्या मिळत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने एका एजंटला गाठले व  ६००० रुपये देऊन आपले काम करून घेतले. पण प्रत्यक्षांत जेंव्हा त्याच्या हातात दाखला आला तेंव्हा त्यावर 'भारत देशाचा रहिवासी' इतकेच लिहून आले होते! झालेल्या चुकीबाबत चौकशी केली असता त्या एजंटने हात वर केले. त्यानंतर त्या एजंटने पुन्हा ६००० रुपये उकळले आणि मगच त्या अधिकाऱ्याला दाखला मिळाला!  

आमच्यापुरते बोलायचे तर, 'ना खाऊंगा ना खाने दूंगा ' या तत्वाचे पालन करण्यासाठी मी आणि आनंद, कसोशीने प्रयत्न करतो. लाचखोरीच्या संदर्भातील ही घोषणा आठवण्यासाठी एक कारण नुकतेच घडले. काही दिवसांपूर्वी एका रिसॉर्टमधे, सुमारे ऐंशी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आमच्या मुलाचे 'डेस्टिनेशन वेडिंग' झाले. लग्नाचे मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटच्या रात्री, आम्ही एक कॉकटेल पार्टी ठेवलेली होती. त्या रिसॉर्टकडे मद्यविक्रीचा कायमस्वरूपी परवाना नसल्यामुळे आमच्या पार्टीसाठी एका दिवसाचा परवाना काढणे आवश्यक होते. एक्साईज खात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून आणि ३८०० रुपये शुल्क भरून तो परवाना मिळवता येतो, ही खात्रीशीर माहिती आनंदला मिळालेली होती. परंतु, रिसॉर्टवाल्यानी तो परवाना  काढून देण्यासाठी १५००० रुपये मागितले. अर्जासोबत लागणाऱ्या विहित शुल्काव्यतिरिक्त वरचे पैसे 'एक्साईज' खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावेच लागतात, त्याशिवाय परवाना मंजूर होतच नाही' अशी माहिती रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने पुरवली. अर्थात लाच घेणे-लाच देणे, हे आमच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याने आम्ही योग्य मार्गानेच परवाना काढायचे ठरवले. 

कार्यक्रमाच्या बरेच दिवस आधी आनंदने त्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. ते करतानाही बऱ्याच बारीक-सारीक अडचणी आल्या. त्या साईटवर अपलोड करावी लागणारी कागदपत्रे व फोटो अमुक इतक्या आकाराचेच आणि तमुक फॉरमॅटमधेच असणे अनिवार्य होते. ती कागदपत्रे योग्य आकार व  फॉरमॅटमधे बसवून साईटवर अपलोड करेपर्यंत, तो सर्व्हर डाऊन होई. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागे. अशा अनंत अडचणी पार करत-करत शेवटी एकदाचा  तो अर्ज त्या वेबसाईटवर अपलोड झाला. त्यानंतर परवाना शुल्क भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याच दुसऱ्या एका वेबसाईटवर जाणे आले. त्यामध्येही अनेक अडचणी पार केल्यानंतर अखेर ते शुल्क भरले गेले. एक-दोन दिवसातच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला फोन आला, "साहेब, तुम्ही परवान्यासाठी आमच्या रिसॉर्टच्या नावे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर इथल्या एक्साईज ऑफिसातून मला असे सांगण्यात आले आहे की गावातल्या काही संघटना ओल्या पार्ट्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे  परवाना मिळायला अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण कार्यालयात येऊन भेटावे असे तिथल्या कर्मचाऱ्याने मला सांगितले आहे." मात्र आनंदने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर ऑनलाईन परवाना मंजूर झाला व आनंदने घरीच त्याचा प्रिंटाऊटही काढून घेतला. दुसऱ्या दिवशी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला पुन्हा फोन आला, "साहेब, एक्साईज डिपार्टमेंटच्या क्लार्क बाईंनी सांगितले आहे की ऑफिसात पैसे भरून परवान्याची प्रत घेऊन जा. त्यासाठी मला पाच-दहा हजार रुपये सोबत घेऊन जावे लागेल. तर कसे करायचे?" आनंदने त्या व्यवस्थापकाला सांगितले, "त्या ऑफिसमधील क्लार्क बाईंना ठणकावून सांगा की योग्य शुल्क भरून मंजूर झालेल्या परवान्याची प्रत माझ्याकडे आहे. तरीही वर काही पैसे हवे असल्यास त्या बाईंनी तसे लेखी द्यावे किंवा मला मेसेज करावा." त्यानंतर मात्र आनंदला कुणाचाही फोन आला नाही, आणि सर्व नियमांचे पालन करून आम्ही आयोजित केलेली कॉकटेल पार्टीही  निर्विघ्नपणे पार पडली.  

लग्नाच्या निमित्ताने ठरवलेले सर्व कार्यक्रम आनंदात पार पडावे, अशी आमची इच्छा होती. "देऊन टाका ना वरचे पाच-दहा हजार रुपये. परवाना मिळवण्याची कटकट तरी वाचेल." असा सल्ला देणारे लोकही आम्हाला भेटले. पण "ना खाऊंगा ना खाने दूंगा!" या तत्वाला मुरड घालायला आम्ही तयार नव्हतो. आमचा बराच वेळ आणि श्रम खर्ची पडले असले तरी ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद त्याहून खूप मोठा होता.  

लाच देणे-घेणे हे अनेक देशवासीयांच्या रक्तात भिनले आहे हे पदोपदी जाणवते. आपल्यापैकी प्रत्येकाने थोडी अधिक धडपड करून, जर "ना खाऊंगा ना खाने दूंगा' हा मंत्र जपला तरच काहीतरी फरक पडेल असे वाटते. 

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

सब घोडे बारा टक्के!

२० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रामधे विधानसभेसाठी मतदान झाले. 

"आपले मत मोलाचे असते. ते वाया घालवू नका", "माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा विचार करून मतदान टाळू नका" किंवा," मतदारांनो, आपल्या मतांसाठी पैसे घेऊ नका. आपले मत विकू नका" असल्या संदेशाचा, पांढरपेशा वर्गाच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर सुळसुळाट झालेला होता. सुशिक्षितांच्या ग्रुपमध्ये हे असले संदेश काही कामाचे नसतात, असे मला वाटते. आपले मत वाया घालवू नये किंवा एका मताने काय फरक पडतो हे न कळण्याइतका पांढरपेशा वर्ग निर्बुद्ध नाही. आणि या वर्गातल्या कोणालाही कधीही कोणताही राजकीय पक्ष मतांच्या बदल्यात पैसे देत नाही. त्यामुळे तिसऱ्या संदेशाचाही आपल्यासारख्याना काही उपयोग नसतो. पण ते असो. 


मतदानाच्या आदल्या दिवशी, पुण्यात माझ्याकडे काम करणारी मोलकरीण म्हणाली," ताई मी उद्या सुट्टी घेणार आहे."

मी म्हणाले," ठीक आहे. जरूर सुट्टी घे.  मतदान करायचे असेल ना. "

" हो, आणि पैसे पण मिळणार आहेत." 

मी म्हणाले, " खरंच पैसे वाटतात का गं ? 

" हो. वाटतात की " ती निर्विकारपणे उत्तरली. 

" दर निवडणुकीला पैसे वाटतात का ?"

" देतात ना. दर वेळी देतात. आमच्या घरात तर आम्ही आठ जण मतदार आहोत. प्रत्येकाच्या नावाने देतात." 

" कुठली पार्टी देते गं ?" मी कुतूहलाने विचारले. 

" आमच्या वस्तीत एकच पार्टी देते. तिकडे दुसऱ्या मुहल्ल्यात दुसरी पार्टी देते." 

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ती आल्याबरोबर मी तिला विचारले, "मतदान केलेस का गं ?'

डाव्या हाताची तर्जनी माझ्यासमोर धरून ती म्हणाली "हे बघा. केले की ताई" 

"पैसे मिळाले का? कसे आणि कुठे देतात गं पैसे?" मी उत्सुकतेपोटी विचारले.

" हो. मिळाले की पैसे. घरी येऊन नोटा देऊन जातात. यावेळी प्रत्येक मताला तीन हजार दिले की . आमच्या सगळ्यांच्यात मिळून २४००० रुपये मिळाले" 

मी आश्चर्यचकित झाले. 

ती पुढे बोलू लागली, "वर आम्हाला प्रत्येकाला, काहीतरी खूण केलेली वीस रुपयाची एक-एक नोट देऊन गेले आहेत. ती जपून ठेवायला सांगितले आहे"

" ती नोट कशासाठी?"

"ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांची पार्टी निवडून आली की आम्ही ती वीसची नोट त्यांना दाखवायची. त्यानंतर ते अजून पैसे देणार म्हणाले आहेत. 

हे सगळे ऐकून मी थक्क झाले. 

" पण मग तू मत कोणाला दिलेस?"

" ज्यांनी पैसे दिले त्यांच्या उमेदवारालाच मत दिले. आम्ही बेईमानी नाही करत." 

निवडणूकांमधे गरिबांची मते विकत घेतली जातात, हे अगदी लहानपणापासून मी ऐकून आहे. लहानपणी आमच्या घरातल्या मोलकरणींना निवडणुकीच्या आधी नव्या साड्या मिळायच्या, झोपडपट्टीतील पुरुषांना धोतरजोडी मिळायची. पुढे अनेक राजकीय पक्ष मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने विकत घ्यायला लागले. पण यावेळच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या कल्पकतेला धुमारे फुटले होते, असे वाटले. 

दिवाळीच्या आधी सोलापूरला गेले होते. तोपर्यंत महाराष्ट्रामधे  निवडणुकीचे वारे वाहायला लागलेच होते. 

मी आलेली आहे हे बघितल्यावर आमच्या शेजारी राहणारी सत्तरीची यास्मिन, मला भेटायला घरी येऊन बसली. गप्पा मारता-मारता सांगू लागली " मैं दिवालीमे अजमेर दरगेको जा रहीं हूँ. इसबार इन लोगोने बहोत अच्छा किया हैं. वहीच लोग हं सबकू लेको जा रहे है. सब खाना-पिना, गाडी सब उनकाच हैं. आपन खाली जानेका. खाली एक फार्म भरकु ले रहे हैं और एक फोटू और आधार कार्डकी कापी देना हैं. दिवालिके  बाद  निवडणुका हैं ऐसा बोल रहे हैं." 

तिने एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले. 

थोड्या वेळाने सोलापूरची मोलकरीण आली आणि आनंदाने सांगू लागली "ताई, दिवाळीनंतर दोन दिवस अष्टविनायकाला जाणार आहे."

सदैव कर्जबाजारी असलेली ही बाई, कामाचा खाडा करून अष्टविनायकाला जाण्याचा खर्च कसा करणार आहे? हा प्रश्न मला पडला. मी तिला काही विचारायच्या आत तिनेच खुलासा केला, "निवडणूका आल्यात नव्ह. म्हणून आम्हाला नेणार आहेत." 

तिनेही दुसऱ्या एका राजकीय पक्षाचे नाव घेतले. 

आपल्या देशामधे कुठलाच पक्ष धुतल्या तांदुळासारखा नाही. सगळे पक्ष एकमेकांवर पैसे वाटपाचे आणि मतदारांना विकत घेण्याचे आरोप करत असतात. पण निवडणूक तोंडावर आली की सर्वच पक्षांकडून पैसे वाटप होते. एकप्रकारे, तळागाळातील बहुजनांचा तात्पुरता आर्थिक विकास घडतो इतकेच!  

उद्या सकाळी माझी मोलकरीण कामाला आली की, "त्या वीस रुपयाच्या नोटेच्या बदल्यात तुला कधी आणि किती पैसे मिळणार?" हा प्रश्न विचारून तिचे उत्तर ऐकायला मी उत्सुक आहे. 

डॉ. स्वाती बापट 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

अवघे एकशे वयमान!

 साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे मी पहाटे उठून, तयार होऊन चालायला बाहेर पडले. आमच्या इमारतीमधून बाहेर पडून गल्लीच्या टोकाला येऊन मी मुख्य रस्त्याला लागणार होते. तितक्यात मला डावीकडून एक वयस्कर गृहस्थ चालत येताना दिसले. त्यामुळे ते जाईपर्यंत मी जरा थांबले आणि मग त्यांच्या मागोमाग निघाले. पण त्यांना पार करून पुढे जात असताना,  त्यांचे वय विचारावेसे मला कुतूहलापोटी वाटले. 
माझा प्रश्न ऐकल्यावर ते गृहस्थ हसून म्हणाले, " माझ्या वयाबाबत तुझा काय अंदाज आहे?"
" नव्वदी तर पार केलेली वाटतेय" 
"नव्वदी केंव्हाच पार झाली. मला  नुकतीच सत्त्याण्णव पूर्ण झाली आहेत!" 
मी चकित झाले. त्यांनी आपले नाव श्री. कन्सल असे सांगितले. पुढे त्यांची आणि माझी चांगली ओळख झाली. पहाटे आमची भेट झाली की गप्पाही होऊ लागल्या. एक प्रकारे मैत्रीच झाली म्हणा ना. आमच्या गप्पातून मला त्यांच्याबद्दल बरीच माहिती कळली. हे कन्सल आजोबा केंद्र सरकारच्या डिफेन्स अकाऊंट्स खात्यामध्ये जवळपास चाळीस वर्षे नोकरी करून वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झालेले होते. जसजसे वय वाढत जाते तसतसे सरकारी निवृत्ती वेतनामधेही वाढ होत जाते आणि वयाची शंभरी पार केल्यानंतर पेन्शन दुप्पट होते, असे ते मला सांगायचे. आर्थिकदृष्ट्या मी कोणावरही अवलंबून नाही आणि कोणालाही माझे काही करावे लागत नाही, असे ते मला मोठ्या अभिमानाने सांगायचे.   

जनरल पोस्ट ऑफिसच्या बरोबर समोरच्या गल्लीतल्या एका इमारतीतील चौथ्या मजल्यावरच्या सदनिकेत ते राहत होते. त्यांच्या इमारतीला लिफ्ट नसल्यामुळे ते रोज सकाळी जिना उतरून एकटेच बाहेर पडायचे. तिथून सुमारे अर्धा किलोमीटर चालत जाऊन, परमार ट्रेड सेंटर नावाच्या इमारतीत रोज सकाळी सहाच्या सुमारास भरणाऱ्या सत्संगाला ते जायचे. साधू वासवानी चौकातला 'सर माणेकजी मेहता मार्ग', ते कोणाच्याही मदतीशिवाय पार करायचे. सातच्या सुमारास सत्संग संपल्यानंतर मात्र, त्यांचा पंच्याहत्तरीचा  मुलगा त्यांना घ्यायला यायचा. कारण त्यावेळेपर्यंत सर माणेकजी मेहता रस्त्यावरच्या वाढलेल्या रहदारीतून त्या वयोवृद्ध आजोबाना एकट्याने वाट काढणे अवघड पडत असावे. त्यानंतरही ते आपल्या मुलाबरोबर चालतच  परतून, चार जिने चढून आपल्या घरी जायचे. पुढे माझी त्यांच्या मुलाशीही ओळख झाली. त्यांच्या मुलाकडून मला अजूनच आश्चर्यकारक माहिती कळली होती. ते आजोबा रोज पुन्हा संध्याकाळी चार जिने उतरून, इमारतीच्या खाली वीस-पंचवीस मिनिटे चालायचे व परत जिने चढून वर जायचे.

पुढील दोन-तीन वर्षांनंतर हळू-हळू ते आजोबा मला सकाळी रस्त्यावर दिसेनासे झाले. पण त्यांच्या मुलाची आणि माझी कधीकधी भेट होत असे.  मुलाकडून आजोबांची खबर मला मिळत असे. शंभरी पार करेपर्यंत ते आजोबा दिवसातून दोन वेळा जिने उतरून इमारतीच्या खालच्या आवारात फिरायचे म्हणे. वयाची १०३ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना कुठलाही त्रास न होता घरच्याघरी मृत्यू आला, असेही मला कळले. पण माझा हा मित्र शतायुषी झाल्यानंतर मात्र आमच्या भेटीचा योग कधी आला नाही.
 
भोर येथे स्थायिक असलेल्या, प्रोफेसर  विनय कुलकर्णी या माझ्या वर्गमित्राच्या वडिलांना, म्हणजे श्री. लक्ष्मण बाळाजी कुलकर्णी यांना १८ ऑक्टोबर २०२४ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. वडिलांच्या शताब्दीपूर्तीप्रीत्यर्थ प्रो. विनय कुलकर्णी यांनी भोर येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. काही कारणाने आम्हाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नव्हते. विनयशी आधी संपर्क साधून, रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी मी आणि आनंद माझ्या वडिलांना घेऊन भोरला गेलो. माझ्या वडिलांना गेल्या महिन्यात ९१ वर्षे पूर्ण झाली. आता त्यांच्या समवयस्क व्यक्ती भेटणेही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे, वयाची शंभरी पार केलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी माझे वडीलही उत्सुक होते. आम्ही प्रो. विनय कुलकर्णी यांच्या घरी पोहोचलो तर त्यांचे वडील आम्हाला भेटायला स्वतःहून उठून चालत बाहेर दिवाणखान्यात आले. आमचे नमस्कार स्वीकारून, त्यांनी हसतमुखाने आमची  विचारपूसही केली. आम्ही बोललेले त्यांना बऱ्यापैकी ऐकू येत होते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे शक्य झाले. श्री लक्ष्मण कुलकर्णी यांनी १९४३ -१९८२ या काळात भारत सरकारच्या तारखात्यामधे नोकरी केलेली होती. त्यापैकी पहिली सात वर्षे ते मुंबईमध्ये कार्यरत होते. १९५० पासून निवृत्त होईपर्यंत म्हणजे १९८२ सालापर्यंत ते सोलापुरात राहत होते. त्यांनी त्यांच्या सोलापुरातल्या वास्तव्याबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या. माझ्या वडिलांचे सर्व आयुष्य सोलापुरातच गेलेले असल्याने त्या दोघांच्या काही ओळखीही निघाल्या आणि त्या दोघांच्या गप्पा होऊ शकल्या. 


श्री. लक्ष्मण कुलकर्णी उर्फ अण्णांच्या तब्येतीच्या काहीही तक्रारी नाहीत. मुलगा विनय त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घेतोच. परंतु, अंघोळ, कपडे बदलणे, जेवणे  इत्यादी आपापली कामे स्वतःच  करतात, आणि त्यासाठी त्यांना कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. इतकेच काय, विनयला कामानिमित्त दिवसभरासाठी बाहेर जावे लागले, तर ते एकटेच घरात राहतात, आपापले जेवायला वाढून घेतात, हे विशेष. आण्णा ठराविक आहार घेतात, जेवणा-खाण्याच्या वेळा सांभाळतात आणि अधेमधे काही खात-पीत नाहीत. १९८२ साली सेवानिवृत्त झाल्यावर आण्णांनी योगासनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर आजतागायत ते न चुकता संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या योगसाधनेला सुरुवात करतात. पूर्वी ते जवळपास तास-दीडतास योगासने करायचे. आता वयोमानापरत्वे तो वेळ थोडा कमी झाला आहे इतकेच. आम्ही संध्याकाळचा चहा घेत असताना , अण्णांची योगासनांची वेळ झाली.  बांधून ठेवलेली योगासनांच्या मॅटची गुंडाळी उघडून, त्यांनी ती जमिनीवर अंथरली. एखाद्या विशीतल्या तरुणाला लाजवेल अशा चपळाईने अण्णांनी योगासने करायला सुरुवात केली. अर्धा-पाऊण तास सर्वांगाला व्यायाम झाल्यावर त्यांनी जमिनीवर अंथरलेल्या मॅटची गुंडाळी बांधून जागेवर ठेवली. विनयच्या आणि अण्णांच्या परवानगीने मी त्यांची योगसाधना माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपली. अण्णा नोकरीत असताना, भारतीय तारखात्याच्या विभागीय क्रिकेट संघाचे उपकप्तान होते.  त्या शिवाय ते टेबल टेनिस, बुद्धीबळही खेळायचे, हे विनयकडून आम्हाला समजले.

माझे सासरे, कै. भास्कर वेंकटेश बापट वयाच्या ९२ वर्षेपर्यंत जगले. ते तसे नाजूक चणीचे होते, आणि व्यायामाने कमावलेली अशी त्यांची शरीरयष्टी नव्हती. म्हणूनच, आपल्या दीर्घायुष्याबद्दल ते कधी-कधी स्वतःच आश्चर्य बोलून दाखवत असत. पण विशेषतः नव्वदी पार केल्यानंतर ते नेहमी म्हणायचे, "मी कधी काही व्यसन केले नाही, पोटाच्या वर कधीही जेवलो नाही, आयुष्यभर जेवणाच्या वेळा सांभाळल्या,  बाहेरचे खाणे टाळले आणि आयुष्यभर चालत-फिरत राहून आपापली कामे करत राहिलो. या पाच सूत्रांचे पालन केले म्हणून मी कदाचित दीर्घायुषी झालो असेन." 

अण्णांना भेटल्यानंतर मला माझ्या सासऱ्यांची आणि त्यांनी सांगितलेल्या त्या पाच सूत्रांची मला प्रकर्षाने आठवण झाली. अण्णांची भेट माझ्यासाठी आणि आनंदसाठी खूपच प्रेरणादायी होती. पण मुख्यत्वे माझ्या वडिलांमध्ये नवचैतन्य आल्यासारखे आम्हाला वाटले. भोरहून पुण्याला परत निघताना आम्ही सगळेच अण्णांच्या  पाया पडलो. दादा अण्णांच्या पाया पडताना म्हणाले, "मी शंभरी ओलांडली की पुन्हा भोरला येईन आणि तुमचे आशीर्वाद घेईन." दादांना आशीर्वाद देत आण्णा, " तथास्तु" म्हणाले! 

 
 

रविवार, ९ जून, २०२४

एज इज नॉट जस्ट अ नंबर !

आज एकसष्ठी पूर्ण झाली. मध्यरात्रीपासूनच अनेक मित्र-मत्रिणी,आप्तांच्या आणि माझ्या बालरुग्णांच्या पालकांच्या शुभेच्छांचा  नुसता पाऊस पडतोय. "आतातरी जरा तुझा बालिशपणा सोडून देऊन, जरा पोक्तपणे वागत जा" असा लाडिक सल्ला माझ्या काही 'हितचिंतकांनी' दिला. तर माझा एक वर्गमित्र फोनवर शुभेच्छा देत म्हणाला, "तुला  एकसष्ट वर्षे पूर्ण झाली? खरंच वाटत नाही. तुझ्या वयाचे आकडे उलटे केले तर १६ हा अंक येतो. परवाच तू तोरण्यासारखा अवघड किल्ला सर केलास. त्यामुळे मला तर तू अजून षोडशाच वाटतेस!" त्याचे ते बोलणे ऐकून मी मनोमन अगदी सुखावले होते. माझ्या काही मोठ्या भावंडानी, 'साठ प्लस' या गटामध्ये माझे मागच्या वर्षीच सहर्ष स्वागत केले होते. आयुष्यातला साठीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडून, वर एक वर्ष उलटून गेल्यामुळे 'साठ प्लस' या गटामधले माझे स्थान पक्के झाले. माझ्या मोठ्या भावंडानी आणि आप्तस्वकीयांनी माझे हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या! पण आता यापुढे तब्येतीला जपायला  हवे असा प्रेमळ सल्ला दिला. माझ्या काही आत्या मावशा आणि काकूंनी, "अगंबाई मागच्याच वर्षी तू साठ वर्षांची झालीस नाही का? खरंच  वाटत नाही गं.  मला तर तू अजूनही अगदी फ्रॉक आणि दोन वेण्यातलीच अल्लड मुलगी आठवतेस!" 

एकूण काय? माझ्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला बोलले तसेच या वर्षीही मला शुभेच्छा देणारे सर्वजण 'वय' या संकल्पनेच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दलच बोलत होते. त्यामुळे व्यक्तीच्या वयाबद्दल किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात, याचा मला पुनःप्रत्यय आला. सर्वसाधारणपणे वय मोजताना आपण जन्मतारखेपासून किती वर्षे उलटली, इतका आणि इतकाच विचार करत असतो. पण वैद्यकीय परिभाषेमधे केवळ या वयाचा विचार न करता, वयाच्या वेगवेगळ्या पैलूंचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वयाचाही विचार केला जातो. जन्मदिवसापासून आजतागायत जो काळ उलटून गेला आहे त्याला आम्ही Chronological Age म्हणतो. ते महत्त्वाचे असतेच. पण बुद्ध्यांक काढण्यासाठी Mental Age हे खूप महत्त्वाचे ठरते. म्हणजे एखाद्या ठराविक वयाच्या मुला-मुलीच्या मेंदूची वाढ आणि प्रगल्भता, त्यांच्याच वयाच्या इतर मुला-मुलींच्या मेंदूइतकी झाली आहे की नाही, यावर त्या मुला-मुलीचे Mental Age ठरते. Mental Age हे Chronological age च्यापेक्षा बरेच कमी असेल तर त्या व्यक्तीला मतिमंद म्हटले जाते. Mental Age हे Chronological age च्या बरोबरीचे असेल तर  त्या व्यक्त्तीचा बुद्ध्यांक १०० असतो. Mental age हे Chronological Age च्या पेक्षा जास्त असणे, अर्थात तुमचा बुद्ध्यांक जास्त असणे, हे कधीही चांगले समजले जाते.  

कायद्याच्या परिभाषेमधे Legal Age ला खूपच महत्त्व असते. लग्न करणे, मतदानाचा हक्क मिळणे अशा अनेक गोष्टींसाठी Legal Age लक्षात घेतले जाते. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली नसल्यास, त्या व्यक्तीला भारतीय कायद्याच्या नजरेमध्ये 'अल्पवयीन' समजले जाते. 'अल्पवयीन' वयोगटासाठीचे कायदे, त्यांच्यातील गुन्हेगारांना मिळणाऱ्या शिक्षा वेगळ्या असतात. अशा अल्पवयीन व्यक्तींना कायद्याने काही विशेष हक्कही दिले गेलेले आहेत. हे हक्क, व हे कायदे बालकांच्या सुरक्षिततेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. काही दिवसांपूर्वी, साडेसतरा वर्षे वयाच्या एका मुलाकडून  पुण्यात घडलेल्या एका मोठ्या अपघातानंतर, Legal Age वर खूप उहापोह झाला. असाच उहापोह 'निर्भया' हत्याकांडाच्यावेळीही झाला होता. बाल न्याय अधिनियमातील तरतुदींनुसार, वय वर्षे १६ ते १८ च्या दरम्यानच्या कुणा व्यक्तीने एखादा जघन्य अपराध केल्यास, त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे तज्ज्ञांद्वारे मूल्यमापन केले जाते. सदर गुन्हा करण्याकरिता व त्याचे परिणाम जाणण्यासाठी ती व्यक्ती सक्षम असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिल्यास त्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीने 'प्रौढ' मानून खटला चालवला जाऊ शकतो व तिला कठोर शिक्षा होऊ शकते.   

एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वयाच्या मानाने,  तिच्या शारीरिक अवयवांचे वय किती आहे? म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे अवयव त्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या अवयवाच्या मानाने कितपत सक्षमपणे काम करू शकत आहेत यावरून त्या व्यक्तीचे Biological Age ठरते. आपला आहार, आपल्या आरोग्यपूर्ण सवयी, आपली जीवनशैली, आपली अनुवांशिकता अशा अनेक घटकांवर आपले Biological age अवलंबून असते. आपल्या Chronological Age च्या मानाने शरीर कमी थकलेले असेल तर आपले Biological Age कमी आहे असे म्हटले जाते, व ते कमी असणे वैद्यकीय दृष्ट्या त्या व्यक्तीच्या दीर्घायुरोग्यासाठी उत्तम असते. अशा व्यक्ती वयोवृद्ध होईपर्यंत कार्यक्षण आणि कार्यरत राहू शकतात. त्यामुळे, कोणालाही आपल्या Chronological Age च्या मानाने आपले Biological Age कमी असावे असे वाटणे सहाजिकच आहे.

जीवनातल्या वेगवेगळ्या  परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, एखादी व्यक्ती तिच्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या मानाने,  मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहे, यावर त्या व्यक्तीचे Psychological Age ठरते. वयाच्या मानाने Psychological Age जास्त असलेल्या व्यक्ती, तिच्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने नवनवीन आव्हानांना सहजी तोंड देऊ शकतात, जास्त उत्साही असतात, नवीन कौशल्ये लवकर आत्मसात करू शकतात, नवीन व्यवसाय किंवा नोकरीमध्ये लवकर आणि सहजी रुळू शकतात किंवा अगदी नवीन विषय व अभ्यासक्रम सहजी पूर्ण करू शकतात. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये एकप्रकारची लवचिकता असते. म्हणजेच, Chronological Age च्या मानाने Psychological Age जास्त असणे चांगलेच म्हणायचे!

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीकडून एखाद्या संस्कृतीतील सामाजिक नियमानुसार काही ठराविक वर्तनाची अपेक्षा असते. यामध्ये आपली कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडणे, आपले शिक्षण वेळेवर पूर्ण करणे, अशा गोष्टींचा समावेश असतो. एखादी व्यक्ती, आपल्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने स्वतःच्या सामाजिक जबाबदाऱ्या किती सहजी आणि समर्थपणे पार पडते, यावर त्या व्यक्तीचे Social Age अवलंबून असते. म्हणजेच  Chronological Age च्या मानाने Social Age जास्त असणे, कधीही चांगलेच समजले जाते. 

थोडक्यात काय? आपल्या Chronological Age च्या मानाने आपले mental age, Psychological Age आणि Social Age जास्त असणे,  परंतु Biological Age कमी असणे हे सर्वोत्तम! 

म्हणूनच मी म्हणते, "एज इज नॉट जस्ट अ नंबर!"

रविवार, २६ मे, २०२४

प्रेरणादायी तोरणा सहल!

या वर्षी एप्रिल-मे महिन्यांतल्या उकाड्यामुळे फारच हैराण व्हायला झाले होते. दोन-तीन दिवस महाबळेश्वरला जायचे पक्के केले होते. पण तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावातल्या एका रिसॉर्टबद्दल समाजमाध्यमात आलेली एक पोस्ट वाचली आणि तिकडे जावे असे अचानक मनात आले. आम्ही दोघे, माझे वडील दादा, माझा आतेभाऊ राजीव, आणि माझे सोलापूरस्थित काका, श्री. हरि गोडबोले आणि सौ. प्रियंवदाकाकू अशा सहाजणांनी जायचे ठरवले. 

आम्ही चौघे पुण्याहून आणि काका-काकू सोलापूरहून, पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचलो. त्या रिसॉर्टमधून अगदी समोरच तोरणा दुर्ग दिसत होता. वामकुक्षीनंतर चहासाठी म्हणून बागेमध्ये बसलो असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. काही क्षणांतच समोरचा तोरणा दुर्ग ढगांच्या आणि धुक्याच्या आड दिसेनासा झाला. सगळ्या परिसरातील दिवे गेलेले असल्याने, बाहेरच पण जरा आडोश्याला बसून  रिसॉर्टच्या मालकांशी मनसोक्त गप्पा झाल्या. तोरणा चढायला आणि उतरायला किती वेळ लागतो, गाडी कुठपर्यंत जाऊ शकते, ही माहिती त्यांच्याकडून समजली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गडावर जायचे, असे मी, आनंद व राजीवने फारसा विचार न करता ठरवूनच टाकले. सहलीला निघण्यापूर्वी, तोरणा गडाबाबत काहीही वाचलेले नव्हते किंवा गड चढायचा विचारही केलेला नव्हता हे विशेष.

पहाटे साडेपाच वाजता रिसॉर्टमधून आमच्या गाडीने निघून, आम्ही तिघे तोरणा गडाच्या पायथ्याशी  पोहोचलो. आम्ही बरोब्बर पावणेसहा वाजता चढायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच्या मुसळधार पावसामुळे वाटेवरची खडी चढण निसरडी झाली होती. त्यावेळी आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. आम्ही slow but steady अशा पद्धतीने, कुठेही न थांबता सतत चढत राहिलो. साधारण वर्षभरापूर्वी आनंदला हार्ट अटॅक येऊन त्याची  दोनवेळा angioplasty झालेली असल्यामुळे, माझ्या मनामध्ये जरा धाकधूक होती. पण मी ती कोणाजवळही बोलून दाखवलेली नव्हती. किल्ला चढायला लागल्यानंतर माझीच इतकी दमछाक होत होती की काही बोलायला माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, हे वेगळेच. माझ्या शरीरातला 'अतिरिक्त' भार पेलत चढणे, हे मोठे जिकिरीचे काम होते. त्या मानाने राजीव आणि आनंदला कमी कष्ट पडत होते. जरूर पडेल तेंव्हा ते दोघे मला हातही देत होते. 

अर्धी चढण चढून आम्ही आलो असू तेंव्हा आमच्या मागून काही कोवळी मुले आरडा-ओरडा करत, एकमेकांची चेष्टा करत, गाणी म्हणत, ठिकठिकाणी सेल्फ्या काढत वर येताना दिसली. ती मुले अगदी लीलया वर चढत होती. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आलेली जेमतेम सोळा-सतरा वर्षांची ही मुले, हातकणंगल्याहून आली होती. त्यांचे ते सरसर गड चढणे पाहून, त्यांच्यामध्ये मला सोळा-सतरा वर्षे वयाचे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच दिसू लागले. त्या कोवळ्या वयात, शिवरायांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले, इतर समवयस्क मुलांना प्रेरित केले, हा किल्ला जिकंण्याची मोहीम आखली आणि ती यशस्वीरीत्या पारदेखील पाडली, हे सगळेच आज आपल्यासाठी आश्चर्यकारक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच दुर्ग आहे. आम्ही दोन तासात गडावर पोहोचलो. तिथे थोडेफार फिरून, काही फोटो काढून आणि सभोवतालचे नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवून आम्ही खाली उतरायला लागलो. त्या वेळी, वीस ते तीस वयोगटातले अनेकजण गड चढताना आम्हाला दिसत होते. बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने पुण्याहून आलेली कॉलेजची मुले, बँकेतील कर्मचारी, अंत्रोळीहून आलेल्या काही मुली अशी तरुणाई भेटल्यामुळे खूप छान वाटले. पुण्यातील एका कॉलेजचा गट तर चक्क हातात शिवरायांचा जरीपटका घेऊन वर येताना दिसला. त्यांना थांबवून, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायचा मोह आवरता आला नाही. आजच्या तरुण पिढीला इतक्या वर्षानंतरही शिवरायांचा प्रताप प्रेरणादायी ठरत आहे, हे विशेष.  

वेल्हे गावाजवळच, मढे घाटातला लक्ष्मी धबधबा अतिशय प्रेक्षणीय आहे, असे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकच समजले. तो बघायला म्हणून, सकाळी साडेसातच्या सुमारास गाडीने बाहेर पडलो. अर्थात भर उन्हाळ्यात आम्हाला धबधबा बघायला मिळणार नव्हताच. वाटेवर गुंजवणी धरणाचा बंधारा आणि भट्टी वाघदरा, केळद वगैरे गावे लागली. वेल्हे गावातून सोळा किलोमीटर, वळणावळणाचा घाटरस्ता पार करून आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो. बराचसा रस्ता निर्मनुष्य होता. ज्या मोकळ्या पठारावरून खाली धबधबा दिसतो, त्या जागेजवळ आम्ही पोहोचलो. सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. अचानक काही लोकांचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पुढे जाऊन पहिले तो, पाच-सहा पुरुषमंडळींनी पठारावरच्या मोकळ्या जागेत लहान-लहान तंबू ठोकून रात्रभर मुक्काम केला होता, असे समजले. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून बरीच माहिती मिळाली. केळद गावामध्ये तंबू भाड्याने मिळतात, असेही समजले. पुण्याच्या अभिनव स्थापत्य महाविद्यालयातील प्राध्यापक, श्री. अतुल भागवत नामक अवलियाबरोबर त्यांचे एक-दोन नातेवाईक व मित्र, खास पौर्णिमेच्या रात्री मुक्कामाला तेथे आलेले होते. प्रा. भागवत यांना अवलिया म्हणण्याचे कारण असे की, दर पौर्णिमेच्या रात्री, ते इथे येऊन मुक्काम करतात, कधी नातेवाईक अथवा मित्रकंपूसोबत, तर कधी एकटेच! हे ऐकून आम्हाला अगदी अवाक व्हायला झाले. सरांकडे स्वतःचे दोन तंबूदेखील आहेत. आमच्या परतीच्या  वाटेवर, केळद गावातली देवराई बघून जायचा सल्ला भागवत सरांनीच आम्हाला दिला. 

देवराईची संकल्पना, पावित्र्य आणि त्यामागची गावकऱ्यांची भावना याबाबत आम्हाला पूर्वकल्पना असली, तरीही प्रत्यक्ष देवराईला भेट देण्याचा अनुभव खूपच सुखद होता. ही देवराई तशी छोटीशीच आहे. देवळाभोवती, वर्षानुवर्षे  गावकऱ्यांनी आपुलकीने जतन केलेली झाडे बघून भारावून जायला झाले. आम्ही वाटेवर पाहिलेल्या भट्टी वाघदरा या गावामधे, लोखंड वितळवून शस्त्रास्त्रे बनवण्याची शिवकालीन भट्टी आहे, अशी माहिती आम्हाला नंतर एका मित्राकडून कळली. पण ती माहिती कळेपर्यंत आम्ही वेल्ह्याला पोहोचलो होतो. त्यामुळे ही भट्टी बघायच्या निमित्ताने, पुन्हा या परिसराला भेट द्यायचे आम्ही मनाशी ठरवले. 

दोन दिवसांची आमची ही छोटीशीच सहल अनेक कारणांमुळे अविस्मरणीय झाली. 

काहीही न ठरवता आणि माहिती न घेता गेलेलो असूनही आम्ही तोरणा किल्ला चढलो. किल्ल्याची चढण बरीच अवघड आहे, हे आधी कळले असते तर माझ्याच मनाने कदाचित कच खाल्ली असती! कारण, मागच्या वर्षी, १२ जून २०२३ रोजी आनंदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये तयार झालेल्या गुठळीमुळे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती. (१००% ब्लॉक). त्यावेळी 'इमर्जन्सी अँजिओप्लास्टी' द्वारे ती गुठळी काढून स्टेंट बसवावा लागला होता. त्याच वेळी त्याच्या हृदयाची आणखी एक मोठी रक्तवाहिनी ७० ते ८०% बंद असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. पण तो अत्यवस्थ असल्याने, दुसरी अँजिओप्लास्टी लगेच न करता, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केली गेली. आमच्या तोरणा मोहिमेमधे आनंदच्या हृदयाच्या क्षमतेचा कस लागला, आणि मोहीम यशस्वी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला. 

अनेक तरुण-तरुणी, नुसते लोळत सुट्टी न घालवता, किल्ला चढायला आलेले बघूनही आम्हाला खूप कौतुक वाटले. किल्ल्याची अवघड चढण चढताना, "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.. .." हे शब्द मनामध्ये घोळत होते. प्रा. अतुल भागवतांच्या भटकंतीच्या कथा ऐकून मी अगदी भारावून गेले. 

एकूण काय, तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या उत्तुंग, 'प्रचंडगड', अर्थात तोरणा गडाला भेट देऊन मला नवीन ऊर्जा तर मिळालीच, पण तिथली शुद्ध हवा पिऊन, आणि पक्ष्यांचे मंजुळ गान ऐकून, प्रसन्न मनाने आम्ही पुण्याला परतलो.        

सोमवार, ६ मे, २०२४

कर्णफुलांच्या गोष्टी!

त्या दिवशी जोरजोरात सायकल चालवत, मी कशीबशी कॉलेजमधे वेळेत पोहोचले होते. पहिला तास सुरू व्हायला जेमतेम एक-दोन मिनिटे बाकी होती. आम्ही मैत्रिणी वर्गात शिरून बाकांवर बसत असतानाच माझी एक मैत्रीण माझ्याकडे बघून हासत-हासत उद्गारली,
"स्वाती, काय गं हे? एकाच कानात रिंग घातली आहेस. दुसऱ्या कानातली रिंग घालायला विसरलीस की काय?"
मी चपापून दोन्ही कानांना हात लावला, तर काय? खरोखर फक्त एकाच कानात रिंग होती. तितक्यातच आमचे प्राध्यापक वर्गात शिरले आणि त्यांनी  तास चालू केला. 

माझी छाती धडधडायला लागली. सकाळी घरातून निघताना, दोन्ही कानामधे सोन्याच्या रिंग्ज घातल्याचे मला निश्चित आठवत होते. पण मग एक रिंग गेली तरी कुठे? सरांच्या शिकवण्याकडे माझे लक्षच लागेना. आता घरी गेल्यावर कुणाकुणाची, किती आणि काय-काय बोलणी खावी लागतील, या विचाराने मी भलतीच अस्वस्थ झाले. ती  रिंग वाटेत कुठे पडली असेल का? पडली असली तर कुठे? माझ्या मनांमध्ये सगळ्या उलट-सुलट विचारांनी जणू रिंगणच धरले. 
सरांचा तास संपेपर्यंत मी कशीबशी कळ काढली. सर बाहेर पडल्याबरोबर, मीही तडक वर्गाच्या बाहेर पडून  सायकल  मारत घराच्या दिशेने निघाले. पण घरापर्यंत न जाता, काहीतरी विचाराने वाटेतच एके ठिकाणी मी थांबले. तिथेच खाली बसून, वेड्यासारखी तिथल्या धुळीमध्ये हात फिरवत मी शोधू लागले. आणि आश्चर्य म्हणजे त्या धुळीत माझी सोन्याची रिंग चकाकताना मला दिसली! माझा जीव भांडयात पडला. मी ती रिंग उचलून कानात घातली  आणि पुन्हा सायकल पळवत  कॉलेजात येऊन पोहोचले!

त्याचे असे झाले होते की, मी घरातून बाहेर पडताना माझा 'एप्रन' बॅगमध्ये ठेवला होता. सायकलवर कॉलेजला निघणार तेवढ्यात लक्षात आले की सायकलमध्ये हवा अगदीच कमी आहे. म्हणून मग सायकल हातात धरून चालत जवळच्या सायकलवाल्याकडे गेले. सायकलमध्ये हवा भरायला थांबलोच आहोत तर, नंतरचा वेळ वाचावा म्हणून, बॅगमधला एप्रन बाहेर काढून मी गडबडीत अंगावर चढवला. हे सगळे मला आठवत होते.  कदाचित एप्रन घालताना ती रिंग माझ्या कानातून निसटून खाली पडली असेल ही एक शक्यता होती. म्हणून मी तिथे शोधू लागले आणि खरोखरच तसे झाले असल्याने ती रिंग मला मिळाली.
 

तुम्ही म्हणाल, आज इतक्या वर्षानंतर ही गोष्ट सांगण्याचे काय कारण? ते कारणदेखील कर्णफुले हरवण्याच्या अलीकडच्या काही घटनांबाबतीतले आहे.  परंतु, ते माझ्या कर्णफुलांचे नाही आणि ती कर्णफुलेही एका वेगळ्याच प्रकारची आहेत! 

नव्वदी पार केलेल्या माझ्या वडिलांनी, आमच्या आग्रहाखातर, चार-पाच वर्षांपूर्वी, त्यांच्या दोन्ही कानांसाठी मशिन्स  (hearing aid) विकत घेतली. अतिशय चांगल्या प्रतीची व नवीन तंत्रज्ञान वापरून बनवलेली ती यंत्रे बऱ्यापैकी महाग होती. एकेका कानाचे मशीन जवळपास लाख-लाख रुपयाचे होते. त्यांच्या या कानाच्या मशीन्सबद्दल, आम्ही गमतीनेच, "दादा, ही तुमची कर्णफुले आहेत", असे म्हणतो. आणि ही मौल्यवान कर्णफुले  माझ्या वडिलांकडून अनेक वेळा आणि वेगवेगळ्या प्रकारे गहाळ होत राहतात. 
चाळीस वर्षांपूर्वी माझ्या कानातली रिंग गायब झाली होती, तेंव्हा मी वडीलधाऱ्यांच्या भीतीने कावरी-बावरी झाले होते. गंमत म्हणजे आज वडिलांची कर्णफुले गहाळ झाली की, माझ्या धाकाने ते कावरेबावरे होतात!

वडिलांची दोन्ही मशिन्स एकाचवेळी दिसेनाशी झाली की आम्हाला जवळजवळ खात्रीच असते की त्यांनी ती नेहमीच्या जागी न ठेवता दुसरीकडे कुठेतरी ठेवली असणार. थोडी शोधाशोध केली की ती सापडतात. पण एकच मशीन गायब झाले तर मात्र फारच मोठे शोधकार्य हाती घ्यावे लागते. 
कुठल्यातरी शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात, कधी बाथरूममध्ये, कधी खुर्ची किंवा सोफ्याच्या सीटखाली, तर कधी चष्म्याच्या केसमध्ये, अशा वेगवेगळ्या आणि अकल्पनीय जागी आम्हाला ते कर्णफूल सापडते. 

एकदा असेच, त्यांचे एकाच मशीन दिसेनासे झाले. आम्ही सगळे घर उलथे -पालथे केले. त्यांची खोली दोन-दोनदा झाडून काढली. अगदी कपाटे आणि टेबलाखालूनही झाडू फिरवला. पण मशीन काही सापडले नाही. त्या दिवशी वडिलांनी त्यांचे कपाट आवरले होते. त्या आवरा-आवरीनंतर बराच सुका कचरा फेकून दिल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. काहीच मिनिटांपूर्वी आमच्या इमारतीत कचरा गोळा करायला येणाऱ्या बाईला, आमच्या घरातला सगळा सुका कचरा आम्ही दिला होता. मशीन कचऱ्यात गेले असेल तर तिला शोधायला सांगावे म्हणून गडबडीने तिला फोन केला. तर ती म्हणाली, "अवो, आत्ताच तर सगळा कचरा महानगरपालिकेच्या गाडीवाल्याला दिला की!"
 
मग काय? आम्ही महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीचा माग काढत-काढत गेलो. बरेच लांब गेल्यावर एका सोसायटीच्या बाहेर ती गाडी दिसली. त्या गाडीवरचा असंख्य पोत्यामधून, आमच्या इमारतीतील पोते आम्ही अंदाजाने शोधून काढले. ते पोते उलटे करून बघितले. पण त्या पोत्यामध्ये ते मशीन काही सापडले नाही. 

हताश होऊन आणि काहीसे वैतागून आम्ही घरी परत आलो. मशीन शोधण्याच्या नादात, घरात बराच पसाराही आम्ही करून ठेवला होता. तो आवरण्याचे  काम होतेच. माझे वडील तोंड पाडून, एका कोपऱ्यात बसून होते. आपल्यामुळे आपल्या मुलीला आणि जावयाला त्रास सहन करावा लागतोय, अशी कमालीची अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. आम्ही दोघांनी त्यांना धीर दिला. आजच नवीन मशीन घेऊन टाकूया असे सांगितले आणि घरातला पसारा आवरायला लागलो. आवरून झाल्यावर जरा नीट स्वच्छता करावी या हेतूने वडलांच्या खोलीतले टेबल पुढे ओढून त्यामागून व त्याखालूनही पुन्हा झाडून घेतले. टेबल भिंतीकडे सरकवत असतांना, टेबलाच्या मागच्या पट्टीला ते मशीन अडकून, लटकलेल्या अवस्थेत दिसले! 

आम्हाला सर्वांनाच काय आनंद झालाय म्हणून सांगू!

त्याच कर्णफुलाची काल संध्याकाळी घडलेली गोष्ट. 
वडिलांच्या एका कानातले मशीन जरा विचित्रपणे बाहेर आल्याचे मला जाणवले. पाहते तर काय, कानाच्या मागे बसणार मशीनचा मुख्य भाग व्यवस्थित होता, पण कानाच्या आत जाणारा छोटा रिसीव्हर मात्र गायब झालेला दिसत होता. पुन्हा घर झाडणे, गाद्या उलट्या-पालट्या करणे, चादरी झटकणे, ठिकठिकाणी शोधाशोध करणे हे सगळे सोपस्कार झाले. पण तो तुकडा काही मिळेना. सहज माझ्या डोक्यात काहीतरी आले. मोबाईलच्या टॉर्चने, वडिलांच्या कानाच्या आत प्रकाशझोत टाकला, तर काय? तो तुकडा तुटून, त्यांच्या कर्णनलिकेच्या (Auditory  Canal) बराच आत रुतून बसलेला दिसला! मग सर्जिकल चिमट्याच्या साहाय्याने, आम्ही तो मोठ्या खुबीने बाहेर काढला.

 
कर्णफुले हरवण्याच्या आणि गवसण्याच्या या काही गमतीदार गोष्टी षट्कर्णी व्हाव्यात यासाठीच हा लेख!

रविवार, ५ मे, २०२४

जागतिक हास्यदिन?


आज सकाळी नेहमीप्रमाणेच फिरायला गेले होते. तिथे ठिकठिकाणी घोळक्यामधे उभे राहून काही मंडळी जोरजोरात हासताना दिसली. तशी ती मंडळी नेहमीच हासतात. पण आज जास्त जोरात हासत होती! समाजमाध्यमांतून आज 'जागतिक हास्यदिन' असल्याचे कळले आणि मला हासायलाच आले.





अमेरिकन लोकांनी mother's day आणि father's day साजरा करायला आपल्याला शिकवले. खरंतर आई-वडिलांवर प्रेम करायला, त्यांच्या ऋणांची उतराई करायला एखादा दिवस राखून ठेवण्याची कल्पना सुद्धा मला हास्यास्पद वाटते. पण डॉकटर मदन कटारिया, या एका भारतीय डॉक्टरने जगाला 'हास्यदिन' साजरा करायला शिकवले, हे वाचून कुठेतरी बरे वाटले. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी, उकाड्याने हैराण झालेलो असतानाही 'हास्यदिन' साजरा करायच्या निमित्ताने लोकं जोरजोरात हसायला लावणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे!

सध्या निवडणुकीचे वारे चालू असल्याने आपल्या सर्वांना नेतेमंडळी हासण्याची भरपूर संधी देत आहेत. समाजमाध्यमामधून नेत्यांवर किंवा राजकीय पक्षांवर होणाऱ्या टिप्पण्या, कविता, मिम्स आपल्याला सात हसवत राहत आहेत. 

पण खरं सांगा  हासायला आपल्याला काही कारण लागते का?

सकाळी बरेचदा फिरायला बाहेर पडते तिथे काही व्यक्ती वरचेवर भेटतात. अशा व्यक्ती कधीकधी माझ्याकडे बघून हासतात. कधी मी अशा व्यक्तींकडे बघून मी हासते. मी त्यांच्या हास्याचे आणि ते माझ्या हास्याचे, हासून स्वागत करतो. आमची अगदी छोटीशी 'हास्यमैत्री' होते. ती मैत्री जवळपास नि:शब्द असते. परस्परांकडे बघून हासण्यापेक्षा ती फार पुढे जाते असे नाही. पण रोज असे हासरे चेहरे मनाला आनंद देऊन जातात, हे मात्र खरे.

सिग्नल नसलेल्या रस्त्यावर, एखादा वाहनधारक आपल्या कडे बघत, सुहास्य करत आपल्याला त्याच्या किंवा तिच्याआधी जाण्याची खूण करतो. कधीकधी आपणही असे हासून  दुसऱ्याला आपल्या आधी जाण्याचा इशारा करतो. भर रहदारीच्या रस्त्यावर, आपण कातावलेले असताना हे हास्य दोन्ही पक्षांना सुखद वाटते.

व्हॉट्सअप, फेसबुक, इंन्टाग्रॅम मुळे तर क्षणाक्षणाला हास्याची कारंजी उडत असतात. त्या पोस्ट वाचून/ऐकून/बघून आपण प्रत्यक्षात हासतोच पण पोस्टकर्त्याला स्माईलींची बरसात करून 'हास्यपावती' पाठवतो.

थोडक्यात काय? दिवसभर अनेक कारणांमुळे मी हासतच असते. हास्यदिन साजरा करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक दिन हा 'हास्यदिन' समजून साजरा करत राहायला काय हरकत आहे?

 डॉक्टर स्वाती बापट, पुणे

रविवार, ७ एप्रिल, २०२४

अलगद झेलणे...

आज पहाटे आमच्या घराजवळच्या आर्मी सब एरियाच्या मैदानामध्ये फिरायला गेले होते. तिथे चालण्यासाठी एक छोटाच पण अगदी छानसा सिन्थेटिक ट्रॅक केलेला आहे. त्या मैदानाच्या आवारात खूप जुनी, मोठमोठालीं झाडे आहेत. त्या झाडांची सावली वॉकिंग ट्रॅकवर पडते. तसेच त्या झाडांवर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी किलबिल करत असतात.  वॉकिंग ट्रॅकच्या कडेकडेने रंगीबेरंगी फुलांची झुडपे लावलेली आहेत. एकूणच, या सर्व वातावरणात चालणे अतिशय आनंददायी असते.  

आज चालताना ट्रॅकच्या बाजूच्या हिरव्यागार झुडुपावर (Calyptocarpus Vialias) लक्ष गेले. वसंत ऋतूमध्ये या झुडुपावर अतिशय नाजूक अशी पिवळी धमक्क फुले येतात. गर्द हिरव्या पानांच्या मखमली पार्श्वभूमीवर ती पिवळी फुले उठून दिसतात. ते बघायला मला खूप आवडते. आज, नेहमीच्या फुलांबरोबरच, पण या झुडुपाच्या फुलांपेक्षा वेगळ्या आकाराची लहान-मोठी अनेक पिवळी फुले या झुडुपावर मला दिसली. मी जरा निरखून बघितल्यावर, ती फुले या झुडुपाची नसून, शेजारी असलेल्या पिवळ्या गुलमोहोराची (Peltophorum Petrocarpum) फुले आहेत असे लक्षात आले. त्या झाडाची फुले गळून खाली असलेल्या या हिरव्या झुडुपावर पडलेली होती. या झुडुपाने, जणू आपलीच फुले असल्यासारखी पिवळ्या गुलमोहराची ती फुले आपल्या अंगाखांद्यावर अलगद झेललेली होती. ते बघून मला, माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली.  

पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले अगदी हक्काने मामाच्या घरी जात. मामा-मामीची तीन-चार मुले आणि पाहुणे म्हणून आजोळी आलेली पाच-सहा भाचरंडे अगदी गुण्यागोविंदाने तिथे नांदत. स्वतःच्या मुलांमध्ये आणि नणंदांच्या मुलांमध्ये कुठलाही भेदभाव न करता, आमच्या माम्या सर्व मुलांना प्रेमाने खाऊ-पिऊ घालायच्या, त्यांचे रुसवे-फुगवे काढायच्या आणि त्यांचे अमाप लाड करायच्या. त्यामुळेच आमच्या पिढीतल्या सर्वच मुलांचा 'मामी' हा एक जिव्हाळ्याचा विषय असायचा. आजोळी एकत्र जमलेले ते लेंढार आनंदाने आणि अलगद 'झेलणाऱ्या' त्या माऊल्या खरोखर कौतुकाला पात्र होत्या! 

एखाद्या प्रसंगाला, किंवा व्यक्तीला 'झेलणे' या उक्तीमधे जरासा नकारात्मक भाव आहे.पण 'अलगद झेलणे' असं म्हटलं की त्या उक्तीला एक सकारात्मकता येते. आजकालची अनेक मुले लग्नच करायला नको म्हणतात. बरं, लग्न केलेच तर आम्हाला मूल नकोच आहे, एकापेक्षा जास्त तर नकोच नको, अशीच विचारसरणी हल्ली होत चालली आहे. आमच्या नंतरच्या पिढीतली कित्येक नाती आधीच हद्दपार होऊन गेली आहेत. आता तर काय? दर घरटी फक्त एकच मूल असल्याने मुलांना भावंडंच नसतात. त्यामुळे त्यापुढच्या पिढीत सख्खा मामा, मावशी, काका आत्या ही नाती नाहीत मग आते, मामे, चुलत आणि मावस भावंडे कुठून असणार? 

आजोळी जाणे, मामा-मामीच्या अंगाखांद्यावर अलगद खेळणे, मामीशी गुळपीठ असणे आणि हितगुज करणे  या सगळ्या गोष्टींना भावी पिढीला मुकावे लागणार आहे. आपला संपूर्ण समाज कुठेतरी निसर्ग-नियमाच्या विरोधात चालला आहे असं मला वाटतं. पटतंय का तुम्हाला?



        

बुधवार, २० मार्च, २०२४

चिमणी पाहावी शोधून!

आज २० मार्च, म्हणजे जागतिक चिमणी दिवस. 

वळचणीला बसलेल्या आणि सर्वत्र चिवचिवाट करत असलेल्या असंख्य चिमण्या मी लहानपणी पहिल्या होत्या. आज चिमणीचे दर्शन केवळ स्वप्नांमधेच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या दुर्लक्षित पक्ष्यासाठी पुढे कधीतरी एखादा 'जागतिक दिवस' राखून ठेवला जाईल असे लहानपणी मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.  

रोजच्याप्रमाणेच आजही सकाळपासून दिवसभर व्हाट्सऍपवर केवळ चिवचिवाटच चालू होता. त्यामध्ये 'चिमणी' या विषयावरचे बरेच लेख, कविता आणि विनोदही होते. आमच्या शाळेतल्या एका शिक्षिकेचे टोपणनाव विद्यार्थ्यांनी 'चिमणी' असे ठेवले होते. आमच्या शाळेच्या व्हाट्सऍप ग्रुपवर एका वात्रट विद्यार्थ्याने आज त्या 'चिमणाबाईंची' सुध्दा आवर्जून आठवण काढली! पण गेले काही दिवस माझ्या मनामध्ये मात्र एक वेगळीच चिमणी चिवचिवत होती. आजच्या या 'जागतिक चिमणी दिनाचे' औचित्य साधून, त्या चिमणीवर एक लेख लिहून काढायचा मोह मला आवरला नाही!


आमच्या घराचे नूतनीकरण करण्याचा धाडसी निर्णय आम्ही नुकताच अमलात आणला. धाडसी निर्णय अशासाठी असे की नूतनीकरणाच्या काळामध्ये, गेले तीन महिने आम्ही आमच्याच घरामध्ये निर्वासितांसारखे राहत होतो. एक-दोन भिंती फोडणे, बाथरूम्स नवीन करणे, खिडक्या बदलणे अशा इतर कामांबरोबर आम्ही 'मॉड्युलर किचनही' करून घेतले. त्या किचनबरोबर 'चिमणी' अत्यावश्यक आहे, हे समजल्यामुळे 'किचन चिमणी'ची शोधाशोध सुरु केली. आजच्या काळात एखादी उडती-फिरती चिमणी शोधण्यापेक्षाही 'किचन चिमणी' शोधणे जास्त अवघड आहे, असे माझ्या लक्षात आले. अनेक वेबसाईट्स, यू-ट्यूब व्हिडीओ, मैत्रिणींची मते आणि समाजमाध्यमातील अनेक ग्रुप्सवर शोधाशोध केल्यावर मी जास्तच संभ्रमात पडले. 

मिळत गेलेल्या माहितीतील एकेक तपशील हळू-हळू डोक्यामध्ये शिरायला लागला. किचन चिमणी ६० आणि ९० सेंटीमीटर, अशा दोन आकारामध्ये येते. सर्वसाधारणपणे दोन-तीन बर्नर असलेल्या शेगडीसाठी ६० सेंटीमीटर आणि ४-५ बर्नर असलेल्या शेगडीसाठी ९० सेंटिमीटर्सची शेगडी असावी. तसेच आपल्या गॅसच्या शेगडीच्या लांबी इतकी किचन चिमणी घेतलेली उत्तम. माझ्याकडची गॅस शेगडी तीन बर्नरची असली तरी त्या शेगडीची लांबी जवळपास ७५ सेंटिमीटर्स भरली. पण ७५ सेंटिमीटरमधे अगदीच कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणि त्या चिमण्यांनाही ६० सेंटिमीटर्सच्या चिमणीचीच मोटार बसवलेली असते, फक्त वरची काच ७५ सेंटिमीटर्सची असते इतकेच. ही बाबा लक्षात आल्यावर मी ६० सेंटिमीटरची चिमणी घेण्याचे ठरवले. 

फिल्टरवाली चिमणी घ्यावी का फिल्टरलेस चिमणी घ्यावी? हा प्रश्न पुढे आला. फिल्टरवाली चिमणी घेणेच योग्य आहे, असे माझ्या अभ्यासांती लक्षात आले. कार्बन फिल्टर, मेश फिल्टर आणि बॅफल फिल्टर, अशी वेगवेगळी नावे ऐकून मला, इंग्रजीमधल्या 'to get baffled' या वाक्यरचनेचा अर्थ पुरेपूर कळला!

बरीच माहिती गोळा केल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे baffle न होता म्हणजेच बावचळून न जाता Baffle filter असलेली चिमणीच घ्यायचे पक्के केले. हा Baffle filter फोडणीतले तेल चिमणीच्या मोटारपर्यंत जाऊ देत नाही, असे असले तरी दर दोन-तीन आठवड्यातून तो फिल्टर स्वच्छ करण्याचे काम गळ्यात पडते, हेही खरे. मात्र हा फिल्टर वरचेवर स्वच्छ करून चिमणी वापरली तर  स्वयंपाकघरामध्ये चिकट मेणी साठत नाही हे विशेष. 

चिमणी ductless घ्यावी का ducted ? हा प्रश्न  त्यानंतर उद्भवला. चिमणीमधून हवा बाहेर फेकणारी duct त्याच्या मॉड्युलर किचनच्या सौंदर्यामधे बाधा आणते असे अनेक गृहिणींना वाटते. त्यासाठी त्या ductless  चिमणी घेतात. अशा चिमणीमध्ये वरच्या बाजूला एक कार्बन फिल्टर बसवलेला असतो. तो फिल्टर, स्वयंपाकघरातला धूर आणि वास काही प्रमाणात शोषून घेत असला तरीही बाहेर फेकू शकत नाही. तसेच स्वयंपाक करत असताना निर्माण होणारी वाफ आणि गरम हवासुद्धा ही चिमणी बाहेर फेकू शकतनाही. म्हणून मग स्वयंपाकघरातला उकाडा आणि कोंदटपणा कमी होत नाही. Ductless चिमणीमधे बसवलेल्या कार्बन फिल्टरमध्ये काजळी साठून तो दर चार-सहा महिन्यांनी गच्च भरतो आणि नीट काम करेनासा होतो. त्यामुळे कंपनीचा माणूस बोलवून कार्बन फिल्टर बदलावा लागतो. त्यासाठी दीड-दोनहजार रुपये मोजावे लागतात ते वेगळेच. चिमणीची duct डोळ्यांना खुपली तरीही चालेल पण माझे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणारी ducted चिमणीच मी घेणार, हे मी पक्के ठरवले. चिमणीच्या खालच्या बाजूला असलेला baffle filter तेल शोषून घेतो, आणि वास, धूर व गरम हवा बाहेर फेकण्याचे काम चिमणीतून घराबाहेर जाणारी duct करते.    

बाजारामध्ये 'ऑटो-क्लीन' आणि 'नॉन ऑटो-क्लीन'  अशा दोन प्रकारच्या चिमण्या उपलब्ध आहेत. 'ऑटो-क्लीन' चिमणीमध्ये एक बटन दाबले की त्या चिमणीच्या आतल्या बाजूला चिकटलेली मेणी वितळून एका ट्रेमध्ये साठते आणि चिमणी स्वच्छ होते. ही प्रक्रिया दाखवणाराने मस्त व्हिडीओ यू-ट्यूबवर बघायला मिळतात. आपल्या शरीरावर चिकटलेली मेणी, एखादे बटन दाबून बाहेर काढता आली तर किती बरे होईल, हा विचार ते व्हिडीओ पाहताना मनामध्ये आल्याशिवाय राहिला नाही! वर्षातून एकदा तरी कंपनीचा माणूस बोलवून 'नॉन ऑटो-क्लीन' चिमणी, आतून-बाहेरून स्वच्छ करवून घ्यावीच लागते. पण 'ऑटो-क्लीन' चिमणीसुध्दा तशीच दर वर्षी स्वच्छ करवून घ्यायला लागते, हे जसे समजले तशी मी 'ऑटो-क्लीन' चिमणी मनातून बाद करून टाकली. 

किचन चिमणी हे तसे बरेच महागडे प्रकरण आहे. इंटरनेटवर बघायला मिळत असलेल्या बऱ्याचशा 'मॉड्युलर किचन'मध्ये 'स्लॅन्टेड' किंवा तिरप्या छताच्या चिमण्या दाखवलेल्या असतात. तिरप्या किंवा स्लॅन्टेड चिमण्या जागा कमी व्यापतात, हे खरे आहे. पण आपण चिमणी ज्या कामासाठी विकत घेतो, त्यासाठी त्या अगदीच कुचकामी ठरतात. केवळ  'आमच्याकडे महागडी किचन चिमणी आहे बरं का!' अशी शेखी मिरवण्यासाठी स्लॅन्टेड चिमण्या उपयोगी पडतात! एखादी वस्तू जास्त महाग असली कि ती जास्त चांगली असते, अशी अनेकांची समजूत असते. पण  कित्येकदा तसे नसतेही. 

किती suction power असलेली चिमणी विकत घ्यावी हे ठरवण्यासाठी माझ्या मेंदूची बरीच पॉवर खर्च झाली. सर्वसाधारणपणे, सध्याच्या विभक्त कुटुंबात जेमतेम तीन-चार माणसेच असतात. स्वयंपाकघरेही जेमतेम १००-१५० चौरस फुटांची असतात. अशा घरामध्ये १०००-१२०० सक्शन पॉवरची (ताशी १०००-१२०० घनमीटर) चिमणी पुरेशी होते. अशा पॉवरच्या चिमणीचा आवाजही सुसह्य असतो.  १०-१२ लोकांच्या कुटुंबात, जिथे सतत आणि भरपूर स्वयंपाक होत असतो अशा कुटुंबासाठी १४००-१५०० पॉवर असलेली चिमणी लागते! पण अशा पॉवरबाज चिमण्यांचा आवाजही जबरदस्त असतो, हे लक्षात घ्यायला हवे. "तो आवाज ऐकल्यावर गिऱ्हाईक पॉवरबाज चिमणी घ्यायला तयार होत नाहीत, म्हणून आम्ही त्या चिमण्या शोरूम्समध्ये ठेवतच नाही" असे एका डीलरने मला दबक्या आवाजात सांगितले! पूर्ण विचारांती माझ्या किचनसाठी मी ११५० पॉवरची चिमणी निवडली. 

आपल्या हाताच्या इशाऱ्यावर चालू-बंद होणाऱ्या, वेग कमी-जास्त करणाऱ्या (मोशन सेन्सर किंवा gesture control ) अशा चिमण्या बाजारामध्ये येतात. आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर सगळे घर नाचावे अशी सुप्त इच्छा स्त्रीच्या मनामध्ये असल्यामुळे, तशी 'मोशन सेन्सर' चिमणी घेण्याचा मोह न पडला तरच नवल! पण तो मोह टाळणेच उत्तम. काही काळातच ते मोशन सेन्सर पॅनल बंद पडते, किंवा त्रास द्यायला सुरुवात करते आणि अखेर बदलावे लागते. खरंतर push buttons ने चालणारी चिमणी सर्वात उत्तम. पण हल्ली बाजारामध्ये तशी चिमणी सहजी उपलब्ध नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक बटन्स असलेली चिमणी विकत घ्यावी लागली. 

अशी 'सर्वगुणसंपन्न' चिमणी एकदाची माझ्या घरात येऊन बसली आणि मला अगदी 'हुश्श' म्हणावेसे वाटले. पण नुसते हुश्श म्हणून गप्प बसेन तर मी कसली?

म्हणून, माझ्या चिमणी-शोधमोहिमेचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तर हा चिवचिवाट!

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका- ४


१९६० च्या दशकामध्ये केंव्हातरी दादांनी सोमनाथ मंदिर बघितलेले होते. शिवाय, मंदिरामध्ये असलेली  तुफान गर्दी आम्ही आदल्या दिवशी पहिली होती. त्यामुळे १६ नोव्हेंबरला, आम्ही दादांना बरोबर न घेताच दर्शनाला जायचे ठरवले. आंघोळी करून आम्ही पाचजण पहाटे साडेसहा वाजेपर्यंत दर्शनाच्या रांगेमधे लागलो. पहाटेच्या वेळीही बरीच गर्दी होती. तरी आम्हाला सकाळची आरती बघायला मिळाली. आनंद, गिरीश आणि शिरीष पुरुषांच्या रांगेत आणि मी व प्राची बायकांच्या रांगेमध्ये होतो. कोणाजवळही मोबाईल नसल्यामुळे, दर्शनानंतर बाण-स्तंभाजवळ भेटायचे असे आधीच ठरवून ठेवले होते. काही वर्षांपूर्वी मोबाईलशिवायही आपले आयुष्य सुरळीत कसे चालू होते, याचे आज आश्चर्य वाटते. 

सोमनाथ मंदिर परिसरातील बाणस्तंभ हे एक मोठे आश्चर्य मानले जाते. या प्राचीन स्तंभावर असलेल्या बाणाचे टोक दक्षिणेला असलेल्या समुद्राकडे रोखलेले आहे. "आसमुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग" असा संस्कृत भाषेतला मजकूर या बाणस्तंभावर लिहिलेला आहे. सोमनाथ मंदिराकडून सरळ रेषेमध्ये दक्षिणेकडे सागरी प्रवास सुरू केल्यास, हजारो मैल दूर असलेल्या दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा तुकडादेखील वाटेत लागणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. कित्येक शतकापूर्वी, कुठलीही साधने अथवा उपकरणे नसताना, आपल्या पूर्वजांना हे सत्य कसे समजले असावे, याचे आश्चर्य वाटते. 

पहाटेच्या प्रसन्न वेळी फिरत-फिरत आम्ही सोमनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला. त्यानंतर आपापले फोन, पर्सेस वगैरे ताब्यात घेतले आणि जवळच असलेल्या जुन्या शिवमंदिरात गेलो. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी बांधलेल्या या जुन्या मंदिरामध्ये मात्र मोबाईल व इतर सामान नेण्यावर काहीही पाबंदी नव्हती. त्यामुळे तिथे आम्हाला फोटो काढता आले. दर्शन घेऊन झाल्यावर आनंद, शिरीष आणि गिरीश हॉटेलवर परतले. प्राचीला अभिषेक करायचा असल्याने आम्ही दोघी मागे थांबलो. प्राची भक्तिभावाने अभिषेक करत होती आणि मी नुसतीच 'मम' म्हणत होते. 


मुख्य सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा-अभिषेक इत्यादि करण्याची व्यवस्था नाही. ते सर्व विधी अहल्याबाईंनी बांधलेल्या जुन्या मंदिरातच करता येतात. त्याकरता ठरवून दिलेले शुल्क अनेक ठिकाणी फलकांवर लिहिलेले आहे. आपण जमा केलेले पैसे सोमनाथ ट्रस्टला मिळतात आणि ट्रस्टमार्फत नेमलेले गुरुजी ते विधी पार पाडतात. आपल्याला कोणी ओळखीचे गुरुजी हवे असल्यास त्यांच्याकडून आपण  विधी  करून घेऊ शकतो. पूजा झाल्यावर आम्ही दोघी हॉटेलवर परतलो. सोमनाथ देवळाच्या उत्तरेला काही अंतरावर प्राचीन सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे संग्रहालय आहे पण ते आम्ही पाहिले नाही. 

दुपारची विश्रांती झाल्यावर, आनंद, मी आणि गिरीश-प्राची असे चौघे सोमनाथमधील इतर देवस्थाने बघायला बाहेर पडलो. शिरीषला बरे वाटत नसल्याने तो दादांबरोबर हॉटेलमध्येच थांबला. आम्ही लक्ष्मीनारायणाचे देऊळ, सूर्यमंदिर, त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम मंदिर, गीता मंदिर, कामनाथ महादेव मंदिर इत्यादी अनेक मंदिरे बघितली. पाच पांडव गुहा सध्या बंद ठेवलेल्या असल्यामुळे त्या बघता आल्या नाहीत. भालका तीर्थ आणि देहोत्सर्ग स्थान ही दोन ठिकाणे भाविकांनी विशेष भेट द्यावीत अशी आहेत. पिंपळाच्या झाडाखाली झोपलेल्या श्रीकृष्णाला हरीण समजून व्याधाने बाण मारला आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा देहांत झाला अशी पौराणिक कथा आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी भालका तीर्थ आहे. हिरण नदीच्या काठावर देहोत्सर्ग तीर्थ आहे. तिथे भगवान श्रीकृष्णांच्या पावलांचा ठसा आहे. या दोन्ही मंदिरातही बरीच गर्दी होती आणि स्वच्छतेचा अभावच होता. 

सोमनाथ मंदिराच्या आवारात रोज संध्याकाळी ''light and sound show" असतो. त्या कार्यक्रमाची तिकिटे गिरीशने संध्याकाळी आधीच जाऊन काढली होती. कार्यक्रम उत्तम होता, पण त्यामध्ये मुख्य भर पौराणिक कथांवर होता. सोमनाथाचे देऊळ कोणी-कोणी आणि किती वेळा लुटले, याचा तपशीलही मिळेल या अपेक्षेने मी गेलेले असल्याने माझा थोडा अपेक्षाभंग झाला. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर, अंबानी कुटुंबियांनी बांधलेले 'सागर दर्शन' नावाचे अतिथीगृह आहे. तिथे रास्त दरामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. पण त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवरून, बरेच आधी अर्ज करून आरक्षण करावे लागते. तिथले जेवणही शुद्ध-सात्विक आहे असे समजले. 

मागच्या वर्षी आम्ही इजिप्तला गेलो होतो. मूर्तिभंजक आक्रमणकर्त्यांनी तिथल्या प्राचीन मंदिरांची केलेली तोडफोड आम्ही पाहिली होती. मोठमोठ्या शिळा वापरून उभारलेली ती मंदिरे आपल्या मंदिरांपेक्षा अतिभव्य आकाराची असल्याने आक्रमणकर्त्यांना ती पूर्णपणे उध्वस्त करता आली नव्हती. मात्र त्या धर्मांध आक्रमणकर्त्यांनी  इजिप्तवासीयांचा धर्म पूर्णपणे नामशेष केला. त्यामुळे, आक्रमण होण्यापूर्वी प्राचीन इजिप्तवासीयांच्या धर्माचे नेमके स्वरूप कसे होते? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला मिळत नाही. 

तुलना करायची झाल्यास, आपली मंदिरे जरी वेळोवेळी उद्ध्वस्त झाली तरी आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन  केला गेला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सोमनाथचे मंदिरही मुसलमान आक्रमकांनी कैक वेळा लुटून जमीनदोस्त केले. परंतु, प्रत्येक वेळी, तत्कालीन राजांनी ते मंदिर पुन्हा बांधून घेतले.  १९५१ साली पुनर्निमाण झालेले सोमनाथ मंदिर, सनातन धर्माच्या शाश्वततेचे प्रतीक म्हणून आज  दिमाखात उभे आहे. याच कारणामुळे हे  देऊळ बघण्याची माझी प्रबळ इच्छा होती. पण सोमनाथ मंदिराचा इतिहास बघता, एका गोष्टीचे मात्र मला कमालीचे वाईट वाटते. एकदा हल्ला झाल्यानंतर, आपल्या पूर्वजांनी या मंदिरावर पुन्हा-पुन्हा हल्ले का होऊ दिले? 

आजच्या युगात कोणी परकीय आक्रमक येऊन आपल्या मंदिरांवर हल्ला करण्याची शक्यता कमीच आहे. पण समाजमाध्यमांतून, जाहिरातींमधून, आणि लव्ह-जिहाद, सक्तीचे धर्मांतर अशा प्रकारातून, आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवर सतत हल्ला होतो आहे. झालेला प्रत्येक हल्ला परतवण्यासाठी आपण सक्षम असायला हवे. परंतु, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, हल्ला करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, यासाठी आपण सजग राहिले पाहिजे असे मला वाटते .  

(क्रमशः)